Wednesday, October 27, 2021

सुनीताबाईंच्या प्रेमाचं कठीण कोवळेपण - शुभदा पटवर्धन

सुनीताबाईंच्या ‘आहे मनोहर तरी’ या आत्मपर लेखनातून त्यांच्यातले स्वभावविशेष अधिक ठळकपणे वाचकांसमोर आले आणि तोपर्यंत एका ठरीव ठशाचं साहित्य वाचण्याची सवय झालेलं साहित्यविश्व ढवळून निघालं. मंगला गोडबोले यांनी लिहिलेलं ‘सुनीताबाई’ हे पुस्तक वाचायला घेताना ही पाश्र्वभूमी मनात तयार होते. ‘हा स्मृतिग्रंथ किंवा गौरवग्रंथ भाबडय़ा भावुक स्मरणरंजनाची पखरण करणारा आरतीसंग्रह नाही.’ ही या पुस्तकामागची भूमिका मंगलाबाईंनी मनोगतातच स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुस्तकाकडे बघण्याच्या आपल्याही दृष्टिकोनाला दिशा मिळते.

‘त्यांच्या घरी जाते आहेस, पण घरात ये म्हणतीलच अशी अपेक्षा ठेवून जाऊ नकोस हं.’

‘ज्या वेळेला बोलावलं आहे, तेव्हाच पोच. पाच मिनिटंसुद्धा मागेपुढे नको.’

‘बोलतीलच याची खात्री नाही आणि बोलल्याच तर नेमकी उत्तरं दे. उगीच फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची.’

‘एकदम कडक काम आहे. पुलंच्या अगदी विरुद्ध. त्यामुळे जरा जपूनच.’
काही वर्षांपूर्वी अगदी पहिल्यांदा सुनीताबाईंना भेटण्यासाठी जाणार होते, तेव्हा मिळालेल्या या सूचना.

खरं तर ज्या कामासाठी जाणार होते ते काम तसं काही फार महत्त्वाचं नव्हतं. त्यांच्याकडून फक्त एक लेख आणायचा होता. ‘सुनीताबाईंकडून लेख आणायचा आहे, कुणालाही पाठवून चालणार नाही,’ अशी सावध भूमिका घेत संपादकांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली आणि मीही नाही म्हटलं नाही. इतकंच. तरीही एक प्रकारचं दडपण मनात घेऊनच गेले. प्रत्यक्षात मात्र अगदी सर्वसाधारणपणे जसं आगतस्वागत होईल, तसंच झालं. खूप उबदार नाही पण अगदीच कोरडंठक्कही नाही. दोन्हीच्या मधलं. समंजस. त्या अशा वागतील, तशा वागतील असं जे चित्र निर्माण केलं गेलं होतं, तसं काहीही झालं नाही. ‘वाचते मी तुमचं लिखाण’, असं सांगून एक धक्काच दिला. एवढंच नाही तर हे तोंडदेखलं म्हणत नाही हे दर्शवण्यासाठी काही लेखांचाही उल्लेख केला. हे सगळं माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होतं. गेल्या पावलीच परतायचं असं मनाशी ठरवून गेलेली मी चक्क अध्र्या तासानंतर बाहेर पडले. पुढच्याही मोजक्या भेटींमध्ये कधी ‘असा विक्षिप्त’ अनुभव आला नाही आणि त्यामुळे असा ताणही कधी जाणवला नाही. पहिल्या भेटीची आठवण नंतर कधी तरी त्यांना सांगितल्यावर काहीही न बोलता त्या फक्त हसल्या होत्या. पण एखाद्या घटनेची, गोष्टीची, विधानाची कानगोष्ट व्हायला वेळ लागत नाही. सुनीताबाईंच्या बाबतीत असंच झालं. सामाजिक रूढ चौकटीत न बसणाऱ्या त्यांच्या स्वभावविशेषांची आवर्तनं पुन:पुन्हा आळवली गेली आणि कळत-नकळत त्यावर शिक्कामोर्तबही होऊन गेलं.

सुनीताबाईंच्या ‘आहे मनोहर तरी’ या आत्मपर लेखनातून त्यांच्यातले हे आणि इतर बरेच स्वभावविशेष अधिकच ठळकपणे वाचकांसमोर आले आणि तोपर्यंत एका ठरीव ठशाचं साहित्य वाचण्याची सवय झालेलं साहित्यविश्व ढवळून निघालं. मंगला गोडबोले यांनी लिहिलेलं ‘सुनीताबाई’ हे पुस्तक वाचायला घेताना ही पाश्र्वभूमी मनात होतीच. ‘हा स्मृतिग्रंथ किंवा गौरवग्रंथ भाबडय़ा भावुक स्मरणरंजनाची पखरण करणारा आरतीसंग्रह नाही.’ ही या पुस्तकामागची भूमिका मंगलाबाईंनी मनोगतातच स्पष्ट केली आहे, ते बरं झालं. पुस्तकाकडे बघण्याच्या आपल्याही दृष्टिकोनाला दिशा मिळते. कारण आजकाल एखादी नामवंत व्यक्ती गेल्यानंतर विविध ठिकाणी प्रसिद्ध होणाऱ्या श्रद्धांजलीपर लेखांचं संकलन करून पुस्तकं प्रकाशित होतात. अशा संकलनाची एक वेगळी गोडी असते. नाही असं नाही. पण तरीही त्यातला सरधोपटपणा त्रासदायक होतोच. सुनीताबाईंसारख्या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाला या सरधोपट चौकटीत बसवण्याची कल्पनाही करवत नाही. पण वाचकांची नस अचूक ओळखलेल्या राजहंस प्रकाशनानं ‘असं जगणं’ (जन्मापासून ते मृत्युपर्यंतचा कालावधी), ‘असं लिहिणं’ (लेखनप्रवास) आणि ‘असं वागणं’ (स्वभाव वैशिष्टय़) या तीन धारणा आणि जोडीला अरुणा ढेरे यांचा दीर्घ लेख अशा चौकटीतून सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतलेला आहे.

विनायक प्रसादमधील एक खोलीच्या छोटय़ा बिऱ्हाडापासून ते लंडन-पॅरीसमधल्या बिऱ्हाडांपर्यंत अशा अनेक घरांबद्दल सुनीताबाईंच्या चांगल्या-वाईट अनेक आठवणी निगडित आहेत. कुठे मर्ढेकरांची पिठलं-भाकरीची फर्माईश पूर्ण केल्याचा आनंद, तर कुठे पुलंमधले कलागुण बहरायला लागले, म्हणून समाधान.

सुनीताबाई आठ भावंडांतल्या चौथ्या. लहानपणापासूनच वेगळेपणामुळे उठून दिसत. पण त्यांचं व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थानं झळाळून उठलं ते बेचाळीसच्या चळवळीतल्या सहभागानं. स्वत:मधल्या क्षमता त्यांना कळल्या. त्यामुळेच परजातीतल्या - निर्धन - बिजवराशी लग्न करण्याचा निर्णय त्या घेऊ शकल्या आणि हा निर्णय घरच्यांच्या गळी उतरवण्यातही यशस्वी झाल्या. लग्नानंतर त्यांचं सगळं आयुष्यच बदललं. आयुष्यभरात सात गावं आणि बावीस घरांमध्ये बिऱ्हाडं मांडावी लागली. अशा किती जागा बदलायला लागल्या तरी प्रत्येक नव्या ठिकाणी सुनीताबाई त्याच उभारीनं उभ्या राहात. कितीही अडीअडचणी आल्या तरी कर्तव्यदक्षतेत कधी कमी पडल्या नाहीत. कुठेही मनापासून रुजायची जणू त्यांनी मनाला ताकीदच दिली होती. पुलंच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं व्रत घेतलं असल्यामुळे येणाऱ्या अडीअडचणींची झळ त्यांनी पुलंना कधी बसू दिली नाही.

असं लिहिणं’ हे प्रकरण अर्थातच सुनीताबाईंच्या लेखिका या भूमिकेतील प्रवास मांडते, पण लेखिका म्हणून त्यांच्या आयुष्यातलं पर्व सुरू झालं तेच मुळी साठीनंतर. तोपर्यंत लेखिका होण्यासाठी पोषक अशी परिस्थिती असतानाही सुनीताबाईंनी कधी या वाटेचा विचारही केला नव्हता.

विनायक प्रसादमधील एक खोलीच्या छोटय़ा बिऱ्हाडापासून ते लंडन-पॅरीसमधल्या बिऱ्हाडांपर्यंत अशा अनेक घरांबद्दल सुनीताबाईंच्या चांगल्या-वाईट अनेक आठवणी निगडित आहेत. कुठे मर्ढेकरांची पिठलं-भाकरीची फर्माईश पूर्ण केल्याचा आनंद, तर कुठे पुलंमधले कलागुण बहरायला लागले, म्हणून समाधान. कुठे घरात जेवण बनवता येत नसे, तर कुठे खालून पाणी भरायला लागत असे. पुलंना आकाशवाणीत नोकरी लागल्यानंतर ते प्रॉक्टर रोडवरील ‘केनावे हाऊस’मध्ये राहायला लागले. या घराच्या घरमालकाला साहित्याबद्दल ना फारशी गोडी होती ना जाणकारी. पण पुलंबद्दल मात्र प्रचंड अभिमान. पुलं लिखाणात गर्क असताना हा घरमालक भक्तिभावानं त्यांच्यासमोर बसून राहात असे. या घरातील वास्तव्यादरम्यान पुलंच्या आकाशवाणीवरील कामगिरीची सरकारदरबारी तसंच रसिकमनात नोंद झाली होती. ‘तुज आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ही इतिहास घडवणारी नाटकं, तसंच ‘मोठे मासे छोटे मासे’ या एकांकिकेनं याच घरात जन्म घेतला होता. केनावे हाऊस सोडल्यानंतर ते ‘आशीर्वाद’मध्ये राहायला गेले. या बििल्डगमध्ये अकरा खोल्या आणि तीन बिऱ्हाडं राहात होती. त्यात सुनीताबाईंचे भाऊ डॉ. श्रद्धानंद ठाकूर आणि त्यांची पत्नी निर्मलाबाई, त्यांचे मेहुणे नारायण देसाई आणि त्यांच्या पत्नी नलिनीबाई, आणि पुलं व सुनीताबाई राहात असत. म्हणजे नलिनीबाईंची नणंद निर्मलाबाई आणि निर्मलाबाईंची नणंद सुनीताबाई असा नणंद-भावजयांचा गोतावळा तिथं एकत्र आला होता. यावर पुलंनी मल्लिनाथी केली नाही तरच नवल. पुलं या बििल्डगचा उल्लेख ‘नणंदादीप’ असा करत असत. मान्यवरांच्या घरावर महापालिका पाटय़ा लावते, पण इतक्या वेळा बिऱ्हाडं बदलली असल्यामुळे इतक्या घरांवर पाटय़ा लावणं महानगरपालिकेला परवडणार नाही, असंही गमतीत ते म्हणायचे. पॅरीसमध्ये माधव आचवल त्यांच्या शेजारी राहात आणि त्या काळात भारतीय जेवण मिळत नसल्यामुळे सुनीताबाईंकडे जेवायला येऊ लागले. दिल्लीतलं त्यांचं घर तर ‘महाराष्ट्र सांस्कृतिक केंद्र’च झालं होतं. आशीर्वादमधून पुलं आणि सुनीताबाई ‘मुक्तांगण’ या स्वत:च्या मालकी हक्काच्या घरात राहायला गेले. हे घर सुनीताबाईंच्या मनासारखं असलं तरी पुलंनी निवृत्त आयुष्य पुण्यात काढायचं ठरवलं आणि ते ‘रूपाली’त राहायला गेले. यानंतरचा शेवटचा टप्पा होता तो ‘मालतीमाधव’चा. कारण तोपर्यंत सगळ्यांचीच वयं झाली होती, तब्येतीच्या कुरबुरी सुरू झालेल्या होत्या, त्यामुळे ठाकूर कुटुंबीयांना एकत्र राहावंसं वाटायला लागलं होतं. मालतीमाधव पुलं आणि सुनीताबाईंच्या मृत्यूची साक्षीदार ठरली. ऐंशी र्वष सुंदर-संपन्न आयुष्य जगल्यानंतर मृत्यूही वैभवशालीच यावा असं सुनीताबाईंना वाटत असलं तरी ते दोघांच्याही बाबतीत खरं झालं नाही. पुलंची अवस्था तर शेवटी शेवटी इतकी केविलवाणी झाली होती की पूर्णपणे परावलंबन नशिबी आलेलं होतं. मृत्यूनंच त्यांची या अवस्थेतून सुटका केली. सुनीताबाईही जाण्याआधी दीडेक वर्ष अशाच क्लेशपर्वातून गेल्या.

‘असं लिहिणं’ हे प्रकरण अर्थातच सुनीताबाईंच्या लेखिका या भूमिकेतील प्रवास मांडते, पण लेखिका म्हणून त्यांच्या आयुष्यातलं पर्व सुरू झालं तेच मुळी साठीनंतर. तोपर्यंत लेखिका होण्यासाठी पोषक अशी परिस्थिती असतानाही सुनीताबाईंनी कधी या वाटेचा विचारही केला नव्हता. सुनीताबाईंचं वाचन दांडगं होतं. इंग्रजी, बंगाली, उर्दू भाषाही त्यांना अवगत होत्या आणि या भाषातील साहित्य त्यांनी वाचलं होतं. कविता हा त्यांचा एक हळवा कोपरा होता. त्यामुळे भाषिक आकलन आणि जाणिवाही चांगल्या विकसित झाल्या होत्या. पुलंनीही कधी त्यांच्यावर अशी बंधनं घातलेली नव्हती. जी. ए., श्री. पु. भागवत, माधव आचवल यांनी वारंवार त्यांना हे सुचवलं होतं, त्यालाही सुनीताबाईंनी कधी भीक घातली नाही. मोठय़ा प्रमाणावर पत्रलेखन करणाऱ्या सुनीताबाई साहित्यनिर्मितीचा विचारही करायला तयार नव्हत्या. स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्याची रसरशीत क्षमता असूनही ‘पुलंची बायको’ याच चौकटीत राहात होत्या. पुलंच्या सगळ्या व्यापातील पडद्याआडची भूमिका त्यांनी स्वीकारली होती आणि अतिशय कर्तव्यकठोरतेनं सांभाळली, हे मान्य केलं तरी त्यामुळे त्यांना लिखाणाकडे लक्ष देता आलं नसावं असं वाटत नाही. कारण त्यांची एकंदरीतच काम करण्याची अत्यंत काटेकोर आणि नेमस्त पद्धत पाहिली तर वेळ मिळत नाही हे कारण त्यांच्या बाबतीत तरी लागू होत नाही. त्यामुळे वयाच्या साठीपर्यंत सुनीताबाईंनी लेखन का केलं नाही, या अनेक वषर्ं अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर याही पुस्तकात सापडत नाही. अर्थात ‘देर आये दुरुस्त आये’ असं काहीसं झालं. साठीनंतर मात्र अचानक एकदम त्यांनी लेखणी हाती धरली आणि ‘आहे मनोहर तरी..’ सारखं पुस्तक लिहून जी झेप घेतली ती अतुलनीय होती. आता पुस्तक लिहायचं म्हणून लिहिलेलं हे पुस्तक नव्हतं, तर वेळोवेळी लिहून ठेवलेल्या या आठवणी एवढंच त्यांचं प्राथमिक स्वरूप होतं. या आठवणींचा काही भाग महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला आणि त्याला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला त्यावरून या आठवणी पुस्तकरूपात प्रसिद्ध कराव्यात असं निश्चित झालं. खरं तर आधीही एकदा या आठवणी सुनीताबाईंनी श्री. पु. भागवतांना वाचायला दिल्या होत्या, पण तेव्हा ‘काही काळ हे लिखाण बाजूला ठेवून द्यावं’ असा सल्ला त्यांनी दिला होता. कदाचित या लिखाणाचं स्वागत वाचक कसं करतील अशी सुनीताबाईंप्रमाणेच त्यांच्याही मनात शंका असेल. कारण मुळात हे आत्मचरित्र नाही. त्यामुळे आत्मचरित्राचा गुळगुळीत बाज त्यात नव्हता. उलट हे पुस्तक म्हणजे आपल्याच आयुष्याची अत्यंत निष्ठुरपणे फेरतपासणी करत घेतलेला आत्मशोध. सुनीताबाईंच्या कडक-करकरीत स्वभावाला साजेल अशा पद्धतीनं केलेला. यात त्यांनी स्वत:ला ‘गुण गाईन आवडी’ या पद्धतीनं सादर केलं नाही, तसं पुलंनाही केलं नाही. पती-पत्नी नात्यातले वेळोवेळी जाणवलेले पीळ उलगडून दाखवताना त्यांनी हातचं काही राखलं नाही. त्यामुळेच पुलंच्या प्रेमात असलेल्या वाचकाला हे रुचेल? पटेल? अशी शंका मनात होतीच. पण मायबाप वाचकांनीच या आठवणीवजा लेखाला कौल दिल्यानंतर या आठवणींचं पुस्तक प्रकाशित करणं आणि तेही मौजेनं प्रकाशित करणं हे अपरिहार्य होतं. या पुस्तकानं साहित्यविश्वात अनेक विक्रम घडवले. या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले. चर्चा-परिसंवाद झाले. उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पत्रव्यवहार झाला. साहित्यविश्व आणि समाज दोन्ही ढवळून निघाला. त्यानं सुनीताबाई सुखावल्या. पण त्याहीपेक्षा ‘आपलं पुस्तक वाचून सर्वसामान्य महिलांना मन मोकळं करावंसं वाटलं. सामान्य माणसं निर्भय होत आहेत हेच लेखक म्हणून आपल्याला मोठं प्रशस्तिपत्रक वाटतं’, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘आहे मनोहर तरी..’च्या यशानंतर ‘सोयरे सकळ’. ‘मण्यांची माळ’. ‘प्रिय जी. ए.’, ‘मनातलं अवकाश’ ही पुस्तकेही प्रसिद्ध झाली. सुनीताबाईंनी कवितांवर मनापासून प्रेम केलं. या प्रेमानेच त्यांना आणि पुलंना एकत्र आणलं. एवढंच नाही तर ज्या व्यक्तीला कविता आवडते, त्या व्यक्तीशी त्यांची नाळ पटकन जुळायची. कवितेच्या प्रेमापायीच त्यांनी काव्यवाचनाचे कार्यक्रम केले आणि काव्यवाचन कसं असावं याचा एक आदर्शच निर्माण केला. कविता हे त्यांच्यासाठी जगण्याचं माध्यम होतं. जी.एं.बरोबरचं मत्र यामागंही कवितेची ओढ हे एक कारण होतंच.

एखाद्या व्यक्तीमध्ये किती परस्परविरोधी गुण एकवटलेले असावेत, ते एकाच तीव्रतेचे असावेत आणि त्याचा एकत्रित परिणाम होऊन एक अमिट ठसा कसा उमटावा, हे ‘असं जगणं’ या प्रकरणावरून लक्षात येतं. जीवन कसं जगायचं यासाठी सुनीताबाईंची विशिष्ट विचारांवर श्रद्धा होती. याच निष्ठांवरच्या अढळ श्रद्धेतून त्यांनी आंतरिक बळ मिळवलं. महत्त्वाचं म्हणजे जीवनविषयक त्यांच्या या निष्ठा ठाम होत्या. वयोपरत्वे त्या डळमळीत झाल्या नाहीत की परिस्थितीला शरण गेल्या नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या या निष्ठांची झळाळी कमी झाली नव्हती. हे जमवणं किती कठीण असतं, हे या वाटेवरून चालणाऱ्यांनाच कळू शकतं. आज अशा निष्ठावान व्यक्ती शोधायलाच लागतील. सुनीताबाईंचं वेगळेपण अधोरेखित होतं ते याच बाबतीत. म्हणूनच अरुणा ढेरे म्हणतात, ‘सुनीताबाईंच्या प्रेमाचं कठीण कोवळेपण इतरांना समजणं अवघडच. फार फार अवघड.’ पसा, प्रसिद्धी, पत, प्रतिष्ठा याचं आणि फक्त याचंच व्यसन असलेल्या आणि त्यासाठीच आयुष्य पणाला लावणाऱ्या समाजाला कमीत कमी गरजा, जीवननिष्ठांमधला कर्मठपणा, साधेपणाची ओढ, काटकसरी स्वभाव, काटेकोर वृत्ती, टोकाचा स्पष्टवक्तेपणा, सत्यप्रियता, स्वच्छता, नीटनेटकेपणा, साधनशुचिता, कर्मवाद, त्याग, आत्मसमर्पण, व्यक्तिस्वातंत्र्याची आस, श्रमप्रतिष्ठेचा ध्यास.. असे अनेक गुण अनाकलनीय वाटले तर नवल नाही. पण याच गुणांच्या बळावर सुनीताबाईंनी आíथक नियोजन ज्या पद्धतीनं केलं आणि वाचनालयं, प्रयोगशाळा, नाटय़मंदिरं, शिक्षणसंस्था, बालवाडय़ा, हॉस्पिटल्स, व्यसनमुक्ती, विज्ञानप्रसार, सांस्कृतिक कार्य आणि चळवळी, अंधश्रद्धा निर्मूलन, गिर्यारोहण.. अशा अनेक उपक्रमांना पु. ल. देशपांडे प्रतिष्ठाननं सढळ हातानं मदत केली. या मदतीतला सुसंस्कृतता, पारदर्शीपणा आणि निर्मोहीपणा याची अनेक उदाहरणं या प्रकरणात सापडतात आणि सुनीताबाईंना एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. ‘पु. ल. देशपांडे प्रतिष्ठान’ ही एक अत्यंत नमुनेदार ‘एन. जी. ओ.’ होती असं वर्णन केलं जातं ते उगीच नाही. आíथक मदत मागण्यामागचं कारण उचित आहे का नाही, याची सुनीताबाई कठोरपणे तपासणी करायच्या. आपला पसा योग्य ठिकाणीच खर्च होणार आहे, याची खात्री पटली की, कोणीच त्यांच्याकडून विन्मुख परत जायचा नाही आणि या मदतीचा त्यांनी कधी गवगवाही केला नाही. किंवा प्रसिद्धी मिळवण्याचं साधन म्हणूनही उपयोग केला नाही.

या पुस्तकात पानोपानी विखुरलेल्या सुनीताबाईंमधील गुणांबद्दल लिहावं तेवढं थोडंच आहे. त्यामुळे हे पुस्तक परत परत वाचावं, सुनीताबाईंच्या जीवननिष्ठा समजून घ्यायचा प्रयत्न करावा. आज ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, आयुष्याला वळण देण्याचा प्रयत्न करावा, पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करावा, लवून नमस्कार करावा असं मनापासून वाटावं, अशी उत्तुंग व्यक्तिमत्त्वं अभावानंच सापडतात. ‘सुनीताबाई’ या पुस्तकाच्या रूपात एक असं व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यांसमोर उभं करून मंगला गोडबोले यांनी आपल्यासमोर एक आव्हानच ठेवलं आहे. सुनीताबाईंचे विचार, धारणा, निष्ठा जेवढय़ा झिरपवता येतील तेवढय़ा झिरपवून आपल्या जीवनाचा आणि जगण्याचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न करावा, यासाठी.

शुभदा पटवर्धन
४ जुलै २०११
लोकसत्ता 

0 प्रतिक्रिया: