Thursday, September 1, 2022

पु.ल. आणि ना.ध. महानोर - निशिकांत ठकार

श्री ना. ध. महानोर लिखीत 'आनंदयोगी पु.ल' ह्या पुस्तकातील श्री निशिकांत ठकार ह्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही भाग.

...मध्यवर्गीय मानसिकतेच्या मर्यादा तोडण्याचा प्रयत्न पु. ल. करायचे. महानोरांविषयीची आत्मीयता कदाचित या पोटीही असेल. प्रत्यक्ष शेतीशी संबंध जोडायला पु. ल. व सुनीताबाई दोघांनाही आवडायचे. बापू कांचन हा एक शेतीचा दुवा होता. महानोरांनी पु. लं. च्या कृषिसंस्कृतीच्या प्रेमाच्या आठवणी लिहिल्या आहेत. त्यात पु.लं. च्या मृद्गंधप्रेमाची असोशी जाणवते. महानोर, कांचन आदी मंडळी म्हणजे शेतावर जायच्या पायवाटा होत्या. महानोर यांच्या पळसखेडला मंडळी पोहोचली. बापू कांचन व महानोरांचे वडील शेतीप्रश्‍नावर चर्चा करीत होते. पु. ल. म्हणाले, 'आम्हांला यातलं काहीच कळत नसलं तरी मोठ्यांदा बोला. काही शिकता आलं नाही, पण समजेल तरी.' पु. ल॑. ना प्रत्येक गोष्टीत लहान मुलासारखी जिज्ञासा होती हे अर्धसत्य आहे. त्यात निरागसपणा होता, उत्साह होता, पण जीवनासंबंधीचे चिंतनही होते. संस्कृतिसंबंधीचा काही विचारही होता. भारत हा कृषी-संस्कृतीचा देश आहे. त्यातली काहीतरी अक्कल आपण उसनी का होईना घेतली पाहिजे, अशी देशी जाणीवही त्यात होती.
भाईकडेच महानोरांना गोविंद तळवलकर भेटले. त्यांच्याकडे भाईंची तक्रार “तुम्ही 'महाराष्ट्र टाइम्स' मध्ये शेती फार कमी आणता” आणि महानोरांचे शेतीविषयीचे लेखन सुरू झाले. लिहायलाच नव्हे तर प्रत्यक्ष कार्य करायलाही त्यांना प्रेरणा मिळाली. पक्षीनिरीक्षण, निसर्गसौंदर्यदर्शन यांत तर भाईंनी रस घेतलाच, पण महानोर रवींद्रनाथ टागोरांच्या वाटेनं जातोय याचंही कौतुक केलं. ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृतीचं मीलन पु. लं. ना अभिप्रेत होतं. रवींद्रनाथांनी पहिली शेतीची शाळा काढली, नव्या शेतीचं शास्त्र आणलं. पु. लं. नी एक वेगळा रवींद्रनाथ अधोरेखित केला.
   
शहरात राहणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाचे वावर हरवलेले आहे. शेताकडे वावरण्याच्या त्यांच्या वाटा बंद झालेल्या आहेत. त्यांचा शोध तो साहित्यातून-कवितेतून घेऊ पाहतो. रानातल्या कवितांचा अस्सलपणा पु.लं. ना पळसखेडला जायची प्रेरणा देतो. खरं तर जीवनाच्या आणि विशेषत: कलेच्या, सर्वच क्षेत्रांतल्या आणि पारदर्शी, सुंदर आणि रमणीय अनुभवांचा शोध घेत पु.लं. नी आपलं व्यक्तिमत्व समृद्ध, सुजाण आणि सुस्कृंत केलं. एका चांगल्या अर्थानं हा एक वेडा माणूस होता. जे रम्य आहे ते बघून त्याला वेड लागायचे. जे रम्य नाही ते बघून त्याच्यावर वेडं व्हायची पाळी यायची तेव्हा तो विनोद करायचा. रम्य म्हणजे नुसते मनोहर नाही. ते तर आहेच, पण त्या सौंदर्यबोधात माणुसकीचा आणि सर्जनाचा साक्षात्कारही त्याला हवा असायचा. त्यामुळेच हा रसिकोत्तम कलावंत कलाप्रेमी होता तसाच माणुसप्रेमीही होता. जिथे काही रचनात्मक चालले असेल तिथे त्याचा ओढा असायचा. रचनात्मकतेत सर्जनात्मकतेचा प्रत्यय आला तर तो त्याच्यावर जीव ओवाळून टाकायचा. हा भावबोध अर्थपुर्ण करण्याचे काम सुनीताबाई करायच्या. ही भाईंची इच्छा म्हणून मम म्हणायच्या. महानोरांनी असे प्रसंग अनुभवले. ’जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे’ ये पु.लं. च्या आयुष्याचे ब्रीद महानोरांनी नेमके हेरले. पु.लं. बरोबर घालवलेल्या क्षणांत हाच आनंद भरून राहिलेला त्यांनी अनुभवला त्याला निर्मळ हास्यविनोदाचा सुंगध लाभलेला होता. पु.लंच्या रम्यतेच्या कल्पनेत सौंदर्यबोध आहे तशीच एक नैतीकताही आहे. त्यामुळेच ते संस्कृतीच्या विविधतेचे महत्व मानतात. देव न मानणारे पु.ल. नास्तिक वाटत नाहीत कारण त्यांनी शिवत्व स्विकारलेले आहे. त्यांना सर्वोत्तमाचे वेड आहे. देव नाही पण बालगंधर्व चार्ली चॅपलीन, रविंद्रनाथ यांसारखी दैवते ते मानतात आणि महानोरांसारख्या विवीध क्षेत्रांतल्या विवीध प्रतिभांचे स्वागत व कौतुक करतात. ते मुळातच बहुवचनी आहेत. त्याशीवाय संस्कृतीची वाढ होत नाही. जे आहे त्यापेक्षा जग चांगले व्हावे, सर्जनशील व्हावे, मानविय व्हावे ही त्यांची नैतीकता आहे.

हरवत चाललेल्या मध्यमवर्गीय मूल्य-जाणिवांच्या स्मरण-रमणीतेत हरवणारा कलावंत लेखक म्हणून पु.लं. ना ओळखणारे काही समिक्षक आहेत. हेच त्यांच्या लोकप्रियतेचं महत्वाचं कारण आहे, असेही त्यांना वाटते. पण पु.ल. वर्गीय जाणीवांनी मर्यादीत नाहीत. आधुनिकतेच्या नव्याच्या विरोधात नाहीत. जे जात आहे त्याची हळहळ अवश्य आहे, पण जे येत आहे ते तेवढ्या गुणवत्तेचे नाही याचा त्रास आहे. तरीही पु.लं. हे स्वागतशीलच राहिलेले आहेत. ते मूळतत्ववादी किंवा पुनरुत्थानवादी झालेले नाहीत. दारिद्र्याच्या आणि आणीबाणीच्या विरोधात ते ठामपणे उभे राहतात. शेताच्या, जमिनीच्या, कृषिसंस्कृतीच्या आकर्षणातून ते देशी शहाणपण व बळ मिळवू पाहत होते असे वाटते.

जोडोनिया धन उत्तम वेव्हारे।
उदास विचारे वेच करी॥


हा तुकारामांचा उपदेश त्यांनी आपल्या प्रतिष्ठानाचे बोधवाक्य म्हणून निवडला होता. (त्यांनी की सुनीताबाईंनी?) अतिशय मार्मिक वचन आणि त्याप्रमाणे आचरण. जोडोनिया धन याबरोबरच ’जन’ हा पाठभेदही नव्याने जोडता येईल. खूप माणसं जोडली. पु.लं. वर लोकांच प्रेम होतं. पु.ल. गेल्यावर ते प्रकर्षाने प्रत्ययाला आलं. महानोरांना सुनिताबाई म्हणाल्याही, "इतकं असेल. असं वाटलं नव्हतं." पु.लं.नी जगण्यातलं खूप काही वेचलं आणि अनंतहस्ते वाटून टाकलं. वाटून टाकायचं हे आधी माहित असणं म्हणजेच उदास (निरपेक्ष) विचाराने वेचणं. त्याने निराशा येत नाही, आनंद वाटतो. वाटला जातो. ’आहे मनोहर तरी...’ मध्येही ’उदास’ गमणे आहे. आत्मशोधातून येणारं ’उदास’ गाणं. म्हणून तर महानोरांना सुनीताबाई व भाई कधीच वेगळे दिसले नसावेत?
       
पु.ल. गेले. त्यांच्या आठवणी राहिल्या. अनेकांच्या अनेक आठवणी, त्यामुळे पु.ल. गेले हे विधान खोटेच वाटायला लागते. कऱ्हाड संमेलनातून पुण्याला परत येताना महानोरांनी पु.ल. सुनीताबाईंना लोकगीतं ऎकवली. त्यातलं एक ऎकलं आणि सुनीताबाईंनी गाडी थांबवली.

गेला मह्या जीव मले भिंतीशी खुळवा
सोन्याचं पिंपळपान माझ्या माहेरी पाठवा


पु.लं. च्या आठवणी म्हणजे पिंपळपानं आहेत. काही पुस्तकांत ठेवलेली, जाळी पडणारी. काही सोन्याची, काही आरस्पानी. वाचकांच्या माहेरी अशी आठवणींची पिंपळपानं आलेली आहेत. झाड शोधायला गेलं तर जंगल हरवतं. जंगल शोधायला जावं तर झाड हरवतं. आठवणींचही असंच होत असावं. आठवणींत बहुवचनी माणूस पुरा सापडत नाही आणि पुऱ्या माणसाला शोधायला आठवणी पुऱ्या पडत नाहीत; पण पिंपळपान संपूर्ण भावबंधाचं प्रतीक होऊन येतं. त्याचा आकार हृदयासारखा असतो म्हणून? का भावबंधांची जाळी पारदर्शी होत जातात म्हणून? पिंपळपान सोन्याचं असलं तरी अटळ उदासी घेऊन येतात. सोन्याचं पिंपळपानं निरोप घेऊन येतं. माहेरच्या माणसांच्या काळजात कालवाकालव होते.

- निशिकांत ठकार
पुस्तक - आनंदयोगी पु.ल.






0 प्रतिक्रिया: