Thursday, April 12, 2007

आपले पु.ल.

"ए देशपांड्या, तुझा गाव कुठला रे? तू सुटीत कुठं जाणार?" शाळेतील सोबत्यांच्या अशा प्रश्नांना त्या मुलाकडे उत्तर नव्हते. कारण ज्याला गाव म्हणतात ते त्याला नव्हतंच. यामुळे त्याला खुप वाईट वाटायचं. तो सांगायचा, "माझं गाव नं ! माझा गाव कारवार." 

याला प्रत्युत्तर यायचं, "अरे, काय सांगतोस? कारवार कसं असेल? कारवारात नाडकर्णी, वागळे, मुजुमदार तेलंग, कैकणी राहतात. कारवारात देशपांडे नसतातच मुळी." 

"अरे पण, माझ्या आजोबांचे घर आहे ना तिथे. दुभाषी त्यांचं नाव. माझे आजी-आजोबा तिथे राहतात. मामा पण आहे. तेथे सदाशिवगड आहे. सुरुपार्क, काजूपार्क, चौपाटीपण आहे. हे तुला माहीती आहे का.? 

पु.लं. नी कोंकणी भाषेतून भाषणाचा आनंद वर्टी यांनी केलेला मराठी अनुवाद 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये प्रसिध्द झाला होता. त्यात वरील उल्लेख आहे. 

पु.लं. लिहीतात, "खरं सागांयच तर आम्ही देशपांडे बेळगावचे, पण तेथे आमचे घर नाही, शेती नाही, मायेची माणसं नाहीत. कायद्याने बघितंल तर मी कारवारचा नाही, पण भावनेच्या नात्याने मी कारवारचा." 

पु.लं. ना कारवारचे इशाड आबें, तेथील विपुल निसर्गसौंदर्य खूप आवडायचे. सुरूपार्क्मधून पाहिलेल्या सूर्यास्ताचे खूप खूप रंग, काजूबागहून दिसणारा सदाशिवगड हे सारं पु.लं. च्या अंतःकरणाच्या एका कोप-यात राहिलं आहे. रवीन्द्र्नाथ टागोर कारवारचा समुद्र्किनारा पाहून वेडे झाले होते असे म्हणतात.

पु.लं. चे मातूल घराणे कारवारचे असले तरी त्यांचा जन्म मुंबईतील गावदेवी भागातील कृपाळ हेमराज चाळीत १९१९ साली झाला. मुबंईतील गिरगाव गावदेवी भागातील चाळीतून राहणा-या काही कारवारांनी जोगेश्वरी या उपनगरात जाऊन तेथे सहकारगृहाची बांधणी केली त्यात पु.लं. च्या आजोबांच्या सहभाग होता. पु.लं. च्या आजोबांनी लेखनासाठी 'रुग्वेदी' हे टोपणनाव घेतेले होते. पु.लं. ची आई ही त्यांची एकुलती एक मुलगी. त्यांना तिला खूप शिकवायचे होते. परंतू तो काळ अनुकुल नव्हता व आजी जुन्या मतांची असल्यामुळे ते शक्य झाले नाही. रुग्वेदी विचाराने सुधारणावादी असले तरी घरी रोज षोडपचार पूजा होई. त्यांनी पु.लं. च्या आईला पूजा व गणपतीची प्राणप्रतीष्ठा शिकवली. ते 'अण्णा' या नावाने ओळखले जात. ते उत्तम लेखक होते. त्यांनी खूप मेहनत करून "आर्याछ्या सणाचा ईतिहास' लिहिला व त्या पुस्तकाला कै. वासुदेव गोविंद आपटे यांनी पेस्तावना लिहिली होती. आगरकर, रानडे हे त्यांचे आदर्श होते. त्यांनी 'समाजोन्नती' या नावाचे नाटक लिहिले. पन्नाशी उलट्यावर बंगाली शिकून रवीन्द्र्नाथ टागोरांच्या 'गीतांजली' चे मराठी रूपांतर 'अभंग गीतांजली' या नावाने त्यांनी प्रसिध्द केले. त्या वेळी पु.लं. शाळकरी वयाचे होते. पु.लं. च्या घरात त्यांच्या आजोबांच्यामुळे रवीन्द्र्नाथांच्या प्रवेश झाला होता. पु.लं. पंचविशीत असताना त्यांनी रवीन्द्र्नाथ अ शरदबाबू मराठी व इंग्रजीतून वाचलेले होते. पन्नाशी ओलांडल्यावर त्यांनी हे दोन थोर लेखक मूळ बंगालीतून वाचण्याची ओढ लागली व त्यांनी शांतिनिकेतनला मुक्काम ठोकायचा बेत पक्का केला. 

