Wednesday, December 11, 2019

देवाची देणगी - मनमोहन रो. रोगे

‘महाराष्ट्र भूषण’ पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष संपूर्ण महाराष्ट्राने अगदी उत्साहात नुकतेच साजरे केले. एखाद्या साहित्यिकाला समस्त मराठी भाषिकांचे इतके प्रेम ‘पुलं’शिवाय अन्य कुणाला लाभले नसेल म्हणूनच, तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचे प्रथम मानकरी ‘पुलं’ ठरले होते.
एखाद्याच्या अंगात नाना कला असणे म्हणजे काय हे ‘पुलं’कडे पाहिल्यावर लक्षात येते. ‘पुलं’मध्ये काय नव्हते? ते लेखक होते, कवी होते. नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, पटकथाकार, संवादलेखक, संगीतकार, नकलाकार, एकपात्री कलाकार, वक्ते, अभिवाचक, पेटीवादक आणि प्राध्यापकही होते. अशा कित्येक क्षेत्रांत त्यांनी एकाचवेळी प्रभावी संचार केला. ‘गुळाचा गणपती’ हा चित्रपट म्हणजे सबकुछ ‘पुलं’ असे मानतात. ‘जोहार मायबाप’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेला चोखामेळा पाहिल्यावर त्यांच्यातील असीम अदाकारीची आपल्याला प्रचिती येते. एक माणूस एकाचवेळी इतकी सगळी कामे तीही प्रभावीपणे कशी करू शकतो हेच कळत नाही. बरे हे सगळे करत असताना ते समाजसेवेतही मागे नव्हते. दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’साठी तसेच डॉ. अनिल अवचट यांच्या ‘मुक्तांगण’साठी त्यांनी भरभरून मदत केली. शिवाय शाळा, वाचनालये, रुग्णालये अशा समाजोपयोगी कितीतरी संस्थांना त्यांनी नेहमीच मदत केली. अनेक कर्तृत्वान माणसे आपापल्या क्षेत्रात थोर असतात, पण इतर क्षेत्रात ती माणसे तितकी प्रवीण नसतात. एकाचवेळी अनेक क्षेत्रात प्रावीण्य असलेली आचार्य अत्रे यांच्यानंतरची व्यक्ती म्हणजे ‘पुलं’ होय. त्यांनी ज्या क्षेत्रात काम केले त्या क्षेत्रात ते अग्रगण्य ठरले. त्यांचे कोणतेही पुस्तक घ्या. एकदा वाचावयास सुरुवात केली की, ते वाचून पूर्ण केल्याशिवाय वाचक स्वस्थ बसत नाही. त्यांची अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा आणि वंगचित्रे वाचताना ‘पुलं’ वाचकांना त्यांच्यासोबत त्या-त्या ठिकाणी फिरवून आणतात. ‘पुलं’नी लिहिलेली व्यक्तिचित्रे वाचताना त्या-त्या व्यक्ती ‘पुलं’ वाचकांसमोर मूर्तिमंत उभ्या करतात आणि त्याच व्यक्ती ‘पुलं’कडून ऐकणे म्हणजे एक पर्वणीच.

त्यांचे साहित्य जाणून घ्यायचे, तर एक जन्मही पुरा पडणार नाही. त्यांचे पत्रसंग्रह आणि भाषणेही प्रसिद्ध आहेत. त्यांचे विनोद हे निखळ होते, त्यात अश्लीलता शोधूनही सापडणार नाही. घरातील सर्व वयाच्या आणि नात्याच्या सदस्यांनी एकत्र बसून ऐकावे, ऐकतच राहावे अशी त्यांची भाषा निर्मळ आणि स्वच्छ आहे. लोकांना हसवण्यासाठी त्यांना अश्लील भाषा वा आक्षेपार्ह अंगविक्षेप करावे लागले नाहीत. विनोद सांगण्याचे त्यांचे टायमिंग, ठरावीक वाक्य बोलून झाल्यावर क्षणभर घेत असलेला पॉज, प्रसंगानुरूप आवाजातील बदल, आवाजाच्या नकला हे सगळेच अप्रतिम आहे. मागील काही पिढय़ा त्यांची व्यक्तिचित्रे वाचत, ऐकत मोठय़ा झाल्याच, पण आजच्या झटपट, नवनवीन ट्रेंड बदलणा-या युगातील तरुण पिढीही त्यांची व्यक्तिचित्रे, त्यांचे कथाकथन तितक्याच तन्मयतेने ऐकतात. असे यश किती लेखकांना, कलाकारांना लाभले वा लाभते? प्रासंगिक विनोद, शब्दांवरील कोटय़ा करण्यात ‘पुलं’चा हातखंडा होता, तसेच ते हजरजबाबी होते हे ‘पुलं’ वाचताना, ऐकताना नेहमीच लक्षात येते. उगीच का त्यांना ‘कोटय़धीश ‘पुलं’ म्हणतात! ‘पुलं’नी वाचक-रसिकांच्या मनात ध्रुवाप्रमाणे अढळ स्थान प्राप्त केले आहे.

त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ची कित्येकांनी पारायणे केलीत. त्या व्यक्ती आपल्या ओळखीच्या वाटू लागतात. नारायण, हरितात्या, अंतू बर्वा, नामू परीट, नाथा कामत, नंदा प्रधान, १०० टक्के पेस्तन काका, सखाराम गटणे, चितळे मास्तर, पानवाला वगैरे व्यक्ती आपल्याला कुठे ना कुठे भेटल्यात, आपण पाहिल्यात असे वाटू लागते. ‘पुलं’चे निरीक्षण आणि त्यानंतर त्याची मांडणी इतकी उत्कट असते की त्या-त्या व्यक्तीरेखेत वाचक गुंतून जातो. बरे त्या व्यक्ती परत परत वाचताना वा ऐकताना कंटाळा तर सोडाच उलट तितकाच आनंद प्रत्येकवेळी होतो. किंबहुना कॅसेट ऐकताना पुढचे सगळे प्रसंग, वाक्ये माहितीची असताना, पाठ असतानाही ती ऐकताच तितकेच हसू येते ही ताकद आहे ‘पुलं’च्या लेखणीची आणि सादरीकरणाची. या सा-या व्यक्तिरेखा मला खूपच आवडतात, भावतात. त्यात डावे-उजवे, कमी-अधिक करणे कठीणच, तरी एक व्यक्तिरेखा ऐकताना मात्र मला हसू येते तितकेच कारुण्य वाटते (तसे कारुण्य हरितात्या, नारायण, वगैरेतही आहे.) आणि ती व्यक्ती आपल्याला कधीतरी भेटली पाहिजे होती, त्या व्यक्तीचा सहवास काही काळ तरी मिळायला हवा होता असे वाटते. ती अजरामर, साधी-सरळ, किंचित रागीट-खूप प्रेमळ, दणकट तितकीच सहृदयी, स्पष्टवक्ती व्यक्ती म्हणजे ‘रावसाहेब’ होय. ‘पुलं’नी प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी ‘म्हैस’ही अजरामर केली आहे, पण रावसाहेब लाजवाबच!

रावसाहेब बेळगावचे तरी मराठी अभिमानी, नाटक-संगीताची आवड असलेले. आपल्याला एकही वाद्य वाजवता येत नसल्याची खंत बाळगणारे, गर्भ श्रीमंतीत जन्म होऊनही श्रीमंतीचा माज नसलेले, मैत्रीसाठी काहीही करण्यास तयार असलेले, ज्या मित्राविरुद्ध कोर्टात केस त्यालाच आपल्या घरी पाहुणचार करणारे, चोरी करणा-या नोकराची परिस्थिती कळल्यावर त्याला शिक्षेऐवजी मदत करणारे, खाँ साहेबांच्या गायनाने तृप्त होऊन त्यांचे पाय चेपणारे, स्वत: थिएटरचे मालक असूनही हौशी कलाकारांच्या नाटकात कुणाच्या पायाला खिळा चुकून टोचू नये म्हणून स्वत: रंगमंचावर झाडू मारणारे रावसाहेबच! श्रीमंतीचं वारं अंगावरून गेलं की ब-याच लोकांच्या मनाला लकवा भरतो. माणसे अपयशापेक्षा यशानेच अधिक मुर्दाड बनतात पण रावसाहेब त्याला अपवाद होते. ‘दूधभात’ चित्रपटाची कथा कै. राम गबाळे आणि ‘पुलं’ रावसाहेबांच्या बंगल्यात लिहीत होते तेव्हाची रावसाहेबांची घालमेल, भाबडेपणा, निष्पाप वृत्ती आणि निरागसता हे सगळे ‘पुलं’च्या शब्दात पुन्हा पुन्हा ऐकावे इतके सुंदर आहे. काही वर्षाच्या सहवासानंतर ‘पुलं’ बेळगाव सोडणार हे समजल्यावर अतिशय दु:खी होऊनही ते दु:ख दाबून ठेवून ‘पुलं’ निघाल्यावर त्यांना ‘कशाला आला होता र बेळगावात?’ असे आपल्या बेळगावी सुरात विचारून ऐकणा-याचे काळीज चिरणारे रावसाहेबच! रावसाहेब ऐकताना त्यांच्यातील एक-एक पैलू ‘पुलं’नी असा काही उलगडत नेला आहे की, आपण त्यात गुंतून जातो.

रावसाहेबांच्या मैफलीत येणा-या एकूण एक व्यक्ती आपल्या ओळखीच्या होतातच पण त्या मैफलीत आपण कधी हजेरी लावतो तेच कळत नाही. मैफलीतील प्रत्येकाची रावसाहेबांनी आपल्या कानडी ‘टच’मधून मराठीत उडवलेली टोपी ऐकताना हसू आवरता येत नाही. त्यांच्या संवादात मराठीला सणसणीत कानडीचा आघात आणि कानडीला इरसाल मराठीचा साज असे. दर तीन शब्दामागे एक कचकचीत शिवी ठरलेलीच. मग ते नाक्यावरच्या मोचीसोबत बोलत असो वा जिल्ह्याच्या कलेक्टरशी. इतकेच नव्हे तर रावसाहेबांची जिमी नावाचा कुत्रा होता त्यालाही रावसाहेबांच्या शिव्या समजत असत. नाटय़प्रयोगाला गेल्यावर त्यातील सुमार नट पूर्वीच्या गाजलेल्या नटांच्या भूमिका करताना असह्य झालेले आणि पुढे एका नाटय़गीताची चाल बदलताच संतप्त झालेले रावसाहेब त्या नटाला खडसावून विचारणारे रावसाहेब तसेच तबलजी त्यांच्या मनासारखे वाजवत नसल्याने त्याला ‘तबला वाजिवतो की मांडी खाजवतो रे?’ असे खडसावून विचारणारे रावसाहेब! प्रत्येक प्रसंगानुरूप ‘पुलं’नी रावसाहेबांमधील ही सच्चाई, खरेपणा असा काही रंगवला आहे की रावसाहेब संपूच नये, ऐकतच राहावे असे वाटते आणि म्हणून एकदा-दहा वेळा-शंभर वेळा ऐकूनही रावसाहेब पुन्हा-पुन्हा ऐकतो आपण. आवेग आवरणे हे सभ्यपणाचे लक्षण मानले जाते, ते रावसाहेबांना जमत नसे तरीही रावसाहेब सभ्य होते, शुद्ध होते.

रावसाहेबांना लेडीज सितारिस्टचे फार वेड होते. त्यांच्या गाडीच्या मागेही लेडीज सितारिस्टचे चित्र लावलेले होते. ‘पुलं’ना आयुष्यात हजारो-लाखो माणसे भेटली तरी त्यांना पहिल्या भेटीत खिशात टाकणारे रावसाहेबच याची कबुली प्रत्यक्ष ‘पुलं’नीच दिली आहे. ‘पुलं’ स्वत:बरोबरच रावसाहेबांना अजरामर करून गेले. आपले भाग्य थोर म्हणून ‘पुलं’च्या या मातीत आपण जन्म घेतला. शेवटी ‘पुलं’ म्हणतात ना तेच खरे, ‘देवाने आमचे लहानशे जीवन समृद्ध करायला दिलेल्या या देणग्या, न मागता दिल्या आणि न सांगता परत नेल्या!’

मनमोहन रो. रोगे
(मोबाईल – ९८६९१८०९५८)
प्रहार
१७ नोव्हेंबर २०१९

0 प्रतिक्रिया: