Wednesday, July 20, 2011

‘कैवल्या’चा आनंद घेणारा!

श्री राम पुजारी यांच्या सत्तरीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ‘पुलं’नी आपल्या या स्नेह्य़ाचं रसिलं व्यक्तिमत्त्व शब्दांमधून उभं केलं होतं.‘पुलं’चं ते भाषण.
मित्रहो,
रामनं आपलं अंत:करण मोकळं करून भाषण केल्यानंतर, मी बोलणं मला चुकीचं वाटायला लागलेलं आहे. एखाद्या चांगल्या गाण्याचा परिणाम आपल्या मनावर व्हावा, तसा त्याच्या भाषणाचा परिणाम झालाय, गाणं संपल्यावर बोलणारे लोक किती कद्रू असतात ते माहीत असल्यामुळे, तो अपराध आपण करू नये असं मला वाटतं. पण आजचा प्रसंगच असा आहे की दोन शब्द आपल्या वतीनं मी बोललो नाही तर मलाच रुखरुख वाटत राहील. मी बोलू नये, अशी निसर्गानं व्यवस्था केलेली आहे पण दरवेळी निसर्गाचं मानलंच पाहिजे असं नाही.

रामचा उल्लेख करताना पुष्कळ लोक म्हणाले की, हा सगळ्यांना अरे-तुरे करतो. रामच्या डोळ्यांनी जो मनुष्य पाहू शकतो त्यालाच तो अरे-तुरेचा अधिकार असतो. आपण ‘विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो’ असं म्हणतो, ‘विठ्ठलरावांना भेटून आलो’ असं नाही म्हणत. विठ्ठल, राम, कृष्ण यांच्याबद्दल आपण एकेरीच बोलतो मग त्यांच्यापेक्षा आम्हीच असे काय मोठे लागून गेलो की आमच्याबद्दल अहो-जाहो करून बोलावं- आपलेपणा आणि परकेपणा साध्या शब्दात व्यक्त होतो. बघा- आईला आपण ‘अगं’ म्हणतो, बापाला ‘अहो’ म्हणतो, कारण दूर असतो तो आईपेक्षा. तर अहो-जाहो हे दूरचं लक्षण आहे. शिष्टाचार वगैरे दूरच्या ठिकाणी. आता रामनं बोलताना सांगितलं की, त्याच्या घरी मी गेलो की गप्पा मारताना मी ऐसपैस पाय पसरून आरामात बसतो. आता ही आपुलकी मुद्दाम ठरवून दाखवण्यासाठी केली जात नाही. ती निर्माण झालीय याची जाणीव व्हावी लागते. आयुष्यात ही जाणीव व्हायची स्थळं कमी असतात, ही त्यातली दु:खद गोष्ट आहे.

रामनं गाणं खूप ऐकलं. कसं ऐकलं? तर ते सुरांचं प्रेम घेऊन ऐकलं. गाण्याला तो मोजपट्टी घेऊन गेला नाही. तो गाण्याचा सुपरवायझर झाला नाही. ऐकणारा झाला. ‘ऑडिट’ हा शब्द, ऐकणं आणि हिशेब तपासणं, या दोन्ही अर्थानी वापरला जातो. इथं हा दुसरा ऑडिटर झाला नाही तर ऐकणारा ऑडिटर झाला. त्यानं गाण्यावर प्रेम केलं, तितकंच त्या गाण्यामुळेच गवयावर प्रेम केलं आणि ‘हे प्रेम मी करतोय’ असा भावही कधी खाल्ला नाही, त्याची त्याला आवश्यकता वाटली नाही, कारण त्याच्या हिशेबी क्रिकेटियर आहेत, चित्रकार आहेत, कवी आहेत, गायक आहेत, इतर कलावंत आहेत, नट आहेत. हे सगळे आहेत ते त्याला आपले वाटतात - ते त्याला आपले वाटतात हे त्यांना प्रत्येकाला माहीत असल्यामुळे त्यांना तो आपला वाटतो. उद्या जर राम मला म्हणाला, ‘आपण आलात, बरं वाटलं.’ त्यावर मी त्याला विचारेन, ‘ मी असा काय गुन्हा केला म्हणून तू असं बोलतोहेस?’ एक तर मराठीची सवयच प्रेमातून अरे-तुरेवर येणारी आहे. आपल्या भाषेला तसा फारसा शिष्टाचार मान्य नाही. फार शांतपणे कोणी मराठी बोलायला लागलं की तो ढोंगी आहे असं वाटायला लागतं. ही मंत्री मंडळी बोलतात बघा, ‘आपण आलात, बरं वाटलं. सहज आला होता काय?’ वगैरे.

राम मैफिलीत असताना गायक जितक्या तन्मयतेनं, आनंदानं गातो तितक्या तन्मयतेनं आणि आनंदानं दुसऱ्या कोणाही पुढे - समीक्षकांची क्षमा मागून सांगतो - ते असूनही गायक रंगतोच असं नाही, कारण तिथं हिशेब तपासनीस बसलेले असतात. माझे एक गवई मित्र होते. म्हणजे ते गात होते म्हणून त्यांना गवई म्हणायचं. ते बैठकीत काय करावं याच्या नोटस् काढून देत असत. ‘तान नंबर एक’, ‘तान नंबर दोन’ एवढंच नव्हे तर ‘या तानेस वाहवा मिळाल्यास ती पुन्हा घ्यावी’- हे मी कपोलकल्पित सांगत नाही - विनोदी लेखकालाही जिरवणारे पुष्कळ असतात, त्यापैकी हे! तर असं काही न करता, आपण गेल्यानंतर आनंद देणारा हा खरा आनंदयात्रीच आहे. त्याला तो आनंद ठिकठिकाणी मिळालेला आहे. तो आनंद मिळत असताना त्याच्या मनात एक विचार सतत आहे की, कोणाच्या तरी कृपेनं हा आनंद आपल्याला मिळालेला आहे. ‘कृपेनं मिळालेलं आहे’ ही भावना आहे ना तिचं विच्छेदन करता येत नाही. शवच्छेदन करता येत नाही. ती एक असते. जसं आता कोणीतरी सांगितलं, फार योग्य सांगितलं. मला वाटतं रेग्यांनी सांगितलं. रेग्यांनी गंभीरपणानं सांगितलं. रेग्यांचा गंभीरपणा सगळ्यात मिश्कील असतो - त्यांनी सांगितलं, ‘संगीतामुळे त्याच्या वागण्याला परतत्त्वस्पर्श झाला. फार सुंदर उल्लेख केला. संगीताचा परतत्त्वस्पर्श ज्यांना झाला तो या साध्यासुध्या गोष्टींच्या बाहेर जातो. तुम्हाला सांगतो, भारतीय संगीत ही अशी गोष्ट आहे की जिथे ‘कैवल्य’ म्हणजे काय याचा साक्षात्कार होत असतो. त्याला रूप नाही, रंग नाही. निराकार, निर्गुण हे जसं देवाचं वर्णन. तसं भारतीय संगीताचं वर्णन करता येईल. पुढे शब्द आले की घोटाळे सुरू होतात, ते निराळे. पण ज्यावेळी आलापी चालू असते. स्वरांचं आळवणं चालू असतं. त्यावेळी तो ‘कैवल्य’ स्वरूपाचाच आनंद असतो. तसला आनंद रामला साहित्यानं दिला, खेळानं दिला.

अरुण टिकेकरांसारख्याला त्यानं क्रिकेटियर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याची महत्त्वाकांक्षा केवढी असेल बघा! मी शाळेत क्रिकेट खेळायला गेलो. पहिल्याच दिवशी मला क्रिकेटच्या शिक्षकांनी सांगितलं, ‘तू फुटबॉल खेळ’- म्हणजे ‘क्रिकेट खेळू नकोस’ हे त्यांनी निराळ्या रीतीनं सांगितलं, कारण आमच्या शाळेत फुटबॉल नव्हता. माझ्याकडे कोण होतकरू कवी येतात, त्यांच्या कविता वाचल्यावर अंगावर काटा येतो. मी त्यांना सांगतो, ‘तुम्ही नाटक ट्राय करा’, म्हणजे एक वर्ष तरी त्याचं त्यामध्ये जातं. कुणीतरी भाषणात आत्ता म्हटलं की, ‘मी सुदाम्याच्या पोहय़ांची पुरचुंडी घेऊन आलोय्’ माझ्याकडे होतकरू कवी वहय़ांची पुरचुंडी घेऊन आलेले असतात. तर अशा ठिकाणी रामसारखा एखादा मित्र असावा. रामची बैठक याचा अर्थ साहित्य, संगीत, कला यांची बैठक. याच्याशिवाय आम्ही कधी काही बोललोच नाही. याचं एक कारण आहे. असं मला वाटतं. माझ्या आणि त्याच्या स्वभावात एक साम्य आहे - आम्ही कधी शर्यतीत नव्हतो. आयुष्यभर कधी पहिलं यावं म्हणून धावलोच नाही- पहिला आलो नाही ही गोष्ट निराळी.

मला बालकवींची कविता आठवते. ‘स्वार्थाच्या बाजारात, कितीक पामरे रडतात। त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो।’ मला हे मिळायला पाहिजे म्हणून त्याच्या मागे लागलो तर ते कधी मिळतच नाही. आमचे खाँसाहेब लोक फार चांगलं बोलायचे. आपण त्यांना जर सांगितलं ‘खाँसाहेब कालचा बागेश्री काय छान झाला’ की ते म्हणायचे, ‘हो गया’. मी केलं नाही, ते झालं. ही भूमिका केवळ गाण्याबद्दल नव्हे तर आयुष्याबद्दल यावी. ही भूमिका कशी येते ती आत्ता राम बोलला त्याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल. ‘मला माहीत नव्हतं. - मी झालो. असं असं माझ्या जीवनात आलं.’ त्याचं पृथक्करण करण्याचा त्यानं प्रयत्न केला. जे काही आहे ते त्याच्या मनामध्ये आहे, ते सांगण्याचा रामने प्रयत्न केला आणि त्यामध्ये आपल्याकडे कर्तृत्व एका कणाचंही घेतलं नाही. एवढंसंसुद्धा कर्तृत्व न घेता, हे मला मिळालं या आनंदात तो बोलला. असा आनंद त्यानं स्वत: घेतला. तुमच्याकडून घेतला, तुम्हाला परत देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तो आनंदानं स्वीकारला, याचं लक्षण - ही सभा. ही सभा जी इथं भरलेली आहे, त्यावरून दिसून येतं. सर्व थरांतले, सर्व पक्षांचे लोक इथं आहेत. सध्या माणसांबद्दल बोलताना पक्षाचा आणि पक्षाबाहेरचा असं दोन्ही बोलावं लागतं. म्हणजे एके ठिकाणी माणूस दिसतो. दुसऱ्या ठिकाणी तो दिसत नाही - कुठला हे मी सांगत नाही - तर अशी सर्व थरांतली माणसं आली आहेत. त्याच्या बरोबरीचे शाळकरी मित्र जे आलेले आहेत, ते आपापल्या क्षेत्रात कितीतरी उच्च स्थानावर गेले आहेत. ते उच्च स्थान विसरून शाळेमध्ये त्या वयाचे असताना जसे बागडले तसेच ते आत्ता आलेले आहेत. मला खात्री आहे की ते शाळेतला आपला ताजेपणा घेऊन आपल्या गावी परत जातील.

असा ताजेपणा त्याच्या भेटीत ज्यानं आयुष्यभर मला दिला असा हा राम आहे. मी इथं आलो म्हणजे रामवर मोठे उपकार केले आहेत असं नाही. मला भीती वाटत होती की, कुठं गेल्यावरती आजारी पडू नये. पण आता तीही भीती मला वाटत नाही, कारण याच्यामागे जी रामची पुण्याई ती आमच्याही कामी येते. कधी कधी असं मला वाटायला लागलंय, साहित्य, संगीत, चित्र, नृत्य, गायन याच्यावर निस्सीम प्रेम करणारा मनुष्य असतो ना त्याच्या वाटेला जायला देवालासुद्धा जरा भीती वाटत असली पाहिजे. यांची मैत्री चालू दे, असं त्यालाही वाटत असेल. अशी याची मैत्री चालू दे, असं वर्षांनुर्वष देवाला वाटत राहो आणि ती आम्हाला पाहायला मिळो, अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपण आता रामला ‘हॅपी बर्थ डे टू यू’ म्हणू या!

रविवार, १७ जुलै २०११
लोकसत्ता

2 प्रतिक्रिया:

Anonymous said...

Phaarach sunder... :)

Anonymous said...

Apratim :)