...पूर्वी ' मी व माझे लेखन ' हा लेख साठीच्या आसपास येताना लिहीत. हल्ली ' अ आ इ ई ' एवढे लिहिल्यावरसुद्धा लिहिता येतो. आता उदाहरणार्थ : किशोर कोरे याने ' ग म भ न ' ही निर्मिती केल्यानंतर लिहिलेला आत्मपरिचय पाहा. किशोर कोरे हा अगदी नवसाहित्यिक आहे. कारण गेल्या महिन्यापासूनच तो लिहायला लागला.
" आमचा बाप ग्रेट आहे. आणि आईसुद्धा. आमच्या बापाचं आईवर प्रेम नसावं. कारण बापाला प्रेम काय ते कळतं म्हणून मला शाळेत पोचवायला येतो आणि आमच्या वर्गातल्या बाईशी बोलत बसतो. बाप सिगारेट ओढतो म्हणून आई त्याला बोलते. बापाने सिगारेट ओढली तर माझ्या आजाचं काय जातं ? मला आजे दोन आहेत. एक आईचा बाप आणि एक बापाचा बाप. हेही ग्रेटच.
मी ग म भ न र स पर्यंत लिहिलं. बाईला त आणि ळ येत नसावा. पुढं जातच नाही. 'स'शीच येऊन थांबली आहे. आमची बाई दॅट इज निमाताई. तिला काहीच येत नाही. तिला मोटरचा उच्चार 'कार'असा आहे हे ठाऊक नाही. बालगीतं म्हणजे वैताग. म्हणून वर्गातली बाकीची भुक्कड गर्दी 'शाणी माजी भावली' म्हणताना फक्त मी तेवढा 'बोल राधा बोल' म्हणत असतो.
मी कधी शाळेत जाईन असं मला वाटलं नव्हतं. बाप उचलून घेऊन गेला. शाळा हा साला ताप आहे. आपण शिकणार नाही. कारण शिकण्यासारखं काहीच नाही. होतं ते शिकलो. आता फारतर शिकलेल्या अक्षरांना टोप्या घालायच्या, नाहीतर काने, मात्रा ओढायचे. म्हणजे वैताग. बालगीतासारखा. खरं तर ग ला म कां नाही म्हणत ? सगळी भाषा बदलली पाहिजे. ' मंमं ' म्हणजे जेवण हे कळत असताना जेवण हे कशाला शिकायचं ? भू भू म्हणजे कुत्रा हे कुत्र्यालासुध्दा कळतं मग कु कशाला नि त्रा कशाला शिकायचा ? पण ' जो जो ' म्हणजे झोप तेव्हा ' ज ' शिकला पाहिजे आणि ' कुक् कुक् ' म्हणजे आगगाडी तेव्हा 'कु' शिकलाच पाहिजे. म्हणजे वैताग.
एकंदर सगळा वैताग आहे हे आजवरच्या आयुष्यातल्या अनुभवावरुन सांगतो.
तिस-या वाढदिवसाला बाप काय देतो पाहीन, नाहीतर चक्क बापाला डॅडी न म्हणता बाप म्हणेन. हे बाप लोक आम्हाला जन्माला घालण्यापूर्वी विचारीत कां नाहीत ? आमच्या बापाचं नाव मोरेश्वर म्हणून मी त्याला नामानिराळा ठेवतो आणि माझं नाव फक्त किशोर कोरे एवढंच सांगतो. एक पाव्हणा म्हणाला, ' अरे तुझ्या बापाचं नाव सांग.' मी म्हटलं, ' हा इथे बाप आहे त्यालाच त्याचं नाव विचारा. ' पाव्हणा आडवा. एका कॅडबरीत काय काय म्हणून सांगायचं ? पाव्हण्याच्या बायकोने माझी पापी घेतली. तिला मी माझं नाव 'किशोरकुमार' असं सांगितलं. ती म्हणाली, 'सगळं नाव काय ?' मी म्हटलं, 'दिलीपकुमारचं सगळं नाव विचारुन या.' पाव्हणी करपली. आपण नाही कोणाला भीत. माझी महत्वाकांक्षा गांजा ओढणं ही आहे. "
किशोर कोरे (आगामी आत्मचरित्रातून)
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
संग्रह - अघळपघळ (१९९८)
(ललित , दिवाळी १९६५)
Monday, March 14, 2022
ललित आत्मपरिचय कसे लिहावे (एक मार्गदर्शन)
Labels:
PL Deshpande,
Pula,
Pula Deshpande,
pulaprem,
अघळ पघळ,
पु.ल.,
पु.लं.,
पुलं
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 प्रतिक्रिया:
Post a Comment