Tuesday, August 31, 2021

कशाला लिहून गेलात ओ.. - (जयंत विद्वांस)

पु.ल. पुलंचं लिखाण पडद्यावर आणणं हे काम सोप्पं नाही. एकतर लोकांनी ते त्यांच्या तोंडून ऐकलंय त्यामुळे त्याचा अमिट ठसा लोकांवर आहे. प्रत्येकाने ते दृश्यं स्वरूपात स्वतःच्या कल्पनेत बघितलं आहे त्यामुळे त्यात काही कमतरता जाणवली की लोकांना ते भिडत नाही किंवा उपरं वाटतं. त्यांच्यावर लिहावं म्हटलं तर ते अजून अवघड काम आहे. त्यावर टीका करणं त्यातल्या त्यात सोप्पं आहे. मागे त्या वाचन परिक्रमेत 'हरितात्या' मधला काही भाग टाकला होता तेंव्हा वाटलं, आपणही लिहावं त्यांच्या वल्लींवर. पण एवढं सोपं नाहीये ते. डोळ्यातून जो पाणी काढू शकतो त्यालाच उत्तम विनोद करता येतो. कारुण्यं आणि विनोद ही विजोड पण एकत्रं नांदणारी जोडी आहे. कुठेतरी कारुण्याची डूब असल्याशिवाय विनोद अजरामर होत नाही. अर्थात प्रत्येकाची विनोदाची व्याख्या वेगळी आहे. अजिबात हसू न येणा-या, ज्यात विनोद कणमात्रही नाही अशा वाक्यावर लोक खदाखदा हसू शकतात तेंव्हा मला लाजल्यासारखं होतं.

पुलंच्या विनोदावर हसू फुटतंच. ते फुटावं म्हणून ना त्यांनी प्रयत्नं केलेत ना आपल्याला करावे लागत. खुदकन हसू फुटतं तो विनोद मला कायम आवडतो. पुलं काय पहिल्यांदा ऐकतोय का? पण मग का तरीही हसू येतं. सगळं माहित असतं. पुढचं वाक्यं काय आहे, विनोद आहे का कारुण्यं आहे तरीही होतंच ते. याचं कारण नुसत्या विनोद निर्मितीसाठी ते लिखाण नाही. माणूस आधी उभा राहतो मग बाकी सगळं येतं. सगळ्या वल्ली एकाच आयुष्यात प्रत्येकाला भेटणार नाहीत मग त्या अशा लिखाणातून सापडतात. माणसाला हेवा वाटला पाहिजे की अशी माणसं आपल्या आयुष्यात का आली नाहीत अशी माणसं त्यांनी उभी केली. सगळ्याच वल्ली विनोदी होत्या का? नव्हत्या. पण त्यांचे गुणदोष सांगताना पुलं विनोदाचं अस्तर लावतात. विनोद का आवडतो लोकांना? असंख्य अडचणी, त्रास यावर मात करत आपण जगत असतो. अशावेळी विनोद खूप कामाला येतो, क्षणभर सगळं विसरायला लावतो. आता गुगलवर विषयानुसार विनोद मिळतात पण म्हणून ते कुणी सलग वाचत बसत नाही हसण्यासाठी.

पु.ल. माणसातली वल्ली शोधतात आणि वल्लींमधला आतला 'माणूस' उभा करतात. जगात कोणीच शंभर टक्के गुणी नाही. पण आपण गुण बघावेत हा एकूणच पुलंचा गुण त्यामुळे त्यांनी न्यूनसुद्धा उल्लेखापुरतं घेतलंय. मगाशी रावसाहेब ऐकत होतो. हरितात्या, चितळे मास्तर, अंतू बर्वा, रावसाहेब, म्हैस या अवीट गोष्टी आहेत. कधीही ऐका. अनंतवेळा ऐकूनसुद्धा हसू येतं, रडू येतं. कधी वाटतं आपला मूड असेल त्याप्रमाणे ते होत असावं. पण तसं नाहीये. आनंद मिळावा, ताण कमी व्हावा म्हणून आपण पुलं ऐकतो. मग हा माणूस टचकन डोळ्यात पाणी काढतो तरी का ऐकतो आपण? ताण निचरा करण्याचे अनेक मार्ग आहेत. कुणी व्यसन करतं, कुणी मौनात जातं, कुणी राग राग करतं, कुणी शिव्या देतं. रडू येणं हा ताण निचरा करण्याचा चांगला मार्ग आहे खरंतर. लहान मूल पटकन रडतं त्याला तेच कारण असावं. आपण मोठेपण लादून घेतलं की खूप बंधनात वागतो. खदखदून हसत नाही, चारचौघात रडत नाही. पुलंचे मानसोपचार आहेत हे. मोकळं करतात ते आपल्याला. पुलंना रिपीट व्हॅल्यू आहे. नवीन पिढी त्यांना वाचते का नाही माहित नाही. कदाचित नसेलही कारण तो काळ त्यांच्या ओळखीचा नाही. पण त्याच्याशी मला काहीही देणंघेणं नाही. तर मूळ मुद्दा 'रावसाहेब'.

माणसांच्यात राहणं सवयीचं नसावं त्यासाठी. कोण कुठल्या वाटेने अर्ध्यात कधी हात सोडून निघून जाईल सांगता येत नाही. जागा भरल्या जातात त्या रिकाम्या झाल्या म्हणून, पण तीच माणसं त्या जागी असतात असं नाही. पुलंनी तरी वेगळं काय केलं. असेच निघून गेले पण रग्गड ठेऊन गेलेत म्हणा. 'शोले'चे डायलॉग जसे लोकांना पाठ आहेत तसे पुलं लोकांना पाठ आहेत. त्यांची व्यक्तिचित्रं अजरामर झाली. प्रत्येक व्यक्तीचं किंवा वल्लीचं काहीतरी लोकांच्या लक्षात आहे. अंतू बर्व्याच्या तोंडचं 'दारचा हापूस परत मोहरला नाही' असो नाहीतर मग रावसाहेब असोत. 'ते एक गच्ची बसतंय का बघा की'. 'ते अरुंधतीला थोडं लेडी सितारीस्ट करा', 'बाप बदला की ओ', 'आमचं वैनी काम करणार, सबनीसची पोरगी काम करणार'. संपताना काही तरी हलतं आतवर. मग उगाचच कधीही न पाहिलेले, दिसण्याची शक्यता नसलेले, नोकरावर ओरडणारे, विलायतखानसाहेबांचे पाय चेपणारे, स्टेज झाडणारे, चाल बदलली म्हणून नटावर चिडणारे, ट्रेनच्या डब्याजवळ 'कशाला आला होता रे बेळगावात' म्हणणारे 'रावसाहेब', आयुष्याच्या आणि दिवसाच्या संध्याकाळी कुत्र्याला कडेला घेऊन एकटे खुर्चीत बसलेले दिसतात आणि वाईट वाटतं. अस्पष्ट हुंदका फुटतोच, डोळे पाणावतात.

आणि मग रावसाहेबांसारखं ओरडावंसं वाटतं, 'कशाला लिहून गेलात ओ असं'...

-- जयंत विद्वांस

Thursday, August 26, 2021

व्यक्ती आणि वल्ली -- पु. ल . देशपांडे

आयुष्यात आपण बऱ्याच लोकांना भेटतो.काही व्यक्ती काळानुसार विस्मरणात जातात तर काही लोक मात्र त्यांच्या स्वभावामुळे 'चांगलेच' लक्षात राहतात."व्यक्ती तितक्या प्रकृती" नुसार व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असतो.परंतु तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरून त्याला विनोदाची खुशखुशीत फोडणी देऊन,साऱ्या महाराष्ट्राला खळखळून हसवण्याची कसब फक्त एकाच व्यक्तीने साधली ती म्हणजे पु ल देशपांडे नी! १९४३ साली अभिरुची मासिकाच्या एका अंकामध्ये 'अण्णा वडगावकर' हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले आणि ते मराठी वाचकांच्या प्रचंड पसंतीस आले. नंतर १९६३ पर्यंत प्रसिद्ध झालेली एकूण २० व्यक्तिचित्रे 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकाच्या माध्यमातून संग्रहित झाली.आज कित्येक दशके उलटूनही हा संग्रह मराठी वाचकांचे मनोरंजन करत आहे आणि करत राहील ह्यात दुमत नाही.व्यक्ती आणि वल्ली वाचताना प्रत्येक पात्राचे पुलं नी केलेले चोखंदळ वर्णन वाचल्यावर ही व्यक्ती आपल्याला कधीतरी भेटली आहे किंवा आपल्यातीलच एक आहे अशी भावना आल्याखेरीज राहत नाही.आणि मग प्रत्येकामध्ये एक 'वल्ली' लपलेला असतो तो फक्त टिपता आला पाहिजे हे पुलं च वाक्य शंभर टक्के पटते. अश्याच वीस वल्लींपैकी मला आवडलेली काही पात्रे :
नारायण- नारायण हा एक असा नमुना आहे की,प्रत्येकाचा कुठून ना कुठून तरी नाते लागणारा नातलग.कुठल्याही मंगलकार्याला स्वयंसेवकगिरी हा जन्मसिद्ध हक्क असलेला. घरात कार्य निघाले की जो वेळेवर टपकतो (कधी-कधी आगंतुक) तो म्हणजे नारायण.लग्नाचीच गोष्ट घेतली तर मुलगी बघण्याच्या कार्यक्रमापासूनच नारायण हजर असायचा,ते मुलगीची वरात मांडवातून निघूपर्यंत त्याची धावपळ चालूच असायची.त्यामुळे प्रत्येक कामामध्ये नारायण हवाच, असा घरच्या प्रत्येकाचा आग्रह असायचा. महिलावर्गाची साडी खरेदी हा पुरुषांचा सर्वात नावडता भाग परंतु, नारायण मात्र त्यात सुद्धा हिरीरीने सहभाग घ्यायचा. अशाप्रकारे एखाद्याच्या कार्यक्रमामध्ये निस्वार्थपणे राबणारा नारायण आत्ताच्या 'दार-बंद ' आणि 'narrow minded' संस्कृतीमध्ये मिळणे अशक्य आहे.
 
हरितात्या
- हरितात्या जगण्यासाठी नेमका काय उद्योग करायचे हे कोणालाच माहित नव्हते. त्यांनी एक व्यवसाय कधी धड केला नाही. इतिहासातील प्रसंगांचे वर्णन हरितात्या असे काही करायचे की, शिवाजीमहाराज,रामदास किंवा तुकाराम हे त्यांचे बालमित्रच असावे. प्रत्येक प्रसंगामध्ये ते कुठे ना कुठे तरी स्वतःला गोवायचेच. मग, भले ती पावनखिंडाची लढाई असो किंवा रामदासांच्या बालपणीची एखादी गोष्ट. 'पुराव्याने शाबीत करीन' ही त्यांची ठरलेली catch phrase. इतिहासासारखा क्लीष्ट विषय हरितात्या इतका जिवंत करून सांगायचे की, ऐकणाऱ्याला तो आवडायला लागे. हरितात्यानी लहानपणी कधीच लेखकांना एक पैशाचा खाऊ दिला नाही, पण आपल्या इतिहासावरचा सार्थ अभिमान दिला.वार्धक्याने हरीतात्या गेले आणि त्यांच्यासोबतच 'पुराव्याने शाबीत करेन' हे वाक्यसुद्धा इतिहासजमा झाले.
 
सखाराम गटणे -काही लोक असतात जे कमालीचं शुद्ध आणि छापील बोलतात. ते बोलतात तेव्हा असे वाटते की बालभारती मधला एखादा धडाच वाचून दाखवत आहेत. सखाराम गटणे हा या category चा संस्थापक असावा. लेखकांची आणि गटणे ची ओळख एका व्याख्यानानंतर सही घेण्याच्या निमित्ताने झाली. आणि गटणेच्या अति शुद्ध बोली मुळे स्वतः साहित्यिक असूनही लेखक थक्क झाले.'अनुज्ञा', 'मार्गदर्शन', 'जीवनानुभूती', 'साकल्याने मिळणारे समाधान' असल्या छापील शब्दांची अडगळ गटण्याच्या तोंडात नेहमी साठलेली असे. पेंटर बापाच्या घरी गटणे सारखी 'व्यासंगी' औलाद कशी काय उपजली हे लेखकांसाठी एक कोडेच होते. साहित्याशी एकनिष्ठ राहण्याचा विडा सख्याने उचलला होता आणि म्हणून तो लग्नाला तयार नव्हता. शेवटी तो लग्नाला तयार झाला, तेव्हा लेखकांनी त्याला पुस्तके भेट दिली. आणि त्यावर 'साहित्याशी एकनिष्ठ रहा आणि जीवनाशीही' असा संदेश लिहिला. गटणे आयुष्यात मार्गाला लागला आणि त्याच्या जीवनातला साहित्याचा बोळा निघाला. पाणी वाहते झाले!
 
