Leave a message

Thursday, September 28, 2023

अंगण हा घराचा आरसा

एकदा एका खेडयात गेलो होतो. अंगणात बसलो होतो. सिगरेट काढली. नेहमीप्रमाणे  काडी नव्हती. पाटीलबुवांनी पोराला सांगितलं, "बावच्या आज्जाच्या कोपऱ्यांतून आगपेटी आन्!" आज्जाचा कोपरा! त्या चिमण्या घरातल्या एका कोपऱ्यात वर्षानुवर्षं म्हातारा आज्जा तरट टाकून बसायचा. त्यामुळं तो कोपरा आज्जाचा होता. आता आज्जा गेल्याला धा वर्स झाली तरी तो आज्जाचा कोपरा!

धोबी आणि तलाव दोघेही गेले तरी धोबीतलाव राहिला आहे तसा! अचेतनाला अशी सचेतनाच्या आठवणींची संगत असली की, लाकूड दगड-विटाही बोलक्या होतात. म्हणून मला 'नाना पेठ' म्हणणारांपेक्षा 'नानाची पेठ' म्हणणारी माणसं आवडतात. अजूनही पुण्यात 'शाळूकर बोळ' म्हणण्याऐवजी 'शाळूकराचा बोळ म्हणणारी माणसं भेटली शिवाजीनगरला भांबुर्ड म्हणणारे भेटले किंवा मुंबईच्या पाली हिलला, 'मोतमावली' म्हटलेलं आढळलं आणि सायनला, 'शीव' म्हणणारा दिसला की, माणूस माझ्या गोत्रातला वाटतो. मामंजी जाऊन पंचवीस वर्षं झाली तरी खोली मामंजींचीच झाली पाहिजे. बाप्पांच्या ओटीला बाप्पाचे पाय लागून दहा वर्ष होऊन गेली असतील, पण ती बाप्पांची ओटी! मग त्या ओटीला इतिहास येतो. तिथल्या आरामखुर्चीवर एकदम बसवत नाही. जस्ती काड्यांचा चष्मा लावून 'बलवंतराव म्हणजे अजब बुद्धीचा माणूस' म्हणणारे आणि पंचावन्नाव्या खेपेला 'गीतारहस्या'चं पारायण करणारे बाप्पा दिसतात आणि मग त्या खुर्चीवर बसून पुष्ट नितंबांचं वर्णन करणारी कथा वाचायला मासिक उघडायचं धैर्य नाही होत. मागली भिंतदेखील जस्ती काड्यांचा चष्मा लावून, "बघू रे, काय वाचतोस ते-" असं म्हणेल की, काय अशी भीती वाटायला लागते.

मुख्य म्हणजे असल्या घरांना अंगण असतं. अंगण हा घराचा आरसा आहे. आरश्यासारखं लख्ख सावरलेलं असतं म्हणून नव्हे. घरातलं कुटुंब किती नांदतय किती गाजतंय ते अंगणात पाहून घ्यावं. वयाची अदब सांभाळत पांडवासारखे बसलेले कर्ते मुलगे, माहेरवाशिणी, एकदोन पोक्त्यपूर्वतया आणि गुढग्यावर लुटलुटत अंगणपालथं घालणाऱ्या गुंड्यापासून ते दारीच्या आंब्यावर झोके काढणाऱ्या नातवंडांच्या संख्येवरून ते सारं घर पारखता येतं. 'अस्स अंगण सुरेख बाई' म्हणतात ते हेच! हे अंगण लखलखतं ते वडीलमंडळीविषयीच्या आदरातून, लेकी सुनांच्या गळ्यातल्या मण्यातून, आजी मावशीच्या लाडांतून आणि उघड्याबंब शरीराची लाज न बाळगता बसलेल्या तगड्या मुलांच्या गप्पातून! संसारातील सारी सुखं दुःख दारच्या प्राजक्तासारखी त्या अंगणात सांडलेली असतात. ती वेचत ही बैठक बसलेली असते.

- (अपूर्ण ) 
हि घरं ती घरं (पुरचुंडी)
हा लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा .

Sunday, September 17, 2023

लोकशाहीत विचारवंत निर्भय राहिले पाहिजेत

महाराष्ट्र शासनातर्फे पु.लं.ना 'महाराष्ट्र भूषण' हा पुरस्कार देण्यात आला. दिनांक २० फेब्रुवारी १९९८ रोजी ह्या पुरस्काराच्या वितरण समारंभाला पु.ल. उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांचे भाषण सौ. सुनीताबाईंनी वाचून दाखवले.
 
'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार वितरण समारंभाला आलेल्या आणि माझ्याविषयी आपुलकी बाळगणाऱ्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या प्रसंगी तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे माझे 'चार शब्द' स्वतः बोलण्याची माझी इच्छा होती, पण प्रकृतीच्या कारणाने माझ्याऐवजी सुनीता ते तुम्हांला वाचून दाखवील.

