Wednesday, December 8, 2021

ज्ञानोबा तुकोबांनी उजळविलेले हे मनाचे कोपरे - पु.ल.

पुलंचा एक किस्सा आहे. ते एकदा म्हणाले होते की "ज्ञानेश्वर, तुकारामांचा मला खूप राग येतो. त्यांनी ओव्या, अभंगातून आमच्यावर खूप संस्कार केले, अंधारलेले मनाचे कोपरे उजळून टाकले. त्यामुळे गरीब असहाय्य कुणी दिसले की मन अस्वस्थ होते." 

त्यांनी एक प्रसंग सांगितला "सत्तर, ऐंशीच्या दशकात ताजसारख्या फाईव्ह स्टार हॉटेलात फक्त श्रीमंताचीच मिरासदारी होती. तेथून जाताना लांबूनच हेच ते ताज हॉटेल असं आपण सोबतच्या माणसाला सांगायचो. मात्र एकदा एक श्रीमंत मित्रामुळे ताजमध्ये जायचा योग्य आला. वेगवेगळ्या डिशमधील पाच पन्नास पदार्थ पाहून अचंबा वाटला.

मोठमोठ्या भांड्यात चिकन रस्सा, मटण मसाला, तळेलेले फिश, तंदुरी चिकन, रायते, वेगवेगळे बेकरी आयटम, चारपाच प्रकारचे आइस्क्रीम तेसुद्धा अनलिमिटेड, आपल्या हातांनीच हवे ते घ्यायचे ते ही हवे तितके सोबतीला हॉट ड्रिंक्स. त्या दिवशी कळलं स्वर्गसुख म्हणजे काय. चांगला चापून जेवलो. शॅम्पेनही डोक्यात उतरली होती. सुगंधी बडीशेप तोंडात टाकत टुथपिकने दात कोरत श्रीमंत दोस्ताबरोबर खाली उतरून रस्त्यावर आलो न आलो तोच भिकाऱ्यांची चार पाच पोरं "सायेब शेट पैसे द्या ना.." म्हणत वाडगी घेऊन आमच्यापुढे येऊन उभी राहिली. "ऐ चल भागे कुत्ते कहीं के!" मित्राने त्यांना फटकारले. ती गयावया करणारी पोर पाहून माझी झिंग मात्र जागीच जिरली. पापलेट पोटात कलमलू लागला. श्रीमंतांवर असल्या केविलवाण्या दृश्याचा परिणाम होत नाही, आपल्याला होतो. कारण ज्ञानोबा तुकोबांनी उजळविलेले हे मनाचे कोपरे."

- ज्ञानेश्वर सोनार
(मार्मिक साप्ताहिक)

1 प्रतिक्रिया:

Sham Yemul said...

मानवी संवेदना बाबतीत पु.ल इतके हळवे होते ह्याचे खूप विशेष वाटते.