या न्यायानं विचार केला तर पुलंसारख्या अवलियाशी नातं जोडल्यानंतर 'विदुषी' म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करताना सुनीताबाईंचा प्रवास किती कठीण राहिला असेल. पण स्वतः पुलंनी सुनीताबाईंविषयीच्या भावना व्यक्त करताना जे सांगितलं त्यातून सुनीताबाईंचं पुलंच्या आयुष्यातील योगदान आणि त्यांची उंची याची जाणीव होते आणि सृजनतेचा आणि प्रतिभेचा संगम किती सुरेख असतो याची आपल्याला प्रचिती येते. सुनीताबाईंविषयी बोलताना पु.ल. म्हणाले होते, "मी रिकाम्या तासाला शिक्षकांच्या कॉमन रूममध्ये बसलो होतो, एवढ्यात खादीची पांढरी शुभ्र साडी, खादीचाच पांढरा शुभ्र ब्लाउज, अंगावर एकही अलंकार नाही, कपाळावर कुंकू नाही अशी सुमारे १६-१७ वर्षांची गोरीपान तरुणी ही झपाझप दार उघडून आत आली. तिचं नाव 'सुनीता ठाकूर'! तिच्याविषयी अलिप्ततेनं बोलणं मला शक्य नाही. पण एकच सांगतो कि, तिच्या रूपानं मला माझ्या आयुष्यामध्ये श्रेयस आणि प्रेयस या दोन्ही गोष्टींचं वरदान लाभलं. खरं म्हणजे ३६ वर्षांपेक्षाही जास्त अशा आमच्या वैवाहिक आयुष्याची कहाणी ही तिनंच सांगायला हवी. पुष्कळ वेळेला मला प्रश्न पडतो कि, माणसाच्या आयुष्यामध्ये प्रयत्नाचं स्थान किती आणि दैवाचं किती? कठीण आहे सांगणं. महाविद्यालयीन शिक्षण सोडून १९४२ च्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून देणाऱ्या सुनीता ठाकूर नावाच्या एका बुध्दीवान आणि संपन्न घराणातल्या मुलीला गरिबीचा वसा घ्यावा, माझ्यासोबत संसार करावा असं का वाटलं असावं? फक्त ५५ रुपयांमध्ये ६-७ जणांच्या संसाराचा गाडा मी ओढत होतो. बरं , माझं काही नाव आहे, यश आहे असंही काही नव्हतं. अशा या माझ्यासारख्या माणसाविषयी तिला ओढ का असावी आणि गेली अनेक वर्षे माझ्या आयुष्यातली मार्गदर्शक, माझ्या साहित्य, नाट्य वगैरे क्षेत्रातील सहकारिणी, त्यानंतर माझी अकाउंटंट, मॅनेजर सगळं काही, एवढंच नव्हे तर स्त्री पुरुषासाठी संसारात ज्या ज्या म्हणून खस्ता खाते त्या खस्ता काढणारी म्हणून तिनं का म्हणून माझ्याबरोबर रहावं, तिला माझी ओढ वाटावी आणि आजही आमचा संसार टिकून आहे हे सगळं गूढच आहे. बाकी एक, आमच्या संसारामध्ये सुखदुःखाच्या प्रसंगी आम्हाला जोडून धरणारा एक धागा आहे महत्वाचा, तो म्हणजे कवितेचा! कविता म्हणजे कविता करायचा नव्हे, कविता वाचायचा, कविता म्हणायचा. कदाचित त्यामुळंच तिच्यासोबतचा माझा प्रवास एखाद्या कवितेइतकाच यमकाला यमक जुळवत काव्यमय झाला असावा."

पु.ल. अर्थात भाईंनी सुनीताबाईंविषयी बोललेला शब्द न शब्द हा सुनीताबाईंचा मोठेपणा दर्शवणारा आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा होता. मला ही अशी माणसं मुरलेल्या लोणच्यासारखी वाटतात. ती जितकी जुनी होत जातात तितकी चविष्ट होत जातात. सुनीताबाई जितक्या शिस्तीबाबत काटेकोर तितक्या भाईंच्या विषयी हळव्या होत्या. पुलंच्या लेखनासाठी सुनीताबाईंनी काय काय केलं याविषयी प्रसिध्द लेखिका मंगला गोडबोले सांगतात, "पुलंच्या लेखनासाठी सुनीताबाईंनी काय केलं नाही? त्यांना लिहिण्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांच्यावर कोणतंही दैनंदिन काम पडू दिलं नाही. लिहिण्यासाठी लागणारी शांतता - निरामयता त्यांना मिळावी म्हणून दक्षता घेतली. नुसती दक्षताच नव्हे, तर जनापवादही घेतले. “भाई, तू आता नाटकाच्या तिसऱ्या अंकाच्या लेखनात बुडला आहेस. आता हे भाषणाचं निमंत्रण घेऊ नकोस.” असं भाषण ठरवायला आलेल्यांसमोर बजावणं असो, किंवा “तुम्ही आलात खरं, पण आता भाई तुम्हांला भेटणार नाही. तो महत्त्वाचं लिहितोय. ते झाल्यावर मी तुम्हांला बोलावेन.” असं एखाद्या अनाहूत पण सन्माननीय पाहुण्याला सांगणं असो. कोणामुळेही पुलंची लेखनाची तंद्री मोडणार नाही याबद्दल त्या सदैव सावध राहिल्या. पु.ल. लिहीत बसले असताना त्यांच्या खोलीत चहा, दाण्याची वाटी, सिगरेटची पाकिटं अशी 'कुमक' न सांगता पुरवली. पुलंनी तो खर्डा पूर्ण करून, वाचून दाखवल्यावर परखड मत दिलं. केवळ स्तुतिपाठकाची भूमिका कटाक्षानं टाळली."(सुनीताबाई - मंगला गोडबोले) यावरून पु. ल. मधील लेखक घडताना त्यात सुनीताबाईंचं योगदान किती अनमोल होतं हे लक्षात येतं.
लेखन, अभिनय, संगीत, अभिवाचन या पु.ल. यांच्या प्रवासात सुनीताबाई त्यांच्या मागे सावलीसारख्या उभ्या होत्या. तेव्हा त्या फारशा प्रकाशझोतात नव्हत्या. परंतु या जोडीनं बा. भ. बोरकर, आरती प्रभू, बा.सी. मर्ढेकर आदी कवींच्या काव्याचा मागोवा घेणारे जाहीर कार्यक्रम सुरु केले तेव्हा खऱ्या अर्थानं सामान्य रसिकाला सुनीताबाईंची ओळख झाली. कविता हा या जोडीचा जीव कि प्राण होता. १९९० साली 'आहे मनोहर तरी' हे आपल्या व पुलंच्या सहजीवनाचा मागोवा घेणारे सुनीताबाईंचे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्यानं साहित्य क्षेत्रात आणि पुलंच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळच उडवून दिली. त्यानंतर 'मनातलं आभाळ', 'अवकाश' आणि 'सोयरे सकळ' ही पुस्तकं लिहून त्यांनी लेखिका म्हणून साहित्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. 'प्रिय जी.ए.' हे त्यांचं प्रकाशित झालेलं शेवटचं पुस्तक. जी.ए. कुलकर्णी हे सुनीताबाईंचे अत्यंत आवडते लेखक. त्या त्यांच्याशी वेळोवेळी पत्राद्वारे संवाद साधत. या पत्रांचा संग्रह म्हणजे 'प्रिय जी.ए.'! या पुस्तकानं साहित्य क्षेत्रात एक वेगळं दालन उघडून दिलं.
३ जुलै १९२६ रोजी रत्नागिरीला जन्मलेल्या सुनीताबाईंना त्यांचं व्यक्तिमत्व समृध्द करणारी कौटुंबिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी मिळाली. आपल्या 'सोयरे सकळ' या पुस्तकात त्यांनी ज्या तलावाचा 'यक्षाचे तळे' असा उल्लेख केला ते धामापूर येथील तलावाचे वर्णन आहे. अशा निसर्गसौंदर्याचं मुक्त हस्तानं उधळण असणाऱ्या वातावरणात सुनीताबाई लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यामुळंच त्यांच्याजवळ एक सौंदर्यदृष्टी होती. भाईंना भेट म्हणून आलेल्या पुष्पगुच्छातील फुलांची त्या इतक्या सुंदर रीतीनं मांडणी करायच्या कि, पाहणारा पाहतच राहील! कवितेची ओढही कदाचित यातूनच निर्माण झालेली असावी. त्यांचे मामा राजा पाटेकर यांनी अण्णासाहेब सहस्त्रबुध्दे यांच्याशी सुनीताबाईंचा परिचय करून दिला आणि सुनीताबाई सेवादलात सक्रिय झाल्या.
१९४२ च्या चळवळीत अण्णासाहेबांनी भूमिगत रेडिओची जबाबदारी सुनीताबाईंवर सोपवली, परंतु ते काम पूर्णत्वास गेले नाही. त्यानंतर त्यांच्यावर टाईम बॉम्ब तयार करण्याचे काम सोपवण्यात आले. त्यावेळी त्यांनी मोर्चाचे नेतृत्व करत मिल्ट्रीच्या ताफ्याचा मोठ्या हिमतीनं सामना केला. बंगाली आणि उर्दू भाषांचा त्यांचा अभ्यास देखील चांगला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या मुंबईला आल्या. जुवळे नावाचे एक शिक्षणप्रेमी दादर भागात 'ओरिएंट हायस्कुल' चालवत होते. त्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. पुलंशी त्यांची प्रथम भेट झाली ती इथेच! पुलंसारख्या कलंदर वृत्तीच्या अवलियाला त्यांनी आईच्या मायेनं सांभाळलं. त्यांच्या सृजनशीलतेला कायम प्रोत्साहन दिलं. प्रसंगी कडव्या शिस्तीच्या आणि प्रसंगी संवेदनशील मनाच्या सुनीताबाईंमध्ये एक समाजसेविका दडलेली होती. त्याला त्यांनी आपल्या दातृत्वाची जोड दिली. 'पु. ल. देशपांडे फाउंडेशन' ची स्थापना करून त्यांनी या फाउंडेशन द्वारे अनेक संस्थांना लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या. शिवाय त्याची कुठेही प्रसिध्दी होणार नाही याची काळजी घेतली. 'साधी राहणी उच्च विचार' या सुविचाराचा त्या मूर्तिमंत प्रतीक होत्या.

ज्या पुलंनी अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवलं त्या पुलंच्या ओठांवर कायम हास्य राहील, त्यांच्या लेखणीतून कायम आनंदाचा झरा वाहत राहील ही काळजी देवालाही असावी. म्हणून तर त्यांनी पुलंच्या आयुष्यात सुनीताबाईंना आणलं, जी एकाच वेळी त्यांची पत्नी होती, आई होती, मैत्रीण होती, सहचारिणी होती, समीक्षक होती आणि त्यांची प्रेरणा देखील. या एवढ्या भूमिका केवळ सुनीताबाईंसारखी स्त्रीच निभावू शकते. म्हणूनच लेखाचा समारोप करताना म्हणेल कि, जसं 'पु. ल. पुन्हा होणे नाही' तसंच 'सुनीताबाई देखील पुन्हा होणे नाही!'
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ




0 प्रतिक्रिया:
Post a Comment