Leave a message
Showing posts with label आचार्य अत्रे. Show all posts
Showing posts with label आचार्य अत्रे. Show all posts

Tuesday, January 24, 2023

मराठवाड्याच्या धुळीत अत्रे साहेबांनी दिलेला वसा पुलंनी आयुष्यभर टाकला नाही - प्रा. मिलिंद जोशी

पु.ल.देशपांडेंचे नुसते नाव जरी उच्चारले तरी मराठी माणसांच्या मनात आनंदाचं कारंजं सुरू होते. वक्तृत्व, साहित्य, नाट्य, संगीत, विनोद अशा सर्व कलांमध्ये रममाण होणार्‍या पुलंनी स्वत: आनंद घेतला आणि रसिकांनाही तो दिला. म्हणून तर आपण पुलंना ‘आनंदयात्री’ म्हणतो. श्री. म. माटे मास्तर म्हणत, ‘माणूस गेल्यानंतर जितका काळ त्याची आठवण काढली जाते, तितका काळ तो माणूस जिवंत असतो.’ महाराष्ट्रात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी पुलंची आठवण निघत नाही. इतकं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड आजही कायम आहे.

नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे पु.ल. अध्यक्ष होते. या संमेलनात आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडे एका व्यासपीठावर आले होते. त्या वेळेस मराठवाड्यातल्या रस्त्यांची अवस्था फारच बिकट होती. रस्त्यावर असणारे खड्डे, प्रचंड धूळ यामुळे अत्रे त्रासलेले होते. आपल्या भाषणात त्यांनी राज्यकर्त्यांवर यथेच्छ तोंडसुख घेतले. अत्रे म्हणाले, ‘काय हे मराठवाड्यातले रस्ते आणि काय ही धूळ! या धुळीनेच मी हैराण झालो आहे.’

नंतर पु.ल. भाषणासाठी उभे राहिले. अत्रेंच्या या भाषणाचा संदर्भ घेत म्हणाले, ‘ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली त्यांना या धुळीची इतकी भीती का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज अशी मोठी माणसं गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना त्या माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे असे वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही. अशा मराठवाड्यात अत्रे साहेब आपण आहात.’ लोकांनी टाळ्यांचा अक्षरश: कडकडाट केला.

सभाशास्त्राचा नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, ‘‘मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे’’. आचार्य अत्रेंचे शब्द खरे ठरले. अत्रेंच्या नंतर महाराष्ट्राला हसवण्याचे काम पुलंनी केले.

पुलंचा जन्म ८ नोव्हेंबर, १९१९ रोजी गावदेवी इथल्या कृपाळ हेमराज चाळीमध्ये झाला. त्यांचे वडील बेळगाव जवळच्या चंदगड गावचे. त्यांचं घराणं बेळगावजवळच्या जंगमहट्टीचं. घरासमोर गंधर्वगड आणि कलानिधीगड हे दोन गड होते. या दोन गडांचे दर्शन पुलंना रोज घडत होते. त्यांना ललित कलांविषयी आणि बालगंधर्वांविषयी जे आकर्षण वाटत होते ते कदाचित यामुळेच असेल.

पुलंचे आजोबा म्हणजे कारवारचे वामन मंगेश दुभाषी. त्यांनी ‘ऋग्वेदी’ या टोपण नावाने ग्रंथ लिहिले. त्यांनी ‘आर्यांच्या सणाचा इतिहास’ हा ग्रंथ लिहिला. टागोरांच्या गीतांजलीचे त्यांनी भाषांतर केले. नातवाने लेखक व्हावे असे आजोबांना वाटत होते आणि मुलाने गायक व्हावे असे वडिलांना वाटत होते. पुलंनी दोघांनाही नाराज केले नाही. पुलंच्या मातोश्री लक्ष्मीबाई यांचा गळा गोड होता. त्यांना पेटीवादनाची आवड होती. हे सारे वंशपरंपरेने पुलंमध्ये आले.

शाळकरी वयातच त्यांनी मास्तरांवर विडंबन लिहिलं होतं. ‘आजोबा हरले’ नावाचं प्रहसन लिहिलं होतं. नकला करणे, गाणे म्हणणे, पेटी वाजवणे, नाटकं लिहिणे, ती बसवणे, त्यात भूमिका करणे अशा अनेक गोष्टीतून पुलंचं व्यक्तिमत्त्व विकसित होत गेलं. १९४१ साली वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे पुलंना त्यांचे मुंबईचे बिर्‍हाड आवरून पुण्याला स्थलांतरीत व्हावे लागले.

१९४२ साली त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बी.ए.साठी प्रवेश घेतला. त्याकाळात त्यांना चरितार्थासाठी भावगीताचे कार्यक्रमही करावे लागले. १९५० साली सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून ते एम.ए. झाले. त्यानंतर बेळगावच्या राणी पर्वतीदेवी महाविद्यालयात, मुंबईच्या कीर्ती विद्यालयात आणि मालेगाव शिक्षण संस्थेत त्यांनी काही काळ अध्यापनाचे काम केले. १९४३ साली बडोद्याच्या अभिरूची मासिकामध्ये पुलंनी लिहिलेले अण्णा वडगावकर हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले. तिथून त्यांची अर्धशतकी लेखकीय कारकीर्द सुरू झाली.

चिंतामणराव कोल्हटकरांच्या ललित कलादर्शनाच्या नाटकानंतर मो. ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन कंपनीच्या नाटकांमध्ये पु.ल. काम करीत असत. रांगणेकरांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘कुबेर’ या चित्रपटात पुलंनी भूमिका केली. ‘जा जा गं सखी, जाऊन सांग मुकुंदा’ हे गीत पुलंनी गायले. इथून त्यांची मराठी चित्रपटसुष्टीतली कारकीर्द सुरू झाली. चोवीस मराठी चित्रपटात कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात पुलंची कामगिरी घडली.

‘तुका म्हणे आता’ हे मंचावर आलेले पुलंचे पहिले नाटक. त्याचा पहिला प्रयोग १९४८ साली पुण्यात झाला पण या नाटकाला यश मिळाले नाही. या नाटकात वसंतराव देशपांडे, वसंत शिंदे आणि वसंत सबनीस असे तीन ‘वसंत’ होते. एक संत आणि तीन वसंत असूनही नाटक चालले नाही असं पु.ल. म्हणत. त्यानंतर अंमलदार हे नाटक आलं, ‘तुका म्हणे आता’ हे गंभीर नाटक होते, ते लोकांनी विनोदाच्या अंगाने घेतले. अंमलदार हे विनोदी नाटक आहे, ते लोकांनी गंभीरपणे घेऊ नये असं पु.ल. म्हणाले.

२६ जानेवारी, १९५७ रोजी ‘तुझे आहे तुजपाशी’ हे त्यांचे नाटक रंगभूमीवर आले. ते मराठी नाट्यसृष्टीतील मैलाचा दगड मानले जाते. सौंदर्यासक्त काकाजी आणि जीवनविरक्त आचार्य या दोन जीवन प्रवृत्तीमधला संघर्ष पुलंनी या नाटकात मांडला. पुढे आलेल्या भाग्यवान, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, एक झुंज वार्‍याशी, ती फुलराणी, राजा ओयरीपौस या सारख्या नाटकांनी मराठी रंगभूमीला समृद्धी देताना प्रयोगशीलतेचे आणि नावीन्याचे भानही दिले. विशिष्ट विषयाचा आणि मांडणीचा आग्रह नाही. आपल्याला जे आवडते तेच लोकापर्यंत पोचवायचे हा पुलंचा सरळ हेतू होता.

पुलं स्वत: उत्तम अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार, निर्माते असल्यामुळे रंगमंचावर प्रायोगिक कसे व्हावे याचे प्रगल्भ भान त्यांना होते. म्हणूनच रंगभूमीच्या इतिहासात पुलंनी आपल्या विविधांगी कर्तृत्वाने मानाचे स्थान मिळवले. १९५५ मध्ये पुलं आकाशवाणीच्या सेवेत पुणे केंद्रावर रूजू झाले. १९५१ ते १९६१ या काळात भारतातल्या दूरदर्शनचे पहिले निर्माते म्हणून त्यांची दिल्लीतली कारकीर्द संस्मरणीय ठरली. याच काळात जनवाणी, साधना, दीपावली, शिरीष, विविध वृत्त वगैरे नियतकालिकांमधून बटाट्याच्या चाळीतल्या गमतीजमती विनोदी शैलीत मांडणारे त्यांचे लेख प्रसिद्ध होत होते. ते खूप गाजत होते. १९५८ साली मौज प्रकाशनगृहाने ‘बटाट्याची चाळ’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध केले.

पुढे युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास एज्युकेशनचा अभ्यास करण्यासाठी ते लंडनला गेले. लंडनमधल्या मुक्कामात बटाट्याची चाळमधील निवडक निवडक भागांचे अभिवाचन त्यांनी केले. त्यातूनच ‘बटाट्याची चाळ’ प्रत्यक्ष अवतरली. पुढे वार्‍यावरची वरात, असा मी असामी, वटवट, हसवणूकच्या माध्यामातून पुलंनी मांडलेल्या खेळाने मराठी माणसांना भरभरून आनंद दिला. बटाट्याची चाळ मधून पन्नास-साठ बिर्‍हाडांचा एक मानस समूह त्यांनी निर्माण केला आणि मध्यमवर्गीयांच्या जगण्याची त्यांनी मार्मिक उलटतपासणी केली. ती लोकांना भावली. पुलंच्या या सर्व प्रयोगांना रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

एका व्यक्तिला चारच तिकीटे मिळतील असा तो सुवर्णकाळ होता. प्रयोगाची वेळ आणि संहिता याबाबत पुलं आणि सुनीताबाई दोघेही खूप दक्ष होते. संहितेतला एक शब्दही बदलला जाता कामा नये. याबाबत ते आग्रही होते. कितीही मोठा अधिकारी किंवा पुढारी प्रयोगाला येणार असला तरी पुलंनी प्रयोगाची वेळ कधी बदलली नाही. ‘रसिकांनी पाच वर्षाखालील मुलांना प्रयोगासाठी आणू नये’ अशा त्यांना सूचनाच होत्या. नटांचे पाठांतर असलेच पाहिजे. ‘पाठांतर नसणे म्हणजे हातात लगाम न घेता घोड्यावर बसण्यासारखे आहे’ असं पुलं म्हणत.

त्या काळात या प्रयोगाचे पंधरा रूपये तिकिट ठेवले असते तरी लोक आले असते पण पुलंनी पाच रूपयेच तिकिट ठेवले. ‘बटाट्याची चाळ’ फॉर्मात असतानाच पुलंनी ‘वार्‍यावरची वरात’चे प्रयोग सुरू केले. नवे-नवे प्रयोग ते सतत करीत राहिले. पुलं थकताहेत, दम लागतोय हे लक्षात येताच त्यांनी प्रयोग बंद केले. सदाभिरूची न सोडता प्रेक्षकांपुढे आसू व हसूचे खेळ करून त्यांची करमणूक केली.

‘गर्दी खेचण्यासाठी सदाभिरूचीच्या मर्यादा ओलांडण्याची गरज नसते’ हे पुलंचे सांगणे आजच्या रसिकांच्या अभिरूचीवर स्वार होणार्‍या कलावंताना खूप काही सांगणारे आहे.

इंग्लंडमधल्या वास्तव्यावर, एकूण प्रवासावर आधारलेले ‘अपूर्वाई’ हे पुलंचे प्रवासवर्णन किर्लोस्कर मासिकात क्रमश: प्रसिद्ध झाले. १९६० मध्ये ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर आलेल्या ‘पूर्वरंग’, ‘जावे त्यांच्या देशा’, ‘व्यंगचित्रे’ या प्रवास वर्णनातून पुलंनी मराठी माणसाला जगाचे दर्शन घडवले आणि त्यांच्या जाणिवांचा परिघ विस्तारला. पुलं गुणग्राहक होते. चांगलं काम करणार्‍या सर्व क्षेत्रातील माणसांविषयी त्यांना कमालीची आस्था होती. त्यांचा गुणगौरव करण्यासाठी पुलंनी व्यक्तिचित्रं लिहिली ती व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, गुण गाईन आवडी आणि मैत्री या पुस्तकात संग्रहित झाली आहेत. पुलंची ही व्यक्तिचित्रं शब्दशिल्पच आहेत.

‘माझं पहिलं प्रेम संगीतावर आहे’ हे पुलंनी अनेकदा सांगितलं. संगीतात जो कैवल्यात्मक आनंद मिळतो त्याची सर दुसर्‍या कशालाही नाही असं पुलं म्हणत. दूरदर्शनवरच्या एका मुलाखतीत पुलं म्हणाले, ‘‘माझ्या लेखी शंभरपैकी साठ गुण संगीताला आहेत. संगीताकडं पुरेसं लक्ष देता आलं नाही याची खंत या जन्मात आहे. पुढच्या जन्मी ही चूक नक्की सुधारेन. माझ्या समाधीवर ‘याने कुमारगंधर्वांचे गाणे ऐकले आहे’ एवढेच लिहा.’’

पुलंच्या वाढदिवसाला किशोरी आमोणकरांनी शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. किशोरीताई म्हणाल्या, ‘पुलं तुमच्यासाठी काय करू?’ पुलं म्हणाले, ‘‘गा’’. किशोरीताई फोनवर खंबावती गुणगुणल्या. पुलं म्हणत, ‘‘कालचक्राबरोबर फिरणारं ध्वनीचक्र माझ्या मनात नेमकं राहतं. माझ्या आवाजाच्या दुनियेत जास्त रंग भरला असेल तर तो संगीताने! ज्या वयात लहान मुलांचं प्रसादाच्या खिरापतीकडे लक्ष असायचं, त्या काळात माझं लक्ष कीर्तनकाराच्या कथेमध्ये, ते गात असलेल्या अभंग, श्‍लोक, आर्या यांच्या गायनामध्ये असायचे.’’

पुलं समर्थ पेटीवादक होते. लहान वयातच बालगंधर्वांच्या समोर त्यांचीच गाणी वाजवून पुलंनी त्यांची शाबासकी मिळवली होती. पुलं म्हणत, ‘माझ्या हातात प्रथम पेटी पडली त्याऐवजी सतार पडली असती तर माझी संगीतातली वाटचाल वेगळी झाली असती. रागवादन, आलापी, घरंदाज ख्याल, गायकी या दिशांनी झाली असती. पेटीवाले गोविंदराव पटवर्धन यांच्या सत्काराला पुलं प्रमुख पाहुणे होते. भाषणात पुलं म्हणाले, ‘‘मी इथं अध्यक्ष म्हणून आलो नाही. पेटीवाला म्हणून आलोय.’’

गीतरामायणात व्हायोलिन वाजविणार्‍या प्रभाकर जोग यांचा पुलंच्या हस्ते सन्मान झाला तेव्हा पुलं म्हणाले, ‘‘माणसं पराधीन असतात हे गदिमांच्या गीतरामायणात ऐकलं होतं पण इतकी स्वराधीन असतात हे जोगांचं व्हायोलिन ऐकल्यानंतर समजलं.’’

संगीत क्षेत्रातील कलावंतांविषयी पुलंना किती आस्था आणि आपुलकी होती, हे यातून दिसून येतं. पुलंची संगीत दिग्दर्शनाची कामगिरी दोन स्तरावरील आहे. एक भावगीतासाठी संगीत दिग्दर्शन आणि दुसरं चित्रपटगीतासाठीचं. पुलंनी बोलपटातील 88 गाण्यांना चाली दिल्याची नोंद आहे. संगीतकार जेव्हा साहित्यातून संगीताकडे येतो तेव्हा सूर, त्यांना वाहणारे शब्द व त्यामागील अर्थ यांचे परस्सर संबंध घट्ट होतात. अर्थ, भावना, सुरांवर तरंगतात. त्यात बुडून जात नाहीत म्हणूनच ते संगीत हृदयाला अधिक भिडतं, हे पुलंच्या संगीताचं वैशिष्ट्य आहे.

पुलंच्या सर्व आविष्कारामध्ये विनोदाची सुखद पखरण आहे. त्यांच्या विनोदाचं आणि विनोदबुद्धीचं मर्म प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी नेमकेपणानं उलगडलं आहे. त्या सांगतात, ‘‘पुलंची कल्पनाशक्ती अव्वल दर्जाची होती. पुलं स्वत:च्या संवेदना स्वत:वर उधळणारे साहित्यिक होते. म्हणून ते कलेच्या विविध प्रांतात सहजपणे वावरले आणि रमले.’’ पुलंची दृकसंवेदना, नाट्यसंवेदना, अर्थसंवेदना, रससंवेदना, श्रोतृसंवेदना अतिशय तल्लख आणि सजग होती. ती संवेदना एकांगी आणि सामान्य पातळीवरची नव्हती तर ती अनेकांगी आणि असामान्य पातळीवरची होती, म्हणूनच त्यांचं साहित्य अनुभवसमृद्ध आहे.

सूक्ष्म निरीक्षणशक्ती, भाषेवर विलक्षण प्रभुत्व, उपहास, उपरोध, विडंबन यांचा सहज वापर, विविध क्षेत्रातील संदर्भांची समृद्धी, सहजता आणि तारतम्याचे भान यामुळं पुलंचा विनोद सहजसुंदर आणि निर्विष झाला. जगातल्या दोन महायुद्धांनी हादरलेली, देशाच्या पारतंत्र्याने पिचलेली, महागाई, टंचाई, कुचंबणा, कोतेपणा यांनी गांजलेली, वेळोवेळी येणार्‍या साम्यवाद, समाजवाद, स्त्रीवाद या नवविचारांचा अर्थ लावताना गांगरलेली, जीवनाचा उपभोग घेताना अपराधगंडाने पछाडलेली माणसं पुलंचं लक्ष्य होती. त्यांना पुलंनी मोकळं ढाकळं केलं. जीवनोन्मुख केलं.

खोगीरभरती, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक, खिल्ली, मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास ह्या त्यांच्या विनोदी लेखसंग्रहांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. पुलंनी विनोद लिहिला. अभिनित केला. उत्तम वक्तृत्वाने तो लोकापर्यत पोचवला. सिनेमा-नाटकातून तो दाखवला. इतका दीर्घकाळ मुक्तहस्ताने विनोदाची चौफेर उधळण करणारा दुसरा विनोदकार मराठी समाजाला मिळाला नाही. अपार करुणा आणि आयुष्याविषयीची खोल समज यामुळे पुलंनी जे काही निर्माण केलं ते रसिक मनांचा ठाव घेणारं ठरलं. जीवनातील विसंगती आणि विकृतीकडं त्या बुद्धीनं पाहणार्‍या पुलंच्या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या विनोदानं कोणालाही जखमा केल्या नाहीत, बोचकारलं नाही आणि रक्तही काढलं नाही.

पुलंच्या विनोदानं मराठी माणसाला खळखळून हसवताना रसरशीत जीवनदृष्टी दिली. एखाद्या घरंदाज सुनेनं चार-चौघांसमोरून जाताना स्वत:चा पदर सावरत ज्या अदबीनं जावं तितक्या सभ्यपणे पुलंचा विनोद मराठी समाजात वावरला. शाब्दिक, प्रसंगनिष्ठ, कोटीबाज अशा सर्व प्रकारच्या विनोदाची उधळण पुलंनी केली. उत्तम लेखक उत्तम वक्ते असू शकत नाहीत याची अनेक उत्तम उदाहरणं आपल्याकडं आहेत. लेखणी आणि वाणी ही शब्दशक्तीची दोन्ही रूपं पुलंवर प्रसन्न होती. बोलताना पुलंचा विनोद एखाद्या कारंज्यातल्या पाण्याच्या धारेप्रमाणं सहज उसळून येत असे. याचा प्रत्यय त्यांच्या लहानपणापासूनच येत होता.

पुलं दहा-अकरा वर्षाचे होते तेव्हाची गोष्ट. पार्ल्याला टिळकमंदिरात साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांचे ‘गर्व्हमेंट ऑफ इंडिया ऍक्ट’ या विषयावर व्याख्यान होते. व्याख्यानानंतर शंका निरसनासाठी प्रश्न-उत्तरं सुरू झाली. पुलं म्हणाले, ‘‘फेडरेशन राबविण्याचा मुद्दा पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगाल का?’’ पुलंकडे पाहत केळकर म्हणाले, ‘‘बाळ, तुझ्या वयाला साजेसा प्रश्न विचार.’’ त्यावर पुलं म्हणाले, ‘‘सध्या पुण्यात अंजिराचा भाव काय आहे?’’ त्यावर न. चिं. केळकर यांनाही हसू आवरलं नाही.

पुलंनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. एका मुलाखतीत त्याचा संदर्भ देत संवादक म्हणाला, ‘‘यांचं मन वकिलीत रमलं नाही.’’ त्यावर पुलं म्हणाले, ‘‘माझं मन वकिलीत रमलं नाही असं म्हणण्यापेक्षा अशिलाचं मन माझ्यात रमलं नाही असं म्हटलं तर जास्त योग्य ठरेल. ज्याप्रमाणे निष्पक्षपाती न्यायाधीश असतात त्याप्रमाणे मी निष्पक्षकार झालो असतो. ’’

पुलं आणि सुनीताबाईंनी बा. भ. बोरकर, आरती प्रभू यांच्याप्रमाणेच बा. सी. मर्ढेकर या कवींच्या काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. मुंबईला मर्ढेकरांच्या कवितांचं वाचन पुलं आणि सुनीताबाई करणार होते. मध्यंतरात पुलंना थोडंस काहीतरी खायला लागायचं. तशा सूचना त्यांनी संयोजकांना दिल्या होत्या. संयोजकांनी ढोकळे, सामोसे, बर्फी इतके पदार्थ आणले होते की ते पाहून पुलं म्हणाले, ‘‘लोक ‘मर्ढेकर’ ऐकायला आले आहेत. ‘ढेकर’ ऐकायला नाही.’’

विजापूरला शाळेत पुलंचं भाषण होतं. टेबलावर पाणी नव्हतं. पुलंना ते हवं होतं. संयोजक कळशी व तांब्या घेऊन आले. पुलं म्हणाले, ‘‘पाणी प्यायला हवंय. आंघोळीला नकोय.’’ जालन्याला पुलंच्या सभेत शेळी शिरली. पुलं म्हणाले, ‘‘येऊ द्या तिला, महात्माजींच्या नंतर प्रथमच तिला सत्य ऐकायला मिळणार आहे.’’ पुलंच्या लेखनाकडं आणि भाषणाकडं गांभीर्यानं पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवते, मराठी भाषेवर पुलंचे प्रेम आहे. म्हणूनच पुलंच्या शैलीविषयी महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत लिहिलेल्या लेखात स. ह. देशपांडे म्हणतात, ‘‘पुलंचे भाषेवर प्रेम आहे तसा त्यांना भाषेचा अभिमानही आहे.’’

पुलं इंग्लंडला गेले. वर्डस्वर्थच्या स्मारकाजवळ जगातल्या इतर अनेक भाषातले त्या स्मारकाजवळ माहिती देणारे फलक होते, पण मराठीतला एकही फलक नव्हता. पुलंना ही गोष्ट खटकली. त्यांनी व्यवस्थापकाला विनंती करून परवानगी मिळवली. मराठीतला फलक स्वत: लिहिला.

पुलंनी भाषा वापरली, वाकवली आणि वाढवली. मानवेतर गोष्टींचं मानवीकरण हे पुलंच्या शैलीचं वैशिष्ट्य होतं. समाजात ज्यावेळी कसोटीचे प्रसंग येतात तेव्हा समाज विचारवंताच्या भूमिकेकडं मोठ्या आशेनं पाहत असतो. अशा काळात विचारवंतांचं सत्त्व पणाला लागलेलं असतं. आज कोणतीही भूमिका न घेणं, एवढीच एक भूमिका समाजातील विचारवंत घेत असतात. पुलंच्या बाबतीत मात्र असं घडलं नाही. त्यांनी गरज असेल तेव्हा नेहमीच ठाम भूमिका घेतली. आणीबाणीच्या काळात दुर्गाबाई भागवत वगळता अन्य साहित्यिकांनी भूमिका घेतली नाही असा अपप्रचार जाणीवपूर्वक काही मंडळींनी केला पण त्यात तथ्य नव्हतं.

जयप्रकाश नारायण यांच्या प्रिझन डायरीचा अनुवाद पुलं करत होते. त्याचा पक्का मसुदा सुनीताबाई करत. या कामासाठी पूर्ण वेळ देता यावा म्हणून ते सभा, सत्याग्रह यात सहभागी झाले नाहीत. या गोष्टीची पुलं आणि सुनीताबाईंनी कधीही जाहिरात केली नाही. आणीबाणीनंतरच्या निवडणुकात इंदिरा गांधींनी वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले, ‘ही वीस अध्यायाची गीता आहे.’ त्याचा समाचार घेताना पुलं भाषणात म्हणाले, ‘ही गीता आहे हे बरोबरच आहे, कारण सुरुवातीला संजयउवाच आहे.’ त्यावर एक राजकीय नेता म्हणाला, ‘यांना आता कंठ फुटला आहे.’ पुलं म्हणाले, ‘गळा यांनीच दाबला होता, मग कंठ कसा फुटणार?’ आपली ठाम भूमिका पुलंनी नेहमीच स्पष्टपणे मांडली.

आणीबाणीनंतरच्या निवडणुकात जनता पक्षाचा विजय झाला. एस. पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होती. पुलंना न विचारताच त्यांचं नाव वक्ता म्हणून बोलणार्‍यांच्या यादी टाकण्यात आलं होतं. लोकाग्रहाला पुलंनी बळी पडू नये असे सुनीताबाईंना वाटत होते. पुलंनाही ते पटले. स्वत: न जाता पुलंनी त्यांच्या भाषणाची कॅसेट या सभेसाठी पाठवली. पुलं लोकप्रियता आणि लोकमान्यतेच्या शिखरावर होते. जनमानसात त्यांची एक प्रतिमा होती. पती म्हणून पुलंचे सुनीताबाईंना आलेले अनुभव वेगळे होते. ते आपण मांडले तर चाहत्यांच्या मनातील पुलंच्या प्रतिमेला धक्का बसेल का? असा विचार दुसर्‍या कोणीतरी निश्चितच केला असता. जे घडून जायचं ते घडून गेलं आहे. त्याचं चर्वितचर्वण कशाला? असा विचारही मनात आला असता पण तो सुनीताबाईंच्या मनात आला नाही.

पुलंच्या अलौकिक प्रतिभेविषयी, त्यांच्या माणसं जोडण्याच्या कलेविषयी, त्यांच्या हजरजबाबीपणाविषयी सुनीताबाईंना नितांत आदर होता. प्रतिभावंत म्हणून घडणारं पुलंचं दर्शन आणि पती म्हणून घडणारं पुलंचे दर्शन या दोन्हीची अतिशय सुरेख मांडणी ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकात सुनीताबाईंनी केली. अनेकदा पतीच्या प्रतिभेच्या, प्रसिद्धीच्या, मोठेपणाच्या तेजात त्याच्या पत्नीचं तेज लुप्त होऊन जातं. मग त्या तेजाचं लुप्त होणं हा कौतुकाचा विषय होतो. ‘पुलंचे मोठेपण निर्विवाद आहे, पण माझी म्हणून स्वतंत्र ओळख आहे, ती जपली गेली पाहिजे. इतर कुणी ती जपावी अशी अपेक्षा नाही, मात्र मी ती प्राणपणाने जपेन’ या भूमिकेतून सुनीताबाई स्वत्वाची आणि सत्त्वाची जपणूक कशा करीत राहिल्या, ते या पुस्तकात वाचायला मिळतं.

पुलंच्याकडं अलौकिक प्रतिभा होती. सुनीताबाईंकडं व्यवहारदृष्टी होती. प्रतिभेचं लेणं त्यांच्याकडेही होतं. पुलंचं यश घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता हे मात्र निर्विवाद. पुण्यात २००२ साली जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्यात ज्येष्ठ लेखिकांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सुनीताबाईंनी हा सत्कार स्वीकारावा यासाठी संयोजकांनी प्रयत्न केला होता. सुनीताबाईंनी हे निमंत्रण नाकारलं. सर्वाधिक लोकप्रिय लेखकाची पत्नी तसेच स्वतंत्रपणे लक्षणीय लेखिका, वत्सल कुटुंबिनी तसेच कर्तव्यकठोर विश्‍वस्त, काव्यप्रेमी रसिक तसेच परखड समाज हितचिंतक असे सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते.

आधुनिक महाराष्ट्रातल्या स्पष्ट, निर्भय, तेजस्वी आणि बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांमध्ये सुनीताबाईंचं स्थान अगदी वरचं आहे. पुलंच्या उत्साहाला आणि अफाट सर्जन ऊर्जेला विधायक वळण देत सुनीताबाईंनी जे पुलंसाठी केलं त्याबद्दल मराठी माणसं नक्कीच त्यांच्या ऋणात राहतील, कारण त्यांच्यामुळंच पुलंच्या निर्मितीचा आनंद रसिकांना भरभरून घेता आला. पुलं आणि सुनीताबाईंनी केवळ भांड्याकुंड्यांचा संसार केला नाही. त्यांनी संसार केला तो सर्जनाचा. त्यामुळंच मराठी माणसांची सांस्कृतिक श्रीमंती वाढली.

पुलंची जन्मशताब्दी साजरी होत असताना सुनीताबाईंचं स्मरण केलं नाही तर ती कृतघ्नता ठरेल. पुलंनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं आणि भरभरून आनंद दिला. त्याचबरोबर निखळ जीवनदृष्टी दिली. विनोदकाराबरोबरच विचारवंत आणि कलावंत म्हणूनही पुलंचं स्थान महत्त्वाचं आहे. ‘विनोदबुद्धीची ढाल हातात असली आणि अंगात रसिकतेचं चिलखत घातलं की जीवनातल्या सगळ्या संकटांना नामोहरम करता येतं’ हे जीवनतत्त्व त्यांनी मराठीजनांना हसतखेळत सांगितलं.

भाई, पुलं, पीएल, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व अशा विविध रूपात वावरणारे पु. लं. देशपांडे ही केवळ एक व्यक्ती नाही, ती वृत्ती आहे. या जगातलं दु:खं नाहीसं करता येत नाही पण ते हलकं करण्याची आस या वृत्तीत होती. या वृत्तीला रसिकतेची आणि शुभंकराची ओढ होती. ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते’ अशा सगळ्या गोष्टींचा ध्यास होता. स्वत: पुलंना इतरांना फुलवायचं आणि स्वत: आनंद घेताना तो इतरांनाही मिळावा यासाठी प्रयत्न करायचा हेच त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं. त्यांनी स्वत:साठी काहीच साठवलं नाही. उलट समाजाकडून घेतलेलं समाजालाच वाटून टाकलं. पुलंची जन्मशताब्दी साजरी करत असताना ही ‘पुलकितवृत्ती’ अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर ते पुलंचं कृतज्ञ भावनेनं केलेलं खरं स्मरण ठरेल.

प्रा. मिलिंद जोशी
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.
९८५०२७०८२३

सदर लेख साप्ताहिक चपराक मध्ये पूर्वप्रकाशित आहे

मूळ स्रोत - > https://thepostman.co.in/pu-la-deshpande/

Tuesday, September 20, 2011

पुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे

पुलंच्या एका सत्कार समारंभानंतर अत्र्यांनी त्यांच्या ‘मराठा’ दैनीकात पु.लंवर हा लेख लिहिला होता

मराठीतील ख्यातनाम विनोदी लेखक, महान संगीतकार, उत्तम दिग्दर्शक, कुशल नट आणि आमचे परममित्र श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची ४७ व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी निवड झाली, म्हणून परवा विलेपार्ले येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. मुंबईतील अनेक सत्कारसमारंभ आम्ही पाहिले आहेत आणि स्वत: आम्हालाही अनेक वेळा या सत्कारांना ’तोंड’ द्यावे लागले आहे, परंतु काल ’पु.ल.’ यांचा आम्ही जो सत्कार पाहिला तो अक्षरश: अविस्मरणीय होता. त्याची भव्यता, त्याची गोडी दीर्घकाळ मनात रेंगाळत राहणारी! जनतेचे पु.ल. यांच्यावर किती अमाप प्रेम आहे. नि मराठी माणसाला राजकारणाप्रमाणेच नाट्याविषयीही किती ’रस’ आहे त्याची ’पोचपावती’ काल पु.ल. यांच्या सत्काराला दहा हजारांच्यावर प्रचंड संख्येने गर्दी करुन जनतेने दिली आहे. हा सत्कार जर ’शिवतीर्था’वर झाला असता तर सारे ’शिवतीर्थ’ वाहून गेले असते! आम्ही स्वत: पु.ल. यांच्या विनोदावर, पु.लं.च्या नाट्यकृतीवर नि विशेषत: संगीतावर बेहद्द खूष आहोत! महाराष्ट्रात एवढा बहुगुणी आणि निर्मळ वृत्तीचा माणूस आज तरी आम्हाला दिसत नही! परवा हा जो पु.ल. यांचा भव्य सत्कार झाला त्या सोहळ्याला अध्यक्षस्थानी आम्ही स्वत: होतो. आम्ही अध्यक्ष होतो म्हणून पां. वा. गाडगिळांनी पाठविलेल्या संदेशात मोठ्या आपुललीने पु.ल. यांच्याबरोबर आमचाही गौरव केला. परंतु पु.ल. यांच्या सत्काराला आम्ही अध्यक्ष होतो ह्याचा पु.ल. पेक्षा आम्हालाच खरोखरी आनंद वाटला.
महाराष्ट्रात मराठी भाषेची, मराठी कलेची, मराठी नाट्याची ज्यांनी ज्यांनी मान उंचावली त्या प्रत्येकाचा मुक्तकंठाने गोरव करण्यात आम्ही धन्यता मानली आहे आणि पु,ल. चा आणि आमचा संबंध तर कितीतरी वर्षापूर्वीचा आहे. आमच्या एका किर्तनाला पु.लं. नी मागे टाळांची साथ देऊन तुकोबांचा एक अभंग रसाळपणे म्हटल्याचे आम्हांला आठवते. तेथपासून आम्ही पु.लं.च्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करीत आलो आहोत. ही व्यक्ती एवढी बहुरंगी आहे की, त्यांना काय येत नाही हाच मोठा प्रश्न आहे. त्यांच्या विनोदाचा वारसा त्यांना आजीकडून मिळाला असल्याचे ते सांगतात. ती गोष्टही मोठी गंमतशीर आहे. त्यांच्या आजीकडे त्यांचे मामा काही मंडळी घेऊन येत. ती बहुधा पेहेलवान असत. एकदा त्यांचे मामा आजीला म्हणाले की, ’आजी ही माणसे पेहेलवान आहेत बरं का.’ तेव्हा आजी म्हणाली, "असं का, बरं झालं, मघापासून कोळशाचं पोतं घरात आणायला मी माणूस पाहातच होते!" पु.ल.. यांचा आजचा विनोद , आजची व्याख्याने आणि सर्व लेखन वरवर पाहिले . तरीही त्यांच्या आजीच्या या धर्तीच्या उपजत विनोदावरच ते सारे पोसले आहे हे अगदी खरे आहे. ’तुझे आहे तुझपाशी’ हे नाटक तसेच खोगीरभरती. नस्ती उठाठेच, गोळाबेरीज हे कथासंग्रह. अपूर्वाई, पूर्वरंग ही प्रवासवर्णने आणि ’पुढारी पाहिजे’ या लोकनाट्यातील उपहासगर्भ विनोद यामागेही हीच वृत्ती आहे.

पु.ल. यांचा विनोद अत्यंत निर्मळ आहे. आयुष्यात त्यांनी वावगे काही लिहिले नाही. विनोदी लेखकांविषयी समाजात पुष्कळ गैरसमज असतात. विनोद ही अत्यंत अवघड गोष्ट आहे हे आम्ही अनुभवावरुन सांगतो. विनोद करणारा माणूस समाजातील ज्या व्यंगावर विनोद करतो त्याचा त्याने सूक्ष्मपणे अभ्यास केलेला असावा लागतो. जीवनातील विसंगती हुडकताना त्याला सुसंगतीचा साक्षात्कार झालेला असतो. सर्कशीतील विदूषक वरुन जरी बावळट दिसला , तरी सर्व ’क्रिडापटूंची’ कला त्याला अवगत अस्ते, ह्याची कितीकांना कल्पना असते? विनोदकरांचे असेच आहे. पु.लं.चा विनोद हा विनोदाचा एक स्वतंत्र प्रकार आहे आणि नाट्यातील त्यांचा विनोद तर खरोखरीच अतिशय आल्हादकारक आहे. ’तुझे आहे तुजपाशी’ मधे ’सुत’ कातणार्‍या श्यामला काकाजी म्हणतो, ’ज्या वयात सुत जमवायचे त्या वयात सुत काय काततोस?’ हा विबोद किती श्रेष्ठ दर्जाचा आहे! या विनोदात केवळ शाब्दिक कोटी नाही. जीवनातले एक तत्वज्ञान त्यात सामवलेले आहे. नाट्य आणि राजकारण ह्यांचे बाळकडू मराठी माणसाला मिळाले आहे. म्हणून मराठी माणसाच्या जीवनात संघर्ष व नाट्य आहे. हे नाट्य आणि जीवनातील संघर्ष पु.लं.नी बरोबर ओळखला आहे. म्हणूनच पु.ल. यशस्वी नाटककार झाले आहेत.

एक गोष्ट सांगतो, पु.लं.च्या नाटकातील तंत्राविषयी आनचा थोडा मतभेद आहे. पु.लं.च्या नाटकात काही वेळा हास्य व अश्रू यांची गल्लत होण्याचा संभव वाटतो. पु.ल. यांचा प्रयत्न नि:संशय मोठा आहे. एकाच वेळी हसू ओठावरून रुंदावत असताना क्षणात डोळ्यांतुन पाणी काढणे हे असामान्य सामर्थ्य आहे नी:संशय. पु.ल. तसाच प्रयत्न करीत आहेत. अर्थात अवघड प्रयत्न आहे हा. आणखी एक गोष्ट सांगतो. पु.लं.च्या विनोदामध्ये पुषकळ वेळा ते पटकन आत्मलक्षी बनतात. ह्याचे कारण त्यांची मूळची वृत्ती भावुक असेल हे खरे, परंतु यामुळे विषयाचा रसभंग होण्याची शक्यता असते. पण हे आमचे किरकोळ मतभेद आहेत. पु.ल. यांच्या गौरवाला, श्रेष्ठपणाला आणि समर्थ लेखणीला त्यामुळे जराही उणेपणा येत नाही. कारण पु.ल. चे लेखन मग ते नाट्य असो, कथा असो की प्रवासवर्णने असोत-- इतकं सिद्धहस्त आहे की, एक दोन मतभेदांतून त्याला कधीही कमीपणा येणार नाही.

पु.ल. यांच्या नाट्याचे आणि साहित्याचे समीक्षण करण्याची ही जागा नाही नि वेळही नाही. पु.लं.चे फक्त कौतुक करायची वेळ आहे. ते सिद्धहस्त आहेत. नाट्य-कलेबाबत बोलावयाचं तर फक्त आम्ही एवढंच म्हणू की, ’तुझे आहे तुजपाशी’ हे एकच नाटक पु.लं.नी जरी लिहिले असते तरी आम्ही त्यांना ’नाटककार’ गौरवैले असते. ह्या एकाच नाटकाने ते अमर झाले आहेत. आमच्या परवांच्या भाषणात पु.लं.च्या गौरवासंबंधी बोलताना आम्ही एक मुद्दा मांडला. आजपर्यंत अनेक वेळा आम्ही तो मुद्दा आहे. स्वत: आम्ही, पु.ल., विजय तेंडुलकर, बाल कोल्हटकर, वसंत कानेटकर इत्यादी नाटककार मराठी रंगभूमीवर तेजस्वी कामगिरी बजावत असताना नटश्रेष्ठ केशवराव दारे ’मराठी रंगभुमी १९३० नंतर संपली’ असे म्हणतात. याचे आम्हाला परमदु:ख होते. केशवरांनी या नाटकरांना, नविन नटांना आणि नटींना उत्तेजन द्यावयास हवे, आशीर्वाद द्यावयास हवा! आजची प्रगतीशील मराठी रंगभूमी नटवर्य दाते यांजकडून आशीर्वादाची अपेक्षा करीत आहे. प्रोत्साहनाच्या दोन शब्दांची अपेक्षा करीत आहे! आणि एवढेही सांगून केशवरांवाना मराठी रंगभूमीचे आजचे तेजस्वी रुप दिसले नाही तरी तिच्या यशाची पावती लक्षावधी जनतेकडून आज मिळत आहे. हे अमाप यश रंगभूमी मेल्याचे लक्षण आहे काय? परवा भाषणात पु.ल. देशपांडे म्हणाले की. नाट्याच्या प्रेमाने प्रेरीत होऊन मुंबईहुन ऑफीस सुटताच डेक्कन क्विनने पुण्याला जाऊन तीन वाजेपर्यंत तालमी उरकुन नि पहाटेच्या पॅसेंजरने परत मुंबईत कामावर येऊन मी हजर होतो. रंगभुमीचे उज्वल दिवस टिकवण्यासाठी धडपडणारी नवी नवी मंडळी काय ’मराठी रंगभूमी संपली’ म्हणून ही आटापिट करताहेत? पु.ल. यांच्या सत्काराच्या निमित्ताने आज पुन्हा ओघाने हे लिहिले .

मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ पु.ल. यांच्या गळ्यात आज पडली आहे, ते काही फारसे गौरवाचे नाही. यापूर्वीच त्यांना तो मान मिळण्यास हवा होता. आणखी एकदोन वर्षात ते साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होतील आणि मराठी भाषेतील हा विद्वान पंडीत मराठीचा झेंडा आपल्या असामान्य , कोटीबाज विनोदाने नि खुसखुशीत शैलीने फडकत ठेवील यात काय शंका? आम्ही स्वत: गडकरी, कोल्हटकर, ठोमरे यांच्या पिढीत वाढलो आहोत आणि परवा आम्ही म्हटल्याप्रमाणे त्या प्रतिभासंपन्न आणि थोर लोकांच्या परंपरेतील एक प्रतिनीधी म्हणून आम्ही पु.ल. यांच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवीत आहोत! यापेक्षा आज ह्या क्षणी आम्ही अधिक लिहू शकत नाही. पु.लं.च्या असामान्य कर्तुत्वाने भारवलेल्या अवस्थेतच आम्ही पु.लं.च्या नव्या निवडीबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करुन सांगतो. पुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो!

आचार्य अत्रे
मराठा
११-१-१९६५

मुळ स्त्रोत -- http://anandghare.wordpress.com

Friday, June 18, 2010

सभ्य स्त्री-पुरुषहो,

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८चा! मुंबईतील प्रकाशक ग. पां. परचुरे यांच्या कुटुंबीयांनी पुण्यातील त्यांच्या जागेत आचार्य अत्रे यांचे स्मारक उभे करण्याचे ठरवले. पुण्यातील आचार्य अत्रे सभागृहाचे उद्घाटन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते २९ मार्च १९८१ रोजी झाले. या कार्यक्रमास बाळ सामंत, ग. वा. बेहरे, शिरीष पै, माधव गडकरी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रेक्षकांमध्ये पु. ल. देशपांडे आणि संगीतकार सी. रामचंद्र यांना पाहिल्यावर उपस्थित प्रेक्षकांनी संयोजकांकडे चिठ्ठय़ा धाडून पुलंना बोलण्याचा आग्रह केला. ऐनवेळी पुलंनी केलेले हे भाषण ध्वनिमुद्रित करण्यात आले होते. पुलं आणि सुनीताबाई देशपांडे यांचे मानसपुत्र व भाचे, जगप्रसिद्ध गणितज्ज्ञ डॉ. दिनेश ठाकूर यांनी या भाषणाची तयार केलेली ही प्रत.




सभ्य स्त्री-पुरुषहो,

आतापर्यंत अत्र्यांवर प्रत्येकाने बोलण्याचा प्रयत्न केला. मी प्रयत्न केला असे अशासाठी म्हणतो कारण, जे परमेश्वराच्याच बाबतीत म्हटलंय की ‘स्थिरचर व्यापून तो जगदात्मा दशांगुळे उरला’, तसं अत्र्यांच्यावर कितीही बोललं तरी ते दशांगुळे शिल्लक राहतात. या अत्र्यांचा मोठेपणा कशात आहे याचा पत्ता लावण्याचा, त्याचं संशोधन करायचा, काही धाडसी लोकांनी प्रयत्नसुद्धा करायचं ठरवलं आहे, असं मला कळलं. हा प्रयत्न चालू आहे, पण प्रत्येकाला असं वाटतं की- नाही, पण अजून मला काय म्हणायचं होतं, ते आलेलं नाही. बाळ (बाळ सामंत) आता म्हणाला तसं, की या महाराष्ट्रात काही व्यक्तीच अशा झालेल्या आहेत की, त्यांचा खरोखर घ्यावा तितका छडा कमी पडतो. जितकं आत शिरावं तितकं त्यांचं मोठेपण दिसतं. अत्र्यांच्या बाबतीमध्ये आम्ही जास्त बोलू शकतो, याचं कारण आम्हाला कुणी जर विचारलं की, तुम्ही कुठल्या काळात वाढलात, तर आम्ही अगदी न घाबरता सांगू की, आम्ही अत्र्यांच्या काळात वाढलो. मी एका माझ्या मागल्या भाषणांमध्ये सांगितलं होतं की, आम्ही जनात खांडेकर पण मनामध्ये अत्रे धरूनच बाकीचं सगळं बोलत होतो. याचं कारणच असं आहे की, लेखकाला आदर मिळतो, मान मिळतो, सन्मान मिळतो.

एक गोष्ट जी बालगंधर्वाना आणि अत्र्यांना मिळाली ती मला नाही वाटत फार आमच्याकडच्या प्रसिद्ध व्यक्तींना मिळाली. प्रत्येकाला, त्यांच्या शत्रूलासुद्धा, अत्रे हा आपला माणूस आहे, असं वाटत असे. मला जे काही म्हणायचंय, ते हा बरोबर बोलतो, असं वाटायचं. असं जर वाटलं नसतं, तर त्यांच्या बोलण्याला एवढा प्रतिसादच मिळाला नसता आणि अत्र्यांचे मला अनेक बाबतीतले उपकार माहिती आहेत, पण सगळ्यात मोठा उपकार जर कोठला असेल तर अस्सल मराठी भाषेचं तेज म्हणजे काय, ते अत्र्यांनी आम्हाला शिकवलं.

अत्र्यांच्या मराठीकडे, अत्र्यांच्या विनोदामुळे पुष्कळदा दुर्लक्ष होतं. विनोदी लेखकाचा एक तापच असतो की, भाषण संपल्यानंतर आपण काहीतरी सुंदर मुद्दा सांगितला, असं म्हणून आम्ही खाली उतरतो, आणि पहिलाच स्वाक्षरी घ्यायला येणारा मुलगा किंवा अधिक लालित्य पाहिजे असेल तर मुलगी, ही ताबडतोब सांगते की, आम्ही खूप हसलो. ‘बरं केलंत!’ आणखी काय सांगणार? अत्र्यांनी हसवलं, त्याहीपेक्षा अत्र्यांनी हसवता हसवता या महाराष्ट्राला शहाणं केलं, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे दिवस ज्यांनी पाहिले असतील, त्यांना माहिती असेल की, एखाद्या अन्यायाविरुद्ध संतापून उठणं म्हणजे काय आणि तो संताप व्यक्त करताना आपलं अर्धाअर्धा, पाऊणपाऊण, तासातासाचं भाषण हसवत, हसवत, हसवत सांगत तो वन्ही प्रज्वलित कसा ठेवावा, याचा विचार म्हणजे काय- या दोन्ही गोष्टींचं तारतम्य त्यावेळी कळलं. अत्रे काय त्याच वेळेला त्वेषाने उठले होते, असं काही नाही. अत्र्यांच्या जीवनाचं सारं सर्वस्वच मुळी उत्कटता हे आहे. त्यांना लहान काही दिसतच नसे.

मी एकदा म्हटलं होतं की, अत्र्यांना त्यांच्या मास्तरांनी ‘बे एके बे’ हा पाढा न शिकवता ‘दोन हजार एके दोन हजार’, ‘दोन हजार दुणे चार हजार’ हाच पाढा शिकवला असावा. आम्हाला म्युनिसिपालिटीच्या शाळेतल्या मास्तरांना दोन म्हणतानासुद्धा आपण जास्त सांगतोय, असं वाटतं. अत्र्यांना कोण ते सासवडचे गुरुजी मिळाले कुणास ठाऊक?
पुण्यातल्या एका समारंभाला आम्ही दोघेही बसलो होतो. त्यांचं आणि माझं, दोघांचंही भाषण होतं. मला म्हणाले, ‘काय रे पी.एल.? किती माणसं असतील असं वाटतं?’ आता माझा साधारणत: कारकुनी अंदाज. मी म्हटलं, ‘हजार-बाराशे असतील.’ ते म्हणाले, ‘अरे बघ, कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार लोक आहेत.’
म्हटलं, ‘कुठले आहेत?’

‘अरे, सत्तर ते ऐंशी हजार म्हणाला नाहीस तर जिल्हा पत्रकाचासुद्धा संपादक होणार नाहीस.’
मग मी सांगितलं त्यांना, ‘बरोबर आहे, ही सभा पुण्यात असल्यामुळे एक माणूस म्हणजे दहा माणसांच्या बरोबरीचा. असा हिशोब तुम्ही काढून हे लोक काढलेले असणार!’
अत्रे हे असं व्यक्तिमत्त्व की ज्या व्यक्तिमत्त्वाला सत्य दिसत होतं आणि ते दिसल्याबरोबर सांगितल्याशिवाय राहावत नव्हतं. अत्र्यांना घाईच असायची ते सांगायची. ‘जगात झालं नाही’ असं जेव्हा अत्रे म्हणत, त्यावेळेला त्या क्षणापुरतं ते खरं असे. हे लक्षात घ्या की, मोठेपणा अनुभवावा कसा हेसुद्धा आपल्याला कळत नाही, ते त्यांना कळलं होतं. जीवनातलं उदात्त म्हणजे काय, मोठं म्हणजे काय, भव्य म्हणजे काय हे ज्या माणसाला कळतं, तोच मनुष्य असं सांगू शकतो.

अत्र्यांना काय आपल्या व्याख्यानाला दहा लाख लोक जमले याची जाहिरात करण्यात काहीच रस नव्हता. ते दहा लाख लोकच गावभर सांगत जातच होते; पण एखादा प्रसंग उत्कटतेने मोजायचा आणि त्यांचं गणित मांडायचं, हे गणित कुठल्याही शाळेमध्ये शिकवलं जात नाही. जीवनाच्या शाळेमध्ये उघडय़ा डोळ्याने आणि विनोदबुद्धीने जो हे पाहात असतो, त्याच्या बरोबर लक्षात येतं की मोठं ते काय आणि मोठेपणाचा आभास तो कुठला! मोठेपणाचा आभासच पुष्कळ वेळेला आपल्याला माणूस मोठा आहे, असं भासवायला लावत असतो.
बऱ्याच लोकांनी माझा इथे अत्र्यांचा उत्तराधिकारी वगैरे असा उल्लेख केल्यामुळे मीही थोडासा चढूच गेलो आहे. पण मी उत्कटतेने सांगतो की, जीवनातलं सुसंगत म्हणजे काय ते तुम्हाला चांगलं कळल्याशिवाय विसंगत म्हणजे काय ते कळणार नाही. बाकीची नुसती चेष्टाच उरेल. आणि अत्र्यांना जीवनातलं सुसंगत म्हणजे काय हे कळलं होतं, याचे पुरावे कऱ्हेच्या पाण्यामध्ये आणि इतरत्र हजारो ठिकाणी दिसतील. कोणाची टाप आहे असं म्हणायची की लोकमान्यांचा आमच्यावरती आशीर्वाद होता? लोकमान्यांच्या तेजाने आम्ही दिपून गेलो होतो म्हणणारे अत्रे हे कुठल्या उत्कटतेच्या क्षणाला बसून ते लिहीत असतील? लोकमान्यांच्या बाबतीमध्ये गडकऱ्यांनीच, त्यांच्या गुरूंनीच म्हटलं होतं, की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विझवावी, या लायकीचा कोणी राहिलेला नाहीये. म्हणजे पुणं दरवेळेला महान होतं, असा भ्रम काही आपल्याला ठेवायची गरज नाही. पुणं, पुणं केव्हा झालं की, ज्या वेळेला लोकमान्य होते, त्यावेळेला. तेव्हा त्या पुण्याला पुणेपणाचा अर्थ होतो. शेवटी शहरांना मोठं-लहान कोण करतं? त्या शहरातल्या व्यक्तीच. आणि मग आपल्यासारखी जी साधी माणसं असतात, ती हळूच आपलं नातं जमवायला ‘आम्हीसुद्धा त्याच आळीतले’ वगैरे सांगतात.

मला इथे कुणाला काही असं बोलायचं नाहीये! आपणही नाही का सांगत, महाराष्ट्राबाहेर गेल्यावर छत्रपतींचं नाव! इथे घेता येत नाही कारण इथे नक्की तुम्ही कोण आहात ते सगळ्यांना माहिती असतं. त्यामुळे हा जो काही अत्र्यांचा गुण होता की, चांगलं दिसल्यावर उडीच मारायची, मोठय़ाने शाबासकी द्यायची, जोरात पाठीत थाप द्यायची, ती थाप ज्याच्या पाठीत गेली त्याची पाठही तितकीच ताकदवाली असल्यामुळेच तो ती थाप सहन करू शकत होता. कारण लेच्यापेच्या पाठीवर त्यांनी थाप मारली नाही. महाभिकार, अगदी अद्भूत, भिकार वगैरे हे शब्द त्यांचे अतिशय लाडके होते आणि त्यांच्या सुदैवाने ते वापरायची संधी समाज त्यांना देत होता.

मगाशी कोणीतरी सांगितलं की, अत्र्यांनी कीर्तन केलं नाही. पण मी सांगतो तुम्हाला, त्यांनी कीर्तनही केलंय. एवढंच नव्हे, तर अत्रे समोर कीर्तन करत असताना मागे अभंग म्हणून टाळ धरायला मीच स्वत: होतो. त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी मला सांगितलं की, तुझ्यासारखा आवाज जगात नाही. त्यामुळे मला वाटलं, खरंच आहे. त्या कीर्तनाला आम्ही दोघेही उभे होतो. अत्रे पुढे कीर्तन म्हणायचे, प्रवचन गद्यामध्ये सांगायचे. आणि अभंगावर आले की, लगेच आम्ही अभंग सुरू करायचो- ‘चंदनाचे हात, पायही चंदन.’

मला तरी तो प्रसंग आठवतो. त्या रात्री १-१।। वाजेपर्यंत विल्सन हायस्कूलच्या पटांगणावर कीर्तन झालं. साने गुरुजींच्या स्मृतीसाठी काहीतरी कार्यक्रम होता. त्याच्यासाठी अत्र्यांनी ते कीर्तन केलं होतं, म्हणून मी गेलो होतो. नाहीतरी एरवी देवाशी सौदा करायला जी कीर्तनं होतात, त्याला मला जायची इच्छा नसते. पण चांगल्या कारणाने कीर्तन होतं. त्याच्यामध्ये ‘चंदनाचे हात, पायही चंदन’ सांगताना, वैष्णवांचा धर्म सांगताना, फुले, आगरकर वगैरे लोकांनी जी समाजसेवा केली त्याबद्दल अत्रे बोलले आणि मग बरोबर तुकारामांवर येऊन त्या संतांचं आणि आजच्या विचारवंतांचं नातं काय आहे, हे फार सुंदर शब्दांमध्ये सांगितलं.
त्यांचं कीर्तन लक्षात राहायचा दुसरा एक थोडा अप्रिय प्रसंग आहे. त्यादिवशी रात्री १-१।। वाजता कीर्तन संपलं. पाल्र्याला आम्ही राहात असल्याने आम्हाला पहिल्या गाडीची वाट बघावी लागत असे. सकाळी आलो तेव्हा कळलं की माझ्या खोलीत चोरी झाली. मी एक typewriter विकत घेतला होता, तो चोरीला गेला.

अत्र्यांच्या सगळ्या बोलण्यामध्ये कीर्तनकारी ढंग होता! अत्र्यांच्या विनोदामध्येही होता. अत्रे त्या त्या प्रसंगाला एक-एक गोष्ट चांगली सांगू शकत होते. सगळ्यात उत्तम म्हणजे पंडिताचीही पगडी हलावी आणि सामान्यांचं अंत:करण हलावं या दोन्ही गोष्टींचा तोल अत्र्यांमध्ये होता. याचं कारण होतं, मगाशी बाळ (सामंत) म्हणाला तसं, अत्र्यांचं वाचन अफाट होतं. लोकांना हे लक्षातच येत नाही की, विनोद म्हणजे सटकन सुचला, असं काही नसतं. कुणीतरी मराठीच्या विद्यार्थ्यांने हा अभ्यास करावा की, अत्र्यांच्या शैलीमधून अत्र्यांनी संतवाङ्मयाचे किती संस्कार घेतलेले आहेत. त्यांच्या भाषेचा अभ्यास करण्यासारखं आहे. अत्र्यांसारखं सरळ मराठी लिहायला फारच कष्ट घ्यावे लागतील. एकदा तुम्ही अत्र्यांचं वाचायला सुरुवात केली की, ते मानगुटीवर बसल्यासारखे तुम्हाला शेवटपर्यंत आपल्याबरोबर नेतात, ही साधी किमया नाही. ज्यावेळेला तुम्ही संत वाङमय, पंतवाङ्मय, पौर्वात्य वाङ्मय, पाश्चिमात्य वाङ्मय असं जेव्हा पचवलेलं असतं, तेव्हाच हे जमू शकतं. जेव्हा अत्रे युजीन ओनील वाचत होते, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की, हा वाचल्याशिवाय तुम्हाला गती नाही. याचं कारण, लेखक आवडला की, ते संपूर्ण फडशा पाडायचे त्याचा. फुल्यांच्या नादात असताना त्यांना पाहणं म्हणजे पुष्कळदा असं वाटायचं की, आपण साक्षात फुल्यांशीच बोलतोय की काय. संपूर्ण फुले असा पचवला की नंतर त्यांनी पिक्चर उभं केलं. साने गुरुजी वाचायला लागले की ते त्यांच्यात तल्लीन होत.

एखादा माणूस सुंदर कधी म्हणतो आपण, एखादं मुलं चांगलं केव्हा दिसतं की ते काहीतरी करण्यात तन्मय झालेलं असतं. तसं अत्रे हे चांगल्या गोष्टींमध्ये तन्मय झाले नाहीत, असं आयुष्यात कधी झालं नाही. मी मुळीच असं म्हणत नाही की, अत्रे कोणी सत्पुरुष होऊन गेले, वगैरे. अशा रीतीने त्यांची बदनामी करायची काही गरज नाही. सत्पुरुष हे सत्पुरुषच असतात. त्यांची समाजाला काही गरज नसते. समाजाला थोडासा गुंड मनुष्य लागतो. तो समाजाला दुरुस्त करतो. नाहीतर आमच्यासारखे लोक होतात. आम्ही लिहितो, पण ज्यावेळी रणांगणात जायचा प्रसंग येतो, त्यावेळी एखादाच येतो, अशा प्रकारचा मनुष्य!

एकद न. र. फाटक म्हणाले होते की, आपल्याकडे स्तुती करायला सुरुवात झाली की, अध्यक्षाला काही सांगायला राहातच नाही. मग म्हणाले, आजच ज्या कोणाची पुण्यतिथी, त्याच्यासंबंधी आता इतके बोलले गेले, की मी त्याच्याबद्दल एवढंच सांगतो की, ते आजानूबाहू होते. आता ते गेलेच आहेत म्हटल्यावर हात मोजायला कोण जाणार आहे?

तांब्यांची पुण्यतिथी होती. कवी तांब्यांची. एक प्राध्यापक बोलले कवीवर्य तांब्यावर. ते म्हणाले, ‘काय सज्जन मनुष्य होता! आपल्या स्वत:च्या लग्नाच्या बायकोवर त्यांनी कविता लिहील्या.’ हा सज्जनपणाचा पुरावा! आणि निव्र्यसनी, वगैरे वगैरे- तांब्यांना जाऊन पाच दिवस झाले होते. ‘चिकित्सक’मध्ये सभा होती. प्राध्यापकाचं नाव मी सांगत नाही. तर लगेच अत्रे त्यांना म्हणाले, ‘अहो, तुमचा काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय. हे हॉटेलवाले तांबे आहेत. जे गेले, ते कवी. सज्जन असणं आणि कविता करणं याचा संबंध काय इकडे! एखाद्या कवितेच्या सुंदर दोन ओळी सांगा.’ कारण अत्र्यांनी जेव्हा तांबे वाचले, त्यावेळी उत्कटतेने वाचले.

अशा प्रकारचा हा माणूस, ज्याने महाराष्ट्रात चैतन्य निर्माण केलं. त्याचा हॉल पुण्यात झाला, हे चांगलंच झालं. त्याबद्दल प्रश्नच नाही. पण एक गोष्ट सांगून ठेवतो, अत्रे ही व्यक्ती नसून अत्रे ही एक जीवनाकडे बघायची दृष्टी आहे. त्यामुळे त्यांचे पुतळे, त्यांची चित्रं किंवा पुण्यतिथी, यात मला काही अर्थ वाटत नाही. अलीकडे या गोष्टींवरचा माझा विश्वास साफ उडालेला आहे. मला असं वाटतं की, त्यांनी ज्या रीतीने जिथे जिथे त्यांना अन्याय दिसला, तिथे ते गेले. आणि सदैव विचार असा ठेवला की, चांगलं असेल त्याला अति चांगलं करीन आणि त्याबरोबर वाईट असेल त्याला कदाचित अति वाईट म्हणून झोडपूनही काढीन. ते जोरात झोडपायचे. नाटकाच्या क्षेत्रात, चित्रपटाच्या क्षेत्रात, प्रत्येक क्षेत्रात ते गेले आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांचं कर्तृत्व पाहिलं की लक्षात येईल, अत्रे हे शिक्षक होते. शिक्षक असल्यामुळे माँटेसरीबाईची पद्धत कधी वापरावी आणि छडी कधी वापरावी, या दोन्हीचं तारतम्य त्यांनी बरोबर लक्षात ठेवलं. समाजाला ज्यावेळेला छडय़ा द्यायच्या, त्यावेळेला छडय़ाही दिल्या. गोड बोलून सांगायचं, त्यावेळेला गोडही बोलून सांगितलं. असा शिक्षक या महाराष्ट्राने जवळ केलेला आहे. आणि अशा माणसांना चटकन विसरून जाण्याइतकं मराठी मन कृतघ्न आहे, असं काही मला वाटत नाही. कधीतरी अत्रे आठवतातच, याही पुढे ते आठवणारच.

परचुर्‍यांनी आपल्या प्रेमाने हा हॉल इथे उभा केलेला आहे. मी एकच इच्छा करतो की, इथे अशा प्रकारचे कार्यक्रम (साहित्याचे) व्हावेत की, अत्रे समोर असते तर त्यांना आवडले असते आणि तिथून उठून हे काय महाभयंकर मराठी बोलताय, असं त्यांनी विचारलं नसतं. असं चांगलं कार्य इथे चालावं, अशी मी इच्छा व्यक्त करतो.

लोकसत्ता,
रविवार, १३ जून २०१०
a