Monday, May 20, 2024

मी एक असामी

माझ्यासाठी कुणीही कोकिळा कधी गायली नाही. मुगभाटात आंब्याच्या मोसमात कोकिळा न येता 'पायरे हाप्पोस' येतो. वसंत, हेमंत वगैरे ऋतू मुंबईच्या वाटेला जात नाहीत. मुंबईला दोनच ऋतू - उन्हाळा आणि पात्रसाळा. एक पावसाच्या धारा, नाहीतर घामाच्या धारा. मोर नाचताना मी कधी पाहिले नाहीत. चांदण्याला शोभा असते ही ऐकीव माहिती. जाई-जुई चमेलीला बहर आलेला मी वेणी- वाल्याच्या टोपलीत पाहिलाय फक्त. आकाशात मेघांची दाटी झाली की मला 'नभ मेघांनी आक्रमिलें' वगैरे गाणी न सुचता छत्री दुरुस्तीला टाकली पाहिजे हे आठवतं. सागराच्या अफाट विस्ताराचं मला यत्किंचितही कौतुक नाही. कारण मला बोट लागते आणि कोकणात जाताना सागराचा विस्तार एवढा मोठा करायची ह्या विधात्याला काही गरज होतीच का हा प्रश्न विचारीत मी डोकं धरून आलं-लिंबू चोखीत रत्नागिरी बंदराची वाट पाहत असतो.

साहित्य-संगीत-कला-विहीन माणूस म्हणजे बिनशेपटीचा बैल असं मला नानू सरंजामे एकदा म्हणाला होता. पण ह्या नानूनंच सांगितलेल्या साहित्यिकांच्या लाथा- ळ्यांच्या कथा मी ऐकल्या आहेत. मानकामेशेटनी गवई लोक एकमेकांवर कशी शिंगं खुपसून धावतात तेही सांगितलंय ! साहित्य, संगीत वगैरेची शेपटं लावून अशी शिंगं खुपसणारे बैल होण्यापेक्षा बेनसन जानसन कंपनीत एक तारखेला पडेल ते हातावर घेऊन मान मोडून खर्डेघाशी करणारा बिनशेपटीचा, त्रिनशिंगांचा, साधा, सरळ ओझ्याचा बैल होणंच बरं असं मला वाटायला लागलंय !

कसा मी कसा मी हे माझं मला नीटसं कळत नाही. पण ह्या जगात येताना जसा गपचूप आलो, तसा जातानादेखील आपल्या हातून त्या जगाला फारसा धक्का न लावता निघून जाण्याची इच्छा बाळगणारा असा मी एक असामी आहे. आणि म्हणूनच असल्या ह्या माणसाचं नाव रवींद्रनाथ, सुभाषचंद्र, वगैरे नसून धोंडो भिकाजी जोशी कडमडेकर असं असलं म्हणून बिघडलं काय ? उलट बरंच आहे. उगीच आडनाव भोसले लावायचं आणि चालवायची पिठाची गिरणी, यात काय अर्थ आहे ?

बाकी चारचौघांपुढे आपण साधे सरळ ओझ्याचे बैल आहोंत हे कबूल केलं म्हणजे कसं मोकळं मोकळं वाटतं. 

पु. ल. देशपांडे 
असा मी असामी 
संपूर्ण पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.

0 प्रतिक्रिया: