Leave a message
Showing posts with label आठवणीतले पु.ल.. Show all posts
Showing posts with label आठवणीतले पु.ल.. Show all posts

Wednesday, March 12, 2025

चांदणे तुझ्या स्मरणाचे - (वरुण पालकर)

८ नोव्हेंबर हा पु.लं. चा म्हणजे भाईंचा वाढदिवस. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप. भाईंना जाऊन आज 19 वर्ष झाली, पण ते गेल्यापासून आजवर कधीही त्यांच्या वाढदिवसाला मी जयंती म्हणालो नाहीये. कारण भाई म्हणजे "महाराष्ट्राच्या अंगणातील कैवल्याचं, आनंदाचं झाड!!", त्यामुळे ते कधी सुकणं, नष्ट होणं शक्य नाही!!या वर्षाच्या सुरुवातीला "भाई-व्यक्ती की वल्ली" हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित झाला. त्या चित्रपटातील काही संवाद आणि काही पात्रांची निवड खटकणारी होती. तसेच Cinematic liberty घेऊन दाखवलेले काही सीन्स अत्यंत आक्षेपार्ह होते. त्यामुळे पूर्वार्ध पाहून "चांदणे तुझ्या स्मरणाचे" या नावाने पहिला भाग 9 जानेवारी रोजी लिहिला. आणि उत्तरार्ध बघून दुसरा भाग टीकात्मक पद्धतीने लिहिणार असं खरंतर ठरवलं होतं, पण काही केल्या लिहिताच आला नाही. भाई आणि सुनीताबाई म्हणजे माझ्या मर्मबंधातली ठेव. या दोघांनी मला आनंदाच्या आणि संस्काराच्या रुपाने एवढं दिलंय की त्याचं ओझं झटकून त्यांच्यावर आधारित चित्रपटावर टीका करायला, त्यातील उणिधुणी काढायला मी धजावलोच नाही. कधी कधी आयुष्यात काही लोकं तुम्हाला असे वश करतात की ते गेल्यानंतरही त्यांची मोहिनी तुमच्यावर कायम असते. भाई आणि माईंच्याबाबतीत माझं नेमकं हेच झालं, असं म्हणता येईल. त्यामुळे आज दहा महिन्यांनी हा दुसरा भाग पूर्ण करुन, या पुण्यवंत उभयतांचे आणि आमचे ऋणानुबंध यांना उजाळा देऊन अंतःकरणापासून आदरांजली वाहण्याचा हा अगदी छोटा प्रयत्न.


आमच्या आजी आजोबांचा आणि पुलं-सुनीताबाईंचा तसा जवळपास 5 दशके जुना परिचय. आणि तो होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सुनीताबाईंच्या धाकट्या भगिनी कै. शालनताई पाटील!! तेव्हा जोशी हॉस्पिटल शेजारी रुपाली अपार्टमेंटमध्ये भाई आणि माई राहत असत. रोजच्या रोज पत्र, फोन आणि माणसांची वर्दळ!! पण या सर्व वैतागाला लगाम घालायला सुनीताबाईंसारखी खमकी गृहिणी कम सचिव होतीच. मग कधीतरी जरा निवांतपणा मिळावा म्हणून लॉ कॉलेज रोडवरील शालनताईंच्या अबोली अपार्टमेंटमधील घरात दुपारच्या चहापानासाठी अथवा रात्रीच्या भोजनासाठी पुलं-सुनीताबाई येत असत. अशाच एका भोजनप्रसंगी पालकर उभयतांची ओळख झाली मग "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तृष्टता मोठी" यानुसार या मंडळींमध्ये "जननांतर सौहृद" निर्माण झालं,टिकलं ते अगदी सुनीताबाई जाईपर्यंत. सुनीताबाई पक्क्या नास्तिक,पुलंही अजिबात दैववादी नव्हते. त्यामुळे त्यांनी ना घरात कधीही देव ठेवले की ना कुठली कार्यही केली. पण नातेवाईकांच्या, आप्त-स्नेह्यांच्या मंगलकार्यात त्या नुसत्या उपस्थित राहत नसत, तर संपूर्ण कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पडेल ते सर्व करण्याची, प्रसंगी पदरचे पैसे खर्च करुन(ज्यांचे कार्य आहे त्यांच्याकडील कोणाला कळू न देता) यथाशक्ती मदत करीत असत. आमच्या बंगल्याची वास्तुशांत, आत्या आणि बाबांचं लग्न, प्रणवचं बारसं, माझी मुंज आदी सर्व शुभप्रसंगी पुलं-सुनीताबाई जोडीने अथवा सुनीताबाई तरी आवर्जून उपस्थित होत्या. माझ्या मुंजीत भाईंच्या सर्व पुस्तकांचा संच सुनीताबाईंनी भेट दिला होता, जो आजही मी जीवापाड जपून ठेवला आहे.

सततचे दौरे, अविश्रांतपणे केलेले नाटकाचे, अभिवाचनाचे प्रयोग यामुळे जसा भाईंच्या मेंदूवर ताण आला तसाच ताण सततचे दौरे, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बैठका, फायली आणि आपल्या आवडत्या व्यक्तींच्या लागोपाठ जाण्याने आमच्या आजोबांच्या मेंदूवर आला. साधारणपणे एका वर्षाच्या अंतराने 1993 साली पुलंना, आणि 1994 च्या शेवटी आजोबांना Parkinson's विकाराने ग्रासले.मग डॉ.चारुदत्त आपटे, डॉ.प्रदीप दिवटेंकडे उपचार सुरू झाले. त्यानिमित्त तरी भेट व्हावी म्हणून दोघेही पुढे मागे येईल अशीच अपॉइंटमेंट घ्यायचे. त्यात आमचे आजोबा मितभाषी, जरुरीपेक्षा जास्त न बोलणारे असे होते. त्यामुळे आपल्याला हा आजार झालाय, आपण परावलंबी होत चाललो आहोत या भावनेने उचल खाऊन आजोबा अंतर्मनात खचू लागले. पण त्या उलट पुलंनी आपल्या आजाराचीही टिंगल करायचे. डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाताना जेव्हा आमच्या बापूंच पाऊल पुढे पडायचं नाही त्यावेळेस चेष्टेच्या स्वरात पुलं त्यांना म्हणायचे, "अरे प्रताप, तू माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहेस, त्यामुळे पहिला मान माझा. पण इथे आपण उलट करू. तू पहिले आत जा. हं, टाक पाऊल, जमेल तुला. अरे तू एरवी भराभर चालतोस की. माझ्यासारखा स्थूल थोडीच आहेस?" असे एकावर एक विनोद करत पुलं बापूंच्या मनावरचा ताण थोडा हलका करीत. अशीच 2-3 वर्ष गेली. एव्हाना बापूंच्या पूर्ण शरीराचा ताबा Parkinson's ने घेतला होता. दिवसातून दोन वेळा सर्व शरीराला कंप सुटायला लागला, मग साधारणपणे 1998 पासून पूर्ण शरीराला या आजाराने विळखा घातला. यातून तात्पुरती सुटका म्हणून बापू दिवसातून 2 वेळा झोपेच्या गोळ्या घेऊ लागले. यामुळे जास्तीतजास्त काळ बापू झोपूनच राहायचे. इकडे पुलं अमेरिकेला जाऊन मेंदूतल्या पेशींवर शस्त्रक्रिया करून आले,ज्याने त्यांचा त्रास कमी होण्याची अपेक्षा होती, पण त्याचा परिणाम अल्पकाळ टिकला. मग पुलंही wheelchair ला खिळून गेले. बाहेर फिरणे, कार्यक्रमाला जाणे, सगळं सगळं बंद झालं. शेवटचा प्रवास पुलंनी केला तो 1999 साली आनंदवनाचा. तिथे "बाबांच्या सोबत जर मी दोन पाऊलं जास्त चालू शकलो तर माझं आयुष्य वाढेल" या भावनेने जवळपास महिनाभर पुलं तिथे राहिले.

आता आयुष्याचं अंतिम वर्तुळ पूर्ण करण्यासाठी काळाचं चक्र फिरू लागलं. मार्च 2000 च्या शेवटच्या आठवड्यात बापूंना न्यूमोनिया झाला. Parkinson's विकाराचा शेवट न्यूमोनियानेच होते याबद्दल डॉ.आपटेंनी आमच्या बाबांना 1995 लाच कल्पना दिली होती. त्यामुळे हे शेवटचे आजारपण हे बाबा समजून चुकले आणि त्यांनी हळूहळू आजीसह बापूंची बहीण, माझी आत्या सर्वांच्या मनाची तयारी करायला सुरुवात केली. आणि अशातच मे च्या पहिल्या आठवड्यात पुलंना देखील न्यूमोनिया सदृश फुफुसांचा आजार झाल्याचे सुनीताबाईंनी कळवले. तेव्हा मात्र आमच्या घरातल्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. आता भाईदेखील त्याच वाटेचे प्रवासी या विचाराने आजी आणि बाबांना अश्रू अनावर झाले. बाबा आणि आजी भाईंना भेटून आले. भाईंनी स्मित केलं पण आवाज खूप खोल गेला होता. 1 मे रोजी डॉक्टरांच्या साप्ताहिक भेटीत बापूंना dehydration झाल्याचे निदर्शनास आले. शरीरात पाणी राहिना. कातडी ओढली की तशीच वर राहू लागली. शरीरातला जोम दिवसागणिक कमी होत गेला, डोळे खोल गेले. डॉक्टरांनी औषधे बंद करण्यास सांगितली. त्यांचा शेवटचा दिस गोड करा, ते मागतील ते द्या, असा जवळच्या आप्तासारखा सल्ला त्यांनी बाबांना दिला. बापूंची प्रकृती अत्यावस्थ आहे हे समजल्यावर 11 मे रोजी सकाळी सुनीताबाई शहाळी घेऊन आमच्या घरी आल्या. बापू तर ग्लानीतच होते. मग सहज बोलता बोलता आजी म्हणाली की गेले 2 महिने यांच्या आजारपणामुळे यांचं आणि माझं पेन्शनच आणायला जमलेलं नाही. झालं!! आजी बोलायचा अवकाश आणि सुनीताबाई आजीला गाडीत बसवून पेन्शन आणायला घेऊन गेल्या. अर्ध्या तासाने परत आणून सोडलं. मग निघताना मला एक चॉकलेट दिलं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला.

दुसरे दिवशी 12 मे रोजी सकाळी बापू गेले. 11 वाजता सुनीताबाई आल्या. मी दारातल्या जिन्याच्या पायरीवर बसून हमसून हमसून रडत होतो. मला जवळ घेत त्यांनी माझे डोळे पुसल्याचं आजही मी विसरु शकत नाही. मग बरोबर महिन्याने 12 जून रोजी पुलं गेले. जणू महाराष्ट्राचा "आनंद-पारिजात"च कोमेजला!! त्याच दिवशी पुलं-सुनीताबाईंच्या लग्नाचा 54 वा वाढदिवस असणे हा एक विचित्र योगायोग म्हणायला हवा. मी लहान असल्याने मला हॉस्पिटलमध्ये तर नेलं नव्हतंच, पण घरीही नेलं नव्हतं. मात्र संध्याकाळी मी रडून घर डोक्यावर घेतलं म्हणून आई-बाबा मला पुढ्यात बसवून "मालती-माधव" मध्ये पुलंच्या घरी घेऊन गेले. मी आत गेलो तोच मला सुनीताबाई दिसल्या. मी मूकपणे रडत त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. आणि एका क्षणी मी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागलो. माझं रडणं ऐकून आई बाबा तर रडलेच, पण सुनीताबाईंचे डोळेही पाझरले. माझ्या पाठीवरून हात फिरवत, मला धीर देत त्यांनी माझं रडू आवरलं.

पुलं गेले तेव्हा मी फक्त 10 वर्षांचा होतो. मी जे पुलं पाहिले ते wheelchair वर बसलेले, दाढी वाढलेले, मऊ सुती बंडी आणि हाफ चड्डी घालणारे आणि खोल गेलेल्या आवाजामुळे शांत बसलेले असे पुलं पाहिले होते. पण सुनीताबाईंचा सहवास मला अगदी 2008 पर्यंत लाभला. या उभयतांनी महाराष्ट्राला खूप दिलं. पुलंनी लोकांना हसवलं, आणि त्यातून जे कमावलं त्याचा विनियोग सचोटीने करत, अनेक प्रामाणिक कष्टाळू संस्थांना भरघोस मदत करत सुनीताबाईंनी दातृत्वाचा एक अतुलनीय वस्तुपाठ महाराष्ट्राच्या सामाजिक कार्यक्षेत्रात घालून दिला. काल सुनीताबाईंची ११ वी पुण्यतिथी झाली. आयुष्यात जास्तीतजास्त आनंद शोधून तो इतरांनाही द्यावा, हे मला भाईंनी शिकवलं, तर कसोटीच्या क्षणी कसं निकराने लढावं, खचून न जाता कणखरपणे कसं उभं राहावं, याचे धडे मी सुनीताबाईंपाशी गिरवले. माझा स्वभाव आवडल्याने ज्यांनी मला आपलंसं केलं, त्या स्वभावाचे कंगोरे घासून लख्ख करण्यात पुलं-सुनीताबाईंचा सिंहाचा वाटा आहे. कुबेराचं कर्ज तिरुपतीचा स्वामी व्यंकटेश्वर अजून फेडतो आहे असं म्हणतात, तद्वत या साहित्यिक कुबेराचे समस्त मराठी जनांवर असलेले ऋण शेवटचा मराठी माणूस या पृथ्वीवर असेपर्यंत फिटणार नाहीत, हे अलबत.

©वरुण पालकर
पुणे

Friday, July 5, 2024

तुमने हमको हसना सिखाया.. - (निमिष वा.पाटगांवकर)

".....इंग्लडला जायला कोणती इंजेक्शने घ्यावी लागतात ह्या प्रश्नाला फक्त दमा, रक्तक्षय आणि बाळंतरोग याखेरीज बहुतेक सगळ्या रोगांची नावे मला सांगितली गेली.. ज्याला जे सुचेल ते तो सुचवत होता. पिवळ्या तापावर फारच दुमत होते. पिवळा ताप फक्त अमेरिकेला जायला अडवतो हे त्यांचे म्हणणे".. "अपूर्वाई"तल्या या प्रसंगाला मी नुकताच जेव्हा सामोरा गेलो तेव्हा लक्षात आले कि पु.ल. आपल्या आयुष्यात किती भरून राहिले आहेत.

वेस्ट इंडिजला विश्वचषकासाठी जायच्या तयारीचा भाग म्हणून मला पिवळ्या तापाची लस टोचून घ्यायची होती. आपण वेस्ट इंडिज म्हणतो पण हे वेगवेगळे देश आहेत आणि बरीच छाननी केल्यावर कळले फक्त गयानाला जायला किंबहुना तिथून परत येताना हा पिवळा ताप टोचून घेतलेला आवश्यक आहे. हि लस कुठे मिळते कळल्यावर विमानतळाजवळच एक आरोग्य सुविधा केंद्र आहे तिथे हि लस आठवड्यात फक्त दोनदाच मिळते हे कळले. असेही कळले कि एकदा लसीची बाटली उघडली कि दहा लोकांना ती दिली जाते नाहीतर ती वाया जाते तेव्हा तिथे दहा लोकं असतील का? हा माझ्यापुढे वेगळाच प्रश्न होता. पुन्हा अपूर्वाईचाच प्रसंग बघितला तर या गडबडीत पासपोर्ट मात्र मी न विसरता नेला पण फक्त अर्धा बुशशर्ट घालायचा विसरलो आणि मला तिथे सलमान खान व्हावे लागले इतकाच काय तो आमच्या दोघांच्या लसीकरणातला फरक. मला दहा माणसांची चिंता होती पण इथेही सुमारे शंभर माणसांची बारी लागली होती. दहा दहाचे जथ्थे ते आत सोडत होते. काही लोकं खरंच गोंदवून घेतल्याच्या खुशीत होते. त्या भाऊगर्दीत बहुतेक सगळे आफ्रिकेला जाणारेच होते. माझ्यासारखा दक्षिण अमेरिकेच्या वाटेला जाणारा कुणी भेटला नाही.

