'एखाद्या माणसाची आणि आपली व्हेवलेंथ का जमावी? आणि एखाद्या माणसाची का जमू नये? याला काही उत्तर नाही..' 'पंधरा पंधरा- वीस वीस वर्षांचा परिचय असतो.. पण शिष्टाचाराची घडी थोडीशी मोडण्यापुढे आपलं नातं जात नाही. काही माणसं क्षणभरात जन्मजन्मांतरीचा दुवा साधून जातात.' बरोबर ही वाक्य लिहिली आहेत ती पु. ल. देशपांडे नावाच्या अवलियानेच. कारण ते होतेच तसे. रावसाहेब या म्हणजेच बेळगावच्या कृष्णराव हरिहर यांची कथा सांगत असताना पु.लंनी त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत. व्यक्ती चित्रण ही तर त्यांची खासियत. हे सगळं आज आठवण्याचं कारणही तसंच खास आहे. आज आपल्या लाडक्या पु.लंना आपला निरोप घेऊन 21 वर्षे झाली. आज त्यांचा एकविसावा स्मृतीदिन.
हरितात्या या त्यांच्या कथेत ते सांगतात की हरितात्यांनी आम्हाला कधी पैशांचा खाऊ दिला नाही. पण वेळप्रसंगी मुठी वळतील तो आत्मविश्वास, ते धैर्य हे त्यांनी न मागता आम्हाला दिलं. अगदी तसंच आहे पु.ल. देशपांडे यांना महाराष्ट्रातल्या मागच्या पिढ्या विसरलेल्या नाहीतच. तशा पुढच्या कैक पिढ्या विसरणार नाहीत. याचं कारण आहे ते म्हणजे त्यांची खास शैली आणि अफलातून विनोद बुद्धी. 'स्टँड अप कॉमेडी' हा प्रकार काय असतो? ते ठाऊक नसतानाही कथाकथन करून तो इतक्या वर्षांपूर्वी म्हणजेच 60 च्या दशकात करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. नुसतं धाडस दाखवलं नाही तर तो प्रकार रूजवला आहे. एक मोठा पोडियम, त्यावर लावलेला माईक, शेजारी भरून ठेवलेलं पाणी आणि हातात पुस्तक घेऊन पुलं त्यांची कथा फक्त वाचून दाखवत नसत तर ती जिवंत करत.
व्यक्ती आणि वल्ली, तुझे आहे तुझपाशी, खोगीरभरती, अंमलदार, ती फुलराणी, तुका म्हणे आता, गुण गाईन आवडी, खिल्ली, चार शब्द, गणगोत, पुरचुंडी, बटाट्याची चाळ, हसवणूक अशा कितीतरी पुस्तकांची नावं घेता येतील जी त्यांनी लिहिली आहेत आणि ती आजही लोकांच्या स्मरणात आहेत. असं म्हणतात की प्रत्येक लेखकाचा एक काळ असतो.. तो काळ सरला की त्या लेखकाला लोक विसरतात. पुलंच्या बाबतीत मात्र ते झालेलं नाही. त्यांच्या पुस्तकांमधून, कथांमधून, सीडीजमधून ते आपल्या मनामनातून जिवंत आहेतच.
मी वयाच्या दहाव्या वर्षापासून पु.ल. देशपांडे ऐकतोय, वाचतो आहे. मला व्यवस्थित आठवतंय की मी पहिली ऐकलेली कथा म्हैस ही होती. एका म्हशीचा बसखाली येऊन अपघात होतो आणि त्यानंतर पु.ल. फक्त आपल्या शब्दांमधून आणि अफाट निरीक्षण शक्तीतून आपल्या पुढे अख्खी बस आणि अख्खं गाव उभं करतात. एस.टी.तला कंडक्टर, ड्रायव्हर, मास्तर, सुबक ठेंगणी, मधु मालुष्टे, उस्मानशेठ, झंप्या दामले, बबूनाना, मास्तर अशी कितीतरी पात्र त्यांनी आपल्या लेखनातून उभी केली त्यांना आवाज देऊन जिवंत केली. एवढंच नाही तर म्हशीचा मालक धर्मा मांडवकर, ऑर्डरली, पुढारी बाबासाहेब मोरे, इन्सपेक्टर अशी सगळी पात्रंही त्यांनी जिवंत करून दाखवली आणि आपल्याला खळाळून हसवलं आहे. 'अरे अर्जूनाना कशाला धाडलंस? कंडम माणूस.. तो फोलिसासंगती कवड्या खेलत बसल..' 'बरा त बरा हे आडली साहेब होते यांनाच घेऊन आलो..' ए डायवर कोन ए.. ? 'हं हं.. मी बाबासाहेब मोरे' हे आणि असे सगळे संवाद तोंडपाठ आहेत.

जी गोष्ट म्हैस या कथेची तीच तुम्हाला कोण व्हायचं आहे? पुणेकर, नागपूरकर? का मुंबईकर ? या कथेची. 'तशी महाराष्ट्रात शेकडो गावं आहेत पण ज्यांच्यापुढे कर जोडावेत अशी ही तीनच खास स्थळं नागपूर, पुणे आणि मुंबई या पहिल्या वाक्यातूनच ते आपल्याला खिशात टाकतात.' 'तुम्हाला पुणेकर व्हायचं आहे का? जरूर व्हा तूर्त सल्ला एकच पुन्हा विचार करा..' पुण्यात दुपारी खणखणारा टेलिफोन आणि त्याबद्दल केलेलं वर्णनही आपल्या खो-खो हसवतं. 'हॅलो, हॅलो असं फोन आल्यावर म्हणायचं हा जगाने मान्य केलेला शिष्टाचार आहे ना? पण टेलिफोन करण्याप्रमाणे ऐकण्यालाही जर पैसे लागले असते तर आणि दुपारच्या झोपेतून उठवल्यावर आवाजात जो काही नैसर्गिक तुसडेपणा आणून कोण ए असं वस् कन ओरडायचं' हे वाक्य ऐकलं की आपल्याला जे काही हसू येतं त्याला तोड नाही..
सखाराम गटणे, नामू परिट, हरितात्या, पेस्तनकाका, दामले मास्तर ही सगळी पात्रं अक्षरशः ते जगले आहेत असंच आपल्याला त्यांच्या कथा ऐकताना वाटत राहतं. जसं ते हरितात्यांच्या कथेत म्हणतात 'कुठलाही ऐतिहासिक प्रसंग घडला की हरितात्या नेमके तिथे कसे हजर होते? हा प्रश्न आम्हाला पडायचा आणि मग पुढे जाऊन लक्षात आलं की इतिहास नावाची जी काही गोष्ट आहे ती म्हणजे हरितात्या. शाळेतला इतिहास आम्हाला कधीच आवडला नाही कारण त्यात सन होते. हरितात्यांनी सांगितलेल्या गोष्टी आवडल्या कारण ते आपली शिवाजी महाराज, बाजीप्रभू यांची भेट घडवून आणायचे' अगदी असंच पुलंच्या लेखणीचं स्वरूप होतं. त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांची ते आपल्या लिखाणातून आणि बोलण्यातून भेट घडवून आणायचे. त्यामुळेच ती पात्रं आपल्या डोळ्यासमोर उभी रहायची.

सखाराम गटणे, नामू परिट, हरितात्या, पेस्तनकाका, दामले मास्तर ही सगळी पात्रं अक्षरशः ते जगले आहेत असंच आपल्याला त्यांच्या कथा ऐकताना वाटत राहतं. जसं ते हरितात्यांच्या कथेत म्हणतात 'कुठलाही ऐतिहासिक प्रसंग घडला की हरितात्या नेमके तिथे कसे हजर होते? हा प्रश्न आम्हाला पडायचा आणि मग पुढे जाऊन लक्षात आलं की इतिहास नावाची जी काही गोष्ट आहे ती म्हणजे हरितात्या. शाळेतला इतिहास आम्हाला कधीच आवडला नाही कारण त्यात सन होते. हरितात्यांनी सांगितलेल्या गोष्टी आवडल्या कारण ते आपली शिवाजी महाराज, बाजीप्रभू यांची भेट घडवून आणायचे' अगदी असंच पुलंच्या लेखणीचं स्वरूप होतं. त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांची ते आपल्या लिखाणातून आणि बोलण्यातून भेट घडवून आणायचे. त्यामुळेच ती पात्रं आपल्या डोळ्यासमोर उभी रहायची.

पुलं फक्त कथा, कादंबऱ्या, नाटकं या निवडक साहित्यकृतींमध्येच अडकून राहिले नाहीत. त्यांनी वाऱ्यावरची वरात सारखं लोकनाट्य लिहिलं. 'ती फुलराणी आणि त्यातला तो संवाद आठवा.. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा.' भक्ती बर्वे, अमृता सुभाष, हेमांगी कवी इथवर अनेक अभिनेत्रींनी ती फुलराणी साकारली. त्यांना ती हवी हवीशी वाटली म्हणूनच.
नवरा बायको, गोकुळचा राजा, घरधनी, देवबाप्पा, संदेश, अंमलदार या चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा, कथा, संवाद लिहिले, तसंच जवळपास वीस-बावीस सिनेमांसाठीही काम केलं. गुळाचा गणपती हा त्यांचा सिनेमा म्हणजे सबकुछ पु.ल. असाच होता.
गणगोत हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक हे त्यांच्या आयुष्यात आलेल्या खऱ्याखुऱ्या व्यक्तींवर होतं. रावसाहेब ही कथा याच पुस्तकातली आहे. रावसाहेबांचं वर्णन करतानाही पु.लंनी रावसाहेबांची शिव्या देण्याची शैली, दणकट माणुसकी, पु.लंनी बेळगाव सोडलं तेव्हा हळवे झालेले रावसाहेब हे सगळं ज्या पद्धतीने उभं केलंय त्याला खरोखर तोड नाही. कृष्णराव हरिह कोण होते? हे आपल्याला माहितही नसतं पण पुलं त्यांची भेट घडवून आणतात. एखादा माणूस वरून जरी कठोर वाटत असला तरीही आतून किती मृदू असतो अशा वेगळ्या प्रकारचं व्यक्तीचित्रण लक्षात राहण्यासारखं.
जी बाब खऱ्याखुऱ्या व्यक्तीरेखांची तीच बाब व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांमधल्या पात्रांचीही. अंतू बर्वा आठवा.. 'कुठे बोलू नका हो दारचा हापूस ही गेली तेव्हापासून मोहरला नाही हो..' काय अंतूशेठ रत्नागिरी झकपक झाली हो तुमची.. तुमच्या घरी आली की नाही वीज? छे हो काळोख आहे तो बरा आहे. गळकी कौलं आणि पोपडे उडालेल्या भिंती हे पाहायला वीज कशाला हवी?' हे सांगणाऱ्या अंतूची आर्तता. त्याच अंतूची अंतूशेठ म्हणून नक्कल करणारे मित्र हे सगळं त्यांनी ताकदीने उभं केलंय. एका लेखणीच्या जोरावर इतक्या पात्रांना जन्म द्यायचा आणि शिवाय ती सगळी आपल्या वर्णनातून जिवंत करायची हे काम नक्कीच खायचं काम नाही. ही किमया फक्त पुलंच साधू शकतात.

पुलंनी महाराष्ट्राला काय दिलं असं जर कुणी विचारलं तर निखळ हसू हे उत्तर अगदी समर्पक ठरेल यात कुणाच्याही मनात शंका नाही. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की मी आनंदयात्री आहे. जगण्यातला आनंद त्यांनी कायम शोधला. फक्त शोधलाच नाही तर तो आपल्या लिखाणातून, नाटकांमधून, कलेतून, गाण्यांमधून, संगीतातून वाटलाही. खळाळून निखळ हसवणारा हा माणूस अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे. मात्र या अवलियाने आपल्या विचारांचा, लेखनाचा, कथांचा अमूल्य असा ठेवा आपल्या सगळ्यांसाठी ठेवला आहे. त्यामुळे आनंदयात्री जातानाही मागे आनंद ठेवून गेला आहे..अनंतकाळासाठी!
समीर जावळे
मुंबई तक
१२ जून २०२१
0 प्रतिक्रिया:
Post a Comment