Friday, December 13, 2019

मी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट.. - दिग्विजयसिंह ठोंबरे

दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगरवरून एका वकील मित्रासोबत घरी येत होतो. वाटेत ट्रॅफिकमुळे त्यांची व माझी चुकामुक झाली. तेव्हा ते रहात असलेल्या बिल्डिंग जवळ येऊन मी त्यांस रूमवर पोहचला का अशी फोनवर विचारणा केली असता ते "हो" म्हणाले त्यावर "या खाली चहा घेऊ" असा प्रस्ताव मी त्यांच्यापुढे ठेवताच ते म्हणाले,

" तुम्हीच या वर मी कपडे काढली आहेत "
माझ्या चहाच्या प्रस्तावाविरोधात त्यांनी मांडलेला प्रतिप्रस्ताव ऐकून मला प्रचंड हसु आल. विनोद हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक असायला हवा. असा विनोद हेरण्याची कला अवगत होण्याचं श्रेय मी पुलं च साहित्य जे माझ्या वाचनात आल त्यास देतो. पुलं चा विनोद कळण्यासाठी एक पर्याप्तता गाठावी लागते तरच पु.ल. समजतात व ती पर्याप्तता आपण गाठली आहे असा गैरसमज मी माझ्या मनात बाळगत असताना आज सकाळी एक वर्तमानपत्र वाचत होतो. त्यात आज पुलं ची पुण्य तिथी आहे असे वाचनात आले. मग काय अश्या या विनोदाच्या बादशाहावर काहीतरी लिहिण्याचा मोह आवरण कठीण झालं. त्यातच एक कल्पना सुचली, आमच्याच सोसायटीमध्ये पुलं चा सहवास लाभलेले "कैलास जीवन" या नामांकित ब्रँडची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे श्री.राम कोल्हटकर काका राहतात त्यांच ऑफिसदेखील सोसायटीच्याच दुसऱ्या मजल्यावर आहे. त्यांचीच भेट घेऊन पुलंबद्दल त्यांलाच बोलत करूयात.....

ही सुचलेली कल्पना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी कैलास जीवनच्या ऑफिसचाच भाग असलेले बंधुतुल्य प्रशांत भागवत यांस मी सदरची कल्पना सांगितली.

त्यांनी देखील माझा भेट घेण्याचा उद्देश रामकाकांस कळवून थोड्याच वेळात माझी व राम काकांची भेट घडवून आणली.

यापूर्वी झालं का जेवण? काय चाललय? या व अश्या प्रकारचे प्रश्न विचारण्यापलिकडे अनुभव नसलेला "मी" व माझ्यासमोर बसलेले पुलं चा सहवास लाभलेले "रामकाका" अशी आमच्यात चर्चा सुरू होण्यापूर्वी माझ्या मनावर दडपण आल्यासारखं वाटू लागलं. अश्यातच मी त्यांस प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

पु.ल. नी एवढं अफाट लिखाण केल ते कसं काय?

पु.ल. मनसोक्त गप्पा मारत असत त्यामुळे त्यांचे लिखानाकडे दुर्लक्ष होत असे ही गोष्ट ज्यावेळी सुनीताबाईंच्या लक्षात आली त्यावेळी सुनीताबाई पुलं च्या लिखाणाच्या वेळी कोणासही पुलं ना भेटू देत नसत.अगदीच जवळची व्यक्ती असल्यास सुनीताबाई स्वतः त्या व्यक्तीबरोबर गप्पा मारत असायच्या. सुनिताबाई यांनीच खरेतर पुलंला लिहीत केलं.लिखाणास प्रवृत्त केलं.

पहिला प्रश्न व त्यावर काकांनी दिलेल्या उत्तरातील सहजतेने माझ्या मनावरील दडपण अलगदपणे बाजूला झालं. माझ्यातील मुलाखतकार जागा झाल्याचा मला भास होताच मी पुढील प्रश्न विचारला.

पुलं चा एखादा अप्रकाशित किस्सा तुमच्या आठवणीतील कोणता आहे?

८ नोव्हेंबर ला पुलं चा वाढदिवस असतो.येणारा वाढदिवस हा पुलं ची पंच्याहत्तरी असणारा होता.त्यामुळे पुलं च्या घरी भरपूर गर्दी होणार होती.वयोमानामुळे पुलं ना सगळ्यांना भेटणे शक्य नव्हते.त्यावर एक युक्ती काढून पुलं नी मला विचारलं राम तू कुठं राहतो ?

चंद्रमा अपार्टमेंट, प्रभात रोड, गल्ली क्र. ८ असे मी उत्तर देताच पुलं म्हणाले वाढदिवसादिवशी मी तुझ्याकडे रहायला येतो व ही गोष्ट कुणालाही कळता कामानये. स्वतः पुलं आपल्या घरी रहायला येत असल्यामुळे मला देखील आनंद झाला. ठरल्याप्रमाणे पु.ल. व सुनीताबाई आमच्याघरी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ नोव्हेंबर ला राहण्यासाठी आले. दुसऱ्या दिवशी पु.ल. पहाटे ५.३० वाजता उठून आवरून बसले.त्यामुळे आम्ही देखील लवकर उठून आवरताच मी पुलंना विचारले नाष्ट्याला काय करायचे? त्यावर पुलं म्हणाले,

उपीट सोडून दुसरे काहीही करा.

पुलंच व उपीटाच जमत नसल्यामुळे आम्ही पोहे किंवा दुसरा पदार्थ (आता नक्की आठवत नाहीये) नाष्ट्याला केला. नाष्टा व त्या ओघात गप्पा सुरु झाल्या तेवढ्यात आमच्या घरातील फोन वाजला. तो मी उचलताच,

राम सुनीताला फोन दे...!

कोण बोलतंय

फोन दे

आहो माझ्याकडे नाही आल्या सुनीताबाई

अरे तू फोन दे त्यांला

कोण बोलत आहात आपण असे मी त्यांस विचारताच

विजया राजाध्यक्ष अस उत्तर पलीकडून आलं.

सुनीताबाई फोन शेजारीच उभ्या होत्या परंतु नाईलाजाने आम्हास फोन ठेवावा लागला त्यामागील कारण म्हणजे पु.ल. आमच्या घरी आहेत हे कोणासही कळून द्यायचे नव्हते.

पुढे असेच काही फोन आले परंतु मी त्यांस पु.ल. सध्या कुठं आहेत हे मला ठाऊक नसल्याचे कळवले.

दुपारी माझी पत्नी चित्राने मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता आम्ही एकत्र जेवण केले व छान गप्पा मारत बसलो. त्या दिवशी रात्री मी व पु.ल. पुलंच्या घराबाहेर नेमकी काय स्थिती आहे हे पाहण्यास गेलो असता आम्हाला दरवाज्यात दोन बुके नजरेस पडले.

त्यातील एकावर लिहिल होत

"आपल्या भेटीसाठी येऊन गेलो,गुच्छ स्वीकारावा"

शरद_पवार.


तर दुसऱ्या बुकेवर लिहिल होत

"आपला आशीर्वाद घेण्यासाठी येऊन गेलो"

बाळ_ठाकरे.


एवढ्या मोठ्या व्यक्ति पुलंबद्दल बाळगत असलेला आदर काकांच्या तोंडून ऐकून पु.ल. हे एक असामान्य व्यक्तिमत्व होत याची प्रचिती मला येत होती.मी विचारलेल्या प्रश्नांची काका मनमोकळेपणाने देत असल्याने आमची चर्चा औपचारिकतेकडून कधी अनौपचारीकतेकडे वळाली हे माझ्या लक्षातच आले नाही. मी त्यांस विचारले

पुलंच्या लोकप्रियतेचा एखादा किस्सा सांगाल काय?

एकदा पुलंच्या घरी मी गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळी पु.ल. खूप आठवणी सांगत होते. "चित्रमय स्वगत" हे पुस्तक त्यावेळी ते लिहीत होते.त्यामुळे पुलंकडे असलेले फोटो बघून त्याबद्दलच्या आठवणी सांगताना पु.ल. जुन्या आठवणींमध्ये रमून जात होते. साहित्यावर बरीच चर्चा झाली व गप्पांच्या ओघात कधी रात्रीचे ११ वाजले कळलेच नाही. तेव्हा आम्ही गप्पा आवरत्या घेत मी पुलंच्या घरातून बाहेर पडलो. सोसायटीच्या खाली येताच तिथे उभी असलेली ट्रॅक्स माझ्या नजरेस पडली. साधारण १५ ते २० लोक असावेत त्या ट्रॅक्स मध्ये. त्या लोकांनी मला विचारले अहो इथे पु.ल. देशपांडे कुठे राहतात? एवढ्या रात्री अनोळखी व्यक्तींस पु.ल. याच सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर राहतात हे कसं सांगायचं असा प्रश्न मला पडला त्यावर मी सुरुवातीला त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं परंतु त्या लोकांनी

अहो आम्ही लातूरवरून आलोय

फक्त पुलंला बघायच आहे

त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं आहे

कृपया आमची भेट घडवून देता का?

त्या लोकांची पुलंला भेटण्याची ओढ पाहून मी पुन्हा पुलं च्या घरी गेलो व सुनीताबाईंला सांगितले,खाली काही लोक उभी आहेत,लातूरवरून आली आहेत त्यांला पुलं ला भेटायचं आहे फक्त,खूपच विनवणी करीत आहेत.

खूप उशीर झाला होता तरीही पुलं वर प्रेम करणाऱ्या व्यक्तींला नाराज करायचे नाही म्हणून सुनीताबाईंनी एका अटीवर त्या लोकांला पुलं ला भेटण्याची परवानगी दिली ती म्हणजे,

"पुलं बरोबर कुणीही बोलत बसायचे नाही फक्त भेटायचे"

सुनीताबाईंच्या या अटीची त्या लोकांस मी कल्पना दिली. ती त्यांनी मान्य करताच मी त्यांस पुलं सोबत भेट घडवण्यासाठी घेऊन गेलो. त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याच दिसत होतं.प्रत्येक व्यक्ती पुलंच्या पाया पडून त्यांला डोळ्यात भरभरून साठवत होती.त्यांची पुलं सोबत भेट घडवल्याचा मला देखील मनस्वी आनंद झाला.

पुलं च्या लोकप्रियतेचे अनेक किस्से आहेत परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता मी पुढील प्रश्नाकडे वळलो.

पुलंच्या बाबतीत एखादा भावनिक प्रसंग तुम्हास आठवतो का?

हो, पुलं ला महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला होता त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तर प्रमोद नवलकर सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते. त्यावेळेस बाळासाहेबांनी पुलं च्या महाराष्ट्रभूषण पुरस्कारासंदर्भात बोलण्याच्या ओघात त्यांच्या शैलीमध्ये एक वक्तव्य केले होते.त्यावेळी खूप वादंग निर्माण झाला होता. बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये ती बातमी छापून आली होती. त्यामुळे पु.ल. व बाळासाहेब यांच्यात दुरावा निर्माण झाला असावा असे लोकांस वाटत होते. या घटनेच्या साधारण वर्षभरानंतर मी ज्यावेळी पुलं च्या घरी गेलो त्यावेळी तिथे राज ठाकरे व नाट्य निर्माते मोहन वाघ आले होते राज ठाकरे पुलं ना म्हणाले,

काकांला आपणास भेटायचे आहे त्यांला आपल्याकडे घेऊन येऊ काय?

त्यावर पु.ल. उत्तरादाखल म्हणाले,

अरे कोण बाळ ना, तो कधीही माझ्याकडे येऊ शकतो. अरे तो माझा विदयार्थी आहे ओरिएंटल हायस्कुल,

मुंबईचा.

काही दिवसांनी राज ठाकरेंनी भेट ठरवली. ठरल्यादिवशी बाळासाहेब पुलं च्या घरी ४.३० वाजता येणार होते ते येत असताना पोलिसांचा फौजफाटा तसेच कार्यकर्त्यांचा लवाजमा अस काही त्यांच्यासोबत असणार नव्हतं. बाळासाहेब व पुलं च्या भेटीचा साक्षीदार होण्यासाठी मी पुलं ना विचारणा केली असता त्यांनी देखील दिलखुलासपणे त्यादिवशी उपस्थित राहण्यास मला परवानगी दिली.

आणि तो दिवस उजाडला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांस राज ठाकरे पुलं च्या घरी घेऊन आले पु.ल. वयोमानामुळे व्हील चेअरवर बसले होते.बाळासाहेबांनी पुलं ना पाहताच आपल्या गुरुचे आशीर्वाद घेतले त्यावेळी पुलं बाळासाहेबांला म्हणाले

बैस..


या घटनेचा मी स्वतः साक्षीदार होतो. हा भावनिक प्रसंग माझ्या लक्षात राहीला तो कायमचाच

साधारण तासभर त्यांच्या दोघांमध्ये दिलखुलास चर्चा झाली त्यावेळी त्यांच्या दोघांमध्ये रंगलेली चर्चा पाहून त्यांच्यात वितुष्ट कधी नव्हतेच याची खात्री पटत होती. बाळासाहेबांचं पुलं च्या घरी येण हे त्यांच्या मनाच्या मोठेपणाची प्रचिती देऊन गेलं.

जशी बाळासाहेब व पुलं यांच्यात चर्चा रंगली होती तशीच रामकाका व माझ्यात रंगलेली चर्चा वेळेची मर्यादा ओळखून मी उरकती घेतली.

रामकाकांनी भेट दिली तसेच विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली त्याबद्दल त्यांस धन्यवाद म्हणून मी ऑफिसमधून बाहेर पडलो.

दिग्विजयसिंह ठोंबरे

Wednesday, December 11, 2019

देवाची देणगी - मनमोहन रो. रोगे

‘महाराष्ट्र भूषण’ पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष संपूर्ण महाराष्ट्राने अगदी उत्साहात नुकतेच साजरे केले. एखाद्या साहित्यिकाला समस्त मराठी भाषिकांचे इतके प्रेम ‘पुलं’शिवाय अन्य कुणाला लाभले नसेल म्हणूनच, तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचे प्रथम मानकरी ‘पुलं’ ठरले होते.
एखाद्याच्या अंगात नाना कला असणे म्हणजे काय हे ‘पुलं’कडे पाहिल्यावर लक्षात येते. ‘पुलं’मध्ये काय नव्हते? ते लेखक होते, कवी होते. नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, पटकथाकार, संवादलेखक, संगीतकार, नकलाकार, एकपात्री कलाकार, वक्ते, अभिवाचक, पेटीवादक आणि प्राध्यापकही होते. अशा कित्येक क्षेत्रांत त्यांनी एकाचवेळी प्रभावी संचार केला. ‘गुळाचा गणपती’ हा चित्रपट म्हणजे सबकुछ ‘पुलं’ असे मानतात. ‘जोहार मायबाप’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेला चोखामेळा पाहिल्यावर त्यांच्यातील असीम अदाकारीची आपल्याला प्रचिती येते. एक माणूस एकाचवेळी इतकी सगळी कामे तीही प्रभावीपणे कशी करू शकतो हेच कळत नाही. बरे हे सगळे करत असताना ते समाजसेवेतही मागे नव्हते. दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’साठी तसेच डॉ. अनिल अवचट यांच्या ‘मुक्तांगण’साठी त्यांनी भरभरून मदत केली. शिवाय शाळा, वाचनालये, रुग्णालये अशा समाजोपयोगी कितीतरी संस्थांना त्यांनी नेहमीच मदत केली. अनेक कर्तृत्वान माणसे आपापल्या क्षेत्रात थोर असतात, पण इतर क्षेत्रात ती माणसे तितकी प्रवीण नसतात. एकाचवेळी अनेक क्षेत्रात प्रावीण्य असलेली आचार्य अत्रे यांच्यानंतरची व्यक्ती म्हणजे ‘पुलं’ होय. त्यांनी ज्या क्षेत्रात काम केले त्या क्षेत्रात ते अग्रगण्य ठरले. त्यांचे कोणतेही पुस्तक घ्या. एकदा वाचावयास सुरुवात केली की, ते वाचून पूर्ण केल्याशिवाय वाचक स्वस्थ बसत नाही. त्यांची अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा आणि वंगचित्रे वाचताना ‘पुलं’ वाचकांना त्यांच्यासोबत त्या-त्या ठिकाणी फिरवून आणतात. ‘पुलं’नी लिहिलेली व्यक्तिचित्रे वाचताना त्या-त्या व्यक्ती ‘पुलं’ वाचकांसमोर मूर्तिमंत उभ्या करतात आणि त्याच व्यक्ती ‘पुलं’कडून ऐकणे म्हणजे एक पर्वणीच.

त्यांचे साहित्य जाणून घ्यायचे, तर एक जन्मही पुरा पडणार नाही. त्यांचे पत्रसंग्रह आणि भाषणेही प्रसिद्ध आहेत. त्यांचे विनोद हे निखळ होते, त्यात अश्लीलता शोधूनही सापडणार नाही. घरातील सर्व वयाच्या आणि नात्याच्या सदस्यांनी एकत्र बसून ऐकावे, ऐकतच राहावे अशी त्यांची भाषा निर्मळ आणि स्वच्छ आहे. लोकांना हसवण्यासाठी त्यांना अश्लील भाषा वा आक्षेपार्ह अंगविक्षेप करावे लागले नाहीत. विनोद सांगण्याचे त्यांचे टायमिंग, ठरावीक वाक्य बोलून झाल्यावर क्षणभर घेत असलेला पॉज, प्रसंगानुरूप आवाजातील बदल, आवाजाच्या नकला हे सगळेच अप्रतिम आहे. मागील काही पिढय़ा त्यांची व्यक्तिचित्रे वाचत, ऐकत मोठय़ा झाल्याच, पण आजच्या झटपट, नवनवीन ट्रेंड बदलणा-या युगातील तरुण पिढीही त्यांची व्यक्तिचित्रे, त्यांचे कथाकथन तितक्याच तन्मयतेने ऐकतात. असे यश किती लेखकांना, कलाकारांना लाभले वा लाभते? प्रासंगिक विनोद, शब्दांवरील कोटय़ा करण्यात ‘पुलं’चा हातखंडा होता, तसेच ते हजरजबाबी होते हे ‘पुलं’ वाचताना, ऐकताना नेहमीच लक्षात येते. उगीच का त्यांना ‘कोटय़धीश ‘पुलं’ म्हणतात! ‘पुलं’नी वाचक-रसिकांच्या मनात ध्रुवाप्रमाणे अढळ स्थान प्राप्त केले आहे.

त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ची कित्येकांनी पारायणे केलीत. त्या व्यक्ती आपल्या ओळखीच्या वाटू लागतात. नारायण, हरितात्या, अंतू बर्वा, नामू परीट, नाथा कामत, नंदा प्रधान, १०० टक्के पेस्तन काका, सखाराम गटणे, चितळे मास्तर, पानवाला वगैरे व्यक्ती आपल्याला कुठे ना कुठे भेटल्यात, आपण पाहिल्यात असे वाटू लागते. ‘पुलं’चे निरीक्षण आणि त्यानंतर त्याची मांडणी इतकी उत्कट असते की त्या-त्या व्यक्तीरेखेत वाचक गुंतून जातो. बरे त्या व्यक्ती परत परत वाचताना वा ऐकताना कंटाळा तर सोडाच उलट तितकाच आनंद प्रत्येकवेळी होतो. किंबहुना कॅसेट ऐकताना पुढचे सगळे प्रसंग, वाक्ये माहितीची असताना, पाठ असतानाही ती ऐकताच तितकेच हसू येते ही ताकद आहे ‘पुलं’च्या लेखणीची आणि सादरीकरणाची. या सा-या व्यक्तिरेखा मला खूपच आवडतात, भावतात. त्यात डावे-उजवे, कमी-अधिक करणे कठीणच, तरी एक व्यक्तिरेखा ऐकताना मात्र मला हसू येते तितकेच कारुण्य वाटते (तसे कारुण्य हरितात्या, नारायण, वगैरेतही आहे.) आणि ती व्यक्ती आपल्याला कधीतरी भेटली पाहिजे होती, त्या व्यक्तीचा सहवास काही काळ तरी मिळायला हवा होता असे वाटते. ती अजरामर, साधी-सरळ, किंचित रागीट-खूप प्रेमळ, दणकट तितकीच सहृदयी, स्पष्टवक्ती व्यक्ती म्हणजे ‘रावसाहेब’ होय. ‘पुलं’नी प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी ‘म्हैस’ही अजरामर केली आहे, पण रावसाहेब लाजवाबच!

रावसाहेब बेळगावचे तरी मराठी अभिमानी, नाटक-संगीताची आवड असलेले. आपल्याला एकही वाद्य वाजवता येत नसल्याची खंत बाळगणारे, गर्भ श्रीमंतीत जन्म होऊनही श्रीमंतीचा माज नसलेले, मैत्रीसाठी काहीही करण्यास तयार असलेले, ज्या मित्राविरुद्ध कोर्टात केस त्यालाच आपल्या घरी पाहुणचार करणारे, चोरी करणा-या नोकराची परिस्थिती कळल्यावर त्याला शिक्षेऐवजी मदत करणारे, खाँ साहेबांच्या गायनाने तृप्त होऊन त्यांचे पाय चेपणारे, स्वत: थिएटरचे मालक असूनही हौशी कलाकारांच्या नाटकात कुणाच्या पायाला खिळा चुकून टोचू नये म्हणून स्वत: रंगमंचावर झाडू मारणारे रावसाहेबच! श्रीमंतीचं वारं अंगावरून गेलं की ब-याच लोकांच्या मनाला लकवा भरतो. माणसे अपयशापेक्षा यशानेच अधिक मुर्दाड बनतात पण रावसाहेब त्याला अपवाद होते. ‘दूधभात’ चित्रपटाची कथा कै. राम गबाळे आणि ‘पुलं’ रावसाहेबांच्या बंगल्यात लिहीत होते तेव्हाची रावसाहेबांची घालमेल, भाबडेपणा, निष्पाप वृत्ती आणि निरागसता हे सगळे ‘पुलं’च्या शब्दात पुन्हा पुन्हा ऐकावे इतके सुंदर आहे. काही वर्षाच्या सहवासानंतर ‘पुलं’ बेळगाव सोडणार हे समजल्यावर अतिशय दु:खी होऊनही ते दु:ख दाबून ठेवून ‘पुलं’ निघाल्यावर त्यांना ‘कशाला आला होता र बेळगावात?’ असे आपल्या बेळगावी सुरात विचारून ऐकणा-याचे काळीज चिरणारे रावसाहेबच! रावसाहेब ऐकताना त्यांच्यातील एक-एक पैलू ‘पुलं’नी असा काही उलगडत नेला आहे की, आपण त्यात गुंतून जातो.

रावसाहेबांच्या मैफलीत येणा-या एकूण एक व्यक्ती आपल्या ओळखीच्या होतातच पण त्या मैफलीत आपण कधी हजेरी लावतो तेच कळत नाही. मैफलीतील प्रत्येकाची रावसाहेबांनी आपल्या कानडी ‘टच’मधून मराठीत उडवलेली टोपी ऐकताना हसू आवरता येत नाही. त्यांच्या संवादात मराठीला सणसणीत कानडीचा आघात आणि कानडीला इरसाल मराठीचा साज असे. दर तीन शब्दामागे एक कचकचीत शिवी ठरलेलीच. मग ते नाक्यावरच्या मोचीसोबत बोलत असो वा जिल्ह्याच्या कलेक्टरशी. इतकेच नव्हे तर रावसाहेबांची जिमी नावाचा कुत्रा होता त्यालाही रावसाहेबांच्या शिव्या समजत असत. नाटय़प्रयोगाला गेल्यावर त्यातील सुमार नट पूर्वीच्या गाजलेल्या नटांच्या भूमिका करताना असह्य झालेले आणि पुढे एका नाटय़गीताची चाल बदलताच संतप्त झालेले रावसाहेब त्या नटाला खडसावून विचारणारे रावसाहेब तसेच तबलजी त्यांच्या मनासारखे वाजवत नसल्याने त्याला ‘तबला वाजिवतो की मांडी खाजवतो रे?’ असे खडसावून विचारणारे रावसाहेब! प्रत्येक प्रसंगानुरूप ‘पुलं’नी रावसाहेबांमधील ही सच्चाई, खरेपणा असा काही रंगवला आहे की रावसाहेब संपूच नये, ऐकतच राहावे असे वाटते आणि म्हणून एकदा-दहा वेळा-शंभर वेळा ऐकूनही रावसाहेब पुन्हा-पुन्हा ऐकतो आपण. आवेग आवरणे हे सभ्यपणाचे लक्षण मानले जाते, ते रावसाहेबांना जमत नसे तरीही रावसाहेब सभ्य होते, शुद्ध होते.

रावसाहेबांना लेडीज सितारिस्टचे फार वेड होते. त्यांच्या गाडीच्या मागेही लेडीज सितारिस्टचे चित्र लावलेले होते. ‘पुलं’ना आयुष्यात हजारो-लाखो माणसे भेटली तरी त्यांना पहिल्या भेटीत खिशात टाकणारे रावसाहेबच याची कबुली प्रत्यक्ष ‘पुलं’नीच दिली आहे. ‘पुलं’ स्वत:बरोबरच रावसाहेबांना अजरामर करून गेले. आपले भाग्य थोर म्हणून ‘पुलं’च्या या मातीत आपण जन्म घेतला. शेवटी ‘पुलं’ म्हणतात ना तेच खरे, ‘देवाने आमचे लहानशे जीवन समृद्ध करायला दिलेल्या या देणग्या, न मागता दिल्या आणि न सांगता परत नेल्या!’

मनमोहन रो. रोगे
(मोबाईल – ९८६९१८०९५८)
प्रहार
१७ नोव्हेंबर २०१९

Monday, December 9, 2019

माझी आ‘पुल’की - मधुरा दातार

अष्टपैलू कलाकार आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या बहुरूपी पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल काही लिहिण्याइतकी मी फोठी नाही. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची अनेक रसिकांप्रमाणेच मीही एक चाहती आहे. एकदा संध्याकाळी कमला नेहरू उद्यानाजवळ मला पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई दिसले. त्यावेळी मी फक्त सात वर्षांची होते. आई-बाबांकडे हट्ट करत मी त्यांच्या पाठोपाठ गेले आणि त्यांना विचारलं, ‘तुम्ही पु. ल. देशपांडे ना? तुमचा निवडक पु.ल. हा कार्यक्रम मला फार आवडतो.’ तेव्हा काहीही ओळख नसताना त्यांनी आणि सुनीताबाईंनी मला आणि आई-बाबांना अगदी प्रेमानं त्यांच्या रूपालीमधल्या घरी नेलं.
       
मी दुसरीत होते. मला काहीच कळत नव्हतं. त्यांनी मात्र त्यांच्या स्वभावाप्रमाणे इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, की आपण आपल्या आजी-आजोबांशीच बोलतो आहोत, असं मला वाटलं. अगदी साध्या, सरळ, घरगुती गप्पा झाल्या. मी मराठी माध्यमात शिकते हे कळल्यावर, ‘बरं झालं. नाहीतर इंग्लिश मीडियममध्ये शिकणारी आजची मुलं आज गोकुळाष्टमी आहे, हे सांगताना आज लॉर्ड क्रिश्नाचा बर्थ डे आहे, असं सांगतात,’ अशी खास पु.ल. शैलीतली प्रतिक्रियाही दिली.

माझ्या प्रगतीपुस्तकावर ‘शाब्बास मधुरा!’ ही त्यांनी दिलेली कौतुकाची थाप आणि माझ्या वाढदिवसाला खूप मोठ्ठी हो, असा माझ्या वयाएवढा ‘ठ’ काढून पत्रातून दिलेला आशीर्वाद, या फक्त आठवणीच राहिल्या आहेत.
 त्यांच्या एका भेटीत माझ्या विनंती आणि आग्रहामुळे पु. ल. आजोबा आणि सुनीता आजींनी फोटो काढून घेण्यासाठीही संमती दिली. खरं म्हणजे सुनीता आजी कधी फोटो काढून घेत नसत. ‘आज तू मला माझे सगळे नियम तोडायला लाव,’ असं कौतुकानं म्हणत त्या फोटोसाठी तयार झाल्या.

मी दर वर्षी ८ नोव्हेंबरला त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या घरी जायचे. तेव्हा त्यांच्या घरात अनेक मोठ्या कलाकारांपासून सामान्यांपर्यंत साऱ्यांचीच गर्दी असायची. ते सर्वांशी आपुलकीनं बोलायचे. खरंतर आपुलकी या शब्दातच पु.ल. दडलेले आहेत. पुलंनी आपल्याला काय दिलं नाही? त्यांच्या प्रत्येक पैलूनं आपल्याला भरभरून आनंद दिला. आपल्या लिखाणातून त्यांनी मराठी मनाची अस्मिता जपली. अपूर्वाई, पूर्वरंग, बटाट्याची चाळ यांसारख्या अनेक पुस्तकांतून आणि ती फुलराणी, सुंदर मी होणार यांसारख्या नाटकांतून त्यांनी आपल्याला खूप काही दिलं आहे. ‘विधात्यानं तुमच्या प्रतिभेचा एक अवयव तुमच्या कानात बसवला आहे की काय,’ असं समीक्षक अरुण आठल्यांनी म्हटलं आहे. ती फुलराणी सारखं नाटक बघताना त्याची प्रचीती येते.

आजूबाजूच्या परिस्थितीचं, माणसाचं सूक्ष्म निरीक्षण करून, त्यातली विसंगती हेरून, त्यांनी ती अशा काही खास शैलीत सांगितली, की सारा महाराष्ट्र खळखळून हसला. त्या शैलीला विनोदाची झालर आणि त्या जातिवंत विनोदाला कारुण्याची किनार.

म्हणूनच त्यांनी ५० वर्षांपूर्वी लिहिलेल्या साहित्याची अपूर्वाई कणभरही कमी झालेली नाही. आज मी जेव्हा जेव्हा ‘हसले मनी चांदणे’, ‘कौसल्येचा राम बाई’, ही गाणी गाऊन

रसिकांची दाद मिळवते, तेव्हा पुलंची प्रकर्षानं आठवण होते. ‘गुण गाईन आवडी’ असं म्हणत मला प्रोत्साहन द्यायला आज ते नाहीत. आज १२ जून. पुलंना आपल्यातून जाऊन १७ वर्षं झाली; पण त्यांच्या नावामागे कैलासवासी हा शब्द लिहायला मन तयारच होत नाही. आजच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात नसती उठाठेव करणारी मंडळी पाहिली, की त्यांची खिल्ली उडवून हसत हसत डोळ्यांत अंजन घालायला पुलं हवे होते, असंच वाटतं.

मधुरा दातार
१२ जून २०१७
महाराष्ट्र टाईम्स

Thursday, December 5, 2019

साहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी

भाईंचंच एक वाक्य आहे, 'पंढरीच्या पांडुरंगापेक्षा त्याला उराउरी भेटणारा वारकरीच मला जास्त भावतो.' भाईंच्या चाहत्यांबाबतही मला बऱ्याच वेळा हाच अनुभव येतो.

भाईंचे चाहते जगभर पसरले आहेत, त्यांच्या पुस्तकांची पारायणे होत असतात. त्यांच्या लेखनातील उतारेच्या उतारे तोंडपाठ असणारीही बरीच मंडळी आहेत. पण माझ्या पहाण्यातले काहीजण खरंच अवलिये आहेत. पुलप्रेम, म्हणजे किती मर्यादेपर्यंत जाऊ शकतं, हे त्यांच्याकडे पाहून कळतं. अशाच एका पुलप्रेमी वारकऱ्याची भेट करून द्यायचा आज विचार आहे.
               
निमित्त झाले आमच्या भिलार भेटीचे. अशिया खंडातील पहिले ' पुस्तकांचे गाव' म्हणून प्रसिद्ध असलेले, पाचगणी महाबळेश्वर सारख्या निसर्गरम्य परिसरात वसलेले हे छोटंसं गाव. अमाप कुतूहल मनात घेऊन या गावात आम्ही भटकत आहोत. कादंबरी, ऐतिहासिक, बालवाङ्मय, अशी एकेक घरे पहात पहात एका घरासमोर पावले थबकतात. ' विनोदी ' अशी पाटी या घरावर आहे. घरमालक श्री. संतोष सावंत. घराच्या एका खोलीत विनोदाला वाहिलेली खोलीभरून पुस्तके वाचकांसाठी सज्ज आहेत, आणि या विषयाचे सम्राट आपले पुल, असं सांगणारी एक गोष्ट इथे नजरेत भरत आहे. त्याविषयीच मला बोलायचं आहे.

घराबाहेरच्या भिंती, कट्टे विनोदी लेखकांच्या .अर्कचित्रांनी (कॅरीकेचर्स) सजलेल्या आहेत. (अत्र्यांच्या लेखणीचा काटेरी दंडुका झालाय, मधु मंगेश कर्णिक माशाचा आधार घेऊन उभे आहेत, इ. इ.) असं सगळं पहात पहात आपण पुढे जातो भिंतीकडे लक्ष जाताच नजर खिळून रहाते. भिंत भरून आकाराचं भाईंचं एक सुरेख अर्कचित्र आपल्याकडे पाहून मिश्किल हसत असतं. त्यांचे ते सुप्रसिद्ध, पुढे आलेले दोन दात पुस्तकाच्या बांधणीने शिवलेले दिसतात. चष्मा आणि पुस्तकासकट चमकणारे डोळे, पुस्तकावरची फूल, देश, पान, डे, ही गंमत, आणि हे सगळं टवटवीत. गुलाबी कमळाच्या आकारात. हे सगळं गमतीजमतीने निरखत असताना नजर जाते, ती चित्राच्या उजवीकडे असलेल्या साक्षात् भाईंच्या लफ्फेदार सहीवर.

आश्चर्याने डोळे विस्फारतात. पुलंची सही? इथे? या भिंतीवर? चित्रावर ? कशी ?

आता चौकशी करणं आलंच. मग आपण सामोरे जातो, ते या घरातल्या गृहलक्ष्मीच्या प्रसन्न स्वागताला.

हसऱ्या चेहऱ्याने, उत्साहाने सौ. शिल्पा सावंत सगळी माहिती सांगत असतात. भाईंच्या या अर्कचित्राचे, आणि इथल्या सगळ्याच चित्रांचे चित्रकार श्री. विजयराज बोधनकर. मूळ कागदावरचे चित्रही त्यांच्याच हातचे आहे.

४ मे २०१७ रोजी भिलार गावाचे उद्घाटन जेव्हा औपचारिक रित्या ' पुस्तकांचे गाव ' म्हणून झाले, त्यापूर्वी तीन दिवस एक बस करून बरेच चित्रकार इथे आले. त्यावेळी श्री. बोधनकर यांनी हा विनोद विभाग सजवला. भिंत भरून असलेले हे पुलंचे कॅरीकेचर, त्याखाली असलेल्या लांबलचक सुबक लाल लाल पायऱ्या, हा सगळा परिसर हा भिलारचा सेल्फी पॉईंट बनलाय. येणारा प्रत्येक जण भाईंसोबत इथे सेल्फी घेतोच. (आम्हीही अर्थातच याला अपवाद ठरलो नाही.)

आणखी काही महिन्यांनी शिल्पाताईंकडे रहाण्याचा योग आला. अविस्मरणीय असे अगत्य, आपुलकी, रुचकर अल्पोपहार, नेमक्या वेळी मिळालेला वाफाळता चहा, या सगळ्या पाहुणचाराबरोबर एक गोष्ट मनाला भिडली. आमच्यासाठी त्यांनी दिवसभर आणि रात्रभर पुस्तकांची खोली उघडी ठेवली होती. कुणाच्याही देखरेखीशिवाय. हा विश्वास एक रसिकच दुसऱ्या पुस्तकप्रेमीबद्दल दाखवू शकतो.

शिल्पाताईंकडून चित्रकार, साहित्यिक श्री. विजयराज बोधनकर यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्यांचा संपर्कक्रमांक मिळाला. पुलंच्या चित्राबद्दल, आणि विशेषतः त्या सहीबद्दल खूप उत्सुकता मनात होती. त्यांना फोन लावल्यावर दिलखुलास अशी त्यांची एक मुलाखतच हाती आली.

भिलार आणि भाईंचे कॅरीकेचर हा विषय निघाल्यावर चित्रकार भरभरून बोलू लागले. प्रत्त्येक पुलप्रेमी आपल्या लाडक्या दैवताचा विषय निघाल्यावर असाच खुलून येतो.

चित्राला आणि सहीला तर इतिहास आहेच, पण त्याचे निर्माते कलाकार श्री. विजयराज बोधनकर यांचा इतिहासही रोचक आहे.

भरपूर समृद्धी असूनही यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी घर सोडलं. घरात सात पिढ्यांची चित्रकारीची परंपरा, परंतू साचलेपणामुळे वाढ नाही, म्हणून हा साचलेपणा मोडून कलेची जोपासना करण्यासाठी मुंबईला आले. त्यानंतर जवळजवळ ३९ वर्षे वडिलांचा एकही पैसा न घेता प्रवास चालू आहे. यात शिक्षण, पदवी, विवाह, घर, सगळे आले.

पुस्तक विचार देऊ शकतं, पुस्तकांमुळे आयुष्याला दिशा मिळू शकते हा त्यांचा अनुभव आहे. सोशल मिडियाच्या आहारी गेलेल्या आजच्या पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे, या तळमळीतून साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील सुमारे ९० व्यक्तींची अर्कचित्रे त्यांच्या कुंचल्यातून साकारत गेली. यांची प्रदर्शने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरघोस प्रतिसादात होऊ लागली. कुठलाही मोबदला न घेता.

या अर्कचित्रांचे नंतर एक पुस्तकही निघाले.

full Imperial size ची ही कॅरीकेचर्स आहेत. (यात बा.भ.बोरकर ढगांवर बसलेले आहेत, व्यंकटेश माडगूळकरांच्या चेहऱ्याला हरणाची शिंगं आहेत, दुर्गाबाई भागवतांच्या पेनाला आग लागलीय, तर गदिमांच्या लेखणीला पालवी फुटलीय.) ज्यांचं जे व्यक्तीचित्र, तेच अर्कचित्रात उतरलंय.

भाईंच्या या अर्कचित्राबद्दल बोलताना ते म्हणतात,

" पुलं कसे आहेत, तर कमळासारखे, गुलाबासारखे. त्यांनी दु:ख कधी जास्त उगाळलं नाही. सगळ्यांना प्रसन्न करीत राहिले, आणि त्यांचा वाचक भुंगा होऊन या कमळाभोवती गुंजारव करीत राहिला."

(चित्रात पण हा भुंगा दिसतोय बरं का.)

" आजही पुलं म्हटलं, की सगळं टेन्शन जातं. हा गेल्या तीन पिढ्यांचा अनुभव आहे. अस्सल साहित्य जुनं होत नाही. ते कालातीत आहे."

मुंबईत आल्यावर, वयाच्या अंदाजे १९ वर्षाच्या आसपास, कामधाम नसलेल्या अवस्थेत निरुद्देश भटकताना असंच तिकिट काढून शिवाजी मंदिरला जाऊन बसले. तिथे एक पांढऱ्या केसांचे गृहस्थ, आणि त्यांच्याच वयाच्या एक बाई अतिशय रसाळ पद्धतीने कविता वाचनाचा कार्यक्रम सादर करीत होत्या. न राहवून त्यांनी शेजाऱ्याला विचारले, की हे कोण ? शेजाऱ्याने रागावूनच पाहिले, आणि म्हटले,

" हे पु.ल.देशपांडे, आणि त्या त्यांच्या पत्नी सुनिताबाई."

हे भाईंचे झालेले पहिले दर्शन. यानंतर भाईंचे बोरकरांच्या कवितांचे सादरीकरण, एकपात्री प्रयोग,आणि असेच कार्यक्रम ते पहात गेलो. पुलंची पुस्तके एक एक करीत खरेदी करीत सुटलो, आणि ती वाचता वाचता आयुष्याची प्रचिती येत गेली." (हा त्यांचाच शब्द.)

यानंतरचा त्यांचा अनुभव ऐकण्यासारखा.

लग्नानंतर एकदा मलेरिया झाला. दुसरं काहीच करता येण्यासारखं नव्हतं, तेव्हा 'व्यक्ती आणि वल्ली', आणि 'बटाट्याची चाळ' ही दोनच पुस्तकं आलटून पालटून सतत वाचत राहिले. इतकं, की ते मेंदूत केमिकल लोचा म्हणतात, तसं झालं. नारायण, हरी तात्या, अंतू बर्वा, नामू परीट, ही माणसं प्रत्यक्षात दिसायला लागली. मग त्यांची अर्कचित्रे काढली. ती काढता काढता भाईंचीही बरीच चित्रे काढली. भिलारच्या भिंतीवरचं चित्रं त्यातलंच.

आता या चित्रावरच्या सहीचा किस्सा.

या चित्रांवर भाईंच्या सह्या घ्याव्यात, ही खूप इच्छा होती. तसा योग जुळूनही आला.

मुंबईच्या एशियाटिक लायब्ररीमधे चित्रकार बोधनकर यांचा सत्कार होता, तिथे पुलं येणार होते. त्यावेळी बाळासाहेबांनी साहित्यिकांना बैल म्हटल्याने वातावरण गरम होते. ठाकरे- पु.ल. वाद रंगला होता. त्या सगळ्या गोंधळात कार्यक्रमाला पुलं आलेच नाहीत. सह्यांचा विषय बारगळला.

काही काळानंतर एका म्युझियममधे भाईंचे भाषण होते. त्यावेळी त्यांना माईक लावून द्यायचा, आणि तासभर त्यांच्याजवळ उभे रहायचे, असे काम बोधनकरांना मिळाले. त्यावेळी ती सगळी व्यक्तीचित्रे त्यांनी पुलंना दाखवली. त्यांनी चित्रांचे खूप कौतुकही केले. सह्या मागितल्यावर भाई सह्या करू लागले. पार्किन्सन्समुळे त्यावेळी त्यांच्या हातामध्ये कंप होता. (आपल्याला तो कंप सहीमधेही दिसतो.)

दोन चित्रांवर सह्या मिळाल्या, त्यात हे भाग्यवान चित्र होतं. थरथरत्या हाताने भाई तिसऱ्या चित्रावर सही करू लागले, त्यावेळी मात्र या त्यांच्या भक्ताने त्यांना थांबवलं. त्यांचा त्रास यांना पहावला नाही.

धन्य ते पु.ल.! हात थरथरत असूनही चाहत्याचे मन राखण्यासाठी कष्ट घेतले, आणि धन्य त्यांचा भक्त ! त्यांच्या सहीचा अनमोल ठेवा स्वत:च्या कलाकृतीवर मिळत असतानाही, केवळ त्यांचा त्रास पहावत नाही, म्हणून त्यांना थांबवले.

तर असा हा सहीचा इतिहास.

हेच अर्कचित्र पीएल् यांच्या सही सही सहीसकट भिलारच्या सावंतांच्या घरी, त्या भिंतीवर सेल्फी पॉईंट म्हणून विराजमान झाले आहे.

मुद्दाम सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे.

पुलंची सही असलेले जे चित्र भिंतीवर काढले आहे, त्यावर कलाकाराने स्वत:ची सही केलेली नाही. त्यांचे नावही कुठे नाही.

न केलेल्या या सहीतून खूप काही त्यांनी सांगीतले आहे.

बोधनकरांनी काढलेल्या, भाईंची सही न लाभलेल्या बाकीच्या चित्रांचाही एक गमतीदार किस्सा त्यांनी सांगीतला.

पुलंचे बंधू श्री. रमाकांत देशपांडे, यांच्याकडे ती चित्रे दाखवायला हे घेऊन गेले. प्रथम इतर काही चित्रे दाखवली, तेव्हा 'चहा कर गं' , अशी सूचना स्वयंपाकघराकडे गेली. नंतर जशी पुलंची, आणि वल्लींची चित्रे येऊ लागली, तशी "आता कांदेपोहेच कर." अशी ती सूचना बदलली.

तर असे पुलवेडाचे हे किस्से.

मराठी साहित्याची जर पंढरी असेल, तर इथल्या पांडुरंगाचा मान निर्विवादपणे पद्मश्री पु.ल. देशपांडे यांचाच आहे.

या पांडुरंगाच्या आणखी काही अचाट अफाट वारकऱ्यांचे किस्से परत कधीतरी.

डॉ रमा खटावकर.

Tuesday, December 3, 2019

पु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा

नमस्कार मंडळी. पु लंचं हे जन्मशताब्दी वर्ष. महाराष्ट्राचे लाडके दैवत पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त माझा ‘पु. लं. आणि दि टॉवर ऑफ बटाटा’ हा लेख 'सारस्वत चैतन्य'च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. जर कां 'बटाट्याच्या चाळी' चा पुनर्विकास (Redevelopment ) झाला तर ..... हा लेख मी माझ्या वाचकांना सादर करत आहे.

पु लं च्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली आणि ‘पुल’कित विनोदाचं लेण ल्यायलेली बटाट्याची चाळ म्हणजे मराठी मना मनाचा अमोल ठेवाच म्हणावा लागेल. पु लं च्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून पु लं आणि ‘दि टॉवर ऑफ बटाटा’ चे रेखाटन करायचा प्रयत्न केला आहे. पु लं परत आले तर..

हल्लीचे दिवस चाळींचे पुनर्विकास करण्याचे दिवस आहेत. चाळीचे टॉवर संस्कृतीत होणारे संक्रमण बटाट्याच्या चाळीच्या पात्रांना धरून रेखाटन करण्याचा प्रयत्न केला आहे - ती ही पु.लं. ची माफी मागून - )



पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे - म्हणजे आपले पु लं - भाईंनी १८ वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावरून एक्झिट घेतली. परंतु त्यांच्या अमोघ साहित्याने मराठी मनामनावर अधिराज्य केले. असा मना मनावर राज्य करणारा अनभिषिक्त सम्राट एकमेवाव्दितीयच ! त्याच रसिकांचं प्रेम मनात घेऊन भाई २००० साली गेले खरे, परंतु त्यांच्या मनातून त्यांच्यावर प्रेम करणारे रसिक काही जाईनात !

एकदा तरी त्या रसिकांची भेट घेऊन यावं, असं पु .लं. ना मनापासून वाटू लागलं. शेवटी, चित्रगुप्तांकडे एक दिवसाच्या ‘कॅज्युअल लीव्ह’ चा अर्ज दिला, तोही घाबरतच, आणि ती रजा मंजूर झालेली पाहताच, पु. लं. च्या आनंदाला पारावार उरला नाही..... कधी एकदा पृथ्वीवर जातो आणि समस्त रसिकांना भेटतो, असं त्यांना झालं..... त्यांना त्यांचं घर, चाहते, नाट्यप्रेमी मंडळी - सारे सारे आठवू लागले आणि …. आणि त्यांच्या लेखणीतून साकारलेली अजरामर बटाट्याची चाळ ..... ते बाबूकाका, त्रिलोकेकर, अण्णा पावशे - पु. लं. ना त्यांच्या मानस पुत्रांची, बटाट्याच्या चाळीची अनिवार्य ओढ वाटू लागली. झालं …. नक्की ठरलं, यावेळी फक्त बटाट्याच्या चाळीलाच भेट द्यायची, असं त्यांनी मनाशी ठरवलं.

बटाट्याच्या चाळीचे, पूर्वीचे ते दिवस आठवत, पु. लं. बटाट्याच्या चाळीच्या गल्लीत शिरले. इतक्या वर्षांत गिरगावात बरेच बदल झालेले, त्यांच्या संवेदनशील मनाने लागलीच टिपले. पण दूरवर नजर टाकली तरी, ती भली थोरली बटाट्याची चाळ काही दृष्टीस पडेना..... गेली कुठे ? रस्ता-गल्ली चुकलो तर नाही नां ? याची पु.लं. नी खातरजमा करून घेतली. पण छे, ‘बाप आहे मी, कधी विसरेन कां ?’ असंही त्यांच्या मनात क्षणभर येऊन गेलं.

पु.ल.ची भीती खरी होती. बटाट्याच्या चाळीच्या जागी, गगनचुंबी प्रकारात मोडणारी टोलेजंग इमारत उभी होती. त्या इमारतीचे मजले मोजायचा पुलंना मोह झाला ! मान दुखेल की काय, या विचारांनी त्यांनी तो विचार दूर सारला. उगीचच, त्यांना श्यामच्या डोक्यावरून खाली पडलेल्या टोपीची आठवण झाली ! तेवढयात, त्यांचे लक्ष इमारतीच्या पाटीवर गेले. ‘दि टॉवर ऑफ बटाटा’ ! बटाटा नावापाशी ते काहीसे घुटमळले आणि गेट मधून आत जाऊ लागले. लागलीच वॉचमनने त्यांना हटकले, ‘किधर जाने का है ?’ असा प्रश्न भाईंना नवा होता. बटाट्याच्या चाळीत शिरायला काय, किंवा कुणाच्या घरात शिरायला काय - कधी कोणाच्या xxxची परवानगी घ्यावी लागत नसायची !

“इधर वो चाल … वो लंबाचौडा चाल था … वो किधर गया ?” पु.लं.नी तरी मनातली शंका विचारून घेतलीच.

तो उत्तर भाषिक वॉचमन बुचकळ्यात पडला. तरी, भाईंना समजावत म्हणाला, “नही, यहां कोई चालवा नही है. तुम का गलत फैमी हुई गवा, हम सात साल से इधर नौकरी कर रहा हूं “

भाईंचा चेहरा गोंधळला. आपण या चाळीचे जनक ....... चाळ जमीनदोस्त झाली की काय ?, या विचारानेही त्यांच्या पोटात कालवाकालव झाली. मग आपल्या मानसपुत्रांचं काय ? ते त्रिलोकेकर शेट, बाबूकाका, अण्णा पावशे ........ तरी भाईंना काही शांत बसवेना...... “इधर वो त्रिलोकेकर शेट रहते थे...... वो बाबूकाका ...... या तो वो अण्णा ....... अण्णा पावशे ?” भाईंनी एकेकांची नाव घ्यायला सुरुवात केली ...... वॉचमन तर काही ऐकायला तयार नव्हता. तो ही आपल्या भाषेत मोठमोठ्याने बडबडू लागला.

गेटवर काही बाचाबाची झालेली पाहून, तीन-चार पेन्शनर मंडळी तिथे जमा झाली. पैकी एकाने डोळ्यांवरचा चष्मा वर-खाली केला, गळ्यातल्या मफलरने नीट पुसला, पुन्हा पाहिले, “अरे ये तो साला भाई लगता है !”

बाकीची मंडळी ‘भाई’ ऐकताच पळायच्या तयारीत राहिले, तर ते “अरे भागतो कशाला रे ? तो बंदूक वाला भाई नाय..... आपला भाई..... चाल वाला भाई- पी. एल. रे - देशपांडे !”

तेव्हा कुठे त्यांचे पेन्शनर मित्र थांबले व डोळे बारीक करून ओळख पटते का ते पाहू लागले ..... भाईंना देखील आवाज ओळखीचा वाटू लागला...... त्रिलोकेकर शेट तर नव्हे नां ?, अशी शंका वाटू लागली. कारण त्यांनी रेखाटलेले त्यावेळचे त्रिलोकेकर शेट आणि आज त्यांच्या पुढ्यात उभे असलेले पात्र - यांत जमीन-अस्मानाचे अंतर होते - गळ्यात मफलर, नाकावर फॅशनेबल चश्मा, पायात ट्रॅक सूट, टी-शर्ट आणि स्पोर्ट शूज ! - असा जामानिमा होता. पण आवाज आणि बोलण्याची लकब मात्र चाळीतल्या त्रिलोकेकर शेटची होती !

“भाई, मी सोकाजी …. सोकाजी दादाजी त्रिलोकेकर - ओळखला नाय काय ?”, त्रिलोकेकर शेठनां पाहताच भाईंना प्रेमाचे भरते आले. वयोवृद्ध त्रिलोकेकर शेटनी भाईंचे पाय पकडले, त्यांना नमस्कार केला.

“अहो, असं काय करता त्रिलोकेकर शेठ ?,“ भाई काहीसे गहिवरले. “अरे, तुम्ही तर आमचा बाप !”, त्रिलोकेकर शेट.

भाईंचे डोळे विस्फारले…. “त्रिलोकेकर शेट, तुम्हाला जनक म्हणायचे आहे का ?”, भाईंनी त्यावेळीही त्रिलोकेकर शेटची चूक दुरुस्त केली.

त्रिलोकेकर शेट , “तेच नां ? बाप, फादर ..... तुमी म्हणते तो ..... जनक, एकच नां ?,” भाईंच्या चेहर्‍यावर हास्य पसरले. त्रिलोकेकर शेटनी बरोबरच्या पेन्शनर्सची ओळख करून दिली, “अरे भाई, हे लोक बघ ..... जुना बटाट्याची चाळ वाला ..... हा बाबूकाका - अरे खरे रे … हिस्ट्री वाला .......”, धोतर-सदरा, हातात काठी घेतलेले बाबू काका कान देऊन ऐकू लागले, “आं ?”

“अरे बाबूकाका, साला ते कान मंदी घालायचा मशिन तू खिशा मंदी कशाला ठेवते ? कान मंदी घाल नां !” भाईंकडे वळून म्हणाले, “अरे, आता ओल्ड झाल्यावर बाबूकाकाला कान मंदी काय पण ऐकू येत नाही.”

बाबूकाकांनी शर्ट-पँटीचे सगळे खिसे थरथरत्या हातांनी चाचपडले आणि कानांत यंत्र घातले. भाई त्यांच्या या मानस पुत्राचं वार्धक्य जवळून निरखीत होते. त्रिलोकेकर त्यांच्या कानाशी कुजबुजले, “आपला भाई हाय रे …. बटाटा चाल वाला.....”

ओळख पटताच बाबूकाकांना कोण आनंद झाला. प्रेमाचं भरतं आलं, त्यांनी भाईंना चक्क मिठीच मारली ! इतकी कडकडून मिठी मारली की, बाबूकाकांना अफजलखानाने शिवाजी महाराजांना मारलेली मिठी आठवली असावी ! “भाई, ...... इतका आनंद झाला की.......”, त्यांना शब्द फुटेना. भाईंनी त्यांच्या प्रेमळ मिठीतून कशीबशी सुटका करून घेतली !

“भाई, मी अष्टेकर - कुशाभाऊ अष्टेकर”, कुशाभाऊंनी स्वत:ची ओळख स्वतःच करून दिली. भाई बारीक डोळे करून, त्यांना न्याहाळू लागले. कुशाभाऊंमध्ये फारसा फरक पडलेला भाईंना काही जाणवला नाही. केस पिकले असावेत, पण कलप इतका बेमालूम पणे लावला होता की, कुठूनही रुपेरी छटा दृष्टीस पडत नव्हती आणि शरीराचाही फापटपसारा नव्हता. नाट्यभैरव म्हणून चाळीत कुशाभाऊ प्रसिद्ध होते. म्हणजे, त्याकाळी ते ‘स्वयंघोषित’ नाट्यभैरव होते ! गंधर्व नाट्य कंपनीत ते होते आचारी, पण रुबाब मात्र मुख्य नटाचा होता ! त्यानुसार त्यांनी स्वतःची शरीरयष्टी तशी प्रयत्नपूर्वक राखली असावी. न जाणो, कधीकाळी, नाटकात भूमिका मिळाली तर .....

कुशाभाऊ जेष्ठ नागरिकांत मोडत असले तरी, आपलं शारीरिक तारुण्य त्यांनी जपलं होतं. त्यांच्या चालण्या-बोलण्यात काहीसा चपळपणा होता. “भाई, आशीर्वाद असावा,” असं नाटकातलं वाक्य फ़ेकावं, तसं म्हणत, भाईंना त्यांनी वाकून नमस्कार केला. भाईंनाही गहिवरून आलं !

“आणि भाई, हेनला ओळखलं का ?” पुढच्या पेन्शनर कडे वळत त्रिलोकेकर शेटनी विचारले.

भाई आपल्या स्मृतीला ताण देऊ लागले. चेहऱ्यावरचे ते पूर्वीचे हसू मात्र तसेच ठेवले. बरेचदा हसून वेळ मारुन नेता येते, हे भाईंना अनुभवांने माहीत होते. त्यांच्या मनात आले, मी जनक असलो तरी, जन्मलेलं बाळ आणि बाळसं घेतलेलं बाळ, यात फरक असणारच नां ? त्यावेळची ती मध्यमवयीन व्यक्तिरेखा आणि आणि आत्ताची ही वृद्धापकाळाने थरथरणारी व्यक्ती - यांचा ताळमेळ जुळवणे भाईंनाही नक्कीच भारी होतं ! शाळेतल्या कुठल्यातरी कठीण प्रश्नाचे उत्तर गुरुजींनी विचारल्यावर, उत्तर येत नसेल तर, विद्यार्थ्याचा जसा चेहरा होतो, तसा बाईंचा झाला होता !

“अरे भाई ...... हा तर साला पावशा रे !”, त्रिलोकेकर भाईंच्या मदतीला धावून आले. म्हणजे कोडयातही तेच टाकत होते नि उत्तरही तेच देत होते ! भाईंनी स्मृतीला ताण दिला...... अण्णा पावशे ..... म्युनिसिपालिटीच्या पाणी खात्यात नोकरी ...... ज्योतिषाची आवड ......

“हां हां ....... अण्णा पावशे !”, भाईंनी त्यांना ओळखले.

अण्णा पावशे भाईंनी रेखाटलेले मध्यमवयीन गृहस्थ होते, आणि आणि आत्ताचे हे अण्णा, तोंडाचं बोळकं झालेले, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा लावलेले, कृश झालेले - आणि त्यांचा तो कृश देह सतत थरथरत होता......

“भाई, बघ रे , या पावशाचा काय झाला...... साला पार्किन्सन झाला ...... ओल्ड एज लई बॅड रे ..... लई बॅड..... सारखा थरथरतो ....... थरथरतो ! हात पाय थरथरतो. आमी लोक तेला सांभाळतो. जुना नेबर नां चालवाला ?, “

भाई आपल्या मानसपुत्राची ही अवस्था विषण्णपणे पहात होते.

“भाई,” म्हणत अण्णा पावशांनी भाईंवर स्वतःला झोकून दिले. भाईंना त्यांचा अचानक आलेला भार सोसवेना, त्यांचा तोल जाऊ लागला ..... बाकीची मंडळी त्यांना सावरायचा प्रयत्न करू लागली. त्यांचीही ही ताकद यथातथाच होती. पण प्रसंगावधान राखून ‘द टॉवर ऑफ बटाटा’ चा वॉचमन पुढे आला आणि त्याने ‘टेकू’ दिला ! त्यामुळे भाई आणि अण्णा जमिनीवर लोटांगण घेण्यापासून वाचले !

अजून किती म्हातार्‍यांना आपल्याला ‘टेकू’ द्यावा लागेल या विचाराने बहुदा, “अरे, आप लोग वो बेंच पे बैठो नां ? “ वॉचमन सूचना केली आणि ती सगळ्यांना पटली.

“हां हां … यू आर राईट,” म्हणत त्रिलोकेकर भाईंकडे वळले आणि म्हणाले, “चला भाई, तिकडे बेंच हाय ..... तेच्यावर बसू...... “, सगळी चमू ‘द टॉवर ऑफ बटाटा’ च्या बाकड्यावर जाऊन विसावली आणि शिळोप्याच्या निवांत गप्पांना रंग चढला !

“अरे, आपली चाळ कुठे गेली ?,” भाईंच्या मनात दुःख खदखदत होतं.

“चाळ पाडली,” अण्णा पावशे थरथरते हात हवेत उडवून ताडकन बोलले.

“चाळ ही वास्तू इतिहास जमा झाली,” बाबूकाकांमधील इतिहासाचार्य मधूनच डोके वर काढत होता.

“सात वरस झाली ...... सेवेन इयर्स ..... “, त्रिलोकेकर उंच टॉवर कडे बघत बोलले .

“म्हणजे आपली बटाट्याची चाळ मालकाने - तिवारीने विकली,” कुशाभाऊंना मध्येच थांबवत बाबूकाका म्हणाले,

“त्या चाळीचा मूळ मालक धुळा नामा बटाटे - क्रॉफर्ड मार्केटचा टोपल्याचा व्यापारी,” प्रत्येक वेळी इतिहासाचे दाखले देण्याची बाबूकाकांची सवय आजमितीही कायम होती, हे भाईंनी हेरले.

“तर, नंतरचा मालक - तिवारीने ती एका बिल्डरला विकली आणि या चाळीचे रि-डेव्हलपमेंट झाले,” कुशाभाऊ वर्तमानात होते, “आणि आणि हा ‘टॉवर ऑफ बटाटा’ त्या जागेवर उभा राहिला नां !”

“ते चाल.....डिमॉलिश केला नां ..... तेव्हा काय दुःख झाला रे ...... मी आणि बाबलीबाय - माय वाईफ रडला रे रडला,” त्रिलोकेकरांचा आवाज कातरला.

भाईंच्याही पोटात गलबललं. त्यांच्या डोळ्यासमोरून चाळ जमीनदोस्त होतानांची काल्पनिक दृष्य चलचित्रपटासारखी सरकू लागली. ...... चाळ उभारतानां ....... चाळीची निर्मिती करतानां, भाईंच्या लेखणीने अमाप कर्तृत्व दाखवले होते ! विनोद- हशांनी त्यावर इमले चढवले होते !

“अरे भाई, आमचा होल लाइफ त्या खोलीमंदी गेला नां !” त्रिलोकेकर त्याच दुःखात होते.

“भाई, आमच्या पण पोटात कालवाकालव झाली ..... कोकणातून येऊन इथेच - चाळीत राहिलो नां - चुलत्याच्या बिऱ्हाडांत ! चाळीशी एक प्रकारची जवळीक होती !”, अण्णा पावशे सुद्धा जुन्या स्मृतींमध्ये गेले.

“हया टोलेजंग - उंच इमारतीत चाळीचे रूपांतर झाले,” कुशाभाऊ भाईंना सगळी माहिती देत होते, “प्रत्येकाला एकेक खोली आधी चाळीत होती. आता प्रत्येकाला ७५० स्क्वेअर फूटचा ब्लॉक मिळाला !”

“हो का ?” भाई चकित झाले. आपल्या बटाट्याच्या चाळीची भविष्यकाळात अशी काही उन्नती होईल, अशी त्यांना निर्मितीच्या वेळी कल्पनाही नव्हती !

“एका खोलीत सात-आठ माणसं गुण्यागोविंदाने राहायचो, त्यावेळी !” अण्णा पावशे जुन्या दिवसात रमले होते.

“आता प्रत्येक ब्लॉक मध्ये तीन किंवा चार माणसं !”, कुशाभाऊ.

“पाचवा माणूस आला की, गर्दी होते आत्ताच्या काळात !,” बाबूकाकांनी मनातली मळमळ ओकून टाकली.

तोवर कुशाभाऊंनी मोबाईल वरून बाजूच्या चहावाल्याला फोन केला. बघता बघता, लहान थर्मास व कागदी ग्लास घेऊन, चहावाला पोऱ्या आला. त्याने सगळ्यांना चहा दिला.

“भाई, चहा घ्या, बाजूच्या हॉटेल मधला आहे,” कुशाभाऊ.

“ असं कां ?”, भाईंना हे नवीनच होतं.

“तर काय भाई, इथे सगळं आता फोनवरून होतं - चहा, दूध, फळे, भाज्या, धान्य, हॉटेलचं खाणं ...... फोन करायचा, ऑन-लाइन पेमेंट करायचे, घरात सगळे हजर ! खिशात पैसा असायची गरज नाही !”

“पण साला..... अकाउंट मंदी पैसा पाहिजे ना !,” त्रिलोकेकर शेटनी मध्येच जोक मारला. सगळे त्यावर खळखळून हसले.

“या फ्लॅट मंदी लय सुविधा हाय …. मस्त हाय. पण चाल मंदली मजा नाय,” त्रिलोकेकर चाळीला मिस करत होते.

“आता घराघरात नळ, त्याला धो धो पाणी,” अण्णा पावशे.

“ त्यामुळे नळावरची भांडण थांबली नां !,” बाबूकाका.

“ आपला तो रामा गडी - त्याची सून येते इथे काम करायला ! ओळखता येणार नाही - शर्ट पॅन्ट घालते,” अण्णांनी बातमी पुरवली.

‘आणि ते……. आपले एचच मंगेशराव गायक आणि त्यांच्या त्या सौ. वरदा बाई ..... नृत्य ...... “, भाईंना एकेकाची आठवण येत होती

“हो हो, ते गातात नां ...... गाणं कसं सोडतील एचच. मंगेशराव ?,” कुशाभाऊ.

“फक्त दरवाजे- खिडक्या बंद करून गातात ! त्यांच्या गाण्याने आमची झोपमोड होते, अशी तक्रार त्यांच्या शेजाऱ्यांनी केली म्हणे,” बाबूकाका.

“असं कां ?,” भाई.

“आणि त्यांच्या त्या सौ. ...... कंबर दुखते म्हणून, पट्टा दिलाय डॉक्टरांनी ! तो घालून डान्स करतात. पूर्वी नृत्य करायच्या, आता पाश्चात्य संगीतावर तो रोंबा सोंबा का काय तो नाच करतात,” अण्णा पावशे.

“पण दरवाजे- खिडक्या बंद करून …. !,” बाबुकाका.

सगळे मनमुराद हसले.

“नाही म्हणजे, आम्हाला त्यांची कला पाहायला मिळते, गणेशा फेस्टिवल मध्ये - कार्यक्रमात !”, कुशाभाऊ.

“भाई, पूर्वीची चाळीतली मजा, एकमेकांमध्ये असलेले प्रेम - जिव्हाळा आता या टॉवर संस्कृतीत राहिलेला नाही, हे मात्र खरं ! गणेशोत्सव आता दि गणेशा फेस्टिवल झाला आहे !”, बाबूकाका.

“तेचा काय आहे भाई, आफ्टर रि-डेव्हलपमेंट आमी लोकांनला बिल्डरने फ्लॅट दिला. बाकीचा फ्लॅट विकला - ते मारवाडी- गुजराती लोक नी बाय केला,” त्रिलोकेकर.

“त्यांच्याकडे पैसा हाय नां, त्यामुळे त्यांची संख्या आता जास्त आहे. गणेशोत्सव होतो पण, पूर्वीसारखा नाही, “ अण्णा पावशे.

“मराठी सांस्कृतिक वातावरण लयाला गेलं !,” बाबूकाका.

“साला ..... मिक्स कल्चर आला इकडे !,” त्रिलोकेकर.

भाई सारं काही ऐकत होते.

“जरा काय झाला की, फोन करतात. समदी कामं साला फोनवरून करतात,” त्रिलोकेकर.

“माणसा-माणसांमध्ये भिंती उभ्या राहिल्या आहेत, प्रेम - ओलावा आटलाय. कोणाच्या घरी जायचं तरी इंटरकॉमवरून ‘ येऊ का ?’ विचारतात. अपॉइंटमेंट घेतल्यासारखे”, बाबूकाका.

“श्रीमंती आली, गाड्या आल्या, कॉम्प्युटर आले. पूर्वीची मुलं खाली मैदानात खेळायला यायची, आता एक तर, शाळेत डाबून ठेवतात, नंतर शिकवण्याना घालतात. उरला वेळ, तर ती मुलं कॉम्प्युटरवर खेळतात. पूर्वीसारखं व्हरांड्यात खेळणे राहीलेलं नाही, “ अण्णा पावशे.

“भाई, खूप बदल झाले हो, बटाट्याची चाळ ते द टॉवर ऑफ बटाटा - हे संक्रमण अनुभवणे आणि टॉवरची संस्कृती पेलणं , आम्हाला जड झालं - किंबहुना जड जातंय अजूनही ! ते पचनी पडत नाही आहे, “ बाबूकाका ताशेरे मारण्यापेक्षा खूपच भावनिक झाले होते

भाईंनाही हे संक्रमण पेलवणं जड जात होतं. वारंवार त्यांचा कंठ दाटून येत होता. त्यापेक्षा आपण ..... परत आपल्या स्थानी गेलेलं बरं, असं त्यांना वाटू लागलं.

त्यांनी त्यांच्या मानसपुत्रांकडे निरोप घेण्याची गोष्ट काढतातच, ते चौघेही गलबलले.

“भाई, बटाट्याच्या चाळीने आम्हाला काय काय दिलं, ते शब्दातीत आहे ..... आम्हाला - आमच्या व्यक्तिरेखांना आपण अजरामर करून ठेवलंय !,” कुशाभाऊंचा वाक्यांमधून नाटक डोकावत असलं तरी, अंतर्मनातील भावना त्यांना लपवता येत नव्हत्या.

बाकीच्यांना भावनावेगाने शब्द फुटत नव्हते. भाईंचा वियोग त्यांना सहन करणं कठीण जात होतं.

एकटे कुशाभाऊ काय ते भावना व्यक्त करत होते, “भाई, आपल्या बटाट्याच्या चाळीने मराठी मनामनावर अधिराज्य केले आहे आणि आजही अजूनही ते कायम आहे ! जोवर, मराठी भाषा आणि संस्कृती या पृथ्वीतलावर अस्तित्वात राहील, तोवर भाई आपल्या ‘बटाट्याच्या चाळी’च्या पाऊलखुणा अजरामर राहतील, यात तीळमात्र शंका नाही !

भाईंनी डबडबलेल्या अश्रूंनी ‘दि टॉवर ऑफ बटाटा’ चा निरोप घेतला...... जड पावलांनी ते परतीच्या प्रवासाला निघाले ....................

नेत्रा श्रीपाद वैद्य

Monday, November 25, 2019

पु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी?'

प्रिय वामन इंगळे,

तुमच्या पत्रांना या पूर्वी उत्तर पाठवायचं राहून गेले याबद्दल मीच तुमची क्षमा मागायला हवी. माझ्या भूमिकेला तुम्ही जाहीर विरोध केल्याचे तुमचे १३/७/७९ चे पत्र येईपर्यंत मला ठाऊक नव्हते.आणि माझ्या मताला कुणी विरोध केला तर कुणालाही वाईट वाटेल किंवा राग येईल,तितकाच मला येतो. त्याबद्दल मनात राग धरून अबोला वगैरे धरणे माझ्या स्वभावात नाही याबद्दल खात्री बाळगा, अशी तुम्हाला मनापासून विंनती करतो.

आता जुन्या गोष्टींच्या प्रेमाविषयी.सुरवातीलाच मी तुम्हाला सांगतो,की कुठलीही गोष्ट केवळ जुनी म्हणून मला तिच्याबद्दल प्रेम नाही. धर्म आणि जात किंवा देव आणि देउळ यांच्याशी मी माझे नाते फार पूर्वीच तोडले आहे. माझ्या वयाच्या विसाव्या वर्षी(आता मी साठीत आलोय.) माझे वडील वारले. त्यांच्या निधनानंतर अस्थिविसर्जन, श्राद्धपक्ष यांतील मी काहीही केलेले नाही. जवळजवळ पंधरा एक वर्षे ‘अनामिका’ या आमच्या संस्थेतर्फे ‘बटाट्याची चाळ’,’वाऱ्यावरची व्रत’वगैरे नाट्यप्रयोग आम्ही केले. त्यात चुकुनही रंगभूमीची पूजा, नारळ फोडणे वगैरे केले नाही.असे असूनही जुन्यातले मला काय चांगले वाटले, त्याबद्दल मी लिहिले असेल.

समजा, एखाद्या देवळावरून जाताना आत भजन चालले असेल आणि मृदुंग वाजवणारा मस्त साथ करीत असेल तर तुम्ही थबकणार नाही का? त्या तालक्रियतेतल्या करामतींची स्मृती तुमच्या मनावर रेंगाळणार नाही का? माझ्या लहानपणी मी जे गाणे ऐकले त्याचा आनंद माझ्या मनात घर करून बसलेला आहे. याचा अर्थ मी नव्या संगीताला – ते केवळ नवे आहे म्हणून कुठे नाव ठेवले आहे का? सुर्व्यांच्या कविता मला आवडली म्हणून बालकवींची ‘फुलराणी’ नावडलीचं पाहिजे असे कुठे आहे? आणि कृत्रिमपणाने किंवा हट्टाने तो आवडलेला अनुभव आपण नाकारायचा का?

माणसांचे गट करणारा धर्म किंवा सत्तेतील राजकीय पक्ष ही कल्पना मला मानवत नाही. ज्या क्षणी मला लिहावसे वाटले ते माझ्या स्वभावाला धरून मी लिहिले. त्यात विसंगतीचे मीच अनेक उदाहरणे दाखवू शकेन. याचे कारण नवे संस्कार हे तत्पूर्वीच्या संस्करण पुष्कळदा उध्वस्त करीत असतात, तर काही टिकवीत असतात. आणि मी कुठल्याही एका विशिष्ट तत्त्वज्ञानाच झेंडा घेऊन निघालो नसल्यामुळे मला हट्टाग्रहाने काही पटवून देण्याची आवश्यकताचं वाटत नाही. मुख्यतः मी ज्याला सर्वसाधारणपणाने विनोदी लेखन म्हटले जाते असेच लिहिले आहे. त्यामुळे मला जिथे विसंगती वाटली त्यावेळीचं मला लेखनाची प्रेरणा झाली. विसंगती जुन्यातही आहेच आणि नव्यातही असू शकते.

मी अशा कालखंडात वाढलो, की ज्यावेळी गरीब, उपेक्षित यांच्याविषयीची भूतदया हा माणुसकीचा सर्वात मोठा अविष्कार मानला जात होता. आज तो संदर्भ बदललेला आहे, इथे कुणीही कुणावर उपकार करीत नसतो, या विचारला महत्त्व आले आहे. माणुसकीने वागवले गेलेच पाहिजे,हा हक्क झाला. त्या हक्काची कुणी पायमल्ली करीत असेल तर तो कायदेशीर गुन्हा झाला.

आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली याचा अर्थ चातुर्वर्ण्यावर आधारलेले न्याय आणि कायदा याविषयीचे जुने तत्वज्ञान जाळले. त्यातून त्यांनी केवळ दलितांच्याचं नव्हे, समाजात डोळे उघडे ठेवू इच्छीणाऱ्या सर्वांच्यातच परिवर्तन घडवून आणले. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय संस्कारात जगणाऱ्याच्या हे उशिरा लक्षात आले असेल. ते आणून देण्यात दलित साहित्यिकांचा फार मोठा वाटा आहे. तेव्हा जुन्याकालचे सारेच काही सुंदर होते, जुने ते सोने म्हणणे निराळे आणि माझ्या बालपणी किंवा तरूणपणी जे सौंदर्याचे, आनंदाचे संस्कार माझ्या मनावर झाले त्याचे स्मरण होणे , यांत फरक आहे.

तुम्ही तबला वाजवता. मी वयाच्या नाना प्रकारच्या अवस्थेत अहमदखान थिरकव्वांचा तबला ऐकलेला आहे. माझा व त्यांचा शेवटी शेवटी परिचयही झाला होता. मध्यंतरीच्या काळात मी अनेक चांगले तबलजी ऐकले पण तबल्याचे बऱ्याच समजदारीने अनुभव घेत जाऊन सुद्धा मला अजूनही थिरकव्वासाहेबांचे अदिव्तीयत्व विसरता येत नाही. नव्या तबलीयांत झाकीर हुसेन हा माझा आवडता तबलजी आहे. समजा, तालाच्या संदर्भात थिरकव्वांच्या मैफिलीचा उल्लेख केला, तर ती जुन्यात रमण्याची आवड, एवढाच त्याचा अर्थ होईल का?

जुने पूल जाळणे हे म्हणायला ठीक असते .ते संपूर्णपणे जाळता येत नसतात. एवढेच नव्हे तर सगळ्याच जुन्या पुलांवरचा प्रवास हा ‘समाजविरोधी’ या सदरात जमा होणारा नसतो.


त्यामुळे माझे सगळे लेखनच चुकले असे म्हणायचे मला यत्किंचीतही गरज वाटत नाही. उगीच स्वतःला मार्क्सवादी म्हणवून घेत राहण म्हणजे आपण प्रगतीशील आहोत म्हणून सिद्ध करणे नव्हे. साहित्यातून प्रगट होणाऱ्या किंवा याचक या नात्याने अनुभवास येणाऱ्या अनुभूतींना असे एकाच मापात मोजता येत नाही असे मला वाटते.

गीतेतला चातुर्वर्ण्य मला अजिबात मान्य नाही. जन्मसिद्ध, श्रेष्ठ-कनिष्ठत्व याला काडी इतकाही अर्थ नाही. या अनिष्ठ आणि पुष्कळदा अमानुष अशा विचारांचा मी पाठपुरावा केल्याचे एकही उदाहरण माझ्या लेखनात सापडणार नाही. हे तर ज्याला वैचारिक असे म्हणतात ते लेखनही मी फार केलेले नाही आणि जे केले आहे, त्यात जुन्या समाजपद्धतीचा कोठेही पुरस्कार केला नाही. मला कधी देवाची करुणा भाकत बसावे असे वाटले नाही. मात्र, दुसरा कोणी देवापुढे हात जोडून उभा असला तर त्याला तिथून ढकलूनही मी देऊ शकलो नाही.

भव्य मंदिरे किंवा युरोपातील प्रचंड कॅथड्रिलस पाहताना मी त्यातल्या शिल्पकलेने थक्क झालो आहे. संगीतातही मी जुने नवे मानत नाही. माझ्या सुदैवाने मला पाश्चात्य पॉप पासून बाख-बेथोव्हेन यांच्या सिफंनीज ऐकायचा योग आला. आणि खेड्यातल्या लोकगीतांपासून ते मंजिखांसाहेब किंवा आजच्या काळातले मल्लिकार्जुन, कुमार वगैरेही मी भान हरपून ऐकतो. लताही माझी आवडती गायिका आहे तिच्या सुरांचा मी चाहता आहे. सैगलच्या आवाजा इतकी बालगंधर्वांची ललकारी मला स्तिमित करते. यांच्या सुरांतली निराळी जादू जुन्या रेकॉर्ड्स ऐकतानाही मला हरवून जाते.

तुम्हाला कल्पना नसेल , सुर्वे यांची कविता मी प्रथम जेव्हा वाचली, त्याकाळात सुर्वेंच नाव साहित्यप्रांतात देखील कोणाला ठाऊक नव्हते. अशा वेळी मी होऊन त्यांची ओळख करून घेतली. केशवसुतानंतर एका निराळ्या वातावरणात रमलेली कविता पुन्हा नव्या जोमाने वर आली, असे मला सुर्वे किंवा वामन निंबाळकर, यशवंत मनोहर यांच्या सारख्यांच्या कविता वाचताना मला वाटले.

ढसाळांच्या ‘एक तीळ सगळ्यांनी रगडून खावा’ यांसारख्या ओळी तर मी माझ्या साहित्यसंमेलनातील अध्यक्षीय भाषणात उद्धृत केल्या आहेत. याचा अर्थ पाडगावकर किंवा सुरेश भटांची गझल मी नाकारली पाहिजे असा होत नाही. यातला साहित्यनिर्मिती साठीचा अमुकच मूड खरा, हे मला मान्य नाही. अध्यापनाच्या कार्यासाठी आवश्यक असलेलीही वर्गवारी माझ्या साहित्यनिर्मितीच्या किंवा आस्वादाच्या आड येत नाही.

तुम्ही गाण्यातले आहात म्हणून गाण्यातले उदाहरणे देतो. रात्रभर मन्सूरांचे ख्याल गायन ऐकून आल्यावर सकाळी उठून कुठून तरी बेगम अख्तरचा ठुमरीतला तुकडा शेजारच्या रेडियोवरून कानावर ऐकला तर तोही मला सुखावून जातो. तेव्हा माझी कशातूनही सुटका बिटका करून घ्यायची नाही. माझ्या या वृत्तीबद्दल मला कोण पुरोगामी म्हणता की कोण परंपरावादी म्हणतो याची चिंता मी का करू?

जे मी लिहिले ते वाचकांपुढे आहे. त्यातून ज्याला जो अर्थ काढायचं आहे त्याने तो अर्थ काढावा. तो काढण्याचा त्याला तो हक्क आहे. याची जी काही फुटपट्टी असेल, तिनेच माझी उंची किंवा बुटकेपणा मोजण्याचा त्याला हक्क आहे. त्याचा हा हक्क मी मानतो. कारण मला जे ज्या वेळी योग्य वाटेल ते लिहिण्याचा माझा हक्क मी मानतो, म्हणून. जग अफाट आहे. जीवनाचे सारे तत्वज्ञान एकाच पोथीत साठवले आहे असेही माणू नये. मग ती दासबोधाची पोथी असो किंवा दासकापितलाची! इथे जुने नवे वगैरे प्रश्न येतच नाहीत. कुठल्या संदर्भात कुठले मत प्रगट झाले आहे ते पहा.

एक उदाहरण देतो. मला मुंज हा प्रकार मान्य नाही. पण समजा, एखाद्या मुलाची मुंज लागत असताना भटजींचे धोतर होमात पडून तो पेटायला लागला आणि ते होरपळून मेले, या घटनेचे मला दुःख झाले तर मुंज लावणाऱ्या प्रतिगामी भटजीच्या मरणाचे दुःख झाले म्हणून माझी मते बुरसटलेली आहेत असे जर कोणी म्हणायला लागला तर त्याला मूर्ख या शिवाय दुसरे काहीच म्हणणार नाही.

जी.ए.सारख्यांची एखादी गोष्ट वाचली की आपले क्षण सत्कारणी लावणाऱ्या या कलावंताना आदराने नमस्कार करावासा वाटतो. काय नवे म्हणावे, काय जुने म्हणावे मनाला रेंगाळावेसे वाटते तिथे रेंगाळावे. त्याक्षणाशी मनाचे अद्वैत साधले जाते. तो भोग काय वाचा मनाने घेतला जातो. कधी तरी शब्दातून त्याला रूप येते.बस एवढेच !

आपुलकीने लिहिलेत म्हणून हे तुमच्यासाठी उत्तर. एरव्ही ज्यांना मला जुन्यात रमणारा म्हणायचे असेल प्रतिगामी म्हणायचे असेल त्यांचे तोंड किंवा हात धरायला मी जाणार नाही पण ज्या अनुभवांनी मला प्रभावित केले त्यांच्याशी मी प्रतारणा करणार नाही.

असो. पत्र खूप लांबले. माझे मन दुखावल्याची भावना मनात ठेवू नका. माझ्या ज्या कुठल्या भूमिकेचा तुम्हाला जाहीर निषेध करावसा वाटत असेल तो अवश्य करा. कोणाच्याही विचारस्वातंत्र्याच्या आड येणे मला योग्य वाटत नाही. मात्र, विचार स्वातंत्र्य याचा अर्थ कुठल्या ऐकीव माहितीवर विसंबून राळ उडवण्याचे स्वांतत्र्य नव्हे. पुराव्या खेरीज आरोप करण्याचे स्वातंत्र्य नव्हे. तुम्हालाही हे मान्य असावे.

तुमचा

पु.ल.देशपांडे
१७/०७/१९७९ 

मुळ स्रोत -->
http://www.bolbhidu.com/pl-deshpande-progressive-or-conservative/

पु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व - डॉ. श्रीकांत नरुले


पुलंनी मराठी रसिकाला हसविले, पण त्यापेक्षा अधिक स्वत:संबंधी विचार करायलाही प्रवृत्त केले आहे. त्यांना अंतर्मुख व्हायला लावले. त्यांनी विनोदाचे एक स्वतंत्र विश्‍व निर्माण केले. लोकांना खळखळून हसविले आणि मोकळेपणाने जगाकडे पाहायलाही शिकविले…

‘हसून दु:ख सोसल्यास सुसह्य होते’, असे विनोदी लेखक पु. ल. देशपांडे यांचे तत्त्वज्ञान होते. विनोदाची खेळकर उत्स्फूर्त वृत्ती, मिस्कीलपणा हे सारे गुण त्यांच्याकडे जन्मजात होते. त्यांच्या आजीची परंपरा त्यांनी स्वीकारून आपला मिस्कीलपणा अधिकच गडद केला. एकदा आजीला नातू म्हणाला, ‘आजी माझे हे मित्र पैलवान आहेत’, आजी म्हणाली, ‘बरे झाले, सकाळपासून मी वाट पाहत होते, हे कोळशाचे पोते आत आणायचे होते.’ पुलंची व्याख्याने व एकूण विनोदी वाङ्‌मय हे आजीच्या शैलीप्रमाणेच आहे. त्यांचा उपहासगर्भ विनोद आपणाला तेच सांगतो.
बटाट्याच्या चाळीत सारे मध्यमवर्गीयच राहतात. येथे भरपूर भांडणे आहेत, पण त्या सार्‍यांमध्ये आत्मीयतेचे धागेही आहेत. इथल्या संवाद विसंवादावरच ‘बटाट्याची चाळ’ नांदत आहे. साध्य ासुध्या संवादातून त्यांनी स्वभावातील खाचाखोचा, तिरकसपणा मांडून सहजपणे विनोद साधला आहे.

त्यांचा विनोद अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. कधीकधी ते बोलण्यातील विसंगतीवरही विनोद मांडतात. मध्यमवर्गाच्या व्यंगावरची फजितीही अनेकदा पाहायला सापडते. त्यावरही त्यांचे विनोद घडलेले आहेत. कधी हा विनोद पाककृतींच्या बिघडलेल्या घटनेवरही असतो.

एखाद्या स्वयंपाकघरातील खूपच वस्तू शेजारच्या घरातून आणलेल्याच अनेक वर्षे दिसून येतात. देणारे आणि वस्तू आणणारे दोघेही ते विसरतात. पुन्हा पुन्हा शेजारच्याही घरात तसेच चित्र दिसते. अनेकदा गृहिणी स्वयंपाक बिघडला तर हार न मानता सारवासारव करते. पुलंनी त्यावरही लिहिले आहे. ‘दिलेली शंकरपाळी दाताने तोडणे कठीण म्हणून तो अडकित्त्याने तोडतो. त्यावर कमलाबाई म्हणतात, आम्ही खाण्याचे पदार्थ मुद्दामच कडक ठेवतो, कारण दातातील शक्ती मऊ, खुसखुशीत पदार्थ खाऊन नष्ट होते. भात देखील पुरा शिजलेला आमच्याकडे नसतो.

‘नळावरील भांडणे’ यावर लिहिताना ‘एकमेकांना पाण्यात पाहणे, हा शब्दप्रयोग नळाच्या पाण्यावरून तर स्फुरला नसेल’ असे पुलं लिहितात.
जनसामान्यांबद्दल त्यांच्या मनात प्रेमच आहे. अशा लोकांच्या जीवनातील विसंगती, आकांक्षा ते रंगून रंगून सांगताना दिसतात. ‘बटाट्याची चाळ’ ‘खोगीरभरती’ मधून त्याची प्रचीती येते. त्यात त्यांचा विनोद निर्मळ राहिलेला आहे. कुठेही अश्‍लीलता नाही. माणसांचे दोष मांडताना ते चेष्टा करतात, पण त्यांच्यावरही त्यांचे प्रेम असते, मायाच असते.

विडंबन हा आणखी एक त्यांच्या लेखणीचा सहजधर्म दिसतो. कोल्हटकर, चि. वि. जोशी, गडकरी, अत्रे यांची लेखन पद्धती, त्यातील नाट्यधर्म, त्यातील गोष्ट त्यांना भावलेली असते. काही तरी करून घसरून नाटक कसे पडेल याकडे प्रथम प्रयोगाकडे आलेल्या लोकांचे लक्ष असते. लोकांची ही वृत्ती त्यांनी उपरोधिक शैलीत मांडली आहे. पुलंनी मराठी रसिकाला हसविले, पण त्यापेक्षा अधिक स्वत:संबंधी विचार करायलाही प्रवृत्त केले आहे. त्यांना अंतर्मुख व्हायला लावले.

फजितीचं अत्यंत साद्यंत वर्णन पुलं करतात. ‘भांडकुदळ’ बायको या लेखात एक मजेशीर घटना घडते. आपल्या बायकोसाठी तो चोरून स्नो पावडर आणतो. त्यावर ती खूष होईल, असे त्यास वाटते. घडते वेगळेच. ती म्हणते, ‘माझ्या काळेपणाला एवढं हिणवायला नको, गोरी पाहिजे होती तर आणायची होती.’ तो म्हणतो ‘हिला काळे म्हणायला माझे डोळे का फुटले आहेत? कोळसे, डांबर, शाई वगैरे मंडळींचा राग मी सुखासुखी का पत्करीन?’
आपला विनोद त्यांनी चावटपणापासून अलग ठेवला आहे. चावटपणाचा साधा स्पर्शही आपल्या विनोदाला ते करू देत नाहीत. उपहासामधून पु.ल. एखाद्याची खिल्ली उडवत. शारीरिक ठेवण, मानसिक दोष, जीवनातील विसंगती यातून त्यांनी आपला विनोद साधला आहे. स्वभावनिष्ठ विनोद, प्रासंगिक विनोद, विडंबन उपहासात्मक विनोद, विसंगतीवरचा विनोद असे विनोदाचे प्रकार पडतात.

एका पानवाल्याची रसिकता किती और आहे, हे सांगताना पुलंची निरीक्षणशक्ती किती सूक्ष्म आहे याचे दर्शन होते. ते म्हणतात, त्याच्या दुकानात कुठल्याशा गोस्वामी बालब्रह्मचारी आणि ‘बंदुककी आवाज’ फेम लवंगलता या दोघांचेही फोटो एकाच फ्रेममध्ये बसवलेले मी या उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत. अनासक्ती आणि आसक्ती याचा असा योगायोग जुळवून आलेला त्यानंतर मी कुठेही पाहिलेला नाही. दर्याचा उल्लेख करताना मोठमोठ्या लेखकांनी ‘ऐलतीर पैलतीर’ पाहिलेला आहे, हा शब्दप्रयोग पुलंना मजेशीर वाटतो. ते म्हणतात, ‘ही भाषा वापरायला दर्या म्हणजे काय कोल्हापूरची पंचगंगा आहे?’ असे विनोद मांडताना त्यांना सामाजिक स्थित्यंतराची जाणीव होते. चाळ ही संस्कृती लोपल्यानंतर कुटुंब ही संकल्पनाही लोप पावणार, ओलाव्याचं नातं संपणार, बंद दार असलेली संस्कृती येणार हे त्यांनी ५० वर्षांपूर्वी लिहिलेले होते. ब्लॉक माणूसपण न जपता खासगीपण जपणार हे त्यांनी तेव्हाच ओळखले होते. पुलंचे हे चिंतन मराठी मन जपते.

निकोपपणे माणसाच्या जगण्याकडे पहा असा जणू संदेश त्यांच्या विनोदवृत्तीने दिला आहे. अमंगल, गुंतागुंतीचे जगणे त्यांच्या खेळकर वृत्तीने नाकारले आहे. माणसाने सुंदरपणाने जगावे असे त्यांना वाटे. पुलंनी विनोदकार म्हणून लौकिक मिळवला, पण अंगाला अहंकाराचा वारा लागू दिला नाही. पुलंनी लिहिलेले काही किस्से सतत आठवत राहतात. ते एके ठिकाणी लिहितात, हौस म्हणून पाळले जाणारे प्राणी तीनच. पोपट, मांजर आणि कुत्रा. एका इसमाने माकडही पाळले होते, पण दोघांच्याही आचरटपणाची इतकी चढाओढ लागायची की, कोणी कोणाला पाळलेय हेच कळत नसे. आम्ही शून्यातून विश्‍व निर्माण केलं का विश्‍वातून शून्य? असा त्यांना माणसाच्या कर्तबगारीबद्दल प्रश्‍न पडतो. पुलंनी मात्र विनोदाचे एक स्वतंत्र विश्‍व निर्माण केले. खळखळून हसविले आणि मोकळेपणाने जगाकडे पाहायला शिकविले.


डॉ. श्रीकांत नरुले
नवप्रभा
८ नोव्हेंबर २०१९

Wednesday, November 20, 2019

माझ्या आठवणीतले पु.ल.

पु.लं. बद्दल काही लिहायचं, म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. श्री रामा ला ते जमलं कारण ते एक अवतार होते, पण आमच्या सारख्याला ते कसं जमायचं, कारण आमचा अवतार पाहाल, तर अगदीच अवतार आहे. तरी देखील, पु.लं नी जे काही दिलं आहे, माझ्या आणि माझ्या सारख्या अनेकांच्या 'आयुष्यात' जे सुख आणि आनंदाचे क्षण दिले आहेत, त्या प्रती क्रुतज्ञता म्हणून हा सगळा खटाटोप. (इथे मुद्दामहून 'जीवनात' हा शब्द टाळला आहे, कारण सखाराम गटणे मध्ये पु. लं.नीच, त्यांना जीवन वगैरे शब्दांची भीती वाटते असे म्हटलं आहे) तसं पाहायला गेलं तर, पु.लं. नी जो काही आनंद दिला आहे, त्याला शब्दात मांडणं कठीण आहे. तरी सुद्धा, अनेक वर्षं मनात दाटून राहिलेल्या भावना व्यक्त कराव्यात असं सारखं वाटत होतं, आणि व्यक्त होत राहणे हा तर आपला स्थायी भाव आहे, म्हणून केलेला हा एक छोटासा प्रयत्न. एवढं असूनही, लेख चांगला असेलच याची शास्वती नाही, तरी सगळ्यांनी हा लेख गोड मानून घ्यावा ही विनंती.

तर...

पु.लं ची आणि माझी पहिली ओळख, दूरदर्शन वरील त्यांच्या 'निवडक पु.लं' या मालिकेतून झाली. मला पहिल्या पासूनच वाचनाची आवड होती, शाळेत सुद्धा, भाषा व इतिहास हे गद्य विषय माझ्या खास आवडीचे. कॉलेजमध्ये आल्यानंतर, माझे अभ्यासक्रमाच्या बाहेरचे वाचन वाढले. कॉनव्हेंट मध्ये शिक्षण झाल्याने, सुरवातीला इंग्रजी पुस्तके वाचण्याकडे माझा कल होता, मग एके दिवशी बाबांनी सल्ला दिला, "इंग्रजी बरोबरच मराठी साहित्य सुद्धा वाचत जा". मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात त्यांचे आजीवन सभासदत्व होते, मग मी माझा मोर्चा तिकडे वळवला. मराठी साहित्याबद्दल फारशी माहिती नसल्याने, काय वाचावे, कोणत्या लेखकाचे पुस्तक घ्यावे हा एक प्रश्नच होता. परंतु, पु.लं. ची थोडीफार तोंड ओळख झाली असल्याने त्यांच्या पासूनच सुरुवात करावी असं ठरवलं. आणि मग सुरू झाला एक अतिशय आनंदाचा आणि सुखाचा प्रवास...
खोगीरभरती, ह'फ'सवणूक, नसती उठाठेव, व्यक्ती आणि वल्ली, अघळपघळ, उरलंसुरलं, खिल्ली, अशा अनेक पुस्तकांनी मनमुराद हसवलं. 'निवडक पु.ल.' पाहिले असल्याचा एक फायदा असा झाला, की मी ती सगळी पुस्तकं पु.लं. च्या आवाजात वाचू शकलो, म्हणजे, मनातल्या मनात वाचताना सुद्धा मला पु.लं. च आपल्याला वाचून दाखवताहेत असे वाटायचे. त्यांच्या त्या खास जागा, विशिष्ट पद्धतीने उच्चार करण्याची लकब, त्यांचे एकूणच अभिवाचन, अगदी सगळं सगळं मी अनुभवत होतो. त्यामुळे त्या वाचनाचा आनंद द्विगुणित झाला. त्यांचं निरीक्षण ईतके सूक्ष्म व विलक्षण असायचं आणि तितकंच लिखाण सजीव, की त्यांच्या पुस्तकातील अनेक प्रसंग, व्यक्तीरेखा, या खर्याखुर्या व जीवंत वाटायच्या, त्यातील अनेक प्रसंग आपण देखील अनुभवले आहेत व त्यातील अनेक व्यक्तीरेखा या आपल्या आयुष्यात सुद्धा आहेत असेच वाटायचं. किंबहुना ते बर्याचदा तसंच असायचं.

त्यांचा नामु परीट असो किंवा पेस्तनकाका, सखाराम गटणे असो किंवा भय्या नागपूरकर, सगळे आपले आपलेसे आणि ओळखीचे वाटायचे. हसवता हसवता मध्येच एकदम, चितळे मास्तर, अंतू बर्वा, हरी तात्या ही मंडळी अचानक काळजाला हात घालुन जायची आणि डोळ्यांच्या कडा नकळत ओल्या व्हायचा. या मंडळींना देखील आपण कुणा ना कुणात, कुठे ना कुठे पाहिलेले असायचे. एसटी चा प्रवास करताना आपण देखील सुबक ठेंगणी पाहिलेली आहे, ईतकी चूकीची माहिती ईतक्या आत्मविश्वासाने सांगणारे मास्तर सुद्धा भेटले आहेत, झंप्या दामले असो वा मधु मलुश्टे, ऑरडरली साहेब असो वा पुढारी, उस्मान शेठ असो किंवा बगु नाना, ही मंडळी आपल्याला देखील ठाऊक आहेत. "कैसा पान लगाऊ साहेब" असं आपल्या पानवाल्याने विचारलं, तर त्याला सुद्धा "तूच का तो ब्रूटस" असं कित्येकदा आपल्याला देखील म्हणावसं वाटलंय, बाबांची पोष्टातील कामं करायला पोष्टात गेलो की आख्खं पोष्टीक जीवन डोळ्यासमोर ऊभं राहिलंय. आज देखील, कुणीही वीट आला असं म्हटलं, तर एका हातातील बाजारातील वीट आणि दुसऱ्या हातातील स्वतःच्या भट्टीतील वीट आठवते. आजकाल फेसबुक चा जमाना आहे म्हणून बरंय, नाहीतर घरी बोलावून कुणी फोटो दाखवायला बसवलं असतं, तर मात्र माझी आणि माझ्या शत्रुपक्षाची चांगलीच जुंपली असती. कुणाच्या घरी बोलणारा पोपट किंवा शेकहँड वगैरे करणारा कुत्रा दिसला, की पाळीव प्राणी आठवतं आणि ती वँक वँक करणारी सिंडरेला नामक चेटकी आठवल्या खेरीज राहत नाही. "महाराषट्राचा संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून विभक्त पणाची भावना अधिक बळावली आहे" हे पु.लं. च वाक्य प्रत्येक मुंबईकर, पुणेकर आणि नागपूरकराने खरं केलंय.

बटाट्याची चाळ आणि असामी असामी वाचल्यावर तर पु.लं बद्दल प्रेम अधिक की आदर असा प्रश्न पडतो. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दैनंदिन व्यवहारात, धकाधकीत इतकी गंमत दडली आहे, हे केवळ पु.लं. नीच जाणून दिलं. आपल्या मध्यम वर्गीय माणसाच्या अडीअडचणींंने भरलेल्या आयुष्याकडे, विनोद बुद्धीने पाहायला आणि त्यातील गंमती हुडकायला, पु.लं. नीच शिकवलं, आणि माझ्या मते हे त्यांनी आपल्याला दिलेलं सर्वात मोठं देणं आहे. चाळीतंच लहानाचा मोठा झाल्यामुळे, माझ्या सारखे अनेकजण, बटाट्याची चाळ अक्षरशः जगले आहेत. आमच्या चाळीत, सोकाजीनाना त्रिलोकेकर पासून ते समेळ काकांपर्यंत आणि अण्णा पावशे पासून ते बाबा बर्वयांपर्यंत सगळे नमुने आम्ही जवळून पाहिले आहेत. "त्या तिथे वसत असे चाळ बटाट्याची" यातील कळवळा आम्ही समजू शकतो. काळ बदलला तरी आजच्या काळातले आप्पा भिंगारडे, नानू सरंजामे, वगैरे मंडळी हापिसात भेटतातच. आपल्या घरी देखील आपला शंकर्या अथवा शरयू आपण किती फॉग आहोत अथवा टॉप्स आहोत ह्याची जाणीव करून देत असतात. जुन्या आणि नव्या पिढीतील चढाओढ अजूनही चालूच असते. "अंग किती गोरं आहे नाही" असं म्हटल्यावर आजदेखील आपली सौ डोळे वटारून "गोरं!!!" असाच प्रतिसाद देते. आता मुलांच्या शाळेत जाण्याचा योग आला की ओठांना ओठ न लावू देता (म्हणजे स्वतःचे) बोलणारी हेडमास्तरीण बाई भेटली की आपली ही अवस्था धोंडू भिकाजी जोशींच्या सारखीच होते. त्यामुळे मला असं वाटतं, की पु.ल. हे कालातीत साहित्यिक आहेत, त्यांचं साहित्य हे पिढ्यानपिढ्या साठी आहे आणि प्रत्येक पिढीला ते आपलं वाटतं, त्यांच्या आयुष्याशी सुद्धा ते समरस आहे, म्हणून तर बिगरी ते मँट्रीक हे प्रत्येकाला त्याच्या शाळेत घेऊन जातं, दामले गुरुजी, ड्रॉईंग चे मास्तर, संस्कृत चे गुरुजी, ईतिहास मधील वंशावळ्या, भूगोलातील वारे, भूमिती साठी वापरली जाणारी कंपास पेटी, करकटक वगैरेशी भेट घडवते.

हा "हसवण्याचा धंदा आपुला" करत असतानाच पु.लं. नी; आपुलकी, मैत्र, गणगोत सारख्या पुस्तकातून; बाल गंधर्व, वसंतराव देशपांडे, वसंत सबनीस, शरद तळवलकर, केसरबाई केरकर, खानोलकर ऊर्फ आरतीप्रभू,शाहू महाराज, वूडहाऊस, चिंतामणराव कोल्हटकर, बेगम अख्तर तसंच रावसाहेब सारख्या थोरामोठ्यांचे, जवळून दर्शन घडवले. जावे त्यांच्या देशा, पूर्वरंग सारख्या प्रवासवर्णनातून आपल्याला विविध देश फिरवले, तेथील संस्कृतीचे दर्शन घडवले. आयुष्याकडे, जगाकडे पाहण्याचा, माणसाकडे पाहण्याचा एक नवा द्रूष्टीकोण दिला.

असो, सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे, पु.लं. नी जो आनंद दिलाय तो शब्दात सांगणं कठीण आहे, त्यांच्या बद्दल कितीही लिहीलं तरी कमीच आहे. तेव्हा माझा हा लेख आटोपता घेतो आणि आपल्या सर्वांना अतोनात आनंद देणाऱ्या या आनंद यात्रीला शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याबद्दल अभिनंदन करतो व असेच आम्हाला पिढ्यानपिढ्या हसवत आल्याबद्दल आभार मानतो.

हिमांशू हाते
https://www.facebook.com/himanshu.hate.9

पु. ल. न विसरता येणारे

पुलं सोबतची (पुस्तकरूपी) ओळख झाली ते शाळेत असताना त्यांचा ‘उपास’ हा धडा शिकताना आणि वाटलं होतं सगळे धडे असेच का नसतात? आज पण जेव्हा कोणी डाएट बद्दल बोलतं तेंव्हा मला ‘उपास’ आठवतो. पुलं हे खूप कोणी तरी मोठे लेखक आहेत आणि त्यांच लिखाण किती महान असेल हे माझ्या सारख्या छोट्या बुद्धी असलेल्याला तेंव्हा समजलं नव्हतं.

पुढे जेव्हा थोडी वाचायची समज आल्यावर आणि त्यांची पुस्तके वाचायला सुरुवात केल्यावर कळलं अरे ह्यांची पुस्तके खूप आधीच वाचायला हवी होती. खर तर पुलं आपल्यातून जाऊन खूप वर्षे झाली पण त्यांची पुस्तके वाचताना , कथानक ऐकताना असं वाटतं अरे ते तर अजून अवतीभवतीच आहेत. मी पुलंच सगळं लिखाण वाचलं आहे असं नाही पण त्यांच जे काही लिखाण वाचलंय त्याला तोड नाही.पुलंनी जे काही लिखाण केलं ते आज सुद्धा मनाला भावतं.
                
पु.लं. च व्यक्ती आणि वल्ली जेंव्हा वाचलं होतं तेंव्हा आणि आज सुद्धा जेंव्हा कधी वाचतो त्या नंतर त्यातील वल्ली चा शोध कोठे ना कोठे घेऊ लागतो. जेंव्हा केंव्हा आमचा कोकण दौरा होतो तेंव्हा त्या कोकणातील नारळ आणि सुपारी च्या बागा पाहतो तेंव्हा मी ‘अंतू बर्वा’ ला आजूबाजूस शोधू लागतो. कधी त्या ठिकाणच्या छोट्या चहा च्या टपरी वर तर कधी बस स्टँड वर. जेंव्हा एखाद्या लग्न समारंभात जातो आणि निवांत बसलेला असतो तेंव्हा कोठे ‘नारायण’ नावाने कोणी हाक ऐकू येते का हे पाहत असतो. जेंव्हा कोणी नातं नसलेला पण आपुलकी असेलला कोणी ज्येष्ठ एखादी मुलगी लग्न होऊन निघताना डोळे पुसतो तेंव्हा मी त्या व्यक्तीत ‘चितळे मास्तर’ बघतो, कधी कोठे खूप अशी तळवे झिजलेली चप्पल बघतो तेंव्हा वाटत अरे ईथे चितळे मास्तर आले असतील काय असा अंदाज लावतो. कधी तरी सदाशिव पेठेत फिरत असताना ‘गटणे’ हे आडनाव कानावर पडतं तेंव्हा वाटत त्यांना जाऊन विचारावं सखाराम तुमचा कोण लागतो? रेल्वेतून जेंव्हा ही प्रवास होतो तेंव्हा वाटत आपल्या शेजारी पण ‘ पेस्तन काका’ यायला पाहिजेत म्हणजे काय धमाल येईल ना. तेंव्हा माझी नजर एखाद्या पारशी कुटुंबाला शोधत असते. कधी तरी आमचा परीट सुद्धा आमचे कपडे हरवून ठेवतो तेंव्हा मला नकळत ‘ नामू परीट’ आठवतो. मी त्याला म्हणतो तुझा नामू झाला वाटतं पण त्या बिचाऱ्याला त्यातलं काहीही कळत नाही. फिरत असताना एके ठिकाणी दोन व्यक्ती बोलताना दिसतात तेंव्हा त्यातील एकाच्या अंगावर बरेच सोन्याचे दागिने, हातात अंगठ्या दिसतात व तोंडात थोडी गुंडगिरी ची भाषा आणि दुसरी व्यक्ती एकदम साधारण असते तेंव्हा वाटत अरे हा ‘बबडू’ तर नसेल ना.

‌ जेंव्हा बस किंवा आता ट्रॅव्हल्स ने प्रवास करत असताना अचानक जर गाडी बंद पडली आणि गोंधळाचा आवाज आला तर वाटतं अरे गाडी खाली ‘म्हैस’ तर नसेल ना आली. कधी तरी नाटक पाहण्याचा योग येतो आणि तिसऱ्या घंटे नंतर जेंव्हा पडदा वर जाऊ लागतो तेंव्हा मला ‘शंकऱ्या’ ने विचारलेला प्रश्न आठवतो, आणि मी शेजारी पाजारी शंकऱ्या ला शोधू लागतो. जेंव्हा कोणी स्वतःच्या नवीन बांधत असेलेल्या घराबद्दल बोलायला लागतं तेंव्हा मला मी आणि माझा शत्रूपक्ष मधील कुलकर्णी पात्र आठवतं आणि हसायला येतं. कधी तरी कामा निमित्त पोस्टात जाणं होतं तेंव्हा मी पुलंनी वर्णन केलेल्या पोस्टाशी काही मिळतं जुळतं आहे का असं बघत असतो तेंव्हा जाणवतं अरे इथे तर अजून पण तिच स्थिती आहे.

‌ माझ्या मामाच्या घरासमोर अजून पण काही चाळी आहेत, आणि ती चाळ त्या चाळीतील घरे ,लोकं पाहिली की मी आपसुकच अरे ही तर ती ‘ बटाट्याची चाळ’ नाही ना असं स्वतःला विचारतो. कधी तरी एखाद्या अमृततुल्य ला चहा घेत असताना अचानक कानावर ‘ पुर्वीच पुणं राहीलं नाही हो आता’ असं जेंव्हा ऐकू येत तेंव्हा पुणेकर होण्यासाठी लागणाऱ्या अटींचा मी विचार करायला लागतो.

‌ पु ल तुम्ही कधी कोणी एके काळी केलेलं लिखाण आज सुध्दा तंतोतंत नजरेस दिसतं, पुलं तुम्ही नक्की च देवलोकी पुन्हा एकदा बटाट्याची चाळ तयार केली असणार आणि देवलोकी हास्याचे फवारे उडत असणार.

Monday, November 18, 2019

गृहिणी-सखी-सचिव

“ काऽऽय हो ? काय म्हणताय ?” असा परिचित आवाज मला माझ्या नव्या लॅंडलाईनच्या रिसीवर मधून ऐकू आला आणि मला एकदम हुश्श झाले. म्हणजे ते दोघेही पुण्यातल्या त्यांच्या घरीच होते. मी पुण्यातच, गावातून कोथरूडला राहायला आलो होतो. माझ्याकडे नुकताच दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दूरध्वनी आला होता. आणि चक्क सुरूही झाला होता. मोबाईलचा जमाना इथे सुरू व्हायचा होता अन लॅंडलाईनला अजून महत्व होते. पहिलाच कॉल कोणाला करायचा तर तो मी १, रूपाली ७७७, शिवाजीनगर, पुणे येथे केला होता. अर्थातच सर्वांचे लाडके व्यक्तीमत्व असलेल्या पु लं च्या घरी. त्यांच्या ३३४६२८ या नंबरवर, दिवस होता १४ ऑगस्ट १९९६. पलीकडून सौ. सुनीताबाई देशपांडे बोलत होत्या. त्यांचा नेहमीच बोलताना येणारा “ काऽऽय हो ” चा आवाज मी झोपेतून उठवले तरी त्यावेळीही सहज ओळखू शकलो असतो. मी त्यांना नवीन फोनबद्दल सांगितल्यावर त्या क्षणी त्या म्हणाल्या – “ थांबा हं .... मी तुमचा नवीन नंबर डायरीत नोंद करून ठेवते.” त्यांनी लगेच तशी नोंदही केली आणि मगच रिसीवर भाईंच्याकडे सोपवला.

मी साधारण १० वीत असल्यापासून आठ नोव्हेंबरला न चुकता पु लं च्या घरी त्यांना शुभेच्छा द्यायला जात होतो. नंतर शिक्षण संपवून मी औद्योगिक प्रकाशचित्रणाचा व्यवसाय सुरू केला. आवड म्हणून संगीत क्षेत्रातील नामवंतांच्या भावमुद्राही टिपायला सुरुवात केली. माझी ती आवड त्या दोघांच्या नजरेतून सुटती तरच ते नवल. मग मला ते वेगवेगळ्या घरगुती मैफिलींची निमंत्रणे आमच्या वाड्यातील श्री. हर्डीकर यांच्या फोनवर देत असत. कधी त्यांचे फोटोचे काही काम असे. मी ते त्वरेने करीत असे. त्यामुळे वेळोवेळी मला त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळे. कधी माझ्याजवळ कॅमेराही असे. पण बऱ्याच दिवसांच्या परिचयानंतर मला हे उमगले होते की – पु लं ना फोटो काढून घेण्याचे वावडे नव्हते पण सुनीताबाई मात्र फोटो काढून घ्यायला विरोध करीत. त्यातून त्या दोघांचा फोटो काढलेला त्यांना अजिबात खपत नसे. याचं कारण त्या सर्वसाक्षीलाच माहित. पण मी मात्र मनाशी ठरवून टाकलं होतं की ते दोघे असताना, मग ते त्यांच्या घरी असोत की एखाद्या कार्यक्रमात, मी कॅमेरा बॅगमधून बाहेरच काढत नसे. अगदी पु लं च्या जन्मदिनाच्या निमित्तानेही मी तसा फोटो कधी काढला नाही. पण प्रत्त्येक जन्मदिनी येणाऱ्या पाहुण्यांचे अगत्याने स्वागत करणे, त्यांच्या हातावर लगेचच पेढा ठेवणे, कोणी फुले आणली असतील तर तो गुच्छ सोडवून आधी आलेल्या व त्यांनीच सुंदरतेने खोलीत मांडून ठेवलेल्या त्या पुष्परचनांत ती नवी फुले अलगद खोवून ठेवणे, मधेच कोणा महत्वाच्या व्यक्तीचा फोन आला तर तो घेऊन उत्सवमूर्तीला आणून देणे, जमलेल्या गप्पांमध्ये एखाद्या घटनेचा संदर्भ तारीख-वार सांगणे व ही सर्व कामे उत्साही आणि हसतमुख चेहऱ्याने करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते सुनीता पुरुषोत्तम देशपांडे.

माझं भाग्य असं की मी पु. ल. आणि सुनिताबाईंच्या स्नेहशील परिवारातलाच झालो होतो. सुनिताबाई जितक्या स्पष्टवक्त्या, व्यवहारी तेवढ्याच सहृदय, आतिथ्यशील होत्या. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे हे दोन्ही पैलू मी अनुभवले. साधेपणा हा तर एका वेगळ्याच लेखाचा विषय ठरेल. त्याचा एक अनुभव मला आला. दिनांक ८ नोव्हेंबर १९९८. पु ल ऐंशीव्या वर्षात पदार्पण करणार होते. लेखकाचा वाढदिवस कसा साजरा व्हावा? त्याच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनाने? हे तर उत्तमच. आणि त्या दिवशी तर पु लं च्या पुस्तकाच्या बरोबरच सुनिताबाईंच्या पुस्तकाचेही प्रकाशन होणार होते. पु लं चे ‘आपुलकी’ हे पुस्तक तर सुनिताबाईंचे ‘सोयरे सकळ’. त्यांच्या मालती-माधव या भांडारकर रोडवरील घराच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये हा छोटेखानी समारंभ होता. त्यावेळी पु. ल. व्हीलरचेअरवर होते. दुसऱ्या कोणी व्यक्ती असत्या तर अशा कार्यक्रमाला उंची असे कपडे आणि झगमगाट नक्कीच दिसला असता. पण इथे तर उत्सवमूर्तींनी अतिशय साधे कपडे घातले होते. पु ल साध्या खादीच्या बंडीत आणि पायांवर शाल पांघरलेले. तर सुनीताबाई जांभळ्या रंगांची फुले असलेली सुती साडी नेसलेल्या. डामडौल नसलेला पण दोन महनीय व्यक्तींचा असा कार्यक्रम.

सुनिताबाईंचे दोघे बंधू व इतर कुटुंबीय, साक्षेपी संपादक श्री. पु. भागवत, मधुभाऊ गानू, शांताबाई शेळके, ज्योत्स्नाबाई भोळे, राम गबाले, भक्ती बर्वे अशा काही मंडळींची आवर्जून उपस्थिती आणि या सगळ्यांचे स्वागत करीत होते रामभाऊ कोल्हटकर. सगळेच एकमेकांना परिचित. त्यामुळे गप्पांचा फड जमणे हे आलेच. काही वेळाने सुनिताबाईंनी सूत्रे हाती घेतली. त्यांनी दोन्ही पुस्तकांची पार्श्वभूमी कथन केली. पुस्तकांचे प्रकाशन अर्थातच ज्येष्ठ प्रकाशक श्री. पु. भागवत यांच्या हस्ते होणार होते. ‘आपुलकी’ चे प्रकाशन त्यांनी केले. ते पुस्तक पु लं नी ज्येष्ठ लेखक श्री. ना. पेंडसे यांना अर्पण केलेले. मग प्रकाशन झालं ‘सोयरे –सकळ’ चे. श्री पुं नी पुस्तकाचे मुखपृष्ठ जमलेल्या सर्वांना दाखवले. सुनिताबाईंच्या गाजलेल्या ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकानंतरचे हे दुसरे पुस्तक. त्यांनी ‘सोयरे –सकळ’ ची ती प्रत सुनिताबाईंच्या हातात दिली. याची अर्पणपत्रिका काय असणार? पु लं सकट सर्वांनाच उत्सुकता. त्या उत्सुकतेनी ते सुनिताबाईंकडे पाहत होते. सुनिताबाईंनी पहिले पान उघडले आणि पु लं समोर धरले. त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ‘सोयरे-सकळ’ हे पुस्तक सुनिताबाईंनी साक्षात पु लं नाच अर्पण केले होते. पु लं च्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली. सगळं वातावरणाच भावूक होऊन गेलं. त्या वातावरणात बदल घडवला तो ज्येष्ठ कवियत्री शांता शेळके यांनी वाचून दाखवलेल्या एका काव्याने. त्यानंतर परत सगळे एकमेकांशी बोलण्यात रंगले. त्या गप्पांच्या आवाजाने पार्किंग भरून गेले.

सुनिताबाईंनी टाळ्या वाजवत परत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आता त्या काय सांगतात याकडे सगळ्यांचे कान व लक्ष. त्या म्हणाल्या- “ जी गोष्ट आजपर्यंत कधीही घडलेली नाही अशी एक कृती मी आज आत्ता करणार आहे. तुम्ही सर्वजण त्याचे साक्षी असणार आहात. मी भाईला नमस्कार करते.” असे म्हणत त्यांनी पुढच्याच क्षणी पु लं ना वाकून नमस्कार केला. आयुष्यभर पु लं शी बरोबरीच्या नात्यानं वागणाऱ्या सुनिताबाईंच्या या कृतीनं सगळेच अचंबित झाले. वातावरणात एकदम शांतता पसरली. या शांततेचा भंग करीत पुढच्याच क्षणी पु लं नी मला हाक मारली व म्हणाले- “ सतीश, या घटनेचं प्रूफ मला हवयं. हा फोटो मला हवायं.” त्यांच्या या वाक्याने वातावरणातला तो ताण कुठल्याकुठे नाहीसा झाला. मग सुनिताबाईंनी परत एकदा वाकून पु लं ना नमस्कार केला अन तो क्षण मी कॅमेराबद्ध केला. आज त्या आठवणींनीही माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. इतकी मोठी ही माणसं अन किती साधेपणा.

जून १२, २००० ला पु. ल. अनंताच्या प्रवासाला निघून गेले. काही न काही कामानिमित्त माझं मालती-माधव मध्ये जाणं सुरूच राहिलं. भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या भावमुद्रा असलेल्या माझ्या पहिल्या थीम कॅलेंडरमध्ये मला पु लं नी माझ्या त्या प्रकाशचित्रांवर लिहिलेला अभिप्राय छापायचा होता. अभिप्राय होता – “या अप्रतिम छायाचित्रातून स्वर ऐकू येतात.” मी सुनिताबाईंना भेटलो. अभिप्राय मराठीत होता. कॅलेंडर इंग्लिश मध्ये. मी मित्राकडून त्याचं भाषांतर करून घेतलेलं. ते वाचल्यावर सुनिताबाई म्हणाल्या – “ हे भाषांतर फारच गद्य वाटतयं. मला जरा वेळ द्या. मी तुम्हाला याचं रूपांतर करून देते.” त्यांचा कवितांचा अभ्यास व प्रेम दोन्ही प्रचंड. संध्याकाळी चार वाजता मला त्यांचा फोन आला. म्हणाल्या- “ हं. घ्या लिहून. These excellent photographs create musical melodies in the minds.” ते समर्पक आणि काव्यात्मक रूपांतर ऐकून मी आनंदून गेलो. माझ्या त्या ‘म्युझिकॅलेंडर’ वर अवतरलेला पु लं चा तो अभिप्राय आणि त्याबरोबरच त्यांची स्वाक्षरी यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

सुनिताबाईंचा नेटकेपणा, त्यांची सौंदर्यदृष्टी ही नेहमी अनुभवास येत असेच पण माझ्या कायमच लक्षात राहील तो त्यांचा कोणत्याही गोष्टीतील अचूकतेचा ध्यास. ‘सोयरे-सकळ’ या पुस्तकानंतर त्यांचे प्रकाशित झालेले पुढचे पुस्तक म्हणजे ‘मण्यांचीमाळ’. ते प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी मी ते डेक्कन जिमखान्यावरून विकत घेतले. वेळ संध्याकाळची. तेथूनच मी त्यांना फोन केला. परत एकदा “ काऽऽय हो ? अशी त्यांची विचारणा. मी नुकतेच घेतलेल्या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी हवी आहे असे सांगितले. त्यांनी किती वेळात येऊ शकाल? असे विचारले. मी त्यांना म्हणालो- “ पाचच मिनिटात पोहोचेन. आत्ता डेक्कनवरच आहे.” आणि अक्षरशः पाच मिनिटात मी तेथे पोहोचलो. त्यांनी पुस्तकाचे पहिले पान उघडून सही केली “ सुनीता देशपांडे १५.१०.२००३.” मग इतर काही बोलणे झाले व मी लगेचच निघालो.

पुढच्याच दिवशी त्या छोटेखानी पुस्तकात मी पूर्ण गढून गेलो. एकतर मला त्यांची लेखनशैली अतिशय आवडे. व त्यांनी त्या पुस्तकात निवडलेले बारा लेखही अतिशय सुंदर. त्यातही ‘डोडी’ या त्यांच्या नातवाने पाळलेल्या आणि बराच वेळ त्यांच्याच घरात वास्तव्यास असलेल्या कुत्र्याविषयी लिहिलेला लेख फारच सुंदर. मी ते पुस्तक वाचत असतानाच मला सुनिताबाईंचा फोन आला. त्या म्हणाल्या – “ काल तुम्ही मण्यांचीमाळ या माझ्या पुस्तकावर सही घेऊन गेलात ना?” माझे उत्तर अर्थातच हो असे होते. त्या पुढे म्हणाल्या – “ उद्या तुम्ही ते सही असलेले पुस्तक परत घेऊन या.” मला काही उलगडाच होईना. पण काय बोलणार? मी त्यांच्या त्या म्हणण्याला होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी पुस्तक घेऊन त्यांच्या घरी हजर. त्यांच्या हातात मी ते पुस्तक दिले. काहीही न बोलता त्यांनी ते पुस्तक पूर्णपणे पान –अन – पान निरखून पाहिले. आणि मग माझ्या हातात परत दिले. आताही मला काही उलगडा होईना. मग त्यांनी कारण सांगितले- “ अहो, आज अजून एक गृहस्थ आले होते सही घ्यायला. त्या पुस्तकातील कागद खराब होता. त्यावर बरचसे काळे ठिपके होते. संपूर्ण पुस्तकभर ते ठिपके होते. आणि मग काही ठिकाणी अक्षरांवर एखादा ठिपका आला तर तो अनुस्वरासारखा दिसत असल्याने मजकुराचा अर्थच बदलत होता. मग मला तुमच्या पुस्तकावर केलेली सही आठवली. म्हणून मी तुम्हाला फोन केला. मी काही कॉपीही मागवून ठेवल्या आहेत.” पण सुदैवाने माझ्याकडची कॉपी स्वच्छ कागदाची होती आणि त्यामुळे सुनिताबाईंचे समाधान झाले होते.

अशी जागरुकता असलेले लेखक-लेखिका किती असतील? कोणी घेईल अशी तसदी? पण अशा व्यक्ती थोड्याच असतात आणि त्यांचा तो स्वभावच त्यांच्याबद्दल चुकीचे समज पसरवण्यास कारण ठरत असेल का?

काही व्यक्तींना एखादे काम कसेही झाले तरी ते फक्त होण्याशी मतलब असतो. काही व्यक्ती याच्यापेक्षा थोड्या पुढे असतात. त्यांना ते काम निगुतीने होण्यात थोडाफार रस असतो. त्यामुळे त्या कामात थोडं इकडं-तिकडं झालं तरी त्या ते चालवून घेतात. पण काही व्यक्ती अशा असतात की त्यांना एखादे काम त्याच्या नियोजित पद्धतीनेच झालेले आवडते उलटपक्षी ते तसेच व्हावे असा त्यांचा आग्रह असतो. आणि असं असण्याचा सगळा त्रास त्यांच्या वाटयाला येतोच. अशा व्यक्तींना ‘ए’ टाईप व्यक्ती म्हणतात असं एक डॉक्टर मला सांगत होते. पुस्तकाच्या पानांवर काळे ठिपके दिसल्याने व त्यातला एखादा ठिपका एखाद्या शब्दावर आल्याने अर्थ बदलतो म्हणून स्वतः सही केलेलं पुस्तकच बदलून द्यायला निघालेल्या सुनीताबाई या अशी व्यक्ती होत्या. त्या त्यांच्या सगळ्याच मतांशी अगदी ठाम असत. त्यापासून जरा देखील ढळत नसत. याचा अनुभव मला वेळोवेळी येत गेला होता.

माझ्या पहिल्या थीम कॅलेंडरमध्ये मला सहर्ष मदत करणाऱ्या सुनिताबाईंचा हा स्वभाव माहित असल्याने पुढच्याच वर्षी मी त्यांच्या घरी पोहोचलो ते ‘आनंदयात्री पु.ल.’ ही नवी थीम घेऊनच. त्यात मी काढलेली पुलंची प्रकाशचित्रे वापरणार होतो. त्याच्या पूर्वीच प्रकाशचित्रकार देवीदास बागूल आणि सुनीताबाई-पु.ल. यांच्यामध्ये फोटोंच्या स्वामित्व हक्कावरून तात्विक वाद बराच तीव्र झाला होता. बागुलांनी काढलेले पुलंचे फोटो पु. ल. सत्कार समितीने विनापरवानगी वापरल्याबद्दल त्यांनी पुलंशी पत्र व्यवहार केला होता. त्यात बागुलांबरोबर अनेक मान्यवरांच्या सह्या होत्या. मी बागुलांच्या स्वामित्वहक्काबाबतच्या भूमिकेशी सहमत होतो. या पत्रयुद्धात बागुलांना पाठिंबा देणारे महारथी हळूहळू मागे हटले आणि मी एकटाच बागुलांबरोबर राहिलो होतो.

पुलंच्या ‘चित्रमय स्वगत’ या पुस्तकासाठी सुनिताबाईंनी मी काढलेले काही फोटो मागितले होते. ते फोटो व त्याची परवानगी मी अतिशय आनंदाने दिली होती. पण मी बागुलांना त्यांच्या स्वामित्वहक्काबाबत दिलेल्या सहकार्याच्या भूमिकेमुळे थोडा तणावही होताच. तरीही प्रत्यक्ष समोरासमोरच्या भेटीत आदरातिथ्य, माझी विचारपूस करणे हे त्यांच्याकडून चुकले नव्हते. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता मी पुलंचे फोटो कॅलेंडरमध्ये वापरणार होतो. सुनिताबाईंची प्रतिक्रिया यावर कशी असणार याचाच मी विचार करीत होतो. माझे पुलंच्या त्या प्रकाशचित्रांचे एडिटिंगचे काम पूर्ण झाले होते. एकेदिवशी -“संध्याकाळी जरा वेळ ठेऊन घरी येऊ शकाल का?” असे विचारणारा सुनिताबाईंचा फोन आला. त्यावेळी त्यांच्या घरी त्यांचे एक स्नेही व मुंबईतील प्रसिद्ध प्रकाशचित्रकारही येणार आहेत हे त्यांनी मला सांगितले. मला कल्पना आली की ही बैठक नक्कीच ‘फोटोंचा कॉपीराईट’ याविषयी असणार आहे. मी संध्याकाळी ‘मालती-माधव’ या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो.

मला कल्पना होती की माझा सुनिताबाईंशी सामना होता आणि त्यांच्या बरोबर एक विख्यात, प्रथितयश व्यक्ती होती. विषय अवघड, संवेदनशील होता. स्वामित्व हक्काचा ! सुनिताबाईंच्या मते, मी काढलेल्या भाईंच्या फोटोंमध्ये माझ्याबरोबरच भाईंचाही कॉपीराईट आहे/होता. चर्चा सुरू झाली. त्या त्यांच्या आग्रहावर ठाम होत्या. मी त्यांना विचारले – “ तुम्ही फोटोग्राफी ही एक कला आहे असे मानता नां ?” त्यांचा अर्थातच होकार आला. मी म्हटले की, मी तुम्हाला चार प्रश्न विचारतो. त्यांच्या उत्तरानंतर मला तुमचे स्वामित्वहक्काविषयीचे मत सांगा. मी साक्षात ‘सरस्वतीपुत्राच्या’ घरीच बसलेलो. त्यामुळे असेल पण मला शब्द सुचत होते, बोलण्याचे धैर्य आले होते. मी प्रसंग उभा करू लागलो.

मी : “ मुंबईची गिरगाव चौपाटी आहे. वेळ संध्याकाळची आहे. निसर्गाची सुंदर प्रकाशयोजना आहे. सूर्यास्त होत आहे. मी हे दृश्य माझ्या कॅमेऱ्यात पकडले. या प्रकाशचित्राचा कॉपीराईट कोणाचा?”

सुनीताबाई : “ प्रकाशचित्रकाराचा म्हणजे तुमचा कारण निसर्गाला कॉपीराईट कुठे आहे?”

मी : या प्रकाशचित्रात काहीतरी कमी आहे असे मला वाटले. विचार करताच लक्षात आले की, यात मानवी अस्तित्व यायला हवे. मी खूप भाग्यवान. मला तेवढ्यात तेथे पु. ल. फिरायला आले आहेत असे दिसले. मी फ्रेम पकडून बसलो. काही क्षणातच माझ्या फ्रेममध्ये भाई आले. सूर्यप्रकाश भाईंच्या पाठीमागून असल्याने ‘सिल्ह्युट’ प्रकारचा उत्तम फोटो मला मिळाला. या प्रकाशचित्राचा कॉपीराईट कोणाचा?”

सुनीताबाई : “ तुमचा आणि भाईंचा.”

मी : “बरं ! आता मी इतका भाग्यवान नाही की, तेथे माझ्यासाठी भाई फिरायला यावेत. पण मला फोटोत मानवी अस्तित्व हवेच होते. तेवढ्यात तेथे एक कचरा गोळा करणारी छोटी मुलगी आली. मला मानवी अस्तित्वाबरोबरच एक हालचालही मिळाली. पुन्हा मला एक उत्तम फोटो मिळाला. या प्रकाशचित्राचा कॉपीराईट कोणाचा?”

सुनीताबाई : “ तुमचा ! कारण ती मुलगी कोणी सेलिब्रिटी नाही. पु. ल. हे सेलिब्रिटी आहेत.”

मी : “ सुनीताबाई, न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी आहे. ती लहान-थोर जाणत नाही. तिच्यापुढे सर्वांना समान न्याय आहे.”

माझा चौथा प्रश्न बाकी होता. समोर बसलेली विख्यात, प्रथितयश व्यक्ती माझ्या धाडसाने चकित झाली होती.

मी : “ मी फिल्मच्या छोट्याशा तुकड्यावर अभिव्यक्त होतो. तुम्ही लेखक लोक बुद्धी, पेन व कागद यांच्या साहाय्याने अभिव्यक्त होता. मी एखाद्याचा फोटो काढला तर त्याला व्यक्तीचित्र म्हणतात , तसेच तुम्ही एखाद्याबद्दल लिहिलेत तर त्यालाही व्यक्तीचित्रच म्हणतात. मग मला आता सांगा की ‘औक्षवंत हो मुली’ या लता मंगेशकर यांच्यावर लिहिलेल्या व्यक्तीचित्रावर भाईंचा व लता मंगेशकर यांचा कॉपीराईट हवा. कारण लता मंगेशकरही सेलिब्रिटी आहेत. मग तशी काही नोंद त्या पुस्तकात आहे का?”

माझ्या या चौथ्या प्रश्नाने त्यांना अंतर्मुख केलं. त्याचं कोणतंच उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. माझ्या युक्तिवादाने मी सुनीताबाईंना माझा मुद्दा पटवून देण्यात यशस्वी झालो होतो. ते ही कोणतीही कटूता न आणता. अर्थात या विषयाला अनेक कायदेशीर पैलू आहेत आणि तो मोठा विषय होऊ शकतो याची मला जाणीव आहे. पण सुनीताबाई आणि माझ्यातला हलकासा असलेला ताणही दूर झाला होता. त्यांनी खिलाडूपणे माझा कॉपीराईट मान्य केला होता. त्यांनी मला परत एकदा कॅलेंडरसाठी प्रचंड मदत केली. त्या नोव्हेंबर महिन्यात भाईंच्या जन्मदिनी ‘ आनंदयात्री पु. ल.’ हे कॅलेंडर प्रकाशित झालं. सुनीताबाई ते सर्वार्थाने निर्दोष कॅलेंडर पाहून हरखून गेल्या.


मी वरचेवर त्यांच्याकडे जात राहिलो. २००० साली माझ्याकडे पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा आला. बदलत्या तंत्रज्ञानाने ही नवी गंगा आणली होती. कधी-कधी या विषयी त्या बोलत–विचारत. एकदा चांगली संधी साधून मी त्यांना विचारले की – “ सुनीताबाई, मला तुमचा फोटोसेशन करायची इच्छा आहे. कधी करू या?” यावर त्यांचे उत्तर होते की- “ मला फ्लॅशचा त्रास होतो.” मी म्हणालो – “ पण मी तर फ्लॅश न वापरता फोटो काढीन.” यावर त्यांची पळवाट होती की - “माझे फोटो चांगले येत नाहीत.” मीही हट्टी मुलासारखा म्हणालो – “ आता डिजिटल कॅमेरा आहे. त्याच्या डिस्प्लेवर लगेचच आपल्याला फोटो बघायला मिळतो. मी तो तुम्हाला दाखवीन. तो जर तुम्हाला आवडला नाही तर आपण डिलीट करून टाकू.” यावर लगेचच त्यांनी उत्तर दिले की – “ मी हल्ली घरी साडी नेसत नाही. गाऊन घालते. म्हणून नको.” यावर मी निरुत्तर झालो. पण मनातला विचार काही लोपला नाही. पुढे काही वर्षे गेली. आणि २००८ च्या जुलै महिन्यात त्यांना जी. ए. कुलकर्णी प्रथम पुरस्कार जाहीर झाला. मला खूप आनंद झाला. आनंद दोन गोष्टींसाठी एक म्हणजे पुरस्कार मिळाल्याचा आणि दुसरं म्हणजे तो घेण्यासाठी का होईना सुनीताबाई सर्वांना सामोरं जाणार म्हणून. मी त्यांना अभिनंदन करण्यासाठी फोन केला. आणि म्हणालो – “ सुनीताबाई, पुरस्कार घेण्यासाठी आता तुम्ही साडी नेसणार असाल नां ? पुरस्काराचा कार्यक्रम झाल्यावर आता आपण फोटोसेशन करू शकतो की.” माझा हट्ट त्यांनी बेसावध क्षणी का होईना मान्य केला.

१० जुलै २००८ रोजी सकाळी मी त्यांच्या घरी पोहोचलो. पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला होता. मंडळी निवांत झाली होती. त्यांचा भाचा डॉ. दिनेश ठाकूर, त्यांची पत्नी सौ. ज्योती, बंधू डॉ. श्रद्धानंद ठाकूर, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे, महेश एलकुंचवार, दिलीप प्रभावळकर, डॉ. शिरीष प्रयाग, बापू कांचन आदी सुहृद गप्पांमध्ये रंगले होते. कोणीतरी त्यांना काही ओळी लिहून पाठवल्या होत्या. त्यात लिहिलं होतं – “ सुनीताबाई, आज तुमच्या सन्मानासाठी आम्हीच आम्हाला मिरवले आहे. कारण तुम्ही आहात हीच आमची श्रीमंती आहे. अशी एखादी व्यक्ती असते, की जी केवळ जीवनमूल्यांच्या आधारानं जगू पाहते. ही गोष्टच आम्हाला धीर देणारी आहे. तुमचं पुस्तक ‘आहे मनोहर तरी..’ वाचलं तेव्हा ही जाणीव आम्हाला पहिल्यांदा झाली. आणि एक व्यक्ती – कणखर, स्वयंसिद्ध व्यक्ती म्हणून कितीतरी बायकांना आणि पुरुषांनाही खूप दिलासा मिळाला.” जणूकाही तेथे आलेल्या प्रत्येकाचे मन हेच तर सांगत होते.

आधीच उत्तम ‘स्कीन कॉम्प्लेक्शन’ असलेल्या सुनीताबाईंच्या चेहऱ्यावरचे हसू जास्तच स्निग्ध झाले होते. मी काही अनौपचारिक असे क्षण कॅमेराबद्ध केले. पूर्वेकडच्या खिडकीतून येणारा प्रकाश हा एकमेव स्त्रोत. उत्सवमूर्तीला काही सूचना करता येतील अशी परिस्थिती नव्हती. त्या जेथे बसल्या होत्या त्याच ठिकाणी मला फोटो घेणे गरजेचे होते. मी कॅमेऱ्यावर टेली लेन्स लावली. त्यांच्या नकळत मी फोटोसेशन सुरूही केला होता. त्यांचे हावभाव, त्यांची नजर, त्यांचे हसू, हळूहळू एक एक फ्रेम ! पंधरा मिनिटात माझं काम झालं होतं. बऱ्याच वर्षांची माझी इच्छा फलद्रूप झाली होती.

मी त्या फोटोंचे एडिटिंग केले. परत एकदा त्यांना फोन केला. माझ्या लॅपटॉपवर मी त्यांना ते एडीट केलेले सर्व फोटो दाखवले. त्यांच्या चेहऱ्यावर परत एकदा हसू पसरले. त्यांच्या नकळत टिपलेल्या त्या भावमुद्रा पाहताना त्यांना परत एकदा त्या आनंदसोहळ्याचा अनुभव आला असेल का? चेहरा तर ते सांगत होता. मला आवडलेली खळाळून हसतानाची त्यांची भावमुद्रा त्यांनाही खूप आवडली. मग त्यांच्या डोळ्यांत पाणी का दाटून आले असेल? काहीच न बोलता त्या उठल्या. वॉकरला धरून हळूहळू चालत आत गेल्या. काही वेळात परत बाहेर आल्या. त्यावेळी त्यांच्या हातात चार कॅसेट्स होत्या. पुलंच्या कॅसेट्सचा संग्रह होता तो. “ तुम्ही खूप छान फोटो काढलेत माझे” असं म्हणत माझ्या जवळ येत त्यांनी तो संग्रह मला दिला. माझ्यासाठी अमूल्य भेट होती ती.

नंतर परत ते फोटो पाहताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी आश्चर्याने दंग झालो आणि सुनीताबाईंपुढे नतमस्तकही ! मी त्यांचे ‘सोयरे-सकळ’च्या प्रकाशनात १९९८ साली फोटो टिपले होते. बरोबर दहा वर्षानी पुरस्काराच्यावेळी त्यांनी परत तीच जांभळी फुले असलेली साडी नेसली होती. माणसाचा साधेपणा, व्यवस्थितपणा, किती असावा, त्याच्या गरजा किती कमी असाव्या याचा तो साक्षात्कार होता. पुलंसारख्या प्रतिभावान, सर्व गुण संपन्न व्यक्तीची पत्नी – गृहिणी, सखी व सचिव अशा रूपांत वावरताना हा साधेपणा जास्तच उजळून आला होता. जणू संत तुकाराम महाराजांनी अभंगात म्हटल्याप्रमाणे ‘जोडोनियां धन, उत्तम वेव्हारें, उदास विचारें वेच करी’ हेच साऱ्या आयुष्याचे ब्रीद या साधेपणातून आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या या भूतलावर आल्या असाव्या.


सतीश पाकणीकर
९८२३०३०३२०
https://www.facebook.com/sateesh.paknikar

Friday, November 15, 2019

जेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...

आकाशवाणीमध्ये काम करत असताना पुलंनी लंडनमध्ये BBCचं प्रॉडक्शन ट्रेनिंग घेतलं होतं. त्याबद्दल त्यांनी 'अपूर्वाई' या पुस्तकात लिहिलेले हे अनुभव तुम्हाला वेगळ्याच काळात घेऊन जातील

एडिन्बराहून निघाल्यानंतर पुढला मुक्काम खुद्द लंडन शहरातच दोनतीन महिने पडणार होता. त्यामुळे काँपेन गार्डन्समधल्या ज्युअरबाईच्या घरात आम्ही चक्क बिऱ्हाड थाटले. यापुढे माझा टेलिव्हिजनचा शिक्षणक्रम BBCच्या शाळेत सुरू होणार होता. आतापर्यंत मी टेलिव्हिजनवर पुष्कळ कार्यक्रम पाहिले होते. आता प्रत्यक्ष स्टुडिओत जाऊन कामाला सुरुवात होणार होती.

रेडिओचे हे धाकटे भावंड कानामागून येऊन भलतेच तिखट झाले आहे. रेडिओची रवानगी आता सैपाकघरात झाली आहे. आधीच इंग्रजीला घरकोंबडेपणा मानवतो. त्यात त्याच्या खुराड्यात ही नवी करमणूक आली. त्यामुळे तासनतास हे कार्यक्रम पाहत बसणारी कुटुंबे निर्माण झाली. कुणी म्हणतात की ह्या यंत्राने सामाजिक जीवनावर आघात केला. कुणा म्हणतात, चित्रपटगृहे ओस पडली. कुणाचे मत, नाटकवाले मेले. मला मात्र तसे वाटत नाही. कारण करमणुकीच्या सर्व कार्यक्रमांना तितकीच गर्दी असते.

शंभर वर्षांपूर्वींची लिफ्ट
आमची शाळा तुसॉदबाईंच्या मेणाच्या प्रदर्शनापुढल्या गल्लीतच होती. BBCचे 'स्टाफ ट्रेनिंग स्कूल' एका जुनाट तिमजली इमारतीत आहे. पहिल्या दिवशी इमारतीतली लिफ्ट पाहून मी थक्क झालो. शंभर वर्षांपूर्वी बसवलेली ही लिफ्ट लोखंडी दोरखंड ओढून वर न्यावी लागते. विसाव्या शतकात महाराणी विक्तूरियाच्या आमदानीतला हा पाळणा अजून वापरात ठेवण्याचा पुराणमताभिमान इंग्रजच बाळगू जाणे.

वर्गाचे स्वरूप अगदी एखाद्या शाळेतल्या वर्गाप्रमाणे होते. छोटीछोटी मेजे आणि पुढे मास्तरांचे टेबल, फळा, खडू, नकाशे अगदी यथासांग होते. टेबलावर छडी तेवढी नव्हती. आम्ही अठरावीस विद्यार्थी होतो. सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत शाळा चालत असे. त्यानंतर प्रत्यक्ष स्टुडिओतील शिक्षण. इथली शिस्त, नियमितपणा, टापटीप पाहून आपण गारठतो.

टेलिव्हिजनच्या शास्त्रातले अनुभवी पंडित आम्हाला धडे देत - सक्तीने गिरवून घेत. सुमारे अडीच महिन्यांत हे सारे शिक्षण इतक्या पद्धतशीरपणे देण्यात आले की, आमच्यापैकी प्रत्येकजण ज्या वेळी आपापले प्रॉडक्शन करण्यासाठी तयार झाला, त्या वेळी BBCच्या टेलिव्हिजनमधला खिळा न् खिळा आमच्या परिचयाचा झाला होता. प्रत्येक शिक्षक शंकासमाधान करायला तत्पर असे.

उत्तरं देण्यासाठी मुदत
अवघड प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी शिक्षक मुदत मागून घेत आणि स्वत: पुस्तके चाळून त्यातले उतारे नोंदवून घेऊन उत्तरे देत. सर्वज्ञतेचा आव कुणी आणला नाही. BBCचा व्याप प्रचंड आहे. त्यातून टेलिव्हिजन हे तर जगड्व्याळ काम. हजारो माणसे इथे घड्याळाच्या काट्याप्रमाणे राबत असतात. पण ह्या सर्वांत मला जर खरोखर कुणाचे कौतुक वाटले असेल तर सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या पोरींचे! ह्या चलाख पोरी टणाटण उड्या मारीत हसऱ्या चेहऱ्याने कामाचे भारे उचलीत असतात.

प्रत्येक प्रोड्युसरला सेक्रेटरी असते. ह्या इतक्या तरबेज असतात की, कधी कधी प्रोड्युसरच्या गैरहजेरीत प्रॉडक्शनचेदेखील काम त्या करू शकतात. BBCच काय, परंतु पाश्चात्य देशांतल्या साऱ्या मोठमोठ्या कंपन्यांच्या ह्या सेक्रेटरी म्हणून राबणाऱ्या पोरी जणू रक्तवाहिन्या आहेत!

पहिल्याच दिवशी मला काही महत्त्वाची पत्रे टाईप करून घ्यायची होती. मी घरून पत्रे लिहून नेली आणि सकाळी टाईप करायला दिली. पंधरा मिनिटांत सहीला पत्रे आली. माझा विश्वास बसेना. आमच्याकडे सामान्यत: दोनतीन दिवसांनी टंकलेखकाला दहा वेळा ढोसल्यानंतर पत्र टाईपराईटवरवर चढायचे!
स्वावलंबी साहेब

दुसऱ्या दिवशी एका गोष्टीने मला असाच धक्का दिला. परदेशांतल्या हपिसांतून चपराशी कधीच आढळले नाहीत. कागदांची हालचाल दर अर्ध्या तासाने मेसेंजर सर्व्हिसमार्फत होते व बाकीची कामे साहेब स्वत: उठून करतात. टेबलावरचा ग्लास उचलून पाणी भरायला चपराशाला बोलवण्याची चैन परदेशांत नाही.

एवढेच काय, पण मोठ्यांतल्या मोठ्या साहेबालादेखील चहा प्यायची हुक्की आली तर स्वत: उठून सार्वजनिक उपाहारगृहात जावे लागते. चहाचा ट्रे घेऊन सरकारी कचेऱ्यांतून हिंडणारे 'बैरे' इंग्लंडमध्ये मला कधीच आढळले नाहीत. साहेबांची घरची कामे करणे हा आपल्याकडच्या चपराशांचा मुख्य व्यवसाय. त्यातून वेळ उरलाच तर फायली हलायच्या.

सकाळी सव्वाअकराला कॉफीची सुटी व्हायची. सव्वाअकरा वाजता उभे इंग्लंड कॉफी पिते. एक वाजता जेवते. चार वाजता चहा पिते. रात्री साताला पुन्हा जेवते आणि नऊ ते अकरा स्वत:ची करमणूक करून घेते. अकरा वाजता चिडीचूप करून झोपी जाते.

सारे जीवन आगगाडीच्या वेळापत्रकासारखे! बहुतेक हॉटेलेदेखील ठराविक वेळी उघडझाप करतात, भलत्या वेळी चहा प्यायचे म्हटले तर चहा मिळायचा नाही. दुपारी तीन वाजता भुकेने कळवळून हॉटेलच्या दाराशी कुणी पडला तरी दार उघडायचे नाही. मोठा अजब लोकांचा देश! अवेळी खाणाऱ्यांनी सहा सहा पेनी यंत्राच्या फटीत कोंबत चॉकलेटे खावीत, कागदी पेल्यांतून कॉफी प्यावी. वर्गात व्याख्यानाच्या रंगात आलेला वक्तादेखील सव्वाअकरा वाजले की विषय दहा सेकंदात गुंडाळून कॉफीला पळायचा!

अपॉइंटमेंटसाठी शतपावली
BBC सारख्या संस्थांचे यश नियमितपणात आहे. दोन वाजता नाटकाची तालीम सुरू म्हणजे सुरू. अडचण आलीच तर टेलिफोनवरून नटाचा किंवा नटीचा निरोप यायचा! वर्गात यायला एका मिनिटाने उशीर करणारा विद्यार्थी (वय वर्षे सामान्यत: चाळीसच्या आसपास) चौथी पाचवीतल्या पोरासारखा अपराधी चेहरा करून माफी मागत वर्गात शिरायचा! मी तर एखाद्याची साताची अपॉइंटमेंट असली तर साडेसहापासून त्याच्या दारापुढल्या फुटपाथवर शतपावली करीत हिंडत असे. नियमितपणा मुख्यत: दुसऱ्या माणसाच्या वेळेला किंमत देण्यातून येतो.

पाश्चात्त्य देशांत मनुष्यबळ कमी. युद्धाने प्रचंड नरबळी घेतले. त्यामुळे माणसाला विलक्षण भाव आला आहे. यंत्राचा उपयोग अत्यंत अपरिहार्य आहे. बोलण्यात नेहमी हॉर्स पॉवरसारखा 'मॅन अवर्स' हा शब्दप्रयोग येतो. टेलिव्हिजनच्या कोणत्याही एका कार्यक्रमाला किती 'मॅन अवर्स' लागतात ह्याची गणिते असतात आणि त्यावर खर्च मोजला जातो.

टेलिव्हिजनच्या शाळेतले माझे दिवस अत्यंत आनंदात गेले. बरोबरीचे विद्यार्थी BBC रेडिओत पंधरा पंधरा, वीस वीस वर्षे काम केलेले होते. प्रत्येकाने युद्धकाळात गणवेष चढवून रणांगणावर कामगिरी बजवाली होती. त्यातले दोघेतिघे हिंदुस्तानातही आले होते. या युद्धाने त्यांना खूप गोष्टी शिकवल्या.

अर्थात वर्गात मास्तरांची चित्रे काढणे, एकमेकांना हळूच चिठ्ठ्या लिहून वात्रटपणा करणे हेदेखील चालायचे. ह्या शिक्षकांतदेखील एका गोष्टीची मला मोठी मौज वाटली. प्रत्येक विषयाला एक एक तज्ज्ञ असे. मी एकूण पन्नाससाठ व्याख्याने ऐकली असतील. प्रत्येकाला इतकी चांगली विनोदबुद्धी कशी काय मिळाली याचे मला कौतुक वाटे! टेलिव्हिजनमधला अत्यंत तांत्रिक विषयदेखील गमतीदार चुटके सांगत सांगत चालायचा.

इंग्रज विनोदाला घाबरत नाही. विद्वानातल्या विद्वान माणसालादेखील आपण हशा पिकवला तर आपल्या विद्वत्तेच्या पगडीच्या झिरमिळ्या निसटून खाली पडतील, अशी भीती वाटत नाही. बीबीसीतले मोठ्यातले मोठे अधिकारी आम्हांला शिकवायला येऊन गेले. डोळे मिचकावून एखादी गोष्ट सांगताना आपल्या तोलामोलाला धक्का बसेल हे भय त्यांना नाही. त्याउलट देशी साहेबांचे काडेचिराइती चेहरे जिज्ञासूंनी आठवावे!

गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग
अनेक अभिवादने, हस्तांदोलने - गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, थँक यू, बेग युवर पार्डन, असल्या शब्दप्रयोगांनी यांत्रिक जीवनाच्या खडखडीतपणालादेखील स्निग्धता येते. वरिष्ठांतल्या वरिष्ठाला कनिष्ठांतल्या कनिष्ठाने अभिवादन केले तरी त्याचा स्वीकार आणि परतफेड तितक्याच उत्साहाने होते. आमच्याकडे एकजण मुजरा करतो आणि दुसरा त्या दिशेला ढुंकून न पाहता जातो. जसजसा माणूस हुद्द्याने मोठा होत जातो तसतशी ही पाहून न पाहण्याची कला तो शिकत जातो, हा एतद्देशीय अनुभव आहे!

तिथे आमचा लिफ्टमनदेखील तो दोरखंड ओढता ओढता शीळ घालून गाणे म्हणायचा! तिसऱ्याचौथ्या दिवसापासून त्याने मला 'पी.एल.' म्हणायला सुरुवात केली. आम्ही आमच्या लिफ्टवाल्याला इथे ताबडतोब समज देऊ. मला वाटते, लोकशाहीदेखील रक्तात मुरावी लागते. त्याला काही पिढ्या जाव्या लागतात की काय कोण जाणे. एकमेकांना मानाने वागवणे हेच कुठल्याही संस्कृतीचे बीज आहे.

(पु. ल. देशपांडे यांचा हा लेख 'अपूर्वाई' या पुस्तकातून साभार. या पुस्तकाचे सर्व हक्क श्रीविद्या प्रकाशन, शनिवार पेठ, पुणे - 30 यांच्याकडे आहेत.)

बीबीसी मराठी
१२ जून २०१८