Leave a message
Showing posts with label एक शून्य मी. Show all posts
Showing posts with label एक शून्य मी. Show all posts

Wednesday, May 29, 2024

मोत्या शीक रे अ आ ई

शिक्षण आणि शिक्षक या विषयावर असंख्य चर्चा, परिषदा आणि परिसंवाद, लेख, भाषणे चालूच असतात. पुष्कळदा वाटते, की या भानगडीत वेळ घालवण्याऐवजी आसपासची चार पोरे जमवून त्यांना चार अक्षरे शिकवण्यासाठी जर ही तज्ज्ञ मंडळी धडपडतील तर हा वेळ सत्कारणी लागेल. आणि म्हणूनच शिक्षण यासंबंधी कोणी काही बोलायला लागले, की मला माझ्या लहानपणी पाठ केलेल्या 'मोत्या शीक रे अ आ ई'ची आठवण होते. आपल्या मोत्याला अ आ ई शिकवायला निघालेली ती पोर अधिक प्रामाणिक होती. फक्त हा शिक्षणाचा व्यवहार एकतर्फी होता. इथे शिक्षक शिकवायला आतुर होता; शिष्य मात्र नव्हता. आपल्याही प्राथमिक शाळेपासून ते उच्च शिक्षणापर्यंतचा प्रकार बराचसा असाच आहे. कुठे शिकवायला उत्सुक असणारे शिक्षक आणि सर्वस्वी अनुत्सुक विद्यार्थी, कुठे शिक्षकही अनुत्सुक आणि विद्यार्थीही अनुत्सुक, कुठे विद्यार्थी उत्सुक, शिक्षक अनुत्सुक ! बहुतेक ठिकाणी शिकवायची इच्छा नसणारे शिक्षक आणि शिकायची इच्छा नसणारे विद्यार्थी अशीच गाठ मारलेली असते. पहिलीपासून ते अकरावी-बारावीपर्यंत आणि पुढेही ह्या गाठी कशाबशा सोडवत जायच्या आणि एकदाचे मोकळे व्हायचे.

शिक्षकाकडे शिकायला मुले पाठवतानादेखील केवळ इतके रुपये देऊन मुलाला इतके तास शिकवण्याच्या आर्थिक कराराचे या व्यवहाराला स्वरूप नसते; कारण इथे मुलांना शिकवून तयार करणे हे निर्जीव वस्तू तयार करण्यासारखे काम नव्हे. तसले काम हा एक वेळ शुद्ध आर्थिक व्यवहार असू शकेल. पण अशा निर्जीव वस्तू बनवणारा माणूसही कित्येकदा त्यात आपला जीव ओततो. 
फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे: कोल्हापूरला मी चप्पल विकत घ्यायला गेलो होतो. लहानसे दुकान होते. मी चप्पल पायात घातली आणि सहज चांभारदादांना म्हणालो, "अंगठा पक्का आहे ना? चपलेच्या अंगठ्याला भलत्या वेळी तुटायची हौस असते." चांभारदादा म्हणाले, "साहेब, तसल्या वांड सोभावाची वाण पायताणं आपल्या हातून नाही घडायची." मला त्यांचे ते 'वांड सोभावाचे पायताण' ही कल्पना फार मजेदार वाटली. मला त्याच्या त्या बोलण्याची मजा वाटलेली पाहून चांभारदादांचीही कळी खुलली, आणि चार इकडल्या तिकडल्या गोष्टी सांगताना त्यांनी आपल्या धंद्यातली गुरुकिल्ली मला सांगितली, "हे बघा साहेब, नवी चेपली नव्या बायकूसारखी. नवराबायकू संसारात रुळेपोत्तूर चार दिवस लागत्यात. एकदा का रुळली दोघंजणं-मग? नवरा न् बायकू येकजीव. तसंच पावलाचं आणि चपलीचं असतं. चप्पल चांगली कंची? जी पायात असतानी असल्याचं भान नसावं, आन् नसली का म्हंजी पाऊल टाकताना अवघड वाटावं."

माझ्या पायांत इतक्या मायेने त्यापूर्वी कुणी चप्पल सरकवली नव्हती. जीवनात स्वीकारलेल्या कामात असा जिव्हाळा येणे हेच महत्त्वाचे. दुर्दैवाने शिक्षकाच्या कामात असा जिव्हाळा यावा याची समाजालाच आच लागलेली मला दिसत नाही. याचे मुख्य कारण शिक्षकाचे हात निर्मितीत गुंतलेले आहेत याची जाणीव कमी झाली आहे. राजकारणात आपण अमक्या पुढाऱ्याचे हात बळकट करा, तमक्या पुढाऱ्याचे हात बळकट करा हे सतत ऐकतो, पण शिक्षकाचे हात बळकट करा असे म्हणणे आपल्याला सुचत नाही. केवळ आर्थिक दृष्टीने नव्हे तर इतर अनेक दृष्टींनी शिक्षकाचे जीवन हे त्याच्या शिक्षणकार्यात त्याला आनंद वाटावा अशा प्रकारचे कसे होईल याची समाजच चिंता करत नाही, आणि उगीचच शिक्षकांकडून अनेक प्रकारच्या अपेक्षा मात्र करत राहतो. 

(अपूर्ण)
एक शून्य मी
हा लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवरून पुस्तक घरपोच मागवा.

Saturday, June 18, 2022

माझे वडील माझे चांगले मित्र म्हणूनच मला आठवतात.

वडील माणसांविषयी लहानांना सर्वात अधिक प्रेम वाटते ते त्यांना ह्या वडिलांनी दिलेल्या आनंददायक आठवणींमुळे. मुलांच्या नैसर्गिक आवडीची जोपासना करणाऱ्या बापाविषयी मनात विलक्षण प्रेम असते. अशा वडिलांची आठवण वृद्धापकाळीदेखील डोळ्यांत पाणी आणते.

मी ह्या बाबतीत स्वत:ला खरोखरीच भाग्यवान समजतो. लहानपणापासून मला संगीताची वाचनाची आणि नाटकाची आवड होती. परीक्षा तोंडावर आली असतानादेखील मी शाळकरी वयात गाण्याच्या बैठकींना जात असे. वडिलांना चोरून जावे लागले नाही. चांगले गाणे ऐकून मी अधिक आनंदित होऊन येईन याची वडिलांना खात्री होती. रात्री बुवा काय गायले ते येऊन मी वडिलांना सांगत असे. त्यावर आमचे बोलणे व्हायचे. गावात मंजीखां, मास्टर कृष्णराव, संवा्ईगंधर्व, वझेबुवा ह्यांच्यासारख्यांचे गाणे असताना रात्री मन अभ्यासाच्या पुस्तकात रमणार नाही आणि न रमलेल्या मनाने अभ्यास होत नसतो, हे त्यांना पक्के ठाऊक होते. मला पोहायला शिकायचेय म्हटल्यावर त्यांनी मला स्वत: विहिरीत ढकलून मागून उडी मारली होती. अशा डायरेक्ट मेथडने मी पोहायला शिकलो. मला माझे वडील आठवतात ते जीवनात चांगले साहित्य, संगीत, नाट्य अशा गोष्टींची गोडी लावणारे मित्र म्हणून, आमचे साधे, बेताच्या कारकुनी उत्पन्नात जगणारे कुटुंब. पण रोज संध्याकाळी मित्रमंडळींचा गपांचा अड्डा जमावा तसा आम्हा भावंडांचा, आईवडील, मामा, आजोबा, आजी यांचा अड्डा जमायचा. गाणे-बजावणे व्हायचे, चर्चा व्हायच्या, 'कविता-कथांचे वाचन व्हायचे. वडील मंडळींचा धाकदपटशा, मुलांची मारहाण वगैरे प्रकार मला आठवतच नाहीत.
पुलंचे वडील श्री लक्ष्मण त्र्यंब्यक देशपांडे 
माझे आजोबादेखील माझ्या पेटीतल्या सर्व सुरांशी फटकून असणाऱ्या स्वत:च्या स्वतंत्र सुरात तुकोबाचा अभंग किंवा पंतांच्या आर्या ऐकवत. मामा मा. दीनानाथ आपलाच शागीर्द आहे अशा थाटात 'परवशंतापाश दैवें', चंद्रिका ही जणूं' वगैरे ठेवून देत. ह्या वातावरणात पैशाच्या श्रोमंतीतून मिळणाऱ्या गोष्टींची आम्हां मुलांना कधी आठवणच झाली नाही. मी आयुष्यातली पहिली चप्पल मॅट्रिकच्या वर्गात गेल्यावर घेतली होती आणि चामड्याची पहिली बुटाची जोडी वयाच्या चाळिशीला आल्यावर, विलायतेला जायला निघालो तेव्हा विकत घेतली होती. त्या जोडीला अजूनही नवा जोडीदार भेटलेला नाही. माझ्या वर्गात तर चप्पल घालून शाळेत येणारी मुले पायाच्या बोटांवर मोजण्याइतकीच होती. अनवाणीपणाचे दुःखच नव्हते. आम्हाला आनंद पुरवण्याचे काम घरातल्या म्हाताऱ्या मंडळींचे होते. आणि ज्या ज्या कुटुंबातली वृद्ध माणसे हे काम करतात ते आपले वार्धक्य आनंदाने साजरे करत असतात. मला पी. वाय. सी. जिमखान्याच्या दगडी कुंपणापाशी भरदुपारी छत्री घेऊन नातवाची क्रिकेट मॅच पाहायला उभे असलेले आजोबा त्या खेळापेक्षाही अधिक प्रेक्षणीय वाटतात.

पु. ल. देशपांडे
(छान पिकत जाणारे म्हातारपण - एक शुन्य मी)

संपूर्ण पुस्तक खालील लिंकवर मिळेल
-> एक शून्य मी



Saturday, July 25, 2020

‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव

यंदा पुलंचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यासंबंधी बरेच लेखन प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे जुन्या आठवणीना उजाळा मिळतो आहे. त्यातून मला हा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. एकंदरीत पुलंसंबंधित लेखन वाचताना मला एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे बरीचशी चर्चा ही पुलंच्या हयातीत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पुस्तकांबद्दल असते. त्यातही त्यांचे विनोदी लेखन, व्यक्तीचित्रण आणि शाब्दिक कोट्या हे बहुचर्चित विषय आहेत. या पार्श्वभूमीवर पुलंच्या वैचारिक लेखनाकडे वाचकांचे लक्ष वळवावे या हेतूने हा लेख लिहीत आहे. ‘एक शून्य मी’ हे पुलंचे पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले आहे (सन २००१). हे पुस्तक माझ्या संग्रही असून ते माझे अत्यंत लाडके पुस्तक आहे. हा पुलंच्या नियतकालिकांतून पूर्वी प्रसिद्ध झालेल्या वैचारिक लेखांचा संग्रह आहे. त्याचा अल्पपरिचय करून देण्यासाठी हा लेख.

या संग्रहात एकून २० लेख संकलित केलेले आहेत. त्यातून पुलंनी तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा धांडोळा घेतला आहे. त्या सर्व लेखांचा आढावा घेण्याचा माझा इरादा नाही. त्यापैकी मला खूप भावलेल्या ४ लेखांचा परिचय या लेखात करून देतो. एक वाचक म्हणून मला त्यांत काय आवडले ते सांगतो. त्या लेखांची शीर्षके अशी आहेत:

१. मराठी दृष्टीकोनातून मराठी माणूस
२. छान पिकत जाणारे म्हातारपण
३. धर्म, अंधश्रद्धा नि तुम्ही आम्ही
४. एक शून्य मी

• मराठी दृष्टीकोनातून मराठी माणूस
हा लेख मुळात १९६२मध्ये ‘अमृत’ मासिकात प्रसिद्ध झालेला आहे. हा लेख ‘मराठीपणा’चे जे काही खास गुणधर्म आहेत त्यांच्यावर नेमके बोट ठेवतो. महाराष्ट्रात मराठीत बोलणे हे कमीपणाचे आणि इंग्रजीत बोलणे हे प्रतिष्ठेचे हा समज तेव्हाही दिसून येई. त्या अनुषंगाने लेखात एक प्रसंग दिला आहे. पुलंची एक मराठी आडनावाची विद्यार्थिनी सारखे इंग्रजी बोले. तिचे वडील मराठी व आई पंजाबी होती. पण तिला या दोन्ही भाषा येत नव्हत्या. त्यावर पुलंनी तिला एकदा त्याचे कारण विचारले. त्यावर ती, “शीः ! मराठी की गडीनोकरांची भाषा आहे”, असे उत्तरते. त्यावर पुलं तिला “मग तुझ्या आईने गड्यानोकराशी का लग्न केले?” असे विचारून निरुत्तर करतात. महाराष्ट्रातील उच्चभ्रू समाजात मराठी बोलण्याची लाज हा बराच जुना विषय असल्याचे यातून जाणवते.

मराठी माणसाचे काही ठाम गैरसमज, कुरकुरायचे नेहमीचे विषय, व्यवहारातील वागणूक, सांस्कृतिक आवडी आणि काही आवडीचे सिद्धांत या सर्वांचा सुरेख परामर्श या लेखात घेतला आहे. १९६०च्या दशकात साधारण मराठी माणसाचे चित्र म्हणजे कारकुनीत खूष आणि व्यापार-उद्योगात मागे असे होते. ही पार्श्वभूमी पुलंसारख्या लेखकाला अगदी पोषक ठरली. मराठी दुकानदार हे या भूतलावरचे एक अजब रसायन असल्याचे त्यांनी अतिशय रंजकपणे वर्णन केले आहे.
“मराठी माणसाला हसण्याचे वावडे नाही. पण याला अपवाद म्हणजे मराठी दुकानदार आणि मराठी सर्कारी हापिसर !” हे वाक्य त्यांचे निरीक्षण किती मार्मिक होते याची साक्ष आहे. आजही ही परिस्थिती बदलली आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल !
मराठींच्या काव्यशास्त्रविनोद आणि संगीतावरील प्रेमाचे पुलंनी दिलखुलास कौतुक केले आहे. तसेच मराठी माणसाच्या जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचे त्यांनी आदराने वर्णन केले आहे. ते लिहिताना त्यांच्यासमोर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा ताजा इतिहास होता. त्याचाही त्यांनी अभिमानाने व कौतुकाने उल्लेख केला आहे.

• छान पिकत जाणारे म्हातारपण
हा १९९२मध्ये ‘शतायुषी’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख आहे. सर्वसाधारणपणे ‘म्हातारपण’ म्हटले की डोळ्यांसमोर एक प्रकारचे सुकलेपण आणि असहायता डोळ्यांसमोर येते. परंतु सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास म्हाताऱ्याना कसे छानपैकी ‘पिकत’ जाता येते, याचे खास पुलं-शैलीतील वर्णन यात वाचायला मिळते. म्हाताऱ्या माणसाला आपण पिकले पान म्हणतो. पण झाडावरचे पिकले पान आणि म्हातारपण यातील फरक पुलंनी फार छान स्पष्ट केला आहे. झाडाच्या पानाला भावना, स्वार्थ, सुखदुःख, अहंकार आणि वासना असे काहीही नसते. पण म्हाताऱ्याना मात्र या सर्व गोष्टींपासून मुक्त होणे जाम जमत नाही.

माणूस जसा मोठा होत जातो तसे त्याच्याकडील अनुभवांची शिदोरी वाढत जाते. त्याचबरोबर आपल्या जगण्यात आणि भवतालात बरेच बदल होत जातात. जीवनशैली झपाट्याने बदलत जाते. तरीही आपल्या तारुण्यात आपण जे काही अनुभवले तेच योग्य होते असा सूर बहुतेक म्हातारे काढतात. त्यातूनच “आमच्या वेळी....” या पालुपदाचा जन्म होतो आणि मग ते घरातील इतरांना छळू लागते ! त्याच्या जोडीला भर पडते ती “हल्लीची पिढी बिघडली” या रेकॉर्डची. सतत असे सूर काढणाऱ्यांना आपणच बाप म्हणून वाढवलेली ही पिढी आहे याचा विसर पडतो, याची जाणीव लेखक करून देतो.
काळाबरोबर बदलणे आणि नव्याला आपलेसे करणे हा म्हातारपण सुसह्य होण्याचा मूलमंत्र आहे, हे या लेखातून छान सांगितले आहे. म्हाताऱ्या मंडळींचे खरे काम म्हणजे घराला आनंद पुरवणे. ज्या कुटुंबांत वृद्ध हे काम करतात ते आपले वार्धक्य आनंदाने साजरे करतात, हा लेखातील संदेश तर लाजवाब आहे. एका आजोबांचे प्रसंगचित्र मुळातून वाचण्यासारखे आहे. तसेच आपली शारीरिक वा कौटुंबिक दुख्खे चव्हाट्यावर आणून स्वतःविषयी सहानुभूती मिळवू नये, असेही सुचवले आहे. आजीआजोबा होण्याच्या मार्गावर असलेल्या सर्वांसाठी मार्गदर्शक असा हा लेख आहे.


• धर्म, अंधश्रद्धा नि तुम्ही आम्ही
हा लेख ‘बुलेटीन’ या नियतकालिकात १९८९मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. लेखाच्या शीर्षकातले पहिले दोन शब्द हे भयंकर नाजूक आहेत हे आपण जाणतो. या विषयांवर लिहायचे म्हणजे तारेवरची कसरत असते. अर्थातच पुलंनी ती लीलया पेलली आहे. लेखात सुरवातीस भारतीय समाज हा जात, धर्म वा पंथ यांच्या विळख्यात किती घट्ट अडकला आहे याची खंत व्यक्त केली आहे. आपल्याला वैचारिक श्रमांचा तिटकारा तर आहेच आणि त्याच्या जोडीला निखळ वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभावही आपल्यात दिसतो. आपण सदैव वास्तव नाकारत जगतो आणि सारा हवाला देवावर नाहीतर दैवावर टाकून मोकळे होतो. तथाकथित पुरोगाम्यांनी बुद्धीप्रामाण्य वाढीस लावण्यासाठी किंवा समाजप्रबोधनासाठी कुठलेही धाडशी पाउल टाकलेले नाही, हे ते परखडपणे नोंदवतात.

लेखातील एका परिच्छेदात पुलंनी बाबासाहेब आंबेडकरांबद्ल अतिशय आदराने लिहीले आहे. समाजातील विखारी जातीयतेने अस्वस्थ झाल्याने पुलंनी आंबेडकरांचे लेखन आणि त्यांचे खैरमोडे यांनी लिहिलेले चरित्र आवर्जून वाचले. त्या चरित्रातील बाबासाहेबांच्या “मला मायभूमी कुठे आहे?” या वाक्याने आपण अंतर्बाह्य हादरून गेल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या लेखाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यात पुलंनी त्यांची देवधर्माबद्दलची भूमिका सुस्पष्ट केली आहे. ती त्यांच्याच शब्दात देतो:

.....“ एक तर धर्म, ईश्वर, पूजा-अर्चा ह्यांत मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही.”....
   
(चित्रसौजन्य : अक्षरधारा)

एका परिच्छेदात त्यांनी संत आणि शास्त्रज्ञ यांची तुलना केली आहे. भारतात संतांची संख्या भरपूर आहे. पण, त्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ अधिक संख्येने जन्मायला हवे होते असे ठामपणे लिहिले आहे. यासंदर्भातले त्यांचे पुढचे वाक्य बहुचर्चित असल्याने ते नोंदवतो:

“ मला कुठल्याही संतापेक्षा अ‍ॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो”...

समाजात मुरलेल्या अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यावर त्यांनी कोरडे ओढले आहेत. तसेच काही अंधश्रद्धाना शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात असल्याची खंत व्यक्त केली आहे. या सगळ्यावर चिंतन केल्यावर त्यांना प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटल्याचे दिसते. या लेखाला त्यांच्या आत्मचरित्राचा स्पर्श झालेला आहे असे म्हणायला हरकत नाही. वैयक्तिक जीवनात ते खूप आनंदी व समाधानी होते. पण आजूबाजूस दृष्टीस पडणारे दुखः, दैन्य आणि विसंगती पाहून त्यांना स्वतःचे जगणेच सामाजिकदृष्ट्या असंबद्ध वाटत असल्याचे नमूद करून ते हा लेख संपवतात.