चितळे मास्तर - चितळे मास्तर हे तीस वर्ष गावच्या शाळेत पहिली ते मॅट्रिक पर्यंत शिकवायचे. इतक्या वर्षाच्या प्रामाणिक नोकरीत त्यांनी गावच्या अनेक मुलांची मॅट्रिक पास करवून घेतली म्हणूनच शाळेला गावातील सर्वजण 'चितळे मास्तरांची शाळा' म्हणायचे. मास्तरांनी छडी कधीही वापरली नाही. त्यांच्या जिभेचेच वळण इतके तिरके होते की, तो मारच पुष्कळ असायचा. ते ११-५ शाळा करायचे आणि शाळा सुटल्यावर कच्या मुलांचे वर्ग घ्यायचे. घोकंपट्टी ,पाठांतर ह्या विषयांवर चितळे मास्तरांचा भक्कम विश्वास. पण ते पाठांतर मात्र मजेत व्हायचे. वर्गामध्ये त्यांनी कोणाची चेष्टा केली तर कोणत्या मुलाने अगर मुलीने ती मनावर घेतली नाही. ना कधी कोणत्या पालकांची चिट्ठी आली. मास्तरांनी आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेमळ शब्द न वापरता प्रेम केले. मॅट्रिकच्या वर्गातील हुशार मुलांसाठी चितळेमास्तर सकाळी पाच वाजता स्वतःच्या घरी शिकवणी घ्यायचे. ते पण फुकट! त्यांनी आयुष्यभर एकच व्रत केले, आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला घासून पुसून जगात पाठवून देणे. आणि हे काम करण्यात त्यांनी आपल्या चपलांच्या टाचा झिजवल्या.

अण्णा वडगावकर - अण्णा खरेतर पेशाने संस्कृतचे प्राध्यापक होते. पण त्यांचे वर्गातील शिकवणे मात्र एकापेक्षा अधिक भाषांमध्ये चालायचे. संस्कृत सारख्या विषयाच्या तासाला वर्गात हशा चाललेला असे आणि कधीकधी तर विद्यार्थ्यांच्या हसून हसून मुरकुंड्या वळायच्या.प्रत्येक तीन-चार शब्दांनंतर 'माय गुड फेलोज' हे संबोधन ठरलेलं. पण वडगावकर प्रोफेसरांनी फक्त संस्कृत कधीच शिकवले नाही तर त्यांनी वर्गात व्यवहार शिकवला. त्यांनी मुलांना 'लाईफ' शिकवली. म्हणूनच सगळया विद्याथ्यांचे ते आवडीचे प्रोफेसर होते.

अंतू बर्वा - रत्नागिरीच्या 'त्या' मधल्या आळीमध्ये लोकोत्तर पुरुष राहायचे आणि अंतू बर्वा ह्याच मातीत उगवला आणि पिकला. अंतूशेट आणि त्याच्या सांगाती यांचे जीवनाविषयी एक अचाट तत्वज्ञान होते. आणि 'अण्णू गोगट्या होणे' म्हणजे पडणे, 'अजगर होणे' म्हणजे झोपणे अशी विशिष्ट परिभाषा असे, जी नवख्या माणसाला उमगणे केवळ अशक्य. ह्या अड्ड्यातील विशेष शब्द गोळा केले तर एक स्वतंत्र कोश तयार होईल! अंतूशेट आणि 'त्या' आळीतले सारेच नमुने एकाच आडवळणाचे. कुणाचे बरे झाल्याचे सुख नाही, वाईट झाल्याचे दुःख नाही. जन्माचे सोयर नाही, मरणाचे सुतक नाही. गाण्याची रुची नाही, तिटकार ही नाही. खाण्यात चवीपेक्षा उदरभरण हाच स्वच्छ हेतू!आयुष्याची गाडी कधी वेगाने धावली नाही पण कधी थांबली ही नाही. राजकारण हा ह्या अड्ड्याचा लाडका विषय. तो निघाला की अंतूशेटच्या जिभेवर सरस्वती नाचे. जीवनातल्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्क त्याने प्यायला होता देव जाणे! दारिद्याच्या गडद काळोख्यात अंतू बर्व्याने आयुष्य एकाकी, आपल्या मताच्या पिंका टाकीत पण शिष्टतेने काढले. रत्नागिरीच्या फणसासारखा अंतू देखील वरून कठीण आणि आतून गोड व रसाळ होता. आणि हा गोडवा सुध्दा खूप पिकल्यावरच आला होता!

वरील पात्रांशिवाय पेस्तन काका,नंदा प्रधान,गजा खोत ह्यासारखी एकूण २० पात्रे पुस्तकात आहेत. ही पात्रे आपल्याला खळखळून हसवतात तर काही पात्रे अंतर्मुख ही करतात. पुल म्हणाले होते की, ही माणसे जर जिवंत होऊन कधी भेटली, तर मी त्यांना कडकडून भेटेन. पुस्तक संपल्यावर प्रत्येक वाचकाची काहीशी अशीच अवस्था होते! आणि ह्यालाच 'प्रतिभावंत' लेखन म्हणतात!

Book-O-Mania

Monday, August 23, 2021

सांत्वन अंगाशी आले - पु.ल.

एका भल्या घरच्या बाईनं एकदा माझा सणसणीत अपमान केला होता. त्या बाईचे वडील वारल्याचं कळलं, म्हणून जनरितीप्रमाणे मी सांत्वनाला गेलो. आता वारलेल्या गृहस्थाचं वय ऐंशीच्या घरात होतं, पण माणसासारखं माणूस गेलेलं. दुःख होणं साहजिक आहे म्हणून गेलो. म्हातारबुवा तसे सालस होते. माझ्याकडून पुस्तकं वाचायला मागून नेत. नीट परत आणून देत. मरण्यापूर्वीच आठ-दहा दिवस आधी दोन पुस्तकं नेली होती. ती परत कशी मागायची हा विचार मनात आल्याबद्दलसुद्धा माझा मलाच थोडा रागही आला होता.

हे सांगायचं कारण एवढंच की, मी अत्यंत मोठ्या सद्भावनेनं सांत्वनाला गेलो होतो. अशा प्रसंगी चार माणसं बोलतात, ती वाक्यं बोललो, "वय झालं, तरी इतक्या लवकर जातील असं वाटलं नव्हतं. नाही म्हटलं तरी वडील माणसांचा आधार असतो. ह्या वयात वाचनसुद्धा अप टु डेट होतं." इत्यादी इत्यादी. त्या बाई त्यांना दिवाणखान्यात कुणीतरी मांडून ठेवावं, तशा बसल्या होत्या. अशा वेळी माणसं थोडी अश्रुप्रपात करतात, पण इथं उमेदवार वकिलानं आरोपीच्या बचावाचं भाषण केल्यासारखा मी बोलत होतो आणि बाई निर्ढावलेल्या न्यायाधीशासारख्या गंभीर. मी बुजलोच. शेवटी 'नाही म्हटलं तरी वडील माणसाचा आधार' हे वाक्य माझ्या तोंडून पोवाड्यातल्या 'जीजी रं जीजी'सारखं पुन्हापुन्हा यायला लागलं आणि मी आवरलं. लगेच बाई कडाडल्या, "तुम्हाला काय? कोण जगलं काय नि कोण मेलं काय, तुम्हांला त्यातसुद्धा विनोदच दिसायचा. तुमच्यापुढे कशाला बोला, तेवढंच धरून विनोदी गोष्ट लिहाल आमच्यावर." 

मी खरोखरच सर्द झालो. आता ऐंशी वर्षांचे का होईनात; पण कुणाचेतरी तीर्थरूप वारल्याचे ऐकून मी तिथे विनोदी लेखाचं साहित्य जमवायला धावलो असं वाटावं, ह्यासारखं अपमानास्पद दुसरं काय असणार. विनोदी साहित्याविषयीचा माझा दृष्टीकोन काय आहे हे माझं मलाही उमगलेलं नाही, पण आमच्या जातीच्या लेखकांच्या बाबतीतला इतरांचा दृष्टीकोन मात्र भलताच... चिनी आक्रमणाच्या काळात मी एक निबंधवजा लेख लिहिला होता. त्या लेखानंतर मला काही वाचकांची पत्रं आली. बहुतेकांचा एकच सूर. तुमच्या मनात इतका जाज्वल्य देशाभिमान असेल अशी कल्पनाही आम्हांला नव्हती. एकानं तर मला चक्क लिहिलं होतं, 'तुमच्यासारख्या विनोदी लेखकाचंही देशावर प्रेम आहे हे पाहून माझ्यासारख्या निस्सीम राष्ट्रभक्ताला अत्यंत आनंद झाला. यापुढेतरी विनोदी लेखन सोडून काहीतरी भरीव लिहा.'

पुस्तक - कसा मी असा मी 
पु.ल. देशपांडे

Saturday, August 14, 2021

फिल्म इन्स्टिट्यूट दीक्षांत समारंभातील भाषण 1979 (kartavysadhana.in)

6 ऑगस्ट 2021 रोजी, पुणे येथील फिल्म इन्स्टिट्यूटमधील टीव्ही स्टुडिओचे नामकरण पु.ल. देशपांडे टीव्ही स्टुडिओ असे होत आहे. भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे. हे निमित्त साधून पु.ल. देशपांडे यांनी केलेले एक भाषण येथे प्रसिद्ध करीत आहोत. फिल्म इन्स्टिट्यूटच्या 16 व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी 2 नोव्हेंबर 1979 रोजी पुण्यात त्यांनी इंग्रजीमध्ये भाषण केले होते, त्याचा हा अनुवाद आहे. हे भाषण झाले तेव्हा प्रख्यात व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते (ते त्यावेळी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष होते) सुनीताबाई देशपांडे यांचे भाचे दिनेश ठाकूर यांनी हे भाषण मिळवून दिले आणि नॅशनल फिल्म आर्काइव्हज ऑफ इंडियाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी त्याचा अनुवाद केला आहे. मूळ इंग्रजी भाषण kartavysadhana.in वर उपलब्ध आहे. 33 वर्षांपूर्वीचे ते भाषण प्रथमच इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध होत आहे. - संपादक

मित्रहो,

तुमच्या संचालकांनी अतिशय प्रसन्न अशा या कार्यक्रमासाठी मला आमंत्रण देण्यापूर्वी मी आपला निवांतपणे बसून होतो, की चित्रपट उद्योगाशी असलेला माझा पूर्वीचा संबंध लोक खूप अगोदर विसरून गेले असतील. या कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून माझी निवड करण्यात त्यांनी योग्य कास्टिंग केली आहे की नाही हे मला माहीत नाही. मी फिल्म उद्योगातून स्वखुशीने बाहेर पडल्याला आता जवळपास पंचवीस वर्षे लोटली आहेत. ज्या वेळी मराठी चित्रपट उद्योगात माझे तसे बरे चालले होते तेव्हा मी तो व्यवसाय सोडला. सर्वसाधारणपणे त्या वेळच्या कॉलेजमधल्या शिक्षकापेक्षा माझी थोडी जास्त कमाई होत होती आणि कोपऱ्यावरच्या माझ्या आवडत्या पानवाल्यापेक्षा किंचित कमी! मी जे काही लिहीत होतो त्याला तेव्हा पटकथा म्हणतात असे मला वाटायचे. मी अभिनय करायचो, संगीत द्यायचो आणि असे करता करता मी एक मराठी चित्रपटही दिग्दर्शित केला. एखाद्या कलावंताला त्या काळी जे जे करावयाला लागायचे ते ते सर्व मी केले. एकदा दिवसातल्या ठरवलेल्या वेळेपेक्षा दोन तास जास्तीचे शूटिंग करायचे होते म्हणून हिरोईनच्या खऱ्याखुऱ्या मातेला दोन तासांसाठी रंजवण्याची कामगिरी विनोदी कलाकार म्हणून मला करायला लागली होती ती एक दुखरी आठवण आहे. माझ्या चित्रपट क्षेत्रातील करिअरकडे मागे वळून पाहताना तिथे राहिलो त्यापेक्षा ती इंडस्ट्री सोडल्याचाच जास्त अभिमान वाटतो. तिथे असण्यापेक्षा नसण्यामुळे या क्षेत्राचा फायदाच झाला, अशा काही मोजक्या धोरणी व्यक्तींपैकी मी आहे असे मी विनयाने म्हणेन. मी काही इथे नम्रतेचे सोंग घेण्याचा प्रयत्न करत नाही. खरं म्हणजे उलटं आहे. फिल्म उद्योगातील एक पूर्वीचा कलाकार आणि अधून मधून चित्रपट पाहणारा सध्याचा प्रेक्षक म्हणून माझे बोलणे कदाचित तुम्हांला एक जुना शाळामास्तर धडा शिकवत असल्यासारखे वाटेल. तुमच्यासाठी या परिसरातील कदाचित हा असा शेवटचाच प्रसंग असेल. माझे विनोदावर किती प्रभुत्व आहे हे दाखवण्यासाठी तर मी मुळीच इथे आलेलो नाही. आपल्या देशातलाच नव्हे तर आधुनिक जगातला एक सर्वोत्तम असा कलावंत इथे माझ्या शेजारी बसला असताना तर नाहीच नाही. उलट मघापासून त्यांच्या शेजारी व्यासपीठावर बसल्यावर मला अगोदरच दडपल्यासारखे झाले आहे. फिल्म इन्स्टिट्यूटच्या सोसायटीचे अध्यक्ष श्री. आर. के. लक्ष्मण यांची निश्चल कार्टून्स माझ्या मते रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या हालचालींपेक्षा जास्त परिणामकारक असतात आणि सत्य आणि सौंदर्य यांचा निकटचा परिचय प्रेक्षकांना घडवतात.

होय, सत्य आणि सौंदर्य. या दोन गोष्टींपासून मी लांब राहावे अशी त्या काळी ज्या चित्रपट निर्मात्यांशी माझा संबंध आला- त्यांची इच्छा होती. माझे स्वत्व बाजूला सारून त्यांच्या भाषेत ज्याला लोकेच्छा किंवा लोकांची मागणी असे समजतात ते त्यांना माझ्याकडून हवे होते. ही लोकेच्छा काय असते ते मला अजूनपर्यंत समजलेले नाही. हे निर्माते डबल रोल खेळत आहेत हे मला लवकरच उमगून आले. लेखक किंवा कलावंत म्हणून माझ्याकडून त्यांची ही अपेक्षा होती की जेणेकरून त्यांचा गल्ला काठोकाठ भरेल. या बॉक्स ऑफिसची उंची अजूनपर्यंत कोणीही मोजू शकले नाही. दुसऱ्या बाजूला त्यांच्या भाषणांत आणि मुलाखतींमध्ये हे लोक खऱ्या कलाकृती बनवू शकत नसल्याबद्दल नक्राश्रू ढाळत होते. कारण पुन्हा तीच घाणेरडी सबब, लोकांची मागणी वेगळी असते. खरे म्हणजे चित्रपट हा त्यांच्यासाठी बाजारपेठेतील एक वेगळा व्यवसाय आहे. पूर्वी वितरक असलेल्या आणि नंतर निर्माता झालेल्या एका स्टुडिओ मालकाबद्दल त्या काळच्या एका खूप वरिष्ठ अभिनेत्याने म्हटले होते, ‘‘या माणसाला जर कळाले की चित्रपटाच्या निर्मितीपेक्षा चितेची लाकडे विकण्यात जास्त पैसा आहे तर तो आपला स्टुडिओ जळाऊ लाकडांनी भरून टाकेल आणि आपल्याला लाथ मारून हाकलून लावेल.’’

खूप कठोर शब्द आहेत माझ्या मित्रांनो, पण अजिबात खोटे नाहीत. मी तर एका निर्मात्याला हे बोलताना ऐकले आहे की त्याने एका अभिनेत्रीवर खूप सारे पैसे लावले होते जेणेकरून ती हमखास जिंकेल. जिथे अतिशय वेगळ्या प्रकारची कलात्मक स्वप्ने पाहिली जातात त्या जागी घोड्याच्या शर्यतीचे आणि जुगार अड्‌ड्याचे परवलीचे शब्द रूढ होऊ लागले होते. वाजंत्रीवाल्याला वऱ्हाडी जे सांगेल तेच गाणे वाजवण्याशिवाय पर्याय नसतो हे मला माहीत आहे. अधून मधून एखाद्या रविवारच्या संध्याकाळी टीव्ही पाहताना या जगरहाटीचा जास्तच विपर्यास झाल्याची त्रासदायक भावना माझ्या मनात येत असते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे घडते. कारण आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यामध्येसुद्धा हाच नियम लागू होतो. आण्विक शस्त्रांपासून ते अगदी टूथ पेस्टपर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू बनवणाऱ्या व्यापाऱ्यांनी सगळ्या क्लृप्त्या वापरून व्यक्ती आणि देशांना केवळ ग्राहक बनवून टाकले आहे हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. तुमची क्रयशक्ती किती आहे यावरून समाजातील तुमचे स्थान ठरवले जाते.

जसे प्रेमामध्ये आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते तसे व्यापारामध्येही असते, ही धारणा आपण सर्वांनी स्वीकारली आहे असे मला वाटते. जगाच्या संहाराला कारणीभूत अशी हिंसक शस्त्रे बनवणाऱ्याला जशी मानवी आयुष्याची काहीही चिंता पडलेली नसते किंवा माणसाच्या जगण्याच्या अधिकाराबद्दल काही देणे घेणे नसते त्याप्रमाणे पैशांच्या थैल्या घेऊन सिनेमाच्या बाजारात उतरलेल्या सट्टेबाजांना मानवी मूल्यांच्या नाशाची अजिबात काळजी नसते. दुसऱ्या व्यवसायाप्रमाणे चित्रपटधंद्यात पण जितका जास्तीतजास्त पैसा मिळेल तितका चांगला. अडाणी आणि भोळसर मनांवर सिनेमा माध्यमाच्या होणाऱ्या परिणामाची त्यांना काही एक पडलेली नसते. सांप्रत काळी मी एखाद्या मित्राच्या घरात जातो तेव्हा मला काय दिसते? त्याचा चार वर्षांचा मुलगा खेळण्यातली बंदूक माझ्यावर रोखतो आणि ओरडतो ‘‘हॅन्ड्‌स अप.’’ हा कोणत्या हिरोची नक्कल करतोय हे माझ्या मित्राची बायको किंवा मुलगी मला विचारते. अर्थातच मी या मुलाखतीत नापास होतो.

आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘विकणे’ हाच एकमेव परवलीचा शब्द आहे असे वाटते. या देशात जोपर्यंत अंधश्रद्धा टिकून आहेत तोपर्यंत त्यावर धंदा चालवायचा. नवीन देव निर्माण करायचे, किंवा जास्त खात्रीसाठी नवीन देवता तयार करायच्या, त्यांना सर्व प्रकारच्या शक्ती बहाल करायच्या, नवनवीन चमत्कार त्यांच्या नावाशी जोडायचे आणि मग सहजपणे भुलून जाणारा (फ्लॅटपासून ते झोपडपट्टीत राहणारा) एक मोठा समुदाय सिनेमा हॉलबाहेर ब्लॅकमध्ये तिकिटे खरेदी करायला तयार होतो. एका फिल्म मॅगझिनमध्ये पटकथा आणि संवाद लिहिणाऱ्या प्राध्यापकाची मुलाखत वाचून मला धक्काच बसला. एका यशस्वी विनोदी नट आणि निर्मात्याबरोबर केवळ बरोबरी दाखवण्यासाठी त्याने द्विअर्थी गलिच्छ संवाद लिहिले होते. म्हणजे अश्लीलता विकायची, सुंदर अशा लैंगिक भावनेला जितके कुरूप बनवता येईल तितके बनवायचे, हिंसाचार विकायचा, सामान्य जनतेला त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या काबाडकष्टांना विसरायला लावणारा पलायनवाद विकायचा आणि ही दुःखे मानवनिर्मितच आहेत हेसुद्धा कळायला नको अशी दृश्ये दाखवायची. थोडक्यात, भरपूर पैसा मिळवण्यासाठी जे काही शक्य आहे ते विकायचे. भरपूर रक्त सांडून झाल्यावर आणि बऱ्यापैकी हाणामारी, गोळीबार दाखवल्यानंतर शेवटच्या रिळामध्ये जो गुन्हेगार आहे त्याला हिरोच्या पातळीवर चढवायचे. मग त्याच्या खूप पूर्वी हरवलेल्या मातेच्या मांडीवर त्याला प्राण सोडू द्यायचा किंवा काही वेळा बदल हवा म्हणून आईला ह्या हिरोच्या मांडीवर अंतिम श्वास घेऊ द्यायचा, दांभिक तत्त्वज्ञान किंवा काव्यात्म संवाद बोलून मृत्युपंथावर असलेल्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांतला शेवटचा अश्रूही खेचून घ्यायचा आणि मग अशी ही रक्तरंजित हाणामारी पाहण्यासाठी प्रेक्षक पुनःपुन्हा येतील या खात्रीने निश्चिंत व्हायचं. हिरो आणि हिरोईनने एकदुसऱ्यांच्या मागे धावण्याची मुबलक दृश्ये दाखवायची. तीही काश्मीरच्या खोऱ्यातली असली तर जास्त चांगलं आणि जोडीला लता मंगेशकर आणि रफीच्या गाण्याची उठावदार साथ द्यायची. खऱ्या आयुष्यात एवढ्या जोरात पळून गाणी म्हणणारा किंवा गवतात लोळून गाणारी एकही व्यक्ती अजूनपर्यंत मला भेटलेली नाही. एका जागी स्वस्थ बसून हे लोक ही कामं का आटपत नाहीत हे मला खरेच समजत नाही. हा संगीतमय लपंडाव एक प्रकारे कर्मकांड झालेलं आहे. इतकेच नाही तर संवादातही तोचतोचपणा आहे. फिल्मी भजन आणि कॅबेरे नृत्याचीही तीच गत झाली आहे. अगदी शेवटच्या रिळातला पाठलागाचा सीनही जुनापुराना झाला आहे. आणि आपल्या लोकांना याची इतकी आवड निर्माण झाली आहे की, चित्रपटांमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश नसला तर तो खरा ‘शिनेमा’ नव्हे असे आपल्याला वाटते. आपल्या चित्रपट निर्मात्यांसोबत नट, नट्या, पटकथाकार, गीतकार आणि प्रसिद्धीमाध्यमे यांच्या अथक अशा प्रयत्नांमुळे सध्याच्या भारतीय चित्रपटाची जी अवस्था आहे ती अशी आहे... मी हे जे बोलतो आहे ते काही माझा नैतिक निषेध नोंदवण्यासाठी वगैरे नाही. खरं म्हणजे उलटे आहे. ही अनैतिकता कॅबेरे डान्सरच्या अंगप्रत्यंगांच्या प्रदर्शनामध्ये दडलेली नाही, तर मूळ सट्टेबाजीच्या प्रवृत्तीमध्ये आहे. सध्याच्या चित्रपट म्हणवल्या जाणाऱ्या निर्मितीमागचे हे खरे कारण आहे. तुम्ही जाणता त्याप्रमाणे सध्याच्या आपल्या चित्रपटांची ही ठळक वैशिष्ट्ये आहेत.
माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही ज्या वाटेवर चालण्यास तयार आहात त्यापासून घाबरवून तुम्हाला दूर लोटण्याचा माझा मुळीच उद्देश नाही. तुम्ही इथे जे काही शिकलेला आहात आणि चॅप्लिन, फेलिनी, डेसिका आणि आपल्या येथील सत्यजित राय, रित्विक घटक, मृणाल सेन, श्याम बेनेगल, गिरीश कार्नाड, बी.व्ही. कारंथ अशा महान कलाकारांनी बनवलेल्या कलाकृती पाहिल्यानंतर ज्या पद्धतीचे चित्रपट इथे बनवले जातात त्याविषयी तुमच्या मनात संदेह निर्माण झाला असणार. असे असूनसुद्धा विशेष गोष्ट ही आहे की या व्यावसायिक चित्रपटांच्या गर्दीत माझे मित्र हृषिकेश मुखर्जी यांच्यासारखे काही दिग्दर्शक असे आहेत की ज्यांनी पातळी न सोडता चांगले यश कमावले आहे. लोकप्रियता मिळवण्यासाठी सवंग होण्याची गरज नाही. जुन्या काळच्या प्रभात आणि न्यू थिएटर्सचे चित्रपट खूप लोकप्रिय होते. पण त्यांना कोणी कमी दर्जाचे किंवा अश्लील म्हणणार नाही. या प्रसंगी मला हेही आवर्जून सांगायचे आहे की भूतकाळातील महान चित्रपट कलावंतांबद्दल सतत गहिवर काढणाऱ्यांपैकी मी नाही. त्यांना सादर दंडवत घाला आणि विसरून जा. सध्याचे जग आता त्यांच्यासाठी नाही. आपण भारतीय लोक कायम भूतकाळ उकरत बसतो आणि वर्तमान विसरतो. काही कलाकृती या सार्वकालीन महान आहेत असे आपण नक्कीच म्हणू शकतो. तुम्ही यातील काही अप्रतिम सिनेमे पाहिलेही असतील. कलेमध्ये अशी काही अज्ञात अनुभूती असते जी काळ आणि अवकाश यांच्या सीमारेषा ओलांडून जाते. आपण त्यांना अभिजात कलाकृती म्हणतो. परंतु हेही लक्षात ठेवायला पाहिजे की या अभिजात कलाकृती त्या त्या काळात आधुनिक मानल्या गेल्या. कलेच्या पारंपरिक तत्त्वज्ञानाला चिकटून बसलेल्या लोकांकडून जवळपास सर्वच महान कलावंतांना त्रासच सहन करावा लागला आहे. बहुतेकांसाठी परंपरा म्हणजे फक्त पुनरावृत्ती. (भारतीय संस्कृती, भारत की सुंदरियां, पतिदेव, खानदान की इज्जत इ.) कलावंत म्हणून ज्याला आपले स्वत्व जपायचे आहे आणि आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहायचे आहे त्याला जे लोक नवीन बदलांना तयार नाहीत आणि जुन्या गोष्टींना चिकटून राहायला आवडते अशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले आहे. ज्या जगात सौंदर्याऐवजी झगमगाटाला, विनोदाऐवजी चाळ्यांना, भावनेऐवजी अतिभावुकतेला, सांस्कृतिक परंपरेऐवजी कालबाह्य प्रथांना आणि मर्दुमकीऐवजी हाणामारीला जास्त महत्त्व दिले जाते तेथे तुमचे काम सोपे असणार नाही. फिल्म इंडस्ट्री म्हणजे जणू काही स्वर्ग आहे अशी सर्वसामान्य भारतीयाच्या मनात भावना असते. चमकदार आणि आकर्षक अशी मोहमयी दुनिया. झटपट पैसा मिळणारे विश्व. जणू काही पंचतारांकित आयुष्य, अशा चुकीच्या समजुतींचे खुसखुशीत चित्रण गुरु दत्त आणि हृषिकेश मुखर्जी यांनी त्यांच्या ‘कागज के फूल’ आणि ‘गुड्डी’ चित्रपटांमध्ये केले आहे. लोकांची मागणी या शब्दासारखाच ग्लॅमर शब्दाचा खरा अर्थ मला अजूनपर्यंत समजलेला नाही. ग्लॅमर शब्दाचा खरा संबंध आपल्या सुपरस्टार नट-नट्यांच्या शारीरिक आकर्षणात किंवा त्यांच्या मोहक अदांशी नाही, तर ते कमवत असलेल्या अकल्पनीय संपत्तीशी जादा आहे असा माझा धूर्त संशय आहे. फिल्म मॅगझिनमध्ये चकचकीत पानांवर छापून येणाऱ्या या तारकांचे विलासी आयुष्य पाहून हे नट जणू काही राजपुत्र-राजकन्याच आहेत अशी प्रतिमा आपल्या देशातल्या गरीब जनतेच्या मनात तयार झाली आहे. हिट झालेले जवळपास सर्व चित्रपट हे नशीबाचे धनी असतात याची तरुण मंडळींना पूर्ण कल्पना असते. अचानक प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचून नंतर गडगडत खाली कोसळणाऱ्या काही नट आणि नट्यांकडे पाहून आपल्या तरुण मंडळींची अशी समजूत झालेली असते की या देशात यश मिळण्यामध्ये गुणवत्तेपेक्षा शंभर पटींनी जास्त नशिबाचा वाटा असतो. अशा विचारातूनच ग्लॅमरच्या संकल्पनेला जास्त खतपाणी मिळते. तसे म्हटले तर उत्तम अभिनयाशी ग्लॅमरचा काडीचाही संबंध नसतो. हेलन हेस ही जगातील सर्वोत्तम संवेदनशील अभिनेत्रींपैकी एक आहे. पण तिच्याजवळ काय ग्लॅमर होते? कलेच्या अन्य प्रांतात असलेल्या कवी, कादंबरीकार, गायक, नर्तक आणि नाटककार यांच्याकडे कसल्याही प्रकारचे ग्लॅमर नसते. हे कलावंत आपल्याला आनंद देत नाहीत काय? ते करमणूक करतात ना? चार्ली चॅप्लिनपेक्षा थोर कलावंत झालाय का? कसदार मनोरंजन आणि कोणत्या प्रकारची लोकप्रियता यालासुद्धा महत्त्व असते.

ज्या चित्रपट कलावंतांना या माध्यमाची क्षमता माहीत आहे त्यांच्यासमोर करमणुकीच्या मूळ कल्पनेमध्येच बदल घडवून आणण्याचे आव्हान आहे. हे आव्हान आहे दिखाऊ सौंदर्याच्या आणि ग्लॅमरच्या तसेच ढोंगी पुरोगामित्वाच्या दुनियेत बदल घडवण्याचे आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या नावाखाली जी काही लबाडी दाखवली जाते त्यापासून सत्य, सौंदर्य आणि आनंदाच्या जगाकडे नेण्याचे. उत्तम विनोदाच्या माध्यमातून उच्चपदस्थांच्या वागणुकीतील अंतर्विरोध दाखवणे किंवा अश्रूंचा भरमार नसलेल्या शोकांतिकेमधून लोकांना जीवनातील वास्तवतेची जाणीव करून देण्याचे हे आव्हान आहे. विनोदाला शहाणपणाची जोड हवी आणि प्रेमाचे प्रकटीकरण अदबीने व्हायला हवे.

तुम्हाला खरोखर तुमच्यातल्या कलावंताशी निष्ठा राखायची असेल तर प्रसिद्धी, मान्यता, ऑस्कर इ.ची चिंता करणे सोडून द्या. अगत्यशीलतेसारखी प्रसिद्धीसुद्धा तुम्हाला नको असते तेव्हा तुमच्या मागोमाग येते. पॅरिसमधील लेखक आणि नाटककारांच्या सोसायटीचे अध्यक्ष श्री.रॉजर फर्डिनांड यांनी चार्ली चॅप्लिनला लिहिलेल्या पत्रातील एक उतारा इथे दिल्याशिवाय मला राहवत नाही. फ्रान्स सरकारने चार्ली चॅप्लिन यांना ‘ऑफिसर ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ या पुरस्काराने सन्मानित केले होते तेव्हाचे हे पत्र आहे. चॅप्लिनच्या लोकप्रियतेबद्दल फर्डिनांड लिहितात की, ‘खरं म्हणजे लोकप्रियता ही बळकावली जाऊ शकत नाही. जर ही प्रसिद्धी चांगल्या कार्यासाठी वापरली गेली तरच तिला काही अर्थ, किंमत असते आणि ती टिकून राहते. तुमच्या स्वतःच्या दुःखातून, आनंदातून, आशा आणि निराशेतून स्फुरलेली मानवाबद्दल जी तुमची कळवळ आहे त्याला कोणत्याही बंधनांची आडकाठी नाही. तुमचे यश हा त्याचा आविष्कार आहे. ज्यांनी अपरिमित दुःख सोसले आहे, ज्यांना करुणा हवी आहे आणि आपल्या हालअपेष्टांना क्षणभर विसरून जाऊन आधाराची आकांक्षा आहे अशा लोकांना तुमचे हास्य हे दुःख मिटवण्यासाठी नाही, तर सांत्वनासाठी आहे याची जाणीव आहे.

शेवटी तुमचे खरे प्रेम कशावर आहे त्यावर हे सर्व अवलंबून आहे असे मला वाटते. इथल्या लोकांवर तुमचा लोभ असेल, त्यांच्या हालअपेष्टांनी भरलेल्या आयुष्यात थोडीफार आशेची किरणे तुम्ही दिलीत, जसे आत्ताचे राजकारणी करतात तशा मर्कटचेष्टा करून लोकांना मूर्ख बनवून पैसा मिळवण्यात तुम्हांला लाज वाटत असेल तर लोकांच्या आंधळ्या श्रद्धा, त्यांचे अज्ञान, त्यांचा प्रारब्धवादी दृष्टिकोन आणि त्यांची मानसिक आणि शारीरिक उपासमार यांच्या जिवावर पैसा कमावण्याचा मार्ग तुम्ही सोडून द्याल. रुपेरी पडद्यावर जे काही दाखवले जाते ते कालातीत सत्य आहे असा विश्वास ठेवण्यास भाग पाडून आपल्या भोळ्या अशिक्षित जनतेची फसवणूक केली जाते. आपण जे काही करतो आहोत ते त्यांच्या भल्यासाठीच आहे असे भासवून कित्येक राजकारणी जनतेला भुलवत आहेत. मग प्रसिद्धी मिळवण्यासाठी कधी दाढी भादरून काढायची किंवा जयप्रकाश नारायण यांसारख्या विद्वत्तापूर्ण थोर माणसाला आधी तुरुंगात टाकायचे आणि नंतर त्यांच्या चितेवर चंदनाची लाकडे ठेवायची. आपल्या धूर्त फिल्मवाल्यांनी काही अज्ञात देवतांना उजेडात आणून त्यांना नवीन जन्म दिला आहे. अशा देवीदेवतांना मिळालेल्या ग्लॅमरचा उपयोग गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांची मंदिरे उभारून झटपट पैसे मिळवण्यासाठी केला आहे.

अशा वेळी, जर खरोखर सरकारला सध्याच्या भारतीय चित्रपट उद्योगामध्ये सुधारणा करायची असेल तर चांगल्या सर्जनशील कलावंतांना ज्या सुविधांची गरज आहे त्या पुरवल्या पाहिजेत. सेन्सॉर बोर्डाचे नियम अधिक कडक करावेत असे मी इथे म्हणत नाही. इंडियन पीनल कोड आल्यामुळे गुन्हे घडायचे काही थांबले नाहीत. जी मूळ मनोवृत्ती आहे ती बदलायला हवी. लोकांच्या मनातली सिनेमाबद्दलची जी गैरधारणा आहे ती कौशल्यपूर्वक प्रयत्न करून बदलवायला हवी. अस्सल नाण्यांची किंमत लोकांना तेव्हाच कळेल जेव्हा खोटी नाणी बाद ठरतील. जे उत्कृष्ट चित्रपट आहेत ते महान साहित्यिकांच्या कथेवर आधारित आहेत हे तुम्हांला उमगलेच असेल. न्यू थिएटर्सच्या यशामध्ये शरदबाबूंचा (शरत्‌चंद्र चॅटर्जी ) मोठा वाटा होता हे विसरून चालणार नाही. सत्यजित रायपासून ते बी. व्ही. कारंथपर्यंत आधुनिक दिग्दर्शकांचे बहुतेक सर्व चित्रपट प्रख्यात लेखकांनी लिहिलेल्या दर्जेदार कथा आणि कादंबरींवर आधारित होते. सर्वच्या सर्व साहित्यकृतींवर काही चित्रपट बनू शकत नाही. परंतु जवळपास सर्वच भारतीय भाषांमध्ये उत्तम दर्जाच्या कथा लिहिल्या गेल्या आहेत, ज्यावर चित्रपट बनू शकतात. मराठी भाषेतल्याच अशा शंभरांहून अधिक कथा मी सांगू शकतो. आपल्या ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांचे आतापर्यंत अपरिचित अशा आशा आणि आकांक्षा, सुख आणि दुःख कलात्मकरीत्या मांडणारे नवीन लेखक भारतीय भाषांमध्ये पुढे आले आहेत. अशा कथांवर 16 मिली मीटरवर 60 ते 90 मिनिटांचे भाग बनवण्यासाठी तरुण कलाकार आणि दिग्दर्शकांना का बरे उत्तेजन देऊ नये? केंद्र आणि राज्य सरकारांनी अशा चित्रपटांना अर्थसाहाय्य करण्याबरोबरच जागोजागी छोटी थिएटर्स बांधावीत. जेणेकरून हे चित्रपट तेथे दाखवले जातील. असे चित्रपट दूरदर्शनवरही दाखवण्यास भरपूर वाव आहे. करमणूक आणि प्रबोधन अशा दोन्ही दृष्टींनी या माध्यमाचे महत्त्व लोकांना कळू द्या. आपल्या संस्कृतीमधल्या अनेक मोहक लोककथा पडद्यावर आल्या पाहिजेत. बुद्धी आणि चातुर्याचा मोठा खजिना तेथे आहे. आपल्या बहुतांश चित्रपट कथांसारख्या त्या कृत्रिम नाहीत, तर इथल्या मातीतल्या या सजीव गोष्टी आहेत.
या आकर्षक कथांना रंग, रूप आणि आकार द्या. जेणेकरून जीवनातील खऱ्या सुखदुःखांची अनेकानेक अंगांनी प्रेक्षकांना अनुभूती मिळेल. सरळ आणि सोप्या प्रकारे त्यांना सादर करा. कला आणि प्रयोगाच्या नावाखाली संदिग्ध आणि अस्पष्ट राहू नका. तुमच्या चित्रपटांतून घटना आणि भावना सोप्या आणि थेट प्रकारे प्रेक्षकांसमोर मांडा. मला कन्नड भाषेतला एकसुद्धा शब्द समजत नाही. पण तरीसुद्धा गिरीश कार्नाड यांच्या ‘काडू’ किंवा शिवराम कारंथ यांच्या ‘चोमाना दोडी’ या चित्रपटांतील दर्शवलेल्या खोलवर दुःखाने मी हलून गेलो. सिम्फनी ऑर्केस्ट्रामधल्या प्रत्येक वादकासारखे जेव्हा लेखक, दिग्दर्शक, छायालेखक, अभिनेता आणि अभिनेत्री एका लयीमध्ये काम करतात तेव्हाच एक चांगला चित्रपट बनतो. म्हणूनच भावी चित्रपट कलावंताना प्रशिक्षण आणि फिल्म बनवण्याच्या विविध अंगांचा परिचय करून देण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की काळ बदलला आहे. काळ आपणहून बदलत नसतो. कलावंत, तत्त्ववेत्ता, शास्त्रज्ञ, चित्रकार, शिल्पकार, संगीतकार, जुन्या जमान्यातले राजे आणि सध्याच्या काळातील राजकारणी स्वतंत्र आणि सामूहिकरीत्या लोकांच्या आयुष्यात हा बदल घडवत असतात. बदलत्या काळाची जाणीव कलावंताला असावी लागते आणि त्या बदलावर कायम सावध दृष्टी रोखून आपल्या कलेमध्ये त्याचा योग्य तो आविष्कार करायचा असतो. प्रशिक्षणाचा हा कालावधी कधी संपत नसतो. हे खरे आहे की कलावंत जन्मजात असतात आणि घडवले जाऊ शकत नाहीत. परंतु केवळ जन्मजात कौशल्ये ही पुरेशी नसतात. ज्यांनी आपल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवले आहे अशा सर्व जन्मजात कलावंतांनी रियाजाचा रिवाज कायम ठेवला आहे. एखादी कला आवडते याचा अर्थ असा नाही की तुम्हांला निर्मितीचे वरदान मिळाले आहे. ती एक हेतुपुरस्सर प्रक्रिया असते. जे कौशल्य आहे त्यामध्ये प्रावीण्य मिळवावे लागते. बाल कलाकार म्हणून लवकर प्रसिद्धी मिळाल्यामुळे पुढे जाऊन बहुतेकदा अपयश मिळालेले दिसते. कारण पुरेशी तालीमच मिळालेली नसते. कलाक्षेत्रातील आपण सर्व जण नार्सिसिस कॉम्प्लेक्सने बाधित असतो. अशा वेळी ज्यांचा तुम्ही आदर करता, असे कान उपटणारे लोक जवळ पाहिजेत. जे तुम्हांला तुमची योग्य जागा दाखवून देतील. चांगले समीक्षक हे काम करू शकतील. पण हीसुद्धा एक दुर्मीळ जमात आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर इथल्या शिक्षकांनासुद्धा वेळोवेळी रिफ्रेशर कोर्सची गरज आहे. आपल्या शिकवणुकीच्या पद्धतींचा कायम आढावा घेतला पाहिजे.

या संस्थेची एक विशेष जबाबदारी आहे. समाजात चांगला बदल घडवण्याची जबरदस्त शक्ती असलेल्या माध्यमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना इथे दिले जाते. ही संस्था चालवण्यासाठी सरकारने बऱ्यापैकी निधी उपलब्ध करून दिला आहे आणि पुढील विकासासाठी अजूनही जास्त देण्याची गरज आहे. इथल्या शिक्षकांना पुरेसे स्वातंत्र्य आणि सुविधा दिल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांचे शिष्य पूर्ण आत्मविश्वासासहित बाहेरच्या जगास तोंड देण्यास सज्ज असतील. इथून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचा दूरदर्शनने पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. मला खात्री आहे की अशा संधी मिळाल्यानंतर आपले तरुण दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, संगीतकार, लेखक आणि तंत्रज्ञ सध्याच्या फिल्म इंडस्ट्रीच्या नावाखाली चाललेल्या सट्टाबाजाराचा खोटा चकचकीत मुखवटा भिरकावून टाकतील आणि आपल्या नैसर्गिक कलात्मक चित्रपटांतून या उद्योगास गौरवाप्रत नेतील.

मित्रहो, मला माहीत आहे की ही संस्था सोडताना तुमच्या मनांत संमिश्र भावना असतील. जीवनातील विरहाचे सर्व क्षण दुःखाचे असतात. तुम्ही जी शिदोरी सोबत घेऊन चालला आहात ती भारताचे भावी चित्रपट कलावंत म्हणून तुमच्या करिअरमध्ये नक्कीच उपयोगी ठरेल असा मला विश्वास आहे. माझी तुम्हांला विनंती आहे की आपल्या हृदयामध्ये तुमच्या प्रेक्षकांविषयी नितांत प्रेम आणि आदर बाळगून तुमच्या कलाकृतीतून त्यांना एक समृद्ध अनुभव देण्याची लालसा ठेवा. तुमच्या कामातून प्रेक्षकांशी सरळ भिडा. मला खात्री आहे की तुम्ही त्यांची मने नक्की जिंकाल, जे बाकी कोणत्याही गोष्टींपेक्षा मोलाचे आहे. तुमच्या या नवीन रोमांचक प्रवासासाठी माझ्या शुभेच्छा!

या कार्यक्रमासाठी मला तुमच्या संचालकांनी खूप आपुलकीने आमंत्रण दिले. मी तुम्हांला ‘शुभास्ते पंथानः’ एवढेच म्हणू शकतो. एका अप्रतिम चित्रपट संग्रहालयाचे घनिष्ट सान्निध्य तुम्हांला लाभले आहे. चित्रपट व्यवसायात पूर्वी कधी असलेल्या आणि माझ्यासारखी ज्यांची काही किंमत राहिलेली नाही अशा लोकांची यादी श्री. नायर यांनी ठेवली आहे हे मला माहीत नव्हते. या संस्थेचे अध्यक्ष आणि कर्मचारी यांना आणि आपणां सर्वांना माझे बोलणे शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल मी धन्यवाद देतो.

अनुवाद : प्रकाश मगदूम, पुणे
prakashmagdum@gmail.com
(अनुवादक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक आहेत.)


मूळ इंग्रजी भाषण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Thursday, August 12, 2021

कशाला जन्म घेतला होता हो महाराष्ट्रात? - अविनाश चंदने

दासबोधाची इतकी पारायणं करून अव्यवहारी राहिलेले ‘हरी तात्या’ असोत की धोंडो भिकाजी जोशी हा वेव्हार न कळणारा 'असामी', परंतु वास्तव हेच होतं, की खुद्द पुलंना आयुष्यात व्यवहार जमलाच नाही. या पार्श्वभूमीवर पु.ल. जर आज आपल्यात असते तर...?

एकविसावे शतक उजाडायला अवघे साडेसहा महिने शिल्लक असतानाच पु. ल. देशपांडे यांनी १२ जून २००० रोजी विसाव्या शतकाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली, परंतु त्यांचा करिश्माच असा आहे, की ते शरीरानं आपल्यातून गेले असले तरी साहित्य, रंगभूमी आणि दातृत्वानं आजही सर्वांशी जोडले गेलेले आहेत. तरीही हुरहूर आहेच, आज पुल आपल्यात हवे होते याची... परंतु आजच्या या व्यवहारी जगात पुलंचा खरोखरच निभाव लागला असता का, असा प्रश्न उपस्थित होतो आणि वाटतं...

एक बरं झालं पु.ल. तुम्ही विसाव्या शतकातच गेलात ते, कारण आजच्या समाजसेवकांच्या गर्दीत तुम्ही साफ हरवून गेला असता. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना हजारो रुपयांच्या वह्या-पुस्तकं देण्याच्या दानशुरांच्या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च करणारे दानशूर तुम्हाला पाहावे लागले असते. स्वत:चा उदोउदो केल्याशिवाय इथे पानदेखील हलत नाही. तुम्हाला हे जमलं नसतं पु.ल., कारण तुम्ही समाजाला भरभरून हसवतानाच स्वत:चा खिसादेखील याच समाजासाठी रिता केलात. एवढंच नाही, तर काही संस्थांची भविष्यात आर्थिक व्यवस्था लावण्याची तजवीजदेखील केलीत. त्यामुळे हे कथित दातृत्वाचं असलं कर्तृत्व दाखवणं तुम्हाला जमलं नसतं पु.ल.!

पु.ल. बरं झालं तुम्ही एकविसाव्या शतकातील उगवता सूर्य पाहायला थांबला नाहीत ते, कारण आम्ही भाषिकवादानं वाजवलेला शंख तुमच्या कानांना मुळीच सहन झाला नसता. तुम्ही ४८ वर्षांपूर्वी म्हणजे १९७० साली बंगाली भाषा शिकण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये गेला होतात. तेव्हा तुम्ही वयाची पन्नाशी ओलांडली होती. तिथं तुम्ही गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये मुक्काम केलात आणि बंगाली भाषा ‌उत्तम अवगत केलीत. आज प्रांतिक अस्मितेनं डोकं इतकं वर काढलंय की आमचं इतर भाषांवरील प्रेम किती बेगडी आहे, हे तुम्हाला पाहावलं नसतं पु.ल.!

बरं झालं पु.ल. तुम्ही आज आमच्यात नाहीत ते, कारण तुमच्या काळात माणसं जेवढी दांभिक होती त्यातून कितीतरी दांभिक माणसं या एकविसाव्या शतकात आहेत. ‘सबकुछ’ तुम्ही असलेल्या ‘गुळाचा गणपती’ हा चित्रपट पुण्यात प्रदर्शित झाला तेव्हा तुम्हाला आमंत्रणपत्रिकादेखील नव्हती. हे कटूसत्य आज कदाचित लोकांच्या पचनी पडणार नाही, पण एक सांगू पु.ल., हा चित्रपट आजच्या शतकात काढला असता, तर कदाचित तुमचं नाव श्रेयनामावलीतूनदेखील वजा केलं असतं. एवढंच कशाला उलट ‘गुळाचा गणपती’ची कथा तुम्हीच चोरल्याचा आरोप करून तुमच्यावर कोर्टात दावादेखील ठोकायलादेखील कमी केलं नसतं.

पु.ल. तुम्ही आज आमच्यात नाही तेच बरं आहे, कारण नव्या शतकात तुमच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ आऊटडेडेट झाल्या असत्या आणि या पुस्तकाचे सिक्वेल काढण्याचे प्रसंग तुमच्यावर आले असते. ‘अपूर्वाई’च्या सिक्वेलसाठी खऱ्या भटकंतीऐवजी इंटरनेटसर्फिंग करण्याची वेळ तुमच्यावर आली असती. जे तुम्हाला कधी जमलं नसतं पु.लं.!

बरं झालं तुम्ही लवकर एक्झिट घेतलीत ते, कारण आजच्या युगात कुठल्याही राजकीय पक्षाच्या लेबलशिवाय तुम्हाला जगणं अशक्य झालं असतं. १९४२चा लढा असो किंवा १९७७मधील आणीबाणी! तुम्ही डोळ्यांसमोर एक ध्येय ठेवून राजकारणात सक्रिय झाला होता. कार्य संपल्यानंतर तुम्ही राजकारणापासून अलिप्त होऊन पुन्हा लेखनाकडे मोर्चा वळवला होता. आज ते तुम्हाला शक्य झालं नसतं. हे म्हणजे महाराष्ट्रात नुसते मराठी असून जमत नाही तर मुंबईकर, पुणेकर किंवा नागपूरकर असावं लागतं, तसंच महाराष्ट्रात कुठल्यातरी राजकीय पक्षाची पालखी उचलल्याशिवाय जगणं आज कठीण झालं असतं पु.ल. तुम्हाला!

आणखी एक बरं झालं पु.ल. तुम्ही चॅनेलची भाऊगर्दी होण्यापूर्वी निघून गेलात ते! वास्तविक, देशात दूरदर्शन सुरू झाल्यानंतर पहिला कार्यक्रम सादर करण्याचा मान तुम्हाला मिळाला होता. परंतु आजच्या शेकडो चॅनेलच्या गर्दीत तुम्हीच हरवून गेला असता. कदाचित दूरदर्शनवर पहिला कार्यक्रम सादर करणारा ‘मी पहिला आहे’ हे तुम्हाला भर पत्रकारपरिषदेत सांगण्याची वेळ आली असती.

कसंही असलं तरी पुन्हा पुन्हा एकच वाटतं पु.ल. तुम्ही आज हवे होतात! तुमच्या जाण्यानं आम्ही खूप काही गमावलंय हो! मनाला चटका लावल्यावर बेळगाव सोडताना रावसाहेबांनी तुम्हाला “कशाला आला होता हो बेळगावात?” असा प्रश्न विचारला होता. आज प्रत्येक मराठी माणूस हाच प्रश्न तुम्हाला विचारतो आहे, “जायचंच होतं तर कशाला जन्म घेतला होता हो महाराष्ट्रात?”

अविनाश चंदने 

Monday, August 9, 2021

वल्ली पुलंना आठवताना! - समीर जावळे

पुलंच्या कथांचं गारुड आजही कायम

“एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंथ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये? याला काही उत्तर नाही” असं वाक्य पुलंच्या रावसाहेब या कथेत आहे. हेच वाक्य अगदी त्यांच्याबाबतीतही तंतोतंत खरं आहे. कारण पुलंशी महाराष्ट्राशी जी नाळ जोडली गेली त्याप्रमाणात इतर अनेक दिग्गज लेखकांशी, साहित्यिकांशी ती जोडली गेली नाही. त्या साहित्यिकांचं साहित्य आणि साहित्यनिर्मितीतलं योगदान हे प्रचंड होतं. मात्र महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व हे विशेषण लागलं ते पुलंच्याच नावाच्या आधी. होय पुलंवर महाराष्ट्राचं कालही प्रेम होतं आणि आजही आहे आणि उद्याही राहिल. याचं कारण त्यांची खुमासदार शैली. गोष्ट सांगण्याची त्यांची शैली आजही आपल्याला गुंगवून ठेवते. त्याच्या कथा वाचून, ऐकून, नाटकं पाहून, चित्रपट पाहून, विचार ऐकून कैक पिढ्या घडल्या आहेत. यापुढेही घडतील.

‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातलीच काही उदाहरणं घ्या. नारायण लग्नात स्वयंसेवकगिरी करणाऱ्या माणसांचं निरीक्षण करुन पुलंनी ही कथा लिहिली. यातल्या नारायणाची शब्दांमधून भेट घडवून आणली. या कथेत पुलंनी काढलेली आवाज हेदेखील या कथेचं खास वैशिष्ट्य आहे. जी गोष्ट नारायणची तशीच अंतू बर्व्याचीही. ‘देवाने माणसाची एक निराळीच घडण केली आहे त्यांच्यामध्ये रत्नागिरीच्या लाल चिऱ्याचे, खाजऱ्या आळवाचे आणि फट् म्हणता प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकटवून आहेत. अंतू बर्वा याच मातीत उगवला आणि पिकला.’ अंतूशेठ कसे होते हे सांगत असतानाच पुलं त्यांचं यथार्थ वर्णन करतात. ‘आमची ही चाळीस वर्षांपूर्वी गेली तेव्हापासून दारचा हापूस मोहरला नाही.’ हे वाक्य ऐकताच अंगावर काटा येतो. ‘पहाटेच्या इवल्याश्या प्रकाशात त्यांचं ते खपाटीला गेलेलं पोट उगाचच माझ्या डोळ्यांवर आघात करुन गेलं’ वाक्य आलं की डोळ्यात आपोआप पाणी येतं. त्यांच्या विनोदाला कुठेतरी कारुण्याची झालर आपल्या डोळ्यांच्या कडा नकळत ओल्या करुन जाते. हसता हसता डोळ्यातून पाणी काढण्याचं कौशल्य त्यांच्या ठायी होतं.

सखाराम गटणे, नामू परिट, नाथा कामत, हरितात्या ही पात्रंदेखील पु.ल. त्यांच्या बोलण्यातून अक्षरशः जिवंत करतात. त्यांच्या म्हैस या कथेत तर सगळ्या बसचं वर्णन आहे. मास्तर, ऑर्डरली, मधु मालुष्टे, ड्रायव्हर, कंडक्टर, बाबासाहेब मोरे, म्हशीचा मालक धर्मा मांडवकर ही सगळी पात्र पु.ल. फक्त शब्दांमधून उभी करतात. त्यांचं निरीक्षण कौशल्य आणि गोष्ट सांगण्याचं कसब इथे पणाला लागलंय.

पाळीव प्राणी ऐकताना, वाचतानाही त्यांचं निरीक्षण कौशल्य आणि ती कथा सांगण्याची विशिष्ट शैली आपल्याही नकळत आपल्यावर कथा सांगण्याचा एक संस्कार करुन जाते. ‘चार-पाच कावळे एकत्र बसले की म्हाताऱ्या वकिलांची एक मुरब्बी टोळीच बसली आहे असं मला वाटतं.’ ‘कबुतरांचं गळ्यात आवाज काढून बोलणं हे मुंबईच्या पारशी लोकांच्या बोलण्याशी मिळतंजुळतं असतं आणि काहीबाबतीत वागणं सुद्धा!’ कुसुकूला आवाज देणारे आजोबा हे सगळं आठवलं की हसू येतं. आजोबांचा विशिष्ट पद्धतीने काढलेला आवाज हादेखील दखल घेण्याजोगा.

‘बिगरी ते मॅट्रीक’मध्ये पु.ल. सांगतात, बिगर इयत्तेपासून ते मॅट्रीकपर्यंतचा माझ्या सगळ्या प्रवासाचं वर्णन हे खडतर असंच करता येईल. बालपण सुखात गेलं असं म्हणताना माझी जीभ चाचरते, दामले मास्तरांचं वर्णन करताना पु.ल. वर्गातल्या विद्यार्थ्यांबाबतही बोलत असतात. सगळा वर्ग त्यांच्या कथेतून आपल्या डोळ्यासमोर उभा करतात. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर पु.ल. कागदावर उमटवलेल्या ओळींमधून निर्माण झालेल्या पात्राशी आपली भेट घडवून आणतात. इतिहासात रमणारे हरितात्या, बाबा रे… तुझं जग वेगळं, माझं जग वेगळं म्हणणारा नाथा कामत, इस्त्रीला कपडे घेऊन गेला की हमखास घोळ घालणारा नामू परिट ही पात्रं आजही आपल्या आजूबाजूला फिरत आहेत का असं वाटतं याचं कारण आहे ते पुलंची आगळी वेगळी शैली. त्यांच्या कथा वाचताना ऐकताना त्यांच्या खास शैलीचं दर्शन होतं.

व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात जशी पुलंना भेटलेली माणसं त्यांनी आपल्या कल्पनेतून साकारली आणि त्यांचं वर्णन केलंय अगदी तसंच त्यांच्या आयुष्यात खरीखुरी आलेली जी माणसं होती त्यांचं वर्णन गणगोत या पुस्तकात आहे. रावसाहेब म्हणजेच बेळगावचे कृष्णराव हरीहर यांचं जे वर्णन पुलंनी केलं आहे त्याला तोड नाही.

मंगेश साखरदांडे, भाई, बटाट्याच्या चाळीचे मालक, पुरुषराज अळूरपांडे, कोट्यधीश पु.ल. अशा टोपण नावांनी पु.ल. ओळखले जातात. अघळपघळ, अपूर्वाई, असा मी असामी, आपुलकी, उरलंसुरलं, गोळाबेरीज, पूर्वरंग, अपूर्वाई, खिल्ली, हसवणूक, गाठोडं, एक शून्य आणि मी अशी कितीतरी पुस्तकं त्यांनी लिहिली.

अंमलदार, एक झुंज वाऱ्याशी, तुका म्हणे आता, ती फुलराणी, तीन पैशांचा तमाशा, सुंदर मी होणार, वटवट सावित्री ही नाटकंही लिहिली. पुढारी पाहिजे आणि वाऱ्यावरची वरात ही लोकनाट्यंही लिहिली. कुबेर, भाग्यरेषा, वंदे मातरम या चित्रपटांमधून अभिनय केला. मानाचे पान, मोठी माणसे, गोकुळचा राजा, नवरा बायको, पुढचं पाऊल, वर पाहिजे, दूधभात, संदेश, देवबाप्पा, गुळाचा गणपती या चित्रपटांसाठी कथा, पटकथा लेखनही केलं. यात विशेष उल्लेख करावा लागेल तो गुळाचा गणपती या चित्रपटाचा. कारण या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत, दिग्दर्शन आणि अभिनय हे सारंकाही पुलंच्या नावे आहे. सबकुछ पु.ल. असलेला हा सिनेमा आजही रसिकांच्या स्मरणात आहे. ती फुलराणी या नाटकाचा विशेष उल्लेख करावा लागेल. कारण हे नाटक भक्ती बर्वे साकारत होत्या. यातली मंजुळा ही भूमिका भक्ती बर्वेंनी अजरामर केली. जॉर्ज बर्नॉड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचं हे मराठी रुपांतर होतं. भक्ती बर्वेनंतर प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी, अमृता सुभाष यांनीही ही भूमिका साकारली. हेमांगी कवीनेही फुलराणी साकारली.

पुलंनी लिहिलेलं नाच रे मोरा आंब्याच्या वनात हे गीत आजच्या पिढीसाठीही बालगीत ठरलं. मोराचं इतकं सुंदर वर्णन या गीतामध्ये केलं आहे की ते गीत आजही सहज आपल्या ओठी येतं. उत्तम संगीत देखील ते देत. गाणं, नाटक, साहित्य, रेडिओ, दूरचित्रवाणी या सगळ्या क्षेत्रात ते लीलया वावरले. त्यांनी जिवंत केलेली बटाट्याची चाळही आजही आपल्या मनात एक घर करुन राहिली आहे.

असा मी असा मी हे त्यांचं नाटकही चांगलंच गाजलं. व्यक्ती आणि वल्ली या नाटकाचे प्रयोग करताना यामध्ये पुलंची भूमिका साकारली ती अतुल परचुरे या गुणी अभिनेत्याने. पुलंच्या समोर मला त्यांची भूमिका साकारण्याचं भाग्य लाभलं अशी प्रतिक्रिया अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीत दिली होती. पुलंकडूनही त्यांच्या कामाचं कौतुक झालं. निखिल रत्नपारखी, आनंद इंगळे, संजय मोने यांनीही पुलंच्या भूमिका साकारल्या. मात्र विशेष कौतुक झालं ते अतुल परचुरे यांचंच.

