Friday, November 8, 2013

गुणाकार आणि भागाकार - प्रकाश बोकील

मिरजमधल्या ‘मिरज विद्यार्थी संघा’चे एक धडपडे कार्यकर्ते वसंतराव आगाशे पुलंचे वर्गमित्र होते. एकदा एका समारंभाच्या निमित्ताने पुलं मिरजला गेले होते. त्यावेळी मिरज विद्यार्थी संघाने एक अद्ययावत सभागृह बांधायला घेतलं होतं. बांधकाम बरंच रखडलं होतं. पुलंनी वसंतरावांना विचारलं; ‘‘आतापर्यंत किती खर्च झालाय या बांधकामावर?’’ ‘‘अडीच लाख रुपये.’’ वसंतराव म्हणाले. ‘‘शिवाय अजून गिलाबा करायचाय, साऊंड सिस्टिम बसवायचीये, वरचा मजला बांधायचाय, परिसराचं सुशोभन करायचंय!’’ वसंतरावांनी बर्‍याच कामांची यादी पुलंना ऐकवली. पुलं म्हणाले; ‘‘ठीक आहे, आता माझ्याकडून किती मदत हवीये तुला तेवढं सांग!’’ पुलंच्या या जिव्हाळ्यानं वसंतराव पुरते भारावून गेले. ते म्हणाले; ‘‘भाई, एक रुपया दिलात तरी आम्ही धन्य धन्य होऊ!’’ वसंतराव आणि पुलंची ही भेट ज्या दिवशी झाली होती, तो दिवस विजयादशमीचा आदला दिवस होता. निरोप घेताना पुलं म्हणाले; ‘‘ठीक आहे वसंता; उद्या येतो शिलंगणाला!’’ दुसर्‍या दिवशी ते मिरज विद्यार्थी संघाच्या कार्यालयात पोहोचले. जाताना ते आपल्याबरोबर एक लाख रुपयांचा चेकच घेऊन गेले होते. तो चेक पाहून वसंतरावांच्या डोळ्यातून अक्षरशः आनंदाश्रू वाहू लागले होते.

नंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा पुलंनी पन्नास हजार रुपये दिले. एक अद्ययावत, डौलदार सभागृह उभे राहिले. त्याचं उद्घाटन पुलंच्या हस्ते झालं. समारंभाला कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी उपस्थित होते. समारंभानंतर वाटवे नावाच्या एका सद्गृहस्थांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी सव्वा लाख रुपये मिरज विद्यार्थी संघाला दिली. चिंतामणराव गोरे नावाच्या आणखी एका गृहस्थाने वीस हजार रुपये दिले. ‘दिवा दिव्याने पेटतसे’ असं म्हणतात ते खरंच आहे. वसंतराव आगाशेंच्या चेहर्‍यावरून कृतज्ञता अक्षरशः ओसंडून वाहत होती.

आपल्या भाषणात पुलं म्हणाले; ‘‘जगातला सर्वात सुंदर चेहरा म्हणजे कृतज्ञ चेहरा! खरं तर माणसांनी एकत्र येऊन आनंदाचा गुणाकार करावा आणि दुःखाचा भागाकार करून त्याची बाकी शून्य करून टाकावी!’’ आयुष्याचं जटिल गणित सोडवण्याची यापेक्षा अधिक सोपी अशी दुसरी कोणती पद्धत असेल? पुलंनी त्या विजयादशमीला जे आनंदाचं, सुखाचं, माणुसकीचं सोनं लुटलं, मिरजेत त्याचा सुगंध आजही त्या सभागृहाच्या रुपानं दरवळतो आहे.

प्रकाश बोकील
-- नवशक्ती

पुन्हा गळाभेट!

वसंतराव देशपांडे तल्लीन होऊन गात होते. पुढ्यात पु. ल. देशपांडे त्यांचं गाणं ऐकत बसले होते. तेही तेवढेच तल्लीन. ढगांचं दार लोटून सुनीताबाई कधी आत आल्या दोघांनाही कळलं नाही. समेवर पुलंनी आपला उजवा हात हवेत झटकून दाद दिली आणि डोळे उघडले तर पुढय़ात साक्षात सुनीताबाई उभ्या, कंबरेला पदर खोचून! पुलंच्या पोटात गोळा आला आणि चेहऱ्यावर अजीजीचे भाव आले.

अगं? तू आलीस? आम्ही जरा बसलो होतो, माझा बर्थ डे साजरा करत. री बर्थ झाल्या खेरीज नवी तारीख मिळणार नाही. तोपर्यंत जुन्याच तारखेला बर्थडे साजरा करायचा. बरं झालं आज नेमकी आलीस! भाईचा कितीही राग आला तरी त्यानं तोंड उघडलं की सुनीताबाईंना राग कायम ठेवणं जड जात असे. तसा याही वेळी त्यांचा राग मावळला आणि म्हणाल्या, अरे, प्रत्येक बर्थडेच्या वेळी मला वाटत होतं यावंस तुझ्याकडे, पण ९ वर्ष काढावी लागली बघ! असं म्हणत त्यांनी वसंतरावांच्या पुढय़ात ठेवलेला पाण्याचा तांब्या हाती घेतला, त्यावरचं फुलपात्र उचललं आणि तांब्यातलं पाणी हुंगलं. ते पाहून वसंतराव म्हणाले, अगं, इथं अमृताखेरीज काहीही मिळत नाही. आता तूच सांग काहीतरी युक्ती मला.

वसंतरावांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत सुनीताबाईंनी चौफेर नजर फिरवली. सगळा परिसर अस्ताव्यस्त. पायजमा खाली पडलेला, कुडता भिरकावून दिलेला, टॉवेल गुंडाळी करून पडलेला. पुढच्या मिनिटाचं आपलं भविष्य काय आहे ते पुलंना चटकन कळलं. त्यांनी शिताफीनं सुनीताबाईंचा हात धरला आणि म्हणाले, अगं आत्ताच आली आहेस नं, जरा बस दोन मिनिटं शांत आणि मग कर आवराआवर! पण सुनीताबाईंना कुठं धीर होता. त्या भाईकडं सात्त्विक रागानं पाहत म्हणाल्या, भाई, मला खरं खरं सांग, हा पायजमा इथं किती दिवसांपासून पडला आहे? त्यांच्या या प्रश्नावर वसंतराव फस्कन हसले. चेहऱ्यावर अपराधीपणाचा भाव आणण्याचा कमालीचा प्रामाणिक प्रयत्न करत पुलं म्हणाले, खरं सांगायचं तर नऊ वर्षांपूर्वी इथं स्वर्गात आलो तेव्हा पृथ्वीवरचे कपडे काढून इथले घातले, तेव्हापासून हा पायजमा असाच पडलेला आहे. तरातरा जात सुनीताबाईंनी तो पायजमा उचलला आणि म्हणाल्या, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात, पण तेही खोटंच म्हणायचं! यावर तिरकसपणे पुलं म्हणाले, ते तुला स्वत:वरूनही कळायला हरकत नाही. वसंतरावांनी मग तंबोऱ्याला गवसणी घातली आणि म्हणाले, काय म्हणतेय आपली पृथ्वी? टॉवेलची घडी घालत सुनीताबाई म्हणाल्या, पृथ्वी काय म्हणतेय ते बघायला माझे डोळे कुठं शाबूत होते? आणि काही ऐकायची इच्छाही नव्हती, आजच्या दिवसाची वाट बघत काढली नऊ वर्ष कशीतरी! दोन क्षण ओली शांतता पसरली. मग पुलंनी सूत्रं हाती घेतली आणि म्हणाले, सुनीता, इथं येऊन एकच गोष्ट लक्षात आली, स्वर्गसुख वगैरे जे काय असतं ना, ते स्थळावर अवलंबून नसतं, आपल्यासोबत कोण आहे, यावर असतं अवलंबून ते! तुझा धाक असण्यात मला जे स्वातंत्र्य होतं, त्याची सर कशालाच नाही. मग सुनीताबाईंनी भाईंचा हात प्रेमानं हाती धरला आणि म्हणाल्या, आता आलो आहोत ना आपण पुन्हा एकत्र!

सुनीताबाई आल्यामुळं पुलंच्या अंगात नवा उत्साह संचारला. घर आवरत असलेल्या सुनीताबाईंना ते म्हणाले, आपल्या पृथ्वीवर तो अमृततुल्य चहा मिळतो ना, तर ते साफ खोटं आहे. खरं तर मी आता चहातुल्य अमृत शोधतो आहे, कारण चहाची गंमत अमृतात नाही. मग ते वसंतरावांकडे पाहत म्हणाले, वसंता, चल कुठं दूध, साखर आणि चहा-पत्ती मिळते का बघू जरा. वसंतराव पुलंचा बालसुलभ उत्साह कौतुकानं पाहत होते. त्यांनी पुलंना वास्तवाची जाण करून दिली. अरे पीएल, बाहेर जागोजागी अमृताच्या टाक्या बसवल्या आहेत, चहासाठी तुला कुंपण ओलांडून नरकात जावं लागेल. ते ऐकून पुलं म्हणाले, पृथ्वीवरचा प्रत्येकजण पुण्याऐवजी पाप गाठीशी बांधण्यासाठी का धडपडत असतो, ते इथं आल्यावर कळलं. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, कारण जिवंतपणीच तो दिसला तर कोणीच तिकडे फिरकणार नाही. मग चहाचा नाद सोडून पीएलनी बैठक मारली आणि म्हणाले, अगं सुनीता, जी.ए. इथंच राहतात, दोन घरं सोडून. तुला जर त्यांना पत्र वगेरे लिहायची असतील तर मी आहे कुरियर सव्र्हिससाठी. किचनचा ओटा साफ करताकरता सुनीताबाई फणकाऱ्यानं म्हणाल्या, काही टोमणे मारायची गरज नाही भाई, मी त्यांना भेटायला जाणारच आहे.

पण पुलं कसले गप्प राहतात? त्यांनी निरागस चेहरा करत टोलेबाजी सुरूच ठेवली, तू येणार आहेस हे आधी कळलं असतं तर बरं झालं असत. अगं, जी.ए. त्यांचा गॉगल विसरले होते पृथ्वीवर. तुला सांगितलं असतं, येताना घेऊन ये म्हणून! सुनीताबाईंनी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाल्या, भाई, कोण कोण भेटतं रे? बरेच जण असतील नं इथं आपल्या ओळखीचे? यावर भाईंनी दीर्घ पॉज घेतला आणि म्हणाले, मी काही फारसा बाहेर पडत नाही. अगं, पृथ्वीवर भेटलेलीच सगळी माणसं जर इथंही भेटू लागली तर मग मरून उपयोग काय? मग उत्साहानं सुनीताबाईंना म्हणाले, आज छान मुगाची खिचडी कर. इथं खाण्याचं मात्र सगळं मिळतं. पण कंटाळा म्हणून मी भानगडी तपडत नाही काही करण्याच्या! सुनीताबाईंनी तांदूळ निवडायला घेतले आणि म्हणाल्या, बघतेच आता तुझ्या कंटाळयाला, उद्यापासून लिहायला बसायचं!

वसंतराव निघाले होते; पण मुगाच्या खिचडीचं नाव ऐकून ते थांबले. ते सुनीताबाईंना म्हणाले, अगं, इथं काही लिहिता येणार नाही त्याला, इथं फक्त मौज मजा करायची असते. काम करायला बंदी आहे इथं. त्यावर पुलं म्हणाले, आता ही आली आहे ना इथं, उद्यापासून इंद्र शेतात जाऊन नांगर धरेल आणि रंभा, उर्वशी जात्यावर बसून धान्य दळतील की नाही बघ! हे ऐकून सुनीताबाईंचा पारा चढणार, हे लक्षात घेऊन मग पुलंनीच विषय बदलला आणि म्हणाले, मी इथं आल्यानंतर तू किती देणग्या दिल्यास? कोणाला दिल्यास? मुगाच्या डाळीवर पाणी ओतत सुनीताबाई म्हणाल्या, भाई, अरे देणाऱ्याला दिल्याचं सुख मिळावं असे घेणारे सापडणं मुश्कील झालंय. आपलं आयुष्य संपलं हे भाग्यच म्हणायचं.. अस्वस्थ मनानं वसंतरावांनी तंबोऱ्याची गवसणी काढून पुन्हा सूर लावला.

लोकसत्ता, लोकरंग,
रविवार, १५ नोव्हेंबर २००९

Wednesday, October 16, 2013

ती पुल-कित भेट - अशोक पाटोळे

विनोद म्हटलं की मराठी माणसाला आठवणारं पहिलं नाव म्हणजे पु.ल. पुलंच्या अशाच काही पुलकित करणाऱ्या भेटींचे फ्लॅशबॅक
--अशोक पाटोळे

‘‘अशोक, लवकर बाथरूममधून बाहेर ये. पु.ल. तुला भेटायला येतायत.’’
खंडाळ्याच्या कामत रिसॉर्टच्या बाथरूमच्या दरवाजावर बिपीन वर्टी नावाचा आमचा दिग्दर्शक- निर्माता मित्र (‘चंगूमंगू’ फेम) धाडधाड थापा मारून सांगत होता.

‘‘अशोक, लवकर आटप. पु.ल. आणि सुनीताबाई तुला भेटायला येतायत.’’ ही घटना आहे १९८७-८८ सालची. मी चित्रपटसृष्टीत नुकतंच पदार्पण केलं होतं. म्हणजे तोपर्यंत मला कुठलंही पद अर्पण झालेलं नव्हतं. फक्त सचिन (पिळगावकर- तेंडुलकर नव्हे) यांचं ‘माझा पती करोडपती’चे संवाद एवढंच माझं चित्रपटसृष्टीला योगदान- तेही योगायोगाने झालेलं होतं. एकदा सचिन पिळगावकर माझं नाटक बघायला आले होते- ‘राम तुझी सीता माऊली’ या विचित्र नावाचं- मध्यवर्ती भूमिकेत मच्छिंद्र कांबळी होते. त्यांनी नाटकात जी काही पदरची वाक्यं घातली होती ती माझीच पदरमोड समजून सचिननी मला ‘माझा पती करोडपती’चे संवाद लिहिण्याचं आमंत्रण दिलं होतं. तो चित्रपट प्लाझामध्ये कधी आला आणि कधी गेला हे भारतमातालाही कळलं नव्हतं. तेव्हा इतका नवखा लेखक मी! या क्षणी आम्ही नवीन चित्रपटाचं स्टोरी सीटिंग करण्यासाठी खंडाळ्याला जमलो होतो. मी, बिपीन आणि विक्रम मेहरोत्रा नावाचा निर्माता. हा माझा जेमतेम तिसरा चित्रपट! तेव्हा इतका नवखा लेखक मी. तरीही पुलं मला भेटायला येतायत! बिपीन वर्टीला त्या वेळी कमालीचं आश्चर्य वाटलं असेल, पण त्या आधी एकदा-दोनदा माझी पुलंशी भेट झाली होती हे त्याला माहीत नव्हतं. खंडाळ्याच्या त्या बाथरूमध्ये तोंडाला साबण लावलेल्या स्थितीत मी चाचपडतच गरम पाण्याचा शॉवर चालू केला- तो थंड पाण्याचा निघाला. आधीच थंडीचे दिवस, त्यात खंडाळा. थंड पाण्याच्या शॉवरने मला हुडहुडी भरली. म्हणून परत घाईघाईने चाचपडत दुसरा नॉब फिरवला तर कढत कढत पाण्याचा वर्षांव! माझी अर्धी बाजू गारठून गेली होती तर दुसरी शेकून निघाली! शेवटी मी बादलीतल्या कोमट पाण्याने आंघोळ करण्याचा निर्णय घेतला. एकेक लोटा अंगावर घेत असताना- पुलंबरोबरच्या त्यापूर्वीच्या भेटींचे फ्लॅशबॅक मला दिसायला लागले.

फ्लॅशबॅक १
इंटेरियर रिझव्‍‌र्ह बँकेतलं माझं डिपार्टमेंट! रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्टाफ कँटीनमध्ये इतर सहकाऱ्यांबरोबर सहभोजन घेत असताना कुणी तरी मला सांगितलं की, ते समोर जे बसलेयत ना ते पुलंचे भाचे लागतात- भास्कर पंडित.

मी लगेच माझी प्लेट घेऊन भास्कर पंडितांच्या शेजारी जाऊन बसलो. माणूस मोठा गप्पिष्ट निघाला. पुलंचे किस्से सांगून लोकांना हसवत होता. चेहरा पुलंच्या कुटुंबात खपून जाईल असा. म्हणजे दाट कुरळे केस, गुबगुबीत गाल आणि हनुवटीला मध्ये खळी. दात थोडेसे जास्त पुढे असते तर पुलंची डमी म्हणून खपला असता.

‘‘भास्करराव, मी पुलंचा भक्त आहे,’’ अशी मी स्वत:ची जुजबी ओळख करून दिली आणि आमचे धागे जुळले ते पुढे अनेक वषर्ं जुळलेलेच राहिले. भास्कर पंडित स्वत: त्या वेळी आंतरबँक नाटय़स्पर्धेत गाजलेले दिग्दर्शक होते. अनेक नाटककारांना त्यांनी ब्रेक दिलेला होता आणि लावलेलाही होता, पण माझ्या दृष्टीनं भास्कररावांचं एकच मोठं क्वालिफिकेशन होतं- ते पुलंचे भाचे होते. सुरुवाती- सुरुवातीला वाटायचं की, आपण पुलंचे भाचे आहोत, असं सांगून पंडित आम्हाला मामा बनवतायत, पण इतरही काही सहकाऱ्यांनी जेव्हा सांगितलं की, भास्कर पंडित पुलंबरोबर ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये काम करायचे, तेव्हा मग मी त्यांना चिकटलो. पंडितांनी नंतर माझं ‘आंदोलन’ नावाचं नाटक बसवलं. त्यात त्यांना आणि नाटकाला बरीच पारितोषिकं वगैरे मिळाली. मलाही लेखनाचं वगैरे पारितोषिक मिळालं, पण मला हवं ते पारितोषिक अद्याप मिळायचं होतं, ते म्हणजे पुलंची प्रत्यक्ष भेट आणि तो योग १९७९ साली जमून आला.

बुडबुडबुड! मी दुसरा लोटा डोक्यावर घेतला आणि पुलंच्या अंधुक प्रकाशातल्या एका भेटीचा फ्लॅशबॅक सुरू झाला.
फ्लॅशबॅक २
इंटेरियर. रवींद्र नाटय़मंदिर. १९७९ साली दुपारी २ वाजता. ‘ती फुलराणी’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाआधीची वेळ.

रवींद्रचा तो पहिला प्रयोग बघायचाच असं ठरवून तिकीट काढायला मी रवींद्र नाटय़मंदिरात गेलो. तिथे कळलं की आत सेट लावला जातोय आणि पुलं जातीने लक्ष घालतायत. मी धडधडत्या अंत:करणाने आत जातो. पहिल्याच रांगेत अंधूक प्रकाशात भाई आणि सुनीतामामी (भास्कर पंडित ज्या नावाने त्यांचा उल्लेख करीत ती नावं) रंगमंचावरच्या त्यांच्या फेव्हरीट रंगमंच व्यवस्थापकाला- गफूरला सूचना देत होते.
मी पुलंच्या जवळ गेलो. ‘‘भाई!’’ पुलंनी त्या काळोखात पटकन वर बघितलं.

‘‘भाई, माझं नाव अशोक पाटोळे. माझे एक सहकारी भास्कर पंडित-’’

‘‘हो. आमचाच तो.!’’ माझं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच पुलंनी म्हटलं. मग माझा हात प्रेमाने धरून आपल्या शेजारच्या सीटवर बसवून घेतलं. त्यांच्या त्या गुबगुबीत हातांचा स्पर्श अजून मला आठवतोय (२०११ मध्ये). तो स्पर्श मित्रत्वाचा होता, तो स्पर्श सुहृदय माणसाचा होता, तो स्पर्श एका दात्याचा होता.

‘‘तुमचं कुठलं तरी नाटक भास्करने केलं ना! खूप तारीफ करत होता लिखाणाची.’’ पुल म्हणाले.

‘‘तुमचाच आदर्श ठेवून- ’’ मी उगाच काही तरी बोलायचं म्हणून बोललोय तेवढय़ात ‘‘गफूर, ठेवून दे त्यावर आणखी एक फ्लॉवर पॉट,’’ एक लक्ष माझ्याकडे दुसरं लक्ष गफूरकडे ठेवून पुल बोलत होते.

‘‘हे नाटक बरं का- शॉचं फिमॉलियन आहे ना त्यावरून बेतलंय मी! पण मूळ नाटकाला शेवट असा काही नाहीय, पण मी लिहिलंय.. आणि भक्ती काय काम करते हो!’’ जणू काही आमची वर्षांनुवर्षांची ओळख असल्यासारखे भाई बोलत होते. वास्तविक त्यांना माझा चेहराही नीट दिसत नव्हता, पण पहिल्याच भेटीत ते ज्या अगत्याने बोलले ते मी आजतागायत असंख्य वेळा अ‍ॅक्शन रिप्ले करून ऐकलेलं आहे.
बुडबुडबुड! 

फ्लॅशबॅक ३
एक्स्टेरीयर. गोरेगावचं एक पटांगण. रात्रीची वेळ.

जनता पक्षाचं आंदोलन- पुलंचं भाषण. ते ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली. मीही कुठल्या तरी कोपऱ्यात उत्सुकतेनं उभा, पुलंचं राजकीय भाषण ऐकण्यासाठी! त्या वेळी मृणाल गोरे वगैरेंना इंदिरा सरकारनं अटक केलेली होती.

‘‘गोरेगावला आल्यानंतर मी आधी स्टेशनच्या नावाची पाटी शोधली- अजून गोरेगावच आहे ना!’’ पुलंची फटकेबाजी सुरू झाली होती. हास्याची कारंजी उसळत होती. वातावरण प्रसन्न झालेलं होतं, कारण रंगमंचाबाहेर राजकीय व्यासपीठावर लोक पहिल्यांदाच पुलंना बघत होते. ‘‘या हुकूमशाहीच्या भीतीने घाबरून मन:शांतीसाठी गीता उघडली तर पहिल्याच पानावर ‘संजय उवाच’!’’ एक जोरदार हशा उसळला. ते राजकीय भाषण म्हणजे पुलंचा विनोदी एकपात्री प्रयोगच वाटायला लागला होता. त्या भाषणात इंदिराजींच्या हुकूमशाहीची भलामण करणाऱ्या लोकांची हजेरी घेताना पुलंनी एक छान गोष्ट सांगितली. ‘‘एकदा बरं का.. एका मरणाच्या पंथाला लागलेल्या गुरुदेवांनी आश्रमातल्या आपल्या सगळ्या शिष्यांना जवळ बोलावून घेतलं. हे बघा बाळांनो, मी आता थोडय़ाच वेळात मरणार आहे, पण मला माझा पुढचा जन्म दिसतोय! कोणता, कोणता गुरुदेव? आम्हाला सांगून ठेवा- म्हणजे पुढच्या जन्मी तुमची आम्ही इतकीच सेवा करू! शिष्य म्हणाले. मग गुरुदेव मोठय़ा कष्टाने म्हणाले- ती जी डुकरीण आश्रमाच्या बाहेरून चाललीय- मी तिच्यापोटी जन्म घेणार आहे. (हशा) शिष्यांनी त्या डुकरिणीवर पाळत ठेवली. (हशा) पुढे ती डुकरीण गाभण राहिली आणि तिने काही गुबगुबीत पिलांना जन्म दिला. त्यातलं एक बऱ्यापैकी दिसणारं पिल्लू बघून शिष्यगण म्हणाले, हेच आपले गुरुदेव! (हशा) झालं! त्या दिवसापासून त्या डुकराच्या पिल्लाची शिष्यांनी उत्तम बडदास्त ठेवायला सुरुवात केली. गुरुदेवांचं आवडतं खाणं त्या पिलाला दिलं. झोपायला छन गादीबिदी केली. (हशा) सगळं काही उत्तम चालू होतं, पण एक दिवस सकाळीच शिष्यांच्या लक्षात आलं की, गुरुदेव गायब झालेयत. शोधाशोध करता करता शिष्यगण एका उकिरडय़ावर पोहोचले- बघतात तर काय गुरुदेवांचा सध्याचा जन्म उकिरडय़ावर मस्त लोळत पडलेला होता. (हशा) शिष्य म्हणाले, गुरुदेव काय हे? तुम्ही आणि असे उकिरडय़ावर? तेव्हा डुक्कररूपी गुरुदेव म्हणाले, असू दे रे! हेही काही वाईट नाही. (हशाच हशा) सध्याची जुलमी राजवटही काही वाईट नाही, असं म्हणणाऱ्या लोकांना लोकशाहीची गादी आता नकोशी झालीय.’’ (काही क्षण हशाच हशा आणि टाळ्या.)

अनेक वर्षांपूर्वी ऐकलेल्या आचार्य अत्र्यांच्या भाषणांची आठवण करून देणारं भाषण होतं ते.
बुडबुडबुड! मी भराभर एकामागून एक लोटा अंगावर घेत होतो. बाथरूमच्या दरवाजावर बिपीन थापा मारत होता.

‘‘अरे आटप! पुल कुठल्याही क्षणी येतील. ते खास तुला भेटायला येतायत!’’ बिपीन बाहेरून ओरडत होता.
‘‘झालं झालं! मी कशीबशी आंघोळ आटोपती घेतली! टॉवेलने जमेल तितकं अंग पुसून कसाबसा टॉवेल गुंडाळला. तो गुंडाळत असताना आणखीन एका घटनेचा फ्लॅशबॅक आला.

त्या वेळी मी एक-दोन मराठी मालिकाही लिहिल्या होत्या. ‘अधांतरी’, ‘कथास्तु’ वगैरे. ‘कथास्तु’साठी भारती आचरेकर (निर्माती) यांनी पुलंची ‘म्हैस’ ही कथा निवडली होती. एका एसटीची धडक लागून एक म्हैस कोलमडते आणि मग बसमध्ये प्रवासी, त्या गावातले टपोरी लोकं ‘लायसस बघू!’ म्हणणारा ड्रायव्हर! एक सुबक ठेंगणी आणि तिच्यावर लट्टू एक शहरी तरुण अशा विविध रंगांनी रंगलेली म्हैस ही पुलंची एक अप्रतिम कथा! विनोदी कथा कशी असावी याचा उत्कृष्ट नमुनाच! त्या कथेवर एपिसोड लिहिण्याचं काम माझ्याकडे आलं होतं, पण मी ते घेतलं नाही. मी निर्मातीला सांगितलं, ‘‘या कथेवर मी लिहिणार नाही- कारण एपिसोड चांगला झाला तर श्रेय मूळ कथेला जाईल. एपिसोड फसला तर लोक म्हणतील कथेची वाट लावणारा कोण तो लेखकू?’’ तेव्हा मग निर्मातीने तो एपिसोड दुसऱ्या कुठल्या तरी लेखकाकडून लिहून घेतला होता.
धाडधाड धाड! परत एकदा बिपीनची दरवाजावर थाप!
‘‘अरे आटप! आले पुल दरवाजापर्यंत!’’

मी घाईघाईत कसाबसा टॉवेल गुंडाळून बाथरूममधून बाहेर आलो.
तेवढय़ात कामत रिसॉर्टच्या कामत बंधूंपैकी एका कामतबरोबर भाई आणि सुनीतामामी दरवाजातून आत आले. त्या दोघांच्या दर्शनाने तुकोबाला विठोबा-रखुमाईचं दर्शन घेतल्यावर झाला नसेल एवढा मला आनंद झाला. ज्या थोर लेखकाच्या लिखाणाने कित्येकदा मनाची मरगळ नाहीशी झालेली होती- जगण्याची उमेद वाढलेली होती, मेंदूला टॉनिक मिळालेलं होतं तो लेखक आणि त्याची ‘हिमालयाची सावली’ माझ्यासमोर साक्षात उभी होती. ‘पुंडलिकाचे भेटी परब्रह्म’ आल्याचा प्रत्यय मला येत होता. मी वाकून नमस्कार करणार एवढय़ात भाई म्हणाले,

‘‘सांभाळून! टॉवेलशी गाठ आहे.’’ मी हसून टॉवेल पोटाशी आवळून जमेल तितकं खाली वाकून त्यांना नमस्कार केला.

‘‘काय चाललंय? बिपीन म्हणाला कुठल्या तरी पिक्चरवर काम चालू आहे तुमचं!’’ भाई आमच्या त्या डुप्लेक्स पद्धतीच्या सूटचं निरीक्षण करीत म्हणाले.

‘‘हो. हॉलिवूडचं एक पिक्चर आहे. ‘ओह गॉड’ नावाचं- त्यावरून मराठी चित्रपटाची कथा बेततोय आम्ही!’’

‘‘ओह गॉड!’’ पुल दोन अर्थानी म्हणाले.

‘‘चांगलं आहे पिक्चर. आम्ही (म्हणजे सुनीतामामींनी आणि भाईंनी) अमेरिकेत असताना पाहिलं होतं.’’
आमची ती प्रशस्त डुप्लेक्स रूम खंडाळ्याच्या एका दरीवर डोकावत होती. काचेच्या तावदानातनं खोलवरची घळ दिसत होती- धबधब्यांना फारसं पाणी नसल्यामुळे घळीत काही ओघळ तेवढे पडत होते.

‘‘छान आहे! रूम छान आहे तुमची! स्टोरी सीटिंगचं तरी लोकेशन छान आहे. शूटिंगचं कसं असेल तो भाग वेगळा! कारण मराठी चित्रपटात एवढी सुंदर दरीबिरी म्हणजे निर्माता गर्तेत जाईल!’’

‘‘बिपीन वर्टीच्या ऐवजी बिपीन वरती होईल!’’ बिपीननं स्वत:च्याच नावावर कोटी केली.
तेवढय़ात काचेच्या त्या भल्यामोठय़ा खिडकीच्या बाहेर वेडीवाकडी वाढलेली झुडपं बघून भाई म्हणाले,

‘‘ती झुडपं कापू नका- अशीच क्रेझी (वेडीवाकडी वाढलेली) राहू द्या. टूरिस्टना क्रेझ असते असल्या निसर्गाची!’’

‘‘तरीही काही क्रेझी लोक सल्ला देतात की, जरा कटिंग करून घ्या!’’ कामत म्हणाले.

‘‘मग रिसॉर्ट बंद करून तुम्हाला इथे सलून काढावं लागेल!’’ भाई म्हणाले.
भाईंच्या उपस्थितीमुळे सगळ्यांनाच आपली विनोदबुद्धी पाजळायची ऊर्मी आलेली होती. तेवढय़ात वेटर चहाचा ट्रे घेऊन आला. चहाचे कप बघून भाई म्हणाले, ‘‘हा चहा कटिंगवाला का?’’
सगळे खदखदा हसले. तेवढय़ात मी वॉर्डरोबच्या आडोशाला जाऊन कपडे बदलून आलो.

‘‘भाई, ‘म्हैस’वरचा एपिसोड बघितलात का हो तुम्ही?’’ मी जरा दूर उभं राहून अदबीनेच विचारलं.

‘‘हो बघितला ना!’’

‘‘कसा वाटला?’’

‘‘माझी म्हैस दोनदा मेली. एकदा बसखाली सापडून, एकदा टी.व्ही.खाली सापडून!’’ आमची रूम हास्यकलोळात बुडून गेली.

पुढे कसा कुणास ठाऊक इंदिराजींचा विषय निघाला - हत्येनंतर.
‘‘इंदिरा गांधींना सफेद कपडय़ात गुंडाळून ठेवलेलं टी.व्ही.वर सतत दाखवलं जात होतं. सफेद कपडे घातलेले काँग्रेसचे पुढारी येऊन नमस्कार काय करत होते, फुलं काय वाहात होते. राजीव गांधी हसून हात जोडून सगळ्यांचं इतकं छान स्वागत करत होता की, जणू काही इंदिराजी ‘मी उठेपर्यंत सगळ्यांच्या चहापाण्याचं बघ रे!’ असं सांगून झोपल्यात की काय असं वाटावं. मला तर आणखी एक भीती वाटत होती.- मध्येच सर्फची जाहिरात लागते की काय’’ (हशा) आणि मग पुलंनी कपडे धुण्याचा अभिनय करत म्हटलं ‘‘सर्फ की धुलाई सबसे सफेद.’’ आमची हसून हसून मुरकुंडी वळली.

‘‘भाई, तुम्हाला एवढं कसं हसवता येतं?’’ मी सखाराम गटणेच्या आविभार्वात विचारलं. 

‘‘तुम्हा मंडळींना हसवण्यासाठी काही काही क्लृप्त्या योजाव्या सांगतात!’’ भाईंनी चहाचा घोट घेत म्हटलं.

‘‘भाई, आपल्याला एक विचारू?’’ माझ्यातला गटणे स्वस्थ बसायलाच तयार नव्हता.

‘‘बोल.’’

‘‘तुम्ही विनोद या विषयावर कधीच का लिहिलं नाहीत?’’

‘‘विनोदावर लिहायला घेतलं की ते गंभीर होतं म्हणून!’’ भाईंनी म्हटलं, पण पुढे त्यांनी जे म्हटलं ते अजून माझ्या डोक्यातून जात नाहीय.

‘‘पण तुला सांगतो, तुला विनोदी लिहायचं असेल तर संत वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. संत वाङ्मयाचा अभ्यास केल्याशिवाय तुला चांगलं विनोदी लिहिताच येणार नाही.’’

पुलंचे ते शब्द मी माझ्या काळजावर कोरून ठेवलेले आहेत. ती भेट काही वेळाने संपली. उन्हात अचानक आलेली थंड वाऱ्याची झुळूक निघून गेल्यासारखं वाटतं.
त्यानंतर फारच क्वचित पुलंशी इतका वेळ बोलायची संधी मिळाली. त्यांचा हजरजबाबीपणा, त्यांचं संभाषणचातुर्य, त्यांच्या ब्रिलियंट कोटय़ा या सगळ्या गोष्टींची एक कॅप्स्यूलच त्या दिवशी मला पाहायला मिळाली. पुढे कित्येक वर्षांनी एके रात्री मी उदास, बेचैन अवस्थेत तळमळत असताना उठलो आणि ‘साठवण’ काढून वाचायला सुरुवात केली. अध्र्या-पाऊण तासात माझं मन शांत झालं, प्रसन्न झालं. मी ताबडतोब एक कागद घेतला आणि भाईंना पत्र लिहिलं.

‘‘भाई, तुमचे किती आभार मानू? तुमचं लिखाण वाचल्यामुळे माझं सैरभैर झालेलं मन शांत झालं. तुम्ही खरंच थोर आहात. आमच्या भास्कर पंडितांकडून तुमचे आम्ही इतके किस्से ऐकलेत आणि तेच तेच पुन:पुन्हा ऐकलेत की, आमचे एक सुरेश रोकडे नावाचे मित्र गमतीने म्हणाले होते की, भास्कर पी.एल.वर इतकं बोललाय की त्याची एल.पी. झाली असती.’’ असं काहीबाही त्या पत्रात खरडून मी दुसऱ्या दिवशी पोस्टात टाकून दिलं.

एक आठवडय़ाभरात भाईंचं उत्तर आलं.

‘तुमच्या मित्राने माझ्या नावावर पी.एल.ची एल.पी. अशी कोटी केलीय, पण माझ्या मित्रमंडळींमध्ये मात्र पी.एल. हा ‘प्लीस लिसन’चा शॉर्टफॉर्म आहे असं म्हणतात.’’ पुलंचं ते पत्र मी अनेक वर्षं पुस्तकातल्या मोरपिसाप्रमाणे जपलं होतं. पण मध्ये एकदा पावसाच्या पुरात कुठे तरी ते हरवलं, पण माझ्या अंत:करणावर ते पत्र कायमचं कोरलं गेलंय. आजही खंडाळ्याच्या कामत रिसॉर्टच्या जवळून जाताना माझ्या कानांवर बाथरूमच्या दरवाजावरची बिपीनची थाप येते. ‘‘अरे अशोक, लवकर आटप. पुल तुला भेटायला येतायत!’’ आणि मन त्या भेटीच्या आठवणीने पुलकित होतं.

अशोक पाटोळे
avpatole@hotmail.com
लोकप्रभा
२५ मार्च २०११

Tuesday, September 10, 2013

बटाट्याच्या चाळीतील गणेशोत्सव - प्रभाकर बोकील

पु. ल. देशपांडे नामक असामीने बटाट्याच्या चाळीतील इरसाल व्यक्ती आणि वल्लींना हाताशी धरून, चाळीचा (गाळीव) इतिहासवजा बखर लिहिली अन्‌ "बटाट्याची चाळ' उजेडात आली. चाळीत सतत होणाऱ्या सामुदायिक - "सांस्कृतिक' चळवळी, आंदोलनं, भ्रमणमंडळं, शिष्टमंडळं वगैरेंवर भरपूर प्रकाश पडला. तरी एक रुखरुख राहिलीच. चाळीचा, सार्वजनिक गणेशोत्सव! साऱ्या बखरींत या गणेशोत्सवावर एकत्रित असा प्रकाश पडत नाही. आहेत ते विखुरलेले कवडसे. त्यावरून केवळ संपूर्ण चित्राचा अंदाज बांधायचा. चाळीत पुन्हा एकदा फेरफटका मारून जमविलेल्या कवडशांचा हा कॅलिडोस्कोप- अर्थात कोलाज.

सवाशे वर्षांपूर्वी म्हणजे १८८० मध्ये कै. धुळा नामा बटाटे (क्रॉफर्ड मार्केटमधील टोपल्यांचे व्यापारी) यांनी भर गिरगावात, खेतवाडीतील वाघूळ गल्लीत, एक चाळ बांधली, ६० बिऱ्हाडांची. साथीच्या आणि लढाईच्या दिवसांत आजूबाजूच्या चाळी ओस पडल्या; मात्र ही चाळ तशीच राहिली. ढिम्म लागू दिला नाही इथल्या माणसांनी प्लेगला अन्‌ जर्मन-जपान्यांना! या चाळीतील ढेकूणही मेला नाही, इतकी ही चाळ टणक. (खेतवाडी म्हणजे शेतवाडी, शेतं संपल्यावर भुते संपली अन्‌ आपण इथे राहायला आलो- इति चाळ रहिवासी - उत्साहमूर्ती राघूनाना सोमण.) असो! तर अशीही चाळ प्रकाशात मात्र आली तब्बल ७५ वर्षांनंतर, १९५८ मध्ये. निमित्त अर्थातच पु. ल. देशपांडे नामक असामीने चार-पाच दिवाळ्या या चाळीत केलेला मुक्काम! त्यांनी या चाळीतील इरसाल व्यक्ती आणि वल्लींना हाताशी धरून, चाळीचा (गाळीव) इतिहासवजा बखर लिहिली अन्‌ "बटाट्याची चाळ' उजेडात आली. चाळीत सतत होणाऱ्या सामुदायिक - "सांस्कृतिक' चळवळी, आंदोलनं, भ्रमणमंडळ, शिष्टमंडळं वगैरेंवर भरपूर प्रकाश पडला. इतकंच नव्हे, तर चाळकऱ्यांच्या व्यक्तिगत वासऱ्या अर्थात डायऱ्या, आत्मचरित्रांचे संकल्प, कन्येस लिहिलेली पत्रंदेखील सार्वजनिक झाली. तरी एक रुखरुख राहिलीच. चाळीचा, सार्वजनिक गणेशोत्सव! साऱ्या बखरींत या गणेशोत्सवावर एकत्रित असा प्रकाश पडत नाही. आहेत ते विखुरलेले कवडसे. त्यावरून केवळ संपूर्ण चित्राचा अंदाज बांधायचा. चाळीत पुन्हा एकदा फेरफटका मारून जमविलेल्या कवडशांचा हा कॅलिडोस्कोप- अर्थात कोलाज. खरं तर पु. लं.च्याच शब्दातील ही "गोळाबेरीज'! "चळवळीच्या सामर्थ्याला भगवंताचे अधिष्ठान हवे म्हणून बटाट्याच्या चाळीत मी गणेशोत्सव सुरू केला, असा ठसठशीत उल्लेख चाळीतील (एकमेव) आत्मचरित्रकार (आगामी) हणमंतराव दशपुत्रे यांनी या बखरींत केलेला आढळतो. आत्मचरित्रातील सर्वच खरं असतं, असं नसलं तरी वरील विधान कुणी नाकारीतही नाही, तोपर्यंत हेच सत्य मानायला हरकत नसावी! तर "सालाबादाप्रमाणे यंदाही' या पद्धतीचा हा गणेशोत्सव चाळींत अखंडितपणे साजरा होत राहिला. अर्थात, बाजूच्या तेजुमल काजूमल चाळीच्या २०० भाडेकरूंच्या धडाक्‍याने होणाऱ्या उत्सवापुढे, ६० बिऱ्हाडांच्या बटाट्याच्या चाळीचा गणेशोत्सव नेहमीच उपेक्षिला गेला; परंतु या गणपतीला ऐतिहासिक महत्त्व होते. हा गणपती पहिल्या महायुद्धात विकत घेतला, तेव्हापासून (जन्मतिथीच्या भू-घोळाशिवाय इतिहास कसा!) वर्षातून एकदा मधला चौक साफ करून तिथे बसविण्यात यायचा. विसर्जनाच्या रानटी रूढीपासून वाचलेला गणनायक, पुढे रंग उडाल्यामुळे "ऍनिमिक' दिसायचा. वयोमानाप्रमाणे मूळच्या एकदंतावर, दंतविहीन होण्याचा प्रसंग आला होता; परंतु त्या जागी एक खडू बसविल्यामुळे नवी कवळी लावलेल्या वृद्धाचा टुणटुणीतपणा त्याला प्राप्त झाला होता.

सदरहू गणपतीची ही "दंतकथा', हा तर इतर चाळकऱ्यांच्या थट्टेचा विषय होऊन राहिला होता! असो! "चाळीतला मधला चौक' यालादेखील एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होतं. चाळीला घाणीचं कधीच वावडं नव्हतं; पण कुठल्या खोलीतून कुठली घाण या चौकात पडावी यासंबंधीची चाळीची काही ठाम मतं होती. "अण्णा पावश्‍यांच्या घरातून निर्मात्याऐवजी, द्रोणांतून अंड्यांची टरफले पडायला लागली, तेव्हा चाळ शहारली होती!' "हा मधला चौक साफ करून, तेथे सामुदायिक सूर्यनमस्कार घालायची माझी कल्पना, कुणीच मान्य करीत नाही-' ही खंत व्यक्त झाली आहे ध्येयवादी बंडू सोमणच्या बासरींत; पण हा चौक साफ करून (वर्षातून फक्त एकदा) तिथे गणपती बसविला जायचा, त्याला सर्वांचाच हातभार लागायचा. एरवी सर्वगुणसंपन्न चाळीत एकमेकांचे जातिवाचक उल्लेख, तोतरा शेणवी, भटुरगी, परभटली मेली, कोळंबी खाऊ, सोनारडा.. वगैरे होत असले तरी गणपतीच्या १० दिवसांत सारे जातिभेद विसरले जात. कारण- प्रचंड गुणवत्तेचा साठा या ६० बिऱ्हाडांत ठासून भरला होता. या दारूगोळ्याला वात लावायची संधी गणेशोत्सवाशिवाय कधी मिळणार! ऐन गणपतीत दिवाळीची आतषबाजी... संगीतज्ज्ञ मंगेशराव हट्टंगडी ऊर्फ मंगेशराव, हे तर चाळीचे मूर्तिमंत संगीत. गणपतीच्या दिवसांत कितीही गर्दी झाली तरी मंगेशरावांच्या नुसत्या षड्‌ज-पंचमाने मंडपात सामसूम व्हायची! त्यांच्या पत्नी सौ. वरदाबाई हट्टंपडी (नृत्यचंद्रिका) यांना गणेशोत्सवात नाचायची विनंती केली, की नाचायला त्या एका पायावर तयार असत! "आपण नृत्यकला का सोडली' यावर "नृत्य साधे ना' हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं! तसेच महाविद्वान प्रा. नागूतात्या. खरं तर एका गणेशोत्सवात त्यांच्या व्याख्यानाचे वेळी, एकदा बोर्डावर चुकून "प्रा. नागूतात्या', असं लिहिल्याने प्राध्यापक ही उपाधीच त्यांना चिकटली होती. (एरवी जगातील सर्व प्राध्यापक गाढव आहेत, हे त्यांचेच मत!) नाट्यभैरव कुशाभाऊ अक्षीकर हे एकाच वेळी "नाट्यतज्ज्ञ' आणि "खाद्यपंडित' होते. कारण- एकेकाळी गंधर्व कंपनीत ते आचारी होते. गणेशोत्सवही त्यांना पंगत पर्वणीच! तेदेखील एकाच वेळी चाळीचे फडके अन्‌ खांडेकर होते.

गणपतीपुढे होणारी त्यांची नाटकं हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय. कवयित्री प्रा. कल्पकता फूलझेले या काव्याप्रमाणे खेळातही (प्रेक्षक म्हणून) हुशार होत्या. त्यांना चित्रकलेचेही वेड होते. चाळीच्या गणेशोत्सवात त्यांच्या चित्रकलेचे नमुने (!) जागोजागी टांगले जात. चाळीतील विदुषी डॉ. सौ. कल्पकलाबाई कोरके धसवाडीतील गणपतीत "नागरी जीवनातील अपौरुषेय वाङ्‌मय'सारख्या गहन गंभीर विषयावर भाषण देत; तर बटाट्याच्या चाळीतील गणपती थोडाच अपवाद असणार? (बिच्चारा!) शिवाय चाळीचे इतिहासकार महापंडित बाबूकाका खरे, आहारशास्त्रज्ञ सोकाजी नानाजी त्रिलोकेकर, ग्रहगौरव अण्णापावशे, आध्यात्मिक स्फूर्तिकेंद्र दे. भ. बाबा बर्वे, उत्साहमूर्ती राघूनाना सोमण... किती नावं घ्यावीत? हे राघूनाना सोमण कन्येस लिहितात, "गणपती ही विद्येची देवता आहे. गणपतीस्रोत्रांत त्याला गणांनां त्वां गणपतीर्हवामहे, कविः कवीणाम्‌ म्हटले आहे. गणांचा पती तो गणपती. कवी हादेखील गणमात्रांचा पती, म्हणजे गणपतीच नव्हे काय? गणपतीचे पुण्यातील महत्त्व पेशवे आणि बाळ गंगाधर टिळक या दोघांमुळे वाढले. भक्तांमुळे भगवंताला मोठेपण येते ते असे!' थोर (आगामी) चरित्रकार हणमंतराव दशपुत्रे; तर चाळीतील गणेशोत्सवातील कार्यक्रम "गाजण्या'वर प्रकाशझोत टाकतात... ""नंतरच्या आयुष्यात मी बटाट्याच्या चाळीतील गणेशोत्सवाच्या व्याख्यानांत, समोरच्या चाळकऱ्यांच्या आकसामुळे व खोडसाळपणामुळे भजी खाल्ली. केवळ "भजी मारा'च्या घोषणा झाल्या; प्रत्यक्ष स्टेजवर भजी आली नाहीत... तो प्रसंग मला आठवतो, "संस्कृती आणि जानवे' या विषयावर माझे भाषण होते. ते दिवस मोहनदास करमचंद गांधी या गुजराती पुढाऱ्याने चालविलेल्या सबगोलंकारी चळवळीचे होते; पण मी काही कच्च्या गुरूचा चेला नव्हतो! ब्रह्मतेजापुढे वाणी तेजाचा काय प्रभाव पडणार होता?'' प्रत्यक्ष गांधींची बरोबरी करणारे धडाडीचे वक्ते चाळीतच असल्यावर गणेशोत्सवाच्या नऊ दिवसांतच दिवाळीचे भुईनळे फुटणार नाही तर काय! दहाव्या दिवशी विसर्जन; पण या सार्वजनिक गणपतीचे विसर्जन कधी झालेच नाही! "(पर्यावरण' हा शब्ददेखील तेव्हा जन्मला नसेल!) तरीदेखील गणपतीला निरोप देताना अंतर्मुख व्हावं तसं, बखरीशेवटी चाळीचा निरोप घेताना पु. लं. "चिंतनात' शिरतात.... ""पूर्वी बर्व्यांच्या घरी तेवढा गणपती बसायचा. पण समेळकाकांचे दाजी मखर करीत. एच्च. मंगेशराव बाप्पा आरत्या गात.

चौपाटीवर बर्व्यांचा गणपती विसर्जनाला जायचा; पण पाट डोक्‍यावर घेऊन स्वतः जनोबा रेग्यांचे काका चौपाटीच्या समुद्रात शिरायचे! लाटा अंगावर घेत ते पाण्यात शिरले, की पोरे भ्यायची. मोठी माणसं म्हणायची, "काका बेतानं', काका आपल्या कोकणी मराठीत म्हणायचे, ""रे, समुद्राची भीती कोकण्यांक कित्याक घालतंस? माशाक आणि मासे खाणाऱ्याक पाण्याचा भय नसतां!'' त्या वेळी चाळीतल्या पोरांना त्रिलोकेकरशेठ्येफादर (त्यांना चाळीत सर्व जण "फादर' म्हणत) मोफतमंदी (हा त्यांचाच शब्द) भेळ खायला देत. त्या उत्सवाला कमिटी नव्हती; अकाऊंट नव्हता, हिशेबाबद्दल शंका नव्हती!' ही सारी गोळाबेरीज केल्यावरदेखील चाळीच्या गणेशोत्सवाबद्दल अंदाज येतो इतकंच. समाधान काही होत नाही. चाळ तर केव्हाच जमीनदोस्त झाली असंल. चाळीची मालकी मेंढे पाटील (कोथिंबिरीचे होलसेल मर्चंट) यांच्याकडे गेली तरी ती कायम ओळखली गेली "बटाट्याची चाळ'! बटाट्यातील "ब' गळून जाऊ? आता कदाचित, "टाटा टॉवर्स' ही इमारत उभी राहिली असेल. सिमेंट-कॉंक्रीटच्या असंख्य कपाटात माणसांना बंद करून ठेवणारी! मूळचे चाळकरी केव्हाच बोरिवली-डोंबिवलीपलीकडे देशोधडीला लागले असतील. त्यांची पोरं- नातवंडंदेखील आता सीनिअर सिटिझन्सच्या रांगेत स्टेशन्सवर पास-तिकिटाला उभे राहत असतील! चाळ तर ५० वर्षांपूर्वीच शेवटचा घाव कोण घालणार, याची वाट पाहत कशीबशी उभी होती. कधी वाटतं, जमिनीसपाट झालेली "बटाट्याची चाळ' पुन्हा तीन मजल्यांनी उठून उभी राहील अन्‌ म्हणेल, "पुलं, तेवढा गणेशोत्सव राहिला!'

- प्रभाकर बोकील

Friday, September 6, 2013

शिक्षकांनीच घडवलं...



पु. ल. देशपांडे यांना त्यांच्या शिक्षकांनी घडवलं. राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळेतच ते शिकले. स्वदेश आणि स्वदेशीवरचं प्रेम यासह अनेक गोष्टी ते या शाळेत शिकले. ते त्यांच्याकडूनच ऐकणं जास्त मनोरंजक होईल.

मी शाळेत होतो, तेव्हा वर्गात २५-२६ मुलं असायची. ही ५०-५५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वर्ग इतका लहान असल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक ओळखत असत. या मुलाच्या घरची परिस्थिती कशी आहे? तो कुठे राहतो? त्याचे मित्र कोण? वगैरे... शाळांना राष्ट्रीय शाळा म्हणत. सरकारी शाळांच्या मानाने इथे शिक्षकांना पगारही कमी मिळायचा. ध्येयवादी शिक्षक अशा राष्ट्रीय शाळांत येत असत. मुलांच्या मनात देशाविषयी प्रेम निर्माण व्हावं, चैन, पोषाखीपणा, ऐषआराम ही वृत्ती मुलांमध्ये नसावी, यासाठी शाळेमध्ये स्वदेशी वस्तूंचं प्रदर्शन भरवलेलं जायचं. थोर देशभक्तांची चरित्रं सांगितली जायची. उत्तम व्याख्यानं व्हायची. मुलांचं शारीरिक- मानसिक बळ वाढावं, यासाठी निरनिराळे कार्यक्रम चालू असायचे. असल्या वातावरणात अमुक एकाच शिक्षकाने मला घडवलं किंवा परिणाम केला, असं म्हणणं बरोबर होणार नाही. तरीसुद्धा काही शिक्षक विशेष आठवतात.

माझ्या लहानपणी ज्यांनी मला साहित्य, संगीत, नाटक पाहून उत्तेजन दिलं, तू चांगला लेखक होशील, नाटकांत चांगलं काम करू शकशील, असा नुसता आशीर्वादच दिला नाही, तर आत्मविश्वासही निर्माण केला, अशा माझ्या शिक्षकांमध्ये तारकुंडे मास्तरांची मला खूप आठवण येते. तारकुंडे मास्तर आम्हाला फिजिक्स- केमिस्ट्री शिकवायचे. पण मैदानात आमच्याबरोबर क्रिकेट खेळत. स्नेहसंमेलनात नाटकं बसवत. मी १५ वर्षांचा होतो, तेव्हा 'बेबंदशाही'ची स्त्रीपात्रविरहित रंगावृत्ती मी तयार केली होती. तारकुंडे मास्तरनी माझं कौतुकच केलं नाही, तर त्यांनी स्वतः ते नाटक आम्हा विद्यार्थ्यांकडून बसवून घेतलं. मी त्या नाटकात संभाजीचं काम केलं होतं.नाटकातलं भाषण म्हणून झाल्यावर कडकडून टाळ्या पडणारा तो पहिला अनुभव मी त्या वेळेला घेतला आहे.
तारकुंडे मास्तरांना मुलांच्यावर कधी रागवावंच लागलं नाही. तसे ते चांगले उंचेपुरे होते. धिप्पाड म्हणावी, अशी देहयष्टी होती. पण बोलण्यात इतका जिव्हाळा होता की, फिजिक्ससारखा विषयही कवितेसारखा वाटायचा. तारकुंडेंच्या सारखेच आमचे फडके मास्तर. ते गणिताचे शिक्षक. पण उत्तम क्रीडापटू. गोरेपान, सडसडीत शरीर, खादीचा पायजमा, शर्ट, कोट अशा वेशातले. डोक्यावर टोपी न घालणारे माझ्या लहानपणी दोघेच शिक्षक होते. फडके आणि व्ही. डी. चितळे. वास्तविक मी गणितात खूप कच्चा. पण फडके मास्तर त्याबाबतीत मला कधीही न रागावता माझ्या पेटीवादनाचं कौतुक करायचे. माझं संगीताचं प्रेम या गणिताच्या फडके मास्तरांनी आणि ड्रॉइंग मास्तरांनी- कोंडकर मास्तरांनी- वाढीला लावलं. गणिताप्रमाणेच मला चित्रकलेतही अजिबात गती नसायची. एकदा या कोंडकर मास्तरांनी मला ड्रॉइंगच्या तासाला फ्री-हँड ड्रॉइंग काढायला सांगितलं. मी हताश होऊन समोरच्या कोऱ्या कागदाकडे बघत बसलो होतो. त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक? ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, 'काय रे? तुझा कागद कोराच?' मी अगदी रडायच्या घाईला आलो होतो. मी रडू आवरत म्हणालो, 'मला चित्र काढायला येत नाही, सर!' 'अरे, तू चित्र काढायला सुरुवातच केली नाहीस, तर येतच नाही हे कसं? रेघा तर ओढायला लाग. आलं तर आलं. नाही आलं तर नाही आलं. परवा पेटी काय छान वाजवलीस. ती काय आपोआप आली? अरे, आपल्या बोटात काय लपलेलं असतं, ते आपल्यालासुद्धा ठाऊक नसतं.' मी लगेच रेघोट्या ओढायला सुरुवात केली. कोंडकर मास्तरांचा नि माझा एक खासगी करार होता. मी इतर विषयांत पहिल्या श्रेणीतले मार्क मिळवले, तर ते मला ड्रॉइंगमध्ये पास करणार होते... आणि गंमत अशी की, मीही त्यांना उगीच पास करायला लागू नये म्हणून प्रयत्नपूर्वक ड्रॉइंगकडे लक्ष द्यायला लागलो. माझी बोटेही साथ द्यायला लागली.

आणखी एका शिक्षकांची मला नेहमी आठवण येते. ती म्हणजे व्ही. डी. चितळे मास्तरांची. पुढे फार मोठे साम्यवादी नेते म्हणून त्यांचं नाव झालं. ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धा दूरदर्शनवरून पाहताना मला त्यांची खूप आठवण झाली. त्यांनी आम्हाला त्या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या ध्यानचंद आणि इतर खेळाडूंचा खेळ दाखवला होता. ते आम्हाला इतिहास शिकवीत. पण स्वतः मात्र उत्तम खेळाडू होते. खूप देखणे होते. लालबुंद चेहरा. उत्तम आरोग्याचा आदर्श नमुना असावा, असे दिसायचे. सदैव हसतमुख. उत्कृष्ट वक्तृत्व. ते बोलायला लागले की, आम्ही मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं ऐकत असू. माझी वक्तृत्वाची आवड चितळे मास्तरांनी जोपासली. त्यांनी मला दिलेला एक गुरूमंत्र आठवतो. ते म्हणाले होते, 'समोर गर्दी कितीही असो, त्यातल्या एकाशी बोलतोय, असं समजून बोलत जा. म्हणजे त्या गर्दीतल्या प्रत्येकाला तू त्याच्याशी बोलतोस असं वाटेल. फोटोतली सरस्वती कशी आपल्याकडेच पाहते असं वाटतं ना? तसं!' या शिक्षकांनी केलेल्या चांगल्या संस्कारांनी घडून मी किती चांगला झालो, हे मला सांगता येणार नाही. पण त्यांच्याविषयी मात्र माझ्या मनात खूप मोठी कृतज्ञता आहे. त्यांची आठवण झाली की, मी पुन्हा शाळकरी वयाचा होतो.

पु.ल. देशपांडे
महाराष्ट्र टाईम्स
५/९/२०१३


Wednesday, June 12, 2013

पु. ल. एक आठवण, किती सारी साठवण! - आरती नाफडे

बारा जून. पु.लं.चा स्मृतिदिन. ज्या व्यक्तिरेखा काळाच्या पडद्याआड कधीच जाऊ शकत नाहीत त्या अमर आहेत. पु.लं.च्या स्मृती त्यांच्या बहुरंगी व बहुढंगी व्यक्तिमत्त्वाने अमर आहेत. त्यांच्या स्मृतींचे अनेक पदर उलगडताना मुलांच्या पाठ्यपुस्तकातील एक धडा स्मरणात राहिला. धड्याचे नाव होते ‘बिनकाट्याचा गुलाब.’ लेखक गंगाधर पानतावणे. दोन महान युगपुरुष पु. ल. देशपांडे व बाबा आमटे यांचे व्यक्तिमत्त्व उलगडत जाणारे अनेक धागेदोरे यांची सुंदर वीण म्हणजे ‘बिनकाट्याचा गुलाब.’ गंगाधर पानतावणे यांच्या पाठाच्या आधारे आठवण लिहिण्याचा प्रयत्न.
पु. ल. देशपांडे हे नुकतेच बंगालचा प्रवास करून आले होते. शिशिर ऋतूच्या एका रम्य सायंकाळी लेखक गंगाधर पानतावणे, सुनीताताई व पु. ल. पुण्याच्या घरी ‘रूपाली’त बैठकीत गप्पा मारीत बसले होते. गप्पांमध्ये रवींद्रनाथांचा विषय ताजा होता. त्या गप्पांत रवींद्रनाथांचे संगीत, त्यांचे नाटक व शिक्षणदृष्टी तसेच बंगाली भाषेचे वैभव असे विषय रंगत चालले होते.

तेवढ्यात गंगाधर पानतवणे यांचे लक्ष बैठकीतील कुंडीकडे गेले. या कुंडीत बिनकाट्याचा गुलाब होता. त्याबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता होती. बिनकाट्याच्या गुलाबाची जन्मकथा सांगताना पु. ल. लेखकांना सांगतात-

एकदा सुनीताताई व पु. ल. आनंदवनात मुक्कामाला असताना बाबा आमट्यांबरोबर आनंदवनाचा फेरफटका मारताना अंध मुलांना भेटायला त्यांच्या कक्षात गेले. बाबा आमट्यांच्या आनंदवनातील आंधळ्या मुलांनी गुलाबाची वर्णनं ऐकली होती. पण, गुलाब कसा होता हे त्यांना माहीत नव्हते. एका आंधळ्या मुलाने गुलाबाच्या झाडाला स्पर्श केला, तेव्हा गुलाबाचे काटे बोचून त्याच्या हातातून रक्त आले. ते बघून बाबांचे मन द्रवले व त्यांनी मुलांसाठी बिनकाट्याचा गुलाब शोधायचे ठरवले. ही गोष्ट जेव्हा पु. लं.ना कळली तेव्हा त्यांचे पण मन मुलांसाठी करुणेने भरून गेले व आनंदवनातील आंधळ्या मुलांसाठी बिनकाट्याचा गुलाब घ्यायचा म्हणून त्यांनी खूप शोध घेतला. शेवटी तो त्यांना कलकत्त्याच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये मिळाला. बिनकाट्याच्या गुलाबाची जन्मकथा पु.लं.नी लेखकाला सांगितली. बैठकीतील बिनकाट्याच्या गुलाबाची कुंडी अशी उकल करून लेखकांना कळली.

जीवनावर व जगावर जीव तोडून प्रेम करणारे पु. ल. मुलांना गुलाबाचे काटे बोचू नयेत व प्रेमाने गुलाबाच्या झाडाला गोंजारता यावे, त्या झाडाशी मुलांना मैत्री करता यावी, गुलाबाचे सौंदर्य व कोमलता हाताच्या स्पर्शाने कळावी म्हणून पु.लं.नी बिनकाट्याचा गुलाब शोधला व मुलांसाठी ती कुंडी ते आनंदवनात पाठवणार होते. बिनकाट्याच्या गुलाबाच्या संशोधनापासून तर कुंडी बैठकीत स्थानापन्न होईपर्यंतचा इतिहास सांगताना पु.लं.ची मुद्रा तृप्त व फुललेली होती.

दोन महान व्यक्तिमत्त्वांचा हा मिलाप किती सुखावह. बाबा आमटे यांचा जगावेगळा सेवेचा ध्यास, जीवनाला नवा आयाम, आशय देण्याचा बाबांनी वसा घेतला होता.

तर पु. ल. एक खळखळतं व्यक्तिमत्त्व. सदैव जीवनाच्या प्रेमात अडकलेले, समाजमन नात्यानं बांधण्याचा ध्यास घेतलेले. बाबांच्या सेवेच्या वृक्षाला प्रेमाचा ओलावा देणारे पु. ल. म्हणतात, दुसर्‍याचं अस्तित्व मान्य करणं यात संस्कृतीची सुरुवात आहे. आंधळ्या मुलांना गुलाबावर डोळस प्रेम करता यावं हे बाबांंचं स्वप्न होतं. यासाठी प्रथम त्या मुलाचं अस्तित्व मान्य करून वेदनेशी असणारे माणुसकीचे नाते पु. लं.नी मुलांसाठी जपले.
पु.लं.नी माणसांवर प्रेम व माया केली. लोकांच्या मनाचा वेध घेणं व त्यांच्या मनात आतपर्यंत डोकावणं ही पु.लं.ची शक्ती आहे म्हणूनच मानवी जीवनातली दु:खं बघून व्यथित होणारे बाबा आमटे व काट्याच्या वेदना सहन करणारा मुलगा यांच्या अंतरंगांचा वेध पु.लं.ना सहज घेता आला. काट्याने मुलाला दिलेली वेदना जीवनावर असीम प्रेम करणार्‍यांनाच घायाळ करू शकते. त्यांच्यातील या समान दुव्यामुळे मैत्री फुलत गेली. सुनीताताई व पु. ल. आनंदवनात येऊन राहात व तेथील कार्याचे जवळून अवलोकन करीत. आनंदवनातील कुष्ठरोग्यांची सेवा पाहून ते भारावत. चांगल्या कार्यासाठी काहीतरी धडपड केली पाहिजे, हे त्यांच्या जीवनाचं ब्रिद होतं. गुणग्राहकता हा त्यांचा मूळ पिंड. जिथं उज्ज्वल भविष्याच्या पायवाटा पोहोचतात त्या वाटेचा मागोवा घेत पु.ल. आनंदवनात नेहमीच येत असत व तेथील सुखदु:खात सामील होत.

बिनकाट्याच्या गुलाबाची गोष्ट लहान पण आशय महान. गोष्ट वाचूनही बारा वर्षे होऊन गेली, पण ती आता पुन्हा स्मरली. यालाच परीसस्पर्श म्हणतात. ती गोष्ट पुन्हा उजळून निघते. पु.लं.च्या सर्व साहित्यांच्या बाबतीत हेच सूत्र लागू पडते. जे वारंवार आठवते ते स्मरण व जे स्मृतीला चालना देते तो स्मृतिदिन. पु.लं.ना विनम्र अभिवादन व आदरांजली.

- आरती नाफडे
नागपुर
तरुण भारत, १२ जुन २०१३

अमरत्व काय फक्त देवालाच आहे काय?

लहानपणी सुट्टीत सायकल शिकणे आणि
वाचनालय लावणे ह्या  दोन गोष्टी
घरोघरी अनिर्वाय होत्या.
 
नुकतेच आम्ही गुलबकावली  आणि ठकसेन ह्यांच्या
राज्यातून  टोम सायर आणि रॉबिन्सन क्रुसो
ह्यांचे वाचन संपवले होते…
आता हा थोडा मोठा झाला असे समजून
आईने “असा मी असामी ” हे पुस्तक वाचायला दिले…
 
तिथून ह्या माणसाने जे “गारुड” घातले
ते अजून सुटलेले नाही…
 
“असा मी ..” नंतर “चाळीत” गेलो..
तिथून “व्यक्ती आणि वल्लींना” घेवून
“खोगीर भरती” केली…
तर “गण-गोतांनी” आमची “खिल्ली” उडवली…
 
सहज म्हणून “पूर्वरंग” घेतले ते “जावे त्यांच्या देशात” असे म्हणून “पश्चिम रंग” करून आलो….
“तुझे आहे तुजपाशी” असे म्हणत असतांनाच “सुंदर मी होणार” कधी ओठावर आले ते समजलेच नाही..
 
“पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे” ह्या लेखकाने उत्तमोत्तम साहित्य देतांना विनोदाची लक्ष्मण-रेषा कधीही ओलांडली नाही.
विनोद करीत असतांना ते थोडे-फार चावट विनोद करत असत पण ते कधीही अश्लील पणाकडे झुकले नाहीत…
आपली पुस्तके एका कुटुंबात वाचली जाणार आहेत आणि ती दिवाणखान्यात ठेवली जाणार आहेत ह्याची त्यांना पूर्ण जाणीव असावी..
त्यांचे लेख कधी कधी विचार करायला भाग पाडत होते पण कधीही दुखी: करत न्हवते.
 
मध्येच कधीतरी दिवाळीत “वाऱ्यावरची वरात” हे नाटक दाखवले…
आणि हा माणूस कलाकार पण होता हे समजले…
कथाकथन म्हणजे नक्की काय आणि ते कसे करायचे ह्याचे ज्ञान फार कमी लोकांना असते..पु.ल., व.पु, द.मा आणि शं.ना. हे त्यापैकीच..
पण मुकुटमणी म्हणजे पु.ल.
 
“चाळ” असो की “असामी” केवळ एकट्याच्या जीवावर हा कार्यक्रम खेचणे हे खायचे काम नाही…
स्वत: एक उत्तम कवी असल्याने ”कविता वाचनाचा” कार्यक्रम  पण ते उत्तम करीत असत…
 
आज कदाचित आमची ही शेवटचे पिढी की जी मराठीची गोडी अनुभवते असे वाटत असतांनाच परवा माझा मुलगा एक पुस्तक वाचत असतांना जोरात हसायला लागला…
सहज म्हणून पुस्तक बघितले तर…”असामी असा मी”….
जो पर्यंत ह्या जगात हे पुस्तक आहे तो पर्यंत मराठीला मरण नाही…
 
अमरत्व काय फक्त देवालाच आहे काय?
 
 
मुळ स्त्रोत - http://full2dhamaal.wordpress.com/ 

Tuesday, June 11, 2013

एका लेखकाने.. - उत्पल वी.बी.

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. इअरप्लग लावून फोनवर गाणी ऐकत होतो. ब्राउझ करताना एकदम पुलंचा 'पानवाला' दिसला. फोनमध्ये पुलंच्या काही फाईल्स आहेत. म्हैस, असा मी असामी, व्यक्ती आणि वल्लीतील व्यक्तिचित्रे, मी आणि माझा शत्रूपक्ष आणि इतरही काही. एके काळी हजारो वेळा ऐकलेल्या. अचानक वाटलं, पानवाला ऐकू. फाईल प्ले केली. खूप दिवसांनी, खरं तर अनेक वर्षांनी पुलंना पुन्हा ऐकलं. काही ओळींनंतर मी हसतो आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि मग आपण हसतो आहोत याचं मला बरं वाटू लागलं.

साहित्य असं घनगंभीर नाव असलेल्या प्रकाराचं महत्त्व काय? त्याचं श्रेष्ठत्व कसं ओळखायचं? चांगलं साहित्य हे आपल्याला जीवनदर्शन घडवणारं असतं, तो त्याच्या श्रेष्ठतेचा एक निकष आहे असं म्हटलं जातं. उत्तम लेखन आपली खोलवर चौकशी करतं. (शब्दप्रयोगाची प्रेरणा पु.ल.देशपांडे. मुगदळाच्या आणि बुंदीच्या लाडवांनी दातांची खोलवर चौकशी केली पाहिजे.…'माझे खाद्यजीवन', हसवणूक.) चांगलं लेखन प्रामाणिक असतं. अभिनिवेशरहित असतं. अंतर्मुख करणारं असतं. मग आपण हसतो तेव्हा काय होत असतं? आपण कशामुळे हसतो? तिथेही काही दर्शन घडत असतं का? की आपण अंतर्मुख होतो तेव्हाच फक्त दर्शन घडत असतं?

पु.ल.देशपांडे हे माझ्यासाठी एक प्रकरण होतं. 'होतं' असं चटकन लिहिलं गेलं कारण आज आता गाडीने ते स्टेशन सोडलं आहे. त्याचा मला त्रास वगैरे होत नाही. कारण वेगवेगळ्या टप्प्यांवर तुमचं विचारविश्व वेगवेगळे आकार घेत असतं. किंबहुना तसे आकार घेतले जाणं आणि त्यानुरूप तुमच्या वाचनात बदल होणं ही एक आश्वासक गोष्ट आहे. वाचन आपल्या आवडत्या टूथपेस्टसारखं नसावंच. अनेक वर्षं एकच ब्रँड! पण पुलंच्या बाबतीत मुक्काम लांबला हे मान्य करावं लागेल. पुलप्रभाव अनेक वर्षं टिकून होता. पुलं ज्यांना पाठ असतात अशा काहींपैकी मी एक. आणि पुलंनी दर्जेदार विनोदाचा आणि सभ्यतेचा जो संस्कार केला तो माझ्यावरही झाला. पुलंच्या प्रतिभेचं आणि हेवा वाटावा अशा निरीक्षणशक्तीचं, सकस विनोदाचं गारूड नंतर मग नेमाडे, रंगनाथ पठारे, श्याम मनोहर, भाऊ पाध्ये, अरुण कोलटकर, नारायण सुर्वे, अरुण काळे अशा अनेक मंडळींचा परिचय झाल्यावर विरत गेलं हे खरं आहे. पण पुलंनी जे चैतन्य दिलं ते विलक्षण होतं. मी 'कोसला' प्रथम वाचली ती पुलंचा कोसलावरचा लेख वाचून! पुढे मग 'कोसला' ने जे झपाटलं ते झपाटलंच. ते भूत अजूनही मानगुटीवरून उतरायला तयार नाही. पण त्याचबरोबर उपमेला, दाखले देताना पुलंची पात्रं वा त्यांनी लिहिलेलं काही हमखास धावून येतं आणि ती भुते अजून अदृश्य रूपात मानगुटीवर वावरत आहेत याची खात्री पटते.

पुलंना जाऊन तेरा वर्षं झाली. मी तेव्हा तेवीस वर्षांचा होतो. पुलं सगळीकडे हजेरी लावून होते. कट्ट्यावरच्या गप्पात, घरातल्या गप्पात, लिहिण्यावर प्रभाव टाकण्यात - सगळीकडे. व्यक्ती आणि वल्ली, हसवणूक, बटाट्याची चाळ, खिल्ली, एक शून्य मी हे माझ्या मते पुलंचे मास्टरपीसेस! पांडुरंग सांगवीकरने आम्हांला हात धरून फर्ग्युसनमध्ये आणि पुण्यातल्या रस्त्यांवरून फिरायला नेईपर्यंत आणि त्याची थोर बडबड ऐकवेपर्यंत आम्ही पुलं दाखवतील ते वाचत होतो. त्यांनी 'हे वाचा' म्हटलं की वाचत होतो. त्यांचा अचाट आणि निर्विष विनोद मेमरीमध्ये सतत स्टोअर होत होता. मला वाटतं की ऐंशी-नव्वदच्या दशकातली माझ्यासारखी मुलं ही बहुधा 'भाबड्या मध्यमवर्गीय पिढी'तील शेवटची मुलं. गूगल, फेसबुक आणि स्मार्टफोनच्या जगात आज मीही सहज वावरत असलो तरी 'चितळे मास्तरांच्या चपला' म्हटलं की मी गहिवरतो. तसा गहिवर आजच्या अठरा-वीस वर्षाच्या मुलाला येतो की नाही मला माहीत नाही. ते तपासावं लागेल. पुलं हे आमच्या या भाबड्या पिढीचे प्रमुख. (विलास सारंग म्हणतात, 'महात्मा फुले, वि.रा.शिंदे, डॉ. आंबेडकर यांच्या लेखनाने मराठी लेखक-वाचकांना जाणीव करून दिली की मराठी सांस्कृतिक विश्व एकसंध नाही. तरीही या घरगुती खेळकरपणाच्या शैलीला धुरीणवर्ग अगदी गळ्याशी येईपर्यंत चिकटून राहिला. हे १९६०-७० सालापर्यंत दिसून येतं. पु.ल.देशपांडे हे धुरीणवर्गाच्या या आवडत्या लेखनशैलीचे व विचारशैलीचे अखेरचे निरूपणकार.… त्यांच्या लेखनात फार वाचनीयता आहे. हे काचेच्या घरातलं चित्र आहे असं आपल्या मनाला सतत जाणवत राहिलं तरी वाचण्याच्या आनंदाला आपण स्वखुशीने मान्यता देतो.' - वाङ्ग्मयीन संस्कृती व सामाजिक वास्तव, पृ. ४९) त्यांची सृजनशक्ती अफाट होती. आणि तिला सामाजिक जाणिवेचं, मूल्यभावाचं दणकट अस्तर होतं. कृतज्ञ असणे, भारावून जाणे, कौतुक करणे, 'चांगलं तेच' बघणे, कलेच्या बाबतीत काही घट्ट निकष असणे, माणसं दुखावली की आपण वाईट वाटून घेत अस्वस्थ राहणे या गुणांना आज वेगवेगळी परिमाणे येऊन चिकटली आहेत. जागतिकीकरणानंतर, आर्थिक-सामाजिक आणि तंत्रज्ञानातील बदलांमुळे  मानवी स्वभाव, नाती आणि महत्त्वाचं म्हणजे मानवी मूल्ये हे सगळंच 'सततच्या संक्रमणा'त असल्यासारखं दिसतं आहे. माणूस कधी नव्हे इतका 'बोलता' (आणि कमी 'ऐकता') झाला आहे. भाबडेपणा हा दुर्गुण वाटावा अशीही परिस्थिती अधेमधे निर्माण होताना दिसते. तेव्हा एकूण गलबल्यात आज पुलंची पात्रे आणि त्यांचं तत्वज्ञान कसं,किती टिकतं ही उत्सुकता आहे. स्वतः पुलं मात्र त्याबाबतीत उदासीन होते. त्यांनी म्हटलंय, 'माझं लिहिणं म्हणजे नदीच्या वाहत्या पाण्यात कागदी होड्या सोडण्यासारखं आहे. त्यातल्या ज्या टिकतील त्या टिकतील, बुडतील त्या बुडतील.' साहित्याबाबत सतत आदळआपट करणारे समीक्षक, लेखक आणि साहित्याकडे तटस्थपणे बघण्याची क्षमता असलेले साहित्यिक पुलं हा फरक बघताना मौज वाटते.

एक मात्र अगदी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. भाबड्या पिढीवरील पुलप्रभावामुळे लघुनियतकालिकांची चळवळ, साहित्यातील इतर प्रवाह काहीसे दुर्लक्षित राहिले. नेमाडेंनी तर 'आपल्याकडे हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व वगैरे भयंकर प्रकरण आहे ना….'असा उल्लेख कुठेतरी केल्याचं स्मरतं. त्याचा राग यायचं खरंच काही कारण नाही. पुलंची मोहिनी इतकी जबरदस्त होती की अनेक चांगले लेखक मराठी वाचकांच्या नजरेतून सुटले किंवा उशीराने लक्षात आले हे खरं आहे. पुलंची लोकप्रियता नक्की कशामुळे होती? मार्मिक, सर्वसामान्य (म्हणजे शहरी, निमशहरी मराठी मध्यमवर्गीय) माणसाला जवळचं वाटणारं, बुद्धिमान निरीक्षण आणि बेतोड विनोदाची डूब असलेलं, सात्विक विचार असलेलं, विद्वत्तेचा आव अजिबात न आणणारं, जुन्यात रमणारं, मूल्यांची पीछेहाट होताना बघून तळमळणारं - एका सामान्य स्थानावरून भोवतालचा गोंगाट टिपणारं पुलंचं लेखन बहुतेकांना आवडत होतं. माझ्यासारखा अत्यंत टिपिकल मध्यमवर्गीय घरातला मुलगाही त्याला अपवाद नव्हता. पुलंची दृष्टी अतिशय स्वच्छ वाटायची. आणि अर्थातच त्यांचा विनोद आणि उत्तम भंकस करायची ताकद त्यांच्या लिखाणाकडे आकर्षित करायची! विसंगतीवर, न आवडलेल्या गोष्टींवर ते त्यांच्या खास शैलीत फटके मारायचे पण हा लेखक आतून नितळ आहे असं वाटायचं. (मी मुद्दाम लेखक असं म्हणतोय कारण माणूस म्हणून पुलंबद्दल मला वाचून/ऐकूनच माहिती होती. आणि आहे. शिवाय आवडत्या लेखकावर 'लेखक' म्हणूनच बोलावं, कारण आपण त्यातल्या त्यात अचूकपणे तितकंच करू शकतो.)
  
पुलंकडे विनोदाचं जबरदस्त हत्यार असल्याने आणि त्याचा मोठा प्रभाव वाचकांवर पडत असल्याने कदाचित त्यांच्या लिखाणावर प्रतिक्रिया देताना, त्याची समीक्षा करताना साहित्यातले जाणकार, विशेषतः लघुनियतकालिकात सक्रिय असणारी मंडळी अधिक तीक्ष्णपणाने बोलत असावीत असं वाटतं. नवकवी, नवचित्रकार यांची पुलंनी बरेचदा चेष्टा केली आहे. पण त्यांचा रोख व्यक्तीकडे नसायचा. 'नवकविते'कडे किंवा 'नवचित्रा'कडे असायचा. ते 'ओल्ड स्कूल'चे होते. इंटेन्स होते. सिनिक नव्हते. प्रतीकात्मकता, दुर्बोध मांडणी याचा धसका घेणारे होते. पण म्हणून ते कलाकृतीचा समाचार घ्यायचे. कलाकाराचा नाही. 'थिएटर ऑफ द अ‍ॅब्सर्ड' या प्रवाहातील एक प्रमुख नाटककार युजीन आयनेस्को याच्या 'द चेअर्स' या नाटकाचं 'खुर्च्या : भाड्याने आणलेल्या' हे विडंबन किंवा बेकेटच्या 'वेटिंग फॉर गोदो'चं 'गोदूची वाट' हे विडंबन अफाट आहे. मूळ नाटके मी पाहिलेली किंवा वाचलेली नाहीत हे इथे आवर्जून नोंदवतो. कदाचित पाहिली तर ती आवडतीलही, पण पुलंच्या टीकात्मक विडंबनाने जी मजा आली तिला तोड नाही. आता 'मजा आली' म्हटल्याने कदाचित काही भुवया उंचावतील, पण मला इथे सांगावसं वाटतं की विडंबन हा एक स्वतंत्र प्रकार म्हणूनही बघता येतोच की. आपल्याला आपणच आखलेल्या रस्त्यावरील खाचखळगे दाखवणारा. त्यात 'मजा येते' म्हणजे त्यातील रचनाकौशल्यामुळे, टिप्पणीमुळे आनंद मिळतो. ताण हलका होतो. गंभीर नाटक, अस्तित्ववादी चिंता वाहणारे नाटक वा कादंबरी वाचतानाच एकीकडे पुलंचं पात्र रोजच्या जगण्याशी झटापट करताना दिसतं तेव्हा ताण हलका होत असतो. हसू फुटत असतं. शेवटी माणूस आणि त्याचं हे विश्व गुंतागुंतीचं आहेच. त्यात वैविध्य आहेच. विचारांच्या, विचार प्रकटनाच्या विविध दिशा आहेत. आणि म्हणूनच जसे नेमाडे आहेत, कमल देसाई आहेत, जीए आहेत तसेच पुलंही आहेत!

पुलं ज्या काळाचं प्रॉडक्ट होते त्या काळाच्या चौकटीत पाहिलं तर काही गोष्टी उलगडू लागतात. पुलंची स्त्रीचळवळीबद्दलची धारणा आणि त्यांनी केलेलं काही स्त्रियांचं 'अतिविशाल' चित्रण हा एक चर्चेचा विषय असतो. पुलं पुरोगामी विचारांचे होते. विज्ञानाचा आग्रह धरणारे होते. जुन्यात रमणारे पण पुढे पाहणारे होते. त्यांनी कर्तृत्ववान स्त्रीला सलामही केला आहे. हिराबाई बडोदेकर, केसरबाई केरकर, बेगम अख्तर, ज्योत्स्ना भोळे, लता मंगेशकर, इरावती कर्वे यांची त्यांनी रेखाटलेली व्यक्तिचित्रे बोलकी आहेत. अर्थात या सहापैकी पाच गायिका होत्या आणि संगीत हे पुलंचं पहिलं प्रेम होतं हे सर्वश्रुत आहे. शिवाय व्यक्ती आणि वल्लीसारख्या काल्पनिक व्यक्तीचित्रांमध्ये एकही स्त्री व्यक्तिरेखा नाही हेही नोंदवायला हरकत नाही. पण तरीही त्यांच्या स्वच्छ दृष्टीत स्त्रीकडे बघताना काही भेसळ व्हायची असं मला अजिबात वाटत नाही. त्यांच्या प्रत्येक अभिव्यक्तीमध्ये (मग ती तिरकस असली तरी) कमालीची सहजता होती, उत्स्फूर्तता होती. मात्र त्यांची वक्र विनोदी नजर 'सोशल वर्कची घाई' असलेल्या काही स्त्रियांवर पडली हे खरं आहे. (एक होती ठम्माबाई, तिला सोशल वर्कची घाई - पुलंची एक विनोदी कविता. वीणा, दिवाळी १९९२ मध्ये प्रकाशित. 'उरलंसुरलं' या संग्रहात समाविष्ट. याच संग्रहात त्यांचं 'पृथ्वी गोल आहे' हे 'स्त्रीमुक्तीवाल्या' स्त्रियांवर टिप्पणी करणारं एक 'नेटक'ही वाचता येईल. हे 'अभिरुची'च्या जून १९४६ च्या अंकात प्रकाशित झालं होतं.) सुस्थितीतील श्रीमंत स्त्रिया आणि त्यांची समाजसेवा हा त्यांचा विशेष आवडता विषय होता असं दिसतं. हे एका बाजूला मान्य केलं तरी दुसरीकडे स्त्री चळवळ आणि पुलंची प्रतिक्रिया याकडे पाहताना मला असं वाटतं की त्यांच्या आधुनिक तरी लग्न, कुटुंब यांना भक्कम, निःसंशय होकार देणाऱ्या मनाला काही गोष्टी पेलल्या नाहीत. त्यांना कदाचित स्त्री चळवळीची दिशा कोणती हा प्रश्न पडला असावा. कदाचित थोडं असुरक्षितही वाटत असेल का? कारण स्त्रीने टाकलेलं एखादं पाऊल आजही शंभरदा निरखून पाहिलं जातं तर त्या काळाच्या चौकटीत विचार करताना पुलंची प्रतिक्रिया समजून घेता येऊ शकेल. दुसरं म्हणजे त्यांनी विनोदाचं आवरण सतत जवळ बाळगल्याने त्यांचं लेखन कधी 'जहरी' झालं नाही. त्यांनी स्त्री चळवळीचा अधिक खोलात जाऊन विचार करायला हवा होता असं नक्कीच म्हणावसं वाटतं, पण (पुलंमुळेच बहुधा) विनोदाचं अंगही विकसित झाल्याने जातिवंत विनोदी लेखकाच्या 'सुरसुरी'चा संबंध मी तात्विक वादाशी जोडण्याचं टाळतोच जरा! राजकीय व्यंग्यचित्र जसं व्यंग्यचित्र म्हणूनच आपण बघतो तसंच विनोदी लेखनाकडेही बघावं. अखेर 'अतिशयोक्ती' हे विनोदाचं वैशिष्ट्य असतंच.

'आहे मनोहर तरी' मधून सुनीताबाई भेटतात तसेच पुलंही भेटतातच. एक सातत्याने व्यक्त होणारा प्रतिभावान आणि दुसरी क्वचित व्यक्त होणारी प्रतिभावान. संवेदनशील लेखक, प्रतिभावंत असे पुलं एकीकडे नवरा म्हणून असंवेदनशील होते याचं चित्र 'आहे मनोहर तरी'मध्ये दिसतं, पण ही असंवेदना 'दुष्ट जाणिवे'तली नसून लहान मुलातली आहे असं सुनीताबाईदेखील सांगतात. मला वाटतं की मराठीमध्ये लेखकांच्या बायकांनी लिहिलेली आत्मकथने हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तावेज आहे. पण त्याबाबतीत 'निर्वाळा' देणं ही अवघड गोष्ट आहे कारण अखेरीस जे आहे ते 'त्या दोघां'मधलं आहे. (शिवाय असंतोषाचं मूळ व्यवस्थेतही असतं. 'नवरा' हा प्रॉब्लेम आहे कारण मुळात 'लग्न' हा प्रॉब्लेम आहे!). अर्थात लेखकाच्या लिहित्या बाजूसारखीच ही दुखरी बाजूही समोर येणं आणि त्याबद्दल चर्चा होणं आवश्यक होतं आणि ते काम या आत्मकथनांनी केलं. ('आहे मनोहर तरी' मध्ये एक तक्रारीचा सूर आहे. त्यामुळे मला ते तितकंसं आवडलं नाही असं मला एका मैत्रिणीने सांगितलं होतं. तिचं म्हणणं होतं की प्रतिभावान माणसांना सांभाळून घ्यावं लागतंच. ते जे देतात ते अधिक मोलाचं असतं. मला तिचं हे म्हणणं पटलं नव्हतं. कारण सुनीताबाई लिहितात त्याप्रमाणे प्रतिभावंताला निर्मितीच्या क्षणी समजून घेणं, सांभाळणं हे योग्यच आहे. पण इतर वेळी तो सामान्य माणसासारखाच नसतो का?)

आज पुलंचे उतारे फेसबुकवर फिरत असतात. त्यांची पुस्तके आजही पुस्तक प्रदर्शनात/पुस्तकांच्या दुकानात दर्शनी शेल्फ पटकावून असतात. पुलं आवडणारा एक मोठा वर्ग अस्तित्वात आहे आणि त्यांच्या लेखनाची कठोर समीक्षा करणारेही आहेत. पुलंचा विनोद न आवडणारेही काहीजण दिसतात. त्यांचं लेखन रंजक आहे पण सखोल नाही असेही मत दिसते. पुलंनी मध्यमवर्गीय भीरूतेचं उदात्तीकरण केलं असा सूर दिसतो. पुलं टिकले का? टिकणार का? यावर मतप्रदर्शन होत असते. ('भालचंद्र नेमाडे' हा विषय जितका चर्चिला जातो तितकी चर्चा पुलंची होत नाही हे मात्र खरं!). मला स्वतःला (अस्मादिक तिशीत आहेत. तरुण आहेत की नाहीत हे ठरवायचं असेल तर फेसबुक प्रोफाईलला एकदा अवश्य भेट द्यावी!) पुलंकडे, ज्या लेखकाने एका टप्प्यावर माझं मानस घडवलं, आज बघताना काय वाटतं? मी खरं तर काहीसा ब्लँक होतो. खूप सवयीच्या माणसाविषयी कुणी आपल्याला आपलं मत विचारलं की आपण जसे ब्लँक होतो तसा ब्लँक!

 - उत्पल वी.बी.
मुळ स्त्रोत -- http://mindwithoutmeasure.blogspot.in/2013/06/blog-post.html
'मिळून साऱ्याजणी', जून २०१३

Tuesday, April 9, 2013

तुम्हाला नागपूरकर व्हायचं का?

 ...आता तुम्हाला नागपूरकर व्हायचं का? हि तुमची महत्त्वाकांक्षा पार पाडणं अत्यंत सोप्पंय.त्यासाठी एकच अट आहे,म्हणजे तुम्ही नागपुरात राहून चालणार नाही.खरा नागपूरकर हा नागपुरात 'नागपुरी खाक्या' दाखवूच शकत नाही कारण तिथे सगळेच खाक्या दाखवायलाच उत्सुक तर ह्याचा खाक्या कोण बघणार?

जर पुण्या-मुंबईत राहिलात तरच नागपुरी खाक्या दाखवणं शक्य आहे.आपण नागपुरी आहोत एवढं नुसतं ऐकवीत राहायचं बास..हे मुख्य काम.मग ज्या कुठल्या गावी राहत असाल त्याच्या तुलनेनी नागपूर प्रशस्ती चालू ठेवायची. पानामध्ये कितीही अस्सल तूप पडलेलं असलं तरी वर्‍हाडी तूप या विषयावरती बोलावं.बिर्याणी खातानासुद्धा 'वडाभाताचा मजा काही और आहे' हे सांगाव.अगदी गुलाबी थंडी जरी पडलेली असली तरी 'नागपुरी उन्हाळा..अरे काय,नागपुरी उन्हाळा...ती संत्री..ते जाळ्याचे पडदे...वगैरे वगैरे' ते ऐकणार्याला त्या थंडीत घाम फुटेपर्यंत ते ऐकवत राहा.हे सगळं नागपूर शहरापासून आपण किमान  २०० मैल दूर आहोत हे ध्यानात ठेवून. खुद्द नागपुरात असलं काही बोललात तर ''चूप बे,का उगाच फजूल फुक्या मारून राहिला बे?'' असं लगेच ते विचारतील मग गोंधळ.

नागपूर बाहेरचा माणूस हा रत्नागिरीचा किंवा धुळ्याचा जरी असला तरी त्याला ''तुमच्या पुण्या मुंबईच्या लोकांचा..'' अशा तुकड्यानीच त्या वाक्याला सुरुवात करावी नेहमी.सतत कुणीतरी आपल्याला उपेक्षेनी मारुल राहिलेलं आहे हि भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण स्वतः पाहुण्याला जरी नुसतं कपभर चहा सरकवत असलो ना तरी सुद्धा बोलताना ''तुमच्या पुण्या-मुंबईमध्ये काय बेटी कंजुषी...चहा घ्या..''

किंबहुना नागपुराखेरीज इतर कुठेच खाण्यापिण्याचा शौकच नसतो असा सिद्धांत उराशी बाळगावा.मात्र पदार्थांचा फार तपशील देऊ नका. एखादा गोवेकर नुसत्या बांगड्याचे वीस प्रकार सांगेल आणि तुमच्या वडाभातापुढे तुम्हाला जाता येणार नाही म्हणजे पंचाईत सगळी.अशा वेळेला आपली गाडी संत्री किवा कापूस ह्याच्यावर आणावी.कारण अस्सल मुंबईकर हा संत्र हे एरंडेलाबरोबर खायचं फळ आहे असं मानतो आणि कापूस हा गादीतच तयार होतो आणि आतल्या आत वाढायला लागून एखाद दिवशी गादी फोडून बाहेर येतो अशी त्याची प्रामाणिक समजूत आहे.
           
अहो प्रत्येक शहरातल्या माणसांचे मोर्चे बांधण्याच्या काय जागा आहेत ते नीट तपासून पाहिलं पाहिजे. मुंबईत तुम्हाला 'आपण नागपूरकर आहोत' हे ठासवायचं असेल ना तर समोरचा माणूस हा नाडकर्णी का धुरंधर आडनावाचा आहे याची खात्री करा आणि सरळ नागपुरी हिंदीच सुरु करा. कारण अस्सल मुंबईकर भुताला भीत नाही इतका हिंदीला भितो. कारण अस्सल नागपूरकर मराठी माणसाची मातृभाषा जशी हिंदी आहे तशी अस्सल मुंबईकर मराठी माणसाची मातृभाषा हि इंग्लिश आहे. मात्र त्या इंग्लिशचा आणि इंग्लंडमधल्या इंग्लिशचा काही संबंध नाही हा. पुण्यातली इंग्रजी मात्र मुळा-मुठेच्या काठी जन्मास येऊन ओंकारेश्वारास तिचे दहन झाले. नागपूरला इंग्रजीची फिकीर करायचं काहीही कारण नाही कारण एका भाषाशास्त्रज्ञाच्या मते पुण्याची इंग्रजी हि संस्कृतोद्भव आहे,नागपूरची हिंदी हि मराठोद्भव आहे आणि मुंबईची मराठी हि आंग्लोद्भव आहे,भाषाशास्त्राचं मत आहे.

आता नागपूरकर होण्यासाठी पान खाणं आवश्यक आहे हि समजूत चुकीची आहे. पान सगळेच खातात,पण आपला नागपुरी अस्सलपणा दाखवायचा असेल तर ज्या पुणेकर किंवा मुंबईकराकडे तुम्ही पाहुणे म्हणून जाणार असाल ना त्याच्या घरी पानाचा इंतेजाम नाही याची खात्री करून ''पान नाही का?'' असं विचारून टाकावं. म्हणजे तो ओशाळतो.आपला एक पॉइंट सर झाला मग ''ठेल्यावरून बोलावून घ्या ना बे''. त्याला ठेला कळत नाही आणि कोणाला बोलवायचं ते कळत नाही. तो ओशाळतो म्हणजे दुसरा पॉइंट सर झाला. ''नाई का? मग थोडी सुपारी तर देऊन द्या ना.'' असं म्हटल्याबरोबर तो मसाल्याची सुपारी आणतो लगेच ''हट, हि मसाल्याची सुपारी, हि तर आमच्या नागपुराटली पोट्टी-पाट्टीही खात नाहीत हो,काय हे?'' पुन्हा आउट तो आणि इथून त्यातून एखाद्यानी पान मागवलंच तर मग सरळ खिडकीतून जोरदार पिंक खाली टाकावी. खालच्या भाडेकरूची झालीच रंगपंचमी तर आपण गेल्यावर शिमगा होईल. आपण निश्चिंत असावं आपलं नागपुरीपण सिद्ध झाल्याशी कारण. पण वरून कितीही उद्धटपणा केला तरी आतून मात्र आपण उदार असल्याचा भाव हा चालू ठेवायला पाहिजे. त्यासाठी मुंबईत कोणाही मुंबईकराच्या घरी गेलात आणि तुम्हीही रिटायर होई पर्यंत आणि त्यानंतरही मुंबईतच राहणार असलात तरी ''एकदा आमच्या नागपूरला येऊन जा ना,संत्र्याच्या सीजनला,अरे काय मस्त संत्रे खाऊ,वाळ्या-बिळ्याचे तट्टे-बिट्टे लावून पडले राहू आरामात,आमचा वर्हाडी पाहुणचार तर बघा''. असं आमंत्रण देत जावं. आता मुंबई ते नागपूर प्रवासखर्च जमेला धरला तर मुंबईत संत्री स्वस्त पडतात त्यामुळे ह्या आमंत्रणाचा कोणीही स्वीकार करत नाही काळजी नसावी.

असो ह्या विषयीचे आमचे पुस्तक लिहून तयार आहे पण त्याचे प्रकाशन मुंबईकराकडून कि पुणेकराकडून कि नागपूरकराकडून करावे हा क्रायसिस आमच्या पुढे आहे.

- पु. ल. देशपांडे
(पुणेकर,मुंबईकर की नागपुरकर?)
 श्री. वेदांत पोफळे यांनी हा लेख ’पु.ल.प्रेम’साठी पाठवल्याबद्दल त्यांचे आभार.

Monday, April 1, 2013

तुम्हाला मुंबईकर व्हायचंय का?

संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून विभक्तपणाची जाणीव जास्त वाढायला लागलीये. आणि एकेकाळी मी नुसताच ‘मराठी’ आहे म्हणून जे भागत असे ती सोय राहिली नाही. मराठी म्हणजे पुणेकर कि मुंबईकर कि नागपूरकर असा प्रश्न यायला लागला. त्यामुळे मराठी माणसाच्यापुढे स्वपरिचयाचा एक नवाच ‘क्रायसिस’ निर्माण झाला..’क्रायसिस’!
महाराष्ट्रामध्ये केवळ महाराष्ट्रीय म्हणून ओळखलं जाणं हे न ओळखण्यासारखच आहे,स्वतः स्वतःलाही. महाराष्ट्रात खास व्यक्तिमत्व म्हणजे अशी तीन.एक म्हणजे मुंबईकर,पुणेकर किंवा नागपूरकर. तशी महाराष्ट्रात शेकडो गावं आहेत पण ज्यांच्यापुढे ‘कर’ जोडावेत अशी ही तीनच खास स्थळ पुणे,नागपूर व मुंबई.
  ...आता तुम्हाला मुंबईकर व्हायचंय का? मुंबईकर व्हायचं असेल तर प्रथम तुम्हाला मुंबईत 'जन्माला' येणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तुमच्या राहण्याच्या जागेचा प्रश्न हा तुमच्या जन्मदात्यानीच सोडवायला हवा. एरवी मामला बिकट आहे. रात्री आडवं व्हायला फुटपाथची 'पागडी' देखील आता हजाराच्या आकड्यात गेलीये असं म्हणतात. त्यापेक्षा तुम्ही जिथे असाल त्या गावी सुखी राहा. आयुष्यात सगळ्याच महत्त्वाकांक्षा काही पुर्‍या होत नाहीत. आता मुंबईच्या चाळीत अगर ब्लॉकमध्ये जागा असलेली एखादी मावशी किंवा एखादी आत्या जर तुम्हाला दत्तक घेत असेल तर पहा. दुसर्‍यांदा जन्माला यायचा हाच एक सोपा उपाय आहे, किंवा मग 'घरजावई' व्हा. 'घरजावई'  याचा मुंबईतला अर्थ ज्याला मुलीबरोबर घरही द्यावे लागते असा आहे. राहती जागा असेल तर मात्र मुंबईकर होण्यासारखं सुख नाही, तुम्हाला सांगतो.

   'मुंबईत भयंकर गर्दीये' ही तक्रार मुंबईकराखेरीज इतरच लोक जास्त करत असतात. मुंबईतली हवा,गर्दी,डास असल्या गोष्टींना कोणीही कितीही नावं ठेवली तरी त्याला ती खुशाल ठेऊ द्यावीत. कारण मुंबईचा अभिमान बाळगलाच पाहिजे अशी काही अट नाहीये.म्हणजे मुंबईकर व्हायला ही अट लागतच नाही. ती पुण्याला, तिथे अभिमान पाहिजे. उलट मुंबईला कोणी जर 'एक भिकार' म्हणत असेल तर आपण 'सात भिकार' असं सांगून मोकळं व्हावं.

  पाव्हण्याना चुकवायला हे धोरण अतिशय उपयोगी पडत, कारण इथे काय आहे, 'बाहेरगावच्या पाव्हण्याना चुकवणे' हे धोरण गनिमी काव्यानी चालू ठेवावं लागत. सुदैवानी मुंबई शहरामध्ये बार-मार रोगांच्या साथी चालू असतात.तसाच मोर्चे,घोषणा,बंद ह्यांच्या राजकीय साथीसुद्धा असतात. प्रत्येक पक्षाला दरवर्षी आपआपला बंद यशस्वी करून दाखवावाच लागतो, त्याला ते तरी काय करणार?

 तेव्हा पाहुणे येणार असले तर त्यांना 'येऊ नका' असं कळवू नका.
'अवश्य यावे फक्त येताना कॉलरा,देवी व इन्फ़्लुएन्झाची इंजेक्शनं घेऊन यावे. गेल्या आठवड्यात २१४ मृत्यू झाले पण त्याचे विशेष नाही. काविळीची साथ पुन्हा सुरु झाली आहे तरी अवश्य यावे.चि.बाळकुशास आशीर्वाद' हे ही त्याच्या मध्ये घालून ठेवा.

 इतकं असून सुद्धा काही चिवट नातलग येतातच. नक्की करतात यायचं. त्यांना 'स्टेशनवरून उतरवून घेण्यास येत आहोत' असे सांगून आणायला जाऊ नये. टेक्सी ड्रायव्हर संघटनेला फोन करून त्यांचा पुढला संप किती तारखेला आहे हे विचारावं आणि त्या दिवशी बोलवावं.
पाहुणे जर प्रथमच येणार असले तर आपण जरी गिरगावात राहत असलो तरी त्याला 'ठाण्यात उतरणे सोयीचे पडेल' असं सांगून मोकळं व्हावं. मुंबईत एकमेव धोका म्हणजे मुक्कामाला येऊ पाहणाऱ्या पाहुण्यांचा, एरवी मुंबई सारखं शहर नाही हो.

  मुंबईकर व्हायचं असेल तर मुंबईचं मराठी आलं पाहिजे. एका मराठी वाक्यात तीनचार तरी इंग्रजी शब्द हवेतच. फक्त मुंबईला 'बॉम्बे' म्हणू नये. अस्सल मुंबईकर मुंबईला 'मुंबई'च म्हणतो. मुंबईत एकदा तुम्ही जन्माला आलात कि मुंबईकर होतच जाता. किंबहुना तुम्हाला दुसरं काही होताच येत नाही. पण बाहेरून येऊन मुंबईकर व्हायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मुंबईच्या मराठीमध्ये भूतकाळाला काहीही किंमत नाही हे ध्यानात ठेवा. मुंबईत जसे उन्हाळा आणि पावसाळा हे दोनच ऋतू तसे काळही दोनच,वर्तमान आणि भविष्य. मुंबईला बिचारीला भूतकाळ वगैरे काही नाहीच. तिला फक्त आज आणि उद्या. मुंबईकराला 'शिवाजी महाराजांच्या घोडीचा स्पीड काय होता?' यापेक्षा सकाळच्या फास्ट लोकल कुठल्या? याची माहिती अधिक महत्वाची. घड्याळाच्या तासाप्रमाणे मिनिटही मोलाची असतात हे मुंबईत राहिल्याशिवाय कळत नाही.कारण मुंबईकराचे घड्याळ हे केवळ हाताला बांधलेले नसून त्याच्या नशिबाला बांधलेलं असतं. पण मुंबईमध्ये मुंबईकर होणं हे काहीही सक्तीचं नाही. हा ऐच्छिक विषय आहे.
पुण्यात मात्र पुणेकर होणं हे सक्तीचं आहे.

घड्याळ आणि गर्दी यांच्याशी जुळवलं आणि चाळीत जर राहत असाल तर 'चाळीस बिर्हाडात मिळून एक' अशा संडासापुढे शांत चित्ताने वाट पाहण्याची अशी जर तुम्ही योगसाधना केलीत कि माणूस मुंबईकर झालाच.

मुंबईला पुण्यासारखा इतिहास नसेल पण खर्‍या मुंबईकराचं भूतकाळाविषयीचं प्रेम फक्त एकाच बाबतीत उफाळून येतं ते म्हणजे क्रिकेट.कारण मुंबईमध्ये क्रिकेट हा एकच 'खेळ' मानला जातो. इतर शहरात हा खेळ मैदानी वगैरे आहे,पण मुंबईतल्या चाळीच्या ग्यालरीत टेस्ट म्याचेस वगैरे चालतात. शिवाय क्रिकेट समजायला हातात ब्याट-बॉल घेतलाच पाहिजे अशी काही अट नाहीये.हि समजूत अगदी चुकीची आहे. क्रिकेट हा मुख्यतः खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. इथे मात्र क्रिकेटच्या इतिहासात तयार असणं अतिशय आवश्यक आहे. अस्सल मुंबईकर ''अवो,ती पानपतची लढाई म्हणतात ती पुण्यात कुठशी झाली वो?'' असा प्रश्न विचारून एखाद्या पुणेकराला फेफड आणील.पण त्याला क्रिकेटचा इतिहास विचारा. एखाद्या पुणेकराने बाजीराव,सवाई माधवराव,त्रिंबकी डेंगळे वगैरे नावं फेकावीत ना तसे पी.विठ्ठल,पी.के.नायडू, विजय मर्चंट इथपासून नावं फेकीत फेकीत वाडेकर,सोलकर,हा आपला गावस्कर इथपर्यंत हा हा म्हणता सगळे येऊन पोहोचतात.तेव्हा मुंबईकर व्हायचं असेल तर,'हर हर ती पेशवाई गेली आणि ब्रह्मविद्या गेली' या थाटामध्ये 'हर हर त्या क्वाडल्यामिरर्स गेल्या आणि क्रिकेट खल्लास झाला.' हे वाक्य म्हणावं लागेल.

  अस्सल मुंबईकर आणि इंग्रजांचा खरा ऋणानुबंध होता. कारण,मुंबईवर मुसलमान किंवा मराठे यांपैकी कोणाचंच राज्य नव्हतं.एक तर मुंबईच नव्हती,ती मुंबई झाली साहेब आल्यानंतर.त्यामुळे मुंबईचे पहिले आणि अखेरचे राजे हे इंग्रजच.टिळक,गांधी या मुंबई बाहेरून आलेल्या लोकांनी उगीचच मुंबईकर आणि साहेब यांचे संबंध बिघडवले.अस्सल मुंबईकराला फोर्ट मधल्या जुन्या इमारती पाहून असं भडभडून येत...'काय साहेब होता.'
   मुंबई हि मुंबईला मुंबई म्हणणार्यांचीच. मुंबई बाहेरून आलेल्या मराठी लोकांनी मुंबईची भाषा बिघडवली. अहो 'चाय पिली' असं म्हणायच्या ऐवजी 'चहा घेतला' म्हणाय लागले.काय हे..

  तात्पर्य, पेशवे आणि टांगे गेले तरी पुण्याचं 'पुणेरीपण' सुटलं नाही पण मुंबईची ट्राम गेली आणि अस्सल मुंबईकर अगदी हळहळला.'साली निदान ती सहा नंबरची ट्राम तरी ठेवायला पाहिजे होती.' या उद्गारामागचा तो काही कळवळा आहे ना तो नव्या मुंबईकराला कळणार नाही.

- पु. ल. देशपांडे
(पुणेकर,मुंबईकर की नागपुरकर?)
 श्री. वेदांत पोफळे यांनी हा लेख ’पु.ल.प्रेम’साठी पाठवल्याबद्दल त्यांचे आभार.

Thursday, March 28, 2013

पुलंची विनोदबुद्धी - डॉ. शरद सालफळे

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ऊर्फ पुल देशपांडे हे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र सारस्वताला परमेश्‍वराने दिलेले वरदान आहे. पुल देशपांडे हे साहित्याच्या सर्वच क्षेत्रांत वावरलेत. विपुल लेखन केले. नाटके लिहिलीत. एकपात्री प्रयोग केलेत. चित्रपटांची निर्मिती केली. भावगीतांना व गाण्यांना सुंदर चाली लावल्यात. पुल सुंदर अभिनय करीत, सुरेल पेटी वाजवीत. या सार्‍या गुणांवरही ताण म्हणजे पुल एक उत्तम रसिक होते. चांगल्या गाण्याला, चांगल्या संगीताला, चांगल्या लिहिण्याला आणि चांगल्या बोलण्याला पुल मनमोकळी दाद देत. असल्या बहुशृत कलाकारास महाराष्ट्र कधी विसरूच शकणार नाही. सार्‍या महाराष्ट्राला आणि बृहन्महाराष्ट्राला पुल कायमचे स्मरणात रहातील, ते त्यांच्या विनोदबुद्धीमुळे. पुलंना विनोदाची निसर्गदत्त देणगी होती. पुल शाब्दिक कोट्या करीत, त्यावर सारा रसिकवर्ग खळाळून हसायचा.
 पुलंचे समाजमनाचे व समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींचे कमालीचे सूक्ष्मतम निरीक्षण असायचे. त्यांना भेटलेल्या व्यक्तींचे, त्यांच्या स्वभावाचे, गुणदोषांचे निरीक्षण करायचे. त्याला विनोदाची मखर देऊन त्या व्यक्तीविषयीचे अभ्यासपूर्ण लेखन करायचे. त्यातूनच त्यांचे विनोदी लेखन झाले. पुलंचे लिखाण केवळ विनोदासाठी विनोद असे नसून, ते आपल्या लेखनातून समाजातील दोषांना उघडे करून दाखवीत. व्यक्तींचे स्वभाव त्यांच्या गुणदोषांसह वाचकांसमोर येत. त्यांच्या स्वभावाला पुल विनोदाचे पांघरूण घालीत, पण दोष मात्र उघडे पाडीत.
 पुलंच्या लिखाणातून जीवनाचे सुंदर दर्शन होते. वाचताना आपल्या लक्षात येते की, या गोष्टी, या घटना प्रत्यही आपल्या सभोवती घडत असतात. आपल्या लक्षात कशा येत नाहीत? साधी ‘म्हैस’ घ्या. बसने झालेल्या अपघातात म्हैस जखमी होते. इतरांना वैताग येतो, पण पुलंना त्यात ‘सुबक ठेंगणी’ दिसते. इंप्रेशन मारणार्‍या हिरोची पुढे पुढे करण्याची वृत्ती दिसते. पंचनामा करणारा शिपाई दिसतो.

 पुल आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण रसिकतेने जगले. छोट्या छोट्या व्यक्तींमध्ये त्यांना लिहिण्यासारखं सापडायचं. लेट झालेल्या गाडीने आपण वैतागतो. पुल तोच वेळ प्लॅटफॉर्मवरील विविध व्यक्ती, त्यांचे खाणेपिणे, इतरांवर खेकसून बोलणे इत्यादींचा अभ्यास करून त्याची नोंद करतात.

 पानवाल्याच्या पानाबरोबरच पुलंना त्याच्या लादीचं आणि स्मरणशक्तीचं कौतुक आहे. रावसाहेबांची शिवराळ भाषा व त्यामागची कळकळ केवळ पुलंनाच कळली. नामू परिटाचा शर्ट हा आपलाच आहे, हे कळल्यावर संतापून न जाता नामूही त्यात जास्त खुलून दिसतो, असे सांगून पुल आपली खेळकर वृत्ती दाखवितात. पाळीव प्राण्यांपैकी एकालाही न दुखविता त्या प्राण्यांच्या मालकाची अशी खिल्ली उडविली आहे की, ते प्राणीही खुष व्हावेत.

 आवाजाच्या दुनियेचा पुलंनी घेतलेला कानोसा मजेदारच आहे. दररोज दारावर वस्तीतून हिंडणारे विक्रेते यांचा पुलंचा अभ्यास कमालीचा आहे. शेंगावाला, भाजीवाला, कुल्फीवाला, कल्हईवाला या सर्वांच्या आवाजाचे पृथ:करण करून त्यांच्या पोटापाण्याला तेच आवाज कसे पोषक असतात, ते पुलंनी सप्रमाण दाखविले आहे.

 प्राण्यांच्या ध्वनिविश्‍वातली व्यंजनं शोधण्याचे महाकठीण काम पुलंनी केलं आहे. पुलंना बहुधा तमाम प्राणिमात्रांची भाषा समजत असावी. कुत्र्यांच्या सभेतलं भाषण माणसांना समजावं, असं त्यांनी भाषांतरित केलेलं आहे.

 स्वत:ला लेखक-कवी म्हणविणार्‍या तथाकथित साहित्यिकांची पुलंनी मस्त खिल्ली उडविली आहे. या सार्‍यांचीच नोंद मराठी वाङ्‌मयाच्या गाळीव इतिहासात आली आहे. चोरलेल्या कवितांचे व लेखांचे साहित्यिकाच्या परिचयासह या इतिहासात उल्लेख आहेत.

 पुलंच्या विनोदास कधी चावटपणा चाटून जातो, तर कधी ते वाचकांना वात्रट वाटतात. प्रसंगी त्या विनोदास कारुण्याची किनार असते. समाजातील विषमता, विसंगती त्यांच्या लेखनातून डोकावते. उपरोधाने लिहिलेले मान्यवरांवरील लेख त्यांना त्यांना कळले तर पुल त्यांना मानधन द्यायला तयार असायचे. गरिबीची आणि गरिबाची पुलंनी कधी खिल्ली उडविली नाही, पण अंधश्रद्धा आणि ढोंगीपणावर त्यांनी विनोदाचे आसूड उगारले. उगाच मोठेपणा मिरविणार्‍या उच्चभ्रू समाजातल्या बायांना आणि श्रीमंतीची ऐट दाखविणार्‍या स्त्रियांना त्यांनी त्यांच्या विनोदी शैलीने बोचकारले आहे. ज्ञानेश्‍वरीचा उपयोग ती डोक्यावर घेऊन सरळ चालण्याच्या व्यायामप्रकारात मोडतो म्हणणार्‍या बाया किंवा अध्यात्मावरील भाषणे हे फॅशन शोचे एक माध्यम मानणार्‍या बाया पुलंना भेटल्या. ‘तुझे आहे तुजपाशी’ मधल्या अतिविशाल महिलांचं मंडळ आचार्यांना असल्याच संदर्भात भेटायला येतं. आचार्यांचा क्रोध आणि विशाल महिलांचे निर्विकार पण व्यवहारी बोलणे यांचा संवाद रंजक वाटतो.
 पुलंचे विडंबनकाव्य अत्र्यांच्या ‘झेंडूची फुले’ वर मात करते. मनाच्या श्‍लोकांची पुलंनी केलेली मनमानी मौजेची आहे. मुंबईकर जेव्हा ट्राम व बसने जायचे त्यावेळी बटाट्याच्या चाळीतले द्वारकानाथ गुप्ते म्हणतात, ‘मना सज्जना ट्राम पंथेची जावे

| तरी वाचतो एक आणा स्वभावे॥ बशीला कशाला उगा दोन आणे| उशिरा सदाचे हफीसांत जाणे॥ पुलंच्या कविताही मिस्कील. त्यात अगम्य दुर्बोध असे काहीच नसे. वाचताना खुदकन हसू यावे अशा वात्रटिका त्यांनी लिहिल्यात. ‘हसविण्याचा माझा धंदा’ मध्ये ते लिहितात-‘गाळणे घेऊन गाळतो घाम चाळणे घेऊन चालतो दाम. चालीबाहेर दुकान माझे | विकतो तेथे हसणे ताजे| खुदकन् हसूचे पैसे आठ | खो खो खो चे पैसे साठ| हसविण्याचा करतो धंदा| कुणी निंदा कुणी वंदा॥

पुलंच्या विनोदावर खळाळून हसणारा मराठी वाचक श्रोता किंवा प्रेक्षक हा बहुशृत असला की, त्याला त्यांच्या विनोदाचे मर्म कळायचे. संदर्भ माहीत असलेत की विनोदाची खुमारी वाढते. दुसर्‍या बाजीरावाबद्दल गाळीव इतिहासात पुल लिहितात, दुसरे बाजीराव हे दानशूर होते. कुठल्याही कलावंतास ते १०० रुपये देत त्यावरून त्यांना दोन शून्य बाजीराव म्हणत. एक शून्य बाजीराव हे त्या काळात गाजलेले नाटक. त्याचा संदर्भ घेऊन ही शाब्दिक कोटी पुलंनी केली.

 पुल हे दानशूर लक्षाधीश होते, पण शाब्दिक कोट्यधीश होते. त्यांच्या कोट्या पराकोटीच्या असत. मर्ढेकरांचं काव्यवाचन करायला सुनीताबाई व पुल सातार्‍याला गेलेत. यजमानांनी खूप खाण्याचा आग्रह केला तेव्हा पुल म्हणाले, ‘अहो श्रोत्यांना मर्ढेकर ऐकवायचे आहेत ढेकर नव्हेत.’ जुन्या काळातल्या अभिनेत्री दुर्गाबाई खोटे यांचा संमेलनात परिचय करून देताना पुल म्हणाले, ‘याचे एक आडनाव सोडले तर बाकीचे यांचे सारे खरेच आहे.’ सौ. सुनीताबाई पुलंना सारखा औषधाचा व खाण्यापिण्याचा सल्ला देत तेव्हा पुल त्यांना जाहीरपणे ‘उपदेश पांडे’ म्हणायचे.

 पुल देशपांडे यांच्या विनोदी लेखनाने मराठी साहित्यात विनोदाचा व हास्याचा प्रचंड धबधबा आणि दबदबाही निर्माण केला आहे. त्यातले केवळ तुषारही आपल्या अंगावर उडालेत तरी आनंद होतो. जे त्या धबधब्याखाली ओलचिंब होतात किंवा झाले ते धन्य होत.
 सर्व प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे माणसाला हसता येते. पुलंनी याबद्दल ब्रह्मदेवाचे आभार मानले आहेत. पुलंनी माणसाला हसायला शिकविले यासाठीच पुलंनी एवढ्या लेखन प्रपंचाचा अट्टहास केला. आपल्या अवतीभवती एवढे सौंदर्य असते, आनंद देणारी निसर्गाची किमयागारे असतात, पण आपण इतके करंटे की आपणास त्यांची ओळख नसते. पुलंनी अवतीभवतीचा सारा आनंद माणसास दाखवून ‘आनंदे भरीन तिन्ही लोक’ हे खरे करून दाखविले. पुलंची विनोदबुद्धी शाब्दिक कोट्या करविते. प्रसंगोपात घडलेल्या विनोदाचं दर्शन घडविते. व्यक्तीमधल्या स्वभावविशेषाने घडणारे विनोदाचे साक्षात्कार दाखविते. अवतीभवतीच्या सार्‍या घटनांचे आपणही साक्षीदार असतो, पण त्यातल्या विसंगती नजरेला आणून देतात ते पुल. त्यातून आनंद घ्यायला शिकवितात ते पुल. ते म्हणतात, दुसर्‍याला हसू नका दुसर्‍याला सोबत घेऊन हसा. सर्वांनी एकत्रपणे हसण्यासाठीच विनोदाची निर्मिती असते.

 पुलंचे विनोद निर्मळ असत. त्यात अश्‍लीलता नसायची. कधी त्याला सेन्सॉरची कात्री लावावी लागत नसे. शाळकरी मुलांनाही समजेल असे पुलंचे साधे लेखन असायचे. अशा मराठी जगतास सार्‍या चिंतांसह, सार्‍या अडचणींसह हसायला शिकविणारा हा पुरुषोत्तम मराठी सारस्वताचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलवतो, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

-- डॉ. शरद सालफळे
 ६/१२/२०१२ , तरुण भारत

Thursday, March 21, 2013

'पुल'कित

काही व्यक्तिमत्वे असे काही दैवी देणे घेऊन आलेले असतात की त्यांच्या प्रतिभेसाठी आकाशाचा फलकही अपुरा पडतो. आपल्या कलेतून वर्तमान आणि भविष्यातील अगणित पिढ्यांचे सामान्य जगणे उजळवून टाकण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते. अशा लोकांची निर्मिती पाहून, तिचा आस्वाद घेऊन तृप्ती तर होतेच पण त्या प्रतिभेचे विशुध्द तेज अनुभवून आपले स्वतःचे जीवनही एक आनंदयात्रा बनून जाते. महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अशा असामान्य दैवी प्रतिभावंतांच्या यादीत पु.ल. देशपांडे हे नाव येणारी कित्येक वर्षे तळपत राहील. चौथी - पाचवीत असेन. बाबांनी पॅनॅसॉनिकचा नवा करकरीत डेक घेतला होता. त्यावेळच्या ऐपतीप्रमाणे जरा अंगाबाहेरचाच खर्च होता पण ती सिल्वर कलरची सिस्टम आणि तिचे ते मोठाले स्पीकर पाहून वरकरणी रागावलेली आईही मनातून आनंदी झालेली दिसत होती. नव्या डेकचे उद्घाटन करण्यासाठी पु.लं.ची म्हैस, अंतू बरवा आणि पानवाला ही अतिशय गाजलेली कथाकथन कॅसेट आणली होती. पुढचे कित्येक महिने आम्ही ती कॅसेट अक्षरश: झिजवली. त्यातल्या ओळीन ओळी मला पाठ झाल्या होत्या.

लवकरच वाचनही सुरु झाले आणि पु.लं. ची पुस्तके जगण्याचा अविभाज्य घटक बनली. त्या कथाकथनाने निर्माण झालेला त्यांचा पगडा एवढा जबरदस्त होता की मी अजूनही पु.ल. वाचताना त्यांच्या त्या सानुनासिक आवाजात ते स्वतः वाचून दाखवतायत असंच वाटत रहातं. वय वाढत गेले, पु.लं. व्यतिरिक्त अनेक लेखकांच्या लिखाणाची ओळखही झाली. पण त्यांचे अग्रस्थान कायम राहिले. त्यांचे आणि त्यांच्याविषयीचे जसेजसे वाचत गेलो तसेतसे त्या व्यक्तिमत्वाचा उत्तुंगपणाही नजरेत भरत गेला. आज थोडी समज आल्यावर जाणवते ते हे की पु.ल.नी आपल्या लिखाणातून जी इतर लेखकांची, कलांची, कलासाधकांची ओळख करून दिली ती जास्त प्रभावशाली होती. व्यासंग म्हणजे काय याचे ते लिखाण एक मार्गदर्शकच होते. चाप्लीनचे चित्रपट पाहून मी एरवीही हसलो असतो पण त्या विनोदामागील कारुण्य आणि अधिष्ठान समजण्याची गरज पु.लं. नी निर्माण केली.

आईला आणि मला त्यांना भेटायची प्रचंड इच्छा होती पण त्यावेळी त्यांची प्रकृती बरीच खालावली होती. पूर्व परवानगीशिवाय भेटणे अशक्य होते. तसे केल्यास सुनिताबाईंकडून कशी 'बिनपाण्याने' व्हायची शक्यता असते तेही बऱ्याच जणांकडून सोदाहरण कळलेले होते. त्यामुळे त्यांची भेट व्हायची शक्यताच नव्हती. त्यांच्या घराचा पत्ता पाठ होता. पुण्यात गेल्यावर त्या इमारतीवरून बऱ्याच वेळा गेलो होतो, काही फुटांवरच आत आपले दैवत राहते आणि भेट शक्य नाही या भावनेने हताशही झालो होतो.

आई थोडेफार लेखन करीत असे. तिच्या एका कथासंग्रहाला बरेच पुरस्कार मिळाले. एके दिवशी सुनिताबाईंचे 'इन्लॅण्ड लेटर' आले. त्यात त्यानी आईचे पुस्तक दोघानाही आवडल्याचे लिहिले होते. एका विशेष कथेविषयी मौलिक रसग्रहण केले होते आणि सोने पे सुहागा म्हणतात तसे खुद्द पु.ल. नी पार्किंसंस असूनही थरथरत्या हातांनी चार आशीर्वादपर वाक्ये लिहिली होती. अनेक पुस्तकांवर पाहिलेली ती विशिष्ट वळणाची सही प्रत्यक्षात पाहताना आम्हाला लॉटरी लागल्याचा आनंद झाला होता. पत्राच्या शेवटी सुनीताबाईंनी घरी भेटण्याचे आमंत्रण दिले होते. फोन नंबर दिला होता आणि सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत कधीही या, पु.ल. फ्रेश असतात, काही बोलणे होईल असेही सांगितले होते. आई दुसऱ्याच दिवशी गेली असती पण माझी इंजिनियरिंगची फायनल चालू होती. हा कपिलाषष्ठीचा योग मी सोडणार नव्हतो. त्यामुळे नाईलाजाने आईला पंधरा दिवसांनंतरची वेळ फोन करून मागून घ्यावी लागली. पंधरा दिवस आम्ही नुसते सळसळत होतो. दोन आठवड्यानी आम्ही पुण्याला निघालो. काशीयात्रेला जाताना लोक पूर्वी भेटायला यायचे तशा आईच्या मैत्रिणी तिला 'घालवायला' आल्या होत्या.

साडे नऊच्या सुमारास आम्ही त्यांच्या घरापुढे होतो. मी चाचपडत बेल दाबली. दोन मिनिटांनी दार उघडले. एखादा नोकर/कामवाली बाई दार उघडेल, आपल्याला काही वेळ बाहेरच्या खोलीत बसवून ठेवतील आणि नंतर पु.ल. आले तर बाहेर येतील असं काही मला वाटलं होतं. दार उघडताच माझी शुध्द हरपली. खुद्द पु.ल. नी दार उघडलं होतं. आधीच धास्तावलेले आम्ही क्षणभर बधीर झालो. काय करावे काही सुचेना. पॉझ बटन दाबल्यासारखी स्थिती होती. ते आम्हाला आमचे नाव विचारत होते (खात्रीसाठी) आणि आम्ही दोघं गोठून गेलो होतो. त्याक्षणी माझी कुठली अंत:प्रेरणा जागृत होती माहित नाही पण पुढच्या आयुष्यात स्वतःचा अभिमान वाटत राहील अशी एकच गोष्ट माझ्या हातून घडली. त्यांच्या पायावर मी झोकून दिलं. डोळ्यातून पाण्याच्या धारा आपसूक वाहू लागल्या. इतक्यात मागून सुनिताबाई आल्या. त्यानी आम्हाला उठतं केलं. आत गेलो. काही काळ केवळ त्या दोघांकडे विशेषत: पु.लं. कडे अनिमिष बघण्यात गेला. शेवटी पु.लं. नीच विचारले ' अरे काही बोलणार आहात की नुसतेच बघून परत जाणार आहात?'. आम्हाला हसू फुटलं. अडखळत - घुटमळत बोलणं सुरू झालं.

किती क्षीण झाले होते ते. पुस्तकांच्या वेष्टनावर दिसणाऱ्या सतेज चेहऱ्याचा मागमूस नव्हता. केस विरळ होते, पांढरी दाढी चेहरा व्यापून होती. दोनच गोष्टी आमच्या ओळखीच्या होत्या त्या म्हणजे त्यांचे स्वत:शीच खुशीत हसणारे डोळे आणि आमच्या काळजात घर करून बसलेला तो खणखणीत आवाज. काळाच्या तडाख्यातून त्या कशा वाचल्या होत्या कोण जाणे.

सुदैवाने त्या दिवशी त्यांची तब्येत बरीच चांगली होती. आम्हाला वीसेक मिनिटांची वेळ दिली होती पण सुनिताबाईच इतक्या बोलू लागल्या की दोन तास आम्ही तिथे होतो. आयुष्य ओवाळून टाकले तरीही परत मिळणार नाहीत असे ते दोन तास होते. आईला त्यांनी 'पोहे करूया का ग? भाई सकाळपासून कर म्हणतोय, मी तुम्ही आल्यावर करू म्हणत होते. चल आत तुला घर दाखवते ' असं म्हटले. आईला चक्कर यायचीच बाकी होती. ज्यांना भेटायची ती गेली २५ वर्षे स्वप्न पाहत होती त्यांना त्यांच्याच घरात स्वत:च्या हातचे खाऊ घालायचे? जणू काही सुनिताबाईंचा विचार बदलेल तर काय करा अशा भीतीने ती त्यांच्यापुढे स्वयंपाकघरात धावली. त्यापुढची १५-२० मिनिटे माझ्या सुखाची परमावधी कारण पु.ल. आणि मी दिवाणखान्यात दोघेच. मी भीतभीत वुडहाउसचा विषय काढला. त्यांची कळी खुलली. वुडहाउसच्या जीवनाविषयी त्यांनी खूप आठवणी सांगितल्या. शेवटी म्हणाले 'त्याला मी भेटू/बघू शकलो नाही हे मला फार शल्य आहे. खरेतर जेव्हा जेव्हा अमेरिकेला गेलो तेव्हा तेव्हा थोडा प्रयत्न केला असता तर नक्कीच भेट झाली असती पण काय झाले कोणास ठाऊक! विल पॉवर कमी पडली ' . मी भक्तिभावाने एक एक शब्द, एक एक हालचाल मनात साठवत होतो.
कौतुक करत त्यानी पोहे खाल्ले, आईच्या लिखाणाची पुन्हा तारीफ केली. आई अल्लड नववधूप्रमाणे लाजून/भावनातिरेकाने लाल झाली होती. जाण्याची वेळ आली. पुन्हा एकदा निस्सीम भक्तीने दोघांच्या पाया पडलो. डोळे भरून पु.लं. ना पाहिले, त्यांच्या घराकडे बघितले आणि कष्टाने पाय बाहेर ओढला.

आज विचार करताना तो दिवस दाखवल्याबद्दल जग:नियन्त्याचे आभार मानण्याशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले, आनंद यादवांसारखा हिरा काळ्या मातीतून वर काढला, मुक्तांगणला संजीवनी देऊन हजारो व्यसनाधीन लोकांना माणसात आणण्यासाठी मार्ग उपलब्ध करून दिला त्या तेज:पुंज स्रोताची काही किरणे आमच्याही आयुष्यांवर पडावी आणि आमचे सामान्य जीवन आयुष्यभरासाठी 'पुल'कित व्हावे ही त्या ईश्वराचीच योजना असणार, दुसरे काय?

अजूनही पु.लं. ची पारायणे चालूच आहेत. काही ओळी वाचताच हसण्याचा उमाळा येतो. डोळ्यातून पाणीही सांडते पण ते फक्त लिखाणातील विनोदामुळे आलेले असते असे आता वाटत नाही. त्या दोन -एक तासात मिळालेल्या दैवी अनुभूतीच्या - असीम कृपेच्या आठवणी त्या अश्रूत मिसळतात आणि त्या अश्रूंना माझ्यालेखी तीर्थाचे महात्म्य प्राप्त होते.

-- अमेय पंडित
मुळ स्त्रोत  - https://www.facebook.com/groups/marathisahityasamooh/permalink/350889888350577/

हा अप्रतिम लेख पु.ल.प्रेम ब्लॉगसाठी सुचवल्याबद्दल श्री. हर्षल भावे आणि लेखक श्री. अमेय पंडित ह्यांचे अत्यंत आभारी आहोत.


Friday, February 1, 2013

मोरपिशी आठवणी - प्रकाश गंधे

डेक्कन क्वीनच्या प्रवासात भेटलेल्या "महाराष्ट्राच्या लाडक्‍या व्यक्तिमत्त्वाने मला अक्षरशः भरभरून दिले... त्यांना पाठविलेल्या पत्राचे उत्तरही अत्यंत सुंदर शब्दांत आले. अलिबागला त्यांना यायचे होते, पण ते जमले नाही.. "पुलं'बरोबरचा हा पत्रव्यवहार म्हणजे अक्षय आनंदाचा ठेवाच...

सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. मी बॅंक ऑफ इंडियामध्ये अधिकारी होतो. रविवार, ता. 9 ऑगस्ट 1981 रोजी मी डेक्कन क्वीनच्या अउ लहरळीलरी पुण्याहून मुंबईस निघालो होतो. लहरळीलरी आरामदायी असली तरी, एकट्याने प्रवास नकोसा वाटतो. कारण, तेथे मनमोकळ्या गप्पा नसतात. खळखळून हसणे नसते. पेपर अथवा पुस्तक उलटसुलट करून वाचत राहणे किंवा वाचल्यासारखे करणे, अधून-मधून खात राहाणे. येथे सहप्रवाशांची कोणी फारसी दखल घेत नाहीत.


मी माझ्या जागेवर बसण्यापूर्वी सहप्रवाशी कोण कोण आहेत ते पाहिले. सहप्रवाशांना पाहून मी गोंधळलो. स्वप्नात आहोत असे वाटले. मी माझ्या सहप्रवाशांना त्याच अवस्थेत नमस्कार केला. त्यांनीही प्रतिनमस्कार केला व म्हणाले "आता बॅग ठेवायला हरकत नाही.' सुरवातीलाच गुगली. कोण होते ते सहप्रवाशी? अगदी शेजारच्या खुर्चीत? आपणा सर्वांचे आवडते, महाराष्ट्राचे भूषण पु. ल. देशपांडे व सौ. सुनीतीताई देशपांडे!

मी माझा परिचय करून दिला. श्री. साठे म्हणून आणखी एक सहप्रवासी होते. गप्पा सुरू झाल्या. अगदी मनमोकळ्या आमच्या गप्पांचा विषय होता. डेक्कन क्वीन. लोणावळा स्टेशन सुटले आणि आमचे गप्पांचे विषयही बदलले. खंडाळ्याच्या घाटातील छोट्या-मोठ्या धबधब्यांपासून ते थेट नायगऱ्याच्या धबधब्यापर्यंत पु.लं. आम्हाला घेऊन गेले. पु.लं.च्या त्या धबाधबा वाहणाऱ्या वाकगंगेत पूर्ण चिंब झालो. दादर स्टेशन कधी आले ते कळलेच नाही.
या प्रवासाची मी डायरीत नोंद करून ठेवली होती. आणि गंमत म्हणून 9 ऑगस्ट 1982 ला पु.लं. वरील आठवणीचा उजाळा देण्यासाठी एक छानसे पत्र पाठविले. त्याचे अनपेक्षितपणे उत्तरही आले. मला, माझ्या पत्नीला, मुलींना व माझ्या मित्रांना खूप आनंद वाटला. पु.लं.च्या पत्रातील मजकूर असा होता.

.............................
प्रिय गंधे,

तुमचे पत्र मिळाले. 9-8-81 रोजी आपली आगगाडीत भेट झाली होती. ती लक्षात ठेवून तुम्ही त्या दिवसाबद्दल पत्र पाठविलेत त्याची मजा वाटलीय. माझ्याशी गप्पा मारणाऱ्याला बहुधा कानसेनाचीच भूमिका घ्यावी लागते. मुंबईचे ENT specialist डॉ. कर्णिक यांनी माझ्या नावाच्या आद्याक्षरांवर .श्रि. म्हणजे please Listen अशी कोटी केली होती. ते कानांचे डॉक्‍टर असल्यामुळे कर्णिक आहेत हे मीही त्यांना Listen करायला लावलं होते.
तुमच्या पत्रातील आपुलकीचा सूर कुणालाही सुखावून सोडेल असाच आहे. वेटर्स, विमानातले पर्सर वगैरे मंडळीविषयी मी बहुधा साशंक असतो. त्यांच्या चेहऱ्यावरील गांभीर्यांची मला धास्ती वाटते; पण डेक्कन क्वीनमधील वेटर त्याला अपवाद आहेत. हमालांशीही माझे कधी भांडण होत नाही. दिलेली मजुरी स्वीकारून जाणारा हमाल क्वचित भेटतो. त्यांचे थोडेसे बोहारणी सारखे असते. नवा शालू दाखवला तरी बोहारीण ""बाई काही तरी चांगलं काढा ना!'' असं सवयीनेच म्हणून जात असावी. याबाबतीत त्यांची तुलना नाट्यसमीक्षकांशी करता येईल. कुठलेही नाटक त्यांना पूर्णपणे पसंत पडत नसते.
पत्राबद्दल मनःपूर्वक आभार. तुमच्या पत्नीला आणि मुलींना अनेक आशीर्वाद.
तुमचा - पु. ल. देशपांडे.
.....................

पुढे 1984 ते 1987 मी अलिबागला होतो. त्या वेळी पु. लं. देशपांडे हे श्री. माळगावकरांनी इंग्रजीत लिहिलेल्या "सरखेल कान्होजी आंग्रे' या कादंबरीचा मराठीत अनुवाद करीत होते. अलिबागला कान्होजी आंग्रेचा भला मोठा वाडा आहे. मी पु. लं.ना सविस्तर माहिती कळविली व त्यांना अलिबागला येण्याचे निमंत्रण दिले; परंतु पु. लं.ना अलिबागला काही येण्यास जमणार नव्हते. तसे त्यांनी एक पत्र मला पाठविले. त्या पत्रातील मजकूर असा होता.

......................
"प्रिय प्रकाश गंधे,
9 ऑगस्टला डे. क्वीनमध्ये 81 मध्ये झालेल्या भेटीचं स्मरण ठेवून तुम्ही पाठविलेले पत्र मिळाले.
तुमच्या अलिबागला येण्याच्या आमंत्रणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. शाळकरी विद्यार्थी असताना अलिबागला गेलो होतो. त्यानंतर आणीबाणीच्या काळात भाषण द्यायला गेलो होतो. सध्या माळगावकरांनी लिहिलेल्या कान्होजी आंग्र्यांच्या इंग्रजी चरित्राचं मराठीतून भाषांतर करतो आहे. त्यात तुमचं आणि तुमच्या मुलीचं आग्रहाचं आमंत्रण. यावंसं खूप वाटतं; पण काही ना काही असे उपद्‌व्याप मागे लागलेले आहेत की इच्छा असूनही सागरकिनाऱ्यावर शांतपणे जाऊन बसण्याची संधी घेणे अवघड होते. अशा वेळी
Woods are Lovely.
Dark and deep.
But I have promises to keep.
And milis to go, Before I sleep. मागील असहायता अधिक प्रकर्षाने जाणवायला लागते.
तुमचा - पु. ल. देशपांडे.
(रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या कवितेतल्या चार ओळी आहेत.)
..............................

या पत्रांचा प्रवास, त्यातली मजा इथेच संपली नाही. अमृतसिद्धी या तीन खंडांत प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात
या पत्रांचा मजकूर माझ्या नावांसह प्रसिद्ध केला गेला आहे. धन्यता वाटली. या आठवणी पुस्तकांत ठेवलेल्या मोरपिसासारख्या जपायच्या असतात...

प्रकाश दत्तात्रय गंधे
सकाळ
१२ जून २०१२