Tuesday, September 28, 2021

'मुली, औक्षवंत हो' ! '

'राज्य सुखी या साधुमुळे
शूरा मी वंदिले'


'राज्य सुखी या साधु'मुळे नंतरच्या शूरामधल्या 'रा' ह्या अक्षरावर सभागृहातून विजेच्या वेगाने आणि विजेच्या लखलखाटाने एखादा तीर सूं-सूं करीत जावा तशी त्या चिमुकल्या गळ्यातून तान गेली आणि सभेचा लक्ष्यवेध झाला. त्या नऊदहा वर्षांच्या चिमण्या जीवाला आपण काय केले ह्याची कल्पना तरी होती की नाही, देव जाणे! सगळ्या पॅलेस थिएटरचे भान त्या सुरांबरोबर हरपले. एक एवढीशी हडकुळी, पण अंतर्बाह्य आत्मविश्वास फुललेली मुलगी रंगभूमीवर येते, आणि फार फार तर 'घेऊन ये पंखा' म्हणायच्या वयात एकदम 'शूरा मी वंदिले' सुरू करते काय!

बाबालाल तबलजी एखाद्या अनुभवी गायकाबरोबर धरावा तसला जबऱ्या दिमाखाचा ठेका काय धरतात आणि पदाची अस्ताई संपवून पहिल्या समेला येताना ही पोरगी पुरे सप्तक भेदून लयीचा तो बिकट बोजा संभाळून समेवर येते काय!

कोल्हापूरच्या त्या पॅलेस थिएटरात संगीतातल्या दिग्गजांनी ज्या रंगमंचावरून सुरांच्या बरसातीचे साक्षात्कार घडविले आहेत, त्याच स्थानावरून एका परकऱ्या पोरीने हे नवल वर्तविले होते. आश्चर्य, आनंद आणि त्या पोरीच्या कर्तबगार पित्याची आठवण असल्या नानाविध भावनांनी त्या रंगमंदिरातील श्रोत्यांच्या अंगावर रोमांच फुलले. कडकडून टाळी झाली नुसती पहिल्या समेला. मी मी म्हणणाऱ्यांनी स्वत:ला चिमटा घेऊन पाहिले असेल, की आपण हे ऐकतो आहो ते खरेच आहे की स्वप्न आहे? त्या तानेचा दाणान्‌दाणा स्वच्छ होता, त्या सुरात भिजलेला होता. लयीच्या कणाकणाचा अंदाज बिनचूक होता. समेवरची झडप तर अशी घारीसारखी होती की समोरचे ते एवढेसे परकर-पोलक्यातील दर्शन नसते तर एखाद्याला वाटले असते की कुणी तपातपाची मेहनत झालेली बुजुर्ग बाई केवळ चूष म्हणून बालआ‌वाजीत पलटा घेऊन गेली.

यापूर्वी फक्त कुमार गंधर्वांनी वयाच्या नवव्या वर्षी मुंबईच्या जिना हॉलमध्ये असला धक्का दिला होता. बालगंधर्वांनी आणखी काही वर्षांपूर्वी अशाच बालवयात रंगभूमीवर येऊन असंख्य अंत:करणे आपल्या सुरांनी झेलली होती. आणि आता हा एक नवा चमत्कार घडत होता. बालगंधर्व, कुमारगंधर्व आणि लता मंगेशकर - तिघांनी संगीतातल्या तीन निरनिराळ्या वाटा धरल्या आणि असामान्यत्वाने उजळून ठेवल्या.

संगीताच्या क्षेत्रात परंपरेचे स्थान मोठे मानले जाते. कलावंत मंडळी आपापल्या कुळाचा आणि गोत्राचा फार मोठा अभिमान बाळगीत असतात. कित्येकदा तर काही जण त्या गोत्राच्याच मोठेपणावर नांदू पाहतात. पण सूर आणि लय ह्यांनाच शंकर-पार्वती मानून गाणारे फार थोडे कलावंत मी पाहिले. 'झरा मूळचाचि खरा' म्हणजे काय ते ह्या कलावंताचे गाणे ऐकताना कळते - मग ते 'मम सुखाची ठेव' असो, 'म्हारो जी भूलो ना माने' किंवा 'आयेगा आनेवाला' असो. चिमुकली लता 'शूरा मी वंदिले' म्हणून गेली, त्याला पंचवीस तीस वर्षे झाली.

दीनानाथांचे सूर हवेतून विरले नव्हते. त्यांची धैर्यधराच्या भूमिकेतली ती गाणी, चमत्कृतींनी नटलेल्या गळ्यातून आलेल्या त्या जागा लोकांच्या कानांत होत्या. त्यामुळे 'शूरा मी वंदिले' ऐकल्यावर लोक म्हणाले, 'वा! दीनानाथांची आठवण झाली!'

त्यानंतर मात्र ह्या त्यांच्या लाडक्या कन्येने वडिलांचेच व्रत चालवले. वडिलांची नक्कल करण्याचे नव्हे. ते त्या मानी गायकालाही रुचले नसते. त्याने तर मराठी रंगभूमीवर स्वत:ची गायकी निर्माण केली होती. दीनानाथराव दीनानाथरावांसारखेच गात होते. त्यांच्या मुलीने हेच व्रत पुढे चालवले. त्यानंतर लता ही लतासारखीच गात आली. ह्या काळात अनेक नवीन गायिका चित्रपटांतील गाणी म्हणण्यासाठी आल्या. त्यांची धडपड 'डिट्टो लता' व्हायची होती. त्यांतल्या कुणी 'लताची आठवण करून देतात,' अशीही तारीफ झाली असेल. पण संगीताच्याच काय, कुठल्याही कलेच्या क्षेत्रात अमक्याअमक्याची आठवण करून देणारा कलावंत सदैव दुय्यम दर्जाचा मानकरी होऊन राहतो. लताने गेल्या पंचवीस वर्षांत गझल, दादरे, ठुमऱ्या आणि हजारो विविध चालींवर नटलेली गाणी म्हटली, पण त्यांत तिने आठवण फक्त लताचीच करून दिली. कलावंत 'या सम हा' होतो तो असा!


लयीच्या आणि सुरांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म कणांनी जेव्हा चैतन्य धारण केलेले असते, त्या वेळी त्या गाण्याची कोणी जातवारी पाहत नसतात. उगीचच भयंकर धीमा एकताल लावून दहा मात्रांपर्यंत सुरांच्या माश्या हाकलीत जायचे आणि मग झोपेतून जाग आल्यासारखे शेवटच्या एकदोन मात्रांवरून उडी मारून समेच्या नाक्यावरची जकात चुकवायची आणि ख्यालगायक म्हणून मोठेपणा मिरवायचा, ह्याला काही अर्थ नाही. संगीतात लयीतला प्रत्येक क्षण हा सुरांच्या मजकुराने भरून काढावा लागतो नव्हे, तिथला सुरांचा अभाव असलेला विराम हादेखील बोलका असावा लागतो. चित्रपटासाठी गायिलेल्या साडेतीन मिनिटांच्या गाण्यातदेखिल चांगल्या ख्यालगायिकी इतकीच लयकारीची जाणीव असावी लागते.

लताचा सूर सारेच मानतात, पण निर्मळ मनाने सर्व तऱ्हेच्या संगीताचा आस्वाद घेणाऱ्यांना मंत्रमुग्ध करणारी जर कुठली गोष्ट असेल, तर शब्दांची फेक करताना दिसणारी लताची विलक्षण मोठी अशी लयकारीची जाणीव. तिच्या सुरांइतकीच सूक्ष्म. ढोबळ लयकारी नव्हे. एखाद्या फुलपाखरांच्या पावलांनी लयीच्या एका कणावरून दुसऱ्या कणावर अलगद उडणारी. कुमार, बालगंधर्व आणि लता ह्यांना वरदान आहे ते लयकारीच्या ह्या अलौकिक जाणकारीचे! गाण्यात बोलत असते ती लय; आणि म्हणूनच लयीच्या जाणिवेचे दुर्मिळ दान घेऊन आलेल्या ह्या कलावंतांनी गायिलेले गाणे दुसऱ्या कुणीही म्हटले, की काही तरी कमी आहे, असे वाटते. लताची गाणी तर खूप चांगला आवाज असलेल्या किती तरी मुली गातात, आवाजाची टीप गाठतात. पण मूळ चित्र आणि त्याची प्रिंट ह्यात असतो, तसा फरक दिसतो. ह्याचे कारण लयीच्या सूक्ष्मतेच्या जाणिवेचा अभाव. सुरांच्या वर्त‌ुळातला मध्यबिंदू पकडणारा आणि लयकारीत वाहत्या काळातला निमिषा-निमिषातला लक्षांश पकडणारा असा हा लताचा गळा आहे. आणि म्हणूनच तिच्या गीतातले शब्दच नव्हे, तर व्यंजनमुक्त स्वरही किती आशयगर्भ वाटतात. लता 'धीरेसे आ जा' म्हणून लोरी गाते, पण 'आ जा'नंतरचा तो स्वरांचा हलकासा शिडकावा लयीच्या असा जागेवरून उठतो, की त्याने कसल्या तरी परतत्त्वाचा स्पर्श केल्यासारखा वाटतो. ह्या साऱ्या आठवणी कमालीच्या मुष्किल आहेत. केवळ स्वरांच्या करामतीमुळे नव्हे; उठावासाठी पकडलेल्या, साध्या नजरेला न दिसणाऱ्या स्थानांमुळे. लताच्या गाण्यातले असामान्यत्व मला तरी भासते ते इथे. झोप उडवणाऱ्या त्या अंगाईगीतातल्या स्वरांच्या शिडकाव्यासारखे किती तरी शिडकावे आज तिने गायलेल्या शेकडो तबकड्यांच्या रंध्रारंध्रातून लपलेले आहेत. तबकडीच्या त्या रंध्रात शिरून तिला गाती करणाऱ्या त्या सुईचे अग्र अधिक सूक्ष्म की त्या रंध्रातून उमटणारा लताचा सूर अधिक सूक्ष्म, हे सांगणे कठीण आहे.


होनाजीच्या भूपाळीतल्या 'आनंदकंदा प्रभात झाली'मध्ये वरच्या षड्जावर 'ई'कार लागला आहे तो असाच सुराची सुई घुसल्यासारखा. 'जा जा जा रे जा सजना'मध्ये अशीच एक जागा आहे. 'कैसे दिन बीते कैसी बीती रतियाँ'मध्ये 'हाये'‌वर अशीच एक सुरांची पखरण आहे. अशी किती म्हणून उदाहरणे दाखवायची! माडगूळकरांच्या 'जोगिया' कवितेतल्या नायिकेच्या गळ्यातून सूर उमटल्याचे वर्णन त्यांनी 'स्वरवेल थरथरे फूल उमलले ओठी' असे केले आहे. लताचे कुठलेही गीत ऐकताना मला ही ओळ आठवते. तिने गायिलेले प्रत्येक गीत हे स्वरलतेवरचे फूलच आहे. अशी शेकडो फुले गेल्या पंचवीस वर्षांत फुलली, आणि किती सहजसहज फुलल्यासारखी फुलली. शब्द, सूर आणि लय ह्यांचे विलक्षण आकार, गंध आणि रंग घेऊन प्रकटलेल्या फुलांचे हे नंदनवन आहे.

मला नेहमी वाटते की, मुंबईसारख्या शहरात एक संगीताचे टोलेजंग म्युझियम असावे. चित्रकलेचे किंवा इतर वस्तूंचे असते तसे. त्यात टेप्सवरून किंवा तबकड्यांवरून देशोदेशींचे आणि सर्व प्रकारचे संगीत ध्वनिमुद्रित करून ज्याला जे ऐकावेसे वाटेल ते ऐकण्यासाठी छोटी छोटी दालने करावीत. हे सारे गायक, गायिका दिसत कसे होते, बोलत कसे होते, राहत कसे होते, हे दाखवणारी चित्रे आणि डॉक्युमेंटरीज कराव्यात. देशोदेशीच्या संगीताच्या इतिहासांच्या, शास्त्रांची, कलावंतांच्या चरित्रांची तिथे मोठी लायब्ररी करावी. पुस्तकांची लायब्ररी, तबकड्यांची लायब्ररी, टेप्सची, डॉक्युमेंटरीजची लायब्ररी. सूर-लयीच्या तृषार्तांनी यावे आणि तृप्त होऊन जावे. त्या लायब्ररीत एक पडवी फक्त लताच्या गीतांची होईल. इतक्या विविध प्रकारची गाणी गायलेली दुसरी गायिका माझ्या तरी माहितीत नाही. आज पंचवीस वर्षे अहोरात्र ह्या अलौकिक सुरांची उधळण चालू आहे. आमची पहाट लताच्या सुरांबरोबर उमलते. मध्यान्ह, सांज, रात्र, मध्यरात्र ह्याच सुरांची साथ घेऊन येतात. वातावरणात कुठे ना कुठे तरी लताचा स्वर मावळत्या किंवा उगवत्या सूर्य-चंद्राच्या साक्षीने विहरत असतो. रेडियोतल्या एका इंजिनीअरने मला सांगितले, की साऱ्या जगात दुसऱ्या कुठल्याही गायक-गायिकेच्या स्वराला वायुमंडलातल्या ध्वनिलहरींवरून इतका अव्याहत संचार करायचे भाग्य लाभलेले नाही. मला त्या विधानात अजिबात अतिशयोक्ती वाटत नाही. लताच्या सुरांची कधी, कुठे आणि कशी गाठ पडेल, कुणी सांगावे! अनिलांच्या कवितेतील एक ओळ आहे -

'आज अचानक गाठ पडे, भलत्या वेळी भलत्या मेळी, असता मन भलतीचकडे'

किती तरी प्रसंग आठवतात. भारतापासून शेकडो मैल दूर अशा इंडोनेशियातून प्रवास करीत होतो. दंडकारण्यात जनस्थानासारख्या वस्तीत, ज्यांना आमच्या भाषेचा आणि आमच्या संगीताचा कुठलाही संस्कार नाही, असा इंडोनेशियन ग्रामवासीयांचा मेळावा फोनो लावून लताची गाणी ऐकत बसला होता. चिनी आक्रमणाच्या काळात हिमालयाच्या शिखरावर एका छावणीतल्या तंबूतली गोष्ट : लडाखच्या यात्रेत असताना आम्ही तिथे जाऊन पोचलो होतो. आठदहा सैनिकांच्या चिमुकल्या तुकडीला त्या जीवघेण्या थंडीत आणि त्या थंडीहून अधिक गारठून टाकणाऱ्या विजनवासातल्या भयाण एकांतात सोबत होती ट्रँझिस्टरवरच्या लताच्या गीतांची. सैनिकाच्या कुरबानीची याद करा, अशी लताच्या आवाजातील ती आर्त हाक लक्षलक्ष डोळ्यांच्या कडा भिजवून गेली. पण हिमशिखरावर लताचा आवाज ऐकताना तन्मय झालेल्या त्या जवानांच्या तुकडीकडे पाहून वाटले, की जवानांच्या कुरबानीइतकीच ह्या अलौकिक आवाजाची जगावर केवढी मोठी मेहरबानी आहे! इंडोनेशियातले ते ग्रामवासी किंवा हिमालयावरचे आमचे जवान ही तर साधी माणसे; गायनशास्त्रातील कोणी पंडित नव्हेत. पण अल्लादियाखाँसाहेबांचे चिरंजीव भुर्जीखाँ म्हणजे शास्त्रीय संगीतातले केव्हढे विद्वान गृहस्थ! मी त्यांना भेटायला गेलो होतो, त्या वेळी लताच्या गाण्याची तबकडी ऐकण्यात ते रंगले होते. 'आयेगा आनेवाला' ऐकून कुमार गंधर्व म्हणाले, 'तंबोऱ्यातून निघणारा गंधार ऐकायचा असेल तर लताच्या गळ्यातून ऐका.' आडगावच्या गावढ्या मंडळींच्या अड्ड्यापासून ते मलबार हिलच्या बंगल्यात राहणाऱ्यांपर्यंत आणि शाळकरी पोरांपासून ते जख्ख म्हाताऱ्यांपर्यंत साऱ्यांनाच आपल्या स्वरांच्या जादूने भारून टाकणारी ही लता - लता कसली, चित्रपटसृष्टीला लाभलेली ही कल्पलताच आहे. सुरांच्या याचकाने जे मागावे ते देणारी. गझल, ठुमरी, दादरा, कवाली, भजन, पाळणे, लोकगीते, भावगीते, बालगीते, खानदानी संगीताच्या वळणाची गाणी... मागणाऱ्याने मागत जावे. असली विविधता आणि तीसुद्धा दर्जाने दिसणारी, भारतीय संगीतात यापूर्वी कोणाच्याही गळ्यातून आलेली नसेल!


हल्ली इलेक्ट्रॉनिक्सच्या साहाय्याने कम्प्युटर म्हणतात त्या यंत्रावर वैज्ञानिकांनी अनेक चमत्कार करून दाखवायला सुरुवात केली आहे. मानवी मेंदूला न साधणारे अनेक बौद्धिक पराक्रम ही यंत्रे करतात. उदाहरणार्थ, जे हिशेब करायला पंचवीस कारकुनांना एक महिना लागेल, ते ही यंत्रे काही सेकंदात करतात. लता हा संगीतातल्या देवाच्या दुनियेतून आलेला कम्प्युटरच आहे. गळ्यातून एक जागा निघावी, म्हणून एकेका गायकगायिकेने जिथे मेहनतीचे पहाड फोडले, त्या बिकट जागा, त्या ताना, त्या मुरक्या, लयकारीचे ते सूक्ष्म भेद हे सारे ती सहज करून जाते. शास्त्रीय संगीतातले जातकुळी असलेले एखादे सिनमातले गाणे असते. लताची त्या गीतातली तान ऐशी गेलेली असते, की मी मी म्हणणाऱ्या उस्तादांनी आणि पंडितांनी, मनाचा तितका प्राजंळपणा असला तर, स्वत:चे कान पकडावे. मला खात्री आहे, की उद्या एखाद्या पाश्चात्य संगीत दिग्दर्शकाने लताला जर इंग्लिश गाणे गायला बोलावले, तर ह्या बाई तिकडल्या तमाम गाणाऱ्या मडमांना संकटात टाकतील. लताच्या सुराला 'अटक गमे जेथ दु:सहा' अशीच जिद्द आहे. देवटाक्याच्या पाण्यासारखा हा गळा. रंग टाकणाऱ्याने आपल्या रंगाच्या निवडीची कमाल करावी. हा गळा त्या रंगांची स्वरपुष्पे क्षणात फुलवून दाखवतो. हा स्वरच मुळी परिसाचा धर्म घेऊन आलेला. त्या स्वरांचा स्पर्श झाला की कशाचेही सोनेच व्हायचे. नुसता स्वरच काय, अभिनयाची जाणकारीही फार मोठी. चित्रपटातील गाणे हे संवादासारखे अभिनीत करायचे असते. मला तर लताला प्लेबॅक आर्टिस्ट का म्हणतात, तेच कळत नाही. तिच्या गाण्यांना त्या नट्यांच्या अभिनयाचा प्लेबॅक असतो. बहुदा तो तिच्या शब्दस्वरांतून उमटलेल्या भावनांच्या उंचीला पोहोचत नाही. 'धूल का फूल' नावाच्या बोलपटातील 'तू मेरे प्यार का फूल है' हे गाणे लताने म्हटले आहे. एका बेवारशी गणल्या जाणाऱ्या अर्भकाची आई हे गीत गात आहे. अभिनय आणि संगीत ह्या दोन्ही दृष्टींनी या गीताचा अभ्यास करावा. लताने त्या गीतातला एकेक शब्द लयीच्या प्रवाहाबरोबर फुलाची एकेक पाकळी सोडावी तसा सोडला आहे. तिने म्हटलेल्या गीतांना, कित्येकदा पडद्यावरच्या नटीच्या ओठांची, स्वत:च्या चेहऱ्याची घडी विस्कटू न देता सुरू झालेली निर्जीव हालचाल पाहिली की वाटते, लताच्या गाण्याच्या वेळी ह्या पडद्यावरच्या नट्यांना पडद्याआडच ठेवावे आणि त्या गीताच्या वेळी कॅमेरा केवळ चंद्र, सूर्य, तारे, पाने, फुले, पाणी, नद्या, डोंगर अशा दृशांच्या दिशेला फिरवावा. आपल्या स्वरांनी आणि स्वरांइतक्याच रेखीव अभिनयाने फुललेल्या गीतांनी लता अशी जादूनगरी उभी करते. तीत कित्येकदा त्या नट्यांच्या ओठांची निष्प्राण हालचाल लताच्या सुरांना दिलेल्या वरवरच्या 'लिप सिम्पथी'सारखी खोटी वाटते. म्हणून मला वाटते, की लता कसली पार्श्वगायिका! तिच्या गीताच्या अभिव्यक्तीतून होणाऱ्या भावनांच्या पातळीला न पोहोचणाऱ्या नट्या या पार्श्वनायिका आहेत.

हिंदी चित्रपट हा काही माझ्या फारशा सलोख्याचा विषय नाही. पण अनेक तारे आणि तारकांनी चमचमणाऱ्या ह्या अंगणातून उद्या लता आणि आशा या भगिनींनी 'आम्हाला वगळा' म्हटले, तर ही तारांगणे एका क्षणात हत:प्रभ होतील! सिलोन रेडिओचा व्यापार विभाग डळमळायला लागेल आणि आमची आकाशवाणी केविलवाणी होऊन जाईल. हिंदी चित्रपटांची दुनिया तर तिथल्या संगीत दिग्दर्शकांनी आणि मुख्यत: लताच्या आवाजाने तगवून धरली आहे. हे म्हणजे मिलिटरीच्या बँडवाल्यांनी एकाद्या राष्ट्राचे संरक्षण केल्यापैकीच आहे. संगीत दिग्दर्शकांच्या भाग्याने लता नावाचा एक चमत्कार हिंदी चित्रपटसृष्टीत आला. या सृष्टीची ती आज गेले पाव शतक अनभिज्ञ सम्राज्ञी आहे. कपिलाषष्ठीच्या योगासारखा तिच्या सार्वजनिक दर्शनाचा योग असतो. कुठले प्रीमियर, कुठली ज्युबिली असल्या प्रसिद्धीच्या नाना आकर्षणापासून ती दूर असते. बाकी राणीला मिरवावे कुठे लागते? मिरवतात दासी. गेल्या पंचवीस वर्षांत तिच्या स्वरांचे हजारो-लाखो अंत:करणांवर अधिराज्य चालू आहे. संगीत दिग्दर्शक नवा असो, जुना असो लता एकदा मायक्रोफोन पुढे आली की सुराना प्राणांचा स्पर्श झाल्याचा साक्षात्कार घडवते आणि त्या बाजारातून नाहीशी होते. पंचवीस वर्षे हा गळा गातो आहे.

तिच्या तीर्थरूपांनी मराठी रंगभूमीवर आपल्या गाण्याने मी मी म्हणवणाऱ्यांना बुचकळ्यात पाडले होते. माझ्या आयुष्याच्या ताळेबंदीत जमेच्या बाजूला जे महान क्षण आहेत, त्यातले किती तरी दीनानाथरावांच्या गाण्यांनी उजळलेले आहेत. सावरकरांसारख्या उत्तुंग प्रतिभावंताने केलेल्या गाण्याची दीनानाथरावांच्या अश्वमेधाच्या घोड्यासारख्या विजिगीषु गळ्यातून निघालेली फेक आजही माझ्या डोळ्यापुढे चमकून जाते. त्यांची ती विजेच्या चपळाईने आणि तितक्याच बेगुमानपणाने जाणारी तान आठवली की आजही जीव अस्वस्थ होतो. जीवाला बैचेन करणारे ते गाणे - अस्वस्थ करणारे. गुंगी आणणारे नव्हे. दीनानाथांच्या कलेचे राज्य त्या काळातल्या आणि व्यवसायाच्या परिस्थितीमुळे मर्यादित राहिले. त्यांच्या या लाडक्या लेकीने त्या राज्याच्या सीमा अमर्याद वाढवल्या. गुणी गायक, वादकांच्या सुरांचे हे ऋण कसे फेडायचे! लताच्या शेकडो स्वरांची ही सुखाची ठेव कुठे ठेवायची? ती स्मृतीवरी लिहावी आणि ते ऋण इथेच ठेवून जायचे! पाव शतकभर साठत आलेले हे ऋण. ऋणकोने धनकोबद्दल एकच भावना ठेवावी; ती म्हणजे धनको सदैव अधिकाधिक धनवान होत जावा हीच.

आमच्या सुरांच्या मागण्याला अंत नाही. आम्ही याबाबतीत सदाचेच भिकारी. सदैव मागतच राहणार. तुकाबाने विठ्ठलाशी मागणे मागताना 'पोटापुरते देई विठ्ठला, मागणे लई नाही, लई नाही' म्हणून सांगितले. पोटापुरते देणाऱ्या विठ्ठलाला देताना कळले असेल की तुकोबाच्या पोटाची भूक कधीच भागणारी नव्हती. लताने कोट्यवधी अंत:करणाच्या सुरांची भूक भागवता भागवता वाढवली आहे. हे स्वरभांडार तिच्या जीवात कोणी मोकळे करून ठेवले काय सांगावे! मी वाडवडिलांचे आशीर्वाद मानणाऱ्यांतला आहे. मला वाटते, दीनानाथांनीच ही मर्मबंधातील ठेव आपल्या मुलामुलींना सांभाळायला दिली. आळंदीच्या विठ्ठलपंताची लेकरे जशी दुधाचे दात पडण्यापूर्वीच विश्वात्मक देवाच्या वाग्यज्ञाची सामग्री गोळा करायला लागली, तशी मंगेशीच्या दीनानाथाची ही मुले हातभर उंचीची असल्यापासून स्वरयज्ञाच्या तयारीला लागली. लताकडे दिदीपण आले. तिने हे वाण आपल्या हाती घेतले आणि अष्टदिशांना सूर पसरला. चित्रपटाच्या मयसृष्टीत कालचे हिरे आज दगडाच्या मोलाने दुर्लक्षिले जातात, तिथे आज लता पंचवीस वर्षे आपले स्थान टिकवून आहे. त्या सृष्टीत राहूनही ती एका विलक्षण अलिप्तपणाने जगत असते. आपल्या स्वराने सर्वांच्यात आहे आणि आपण मात्र कुणाच्यातही नाही. दिवसातून किती तरी वेळा आकाशवाणीवरून तिच्या नावाचा पुकारा होतो. आपल्या साऱ्या जीविताचे स्वरमय अलगुज करणारी ही कलावती. तिच्या गाण्याला कुठलीही फूटपट्टी लावून ती मोजता येत नाही. त्या साडेतीन मिनिटांच्या कालावधीत तिच्या गळ्यातून निघालेल्या प्रत्येक सुराला अंतिमत्व आहे. ताजमहालाच्या स्थापत्यात जशी सुधारणा सुचवता येत नाही, किंवा चांदण्यांची शोभा वाढवायला त्या चांदण्यात आणखी काही दुरुस्ती घडवावी असे वाटत नाही, तसे त्या स्वराला 'तत्‌ त्वम् असि' असे म्हणावे लागते. सुरांचा मर्मबंध गवसलेला हा गळा आहे. सूक्ष्म लयतत्त्व पाहणारी ही नजर आहे. लताची पंचवीस वर्षांपूर्वीची तबकडी काय आणि आजची काय, त्याच चैतन्याने उजळलेला तो सूर. त्याला कोमेजणे ठाऊक नाही आणि त्याची नक्कलही होऊ शकत नाही.

असली ही गुणी मुलगी आणि तिची गुणी भावंडे. कोल्हापूरच्या पॅलेस थिएटर जवळ चिमुकल्या घरट्यात राहत होती, तेव्हापासून आजतागायत आपल्या गात्या गळ्याने सुरांचे जग जिंकत चाललेली पाहत आलो आहे. ह्या गळ्यांना कधीही थकवा न येवो. आणखी खूप वर्षे हे गळे असेच गात राहोत. ज्ञानदेवांच्या दारी सोन्याचा पिंपळ होता. या भावडांच्या दारी सुरांचा पिंपळ आहे. आज त्या पिंपळाच्या पानापानाइतकी गीते गाऊन ह्या भावडांनी शेकडो अंत:करणे तृप्त केली आहेत.
संगीतातले ढुद्धाचार्य सिनेमा संगीताला नाके मुरडीत असतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे ही मंडळी आपले कान चारी दिशांतून येणाऱ्या सुरांसाठी उघडेच ठेवत नाहीत. वास्तविक सिनेमासंगीत हे आजचे लोकसंगीत आहे. लता मंगेशकर ही आमची खरी 'नॅशनल आर्टिस्ट' आहे -- राष्ट्रगायिका आहे.

नॅशनल प्रोग्रॅममधे गायले म्हणजे नॅशनल आर्टिस्ट होत नसतो. त्याला आकाशवाणीच्या स्टुडिओत घर करून चालत नाही. देशातल्या लोकांच्या अंतःकरणात घर करावे लागते. ते भाग्य लताइतके दुसऱ्या कुठल्याही गायकाला किंवा गायिकेला लाभलेले नाही. आज पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रविड, उत्कल, बंग जर कुणी एकत्र बांधून ठेवला असेल, तर लताच्या सुरांनी. निसर्गदत्त किंवा संकुचित मनाने ज्यांना बहिरेपणा आलेला आहे असे जर काही अभागी वगळले, तर ह्या सुरांनी आकृष्ट न होणारा ह्या देशात कुणी असेल, असे मला तरी वाटत नाही.

सिनेमातले गाणे अल्पजीवी म्हणू हेटाळू नये. ते गाणाऱ्यांची आणि ती गीते लिहिणाऱ्या प्रतिभावान गीतकारांची उपेक्षा होता कामा नये. ते तसे करायचे असेल तर वेलीवर फुलणाऱ्या जाईजुईलाही तुच्छ मानावे लागेल. चित्रपटसंगीतात तबकडीवरची ही तीन-साडेतीन मिनिटे सुरांच्या खजिन्यातून नवीनवी रत्ने काढून साजरी करणे हे सोपे नाही. त्या कालावधीतली प्रत्येक सेकंदाची पोकळी फारफार चतुराईने भरावी लागते. या साडेतीन मिनिटांच्या कालावधीत तिच्या गळ्यातून निघालेल्या प्रत्येक सुराला अंतिमत्व आहे. ताजमहालाच्या स्थापत्यात जशी सुधारणा सुचवता येत नाही, किंवा चांदण्याची शोभा वाढवायला त्या चांदण्यात आणखी काही दुरुस्ती घडवावी असे वाटत नाही, तसे त्या स्वराला 'तत् तत्वम असि' असे म्हणावे लागते. सुरांचा मर्मबंध गवसलेला हा गळा आहे. सूक्ष्म लयतत्व पाहणारी ही नजर आहे. लताची पंचवीस वर्षांपूर्वीची तबकडी काय आणि आजची काय, त्याच चैतन्याने उजळलेला तो सूर. त्याला कोमेजणे ठाऊक नाही आणि त्याची नक्कलही होऊ शकत नाही.

बहुधा गाणे न कळणारे उच्चभ्रु रसिक "आपण शास्त्रीय संगीताखेरीज दुसरं काही ऐकत नाही," वगैरे सांगत असतात. हे म्हणजे स्वतःला फुलांचा षौकीन म्हणवणाऱ्याने आपण फक्त भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेले कमळ तेवढे मानतो, इतर जाईजुई वगैरे हलकी (!) फुले मानीत नाही, म्हणण्यापैकी आहे. ही माणसे चुकून सुरांच्या राज्यात शिरली आहेत.भारतीय चित्रपट संगीतदिग्दर्शकांनी स्वररचनेचे फार कौतुकास्पद चातुर्य दाखवले आहे. आणि सच्चा सच्चा सूर दाखवायला तिथे लताचा आवाज आहे. सुरांचा आणखी सुंदर संस्कार कुठला हवा?

लताच्या सुरांनी जिंकलेले हे केवढे मोठे साम्राज्य आहे! ह्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही. सकाळ उजाडते. घरोघरीचे रेडिओ लागतात. एखाद्या रेडिओवरून बातम्या ऐकू येत असतात; युद्धाच्या, जाळपोळीच्या, सत्तेच्या उलथापालथीचा, मन विषण्ण करणाऱ्या, जगणे म्हणजे हेच का शेवटी हा प्रश्न उभा करणाऱ्या -- आणि अंधारातून प्रकाशरेखा जावी, तसा एकदम लताचा सूर तीरासारखा घुसतो आणि मनाची काळोखी नष्ट करतो. काही नसले तरी हे सूर ऐकायला तरी जगले पाहिले, असे वाटायला लागते. अतिपरिचयानेदेखील अवज्ञा झाली नाही, अशी एकच गोष्ट म्हणे लताचे सूर ! ते सूर कानी पडले की, मनावर शिल्पासारखा कोरलेला तो प्रसंग डोळ्यापुढे उभा राहतो.


"शूरा मी वंदिले" म्हणणारे परकर-पोलक्यातले लताचे चिमुकले ध्यान दिसायला लागते. मनात म्हणतो, ह्या मुलीला कल्पनाही नसेल की, ह्या "शूरा मी वंदिले" ऐकताना कोल्हापूरच्या त्या पॅलेस थिएटरातल्या अनेकांनी मनात म्हटले असेल की, ह्या असल्या अलौकिक 'सूरा मी वंदिले'. सुरांची चैतन्यफुले फुलविणाऱ्या लतेला, वयापेक्षा कुठलीही वडिलकी नसणाऱ्या माझ्यासारख्याने अंतःकरणापासून एकच आशीर्वाद द्यायचा की, "मुली, अशी ही दाद तुला अखंड मिळो -- औक्षवंत हो !"

(गुण गाईन आवडी)
पु.ल. देशपांडे
७ फेब्रुवारी २०२२
महाराष्ट्र टाइम्स 

Friday, September 24, 2021

चला, अजुन एक पुतळा उभारूया - प्रशांत असलेकर

फार जुनी नव्हे, जेमतेम वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. एक चालता बोलता पुरूषोत्तम या महाराष्ट्राच्या भूमीवर वावरत होता. थकला होता. भागला होता. विकलांग झाला होता. पार्कीन्सनने विद्ध होऊन शरपंजरी पडला होता. गुडघेदुखीने बेजार झाला होता पण त्याने कुणापुढेही गुडघे टेकवले नव्हते. अगदी राज्यकर्त्यांकडून सर्वोच्च मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारतानाही मनगटशाहीविरुध्द बोलण्याची धमक तो राखून होता. भले स्वत:चं भाषण स्वत: वाचून दाखवण्याची ताकद त्याच्यात उरली नव्हती तरीही. पण तो होता !! तेच सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्याचं नुसतं अस्तित्वच समाजमानाला प्रेरित करत होतं. प्रफुल्लित करत होतं. कुठं तरी ‘बिग ब्रदर इज वाचिंग ची भावना सगळ्यांच्या मनात होती. अभिरुचीची पातळी एका मर्यादेखाली घसरली नव्हती. वागणं आणि बोलणं यात काही किमान सुसंगती होती. विनोदाला बाष्कळपणाचं स्वरुप आलेलं नव्हतं. जात-पात बघून कुणाबद्दलचं मत निश्चित केलं जात नव्हतं. महापुरूषांची जात बघितली जात नव्हती. पंढरीच्या विठोबापेक्षा त्याला ‘सर्दाळू ’ वारकरी अधिक प्रिय होता. वृत्तीने समाजवादी असूनही सनातन भारतीय परंपरेबद्दल त्याला आदर होता. कर्मकांडाचा निषेध आणि भाविकतेप्रती श्रध्दा या दोन्ही मर्यादा त्याने कसोशीने आणि लिलया पाळल्या होत्या. त्याच्या अस्तित्वामुळेच असेल कदाचित पण अध्यात्माची दुकानं एवढी जोरात चालू झाली नव्हती. सनातन भारतीय तत्त्वज्ञान आपल्या पुडीत बाधून, आपलं लेबल लावून विकणारे वाणी गल्लीबोळात बोकाळले नव्हते.

तो एक अफाट आयुष्य जगला. त्याच्या कर्मक्षेत्रांची आणि त्यांच्यात त्याने गाजवलेल्या कर्तृत्वाची नुसती यादी आठवली तरी आम्हाला धाप लागते. एकच माणुस एवढी क्षेत्रे गाजवू शकतो यावर विश्वास बसत नाही. त्याने अनुवाद केले. विदेशी कलाकृतींना देशीकार लेणी चढवली. परक्या संस्कृतीतल्या माणसांमधलं माणूसपण हेरून त्यांना अस्सल भारतीय रुपडं चढवून पेश केलं. त्याच्या तोंडची भाषाही आमचीच. ‘गुरं राखणाऱ्याच्या हाती दंडुका असायाच पायजी ‘ , अशी रांगडी. त्याने प्रवासवर्णने लिहीली. तपशिलाच्या जंत्रीपेक्षा त्याने स्थलकाल निरपेक्ष मानव्य शोधलं. म्हणूनच जकार्ताचा सूर्यास्त दाखवणारे विधूर मणिभाई, प्रत्येक देशात दत्तक मुलगा असूनही माया-ममता शोधणारा दारुडा इंग्रज बाप, कण्वमुनीसारखा आपल्या विद्यार्थिनीच्या लग्नाला आशीर्वाद द्यायला निघालेले जपानी प्राध्यापक तनाष्का – आम्हाला कधी परके वाटलेच नाहीत. ते आमच्या काळजात घर करून बसले. तो अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी लढला. आजच्या सारख्या टीआरपी वाढवण्यासाठी चाललेल्या आग्यावेताळ अभिव्यक्तीसाठी नव्हे. खऱ्या मतस्वातंत्र्यासाठी.

तो भ्रष्टाचाराविरुध्द लढला. जे जे अयोग्य वाटलं त्याच्याविरुध्द त्याने आवाज उठवला. करायचं तेव्हा दिलखुलास वैर केलं. इतर वेळी निखळ मैत्री जोपासली. विदुषकाचं बिरुद हौसेने स्वीकारलं. काम झाल्यावर नाटकातल्या पोषाखाइतक्याच सहजतेने ते उतरवूनही टाकलं. आपल्याच सत्कार समारंभाला भाषणाची टेप पाठवणारा कदाचित तो एकटाच महापुरूष असावा. त्याचं कुणाशीच कायमस्वरुपी वैर नव्हतं. तसा त्याचा स्वभावच नव्हता. उलट तो कायम कोणात काय चांगलं आहे, याचाच सतत शोध घेत असायचा. कुणाचं कणाएवढं चांगलं काम तो मणाएवढं करून सांगायचा. त्याने अनेकांचे आवडीने गुण गायले. ती सगळीच माणसं काही मोठी नव्हती. काही तर अगदीच सामान्य होती. स्टुडीओतले हरकामे किंवा आयुष्यात एखादी कुस्ती जिंकणारे पहिलवान वगैरे. पण या सामान्य माणसांना त्यानं मराठी साहित्यात अजरामर करून ठेवले. ही सारी माणसं सर्व जाती-धर्मातली होती. त्याने कौतुक केलं ते गुणांचं. कुठल्यातरी वेडाचं. छांदिष्टपणाचं. व्यवहारी अपूर्णांकत्वाचं. कारण तो स्वत: त्याच जातकुळीतला होता.

खरा समाजवादी अपरिग्रह त्याच्या नसानसात स्वाभाविकपणे भरलेला होता. वागणुकीतही अस्सल देशी रांगडेपण ओसांडत होतं. पंचतारांकित हॉटेलात काटे-चमचे फेकून देऊन देशी पद्धतीने जेवताना त्याला आसुरी आनंद व्हायचा. आपल्या आया-बाया मुलांचे इंग्लिशमधून लाड करताना बघून त्याला वाईट वाटायचे. त्याचं संस्कृतीप्रेम नववर्ष स्वागतयात्रेला भारतीय पोशाखात जाण्यासारखं उसनं नव्हतं. ते रंध्रा-रंध्रातून प्रकटणारे , आतून आलेलं होत. म्हणूनच इंग्लंडच्या नाट्यगृहात, चीन युध्दाच्या वेळी अमेरिकेची मदत मागणाऱ्या पंडित नेहरूंची केलेली नक्कल बघून त्याचं पित्त खवळलं होतं. ‘ दिल्ली मुगलांच्या बापाची आणि परकीय मराठ्यांनी ती लुटली ’, असं सांगणाऱ्या गाईडचं नरडं आवळावं असं त्याला वाटलं होतं. त्याला ज्या ज्या वेळी जे जे करावंसं वाटलं ते ते त्याने मनमुरादपणे केलं, कुठलाही संकोच न बाळगता केलं. त्यानं स्वत:वर कुठलाही शेरा बसू दिला नाही. तसंच कधी तसा शिक्का बसेल म्हणून फिकीरही केली नाही. तमाशा परिषदेचं अध्यक्षपद हौसेने स्वीकारलं. त्याच्या अध्यक्षपदाच्या भाषणात हाती डफ-तुणतुणं घेऊन गाणंही म्हटलं आणि लंडनच्या वनारसे आजींच्या गणपतीसमोर आरती म्हणताना त्याचं समाजवादीपण आडवं आलं नाही. गणपतीची आरती म्हणताना त्याने अंगावर पाल पडल्यासारखे केले नाही. ज्या ज्या क्षेत्रात तो गेला त्यात त्याने उच्च कोटीचे मानदंड प्रस्थापित करून ठेवले. त्या शिखरांकडे दृष्टी ठेवून, त्या दीपस्तंभांच्या दिशेने जरी आम्ही वाटचाल केली तरी तरी आमचं आयुष्य धन्य होऊ शकतं. त्याच्या अंगात असलेले नानाविध आणि अत्युच्च कोटीचे गुण हा जरी एक ‘ जेनेटीक अक्सिडेंट ‘ मानला तरी, त्यातील एखाद्या गुणाची जोपासना करण्यातही आमचं आयुष्य कृतार्थ होऊ शकतं.

त्याच्या जाण्याला आता वीस वर्ष उलटली आहेत. मध्ये एक पिढी जन्माला येऊन, भर तारुण्यात आली आहे. हाती मोबाईल आणि त्यात इंटरनेट असणाऱ्या या पिढीला त्याचे पौष्टीक जीवन, पत्राची वाट पाहण्यातली हुरहुर आणि ‘बिलाचा की दिलाचा तगादा ‘ – यातला विनोद काय कळणार ? त्याच्या जाण्यानंतर झपाट्याने सारे बदलत-बिघडत गेले आहे. विनोदाच्या नावाखाली पांचटपणाला उत आलाय. दूरदर्शनचे ‘ दुर्दशन ‘ होण्याची त्याने व्यक्त केलेली भीती वास्तवात उतरलीये. विनोदी मालिकांचा सुकाळू झालाय पण त्यात दिसतो विनोद करण्याचा विनोदी प्रयत्न. विनोदी पंचेस, शाब्दीक कोट्या, शारीरिक हालचाली-कसरती, रेकार्डेड हसे, बांधून घातलेल्या प्रेक्षकांचे बळजबरीने आणलेलं हसू. धृतराष्ट्राच्या डोळ्याला गागल, भीमाच्या तोंडी नाय-नो-नेव्हर सारखे डायलाग आणि गांधीजी आणि हिटलरला एकाच वेळी रंगमंटावर दाखवायची अफाट कल्पनेची अफाट भरारी. गेला विनोद कुणीकडे तेच कळत नाही. तो गेला आणि जणू निर्भेळ, निर्विष विनोद नष्टच झाला.

त्याच्या माघारी समाजजीवनात अनेक बदल झालेत. त्यातले काही तर भयानक म्हणावेत इतके वाईट आहे. सार्वजनिक जीवनातला कसदारपणा नष्ट होऊन सगळीकडेच उथळपणा, सवंगपणा ऊतू चाललाय. रचनात्मक विधायक कार्याची जागा पेजथ्री कल्चरने घेतलीये. निर्व्याज प्रेमाने मनापासून शुभेच्छा देण्याऐवजी वाढदिवसाचे मेसेज, वाटसअप पोस्टस् जास्त महत्त्वाचे झालेत. जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रांत दिखावूपणाला जोर चढलाय. सश्रध्दपणाची जागा आता देवभोळेपणाने घेतलीये. प्रत्येक गावातच नव्हे तर गल्ली-बोळात नवनवा बाब-बापू उभा राहतोय. कचेरीतलं काम, आपले विहित कर्तव्य करायचे नाही आणि मग मानसिक शांतीच्या शोधात कुठल्यातरी बुवा-बाबा-बापूचं शिष्यत्व पत्करायचं, आपल्याला मिळालेली सर्वोत्तम देणगी असलेलं डोकं तिथे गहाण ठेवायचं, आपलं स्वत्व त्याला अर्पण करायचं. भ्रष्टाचाराच्या, कामचुकारपणा करून कमावलेल्या पैशतला काही भाग बुवा-बापूच्या चरणी अर्पण करायचा. अपराधीपणाच्या भावनेतून मुक्ती मिळवायची आणि पुन्हा नवीन पापे करायला मोकळे व्हायचे. असा प्रकार सुरू झालाय. पुरूषोत्तमाचा डोळस श्रध्दाळू विवेकवाद लयाला गेलाय.

तिकडे मराठीचिये प्रांती भाषांतरांचा- अनुवादाचा नुसता सुकाळू झालाय. इंग्रजी पुस्तक प्रकाशित होण्याचा अवकाश, इकडे त्याचा मराठी अनुवाद लगेच बाजारात येऊ लागलाय.अनुवाद म्हणजे फक्त कर्ता-कर्म-क्रियापदांची अदलाबदल इवढंच मानलं जातंय. त्यात आमचे देशी वातावरण, ऐतिहासिक-पौराणिक संदर्भ त्यात उमटत नाहीत. इंगर्जी पुस्तकाचं सरळधोपट मराठी रुपांतर तेवढं वाचकाच्या हाती पडतं. ‘ ब्रेड आणायला जाणारा फ्रेंच रामभाऊ ‘ त्याला कुठेच भेटत नाही. वाचक पात्रांपासून मनाने दूरच राहतो. तो कुठेही गलबलत नाही. कासावीस होत नाही. एका तटस्थ मानसिक भूमिकेतून तो ते टीपण वाचतो. माय फेअर लेडीला देशी फुलराणी बनवणार्या पुरूषोत्तमाच्या आणि किंग लिअरचा गणपतराव बेलवलकर करणाऱ्यांच्या देशात हा प्रकार चाललाय, जातीय-धार्मिक-प्रांतिक भेदांनी तर टोक गाठलंय. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणायलाही लोक कचरू लागलेत. एखादी गोष्ट कोणी केली, गुन्हेगाराची जात-धर्म कोणता – यावर आमची त्या गोष्टीवरची प्रतिक्रिया ठरू लागली आहे. दुर्दशनवर प्रत्यही राजकीय पोपटांचे परिसंवाद भरतात. जो तो आपापल्या साचेबद्ध विचारसरणीनुसारच मते मांडतो. जो तो आपापल्या कोशातच मग्न आहे.

