त्यांच्या 'बटाट्याची चाळ' या बहुरूपी कार्यक्रमाचा प्रभाव तर इतका होता की मला तो एक 'चमत्कार' वाटला. एक कलाकार तीन तास प्रेक्षकांना खिळवून कसा काय ठेवू शकतो याचं मला मोठं नवल वाटलं होतं. आपणही असं काही करायला हवं वाटण्याऐवजी, हेच करायला हवं असं वाटलं. आणि मी पुलंचा प्रयोग पुन्हा पुन्हा पाहून आणि 'बटाट्याची चाळ' मधले लेख वाचून त्यातला 'भ्रमण मंडळ' हा भाग चोख पाठांतर करून आमच्या हाऊसिंग कॉलनीच्या गणेशोत्सवात सादर केला. त्याचं कौतुक झालं. माझ्या अंगात उत्साह संचारला! मला वाटलं, आता कोणी सांगितलं, बोलावलं की करून दाखवायला हरकत नाही. 'दाभोळकर ऑप्टिशियन' आमच्या कॉलनीत राहायचे. त्यांच्या दुकानात जाऊन मी पुलंसारखा चष्माही करून घेतला. कॉलनीतल्याच एकदोघांनी मला त्यांच्या ऑफिसच्या वार्षिक समारंभाला हे सादर करायला बोलावलं. मग एकदा आमच्यासमोर राहणाऱ्या एका वकिलांनी मला विचारलं, 'काय रे तू पुलंना भेटलायस का?' 'नाही हो. फार इच्छा आहे. पण कसं जाणार?' 'मग हे त्यांचं भ्रमण मंडळ कसं करतोयस? परवानगी घेतली आहेस?' मला यासाठी परवानगी घ्यायची असते याची कल्पना नव्हती. 'सुनीताबाई केस करतील,' त्यांनी इशारा दिला. माझ्या उत्साहाला तात्काळ ब्रेक लागला. (मी चष्माही परत केला.) पण मग पुलंची भेट झाली, (त्या वयात) स्वप्नवत वाटणारं 'दर्शन' घडलं ते पक्कं आठवतं.

पार्त्याच्या एका सभागृहात श्री. ना. पेंडसे लिखित 'राजेमास्तर' या नाटकाचा पुलंच्या हस्ते मुहूर्त होता. तिथे मला माझ्या बाबांचे मित्र घेऊन गेले. त्यांनी माझ्या संग्रहातली पुलंची पुस्तकं - तोपर्यंत प्रकाशित झालेली सगळीच्या सगळी पाहिली होतीच,
शिवाय पुलंविषयी वर्तमानपत्रात आलेला मजकूर, त्यांची भाषणं या सगळ्याची मी व्यवस्थित कापून वह्यांमध्ये चिकटवलेली कात्रणंही पाहिली होती! (त्यांना ते 'वेड' बघून हसूच फुटलं होतं!) 'पुलंना भेटायचंय तुला? माझे मित्र आहेत ते.' असं त्यांनी म्हटल्यावर मला जवळजवळ हर्षवायूच झाला होता. 'राजेमास्तर'च्या मुहूर्ताच्या वेळी 'दर्शन' झालं! पुलंना पाहिल्याबरोबर वाटलं, आपल्यासमोर जी प्रतिमा होती, तसेच तर हे एरवीही दिसतात की! आनंदी, मिश्किल परफॉर्मर ! त्यांच्या अभिनयाच्या आणि संगीताच्या कर्तृत्वापेक्षा, वक्तृत्वापेक्षा त्यांचं साहित्यच आठवत राहिलं. परिच्छेदच्या परिच्छेद, वाक्यंच्या वाक्यं... विनोद एकापाठोपाठ एक ! कुडाळकरकाकांनी ओळख करून दिली. आता मला तो प्रसंग आठवला की वाटतं, त्यावेळच्या माझ्यात पुलंच्याच 'सखाराम गटणे' या पात्राची लक्षणं दिसत होती की काय? अर्थात मी 'कृत्रिम' किंवा 'छापील' बोलत नव्हतो. काही बोलतच नव्हतो. कुडाळकरकाकाच पुलंना म्हणाले, 'बरं भाई, येतो आम्ही.' पुलंनीच माझा हात हातात घेऊन 'बरं भेटू या हं' म्हटलं.
त्यानंतर काही काळानं आम्ही बऱ्याचदा भेटलो. तालमीत प्रयोगांआधी नाटकांच्या नंतर - त्यांच्या घरी नाट्यगृहांमध्ये. त्या आठवणी आहेतच. पण पहिल्या 'दर्शना'ची आठवण खास आहे.
या मनातल्या प्रतिमेशी बरोबर जुळणाऱ्या व्यक्ती. पण असेही भेटले, जे कल्पनेतल्या रूपाला छेद देणारे होते. प्रत्यक्षातले अगदीच वेगळे. आश्चर्यच वाटावं, चकित व्हावं, अविश्वास वाटावा असे. त्याबद्दल पुढच्या वेळी.
- दिलीप प्रभावळकर
मूळ स्रोत - मुंबई टाइम्स




0 प्रतिक्रिया:
Post a Comment