Leave a message
Showing posts with label गदिमा. Show all posts
Showing posts with label गदिमा. Show all posts

Monday, January 3, 2022

'पुल'कित गदिमा -- सुमित्र माडगूळकर

पु.ल.देशपांडे व गदिमा पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याच्या टेनिस कोर्टाजवळच्या रस्त्यावरुन प्रभातफेरीला निघाले होते,रात्रभर प्रभात स्टुडिओत एका चित्रपटाचे चित्रीकरण आटपून मंडळी चालायला निघाली होती,पुल ना फारसे चालायला आवडायचे नाही मात्र गदिमांना प्रभात फेरीचे प्रचंड प्रेम, नाईलाजाने का होईना पण गदिमांकडून लवकर गीते लिहून घ्यायची असतील तर पर्याय नव्हता!,तितक्यात रस्त्यात महानगरपालिकेचे दिवे बंद झाले आणि काय गंमत गदिमांना गीत सुचले,

"विझले रत्नदीप नगरात,आता जागे व्हा यदुनाथ".

एक मोठा प्रश्न आज सुटला गदिमा-पु.ल आजच्या काळात का होत नाहीत? तर याचे उत्तर सोपे आहे,अहो आता अनेकदा महानगरपालिकेचे दिवे सकाळी १०-११ पर्यंत बंदच होत नाहीत तर लोकांच्या प्रतिभा जागृत होणार कशा!.

गदिमा व पु.लं चा स्नेह खूप जुना,ज्याकाळात आपल्यात लेखनाचे गुण आहेत हे पु.लं ना उमगलेही नव्हते तेव्हापासूनचा,तेव्हा पुल गायक होण्याच्या मागे लागले होते,महाराष्ट्रभर फिरुन ते भावगीत गायनाचे कार्यक्रम करत असत,कोल्हापूरच्या सोळंकूरकर मास्तरांचा संगीत मेळा त्याकाळात खूप प्रसिध्द होता,मेळ्यात त्याकाळात गाणार्‍या गुणवान मुलांची नावे होती सुधीर फडके, राम गबाले, आबासाहेब भोगावकर,पद्मा पाटणकर (नंतरच्या विद्याताई माडगूळकर)!.मुंबईत संगीत क्षेत्रात धडपडणारे पण कोल्हापूरला या मुलांसमोर भेट देताना ज्यांची 'मुंबईचे नामवंत भावगीत गायक' अशी ओळख करुन दिली जात असे ते पु.ल.देशपांडे या मेळ्याला नामवंत पाहुणे म्हणून भेट देत असत!.गदिमांची अनेक गीते त्यांना तिथे मिळत असत व त्यांना चाली लावुन ते कार्यक्रम करत असत.यातूनच पुढे दोघांची भेट झाली व दोघात स्नेह निर्माण झाला.

१९४८ सालचा 'वंदे मातरम' चित्रपट,गदिमांनी आग्रहकरुन पु.ल व सुनिता बाईंना या चित्रपटात भूमिका करायला लावली होती,सुनिताबाई माहेरी गेल्या होत्या तर गदिमांनी त्यांना पत्र लिहून त्यांचा होकार मिळवला,"वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम" हे गदिमांचे गाजलेले गीत याच चित्रपटातले (नुकतीच या चित्रपटाची प्रत मिळाली आहे व National Film Archive of India,Pune कडे उपलब्ध आहे)."गुळाचा गणपती" हा चित्रपट 'सबकुछ पुल' अश्या नावाने जरी ओळखला जात असला तरी यात गीते होती अर्थातच गदिमांची, "इंद्रायणी काठी देवाची आळंदी,लागली समाधी ज्ञानेशाची" हा अभंग याच चित्रपटातला,हा गाणार्‍या पं.भिमसेन जोशींना सुध्दा माहित नव्हते की हे गीत गदिमांचे आहे,अगदी एच.एम.व्ही कंपनीच्या रेकॉर्डवर त्या काळात 'एक पारंपारीक अभंग' अशा नावाने तो प्रसिध्द झाला होता,शेवटी गदिमांना सांगावे लागले की अहो हे माझे चित्रपट गीत आहे!.

पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदीराच्या उदघाटन प्रसंगी एक गीत हवे होते,पु.लं नी पंचवटी गाठली व गदिमांनी गीत दिले

"जसा जन्मतो तेज घेऊन तारा!
जसा मोर घेऊन येतो पिसारा!
तसा येई घेऊन कंठात गाणे!
असा बालगंधर्व आता न होणे!

रतीचे जया रुपलावण्य लाभे!
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे!
सुधेसारखा साद,स्वर्गीय गाणे!
असा बालगंधर्व आता न होणे!"

पु.लं नी याला संगीत दिले व उदघाटन कार्यक्रमात ते बकुळ पंडित यांच्या आवाजात सादर झाले,याशिवाय 'असे आमुचे पुणे' ही सूंदर कविताही गदिमांनी दिली होती त्याचेही सादरीकरण याच कार्यक्रमात झाले.आजही बालगंधर्व रंगमंदिरात बालगंधर्वांच्या छायाचित्राखाली या ओळी लावलेल्या आहेत.(आधी मोठया अक्षरात असलेल्या ओळी आता दुर्दैवाने लोकांनी भिंग घेऊन वाचाव्यात इतक्या बारीक करून लावल्या आहेत हे काळाचे दुर्दैव!)

'नाच रे मोरा' हे गदिमा-पु.ल जोडीचे गाजलेले गीत,एकदा मस्ती करता करता पुलंनी गदिमांना सांगितले माडगूळकर 'नाच गं घूमा कशी मी नाचू' च्या धर्तीवर बालगीत हवे आहे,गदिमा उत्तरले घे लिहून 'नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच'.

या जोडीने अनेक सुंदर सुंदर गीते आपल्याला दिली,नुसती वानगी दाखल नावे घ्यायची झाली तर 'इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे','नाच रे मोरा नाच','इंद्रायणी काठी देवाची आळंदी','श्रीहरी विदुराघरि पाहुणा','इथेच टाका तंबू','ही कुणी छेडिली तार','जा मुलि शकुंतले सासरी','कबीराचे विणतो शेले','कुणी म्हणेल वेडा तुला','सख्यांनो करु देत शृंगार','माझं ठरल्यालं लगीन मोडलं ग','दूर कुठे राउळात','केतकीच्या बनात उतरत्या उन्हात' अशी अनेक गीते आहेत.

याशिवाय शाकुंतल व अमृतवेल अश्या दोन गदिमांच्या सुंदर संगीतिकांना पुल नी संगीत दिले होते,याशिवाय 'तुका म्हणे आता' या पुल च्या नाटकासाठी गदिमांनी गीते लिहून दिली होती,दोघांनी मिळून केलेल्या अश्या अनेक कलाकृती आज पडद्याआड आहेत.

"त्या तिथे, पलिकडे,तिकडे,माझिया प्रियेचे झोपडे" ही कविता प्रथम गदिमांच्या तोंडून ऐकल्यावर पु.ल म्हणाले होते, "महाकवी,तुम्ही लकी !",तुमच्या प्रियेच्या झोपड्याकडे वळताना त्या वळणावर आंब्याचे वाकडं झाड होतं. आम्ही वाढलो मुंबईत,त्या वातावरणात वळणावर असते जळाऊ लाकडांची वखार ! .

गदिमा व पु.ल अनेक साहित्यिक कार्यक्रमांना बाहेरगावी एकत्रही जात असत,कधीकधी रात्री भोजन पुर्व रसपानाचा कार्यक्रमही होत असे प्रथम पु.ल नको नको म्हणायचे त्यावर गदिमा मित्राला म्हणायचे,

'आबासाहेब,यांना डोंगरे बालामृत द्या हो!' (त्यावेळी लहान मुलांसाठी हे औषध प्रसिद्ध होते!)

चेष्टा-मस्करी करीत रसपानाला रंग चढे,पु.ल पुरे,छोटा पेग,छोटा पेग करायचे.ते म्हणायचे "अण्णा,रसपान असे बेताने नि बेमालूम करावे की मासा जसा पाण्यात पाणी पितो.रसपान हे सुध्दा अत्तराप्रमाणे असावे"

लगेच गदिमा म्हणायचे "लावा रे लावा,अत्तराचा फाया याच्या मनगटावर लावा!"

एकदा शरदरावजी पवार दोघांना बारामतीला सांस्कृतिक कार्यक्रमाला घेऊन गेले होते,कार्यक्रम सुंदर झाला ,परत निघताना त्यावेळी पवारांकडे गाडी नव्हती (नसते अहो!,विश्वास ठेवा!) तेव्हा त्यांनी एका व्यापारी मित्राची गाडी घेतली,त्याच वेळी त्या मित्रालाही काम निघाले व तो ही यांच्या सोबत निघाला,गाडीत पवारांनी या गृहस्थांशी ओळख करुन दिली गेली "हे ग.दि.माडगूळकर हे महाकवी आहेत.गीतरामायण यांनीच लिहिले आहे आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्राचे महान विनोदी लेखक आहेत".समोरच्या महाशयांचा साहित्याशी अगदी बादरायण संबंधही नव्हता ते अगदी निष्पाप आणि निरागस पणे उत्तरले

"व्हय! पर हे करत्यात काय?".

त्याप्रसंगावर नंतर या दोघांची जी हास्यरेस सुरु झाली ती लवकर थांबेचना,गदिमा म्हणाले "आमची अजून महाराष्ट्रात अशी कुणी जिरवली नव्हती!"

पु.ल चष्मा काढून हसत होते.त्यावर गदिमा म्हणाले

"पुरश्या,चष्मा घाल.चष्मा काढल्यावर तू चोरासारखा दिसतोस! तू नाटक लिहितोस ना? असा 'Anticlimax' कधी लिहिला आहेस?,असा कनवाळू माणूस आम्ही कुठे बघितला नाही.आपल्या पोटापाण्याची कोण रे चौकशी करतंय!".

पु.ल यांचे बंगाली भाषेवर खूप प्रेम होते,त्यावर गदिमांनी ए.क.कवडा या टोपण नावाने बिंगचित्र लिहीले होते...

"पाया पडती राजकारणी,करणी ऐसी थोर
मराठीतला तू बिनदाढीचा रवींद्र टैगोर"

गदिमा-विद्याताई व पुल-सुनीताबाई यांचेही खूप चांगले संबंध होते,अनेकदा रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगत मग लक्षात येई उशीर झाला ,मग गप्पात खंड न पडता गदिमा-विद्याताई पुल-सुनीताबाईंना सोडण्यासाठी त्यांच्या घरा पर्यंत जात व तिकडे पोहोचल्यावर कधी पुल-सुनीताबाई या दोघांना सोडायला पंचवटीत परत!,कधीकधी तर असे रात्रभर चाले!,किती ही रसिकता व स्नेह!.

७-८ डिसेंबर १९७७ पु.ल रवींद्रनाथांची दोन गीते घेऊन पंचवटीत आले,"माडगूळकर बाबा आमटे यांच्या आनंदवनात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे,त्यासाठी या गीतांच्या तर्जुम्यावर गीतरचना हवी आहे",गदिमा खूप आजारी होते,तरीपण मित्राच्या प्रेमाखातर त्यांनी लगेच दोन गीते लिहून दिली

"येइ रे प्राणा,सर्वात्मका!
उंच उडव या मरुभूमीची गगनी विजयपताका!"

व दुसरे होते

"कोवळ्या रोपट्या,आज तू पाहुणा
भूषवी अंगणा येउनिया"

१४ डिसेंबर १९७७ गदिमा आपल्याला सोडून गेले व पुल,बाबा आमटे यांच्यासाठी लिहीलेली ही गीते गदिमांची शेवटची गीते ठरली. पु.ल १२ जून २००० रोजी आपल्याला सोडून गेले.असे हे दोन जिवलग मित्र, त्यांच्याविषयी किती लिहू आणि किती नाही असे होऊन जाते,गीतरामायणातील "त्रिवार जयजयकार रामा" गीतातल्या ओळी जणू गदिमांनी पु.लं साठीच लिहून ठेवल्या आहेत...

"पुलकित पृथ्वी,पुलकित वायु" तसे हे होते 'पुल'कित गदिमा..

- सुमित्र माडगूळकर

Thursday, October 21, 2021

पु.ल. आणि गदिमांची एक आठवण -- शरद पवार

बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर मी नेहमीच माझ्या मतदारसंघातल्या सर्व घटकांमधल्या लोकांच्या भेटी वेगवेगळ्या कामांच्या निमित्तानं घेत असे. पुण्यापासून जवळच असलेल्या बारामतीत होणाऱ्या साहित्य, कला, संगीत, नाटक आदी उपक्रमांमध्येही मी बारकाईनं लक्ष घालत असे व अशा संस्थांमधून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमागं उभा राहत असे. त्या काळी सर्व छोट्या-मोठ्या शहरांमध्ये ‘सानेगुरुजी कथामाला’ हा कार्यक्रम उत्साहात साजरा होई. आमच्या बारामतीच्या ‘सानेगुरुजी कथामाले’च्या एका मोठ्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ख्यातनाम कवी-गीतकार ग. दि. माडगूळकर आणि सिद्धहस्त साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना एकत्रितपणे आमंत्रित केलं होतं. ठरल्याप्रमाणे कथामालेचा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीनं पार पडला. या मोठ्या पाहुण्यांसाठी माझ्या घरीच दुपारच्या भोजनाची व्यवस्था केलेली होती. त्याप्रमाणे कार्यक्रम संपवून आम्ही घरी आलो.

भोजनाची सर्व तयारी झालेली होती. पानंसुद्धा घेतलेली होती. तर्कतीर्थांच्या पानाभोवती सुरेख रांगोळी घातलेली होती आणि पानात सर्व शाकाहारी पदार्थ वाढलेले होते. बाकी आम्हा सगळ्यांच्या ताटांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांची रेलचेल होती. जेवण सुरू करण्यापूर्वी तर्कतीर्थांनी मला जवळ बोलावलं आणि विचारलं - ‘‘हा ‘पंक्तिप्रपंच’ कशासाठी? तसं बघितलं तर, तुमच्या पानात जे वाढलेलं आहे, तेही चालतं आम्हाला आणि जमलंच तर आम्ही घेतोसुद्धा!’’ हे ऐकून तर्कतीर्थांचं ताट बदलण्यात आलं. तर्कतीर्थ स्वत-च्या वाहनानं बारामतीला आलेले होते. त्यामुळं त्यांची परतीची सोय झालेली होती; परंतु गदिमा ऊर्फ अण्णा आणि पुलं यांना पुण्याला पोचवायचं होतं. त्या वेळी माझ्याकडं स्वत-ची जीपगाडी होती; परंतु एवढ्या थोरा-मोठ्यांना जीपनं प्रवास घडवावा, याबद्दल मला थोडा संकोच वाटत होता. गावातले माझे एक सहकारी भगवानराव काकडे बऱ्यापैकी सधन होते आणि त्यांच्याजवळ एक चांगली मोटारगाडीही होती. मी त्यांना विनंती केली - ‘‘आपण तुमच्या गाडीनं पाहुण्यांना पुण्यापर्यंत सोडू या.’’ माझे पाहुणे म्हटल्यानंतर साहजिकच काकडे यांची कल्पना अशी झाली, की कुणीतरी फार मोठी माणसं असली पाहिजेत. काकडे लगेच तयार झाले आणि आम्ही गदिमा व पुलं यांना घेऊन पुण्याकडं निघालो. काकडे स्वत-च गाडी चालवत होते आणि मी पुढच्या सीटवर त्यांच्या शेजारी बसलो होतो. प्रवास सुरू झाला तशी काकडे यांनी पाहुण्यांची विचारपूस करायला सुरवात केली. त्यांनी पहिलाच प्रश्न टाकला - ‘‘कोणच्या गावाकडचं म्हणायचं?’’‘‘आम्ही पुण्यालाच असतो,’’ असं उत्तर दोघांनीही दिलं. त्यांचा पुढचा प्रश्‍न - ‘‘काय काम करता?’’ आता या प्रश्नाचं उत्तर काय येईल, याबाबत मी थोडासा धास्तावलोच होतो; तर अण्णांनी म्हणजे गदिमांनी उत्तर दिलं - ‘‘आम्ही लिव्हतो.’’

त्यांचा परत प्रश्न आलाच - ‘‘कुठं पोस्टाबाहेर बसता की मामलेदार कचरीसमोर?’’ आता संभाषणाची सूत्रं पुलंनी स्वत-कडं घेतली आणि सांगितलं - ‘‘मी पोस्टात बसतो आणि हे (गदिमा) मामलेदारांच्या कचेरीबाहेर बसतात.’’ काकडे यांचं समाधान अर्थातचं झालेलं नव्हतं.

त्यांनी पुन्हा विचारलं - ‘‘काय, घरदार चालंल इतकं पैसं मिळतात का ?’’

पुलंनी लगेच उत्तर दिलं - ‘‘लोक आम्हाला लिहिल्याचे बऱ्यापैकी पैसे देतात.’’ काकडे यांच्या शंका अद्यापही संपलेल्या नव्हत्या. त्यांनी पुढं विचारलं - ‘‘तुम्ही या एवढुशा कामाचे लोकांकडून फार पैसं घेत असला पाहिजे. आवं, जरा विचार करा...काय एक-दोन-चार तर कागद लिव्हायचे आन्‌ किती पैसं घ्यायचे? बरं, तुम्ही पडला शिकली-सवरलेली माणसं आणि तुमच्याकडं कागद लिव्हायला येणारा अडाणी, गरीब. हे काय बरोबर नाही. तुमचं सगळं शिक्षण तर सरकारच्या पैशातच व्हतं ना; मग थोडं माणुसकीनं वागा की राव. कशाला गरिबांचे तळतळाट घ्यायचे?’’ हे सगळं ऐकून महाराष्ट्राचे ते दोन मोठे साहित्यिक, अर्थातच गदिमा आणि पुलं, एकमेकांकडं बघून हसत होते. मीही या संभाषणात माफक सहभाग दाखवून शांतपणे बसलो होतो.

- शरद पवार
१५ फेब्रुवारी २०१५
सकाळ

Friday, November 12, 2010

आठवणीतील गदिमा - पु.ल.

पुण्याला 'बालगंधर्व' थिएटर उभे राहत होते,गोपाल देउसकरांच्या सुंदर चित्रांशी स्पर्धा करणार्‍या चार ओळी पाहिजे होत्या. पंचवटी गाठली. माडगूळकरांना म्हणालो, "स्वामी, चार ओळी हव्या आहेत ....बालगंधर्वाच्या पोट्रेटपाशी".मागणी संपायच्या आत माडगूळकर म्हणाले ,"असा बालगंधर्व आता न होणे." तेवढय़ात कुणीतरी आले. गप्पागोष्टी सुरु झाल्या. मी समस्यापूर्तीची वाट बघत होतो. तासाभरात निघायचे होते. त्या श्लोकाला चाल लावायची होती.

उदघाटन -समारंभाच्या प्रसंगी गाण्याच्या गीतांच्या तालमी चालल्या होत्या. त्यांत माडगूळकरांचे "असे आमुचे पुणे" होतेच. तालमीच्या ठिकाणी बाळ चितळे श्लोक घेऊन आला. सुरेख, वळणदार अक्षरात लिहिलेला. बकुळ पंडितला मी चाल सांगितली. रंगमदिराच्या उदघाटनाच्या वेळी रसिकांनी भरलेल्या प्रेक्षागारातले दिवे मंदावले.रंगमंचावर मांडलेल्या बालगंधर्वांच्या 'नारायण श्रीपाद राजहंस' आणि 'स्वयंवरातली रुक्मिणी' अशी दोन दर्शने घडवणार्‍या त्या अप्रतिम चित्रांवरचे पडदे दोन युवतींनी बाजुला केले , आणि लगेच माडगूळकरांच्या गीताचे गायन सुरु झाल्यावर रसिकांना कळेना , की त्या रंगशिल्पाला दाद दयावी की गीतातल्या शब्दशिल्पाला !. प्रेक्षागारात पुन्हा प्रकाश आला त्या वेळी त्या 'रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्' ह्या अनुभूतीने पर्युत्सुक झालेल्या रसिकांच्या खिशांतले शेकडो हातरुमाल अश्रू पुसत होते.
गीतांच्या जन्मकाळाशी गुंतलेल्या अशा किती आठवणी....

डेक्कन जिमखान्याच्या टेनिस कोर्टाजवळच्या रस्त्यातून जाताना एका विजेच्या खांबापाशी आलो की आठवते: रात्रीचे चित्रीकरण आटपून चालत आम्ही दोघे घरी येत होतो. पहाट होत होती,रस्त्यातले म्युनिसिपालटीचे दिवे मालवले.
त्या खांबापाशी क्षणभर थांबून माडगूळकर उदगारले,
"विझले रत्नदीप नगरात !"
"आता जागे व्हा यदुनाथ"
गीत भावनेच्या तादात्म्य पावण्याच्या त्यांच्या असंख्य खुणा त्यांच्या गीतातून आढळतात.शब्दयोजनेतले त्यांचे अवधान सुटत नाही. अशी शेकडो गीते त्यांनी रचली. चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिल्यामुळे आमच्या 'आर्डरी' ही विचित्र असायच्या. 'आर्डरी' हा त्यांचाच शब्द. कधीकधी चाल सुचलेली असायची.
"स्वामी,असं वळण हवं."
"फूल्देस्पांडे, तुम्ही बाजा वाजवीत राहावे".

मित्रांच्या नावांची गंमत करणे हा त्यांचा आवडता छंद असायचा. मग मधुकर कुळकर्ण्याला "पेटीस्वारी",राम गबालेला "रॅम् ग्याबल", वामनराव कुळकर्ण्यांना "रावराव"...कुणाला काय , कुणाला काय असे नाव मिळायचे. चाल पेटीवर वाजवत बसल्यावर चटकन त्या चालीचे वजन त्यांच्या ध्यानात येई. मग त्या तालावर झुलायला सुरुवात. बैठकीवर उगीचच लोळपाटणे. पोटाशी गिरदी धरुन त्याच्यावर चिमटय़ात अडकवलेल्या कागदाचे फळकूट पुढय़ात ठेवून कातरायला सुरवात.मग अडकित्याची चिपळी करुन ताल ...नाना तर्‍हा .एखाद्या अचानक तिथे आलेल्या नवख्याला वाटावे , इथे गीत आकाराला येते आहे, की नुसताच पोरकटपणा चाललाय !. एखादे दांडगे मूल पाहावे तसे वाटत असे.त्यांच्यातला नकलाकार जागा झाला की मग तो मूलपणा पाहावा. खरे तर मानमरातबाची सारी महावस्त्रे टाकून शैशवात शिरलेल्या माणसाचे ते दर्शन असायचे. ह्या स्वभावगत मूलपणाने त्यांना खूप तारलेले होते. प्रापंचिक जबाबदाय्रा फार लवकर त्यांच्या अंगावर पडल्यामुळे विशीतच फार मोठे प्रौढपण त्यांच्यावर लादले गेले होते, त्यातून ही मूलपणाकडची धाव असायची की काय,ते आता कोणी सांगावे ?..