खरंच पु.ल. नावाचं गारुड आज पुलंना जाऊन चोवीस वर्षे झाली तरी काही कमी होत नाही. जिकडेतिकडे पुलंनी पेरलेली माणसे दिसत असतात. आजकाल लग्न हे एखाद्या इव्हेंटसारखे असते तरी त्यातही कुणीतरी नारायण पटकन दिसतो. माझे शिक्षक आता फार कमी राहिले आहेत पण काहींची आठवण आली कि चितळे मास्तरांची आठवण येते. यू सी..यू सी ...करत गोंडा घोळणारा मधू मलुष्टे आता एसटीमध्ये न दिसता कधी कधी विमानात एअरहोस्टेसवर इम्प्रेशन मारताना दिसतो. आमची पिढी पन्नाशीची झाली तरी आमच्या वेळच्या इंदू वेलणकर कुठे राहायच्या नाही तर आता कुठे राहतात हे आमच्यातल्या अनेक नंदा प्रधानांना आजही माहित असते. कधीकधी त्यांचे खविस बापही भेटतात. आमच्यातल्या काहींचे केस आता काळ्या रंगाशी फारकत घ्यायला झालेत तरी मनाने नाथा कामतचे उसासे टाकत असतो. हे झाले काही वल्लींचे नमुने तर "आमची व्हिक्टोरिया अशी नाही हं" हा श्वानमालकांचा नमुना जसाच्या तसा बघायला मिळतो.

अत्यंत सोप्या भाषेत, आपल्याला दिसते तेच पण वेगळ्या शैलीत मांडून आपल्याला पुनर्प्रत्ययाचा सुखद धक्का देणारे पु.लंचे लिखाण म्हणूनच कालबाह्य होत नाही. मुंबईतल्या चाळी आता नामशेष व्हायला लागल्या आहेत पण जरी तिथे चाळी जाऊन टॉवर उभे राहिले तरी कुणीतरी एच. मंगेशराव असतील, लोकांना ब्रह्मज्ञान पाजणारे बाबा बर्वे असतील, चापशी असेल आणि टॉवरच्या कुठच्यातरी दोन मजल्यावर असलेले सरोज गुप्ते आणि मधू चौबळ आता पत्रे नाही तर चॅट करून आपले मन उलगडून दाखवत असतील. मला वाटते आजूबाजूचे जग झपाट्याने बदलले तरी माणसाचा मूळ स्वभाव तसाच असतो. पु.लंनी तो अचूकतेने टिपला म्हणून आजही ते वाचताना आपल्या चेहऱ्यावर हास्याची किनार उठते आणि त्याहून महत्वाचे म्हणजे हे सर्व सात्विक जग बघून आपण त्या नॉस्टॅलजियामध्ये हरवून जातो.

पु.ल. गेले तेव्हा मी अमेरिकेत होतो. त्यांची तब्येत खालावत चालल्याचा बातम्या रोज वाचून काळजात चर्रर्र होत होते. जे अटळ आहे ते समोर दिसत होते. माझ्या वाढदिवसाला (११ जूनला) हे व्हायला नको म्हणून मी स्वार्थीपणाने देवाकडे एक दिवस मागून घेतला. देवानेही तो मान्य केला असावा. १२ जूनचा ऑनलाईन पेपर उघडायची हिम्मतच नव्हती. मला आठवतंय त्या डेक्कनवरच्या प्रयाग हॉस्पिटलच्या समोरच्या गर्दीत एक माणूस हातात फलक घेऊन उभा असेलेला फोटो आजही मी विसरलो नाही. त्या फलकावर लिहिले होते ..."तुमने हमको हसना सिखाया...." आजकाल दुर्मिळ होत चाललेली हि गोष्ट भरभरून दिलेल्या पुलंचे "एहसान" व्यक्त करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडतात.
- निमिष वा. पाटगांवकर

Tuesday, July 2, 2024

हशा-टाळ्या पलीकडचे पु.ल. - (विनायक होगाडे)

पुलंची वैचारिक, सामाजिक आणि राजकीय भूमिका काय होती? याबाबतची चर्चा फारशी होताना दिसत नाही. 'हशा-टाळ्या पलीकडचे पुलं' समजून घ्यायला महाराष्ट्र कमी पडला आहे का, या प्रश्नावर त्यांच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्ताने विचार करणे क्रमप्राप्त ठरेल.

ज्या काळात स्टॅण्डअप कॉमेडी नावाचा प्रकार महाराष्ट्राला फारसा माहीत नव्हता, त्या काळात पु. ल. देशपांडे हे या प्रकारातले ग्रेट एंटरटेनर होते. मात्र, त्यांची ओळख एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. याशिवाय ते शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, पट्टीचे वक्ते होते. यापैकी कोणती ओळख अधिक ठळक करावी आणि कोणती फिकट करावी, असा प्रश्न सूज्ञ मराठी माणसाला पडू शकत नाही. कारण, ज्यांना पुलं देशपांडे कळलेत तो पुलंच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक धाग्यांपैकी कोणतातरी एकच धागा आपलासा करून बसणार नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला जे काही पैलू होते, त्या सगळ्याच पैलूंना आलेल्या चकाकीमुळेच पुलं नावाचा हिरा मराठी साहित्य-संस्कृतीमध्ये चमकताना दिसतो. पुलंचे स्मरण दरवेळी त्यांच्या पुस्तकांवरून, सादरीकरणावरून होते, ते करणेही फारच सोयीचे आहे. मात्र, त्यांची वैचारिक, सामाजिक आणि राजकीय भूमिका काय होती? याबाबतची चर्चा फारशी होताना दिसत नाही. ‘हशा-टाळ्या पलीकडचे पुलं’ समजून घ्यायला महाराष्ट्र कमी पडला आहे का, या प्रश्नावर त्यांच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्ताने विचार करणे क्रमप्राप्त ठरेल.

गांधीवादी-समाजवाद्यांशी वैचारिक नाते
पु.ल. देशपांडे हे प्रामुख्याने कला क्षेत्राशी निगडीत व्यक्तिमत्त्व असले तरीही राजकारण-समाजकारणापासून विलग करून त्यांचे चित्र डोळ्यांसमोर उभे करता येत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती ही त्या-त्या काळाचे अपत्य असते. त्यामुळे तिच्यावर त्या काळात घडलेल्या राजकीय-सामाजिक घटनांचा आणि विचारांचाही प्रभाव असणे स्वाभाविक आहे. तिने वेगवेगळ्या गोष्टींबाबत भूमिका घेणेही स्वाभाविक आहे. बरेच लेखक-कलाकार आपली राजकीय-सामाजिक भूमिका काय आहे, हे उघड करणे टाळतात. किमानपक्षी भूमिका घेणे तरी टाळतातच. मात्र, पुलं त्यापैकी नव्हते. आपला जन्म शहरी मध्यमवर्गीय घरात झाला आणि आपली वाढ स्वातंत्र्य चळवळीच्या आणि गांधीजींचे नेतृत्त्व प्रस्थापित होण्याच्या काळात झाली, या त्या दोन गोष्टी पुलंनी वारंवार सांगितल्या आहेत. त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी सांगितले की, “महात्मा गांधी आणि साने गुरुजी यांचा पुलं देशपांडेंवर विशेष प्रभाव होता. दुसरी गोष्ट त्यांची पत्नी ही समाजवादाचा पुरस्कार करणाऱ्या ‘राष्ट्र सेवा दल’ या संघटनेची कार्यकर्ती होती. त्यामुळे या तिघांच्या प्रभावामुळे ते डाव्या आणि गांधीवादी विचारसरणीच्या बाजूला झुकणे स्वाभाविक होते. सुरुवातीची त्यांची कारकीर्द फारशी वैचारिक आणि तात्त्विक अशी दिसत नसली तरीही सुनीता देशपांडेंसोबत विवाह झाल्यानंतर त्यांच्या एकूण जीवन व्यवहाराला हाच विचार जवळचा वाटला.” पुढे ते म्हणाले की, “ते उत्तम कलावंत होते. त्याकाळी त्यांच्यातल्या कलेला उत्तम दाद या लोकांकडूनच मिळत होती. मात्र, त्यांच्या लिखाणातून गांधीवादी-समाजवादी अशी सगळीच मूल्ये पूर्णपणे उमटतात असे दिसत नाही. मात्र, त्यांनी आपल्या कलेतून उपलब्ध झालेले संचित या विचारांकरिताच दिल्याचे दिसून येते. जे आपल्याला करता येत नाही, ते ही मंडळी करत आहेत, तर त्यांच्यासाठी आपण इतके करू शकतो, असे म्हणून त्यांनी हा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येते.”


पु. ल. देशपांडे यांनी साने गुरुजी, विनोबा भावे, डॉ. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, नाथ पै, हमीद दलवाई, राम नगरकर, ग. दि. माडगूळकर इत्यादींचा गौरव केल्याचे दिसून येते. ही सगळी प्रामुख्याने गांधीवादी-समाजवादी-प्रागतिक विचारांचीच माणसे होती. मुस्लीम धर्मात सुधारणा व्हावी म्हणून ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना करणाऱ्या हमीद दलवाईंवर लिहिलेल्या एका लेखात पुलं म्हणतात की, “हमीदला केवळ मुसलमान स्त्रीचेच दु:ख जाणवले होते असे नाही; फक्त त्या स्त्रियांच्या यातनांची त्याला अधिक माहिती होती. त्या स्त्रियांच्या दु:खांना कुठे वाचाच फुटत नाही, ती फोडायला कुणी धजावत नाही याची त्याला खंत होती. वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्याला धर्म या नावाखाली चालणाऱ्या अज्ञानाच्या जोपासनेची आणि अन्यायांची जाण आली होती.” पुढे ते म्हणतात की, “हमीद गेला याचा अर्थ असले दुर्मीळ हात गेले. हमीद अनेक दृष्टींनी अकाली गेला. विरोधकांना त्याला हरवता आले नसते. एका दुर्धर रोगाने ऐन बहरात त्याचे जीवनपुष्प कुस्करून टाकले. या दु:खाबरोबरच भारताच्या जीवनात एक नवे क्रांतिपर्व सुरू होते आहे, अशा काळातले हमीदच्या निधनाचे दु:ख मनाला अधिक यातना देणारे आहे. केवळ मुसलमान समाजाचेच नव्हे, तर साऱ्या भारतीयांचे हे दु:ख आहे. आजवर या ना त्या पूर्वग्रहामुळे एकमेकांपासून दूर राहिलेले भारतातील सामाजिक आणि राजकीय चळवळीचे प्रवाह एकमेकांत मिसळण्याचा एक ऐतिहासिक क्षण आला आहे. अशा क्षणांना पकडून त्यांचे युग करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या हमीदच्या हातांसारख्या हातांची कधी नव्हती इतकी आज गरज आहे. ते सामर्थ्य आता हमीदच्या विचारांतून मिळवावे लागणार आहे.” (संदर्भ : ‘मैत्र’- मौज प्रकाशन गृह, मुंबई / हमीद : एक श्रेष्ठ प्रबोधनकार)

राजकारणावर सडेतोड मते
‘राजकारण आणि संस्कृती उत्तरार्ध’ या लेखात पुलं देशपांडे म्हणतात की, “वस्तुतः केवळ राजकारणी लोकांना सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रांत ढवळाढवळ करण्याचा काय अधिकार पोचतो! वैयक्तिक महत्त्वाकांक्षेच्या आहारी जाऊन ‘येन केन प्रकारेण’ निवडणुका जिंकणे व सत्तास्थाने काबीज करणे, हेच ज्यांचे ध्येय, त्यांना नीती-अनीती, धर्माधर्म, सुसंस्कृतपणा, रानटीपणा यांचे कसलेही सोयरसुतक नसते. निवडणुकांचे राजकारण हे केवळ निनैतिकच नसते, तर ते सर्व नैतिक, धार्मिक व सांस्कृतिक जीवनमूल्यांची पायमल्ली करणारे असते; ही गोष्ट आपल्या देशापुरती तरी आता सिद्ध होऊन चुकली आहे. सांस्कृतिक जीवनमूल्यांची भेसुर विटंबना करणाऱ्या या अशा राजकारणी लोकांकडे जनतेच्या सांस्कृतिक व शैक्षणिक विकासाची जबाबदारी राहू देणे म्हणजे सिद्ध होऊन चुकलेल्या पापाचरणाला अमरपट्टा बहाल करणे होय!”
इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाही आणि बाळासाहेब ठाकरेंच्या ‘ठोकशाही’लाही विरोध
१९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर पुलं देशपांडे त्या विरोधात सक्रिय भूमिका घेऊन उभे राहिले. कलावंताचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य त्यांना प्रिय होते. त्यामुळे त्यांनी आणीबाणीनंतर काँग्रेसविरोधात प्रचारच केला. तत्कालीन परिस्थितीत जसा विरोधी प्रचार त्यांनी काँग्रेसविरोधात केला अगदी तसेच महाराष्ट्रात हिंदुत्ववादी युतीचे सरकार असताना ते ‘ठोकशाही’वरही बोलले होते. “लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा ”लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो’ वगैरे बोलायला लागतात, तेव्हा माझ्यासारख्याला किती यातना होत असतील ते कोणत्या शब्दांत सांगू? ‘निराशेचा गाव आंदण आम्हासी’ ही संत तुकोबाची ओळ पुन्हा पुन्हा आठवायला लागते”, असे वक्तव्य पुलंनी केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हे वक्तव्य आवडले नव्हते. त्या दोघांमधील संबंध एरवी सलोख्याचे असले तरीही पुलंनी केलेल्या वक्तव्याविरोधात बाळासाहेब ठाकरेंनी केलेले वक्तव्यही चर्चेत आले. “झक मारली अन् पुलंना पुरस्कार दिला. आम्ही ठोकशाहीवाले तर आमचा पुरस्कार कशाला स्वीकारता?”, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. त्यांनी पुलंना ‘मोडका पूल’ असेही म्हटले होते. हिंदुत्ववादी विचारसरणीसोबत पुलंचे संबंध कसे होते, याबाबत बोलताना जयदेव डोळे यांनी म्हटले की, “सावरकर आणि देवल दोन हिंदुत्ववादी आणि संघपरिवारातील माणसं सोडली, तर या परिवाराला आपल्यापासून चार हात दूर ठेवणंच पुलंनी पसंत केले. सावरकरांना त्यांनी ऐकलेलं-पाहिलेलं होतं. महाराष्ट्रावर सावरकरांची भुरळ पडलेला तो काळ होता. आता आपल्याला उपलब्ध असलेले सावरकरांच्या कर्तृत्वाचे ऐतिहासिक वस्तुनिष्ठ मूल्यमापन त्या काळात झालेले नव्हते. त्यामुळे पुलं देशपांडे आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून एकाच वेळी साने गुरुजींच्याही प्रेमात होते आणि एकाच वेळी ते सावरकरांच्याही प्रेमात होते. कारण या दोघांच्या विचारातील विरोधाभास ७०-८० वर्षांपूर्वी मराठी समाजाला फारसा समजत नव्हता, तो पुलंच्याही स्वभावात आणि वागण्यातही दिसून येत होता.”

पु.ल. देशपांडे – प्रामुख्याने एंटरटेनर
१९४६-४७ च्या सुमारास साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून आंदोलन छेडले होते. त्यासाठी दहा दिवस प्राणांतिक उपोषणही केले होते. या उपोषणालाही पुलं देशपांडे यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. साने गुरुजींची भूमिका नाटक, पथनाट्य, वगनाट्याच्या माध्यमातून लोकांसमोर नेण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे कलापथक सक्रिय होते. या कलापथकाला लिहून दिलेले एक गीतही प्रचलित झाले होते. त्या गीताचे बोल असे होते,
हरिचे प्यारे हरिजन आम्ही आलों हरिचरणी
पंढरिराया राउळिं तुमच्या बसूं धरुन धरणीं ॥
चोखामेळ्याच्या भक्तिची शक्ती आम्हाला
मिराबाईचें घुंगुर चरणीं सखुच्या करताळा ||

साने गुरुजींबद्दल लिहिलेल्या ‘स्वप्न आणि सत्य’ या लेखात पुलं देशपांडे म्हणतात की, “गुरुजींच्या वाङ्मयात केवळ काव्यातलाच निसर्ग आहे असे नाही, त्यांनी विज्ञानाच्या उपासनेला फार महत्त्व दिले आहे. गुरुजींनी म्हटले आहे, ‘विज्ञानग्रंथांची भाषांतरे करा, तुम्हाला प्रतिशब्द मिळाले नाहीत तर ऑक्सिजनला ऑक्सिजन म्हणा; कार्बनला कार्बन म्हणा, पण विमाने उडतात कशी? आकाशापर्यंत लोक कसे जातात, हे मुलांना कळू द्या.”

पुलं देशपांडे यांनी चित्रपटात संत चोखोबांचीही भूमिका केली होती. व्यंकटेश माडगूळकर यांची कथा आणि ग. दि. माडगूळकर यांची पटकथा, संवाद आणि गीते असलेला हा सिनेमा १९५० साली ‘जोहार मायबाप’ आणि १९८१ साली ‘ही वाट पंढरीची’ या नावाने प्रदर्शित झाला होता. पुलं देशपांडेंनी समतेच्या आणि मानवतावादी चळवळीला नेहमीच सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी प्रसंगी राजकीय भूमिका घेण्यासही मागे-पुढे पाहिले नाही. देवा-धर्माबाबत वैयक्तिक जीवनात ते नास्तिक आणि निधर्मी होते. देवधर्म व कर्मकांडांत ते कधीही गुंतले नाहीत तसेच कोणत्याही माध्यमातून त्यांचा पुरस्कारही केला नाही. मात्र, तरीही विचारसरणीच्या भिंती ओलांडून ते संपूर्ण महाराष्ट्राचे ठरले. याबाबत बोलताना जयदेव डोळे म्हणाले की, “पुलं देशपांडे सर्वात आधी एंटरटेनर होते आणि एंटरटेनर माणूस हा विशिष्ट वर्गांसाठी काहीही करत नाही. त्यावेळी पुलंना शाहीर अमर शेख, आण्णाभाऊ साठे, शाहीर साबळे असे समकालीन लोक होते. एवढी तीन मोठी व्यक्तिमत्त्वे उघडपणे राजकीय विचारसरणी मांडत होती. त्या काळात दलित आणि बहुजन समाजामध्ये या तिघांचीही लोकप्रियता पुलंहून अधिक होती. मात्र, त्यांच्यासारखी थेट राजकीय भूमिका पुलं मांडत नव्हते. दुसऱ्या बाजूला एंटरटेनमेंट हाच त्यांचा पाया असल्यामुळे त्यालाही थेट राजकारणाचा पाया देणे त्यांना योग्य वाटले नसावे. शिवाय त्यांचा चाहतावर्ग हा ग्रामीण, शेतकरी, कामगार, कष्टकरी नव्हे तर शहरी मध्यमवर्ग होता. हा मध्यमवर्ग समाजवादी असो वा हिंदुत्ववादी असो, तोच त्यांचा चाहतावर्ग ठरला.”

विनायक होगाडे
लोकसत्ता 

Wednesday, June 26, 2024

पु. ल. आज तुम्ही हवे होतात. - (अविनाश चंदने)

पु. ल. देशपांडे यांचा जन्म हा देण्यासाठीच झाला होता. त्यांनी महाराष्ट्राला उत्तम साहित्य दिले, उत्तम संगीत दिले, सुंदर काव्य दिले, मराठीजनांना पोट धरून हसवले, सामाजिक संस्थांना न बोलता ओंजळी भरून दिले. गुणीजनांचे तोंडभरून कौतुक करण्याची ख्याती पुलंचीच! साहित्य, नाटक, चित्रपट, एकपात्री प्रयोग, संगीत मैफल या सर्वांवर त्यांची हुकूमत होती. पुलंनी प्रत्येक गोष्टीला चार चाँद लावले. आजच्या इंटरनेटच्या युगात पुलंचे सर्व साहित्य, त्यांचे प्रयोग यूट्यूबवर उपलब्ध आहेत. आजही त्याचा आनंद घेतला जात आहे. १२ जून रोजी पुलंचा २४ वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने या निर्लेप, सज्जन मनाच्या माणसाची ही आठवण.

गेल्या आठवड्यात रत्नागिरीहून माझ्या जुन्या मित्राचा मुलगा भेटायला आला होता. एसटीने आलो म्हणाला आणि डोळ्यासमोर उभी राहिली ती पुलंची ‘म्हैस’. मी त्याला हातखंब्याविषयी विचारले आणि अजूनही तिथे एसटीसमोर म्हैस आडवी येते का असे विचारले. त्याला काही कळले नाही, मात्र माझ्या चेहर्‍यावरचे हसू त्याच्या नजरेतून सुटले नाही. मग त्याने कारण विचारले. त्याला एकच उत्तर दिले, एकदा पुलंची ‘म्हैस’ ऐक नंतर मला विचार. लगेच त्यांनी यूट्यूबवर म्हैस शोधली आणि ऐकली. त्यानंतर पुलंचे बरेच एकपात्री प्रयोग पाहिले, ऐकले आणि एकदम खूश झाला.

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राला लाभलेले दैवी देणे होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अशीच त्यांची ओळख होती. साहित्य, संगीत आणि कला क्षेत्रात त्यांचा सिद्धहस्त वावर होता. त्यांना अख्खा महाराष्ट्र ‘पुल’ म्हणून ओळखतो आणि फिल्म इंडस्ट्रीत तसेच देशात ‘पीएल’ नावाने त्यांना हाक मारायचे. हे सांगण्याचे कारण म्हणजे पुलंना जाऊन दोन तपं झालीत. 12 जूनला पुलंचा 24 वा स्मृतिदिन आहे. 12 जून 2000 रोजी पुलंनी शरीराने हे जग सोडले, मात्र त्यांनी साहित्याची, कलेची, त्यांच्या संगीतप्रेमाची छाप कायमची अवघ्या मराठीजनांवर सोडली आहे. तिचा कधीही कुणाला विसर पडणार नाही. 

पु.ल. म्हटले की डोळ्यांसमोर सर्वात प्रथम येतात ती त्यांची ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील पात्रे. ज्यांनी पु.ल. देशपांडे वाचले आहेत तो माणूस हातखंब्याला आला की हमखास एसटीतून बाहेर डोके काढून बघणार! न जाणो एखादी म्हैस एसटीला आडवी येईल आणि मग उगाचच तीन-चार तासांचा खोळंबा येईल, मात्र तो खोळंबा सर्वांना हवाहवासा वाटेल. कारण त्यात बाबूतात्या, खादीवाले, उस्मानशेट, मास्तर, मुलस्ट्यांचा मधू, ती सुबक ठेंगणी या सर्वांच्या भेटी होतील. ही सर्व पात्रे पुलंनी रत्नागिरी ते मुंबई या एसटी प्रवासात अजरामर करून ठेवली आहेत.

पुलंचे आणखी एक असेच विशेष पात्र म्हणजे ‘नारायण’, जो सगळी कामे बिनदिक्कतपणे करतो आणि त्यानंतर नामानिराळा होतो तो नारायण. पुलंनी नारायणाला असा काही घडवला आहे की विचारू नका! काही वर्षांपूर्वी लग्नानिमित्ताने पुण्याला मुक्कामी होतो. सर्व काही सुरळीत सुरू होते आणि तिथला एकजण सारखी धावपळ करत होता. जणूकाही लग्नाची सर्व सूत्रे त्याच्या हातात दिली होती. हे पाहून एका पाहुण्याने मला विचारले, हे सद्गृहस्थ आहेत तरी कोण? नारायण, असे उत्तर माझ्या तोंडून नकळत बाहेर पडले. 

लग्नसोहळ्यात एखादी व्यक्ती अशी असते जिच्याशिवाय पानदेखील हलत नाही. तो ‘नारायण’ असे पुलंनीच म्हटल्याने नारायण अजरामर झाला. पुलंची सर्व पुस्तके गाजली. त्यांना कायम मागणी राहिली. या सगळ्यांत ‘व्यक्ती आणि वल्ली’ने अमाप लोकप्रियता मिळवली. ही पात्रे पुलंना खरंच भेटली होती का, असा प्रश्न सर्वांना पडतो. त्यावर ‘म्हटले तर भेटली आहेत, म्हटले तर नाहीत,’ असे उत्तर पुलंनी दिले होते.

पुराव्यानं शाबीत करीन म्हणणारे ‘हरितात्या’, ‘परोपकारी गंपू’, विलेपार्ले ते चर्चगेट हा प्रवास कधीही बसून न करणारा आणि बाबा रे तुझं जग निराळं आणि माझं निराळं म्हणणारा ‘नाथा कामत’, नुसतीच सोबत करणारा टेस्टलेस-कलरलेस-ओडरलेस ‘गजा खोत’, पोरगं तावडीत सापडलं की त्याला घासून पुसून जगात पाठवणारे ‘चितळे मास्तर’, बुद्धीजीवी ‘लखू रिसबूड’, बदनाम झालेला ‘बबडू’, बेळगावमध्ये वेव्हलेन्थ जुळलेले ‘रावसाहेब’, पावणेसहा फूट उंच आणि निळ्या डोळ्यांचा ‘नंदा प्रधान’, रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीतील लोकोत्तर ‘अंतु बर्वा’, प्राज्ञ मराठी बोलणारा ‘सखाराम गटणे’ ही आणि अशी अनेक पात्रे केवळ आणि केवळ पुलंनी जन्माला घातलीत आणि त्यांना चिरंजीव केले.

पुल केवळ साहित्यात रमले असे नाही तर ते संगीत, गायन, वादन, नाटक, चित्रपट अशा सर्व ठिकाणी त्यांनी उत्तम तेच दिले. जे उत्तम असेल, चांगले असेल त्याचे पुल कौतुक करायचे. नवोदितांना प्रोत्साहन द्यावे तर पुलंनीच. ‘वस्त्रहरण’ हे मच्छींद्र कांबळी यांचे नाटक सर्वांना माहीत आहेच. हे नाटक सुरुवातीला चालले नाही. पुलंनी ते पाहिले, त्याचे जाहीर कौतुक केले. त्यानंतर अख्खा महाराष्ट्र आजपर्यंत या नाटकाचे कौतुक करताना दमला नाही. ‘कोसला’ कादंबरीचेही असेच आहे.

पुलंनी ‘कोसला’चे जेवढे कौतुक केले तेवढे कदाचित कुणीही केले नसावे. विशेष म्हणजे ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे आणि पुलंचे फारसे कधी जुळले नाही, मात्र ‘कोसला’चे कौतुक करताना त्यांच्यातील मतभेद कधीही दिसले नाहीत. साहित्य, नाटक, संगीत, चित्रपट आणि हो माणसांत रमणार्‍या पुलंना महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. त्यांची पुस्तके, त्यांचे एकपात्री प्रयोग हे सर्व आजही मराठी माणसाच्या मनात घर करून आहेत.

1942 चा लढा असो किंवा 1977 चा आणीबाणीचा संघर्ष, पुलंनी लेखणी बाजूला ठेवून राजकारणात उडी मारली होती. तिथे त्यांनी अनेकांची भंबेरी उडवली होती, मात्र हेतू साध्य झाल्यावर राजकारणातून अंग बाजूला काढून ते पुन्हा लिखाणाकडे वळले. पुल ही व्यक्ती अगदी हटके होती. आताच्या जनरेशनला कदाचित ठावूक नसेल म्हणून पण भारतात दूरदर्शनचा पहिला कार्यक्रम सादर करण्याचा मान पुलंना मिळाला होता.

त्यासाठी त्यांना लंडनमध्ये ब्रॉडकास्टिंग आणि टेलिव्हिजनचे प्रशिक्षण देण्यात आले होते. दूरदर्शनमध्ये सर्वकाही उत्तम चाललेले असताना त्यांनी ते सोडले. पुल कधीही एका जागी स्थिर राहिले नाहीत. राज्याच्या साहित्य, कला, संगीत क्षेत्रासाठी पुलंचे एका जागी स्थिर न होणे जमेची बाजू ठरली. पुल सर्व क्षेत्रात वावरले म्हणूनच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ऐश्वर्यात आणखी मोठी भर पडली.

पुलंनी पन्नाशीनंतर म्हणजे 1970 च्या सुमारास बंगाली शिकण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी ते गुरुवर्यांच्या (रवींद्रनाथ टागोर) पश्चिम बंगालमधील शांती निकेतनमध्ये गेले होते. ते बंगाली नुसते शिकलेच नाहीत तर त्यांनी बंगाली भाषेवर प्रभुत्वही मिळवले होते. बेळगावमधील राणी पार्वतीदेवी कॉलेज, मुंबईतील कीर्ती कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. मालेगावमधील महात्मा गांधी विद्यामंदिराचे ते प्रमुख होते.

मुंबई, पुणे तसेच दिल्लीच्या आकाशवाणीत त्यांनी नोकरी केली. पुलंना काहीही वर्ज नव्हते. त्यांची नजर जिथे जायची त्यात ते पारंगत होत असत. असे असले तरी संगीत त्यांच्या नसानसात होते. पं. वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व आदींशी पुलंची खास मैत्री तर बालगंधर्व यांच्याविषयी त्यांच्या मनात हळवा कोपरा होता. संगीत मैफलीत पुल रमून जायचे.

पुलंची ‘वार्‍यावरती वरात’, ‘रविवारची सकाळ’, ‘बटाट्याची चाळ’ यांचे प्रयोग तर प्रेक्षकांनी उचलून धरले होते. यांचे प्रत्येक प्रयोग कायम हाऊसफुल्ल होत असत. पुलंनी त्या काळी चित्रपटसृष्टीही गाजवली होती. त्यातील ‘गुळाचा गणपती’ चित्रपटाला सबकुछ पुल म्हटले जाते. म्हणजे याची कथा, पटकथा, संवाद, गीते, संगीत आणि दिग्दर्शन पुलंनीच केले होते. विशेष म्हणजे चित्रपटाचे नायकही पुल होते. आता गंमत पाहा, हा चित्रपट खूप चालला, चांगली कमाई केली, पण दुर्दैवाची बाब ही की चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रणही नव्हते. तिकीट काढून पुलंनी तो चित्रपट पाहिला होता.

व्यवहारी जगात पुलांना अनेकांनी फसवले होते, मात्र पुलंनी कधीही कुणावर राग धरला नाही की फसवणूक करणार्‍यांना त्यांनी कधी कोर्टात खेचले नाही. एवढेच कशाला फसवणूक करणार्‍यांबद्दल कुणाजवळ वाईटही बोलले नाहीत. कारण पैसा ही त्यांची गरज नव्हती, तर पुलंची कमाई ही सामाजिक गरज होती.

पुलंनी कुठलाही गाजावाजा न करता समाजाला भरभरून दिले. पुस्तकातून दिले, प्रयोगातून दिले, कवितांच्या कार्यक्रमातून दिले आणि खिशातून न मोजताही दिले. अनेक सामाजिक संस्थांना पुलंनी कुठलीही वाच्यता न करता आर्थिक मदत केली. त्यांच्यासाठी कायमची आर्थिक तजवीजही केली. त्यांनी उजव्या हाताने केलेले दान त्यांच्या डाव्या हातालाही कळले नसेल इतके पुल निर्लेप आणि सज्जन मनाचे होते.

– अविनाश चंदने
९ जून २०२४
उप वृत्तसंपादक आपलं महानगर
मूळ स्रोत - https://www.mymahanagar.com/featured/saransh/pu-la-today-you-are-wanted/752763/

Tuesday, June 18, 2024

स्वरयात्री पु. ल. - (अमृता देशपांडे)

'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' पु. ल. देशपांडे हे जग सोडून गेले, त्याला आज २४ वर्षं पूर्ण होत आहेत. अष्टपैलू प्रतिभेचे धनी असलेल्या पुलंचं 'संगीतकार' हे रूपही अतिशय सुरेल होतं. त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी व पुलंच्या संगीतप्रेमाविषयी...

१२ जून २००० या दिवशी पुलंचं देहावसान झालं. त्या दिवशी पु. ल. देशपांडे नामक व्यक्तीचा मृत्यू झाला नव्हता, तर अवघ्या महाराष्ट्राचा साहित्य आणि संगीतातल्या अमूल्य आठवणींचा ठेवा स्वर्गातल्या देवांचं मनोरंजन करायला निघून गेला होता. त्यांनीच म्हटलंय, 'स्वर्गात गेल्यावर ब्रह्मदेव मला विचारेल, 'वत्सा पुरुषोत्तमा, विनोदाचं भांडवल देऊन मी तुला पृथ्वीवर पाठवलं ते तू कुणाकुणाला दिलंस?' तेव्हा मी उत्तर देईन, 'मी कुणाला काय दिलं याचा हिशेब ठेवत नाही; पण तमाम मराठी माणसांनी मला आपलं अनमोल हास्य दिलं; हे मी कधीही विसरणार नाही !'

अजूनही मराठी रसिकांचा दिवस 'इंद्रायणीकाठी देवाची आळंदी' या भजनानं किंवा 'कबिराचे विणतो शेले' अशा गाण्यांनी होतो, तर 'दूर कुठे राऊळात दरवळतो पुरिया...', 'सख्यांनो करू देत शृंगार' ही गाणी ऐकण्यानं एखादी संध्याकाळ फुलून येते. कधी जीवनातल्या अवघड वळणावरून जाताना 'माझे जीवनगाणे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मी जाणे' अशी त्यांनी संगीत दिलेली गाणी जगण्याचा धीर आणि जीवनातला आनंद देऊन जातात. 'शब्दावाचून कळले सारे'सारखी अत्यंत तरल चालीची गाणी प्रेमातल्या पूर्णत्वाचा आश्वासक आनंद देऊन जातात. पुलंच्याच शब्दांत 'कशासाठी जगायचं, तर संगीत ऐकण्यासाठी जगायचं' हा जीवनाचा हेतू देऊन जातात.

विनोदी लेखक, नाटककार, कथाकार, पटकथाकार, अभिनेते म्हणून पु. ल. महानच होते. उभ्या महाराष्ट्राला त्यांनी हसवलं. त्या पुलंचा मला अतिशय भावणारा गुण म्हणजे त्यांच्यातला सूरग्राही संगीतज्ञ... गायक, वादक आणि संगीतकार !

त्यांना लहानपणापासूनच सुरांची विलक्षण ओढ होती. लहानपणच्या अगदी पुसट आठवणींबद्दल बोलतात, तेव्हा ते प्रसंगांपेक्षा सूरांचींच आठवण अधिक असल्याचं सांगतात. त्यांची आई खूप चांगली पेटी वाजवत असे आणि आजोबा कीर्तनकार होते. त्यांच्या घरात गाणं-बजावणं कायम होतंच. आवाजाच्या आणि सूर-लयीच्या ओढीबद्दल ते म्हणतात, 'ज्या काळात लहान मुलांचं लक्ष प्रसादाच्या खिरापतीकडे असतं, त्या काळात माझं लक्ष कीर्तनकाराच्या कथेमधे आणि अभंग, श्लोक, आर्या यांच्यामधे असायचं.' वयाच्या अगदी आठव्या दहाव्या वर्षापासून त्यांनी बालगंधर्व, बाई सुंदराबाई, सवाई गंधर्व, मास्टर कृष्णराव, हिराबाई बडोदेकर, फैयाझ खाँ, मल्लिकार्जुन मन्सूर यांचं गाणं ऐकलं. या सगळ्यांच्या गाण्याचे सूर त्यांच्या मनात आणि हृदयात घट्ट वसले होते. त्यांच्याच वयाचे असणारे पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याशी त्यांची मैत्री आजन्म राहिली. त्यांच्या मैत्रीतली एकतानता 'इंद्रायणीकाठी', 'ही कुणी छेडिली तार...' अशा अनेक गाण्यांतून दिसते.

पुलंना सगळ्या प्रकारची गाणी आवडायची. नाट्यगीतं तर ते अगदी समरस होऊन गायचे. बालगंधर्वांवर पुलंचं निरतिशय प्रेम. त्याबद्दलचे अनेक किस्से आहेत. लहानपणी ते पेटी शिकायला दत्तोपंत राजोपाध्ये मास्तरांच्या क्लासला जात असत. त्यांच्या क्लासचं स्नेहसंमेलन होतं. त्याला अध्यक्ष म्हणून प्रत्यक्ष बालगंधर्व आले होते. त्यांच्यासमोर अकरा वर्षांच्या पुरुषोत्तमानं पेटीवर त्यांचीच नाट्यगीतं वाजवायला सुरुवात केली; तसे बालगंधर्व खुर्चीवरून उठून पुलंच्या समोर येऊन बसले आणि भरभरून आशीर्वाद दिले. बालगंधर्वांची गायकी पुलंनी आयुष्यभर आपल्या हृदयात साठवली.

लेखक व्हायच्या आधी पुलंना गायकच व्हायचं होतं. ते संपूर्ण महाराष्ट्रभर गाण्याचे कार्यक्रम करीत असत. पुढं वसंतरावांची आणि पुलंची ओळख झाली. पु. ल. वसंतरावांसमोर गायले. वसंतरावांनीही पुलंच्या गाण्याचं कौतुक केलं; पण वसंतरावांनी आपली गायकी पेश केली, तेव्हा आपण काहीच नाही असं वाटून पुलंनी गाणं म्हणणं सोडून दिलं. आयुष्यभर पेटी वाजवली अन् गाण्यांना संगीत दिलं. वसंतरावांच्या गाण्याबद्दल पु. ल. म्हणतात, 'वसंताची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवणारी नाही. ती दऱ्याखोऱ्यांतून बेफाम दौडत जाणाऱ्या घोडेस्वारासारखी आहे.'
        
पेटी वाजवण्याबरोबरच अभिनय, नाट्यलेखन, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण आणि फार काय; पण त्यांनी तमाशाही लिहिला आहे. हे सगळं एकच माणूस करतो, हे आजच्या 'स्पेशलायझेशन'च्या पिढीला खूप आश्चर्यकारक वाटण्यासारखं आहे. याबद्दल ते म्हणतात, 'एक विदूषक, एक गायक आणि एक लेखक माझ्यामध्ये लहानपणापासून दडलेला आहे. यांच्यापैकी कोण केव्हा उसळी मारून वर येईल काही सांगता येत नाही.' त्यांनी रेडिओ आणि 'दूरदर्शन'मध्ये नोकरी केली. त्यानिमित्तानं देशाभरातल्या अक्षरशः शेकडो संगीत कलाकारांशी त्यांची चांगलीच गट्टी जमली. संगीतप्रेमी मंडळींशीही स्नेह जुळला. तिथंच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं विपुल संगीत ऐकलं. पुलंना कोणतंही गाणं वर्ज्य नव्हतं. याबद्दल त्यांनी एका ठिकाणी खूप सुंदर लिहिलं आहे. ते म्हणतात, 'मी सूर-तालाचा लोभी आहे. त्या लोभात सारंगीही आहे आणि एकतारीही आहे. मृदंगही आहे आणि ढोलकीही आहे. कपाळभर आडवं गंध लावलेला धृपद धमार आहे आणि डोळ्यात सुरमा घातलेली गझलही आहे...'

किती रसिकतेनं लिहिलं आहे हे! पुलंनी संगीत दिलेली गाणी आजही आपल्या मनात ताजी आहेत. त्यात ज्योत्स्नाबाई भोळेंनी गायलेलं पहाटेचं चित्रमय वर्णन करणारं 'झाली पहाट झाली पहाट' हे गाणं, मागच्या अनेक पिढ्यांनी ज्या गाण्यावर ठेका धरला ते आशा भोसलेंच्या आवाजातलं 'नाच रे मोरा नाच' आहे, तर माणिक वर्षांनी गायलेलं खट्याळ चालीतलं 'हसले मनी चांदणे'ही आहे. या गाण्यांच्या आठवणीही अत्यंत रमणीय आहेत. एकदा गदिमा आणि पु. ल. रस्त्यानं जात होते. तेव्हा गदिमांनी पुलंना आपल्याला ते रागविग काही कळत नसल्याचं म्हटलं आणि 'केदार राग कसा असतो,' असं विचारलं. त्यावर पुलंनी उत्तर दिलं, 'समोर प्राजक्ताचं डवरलेलं झाड दिसतंय ना तोच केदार!' क्या बात है! गदिमाही काय समजायचं ते समजून चुकले आणि एक गीत त्यातून तयार झालं, 'ही कुणी छेडिली तार, प्राजक्ताच्या मधुगंधासम कुठुनी ये केदार...' या गाण्याला पुलंनी केदार रागातच चाल दिली !

एक विशेष गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे पुलंनी 'बिल्हण' या मूळ संस्कृत नाटकाचं मंगेश पाडगावकरांना मराठीत रूपांतर करायला सांगितलं. मंगेश पाडगावकरांनी ही सांगीतिका - लिहिली. त्याला पुलंनी संगीत दिलं. ही सांगीतिका आकाशवाणीवर दोनदा प्रसारित झाली. एकदा किशोरी आमोणकर आणि पं. भीमसेन जोशी यांनी गायली, नंतर पं. जितेंद्र अभिषेकी आणि किशोरी आमोणकर यांनी गायली. त्यात शोभा गुर्टू, रामदास कामत आणि पं. हरिप्रसाद चौरसिया असे अनेक मातब्बर कलाकार होते. या सगळ्यांची मोट पु. ल.च बांधू शकतात. याच्या रेकॉर्डिंग आता फारशा उपलब्ध नाहीत. त्यातलं एकच अप्रतिम गाणं 'सात समुद्रापलीकडून विहंगाला......' ऐकायला मिळतं. पुलंच्या अशा अगणित आठवणी आहेत. हा आपल्याला मिळालेला अमूल्य ठेवा कितीही वाटला तरी न संपणारा आहे. पुलंच्याच शब्दात सांगायचं म्हटलं, तर 'आपलं संगीतच मुळात चिरतरुण आहे'. म्हणूनच पुलंची आठवण आल्यावर मागच्या संपूर्ण शतकाचा संगीतपट व डोळ्यासमोर उभा राहतो, डोळ्यांच्या कडा ओलावतात आणि टागोरांच्या कवितेतल्या ८. त्यांच्याच ओळी, त्यांच्याच आवाजात मनात निनादत राहतात...

हसेन खळखळ, गायीन कलकल
धरुनी ताल मग टाळी देईन,
माझ्यापाशी कथा किती तरी,
गाणी किती तरी,
प्राणांची अन शक्ती किती तरी..
सुखे किती, अनंत ऊर्मी,
मम जीवाची कोण उभारी...


अमृता देशपांडे
संपर्क क्रमांक - ९६८९९४७०१४
(लेखिका संगीत अभ्यासक आहेत.)
महाराष्ट्र टाईम्स
१२ जून २०२४

Monday, June 17, 2024

एक चाळीशी.. हवीहवीशी - (प्रेरणा कुलकर्णी)

गेल्या आठवड्यात पुलं चा स्मृतिदिन होता त्यानिमित्त हा लेख. कितीतरी महिने हे डोक्यात घोळत होतं. आज त्याला शब्दरूप देता आलं. पुलं च्या स्मृतीस त्रिवार वंदन!

गेल्या दोन तीन वर्षांपासून मला एका गोष्टीचं अत्यंत कुतूहल वाटतंयं. काळा जाड्या फ्रेमचा चष्मा आणि अर्थात त्यामागील ते मिश्किल, प्रेमळ, आणि हसरे डोळे.. म्हणजे इतकं की तुम्हाला काय व्हायला आवडेल असा एखादा निबंधाचा विषय दिला तर माझा विषय अगदी पक्का- तो जाडा काळा चौकोनी चष्मा किंवा त्यापलीकडची ती दृष्टी.. ती जादुई नजर. तसं तर आपल्या सगळ्यांनाच रोज शेकडो लोकं दिसत असतात. मुंबई सारख्या महानगरात राहत असू, लोकलने जात असू तर तोच आकडा हजारावरही जाऊ शकतो.

ही लोकं, काही अत्यंत कंटाळवाणी अगदी टाळू वाटावी अशी तर काही महाभयंकर अगदी चार हात दूर राहाव अशी, काही रागीट तर काही अतिप्रेमळ, काही बेफिकीर, तर काही बेरकी, काही भोळसट तर काही परोपकारी तर काही चाकोरीबद्ध जीवन जगणारी. हातावर पोट असणारी, दोन पैसे गाठीशी बाळगणारी, ऋण काढून सण साजरा करणारी, पोटाला चिमटा काढून पै न पै साठवणारी. अशी नाना प्रकारची, नाना स्तरावरची, आपणही त्यांच्याशी कधी हसतो, बोलतो, चिडतो, टाळतो, दुर्लक्ष करतो, प्रेम करतो, द्वेष करतो, कौतुक करतो किंवा क्वचित कधी थोडी असुयाही बाळगतो.

आपण अगदी सामान्य माणसं, म्हणजे सूर्योदय किंवा सूर्यास्त बघितला म्हणजे काही लगेच आपल्याला कविता स्फुरणार नाही, की झाडाखाली बसलो म्हणून न्यूटन सारखे शोध लागणार नाहीत, किंवा परिस्थितीने चटके दिले वा प्रेमात पडलो म्हणून लगेच कादंबरी लिहायला सुचणार नाही. तेथे पाहिजे जातीचे. या लेखक, कवी, नाटककार मंडळींचं आपल्यापेक्षा सगळंच वेगळं. पण तरी त्यातही डावं उजवं असतंच नाही? म्हणजे बघा अगदी कितीही श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लेखक म्हंटला तरी त्यांची काही पुस्तकचं लोकप्रिय होतात.. त्यातही एखादी लेखांची पुस्तकांची मालिका लिहिली की त्यातील एखादे पात्र अजरामर होणार.

पण मग असा एखादा अवलिया, ज्याच्या एका पुस्तकात त्याने वीसेक पात्र तरी खुबीनं रंगवलीयेत आणि ती सगळी लोकप्रिय झालीयेत. आणि हे असं एखादच पुस्तक नाही तर कितीतरी पुस्तकं, नाटकं, कलाकृती.. आणि त्या प्रत्येक कलाकृतीतली अनेक पात्र, व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्यात नव्हे तर अजरामर झाल्यात. इतक्या की नंतरच्या तिसऱ्या, चौथ्या पिढीलाही एखादा शब्द किंवा वाक्य त्यांच्या कुठल्या पुस्तकातील कुठल्या पात्राच्या तोंडी होत हे अगदी तत्परतेनं सांगता येतं. बरं ती पात्र किंवा व्यक्ती रेखाही काही शूरवीर राजे महाराजे, किंवा अमानवी शक्ती असलेले जादूगार किंवा देवदूत नाहीत तर अगदीच सामान्य किंवा अतिसामान्य माणसं… परिस्थितीचे तडाखे सोसलेली, जनरीतीच्या रहाट-गाडग्यात फिरणारी तुमच्या आमच्यासारखीच सुख दुःख असलेली.. किंबहुना
कदाचित ती तशी होती म्हणूनच ती इतकी लोकप्रिय झाली असावीत का?

आपल्या भोवती चालणाऱ्या कोलाहलातून, गराड्यातून, माणसांच्या जत्रेतून छोटे छोटे बारकावे, त्यांच्यातील नातेसंबंध, देवाण-घेवाण टिपणारे, त्यांच्या लकबी, लय, ढब, शब्दफेक, चढउतार हेरणारे ते ठसठशीत काळ्या जाड्या फ्रेममागचे ते मिश्किल डोळे. वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षांपासून पुलंना ऐकायला, वाचायला सुरुवात केली, तेव्हापासून ते वेगवेगळे कळत गेले, उमजत गेले. अर्थात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ते ते उमजणं, आवडणं वेगळं होतं. शालेय किंवा महाविद्यालयीन दिवसांत त्यातला विनोद, कोपरखळ्या, गोष्टीवेल्हाळता ह्यांनी वेड लावलं.
पुढे नोकरी, संसार सुरु झाल्यावर त्यातील व्याप, ताणतणाव विसरायला लावून काही क्षण हसायला लावणारा तो एक हलकासा विरंगुळा झाला. चाळीशीच्या आसपास अजून आयुष्य, माणसे बघितल्यावर, त्यांचे अनुभव घेतल्यावर त्या विनोदामागचे कारुण्य, टोकदारता, विसंगती जाणवू लागली आणि तीच विसंगती, विक्षिप्त माणसे किंवा त्यांचे स्वभाव, परिस्थिती मग आपल्या स्वतःच्या आयुष्यात आल्यावर बसणारी तिची झळ जराशी सुसह्य होत गेली.
वाचता वाचता कधीतरी छोटे मोठे अनुभव, मनोगत लिहायला लागल्यावर मग मात्र पुलं च श्रेष्ठत्व, वेगळेपण अजूनच भावत गेलं. कारण त्यांची एक एक कलाकृती, आणि त्यात चपखल बसणारी ती पात्रं.

आता हेच बघा ना..
असामी असामी मधे फक्त ४०-५० च्या दशकातला कारकुनी करणारे धोंडोपंत जोशीच रंगवले नाही तर त्यांचं पूर्ण कुटुंब, कॉलनीतील, चाळीतील माणसे, कचेरीतील सहकारी, त्यावेळची मुंबई, आणि अर्थात सरोज खरे .. आपली .. सगळं सगळं चित्र शब्दसामर्थ्यावर उभं केलय. तीन मजली बटाट्याची चाळ त्यातील अनेक बिऱ्हाडकरुंसकट इतकी सुंदर रंगवलीये की चाळसंस्कृती कधीही न अनुभवलेला, पाहिलेला वाचक/ श्रोताही त्यात रंगून जातो.
व्यक्ती आणि वल्ली म्हणजे तर एक खजिनाच आहे. नावाप्रमाणेच अनेक वल्ली तुम्हाला भेटतात अगदी कडकडून.
त्यात उच्चभ्रू नंदा प्रधान, साठाव्या दशकात मराठी कुटुंबियांच्या घरात सर्रास आढळणारा नारायण, गुलछबू नाथा कामत, बेरकी नामु परीट, अभ्यासातील किडा सखाराम गटणे, भोळसट गज खोत, परोपकारी गंपू, इरसाल पण तरीही हतबल असा अंतू बर्वा, उच्चमध्यमवर्गीय सरळमार्गी गुळगुळीत ते चौकोनी कुटुंब, नगण्य तरीही विक्षिप्त असा मिडिऑकर लखू रिसबूड, मिश्किल खट्याळ पेस्तनकाका - काकी, स्वतः मुखवटा घालून दुनियादारी करणारा आणि अंतर्मुख व्हायला लावणारा ‘तो’.

सुंदर मी होणार मधील दीदीराजे, बेबी राजे किंवा तुज आहे तुजपाशी मधील जिंदादिल काकाजी, कठोर आचार्य किंवा ती फुलराणी मधील फुलराणी, प्राध्यापक किंवा रविवार सकाळ मधील एकेक हरहुन्नरी चाळकरी, मालू, तिच्या उच्चभ्रू मैत्रिणी किंवा वार्यावरची मधील गावातला महाबेरकी साक्षीदार, टुरिंग टॉकिज दाखवणारे गावकरी, स्वागत समारंभातील मान्यवर .. केव्हढा मोठा तो स्पेक्ट्रम! जिथे एका लेखकाला एक पात्र तयार करून ते लोकांच्या मनावर ठसवायला फक्त एक पुस्तक नाही तर पुस्तक मालिका कराव्या लागतात.

तिकडे एका नाटकात, पुस्तकात असणारी अनेक पात्रे त्यांच्या संवादासह प्रेक्षकांच्या, वाचकांच्या मनावर राज्य करतात आणि पुस्तक/ नाटक संपल्यावरही हलकेच मनात त्यांची सोबत करत राहतात.. अगदी काही दशकांपूर्वीच्या काळातील त्या व्यक्ती अगदी ह्या काळातही त्यांना भेटत राहतात.. खरंच अगदी अद्भुत वाटतं सारं! म्हणूनच ते इंग्रजी मध्ये म्हणतात ना ‘अ फ्लाय ऑन द वॉल’ अगदी तसच त्या चष्म्यात बसून त्यांना काय काय आणि कस कसं दिसतं ते बघत राहावं .. अगदी तासनतास .. दिवसेंदिवस .. वर्षानुवर्षे पण म्हणजे आत्ता नाही हं कित्येक दशकं मागे जाऊन अगदी पार ६०च्या दशकापासून!
- प्रेरणा कुलकर्णी

Monday, April 22, 2024

सबकुछ पु.ल. - (अनिल हर्डीकर)

मराठीत साहित्यक्षेत्रात विनोदी लेखक म्हणून प्रचंड झालेले पु.लं. देशपांडे आणि विनोदी अभिनेता म्हणून नावारूपाला आलेल्या शरद तळवळकर यांची वसंत सबनीस यांच्या साक्षीने घडलेली ही भेट.

पु. ल. देशपांडे यांचे नाव माहीत नाही असे सांगणारा मराठी माणूस मिळणार नाही. 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' असा अत्यंत कमी शब्दांत त्यांचा पूर्ण परिचय केला जातो. पुलंनी जेवढे विपुल लेखन केले त्यापेक्षा काकणभर जास्तच त्यांच्याविषयी कौतुकाने, गौरवाने लिहिलेला मजकूर भरेल इतके त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेम केले. पुलंनी मुख्यत्वे विनोदी लेखन केले असले तरी त्यांच्या गंभीर विषयाला धरून असलेल्या लेखनातही त्यांच्यात असलेला खोडकर स्वभाव डोके काढतो आणि लेखन क्लिष्ट होत नाही.पुलं चांगले वक्ते होते. सामजिक कार्यासाठी त्यांनी अनेक संस्थांना देणग्या दिल्या. चित्रपट क्षेत्रात असताना 'सबकुछ पुलं' असा गुळाचा गणपती त्यांनी बनवला. शिक्षक म्हणूनही काही काळ ते महाविद्यालयात, शाळेत रमले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हेसुद्धा त्यांचे विद्यार्थी. ते जिथे गेले तिथे त्यांनी खसखस पिकवली. त्यांना संगीताची चांगली जाण होती, कविता त्यांना प्रिय होती. मात्र हा बहुरूपी कोणत्याही पदाला चिकटून राहिला नाही. आणीबाणीच्या काळात त्यांनी आपले वक्तृत्व किती प्रभावी आहे हे सिद्ध केले, पण तिथे ते रेंगाळले नाहीत. जसे ते इतरत्रही रेंगाळत राहिले नाहीत. ते बाबा आमटे यांच्या आनंदवनात गेले, रवींद्रनाथ टागोर यांच्या शांती निकेतनात राहिले. दूरदर्शनच्या निर्मितीत त्यांचे योगदान होते. त्यांना मिळालेल्या मान-सन्मानाचे मोजमाप करणे कठीण आहे.

आज मी त्यांचे पहिल्या भेटीचे दोन किस्से सांगणार आहे. साल वगैरे नक्की सांगता येणार नाही, पण तो काळ ज्या वेळी मोबाईल सोडा घरोघरी फोनदेखील नव्हते. पुण्यात पुलं राहत होते. काही कामासंदर्भात आपल्या एका मित्राला घेऊन ते त्यांच्या एका मित्राकडे गेले. घरात तो मित्र नव्हता. त्या मित्राची 13/14 वर्षांची मुलगी एकटीच घरात होती. पुलं तिला म्हणाले, "मी येऊन गेलो असे सांग तुझ्या बाबांना.'' ती म्हणाली, "नक्की सांगते.'' पुलं आणि त्यांचा मित्र निघणार इतक्यात ती म्हणाली, "काका चहा घ्या ना. मला येतो चहा करता. तुम्ही चहासुद्धा न घेता येऊन गेलात तर बाबा रागावतील.'' मुलीच्या बोलण्यात आदर होता, आग्रह होता. पुलंनी "राहू दे'' असे म्हणूनही ती ऐकत नाही म्हटल्यावर पुलं म्हणाले, "चहा नको. पण घोट घोट दूध दे गरम करून.''

मुलीने दूध गरम करून दोघांना दिले. पुलंना दूध कितपत गरम असेल याचा अंदाज करता आला नाही. त्यांनी दूध प्यायले आणि त्यांची जीभ भाजली. पुलं त्या मित्राच्या मुलीला एका शब्दाने बोलले नाहीत. मात्र घराबाहेर पडल्यावर सोबत असलेल्या मित्राला म्हणाले, "पहिल्या भेटीत चटका लावून गेली पोर.''

पुलंनी विनोद करण्यासाठी व्यंगाची चेष्टा केली नाही. 'गुण गाईन आवडी' हा एकमेव उद्देश त्यांच्या ठायी होता. माणसातल्या दुर्गुणाकडे कानाडोळा करून त्याच्या अंगी असलेल्या गुणांचे कौतुक करण्याचे विलक्षण कसब त्यांच्या ठायी होते.

महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना पुल पुण्यात राहत होते.वसंत सबनीस हा त्यांचा खास जुना मित्र होता. 'अघळपघळ' हे पुलंचे पुस्तक त्यांनी 'वसंता'ला अर्पण केले आहे. वसंत सबनीस कॉलेजच्या हॉस्टेलवर त्यांच्या एका मित्राबरोबर राहत असत. ज्यांचे नाव होते शरद तळवळकर. मराठी चित्रपटसृष्टीत एक बुद्धिमान आणि विनोदी अभिनेता म्हणून ते पुढे नावारूपाला आले, तर एक दिवस 'वसंता'ला भेटायला पुलं हॉस्टेलवर गेले. योगायोगाने वसंतरावांचा रूममेट असलेले शरद तळवळकर रूमवरच होते. साहजिकच वसंतरावांनी पुलंशी आपल्या रूममेटची ओळख करून दिली. म्हणाले, "पुर्ष्या, हा माझा रूममेट शरद तळवळकर आणि शरद हा माझा मित्र पुरुषोत्तम देशपांडे.'' क्षणाचाही विलंब न लावता पुलं वसंत सबनीसांना म्हणाले, "अगदी साधा, सरळ दिसतोय तुझा मित्र.'' पुलंच्या या बोलण्याचा अर्थ वसंत आणि शरद दोघांनाही लागेना. वसंत म्हणाले, "म्हणजे?''

पुलं म्हणाले, "आख्या नावात एकही काना, मात्र, वेलांटी नाही. श र द त ळ व ल क र.''

मराठीत साहित्यक्षेत्रात विनोदी लेखक म्हणून प्रचंड झालेले पुलं देशपांडे आणि विनोदी अभिनेता म्हणून नावारूपाला आलेल्या शरद तळवळकर यांची ही अशी भेट वसंत सबनीस हेही एक विनोदी लेखक यांच्या साक्षीने झाली.

- अनिल हर्डीकर
hardikarsutradhar@gmail.com



Friday, April 19, 2024

ऑल राउंडर पु. ल. - (नरहर कुरुंदकर)

आमचे मित्र पु. ल. देशपांडे हे मराठी जीवनातील एक दृष्ट लागण्यासारखे व्यक्तिमत्त्व आहे. सिनेमा उद्योगात पु. ल. ज्या वेळी शिरले त्या वेळी क्रमाने 'ऑल राउंडर' होण्याचा त्यांनी प्रयल केला. ते नट होते, दिग्दर्शक होते, पटकथा-लेखक, संवादलेखक, गीतकार, संगीत-दिग्दर्शक अशा नानाविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. शेवटी 'गुळाचा गणपती' सारखा एक चित्रपट तर असा आहे की ज्याचे नायक, दिग्दर्शक, पटकथालेखक असे अनेक विभाग एकट्याने सांभाळून पु. लं. नी एकखांबी तंबू तयार केला.

प्रतिभेचा चौरसपणा
नाटकाच्या क्षेत्रात ते पुन्हा नाटककार, नट, कुशल दिग्दर्शक या सर्व भूमिकांतून चमकलेले आहेत. पडदे ओढणारा आणि प्रॉम्प्टरपासून नाटककार आणि प्रमुख नट इथपर्यंत त्यांचा संचार चालतो.

संगीताच्या क्षेत्राशी पु. लं. चा घनिष्ठ संबंध आहे. गायनाचा क्लास कोण्या एकेकाळी त्यांच्या चरितार्थाचा विषय होता, गायनातील नानाविध बारकावे, हरकती त्यांच्या हातात व गळ्यात मुरलेल्या आहेत. संगीताचा विवेचक अभ्यासही त्यांनी बराच केला आहे. यादृष्टीने श्री. मारुलकर यांच्या पुस्तकाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना पाहण्याजोगी आहे.

रेडिओ आणि टेलिव्हिजन यांचेही तज्ज्ञ म्हणून पु. लं. कडे पाहिले जाते. ते कलावंत आहेत तसेच हाडाचे रसिक आहेत. केशवराव भोळे, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व यांच्याविषयी त्यांनी लिहिलेले लेख त्यांच्या अस्सल रसिकतेची साक्ष पटवतील. हाडाचा कलावंत आणि तितकाच दिलदार रसिक हा योग फार क्वचित जुळणारा असतो. इतरांच्या क्षेत्रांत पु. लं.चा शिरकाव आहे. तसे त्यांचे स्वतःचे एक खास क्षेत्र आहे. एकपात्री प्रयोग सौ. मुळगावकरही करतात; पण 'बटाट्याची चाळ'ला जे प्रायोगिक आणि कलात्मक यश आले त्याला महाराष्ट्रात तर दुसरी तोड सापडणे कठीण आहे. लक्ष्मी आणि सरस्वती यांचे वाकडे आहे असे म्हणतात. व्यवहारी न होता व्यवहार सांभाळणे, अस्मिता न सोडता धन पायाशी खेचून आणणे आणि जीवनाचा रसिक आस्वाद घेऊन कंटाळण्याचे निमित्त सांगून गर्दीत चालणारे एकपात्री प्रयोग बंद करणे हे भाग्य मराठीत फक्त पु. लं. नाच मिळाले. छापलेल्या कथा केवळ वाचून दाखविण्यासाठी हजार रुपये मागणारे जसे पु.ल.च, तसे चाळीस हजार रुपये रक्तपेढीला देऊन मराठी साहित्यिकांचा साहित्य सेवेवर घडलेल्या दानाचा उच्चांक निर्माण करणारे पुन्हा पु.ल.च !

याखेरीज ते साहित्यिक आहेत नाटके, एकांकिका, विनोदी लेख, व्यक्तिरेखा, प्रवासवर्णने आणि गप्पाशप्पा हा पसारा तर आहेत; बाजूला विविध विषयांवर त्यांचे फुलणारे वक्तृत्त्व आहे. इतिहास-संशोधनापासून सेवादलापर्यंत आणि चित्रकलेपासून रक्तपेढीपर्यंत जागृत नागरिकांची सर्व कर्तव्ये सांभाळणारे, ज्ञानाविषयी आस्था असणारे आणि कलांची आस्था असणारे चौरसपण पु. लं. ना लाभलेले आहे. याबाबत त्यांच्याशी तुलना करता येईल असा दुसरा माणूस सापडणे फार कठीण

पु. लं. भोवतीचे कुंपण
एवढा मोठा चौरसपणा माणसाचा व्याप वाढवतो, आवाका वाढवतो तसाच त्याच्या मर्यादाही निर्माण करतो. पु. लं. ना. आता अशा मर्यादा निश्चित पडलेल्या आहेत. या मर्यादाच्यावर मात करण्याची फार मोठी सुप्त शक्ती त्यांच्याजवळ आहे, हे खरे असले तरी ठिकठिकाणी पडलेल्या मर्यादा ओलांडण्याची जिद्द आणि इच्छा त्यांच्याजवळ किती आहे हाच एक महत्त्वाचा प्रश्न होऊन बसला आहे. नानाविध वाटांनी फुलणारे विस्तृत व्यक्तिमत्त्व हेच आता पु. लं.च्या भोवती कुंपण होऊन बसले आहे. या कुंपणावरून किती वेळा बाहेर उडी घेणे पु. लं. ना जमेल याचे उत्तर त्यांनी स्वतः द्यायचे आहे.

गौरव हाच शत्रू
महाराष्ट्राचे विनोदकार म्हणून सर्वत्र पु. लं. चा गौरव होत असतो. हा गौरवच या माणसाचा शत्रू ठरेल की काय अशी मला भीती आहे. मराठीतील विनोदाची परंपरा प्रामुख्याने बौद्धिक व रूक्ष आहे. न आवडणाऱ्या समाजविघातक घटनेची विविध प्रकारे चेष्टा करणे, टर उडविणे, रूढींना हास्यास्पद करून टाकणे किंवा दाखविणे असे आरंभीच्या मराठी विनोदाचे स्वरूप आहे. विनोद कोटीनिष्ठ असो, प्रसंगनिष्ठ असो की स्वभावनिष्ठ असो हास्यास्पद करून दाखविणे या जिद्दीची मर्यादा विनोदाला पडली आहे. कोल्हटकरांच्या सारख्या विनोदकाराच्या लिखाणात आपण हिंदूसमाजातील रूढींना हसतो. गडकरी आणि चि. वि. जोशी यांचा विनोद पाहत असताना आपण फजित झालेल्या, बावळट ठरलेल्या माणसाला हसत राहतो. कधी कधी एखाद्या कोटीमुळे लक्कन जाणवणाऱ्या विसंगतीकडे पाहून आपण हसतो; पण विनोदाची ही सारी रूपे स्थल-काल-समाजाने बद्ध केलेली आणि बौद्धिक रूपे आहेत. पु. लं.च्या लिखाणातील पुष्कळसा विनोद असाच आहे. चि. वि. जोशी, गडकरी, कोल्हटकर, वि. मा. दि. पटवर्धन यांच्या विनोदाची सर्व सामध्यें पु. लं.च्या ठिकाणी एकत्रित दिसू लागतात. या अर्थाने पाहिले म्हणजे मराठीतील विनोदाच्या मागच्या सर्व परंपरांचा पु. लं.च्या ठिकाणी समुच्चयाने आढळ दिसून येतो, पण असे असूनही चि. वि. जोशी किंवा कोल्हटकर यांच्या विनोदाला जो भरघोसपणा आहे, तसा पु. लं.च्या विनोदाला प्राप्त झालेला दिसून येत नाही. सुटे सुटे हसण्याजोगे प्रसंग एकजीव होऊन त्यातून विनोदाचा एक सलग पट उमलावा लागतो तसा सलगपणा अजून पु. ल.त नाही. त्यांच्या विनोदाचे स्वरूप अजूनही फुटकळ आहे. हा सलगपणा न जाणवण्याचे कारण लेखकाच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात अविछिन्न असणारी संगती अजून पु. लं.ना साधलेली नाही; या ठिकाणी आढळेल असे मला वाटते.

पु. ल. हे पु. ल. होण्याचे टाळत आहेत
पण माझी खरी तक्रार ही नाही. पु. ल. देशपांडे यांना चि. वि. जोशी, कोल्हटकर होता आले असते; पण तसे ते झाले नाहीत ही खरोखरी तक्रारच नव्हे. कारण पु. लं. नी कोल्हटकर, चि. वि. जोशी व्हावे अशी आमची इच्छाच नाही. माझी मुख्य तक्रार आपल्या नानाविध घाईगर्दीत पु. ल. हे स्वतः पु. ल.च होण्याचे टाळत आहेत, ही आहे. स्थळकाळाने आणि समाजाने, रूढींनी बंदिस्त केलेला असा माणूस असतोच; पण याच्यापलीकडे माणसाचे माणूसपण दडलेले असते. रूढींनी निर्माण झालेली परिहार्य मानवी दुःखे, वेदना असतातच; पण माणसाच्या माणूसपणामुळेच निर्माण झालेली दुःखे ही अधिक खोल व थक्क करणारी असतात. वेदनेचा हा मूलकंद जसा माणूसपणाच्या गाभ्यापर्यंत जाऊन भिडलेला असतो तिथेच हास्याचाही मूलकंद जाऊन भिडला पाहिजे. भावनेच्या पातळीवर विषण्ण होणे, सुन्न होणे हे जसे माणसांनाच शक्य आहे तसे हसणेही माणसांनाच शक्य आहे. जनावरांच्यासाठी 'Pain' आहे पण 'Sorrow' नाही आणि 'Pleasure' आहे पण 'Laughter' नाही. माणसाच्या माणूसपणाच्या साक्षीदार असणाऱ्या या मूलभूत ठिकाणापर्यंत जेव्हा विनोद जातो त्या वेळी तो वेदनेत, अनुकंपेत भिजून चिंब झालेला असतो. सहानुभूती, हळुवारपणा, दुःख, अनुकंपा, कीव ही ज्या विनोदाचा पाया आहे त्याचे स्वरूप मग केवळ बौद्धिक राहत नाही; ते तर्काची दारे ओलांडून आत्म्याइतके खोल जाते आणि वेदनेच्या दर्शनाप्रमाणेच एकाच वेळी माणसाला उल्हसितही करते आणि गुदमरूनही टाकते. मराठीला अनोखी असणारी विनोदाची ही पातळी पहिल्यांदा पु. लं.नी गाठली. या पातळीवर स्थिर होणे त्यांना जमत नाही; किंबहुना हे करणे त्यांना मनापासून फारसे महत्त्वाचे वाटत नाही, अशी माझी तक्रार आहे. या आपल्या हक्काच्या वैभवासाठी जागेवर पाय रोवून घट्ट उभे राहण्याइतकी पु. ल. स्थिरताच दाखवायला तयार नाहीत. त्यामुळेच त्यांचा चौरसपणा त्यांचा शत्रू होईल की काय, व्यापकपणा कुंपण होईल की काय अशी मला भीती वाटते.

पु. लं. चा मराठीत विनोदकार म्हणून गौरव होत असताना त्या विनोदाचे हे स्वरूप प्रायः कुणी लक्षात घेत नाही. कुठलाही विनोदकार चमकदार बुद्धीचा आणि मिष्किल असतो. तसा बौद्धिक चमकदारपणा व मिष्किलपणा पु. लं.च्या जवळ आहे; पण कोल्हटकरांच्या विनोदाचा रोख अंधःश्रद्धांनी जखडलेल्या समाजाला परंपरांची हास्यास्पदता दाखविण्याकडे होता. एका दृष्टीने त्या विनोदाचे प्रयोजन पुढे नेणे असे होते. पु. लं. चा विनोद यापेक्षा निराळा आहे. पुढे जाता जाता ज्या वेळी माणूस यंत्रच होऊ लागतो, त्याचे जीवन पोकळ होऊ लागते आणि निवडुंगाला कॅक्टस म्हणून कुंडीत जपण्याची व त्या आधारे आपली कलाप्रीती दाखवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा या माणसाला 'थोडे थांब या पळण्याच्या घाईत सर्वस्वी पोकळ यंत्र आणि माणुसकीला पारखा होऊ नको असे सांगावे लागते. पु. लं. च्या विनोदाला हह्यामुळे सनातनीपणाची झाक येते असाही आक्षेप कधी कधी ऐकू येतो; पण पुढे जाणे अगर थांबणे या दोन्हींचाही हेतू माणसाच्या स्वाभाविकपणाला असणारे अडथळे दूर करणे इतकाच आहे हे ध्यानात घेतल्यावर सनातनित्वाचा आक्षेप अनाठायी वाटू लागतो. पण खरे म्हणजे शिष्टाचारांच्या विळख्यात जे गुदमरणे आहे ते आक्रंदन पु. लं. च्या विनोदातून मिष्किलपणे साकार होत असते. याहीपेक्षा खोल जाण्याची शक्ती पु. लं. च्या ठिकाणी आहे. वेदनेच्या तळ्यावर मधूनच लाटा उसळाव्यात तसे त्यांच्या विनोदाचे स्वरूप काही ठिकाणी दिसते.

दुःखाचे चित्रण
असा लेखक दुःखाचे चित्रणही फार सामथ्यान करीत असतो. यापूर्वी मराठीत हा चमत्कार गडकऱ्यांनी करून दाखविला आहे. उत्कट दुःख आणि हास्याचा खळखळाट सारख्याच सामथ्यर्थाने गडकऱ्यांच्या नाटकांतून दिसू लागतो. हा पाहून आपण फार तर असे म्हणू की गडकरी ढसढसा रडवू शकत होते आणि खदखदा हसवू शकत होते. दुःख आणि हसू यांचे प्रांत जीवनात इतके वेगळे नाहीत. ज्या ठिकाणी हसणे आणि रडणे या दोन्ही गोष्टी एकच होऊन जातात तिथे आपण जीवनाच्या आकलनात अधिक खोलवर जाऊन पोचलेलो असतो. कधी यातील हास्याचा पापुद्रा एकदम विरळ होऊन जातो आणि मग दुःखाचा सूक्ष्म पण उत्कट आविष्कार प्रभावीपणे जाणवू लागतो. व्यक्ती आणि वल्लीतील 'अन्तू बर्वा' सारखी व्यक्तिरेखा अशी आहे. या व्यक्तिरेखेचा आस्वाद घेताना आपण हसतो आहोत की विषण्ण होतो आहोत, भाबडे प्रेम पाहताना आपण हळुवार होत आहोत की अन्तू बर्व्याची आविष्कारशैली पाहताना आपण 'सिनिकल' होत आहोत हे कळणेच कठीण होऊन जाते. हसता हसताच एकाक्षणी आपल्याला हे लक्षात येते की, आपण हसत नव्हतोच. आपण हा माणूस पाहून सुत्र होत होतो. अंतूची जीवनगाथा ऐकत असताना कणवेचा एक थेंब डोळ्यांत जमू लागतो आणि आपल्या दारिद्र्यावरचे विदारक भाष्य जेव्हा अंतू सांगू लागतो त्या वेळी हा थेंब वाफ होऊन उडून जातो. 'व्यक्ती आणि वल्ली'तील सर्वच व्यक्तिरेखा वाचताना हा अनुभव येतो असे नाही, पण जे अन्तू बर्व्यात साधले आहे ते. इतरत्र बोटातून निसटून गेले ही जाणीव पु. लं.ना कितीदा असते हा खरा प्रश्न आहे. त्यांच्या 'सोत्वन' सारख्या एकांकिकेत विनोदाचा हा पापुद्रा अगदी विरविरीत दिसू लागतो आणि मग सर्व प्रतिष्ठा आणि सुख यांनी घेरलेल्या माणसाचे गुदमरून गेलेले दृष्य त्या ठिकाणी साकार होऊ लागते. 'सांत्वन' मधील चित्रण वेदनेच्या बाजूला थोडे अधिक झुकले आहे असे आपण म्हणू शकू तर 'असा मी असा मी'तील चित्रण उथळ हास्याकडे फारच झुकले वा कलले आहे असे आपण म्हणू, अन्तू बर्वा काही जणांना एकदम स्थूल वाटू शकेल. पु. लं.नी निर्माण केलेल्या कलाकृतींच्या यशापयशाविषयी मतभेद होऊ शकतील; पण या ठिकाणी सहानुभूतीच्या कवडशात थरथरणारा अश्रू हाच विनोद म्हणून उभा करण्याचा एक विलक्षण नाजूक प्रयोग घडतो आहे यावर फारसा मतभेद होणार नाही. अशा विनोदाचे आकलन प्रामुख्याने भावनिक असते व ते एकदम माणुसकीच्या गाभ्याजवळ नेते असा माझा मुद्दा आहे. पु. लं.नी केलेल्या या प्रयोगाकडे त्यांना विनोदकार म्हणताना फारसे लक्ष कधी जातच नाही.

(अपूर्ण)
लेखक - नरहर कुरुंदकर 
पुस्तक -  रंगविमर्श

Saturday, November 18, 2023

मी आणि पु.ल. - (सई ललित)

मी आणि पु.ल आमच्यामधे एक सहृदयतेचा पुल मी दहा बारा वर्षाची असताना बांधला गेलाय.तो एवढा मजबूत आहे की मी मरेपर्यंत तो टिकेलच.पण त्या पुलावरुन माझी मुलं नातवंडं पण आरामात आवडीने जातील .याची खात्री वाटते. कदाचित पुढच्या पिढीचं वाचन कमी होईल.

कारण त्यांची त्रोटक वाचायची सवय डेव्हलप झालीय. मग त्यासाठी पुलंच्या आॕडीओ कॕसेट आहेत.व्हिडीओ आहेत.ते इतके सुंदर आहेत की आपल्याला वेगळ्या काळात खेचून न्यायचं सामर्थ्य त्यांच्या मधे आहे.

मी तर पुल वाचायच्या आधी त्यांच्या कॕसेटच (अलुरकरांच्या ) ऐकल्या होत्या . एवढा प्रसन्न खेळकर चतुर मिस्कील बावळट भासणारा विनोदी माणूस मी पहिल्यांदाच कानांनी बघत होते. मग दहावीला असताना बटाट्याची चाळ मधला एक लेख भ्रमणमंडळ धडा म्हणून अभ्यासाला आला.तो शिकवत असताना (माझी आईच दहावीला मराठी शिकवायची ) आम्ही सर्व जण वर्गात किती हसलो होतो.


माझे बाबा अत्यंत कडक शिस्तीचे होते.सार्वजनिक जीवनात ते दिलखुलास असले तरी घरी बडबड त्यांना चालायची नाही. त्यांनीच नवीन टेपरेकॉर्डर आणि ह्या कॕसेट त्या काळी आणल्या होत्या .ही गोष्ट मला महान आश्चर्याची वाटली होती.आणि बाबा त्यातले विनोद ऐकून उघडपणे हसत होते.ते बघून शोले मधला गब्बरसिंग हसल्यावर जसे बाकीचे दरोडेखोर सावकाशीने घाबरत घाबरत हसतात तसे आम्ही हसलो होतो.हे बघून आईला पण हसु आवरत नव्हतं ! मग हळुहळु भीड चेपत गेली.बाबांना पुल आवडतात म्हटल्यावर पुलं बद्दलचा आदर सहस्त्र पटीने वाढला.कारण पुलं मुळे आम्ही घरात मोठ्याने हसु शकलो.

काॕमेडीचं एक वेगळं दालन कॕसेटच्या रुपात खुलं झालं .( बाय द वे अंध मुलांच्या शाळेत या आॕडीओ कॕसेट लावल्या जातात का ? नसतील तर जरुर लावाव्यात.) अजूनही घरात काही कॕसेटी असतील.पोटात लांबलचक आतडी असलेल्या या कॕसेटी तेव्हा घरोघरी दिसायच्या.मधेच ते आतडं बाहेर पडायचं मग आम्हीच ते सर्जन होवून हिराने नीट आत ढकलायचो. आमची सर्जनशीलता अशी बहराला यायची.

पुलं बरोबरच वपु काळे होते. शिवाजीराव भोसले होते.ते पण ऐकायला आवडायचे.पण पुलंची जादू वेगळीच होती.घरेलु प्रसन्न वातावरण त्यात खेळत असायचं. एकतर त्यांना नेहमी सोताकडे कमीपणा घ्यायची सवय.त्यामुळे चला हा माणूस आपल्या सारखाच आहे.असं तेव्हा वाटायचं .आपुलकी वाढीस लागली होती.आता कळतय ते बावळट नव्हते आणि नाहीत.पण फार व्यवहाराने किंवा काटेकोरपणे जगणे त्यांच्यातल्या माणसाला अवघड जायचं . असं जगून आपण काय साधणार हा त्यांचा साधा विचार असावा.

लबाड, ढोंगी, स्वार्थी ,उथळ ,कद्रु ,दिखावू ,मत्सरी, आपलं तेवढं साधून घेणाऱ्या अति शहाण्या माणसांना ते ओळखून होते. नाही असं नाही.पण त्यांना उघडं पाडणं त्यांच्या जीवावर यायचं. या अर्थाने ते आळशी होते.कारण एकदा वैर पत्करलं की ते झक मारत जोपासत ठेवावं लागतं. डाव प्रतिडाव, शह प्रतिशह लय राबणूक असते. त्यापेक्षा साधी माणूसकी जोपासायला सोपी. हिणकसपणाची कलाकुसर करावी लागत नाही.

शिवाय आपल्या समोर कुणाचा चेहरा पडलाय..किंवा आपल्या मुळे कुणाची मानहानी झालीय , कुणी तोंड फिरवलय ही गोष्ट त्यांना अजिबात रुचायची नाही. या बाबतीत मी अगदी पु.लं.सारखीच आहे.
काही माणसांना मात्र दिवसातून चार माणसांचे तरी धडधडीत अपमान केल्याशिवाय..आणि दहा एक माणसांचे चेहरे पाडल्या शिवाय अन्नच गोड लागत नाही.आणि त्यालाच ती आपली बुध्दीमत्ता समजतात.
ज्याला ज्यात आनंद आहे ते करुदेत. आपण मात्र त्यांच्या पासून लांब राहायचे. कदाचित असल्या माणसांशी डावपेच खेळत राहण्यापेक्षा तो वेळ साहित्य ,नाटक , गाणं बजावणं यात सत्कारणी लावावा असा त्यांचा विचार असावा.
     
पुलंचं आणि माझं एक महत्वाचं साम्य म्हणजे माझे पुढचे दोन दात सेम पुलं सारखे आहेत. आम्हाला खाण्या विषयी असलेली आवड..म्हणजे केवळ पदार्थ खाण्याविषयी नाहीतर पदार्थ करण्याचं जस्ट मनात आल्या पासून ते खिलवण्या पर्यंतचे सर्व प्रकारचे सोपस्कार..वगैरे वगैरे आणि वगैरे.

पुलंना विनोदी लेखन करायला खूप आवडायचं.ते करताना त्यांच्या मनावर कसलाही ताण नसायचा.ते अगदी सहज असायचं .माझं सुध्दा अगदी सेम असं..असं म्हणण्याचा मी महाआगावूपणा करणार नाही. पुलं जबरदस्त परफाॕर्मर होते..हा गुण त्यांना इतर विनोदी लेखकांपेक्षा श्रेष्ठ ठरवतो. मला सर्वात जास्त कौतुक वाटतं ते त्यांच्या हार्मोनियम वादनाचं संगीत प्रेमाचं आणि अभ्यासाचं.लहानपणी खूप संगीत ऐकून ऐकून आपोआप अभ्यास झाला असं ते म्हणतात .पण तो नुस्ता अभ्यास नाही..रसिला अभ्यास आहे.अभ्यास म्हटलं की एक प्रकारची रुक्षता निदान मला तरी जाणवते.ती यात दिसत नाही .एका रसिक आनंदाची निर्मळ देवाणघेवाण यात दिसते. वादक लोक न बघता पेटी वाजवतात याचं मला कमालीचं आश्चर्य वाटतं !आम्हाला दोन डोळे सताड उघडे ठेवले तरी धोंडे काय वाजवता येत नाही. त्यात पुल पट्टीचे सुरेल वाजवणारे..!संगीताची आवड ज्ञान आणि त्यांना अवगत असलेली कला यामुळे त्यांना आयुष्याचा आनंद शतपटीने घेता आला.

खरोखरच ही दैवी प्रतिभाच होती. पुलंच्या साहित्याचं जर पारायण केलं तर तत्वज्ञानाची वेगळी पुस्तकं वाचायला नकोत. पुलंची पुस्तकं एक प्रकारे मानसिक समाधान वाढवणारी आहेत. पुलं वाचलेला पचवलेला माणूस आत्महत्या करुच शकत नाही.हे त्यांच्या साहित्याचं सर्वात मोठं योगदान आहे. आणि म्हणून..मानसोपचाराचा भाग म्हणून त्यांची पुस्तकं नियमीत अभ्यासाला लावली पाहिजेत..असं माझं आपलं अभ्यासू मत आहे.

- सई ललित

Wednesday, April 19, 2023

कसं काय, बरं आहे !

....साऱ्या व्यवहारात "कसं काय" या सारखा निरर्थक प्रश्न आणि "बरं आहे" यासारखं निरर्थक उत्तर नाही. ह्या शब्दाला निश्चित असा अर्थ नाही, कळा नाही, चव नाही. एखाद्या वृद्ध माणसाची आपण चौकशी करतो, "काय अण्णा साहेब, काय म्हणतेय प्रकृती?" त्यावर वय सत्तर वर्षे, 500 रुपये पेंशन, सर्व मुले कमावती, मुलींची लग्न बिनहुंड्याने झालेली असं सविस्तर उत्तर मिळतं. परंतु, "कसं काय अण्णा साहेब?" हा प्रश्ण टाका, त्याला त्यांचे उत्तर "बरं आहे" हेच येईल. लहानपणी मास्तर निबंधावर " बरा" असा शेरा देत असत ज्याचा अर्थ वाईट नाही आणि चांगलाही नाही असा असे.

परंतु ह्या सृष्टीत सर्वस्वी चांगला आणि वाईट कोणी नाही त्याप्रमाणे "बरं आहे" ह्या शब्दाला केवळ अवगुणच चिकटलेले आहेत अस नाही. उदाहरणार्थ, नुसतं पाहून घेईन' म्हणण्याऐवजी 'बरं आहे, पाहून घेईन" म्हणा आणि वाक्याला किती जोर चढतो बघा. त्याचप्रमाणे नको असलेला माणूस भेटला की "बरं आहे" चे समारोपदाखल दोन शब्द अगदी वेळेवर कामाला येतात.

बोध एवढाच घ्यायचा की व्यवहारात निरुपयोगी असे काही नाही. बिऱ्हाड बदलताना जसे स्वगृहिणी चातुर्याने केरसुणीची काडीदेखील आयडीनचा कापूस लावायला उपयोगी पडेल म्हणुन जपते तसेच "बरं आहे" ला मला संग्रही ठेवावा लागतो.... बरं आहे!
...

समजा, 'कसं काय?' म्हटल्यावर 'छान आहे' म्हणायची रूढी असती तर उत्तराला डौल आला असता. 'छान' शब्द कसा छान आहे ! चांगल्यापेक्षा देखील 'छान' शब्दाला अधिक डौल आहे. ह्या शब्दाने आपली टोपी वाकडी घातली आहे. धोतराचा सफाईदार काचा मारला आहे. सिल्कच्या झकास शर्टावर वुलन कोट घातला आहे. आणि पायात सुरेख कोल्हापुरी जरीपट्टयाचे पायताण घातले आहे. छान आहे ! 'चांगलं आहे' ह्या शब्दप्रयोगाला अधिक भारदस्तपणा आहे. ह्या शब्दाने पोषाख साधाच घातला आहे; पण गळ्याचे बटण लावले आहे, आणि टोपी नाकासमोर घातली आहे.

वास्तविक 'बरं', 'चांगलं' आणि 'छान' हे नातलगच; पण स्वभावात किती फरक ! 'बरं' हा शब्द आळशी आहे, निरुत्साही आहे. ‘चांगला' इमानी आहे कसा कुणाच्या अध्यात ना मध्यात. आणि 'छान' हे कनिष्ठ बंधू दोस्तांच्या घोळक्यात हास्यविनोद करीत उभे आहेत. ‘छान’ आणि ‘चांगल्या'चे चांगले चाललेले पाहून 'बऱ्या'ला तितकेसे बरे वाटत नाही. ह्याच मंडळीत एक 'ठीक' नावाचे गृहस्थ आहेत. 'कसं आहे? ठीक आहे.' 'ठीक आहे' मध्ये समाधान आहे. ते फारसे मोठे नसले तरी एफिशियन्सी बारमध्ये फार दिवस अडकून न राहाता बढती मिळालेल्या कारकुनाच्या समाधानासारखे ते समाधान आहे. पण 'बरं आहे' मागे मात्र कुरकूर आहे. ह्या 'आहे' मागला 'नाही'चा बदसूर मोठा कुजकट आहे. त्या दृष्टीने एकूणच 'बरे' ह्या शब्दात एक क्षुद्रपणा दडलेला आहे. वरपांगी साळसूद वाटणाऱ्या ह्या शब्दाला अगदीच स्वभाव नाही म्हणावे, तर तसे नाही. तसा स्वभाव आहे, आणि तो आपले खरे स्वरूप कधीकधी विलक्षण रीतीने उघड करून दाखवतो.

पु. ल. देशपांडे 
कसं काय, बरं आहे !
पुस्तक - खोगीरभरती

हा लेख संपूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून पुस्तक घरपोच मागवू शकता.

Wednesday, March 1, 2023

आठवणीतील पु.ल. - मंगेश पाठक

पुलंच्या निधनानंतर साहित्य किंवा चित्रपटसृष्टी- प्रमाणेच आणखी एक मैफल सुनी झाली. ती साहित्यिक गप्पांशी किंवा वाङमयीन वैशिष्ट्यांशी संबंधित नाही, पुलंच्या धमाल विनोदी नाटकांशीही संबंधित नाही. ही मैफल आहे कायमस्वरुपी स्मरणात राहणाऱ्या पुलंच्या फिरक्यांची ! वेळोवेळी संधी मिळेल तिथे पुलं हास्याची कारंजी फुलवायचे. त्यांच्या धमाल विनोदांमुळे आणि कोट्यांमुळे छोट्या वाटणाऱ्या अनेक गाठीभेटीही अविस्मरणीय झाल्या. प्र. के. अत्रे एकदा एका अंत्ययात्रेला गेले तेव्हा तिथले गंभीर वातावरणही बदलले. तशा वेळी अवघड परिस्थितीतही हास्यतुषार उडू लागले अशी आठवण सांगतात. पुलंबाबत असं घडल्याचं ऐकीवात नसलं तरी त्यांच्या मृत्युच्या बातमीनंतरही त्यांचे सुहृद अशा किस्स्यांबाबत आवर्जून बोलले. दुःखावेग आवरत त्यांनी अशा किस्स्यांना वाट मोकळी करुन दिली. कारण हे केवळ किस्से नव्हते तर त्यात अस्खलित विनोदबुध्दी आणि उच्च श्रेणीचा हजरजबाबीपणा यांचा मिलाफ होता. कदाचित म्हणूनच एका डोळ्यातून आसवं वाहताना दुसरा डोळा ठराविक प्रसंग समोर उभा करून विनोदात रमताना दिसत होता.

पुलंबाबत एक आठवण सांगितली जाते. आयुष्यातलं पहिलंच भाषण करताना बाल्यावस्थेतील पुलं नेमक्या क्षणी अडखळून बसले. त्यांचं भाषण पुढे सरेना. परिणामी बोबडी बंद झाली. पण वेळ मारुन न्यायचे आणि हजरजबाबीपणाचे बाळकडू त्यापूर्वीच त्यांना मिळाले असावे. म्हणून तर 'आता माझी दूध घ्यायची वेळ झाली' असा बहाणा करत पुलं तिथून निघून गेले. पुलंच्या व्यक्तिमत्वापासून तसूभरही दूर न करता येण्याजोग्या अशा किस्स्यांची कमतरता त्यांच्या साहित्यिक मित्रांना कधीच जाणवणार नाही. ज्येष्ठ समीक्षक बापू वाटवे यांनी असाच किस्सा कथन केला होता. बापूंचा पुलंशी जवळचा परिचय होता. त्यांना पुलंच्या घरी जाण्यासाठी कधीच परवानगी लागायची नाही. एकदा बापू असेच गणांगण रंगवण्यासाठी पुलंच्या घरी पोहोचले. पुलं झोपले असतील किंवा विश्रांती घेत असतील असा त्यांचा अंदाज होता. कारण त्या सुमारास त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची चर्चाही सुरु होती. बापूंनी दबकतच त्यांच्या घरी पाऊल ठेवलं आणि पाहतात तो काय, पुलं एका हातात पेटीचा भाता ओढत गायन- वादनात रमले होते. हे दृश्य पाहून बापूही चक्रावले. विनाविलंब पुलंच्या मैफलीत सहभागी होत त्यांनी कौतुक सुरू केलं. शेजारीच भरपूर उकडलेल्या शेंगा होत्या. त्या रसरशीत शेंगांची चव चाखत बापूंनी संगीताला दाद द्यायला सुरूवात केली. बराच वेळ ती मैफल रमली. मैफल संपताच बापू म्हणाले, 'वा भाई, छानच पेटी वाजवली. या वादनाचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर लोकांना पैसे मोजावे लागतात. मी तर फुकटातच आनंद घेतला'. बापूंचं बोलणं ऐकून शांत बसतील ते पुलं कसले ? एक क्षणही न गमवता त्यांनी विचारलं, 'फार वाईट वाटतंय का ? तसं असेल तर पाच-पंचवीस रुपये देऊन टाक!' पुलंच्या या मल्लिनाथीनंतर उपस्थित हास्यसागरात बुडून गेले.

असाच आणखी एक किस्सा बापूंनी रंगवला होता. पुलंच्या आजाराविषयी सर्वत्र चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना काळजी वाटू लागली. जवळचे मित्र अनेक डॉक्टरांची आणि उपचारपध्दतींची माहिती देऊ लागले. पण दूरदूरचे काही हितचिंतकही पुलंकडे गर्दी करु लागले. त्यांना नव्या आणि वेगळया उपचारपध्दतींविषयी माहिती देऊ लागले. अशाच एक बाई पुलंना भेटायला आल्या. त्या सुमारास 'रेकी'ची बरीच चर्चा होती. या उपचारपध्दतीचा पुलंना फायदा होईल असं वाटल्याने ती "बिचारी बाई लांबून आली होती. पुलंकडे बराच वेळ थांबून त्या बाईने रेकीची माहिती सांगितली. बराच वेळ ती बाई या उपचारपध्दतीचा फायदा पुलंनी घ्यावा असं सुचवत होती. पुलंच्या लेखी तिचं समजावणं आणि मागे लागणं थोडसं अतीच होत होतं. पण ते काही बोलले नाहीत. थोडया वेळाने त्या बाई निघून गेल्या. बापू त्यावेळी तिथेच होते. त्या बाई निघून जाताच पुलंनी दार लावून घ्यायला सांगितलं. दार लावून घेताच बारीक नजरेने तिथे पहात ते बापूंना म्हणाले, 'काय रे ती 'अति-रेकी' गेली का ?' पुलंनी केलेली ही कोटी त्यावेळी चांगलीच दाद मिळवून गेली. बघता बघता दोघेही जोरजोरात हसू लागले.

पुलंना ज्या प्रयाग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथल्या मंडळींनाही पुलंनी सोडलं नाही. डॉ. शिरीष प्रयाग यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह जुळला होता. १९८६ मध्ये डॉ. प्रयाग यांच्या रुग्णालयाचं उद्घाटन पुलंनीच केलं होतं. या उद्घाटनप्रसंगी पुलंनी डॉ. प्रयाग यांची फिरकी घेतली. त्यांनी भाषणाला सुरूवात केली आणि संपूर्ण रुग्णालयावर एक नजर टाकली. आजूबाजूला डोकावून पाहिल्यानंतर ते उत्तरले, 'शिरीषकडे येणारे रुग्ण अत्यवस्थ असू शकतात. शक्यतो लोकांना त्याच्याकडे यायची गरज पडू नये. पण अशी गरज पडलीच तर हे रुग्णालय सर्व बाबतीत सुसज्ज आहे'.पुलंचं हे म्हणणं ऐकून उपस्थित मंडळींमध्ये चांगलीच खसखस पिकली होती.

एखाद वेळी स्वत: एखाद्या कामासाठी जवळच्या स्नेह्याला फोन केला तरी पुलंची विनोदबुध्दी जागृत असायची. आपलं काम आहे म्हणून ते समोरच्याची फिरकी टाळायचे नाहीत. त्यांच्यासंदर्भातला असाच एक किस्सा इथे सांगण्याजोगा. एकदा पुलंना 'धर्मात्मा'चं बुकलेट हवं होतं. त्या बुकलेटवरील बालगंधर्वांचा फोटो ते शोधत होते. एका मित्राला त्यांनी फोन केला आणि म्हणाले, 'काय रे, तुझ्याकडे 'धर्मात्मा'चं बुकलेट आहे का ? मला ते हवं आहे.' पलिकडून मित्र म्हणाला, 'हो, माझ्याकडे ते बुकलेट आहे.' यावर पुलंनी विचारलं, 'काय रे, तुझ्याकडे हे बुकलेट कुठून आलं? तू तर 'धर्मात्मा'मध्ये कामही केलं नव्हतस.' मित्र उत्तरला, 'अरे मी काम केलं असतं तर तो चित्रपट चालला असता ना !' मित्राच्या या विधानावर पुलंची प्रतिक्रिया आली नाही. हे लक्षात येताच त्याने पुन्हा विचारलं, 'काय पीएल, दुसऱ्याच्या विनोदांना हसायचा रिवाज तुमच्याकडे नाही का? का आम्हीच तुमच्या विनोदांना दाद द्यायची?'

मित्राच्या या प्रश्नावर पुलं शांतपणे उत्तरले, 'अरे मित्रा, विनोदाला दाद देण्याचा रिवाज आमच्याकडे अवश्य आहे. पण त्यासाठी मुळात विनोद घडायला हवा ना.' पुलंचा हा शेरास सव्वाशेर प्रतिसाद ऐकल्यानंतर मात्र मित्राची आणखी काही प्रश्न विचारायची हिम्मत झाली नाही. पुलंनी परिचित, स्नेही, मित्रमंडळी सर्वांनाच आपल्या फिरकीचं लक्ष्य बनवलं. मात्र, स्वत: वरील विनोदही नाकारले नाहीत. प्रयाग हॉस्पिटलबाहेर चित्रपट निर्माते राम गबाले, जब्बार पटेल, दिलीप माजगावकर आणि इतर अनेकजण पुलंबद्दल भरभरुन बोलत होते. त्याच वेळी आणखी एक आठवण पुढे आली. शेवटी पुलंना पायावर जोर देऊन उभं राहता यायचं नाही. ते व्हिलचेअरवरच असायचे. अशाही परिस्थितीत मित्रमंडळींना बोलावणं, त्यांच्याशी गप्पा मारणं कमी केलं नव्हतं. मित्रमंडळीही चलाख. पुलंबरोबर गप्पा मारायची संधी मिळाली की त्यांची थोडीशी टर खेचायची संधी तेही सोडायचे नाहीत. पुलं व्हिलचेअरवर बसून गप्पा मारताना त्यांना पाय टेकवून उभं राहता येत नाही हे एका मित्राच्या लक्षात आलं. त्याने लगेच मल्लिनाथी केली, 'आता पीएलचे पाय जमिनीला लागत नाहीत पहा.' त्याचं हे विधान ऐकून एक समयोचित सुंदर विनोद घडल्याचं पाहून सारे जण हसू लागले. पुलंनीही समरसून त्यांना दाद दिली. पुलंच्या अशा असंख्य आठवर्णीना अजूनही उजाळा दिला जातो. त्यांच्या शाब्दिक कोट्या, प्रसंगनिष्ठ विनोद आणि हजरजबाबीपणा यावर आवर्जून बोलले, लिहिले जाते. खंत एकच आहे, ती म्हणजे आता अशा कोट्या फारशा ऐकायला मिळत नाहीत आणि प्रसंगनिष्ठ विनोदातली ती नजाकत दुर्मिळ झाली आहे.

मंगेश पाठक
दैनिक महानगर

Tuesday, January 31, 2023

ती फुलराणी (प्रथम प्रयोग २९ जानेवारी १९७५) - प्रसाद जोग

अजरामर मराठी नाटक : ती फुलराणी
प्रथम प्रयोग : २९ जानेवारी १९७५

इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती "फुलराणी" या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.

जॉर्ज बर्नार्ड शॉचे ‘पिग्मॅलिअन’ वाचत असताना त्यातल्या पात्रांच्या संवादाची मराठी रूपे पुलंना दिसायला लागली आणि हे नाटक मराठीत आणावे असे त्यांना वाटत होते. पुलंनी स्वतः जरी ‘ती फुलराणी’ला ‘पिग्मॅलिअन’चे रूपांतर म्हंटले असले तरी ते अस्सल देशी वाटत.

सतीश दुभाषी पु.लं. कडे नवीन नाटकाची मागणी करायला गेले असता , त्यांच्या मनात हा पिग्मॅलियन पुन्हा जागा झाला. सतीशसारखा गुणी नट त्यांना प्रो. हिगिन्सच्या भूमिकेत दिसायला लागला आणि मग त्यांनी ‘ती फुलराणी’ हे नाटक लिहून काढले ते मुख्यत: सतीशसाठी. मंजुळेच्या भूमिकेसाठी भक्ती बर्वे यांना आणि विसूभाऊसाठी अरविंद देशपांडेंना घेण्याचा आग्रह धरला तो पु.लं च्या पत्नी सुनीताबाईंनी. इंडियन नॅशनल थिएटरने हे नाटक रंगमंचावर आणले. सतीश दुभाषी, भक्ती बर्वे, अरविंद देशपांडे, राजा नाईक, मंगला पर्वते ह्या गुणी कलावंतांना बरोबर घेऊन ह्या नाटकाचे दिग्दर्शन करणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव पु.लं.ना मिळाला . ह्या नाटकाच्या स्वभावाला धरून त्यातल्या शब्दाशब्दात,वाक्यावाक्यात प्रयोगातल्या कलावंतांनी नाटकात रंग भरला.

पु.लं. देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी’ नाटकाने भक्ती बर्वे यांना ओळख प्राप्त झाली. या नाटकातील ‘मंजुळा’ हे पात्र रंगभूमीवरील अजरामर भूमिकांपैकी एक. या नाटकाच्या तालमींच्या आठवणीही तितक्याच खास आहेत.’ती फुलराणी’ मधील स्वगत ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ पुलंनी स्वत: भक्ती यांच्याकडून बसवून घेतले होते. या स्वगताला वन्स मोअर येणार हे भाकीत पुलंनी तालमीतच केले. गाण्याला वा वादनाला वन्स मोअर येण स्वाभाविक होत पण स्वगताला वन्स मोअर म्हणजे भक्ती यांच्यासाठी ती कल्पनाच अविश्वसनीय होती. ती फुलराणी च्या पहिल्या प्रयोगात भक्ती‌ यांनी हे स्वगत सादर केलं आणि प्रेक्षकातून एकदा नाही अनेकदा वन्स मोअर आला…पुलंचं भाकीत खरच ठरल.


मंजुळा : ………” असं काय मास्तरसाहेब ? गधडी काय? नालायक, हरामजादी ? थांब…..

थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुज्या पापाचा भरलाय घडा
मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर
तुजं मसणात गेलंय ग्यान, तुज्या त्वांडात घालीन शान
तुजा क, तुजा ख, तुजा ग, तुजा घ, मारे पैजंचा घेतोय इडा
तुला शिकवीन चांगलाच धडा

तुजा उतरीन समदा माज, तवा येशील गुंडाळून लाज
माजी चाटत येशील बुटां, मी म्हनन, काय आज इकडं कुठ ?
हात पसरून मागशील भीक, मी म्हनन, जरा शुद्ध बोलायला शीक
मग उडवून हात, सांगीन धरायला वाट, चाल भाईर मुकाट
उगं वळवळ करतोय किडा ! तुला शिकवीन चांगलाच धडा !

तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील माझा तोरा,
ओ हो हो, आहाहा, ओ हो हो, आहाहा, हाऊ स्वीट, हाऊ स्वीट
लव्हली, चार्मिंग, ब्युटी, हाय, समदे धरतील मंजूचे पाय
कुत्र्यावानी घोळवीत गोंडा, तरन्या पोरांचा दारात लोंढा
हाय मंजू, हाय दिलीप….हाय मंजू, हाय फिलीप
मंजू बेन केम छो, हाऊ डु यू डु,
कम, कम, गो हेन्गिंग गार्डन, आय बेग युवर पारडन ?
कुनी आनतील सिलीकची साडी, कुनी देतील मोत्यांची कुडी
कुनी घालतील फुलांचा सडा ! तुला शिकवीन चांगलाच धडा !

मग? कुठूनसा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होउन स्वार
नदरेला जेव्हा नदर भिडल, झटक्यात माझ्या पायाचं पडल
म्हनल,रानी तुज्यावर झालो फिदा, क्या खुबसुरती, कैसी अदा
माग, माग, काय हवं ते माग, प्यारी माज्यावर धरू नकोस राग
मी मातर गावठीच बोलीन, मनाची गाठ हळूच खोलीन
गालावर चढल लाजेची लाली, नदर जाईल अलगद खाली
म्हनेन त्याला, ह्ये काय असं ? लोकांत उगंच होईल हसं
कुंपणापातर सरड्याची धाव, टिटवीन धरावी का दर्याची हाव
हिऱ्याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा? गटारीच्या पान्याला सोन्याचा घडा ?
मग राजाच येईल रथात बसून, म्हनंल, कसं बी कर, पन हो माझी सून
दरबारी धरतील मुठीत नाक, म्हनत्याल राजाचा मान तरी राख
तोरणं बांधा नि रांगोळ्या काढा, त्या अशोक्याला शिकवीन चांगला धडा !

मंग मंजू म्हनल, महाराज ऐका, त्या अशोक मास्तराला बेड्याच ठोका
शिशाचा रस त्याच्या कानांत वता, आन लखलख सुरीन गर्दन छाटा
मास्तरला घोड्याच्या शेपटाला जोडा, आन पालटून काढून चाबकानं फोडा
महाराज म्हनत्याल, भले हुशार, धाडून द्या रं घोडस्वार
हां हां हां हां
जवा राजाचं शिपाई धरत्याल तुला, म्हनशील मंजे सोडीव मला
धरशील पाय आन लोळशील कसा, रडत ऱ्हाशील ढसाढसा
तुझा ए, तुझा ओ, तुझा न, तुझा ण, तुज्या श्या, तुजं वसकन आंगाव येणं
भोग आता गप तुज्या कर्माची फळं, तुज्या चुरूचुरू जिभेला कायमचं टाळं
महाराज म्हनत्याल, ह्याची गर्दन तोडा, मी म्हनन, जाऊ द्या, गरिबाला सोडा
तू म्हनशील, मंजुदेवी आलो तुला शरन
मी म्हनन, शरन आल्यावं देऊ नये मरन. “

पुलंनी हे इतकं अफलातून लिहिलंय ना, की अगदी मंजुळेसारखं ते त्याच ठसक्यात बोलावसं वाटतं. पूर्ण फुलराणीचं नाटक तर अनेक महाविद्यालयांमध्ये अजूनही बसवलं जातंच पण फक्त या स्वागताचे कितीतरी प्रयोग शाळा, महाविद्यालयांमध्ये झाले असतील.

प्रसाद जोग
सांगली
९४२२०४११५०

'ती फुलराणी' पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


Monday, January 9, 2023

अडला हरी

....हरीचा डोळा त्या गॉगलवर गेला.

"अपूर्व" हरी.

"काय अपूर्व?" मी.

"हे ऊनप्रतिबंधक उपनेत्र!" आमचे गॉगल हऱ्याच्या नेत्रावर चढले देखील. "पण वत्सा, हे नयनत्राण तुला काय कामाचे.? दिवसभर टेबलाशी बसून कल्पनासृष्टीतला विहार कागदावर उतरवणाऱ्या तुझ्यासारख्या गृहकुक्कुटाला हे कृष्णोपनेत्र कशाला हवेत?"

खरोखर ह्या हऱ्याला कुणीतरी सरकारी शब्दांच्या टांकसाळीत चिकटवून का घेत नाहीत, कोण जाणे. साध्या गॉगलला एका घटकेत तीन प्रतिशब्दांनी हाक मारून गेला. कृष्णोपनेत्र काय, ऊनप्रतिबंधक उपनेत्र काय, नयनत्राण काय !

"…हे सौम्य, ही वस्तू आमच्यासारख्या जित्याजागत्या दुनियेत - "

पुढले वाक्य पुरे करण्यात शाई आणि कागद वाया घालवण्याची गरज नाही. तो चष्मा आपल्या डोळ्यावर चढवून हरी खिडकीतून समोरच्या गॅलरीत केस वाळवीत असलेली जितीजागती दुनिया बघण्यात गुंग झाला होता. त्या दुनियेचे चुलीवर ठेवलेले दूध उतू गेले असावे. कारण चटका बसल्यासारखी ती आत पळाली. हरीने माझ्याकडे अबाउट टर्न केले आणि एखाद्या मुरलेल्या वकिलासारखी आपली तर्जनी माझ्याकडे रोखीत म्हणाला,

"शिवाय, हे वापरायला चेहऱ्याची एक विशिष्ट उभारी लागते. तुझ्या निर्गुण मुखावर हे कृष्णोपनेत्र म्हणजे - "

पुढली उपमा मी ऐकली नाही. माझ्या चेहऱ्याला उभारी नाही एवढे भाष्य मला बस होते.

अडला हरी
उरलंसुरलं
(आवाज, दिवाळी १९७३) संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.
 

Monday, November 21, 2022

पु.ल. आज तुम्ही हवे होता - निकेत पावगी

आठ नोव्हेंबर आणि बारा जून हे दोन दिवस पुलप्रेमींसाठी महत्त्वाचे आणि मनात विविध प्रकारचे कल्लोळ उठवणारे दिवस.

"कशाला आला होता हो बेळगांवात?" अशा स्वरूपाचा विदीर्ण टाहो काही जणं फोडत होती, असतील, रहातील - मनातल्या मनात.

पुलोत्सव वगैरे आयोजित करणारी मंडळी आता साठीच्या आसपास असतील आणि उत्सव साजरे करण्याची सध्याची किंमत बघता, असे उत्सव साजरे न करणेच त्यांना योग्य वाटत असेल.
आज तुम्ही हवे होता - असं वाटत रहाण्याचे दिवस गेले. उलट, तुम्ही गेलात तेच बरं झालं -: असं राहून राहून वाटत रहाण्याचे प्रसंग वारंवार येत रहातात.

थोर थोर विचारवंत, साहित्यिक लोकांची विविध पध्दतीने अवहेलना बघून तुम्ही स्वस्थही राहू शकला नसता आणि काही करण्याचा विचारही सुचला नसता. तुम्हालाही कोणत्याही एखाद्या वर्गाचे प्रतिनिधित्व देऊन कुणीतरी ठोकून काढलं असतं आणि तुमच्या कार्याची चिरफाड संकुचित चष्मे लाऊन झाली असती. तुमच्या लेखनातील एखादा लचका तोडून एखादे आंदोलन वगैरे झाले असते आणि त्यावर विचित्र पद्धतीने वाद - प्रतिवाद, प्रतिक्रिया उमटल्या असत्या. त्याला एखादा रंग कुणीतरी दिला असता. त्याउपर आपल्याच काही जाहीर चाहत्यांनी सपशेल कुस बदलून ते रंग गडद करण्यासाठी हातभार लावला असता. तुमचे मोजके पुतळे काही ठिकाणी अजूनही सुरक्षित आहेत, हे आमचे भाग्य. पण काही भरवसा वाटत नाही.

कदाचित एखादा Stand up comedy show करण्यासाठी तुम्हाला आग्रह झाला असता. घरोघरी पैदास झालेल्या साहित्यिकांचे तुमच्या स्वभावानुसार कौतुक करता करता तुमची लेखणी थिजून गेली असती.

कालातीत रहाणे फार कठीण असते. जवळपास अशक्यच. कालानुरूप परिस्थिती, संदर्भ बदलत असतात. पण काही भुमिका, दृष्टीकोन आणि शैली अजरामर असतात. समस्त जगातील मराठी बांधवांच्या ज्या सर्वसमावेशक गटाचे तुम्ही लाडके व्यक्तिमत्त्व होता, तो गट आता शिल्लक राहिला नाही. त्यापैकी कित्येकांनी इहलोक सोडला आणि त्यापेक्षा जास्त मंडळींनी मायभूमी सोडली. तुम्हाला जे सांगायचे आहे, दाखवायचे आहे आणि वाटायचे आहे ते समजणारी आणि ते समजून आनंदाने चकित होणारी मंडळी आता क्षीण झाली आहेत.

तुमच्या नांवाचें समुह अजूनही नवीन आणि तुमच्यासाठी अनोळखी अशा माध्यमातून सक्रिय आहेत. तुमची लेखी वाक्य शेकडो मंडळी कपड्यांवर मिरवत असतात. पण आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनावर तुम्ही जे कोरलंत ते मिरवावे असं वाटत नाही आणि जे मिरवतात त्यांच्या मनापर्यंत ते रूजलं आहे का, समजत नाही.
अजातशत्रूत्वाला एक प्रकारची चतुराई लागते- तुम्ही लिहून गेलात. तुमच्यात ती चतुराई नसूनही तुम्ही कितीतरी दशकं अजातशत्रू राहिलात. ते तुमच्या मोकळ्या मनस्वीपणामुळे आणि मुख्य म्हणजे स्वतः कडे सहज कमीपणा घेणाऱ्या तुमच्या निरागसपणा मुळे. ती निरागसता हल्ली इयत्ता पहिलीत सुध्दा शिल्लक राहिली नाही. नवरसांमधील कणांपासून विविध प्रकारच्या जणांपर्यंत ज्यात तुम्हाला उदात्त, उत्कट, मंगल असे जाणवले त्या सगळ्यांना दाद देत तुम्ही निर्मिती करत राहिलात. वाईटातूनही चांगलं दाखवण्याच्या शैलीतून. त्या चांगल्याची आणि मांगल्याची जी जाणीव निर्माण झाली ती नुसती आनंददायी नाही तर सकारात्मक स्फूर्तीदायी आहे. आज चांगल्यातूनही नेमकं वाईट तेवढे शोधून पसरविणारी लोक वाढत चालली आहेत.

तंत्रज्ञान फारच प्रगत झाले आहे. आजच्या तंत्रयुगात तुमच्यासकट, तुम्ही पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या समस्त प्रतिभावंतांनी काय कमाल केली असती असा विचार मनात येतो. पण त्या अभिजाततेसाठी पोषक असे समाजाचे कोंदणसुध्दा त्या प्रतिभावंतांना आवश्यक असते. रात्रभर चालणाऱ्या मैफलींमधून होणारी रसनिर्मिती कधीच नाहीशी झाली. त्यानुरुप होणारी प्रतिभा दुर्मिळ झाली तर दोष कुणाचा?

तरीही तुम्ही असता तर नक्कीच काहीतरी चिंतनाला आवाहन करणारी निर्मिती झाली असती. अद्वैताचे प्रतिरुप असणाऱ्या तुमच्या जोडीदाराला थोडे जास्त कठोर होऊन त्यासाठी तुम्हाला उद्युक्त करावे लागले असते, ते त्यांनी सजगपणे आणि अधिकाराने केले असते.

टिळक - गांधी पुण्यतिथी/ जयंती च्या दिवशी व्यक्तीगत पातळीवर आपापल्या परीने आदरांजली वाहणारी आमच्या आजी आजोबांची सहृदय पिढी कधीच नाहीशी झाली. कुणी लंघन करायचे, कुणी मौन व्रत त्या दिवशी धारण करायचे. काळ बदलत गेला. ती पिढी गेली, ते आवाज गेले, धुसर होत अदृश्य झाले.
तुम्ही गेलात हे एक प्रकारे बरं झालं असा व्यावहारिक विचार मनात गडद होत जातो आणि तरीही तुम्ही असायला हवे होतात हेही प्रकर्षाने जाणवत रहातं.
निखळ आनंदाची देवाणघेवाण सुरू झाली आणि निरपेक्ष दाद दिली घेतली जाऊ लागली कि मात्र सभोवताली कुठल्यातरी स्वरूपात तुम्ही असल्याचा साक्षात्कार होतो.
आठ नोव्हेंबर आणि बारा जून रोजी आयुष्यातील अशा सगळ्या साक्षात्कारांची उजळणी मनात सुरू असते....
मौनव्रत आणि उपास मागे गेले....
ही उजळणी मागे पडणे शक्य नाही.

निकेत पावगी
०८/११/२२
a