Friday, September 30, 2022

भाईंच्या "नव"दुर्गा - (मकरंद सखाराम सावंत)

मुळात असं काही नाहीय, लिहिताना भाईनी हा विचार केला हि नसणार कि लिहित असलेली व्यक्तिरेखा स्त्री आहे कि पुरुष, त्यांच्यातली विसंगती टिपून काढताना भाई नेहमी दाखवून देत होते कि जसे या विसंगतीला जात, धर्म नसतात तसेच लिंग हि नसतं, पण मला आवडलेल्या त्यांच्या साहित्यातल्या नव दुर्गा आणि त्याचं महात्म्य लिहावं असं वाटलं, तोच हा प्रयत्न, अर्थात भाईंनी जी काल्पनिक व्यक्तिचित्र लिहिली त्यातलीच काही मी घेतोय, त्यांनी बयो , हिराबाई याचं व्यक्तिचित्र जे लिहिलं त्या बद्धल नंतर कधी तरी, या लिखाणात असामी असामी, व्यक्ती आणि वल्ली तसेच बटाट्याची चाळ मधल्या व्यक्तिरेखा जास्त येऊ शकतात कारण त्यातली पात्र जास्त वेळ आपल्या सोबत होती आणि जास्त खुलली गेली आहेत तरी , आवडल्यास वाचा नावडल्यास दुर्लक्ष करा, वाईट साहित्य हे विरोधा पेक्षा दुर्लक्षल्याने मरतं. आणि चांगलं तरतं, गाथा सकस असली कि ती बुडवण इंद्रायणीला सुद्धा जमत नाही, तेव्हा सादर आहेत भाईंच्या नव दुर्गा.

१ ) अन्नपूर्णा
असामी असामी मधली धोंडो भिकाजी जोशी यांच्या पत्नी अन्नपूर्णा, आवड - नवऱ्याला उघडा टाकून तंबोऱ्यास कापडं शिवणे, झंपरचंद्रिका च्या नियमित वाचिक, डोक्यावर ग्रंथ घेऊन चालण्याचा अभ्यास, नाटकास गेल्यास पात्रांपेक्षा पडद्यांवर जास्त लक्ष, मुंबईत नक्की माहेर कुठे हे माहित नाही पण पार्ल्यास एक मावशी रहाते. अपत्य - भरपूर. वज्र - कांद्याचं थालीपीठ, ज्याच्या वासाने धोंडोपंतांचं वैराग्य पळून जातं , बाकी भजन गायल्यावर मिळालेली ढाल आहेच.

२ ) इंदू वेलणकर
नऊवारी साडी, आंबाडा, हातात पुरुषांनी बांधावं तसं एवढं लठ्ठ घड्याळ. हातावर पुस्तकांचा ढीग, रात्रभर मंगळागौरीचं जागरण करून आल्या सारखी दिसणारी. विश्वविद्यालयात इंग्रजी या विषयात सगळी बक्षीस मिळवलेली, कल्हई वाल्या पेंडशेंच्या बोळात राहणाऱ्या ज. गो वेलणकर ( रिटायर्ड एज्युकेशनल इन्स्पेक्टर ) यांच्या तीन बायकांपेकी बहुतेक पहिल्या बायको पासून झालेली मुलगी. कार्ला केव्हज ला जेव्हा इंग्लिश ऑनर्स च्या मुलांची ट्रीप गेली होती तेव्हा उठलेल्या मधमाश्यांच्या मोहोळात इंदू वाचली पण नंदा प्रधान ला माश्या चावल्या, रात्री इंदू नंदाच्या खोलीवर आली, रात्रभर नंदा चं डोकं मांडीवर घेऊन रडली, नंदाला चमच्याने चहा पाजला , इंदू ला कुणीतरी सांगितलं नंदाची आई त्याला सोडून लहानपणी पळून केली, नंदाला एका रात्रीचं बालपण देणारी इंदू. नंदा आयुष्यात फक्त त्या रात्री रडला . इंदू नंदा सोबत रजिस्टर लग्न करणार होती आणि लग्ना नंतर त्याला न्हाऊ घालून झारीने दुध पाजून तीट लावणार होती, इंदू ने घरी काही सांगण्या आधी ज गो वेलणकर याने काठीने तिला मारलं, नंदा मध्ये पडला तसा म्हाताऱ्याने दोन पोरांना इंदूच्या समोर टाकलं या पोरांना मारून जा म्हणाला, पुन्हा इंदू भेटली नाही.


३ ) ( आपली ) सरोज खरे
हेडमास्तरीण बाईंच्या मुख्याध्यापिका झाल्यावर घडलेल्या सडपातळ बदलाचे मूर्तिमंत उदाहरण, सरोज खरे. नुसत्या दाताने “ नअस्कार आवल्याला तसदी दिली” म्हणायच्या या वाक्यात सुद्धा लिपस्टिक आड यायची. पाल्याच्या अभ्यासा पेक्षा पालका च्या माहिती मध्ये जास्त इंटरेस्ट असणारी मुख्याध्यापिका. खाद्यावर वेणीचा शेपटा उपरण्या सारखा पडलेला. पालकांकडून फॉर्म भरून घेणाऱ्या, मध्येच शेपटाचा सव्य, अपसव्य करणाऱ्या, पाल्याचे ट्रेटस पालकात शोधणाऱ्या. प्रोफेसर ऑस्ट्रोजेम च्या थिअरी वर प्रचंड विश्वास असणाऱ्या (स्वतःच्या) ओठान ओठ न लावता बोलणाऱ्या, दातांतून कुरमुरे उडवल्या सारख्या हसणाऱ्या सरोज खरे.

४ ) पणती
किराणाभुसार दुकाना समोरच्या गर्दीत दिवाळीत दिसणारी, फाटक्या परकर पोलक्यातली पोरगी, टेल न्यायला जिच्या कडे फक्त एक मातीची पणती आहे. दुकानदाराने भांड कुठेय विचारल्यावर न गांगरता दारिद्रयाने शिकवलेल्या धिटाईने दिवाळी साठी नाही खायला तेलं हवंय असं उत्तर देणारी. दहाच पैसे दुकानदाराच्या हातावर ठेवत जेवढं पणतीत देता येईल तेवढं टेल मागणारी, आमच्या कडे एवढेच पैसे आहेत म्हणणारी, दहा पैशाच्या तेलाने पणती भरेल एवढं तेल हि नसताना , तेवढ्याच तेलात दिवाळी साजरी करणारी मुलगी, पणती.

५ )श्यामा चित्रे
नाथा कामात ला झालेली सर्वात खोल जखम . श्यामा खरं तर फर्स्ट इअरलाच रुतत होती, पण नाथाच्या सिव्हिक आणि इंग्रजीच्या नोट्स वाचून पास झाली, नाथाचं अक्षर पाहून श्यामा म्हणाली होती “असल्या अक्षराचा मुका घ्यावासा वाटतो “ फर्स्ट इअर चा रिझल्ट लागला त्याच संध्याकाळी चौपाटीवरच्या मावळत्या सूर्याला साक्ष ठेऊन श्यामा म्हणाली होती “ मी तुला आजन्म विसरणार नाही नाथा, “पांढर पातळ नेसलेली, पांढरा ब्लाउज, गळ्यात पांढरी माळ. केसात पांढऱ्या जाईचा सर, आणि हो मिश्चीफ चा मंद वास.हे सगळं लेऊन नाथा सोबत टिळकांच्या पुतळ्या जवळ बसलेली श्यामा आपल्या गुलाबी निमुळत्या बोटांनी नाथा कामात हि अक्षर इंग्लिश मध्ये कोरत होती.पुढे मधु शेट्ये च्या badminton वर भाळली, पुढे मधु शेट्ये सोबत तिने लग्न केलं आणि डिवोर्स सुद्धा घेतला, एकदा रुपारेल ला असलेली डॉक्टर नेन्यांची मुलगी सुषमा नेने, हिला बघून नाथा म्हणाला होता हिचे डोळे श्यामा सारखे आहेत.

६ ) मंजुळा दगडू साळुंखे
मुसळधार पावसात थीएटर बाहेर आपली फुलांची टोपली घेऊन उभी असायची मंजुळा.समद्या जंटलमन लोकांना रामभाव नाहीतर वसंतराव म्हणणारी, थोडा पिकलेला असेल तर रामभाव नाही तर वसंतराव.आणि सगळ्या बायकांना एकजात शांताबाय म्हणणारी मंजुळा.फ्लोरीस्टातली शिळी फुलं पाणी मारून विकणारी मंजुळा हिच्या डोळ्यात कधी तरी आपण सुद्धा या काचच्या मागं हूब राहून शेळी फुलं इकाची स्वप्न बघते.मंजुळा चिंचपोकळीच्या झोपडपट्टी मध्ये रहायची, बाप दगडू , अगदी कंडम माणूस.पोरगी बंग्ल्यावाल्या बरोबर गेली असं कळलं तसा तिच्याकडून पैसे काढायला पोचला, पण बाप परत आला तर त्याच्या अंगावर कुत्रं सोडा सांगणारी, आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा आंघोळ करताना अंगभर आरश्यात पाहिलं तेव्हा खरं तर मंजुळा तो आरसा फोडणार होती पण दगड सापडला नाही, मग तिने त्यावर स्वतःचे कपडे अंथरले आणि आरश्या पासून स्वतःला लपवलं.नकळत अशोकच्या प्रेमात पडणारी मंजुळा त्याला सोडून जाताना त्याचा चष्मा त्याच्या वस्तू कुठे आहेत ते आठवण करून देणारी मंजुळा, जिला सुप्रसिद्ध उच्चारशास्त्रज्ञ प्रोफेसर अशोक जहागीरदार याने सारंगपूर ची राजकुमारी मंजुश्रीदेवी म्हणून मिरवलं ती ती गटाराकाठी जन्मलेली आणि वाढलेली, मंजुळा दगडू साळुंखे.

७) सुबक ठेंगणी
खरं तर हि एकटीच नाहीय, हि प्रतीनिधी आहे, बऱ्याच सरला पित्रे , गोदी गुळवणी, रतन समेळ, राघुनानाच्या मुली या सगळ्यांची, मे महिन्यात एष्टी ने मुंबईला दाखवायला आणलेल्या किंवा अश्याच मुंबईहून कुठे तरी निघालेल्या या सगळ्या, कुठल्या तरी मधु मलुष्टेच्या समेवर यायची वाट बघत असताना दिसतात.

८) सुभद्रा
आबुराव ची सुभद्रा, देवगावकर तमाशा मंडळात कधी नाचायला आली आणि कधी आबुराव ची झाली तिचं तिला हि कळलं नाही, तसं तिला बरंच काही कळलं नाही. अंगभर लादलेली मेहंदी आवडली कि आबुराव ने बांधलेला आंबाडा यात तिला मोरपीस कधी भावलं तेही कळलं नाही, सिनेस्टार मेनकेने येऊन जेव्हा आबुराव चा हात हातात घेतला तेव्हा आपली नखं दरवाजाच्या लाकडी चौकटीत रुतु लागलीत हे सुद्धा सुभद्रेला कळलं नाही.आबुराव कायमचा मेनके सोबत फिल्म लाईन ला गेला तेव्हा आपल्या गळ्यातल्या सोन साखळी ला गाठ कशी पडली हे सुद्धा कळलं नाही, आबुराव ची पोर जाई आपल्या पोटात आपण का वाढवली, आणि आबुराव ची वाट बघत एक दिवस आपण कायमचे डोळे मिटले, ती वाट पाहण्याचं कारण सुद्धा सुभद्रेला कधीच कळलं नाही.

९)बटाट्याची चाळ
चाळीचे आद्य मालक, कै. धुळा नामा बटाटे. नंतर यांच्या वंशजांनी करू नये ते धंदे केल्याने चाळीच्या मालकीचा खांदेपालट होत आता ती कोथिंबीरीचे व्यापारी असलेल्या मेंढे पाटलांच्या घराण्याकडे गेली आहे. खरं तर चाळ आता थकलीय. खिडक्यांचे गज अर्ध्याहून अधिक उडालेत , जिने आता आपली पायरी सोडून वागू लागलेत.आज जो रंग दिसतोय ती छटा कोणत्याही डबीतून आलेल्या रंगाची नाही,अनेक वर्ष अनेकांनी पुसलेल्या बोटांतून , टेकलेल्या डोक्यांतून धुरातून तयार झालेला हा रंग आहे. चाळीला मुळचा पांढरा रंग होता तो . आता कुठेतरी कुणीतरी खिळ्याने कुणीतरी डुक्कर आहे किंवा दुष्ट आहे असं लिहिलेलं आहे.त्या शिवाय जागोजागी खिळ्यानेच उडते पक्षी उगवता सूर्य काढलेला आहे.दसरा दिवाळीला चार सहा पणत्या , कधीतरी झेंडूची तोरणं, आंब्याच्या डहाळ्या सोडल्यास त्या व्यतिरिक्त चाळीवर सौंदर्याचे संस्कार असे झालेच नाहीत. पण तरीही चाळ सदैव नांदती जागती राहिली. मलेरीयात कुडडली , प्लेगात गाठी आल्या , देवी आल्या पण साठीच्या आतलं काही कुणी कुणाच्या खांद्यावरून गेलं नाही.चाळीचा चिवटपणा माणसांत हि उतरला. मुलांच्या मुंजी, मंगळागौर, बारशी, हळदीकुंकू असे वर्षभर या ना त्या बिऱ्हाडात सांकृतिक कार्यक्रम असायचे पण चाळकरी घरचं कार्य असल्यासारखे वावरायचे,हौसेला घटनांच्या नियमात बांधलं ते नंतरच्या पिढीने , मग निवडणुका आल्या, भांडण आली चाळीतला ओलावा सरला फक्त ओल उरली.पण अजून धागे तुटले नाहीत , अजूनही कार्य असलं कि लोकं अंग मोडून काम करतात .कुठेतरी एकाच नळातून आलेल्या पाण्याने प्रेम टिकवून ठेवलं आहे.चाळीला भीती आहे ती आपण कोसळण्याची नाही, तर आपल्या नंतर जी वास्तू इथे उभी राहील त्यात माणसं दारं बंद करून रहाणाऱ्या ब्लॉक मधल्या माणसांसारखी राहतील हि.तेव्हा चाळीला वाटे आपला भुईसपाट झालेला देह तीन मजल्यांनी उठून उभा राहील आणि म्हणेल “अरे नाही रे ! माझ्या पोटात या पेक्षा खूप खूप माया होती !!”

मकरंद सखाराम सावंत

0 प्रतिक्रिया: