Wednesday, March 30, 2022

पु.ल. आणि भीमराव पांचाळे

४ मार्च १९८९ ला चंद्रपूरला पहिलं दलित साहित्य संमेलन झालं. संमेलनाचे उद्घाटक होते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे. ते या संमेलनाचं सर्वात मोठं आकर्षण होतं. उद्घाटनपर केलेल्या वैचारिक तरीही अत्यंत रसाळ अशा भाषणाने त्यांनी या संमेलनाला एका उंचीवर नेऊन बसवलं.

या संमेलनात पुलंनी एक कार्यक्रम खूप आग्रहाने करायला लावला. तो म्हणजे गझलनवाज भीमराव पांचाळेंची गजलमैफल. भीमराव तेव्हा गझलनवाज बनले नव्हते. त्यांना मुंबईत येऊन अवघी सहाच वर्षं झाली होती. संघर्ष सुरू होता. पण पुलंचा हट्टच होता. भीमराव चंद्रपूरच्या संमलनात पाहिजेच. कुणाला साक्षच काढायची असेल तर संमेलनाचे एक मुख्य आयोजक असलेले ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर आहेत. ते या सा-या घटनाक्रमाचे साक्षीदार आहेत.

संमेलनात भीमरावाची मैफल नेहमीप्रमाणेच रंगली. त्याला पुलं संपूर्ण वेळ आवर्जून उपस्थित राहिले. इतकंच नव्हे तर या मैफिलीचं प्रास्ताविक निवेदन त्यांनी स्वतःहून केलं. त्यात त्यांनी भीमराव, मराठी गजल यांचं खूप कौतूक केलं. तुम्ही विदर्भातले आहात, भीमराव विदर्भातले आहेत. पण भीमरावांची खरी कदर विदर्भाने नाही, तर आम्ही मुंबईकरांनी केली, असं त्यांनी वैदर्भीयांना आपल्या खुशखुशीत शैलीत सांगितलं. भीमरावांच्या गाण्यात शब्द आणि सूर एकमेकांना आलिंगन देऊन लयीत चालतात. असं भरभरून कौतूक करत त्यांनी भीमरावांना असंच गात राहा, असे आशीर्वाद दिले. सोबतचा फोटो त्याच कार्यक्रमातला. नागपूर आकाशवाणीकडे या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंगही उपलब्ध आहे.

पुलंची आणि भीमरावांचा ऋणानुबंध खूप जुना. पहिली भेट अकोल्यातली. पुलं अकोल्याला आले की त्यांचा किशोरदादा मोरेंकडे यायचे. किशोरदादा हे भीमरावांचे पालक. त्यामुळे त्याकाळातल्या अनेक मान्यवरांबरोबरच पुलंचाही सहवास भीमरावांना लाभला. एकदा बाबा आमटेंकडे आनंदवनात गेलेले असताना परतीच्या प्रवास पुलं अकोल्याला आले होते. त्यांच्यासोबत डॉ. अनिल अवचट होते. नारायण कुलकर्णी कवठेकर, मांडवगणे अशी अकोल्यातली साहित्यिक मंडळीही होती. किशोरदादांनी प्रत्येक जाणकारासमोर भीमरावांना जाणीवपूर्वक गायला सांगत. तेव्हा भीमरावांचं वय विशीच्या आसपास होतं. त्यांनी त्यांचं एक नवं कम्पोझिशन गाऊन दाखवलं. ती अर्थातच गजल होती. भीमूला पहिल्याच फटक्यात पुलंसारख्या दैवताकडून शाबासकीची थाप मिळाली.