गडकरी गेले त्या वेळी रसिक महाराष्ट्र असाच सुन्न झाला होता म्हणतात. माडगूळकरांना गडकर्‍यांविषयी अतोनात प्रेम. आम्ही जोडीने केलेल्या प्रवासात गडकर्‍यांच्या कवितांचेच नव्हे, तर नाटकांतील उतार्‍यांचे पठण हा आमचा आवडता छंद असायचा. हरिभाऊ आपटे,नाथमाधव,गडकरी ,बालकवी, केशवसुत, फडके, खांडेकर,अत्रे ह्या आधुनिक काळातल्या साहित्यकारांचे मार्ग पुसैतु आम्ही ह्या साहित्याच्या प्रांतात आलो. मी मुंबंईत वाढलो आणि माडगूळकर माडगुळ्यात वाढले,तरी आमच्या साहित्यप्रेमाचे पोषण एकाच पध्दतीने चाललेले होते. गडकर्‍यांच्या निधनानंतर वर्षभराच्या आतच आमचा जन्म. माडगूळकर माझ्यापेक्षा फक्त एक महिन्याने मोठे, बालपणातले आमचे इतर वातावरण मात्र निराळे होते.

"त्या तिथे, पलिकडे,तिकडे,माझिया प्रियेचे झोपडे" ही कविता प्रथम त्यांच्या तोंडून ऐकल्यावर मी म्हणालो होतो, "महाकवी, तुम्ही लकी !" (माडगूळकर मात्र स्वताला 'महाकाय कवी' म्हणत.) तुमच्या प्रियेच्या झोपडय़ाकडे वळताना त्या वळणावर आंब्याचे वाकडं झाड होतं. आम्ही वाढलो त्या वातावरणात वळणावर जळाऊ लाकडांची वखार !

"महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्या-या माणसापेक्षा समाजाला गाणे देणा-या माणसाचे उपकार फार मोठे असतात. Song has longest life अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढय़ानुपिढय़ा बांधून ठेवते एवढेच कशाला ?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंत:करण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली,तमाशाच्या फडात , देवळात ,शाळेत,तरुणांच्या मेळाव्यात,माजघरात,देवघरात,शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत... त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे ?.

माडगूळकरांचे चिरंजीवित्व गाण्यांनी सिध्द झाले आहे, व्यक्तिश: मला तर माडगूळकरांचे स्मरण करणे माझ्या पंचविशीपासून ते आता साठीकडे वळलेल्या माझ्याच आयुष्याकडे पुन्हा वळून पाहण्यासारखे वाटते. आम्ही काम केलेला एखादा जुना चित्रपटच पाहण्यासारखे.त्यातली माडगूळकरांची भूमिका आणखी खूप पाहायला मिळणार अशी आशा होती. कवितेच्या त्या जिवंत झर्‍यातून अजून कितीतरी ओंजळी भरभरुन प्यायला मिळणार आहेत अशी खात्री होती. प्राणांन्तिक संकटातून ते वाचले होते. इडापीडा टळली असा भाबडय़ा मनाला धीर होता.आणि अचानक चित्रपटगृहातल्या अंधारात ती बाहेर पडायच्या दरवाजावरची Exit ची लाल अक्षरे पेटावी, आणि "म्हणजे ?,एवढय़ात संपला चित्रपट ?",असे म्हणता म्हणता 'समाप्त' ही अक्षरे कुठल्या रिळाच्या शेवटी लिहिली आहेत हे कुणाला कळले आहे ?. मी चित्रपटव्यवसाय सोडून बेळगावला गेल्यावर माडगूळकर मला म्हणाले होते, "मित्रा, अशी मैफिल अर्ध्यावर टाकून जाणं बरं नव्हे.आम्ही आता काय म्हणावे ? आणि कुणाला म्हणावे ?.
- पु.ल. देशपांडे
-----------------------------
सुमित्र माडगूळकर
www.gadima.com
a