माझ्या अगणित मराठी बांधवांकडून लाभलेला हा पुरस्कार त्यांच्या मनातल्या माझ्यावरच्या प्रेमाचं एक विराट दर्शन मला घडवतो. इतक्या प्रचंड संख्येनी समाजानी मला आपला माणूस आहे म्हणणं, हा शब्दातीत गौव आहे. हा गौरव लेखन-वाचन-संगीत-नाट्य इत्यादी कलांद्वारे या उदार मनाच्या रसिकांशी माझा जो संवाद साधला गेला त्याकरता आहे, असं मी मानतो. त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायला माझ्यापाशी शब्द नाहीत.

गोविंदाग्रजांनी या महाराष्ट्राचं वर्णन,

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा


अशा यथार्थ शब्दांत केलं आहे. माझ्या सुदैवाने या महाराष्ट्रानी स्वतःच्या 'नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, ' या वर्णनाला साजेल असं दर्शन मला घडवलं आहे. माझ्या वाट्याला अधिक करून ही जी फुलंच येत गेली, स्वाबद्दल मी कृतज्ञ आहे.

माझ्या आयुष्याचं हे अखेरचं पर्व आहे. अशा वेळी मन काहीस निवृत्त होत जातं. जीवनग्रंथाच्या या अखेरच्या पर्वात अनुभवाला येणारी निवृत्ती ही सत्प्रवृत्तीइतकीच लोभस असते. आमचे कवी बा. भ. बोरकर यांनी आपल्या एका कवितेत म्हटलं आहे :
 
विझवून दीप सारे, मी चाललो निजाया
इथल्या अशाश्वताची, आता मला न माया


इथल्या अशाश्वताची माया बाळगू नये हे खरं, पण इथेही या अशाश्वताच्या आत दडलेल्या शाश्वताची जाणीव असली की जीवन हा आनंदोत्सव होतो. अगणित लोकांनी एकत्र येऊन केलेला माझा हा सन्मान हाही आनंदोत्सवच आहे.

या समारंभाचं आयोजन महाराष्ट्र राज्य शासनानं केलेलं आहे. अलीकडे राज्य-राजकारण-राज्यशासन-राजकीय पक्ष वगैरे शब्द भ्रष्टाचार-गुंडगिरी- खुनाखुनी-जाळपोळ यांना पर्यायी शब्द झाल्यासारखी अवस्था झाली आहे. 'बहुजन हिताय ! बहुजन सुखाय!' हे आपल्या देशाचं बोधवचन, पण प्रत्यक्षात मात्र फार विपरीत असं पाहायला, ऐकायला आणि वाचायला मिळतं. उच्चार आणि आचार यांच्यात तफावत पडताना दिसली की जीवनातल्या चांगलेपणावरचा विश्वासच उडत जातो. 'निराशेचा गाव आंदण आम्हांसी' ही संत तुकोबाची ओळ पुनःपुन्हा आठवायला लागते. कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचा तर आनंदाचा अनुभव देणारी निर्मिती करण्यातला उत्साहच नाहीसा होतो. आपल्या मताला अनुसरून लिहिण्याच, बोलण्याचं स्वातंत्र्य ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते. आपण सतत लोकशाही, जनमानस, जनतेचा कौल वगैरेबद्दल बोलत असतो. या सगळ्याच्या मुळाशी विचार, उच्चार आणि आचार या गोष्टींचं स्वातंत्र्य या कल्पना आहेत. लोकशाहीच्या राज्यात तर लोकांच्या हितासाठी मांडलेला विचार सत्ताधीशांना मानवला नाही, तरी सत्य लोकांपुढे आणलंच पाहिजे, असा आग्रह धरणारे विचारवंत निर्भय राहिले पाहिजेत. आपल्याला न पटलेला एखादा विचार सत्ताबळाने दडपून टाकणारे राज्यकर्ते साऱ्या सामाजिक प्रगतीला अगतिक करतात.

वयाच्या अखेरच्या टप्प्यात मला सर्वांत अधिक अस्वस्थ करणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे योग्य मुद्द्यांनी सिद्ध करण्याची घटना गुद्द्यांनी दडपून टाकण्याच्या प्रवृत्तीचा वाढता जोर ही आहे. विचारस्वातंत्र्याचा मी आजवर पाठपुरावा करीत आलो आहे. अशा वेळी लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा 'लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो' वगैरे बोलायला लागतात, तेव्हा माझ्यासारख्याला किती यातना होत असतील ते कोणत्या शब्दांत सांगू? 'निराशेचा गाव आंदण आम्हासी' ही संत तुकोबाची ओळ पुन्हा पुन्हा आठवायला लागते.

(अपूर्ण )
पुस्तक - पाचामुखी

हे भाषण पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.
a