१९८३ साली भीमराव विदर्भातून मुंबईत स्टेट बँकेत बदली घेऊन आले. नरिमन पॉइंटच्या हेड ऑफिसमधे पोस्टिंग होतं. तिथून अवघ्या दोन मिनिटांवर पुलंचं एनसीपीएचं ऑफिस होतं. पुलं तेव्हा एनसीपीएचे अध्यक्ष होते. तिथेच त्यांचं बि-हाडही होतं. पंधरा दिवस ते इथे राहत आणि पंधरा दिवस पुण्याला. तिथे पुलंसोबत काम करणा-या वृंदावन दंडवतेंच्या ओळखीनं भीमराव पुलंना भेटले. ८७ साल होतं ते. निमित्त होतं मुंबई आकाशवाणीने आपल्या हिरकमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भीमरावांच्या मैफिलीचं निमंत्रण.

आकाशवाणीच्या मैफिलीला येणं पुलंना शक्य नव्हतं. पण त्याची सव्याज भरपाई त्यांनी एका क्षणात केली. त्यांनी भीमरावांना एक एनसीपीएच्या नावे एक पत्र द्यायला सांगितलं. मला माझी कला सादर करण्यास संधी द्यावं, असं पत्र त्यांनी तिथेच लिहून घेतलं आणि दंडवतेंकडे ठेवायला दिलं. अकोल्याला भीमरावांकडून ऐकलेलं गाणं पुलंच्या लक्षात होतंच. पण दूरदर्शनवरच्या मैफिलीही ऐकलेल्या होत्या. पेपरांत छापून येत होतंच. पुलंनी भीमरावांच्या गाण्याला आणि मराठी गजलला एनसीपीएसारखं जगात नावाजलं जाणारं व्यासपीठ मिळवून दिलं.

२९ जून १९८८ ला ही मैफल झाली. एनसीपीएत ब्लॅक बॉक्स नावाचं एक छोटं सभागृह आहे. त्याची रचनाच अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे की मंचावर टाचणी जर पडली तरी माईकशिवाय शेवटच्या खुर्चीपर्यंत ती नीट ऐकू जाते. मुंबईतच्या उच्चभ्रू वर्तुळातल्या जाणकार आणि दर्दी लोकांसाठी तिथे निवडक मैफिली आयोजिल्या जातात. भीमरावांच्या सूरांनी एनसीपीए जिंकलं. अनेक मान्यवरांनी वृत्तपत्रातून भीमरावांचं कौतूक केलं. आजही एनसीपीएच्या लायब्ररीत कुणीही जाऊन या मैफिलीचं रेकॉर्डिंग ऐकू शकतं.

पहिल्याच भेटीपासून पुलंनी भीमरावांसाठी दोघांमधलं सगळं अंतर संपवून टाकलं होतं. त्यांना पुलंच्या ऑफिसात मुक्तद्वार होतं. दुपारी बँकेत लंचअवर झाला की भीमराव पळालेच एनसीपीएला. तिथे दंडवते, वामन केंद्रे, अशोक रानडे अशी मंडळी सोबत असायची. तासन्सान गप्पा चालायच्या. आणीबाणीपासून लोकगीतांपर्यंत अनेक विषयांवर या चर्चा सुरू असायच्या. त्यातून भीमराव कळत नकळत घडत होते. पुलंच्या परिवारातल्या अनेकांशी परिचय होत होता. पुलं अनेकदा भीमरावांना ऑफिसात फोन करत. ऑफिसमधल्यांनाही त्याचं अप्रुप होतं. आणि ऑफिसात काही महत्त्वाचं काम आलं आणि भीमराव ऑफिसात नसतील, तर ऑफिसातून पुलंच्या ऑफिसात फोन जायचा. सगळ्यांना माहीत होतं भीमराव एनसीपीएतच गेले असणार.