पुलंच्या हजरजबाबीपणाचे अनेक किस्सेही प्रसिद्ध आहेत. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की मी एक खेळिया आहे. मला हे असंच जगायला आवडतं. पुलंच्या पत्नी सुनिताबाई देशपांडे यांनीही त्यांना कायमच साथ दिली. आहे मनोहर तरी हे त्यांचं पुस्तक प्रचंड गाजलं. तसंच मण्यांची माळ, मनातलं आकाश, सोयरे सकळ या पुस्तकांचंही लेखन सुनिता देशपांडे यांनी केलं. त्या सामाजिक कार्यकर्त्याही होत्या. पुलंच्या सुंदर मी होणार या नाटकात त्यांनी दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिकाही साकारली होती.

एक पोडियम आणि माईक, शेजारी टेबलवर भरुन ठेवलेलं तांब्या भांडं आणि त्या माईकवर आपली कथा सांगणारे पु.ल. हे चित्र अवघ्या महाराष्ट्राला परिचित झालं. कथाकथन हे महाराष्ट्राच्या मातीत रुजवलं ते पुलंनीच. स्टँड अप कॉमेडी हा प्रकार सध्याच्या काळात चांगलाच लोकप्रिय ठरतोय. मात्र त्याचे जनक हे पु.ल. आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. पानवाला, मी आणि माझा शत्रुपक्ष, म्हैस, पाळीव प्राणी, तुम्हाला कोण व्हायचं आहे मुंबईकर पुणेकर की नागपूरकर? या आणि अशा अनेक कथा त्यांनी नुसत्या सांगितल्या नाहीत तर त्यातल्या पात्रांशी आपली भेट घडवून आणली. शब्दांच्या या जादुगाराने निर्माण करुन ठेवल्या साहित्यकृतींंवर, नाट्यकृतींवर, संगीतावर आणि भाषणांवर महाराष्ट्राने अतोनात प्रेम केलंय करत राहिल. ते गेले त्याला आता वीस वर्षे झाली आहेत. मात्र आजही ते आपल्यातच आहेत असंच वाटतं ते त्यांच्या लिखाणामुळेच.

पु.ल. गेले ही बातमी आली तेव्हा आपल्या घरातलंच ज्येष्ठ माणूस गेलंय अशी भावना महाराष्ट्राच्या मनात होती. त्यांचं जाणं चटका लावून गेलं असलं तरीही त्यांनी जी निर्मिती करुन ठेवली आहे ती त्यांना अमर करुन गेली. शेवटी जाता जात त्यांच्याच रावसाहेब या कथेतलं शेवटलं वाक्या आठवतं.. देवाने आमची छोटीशी जीवनं समृद्ध करण्यासाठी दिलेल्या या देणग्या! न मागता दिल्या होत्या.. न सांगता परत नेल्या.

समीर जावळे 
sameer.jawale@indianexpress.com
लोकसत्ता 
१२ जून २०२०

Saturday, August 7, 2021

An unpublished speech of P. L. Deshpande

P. L. Deshpande is known for his writings. But he was also an accomplished film and stage actor, scriptwriter, musician and film director. From 6th August 2021 onwards T.V. Studio building of the Film and Television Institute of India (FTII), Pune will be known as P. L. Deshpande T.V. Studio building. FTII is organizing an event to inaugurate P. L. Deshpande TV building and unveiling of P. L. Deshpande mural. The occasion will be graced by Chief of the Army Staff General Manoj Naravane. Kartavya is immensely happy to treat our readers with P. L. Deshpande's unpublished speech which he delivered on 2nd November 1979, at the 16th convocation ceremony of FTII. During the convocation ceremony R. K. Laxman, President of FTII society was also present. Mrs. Sunitabai Deshpande’s (P. L. Deshpande’s wife) nephew Dinesh Thakur & National Film Archives of India, Pune (NFAI) Director Prakash Magdum, made this speech available to us.

Friends,

I had a very comfortable feeling that people had long forgotten my association with the Film World, until your Director invited me to perform this very pleasant duty. I do not know if he has done correct casting in selecting me as a performer on this occasion. It is nearly a quarter of a century since I withdrew most willingly from the film world. I withdrew myself at a time when I was faring pretty well in the Marathi Bazar. On an average, I was making a little more than a college teacher of those days and a little less than my favorite paan wallah round the corner. I used to write, what I then thought were screenplays. I used to act and I used to direct music and I even ended up in Directing a Marathi film. I did everything that a performer was called upon to do in those days. I have even a painful recollection of having been asked, as a humorist, to keep the heroine's real mother in good humor for a couple of hours as the day's shooting had to be extended beyond the stipulated time. Looking back at my film career, I feel prouder not so much for being in it but for having left it. I can in all humility count myself as one of those very few prudent persons who have obliged the fields of their activity more by their absence than presence. Believe me, I am not trying to pose as a humble man; far from it. As an ex-film-man and a present film-viewer rather an irregular one though- I might soon sound like an old schoolmaster conducting a lesson-perhaps the last one you will be facing in these precincts. Neither have I come here to show you my prowess as a humorist; certainly not in the presence of one of the greatest ones is not only in our country but in the modern world, who is sitting here by my side and has made me feel most uncomfortable from the moment I sat on this chair. I mean the President of this Society, Shri R. K. Laxman, whose still cartoons show a greater movement than many of our so-called motion pictures and bring the viewer nearer truth and beauty.

Truth and beauty, Yes. That is what the Film Producers in whose contact I came in those days wanted me to remain away from. They wanted me to separate myself from whatever I was and supply them with what they thought had 'the public demand' - 'Public demand'. - the one expression which I have never been able to understand. I soon realized that they were playing a double role. What they really wanted of me as a writer or a performer was something which ultimately would result in filling their cash boxes to the brim. None could ever determine the height of these boxes. On the other hand, in their public speeches or interviews they were shedding crocodile tears for their inability to give real artistic pieces because, to use that nasty word again, the public demand was different. In truth, the film to them was just another commodity, like any other in the market. Speaking of a Distributor turned Producer-cum-Studio-owner, a very senior actor of those days said, 'If Mr. X comes to know that there is more money in selling wood for funeral pyres than producing pictures he would rather stock his Studios with logs of wood for cremation than produce films and kick us all out of here.'

Harsh words, my friends, but not quite untrue. I even heard a producer say that he had backed so much money on a certain actress who he thought was going to be a sure win. The jargon of the racecourses and the gambling dens had started creeping in a land where dreamers of a different kind gather. I know that it is always the man who pays the piper calls the tune. Looking occasionally at the TV screen on Sunday evenings I get a painful feeling that the rule is operating in a much more disastrous manner today. It operates in the film world because it operates in every walk of our private and public life. There is no denying the fact the manufacturers of goods ranging from the nuclear weapons to various kinds of toothpaste and whatnot are using all possible tricks in converting nations and individuals into buyers. Your status in society is determined by your capacity to buy.

It seems to me that we have all come to accept the fact that as in love and war everything is fair in trade also. And just as the manufacturers of the weapons of largescale destruction do not bother about the value of human life or our fundamental right to exist, the speculators who have entered the world of film art with bags of money to invest are least worried about the serious loss of human values. As in any other trade, whatever brings in larger and larger profits is good enough for the film trade also. They are the least. disturbed by the impact this medium has on untutored and innocent minds. What do I find, these days when I enter some friend's house? His four-year-old son pointing a toy gun at me and shouting 'Hands up' and my friend's wife or daughter wanting me to tell her which film hero he is imitating. I fail in this viva voce.

"Sell" seems to be the only watchword in our film industry. So long as blind faith and superstitions sell in this country, sell them. Create new Gods or to be sure create new Goddesses, invest them with all kinds of powers, invent new miracles and you have a large and an easily qullible population living right from the lavishly furnished flats down to the worst possible slums to buy the stuff even at the black market rate outside the cinema halls. I was shocked to read an interview in a film magazine given by a Professor who has also been writing screenplays and dialogues that he had written some dirty dialogues with double meanings just to show a successful film comedian-writer-producer that he too can match him in vulgarity. So, sell vulgarity, make beautiful sex as ugly as possible and sell it; sell violence; sell dopes of escapes to our masses to make them forget their daily drudgeries of life and let them not know that most of their miseries are man-made. In short, sell everything that brings in enormous amounts of money. Elevate the anti-social to the position of a hero in the last reel, when everyone has seen enough of blood and indiscriminate fighting and shooting, and make him die in the end of the lap of his long lost mother or sometimes for a change let the mother die on the lap of this hero, let the dying one jerk the last tear from the eyes of the audience with a pseudo-philosophical or poetical line and be sure that the spectators come again to witness the fights and blood-shedding. Let there be a fair amount of running after each other done by the hero and the heroine-preferably in the Kashmir Valley, with Lata Mangeshkar and Rafi singing for them to buck them up. I have yet to meet a man or a woman in real life who can sing while running so fast or even for the matter of that while rolling on a lawn. I do not know why they don't sit at a place and really finish the job. This musical hide and seek has almost become a ritual. Why even the dialogues are ritualistic. A filmy bhajan is a ritual and cabaret dance too is a ritual. The chase in the last real is a ritual. And we as a people are so very fond of rituals that unless you have all these rituals bundled together in a feature film that is not a real 'Saneema' for our people. Thanks to the untiring efforts of our film producers and all the others who as actors, actresses, screenplay writers, songwriters and publicity experts, share the booty with them most of what passes for an Indian film today is just this and nothing more. I am not saying all this to show my moral indignation or anything of that kind. Far from it. The immorality lies not so much in the exposed physical contours of a Caberet dancer as in the basic speculative motive that is at the root of producing a so-called feature film. These, as you all know, are the salient features of our feature films.

I certainly do not want to frighten you away, my young friends, from the journey which you are ready to undertake soon. I am sure that after all the training you had here and after seeing some of the masterpieces made by great film-makers like Chaplin, Fellini, Desica, and our own Satyajit Ray, Ritwik Ghatak, Mrinal Sen, Shyam Benegal, Girish Karnad, B.V.Karanth, what goes under the name of Cinema or a feature film must be causing a concern to you also. It is refreshing to find that even in some of our commercial feature films there are a few Directors like my friend Shri Hrishikesh Mukherji who have refrained from stooping so low and have yet met with good success. It is not necessary to be cheap to be popular. The old Prabhat and New Theatres films were quite popular; yet no one could accuse them of being cheap and vulgar.

Let me also tell you at this juncture that I am not one of those who are in a perpetual state of mourning for the great film-makers of the past, who are no more. Offer your sincerest pranams to them and forget about them. The world does not belong to them anymore. We Indians are always busy building up the past and forgetting the present. There are a few creations no doubt which can describe as all-time great. You must have seen such excellent works of film art. There is some unknown element in art which transcends the barriers of time and distance. We call them classics. But, let us not forget that these classics were modern in their own times; almost all great artists who created them had to suffer at the hands of people who cling fast to what they think are artistic traditions. To many, tradition is just repetition. (Bharateeya Sanskriti, Bharat Kee Sannariyan, Patidev, Khandaan ki ijjat etc.) No one who wanted to be true to himself and his own experiences as artist could escape the struggle against the people who are averse to change and are happy clinging to cliches and platitudes.

Your task is not going to be an easy one in a world where glossiness is mistaken for beauty, tomfoolery is accepted as humour, sentimentalism is taken for emotion, outdated customs for cultural traditions and goondaism for bravery. The impression in the mind of an average Indian about the film world is akin to his idea of paradise. A world of glitter and glamour. A world of easy money. A 'five-star' life if I may say so. The late Guru Dutt and Hrishida have depicted these misconceptions in their delightful films, like Kagaz Ke Phool and Guddi.

Like that word public demand, I have yet not been able to grasp the correct connotation of this word 'glamour' too. I have a shrewd suspicion that this thing called glamour has more to do with the unimaginable wealth which many of our successful stars and superstars are supposed to be amassing rather than their physical attraction or sexual bewitchment. The glossy film magazines which give publicity to their lavish manner of living and spending have created a kind of a feudal Prince or a Princess image in the minds of the poor people in our country. The youth knows full well that most of the so-called 'hits' are flukes. Looking at the meteoric rise and fall of some of the actors and actresses, the general feeling in the minds of our young man and woman is that success in this land is hundred times more due to luck than merit, which also must be contributing to this idea of glamour. Good acting has, at all, very little to do with glamour. Helen Hayes is perhaps one of the most sensitive actresses in the world. What kind of glamour was there about her. There is hardly any glamour attached to artists in the other fields of art - poets, novelists, singers, good dancers, playwrights. Don't they create joy in life? Don't they entertain? Was there a greater entertainer than Charlie Chaplin? It is the quality of entertainment and even the quality of popularity that matters.

The challenge before the film-makers, who are aware of its potentialities as medium of entertainment is that of bringing about a change in the basic conception of entertainment itself; a change from the world of glamour, pseudo-romanticism, pseudo-progressivism as well, from the sham that is dished out in the name of our rich cultural heritage etc., to the world of truth, beauty and joy. Making people aware of the realities of life by either exposing the contradiction in the behaviour of our tall and mighty through good humour, or with tragedies which are not merely sob stuff. Let not humour be devoid of gentle wisdom nor the expression of love with dignity.

If you really want to be true to the artist within you leave worrying about fame, recognition, Oscars etc. Fame like hospitality has a strange habit of pursuing you when you do not need it.

I cannot resist quoting a passage from a letter written to Charlie Chaplin, by Mr. Roger Ferdinand, the then President of the Society of authors and Dramatists in Paris. This was written when Chaplin was elevated to the rank of the officer of the Legion of Honour by the French Government. Writing about Chaplin's fame, Mr. Ferdinand says,

'In truth the real fame is never usurped; It only has a sense, a value and duration when it is turned to a good cause. And your victory is in the fact that you have human generosity and spontaneity that are not inhibited by rules or cleverness but stem from your own sufferings, your joys, hopes and disappointments; all that is understood by those who suffer beyond their strength and ask for pity and who constantly hope to be comforted to be made to forget for a moment by that laughter which does not pretend to cure but to console.

Ultimately, I believe that it all depends on what you really love. If you really love your people and really care for bringing a little sunshine in their clouded life, if you really feel ashamed of making monkeys out of them by doing monkey business as most of our politicians are doing today, you will shun the path of cashing on peoples' ignorance, their blind faith, their fatalistic outlook, their mental and physical starvation. Our innocent illiterate masses are duped into believing that whatever goes on the silver screen is God's truth. The way many of our politicians are duping people into believing that whatever they are doing is only in the interest of the people, including the ceremonial shaving off of the beard or for the matter of that putting the men of rare wisdom like Jayaprakash Narayan behind the bars and later on placing a sandalwood stick on his funeral pyre. I need not tell how our clever film-wallas have given a new lease of life even to some unknown Goddesses and how some of our antisocials have made use of the glamour which these gods and goddesses have got, and have erected temples in their names and have made quick money out of it.

It is here that the Government, if it really wants to improve the state of affairs in the modern Indian film production, can provide the real good creative artists with facilities they need most. I do not want to suggest the tightening up of the rules of the Board of Film Censors. The Indian Penal Code has not been able to prevent crime. It is the basic mentality that needs change. The false notion about cinema has to be driven away from peoples minds only through proper artistic efforts. The only way to do away with bad coins is to make people aware of what good coins are. You must have realised that the best films are based on stories written by literary artists of great merit. Let us not forget the share of Sharad Babu in the New Theatre's success. Most of the pictures made by modern Directors ranging from Satyajit Ray to young B.V.Karanth are based on excellent short stories and novels written by eminent writers. Not all of them can lead to making a film. But there are excellent short stories written by good writers in almost every Indian language which are film-worthy. I could list about a hundred of them from Marathi itself. A crop of writers has sprung in the Indian languages who have most artistically brought the hitherto unknown joys and sorrows of people living in our rural and tribal areas. Why not encourage young artists and directors to produce 60 to 90 minutes productions based on these stories, on 16mm films. In addition to financing such films the Governments both at the Central and State level should build hundreds of simple structures and use them as Cinema Houses for the projection of these films. TV can make ample use of these films. Let the people know the strength of this medium in entertainment and enlightenment. Let some of our delightful folk tales be picturised. You have a vast treasure of wit and wisdom there. It is real organic material and not synthetic as most of our film stories go.

Give a shape and a form to these beautiful stories which will make them aware of the real joys and sorrows that life offers to all of us in hundred different ways. Present them simply and intelligibly. Please don't, in the name of art and experiment, be vague or non-communicative. Let your picture convey to them the emotion and the incidents in a straight and a simple manner. I don't understand a word of Kannada but I enjoyed every moment and was touched by the deep sorrow in Karnad's Kadu or Karanth's Chomana Dudi. It is only when the story writer, the Director, the Cameraman, the Actors and the Actresses play together in tune like the various instrumentalists in a symphony orchestra that you get a good film made. And it is here that the question of training and acquainting the future filmmakers with different aspects of filmmaking comes in.

We often say that the times have changed. Times do not change of their own accord. It is the artist, the philosopher, the scientist, the painter, the sculptor, the musician, the King in the old days and the politician in the modern times who individually and collectively bring about this change, in the lives of the people. It is the responsibility of an artist to be aware of the changing times and give a proper expression to them by keeping a vigilant watch on such times and on himself in art. This training period never comes to an end. It is true that artists are born and not made. But the mere birthmark is not enough. All born artists who have made a mark in art are also gifted with the faculty of self-training. Liking for an art, therefore, must never be mistaken for the gift of creation. It is a conscious effort. One has to master the craft also. An early success as a child artist has more often than not resulted in his or her total failure as a grown-up artist for want of proper training. We all of us in art suffer from a kind of Narcissus complex. It is here that you need someone whom you respect and love to pull your ears and show you your right place; good critics of art can do this job. But that too is a very rare community. Not only the artists but also the teachers in such institute need refresh/courses from time to time. There should be a constant re-examination of our teaching methods.

This Institution has a special responsibility. The student here is taught to handle a medium which has tremendous potentialities to shape and change society for the better. The Government is spending a fair amount of money for running this Institute, though much more is needed for its further development. The teachers here should also be provided with such freedom and facilities that they should have the satisfaction of having sent their students out in the world with the fullest confidence. TV should make the best use of students who get qualified from here. Given such opportunities, I am sure, our young rectors, actors, actresses, musicians, writers and technicians will positively change the falsely glittering face of the present speculation market which goes in the name of Film Industry and make our film productions shine in their natural and legitimate glory.

Friends, I know you must be leaving this Institute with mixed feelings. All parting in life is sad. I am sure, you will be carrying with you something which will prove worthwhile in your careers as future Filmmakers of India. I would like to request you to have a deep feeling of love, respect for your viewers and a genuine desire to give them a feeling of enrichment through your art. Make a simple approach to them through your productions. I am sure, you will never fail to win their hearts which is far more precious than winning anything else. You are about to start on a new and an exiciting journey, I wish you bon voyage.

It was very kind of your Director to have invited me to give you my best wishes. That is all that I can give you. I know your Institute has access to a wonderful Film Archive. But, I never knew that Mr. Nair has also maintained a list of persons who were once associated with filmmaking and who like me have only a very little archival value, if any. I must also thank your Chairman, your President, the members of your staff and you ladies and gentlemen for giving me a patient hearing.

- P. L. Deshpande

Prakash Magdum (Director, National Film Archives) has translated the speech in Marathi, which is published in 14th August Issue of Weekly Sadhana.

Wednesday, August 4, 2021

वजन ठेवल्यावर पुढे सरकते ते सरकार! - पु.ल.

आणीबाणीच्या वेळची ‘पुलं’ची एक आगळीवेगळी ओळख करून देणारी आठवण सांगत आहेत रत्नागिरीचे ऍड. धनंजय भावे
...............
सन १९७७. आणीबाणी समाप्तीची घोषणा झाली. देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र झाले आणि ऐतिहासिक ‘जनता’ पक्षाची स्थापना जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झाली. देशभर प्रचाराची धूम उठली होती. मोहन धारियांसारखे तरुण तुर्क इंदिराजींना सोडून जनता पक्षाच्या प्रचारात उतरले होते. विशिष्ट ध्येयवाद मानणारे पु. ल. देशपांडे यात मागे कसे राहतील? महाराष्ट्राचा एवढा मोठा लाडका साहित्यिकही आणीबाणीच्या विरोधात उभा राहून प्रचारात उतरला होता.

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून बापूसाहेब परुळेकर जनता पक्षाचे उमेदवार होते आणि ‘अहो भाग्यम्!’ ‘पुलं’ची एक प्रचारसभा चक्क रत्नागिरीला मिळाली होती! कदाचित जावई म्हणून हा मान आम्हा रत्नागिरीकरांना मिळाला असावा. सभा संध्याकाळी पाच वाजता होती. सभेच्या आणि प्रचाराच्या व्यवस्थेमधील भाग म्हणून मी आणि अॅड. बाबासाहेब परुळेकर ‘पुलं’च्या सासुरवाडीला म्हणजे स्व. ठाकूर वकिलांच्या बंगल्यावर भेटायला गेलो होतो. मनात एक वेगळीच भावना होती. एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण भेटणार, त्यांच्याशी बोलायचे तरी कसे! पण ठाकूर वकील वडिलांच्या परिचयाचे म्हणून ‘पुलं’शी संभाषण कधी सुरू झाले ते कळलेच नाही. त्यात मी रत्नागिरीच्या मधल्या आळीतला. मग काय विचारूच नका; पण आणीबाणीविषयी आणि त्या अनुषंगाने दुर्गाबाई भागवतांचे त्या काळातील गाजलेले साहित्य संमेलन अशा अनेक गोष्टी ‘पुलं’कडून ऐकायचे भाग्य लाभले. मधूनच माजी सरकार कसे होते, याविषयी ‘पुलं’चे त्यांच्या खास शैलीतून उद्गार - ‘वजन ठेवल्यावर पुढे सरकते ते सरकार!’ (संध्याकाळच्या सभेची टॅगलाइन बहुधा तीच असावी, असे त्या वेळी वाटले.)

राजकारणात न रमलेले ‘पुलं’... पण आंदोलन करताना कशाचे भान ठेवावे याबाबतीत त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मला भावली. ते म्हणाले, आणीबाणी आता केव्हा आणि कशी संपणार, या निराशेच्या गर्तेत असलेले काही विद्यार्थी प्रतिनिधी त्यांना भेटायला आले होते. सत्याग्रह करून झाला, आणखी किती सत्याग्रहांमध्ये अटक करून घ्यायची, अशी त्यांची निराशाजनक तक्रार होती. ‘पुलं’नी त्यांना मोलाचा सल्ला देताना महात्मा गांधींचे उदाहरण दिले. त्यांनी सांगितले, की गांधीजींच्या सत्याग्रहांचा अभ्यास करा. त्यांनीही स्वातंत्र्यलढ्यामध्ये काही काळ लढा स्थगित केला होता. त्यांचे म्हणणे असे होते, की विरोधकांना तुमच्या ‘काही हालचाल न करण्याची’सुद्धा भीती वाटत राहिली पाहिजे. तुमच्या पुढील योजना काय चालल्यात, याच्या शोधात विरोधक राहिले तर तो एक प्रकारच दबावच असतो. संभाषणाच्या ओघात महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्यातील यशाचे यापूर्वी न उलगडलेले एक मोठे सूत्र ऐकायला मिळाले आणि तेही ‘पुलं’सारख्या एका अ-राजकीय थोर साहित्यिकाकडून, हे भाग्यच म्हणायचे.

गोगटे कॉलेजच्या मैदानावर मंडणगड ते रत्नागिरी आणि जवळच्या लांजा, राजापूर विभागातून आलेल्या सुमारे २५ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ‘पुलं’ स्टेडियमवर उभे राहिले आणि त्यांनी सभा पहिल्या १० मिनिटांतच जिंकली. ‘वजन ठेवल्यावर पुढे सरकते ते सरकार!’ हीच टॅगलाइन ठरली! त्यापूर्वी अशी सभा मी तरी पाहिलीच नव्हती. ‘पुलं’ची जन्मशताब्दी सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने ‘पुलं’ची समाजाप्रति सजगता दाखविणारी ही एक आगळीवेगळी ओळख!

संपर्क : ऍडव्होकेट. धनंजय जगन्नाथ भावे – ९४२२० ५२३३०