Monday, January 20, 2020

माझे जीवनगाणे - डॉ. प्रतिमा जगताप

सात नोव्हेंबर हा पं. जितेंद्र अभिषेकी यांचा स्मृतिदिन, तर आठ नोव्हेंबर हा पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन. याचं औचित्य साधून ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या ‘माझे जीवनगाणे’ या मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या, अभिषेकीबुवांनी गायलेल्या आणि ‘पुलं’नी संगीत दिलेल्या गाण्याबद्दल...  
‘माझे जीवनगाणे’ हे गाणं ऐकतांना गाण्यातल्या पहिल्या तीन शब्दांबरोबर एकाच वेळी अभिषेकीबुवा, पु. ल. देशपांडे आणि मंगेश पाडगावकर या तीन महान व्यक्तींचं स्मरण होतं. एखादं गाणं असं जन्मत:च रत्नजडित स्वरमुकुट लेवून येतं. अनमोलत्वाचं बिरुद घेऊनच जन्माला येतं. तसंच या गाण्याचं झालं असं वाटतं... गाणं सुरू झाल्याबरोबर रसिकमनात आनंदलहरी उमटू लागतात. आपलं अवघं भावजीवन व्यापून टाकणारे मंगेश पाडगावकरांचे शब्द, अभिषेकीबुवांचे स्पष्ट उच्चार आणि लयकारीनं नटलेली गायकी आणि ‘पुलं’चं हवंहवंसं, रसिकांना आपलंसं करणारं, नव्हे पुलकित करणारं संगीत म्हणजेच ‘माझे जीवनगाणे’ हे गीत. रसिकहो हे लिहिता लिहिताच गाणं कानामनात सुरू झालंय...

माझे जीवनगाणे
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा ना दिसू दे
गात पुढे मज जाणे... माझे जीवनगाणे...


कुणाचं आहे हे स्वगत? कवी पाडगावकरांचं, बुवांचं की ‘पुलं’चं ? आत्ता या क्षणी वाटतंय, की तिघांचंही... पं. जितेंद्र अभिषेकी यांचा आज स्मृतिदिन. उद्या म्हणजे आठ नोव्हेंबरला ‘पुलं’चा जन्मदिन... या दिग्गजांच्या स्मरणयात्रेत कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या शब्दांची पालखी मन:चक्षूंपुढे झुलत चाललीय. खरंच हे गाणं ऐकणं म्हणजे एक अलौकिक अनुभव! शब्दांचा, स्वरांचा आणि गायनाचा... हा त्रिवेणी संगम आकाशवाणीतच व्हावा हा किती सुंदर योगायोग. ‘पुलं’ आकाशवाणीतच नाट्यनिर्माते होते, पाडगावकरही आकाशवाणीत कार्यरत होते आणि अभिषेकीबुवांनीही एका मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांनीही जवळजवळ साडेनऊ वर्षं आकाशवाणीत काम केलं होतं. ‘रेडिओत नसतो, तर असं चौफेर मी काहीच करू शकलो नसतो. नाटक, संगीत, दिग्दर्शन, स्वररचना या सगळ्या गोष्टी मी रेडिओमुळे मी करू शकलो,’ असं त्यांनी म्हटलं होतं. अभिषेकीबुवा १९४२च्या सुमारास पुण्यात आले. ‘गाणं हेच आपलं जगणं’ हाच ध्यास घेऊन बुवा मार्गक्रमण करत राहिले. अभिषेकीबुवांबद्दल ‘पुलं’ म्हणायचे, की दत्तगुरूंसारखे २१ गुरू त्यांनी केले. अभिषेकीबुवांनी विविध घराण्यांचा अभ्यास केला. मिंड, मुरकी, तान अशा प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास केला, प्रचंड मेहनत आणि रियाजानं कमावलेला आवाज ही बुवांची वैशिष्ट्यं. या सर्व वैशिष्ट्यांनिशी बुवांचं गाणं बहरत गेलं.

कधी ऐकतो गीत झऱ्यातून
वंशवनाच्या कधी मनातून
कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून
झुळझुळतात तराणे... माझे जीवनगाणे...


‘पुलं’ नाट्यनिर्माते म्हणून आकाशवाणीत असताना त्यांनी ‘भिल्लण’ ही संगीतिका केली होती. मंगेश पाडगावकरांचं काव्य, ‘पुलं’चं संगीत, मुख्य गायक पं. जितेंद्र अभिषेकी, विदुषी किशोरी आमोणकरही होत्या. आकाशवाणीवरून ही संगीतिका प्रसारित झाली होती, तेव्हा रसिक श्रोत्यांना श्रवणसुखाची पर्वणी अनुभवायला मिळाली असेल! आसमंतात ध्वनिलहरींऐवजी आनंदलहरी प्रसारित झाल्या असतील. ही संगीतिका प्रसारित होणार होती, तेव्हा बुवांनी आपल्या आईला, बहिणीला मोठ्या अभिमानानं सांगितलं होतं, ‘आज रात्री साडेआठ वाजता रेडिओ ऐका. तुम्हाला कळेल, की मी कोणत्या कामात गुंतलो होतो.’ रेडिओवर संगीतिका प्रसारित झाली आणि त्या संगीतिकेतील गाण्यांच्या आनंदलहरींवर आजतागायत मराठी मनं पुलकित होताहेत.


‘पुलं’ नेहमी म्हणायचे, की माझं पहिलं प्रेम संगीत! आणि मग साहित्य... बालगंधर्वांचं गाणं बालपणी कानावर पडलं आणि चांगल्या गाण्याचा बालमनावर झालेला संस्कार कधीही पुसला गेला नाही. गवई होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही; पण उत्तम संगीतकार म्हणून ‘पुलं’ची ओळख अवघ्या संगीतविश्वाला झाली. ‘मी गाणं शिकतो’ या ‘पुलं’च्या एका लेखात त्यांच्या गाणं शिकण्याच्या धमाल गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. मुंबईला गेल्यावर पांडुबुवांकडच्या गायनाच्या क्लासच्या गमती वाचून आपली हसून हसून पुरेवाट होते. पांडुबुवा सगळ्यांना ‘देवराया’ म्हणायचे. हे सांगून ‘पुलं’नी गाण्याच्या क्लासमधल्या गंमती सांगताना त्यांच्यातला एक मजेदार संवाद लिहिलाय.


‘आवाज आणि आवाजी यात फरक कोणता?’ मी तसा चेंगट आहे.
‘तसा फरक नसतो देवराया.’
‘पण मग आवाज केव्हा म्हणायचा न् आवाजी केव्हा म्हणायचं ?’
‘हे पहा, एखाद्या बाईला बाई केव्हा म्हणायचं न् बया केव्हा म्हणायचं, याचा काही कायदा आहे का? पोराला पोरगंही म्हणतात, कार्टंही म्हणतात. आमचंच बघा ना, गायन क्लासला कधी आम्ही कलेची सेवा म्हणतो, तर कधी पोट जाळण्याचा धंदा म्हणतो. आता ‘सा’ लावा देवराया.’
‘का हो बुवा, ‘सा’ला ‘सा’ का म्हणतात?’
‘देवराया, आता आपलं डोकं...’
‘काय?’
‘नाही, उदाहरणार्थ... आपलं डोकं..’
‘माझं डोकं, त्याचं काय?’
‘आपल्या डोक्याला काय म्हणतात?’
‘डोकं’
‘डोकं, खोकं का नाही म्हणत? तसंच ‘सा’ला ‘बा’ म्हणून कसं चालेल ?’
आणि मग मी ‘सा’ लावला.

‘पुलं’च्या गळ्यातल्या ‘सा’ऐवजी पेटीवरचा ‘सा’ मात्र फुलत गेला. त्या ‘सा’ने त्यांची आयुष्यभर संगत केली. संगीतातला ‘सा’ आणि साहित्यातला ‘सा’ त्यांचं जीवनगाणं बनून राहिले. पार्ल्यातल्या अजमल रोडवरच्या त्रिंबक सदनात २२ रुपयांना विकत घेतलेली पेटी ‘पुलं’ना खूप प्रिय होती. पुलं म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व. त्यांच्या नुसत्या नावानं मराठी मन हरखून जातं. तुसड्या, माणूसघाण्या चेहऱ्यावरही स्मितरेषा उमटवणारं नाव म्हणजे ‘पुलं’! जिवंतपणी दंतकथा होण्याचं भाग्य लाभलेलं नाव म्हणजे ‘पुलं’! संगीतकलेबद्दल विलक्षण प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता असणाऱ्या ‘पुलं’नी संगीताविषयी भरभरून लिहिलंय. आपल्या भाषणांमधून सांगितलंय. भावगीत गायनाबद्दल अतिशय तळमळीनं त्यांनी लिहिलंय, ‘भावगीत गायन हा संगीत प्रकार टिकावा, असं गायकांना वाटत असेल, तर अभिजात संगीताचा अभ्यास अपरिहार्य आहे. त्याशिवाय लयीची आणि स्वरांची मूल्यं समजणं अशक्यच आहे.’


पं. जितेंद्र अभिषेकी यांचा आज स्मृतिदिन आणि उद्या ‘पुलं’चा जन्मदिन साजरा करताना कवी मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली आणि या दोन दिग्गजांच्या संगीतकलेनं मोहरलेली कविता गुणगुणत राहू या...

गा विहगांनो माझ्या संगे
सुरावरी हा जीव तरंगे
तुमच्या परी माझ्याही सुरातून
उसळे प्रेम दिवाणे... माझे जीवनगाणे...



- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४
(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)
(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदराचे पुस्तक आणि ई-बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Saturday, January 18, 2020

II पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II

पु. ल . देशपांडे नावाची व्यक्ती मला पहिल्या वेळेस कधी भेटली हे नक्की आठवत नाही, पण एवढं आठवतंय की मी त्यावेळी साधारणतः सातवीत शिकत होतो .

दूरदर्शनवर एक कार्यक्रम असायचा. घरातली सर्व लोक त्या कार्यक्रमासाठी टीव्हीसमोर मांडी ठोकून बसायची. त्या प्रेक्षकांमध्ये आज्जी आजोबा असायचे. शेजारपाजारचे सुद्धा यायचे . ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा तो जमाना होता. रात्रीचे आठ वाजले की एका कर्णमधुर संगीताच्या पार्श्वभूमीवर टीव्हीवर एका स्टेजवरील पडदा बाजूला जायचा आणि टाळ्यांच्या गजरात सर्वजण एका व्यक्तीचे स्वागत करायचे. स्टेजवर फक्त तो एकटा माणूस अर्धा तास काहीतरी गम्मतीदार सांगायचा आणि घरातील सगळेजण त्याच्या प्रत्येक वाक्याला हसत असायचे . मला त्या कार्यक्रमातील फारसं काही कळायचं नाही . पण घरातील सगळे तो कार्यक्रम पाहताना आनंदात असायचे हे पाहून आम्हा लहान मुलांना देखील बरं वाटायचं .

स्वयंपाकघरातली सगळी कामे टाकून साडीला हात पुसत आई या कार्क्रमाला लगबगीने यायची , वडील पेपर वाचायचे थांबवून टीव्हीपुढे बसायचे. एरवी अतिशय गंभीर असलेले आजोबा आणि कायम देवाचे नाव पुटपुटत असणारी आज्जी सुद्धा कार्यक्रम पाहताना मिश्किल हसायचे .

घरातील सगळ्या माणसांना हसवणारा हा माणूस नक्की कोण या माझ्या प्रश्नाचे उत्तर घरातील सर्व एकसुरात दिले , " अरे , ते तर आपले पुलं ! "

ही होती माझी पुलंबरोबर पहिली भेट !

त्यानंतर पुलं आयुष्यात नेहमी भेटत राहिले . सुखाच्या प्रसंगात भेटलेच पण दुःखाच्या प्रसंगात जास्त वेळा भेटले . गमतीची गोष्ट म्हणजे पुलं भेटायला येताना एकटे यायचे नाहीत तर सोबत गोतावळा घेऊन यायचे .............. प्रत्येक वेळी त्या गोतावळ्यात नवनवीन माणसांची भर पडत जायची . त्यात अगदी सुरुवातीला आला तो गटणेंचा सखाराम ! " प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे " असलं काहीतरी पुस्तकी बोलणारा हा मुलगा मनात घर करून गेला. त्यानंतर आला नारायण . आकाशवाणीवरून पुलंच्या आवाजात नाट्यरूपांतर केलेला हा नारायण त्यानंतर प्रत्येक लग्नकार्यात भेटत राहिला . नंतर आले हरितात्या ! मनाने अत्यंत चांगले पण बेशिस्त. पुलं गमतीने म्हणायचे " दासबोधाची इतकी पारायणं करूनही एवढा अव्यवहारी राहिलेला दुसरा माणूस मी पाहिलेला नाही ."

या हरितात्यांचे समर्थ रामदासांवर खूप प्रेम होतं . अगदी घरी आल्याआल्या मुलांसोबत " जय जय रघुवीर समर्थ " असा अंगणातच जयघोष करायचे .

पुलंसोबत येणारं हे गणगोत दिवसोंदिवस वाढतच होतं . त्यात भर पडली बटाट्याच्या चाळीतल्या आणि असामी असा मी या ऑफिसमधील लोकांची ! मला आठवतंय त्यावेळी पुलंचं वजन वाढलं होतं . चाळीतले सोकाजी त्रिलोकेकर त्यांना म्हणाले " ए पंत , साला बटाटा सोड ! बटाट्याचं नाव सुद्धा काढू नकोस . अगदी कुणी विचारलं " कुठे राहता " तर नुसतं " चाळीत " म्हण " बटाट्याच्या चाळीत " नकोस म्हणू , नायतर वजन वाढल . " आम्ही पोरं या वाक्यावर फू….SSS करून हसलो होतो .

आम्हाला वाटायचं पुलं फक्त विनोदी लिहतात आणि बोलतात. पण असच एकदा त्यांचं पेटीवादन ऐकलं आणि आम्ही गारच पडलो. खास आमच्यासाठी पुलंनी त्यादिवशी " नाथ हा माझा " वाजवलं होतं . त्यानंतर बोरकरांच्या कविता पुलं आणि सुनीताबाईंच्या आवाजात ऐकल्या आणि हे पुलं आणि आपले नेहमीचं विनोदी लिहणारे पुलं वेगळे आहेत अशा निष्कर्षांला आम्ही मुलं आलो . कारण, एकच मनुष्य लेखन , संगीत , कविता या सगळ्या गोष्टी कशा करू शकेल ? बोरकरांच्या कवितावाचनावेळचा प्रसंग . पुलंनी ' जीवन त्यांना कळले हो ' ही कविता वाचली आणि आमच्यापैकी एकजण सहजपणे म्हणाला , " ही कविता पुलंवरच लिहली आहे असं वाटतंय ना " ... आमच्या सर्वांच्या डोळ्याच्या कडा त्यावेळी नकळत ओलावल्या होत्या..!

याशिवाय गायक पुलं , संगीतकार पुलं , प्रवासवर्णन करणारे पुलं अशा वेगवेगळ्या रूपात पुलं आम्हाला भेटत राहिले . आपल्या देशावर लादल्या गेलेल्या आणिबाणीमध्ये पुलंनी सरकारविरोधी घेतलेली कणखर भूमिका आणि आणीबाणीनंतर मात्र अगदी शांतपणे लेखनाच्या प्रांतातील त्यांचा पुनःप्रवेश हे पाहून त्यांच्याविषयीचा आदर दसपटीने वाढला .

मनात विचार येतो , पुलंचे वर्णन नक्की कोणत्या शब्दात करता येईल . पुलं फक्त लेखक होते ? फक्त गायक अभिनेते होते ? फक्त संगीतकार होते ? नक्कीच नाही. पु.ल. म्हणजे आयुष्याकडे पहाण्याची एक वृत्ती आहे. स्वतःच्या आयुष्यातील सुखदुःखे विसरून जगाला आनंद देणे आणि जगाला हसवत ठेवण्याची ही वृत्ती आहे. स्वतःच्या वैयक्तिक सुखदुःखामध्ये न अडकता त्यांनी केलेल्या समाजोपयोगी कार्यांचा गौरव देखील झाला मात्र कोणताही बडेजावपणा न करता ते आयुष्यभर साधेपणाने जगले . पुलंचे जीवन पहिले तर समर्थ रामदास स्वामींच्या - ऐसी कीर्ती करून जावे I तरीच संसारास यावे I दास म्हणावे I हे स्वभावे संकेतें बोलिले II या श्लोकांची आठवण होते .

पुलं आणि सुनीताबाईंनी पुलं फाऊंडेशनच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या देणग्या विविध सामाजिक कार्यांसाठी दिल्या. अनेक सामाजिक संस्था, चळवळी, अपंग-मूक-बधिरांसाठीच्या संस्था अशा विविध कार्यांना त्यांनी भरभरून देणग्या दिल्या. आपल्या पुस्तकांचे हक्क प्रकाशकांना विकून तो पैसाही त्यांनी सामाजिक संस्थांना दान केला. यापैकी कित्येक गोष्टींची माहिती पुलं गेल्यानंतर लोकांना कळल्या. समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे मात्र जवरी चंदन झिजेना I तंव तो सुगंध कळेना I या वचनाप्रमाणे चंदन आणि इतर लाकडे वरवर एकसारखी वाटत असतील तरी उगाळल्यावर त्यातील फरक कळून येतो .

दासबोधातील निस्पृह लक्षण , उत्तम पुरुष लक्षण , विरक्ती लक्षण यातील वर्णन पुलंना तंतोतंत लागू पडते . अशा या पुरुषोत्तमास साष्टांग नमस्कार !

डॉ .वीरेंद्र वसंत ताटके
Mobile 9225511674
(श्री क्षेत्र सज्जनगड येथील समर्थ सेवा मंडळाच्या मासिकात आलेला लेख )