पुलं भीमरावांना आग्रहाने चंद्रपूरच्या दलित साहित्य संमेलनात घेऊन गेले. पण त्यामधे आलेली एक अडचणही त्यांनी दूर केली. संमेलनाच्या तारखा त्यांनी आकाशवाणी पोर्ट ब्लेअर केंद्राला आधीच दिल्या होत्या. त्यामुळे अंदमानात जाण्याची त्याकाळी दुर्मीळ असणारी संधी सोडावी लागणार होती. पुलंनी संमेलनात नाव सूचवल्यामुळे भीमरावांनी आकाशवाणीला नकार कळवण्याची तयारीही केली होती. पण पुलं दोन्ही कार्यक्रम व्हावेत म्हणून आग्रही होती. त्यांनी आकाशवाणीचे स्टेशन डायरेक्टर असणा-या मधुकर गायकवाडांची भेट घेतली आणि पोर्ट ब्लेअरचा कार्यक्रम पुढे ढकलायला लावला. भीमरावांच्या आग्रहावरून पुलं एनसीपीएच्या वतीनं वैदर्भीय लोकगीतांचा एक कार्यक्रम आयोजित करणार होते. पण विदर्भातले कलावंत आणि अभ्यासकांचा उत्साह मावळल्यामुळे दस्तावेजाच्या दृष्टीने महत्त्वाचा कार्यक्रम होऊ शकला नाही.

मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्य हा दोघांच्या कॉमन आवडीचा विषय. त्याविषयी भीमराव एक प्रसंग सांगतात, ‘माझी भीड तोपर्यंत बरीच चेपली होती. एक दिवस मी पुलंसारख्या साहित्यातल्या मेरुमणीलाच पुस्तकं सजेस्ट करण्याची हिंमत केली. माझी भूमिका प्रामाणिक होती की आपल्याला आवडलेल्या विनोदाबद्दल त्यांच्याशी बोलावं. एक श्रीलाल शुक्लंचं रागदरबारी. मी रागदरबारीचं नाव काढताच त्यांनी कानाला हातच लावला. त्यातल्या विनोदाचा व्यापक पट आणि अफाट दर्जा याविषयी त्यांनी भरभरून सांगितलं. दुसरं होतं, इटालियन लेखक गुयानी गुरेत्शी. मी म्हटलं, मला त्याचा नावाचा उच्चारही नाही माहीत, पण मला याचा विनोद खूपच भावलाय. पुलंनी लगेच म्हटलं ‘ द हाऊस दॅट निनो बिल्ट’वालाच ना? तू काय वाचलंयस त्याचं. मी गेली अनेक वर्षं शोधतोय. पण फक्त एकच पुस्तक मिळालंय. त्यानंतर माझ्या चेह-यावर आनंद पसरला. कारण अकोल्यावर मुंबईत आल्यावर मी जवळपास दोन वर्षं मुंबईचे सगळे फूटपाथ पालथे घालत गुरेत्शीची सगळी पुस्तकं शोधून काढली होती. मला देशील का रे वाचायला, भाई अगदी काकुळतीला येऊन बोलले. पंधरा दिवसात परत देईन. आणि मी पुस्तक दिल्यावर पंधरा दिवसात एका लिफाफ्यात नीट पॅक करून त्यांनी ती पुस्तकं परत दिलीही. सोबत पुलंनी एक आपलं एक पुस्तक सही करून दिलं, ‘पुलं एक साठवण’. ते असं पुस्तक असं कुणाला सहसा देत नसत. ती साठवण मी जिवाच्या पार जपून ठेवलीय. मी माझ्या गीतालाही त्याला हात लावायला देत नाही.’ इति भीमराव.

गीता म्हणजे भीमरावांच्या पत्नी. लग्नानंतर त्या पुलं आणि भीमरावांच्या गप्पांच्या मैफिलीत जोडल्या गेल्या. त्याही मूळ पुलंसारख्याच सारस्वत. त्यांनी जातीची बंधनं न भीमरावांशी लग्न केलं याचं याचा त्यांना खूप आनंद होता. सारस्वतांच्या स्वयंपाकाविषयी ते त्यांच्याशी नेहमी बोलत. तू चांगला गातोस, यापेक्षाही तुझी बायको गोव्याची आहे, याचा मला जास्त आनंद आहे, असं ते भीमरावांना गमतीनं सांगायचेही.

भीमरावांची गझलेची पहिली कॅसेट ‘एक जखम सुगंधी’ खूप गाजली. तिचं प्रकाशन पुलंच्याच हस्ते झालंय. यातली मराठी गझल एकूण मराठी गाण्यांना नवं वळण देणारी होतीच. रसिकांना ती आजही भुरळ घालतेय. ती इतकी गाजली कारण त्याचा सरस दर्जा होताच. पण पुलंचा लाभलेला परिसस्पर्शही याला कारणीभूत होता. पुलंनी आपली पुण्याई आणि लोकप्रियता भीमरावजींच्या नव्या प्रयोगाच्या पाठिशी उभी केली. पुलंच्याच या परिसस्पर्शामुळेच माध्यमांमधे आणि अभिजनांच्या वर्तुळात भीमरावांचा प्रवेश तुलनेने सोपा झाला. नाहीतर विदर्भाच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या, कोणतीही शहरी सांस्कृतिकतेची पार्श्वभूमी नसलेल्या आणि छोट्या चणीच्या भीमरावांना मुंबईतल्या अभिजन वर्तुळाने स्वीकारणं सोपं नव्हतं.

भीमराव हे असं एकमेव उदाहऱण नाही. पुलंनी आजवर अनेक कलावंतांच्या पाठीवर असाच कौतुकाचा हात फिरवला आणि त्या कलावंतांचं सोनं केलं. त्यांनीच दादू इंदुरीकरांना शोधून ‘गाढवाचं लग्न’ महाराष्ट्रासमोर आणलं. मच्छिंद्र कांबळीचं ‘वस्त्रहरण’ मान टाकणारच होतं. पण पुलंची शाबासकी पेपरांत छापून आली आणि त्याने इतिहास घडवला. मराठी मातीतलं अस्सल बानवकशी जे काही गवसलं, त्याला पुलंनी आपल्या लोकप्रियतेची मदत घेऊन कोंदण मिळवून दिलं. महाराष्ट्रभर जे काही नवे प्रयोग होत होते, त्याच्या पाठिशी ते कायम उभे राहिले.

पुलंनी एका प्रगल्भ सामाजिक जाणिवेतून हे सातत्याने केलं. कितीही गुणवत्ता असली तरी सांस्कृतिक स्पर्धेत उतरणं सर्वसामान्य घरांमधून आलेल्या कलावंतांसाठी मुश्किल असतं. धावण्याच्या स्पर्धेची सुरुवात जिथे होते, तिथे पोहचण्यासाठीच त्यांना मैलोनमैल धावून यावं लागतं. अशावेळेस कुणीतरी पाठिशी ठामपणे उभं राहावं लागतं. पुलंनी गावागावातल्या धडपडणा-या प्रतिभांना कायम आधार दिला. चंद्रपूरच्या दलित संमेलनातल्या उद्घाटनाच्या भाषणात तर त्यांनी याविषयीचं आपलं जीवन तत्त्वज्ञानच मांडलंय. पण पुलंचा हा चेहरा क्वचितच समोर आणला गेला. भीमरावांसारख्या कलावंतांच्या पाठिशी उभे राहणारे पुलं आज आपल्याला ठावूकच नाहीत. पुलं म्हणजे विनोद, नॉस्टॅल्जिया, पुणं आणि पार्ले एवढंच मर्यादित ठेवण्यात आलं. तेच सा-यांच्या सोयीचं होतं. पण पुलंनी पेरलेलं आज बहराला आलंय. म्हणूच आज भीमरावांची साठी समाधानात आणि मोठ्या सन्मानाने साजरी होतेय. त्याचा पुलंना ते असतील तिथे खूप आनंद होत असेल.

सचिन परब,
क्रिएटिव पत्रकार,
मुंबई

0 प्रतिक्रिया: