Saturday, June 17, 2017

प्रिय सुनीताबाई...

पु.ल. गेल्यानंतर सुनीताबाईंना एकटं वाटणार नाही, हे सांगत दोहोंच्या नात्यातलं एकत्व स्पष्ट करणारा अग्रलेख ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी लिहिला होता.  हा अग्रलेखही  उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुकेश माचकरांचे पुन्हा धन्यवाद.

'तुम्ही अतिशय धीराच्या आणि तशा गंभीर आहात. त्यामुळे हे पत्र केवळ सांत्वनासाठी वा धीर देण्यासाठी . पण केवळ औपचारिकपणा म्हणूनही लिहीत नाही. अवघ्या महाराष्ट्राला कालपासून भिरभिरल्यासारखे होत आहे. वरवर सगळे व्यवहार रीतसर चालू आहेत हे खरे, पण पायाखालून जमीनच सरकल्याचा सारखा भास होत आहे. ही सार्वत्रिक भावना आहे. ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे पत्र. तुम्हाला भावनाविवशता आवडत नाही. तशा विवश मानसिक स्थितीत माणूस कधी खोटेच भाव चेह-यावर वा शब्दात आणतो. तर कधी मेलोड्रामाच्या आहारी जातो. म्हणून असेल किंवा तुमच्या स्वभावातील निग्रहामुळे असेल, पण भावनांचे प्रदर्शन तुम्ही टाळता. याचा अर्थ तुमचं मन उचंबळून येत नाही वा भावनांच्या कल्लोळाने गजबजून जात नाही असा नाही. परंतु अनेक लोकांना निग्रहीपणा आणि कोरडेपणा यातील फरकच कळत नाही. त्यामुळे तुम्ही भाववृत्तींनी 'शुष्क' आहात, असे काहींना वाटते. काहींना तुम्ही कठोर वाटता, तर काहींना एकारलेल्या. जणू तुमच्या घरात आणीबाणी जाहीर झालेली असून, अनुशासन पर्व घोषित झाले आहे... पुलंवर तुमची तुमची अशी जरब होती, असे ही मंडळी सांगतात की, त्यांची काय टाप होती शिस्त मोडण्याची! तुमचे 'आहे मनोहर तरी' हे आत्मकथम प्रसिद्ध झाले मात्र आणि तमाम कुजबुज आघाड्यांमध्ये पुलंच्या आणि तुमच्या भावसंबंधांबद्दल चर्चा सुरू झाली. परंतु तुम्हीच तुमच्या मनाच्या हिंदोळ्यांचे इतके उत्कट वर्णन केले आहे की चर्चाच अर्थशून्य वाटावी. कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे-गडद निळे जलद भरून येतात आणि आकाश धुऊन स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रुपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळीच रांगोळी... चोहीकडून नातवंडं येऊन बिलगतात आणि 'गोष्ट सांग' म्हणून चिवचिवाट करतात...हे सगळं किती लोभसवाणं आहे! मग माझ्याच पापण्यांत पुन्हा पुन्हा हे असं धुकं का जमा होतंय? 'आहे मनोहर तरी गमते उदास' अशी ही मनाची अवस्था झाली असताना या पाखरांना मी गोष्ट तकरी कोणती सांगू"' या भावोत्कट संभ्रमांतून तुम्ही तुमची कहाणी सांगू लागता- साठा उत्तरांची नव्हे, तर साठा प्रश्नांची कहाणी! “सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे, अपूर्ण मात्र नक्कीच!”सोमवारी दुपारी एक वाजून बावीस मिनिटांनी तुम्ही एकदम एकट्या झालात. जवळजवळ ५४ वर्षांनी. योगायोगाच्या भाषेत बोलायचं, तर अगदी त्याच दिवशी. तसा प्रत्येक माणशून एकटाच या जगात येतो आणि एकटाच जातो, असं म्हणण्याची चुकीची प्रथा आपल्याकडे आहे. माणसू कधीही एकटा येत नाही. तो येतानाच काही अतूट नाती बरोबर घेऊन येतो. मग कितीतरी नाती निर्माण करतो आणि जाताना ती नाती ठेवून फक्त लौकिक अर्थाने एकटा जातो. जाताना, त्याच्या जीवनाला अर्थ आणि समृद्धी प्राप्त झाल्याचं त्याला वाटत असतं; कारण ती नातीच. तुम्ही दोघांनी अशी हजारो, लाखो नाती निर्माण केली आहेत. सर्व अतूट. ब-याच जणांनी असा (सोईस्कर) समज करून घेतला होता की, ही सर्व नाती 'फक्त' पुलंची होती. तुमचा सहभाग फक्त 'म-म' म्हणण्यापुरता, किंवा तुमचा 'म-म' संस्कृतीवर विश्वास नाही, म्हणून फक्त साक्षीदाराइतका! प्रत्यक्षात मात्र असं एकही नातं नव्हतं की, जे तुम्हाला दोघांना वेढून टाकत नव्हतं वा एकत्रपणे गुंतवत नव्हतं. तुमचं लग्न झालं तेव्हा म्हणजे १९४६ साली पुल हे 'पुल' म्हणून लोकांना माहीत व्हायचे होते. परंतु तुमचा जीवनरस एकाच कलाविश्वात होता. तुम्ही तेव्हा जी नाटकं बसवत होता, लिहीत होता, तुमच्या मित्रमंडळींबरोबर रात्र-रात्र भटकत होता, गप्पा मारत होता, भांडत होता, हसत होता, गाणी-बजावणी करत होता, तेव्हा तो पूर्णपणे उधळून गेला होता. तेव्हा तुम्हाला दोघांनाही खूप कीर्ती मिळवायची ईर्षा नव्हती, श्रीमंत व्हायची महत्त्वाकांक्षा नव्हती, कोणाला तरी 'मागे' टाकून आपण 'पुढे' जायची पराकाष्ठा नव्हती. तुमच्या त्या जीवनासक्तीतच कलासक्तपणा होता. जीवन आणि कला यांना वेगळं करून शहाजोगपणे चर्चा करण्यात तुम्हाला रस नव्हता- वेळही नव्हता. तुम्हाला ओळखणा-या सगळ्यांना हे माहीत आहे सुनीताबाई की, तुमचा ओढा चळवळीकडे होता. स्वातंत्र्याला कष्टक-यांच्या जीवनाचे परिमाण असावे आणि राजकारणाला मूल्यांची जोड असावी, असा तुमचा आग्रह असे. व्यवहारवादी तडजोडींना तुमची अजिबात तयारी नसे. एकदा तडजोडी सुरू केल्या की, त्यांची परिणती निष्ठेच्या लिलावात आणि भ्रष्टाचारात व्हायला फारसा वेळ लागत नाही, असं तुमचं मत होतं. म्हणून तुम्ही अनेकदा अतिशय कठोर होताना लोकांनी पाहिलं आहे. नाती आणि मूल्यं यात कटुता पत्करून, नातं तुटलं तरी चालेल, पण मूल्य सोडणार नाही, असा ताठा तुम्ही दाखवला.व्यवहारवादी जगात अशा करारीपणाला भावनाशून्यता, असं संबोधण्याची पद्धत आहे. पुलंना तुमचा तो जिद्दी स्वभाव भावला असावा. कदाचित त्यांना असंही वाटलं असेल की, आपल्यावर अशी जरब ठेवणारा कुणी तरी हवाच! पुल भाबडे होते तसेच अतिशय भिडस्तही. त्यांना त्या भिडस्तपणाच्या आहारी जाऊ दिलं असतं, तर गाडी कुठेही घरंगळत गेली असती- म्हणजे पुलंनाच अशी स्वत:बद्दल भीती वाटली असेल. परंतु याचा अर्थ असा नाही की, तुमची 'भूमिकी' ही फक्त महाराष्ट्राचा हा तेजस्वी हिरा जपण्याची होती. आपल्या 'पुरुषी' संस्कृतीत सहचारिणीला तेवढीच भूमिका देण्याची रीत आहे! परंतु तुमचे भाग्य (!) हे की, पुलंना मात्र असे कधीही वाटले नाही. कृ. द. दीक्षितांनी एका लेखात तुमचे दोघांचे नाते हे 'भारती तत्त्वज्ञानातील पुरुष व प्रकृतीत यांच्यातील नात्यासारखं होतं'. असे म्हटले आहे. तेच अतिशय नेमके वर्णन आहे. म्हणूनच तुम्हाला सारखं,अगदी क्षणाक्षणाला चुकल्यासारखं वाटेल, पण कधीही एकटं-एकटं वाटणार नाही! पुरुष आणि प्रकृती विभक्त होऊच शकत नाहीत!

पुलंच्या आणि तुमच्या नात्यातलं एकत्व असं अध्यात्माच्या पातळीवरचं नव्हतं. म्हणून त्याला उगीचच तसं 'रोमँटिक' आणि खोटं खोटं करण्याची गरज नाही. तुमच्यातल्या एकत्वाचा साक्षात्कार तुम्हाला दोघांनाही नातं विकसताना होऊ लागला होता. भारतात अशी बहुतेकशी नाती फुलायच्या आतच विस्कटून जातात. लग्न हे दोघांचं असतं.अगदी एकत्र कुटुंबपद्धती संपली तरी नवरा-बायको आपापली मित्र-मैत्रिणींची नाती बरोबर घेऊन एकत्र येतात. कितीही उत्कट प्रेम असलं, तरी त्या सगळ्या नात्यांचं ओझंही वाहायचं असतं. आपल्याकडे ते ओझं मुख्यत: स्त्रियांना वाहावं लागतं. काही स्त्रिया ते ओझं वाहताना मोडून पडतात. परंतु बहुसंख्य स्त्रिया ते वाहण्यासाठी अंगी अधिक मानसिक सामर्थ्य मिळवतात. बहुतेक नव-यांना त्याचं भान येत नाही, काहींना ते उशिरा येतं. तुम्हावरही असे प्रसंग आले. तुम्ही ते वेळी अपमान सहन करूनही निभावून नेले.परंतु भाईंबद्दलची तुमची भावना कधीही आटली नाही. भाई आणि तुम्ही किती भिन्न स्वभाववैशिष्ट्यांचे आहात, ते तुम्ही वर्णन केलेल्या अनेक प्रसंगांतून आम्हाला कळलं आहे.भाईंशी, किंवा त्यांच्या अनेक सवयींशी जुळवून घेणं तुम्हाला किती कठीण गेलं असेल, याचा अंदाज आम्हाला आहे. परंतु तुम्हाला याचंही भान होतं की, भाईलाही त्याच्या मनस्वीपणावर बंधनं घालणं किती कठीण असलं पाहिजे. पुलंची निर्मिती आणि त्यांचा मनस्वीपणा यांना वेगळं करणं अशक्य आहे. लोक पुलंवर जे बेहद्द फिदा होते, ते केवळ साहित्यनिर्मिती वा संगीतामुळे नव्हे. पुलंचं मनस्वीपणच तमाम मराठी माणसांना भावून टाकत असे. कधीकधी या मनस्वीपणात काही स्त्रीवादी समर्थकांना 'पुरुषी आत्मकेंद्रीपणा वा स्वार्थ' दिसतो. तुमचं पुस्तक प्रकाशित झाल्यावर ज्यांनी 'तुमची' बाजू घेऊन पुलंमध्ये व तुमच्यात तट पाडले, त्या स्त्रीवाद्यांनाही मानवी नात्यांतली गुंतागुंत समजत नाही असंच म्हणावं लागेल. या जगातल्या कोणत्याही माणसाला मनसोक्त, 'मै तो चला, जिधर चले रस्ता' शैलीत जगता येत नाही. कितीही वाटलं तरी, पुलंनाही ते शक्य नव्हतं. तुम्हालाही शक्य नव्हतं. तुमच्या मनात तसा एकटा स्वतंत्र, स्वत:चा, बिनधास्त प्रवास करायची कल्पना अनेकदा तरळून गेली. मग तुम्ही तसं का केलं नाही?अशक्य होतं म्हणून नाही. तुम्हाला माहीत होतं की, ते 'अयोग्य' आहे. तुम्ही लिहिलंय, “इतकी वर्षे दोघांचा संसार झाल्यानंतर स्वत:चा एकटीचाच विचार करणे, हे तितकेसे सोपे नाही. पण गेली काही वर्षे ही प्रक्रिया चालू आहे आणि आता मनाने मी पूर्णपणे मोकळी, सुटी, पुन्हा एकटी झाले आहे. तशी मी आयुष्यभर स्वतंत्रच होते, पण स्वत:हून स्वत:ला कुठे कुठे गुंतवत गेले... पण त्या कशाचेही मला कधी बंधन वाटले नाही. कारण मी जे काही करत गेले ते आनंदाने, स्वयंनिर्णयाने... आणि आता स्वयंनिर्णयानेच सर्व रेशीमधागे सोडवून मोकळी झाल्यावर ही अदृश्य जबाबदारी का जाणवत राहिली आहे?... स्वत:हून स्वीकारलेली बंधने स्वत:च तोडून टाकली, तरी ते पाश काचत का राहतात?” सुनीताबाई, तुमच्या या प्रश्नांमध्येच त्यांची उत्तरं आहेत. माणूस 'मुक्त' होऊ शकतो, ही केवळ कल्पना आहे. खरंच तो तसा मुक्त झाला, तर जीवनाला काहीही अर्थ राहणार नाही. नाती, पाश, जाच, बंधनं राहणारच. संघर्ष करावा लागतो, तो जाच आणि बंधनं दूर करून नाती आणि पाश टिकवायचे असतात म्हणून. तुम्ही तुमच्या एकत्रित जीवनात तो संघर्ष केलात आणि ते पाशही जपलेत. काचत असूनही. म्हणूनच तुम्हाला एकटं वाटणार नाही. तमाम मराठी माणसांनी तुमची साथ केली आहे. पुल गेले म्हणून ती साथ सुटणार नाही!”
-- कुमार केतकर

1 प्रतिक्रिया:

मुकेश माचकर said...

नमस्कार, हा लेख इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.