Monday, July 11, 2022

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात - प्रभाकर पेंढारकर

...आनंदवनाला पु.ल.देशपांड्यांची भेट. दरवर्षी 'मित्रमेळा' इथे साजरा होतो. आनंदवनाचा हा आनंदोत्सव. आम्ही कॅमेरा लावलेला होता. आणि रंगमंचावरचे कार्यक्रम चित्रित होत होते. त्यांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मग आम्ही प्रेक्षकांचे शॉटस घेऊ लागलो आणि एकदम टाळ्यांचा कडकडाट झाला. आम्ही कॅमेरा स्टेजकडे वळवला, तिथे पु.ल. आलेले होते. हे त्यांचे प्रेक्षकांनी केलेले मनापासूनचे स्वागत.

प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट. आणि माझ्या एकदम लक्षात आलं की समोरच बसलेल्या मुली मात्र स्तब्ध त्यांना नेमके काय होत आहे, स्टेजवर कोण आलं आहे हे न समजल्यासारखं त्या उभ्याच, मग आजूबाजूला टाळ्या वाजतात म्हणून त्याही टाळ्या वाजवू लागल्या. मी शेजारी उभ्या असलेल्या गृहस्थांना विचारलं,"या कोण मुली?"

"इथल्याचं आहेत. त्यांच्या अद्याप लक्षात आलेलं नाही की स्टेजवर पु.ल. आलेले आहेत. त्या अंध आहेत."

दुसर्‍या दिवशी सकाळी मी पु.लं.ना गाठलं. नागपूरला त्यांचा एक कार्यक्रम होता. त्यांना लगेच निघायचं होतं. मी त्यांना म्हणालो,"मला तुमची फक्‍त दहा मिनिटंच हवी आहेत." ते हसले आणि म्हणाले,"मी काल पाहत होतो तुम्ही माझे भरपूर शॉटस्‌ घेतले आहेत."

“ते घेतलेच आणि आज अगदी वेगळ्या प्रेक्षकांच्या बरोबर काही शॉटस्‌ हवे आहेत."

आनंदवनात बाजूला मुलींचं एक वसतीगृह आहे. तिथे अंगणात मुली थांबल्या होत्या. पु.ल. आले आणि मुलींना समजलं तसं त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पु.ल. एका खुर्चीवर बसले आणि मुली त्यांच्यासमोर बसल्या. त्यांना पु.ल. म्हणाले की, "कालच्या गर्दीत तुम्ही होता पण मला काही तुमच्याशी बोलता आलं नाही. म्हणून मी तुमच्यासाठी आज इथे आलेलो आहे. ओळखलत का मला?" मुली एकदम म्हणाल्या,"हो हो, आमचे बाबा तुम्हाला भाई म्हणतात, तेच ना तुम्ही?"

आणि पु.ल. म्हणाले,"मी भाईच ! मला सांगा, तुम्हाला काय हवं आहे." आणि मुली म्हणाल्या, आम्हाला तुम्हाला पाहायचं आहे." कॅमेरा पु.लं. कडे वळला. क्लोजअपमध्ये त्यांच्या डोळ्यात उभं असलेलं पाणी क्षणभर दिसलं आणि पु.ल. म्हणाले, "तुम्हाला माहीत आहे का मी सावळा आहे, जरा ढब्या आहे. बराचसा बावळट, वेंधळा त्याशिवाय का लोक मला पाहताच हसतात?

"आणि एक सांगू, ज्यांना दिसतं ते सगळेच पाहतात असं नाही. त्यांना हे समजत नाही की आपण पाहण्याजोग्या या जगात कितीतरी गोष्टी आहेत. पण आपण पाहतच नाही. तुमचं तसं नाही तुम्ही इथल्या बागेत फुलं पाहता. त्यांना पाणी घालता, त्यांना हात लावता, त्यांचा वास घेता. तुम्हाला समजतं की हा गुलाब, शेवंती, हा मोगरा आहे."

तुम्ही ही फुलं पाहता, त्यांना समजून घेता, हे समजून घेणं हेच महत्त्वाचं आहे."

आणि त्या मुली म्हणाल्या "आम्हालाही फुलं दिसतात म्हणून तर आम्ही त्यांना पाणी घालतो." आणखीन थोड्यावेळा गप्पा चालू राहिल्या आणि मुलींना समजलं की हा भाईही आपल्याला दिसतो आहे. मग पु.ल. म्हणाले, "तुमच्याकडे मी पाहतो आणि मला एका मुलीची अतिशय आठवण येते. ती एक गाणं म्हणायची ते तुम्ही ऐकलं असेल. माझ्याबरोबर म्हणाल का?"

आणि भाई म्हणाले

“नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
ढगांशी वारा झुंजला रे.
काळा काळा कापूस पिंजला रे”


आणि मुली उभ्या राहिल्या. भाईच्या आवाजात आपलाही आवाज मिसळून गाऊ लागल्या. आम्हाला समजलं नाही कॅमेराच्या मागे बाबा आमटेही उभे राहीले होते. ते हळूच म्हणाले, "ह्या मुलींच्या डोळ्यांना सूर्याच्या कोवळ्या किरणांनी कधी स्पर्शच केला नाही. भाईंच्या शब्दांनी मात्र त्यांना स्पर्श केला. त्या पाहू लागल्या."

भाई सांगत होते आणि मुलीही त्यांच्या बरोबर म्हणत होत्या,

"काळा काळा कापूस पिंजला रे.
आता तुझी पाळी
वीज देते टाळी,
फुलव पिसारा नाच,
नाच रे मोरा,
आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच !


-- प्रभाकर पेंढारकर
जीवनज्योत दिवाळी अंक २००९

0 प्रतिक्रिया: