Wednesday, June 24, 2026

सुनीताबाईंचा 'डोडी'

फोटोत सुनीता बाई आपल्या आवडत्या डोडी बरोबर आहेत. त्यांच्या नावाने त्यांनी प्रकाश आणि मंदा आमटे यांच्या संस्थेला पाच लाख रुपयांची देणगी पण दिली होती. 


"मण्यांची माळ" या पुस्तकात सुनीता बाई नी डोडी च खूप छान वर्णन केलं आहे.

त्यातलाच काही अंश "डोडी खरोखरंच देखणा कुत्रा आहे. काही कुत्री केसाळ असतात. त्यांच्यासारखे डोडीचे केस खूप लांब नाहीत. बेताचेच लांब आहेत. सोनेरी रुपेरी काळसर असं काहीसं रंगाचं सुंदर मिश्रण असलेले केस, चकलीसारखी, सदैव गोल गोल गुंडाळलेली शेपटी, आपल्यातलं कुणी आल की पंख्यासारखी ती चकली हलवत ठेवत आनंद व्यक्त करण्याची व्यक्त करण्याची तह, त्याचं रुसण, सर्व काही मला मोहून टाकतं. रांगत्या मुलाची लाळ गळत असते, तरी आपल्याला ती मुलं अस्वच्छ वाटतं नाहीत, त्यांना उचलून घ्यावं, त्यांचे पापे घ्यावे, असाच काही तरी निरागस भाव त्यांच्या त्या उघड्या तोंडावर असतो. डोडीच्या बाबतीत माझी तशीच गत होते."

-मधुरा कुलकर्णी


‘पुल’कित स्पर्श (संदीप गजानन श्रोत्री)

आम्ही २१ सप्टेंबर १९८४ या दिवशी थंडीत कुडकुडत पण छातीत धडधडत सकाळी सात वाजता पुण्यातील कमला नेहरू पार्क जवळील ‘रुपाली’ अपार्टमेंट मधील एक नंबरच्या फ्लॅट समोर उभे होतो. बेल वाजवली. दरवाजा उघडला तो डॉ. जब्बार पटेल यांनी. तीन खोल्यांचा तो फ्लॅट, आत हॉलमध्ये एका सोफ्यावर जाड काड्यांचा चष्मा आणि शेवाळी-हिरव्या रंगाचा स्वेटर घालून ‘पुल’ अर्थात ‘भाई’ बसले होते, समोर बालभारती संस्थेचे काही अधिकारी बसले होते. थेट मिरजहून सह्याद्री एक्स्प्रेसने आलो, असे समजून सुनिताबाईनी आम्हाला स्वैपाकघरात बोलावले. चहा-पाणी, नाष्टा आमचे तिथेच झाले.

त्या दिवशी लोकसभेसाठी मतदान होते. त्यामुळे पुलंना मतदानासाठी नेण्याची राजकीय कार्यकर्त्यांची धावपळ चालू होती. पुलंची ती बैठक तब्बल चार तास चालली होती. त्यानंतर आम्ही त्यांच्यासमोर बसलो. ‘पुलं’पेक्षा सुनीताबाई आमच्याशी कार्यक्रमाच्या तपशिलाविषयी सांगत होत्या. कार्यक्रम होता, ‘एक आनंदयात्रा कवितेची’. आम्ही दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाचा प्लॅन घेऊन गेलो होतो. त्यांनी सगळी माहिती आमच्याकडून घेतली. कार्यक्रमाचे बारकावे, येणाऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा विचारल्या. आम्हाला काही सूचना केल्या. कार्यक्रम कवितेचा असल्यामुळे ‘लहान मुलांना प्रवेश नाही, प्रत्यक्ष कार्यक्रम सुरु झाल्यावर कोणाला आत किंवा बाहेर ये-जा करता येणार नाही, मुख्य म्हणजे कार्यक्रमाचे तिकीट दहा रुपयांपेक्षा जास्त लावायचे नाही, विलीन्ग्डन कॉलेजच्या मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे’, या त्यापैकी काही प्लॅनवरील अगोदरच केलेल्या लाल फुल्या बघून त्यांनी चौकशी केली. त्या खुर्च्या नगरपालिका, पोलीस आणि कलेक्टर यांच्यासाठी राखीव आहेत असे सांगितल्यानंतर पुलंनी कपाळावर हात मारून घेतला होता आणि म्हणाले, “एखादी सुंदर स्त्री आपल्याकडे पाहताना मध्येच हसली आणि तिचे पुढचे चार दात पडलेले दिसावेत, तसे पडदा उघडला आणि भरगच्च सभागृहात पुढच्या चार-पाच रांगेतील या ‘सरकारी’ रिकाम्या खुर्च्या पहिल्या कि व्यासपीठावरून आम्हाला वाटते”, अशी एक परफेक्ट कॉमेंट केली होती. तब्बल सात तास आम्ही त्यांच्या घरी होतो. शेवटपर्यंत त्यांनी मानधनाचा विषय काढला नाही. शेवटी मीच भीतभीत त्यांना विचारले. त्यावर सुनिताबाईनी ‘तुमचा सगळा खर्च वजा जाता उरलेली रक्कम द्या’, असा धक्कादायक आणि तितकाच आनंददायक बॉम्ब टाकला. आम्हाला त्यांचे मानधन लाखाच्या घरात (१९८४ साली) असते एवढेच माहित होते. त्यामुळे आम्ही चिंतेत होतो, पण झाले उलटेच. मोठ्या आनंदांत आम्ही मिरजला आलो. तारीख ठरली होतीच. कार्यक्रमाचा आणि संपूर्ण दिवसाचाच अक्षरशः ‘मिनिट टू मिनिट’ तपशील काढला. पुल-सुनिताबाईना आणण्यासाठी कोल्हापूरला आदल्या दिवशी आम्ही जाणार होतो. त्याच दिवशी त्यांचा तेथील हाच प्रयोग बघणार होतो. आम्ही त्यांच्यासाठी आमच्या कॉलेजपलीकडील ‘गेस्ट हाउस’ मधील एक ‘सूट’ आरक्षित केला होता. तिथेच सर्वाना रात्रीचे जेवण होते.
 
प्रत्यक्ष कार्यक्रमाची तारीख होती ३१ जानेवारी १९८५, परंतु त्यादिवसाच्या कितीतरी अगोदर आम्ही तयारीला लागलो होतो. सर्वात कटकटीचा आणि डोकेदुखीचा मुद्दा होता तो तिकीट वाटपाचा. तिकिटे विकली जाणे हा मुद्दाच नव्हता. ती कोणाला किती द्यायची हाच खरा प्रश्न होता. प्रत्येक डॉक्टरला जादा पासेस हवे होते. आम्ही प्रत्येकाला जास्तीतजास्त फक्त दोन तिकिटेच द्यायची असा निर्णय घेतला. भाईंच्या सल्ल्याप्रमाणे आम्ही खरेच विलिंग्डन कॉलेजमध्ये गेलो, तिथे प्राचार्यांना भेटून एम.ए.मराठी च्या विद्यार्थ्यांना तिकिटे घ्यायला लावली. शांताबाई किर्लोस्कर, प्रा.दिलीप परदेशी, अंधकवी राम गोसावी, औदुम्बरचे कवी सुधांशू, आदी कितीतरी मान्यवर या कार्यक्रमाला येणार होते. त्यावेळच्या जिल्हाधिकारी सौ.लीना मेहेंदळे, पोलीस अधीक्षक श्री पुरुषोत्तम जाधव हे साहित्यरसिक होतेच. परंतु त्यांनासुद्धा आम्ही जादा तिकिटे देऊ शकलो नाही. माझ्या खोलीवरच सगळी तिकिटे विकली गेली होती. दीनानाथ नाट्यगृहासमोर तीन दिवस अगोदर तिकिटासाठी रांग लागलेली आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. तिकिटे न मिळाल्यामुळे अनेक रसिकांचे शिव्याशाप आम्ही त्या काळी घेतले होते. अनेक ‘व्हीआयपी’चा दबाव आम्ही झुगारून लावला होता. कॉलेजच्या प्राध्यापकांनी सुद्धा आम्हाला आग्रह किंवा आमच्यात ढवळाढवळ केली नाही. डॉ. दयानंद नाईक माझ्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे खंबीर उभे होते. डॉ.दत्ता कुंभार यांच्याकडे छायाचित्रे काढण्याची जबाबदारी होती.
 

कार्यक्रम सुरु होण्याच्या अगोदर एक तास भाई आणि सुनीताबाई दीनानाथ नाट्यगृहात आले. व्यासपीठावर भाई बसले आणि सुनीताबाई त्या नाट्यगृहाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जावून आवाज व्यवस्थित येतो का त्याची खात्री करत होत्या. भाईनी त्यावेळी ‘चपल तुझे चरण जरा’ हि कविता गायली होती. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर फोटो काढायला परवानगी नव्हती. कार्यक्रमाचे रेकोर्डिंग करण्यासाठी कोल्हापूरहून इच्छुक लोक आले होते परंतु भाईनी त्यांना विनम्र नकार दिला होता. प्रचंड गर्दी बाहेरच्या आवारात झाली होती. पोलीस व्यवस्था चोख होती. बाहेर जादा माईकची सोय केली होती. आमच्या कार्यकारिणीतील वर्गमैत्रिणी वर्षा शिराळकर (काणे), किमया शहा, विनिता बहेकर (कुलकर्णी) यांनी फार मोठी जबाबदारी मोठ्या हौसेने पार पाडली होती. नाट्यगृहात उपस्थित असणाऱ्या सर्व स्त्रीवर्गाला गजरे देवून आणि अत्तरदाणी-गुलाबदाणीच्या पाण्याचा शिडकावा करून वातावरण सुगंधी केले होते. कार्यक्रम सुरु झाला त्यावेळी मधु गानू हे भाईंचे मित्र आणि सहाय्यक, मी आणि धनंजय खानोलकर विंगेतच होतो. ध्वनिव्यवस्था श्री आठवले यांच्याकडे होती. कार्यक्रम बरोबर दिड तास चालला. आम्ही मंत्रमुग्ध झालो होतो.

कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर जमलेल्या लोकांना त्यांच्या विनंतीवरून मागील दरवाज्याने पुलंचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी आत सोडले होते आणि पुढील दरवाज्याने आतील लोकांना बाहेर सोडले होते. त्या गर्दीतून भाई माझ्या खांद्यावर हात ठेवून बाहेर गाडीत आले होते. रात्रीचे भोजन म्हणजे तर एक वेगळा समारंभच होता. भाईंच्या आवडीचे मासे गोव्यावरून मागवले होते आणि हेल्थ रेझोर्टचे श्री सामंत या ‘सारस्वतां’कडून बनवून घेतले होते. त्याला भाईनी सुद्धा दाद दिली होती. त्यानंतर ‘फोटोसेशन’ झाला. मानधनाचे पाकीट त्यांच्या हाती देताना त्यांनी ‘किती रुपये आहेत?’, ते न विचारता पुन्हा पुन्हा ‘सर्व खर्च वजा केला का?’ ते विचारले. रात्री अकरा वाजता रेल्वे स्टेशनवर सह्याद्री एक्स्प्रेसच्या पहिल्या वर्गाच्या डब्यामध्ये त्या दोघांना बसविले. पाया पडून त्यांचा आशीर्वाद आणि निरोप घेतला. आणि मिशनच्या चौकात सायकली पळवत आलो ते थेट कुमारच्या टपरीवर शांतपणे चहा प्यायला. एक स्वप्न पूर्ण झाले होते. खरे म्हणजे आजही त्या स्वप्नातून बाहेर यावेसे वाटत नाही.

पुढे भविष्यात ‘पुलं’ची सुद्धा दोन वेळा गाठ पडली, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज भेटले. परंतु मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील त्या दीड वर्षातील त्या आठवणी आजही तशाच लख्ख ताज्या आहेत. अत्तराच्या कुपिमध्ये त्या हृदयात बंद आहेत, केंव्हातरी वाऱ्याची झुळूक येते, ती कुपी थोडीशी उघडली जाते. आतील पुलकित आठवणीरुपी अत्तराच्या सुगंधी वासाने तन आणि मन धुंद होते. ओठावर ‘गदिमां’ची मला अत्यंत आवडती ओळ येते,


“लुटुनी नेसी काय काळा, सौख्य माझे मागले, भोगले ते भोगले”.
 
- डॉ. संदीप गजानन श्रोत्री, एम.एस.