• एक शून्य मी
हा लेख ‘मटा’ च्या दिवाळी अंकात १९७४मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. पुस्तकाची तब्बल १४ पाने व्यापून राहिलेला हा लेख त्याचा कळसाध्याय म्हणायला हरकत नाही. किंबहुना त्यामुळेच त्याचे शीर्षक पुस्तकाला दिले गेले असावे. इथल्या सर्व लेखांपैकी मला तो जास्त प्रभावी आणि अंतर्मुख करणारा वाटतो. तेव्हा यावर थोडे विस्ताराने लिहितो.
लेखाच्या शीर्षकावरून पुलंना काय म्हणायचे असावे याचा अंदाज सुजाण वाचकाला येतो. मानवी जीवनातली निरर्थकता ही या लेखाची मध्यवर्ती कल्पना आहे. लेखाची सुरवातच मोठी आकर्षक व मार्मिक आहे. जेव्हा आपली एखाद्या परीचिताची कुठेही भेट होते तेव्हा आपसूक विचारला जाणारा प्रश्न असतो, “काय चाललंय सध्या?”. तसा हा प्रश्नच बर्ऱ्यापैकी निरर्थक आणि बरेचदा त्याला मिळणारे उत्तर देखील ! हा संवाद खास त्यांच्याच शब्दात देतो:

...’ सध्या मलादेखील “काय चाललंय तुमचं सध्या ?” असे कुणी विचारले, तर ‘श्वासोच्छवास’ याहून अधिक समर्पक उत्तरच सुचत नाही.’....

हे वाचून क्षणभर आपण स्मितहास्य करतो पण दुसऱ्याच क्षणी सुन्न होतो. हे प्रश्नोत्तर आपल्याला खूप काळ विचार करायला आणि कठोर आत्मपरीक्षण करायला लावते.

पुलंचे सारे आयुष्य संगीत, साहित्य आणि नाटकांना वाहिलेले होते. त्यातून मिळणाऱ्या आनंदात ते रममाण होत असत. पण समाजात आजूबाजूला नजर टाकता जे काही दिसे त्याने ते खूप अस्वस्थ होत. त्यांना सारेच कसे अपरिचित नि अनोळखी भासत होते. शहरी जीवनातली सामाजिक विषमता त्यांना बोचत असे. पुणे ते मुंबई हा नियमित प्रवास डेक्कन क्वीनने करताना आलेले अनुभव त्यांनी विषादाने लिहीले आहेत. कल्याण ते मुंबई या टप्प्यात ट्रेनच्या डब्यातले आणि बाहेर दिसणारे वातावरण किती विरोधाभासी असते ते त्यांनी छान रंगवले आहे. किंबहुना ते एका मध्यमवर्गीयाचे मुक्त चिंतन आहे. या ट्रेनच्या डब्यात जी सूट-बूट आणि चेहऱ्यावर श्रीमंतीची सूज असलेली संस्कृती आहे त्यात तर आपण मोडत नाहीच. त्याचबरोबर खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या लोकलच्या त्या जीवघेण्या गर्दीत जमा होण्याचीही आपली ताकद नाही, याची ते कबुली देतात.

हा लेख लिहिताना त्यांनी महानगरी समाजातल्या विविध आर्थिक स्तरांना समोर ठेवले आहे. उच्चभ्रू, मध्यमवर्ग आणि दरिद्री लोक या प्रत्येकाचे विश्व किती भिन्न आणि एकमेकापासून अलिप्त आहे हे त्यांना प्रकर्षाने जाणवते. यातील एका वर्गाचे सारे सुख कुठलेही प्रश्न न पडण्यात आहे तर विचार करणाऱ्या माणसाकडे प्रश्नचिन्हांखेरीज काहीच नाही, हा विरोधाभास ते नोंदवतात. एकीकडे त्यांना मुंबईच्या एका प्रतिष्ठित देवळातली दर मंगळवारची वाढती रांग दिसते तर दुसरीकडे एका हॉटेलच्या बाहेर रोज मध्यरात्री तिथले उरलेले अन्न मिळवण्यासाठी लागलेली भुकेलेल्ल्यांची रांग. मग या दोन रांगापैकी काय खरे, काय खोटे हे प्रश्न त्यांना छळतात.

आर्थिक व सामाजिक विषमतेनंतर त्यांनी वैचारिक विषमतेचाही आढावा घेतला आहे. समाजातील विविध स्तरांत असलेली वैचारिक दरीही त्यांना खोल वाटते. ज्या माणसांच्या धर्माच्या कल्पनेशी आपले कुठेच नाते जमत नसेल तर ते आपले धर्मबांधव कसे? आणि ज्यांच्याशी आपले कुठलेच वैचारिक साम्य नाही, ते केवळ एकाच देशात राहतात म्हणून देशबांधव तरी कसे?” हे प्रश्न ते वाचकांसमोर ठेवतात.
आजही हे दोन प्रश्न आपल्यातील अनेकांना पडतात आणि आपण अस्वस्थ होतो. लेखातली पाच पाने देव, कर्मकांड, नवस, अंधश्रद्धा आणि ढोंगबाजी यांना वाहिली आहेत. ती मुळातूनच वाचण्यात मजा आहे. ती वाचल्यानंतर पुलं हे ‘विचारांती नास्तिक’ झालेले गृहस्थ आहेत याची खात्री होते.

एकंदरीत गरीबी-श्रीमंतीतला विसंवाद त्यांना खूपच खटकत असल्याचे दिसते. या संदर्भातला एक प्रसंग मननीय आहे. तो या लेखाचा कळसबिंदू म्हणायला हरकत नाही. पुलं एका किराणा दुकानात गेलेत. तिथे गोड्या तेलासाठी मोठी रांग होती. आता त्या रांगेतल्या एका फाटक्या कपड्यातील मुलीचा नंबर लागतो. ती दुकानादारापुढे छोटी मातीची पणती ठेऊन दहा पैशांचे तेल मागते. त्यावर तो म्हणतो की दिवाळी अजून लांब आहे तरी पणती कशाला आणलीय? त्यावर ती धिटाईने सांगते की तिला ‘खायालाच’ १० पैशांचे तेल हवे आहे. त्यावर तो नकार देतो. मग पुलं मध्यस्थीने त्याला विचारतात की कमीतकमी किती पैशांचे तेल तो देऊ शकेल. त्यावर तो १५ पैसे म्हणतो. मग ते वरील ५ पैशांची सोय करतात आणि त्या मुलीला अर्धी पणतीभर तेल मिळते. याचा खोल परिणाम स्वतःवर कसा झाला ते त्यांनी विषादाने लिहीले आहे. या घटनेनंतर एखाद्या दिवाळीत पणत्यांची आरास पहिली, की ती १० पैसेवाली मुलगी त्यांना प्रकर्षाने आठवते. जणू तिचा प्रचंड आक्रोश त्यांना ऐकू येतो आणि ते हतबुद्ध होतात.

अशा असंख्य अनुभवांतून जाताना त्यांना अनेक प्रश्न मनाशी पडले होते, अस्वस्थता आली होती. शेवटी ते जगणे म्हणजे तरी काय या मूलभूत प्रश्नापाशी येऊन ठेपतात. असा मूलगामी विचार करता करता ते एकदा प्रश्नचिन्हाकडेच ( म्हणजे ?) निरखून पाहतात आणि त्यांना उत्तर मिळते ! या चिन्हाच्या आकड्याखालीच असलेले ‘टिंब’ म्हणजेच ‘शून्य’ हेच कुठल्याही प्रश्नाचे उत्तर असते असे सांगून ते या सुंदर लेखाची सांगता करतात.

तर असा हा ‘शून्याचा’ लेख. यात पुलंनी स्वतःला शून्य संबोधणे हा त्यांचा विनय आहे. मात्र हा लेख (आणि एकूणच हे पुस्तक) वाचताना आपल्याला त्या शून्याचा अर्थपूर्ण प्रवास घडतो, हे नक्की.

पुलंच्या निधनानंतर प्रकाशित झालेले हे पुस्तक मी आवडीने विकत घेऊन संग्रही ठेवले आहे. दर सहा महिन्यांतून मी त्यातला एखादा लेख पुनःपुन्हा वाचतो आणि तृप्त होतो. हे वाचन माझ्यासाठी एखाद्या ‘बूस्टर’ सारखे असते. त्यातल्या भाषेची खुमारी, लेखनातील सहजता, दंभावर प्रहार आणि वाचकाला अंतर्मुख करण्याची क्षमता हे सर्व काही लाजवाब आहे. तुमच्यातील काहींनी हे पुस्तक वाचले असेलच. तेव्हा तुमचेही प्रतिसाद जाणून घेण्यास उत्सुक !
************************************************************
• टीप: हा मर्यादित पुस्तक परिचय करून देताना या लेखात जे काही विचार आणि मते लिहीली आहेत ती सर्वस्वी पु ल देशपांडे यांची आहेत याची नोंद घ्यावी.
• पुस्तक संदर्भ : एक शून्य मी , मौज प्रकाशन, पाचवी आवृत्ती, २००६. साभार !

- कुमार
मुळ स्रोत-- https://www.maayboli.com/node/69050

Wednesday, February 12, 2014

नामस्मरणाचा रोग

..जोतिबांना आपले द्रष्टे पूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा असेल तर जात, वर्णवर्चस्व, मूर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणाने सिद्ध करून दाखवावा लागेल. हे सोपे नाही. त्यासाठी आप्तस्वकीय आणि मित्रांचा दुरावा सहन करावा लागेल. वयाने वडील असलेल्या मंडळींचा मान ठेवायचा म्हणजे त्यांच्या अंधश्रद्धांचा मान ठेवायचा असे होत असेल तर तो मान ठेवण्याच्या लायकीचा नाही, हे ओळखून त्याप्रमाणे निर्धाराने वागावे लागेल. वाढत्या वयाचा शहाणपणा वाढण्याशी नैसर्गिक संबंध असतोच असे नाही. लोक गतानुगतिक असतात. मतपरिवर्तनाला सहजपणे तयार नसतात. त्यामुळे मित्रांचासुद्धा दुरावा पत्करावा लागेल.

फुले मानायचे म्हणजे पूर्वजन्म आणि कर्मसिद्धांत ही दरिद्री जनतेने दारिद्र्याविरुद्ध बंड करून उठू नये, म्हणून केलेली फसवणूक आहे हे मानावे लागेल. देवळातला देव दीनांचा वाली आहे, या श्रद्धेने सर्वकाही आपोआप चांगले होईल, ही भावना टाकून द्यावी लागेल. `स्तियो वैश्यास्तथाशूद्रा:' अशा प्रकारच्या `जन्माने ब्राह्मण असलेले तेवढे श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ' असल्या माणसामाणसात भेद करणार्‍या गीतेसारख्या ग्रंथाचे श्रेष्ठत्वदेखील आंधळेपणाने स्वीकारता येणार नाही. इतर चार मनुष्यनिर्मित ग्रंथांसारखेच सारे धर्मग्रंथही काही योग्य आणि काही चुकीच्या मतांनी भरलेले आहेत, असेच मानून वाचावे लागतील.

शंभर वर्षापूर्वी ज्या वेळी थोर विचारवंत म्हणवणारी मंडळी आपल्या बायकांना घरात चूल फुंकवत बसवायची, ज्यांच्या अस्तित्वाची दखलही घेतली जात नसे अशा काळात, जोतिबांनी आपल्या बायकोला आपल्या सार्वजनिक कार्यात जोडीदारीण म्हणून ते कार्य करायला उत्तेजन दिले. महादेव गोविंद रानड्यांच्या पत्नीसारखे काही तुरळक अपवाद वगळले तर समाजसुधारकांनी आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांना घेतल्याचे उदाहरण नाही. तेव्हा जोतीबा मानायचे म्हणजे कुटुंबात स्त्री - पुरुषांचे समान हक्काने वागणे दिसायला हवे. एखाद्या स्त्रीचा नवरा मरण्याशी पापपुण्याचा संबंध नसून, त्या माणसाच्या रोगावर योग्य इलाज होऊ शकला नाही म्हणून तो मेला, एवढेच सत्य मानून त्या स्त्रीच्या कौटुंबिक आणि सामाजिक दर्जावर कसलाही अनिष्ट परिणाम होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागेल.

स्त्रीचे एक माणूस म्हणून जगणे आणि तिच्या कपाळी कुंकू असणे किंवा नसणे याचा परस्परसंबंध ठेवता येणार नाही. किंबहुना सर्व माणसांचा माणूस म्हणू विचार होईल, त्याच्यावर त्याला समजू लागण्यापूर्वीच हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन असली कसलीही लेबले चिकटवण्यात येत कामा नये. अशा प्रकारचा बुद्धीनिष्ठ आचरणाचा हा वारसा आहे. कालचे धर्मग्रंथ कालच्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे रचलेले असतात. ते आजच्या परिस्थितीला उपयुक्त नसतील तर ते रचणारे महापुरुष कोणीही असले तरी त्या ग्रंथांचा भक्तिभावाने स्वीकार करण्याची आवश्यकता नाही. ती माणसे कितीही थोर असली तरी माणसेच होती. ईश्वराचे अवतार वगैरे नव्हती. तीही चुका करू शकत होती. त्या त्या काळातले त्यांचे मोठेपण मान्य करूनही त्यांच्यात उणीवा होत्या हे ध्यानात ठेवायला हवे.

एकदा नामस्मरणाच्या सोप्या साधनाने जन्मजन्मांतरीच्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात, हे भाबड्या जनसमुदायाच्या मनावर बिंबले किंवा बिंबवीत राहिले की, या जन्मी हवी तेवढी पापे करावी. त्यातूनच मग कागदावर `लाख वेळा `श्रीराम जयराम' लिहा, म्हणजे सर्व आधीव्याधी नष्ट होतील', हे सांगणारे महापुरुष आणि ते ऐकणारे महाभाग निर्माण होतात. ज्या देशात दुधाच्या थेंबाथेंबासाठी हजारो अर्भके आसुसलेली आहेत, तेथे दगडी मूर्तीवर जेव्हा दुधाच्या कासंड्याच्या कासंड्या अभिषेकाच्या नावाने उपड्या केल्या जातात आणि हा प्रकार राज्यकर्त्यांपासून सगळे जण निमूटपणे पहातात, नव्हे असल्या गोष्टीचे कौतुकही करतात, त्या वेळी ज्योतिबा फुले हे नाव उच्चारण्याचादेखील अधिकार आपण गमावून बसलो आहोत, असे वाटते.

एकीकडे रस्ते, चौक, विद्यालये, विद्यापिठे, वाचनालये, मंडळे अशा ठिकाणी ज्योतिबांचा नामघोष आणि दुसरीकडे पंढरपूरला विठोबाची मंत्र्यांकडून भटजीबुवांच्या दिग्दर्शनाखाली साग्रसंगीत पूजा. त्यातले खरे कुठले समजायचे आणि नाटक कुठले समजायचे ? ज्या पूजेअर्चेविरुद्ध आणि भटजीबुवांच्या संस्कृत पोपटपंचीविरुद्ध फुले बंड करून उठले, त्यांच्या पुतळयांची उद्घाटने करणारे नेते सरकारी इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वी तसल्या भटजीच्या पुढे पूजेला बसलेले दिसतात. कुठल्यातरी दगडापुढे नारळ फोडतांना किंवा शेंदूर लावतांना घेतलेले मंत्र्यांचेच, नव्हे तर शिक्षणसंस्थांचे कुलगुरु आणि कुलपती यांची छायाचित्रे वर्तमानपत्रांत झळकत असतात. अशा वेळी एकच प्रश्‍न मनापुढे उभा रहातो - आपण कुणाला फसवत आहोत ? ज्योतिबांना ? स्वत:ला ? कि नामस्मरणातच सर्वकाही आले असे मानणार्‍या जनतेला ? ज्योतिबांना आपले द्रष्टे पूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा असेल, तर जात, वर्णवर्चस्व, मूर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणाने सिद्ध करून दाखवावा लागेल.

एकदा नामस्मरण सुरु झाले कि माणसाचा देव होतो आणि बुद्धीनिष्ठ चिकित्सेची हकालपट्टी होते. कृष्ण, राम यांसारख्या आपल्या महाकाव्यातल्या नायकांचे आम्ही देव केले. महात्मा गांधीची देवपूजाच सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रखर बुद्धीनिष्ठांचाही देव करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. फुल्यांचेही नुसतेच नामस्मरण करून त्यांनाही एकदा अवतारी पुरुषाच्या देव्हार्‍यात बसवले, कि आम्ही फुले आचरणात आणण्याच्या जबाबदारीतून सुटू !

एकदा देव करून पूजा सुरु झाली, कि मुळ विचार दुर टाकता येतात. जसे स्वच्छता हा मु्ळ हेतू दूर राहून वर्षानुवर्षे न धुतलेल्या पितांबराला सोवळे मानले जाते तसेच हेही आहे. देव केला कि देवपूजेचा थाट मांडणारे देवांचे दलाल भूदेव होऊन हजर. आज फुल्यांचा जयजयकार करणारे धूर्त राजकारणीही असेच पवित्र होऊ पाहताना दिसतात.

- पु. ल. देशपांडे
( सामना, २५ नोव्हेंबर १९९० )
नोंद-- हा लेख टंकुन दिल्याबद्दल पु.ल.प्रेमी कविता गावरे ह्यांचे खुप आभार.

Wednesday, November 21, 2012

धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही - पु.ल.

भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्रमातच वावरत होते असे मला वाटते. निखळ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे एकूणच आपल्या देशातील हिंदूंना आणि मुसलमानांना वावडे. बरे, ज्या ख्रिस्ती लोकांशी संबंध आला, ते पाद्री धर्मप्रसारक. शाळा-कॉलेजे त्यांनीच चालवली. त्यांच्याही डोळ्यांना झापडे बांधलेली. शिवाय आपल्या देशात शारीरिक श्रमाइतकाच वैचारिक श्रमाचा तिटकारा.

बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की ब्राम्हण इंग्रजी विद्या शिकले ते कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. लाखात एखादा सोडला तर ब्राम्हणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे व्यासंगासाठी ग्रंथसंग्रह नव्हता. वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा; त्याला अक्कल लागत नाही. पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत. सारे अभिमान आंधळे! कुणी तरी भारतात सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे आणि इतरांना तो आपण पाहिल्यासारखे वागायचे. आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर.

न्यायमूर्ती रानड्यांसारखी माणसेदेखील इंग्रजी राज्य हे Divine dispensation मानताना पाहिली की आश्चर्य वाटते. आमचे देवदेखील वरती हिंदुस्थानचा नकाशा घेऊन जरा चार इंग्रज पाठवून भारतीयांना शहाणे करू या म्हणत बसले होते. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात जातिभेद नष्ट झाल्याच्या भ्रमातच आपण सारे जण वावरत होतो. जातीय संघटनांच्या शक्तीची जाणीव, मते पदरात पाडून घ्यायला स्वातंत्र्यानंतर जेव्हा व्हायला लागली तेव्हा सेक्युलर भारताचा जयजयकार करणाऱ्या नेत्यांची गाळण उडाली. लाखातला एखादा अपवाद वगळला तर उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचारापर्यत सारे काही जात, धर्म, पंथ यांच्या दुराभिमानाला जागवतच चालत असत. मग निवडणूक-प्रचाराचे नारळ तुळजाभवानीपुढे फुटतात, दर्ग्यावर चादर चढते, देवळावर कळस चढतात. तान्ही पोरे दुधावाचून तडफडत असली तरी दगडी पुतळ्यावर शेकडो दुधाच्या घागरी उपड्या होतात. आपल्या देशात केवळ हिंदूच नव्हे तर मुसलमान, ख्रिश्चन, बुध्द, जैन, शीख- सगळ्यांची अस्मिता जात आणि पंथाधिष्ठितच आहे. एखाद्या राजकीय किंवा भाषिक चळवळीच्या प्रसंगी किंवा चीन-पाकिस्तानसारख्या युध्दाच्या प्रसंगी माणसे एकत्र आल्यासारखी वाटतात; पण लगेच पुन्हा आपापल्या जातीच्या कळपात जातात. मुसलमानांतले शिया आणि सुनी, आगाखानी, कटियारी, मोमीन, खोजे, बोहरी वगैरे लोकही एकमेकांपासून विधर्मीयांइतकेच दूर आहेत. केरळातले सिरीयन ख्रिस्ती आणि मंगळूरचे कॅथॉलिक किंवा महाराष्ट्रातले प्रोटेस्टंट किंवा मेथॉडिक यांच्यात वैमनस्याच्या भिंती उभ्या आहेत. गोव्याच्या ख्रिस्ती लोकांत बामण खिरिस्तॉव आहेत. आहिंसा परमो धर्म मानणाऱ्या श्वेतांबर आणि दिगंबर पंथांच्या जैनांच्या देवाच्या अलीकडील घटना तुम्हाला ठाऊक असतीलच.
मनुष्यस्वभावात हा जात नावाचा व्हायरस इतका घट्टपणे कसा रोवून घेऊन बसतो हे एक विलक्षण कोडे आहे.

आर्थिक अभ्युदयाबरोबर जातीच्या प्रश्नांची तीव्रता कमी होईल असे वाटले होते. कामगार-चळवळीला जोर आल्यावर सारे कामगार यापुढे ‘कामगार’ हीच जात मानतील, असाही विश्वास होता. पण तेही खरे ठरले नाही. त्या चळवळीच्या नेत्यांचे पितळ कामगार-चळवळीच्या प्रारंभीच्या काळात सूत-गिरण्यांतल्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या कामगारांना दूर ठेवण्यापासूनच उघडे पडले होते. खुद्द कम्युनिस्ट देशांतही पुन्हा एकदा राष्ट्रवादाने जोर धरल्यासारखे दिसते. रशियन कामगार आणि चिनी कामगार आता एकमेकांचे वैरी झालेले दिसताहेत. ज्या चीनमध्ये माओचे रेड बुक म्हणजे रोज सकाळी उठून भक्तिभावाने वाचायचा ग्रंथ होता आणि ‘माओच्छिष्ठम् जगत् सर्वम्’ अशी परिस्थिती होती, तिथे इतिहासातून माओचे नाव पुसून टाकायचा चंग बांधलेला दिसतो आहे. अरब राष्ट्रांकडे पहावे तर अंधश्रद्धा, रूढी, धर्म-दुराभिमान ही मध्ययुगीन भुते थैमान घालताना दिसताहेत. खोमिनीच्या राज्यात बायका पुन्हा एकदा घरातल्या अंधारात कोठड्यात गेल्या. ही भुते उतरवण्याऐवजी त्यांचे सामर्थ्य वाढीला लावण्यात येत असलेले दिसत आहे.

आपल्या देशात पुरोगामी विचारांचा झेंडा मिरवणाऱ्या साम्यवाद्यांनी तर बुद्धिप्रामाण्य वाढीला लावण्यासाठी किंवा एकूणच समाजप्रबोधनासाठी कुठलेही धाडसी पाऊल टाकलेले नाही. कम्युनिस्ट युनियनचे सभासद असलेले मुंबईतले गिरणी-कामगार एकीकडून क्रांतीचा जयजयकार करतात आणि दुसरीकडून देवीला कोंबडा मारून नवस फेडतात. आपल्या देशात एकाच काळात आदिमानव-युगापासून apple-युगापर्यत सारे काही एकदम नांदत असते. त्या वेळी तुम्ही कशालाही भारतीय संस्कृती म्हणू शकता! फक्त ही वास्तवापासून अधिक दूर असेल तितकी अधिक भारतीय. जयप्रकाशजींचे नवनिर्माण-आंदोलन प्रचंड जोराने करणाऱ्या गुजरातेत राखीव जागाविरोधी आंदोलनही तितक्याच तीव्रतेने होऊन हजारो दलिनांना उध्द्वस्त करण्यात येते. मराठवाड्याची अस्मिता विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याच्या बाबतीत इतकी जागी होती, की शेकडो दलितांना आपल्या झोपड्या भस्मसात होताना पाहाव्या लागतात. कसले प्रबोधन, कसले फुले आणि कसले काय?

एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.

आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो.

विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही. सत्याचे दर्शन घडवणाऱ्या वैज्ञानिकांचा, देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे. धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू नसतील. मग ते बायकांना नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील, काय वाटेल ते करतील. धर्म आणि पंथाच्या दुरभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे; आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे हुकूमशहाच उदयाला आलेले दिसतात.

पण आपला इतिहास हा मुख्यतः राजे लोकांनी मुलूख बळकावण्यासाठी केलेल्या लढायांचा, जयापराजयाचा इतिहास आहे; आणि प्रत्येक विजयी राजाच्या भाट-चारणांची ही प्राचीन परंपरा आजही कशी टिकून आहे, ते आपण पाहतोच आहो. विजयी राजाच्या भाट-चारणांनी त्यातील सत्यावर स्तुतिस्तोत्रांच्या इतक्या झुली पांघरल्या आहेत, की भूतकाळातल्या त्या तसल्या व्यक्तींना झाकणारी शब्दांची आरास म्हणजे इतिहास हीच आपली समजूत आहे.

संजय गांधीला बुध्द आणि ख्रिस्ताच्या पंक्तीला नेऊन बसवणारे नेते (?) निघाले. अशा ह्या देशात बुध्दीला आणि निश्चित पुराव्याला साक्ष ठेवून काही लिहिणे आणि बोलणे हा गुन्हा ठरतो.
त्यातून आपल्या देशात नाममहात्म्याला फार मोठे स्थान आहे. नामस्मरणाने तरून जाता येते ही श्रद्धा. कुठे जाता येते आणि तरणे म्हणजे काय याचा विचार नाही. अंधश्रद्ध समाजात कुठलीही घटना पारखून घेण्याची शक्तीच उरत नाही. भाषेचा वापर मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी भरमसाट रीतीने केला जातो. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु सहनौ भुनक्तु’ ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतु’ म्हणताना “दूर हो. विटाळ होईल.” म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ. त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ. सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणी ना कुणी तालासुरात सांगत असते; आणि गॅलरीत आल्यावर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसत असतात. त्या देवावर आणि सत्तेवर असलेल्या माणसांवर विशेषणांची खैरात चालू असते. दुर्दैवाने वास्तवाला विशेषणे मंजूर नसतात.

कल्पनारम्यतेला मात्र ती पोषक ठरतात. अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना ‘हरिजन’ म्हटले, की जादूचा मंत्र म्हटल्यासारखी अस्पृश्यता नष्ट होईल असे मानणे किंवा स्त्रियांना देवता म्हटल्यानंतर त्यांची गुलामी नष्ट होईल असे धरून चालणे, हे ह्या असल्या वास्तवापासून दूर असलेल्या कल्पनारम्यतेचे लक्षण आहे. पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे. माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते. त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो. आमच्या सेक्युलर भारताच्या पंतप्रधानबाई त्यांच्या दर्शनाला जातात. चर्चेस्, मशिदी यांचे उत्पन्न भरमसाट वाढते आहे. यातून आपण विशिष्ट जातीचे किंवा पंथाचे अनुयायी या अहंकाराखेरीज पदरात काहीही पडत नाही. ह्या साऱ्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले, की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो. खुर्ची जाईल या भयाने ग्रस्त असलेले नेते, श्रीमंती जाईल या भयाने अस्वस्थ असलेले धनिक आणि असहायतेने निदान देव तरी आपल्या मदतीला येतो की काय हे पाहू या म्हणणारे दरिद्री लोक असाच देखावा दिसतो अाहे. वैचारिक आधुनिकतेचा समाजाला स्पर्शही झालेला दिसत नाही. शेवटी हेच खरे आहे असे वाटायला लागते. ‘Justice is Simply the interest of the Stronger’.

मनाच्या निराश मूडमध्ये हे लिहिले आहे असे तुम्हाला वाटेल. व्यक्तिगत जीवनात दुःख बाळगत राहावे असे माझ्या बाबतीत काहीही नाही. उद्या मला जेवायला मिळणार आहे किंवा नाही आणि आज रात्री झोपायला जागा सापडणार की नाही, ह्या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगताहेत, तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख हा शब्दही उच्चारू नये, ह्या जाणिवेने मी कसलेही वैयक्तिक दुःख माझ्याभोवती रेंगाळू देत नाही. साहित्य, संगीत, नाट्य असल्या कलांत रमण्यात आणि थोडेफार इतरांना रमवण्यात आयुष्य गेले. उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली. ‘उपरा’, ‘बलुतं’, ‘आठवणीचे पक्षी’ ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते. कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते.


(’एक शुन्य मी’ या पुस्तकातुन)

Friday, April 20, 2007

एक शून्य मी..

... मानवी इतिहासात हे सदैव असेच चालत आले आहे का? आत्मवंचना करत जगत राहण्याखेरीज काही इलाज नाही का? बालवयात, तरुण वयात, मनाच्या तुलनेने अधिक अपिरपक्व अवस्थेत ज्याला आपण संस्कृती संस्कृती समजत आलो तशी कधी संस्कृती होती का? गायन, वादन, नर्तन वगैरे कला देवळांच्या परिसरात वाढल्या म्हणतात. कला आपोआप थोड्याच वाढतात? त्या वाढवणारी हाडामांसाची माणसे असतात. त्या गायिका, त्या गायिका, नर्तिका ह्मांना न गाण्याचे किंवा न नाचण्याचे स्वातंत्र्य होते का? एखाद्या गणिकेच्या कन्येला गावातल्या देवदर्शनाला येणाऱ्या स्रिसारखे आपल्या नवऱ्याशेजारी बसून त्या देवाची पूजा करण्याचे भाग्य लाभावे असे वाटले तर तिचे कुणी सालंकृत कन्यादान केल्याचा कुठे इतिहास आहे का? की कुत्र्याच्या जन्मकाळा पासून त्याला हाडकावरच वाढल्यामुळे, पुरणपोळी ही आपल्या खाण्याची वस्तूच नव्हे असे त्याला वाटावे, तसे त्या नर्तकींना लग्न ही आपल्या कामाचीच गोष्ट नव्हे असे आपण वाटायला लावले? अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते. आणि कुठलेही मोहोळ उठले, की अंगावर फक्त डंख उठवणाऱ्या माशांशी मुकाबला करुन प्रत्येक जण त्याचा तो राहतो, तशी काहीशी माझी अवस्था झाली आहे. डोक्याला ही प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी? डोळयांवर आघात करणाऱ्या गोष्टी टाळायच्या असतील तर डोळे त्या गोष्टींकडून दुसरीकडे फिरवता यायला हवेत! स्वत:च्या अपूर्णतेची जाणीव होत असताना अपूर्णाची पूर्णावस्था शून्याच्याकडेच स्वत:ला नेताना दिसते.

परवाचीच गोष्ट. किराणाभुसार दुकानात काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्यातेलासाठी भलीमोठी रांग होती. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. दुकानदार डोळयांत तेल घालून थेंबाथेंबाचा दाम दसपटीने वसूल करत होता. तेवढ्यांत त्या रांगेतल्या एका फाटक्या परकरपोलक्यांतल्या पोरीचा नंबर लागला. तिने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली. 

दुकानदार "तेलाचं भांडं कुठाय?" म्हणून खेकसला. 

ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या." 

"अग, दिवाळीला अवकाश आहे! पणत्या कसल्या लावतेस?" पोरगी गांगरली. पण दारिद्रय धिटाई शिकवते. 

लगेच सावरुन म्हणाली, "दिवाळी कसली? खायला त्याल द्या..." 

"ह्मा पणतीत?" दुकानदार म्हणाला.

मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले."यवड्या पैशात किती बसतं ते द्या" 

"अग, दहा पैशाचं तेल द्यायला माप कुठलं आणू?" 

"पण आमच्याकडे धाच पैशे हाइत."पोरीने स्वत:चा 'आमच्याकडे' असा बहुवचनी उल्लेख केलेला पाहून त्या परिस्थितितही मला मजा वाटली. 

"अहो, कमीत कमी किती पैशाचं तेल देऊ शकाल तुम्ही?" 

"अँटलीस्ट फिफ्टीन!" दुकानदार. 

त्याला ते सांगताना लाज वाटली असावी. नाहीतर तो इंग्लिश बोलला नसता. आपल्याकडे युटेरस, पाइल्स, सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे शब्द आपण असेच लाज लपवायला इंग्लिशमधून वापरतो. त्याची आणखी पाच पैशांची सोय केली. पोरीची पणती तरीही पुरती भरली नव्हती. तिच्या घरी पणतीहून अधिक मापाचे 'खायाचे तेल' परवडत नाही. आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे. पणत्यांची आरास पाहिली, की 'आमच्याकडं धाच पैसे हाइत्' म्हणणारी ती मुलगी- नव्हे, एक प्रचंड आक्रोश मला ऐकू येतो. दिवाळीसारख्याच अनेक गोष्टींची नाती तुटत तुटत मी शून्य होत जातो. तरीही जगतो.

ह्मा शून्याच्या मागे नकळत एखादा आकडा येऊन उभा राहतो. मला मी कधी दहा झालो आहे, कधी वीस, कधी तीस, असेही वाटायला लागते. कुणीतरी सांगत येतो, की अमक्या अमक्याच्या बायकोने रुग्णशय्येच्या उशाखाली एक चिठ्ठी ठेवली होती. तिच्यावर लिहिले होते, की माझ्या मृत्यूनंतर माझे प्रेत ससून हॉस्पिटलमधल्या विद्यार्थ्यांना शवविच्छेदनाला द्या. त्यांना उपयोग होइल. ह्मा बातमीने मग माझ्या शून्यामागे एक फार मोठा आकडा उभा राहून मला शून्याची किंमत दाखवून जातो. त्या बाईची आणि आपली ओळख असायला हवी होती असे वाटते. आता जगणे म्हणजे नुसता श्वासोच्छ्वास राहत नाही. 

त्या किराणा-भुसार दुकानदाराच्या दारातल्या पोरीने माझे मातीच्या पणतीचे दिवाळीशी जडवलेले नाते तोडले एवढेच मला वाटले होते : पण त्या पोरीशी माझे नाते कां जडावे ते कळत नाही. ती कुठे राहते? तिच्या हक्काची झोपडी तरी असेल का? झाले ! म्हणजे प्रश्नातून सुटका नाही. माझीच नव्हे, कुणाचीच नाही! मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो. आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते. विरामिचन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती!

- पु.ल. देशपांडे 
a