Saturday, November 29, 2008

मुलायम आवाजाचा भीमसेन -- पु.ल. देशपांडे

पु. ल. देशपांडे यांनी पंडित भीमसेन जोशी यांची आकाशवाणीवर मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा हा संपादित भाग...

मुळ स्त्रोत -- महाराष्ट्र टाईम्स
.........

पु.ल. : आतापर्यंत अनेक वेळा भेटलो आहोत आपण, परंतु तुम्हाला भेटल्यावर मला न चुकता कसली आठवण होत असेल, तर पहिल्यांदा तुमची माझी भेट झाली त्या क्षणाची; आणि प्रत्यक्ष झाली नाही, तर ती तुमच्या सुरांतून झाली. आणि मग तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो. पस्तीस-छत्तीस वर्षं झाली असतील. एचएमव्ही स्टुडिओमध्ये मी गेलो होतो. तिथं तुमचं त्या वेळेला एक रेकॉडिर्ग चाललेलं होतं. मला आठवतं की, ते कानडी गाणं होतं.

ते ऐकल्याबरोबर मी त्या रेकॉडिर्ंग बूथमध्ये उभा राहिलो. तिथे जी. एन. जोशी होते. त्यांना म्हटलं, ''कोण आहे हा?'' ते म्हणाले, ''धारवाड, गदग वगैरे भागातून तरुण मुलगा आलेला आहे, आणि त्याचं नाव भीमसेन जोशी आहे.'' त्या वेळी तुमच्या आवाजातील मुलायमपणा आणि तुमचं भीमसेन हे नाव या दोन्ही गोष्टी मला विसंगत वाटल्या. तुम्ही हे गाणं अतिशय सुंदर गायलं होतं. तर त्या गाण्यानं आपल्या गप्पागोष्टींची सुरुवात करू या.

भीमसेन : (गातात)

पु.ल. : वा, वा, वा.... पस्तीस वर्षं झाली. तुम्हीही साठी ओलांडली आहे. मी तर केव्हाच ओलांडलेली आहे, पण तुम्ही साठी ओलांडूनसुद्धा पस्तीस वर्षांपूवीर्चं तुमच्या गळ्याचं तारुण्य तसंच आहे, आणि त्यामधली जी कोवळीक आहे ती या क्षणालासुद्धा तशीच राहिली आहे. ही काय जादू आहे मला कळत नाही. तुम्हाला गाण्याचा हा ध्यास खूप लहानपणी लागला, नाही का?

भीमसेन : हो. म्हणजे तसं आपल्याला माहीतच आहे, की आमच्याकडं जुन्या काळातील माणसं होती. घरात संध्याकाळी दिवे लागले की माझी आई गायची. देवदासाचं भजन वगैरे म्हणायची. ती इतकी गोड गायची की, त्यामुळेच सुरुवातीला मला गाण्याचा नाद लागला.

पु.ल. : बहुतेक गवयांची हीच कथा आहे. त्यांच्यावर गाण्याचे पहिले संस्कार झाले, ते त्यांच्या आईच्या गाण्याचे झाले. आणि ते जे संस्कार झाले त्याच्यामागे एक जिव्हाळासुद्धा होता. या दोन्हींमुळे ते गाणं अतिशय गोड वाटत होतं. अशा प्रकारचं गाणं ऐकत-ऐकत तुम्ही मोठे झालात...

पण मला सांगा, की आपल्याला आता गाण्याचा ध्यास घ्यायलाच पाहिजे किंवा गाणं शिकलंच पाहिजे. किंवा गवई व्हायलाच पाहिजे, असं तुम्हाला वाटावं अशी एखादी घटना घडली की आणखी काही झालं?

भीमसेन : घटना म्हणजे, तुम्हाला माहीत आहे की, खाँसाहेबांची पहिली रेकॉर्ड निघाली 'पिया बिन...' आमच्याकडं एक दुकानदार होता. तो नवीन रेकॉर्ड आली की जाहिरातीसारखी लावायचा. आतासारखं पेपरमध्ये वगैरे येत नव्हतं. शाळा सोडून मी तिथं जाऊन बसायचो. ते इतक्या वेळेला ऐकलं की, असं वाटायचं, अशा प्रकारचं गाणं मला यायला पाहिजे. हा निश्चय मनात पक्का केला.

आमच्या वडिलांची एवढीच इच्छा होती, की आधी थोडं तरी शिक्षण घ्यावं, निदान ग्रॅज्युएट तरी व्हावं. पण मला काही धीर नव्हता. मी म्हटलं, हे काही जमत नाही. मी पळून गेलो.

पु.ल. : तुम्ही लहान होतात. काय वय होत तेव्हा?

भीमसेन : बारा-तेरा वर्षांचं.

पु.ल. : बारा-तेरा वर्षांचं? तुम्ही गेलात ते गदगहून निघालात आणि धारवाडला आलात?

भीमसेन : हो. धारवाडहून पुण्याला आलो. पुण्याहून मंुबईला गेलो.

पु.ल. : म्हणजे कुठं जायचं. ते माहीत नव्हतं.

भीमसेन : माहीत नव्हतं, पण ग्वाल्हेर वगैरे असं मनात होतं. तिथपर्यंत पोहोचलो.

पु.ल. : तुम्ही हाल काढत ग्वाल्हेरपर्यंत गेलात, ते मला माहीत आहे. गाडीचा प्रवास करत करत खिशातील पैसे संपले की गाडीत गाणं म्हणायचं. लोकांना वाटायचं, हा भिकाऱ्याचा पोरगा लहान असूनसुद्धा छान गातो. म्हणून जेवायला द्यायचे. कोणी पैसे द्यायचे. आणि त्या काळी तुम्ही चतुराईनं रेल्वेला बरंचसं फसवून विदाऊट तिकीट ग्वाल्हेरपर्यंतचा प्रवास केलेला आहे.

भीमसेन : हो. दोन-तीनदा जेलमध्येसुद्धा जाऊन आलोय.

पु.ल. : तिथंसुद्धा तुम्ही, मला वाटतं, तो जो शिपाई होता, त्याला गाणं ऐकवल्यावर त्यानं तुम्हाला सोडलं.

भीमसेन : काय आहे, गाण्याचे शौकीन भेटले की, आपला पुढचा प्रवास सुखकर व्हायचा.

पु.ल. : तुम्हाला गुरू कुठं भेटले?

भीमसेन : तिथं मी असा हिंडत-हिंडत गेलो. मी पंजाबमध्ये जालंदरला पोहोचलो. तिथं 'आर्य संगीत विद्यालय' आहे. तिथे त्या काळातील भक्त मल्होत्रा नावाचे ध्रुपद गायक होते. ते प्रसिद्ध होते. त्यांच्याकडं मला एका मिल ओनरनं ठेवलं. म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हतं. ते म्हणाले, ''काही हरकत नाही. तू गाणं शिकत जा.'' आणि मी तिथं शिकायला सुरुवात केली. शे-दीडशे ध्रुपदं शिकलो त्या वेळेला. तिथं 'हरी वल्लभका मेला' भरायचा. तिथं आपल्याकडचे सगळे गायक यायचे. वामनराव, नारायणराव व्यास, विनायकबुवा. कोणी आलं की मी आपला तंबोरा घेऊन आहेच मागं उमेदवारीला. विनायकबुवांनी तिथं विचारलं, ''इथं काय करतोयस तू?'' मी म्हटलं, ''गाणं शिकायला आलोय.'' ''वेड्या, तुला माहीत नाही? तुझ्या गावाजवळच एवढी मोठी व्यक्ती आहे, सवाईगंधर्व. त्यांच्याकडं जा तू.'' मग तिथून गाडी परत फिरली.

पु.ल. : म्हणजे 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' म्हणतात तसं. मग रामभाऊंनी सुरुवात कशी केली?

भीमसेन : ते परीक्षा बघत होते. कारण माझ्यासमोरच दोन-चार माणसं गाणं शिकायला आली. तिथं पाण्याचा दुष्काळ होता. पाणी भरणं वगैरे बघून ती पळून गेली. हा खरा टिकणारा आहे की नाही, खरा शिकतो की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी वर्षभर आम्हाला शिक्षा दिली. दोन-दोन घागरी घ्यायच्या आणि विहिरीवरून पाणी आणायचं. तेव्हा त्या परीक्षेत मी पास झालो. कारण पंजाबमध्ये ते सगळं होतं ना.

मी पहाटे चारला उठत होतो. मग एक तासभर पाणी वगैरे भरायचं. पन्नास-साठ घागरी पाणी आणायचं. मग तंबोरा घ्यायचा. मग त्यानं सुरुवात करायची. भैरव रागाचा रियाज सप्तकात करायचा. खर्ज वगैरे लावून. एकदा मी शिकत असताना माझा आवाज बसला होता. तरीसुद्धा गुरुजी रियाज करून घेत होते. पण मला त्याचा त्रास झाला नाही. मंदामध्ये रियाज करायला लावला जायचा. मध्य सप्तकात वगैरे नाही. विश्रांती देत-देत असा रियाज करत करत मग तो त्रास नाहीसा झाला.

पु.ल. : तुमच्या गाण्यामधलं जे वैशिष्ट्य मला जाणवतं ते असं की, तुमचा स्वर जो आहे ते आ-काराचं गाणं आहे. हा आ-कार तेजस्वी लावला पाहिजे हे तुम्हाला गुरुजींनी सांगितलं की...

भीमसेन : नाही. ते तो तसा लावत नव्हते. ते सांगायचे. माझ्यावरती जे गायक आहेत, त्यांचे हे परिणाम आहेत. हा स्पेशल म्हणजे माझ्यावर केशरबाईंचा प्रभाव आहे. आमच्या वेळेला माईक वगैरे काही नव्हतं. आमचे गुरू थिएटरमध्ये विदाऊट माइक ऐकलेले आहेत मी.

पु.ल. : मी रस्त्यावरूनसुद्धा ऐकलेले आहेत. हजार लोकं पुढं बसलेले आणि गुरुजी गाताहेत. तर हे जे सगळं तुम्ही रियाज करत करत केलंत, हे किती वर्षं चाललेलं होतं?

भीमसेन : जवळजवळ पाच-सात वर्षं मी रियाज केला. थोडंसं यायला लागल्यानंतर मी अठरा-अठरा तास रियाज करत होतो.

पु.ल. : रियाज करताना रागांचा रियाज कसा करायचात?

भीमसेन : एक राग घेऊन, त्यातलं जे आपल्याला येत नाही ते गायचं.

पु.ल. : मला तुम्ही सांगा की, तान वगैरे घेताना तुम्ही हे लिहून करता की नोटेशन घेऊन त्या नोटेशनच्या अंदाजानं तान घेता?

भीमसेन : नोटेशन्स असतात, पण ती मनात.

पु.ल. : ते मनातलं नोटेशन वेगळं.

भीमसेन : एक राग घेऊन, त्याची प्रॅक्टिस करायची. काही कलावंतांचा रियाज म्हणजे हाच असतो. हल्ली रियाज आणि बैठकीचं गाणं एकच झालंय.

पु.ल. : 'घराणं' या विषयावर तुमचं काय मत आहे?

भीमसेन : माझं स्वत:चं काय आहे की, मी डेमॉक्रॅटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आई-वडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढे ठेवलं, तर ती पोपटपंची होते. मग आपलं काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्यांची भट्टी करून आपल्यात मिसळून घेतली आहे.

पु.ल. : तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य असं वाटतं, की तुमचा जो मूळ पाया आहे, त्या पायाला कुठंही धक्का न लावता तेव्हाच्याच इमारतीत जी रचना तुम्ही केलीत, त्याच्यामध्ये नावीन्य आहे. जुन्या घोड्याला शिंगं काढून म्हणायचं, की मी नवा घोडा काढला, असं ते नावीन्य नाही.

भीमसेन : त्याचं घोडेपण टिकवून, म्हणजे किराण्याला जे अभिप्रेत आहे, की स्वरांची आराधना करत करत जाणं, हे ठेवून मी त्याच्यावर पुष्कळ नवीन केलं. माझ्या भाषेत म्हणायचं तर प्रत्येक कलावंत हा चोर आहे. मोठा चोर आहे. त्याच्यात कोणी लहान असतो, कोणी मोठा असतो, पण असं केल्याशिवाय स्वतंत्र गायक होऊ शकत नाही.

पु.ल. : आता मला हे सांगा की, तुमची पहिली बैठक कुठं झाली?

भीमसेन : म्हणजे कर्नाटकात की पुण्याला?

पु.ल. : पुण्याला.

भीमसेन : अरे, तुमच्याच घरामध्ये गायला बसलो होतो. तुम्ही आणि ते गोडबोले होते.

पु.ल. : हो, आठवतंय मला. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला पब्लिकमधली बैठक सुरू केलीत, त्या वेळेला लोकांपुढे गाताना आपल्याला काय काय करायला पाहिजे, याचा विचार करून तुम्ही गाण्यामध्ये काही अदलबदल केलेत का?

भीमसेन : नाही. असं काही नाही. बदल वगैरे काही विशेष केलेले नाहीत मी. जे तेव्हा गात होतो, ते अजूनही गात आहे. मुख्य एवढंच की, त्याला वेळेचं बंधन वगैरे पाळतो. उगीच आपलं आपल्याला येतंय म्हणून तास-सव्वातास गायचं, ही फॅशनच होऊन गेलीय. लोक म्हणतात, अरे हा राग यांनी तासभर पिसला. आता ते पिसणं नकोच.

पु.ल. : तुमच्या असंख्य मैफली नाना तऱ्हेच्या श्रोत्यांसमोर झाल्या, पण भीमसेन, मला असं वाटत की, तुम्ही इकडले असे पहिले गवई होता की, ज्यांनी बंगालमध्ये श्रोता मिळवला.

भीमसेन : एकदम असं शास्त्र वगैरे त्यांना कळत नाही, पण ते जे कान आहेत, ते सुरेल गाणं ऐकणाऱ्यांचे आहेत, आणि कलावंताला ते देव मानतात.

पु.ल. : सुराला स्वभाव अथवा भावना नसतात. त्याला आर्तता असते. तुमच्या गाण्यात जी आर्तता आहे, ती जास्तीत जास्त प्रतीने तुमच्या गाण्यात आहे.

भीमसेन : आणि पहिल्यापासून माझा स्वभाव आहे, की मी कुठल्याही तऱ्हेचं गाणं कमी प्रतीचं मानत नाही. ठुमरी असो, गझल असो किंवा भजन असो, सूर पक्का पाहिजे.

( परचुरे प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या 'सुजनहो!' या पुस्तकातून साभार.)

हि मुलाखत आपण इथे ऎकु शकता --> भिमसेन जोशी आणि पु.ल.

Thursday, November 20, 2008

सावरकर आणि समाजकारण

सावरकर आणि समाजकारण
पु.ल. देशपांडे


'सावरकरांच्या जिवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती'

मित्रहो,
माझ्या आयुष्यातला हा मी एक परमभाग्याचा दिवस समजतो. पूर्वजन्मावर माझी श्रद्धा नाही. त्यामुळे ह्या भाग्याचा मी पूर्वजन्माशी संबंध जुळवू इच्छित नाही. पण हा क्षण माझ्या आयुष्यात यावा ह्याला 'भाग्य' या पलिकडे मला काय म्हणावं ते सुचत नाही.

आपण आत्ताच सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्या खोलीचा उल्लेख अंदमानतली कोठडी असा केला जातो, परंतु ज्या वेळेला एखाद्या कोठडीमध्ये प्रत्यक्ष तेजच वस्तीला येत असतं, त्यावेळी त्या कोठडीचा गाभारा होतो. आपण आता जिथे गेलो होतो तो असाच एक गाभारा झालेला आहे. तिथे एक मुर्तीमंत तेज वावरत होत. 'तेजस्विनावधीत्मस्तु' असं आपण पुष्कळ वेळेला नुसतं म्हणतो आणि म्हटलेलं विसरुन जात असतो. पुन्हा रोज म्हणत असतो, परंतु ज्याची काया, वाचा, मन, अवघं व्यक्तिमत्व अंतबार्ह्य तेजस्वी होतं अशी अलिकडल्या काळातली भारतीय इतिहासातली व्यक्ती शोधायला गेली तर वीर सावरकरांची मुर्ती डोळ्यापुढे आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक क्षण हा जीवन उजळण्यासाठी आहे अशा इर्षेने ते जगले. अधांराचे ते सगळ्यात मोठे शत्रू होते. मग तो अंधार अंधश्रद्धेने आलेला असो, अंधविश्वासाने आलेला असो किंवा पारतंत्र्याचा असो. त्या अंधाराविरुद्ध त्यांची झुंज होती. जीवनात प्रत्येक माणसाला तीन शक्तीशी सतत झूंज द्यावी लागते. बर्टुड रसेलने त्याचं वर्गीकरण केलं आहे. मनुष्य आणि निसर्ग, मनुष्य आणि समाज, आणि मनुष्य आणि तो स्वत: ह्या तिन्ही शक्तीशी त्याची रस्सीखेच चाललेली असते. 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असं तुकोबांनी म्हटलं आहे. हे एक अंतर्गत युद्ध चालु असतं. आणि युद्धाचा पहिला नियम असा आहे की मी जिंकणारच आहे अशा भावनेनेच युद्धात उतरावं लागतं.सावरकरांनीसुद्धा 'मारिता मारिता मरावे' ह्याचाच जयघोष केला होता. पराजित मनाने लढणारा माणूस कधीही युद्ध जिंकू शकत नाही. सावरकरांच्या सगळ्या साहित्यातून ज्या जिवनविषयक तत्वज्ञानातून ते साहित्य निर्माण झाले होती. त्यातून जर सार काढायंचं असेल तर तर असंच म्हणावं लागेल की, केवळ राजकिय शत्रूंवरच नव्हे तर जिथे जिथे तुम्हाला अंधश्रद्धा दिसेल, अज्ञान दिसेल तिथे तिथे वीर पुरुषासारखे त्याच्यावर तुटून पडा. म्हणूनच आधुनिक काळातल्या इहवादी महर्षींमध्ये सावरकरांच नाव आदराने घायला हवे. विज्ञाननिष्ठेवरचे त्यांचे निंबंध ह्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखे आहेत आणि ही विज्ञाननिष्ठा का? तर ती सदैव अज्ञानापोटी जन्माला येणाऱ्या अंधश्रद्धेच्या काळोखावर मात करायला निघालेली असते म्हणून. काळोख याचा अर्थ भय, आंधळेपण, सर्व क्षेत्रातलं आंधळेपण जावं ह्यासाठी त्यांनी आपल्या सर्वस्वाचा होम पेटवला.

आजच्या दिवसाचा आपण सावरकरांच्या अत्मार्पणाचा दिवस म्हणतो. केवळ तिथीच्या हिशेबात, 'जीवनाध्वरि पडे आज पूर्णाहुती' ह्या दृष्टीने हा दिवस आत्मार्पणाचा म्हणणे संयुक्तिक होईल. पण वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून त्यांच्या जीवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती. 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार' अश्या निष्ठेने ज्यांच्या जीवनातली वाटचाल क्रांतिपथावरुन चालत असते त्यांचा मृर्त्यु हा सांगाती असतो. आपण पुष्कळसे लोक केवळ मरता येत नाही म्हणुन जगत असतो. क्षणोक्षणी मरणाच्या धास्तीने जगत असतो. असल्या जगण्याला श्वासोच्छवास घेणे यापलिकडे फारसा अर्थ नसतो. परंतू ज्या वेळेला मनुष्य हा श्वासोच्छवास मी कशासाठी घेतो आहे याचा विचार करील त्यावेळी सार्थ जगण्याचा वाटा तो शोधायला लागेल आणि जिथे राजकिय धार्मिक किंवा आर्थिक दडपणामुळे आलेला गुदमरलेपणा, धूत:शरीरेण मृत:स जीवती अशी परिस्थिती त्याला आढळेल. जिथे जिथे म्हणून मोकळा श्वास घेता येत नाही तिथे उडी मारून तो श्वास मोकळेपणाने घेता येण्याची परिस्थिती निर्माण करण्यासाठी स्वत:चे प्राण पणाला लावेल त्याचवेळी ते जगणं खर्‍या अर्थाने पारमार्थिक होईल. आपण पारमार्थिक ह्याचा अर्थ गळ्यात माळा आणि कपाळी टिळा लावून जयजय राम कृष्ण हरी करित राहणं असा करतो पण जोवर माणुस आणि निसर्ग, माणुस आणि माणुस, माणुस आणि तो स्वत: ह्या द्वंद्वांना सामोरे जाऊन ती कोडी उलगडण्याच्या मागे लागत नाही तोवर ते जगणं केवळ आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या चौकोनातच पशुवत सीमित राहिल. ते पारमार्थिक होणार नाही आणि एकदा का ह्या जीवनाचं यशार्धत्व पटलं की मग चित्त भयशून्य होत. प्रथम ते मुक्त होतं मरणाच्या महामायतून. सावरकरांना मुर्त्युंजय म्हणायचं ते ह्या अर्थाने.

ह्या जेलमध्ये आजसुद्धा पहा. हे पर्यटनस्थान असूनही नुसत्या त्या जेलच्या विराट स्वरुपामुळे सारं कसं भयाण वाटतं.
आपण कल्पना करा १९११ साली वर्षापूर्वी यापुढली थोडी थोडकी नाही पन्नास वर्ष या ठिकाणी डांबलेल्या असस्थेत सजा भोगण्यासाठी ते शिरत होते. भोवताली दैत्यांसारखे पहारेकरी होते ब्रिटीश सत्ता टिकवण्यासाठी. स्वातंत्र्य हा शब्द उच्चारण्यालाही ठार मारणं, त्याचे अनन्वित हाल करणं हा त्यांचा खेळ होता. अशा ह्या नरकपुरीत प्रवेश करताना सावरकरांनी उद्गार काय काढावे? ते म्हणाले होते, 'मित्रांनो एक दिवस इथे आमचे पुतळे उभे राहतील. मी जिंकणारच ह्या आत्मविश्वासाने युद्धात पडायचं असतं.' ह्या तत्वज्ञानाच्या खरेपणाचं आणखी दुसरं उदाहरण आवश्यकच नाही. हा भाबडा विश्वास नव्हता. साम्राज्यशाहिच्या आत्म्याचे गणित ते वैज्ञानिक पद्धतीने मांडू शकत होते. लोंकांमध्ये गूलामगिरीविरुद्ध द्वेष उत्पन्न होत असलेले ते पाहत होते. त्या द्वेषाला सामर्थ्या़ची जोड हवी याची त्यांना जाणीव होती. त्यासाठी प्रथम आपल्या देशबांधवांच्या मनाचे सामर्थ्य अपरंपार वाढवले पाहिजे याची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी देवधर्मापेक्षा 'राष्ट्र' ह्या कल्पनेला अग्रमान दिला. आमचे देव इंग्रजांच्या बंदीत नव्हते. त्याची षोडपचार पुजा चालू होती. धर्मातही राज्यकर्ता इंग्रज लुडबुड करीत नव्हता. पण इथला माणुस मात्र त्याला सदैव दुबळाच राहायला हवा होता. सावरकरांनी हिंदु हा शब्द्च राष्ट्राला समानार्थी करुन टाकला. मी हिंदुस्थानाचाच रहिवासी आहे. माझी पुण्यभू, मातृभू, धर्मभू हिंदुस्थान हीच आहे असे म्हणणारा तो हिंदू, अशी त्यांनी धर्माची इहवादी व्याख्या बनवली आणि त्या हिंदुला समर्थ करण्यासाठी त्यांनी इथल्या रहिवाश्यांना तुम्ही 'अमृताचे पुत्र' अहात. तुम्ही मरण स्विकारायचे आहे ती होतात्म्यातून तुम्हाला अमर करणारे- हा मंत्र सांगितला हिंदू-मुसलमान-खि्स्ती कुणाचाही देव दुबळ्याच्या मदतीला धावत नाही हे ते पक्के जाणुन होते. त्यांनी सतत जर कसला धिक्कार केला असेल तर तो दुबळेपणाचा. दैववादाचा, मनुष्य बुद्धीच्या निकषावर प्रत्येक गोष्ट घासून मगच ती स्विकारतो. त्यावेळी त्याच्या आचारविचारांत एक निराळेच तेज दिसू लागते. तो जय-पराजयाची भाषा करीत नाही प्रयत्नात आपण कमी पडलो असे मानुन पराजयाच्या क्षणीही पुन्हा उठुन उभा राहतो. मर्ढेकरांनी म्हटलं आहे 'भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी.' एखाद्या दृश्याने किंवा कल्पनेने भावनाबंबाळ होणं ह्याला अर्थ नाही. उदाहरणार्थ हा सेल्युलर जेल पाहून मी लगेच भावनाविव्हळ होऊन ओक्साबोक्सी रडायला लागणं आणि थयथयाट करून मला किती दु:ख झालं आणि सावरकरांना भोगाव्या लागलेल्या भळाच्या आठवणींनी मी किती व्हिवळ झालो याचं प्रदर्शन माम्डणं म्हणजे माझी भावना शंभर टक्के खरी आहे असं नाही. एखाद्या गोष्टीच्या बाबतीतली उत्कट भावना तिला अश्रूंची वाट करून देण्याने सिद्ध होत नाही. उलट स्वत:ला आवर घालून जे कार्य हाती घ्याचं असतं. ते करण्याच्या हेतूने सामर्थ्य मिळायला लागणे हे महत्वाचं असतं.

आत्ताच श्री. हर्षे यांनी सांगितलं की सावरकरांच्या विषयीच्या माझ्या काही आठवणी असल्या तर त्या मी सांगाव्या. खरं सांगायचं तर त्यांच्याजवळ जाण्याची छाती आणि हिंमत मला नव्हती. सुर्याचं तेज दुरून घ्यावं, फार जवळ गेलो तर भस्मसात होण्याची भि्ती. त्यामुळे आम्ही सावरकरांना भेटत आलो ते त्यांच्या पुस्तकातून. पण माझ्या आयुष्यात एक सुंदर क्षण आला होता तो म्हणजे परशुरामभाऊ कॉलेजच्या मैदानावर त्यांचा मृत्यंजय समारंभ झाला त्यावेळी मी त्यांचे भाषण ऎकलं.

पारल्याला माझ्या लहानपणी सावरकरांची टिळक मंदिरात झालेली भाषणंही मी ऎकली आहेत. चांगल्या वक्तृत्वाच्या बाबतीत आपण 'गंगेसारखा ओघ' असं म्हणतो. त्या ओघाचा साक्षात्कार सावरकरांइतका शंभरटक्के मला कोणत्याही भाषणाने झाला नाही. विचार आणि उचार एकाच सामर्थ्याने तळपत असायचे. मातृभाषाप्रेम हा राष्ट्रप्रेमाचाच एक महत्वाचा घटक असतो. सामर्थ्याच्च्या उपासनेत आपल्या भाषेला जुलमी राज्यकर्त्याच्या उदासीपणातून, अवलबित्यातून वाचवणं हा विवेक सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या चळवळीमागे होता. वास्तविक एंग्रजीवर त्यांच चांगलंच प्रभुत्व होतं. मराठी भाषणाच्या ओघात एकादा मुळातला इंग्रजी उतारा स्मरणाने धडाधड म्हणत. कुठल्याही सोवळेपणाच्या भावनेने त्यांनी इंग्रजीला अब्रहण्यम मानले नाही. त्यांना आमान्य होतं ते दुबळेपणाच्या भावनेने विदेसी भाषेतल्या श्ब्दांची घूसखोरी चालू देणं. सावरकरांची ही राष्ट्रीय अस्मिता जागवण्याची भावना ज्यांनी समजून घेतली नाही. त्यांनी त्यांच्या भाषाशुद्धीची चेष्टा केला. हे शब्द रूढच होणे शक्य नाही असे म्हणायला सूरुवात केली. पण ते सरकारी शब्दांच्या टाकसाळीत तयार केलेले नव्हते. एका प्रतिभावंत कवीची ती निर्मीती होती.

सरकारात मोले घातले रडाया (की खरडाया?) ह्या भावनेने भाषाशुद्धीचे पगारी कर्मचारी जेव्हा बसतात तेव्हा"ते इकडली इंग्रजी डिक्शनरी आणि कर त्याचा मराठी शब्दकोश' असा व्यवहार चालतो. सावरकरांना तो शब्द कोशात पडून राहणारा नको होता. तो कवितेसारखा लोंकाच्या तोंडी रूळायला हवा होता. त्यांनी रिपोर्टरला 'वार्ताहर' हा शब्द निर्माण केला. वार्ता खेचून आणणारा. इथे इंग्रजी शब्दाच्या ठिकाणी मराठी प्रतिशब्द असे होता, एक कविनिर्मीत प्रतिमा तयार झाली. प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले. हे शब्द सावरकरनिर्मीत आहेत ह्याचा देखील लोकांना विसर पडला. आज महाराष्ट्रात सामान्य माणसाला मेयरपेक्षा महापौरच जास्त अप्रिचित आहे. वृत्तपत्रांच्या क्षेत्रात तर संपादकापासुन स्तंभापर्यंत अनेक मराठी शब्द त्यांनी दिले आहेत. तीच गोष्ट चित्रपटसुर्ष्टीची, दिग्दर्शन, संकलन, ध्वनिमुद्रण, पटकथा हे सारे त्यांचे शब्द. मराठीला त्यांचं हे सत्व जागविण्यासाठी दिलेल मोठं देण आहे. शिवाय ते उत्तम वक्ते असल्यामुळे शब्द निर्मिती करताना त्यात उच्चारांचा सोपेपणाही त्यांनी सांभाळला. पुष्कळदा मला वाटतं की भाषेचं सामर्थ्य म्हणजे काय, ओघवती भाषा म्हणजे काय ह्याचा मुलांना साक्षात्कार घडवायचा असेल तर त्यांच्याकडून सावरकरांचे 'माणसाचा देव आणि विश्वाचा देव.' दीन शब्दांत संस्कृती, ह्या सारखे निंबंध मोठ्याने वाचून घायला हवेत. वैचारिक संस्कार आणि भाषेचे उत्तम संस्कार ह्या दोन्ही दृष्टीनी हे वाचन उपयोगी ठरेल. सावरकरांच्या जीवनात तर ग्रीक नाट्य़ातल्या महान नायकांसारखं नाट्य होतं. आणि ते त्यांच्या वाणी-लेखणीतूनही ओसंडत होतं. ते स्वत: नाटककार, थोर कवी असल्याचा दुर्दवाने त्यांच्या केवळ राजकिय कर्तूत्वाकडेच पाहिल्यामुळे विसर पडतो. 'उत्कट भव्यतेज्याचे मिळमिळीत अवघेची टाकावे' हा समर्थांचा उपदेश सावरकरांइतका तंतोतंत आचरणात आणलेला क्ववित आढळतो. त्यामुळे कवितेत देखील ते कल्पनेची हिमालयीन शिखरे गाठतात. प्रियकर प्रेयसीच्या मीलनाच्या प्रतिक्षा काळाबद्दल कविता लिहिताना ते म्हणतात-

'शतजन्म शोधताना शत आति व्यर्थ झाल्या !
शत सुर्यमालिकांच्या दिपावली विझाल्या !’

कालाचं किती विराट स्वरूप दोन ओळीत त्यांनी उभं केलं आहे पहा ! एका सुर्य मालिकेचं चित्र डोळ्यांपुढे आणताना आपण थकून जाऊ हा महाकवी शतसुर्यमालिकांच्या दिपावली विझाल्या म्हणून जातो. इतकी प्रचंड प्रतिमा घेऊन आलेल्या ह्या कोठडीत राहावं लागलं आणि ही भयाण कोठडी 'कमला सप्तर्षी, विरहाच्चवास असल्या प्रतिभेची उत्तुंग शिखर दाखवून देणाऱ्या काव्यांचं जन्मस्थळ ठरली.

ह्या कोठडीत त्यांनी जे हाल सहन केले त्याची कल्पना 'माझी जन्मठेप' वरुन येते. पण मला वाट्तं. त्यांनी खरोखरी जे शारीरिक आणि मानसिक हाल सहन केले असतील त्यातल्या एक दशांशाचं सुद्धा वर्णन त्यात लिहिलेलं नसेल. कारण हालाच वर्णन करताना त्यांना जराही संषय आला असावा की ह्या कथनामुळे लोकांच्या मनात करुणा उत्पन्न होणार आहे. तर त्या महापुरूषाला ते कदापीही रुचलं नसतं. म्हणून मला नेहमी वाटतं की इथे झालेले सगळे हाल त्यांनी लिहीलेच नाहीत. त्यांना हे पुस्तक वाचुन एखाद्या आजीबाईंनी 'आई आई गं काय हो हे हाल' म्हणायला नको होत, त्यांना असल्या हालावर मी मात करीत अशा विश्वासाने ह्या संकटात उडी टाकायला सिद्ध होणारा तरुण वाचक अभिप्रेत होता. स्वत:बद्दलची कणव निर्माण करण्याचा किंवा आपल्या त्यागाचे भांडवल करण्याचा तिटकारा होता. वार्ध्यक्याच्या काळात ते कुणालाही भेटायला उत्सुक नसत. 'त्याच कारण मला तरी असं वाटतं, की आपल्या आयुष्यातल्या थकलेल्या अवस्थेत आपल्याला कुणी पहावे हे त्याना आवडणं शक्य नव्हतं. एखाद्या म्हाताऱ्या सिंहाला वाचा फूटली तर तो जसा म्हणेल. 'मला सर्कशीतला सिंह म्हणून काय पहाता. जंगलात हत्तींची गंडस्थंळ फोडीत होतो तेव्हा पहायचं होतंत-' त्याच वृत्तीने ते एक प्रकारच्या एकांतात राहिले त्या वाधंक्यात एकच व्याधी त्यांना आतून पोखरत होती. ती म्हणजे देश दुभंगल्याची अशा अवस्थेतच त्यांनी मृत्युला आपण सामोरे जाऊन भेटण्याचा निश्चय केला.

विज्ञाननिष्ठ सावरकरांचे त्यांना धर्माभिमानी संकुचित म्हणणाऱ्यांना त्यांच्या मृत्युच्या प्रसंगी एक हादरून टाकणारे दर्शन झाले. आपल्याकडे बहुतेक लोकांची बुद्धिनिष्ठा औद्वदेहीक संस्काराच्या प्रसंगी लुळी पडते. परंपरागत रुढींचे पालन केले नाही. तर मानगुटीला बसेल त्याला नरकवास घडेल अशी नाना प्रकारची भीती मनात असते. मरणाऱ्याचीही आपल्याला मंत्राग्नी मिळावा-भंडांग्नी नको अशी अखेरची इच्छा असते आणि मुख्यत भितीपोटी ह्या इच्छेला त्याचे उत्तराधिकारी मान देत असतात. आणि अशा ह्या परिस्थितीत सावरकर आपल्या अखेरच्या इच्छापत्रात आपलें शव विद्दुत दाहिनीत टाकून द्यावे अशी इच्छा व्यक्त करतात. हे शव आहे त्याला एक काष्ठ या पलिकडे अर्थ राहिलेला नाही असं मानणं हे आद्द शंकराचार्यासारखं झालं. आद्द शंकराचार्याची आई मरण पावली. ब्राह्मणांनी तिच्या अंत्यंसंस्कारावर बहीष्कार टाकला. मृतदेह एकट्या शंकराचार्यांना उचलून स्मशानात नेता येईना. त्यांनी हे काष्ठ आहे. असं म्हणुन त्या मृतदेहांचे तीन तुकडे केले आणि एकेक तुकडा नेऊन दहन केले. विज्ञानिष्ठेची हीच परंपरा सावरकरांनी पाळली. आज आम्ही पाहतो. स्वत:ला सेक्युलर म्हणवणारे लोक आपल्या इच्छापत्रात आपली रक्षा कुठल्या सोर्वात नेऊन टाकावी हे नमुद करतात. मरणानंतर उतरांवर संकुचित धार्मिक्तेचा आरोप करणाऱ्या नेंत्यांच्या रक्षा विसर्जनाचा तमाशा दहा दहा दिवस चाललेला असतो आणि सावरकर मात्र आपले शव विद्दुतदाहिनीत टाका म्हणतात.(विद्दुत दाहिनी हा शब्दही त्यांचाच असावा असे मला वाटते.) मंत्रपठणाची गरज नाही म्हणतात. नंतरच्या क्रियाकर्माची आवश्यकता नाही म्हणून बजावतात. आयुष्यभर सावरकर ह्या बुद्धिनिष्ठेचा पाठपुरावा करीत आले. अंधश्रद्धा माणसाला दुबळं करते हे सांगत आले. इहवादाचा पुरस्कार करीत आले. राष्ट्रहिताविरुद्ध कारवाया करणाऱ्यां अनुयायी मिळवण्यासाठी त्यांनी सत्याशी तडजोड करणे नाकारले. सावरकारांनी गाईला केवळ एक उपयुक्त पशू म्हटल्यावर तिच्या पोटातल्या तेहतीस कोटी देवांच्या भाकड काथांवर आपली तुंबडी भरणारे त्यांच्यावर तुटून पडले होते.

यापुढे धर्मभोळ्या-मंत्रतंत्राच्या युगात आपल्याला राहयचं नसून विज्ञानीने समर्थ झालेल्या जगात जगायचं आहे हा विचार एका विलक्षण द्वष्टेपणाने ते मांडत आले. त्या नव्या जगात जगायला आपण नालायक ठरलो तर आपण आदिम अवस्थेतल्या जमातीतल्या माणसांसारखे ठरणार आहोत, बावळट ठरणार आहोत. अशा प्रकारच्या बावळटपणाला सावरकरांना तिटकरा असे. त्यांना दुबळा, वाकलेला, लाचार असा माणुस सहनच होत नसे. तेज:पुजतेने आकर्षण त्यांच्या साहित्यातून सदैव प्रकट झालेले दिसते. स्वातंत्र्याचं नातं देखील त्यांनी ’आत्मतेजीवाले’ प्रकटणाऱ्या रवीशी जुळवलेलं आहे, त्यांनी शेवटी मृत्युला अलिंगन दिले. ते देखील तेजाच्या एका ज्योतीने दुसऱ्या प्रचंड ज्योतीत मिळून जावे तरी. मृत्युला आपल्यावर झडप घालू न देता त्याच्या दरबारी ते धोरदात्त नायकासारखे चालत गेले. समिधेसारखं जीवन जगणाऱ्या सावरकरांची जीवनयद्वत स्वखुशीने आहुती पडली.

आपण आत्ताच ह्या बंदिगृहातल्या त्यांच्या एका गाभाऱ्यात जाउन आलो. निर्भयतेचा एक उपासक तिथे ठेवला गेला होता. नाना प्रकारचे हाल त्याला सहन करावे लागले. कोणासाठी त्यांनी ते सर्व सोसलं? तुमचा आमचा श्वासोच्छवास स्वतंत्र हिंदुस्थानातल्या हवेत मोकळेपणाने घेता यावा म्हणून. आज आपण इथे येतो. निर्भयपणाने हा भयाण कारागृहात हिंडतो. ती, सावरकरांची आणि राजबंदी म्हणून ज्या क्रांतिकारकांना इथे जन्मठेपेची सजा भोगावी लागली त्यांची पुण्याई आहे. त्या पुण्याईचे आज आपण स्मरण करतो म्हणुन आजच्या दिवसाला आपण सावरकरांची पुण्यतिथी म्हणतो. त्यांनी मिळवलं ते पुण्य जपजाप करुन नव्हे तर आयुष्याचं मौल देऊन निर्भयतेची साधना करुन आणि ती साधना कृतीत उतरवून अशा प्रसंगी त्या निर्भयतेचा थोडा तरी अंश आपल्यात उतरो ही आपली प्रार्थना असायला हवी.

प्रार्थनेचा उल्लेख आल्यावर मला स्त्रोत्राची आठवण आली. मी वाचलेल्या स्त्रोत्र-साहित्यात मला सगळ्यात आवडलेल स्त्रोत्र कुठलं असेल तर ते सावरकरांनी लिहिलेलं स्वतंत्रेच स्त्रोत्र. ’जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे.’ ह्या जयोस्तुतेच्या संदर्भात माझ्या मनाला स्पर्श करुन गेलेली एक घटना सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. अस्पृश्यता निवारणाविषयींच्या सावरकरांच्या तळमळीविषयी आणि सहभोजन, मंदिरप्रवेश इत्यादी कार्यक्रमांविषयी मी आपल्याला सांगायला पाहिजे असं नाही. काही वर्षापूर्वी मी सांगलीजवळ म्हैसाळ म्हणून गांव आहे तिथे मधुकरराव देवल यांनी दलितांच्या सहकारी शेती संस्थेचा प्रयोग केला आहे तो पहायला गेलो होतो. भारतातल्या उत्तम ग्रामिण प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे. एक काळ असा होता की वस्तीतल्या स्त्रियांच्या अंगावर लज्जरक्षणापुरतीही वस्त्रं नसायची म्हणून त्यांना झोपडीबाहेर पडणं मुष्किल होतं. तिथे आम्ही गेलो त्या दलित वस्तीतली सर्व स्त्रीपुरूष मंडळी लग्नंसमारंभाला जावे तसा पोषाख करुन जमली होती. सहकारी शेतीने त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवून आणलं होतं आणि ते केवळ आर्थिक परिवर्तनच नव्हतं हे लगेच माझ्या लक्षात आलं. त्या स्त्रियां समारंभात गाणं म्हणणारं होत्या. अलीकडे कुठेही सभेला गेल्यावर गाणी ऎकावी लागतात ती बहुदा सिनेमातली किंवा प्रसंगाला साजेशी अशी तितल्याच शाळेतल्या गुरुजीनीं कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करून जुळवलेली स्वागतपर पद्दं. आणि इथे पेटीवाल्यांनी सुर धरला तबलजीने ठेका सुरू केला आणि अस्खलित वाणीने त्या दलित भगिनींनी गाणे सुरू केले. - जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे! स्वतंत्रते भगवती त्यामहं यशो युतावंदे! माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारावं, त्यांना समाजात मानाने जगता यांव- मोकळेपणाने गाता यांव वावरता यांव म्हणून सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करित ज्या सावरकरांनी जींवाचं रान केलं त्यांनी रचनेत हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रिया बिनचुकपणाने उत्तम सुराचालात गात होत्या. एखाद्याचं पुण्य फळाला येणं म्हणजे काय याचा मला त्या क्षणी अनुभव आला.

अशा या पुण्यशाली महापुरुषाला जिथे बंदिवास घडला ते हे क्षेत्र आता इहवादी सत्पुरुषाचं जिथे स्मरण करावं असं तिर्थक्षेत्र झालेलं आहे. ज्यामुळे आपल्या मनाला स्नान घडतं ते तिर्थ असं मी मानतो. भयाने, स्वार्थाने, संकुचीत वृत्तीने मालिन झालेली आपली मन धुवायला आपण आता ठिकाणी येतो. बाळारावांनी आणि श्रि. हर्षे यांनी इथे सर्वांना एकत्र आणण्याचा योग आणला. त्यांच्या आयोजनामुळे इथे येण्याचे भाग्य मला लाभले, मी त्यांचा आभारी आहे.
वीर सावरकरांच्या स्मृतीला मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. ह्या सभेची सांगता एकेकाळी ज्या गीताने आपले सारे राष्ट्र जागृत झाले होते त्या त्या गिताचे पडसाद ह्या बंदिक्षेत्रात उठवून आपण करुया. मुक्त मनाने वंदेमातरम गाऊ या धन्यवाद !
[२६ फेब्रुवारी १९८३ ह्या दिवशी, अंदमानच्या सेल्युलर तुरूंगातील मैदानात केलेल्या पु.ल.देशपांडे यांच्या भाषणावरून.]

Thursday, November 6, 2008

आवाज... आवाज...

गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात दुनिया बरीच बदलली. पण मला जाणवतो तो बदल मात्र आवाजांच्या दुनियेचा. किती आवाज हरवले. किती नवे आले. तंग तुमानी घालून रस्त्यातून हिंडणाऱ्या पोरींची जशी डोळ्यांना सवय होते तशी नव्या आवाजांची पण होते. पण रस्त्यातून सिगरेट ओढीत जाणाऱ्या कुंकू लावलेल्या बाईचं दर्शन जसं अजूनही धक्का देउन जातं तसं भल्या पहाटे ’मुझे बुढ्ढा मिल गया’ चा विलाप कानी आला तरी धक्का बसतो. अर्थात माझी आवाजाची दुनिया संगीतापुरती मर्यादित नाही. हे आवाज. उघडेबंब आवाज. पहाटेशी कुणाचं नातं कोंबड्याच्या आरवण्याने जुळलेलं असेल.. कुणाचं जात्यावरच्या ओव्यांनी असेल.. कुणाचं देवळ्यातल्या सनईने असेल. ही नाती काव्यमय. आमचं अगदी गद्द नात पण म्हणून त्या नात्याची जवळीक कमी नव्हती. दाराची कडी वाजायची. आवाज यायचा "बाई दो ध" मग ते दुध भांड्यात ओतल्याचा आवाज. त्या आवाजाबरोबर झोपेचा निरोप घेतला जाई. मग स्टोव्हने सूर धरलेला असायचा. सकाळीच वाटर डिपारमेण मध्ये ड्युटीवर जाणाऱ्या बापू नाबराच्या चपलेची चटक फटक चटक फटक. एक तारखेच्या दिवशी मोटी चटक फटक करीत कामावर जाणारी ती पावलं महिनाखेरीस फसाक फसाक करीत घासत जायची. साऱ्या महिन्याच्या ओढगस्तीचा इतिहास त्या चपलांचा आवाह सांगत असे. तेवढ्यात वर्तमानपत्रवाल्या पोराची ललकारी. इकडे कुठेतरी मोरीत पाण्याच्या बादलीत नळाने धरलेल्या अभिषेकाचा सूर, त्या काळात नळाच्या नरड्यांना इतकी कोरड पडलेली नव्हती. ’बुडभुडभुडभुड फा~~श’... गोंद्याच्या बाबाचं स्नान सुरू. ’खिस खिस खिस फचपूरू’.... अंगाला साबण लावताहेत. ’शू~~ हुश्श फू~~ फ्फ्फ’... म्हणजे पंचाने अंग चोळायला सुरूवात. अणि ’क्ल ~ स्क~~’ म्हणजे "निऱ्या काढलेलं धोतर घेउन उभ्या रहा~" "ईट ज्याडारे क " ही आरोळी आली की सकाळचे आठ वाजले म्हणून घड्याळ लावून घ्यावे. एका भल्या मोठ्या टोपलीत काळं आणि पांढरंशुभ्र मीठ विकणारे. हे जाडाबारीक मीठवाले हल्ली काय विकतात कोण जाणे. "ईट ज्याडारे क" ह्या आणि असल्या आवाजांचा अर्थ कळायला मात्र कान तयार लागतात.

गाण्यातल्या दर्दी लोकांना जसं गवयानं पहिलं ’ट्यॅ ह्यॅ’ केलं की भीमपलास की भूप किंवा जो कोणता राग असेल तो कळतो त्याचप्रमाणे आवाजाच्या दुनियेतील आरोळ्यांचं आणि नाना तरहेच्या ध्वनीचं होतं. ते ध्वनी नव्हतेच. ती संपृर्ण ध्वनिचित्रंच होती. "येत्रिउरो~स." म्हणजे छत्री दुरुस्त हे कळायला जाणकारीच हवी. "लायचियल्हिहो" ही कल्हय वाल्याच्या आगमनावी नांदी होती. "आयरे प्पो ओ ~स" म्हणजे पायरी हापूस होता. हे सगळे ध्वनीचित्रकार गेले कुठे.. हापुसवाले आणि कल्हई वाले दिसतात. पण मग ते आपण आलो आहोत असं सांगणारी ती ललकारी का देत नाहीत. "पायरेप्पोहोस" ची आरोळी प्रथम कानी यायची ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात. परीक्षा तोंडावर आलेल्या असायच्या. चोवीस एप्रिलला जे काही बरे वाईट निकाल लागायचे ते लागले की चाळी ओस. मंडळी पोरांना घेऊन आपापल्या गावाला पळायची. कोकणवाल्य़ांना बोटीचा भोंगा केव्हा ऐकीन असं व्हायचं. घाटावरची माणसं अगिनगाडीची शिट्टी झाली की डोळ्यापुढे आपापल्या गावाकडं वळणारी वाट आणीत गाडीच्या गर्दीत बसायची आणि परवाच मी पाहिलं.. आगगाडीच्या शिट्टीचासुद्धा बदलला. हल्ली ती पूर्वीसारखी ’कू~ क’ करत नाही. ’भ्या.~’ असा बिभस्त आवाज काढते. विस एक म्हशी एकदम हंबरल्यासारखी हंबरते आणि "नेते रे चांडाळानो तुम्हाला ओढीत" असं म्हणते. ’भ्यां’ चा अर्थ तो आहे. ’कू~~क’ म्हणजे "अरे चला चला.. मज्जा येइल आता" असा होता.

आगगाडीत तर आवाजाच्या कसल्या एकेक तरहा. बोटीत फक्त इंजीनची धडधड आणि अधुन मधून पूर्वी ट्रामची घंटा असे तसली टण टण टण टण अशी खोल कुठे तरी वाजणारी घंटा. आगगाडी एक तर ठेक्यात जाते. लेझमीत जशी आधी संथपणाने तांग टुक ताकड तुं तुं तांग तुक्क ताकड तुम अशी धीमी लय सुरु होते तसंच इंजिनाचाही. इंजिन.. तबलजी जसा आधी उगीचच डग्याचे ढूं~म करुन तबल्यावर थाप मारतो तसा ’फा~~स.. फ्फू~~स" असा वाफेचा भलाथोरला निश्वास टाकतं. मग चाकापासून ते कूठे कुठे लोंबणाऱ्या साखळ्या.. पंखे .. हापटणारी दारं ह्या सगल्य़ा वाद्दांसकट लेझमीसारखा तो संथ ठेका सुरू होतो. आणि हळू हळू वाढत्या लयीचा गमतीचा रंग भरायला लागतो. मला वाटतं अनेक तबलजींना आगगाडीच्या ठेक्यांतून तुकडे सुचले असतील. आगगाडीसारखा तालिया नाही. गाडीच्या खिडकीशी बसावं आणि आवाज लावावा. हव्या त्या तालाचं गाणं घांव.. मस्त साथ चालू असते. लांबच्या पल्ल्यांना लय वाढल्यावर तर बघायलाच नको. पण आपण स्वत: न गातादेखील आगगाडीत खास स्वतःची मैफल चाललेली असते. विशेषत: फर्स्ट क्लासच्या वरच्या बर्थवर झोपावं पंख्याने सुर धरलेले असतात. त्यातून अक्षरक्ष: सतारीसारख्या गती चाललेल्या असतात. बरं हा फर्मायशी प्रोग्राम असतो हे पुष्कळांना ठाउक नसावं. पण खानदानी गाण्याची आपण पंख्याला फर्माइश करावी.." बेटा चलो भूपही सुनेंगे .." मनाशी भूप घोळवावा की पंख्यातून चक्क भूप सुरु होतो.’ ज्यांना भूप येतो त्यानी आपल्या जोखमीवर गाऊन पहावा’. डब्याखालची चाकं लगेच ठेका पकडतात. अर्थात पंख्याची एक सवय आहे. सांगणाराला गाण्याची जाणकारी आणि चिजाबीजांची याददास्त चांगली असली तरच ही मैफल ऎकायला मिळते. मात्र कऱ्या खानदानी कलावंताप्रमाणी पंख्याची मैफल ड्युटी बजावत असतो. त्याचा सुरू लागत नाही. गाडीत पंख्याच्या मैफली मी खूप ऐकल्या आहे. आणि मैफैलींचे इंटर्वलही सुरेख पडायचे. स्टेशन आलं की एकदम अनेक आवाजांची नुसती कारंजी उडायची. "च्याय ये रे म" "पानी डिग्रेट व्यॅ च्ये ~स" पासून ते "रम दो ~ध" पर्यंत वेदांचे जसे ठाराविक उच्चार आहेत तसे फेरीवाल्यांचेही आहेत. उद्या कोणी "च्यायेरेम" ऎवजी "गरम चहा~" असं स्वच्छ म्हणाला तर त्याला काढून टाकतील. खानदानी गाण्याला हे असले आवाज काढण्याचं शास्त्र जरा अधिक जवळ आहे. इथे बोलताना अडवणूक करणाऱ्या व्यंजनांना मुळी स्थानच नाही. आवाजची फेक म्हणजे नुसत्या स्वरांची फेक. तिथे "चहा गरम" किंवा "पान विडी सिग्रेट माचीस हे एवढं म्हणून आवाज फेकलाच जात नाही. ही दुनिया आवाजाची आहे. इथे अर्थ आहे तो आवाजाला. "च्यायरेम" म्हटलं की एकदम चहाच्या भरलेल्या किटलीतून ’चुळळळळ’ असा आवाज होत कप भरत आला हे दृश्य डोळ्यापुढे आलं पाहिजे.
----
गडबड- आवाज -आरडाओरडा हे मुळी साध्याभोळ्या मनमोकळ्या स्वभावाचे लक्षण आहे. आतल्या गाठीची माणसं गप्प बसतात. मुंबईची ट्राम गेली त्यावेळी आपली जुनी मैत्रीण गेली म्हणून त्या वेळी त्या मोकळ्या अनाथ रुळाकडे पाहून तिच्या ठणठणाटाला संगीत मानणाऱ्या मुंबईकरांनी डोळ्यातून टिपू काढली होती. हे आवाज असे जातात आणि नव्या आवाजाच्या दुनियेत आम्ही परके होतो. मग ते जुने ध्वनिमित्र आठवत पडायचं.

मध्यरात्र उलटून जाते. बाहेरचं ध्वनिविश्व शांत झालेले असतं. आता फक्त ऐकू येतो एकच आवाज भिंतीवरच्या घड्याळाचा टिक टिक टिक टिक. कालपुरूषाचं ते कायमचं पुटपुटणं. त्याला प्रतिसाद देणारा आवाज सहसा येत नाही. पण मध्यरात्री इतर आवाज बंद झाल्यावर बिछान्यावर पडल्यापडल्या ती टिकटिक ऐकताना सहज छातीवर हात जातो. तिथल्या टिकटिकीचं भिंतीवरच्या त्या पुटपुटणाऱ्या काल पुरुषाशी त्या निवांत वेळी संभाषण चालू असतं. अजूनही त्याचा अर्थ लागत नाही. छे छे! आवाज हवा. आयुष्य म्हणजे आवाज. ते संपल की पुढं मग काय, शांतताच.

अपुर्ण (उरलंसुरलं)

- पु.ल. देशपांडे
मुळ स्त्रोत -- मायबोली