Monday, June 27, 2016

पु.लं.च्या सहवासात - आरती नाफडे

सह म्हणजे बरोबर व वास म्हणजे असणे वा राहणे. पु. ल. या शब्दाची वा नावाची जादूच अशी आहे की, सर्वार्थाने आपण त्यांंच्या सतत सहवासात आहोत. पुलंना जाऊन बराच काळ लोटला म्हणजे अख्खी पंधरा वर्षे. पण, त्यांचा वास आपल्यातच म्हणजे मनात व जनात कायम आहे. पुलंचा सहवास म्हणजे अर्थात त्यांचे साहित्य. त्यांच्या साहित्य-सहवासातूनच मिळणारा आनंद आम जनतेच्या हक्काचा.

मधू गानू यांच्या ‘जवळून पाहिलेले पु. ल.’ या लेखातील वाक्य फार मार्मिक आहे. ते म्हणतात- पुलंच्या सहवासात त्यांना जवळून पाहिले की, त्यांचे ‘भाई’ होतात. या भाई नावाची जादू तर खासच आहे. अशा भाईंना साहित्याच्या माध्यमातून जवळून बघितले की त्यांचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, मार्गदर्शन सगळं काही प्राप्त होतं.
पुलंविषयी खूप व खूपदा लिहून झालं असलं, तरी त्यांच्या साहित्य-सहवासात एखादा नवीन विचार जुनाच, पण नव्याने जाणवत असलेला पुन्हा गवसतो व नवीन काहीतरी स्फूर्ती देऊन जातो.

भाईंचा सहवास त्यांच्या पत्रातून अनुभवणे, हाही एक वेगळाच आनंद आहे. आता लुप्त होत जाणारी पत्रलेखनाची कला. त्यातील कलात्मकता व भावविश्‍व नाहीसे होत असताना पुलंची पत्रं गार हवेच्या झुळुकीसारखी मनाला आनंदित करतात.

पुलंच्या पत्रांचा सहवास म्हणजे समाजप्रबोधन आहे. त्यांच्या पत्रातील विषय सर्वस्पर्शी आहेत. शिवाय त्यांची पत्रं अतिशय बोलकी असल्याने एक नवउत्साह व नवदृष्टी वाचकाला अनुभवायला येते.

पुलंच्या मनातील विचार प्रत्यक्ष साहित्यकृतीत येतात, तेव्हा प्रथम त्यांच्या पत्रांचा सहवास येतो मग साहित्याचा. त्यांच्या, परदेशातील अनेक पत्रांतून त्यांनी भेटी दिलेल्या स्थळांची सुंदर वर्णने आहेत. त्यांच्या तिन्ही प्रवासवर्णनांच्या पुस्तकातून- ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’, ‘जावे त्यांच्या देशा’ यातून ती आपल्याला वाचायला मिळतात.
लेखकाच्या मनातील विचार प्रकर्षाने अनुभवनिष्ठ व डोक्यात सतत स्थिर असतात. पुढे ते साहित्याचं वलय घेऊन जेव्हा पुढ्यात येतात, व्यक्त होतात तेव्हा त्यांचे संदर्भ लागतात. १९५२-५३ साली पुलं बेगम अख्तर यांना भेटायला रामूभय्या दाते यांच्याबरोबर गेले होते. त्या वेळी त्यांनी लिहिलेल्या पत्रात शिवपुरीच्या जंगलाचे सुंदर वर्णन आहे. पुढे ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटक आले आणि त्यात काकाजीच्या रूपाने रामूभय्या दिसले आणि काकाजींच्या तोंडी जंगलाचे वर्णन.

जगाला भरभरून आनंद देणारा चॅप्लिन हे पुलंचं आवडतं व्यक्तिमत्त्व होतं. १४-९-७२ त्या पत्रात ते लिहितात, व्हेनिसला चित्रपट महोत्सव होता. तिथे ‘सेंट मार्कस्’ नावाचा भव्य व सुंदर चौक होता. तिथे आम जनतेला महोत्सवातील चित्रपट मोफत दाखवत. पुलं तिथे गेले. त्या रात्री त्यांना चॅप्लिनचा ‘लळींू श्रळसहींी’ चित्रपट दाखवणार होते आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्या रात्री स्वतः चॅप्लिन मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते! पुलंची चॅप्लिनला पाहण्याची इच्छा अशी पूर्ण झाली. पुलंना आनंदयात्री म्हणून आपण सगळे ओळखतो. त्यांना चॅप्लिनच्या दर्शनाने झालेला आनंद वाचकांसाठी लाखमोलाचा आहे. जो पत्रातून प्रत्ययास आला.
पुलंचा पत्ररूपी सहवास लाभलेले मित्र व मित्रांचा गोतावळा ज्या गावी ते जात तिथे जमत असे. यावरून पत्रसहवासाने दोन व्यक्तींमधला स्नेहभाव वाढतो. आपुलकीची भावना निर्माण होेते. मात्र, त्यासाठी सहवासातील सारे आनंदाचे क्षण न विसरता जपावे लागतात. २९ सप्टेंबर १९७५ च्या भुवनेश्‍वरहून लिहिलेल्या पत्रातून त्यांच्या मित्रपरिवाराची व्याप्ती लक्षात येते. पुलंच्या मनातील निसर्गप्रेम त्यांच्या पत्रातील सहवासातून मनाला भावते. निसर्गाच्या विपुलतेचं मनोहारी वर्णन ते करतात. त्याच निसर्गाचं रौद्ररूप धारण केलेले वर्णन मनाला स्पर्शून जातं. शांतिनिकेतनच्या तपोवनात त्यांच्यातील सुप्त निसर्गप्रेम प्रकट झाले. वृक्षराजी आणि पुष्पसृष्टी त्यांना खर्‍या बंधुप्रत भासली.

शांतिनिकेतनातून लिहिलेल्या पत्रात वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी बंगाली शिकायचे ठरवले. त्यासाठी शांतिनिकेतनमध्ये जाऊन राहिले. ते पत्रात लिहितात, बंगाली वाचता येऊ लागल्याने अलिबाबाच्या शिळेची गुहा उघडायचा मंत्र सापडल्यासारखे झाले आहे. नवीन भाषा शिकायला वयाची अट नाही, फक्त नवीन काहीही शिकायची इच्छा मात्र पाहिजे.

मधू गानू हे पुलंच्या घरच्या मंडळींसारखे. त्यांनी पुलंबरोबर प्रवासपण केलेला. ते म्हणतात, भाईबरोबरच्या प्रवासातील आनंदासारखाच प्रवासातल्या भाईंच्या पत्रातून मिळणारा आनंद वेगळा असतो. त्यांना पुलंची मोजकीच पत्रे आलेली. मधू गानू आपल्या लेखात पुलंच्या दोन पत्रांविषयी विशेषत्वाने उल्लेख करतात. ज्यात त्यांना पुलंचे प्रेम व काळजी दोन्ही भावना प्रतीत झाल्या. जीवनाबद्दलची एक वेगळी दृष्टी भाईंनी मला दिली, असा उल्लेख पत्रात आहे.

पत्राचा संदर्भ असा- मधू गानू यांना १९७४ साली त्यांच्या कंपनीतर्फे दुबईला जाऊन राहण्याची संधी आली होती. पण, जीवनात योग्य काय व अयोग्य काय, हे सांगणारी व्यक्ती लाभणं हे फार मोलाचं आहे. भाईंनी तेव्हा पत्रात त्यांना लिहिलं की, तुझी बदली लंडन किंवा पॅरिसला झाली असती तर काही सांगण्याचा प्रश्‍नच नव्हता. पण ज्या शहरात पैसा हे एकमेव लक्ष्य आहे व तो वैध आणि अवैध मार्गाने मिळवला जातो अशा एका केवळ ‘वासनाखंडात’ तुला बदली निमित्ताने जावे लागत आहे, हे मनाला पटत नाही व योग्यपण वाटत नाही. पैसा या गोष्टीची आवश्यकता असली तरी तुला त्याचा मोह नाही हे मी जाणतो. त्यामुळे विचारपूर्वक निर्णयाचे अवलोकन कर व दुबईला जाण्याचा मार्ग धरू नको.

मधू गानू यांनी भाईंचा उपदेश प्रमाण मानला व ते गेले नाहीत. ते पुढे म्हणतात, भाईंच्या पत्रातून वेगळी जीवनदृष्टी प्राप्त झाली.

दुसर्‍या पत्रात मधू गानू चिडून सुनीतावहिनींना पत्र लिहितात. त्यावर पु.लं.नी त्यांना लिहिलेल पत्र, हे जरी त्यांना उद्देशून होते तरी त्यातला उपदेश प्रत्येक रागीट व शीघ्रकोपी माणसाने मनन व चिंतन करून ठेवण्यासारखा आहे.

पु.ल. पत्रात लिहितात- जीवनात आपल्याला जे हवे ते सर्व मिळतेच असे नाही. शीघ्रकोपी माणसांचे बाबतीत समजुतीच्या घोटाळ्याने अतिरेक होतो व त्यांचेच बाबतीत नेमके घोटाळे होतात. माणसातला अनावरपणा एकूणच चांगला नाही. माणसाला आवरते घेता आले पाहिजे व महत्त्वाचे म्हणजे आपल्या माणसांना समजून घेता आले पाहिजे.

आपल्या विचारशक्तीचा ताबा रागाच्या स्वाधीन केला, तर प्रत्येक कृती विपरीत दिसायला लागते. मग माणसातील सहानुभूती, समजूतदारपणा, विचार करण्याची शक्तीच नाहीशी होते. आपल्या जीवनात परिचित किंवा मित्र, आप्त वगैरे खूप असतात. पण, स्नेहबंधने फार नसतात. दुर्मिळ नाती कुठल्यातरी पूर्व योगाने जमली असतात. ती धरून राहायचं असेल, तर राग, क्रोध यावर ताबा हवाच व मुख्य, आततायी वृत्ती सोडायला हवी.
त्या पत्रातील पु.लं.चं एक वाक्य मनाला चिकटणारं आहे. ते म्हणतात- हसूनखेळून आयुष्यातली दुःखे कमी करीत जगण्याची संधी असताना आपणच आपली आयुष्यं रागाने मलिन करीत असतो. मुलं रागावली की आपलं खेळणंच मोडून टाकतात. त्यासारखे आपले स्नेहबंध मोडून टाकून चालत नसतं. त्यातून जीवनातला आनंद घेण्याचा खिलाडू वृत्तीचाच लोप होतो. ती वृत्ती गेली की सारेच गेले.

पु.लं.नी जीवनभर जपला तो आनंद कसा टिकवून ठेवता येईल, याची गुरुकिल्लीच या पत्रांद्वारे आपल्या हातात दिली. आपण ही जिवापाड जपायचा प्रयत्न करू या...

आरती नाफडे
२६ जून २०१६

Monday, June 13, 2016

एक होता विदुषक

हा विदुषक जर आज हयात असता तर त्याने ९६ वर्षे पुरी केली असती. १५ वर्षापूर्वी अवघ्या महाराष्ट्राला हसवणाऱ्या आवाजाने अखेरचा श्वास घेतला. प्रयाग चे अथक परिश्रम निकामी ठरले. मी त्या काळी मुंबईला असे. अखेरचा निरोप देण्यासाठी डेक्कन वरचा माणसांचा महापूर पेपरमध्ये पहिला. त्या गुरुतुल्य विदुषकाची प्रत्यक्षात भेट झाली नाही ह्याची सदैव हुरहूर राहील. त्यामुळे जवळच्यांसाठी ते भाई असतील, काहींसाठी पि. एल., पण आमच्यासाठी फक्त ‘पुलं’ राहिले.
माझे 'पुलं' संस्कार वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षा पासून सुरु झाले. आजुबाजू ला सतत कानी येई - पुलंचे पुस्तक, पुलंचे गाणे, पुलंची पेटी, पुलंची क्यासेट. माझ्या इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या बाल मनाला वाटले कि ह्या माणसाचे नाव पु. लं. देशपांडे आहे, आणि तसे मी उच्चारूही लागलो. नंतर मला समजवण्यात आले की 'ल' लक्ष्मण चा, ‘लं’केचा नव्हे. असामी आसामी चे पुस्तकाचे शीर्षक वाचल्यावर मला वाटले कि हे एक आसामी (आसाम मध्ये राहणारा) माणसाबद्दल असणार. त्या वेळी मी ते वाचायची हिम्मतही नाही केली. पितृकृपेने घरात पुलंची अनेक पुस्तके येत गेली, पण काही वाचायचा योग नाही आला. खरं तर हे आधीचं वाक्य लिहिताना जरा बरं दिसावं म्हणून लिहिले. पुलं काय आहेत ह्याची तेव्हा अक्कलच नव्हती. पण योग आला नाही म्हणलं कि कसं भारदस्त वाटतं. त्या नंतर एकदा गणपतीत टीव्हीवर "वाऱ्यावरची वरात" दाखवलं गेलं. त्यातला नाट्याविष्कार फार काही समजला नाही परंतु हास्याच्या सर्वोच्य स्थानावर अलगदपणे घेऊन घेणाऱ्या ह्या बादशाहचा जवळून परिचय झाला. पुढे कधीतरी विजया मेहतांनी ल्यामिंगटन रोड वरून पुलंबरोबर वरातीच्या तालमीला जातानाच्या उत्साहाचे वर्णन ऐकले, तेव्हा त्याची नशा काय असेल ह्याची कल्पना आली.

माझ्या किशोर अवस्थेत आणि पुलं हयात असताना माझी पोच असामी आसामी, पुलं एक साठवण, आणि क्यासेट मधल्या पुलंपर्यंत झाली. आमच्या शेजारच्या घाणेकरांनी जेव्हा मला "बहुरूपी पुलं" ऐकायला बोलावले, तेव्हा मी साफ नकार दिला होता . पुलंचे पेटीवादन ऐकणे ही कल्पनासुद्धा मला मान्य नव्हती. पुलं म्हणजे हसणे. त्यामुळे आल्यागेल्यांवर छाप पडावी म्हणून त्यांना असामी ऐकवणे, साठवण मधले मथळे ऐकवणे, हे कार्य सुरु केले. शाळेत असताना सदु आणि दादू चे नाटक सुचवून त्यात काम सुद्धा केले.

चाळीचा आणि व्यक्ती आणि वल्लीचा परिचय तसा नंतरचा काळ. चाळ तर आधी ध्वनी रूपातच बघितली. अपूर्वाई, पूर्वरंग, जेवे त्यांच्या देशा, हसवणूक, खोगीरभरती आजूबाजूला असून फक्त बघत होतो. नंतर कामानिमित्त एक वर्ष डोंबिवली ला गेलो असताना असामी नीट वाचलं. त्यातला वाचनातला एक प्रसंग आठवतो. पार्ल्याच्या मावशी चे घर शोधात असताना पुलंना एक म्हातारे ग्रहस्त भेटतात आणि त्यांचा पुलंच्या कुटुंबाशी भर रस्त्यात संवाद सुरु होतो. त्याच संवादात ते आजोबा शंकऱ्या ला विचारतात " काय नाव तुझं बाळ?" आणि शंकऱ्या म्हणतो " छत्रपती शिवाजी महाराज". वास्तविक तो एक पाटी वाचत असतो, पण ते इतक्या मजेशीर पणे लिहिले होते, कि मी अक्षरशः गडबडा लोळून हसत सुटलो. ते पाहून माझ्या त्याकाळचा रूम पार्टनर आनंदकुमारने माझ्याकडे ज्या नजरेने पहिले होते ते मला अजूनही आठवत आहे.

त्यानंतर पुलंची पुस्तके आणि वाचन दोन्ही वाढत गेल्याचे आता स्मरते. पुलंशी नाते वाढत चालले असता ज्या माणसाने सगळ्यांना जन्मभर हसवत ठेवलं, त्यानी साऱ्यांच्या डोळ्यात अचानक आसवे उभी केली. दुर्दैवाने पुलं गेल्यानंतर पुलं जास्त उमगले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे नवीन पैलू समोर येऊ लागले.

बहुरूपी पुलं ऐकण्यासाठी आता धडपडू लागलो. त्यांची भाषणे ऐकण्याचा सपाटा सुरु केला. मित्रहो, श्रोतेहो, रसिकहो, गणगोत, मैत्र, उरलंसुरलं, शांतीवन मध्ये नव नवीन पुलं पाहायला मिळाले, आणि लक्षात आले कि ह्या माणसाचा विस्तार केवढा मोठा आहे. पुलंच्या विचारांचा प्रभाव दैनंदिन जगण्यावर आपसूक पडू लागला. पुस्तकांची पारायणे होऊ लागली. प्रत्येक वेळेस नवीन बोध होऊ लागला. चाळीचे चिंतन मनात कोरले गेले. असामी आसामी मधला " In tune with the tune" लिहिणाऱ्या इसमाचे पहिले वाक्य " गुरुदेवांना बरं का साहेब, सगळे सारखे" आणि त्याचेच शेवटचे वाक्य " पण गुरूदेवांचा बहुबल आहे, सगळीकडे वशिलेबाजी आहे साहेब" ह्यातला मार्मिकपणा दिसू लागला. गजा खोत आणि सखाराम गटणे सोडले तर, प्रत्येक व्यक्तीचा (किंवा वल्लीचा) आत्मविश्वास प्रखरपणे समोर येऊ लागला. एक शुन्य मी ने एक वेगळ्या पुलंचे दर्शन घडवले. माणसातल्या माणूसपणाचे दर्शन झाले. तात्पर्य काय, मी पुलकित झालो.
पुलंचे बालगंधर्वांवर झालेले भाषण ऐकून खरंतर नाट्यसंगीत आणि अभिजात संगीताबद्दल ओढ अधिक तीव्र वाटू लागली. जिथे संगीत तिथे पुलं हे समीकरण कळू लागले. इंद्रायणी काठी कसं घडलं ते कळलं, केसरबाई कशा प्रेमाने फटकारायच्या ते समजले, आणि बेगम अख्तर कशा बेहोश होवून गायच्या ते उमजले. पुलं - वसंतरावांची दोस्ती दिसली, भीमसेन ची पुलंच्या घरची पुण्यातली पहिली मैफिल दिसली आणि नारायणराव बालगंधर्वांवरची भक्ती दिसली. मल्लिकार्जुन आणि माणिक वर्मांचा परिचय झाला, वझेबुवांचा कष्टाचा इतिहास नजरे समोर आला आणि अब्दुल करीम खांसाहेबांची ‘ओडियन’ ची " पिया बिन" कानी घुमू लागली. पुष्प पराग सुगंधित मधील सुद्ध मध्यम किती सूक्ष्म रीतीने लागत आहे हे धुंडू लागलो आणी कुमार गंधर्वांची रामू भैय्या दात्यांकडे मैफील चालू आहे, भीमपलास चालू आहे, पुलं पेटीवर आहेत आणि मी समोर बसलो आहे असा जागेपणी भास होऊ लागला.
                       
कवितांच्या आनंद यात्रेत बुडून आयुषभर पती पत्नीने एवढे समाज कार्य आणि दान धर्म केला पण कुठेही वाच्यता नाही केली. म्हणूनच वाटते हा विदुषक नव्हता, होता एक राजा आणि त्याची होती एक आनंदाची अद्भूत नगरी, जणू काय - सा रम्या नगरी महान्स नृपतिः सामन्तचक्रं च तत्…. गडकऱ्यांनी ‘राजसन्यास’ मध्ये साबाजीच्या च्या तोंडी वाक्य घातले आहे. " थोरले महाराज जाऊन आज इतके वर्षे झाली पण त्यांच्या नावाची नशा काही उतरत नाही". अशीच पुलंच्या नावाची नशा काही अजून उतरत नाही. त्यांच्या साठाव्या वाढदिवसाला त्यांनी सांगितले होते कि जर कधी त्यांचा पुतळा बांधला गेला तर त्या खाली एवढेच लिहावे - ह्या माणसाने आम्हाला हसवले. तर मी असे लिहीन - ह्या माणसाने आम्हाला नुसते हसवलेच नाही, तर घडवले.!! पुलं म्हणाले होते की कोकणातल्या माणसांमध्ये कोकणातल्या फणसासारखा खूप खूप पिकल्या शिवाय गोडवा येत नाही. पण काही काही लोकांमध्ये तसा गोडवा त्यांच्या पाश्च्यातही अवीट असाच राहतो.

-- अभिताभ दिलीप होनप
ahonap@gmail.com
८-११-२०१५

Friday, June 10, 2016

एक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.

माझे तारुण्य जन्माला आले ते कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याच्या आकाशात सोडलेल्या 'विशाखा' नक्षत्रावर. कवितेने सुरांशी घटस्फोट घेतला नव्हता; त्या जमान्यात माझी कवितेशी मैत्री झाली. गळयात गळा घालणारी दाट मैत्री. त्या काळात रविकिरण मंडळातले गिरीश, यशवंत, विठ्ठलराव घाटे शेकडो श्रोते तन्मयतेने ऐकत असत. श्रोत्यांची संख्या शेकडोंच्या हिशोबात असल्यामुळे कवितेच्या चिकित्सेला जागा नव्हती. यशवंतरावांची 'आई' ऐकून माणसे डोळे टिपीत. गिरीशांनी 'आणि पुशिली लोचने डॉक्टराने' म्हटली की, ऐकणारेही डोळे पुशीत. संजीवनीबाईंचा सूर कानी पडला की,मने तृप्त होत. गोकुळीच्या कान्ह्यानेही वेड लावले होते. ते सारे गोड होते. जरा गोड नव्हे, गोडच गोड आहे की काय अशी शंकाही ओठावर नव्याने फुलणार्‍या मिशीसारखी उगवायला लागली होती. तेवढ्यात अत्रे यांची 'झेंडूची फुले' आली आणि गोड कुठले आणि गुळचट कुठले ते कळायला लागले. चांदरातीची माया पसरुन काणेकरच त्या चांदरातीच्या वातावरणातून बाहेर पडून 'आकाशातील पोलिस' ला जाब विचारु लागले होते. ना.घ. आणि आ.रा. देशपांड्यांची गाणी तबकड्यांवर आली होती. पण कवी आणि श्रोता यांच्यामध्ये ती गीते गाणारे गायक आणि गायिका येत होते.

कोलाहलातून माझे तारू माझा स्वतःचा सूर शोधीत होते किंवा सुसंवादी सुरांची सोबत शोधीत होते. ही सोबत घेऊन कुसुमाग्रज आले. माझ्या तारुण्यातला कवी मला सापडला. सांगाती भेटला. तिथून पुढील वर्षे, पुढले सारे दिवस हे विशाखाचे दिवस. या काळात प्रेम केले ते विशाखातल्या ओळींनी प्रेमपत्रे सजवीत. मनातल्या त्वेषाला 'कशास आई भिजवीसी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल' सारख्या ओळींनी वाट फोडली. भोवतालच्या घडामोडींचे संस्कार ज्यांच्या ज्यांच्या मनावर या काळात जाणतेपणाने उमटत होते त्यांचे त्या यौवनकाळातले उद्गाते कुसुमाग्रज होते. कुसुमाग्रज आमचे हीरो नव्हते. ते आमच्यातलेच एक होते. माझ्या अंत:करणातल्या स्वरकोषात जसे बालगंधर्व गातच असतात तसे कुसुमाग्रज कविता म्हणतच नांदत होते. आमच्या जाणिवांना वाचा फुटायची ती त्यांच्या काव्यपंक्तीतूनच.
हा कवी आम्हाला कुठल्याही काव्यगायनाच्या समारंभात व्यासपीठावरुन भेटला नाही. हा कवी कुठल्याही उत्सवात काव्यगायन करीत नव्हता. किंबहुना आजही कुसुमाग्रज आपल्या आयत्या वेळेच्या अनुपस्थितीविषयीच अधिक प्रसिद्ध आहेत. कुसुमाग्रजांनी जणू काय अदृश्य राहण्याचे निराळेच कोकिळाव्रत घेतले होते.

गडकरी, बालकवी आणि केशवसुत या तिन्ही कविश्रेष्ठांच्या संस्कारांचे सौष्ठव घेतलेली परंतु ३५ ते ४२ या कालखंडातले तरुणांच्या मनावरचे नवे संस्कार शोधून फुललेली ही कविता होती. तिची जवळीक तत्कालीन तरुण मनांना अधिक वाटली. कारण ती वाचताना मला कविप्रतिभा असती तर मी हेच आणि असेच सांगितले असते, असे त्यांना वाटत होते. मग सांगण्याची ती उर्मी पारतंत्र्याविषयक वाटणार्‍या संतापाविषयी असो की प्रेयसीविषयी वाटणार्‍या ओढीची असो.
त्या काळात कुसुमाग्रजांची 'स्वप्नाची समाप्ती' ही कविता आली. गोदातीराच्या दिशेने सावरकर, गोविदांनंतर पुन्हा एकदा तेजाची गंगा वाहू लागली.

"प्रकाशाच्या पावलांची चाहूल ये कानावर
ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर"

असे सांगत एक कवी आला. आपल्या प्रेयसीला
‘काढ सखे, गळ्यातील |
तुझे चांदण्यांचे हात |

'क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत’म्हणणारा,
रात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल पाहणारा,
त्या काळाचा वैतालिक होऊन उभा राहिला.

हा कवी प्रेमासाठी झुरणारा नव्हता. उसासे टाकणारा नव्हता. त्या प्रेमात प्रेयसीच्या मिठीत क्षण क्षण फुलणारी स्वप्ने होती आणि या स्वप्नांची समाप्ती कधी होते, नव्हे ती होणे अटळ कसे आहे याची जाण होती. 'बी' कवींनी एका ठिकाणी नव्या मराठी कवितेच्या नव्या उमेदीच्या नित्य जिव्हाळ्याच्या अनेक खुणा आहेत, असे म्हटले आहे. कुसुमाग्रजांनी आमच्या पिढीचे हे नवे जिव्हाळे आणि नव्या उमेदी ओळ्खल्या. कुठल्याही तबकडीचा किंवा काव्यगायनाचा आधार नसतानाही नव्या रसिक तरुण पिढीत कुसुमाग्रजांची कविता. त्या कवितेला ओज होते, परंतु खरखरीतपणा नव्हता. नव्या युगाच्या नव्या जाणिवांनी सधन झालेली ही कविता पण तिने कुठेही आपले कवितापण सोडले नव्हते.

कुसुमाग्रजांच्या कवितेने स्वप्नांची समाप्ती दाखवली, पण जीवनातल्या स्वप्नांची किंमत उतरवली जात नाही. त्यांनी उत्साहाच्या भरात शृंगाराचीच अवहेलना केली नाही. त्यांनी अवहेलना केली ती दुर्बलांच्या शृंगाराची. कारण तो शृंगारच नसतो. म्हणून ती एक निसर्गाने दिलेल्या अलौकिक वरदानाची दुबळ्या इंद्रियात होणारी शापावस्था असते. तिथे शृंगारदेखील निस्संग होऊन साधलेला नसतो. जीवनात रणभूमीसारखी रतिशय्येवरसुद्धा झपूर्झाची अवस्था ही समर्थ देह आणि समर्थ मनाला साधलेली सिद्धी असते. त्या अवस्थेला कुसुमाग्रज 'वेड' हा साधा शब्द वापरतात.

'होते म्हणू स्वप्न एक, एक रात्री पाहिलेले
होते म्हणू वेड एक, एक रात्र राहिलेले'

असे एका रात्रीचे का होईना, पण वेड लागण्याचे भाग्य त्यांनी मोलाचे मानले. खर्‍या अर्थाने पृथ्वीमोलाचे मानले. पृथ्वीच्या प्रेमगीतातील पृथ्वी ही त्या युगाची नायिका होती. त्यागाचे अनेक स्थंडिल पेटले होते. त्यात जीवितांची आहुती देण्यासाठी अनेक भास्करांना आपल्या प्रेयसीचे आपल्या गळ्यात पडलेले चांदण्याचे हात दूर करावे लागले होते. अशा भास्करावर प्रेम करणार्‍या प्रेमिकांनीही त्या पृथ्वीसारखेच प्रेम केले होते. हे अलिंगन आपल्याला भस्मसात करील याची खात्री असूनही केले होते. निरनिराळ्या राजकीय पक्षांत दीपज्योतीवर झेपावणार्‍या पतंगासारखे आयुष्य झोकून दिलेले तरुण आजूबाजूला दिसत होते. कपाळी मुंडावळ्या बांधलेल्या अवस्थेत ब्रिटिशांच्या फौजदारांनी वरांना चतुर्भुज करुन न्यावे आणि त्यांच्या वधूंनी डोळे कोरडे ठेवून ते पाहावे अशा घटना घडत होत्या. नव्या संसाराची सुरुवात डाळमुरमुर्‍याच्या भत्त्यावर करणारी आणि देशासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवताना प्रेमाचे मोल कमी न मानणारी जोडपी होती. अशा एखाद्या प्रेयसीला आपल्या भावी गृहस्थापनेच्या अस्थिरतेविषयी कोणी प्रियकर 'सावधान' असा इशारा देऊ लागला तर तिच्या ओठी 'नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे' ह्याशिवाय दुसरी ओळ आली असेल? छ्त्तीस ते बेचाळीस या सहा वर्षांच्या काळातले तरुण आणि तरुणी कुसुमाग्रजांच्या कवितेत बोलू लागले. त्यांना प्रिय आणि आदर्श वाटणार्‍या अनुभवांची सारी चित्रे त्यांच्यापुढे कुसुमाग्रजांनी रंगविली. त्या चित्रात त्या काळातल्या तरुणांच्या आशाआकांक्षांचे कालसापेक्ष दर्शन होतेच पण त्याबरोबर काळावर मात करुन जाणारी चिरंतन सौंदर्याने नटवलेली अनेक चित्रे होती.

'विशाखे'त अशी असंख्य मोहक चित्रे आहेत तर काही रुधिरात रंगलेली. अमरशेख आपल्या पल्लेदार आवाजात 'सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते' म्हणताना त्या मैदानामागल्या क्षितिजाचा पट होऊन ते दृश्य हजारो डोळ्यांपुढे उभे राहायचे. काही काही ओळींनी तर माझ्या मनःपटलावर त्यावेळी त्याकाळी उभी केलेली चित्रे आज त्याच ताज्या ओलेपणाने टिकून आहेत. प्रवासात कुठल्यातरी डाक बंगल्यात रात्रीचा आसरा घेतलेला असतो. पहाटे जाग येते. अंगणातल्या वृक्षांतून पाखरे भर्रकन चारापाण्याला उडून जातात. आणि एकदम 'सोन्याच्या दर्यात गल्बते जणु गोजिरवाणी | झाला उषःकाल राणी' या ओळी उमटतात.

कुसुमाग्रजांच्या प्रतिभेला त्या काळातल्या समीक्षकांनी धगधगत्या यज्ञातून प्रकटणार्‍या असुरसंहारिणी दुर्गेच्या स्वरुपातच पाहिले. वास्तविक, ती उमेसारखी विविध रूपधारिणी आहे. तिला क्रांतिकारकांनी केलेल्या सर्वस्वाच्या होमाइतकीच 'माजघरातल्या मंद दिव्याच्या वातीची ओढ' आहे. जीवित हे समुद्रासारखे आहे ते केवळ सुंदर नाही आणि भीषण नाही, ते तिला ठाऊक आहे. जीवनाचा कुंभ हाती देणार्‍या कुंभाराची चौकशी करण्यात आयुष्य दवडण्यापेक्षा 'आमंत्री बाहू पसरुन इकडे ही यक्षकन्या ही गुणी' म्हणणारे कुसुमाग्रज जीवनाला एकाच सुराने आळवीत बसले नाहीत. इथेच त्यांच्या प्रतिभेला लाभलेले चिरतारुण्य आहे. मराठी कवितेत कितीतरी नवे संप्रदाय आले. खूप भूकंप झाले. स्त्रीचे स्त्रीत्व कशात आहे हा जसा आता नव्या जगात वादाचा मुद्दा झाला आहे तसाच कवितेतले काव्य कशात आहे हाही झाला आहे. हे होणे अपरिहार्य आहे. दुसर्‍या महायुद्धाने एक-दोन देशांना किंवा खंडांनाच नव्हे तर सार्‍या मानवी जीवनाला मुळातूनच हादरे दिले आहेत. धर्म, नीती, कुटुंब, शील यात या सार्‍या मूल्यांची कठोर तपासणी सुरु झाली आहे. अणुबॉम्बपेक्षाही हा धक्का मोठा आहे. साहजिकच हा धक्का सतत नवनिर्मितीच्या चिंतनात असणार्‍या कवीला आधी आणि अधिक जाणवतो. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात कुसुमाग्रज म्हणत होते 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल.' स्वातंत्र्याबरोबर तो उषःकाल येईल असा हा आशावाद होता. स्वातंत्र्य येऊन पाव शतक लोटल्यावर त्या रात्रीचा असा गर्भपात का झाला? पण कुसुमाग्रजांनी रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल पाहिला. त्या काळीही एकदा तो उषःकाल झाला की सारे काही छान होईल असला भाबडा आशावाद बाळगून तेही बसले नव्हते. निर्मिती, विध्वंस, त्यातून पुन्हा निर्मिती आणि पुन्हा विध्वंस ह्या निसर्गचक्राची त्यांची जाणीव पक्की होती. कारण त्याच काळात त्यांनी लिहून ठेवले आहे -

'ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती?
वेड्यापरी पूजतो या आम्ही भंगणार्‍या मूर्ती'

मूर्ती भंगतात त्या घडवायच्याच नाहीत हा पळपुट्यांचा विचार झाला. मह्त्त्वाचे असते ते नव्या नव्या मूर्ती घडवण्याचे वेड लावून घेणे. अकस्मात घडलेल्या जननानंतर अटळ मरणाकडे जाणारी वाट ही चालताना सुंदर करीत जाणे, त्या वाटेवरचे सौंदर्य पाहून सोबत चालणार्‍याच्या नजरेला ते आणून देणे, जीवनाचे सारे शहाणपण ज्या वेडापोटी जन्माला येते ती वेडे लावून घेणे. त्यांच्या कवितेत 'वेड' हा शब्द अनेकदा येतो.

१. होते म्हणू वेड एक | एक रात्र राहिलेले

२. उजेडात दिसू वेडे |
आणि ठरु अपराधी
३. हे काय अनामिक आर्त पिसे
४. सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
५. देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार...
६. वेड्याने खोदले प्रचंड मंदिर
७ नंतर सुरु हो वेड्याचे पूजन
८. आणि अंती मृत्यूच्या घासात वेडा सापडे
९. वेडात मराठे वीर दौडले सात..

नाहीतरी शेक्सपीअरने कवी, वेडे आणि प्रेमिक यांची गाठ मारली आहेच. कसले तरी वेड यौवनाचे लक्षण, ती वेडे आणि त्या वेडातील स्वप्ने ओसरली आणि सबुरीचा आणि औचित्याचा फोल विवेक सुरु झाला की यौवनाच्या चक्राची फेरी संपली हे ओळखावे. विशाखाचे दिवस हे कुसुमाग्रजांच्याही वेडाचेच दिवस होते. एकोणीसशे चौतीस ते एकोणचाळीस सालातल्या ह्या कविता कुसुमाग्रजांच्या ऐन पंचविशीतल्या.

वृद्धत्वातही त्यांच्या प्रतिभेचे ताजेपण ओसरलेले नाही. त्यांच्या भावनांना बुद्धीच्या भट्टीतून भाजून निघण्याची सवय आहे. त्यामुळे आजही त्यावर वार्धक्याचा गंज चढू शकत नाही. त्यांनी पुरोगामित्वाचा कुठलाही एकच एक बावटा नाचवला नाही की खांद्यावर आंधळ्या श्रद्धेची पताका वागवली नाही. आजही सतत नवी निर्मिती करणार्‍या कुसुमाग्रजांकडे पाहिले, त्यांच्या सहवासात रात्र जागवण्याचा योग आला म्हणजे वाटते की त्यांच्या विशाखाने उजळलेल्या इतरांचे तारुण्य मागे राहिले तरी कुसुमाग्रजांचे विशाखेचेच दिवस चालू आहेत. त्यांचे नव्या मूर्ती घडविणे थांबले नाही. 'वयपरत्वे' हा शब्द त्यांच्या बाबतीत लावता येत नाही. आधुनिक काव्याचे समीक्षक मर्ढेकरांच्यानंतर मराठीत कवितेने घेतलेल्या वळणाच्या अनुषंगाने काव्याची समीक्षा करीत असतात. पण साठीच्या आसपास असणार्‍या कुसुमाग्रज, बोरकर आणि रेग्यांच्या एकाहत्तर सालात लिहीलेल्या कवितांमधील ताजेपणा त्यांनाही बुचकळ्यात टाकत असावा. तिन्ही तीन तर्‍हेचे वृक्ष. साठ वर्षांपूर्वी आमच्या भाग्याने मराठीच्या प्रांगणात उगवलेले आणि आजही मातीतला रस शोषून फुलायची ताकद असलेले त्याच जोमाने बहरणारे. असले झाड जुने झाले म्हणून त्याच्यावर फुलणारे फूल जुने नसते. आजही कुसुमाग्रजांची कविता अचानक भेटते आणि आमच्यासारख्यांचा आंतरअग्नी क्षणभर फुलवून जाते. हा नाविक आजही 'निर्मित नव क्षितिजे पुढती' म्हणत चालला आहे. आणि म्हणूनच कुसुमाग्रजांना आजही भेटलो तरी वयाचा विसर पडतो. आम्ही विशाखाच्या दिवसात शिरतो.

आज मागे पाहताच कृतार्थ वाटावे अशीच कुसुमाग्रजांची साहित्य-साधना आहे. काव्य, कथा, निबंध, कादंबरी आणि नाटक या क्षेत्रांतही पुढे जाताना त्यांनी मागे सुंदर कुसुमेच ठेवली आहेत. त्यांनी तुडवलेली वाट सुगंधी केली आहे. रंग वैभवाने नटवली आहे.

महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांना कुसुमाग्रज आपले वाटत आहेत. माझ्यासारख्यांना ही आपुलकी अधिक, कारण आमच्या जीवनातल्या वसंतकाळातला हा कोकीळ, आमच्या जीवनातल्या छोट्यामोठ्या वेडाचे हे विशाखाचे दिवस. आजही मनाला त्या दिवसांची ओढ लागली की हात पुस्तकांच्या कपाटातून 'विशाखा' काढतात. जुनी ट्रंक उघडल्यावर त्यातल्या वस्त्रांना बिलगलेल्या वाळ्याचा सुगंध यायचा, तसा जीवनाच्या या जीर्ण होत चाललेल्या वस्त्रांच्या कुठल्या तरी आतआतल्या घडीतून विशाखाच्या दिवसांचा सुगंध दरवळायला लागतो.

- पु.ल.देशपांडे
मुळ स्त्रोत -- http://www.maayboli.com/node/33051