पुरूषोत्तमाने विनोबांच्या भूदान यज्ञाचं कौतुक केलं आणि आणीबाणीला अनुशासन पर्व म्हणाल्याबद्दल त्यांच्यावर यथेच्छ टीकाही केली. त्याच्या दोन्ही भूमिका त्या त्या वेळी आणि संदर्भात प्रामाणिक होत्या. दूरदर्शनवरच्या तज्ज्ञांप्रमाणे दुराग्रही नव्हत्या. या भूमिकांमध्ये काही विसंगती नव्हती. ते स्वत:शी राखलेलं इमान होतं. विद्येचं प्रतिक म्हणून गणपतीचेच चित्र असले पाहीजे हे त्याने ठासून सांगितले आणि तसे ते ठेवणाऱ्या मुस्लिमबहुल मलेशियाचे त्याने कौतुक केले. त्यात त्याचे समाजवादीपण आडवे आले नाही. ‘आजोबांच्या मते सर्वात थोर पुरूष म्हणजे आगरकर, हे त्यांचे मत ऐकून पूर्वी त्यांची कीव वाटायची – आणि आता स्वत:ची वाटते ‘ , हे मान्य करायला त्याला संकोच वाटला नाही.

स्वत:शी असलेला हा प्रामाणिकपणाच आता सार्वजनिक जीवनातून हद्दपार झालाय. पक्षीय अभिनिवेश, राजकीय निष्ठा, त्यातीन मिळणारे भौतिक लाभ, विचारसरणीची बंधनं इतकी तीव्र झालीत की सत्य अंग चोरून वावरतंय.
त्याने अगदी सामान्य माणसांबद्दल लिहिलं. त्यांची कधी जात बघितली नाही. धर्म बघितला नाही. आज आम्ही प्रत्येक संताकडे, महापुरूषाकडे आमच्या जातीय चष्म्यातून बघतोय. प्रत्येक महापुरूषाला आम्ही एकेका जातीच्या चौकटीत बंदिस्त केलंय. आम्ही कोणाकडून टोपी घेतली, कुणाकडून दाढी, सत्याचा आग्रह धरणाऱ्या नंग्या फकिराची चित्रं आम्ही चलनी नोटांवर छापली. त्याला आमच्या सगळ्या भ्रष्टाचाराचा, चंगळवादी जीवनशैलीचा साक्षीदार बनवलं. पिरांना वर्षासनं लावून देणाऱ्या महापुरूषाची आम्ही दाढी तेवढी घेतली. त्याचे गोडवे गाणाऱा शिवशाहीर दुसऱ्या जातीचा असेल तर आम्ही त्याला डाकू ठरवून मोकळे झालो. इतरांना त्याच्यावर बोलायला बंदी घातली. तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापुरूषांकडून आम्ही स्वदेशीचा आग्रह नव्हे, गोंगाटी गणेशोत्सव तेवढा घेतला.

आम्ही सगळ्यांचेच पुतळे बनवलेत. एकदा जयंती-मयंतीला पुतळ्यांच्या गळ्यात हार घालले की पुढे वर्षभर आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे वागायला, धिंगाणा घालायला मोकळे.
चला, आता पुरूषोत्तमाचाही एक पुतळा बनवू या.

बापुंचे आशीर्वाद मिळवण्यासाठी. रेकार्डेड हशांवर हसण्यासाठी. अनुवादाचे रतीब घालण्यासाठी. पक्षीय निष्ठांची पोपटपंची करण्यासाठी, नववर्ष स्वागत यात्रेत बॉबकट -नऊवारी नेसून स्कूटरवरून संस्कृतीरक्षण करण्यासाठी. आपल्या कॉन्व्हेंटमधल्या पोरांना – ‘सेंट ग्यानेश्वरा डाईड इन ट्वेल्व्ह हंड्रेड नाईन्टी सिक्स ‘अँड ‘शिवाजी फॉर्मड स्वराज्य विथ हीज मवालीज ‘ शिकवण्यासाठी. पुरूषोत्तमाचा कुठलाच आदर्श प्रत्यक्ष जीवनात न बाणवता त्याचे चार दिवसांचे दिखावू पोशाखी महोत्सव भरवण्यासाठी.

प्रशांत असलेकर –
93220 49083, 9689481154

Wednesday, September 22, 2021

पु. ल. देशपांडे - बस नाम ही काफी है! - राहुल गोगटे

पु. ल. देशपांडे - बस नाम ही काफी है! आपणा मराठीजनांसाठी हे असे एकच व्यक्तिमत्त्व असेल, ज्यांचा परिचय देण्याची गरजच नाही! अष्टपैलू किंवा हरहुन्नरी हे शब्द खुजे वाटावेत इतके बहुरंगी आणि बहुढंगी व्यक्तिमत्त्व - लेखक, अभिनेता, नाटककार, संगीतकार, पेटीवादक, समीक्षक, संगीतज्ञ, दिग्दर्शक, वक्ता...लिहावे तेवढे पैलू कमीच! संगीत, साहित्य, चित्रपट व नाटक - मराठी संस्कृती ज्या चार खांबांवर उभी आहे, तिचा कळस हेच वर्णन कदाचित त्यांना लागू पडेल! जरा अलंकारिक शब्दात सांगायचे तर मराठी सांस्कृतिक विश्व हे जर आकाश असेल, तर पुलं हे त्या आकाशातला अढळ स्थान असलेला ध्रुवतारा आहेत!

मला सगळ्यात जास्त भावतात ते लेखक पु. ल. देशपांडे. मला वाटतं पुलं हे असे एकमेव लेखक असावेत, ज्यांचे साहित्य लहानांपासून थोरांपर्यंत अगदी कोणीही बिनदिक्कतपणे वाचू शकेल! समजेल की नाही, वाचनीय असेल की नाही, हा प्रश्न ज्यांच्या लेखनाबाबतीत संभवतच नाही, असे केवळ पुलंच असतील! त्यांचे लेखन अतिशय विनोदी व खुसखुशीत असते ह्यात शंकाच नाही, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, त्यांचा विनोद हा अतिशय निर्विष व प्रामाणिक असतो! त्यात कुणाचीही बदनामी, नालस्ती करण्याचा हेतू नसतो, असलीच तर असते निर्मळ थट्टा किंवा असतो कोपरखळी मारणारा उपहास!

मला मराठी वाचनाची गोडी लागली ती फक्त पुलंमुळे! व्यक्ती आणि वल्ली हे मी वाचलेले पहिले मराठी पुस्तक. माझ्या दहाव्या वाढदिवसाला आईबाबांनी दिलेली भेट म्हणून मिळालेले पुस्तक मला वाचनाची कायमस्वरूपी गोडी लावणारे ठरले! त्यातल्या प्रत्येक वल्लीचे वर्णन इतक्या समर्पक शब्दात असते, एकाच वेळी खुदकन हसवण्याचे आणि चटकन डोळ्यात पाणी आणण्याचे सामर्थ्य त्यांच्या शब्दात आहे! अतिशय परफेक्ट शब्दयोजना पाहावी तर पुलंचीच! उदाहरणच द्यायचे तर एखाद्या माणसाबद्दल लिहिताना, त्याचे अभिप्रेत असलेले व्यक्तिमत्त्व उभे करण्यासाठी, त्याला व्यक्ती केव्हा म्हणावे, इसम केव्हा म्हणावे, असामी केव्हा म्हणावे ह्याचे परफेक्ट भान आपल्याला पुलंच्याच लेखनात दिसेल!

लहानपणापासून आत्तापर्यंत, म्हणजे पंचविशीत, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मी पुलं वाचले, इतरही अनेक पुस्तके वाचली. पण त्या प्रत्येक टप्प्यावर तितकेच भावले ते फक्त पुलं! हो, पण प्रत्येक टप्प्यावर भावले ते वेगवेगळ्या प्रकारे! लहानपणी केवळ हसू आले, त्यांच्या खुसखुशीत आणि विनोदी लेखनावर, टीनएज मध्ये कधी कधी चावट टिचकी मारणारे त्यांचे विनोद कळू लागले, त्याचबरोबर त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती, एखाद्या माणसाचे किंवा प्रसंगाचे मार्मिक वर्णन करण्याची त्यांची शैली जाणवू लागली की जणू त्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष पाहिलंय, किंवा तो प्रसंग आपणही जगलोय असे वाटते! आता म्हणजे पंचविशीत थोडी जास्त मॅच्युरीटी आल्यावर त्या विनोदामागे दडलेली एक प्रचंड अभ्यासू वृत्ती, एखाद्या माणसाला वाचण्याची कला, त्या व्यक्तीकडे तटस्थपणे पाहण्याची दृष्टी, त्यांच्या विविध व्यक्तिचित्रांचा thought process, human tendency दाखवणारे अनेक प्रसंग, अनेक घटना जाणवतात, त्या विशिष्ट प्रसंगी ती अशीच का वागली किंवा react झाली, ते योग्य होतं का अयोग्य, आपणही कधी कधी असेच वागतो का, आपला thought process कसा असला पाहिजे, अश्या विविध विचारांना subconsciously चालना देऊ लागले पुलंचे लेखन! आता मला नक्कीच माहित्येय की जसजसे आणखी वय वाढेल, तसतसे आणखी वेगळ्या प्रकारे पुलं भावतच राहतील! व्यक्ती आणि वल्ली हे एकच पुस्तक त्यातल्या विविध सामजिक, आर्थिक, शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तिमत्त्वांमुळे एक माणूस म्हणून आपल्याला समृद्ध बनवू शकते, हे निश्चित!

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारे भावलेल्या व्यक्तिचित्राचे उत्तम उदाहरण म्हणजे अंतू बर्वा. लहानपणी अंतू बर्वा वाचताना जाणवायचा केवळ त्यातला विनोद आणि अंतुशेटचे उपरोधिक उद्गार - काहीही पडणे म्हणजे त्याचा "अण्णू गोगट्या झाला का रे", "सिंधू कसली? सिंधुदुर्ग आहे मालवणचा नुसता!" ह्या वाक्यांवर हमखास हसू यायचे. टीन एज मध्ये गेल्यावर "छे हो, काळोख आहे तो बरा आहे. उद्या (विजेचा) झकपक प्रकाश पडला तर बघायचं काय? दळीद्रच ना? अहो, पोपडे उडालेल्या भिंती नि गळकी कौले बघायला वीज ही कशाला? आमचं दळीद्र काळोखात दडलेले बरे!" वरकरणी वाटणाऱ्या विनोदामागे आपले दारिद्र्य इतरांना न कळू देण्याची स्वाभिमानी वृत्ती दिसते. पंचविशीत जाणवलं ते "रत्नांग्रीत दोन पालख्या निघाल्या आषाढीला - एक विठोबाची नि दुसरी दामू नेन्याची. आषाढात तो गेला नि विजयादशमीला आपल्या दत्तू परांजप्याने सीमोल्लंघन केलेनीत. अवघ्या देहाचे सोने झाले. इजा झाला, बिजा झाला, आता तिजाची वाट पाहतोय" ह्या वाक्यांमध्ये दडलेला मृत्यूसारख्या आयुष्यातील कटू वास्तवाचा उतारवयात केलेला स्वीकार आणि खवट बोलण्यामागे दडलेले आपले मित्र गमावण्याचे दुःख! तत्वज्ञान दुर्बोध करून अनेकांनी सांगितले, पण ते विनोदातून सुलभ केले पुलंनी!

त्यांच्या लेखनाची समीक्षा करण्याइतपत मोठा किंवा लायक मी नक्कीच नाही! एके ठिकाणी पुलंनीच म्हटले आहे की, "उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या, पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचे, हे सांगून जाईल." त्याच्यापुढे जाऊन मी म्हणेन, की पुलंचे साहित्य वाचून का जगावे हेच नाही, तर कसे जगावे हेसुद्धा मी शिकतोय, हे निश्चित!

- राहुल गोगटे

Tuesday, September 14, 2021

पुलंच्या सिग्नेचर ट्यूनची गोष्ट

पु ल देशपांडे हे महाराष्ट्राला पडलेलं एक पहाटस्वप्नच. पुलंच्या विनोदाने आपल्याला हसवलं आहे. पु ल देशपांडे यांच्या विनोदी कथा, प्रवेश जसे आपल्याला लक्षात राहतात तसेच पु ल देशपांडे यांच्या निवडक पु ल या मालिकेची सिग्नेचर ट्यूनसुद्धा सर्वांना माहिती आहे मात्र या सिग्नेचर ट्यूनबद्दल कितीतरी गोष्टी आपल्याला माहिती नाहीत.
निवडक पु ल या मालिकेची निर्मिती फाउंटनतर्फे करण्यात आली. त्यावेळी या मालिकेसाठी एक सिग्नेचर ट्यून किंवा शीर्षक गीत असावं असा निर्णय झाला होता. आज आपण जी सिग्नेचर ट्यून ऐकतो त्यात हार्मोनियमचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. अनेकांना स्वतः पु ल देशपांडे यांनी ती हार्मोनियम वाजवली आहे असं वाटतं. पण प्रत्यक्षात मात्र ती संवादिनी पु ल देशपांडे यांनी वाजवलेली नाही. या ट्यूनचं रेकॉर्डिंग ज्यावेळी करण्यात आलं त्यावेळी स्वतः पु ल देशपांडे उपस्थित होते. सुप्रसिद्ध संगीत संयोजक आप्पा वढावकर यांनी पेटीचा तो टोन रेकॉर्डिंगच्या वेळी आपल्या किबोर्डच्या माध्यमातून वाजवला होता. या प्रत्यक्ष रेकॉर्डिंगनंतर पु ल देशपांडे यांनी आप्पांचे कौतुक करून त्यांना दादसुद्धा दिली होती. मात्र बऱ्याच जणांना आजही याबद्दल माहीती नाही.

वेस्टर्न आऊटडोअर्स येथे झालेल्या रेकॉर्डिंगच्या वेळी माधव पवार, दिपक बोरकर, आप्पा वढावकर, राजेश देव हे वादक उपस्थित होते तर त्याचबरोबर पुण्याच्या काही वादकांसोबत या वादकांनी एकत्र येऊन ही मूळ धून वाजवली होती. या ट्यूनला पूर्णपणे संगीत पु ल देशपांडे यांनी दिल्याचासुद्धा अनेकांचा समज आहे. इंटरनेटवरसुद्धा तसे दाखले आहेत. मात्र सुप्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक यांनी या ट्यूनला संगीत दिले आहे.
ध्वनिफिती, सीडी आणि रंगमंचीय कार्यक्रमांना आपल्या संगीताच्या जादूने वेगळे परिमाण देणारे संगीतकार अशी त्यांची ओळख सांगितली जाते.

याच रेकॉर्डिंगशी निगडित आणखी एक गोष्ट आहे. रविंद्र साठे हे नाव आपण मराठीतील जेष्ठ गायक म्हणून ओळखतो. पण गायनाच्या आधी रविंद्र साठे एक उत्तम तंत्रज्ञ होते. ध्वनी व्यवस्थापन, संयोजनसुद्धा त्यांना उत्तम ज्ञात आहे. आनंद मोडक यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे. निवडक पु ल चे रेकॉर्डिंग करताना मूळ कार्यक्रम आणि संपूर्ण सीडीचे ध्वनी संयोजन आणि रेकॉर्डिंग रविंद्र साठे यांनी केले आहे. त्यासाठी माईक लावण्यापासून ते संपूर्ण व्यवस्था त्यांनी त्यावेळी सांभाळली होती. त्यामुळे त्यांच्याही या रेकॉर्डिंगच्या आठवणी आहेत. एकंदरच या सर्व गोष्टी आजपर्यंत अप्रकाशित राहिलेल्या आहेत. पु ल देशपांडे यांच्याशी निगडित कोणताही कार्यक्रम आला की आपण ही ट्यून त्या कार्यक्रमात हमखास ऐकतो पण त्यावेळीसुद्धा ही माहिती प्रकाशात येत नाही.या सिग्नेचर ट्यूनच्या निर्मितीमध्ये आनंद मोडक, रविंद्र साठे, आप्पा वढावकर आणि सर्व संबंधितांचे योगदान नक्कीच मोलाचे आहे.

-आदित्य बिवलकर