Tuesday, March 12, 2024

ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना !

चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांनी लिहिलेली ही कविता. याच कवितेचं नंतर अत्यंत प्रसिद्ध असं गाणंही झालं. ह्रदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेलं हे गीत, आशा भोसले यांनी खरोखरच असं गायलं आहे की ते
स्वरांचे घन येऊन आपल्या मनाला न्हाऊ घालतात प्रत्येक वेळी ऐकताना.

पण मुळात ही कविता आणि ती लिहिण्यामागची पार्श्वभूमी दोन्ही अतिशय उदात्त अशी आहे. एकूणच काव्य, कवी आणि कलाकार या सर्वांसाठीच या कवितेचं स्थान हे पसायदानासारखं आहे. सुनीताबाई देशपांडे यांनीच त्यांच्या 'कवितांजली' ह्या कविता वाचनाच्या कार्यक्रमात ही हकिकत सांगितली होती.

आरती प्रभू यांच्या कविता सुरुवातीला 'सत्यकथा' या मासिकातून प्रसिद्ध होऊ लागल्या आणि साहजिकच ते काव्य अत्यंत लोकप्रिय होऊ लागलं. त्यामुळे 'आरती प्रभू' या नावाला खूप प्रसिद्धी आणि वलय प्राप्त झालं. नेमक्या याच
कारणाने चिं. त्र्य खानोलकरांमधला अत्यंत संवेदनशील असा 'आरती प्रभू' हा कवी खूप अस्वस्थ झाला. त्याच मानसिक घालमेलीतून त्यांनी ही कविता लिहिली. प्रत्येक कवीने, कलाकाराने ज्या कवितेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेऊन मगच स्वतःला कलेच्या स्वाधीन करावं.

"ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना" ... प्रसिद्धी, लोकप्रियता यामुळे कदाचित माझ्या मनात अहंकार निर्माण होईल. आणि त्या अहंकाराने माझं मन मलीन होऊन जाईल, काळवंडून जाईल. अशी भीती, अशी अस्वस्थ करणारी शंका 'आरती प्रभूंच्या' मनात डोकावत होती. म्हणून त्यांनी थेट त्या दयाघनालाच साकडं घातलं की हे दयाघना; तू घनांच्या स्वरूपातून ये आणि माझ्या मनावर बरसून जा.

पण हे बरसणं फक्त भिजण्यासाठी नको... तर तू मला, माझ्या अहंकाराने मलीन झालेल्या मनाला 'न्हाऊ' घाल. आई आपल्या बाळाला न्हाऊमाखू घालते; अंगणात खेळताना, बागडताना, धडपडताना त्या बालकाचे मळलेले अंग धुवून पुसून स्वच्छ करते आणि त्याला त्याचं गोंडस, गोजिरं, निरागस रुप पुन्हा मिळवून देते. तसंच तू घनांमधून , जलधारांमधून थेट माझ्या मनात ये; आणि माझ्या मनावरची ही प्रसिद्धी, वलयामुळे साठलेली अहंकाराची पुटं धुवून टाक. मला पुन्हा एकदा शुद्ध, निर्मळ, निरागस रुप हवं आहे.... म्हणून... "ये रे घना, ये रे घना".

"फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू. नको नको म्हणताना, गंध गेला रानावना" ... 'माझ्या कविता', त्यातून व्यक्त होणाऱ्या माझ्या भावना; या अगदी तरल आहेत, नाजूक आहेत. खरंतर त्या भावना इतक्या हळूवार आहेत की
त्यांना फक्त 'अळुमाळू' याच शब्दात व्यक्त करता येईल. हा अळुमाळू शब्द; ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ओवीमध्ये वापरला आहे. कारण तो नाजूकपणा फक्त स्पर्शाचा भाव नाही; तर ते शुद्धतेचं, पावित्र्याचंही विशेषण आहे.

म्हणून 'आरती प्रभू' म्हणतात की; माझ्या ह्रदयस्थ भावनांमधून उमललेली ही काव्यपुष्पं; ह्या लोकप्रियता, प्रसिद्धी आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अहंकार आदी ऐहिक वाऱ्याने चुरगळून जातील, विस्कटून जातील. आणि मी त्या
काव्यसुमनांना 'नको नको' म्हणतच होतो. मी स्वतःहून कधीच प्रसिद्धीच्या, लोकप्रियतेच्या वाऱ्यालाही उभा राहिलो नाही. पण ... त्या कवितेतील भावफुलांचा गंध ! तो गंध कसा लपवून ठेवू... ! मी माझी ह्रदयस्थ कविता
कुणाच्याही दृष्टीस पडणार नाही याची काळजी घेतली तरीही तो 'गंध' , तो भावगंध सर्वदूर पसरलाच आहे ! मग आता मी काय करू... म्हणूनच ... "ये रे घना, ये रे घना".

"टाकुनिया घरदार, नाचणार नाचणार; नको नको म्हणताना मनमोर भर राना" ... कविता, काव्यउर्मी, काव्योन्मेष, या गोष्टी अशा आहेत की त्यांना कसलंच भान नाही, कसलीच बंधनं नाहीत. स्वयंभू, स्वच्छंदी अशा भावना आहेत या. "नभ मेघांनी आक्रमिले" या अवस्थेत मोर जसे धुंद, मुग्ध होऊन, पिसारा फुलवून नृत्य करणारच. अगदी तसंच एखादी प्रतिभेची श्रावणसर आल्यावर माझ्या मनातले भावमयुर त्यांचा काव्यपिसारा फुलारून नवनिर्मितीच्या रानावनात मुक्त संचार करणारच !

तेव्हा ते माझं काही एक ऐकत नाहीत. आणि मग त्यांच्या या भावमुग्ध अविष्काराने रसिकजनांचं लक्ष आपोआपच वेधून घेतलं जातं. दयाघना... मला भीती वाटते रे... माझ्या या मुक्तमयुरांना कोणी कैदेत तर नाही ठेवणार ना,
काहीतरी व्यावहारिक आमिष दाखवून त्यांचं स्वातंत्र्य हिरावून तर नाही घेणार ना ! म्हणूनच... तू...
"ये रे घना, ये रे घना".

"नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू; बोलावितो सोसाट्याचा वारा मला रसपाना" ... हा कसा पेच निर्माण झाला आहे ! कितीही नको नको म्हटलं तरी तो काव्यगंध रानवाटांनी पसरणारच आहे. शब्दमाधुर्यातून गुंजारव करणारे आर्त सूर एखाद्या वेणूच्या नादलहरींसारखे विहरत, लहरत कानोकानी पोहचणारच आहेत. आणि मग या साऱ्या शब्दलाघवाचा, भावोन्मेषाचा उगम शोधत शोधत तो प्रचंड लोकप्रियतेचा, प्रसिद्धीचा, लोकाभिमुखतेचा वारा ; अनिवार होऊन माझ्या दिशेने येणारच आहे.

त्या सोसाट्याचा वाऱ्यावादळात मी माझी ही काव्यवेल कशी सांभाळू ! त्या सोसाट्याचा वाऱ्याबरोबर जी प्रतिष्ठेची अहंकारमिश्रीत धुळ उडून येईल; ती या डोळ्यांवाटे माझ्या मनापर्यंत पोहचली तर ... काय करू ! माझी फुलं
कोमेजून जातील ना; चुरगळून जातील ना !म्हणूनच... "ये रे घना, ये रे घना; न्हाऊ घाल माझ्या मना"...

मनामध्ये अशी भावकोवळीक असलेला हा 'आर्ततेचा प्रभू' अवघ्या सेहेचाळीस वर्षात स्वतःच त्या दयाघनाला भेटायला निघून गेला. कदाचित स्वतःच्या 'अळुमाळू' भावसुमनांनी त्या प्रतिभेच्या दात्यालाच न्हाऊ घालण्यासाठी
गेला असावा हा 'प्रभू' ... आवाज चांदण्यांचे ... अजूनही ऐकू येतात मात्र इथेच ठेवून गेला... आपल्यासाठी.

रसग्रहण : रोहित कुलकर्णी