Tuesday, March 31, 2009

पु.लं.च्या आठवणींना उजाळा

'मराठी वाचकांना आणि प्रेक्षकांना आपल्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे पाहायला लावणारा, नव्याचा स्विकार निखळपणे करायला शिकविणारा, सामान्यातील असामान्यत्व हुडकणारा माणुस म्हणजे पु.ल.देशपांडे आणि अशा या भल्या माणसाच्या आनंदोत्सावात आपण सहभागी होतो, याबद्दल स्वत:चाच हेवा वाटतो.’ पु.लं.च्या आठवणी सांगताना विजयाबाई अक्षरश: हरवुन गेल्या होत्या. जबरदस्त मित्रवर्ग लाभलेला ’अवलिया’ पण भला माणूस असलेल्या पु.लं.ना कायम आपला म्हणून जो अनुभव आहे, तो इतरांनाही जाणवून देण्याचा ध्यास होता. त्यामुळेच त्यांचा विनोद आणि लिखाण हे दोन्ही आयुष्यभर आपल्याकडे ठेवणीतला साठा जपून ठेवावा तसे टिकून आहेत.

एवढेच नव्हे तर पु.लं.चे लिखाण वाचताना नकळत ते आपल्याशी संवाद साधत असल्याचा भास होतो. पु.लं.च्या सान्निध्यात असताना, या माणसाकडे अशी कोणती जादू आहे!’. याचं कायम अप्रूप वाटत असं सांगताना विजयाबाईंनी भावनाविवश होत पु.लं.ची एखाद्याचं कौतुक करण्याची अगर प्रोत्साहन देण्याची हुबेहुब नक्कल करुन दाखवीली, त्या वेळी प्रेक्षकही गहिवरले होते. कोणत्याही चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याच्या पु.लं.च्या स्वभाविषयी सांगताना ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल म्हणाले, विजय तेंडुलकरांनी ’घाशीराम कोतवाल’ चे केलेले पहिले वाचन ऎकल्यानंतर पु.लं. नी, हे नाटक फार मोठे असून हे आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर व वेगळ्या पद्धतीने करावे लागेल. असे वारंवार बजावत प्रोत्साहन दिले. तसेच ’घाशीराम...’चा प्रयोग पाहिल्यावर, मी तुझ्यासाठी नाटक लिहायला घेतोय आणि त्याचे नाव असेल ’तीन पैशांचा तमाशा’, असं सांगून ’घाशीराम’साठी शाबासकी दिली. ’तीन पैशांचा तमाशा’चे पु.लं.नी पहिले वाचन केले, त्या वेळी हे नाटक मुंबईच्या वास्तवाशी जुळवून करु या, असे आपण सुचविताच, आता हे नाटक तुझे आहे, तुला हवे ते बदल कर, असं पु.लं. सहजपणे म्हणाले, त्यानंतर पु.लं. एकदाही नाटकाच्या तालमीला आले नाहीत. नाटकाच्या पहिला प्रयोग बघितल्यानंतर, ’आपण याला काय लिहून दिले अन्‌ याने हे काय केले?" असे भाव पु.लं.च्या चेहर्‍यावर होते. परंतु पं. वसंतराव देशपांडे आणि सी. रामचंद्र यांनी नाटकाचा बाज आणि त्यातील जाझ संगिताचे कौतुक करुन नाटक आवडल्याची पावती देताच पु.लं. खुलले...ही आठवण सांगताना जब्बार पटेलांनी, दिग्दर्शाने केलेले बदल खुलेपणाने स्विकारणारा नाटकार, अशी पु.लं.ची ओळख करुन दिली. ’देव नावाची गोष्ट कधी कधी मला कळत नाही’, असं मार्मिक विधान करणारा अतिशय मर्मग्राही भाष्यकार म्हणूनही पु.ल. मोठे होते. 

आणीबाणीच्या काळात पु.लं. नी शनवारावाड्यासमोर केलेले भाषण म्हणजे त्यांचं खरं व्यक्तीमत्व उलगडून दाखविणारं स्वगत आहे, असे जब्बार पटेल म्हणाले. ’मोठा कलावंत व्ह्यायचे असेल तर तुझ्यातल्या लहान मूलाला जप;, अशी फार मोलाची शिकवण देणारे पु.ल. स्वत:ही एखाद्या खट्याळ मुलाप्रमाणे होते, असे सांगताना प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे पदर उलगडुन दाखविले. एखाद्याची अमूक एक गोष्ट वा उपक्रम आवडला की, पु.ल. त्याला अवघडायला होईल, इतकं त्याचं कौतुक करायचे, असं सांगून प्रा. केंद्रे यांनी ’झुलवा’च्या पहिल्या प्रयोगानंतरची आठवण सांगितली नाटक बघितल्यानंतर पु.ल. दोन दिवस बोलले नाहीत. मी एनसीपीएतच त्यांच्या हाताखाली काम करायचो, त्यांच्यासमोर गेलो तरी ते माझ्याशी काही बोललेच नाहीत. त्यामुळे आपलं काही तरी चुकलं, म्हणून पार गोंधळून गेलो होतो. 

तिसर्‍या दिवशी सकाळी एनसीपीएमध्ये गेल्यावर चौकीदारापासून जो भेटेल तो, पु.लं.नी तुम्हाला तातडीने भेटायला सांगितलं आहे, असं सांगत होता, मी पु.लं,च्या पुढ्यात दाखल होताच, नाटक बघितल्यानंतर बोलता येईल याचा आत्मविश्वास मला नव्हता’, असं सांगितलं. त्या वेळी एखादा माणूस किती मोठा असू शकतो, याचं पु.लं. च्या रुपाने आपल्याला दर्शन झाल्याचे प्रा. केंद्रे म्हणाले, ते नेहमी म्हणायचे तु मला एखादी चांगली कथा सुचव, मी तुला चांगले नाटक लिहून देतो. त्यामुळे आपण एक रशियन कथा त्यांना वाचायला दिली. पु.लं. चा कथा कशी वाटली म्हणून दुसर्‍या दिवशी त्यांना विचारायला गेलो तर म्हणाले, ’कथा छानच आहे, बरोबर चार दिवसांनी मी या कथेच्या नाटकाचे वाचन करणार, तु तयार राहा.’ पु.लं.नी केवळ चार दिवसांत ’एक झुंज वार्‍याशी’ या नाटकाचे वाचन केले. ही आठवण सांगताना प्रा. केंद्रे यांनी जेव्हा असं काही केवळ पु.ल.च करु शकतात, असे उद्‌गार काढले. 

(९ नोव्हेंबर २००६ रोजी रविंद्र नाट्यमंदिर इथे झालेल्या 'पु.लं. च्या आठवणींना उजाळा' या पु.लं. च्या वाढदिवसानिमित्त आयोजीत कार्यक्रमातून)

2 प्रतिक्रिया: