Monday, November 27, 2017

पुलकित यामिनी - शरद सातफळे

काही माणसे आपल्या कायम स्मरणात राहतात ते त्यांच्या काही वैशिष्ट्यांमुळे. पंडित भीमसेन जोशी त्यांच्या संगीतामुळे, आचार्य अत्रे त्यांच्या विनोदामुळे, प्रभाकर पणशीकर स्मरणात राहतात ते त्यांच्या अष्टावधानी अभिनयामुळे, बाबा आमटे कायम स्मरणात राहतात ते त्यांच्या समाजाभिमुख कार्यामुळे, कुसुमाग्र्ज त्यांच्या कवितेमुळे तर वि. वा. शिरवाडकर त्यांच्या नाटकां मुळे. या साऱ्यांचा सुरेख संगम एकाच ठिकाणी पाहायला मिळतो तो भार्इंचे ठायी.

भाई म्हणजे महाराष्ट्राचे लाडके दैवत पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे! 8 नोव्हेंबरला पुलंचा जन्मदिवस. थोर माणसांच्या जन्मदिनाची नोंद जयंती म्हणून ठेवली जाते. नेत्यांच्या जन्मदिवसाची आठवण शहरभर त्यांची छायाचित्रे लागलीत की होते. मग तो जन्मदिवस पुन्हा एक वर्षासाठी विस्मरणात जातो. मराठीचा एक चोखंदळ वाचकवर्ग आहे. उच्च अभिरूची असलेला मराठी वाचक पु.ल. देशपांड्यांना कधी विसरणार नाही.कारण त्यांचे महाराष्ट्रावर खूप खूप उपकार आहेत. नवीन पिढीतील एका युवा वाचकाने मला विचारले, ‘‘काका तुम्ही पुलंना पाहिलं आहे? तु च्या पिढीने त्यांचे एकपात्री प्रयोग पाहिले आहेत? आम्हाला पु. ल. फक्त वाचून व ऐकूनच माहिती आहेत.’’ त्याला म्हणालो, ‘‘बेटा, आमच्या काळत पु.ल. आमचे साहित्यिक हिरो होते. पु.लं.ची नाटके, एकपात्री
प्रयोग, त्यांचे पेटीवादन आणि त्यांची भाषणे ते जेथे असतील तेथे जाऊन आम्ही पाहिले आहेत, ऐकले आहेत. हे त्या काळात ज्यांनी पाहिलेत त्यांचेही आता अमृतमहोत्सव होत आहेत. पुलंच्या काळात ही सारी नवीन टेक्नॉलॉजी रांगत रांगत येत होती. कॅमेरे, चित्रण बाल्यावस्थेतच होते. त्यामुळे पु.लं.च्या ऐन उमेदीतल्या काळातल्या कार्यक्रमांचं चित्रण किंवा ध्वनिमुद्रण पाहिजे त्या स्वरूपात उपलब्ध नाही. नाही तर तु च्या पिढीला पु.ल. खूप छानसे पाहायला व ऐकायला मिळाले असते.’’

तो युवा वाचक पुढे म्हणाला, ‘‘काका पुलंबद्दल आणखी काही सांगाना.’’

मलाही पुलंबद्दल भरभरून सांगावसं वाटत होतंच. पुलंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे पु.ल. स्मरण अगदी योग्य वाटले. पुढे त्याला मी सांगू लागलो. ‘‘बालका, पु.ल. हे महाराष्ट्राला पडलेले एक सुखद स्वप्न होते. पुलंनी व्यवहारात आणि रंगमंचावर अनेक भूमिका केल्यात. पोटापाण्यासाठी मास्तरकी केली. आकाशवाणीवर नोकरी केली. नुकतीच भारतात आलेली दूरचित्रवाणी त्यांनी चित्रित केली आणि शेवटी परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून लेखन, चित्रपट दिग्दर्शन, संगीत इत्यादी ललित कलांमध्ये त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी काही चित्रपट दिग्दर्शित केले. स्वत: त्या चित्रपटां धून भूमिका केल्यात. त्यातली गाणी बसविली. संगीत दिग्दर्शन केले. फार बारीक तारीखवार तपशील देण्यात काही मौज नाही. मौज ही पुलंना ऐकण्यात, त्यांचा अभिनय पाहण्यात, त्यांनी लिहिलेलं वाचण्यात आहे. सुदैवाने पुलंचे सारे साहित्य महाराष्ट्र सारस्वताने जपून ठेवले आहे. ते तु च्या पिढीला वाचायला मिळेलच. पण, पुलंबद्दलचे किस्से कुठलीही मैफील रंगवू शकतात.माणूस गेला की त्याचे किस्से आख्यायिका होतात. पण, तुला सांगतो पुलंची भाषणे, एकपात्री प्रयोग, त्यांची नाटके यावर त्या काळी रसिकांच्या उड्या पडायच्या. पुलंनी लिहिलेली व्यक्तिचित्रे आपल्या अवतीभवती वावरत आहेत असा भास होतो. चाळीची संस्कृती आता जवळ जवळ संपुष्टात आली आहे. पण, बटाट्याची चाळ आपल्याला त्या काळात घेऊन जाते. त्या काळातली पात्रे, त्यांचे भ्र ण मंडळ, त्यातली सांगितिक चिंतनिका ऐकली की आपणास काहीतरी हरविल्यासारखे वाटते. पुलंची ‘वाऱ्यावरची वरात’ पाहिली की वधूवरांनासुद्धा तिचा हेवा वाटावा इतकी रंजक. पुलंच्या ‘असामी असा मी’मधला बेंबट्या पुलंनी अजरामर करून टाकला.

पुलंनी लिहिलेली व्यक्तिचित्रे कधी रंगभूमीवर उतरली, त्या कथांचं वाचन हा एक आनंददायी प्रवास
असायचा. ‘हसविण्याचा माझा धंदा’ तर छान बिझिनेस करून गेला. पुलंच्या बरोबर सुनीताबाई देशपांडेही साहित्याची उत्कृष्ट जाण असलेल्या कलाकार होत्या. त्यांनी (सुनीताबार्इंनी) ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये छान ठसकेबाज भूमिका केली होती. ‘तुझे आहे तुजपाशी’ या पुलंच्या नाटकांत आणि ‘राजमाता जिजाबाई’ यातील त्यांच्या भूमिका आजही स्मरणात आहे. पुलंची नाटकं त्या काळात खूप गाजली. ‘अंमलदार,’ ‘तुझे आहे तुजपाशी,’ ‘सुंदर मी होणार’ ही त्यातली काही. १९५६ ते १९६६ पर्यंत शाळा-कॉलेजेस स्नेहसंमेंलनां धून व स्पर्धां धून ही नाटके खूप गाजलीत.

पुलंचे चित्रपट त्या काळातले ‘हिट पिक्चर्स’ होते. त्यांचा ‘देवबाप्पा,’ ‘पुढचे पाऊल,’ ‘गुळाचा गणपती’ हे सिनेमे आम्ही शाळकरी पोरे होतो तेव्हा तेव्हा पाहिलेत. ‘गुळाचा गणपती’तला निरागस नाऱ्या म्हणजे स्वत: पु.ल. देशपांडेच होते. पु. ल. देशपांडेंची सारीच पुस्तके खूप छान आहेत. वाचता वाचता हसायला येते. एकटाच कधी वेड्यासारखा हसायला लागतो. पुलंनी गंभीर लिखाणही विनोदी अंगाने केलं आहे. त्यामुळे ते जास्त कुरकुरीत आणि चवदार झालं आहे. बंगाली साहित्यातले सौंदर्य पुलंना शोधायचे होते. बंगाली साहित्याचा पुलंना अभ्यास करावयाचा होता. त्यासाठी पु.ल. स्वत: शांतिनिकेतनमध्ये जाऊन राहिलेत. बंगाली भाषा शिकले आणि त्यांच्या अनुभवातूनच ‘वंगचित्रे’ नावाचे पुस्तक तयार झाले. पुलंची साऱ्या महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रात व्याख्याने झालीत त्याचे सुंदर संकलन करून ठेवले आहे आणि ‘श्रोते हो,’ ‘रसिक हो,’ ‘मित्र हो’ अशी छान पुस्तके जन्माला आलीत.पुलंची ‘पुरचुंडी,’ ‘उरलं सुरलं,’ ‘गोळाबेरीज’ आणि ‘खिल्ली’ ही पुस्तके तुम्ही मिळवा आणि वाचा. विनोद कसा असावा हे त्या पुस्तकांवरून कळेल. विनोदाने गुदगुल्या केल्या पाहिजे, हसविलं पाहिजे. ओरबाडून समोरच्याला दुखविणारा हा विनोद कधीच नसतो. हेटाळणी, एखाद्या व्यंगावरून केलेली टीका समोरच्या व्यक्तीचा दुबळेपणा यातून विनोदनिर्मिती होत असेल तर ती आपली भूल आहे. विनोदाविषयी विषाद निर्माण होईल असे विनोद भार्इंकडून कधीही झाले नाहीत. कुणीही कधी दुखावल्या गेले नाही. पुलंनी त्यांच्या विरोधकांनाही हसविलं आहे, जिंकलं आहे.

बाबा आमट्यांच्या आनंदवनात पु.ल. आले आणि बाबांचे काम पाहून खूप प्रभावित झाले. आनंदवनाला त्यांनी मोठमोठ्या देणग्या दिल्या. तेथे मुक्तांगण निर्माण झाले. पुलंची उपस्थिती असलेले मित्रमेळावे साऱ्या जगात गाजले. आनंदवनात देशविदेशचे पाहुणे यायला लागलेत. पु.ल. स्वत: कलाकार होते, पण त्यांनी इतर लाकारांचा यथोचित सन्मान केला. त्यांच्या कलाकृतीला छान दाद दिली, प्रतिसाद दिला. त्यांचे ‘गणगोत’ खूप मोठे होते. छोट्या रसिक वाचकांच्या पत्रांनाही ते स्वत: लिहून पत्रोत्तर द्यायचे. आनंदवनात एकदा मित्रमेळावा चालू असताना वीज गेली. कंदील-मेणबत्त्या लावून आम्ही सारे पुलंच्या भोवती गोळा झालो. ‘भाई पेटी वाजवा ना,’
किस्से सांगाना,’ म्हणून आग्रह झालेत. पुलंनी छान किस्से सांगायला सुरुवात केली. चित्रपट तयार होत असताना घडलेल्या गमतीजमती, कुठल्या रंगलेल्या मैफलीत झालेला गोंधळ, कुठल्या स्नेहसंमेलनातल्या विनोदी घटना ऐकता ऐकता आणि हसता हसता पुरेवाट झाली. भाई तु च्या युरोप टूरबद्दल सांगाना. त्या वेळी अपूर्वाईचा जन्म झाला होता तरी भार्इंनी सांगितले असे देश मी पाहिले नाही. अरे काय सांगू तुला जिकडे तिकडे क्लिनता (स्वच्छता) आणि माणसं तरी काय सांगू तुला वागण्यात अगदी डिसेंट हो. अशी डिसेंट्री त्रिभुवनात सापडायची नाही. साऱ्यांची सारे किस्से ऐकून हसून हसून मुरकंडी वळली. कुणीतरी भार्इंकडे पुढे पेटी सरकविली. भार्इंचे जादूभरे पेटीवादन सुरू झाले, ‘किती किती सांगू तुला’ वाजवून झाले. टाळ्यांवर टाळ्या. छान छान नाट्यगीते पेटीवरची सुरावट ऐकून कान तृप्त झाले.‘रात्रीचा समय सरूनि होत उष:काल’ हे भार्इंनी वाजवायला घेतलं अन्‌ लाईट आले. अंधारातही दीपवून टाकणारी ही मैफील आम्ही कधीच विसरणार नाही. ही रात्र ‘पुलकित यामिनी’ म्हणून सदैव स्मरणात राहील. भार्इंचा शंभरावा वाढदिवस लवकरच येणार त्याची आपण तयारी करू या आणि पुलंना ‘हॅपी बर्थ डे डीयर भाई’ म्हणून गाऊ या.

शरद सातफळे
तरुण भारत (नागपूर)
०८ नोव्हेंबर २०१७
९४२२१३६०६७


0 प्रतिक्रिया: