Thursday, September 18, 2014

नाटकवाले पु.ल. - सुभाष इनामदार

नोव्हेबरात पुण्यात सुरू होत असतो पुलोत्सव. साहित्य, नाट्य, चित्र, संगीत, अभिनय, दिग्दर्शन आशा विविध अंगानी फुलणारे आणि तमाम मराठी मंडळींचे लाडके म्हणजे. पु. ल. देशपांडे.
अनेकविध कलांचा हा बादशहा. वाणीत ओजस्विता. तर लेखणीत विनोदाचा नटखट बाज. थोडे मागे वळून पाहिले तर नाटकाने पुलंना नाव, किर्ती दिली. त्यांच्या नाटकावरील प्रेमाच्या अनेक गोष्टी रसिकांच्या आठवणीच्या कप्प्यात घर करुन आहेत. अनेकांनी पुलंच्या नाटकाविषयी, नाट्यक्षेत्रातल्या त्यांच्या कर्तृत्वाविषयी नोंद करून ठेवली आहे. या निमित्ताने ती पोत़डी तुमच्यासारख्या जाणकांरांसमोर खुली करण्याचा हा प्रयत्न आहे.
--------------------------------------------------------
नाटकात मी लेखक,दिग्दर्शक, नट अशा निरनिराळ्या सोंगात वावरलो. मला सगळ्यात अधिक आनंद मिळत गेला तो नाटकांच्या तालमीत. पहिला प्रयोग हे प्रवासातला शेवटचा मुक्काम गाठण्यासारखं असते. पण मजा असते ती प्रवासातल्या त्या मुक्कामापर्यंतच्या वाटचालीत. एखाद्या मित्राचं रहस्य उलगडावं तशी वाक्य उलगडत जात असतात.

एखादे कॉम्पोझिशन जरा इकडून तिकडे फिरविले की.. त्या चित्रात निराळाच रंग भरत असतो. एखाद्या वाक्याचा चढ-उतार, एखादा पॉज, एंट्रीच्या वेळची एखादी हालचाल, एखाद्या नटाचा किंवा नटीचा अकल्पितपणे साधलेला अभिनयातला बारकावा- तालमीत एखाद्या पात्राच्या अभिनयाचा उठाव येण्यासाठी सुचलेला बिझनेस, इतकेच नव्हे, तर अनपेक्षितपणाने उदभवणा-या अडचणा, त्या सा-या उत्सुक क्षणांतून पहिल्या प्रयोगाच्या दिशेला हे तालमीचं जहाज प्रवास करीत असते. ह्या तालमीत ज्याला मजा घेता आला नाही त्याला नाटकात रमण्यात रस नसून नुसते मिरवण्याची आवड आहे हे ओळखावे आणि इतकी सगळी धडपड करूनही पहिल्या प्रयोगाच्या वेळी आपल्या स्वप्नातही नसलेल्या ठिकाणी दाद मिळून जाते किंवा अपेक्षित प्रतिक्रियेच्या क्षणी प्रेक्षागार ठप्प होउन बसते तो अनुभव निराळाच.

कलेत विचार हवा. पण केवळ तार्कीक विचारातून कलेचे घुमारे फुटत नाहीत. हा प्रपंच तकार्तीत असतो. इथे बे दुणे चार करण्यात हाशील नसून बे दुणे पाच किंवा तीन करण्याची किमया साधण्यातच गंमत आहे. सोळा मात्रांचा हिशेब दाखवीत ही साधणे ही कारागीरी झाली. पण ऐकणा-याच्या डोक्यातून मात्रांचा हिशेब घालवून अकल्पित भेटलेल्या प्रियसी सारखी समेची भेट घडवून आणण्याला संगीतात श्रेष्ठ मोल असतं. कुणीसं म्हटलय ते खरं आहे... एक होता राजा आणि एक होती राणी.- इथे नाटक सुरू होत नाही. तर एक होता राजा आणि एक होती राणी पण...त्या `पण` पासून नाटक सुरू होतं. सारं आयुष्य हा पण जो काही नाना प्रकारचे खेळ मांडतो त्यातलं रहस्य शोधताना कसं निघून गेले ते कळत नाही. म्हणूनच तर प्रत्येक नाटकाच्या तालमी सुरू झाल्या की नवे सुरवातीचे दिवस सुरु होतात.
- पु.ल.

-------------------------------------------------------------
पीएल म्हणजे नुसता विनोद व हशा नाही. या विनोदाच्या पलिकडे एक सश्रध्द, न्यायान्यायाच्या प्रश्नात तीव्रतेनं गुंतलेलं समंजस आणि प्रागतिक असं मन आहे. असे अस्वस्थ झालेले पुलही मी पाहिलेले आहेत. अत्याचार, अन्याय, जुलूम, जबरदस्ती इत्यादि गोष्टींनी ते अशांत होतात. त्याचप्रमाणे बाबा आमट्यांसारख्या नवसंतांच्या कार्यदर्शनानं ते पूर्णतः जिंकले जातात आणि आपल्या सर्व शक्ति पणाला लावून अशा कामासाठी प्रत्यक्ष राबतातही. अतिशय डोळसपणानं त्यांनी दिलेल्या मोठमोठ्या देणग्या त्यांच्या वृत्तीच्या निर्देशक आहेत. मला पीएलचं वैशीष्ट्य हे वाटतें की, जगभर संचार करुनही त्यांचं मराठीपण कधी हरवले नाही किंवा विविध व्यवसायात वावरुनही त्यांच्या अंतरंगातील माणुसकीची भावना कधी विस्कळीत झाली नाही.
- वि वि शिरवाडकर

-----------------------------------------------------------
पुलंचे बहुतांश लेखन पाहण्यासारखे आहे. एकेका अतिरेकी प्रवृत्तीवर विनोद करण्यामागे सुध्दा पुलंमधला नाटककार किंवा बहुरुपी प्रभावी ठरतो. त्यांच्या लेखनातसुध्दा एकेका प्रवृत्तिदर्शक व्यक्तिच्या नकला होत आहेत किंवा अतिरेकी प्रवृत्तीची चेष्टा चालू आहे असा अनेकदा भास होतो. या दृष्टीने पुलंची शैली पाहण्यासारखी आहे. लेख लिहिताना आपण रंगमंचावर आहोत आणि सभोवार प्रेक्षक असून आपले लेख ` ऐकत` आहेत असा खुद्द पुलंचाही समज असतो की काय असे वाटू लागते. पुलंनी मलाच मागे एका मुलाखतीत सांगितलेले आहे की, `साहित्य हे खरे मुळात उच्चारीच ( स्पोकन) आहे. लिखित किंवा पुस्तक ही एक सोय आहे. वाक्य हे अर्थानुसार उच्चारावे लागते. ते उच्चारताच एगदी निकटवर्ती असा अर्थ प्रतीत झाला पाहिजे. खरे तर ही भूमिका नटाची आहे.` पु.ल हे नट-साहित्यिक आहेत. नट, नाटककार आहेत. काहीही लिहिताना नट ते कसे उच्चारील याकडे त्यांचे लक्ष असते.
पुलंना निसर्गतःच उच्चारांची, ध्वनीची एक वेगळी जाण आहे. ती तेवढ्या प्रमाणात आज कुणाला आहे असे वाटत नाही. ते कितीतरी वेगळ्या आवाजात बोलू शकतात.ती एक मोठी देणगी आहे. विविध त-हांनी ते नकला करू शकतात. परंतु या देणगीचा मराठी रंगभूमीला फार मोठा फायदा झाला नाही.
-जयवंत दळवी.

------------------------------------------------------------
पु.ल. देशपांड्यांच्या रंगभूमिवरील कामगिरीकडे पाहिले की असे वाटते की, पु. ल. म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक बेट आहे. ते आशा अर्थाने की नाट्य-साहित्याच्या प्रांतात त्यांनी खास असे कोणी शिष्य निर्माण केले नाहीत. आचार्य अत्र्यांप्रमाणे त्यांना ही नाट्यलेखन व दिग्दर्शन यांच्याखेरीज महत्वाची व्यवधाने होतीच. परदेशी रंगभूमीचा अनुभव त्यांनी अत्र्यांपेक्षा जास्त जाणकारीने घेतला आणि नाट्यरचनेच्या बाबतीत अत्र्यांप्रमाणे संकेतप्रिय राहून समाजमनावर मात्र प्रचंड मोहिनी घातली. पु.लं.चे श्रेष्ठत्व हेच की, पुढे त्यांना मराठी रंगभूमीची अवघी कलात्मक अस्मिताच ढवळून काढली, तिचे सव्वा शतक जणू एकसमयावच्छेदेकरून प्रेक्षकांपुढे उभे केले आणि किमान आणखी एक शतक पुरेल इतके चैतन्य तिला दिले.
-ज्ञानेश्वर नाडकर्णी

------------------------------------------------------------
`गृहदाह` या नाटकाच्या निमित्ताने आम्ही एकत्र येण्याचा योग आला. तो काळ माझ्या जीवनातला सोनेरी काळ! कारण पी. एल. माझ्या अगदी जवळ आला होता तो याच काळात. त्या काळात तो कोणी मोठा होता असं नव्हे. पण या माणसात काही तरी जादू आहे खास असं मला राहूनराहून वाटायचं. त्याचा सहवास एखाद्या गुलाबाच्या सुगंधासारखा-सदैव हवाहवासा वाटायचा.
पी. एल. एतका बुध्दिमान, रसिला, प्रेमळ आणखी पुष्कळ काही असूनदेखील माल तो आवडतो तो एक माणूस म्हणून. १९५०- मध्ये `तुझे आहे तुजपाशी` या नाटकामुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो. यावेळी त्याच्यातला दिग्दर्शक मला दिसला. . नाटकामुळे पी.एल.नं लोकप्रियतेचे शिखर गाठलं तर या नाटकात मला डॉ. सतीशची भूमिका देउन त्यानं मला लोकप्रियतेच्या टेकडीवर आणून ठेवलं. पी.एल. नं अशा रितीने कितीतरी कलावंताना त्यांचा हात धरून प्रसिध्दीच्या झोतात आणले आहे.
-अनंत वर्तक

-----------------------------------------------------------------
अशा अनेकविध कलावंतांच्या आठवणीच्या पोतडीत पुल दडले आहेत. अखेरपर्यंत हसवितानाही गंभीर करणारा विनोद पुलंनी महाराष्ट्राला, मराठी भाषेला दिला. त्यांच्या कोट्यांवर महाराष्ट्रातला एक वर्ग जीवापाड प्रेम करतो. त्यांच्या नाटकांचे आजही प्रयोग होत आहेत. त्यांच्या वाचनांचे, कथांचे. एकपात्री प्रयोगांची आजही मागणी आहे. असा कलावंत हा नशीबाने मराठी भाषकांना लाभला. त्या पुं.लंच्या स्मृतीना वंदन करून त्यांची सहजता, अभिनय आणि हजरजबाबी लेखनशैली आजरामर राहो, हिच इच्छा.

सुभाष इनामदार, पुणे
Subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
Mob_ 9552596276