आजोबांच्याकडे भरपूर शब्दभांडार होते. कानडी, बंगाली, हिन्दी, इंग्रजी, गुजराती, कोंकणी या भाषांचे ते जाणकार होते. आचार्य काका कालेलकर हे त्यांचे शिष्य होत. आपल्या आजोबांबद्दल `गणगोत' मध्ये पु.लं. लिहितात, "अण्णांना वक्तुवाचे देणे होते. सहद्य विनोदबुद्धी होती. परिश्रमाची पराकाष्ठा कराण्याची ताकद होती. आणि या साऱ्यांच्या जोडीला वाड:मयाच्या परिशीलनाने आलेली नम्रता होती." पु.लं. ना हाच वारसा मिळाला. पु.ल. कधीही प्रतिपक्षावर तुटुन पडत नसत. या संदर्भात त्यांनी एका लेखात लिहीले, "कुणावरही अतोनात चिडून तुटुन पडायचं हे मला जमतच नाही. कोणाचाही पाण उतारा होऊन तो खाली मान घालून गेला ते दृश्य मला पहावत नाही." 

पु.ल. ची आजी 'बाय' या नावाने ओळखली जायची. तिचे नाव होते 'तुळशी'. पु.ल. चे बरेचसे बालपण त्यांच्या आजोळी गेले असल्यामुळे तेथील आठवणी `बाय' या शब्दचित्रात `गणगोत' मध्ये ग्रथित केल्या आहेत. घरातील पोराबाळांनी भरपूर जेवावे म्हणुन बायने एक युक्ती योजली होती. आजोबा दररोज देवाला नैवेद्द दाखविण्याच्या वेळी मंत्राबरोबर अन्नपदार्थात एक-एक तुळशीचे पान टाकत असत. पोराबाळांच्या पंगतीत ज्या ज्या ताटात तुळशीचे पान येईल तो पुण्यवंत अशी त्यांची समजुत करुन दिलेली होती. बाय विनोदी किस्से, गमतीजमती सांगुन हसवायची. तिच्या बोलण्यात चारपाच उपमा येऊन जात. बायच्या उतारवयात पाचवारी साडीची फॅशन रुढ होऊ लागली होती. तिच्या दुष्टीने पाचवारीतल्या बायका `उभ्या वळकट्या' होत्या. ती नकलाही चांगल्या करायची. फॅशनेबल मुलींची ती अशी नक्कल करीत असे - "अहो, काय करावं? मला म्हणजे टायमच नाही. मॉर्निंगपासून इव्हिनिंगपर्यंत सारखी बिझी बिझी बघा. सारखं वर्क, वर्क, वर्क..." अशा त-हेने पु.ल. ना विनोदाचा वारसा त्यांच्या मातुल घराण्यातुन मिळाला व मोठेपणी निष्ठेने व व्यासंगाने त्यांनी विनोदाचे दालन अधिक समृद्ध करून महाराष्ट्राला खळखळून हसविले.

पु.ल. ची आजी पद फारच गोड गायची. हा गाण्याचा वारसा पु.ल. च्या मातोश्रींकडे आला व त्यांच्याकडून त्यांच्या सुपुत्राकडे. याबाबत पु.ल. लिहीतात, "एक माझे आजोबा सोडले तर सारे आजोळ आणि घर गात होते. वयाच्या अठरा-एकोणीस वर्षापर्यंत मी सुरांच्या साथीत वाढलो." 

बायने गंधर्वाची नाटके सुद्धी बरीच पाहिली होती. पु.ल. नी आजीबरोबर तुकाराम सिनेमा पाहिला होता. शो संपल्यावर आतील प्रेक्षक बाहेर येण्याआधीच पुढच्या खेळाची गर्दी आत येत होती. ते पाहून आजी म्हणाली, "तो तुकारामाचा पार्टी गाऊन गाऊन क्षय रोगाने वैकुंठाला जायचा," यावर पु.ल. म्हणाले, "तो पुढच्या शोला परत जिंवत होऊन येणारच आहे." 

पु.ल.नी संगीताची आराधाना वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी सुरू केली. पु.ल. च्या आईवडिलांनी लहानपणी त्यांच्या गुणांची जोपासना केली. पु.ल. च्या मातोश्रींना संगीत, पेटी शिकण्याची फार हौस होती, पण संसाराच्या जबाबदारीमुळे ती पुरी झाली नाही. तेव्हा आपल्या मुलाने संगीतक्षेत्रात जावं असं त्यांना वाटल्याने पु.ल. ना पेटी शिकण्यासाठी पाठविले. पु.ल. च्या पेटीवादनाला बालगंधर्वानी त्यांच्या पाठीवरून हात फिरवून शाबासकी दिली, त्यावेळी हॉलमध्ये बसलेल्या पु.ल. च्या वडिलाचे अंतक:रण गहिवरुन आले. बालगंधर्वाचे गाणे व अभिनय हे देशपांडे कुटुंबाचे कुलदैवतच आहे असे म्हणायला हरकत नाही. पु.ल. च्या वडिलांनी षौक केला तो बालगंधर्वाच्या गाण्याचा. पु.ल. च्या वडिलांनी सुपारीचे सुद्धा व्यसन नव्हते. पण मुंबईत गंधर्व मंडळी आली की ते मोठ्या उत्साहाने नाटकांची तिकीटे काढीत. पु.ल. ना बालपणीच मोठ्या कलाकारांची नावे वडिलांकडुन ऎकायला मिळाली. 

पु.ल. ना अनेक कला अवगत होत्या. या संदर्भात अनेकांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत पु.ल. सांगत, "या सर्व कलांमध्ये मला संगीत प्रिय आहे. संगीत हे माझे पहिले प्रेम आहे. Music is my First Love. मी संगीताला दुय्यम स्थान कधीच दिलं नाही. या कलेत माझे स्थान आहे हे मला आधीच कळायला लागले. संगीतात असतात फक्त सूर व साहित्यात असतात फक्त शब्द मला वाटे. या क्षेत्रांत आपण कुठंपर्यत जाऊन? बालगंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व अशा दिग्गजांपर्यंत पोहचण्याची ताकद आपल्या पंखात नाही हे मला समजलं. संगीतात मी कोणत्याही घराण्याचा गंडा बांधला नाही. जे गाणे आवडेल ते मी मनमुराद ऎकत असे." 

थोडक्यात म्हणजे संगीत पु.ल. च्या जीवनाच्या प्राण होता. सुर त्यांच्या मुखात लीलया येत असत. त्यांना सूर जणू काही आंदण मिळाले होते. 

एक मध्यमवयीन गृहस्थ आपल्या नऊ-दहा वर्षाच्या मुलाबरोबर मुगभाटातून येत होते. तेवढ्यात त्यांचे लक्ष नाक्यावरच्या हॉटेलातून उतरणाऱ्या एका देखण्या गृहस्थाकडे गेले. 

"अरे, तो बघ कृष्णा गोरे ! काय योगायोग आहे बघ. पुरुषोत्तमा, उद्दा आपल्याला कृष्णा गोऱ्याचे `प्रिये पहा रात्रीचा समय सरूनी येत उष:काल हा...' ऎकायचे आहे नं? पुरुषोत्तमा, आपल्याबरोबर उमाकांतलाही आणायचे बरं का!" 

त्या काळात मुंबईवर बालगंधर्व मोहिनी घालून बसले होते. लक्ष्मणरावांना बालगंधर्वाचा अभिनय व सुरेल स्वर अतिशय प्रिय होते. गंधर्व मंडळी मुंबईला आली की ते स्वत: जाऊन नाटकांची तिकीटे काढत. नाटक पहायला त्यांची दोन्ही मुलंही असत. त्यांनी `एकच प्याला'. `स्वयंवर' किती वेळा पाहिले असेल देव जाणे. नाटक सुरू होण्याआधी ते मुलांच्या बोटाला धरून थिएटरपुढे बराच वेळ उभे असत, व तेथे ते मुलांना नाट्यविषयक गोष्टी सांगत. "अरे पुरूषोत्तमा, नारायणरावांना बालगंधर्व ही पदवी कोणी दिली हे तुला सांगतो; ती आपल्या लोकमान्य टिळकांनी दिली. त्यावेळी पुण्यात प्लेगने कहर केला होता. गावातील रहिवासी वेशीबाहेर उभारलेल्या झोपड्यांतून निवाऱ्यासाठी गेले. अशाच एका झोपडीत लोकमान्यांचा निवासा होता. तेथेच `केसरी' वृत्तपत्राच्या कर्मचारी मंडळींनी गाण्याचा कार्यक्रम केला. गायन चालू असताना लोकमान्य टिळक समोर फेऱ्या मारत होते. "वा ! वा ! या बाळाच्या चांदण्याच्या स्वरांनी मला मोहून टाकले आहे." लोकमान्य स्वत:शीच म्हणाले. दुसऱ्या दिवशी `केसरी'तून समस्त पुणेकरांना या पोरसवदा गायकाला `बालगंधर्व' या पदवीने लोकमान्य टिळकांनी गौरविले आहे ही शुभवार्ता समजली. 

अल्लादियाखॉं, कृष्णा गोरे, तिरखवॉं, कादरबक्ष अशा कलाकांराची नावे पुरुषोत्तमने आपल्या वडिलांकडून प्रथम ऎकली होती. पु.ल. नाटक या नावाशी परिचीत झाले ते जोगेश्वरीच्या सोसायटीत या नावानेच ओळखली जायची. १९२५-२६ साली याच सोसायटीत पु.लं. नी पहिले नाटक पाहिले. त्याचे नाव होते `पुण्यप्रभाव'. ते पहिले नाटक पु.लं. च्या द्दुष्टीने एक चमत्कारच होता. त्या नाटकातील पात्रयोजना तर कित्येक वर्ष त्यांच्या स्मरणात राहिली होती. त्यातून ते नाटक स्त्रीपात्रविरहित होते. पु.ल. ना खेळात रुची नव्हती, पण नाटकांचे वेड होते. नारायणमामा (सतीश दुभाषींचे वडील) हे त्यांचे आदर्श होते. मामाची नाटक मंडळी रामायण, हाणामारी म्हणजे राम-रावण युद्धावर आधारित नाटके करीत. पु.ल. व इतर बालचमू वानरसेनेत सामील होऊन पुढ्याचे मुकूट, धनुष्यबाण, अर्ध्या चड्ड्यांना शेपटं लावून सोसायटीत प्रयोग सादर करीत. 

पु.ल. चा खेळांपेक्षा संगीत, साहित्य, नाटक, वक्तृत्व, नकला या कलांकडे अधिक होता. पु.ल. च्या वडिलांना गाण्याची भारी हौस होती.

पु.ल. ना नाट्याचे शिक्षण लहानपणीच मिळाले. नाटकातील पात्रयोजना, संगीत किंवा गद्द नाटक, संवाद लेखन, नेपथ्य अशी नाट्यकलांची ब्रिजे पु.ल. च्या मनात जोगेश्वरीच्या सारस्वतबागेत रुजली. सोसायटीतील नाटके पाहिल्यावर त्यांच्या मनात आले,`अरे पुरुषा, नाटक असं असतं काय! नाटक असं बसवतात काय!' आपणही नाट्यलेखनात का हात घालू नये, हा विचार त्यांच्या मनाला स्पर्श करून गेला. अशा तऱ्हेने त्यांच्या बालपणाची जडणघडण नाट्यसृष्टीच्या सान्निध्यात झाली. 

१९४४ सालातील ही कथा आहे. दादरच्या एका हायस्कूलमधील दहावीचे विद्दार्थी शिक्षकांची वाट पाहत होते. शिक्षक न आल्यामुळे वर्गात गलका वाढत होता. तेवढ्यात स्वच्छा पायघोळ लेंग्यातील कुरळ्या केसांच्या एका पोरसवदा शिक्षकाने वर्गात रुबाबात एंट्री घेतली. जोधपुरी फॅशनचा कोट, डोळ्याला चष्मा, साधारण सावळ्या वर्णाच्या या तरतरीत नवीन सरांकडे पाहून सारा वर्ग स्तब्ध झाला. सर काय सांगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. गणिताचा तास होता. पण सर म्हणाले."मुलांनो, आज गणिताऎवजी आपण जनरल नॉलेजचा पिरिअड घेऊ या ! चालेल नं?" नवीन संराचे हे शब्द ऎकताच वर्गात आनंदाची एक लहर पसरली. सर्वजण मोठ्या उत्सुकतेनं सरांकडे पाहू लागले. सरांनी त्या तासाला नाट्य, साहित्य, चित्रपटांसंबंधी अनेक प्रश्न मुलांना विचारले. पिरिअड केव्हा संपला हे कुणालाच समजले नाही. सर जायला निघाल्यावर सर्व विद्दार्थी सरांभोवती गोळा झाले. "सर, सर, आपले नाव काय?" मुलांनी विचारले. उत्तर आलं, "देशपांडे!" 

क्रमश..

0 प्रतिक्रिया: