Leave a message
Showing posts with label चाहत्यांचे पु.ल.. Show all posts
Showing posts with label चाहत्यांचे पु.ल.. Show all posts

Friday, July 5, 2024

तुमने हमको हसना सिखाया.. - (निमिष वा.पाटगांवकर)

".....इंग्लडला जायला कोणती इंजेक्शने घ्यावी लागतात ह्या प्रश्नाला फक्त दमा, रक्तक्षय आणि बाळंतरोग याखेरीज बहुतेक सगळ्या रोगांची नावे मला सांगितली गेली.. ज्याला जे सुचेल ते तो सुचवत होता. पिवळ्या तापावर फारच दुमत होते. पिवळा ताप फक्त अमेरिकेला जायला अडवतो हे त्यांचे म्हणणे".. "अपूर्वाई"तल्या या प्रसंगाला मी नुकताच जेव्हा सामोरा गेलो तेव्हा लक्षात आले कि पु.ल. आपल्या आयुष्यात किती भरून राहिले आहेत.

वेस्ट इंडिजला विश्वचषकासाठी जायच्या तयारीचा भाग म्हणून मला पिवळ्या तापाची लस टोचून घ्यायची होती. आपण वेस्ट इंडिज म्हणतो पण हे वेगवेगळे देश आहेत आणि बरीच छाननी केल्यावर कळले फक्त गयानाला जायला किंबहुना तिथून परत येताना हा पिवळा ताप टोचून घेतलेला आवश्यक आहे. हि लस कुठे मिळते कळल्यावर विमानतळाजवळच एक आरोग्य सुविधा केंद्र आहे तिथे हि लस आठवड्यात फक्त दोनदाच मिळते हे कळले. असेही कळले कि एकदा लसीची बाटली उघडली कि दहा लोकांना ती दिली जाते नाहीतर ती वाया जाते तेव्हा तिथे दहा लोकं असतील का? हा माझ्यापुढे वेगळाच प्रश्न होता. पुन्हा अपूर्वाईचाच प्रसंग बघितला तर या गडबडीत पासपोर्ट मात्र मी न विसरता नेला पण फक्त अर्धा बुशशर्ट घालायचा विसरलो आणि मला तिथे सलमान खान व्हावे लागले इतकाच काय तो आमच्या दोघांच्या लसीकरणातला फरक. मला दहा माणसांची चिंता होती पण इथेही सुमारे शंभर माणसांची बारी लागली होती. दहा दहाचे जथ्थे ते आत सोडत होते. काही लोकं खरंच गोंदवून घेतल्याच्या खुशीत होते. त्या भाऊगर्दीत बहुतेक सगळे आफ्रिकेला जाणारेच होते. माझ्यासारखा दक्षिण अमेरिकेच्या वाटेला जाणारा कुणी भेटला नाही.

खरंच पु.ल. नावाचं गारुड आज पुलंना जाऊन चोवीस वर्षे झाली तरी काही कमी होत नाही. जिकडेतिकडे पुलंनी पेरलेली माणसे दिसत असतात. आजकाल लग्न हे एखाद्या इव्हेंटसारखे असते तरी त्यातही कुणीतरी नारायण पटकन दिसतो. माझे शिक्षक आता फार कमी राहिले आहेत पण काहींची आठवण आली कि चितळे मास्तरांची आठवण येते. यू सी..यू सी ...करत गोंडा घोळणारा मधू मलुष्टे आता एसटीमध्ये न दिसता कधी कधी विमानात एअरहोस्टेसवर इम्प्रेशन मारताना दिसतो. आमची पिढी पन्नाशीची झाली तरी आमच्या वेळच्या इंदू वेलणकर कुठे राहायच्या नाही तर आता कुठे राहतात हे आमच्यातल्या अनेक नंदा प्रधानांना आजही माहित असते. कधीकधी त्यांचे खविस बापही भेटतात. आमच्यातल्या काहींचे केस आता काळ्या रंगाशी फारकत घ्यायला झालेत तरी मनाने नाथा कामतचे उसासे टाकत असतो. हे झाले काही वल्लींचे नमुने तर "आमची व्हिक्टोरिया अशी नाही हं" हा श्वानमालकांचा नमुना जसाच्या तसा बघायला मिळतो.

अत्यंत सोप्या भाषेत, आपल्याला दिसते तेच पण वेगळ्या शैलीत मांडून आपल्याला पुनर्प्रत्ययाचा सुखद धक्का देणारे पु.लंचे लिखाण म्हणूनच कालबाह्य होत नाही. मुंबईतल्या चाळी आता नामशेष व्हायला लागल्या आहेत पण जरी तिथे चाळी जाऊन टॉवर उभे राहिले तरी कुणीतरी एच. मंगेशराव असतील, लोकांना ब्रह्मज्ञान पाजणारे बाबा बर्वे असतील, चापशी असेल आणि टॉवरच्या कुठच्यातरी दोन मजल्यावर असलेले सरोज गुप्ते आणि मधू चौबळ आता पत्रे नाही तर चॅट करून आपले मन उलगडून दाखवत असतील. मला वाटते आजूबाजूचे जग झपाट्याने बदलले तरी माणसाचा मूळ स्वभाव तसाच असतो. पु.लंनी तो अचूकतेने टिपला म्हणून आजही ते वाचताना आपल्या चेहऱ्यावर हास्याची किनार उठते आणि त्याहून महत्वाचे म्हणजे हे सर्व सात्विक जग बघून आपण त्या नॉस्टॅलजियामध्ये हरवून जातो.

पु.ल. गेले तेव्हा मी अमेरिकेत होतो. त्यांची तब्येत खालावत चालल्याचा बातम्या रोज वाचून काळजात चर्रर्र होत होते. जे अटळ आहे ते समोर दिसत होते. माझ्या वाढदिवसाला (११ जूनला) हे व्हायला नको म्हणून मी स्वार्थीपणाने देवाकडे एक दिवस मागून घेतला. देवानेही तो मान्य केला असावा. १२ जूनचा ऑनलाईन पेपर उघडायची हिम्मतच नव्हती. मला आठवतंय त्या डेक्कनवरच्या प्रयाग हॉस्पिटलच्या समोरच्या गर्दीत एक माणूस हातात फलक घेऊन उभा असेलेला फोटो आजही मी विसरलो नाही. त्या फलकावर लिहिले होते ..."तुमने हमको हसना सिखाया...." आजकाल दुर्मिळ होत चाललेली हि गोष्ट भरभरून दिलेल्या पुलंचे "एहसान" व्यक्त करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडतात.
- निमिष वा. पाटगांवकर

Tuesday, July 2, 2024

हशा-टाळ्या पलीकडचे पु.ल. - (विनायक होगाडे)

पुलंची वैचारिक, सामाजिक आणि राजकीय भूमिका काय होती? याबाबतची चर्चा फारशी होताना दिसत नाही. 'हशा-टाळ्या पलीकडचे पुलं' समजून घ्यायला महाराष्ट्र कमी पडला आहे का, या प्रश्नावर त्यांच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्ताने विचार करणे क्रमप्राप्त ठरेल.

ज्या काळात स्टॅण्डअप कॉमेडी नावाचा प्रकार महाराष्ट्राला फारसा माहीत नव्हता, त्या काळात पु. ल. देशपांडे हे या प्रकारातले ग्रेट एंटरटेनर होते. मात्र, त्यांची ओळख एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. याशिवाय ते शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, पट्टीचे वक्ते होते. यापैकी कोणती ओळख अधिक ठळक करावी आणि कोणती फिकट करावी, असा प्रश्न सूज्ञ मराठी माणसाला पडू शकत नाही. कारण, ज्यांना पुलं देशपांडे कळलेत तो पुलंच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक धाग्यांपैकी कोणतातरी एकच धागा आपलासा करून बसणार नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला जे काही पैलू होते, त्या सगळ्याच पैलूंना आलेल्या चकाकीमुळेच पुलं नावाचा हिरा मराठी साहित्य-संस्कृतीमध्ये चमकताना दिसतो. पुलंचे स्मरण दरवेळी त्यांच्या पुस्तकांवरून, सादरीकरणावरून होते, ते करणेही फारच सोयीचे आहे. मात्र, त्यांची वैचारिक, सामाजिक आणि राजकीय भूमिका काय होती? याबाबतची चर्चा फारशी होताना दिसत नाही. ‘हशा-टाळ्या पलीकडचे पुलं’ समजून घ्यायला महाराष्ट्र कमी पडला आहे का, या प्रश्नावर त्यांच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्ताने विचार करणे क्रमप्राप्त ठरेल.

गांधीवादी-समाजवाद्यांशी वैचारिक नाते
पु.ल. देशपांडे हे प्रामुख्याने कला क्षेत्राशी निगडीत व्यक्तिमत्त्व असले तरीही राजकारण-समाजकारणापासून विलग करून त्यांचे चित्र डोळ्यांसमोर उभे करता येत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती ही त्या-त्या काळाचे अपत्य असते. त्यामुळे तिच्यावर त्या काळात घडलेल्या राजकीय-सामाजिक घटनांचा आणि विचारांचाही प्रभाव असणे स्वाभाविक आहे. तिने वेगवेगळ्या गोष्टींबाबत भूमिका घेणेही स्वाभाविक आहे. बरेच लेखक-कलाकार आपली राजकीय-सामाजिक भूमिका काय आहे, हे उघड करणे टाळतात. किमानपक्षी भूमिका घेणे तरी टाळतातच. मात्र, पुलं त्यापैकी नव्हते. आपला जन्म शहरी मध्यमवर्गीय घरात झाला आणि आपली वाढ स्वातंत्र्य चळवळीच्या आणि गांधीजींचे नेतृत्त्व प्रस्थापित होण्याच्या काळात झाली, या त्या दोन गोष्टी पुलंनी वारंवार सांगितल्या आहेत. त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी सांगितले की, “महात्मा गांधी आणि साने गुरुजी यांचा पुलं देशपांडेंवर विशेष प्रभाव होता. दुसरी गोष्ट त्यांची पत्नी ही समाजवादाचा पुरस्कार करणाऱ्या ‘राष्ट्र सेवा दल’ या संघटनेची कार्यकर्ती होती. त्यामुळे या तिघांच्या प्रभावामुळे ते डाव्या आणि गांधीवादी विचारसरणीच्या बाजूला झुकणे स्वाभाविक होते. सुरुवातीची त्यांची कारकीर्द फारशी वैचारिक आणि तात्त्विक अशी दिसत नसली तरीही सुनीता देशपांडेंसोबत विवाह झाल्यानंतर त्यांच्या एकूण जीवन व्यवहाराला हाच विचार जवळचा वाटला.” पुढे ते म्हणाले की, “ते उत्तम कलावंत होते. त्याकाळी त्यांच्यातल्या कलेला उत्तम दाद या लोकांकडूनच मिळत होती. मात्र, त्यांच्या लिखाणातून गांधीवादी-समाजवादी अशी सगळीच मूल्ये पूर्णपणे उमटतात असे दिसत नाही. मात्र, त्यांनी आपल्या कलेतून उपलब्ध झालेले संचित या विचारांकरिताच दिल्याचे दिसून येते. जे आपल्याला करता येत नाही, ते ही मंडळी करत आहेत, तर त्यांच्यासाठी आपण इतके करू शकतो, असे म्हणून त्यांनी हा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येते.”


पु. ल. देशपांडे यांनी साने गुरुजी, विनोबा भावे, डॉ. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, नाथ पै, हमीद दलवाई, राम नगरकर, ग. दि. माडगूळकर इत्यादींचा गौरव केल्याचे दिसून येते. ही सगळी प्रामुख्याने गांधीवादी-समाजवादी-प्रागतिक विचारांचीच माणसे होती. मुस्लीम धर्मात सुधारणा व्हावी म्हणून ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना करणाऱ्या हमीद दलवाईंवर लिहिलेल्या एका लेखात पुलं म्हणतात की, “हमीदला केवळ मुसलमान स्त्रीचेच दु:ख जाणवले होते असे नाही; फक्त त्या स्त्रियांच्या यातनांची त्याला अधिक माहिती होती. त्या स्त्रियांच्या दु:खांना कुठे वाचाच फुटत नाही, ती फोडायला कुणी धजावत नाही याची त्याला खंत होती. वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्याला धर्म या नावाखाली चालणाऱ्या अज्ञानाच्या जोपासनेची आणि अन्यायांची जाण आली होती.” पुढे ते म्हणतात की, “हमीद गेला याचा अर्थ असले दुर्मीळ हात गेले. हमीद अनेक दृष्टींनी अकाली गेला. विरोधकांना त्याला हरवता आले नसते. एका दुर्धर रोगाने ऐन बहरात त्याचे जीवनपुष्प कुस्करून टाकले. या दु:खाबरोबरच भारताच्या जीवनात एक नवे क्रांतिपर्व सुरू होते आहे, अशा काळातले हमीदच्या निधनाचे दु:ख मनाला अधिक यातना देणारे आहे. केवळ मुसलमान समाजाचेच नव्हे, तर साऱ्या भारतीयांचे हे दु:ख आहे. आजवर या ना त्या पूर्वग्रहामुळे एकमेकांपासून दूर राहिलेले भारतातील सामाजिक आणि राजकीय चळवळीचे प्रवाह एकमेकांत मिसळण्याचा एक ऐतिहासिक क्षण आला आहे. अशा क्षणांना पकडून त्यांचे युग करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या हमीदच्या हातांसारख्या हातांची कधी नव्हती इतकी आज गरज आहे. ते सामर्थ्य आता हमीदच्या विचारांतून मिळवावे लागणार आहे.” (संदर्भ : ‘मैत्र’- मौज प्रकाशन गृह, मुंबई / हमीद : एक श्रेष्ठ प्रबोधनकार)

राजकारणावर सडेतोड मते
‘राजकारण आणि संस्कृती उत्तरार्ध’ या लेखात पुलं देशपांडे म्हणतात की, “वस्तुतः केवळ राजकारणी लोकांना सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रांत ढवळाढवळ करण्याचा काय अधिकार पोचतो! वैयक्तिक महत्त्वाकांक्षेच्या आहारी जाऊन ‘येन केन प्रकारेण’ निवडणुका जिंकणे व सत्तास्थाने काबीज करणे, हेच ज्यांचे ध्येय, त्यांना नीती-अनीती, धर्माधर्म, सुसंस्कृतपणा, रानटीपणा यांचे कसलेही सोयरसुतक नसते. निवडणुकांचे राजकारण हे केवळ निनैतिकच नसते, तर ते सर्व नैतिक, धार्मिक व सांस्कृतिक जीवनमूल्यांची पायमल्ली करणारे असते; ही गोष्ट आपल्या देशापुरती तरी आता सिद्ध होऊन चुकली आहे. सांस्कृतिक जीवनमूल्यांची भेसुर विटंबना करणाऱ्या या अशा राजकारणी लोकांकडे जनतेच्या सांस्कृतिक व शैक्षणिक विकासाची जबाबदारी राहू देणे म्हणजे सिद्ध होऊन चुकलेल्या पापाचरणाला अमरपट्टा बहाल करणे होय!”
इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाही आणि बाळासाहेब ठाकरेंच्या ‘ठोकशाही’लाही विरोध
१९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर पुलं देशपांडे त्या विरोधात सक्रिय भूमिका घेऊन उभे राहिले. कलावंताचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य त्यांना प्रिय होते. त्यामुळे त्यांनी आणीबाणीनंतर काँग्रेसविरोधात प्रचारच केला. तत्कालीन परिस्थितीत जसा विरोधी प्रचार त्यांनी काँग्रेसविरोधात केला अगदी तसेच महाराष्ट्रात हिंदुत्ववादी युतीचे सरकार असताना ते ‘ठोकशाही’वरही बोलले होते. “लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा ”लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो’ वगैरे बोलायला लागतात, तेव्हा माझ्यासारख्याला किती यातना होत असतील ते कोणत्या शब्दांत सांगू? ‘निराशेचा गाव आंदण आम्हासी’ ही संत तुकोबाची ओळ पुन्हा पुन्हा आठवायला लागते”, असे वक्तव्य पुलंनी केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हे वक्तव्य आवडले नव्हते. त्या दोघांमधील संबंध एरवी सलोख्याचे असले तरीही पुलंनी केलेल्या वक्तव्याविरोधात बाळासाहेब ठाकरेंनी केलेले वक्तव्यही चर्चेत आले. “झक मारली अन् पुलंना पुरस्कार दिला. आम्ही ठोकशाहीवाले तर आमचा पुरस्कार कशाला स्वीकारता?”, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. त्यांनी पुलंना ‘मोडका पूल’ असेही म्हटले होते. हिंदुत्ववादी विचारसरणीसोबत पुलंचे संबंध कसे होते, याबाबत बोलताना जयदेव डोळे यांनी म्हटले की, “सावरकर आणि देवल दोन हिंदुत्ववादी आणि संघपरिवारातील माणसं सोडली, तर या परिवाराला आपल्यापासून चार हात दूर ठेवणंच पुलंनी पसंत केले. सावरकरांना त्यांनी ऐकलेलं-पाहिलेलं होतं. महाराष्ट्रावर सावरकरांची भुरळ पडलेला तो काळ होता. आता आपल्याला उपलब्ध असलेले सावरकरांच्या कर्तृत्वाचे ऐतिहासिक वस्तुनिष्ठ मूल्यमापन त्या काळात झालेले नव्हते. त्यामुळे पुलं देशपांडे आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून एकाच वेळी साने गुरुजींच्याही प्रेमात होते आणि एकाच वेळी ते सावरकरांच्याही प्रेमात होते. कारण या दोघांच्या विचारातील विरोधाभास ७०-८० वर्षांपूर्वी मराठी समाजाला फारसा समजत नव्हता, तो पुलंच्याही स्वभावात आणि वागण्यातही दिसून येत होता.”

पु.ल. देशपांडे – प्रामुख्याने एंटरटेनर
१९४६-४७ च्या सुमारास साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून आंदोलन छेडले होते. त्यासाठी दहा दिवस प्राणांतिक उपोषणही केले होते. या उपोषणालाही पुलं देशपांडे यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. साने गुरुजींची भूमिका नाटक, पथनाट्य, वगनाट्याच्या माध्यमातून लोकांसमोर नेण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे कलापथक सक्रिय होते. या कलापथकाला लिहून दिलेले एक गीतही प्रचलित झाले होते. त्या गीताचे बोल असे होते,
हरिचे प्यारे हरिजन आम्ही आलों हरिचरणी
पंढरिराया राउळिं तुमच्या बसूं धरुन धरणीं ॥
चोखामेळ्याच्या भक्तिची शक्ती आम्हाला
मिराबाईचें घुंगुर चरणीं सखुच्या करताळा ||

साने गुरुजींबद्दल लिहिलेल्या ‘स्वप्न आणि सत्य’ या लेखात पुलं देशपांडे म्हणतात की, “गुरुजींच्या वाङ्मयात केवळ काव्यातलाच निसर्ग आहे असे नाही, त्यांनी विज्ञानाच्या उपासनेला फार महत्त्व दिले आहे. गुरुजींनी म्हटले आहे, ‘विज्ञानग्रंथांची भाषांतरे करा, तुम्हाला प्रतिशब्द मिळाले नाहीत तर ऑक्सिजनला ऑक्सिजन म्हणा; कार्बनला कार्बन म्हणा, पण विमाने उडतात कशी? आकाशापर्यंत लोक कसे जातात, हे मुलांना कळू द्या.”

पुलं देशपांडे यांनी चित्रपटात संत चोखोबांचीही भूमिका केली होती. व्यंकटेश माडगूळकर यांची कथा आणि ग. दि. माडगूळकर यांची पटकथा, संवाद आणि गीते असलेला हा सिनेमा १९५० साली ‘जोहार मायबाप’ आणि १९८१ साली ‘ही वाट पंढरीची’ या नावाने प्रदर्शित झाला होता. पुलं देशपांडेंनी समतेच्या आणि मानवतावादी चळवळीला नेहमीच सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी प्रसंगी राजकीय भूमिका घेण्यासही मागे-पुढे पाहिले नाही. देवा-धर्माबाबत वैयक्तिक जीवनात ते नास्तिक आणि निधर्मी होते. देवधर्म व कर्मकांडांत ते कधीही गुंतले नाहीत तसेच कोणत्याही माध्यमातून त्यांचा पुरस्कारही केला नाही. मात्र, तरीही विचारसरणीच्या भिंती ओलांडून ते संपूर्ण महाराष्ट्राचे ठरले. याबाबत बोलताना जयदेव डोळे म्हणाले की, “पुलं देशपांडे सर्वात आधी एंटरटेनर होते आणि एंटरटेनर माणूस हा विशिष्ट वर्गांसाठी काहीही करत नाही. त्यावेळी पुलंना शाहीर अमर शेख, आण्णाभाऊ साठे, शाहीर साबळे असे समकालीन लोक होते. एवढी तीन मोठी व्यक्तिमत्त्वे उघडपणे राजकीय विचारसरणी मांडत होती. त्या काळात दलित आणि बहुजन समाजामध्ये या तिघांचीही लोकप्रियता पुलंहून अधिक होती. मात्र, त्यांच्यासारखी थेट राजकीय भूमिका पुलं मांडत नव्हते. दुसऱ्या बाजूला एंटरटेनमेंट हाच त्यांचा पाया असल्यामुळे त्यालाही थेट राजकारणाचा पाया देणे त्यांना योग्य वाटले नसावे. शिवाय त्यांचा चाहतावर्ग हा ग्रामीण, शेतकरी, कामगार, कष्टकरी नव्हे तर शहरी मध्यमवर्ग होता. हा मध्यमवर्ग समाजवादी असो वा हिंदुत्ववादी असो, तोच त्यांचा चाहतावर्ग ठरला.”

विनायक होगाडे
लोकसत्ता 

Wednesday, June 26, 2024

पु. ल. आज तुम्ही हवे होतात. - (अविनाश चंदने)

पु. ल. देशपांडे यांचा जन्म हा देण्यासाठीच झाला होता. त्यांनी महाराष्ट्राला उत्तम साहित्य दिले, उत्तम संगीत दिले, सुंदर काव्य दिले, मराठीजनांना पोट धरून हसवले, सामाजिक संस्थांना न बोलता ओंजळी भरून दिले. गुणीजनांचे तोंडभरून कौतुक करण्याची ख्याती पुलंचीच! साहित्य, नाटक, चित्रपट, एकपात्री प्रयोग, संगीत मैफल या सर्वांवर त्यांची हुकूमत होती. पुलंनी प्रत्येक गोष्टीला चार चाँद लावले. आजच्या इंटरनेटच्या युगात पुलंचे सर्व साहित्य, त्यांचे प्रयोग यूट्यूबवर उपलब्ध आहेत. आजही त्याचा आनंद घेतला जात आहे. १२ जून रोजी पुलंचा २४ वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने या निर्लेप, सज्जन मनाच्या माणसाची ही आठवण.

गेल्या आठवड्यात रत्नागिरीहून माझ्या जुन्या मित्राचा मुलगा भेटायला आला होता. एसटीने आलो म्हणाला आणि डोळ्यासमोर उभी राहिली ती पुलंची ‘म्हैस’. मी त्याला हातखंब्याविषयी विचारले आणि अजूनही तिथे एसटीसमोर म्हैस आडवी येते का असे विचारले. त्याला काही कळले नाही, मात्र माझ्या चेहर्‍यावरचे हसू त्याच्या नजरेतून सुटले नाही. मग त्याने कारण विचारले. त्याला एकच उत्तर दिले, एकदा पुलंची ‘म्हैस’ ऐक नंतर मला विचार. लगेच त्यांनी यूट्यूबवर म्हैस शोधली आणि ऐकली. त्यानंतर पुलंचे बरेच एकपात्री प्रयोग पाहिले, ऐकले आणि एकदम खूश झाला.

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राला लाभलेले दैवी देणे होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अशीच त्यांची ओळख होती. साहित्य, संगीत आणि कला क्षेत्रात त्यांचा सिद्धहस्त वावर होता. त्यांना अख्खा महाराष्ट्र ‘पुल’ म्हणून ओळखतो आणि फिल्म इंडस्ट्रीत तसेच देशात ‘पीएल’ नावाने त्यांना हाक मारायचे. हे सांगण्याचे कारण म्हणजे पुलंना जाऊन दोन तपं झालीत. 12 जूनला पुलंचा 24 वा स्मृतिदिन आहे. 12 जून 2000 रोजी पुलंनी शरीराने हे जग सोडले, मात्र त्यांनी साहित्याची, कलेची, त्यांच्या संगीतप्रेमाची छाप कायमची अवघ्या मराठीजनांवर सोडली आहे. तिचा कधीही कुणाला विसर पडणार नाही. 

पु.ल. म्हटले की डोळ्यांसमोर सर्वात प्रथम येतात ती त्यांची ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील पात्रे. ज्यांनी पु.ल. देशपांडे वाचले आहेत तो माणूस हातखंब्याला आला की हमखास एसटीतून बाहेर डोके काढून बघणार! न जाणो एखादी म्हैस एसटीला आडवी येईल आणि मग उगाचच तीन-चार तासांचा खोळंबा येईल, मात्र तो खोळंबा सर्वांना हवाहवासा वाटेल. कारण त्यात बाबूतात्या, खादीवाले, उस्मानशेट, मास्तर, मुलस्ट्यांचा मधू, ती सुबक ठेंगणी या सर्वांच्या भेटी होतील. ही सर्व पात्रे पुलंनी रत्नागिरी ते मुंबई या एसटी प्रवासात अजरामर करून ठेवली आहेत.

पुलंचे आणखी एक असेच विशेष पात्र म्हणजे ‘नारायण’, जो सगळी कामे बिनदिक्कतपणे करतो आणि त्यानंतर नामानिराळा होतो तो नारायण. पुलंनी नारायणाला असा काही घडवला आहे की विचारू नका! काही वर्षांपूर्वी लग्नानिमित्ताने पुण्याला मुक्कामी होतो. सर्व काही सुरळीत सुरू होते आणि तिथला एकजण सारखी धावपळ करत होता. जणूकाही लग्नाची सर्व सूत्रे त्याच्या हातात दिली होती. हे पाहून एका पाहुण्याने मला विचारले, हे सद्गृहस्थ आहेत तरी कोण? नारायण, असे उत्तर माझ्या तोंडून नकळत बाहेर पडले. 

लग्नसोहळ्यात एखादी व्यक्ती अशी असते जिच्याशिवाय पानदेखील हलत नाही. तो ‘नारायण’ असे पुलंनीच म्हटल्याने नारायण अजरामर झाला. पुलंची सर्व पुस्तके गाजली. त्यांना कायम मागणी राहिली. या सगळ्यांत ‘व्यक्ती आणि वल्ली’ने अमाप लोकप्रियता मिळवली. ही पात्रे पुलंना खरंच भेटली होती का, असा प्रश्न सर्वांना पडतो. त्यावर ‘म्हटले तर भेटली आहेत, म्हटले तर नाहीत,’ असे उत्तर पुलंनी दिले होते.

पुराव्यानं शाबीत करीन म्हणणारे ‘हरितात्या’, ‘परोपकारी गंपू’, विलेपार्ले ते चर्चगेट हा प्रवास कधीही बसून न करणारा आणि बाबा रे तुझं जग निराळं आणि माझं निराळं म्हणणारा ‘नाथा कामत’, नुसतीच सोबत करणारा टेस्टलेस-कलरलेस-ओडरलेस ‘गजा खोत’, पोरगं तावडीत सापडलं की त्याला घासून पुसून जगात पाठवणारे ‘चितळे मास्तर’, बुद्धीजीवी ‘लखू रिसबूड’, बदनाम झालेला ‘बबडू’, बेळगावमध्ये वेव्हलेन्थ जुळलेले ‘रावसाहेब’, पावणेसहा फूट उंच आणि निळ्या डोळ्यांचा ‘नंदा प्रधान’, रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीतील लोकोत्तर ‘अंतु बर्वा’, प्राज्ञ मराठी बोलणारा ‘सखाराम गटणे’ ही आणि अशी अनेक पात्रे केवळ आणि केवळ पुलंनी जन्माला घातलीत आणि त्यांना चिरंजीव केले.

पुल केवळ साहित्यात रमले असे नाही तर ते संगीत, गायन, वादन, नाटक, चित्रपट अशा सर्व ठिकाणी त्यांनी उत्तम तेच दिले. जे उत्तम असेल, चांगले असेल त्याचे पुल कौतुक करायचे. नवोदितांना प्रोत्साहन द्यावे तर पुलंनीच. ‘वस्त्रहरण’ हे मच्छींद्र कांबळी यांचे नाटक सर्वांना माहीत आहेच. हे नाटक सुरुवातीला चालले नाही. पुलंनी ते पाहिले, त्याचे जाहीर कौतुक केले. त्यानंतर अख्खा महाराष्ट्र आजपर्यंत या नाटकाचे कौतुक करताना दमला नाही. ‘कोसला’ कादंबरीचेही असेच आहे.

पुलंनी ‘कोसला’चे जेवढे कौतुक केले तेवढे कदाचित कुणीही केले नसावे. विशेष म्हणजे ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे आणि पुलंचे फारसे कधी जुळले नाही, मात्र ‘कोसला’चे कौतुक करताना त्यांच्यातील मतभेद कधीही दिसले नाहीत. साहित्य, नाटक, संगीत, चित्रपट आणि हो माणसांत रमणार्‍या पुलंना महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. त्यांची पुस्तके, त्यांचे एकपात्री प्रयोग हे सर्व आजही मराठी माणसाच्या मनात घर करून आहेत.

1942 चा लढा असो किंवा 1977 चा आणीबाणीचा संघर्ष, पुलंनी लेखणी बाजूला ठेवून राजकारणात उडी मारली होती. तिथे त्यांनी अनेकांची भंबेरी उडवली होती, मात्र हेतू साध्य झाल्यावर राजकारणातून अंग बाजूला काढून ते पुन्हा लिखाणाकडे वळले. पुल ही व्यक्ती अगदी हटके होती. आताच्या जनरेशनला कदाचित ठावूक नसेल म्हणून पण भारतात दूरदर्शनचा पहिला कार्यक्रम सादर करण्याचा मान पुलंना मिळाला होता.

त्यासाठी त्यांना लंडनमध्ये ब्रॉडकास्टिंग आणि टेलिव्हिजनचे प्रशिक्षण देण्यात आले होते. दूरदर्शनमध्ये सर्वकाही उत्तम चाललेले असताना त्यांनी ते सोडले. पुल कधीही एका जागी स्थिर राहिले नाहीत. राज्याच्या साहित्य, कला, संगीत क्षेत्रासाठी पुलंचे एका जागी स्थिर न होणे जमेची बाजू ठरली. पुल सर्व क्षेत्रात वावरले म्हणूनच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ऐश्वर्यात आणखी मोठी भर पडली.

पुलंनी पन्नाशीनंतर म्हणजे 1970 च्या सुमारास बंगाली शिकण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी ते गुरुवर्यांच्या (रवींद्रनाथ टागोर) पश्चिम बंगालमधील शांती निकेतनमध्ये गेले होते. ते बंगाली नुसते शिकलेच नाहीत तर त्यांनी बंगाली भाषेवर प्रभुत्वही मिळवले होते. बेळगावमधील राणी पार्वतीदेवी कॉलेज, मुंबईतील कीर्ती कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. मालेगावमधील महात्मा गांधी विद्यामंदिराचे ते प्रमुख होते.

मुंबई, पुणे तसेच दिल्लीच्या आकाशवाणीत त्यांनी नोकरी केली. पुलंना काहीही वर्ज नव्हते. त्यांची नजर जिथे जायची त्यात ते पारंगत होत असत. असे असले तरी संगीत त्यांच्या नसानसात होते. पं. वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व आदींशी पुलंची खास मैत्री तर बालगंधर्व यांच्याविषयी त्यांच्या मनात हळवा कोपरा होता. संगीत मैफलीत पुल रमून जायचे.

पुलंची ‘वार्‍यावरती वरात’, ‘रविवारची सकाळ’, ‘बटाट्याची चाळ’ यांचे प्रयोग तर प्रेक्षकांनी उचलून धरले होते. यांचे प्रत्येक प्रयोग कायम हाऊसफुल्ल होत असत. पुलंनी त्या काळी चित्रपटसृष्टीही गाजवली होती. त्यातील ‘गुळाचा गणपती’ चित्रपटाला सबकुछ पुल म्हटले जाते. म्हणजे याची कथा, पटकथा, संवाद, गीते, संगीत आणि दिग्दर्शन पुलंनीच केले होते. विशेष म्हणजे चित्रपटाचे नायकही पुल होते. आता गंमत पाहा, हा चित्रपट खूप चालला, चांगली कमाई केली, पण दुर्दैवाची बाब ही की चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रणही नव्हते. तिकीट काढून पुलंनी तो चित्रपट पाहिला होता.

व्यवहारी जगात पुलांना अनेकांनी फसवले होते, मात्र पुलंनी कधीही कुणावर राग धरला नाही की फसवणूक करणार्‍यांना त्यांनी कधी कोर्टात खेचले नाही. एवढेच कशाला फसवणूक करणार्‍यांबद्दल कुणाजवळ वाईटही बोलले नाहीत. कारण पैसा ही त्यांची गरज नव्हती, तर पुलंची कमाई ही सामाजिक गरज होती.

पुलंनी कुठलाही गाजावाजा न करता समाजाला भरभरून दिले. पुस्तकातून दिले, प्रयोगातून दिले, कवितांच्या कार्यक्रमातून दिले आणि खिशातून न मोजताही दिले. अनेक सामाजिक संस्थांना पुलंनी कुठलीही वाच्यता न करता आर्थिक मदत केली. त्यांच्यासाठी कायमची आर्थिक तजवीजही केली. त्यांनी उजव्या हाताने केलेले दान त्यांच्या डाव्या हातालाही कळले नसेल इतके पुल निर्लेप आणि सज्जन मनाचे होते.

– अविनाश चंदने
९ जून २०२४
उप वृत्तसंपादक आपलं महानगर
मूळ स्रोत - https://www.mymahanagar.com/featured/saransh/pu-la-today-you-are-wanted/752763/

Tuesday, June 18, 2024

स्वरयात्री पु. ल. - (अमृता देशपांडे)

'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' पु. ल. देशपांडे हे जग सोडून गेले, त्याला आज २४ वर्षं पूर्ण होत आहेत. अष्टपैलू प्रतिभेचे धनी असलेल्या पुलंचं 'संगीतकार' हे रूपही अतिशय सुरेल होतं. त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी व पुलंच्या संगीतप्रेमाविषयी...

१२ जून २००० या दिवशी पुलंचं देहावसान झालं. त्या दिवशी पु. ल. देशपांडे नामक व्यक्तीचा मृत्यू झाला नव्हता, तर अवघ्या महाराष्ट्राचा साहित्य आणि संगीतातल्या अमूल्य आठवणींचा ठेवा स्वर्गातल्या देवांचं मनोरंजन करायला निघून गेला होता. त्यांनीच म्हटलंय, 'स्वर्गात गेल्यावर ब्रह्मदेव मला विचारेल, 'वत्सा पुरुषोत्तमा, विनोदाचं भांडवल देऊन मी तुला पृथ्वीवर पाठवलं ते तू कुणाकुणाला दिलंस?' तेव्हा मी उत्तर देईन, 'मी कुणाला काय दिलं याचा हिशेब ठेवत नाही; पण तमाम मराठी माणसांनी मला आपलं अनमोल हास्य दिलं; हे मी कधीही विसरणार नाही !'

अजूनही मराठी रसिकांचा दिवस 'इंद्रायणीकाठी देवाची आळंदी' या भजनानं किंवा 'कबिराचे विणतो शेले' अशा गाण्यांनी होतो, तर 'दूर कुठे राऊळात दरवळतो पुरिया...', 'सख्यांनो करू देत शृंगार' ही गाणी ऐकण्यानं एखादी संध्याकाळ फुलून येते. कधी जीवनातल्या अवघड वळणावरून जाताना 'माझे जीवनगाणे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मी जाणे' अशी त्यांनी संगीत दिलेली गाणी जगण्याचा धीर आणि जीवनातला आनंद देऊन जातात. 'शब्दावाचून कळले सारे'सारखी अत्यंत तरल चालीची गाणी प्रेमातल्या पूर्णत्वाचा आश्वासक आनंद देऊन जातात. पुलंच्याच शब्दांत 'कशासाठी जगायचं, तर संगीत ऐकण्यासाठी जगायचं' हा जीवनाचा हेतू देऊन जातात.

विनोदी लेखक, नाटककार, कथाकार, पटकथाकार, अभिनेते म्हणून पु. ल. महानच होते. उभ्या महाराष्ट्राला त्यांनी हसवलं. त्या पुलंचा मला अतिशय भावणारा गुण म्हणजे त्यांच्यातला सूरग्राही संगीतज्ञ... गायक, वादक आणि संगीतकार !

त्यांना लहानपणापासूनच सुरांची विलक्षण ओढ होती. लहानपणच्या अगदी पुसट आठवणींबद्दल बोलतात, तेव्हा ते प्रसंगांपेक्षा सूरांचींच आठवण अधिक असल्याचं सांगतात. त्यांची आई खूप चांगली पेटी वाजवत असे आणि आजोबा कीर्तनकार होते. त्यांच्या घरात गाणं-बजावणं कायम होतंच. आवाजाच्या आणि सूर-लयीच्या ओढीबद्दल ते म्हणतात, 'ज्या काळात लहान मुलांचं लक्ष प्रसादाच्या खिरापतीकडे असतं, त्या काळात माझं लक्ष कीर्तनकाराच्या कथेमधे आणि अभंग, श्लोक, आर्या यांच्यामधे असायचं.' वयाच्या अगदी आठव्या दहाव्या वर्षापासून त्यांनी बालगंधर्व, बाई सुंदराबाई, सवाई गंधर्व, मास्टर कृष्णराव, हिराबाई बडोदेकर, फैयाझ खाँ, मल्लिकार्जुन मन्सूर यांचं गाणं ऐकलं. या सगळ्यांच्या गाण्याचे सूर त्यांच्या मनात आणि हृदयात घट्ट वसले होते. त्यांच्याच वयाचे असणारे पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याशी त्यांची मैत्री आजन्म राहिली. त्यांच्या मैत्रीतली एकतानता 'इंद्रायणीकाठी', 'ही कुणी छेडिली तार...' अशा अनेक गाण्यांतून दिसते.

पुलंना सगळ्या प्रकारची गाणी आवडायची. नाट्यगीतं तर ते अगदी समरस होऊन गायचे. बालगंधर्वांवर पुलंचं निरतिशय प्रेम. त्याबद्दलचे अनेक किस्से आहेत. लहानपणी ते पेटी शिकायला दत्तोपंत राजोपाध्ये मास्तरांच्या क्लासला जात असत. त्यांच्या क्लासचं स्नेहसंमेलन होतं. त्याला अध्यक्ष म्हणून प्रत्यक्ष बालगंधर्व आले होते. त्यांच्यासमोर अकरा वर्षांच्या पुरुषोत्तमानं पेटीवर त्यांचीच नाट्यगीतं वाजवायला सुरुवात केली; तसे बालगंधर्व खुर्चीवरून उठून पुलंच्या समोर येऊन बसले आणि भरभरून आशीर्वाद दिले. बालगंधर्वांची गायकी पुलंनी आयुष्यभर आपल्या हृदयात साठवली.

लेखक व्हायच्या आधी पुलंना गायकच व्हायचं होतं. ते संपूर्ण महाराष्ट्रभर गाण्याचे कार्यक्रम करीत असत. पुढं वसंतरावांची आणि पुलंची ओळख झाली. पु. ल. वसंतरावांसमोर गायले. वसंतरावांनीही पुलंच्या गाण्याचं कौतुक केलं; पण वसंतरावांनी आपली गायकी पेश केली, तेव्हा आपण काहीच नाही असं वाटून पुलंनी गाणं म्हणणं सोडून दिलं. आयुष्यभर पेटी वाजवली अन् गाण्यांना संगीत दिलं. वसंतरावांच्या गाण्याबद्दल पु. ल. म्हणतात, 'वसंताची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवणारी नाही. ती दऱ्याखोऱ्यांतून बेफाम दौडत जाणाऱ्या घोडेस्वारासारखी आहे.'
        
पेटी वाजवण्याबरोबरच अभिनय, नाट्यलेखन, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण आणि फार काय; पण त्यांनी तमाशाही लिहिला आहे. हे सगळं एकच माणूस करतो, हे आजच्या 'स्पेशलायझेशन'च्या पिढीला खूप आश्चर्यकारक वाटण्यासारखं आहे. याबद्दल ते म्हणतात, 'एक विदूषक, एक गायक आणि एक लेखक माझ्यामध्ये लहानपणापासून दडलेला आहे. यांच्यापैकी कोण केव्हा उसळी मारून वर येईल काही सांगता येत नाही.' त्यांनी रेडिओ आणि 'दूरदर्शन'मध्ये नोकरी केली. त्यानिमित्तानं देशाभरातल्या अक्षरशः शेकडो संगीत कलाकारांशी त्यांची चांगलीच गट्टी जमली. संगीतप्रेमी मंडळींशीही स्नेह जुळला. तिथंच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं विपुल संगीत ऐकलं. पुलंना कोणतंही गाणं वर्ज्य नव्हतं. याबद्दल त्यांनी एका ठिकाणी खूप सुंदर लिहिलं आहे. ते म्हणतात, 'मी सूर-तालाचा लोभी आहे. त्या लोभात सारंगीही आहे आणि एकतारीही आहे. मृदंगही आहे आणि ढोलकीही आहे. कपाळभर आडवं गंध लावलेला धृपद धमार आहे आणि डोळ्यात सुरमा घातलेली गझलही आहे...'

किती रसिकतेनं लिहिलं आहे हे! पुलंनी संगीत दिलेली गाणी आजही आपल्या मनात ताजी आहेत. त्यात ज्योत्स्नाबाई भोळेंनी गायलेलं पहाटेचं चित्रमय वर्णन करणारं 'झाली पहाट झाली पहाट' हे गाणं, मागच्या अनेक पिढ्यांनी ज्या गाण्यावर ठेका धरला ते आशा भोसलेंच्या आवाजातलं 'नाच रे मोरा नाच' आहे, तर माणिक वर्षांनी गायलेलं खट्याळ चालीतलं 'हसले मनी चांदणे'ही आहे. या गाण्यांच्या आठवणीही अत्यंत रमणीय आहेत. एकदा गदिमा आणि पु. ल. रस्त्यानं जात होते. तेव्हा गदिमांनी पुलंना आपल्याला ते रागविग काही कळत नसल्याचं म्हटलं आणि 'केदार राग कसा असतो,' असं विचारलं. त्यावर पुलंनी उत्तर दिलं, 'समोर प्राजक्ताचं डवरलेलं झाड दिसतंय ना तोच केदार!' क्या बात है! गदिमाही काय समजायचं ते समजून चुकले आणि एक गीत त्यातून तयार झालं, 'ही कुणी छेडिली तार, प्राजक्ताच्या मधुगंधासम कुठुनी ये केदार...' या गाण्याला पुलंनी केदार रागातच चाल दिली !

एक विशेष गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे पुलंनी 'बिल्हण' या मूळ संस्कृत नाटकाचं मंगेश पाडगावकरांना मराठीत रूपांतर करायला सांगितलं. मंगेश पाडगावकरांनी ही सांगीतिका - लिहिली. त्याला पुलंनी संगीत दिलं. ही सांगीतिका आकाशवाणीवर दोनदा प्रसारित झाली. एकदा किशोरी आमोणकर आणि पं. भीमसेन जोशी यांनी गायली, नंतर पं. जितेंद्र अभिषेकी आणि किशोरी आमोणकर यांनी गायली. त्यात शोभा गुर्टू, रामदास कामत आणि पं. हरिप्रसाद चौरसिया असे अनेक मातब्बर कलाकार होते. या सगळ्यांची मोट पु. ल.च बांधू शकतात. याच्या रेकॉर्डिंग आता फारशा उपलब्ध नाहीत. त्यातलं एकच अप्रतिम गाणं 'सात समुद्रापलीकडून विहंगाला......' ऐकायला मिळतं. पुलंच्या अशा अगणित आठवणी आहेत. हा आपल्याला मिळालेला अमूल्य ठेवा कितीही वाटला तरी न संपणारा आहे. पुलंच्याच शब्दात सांगायचं म्हटलं, तर 'आपलं संगीतच मुळात चिरतरुण आहे'. म्हणूनच पुलंची आठवण आल्यावर मागच्या संपूर्ण शतकाचा संगीतपट व डोळ्यासमोर उभा राहतो, डोळ्यांच्या कडा ओलावतात आणि टागोरांच्या कवितेतल्या ८. त्यांच्याच ओळी, त्यांच्याच आवाजात मनात निनादत राहतात...

हसेन खळखळ, गायीन कलकल
धरुनी ताल मग टाळी देईन,
माझ्यापाशी कथा किती तरी,
गाणी किती तरी,
प्राणांची अन शक्ती किती तरी..
सुखे किती, अनंत ऊर्मी,
मम जीवाची कोण उभारी...


अमृता देशपांडे
संपर्क क्रमांक - ९६८९९४७०१४
(लेखिका संगीत अभ्यासक आहेत.)
महाराष्ट्र टाईम्स
१२ जून २०२४

Monday, June 17, 2024

एक चाळीशी.. हवीहवीशी - (प्रेरणा कुलकर्णी)

गेल्या आठवड्यात पुलं चा स्मृतिदिन होता त्यानिमित्त हा लेख. कितीतरी महिने हे डोक्यात घोळत होतं. आज त्याला शब्दरूप देता आलं. पुलं च्या स्मृतीस त्रिवार वंदन!

गेल्या दोन तीन वर्षांपासून मला एका गोष्टीचं अत्यंत कुतूहल वाटतंयं. काळा जाड्या फ्रेमचा चष्मा आणि अर्थात त्यामागील ते मिश्किल, प्रेमळ, आणि हसरे डोळे.. म्हणजे इतकं की तुम्हाला काय व्हायला आवडेल असा एखादा निबंधाचा विषय दिला तर माझा विषय अगदी पक्का- तो जाडा काळा चौकोनी चष्मा किंवा त्यापलीकडची ती दृष्टी.. ती जादुई नजर. तसं तर आपल्या सगळ्यांनाच रोज शेकडो लोकं दिसत असतात. मुंबई सारख्या महानगरात राहत असू, लोकलने जात असू तर तोच आकडा हजारावरही जाऊ शकतो.

ही लोकं, काही अत्यंत कंटाळवाणी अगदी टाळू वाटावी अशी तर काही महाभयंकर अगदी चार हात दूर राहाव अशी, काही रागीट तर काही अतिप्रेमळ, काही बेफिकीर, तर काही बेरकी, काही भोळसट तर काही परोपकारी तर काही चाकोरीबद्ध जीवन जगणारी. हातावर पोट असणारी, दोन पैसे गाठीशी बाळगणारी, ऋण काढून सण साजरा करणारी, पोटाला चिमटा काढून पै न पै साठवणारी. अशी नाना प्रकारची, नाना स्तरावरची, आपणही त्यांच्याशी कधी हसतो, बोलतो, चिडतो, टाळतो, दुर्लक्ष करतो, प्रेम करतो, द्वेष करतो, कौतुक करतो किंवा क्वचित कधी थोडी असुयाही बाळगतो.

आपण अगदी सामान्य माणसं, म्हणजे सूर्योदय किंवा सूर्यास्त बघितला म्हणजे काही लगेच आपल्याला कविता स्फुरणार नाही, की झाडाखाली बसलो म्हणून न्यूटन सारखे शोध लागणार नाहीत, किंवा परिस्थितीने चटके दिले वा प्रेमात पडलो म्हणून लगेच कादंबरी लिहायला सुचणार नाही. तेथे पाहिजे जातीचे. या लेखक, कवी, नाटककार मंडळींचं आपल्यापेक्षा सगळंच वेगळं. पण तरी त्यातही डावं उजवं असतंच नाही? म्हणजे बघा अगदी कितीही श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लेखक म्हंटला तरी त्यांची काही पुस्तकचं लोकप्रिय होतात.. त्यातही एखादी लेखांची पुस्तकांची मालिका लिहिली की त्यातील एखादे पात्र अजरामर होणार.

पण मग असा एखादा अवलिया, ज्याच्या एका पुस्तकात त्याने वीसेक पात्र तरी खुबीनं रंगवलीयेत आणि ती सगळी लोकप्रिय झालीयेत. आणि हे असं एखादच पुस्तक नाही तर कितीतरी पुस्तकं, नाटकं, कलाकृती.. आणि त्या प्रत्येक कलाकृतीतली अनेक पात्र, व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्यात नव्हे तर अजरामर झाल्यात. इतक्या की नंतरच्या तिसऱ्या, चौथ्या पिढीलाही एखादा शब्द किंवा वाक्य त्यांच्या कुठल्या पुस्तकातील कुठल्या पात्राच्या तोंडी होत हे अगदी तत्परतेनं सांगता येतं. बरं ती पात्र किंवा व्यक्ती रेखाही काही शूरवीर राजे महाराजे, किंवा अमानवी शक्ती असलेले जादूगार किंवा देवदूत नाहीत तर अगदीच सामान्य किंवा अतिसामान्य माणसं… परिस्थितीचे तडाखे सोसलेली, जनरीतीच्या रहाट-गाडग्यात फिरणारी तुमच्या आमच्यासारखीच सुख दुःख असलेली.. किंबहुना
कदाचित ती तशी होती म्हणूनच ती इतकी लोकप्रिय झाली असावीत का?

आपल्या भोवती चालणाऱ्या कोलाहलातून, गराड्यातून, माणसांच्या जत्रेतून छोटे छोटे बारकावे, त्यांच्यातील नातेसंबंध, देवाण-घेवाण टिपणारे, त्यांच्या लकबी, लय, ढब, शब्दफेक, चढउतार हेरणारे ते ठसठशीत काळ्या जाड्या फ्रेममागचे ते मिश्किल डोळे. वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षांपासून पुलंना ऐकायला, वाचायला सुरुवात केली, तेव्हापासून ते वेगवेगळे कळत गेले, उमजत गेले. अर्थात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ते ते उमजणं, आवडणं वेगळं होतं. शालेय किंवा महाविद्यालयीन दिवसांत त्यातला विनोद, कोपरखळ्या, गोष्टीवेल्हाळता ह्यांनी वेड लावलं.
पुढे नोकरी, संसार सुरु झाल्यावर त्यातील व्याप, ताणतणाव विसरायला लावून काही क्षण हसायला लावणारा तो एक हलकासा विरंगुळा झाला. चाळीशीच्या आसपास अजून आयुष्य, माणसे बघितल्यावर, त्यांचे अनुभव घेतल्यावर त्या विनोदामागचे कारुण्य, टोकदारता, विसंगती जाणवू लागली आणि तीच विसंगती, विक्षिप्त माणसे किंवा त्यांचे स्वभाव, परिस्थिती मग आपल्या स्वतःच्या आयुष्यात आल्यावर बसणारी तिची झळ जराशी सुसह्य होत गेली.
वाचता वाचता कधीतरी छोटे मोठे अनुभव, मनोगत लिहायला लागल्यावर मग मात्र पुलं च श्रेष्ठत्व, वेगळेपण अजूनच भावत गेलं. कारण त्यांची एक एक कलाकृती, आणि त्यात चपखल बसणारी ती पात्रं.

आता हेच बघा ना..
असामी असामी मधे फक्त ४०-५० च्या दशकातला कारकुनी करणारे धोंडोपंत जोशीच रंगवले नाही तर त्यांचं पूर्ण कुटुंब, कॉलनीतील, चाळीतील माणसे, कचेरीतील सहकारी, त्यावेळची मुंबई, आणि अर्थात सरोज खरे .. आपली .. सगळं सगळं चित्र शब्दसामर्थ्यावर उभं केलय. तीन मजली बटाट्याची चाळ त्यातील अनेक बिऱ्हाडकरुंसकट इतकी सुंदर रंगवलीये की चाळसंस्कृती कधीही न अनुभवलेला, पाहिलेला वाचक/ श्रोताही त्यात रंगून जातो.
व्यक्ती आणि वल्ली म्हणजे तर एक खजिनाच आहे. नावाप्रमाणेच अनेक वल्ली तुम्हाला भेटतात अगदी कडकडून.
त्यात उच्चभ्रू नंदा प्रधान, साठाव्या दशकात मराठी कुटुंबियांच्या घरात सर्रास आढळणारा नारायण, गुलछबू नाथा कामत, बेरकी नामु परीट, अभ्यासातील किडा सखाराम गटणे, भोळसट गज खोत, परोपकारी गंपू, इरसाल पण तरीही हतबल असा अंतू बर्वा, उच्चमध्यमवर्गीय सरळमार्गी गुळगुळीत ते चौकोनी कुटुंब, नगण्य तरीही विक्षिप्त असा मिडिऑकर लखू रिसबूड, मिश्किल खट्याळ पेस्तनकाका - काकी, स्वतः मुखवटा घालून दुनियादारी करणारा आणि अंतर्मुख व्हायला लावणारा ‘तो’.

सुंदर मी होणार मधील दीदीराजे, बेबी राजे किंवा तुज आहे तुजपाशी मधील जिंदादिल काकाजी, कठोर आचार्य किंवा ती फुलराणी मधील फुलराणी, प्राध्यापक किंवा रविवार सकाळ मधील एकेक हरहुन्नरी चाळकरी, मालू, तिच्या उच्चभ्रू मैत्रिणी किंवा वार्यावरची मधील गावातला महाबेरकी साक्षीदार, टुरिंग टॉकिज दाखवणारे गावकरी, स्वागत समारंभातील मान्यवर .. केव्हढा मोठा तो स्पेक्ट्रम! जिथे एका लेखकाला एक पात्र तयार करून ते लोकांच्या मनावर ठसवायला फक्त एक पुस्तक नाही तर पुस्तक मालिका कराव्या लागतात.

तिकडे एका नाटकात, पुस्तकात असणारी अनेक पात्रे त्यांच्या संवादासह प्रेक्षकांच्या, वाचकांच्या मनावर राज्य करतात आणि पुस्तक/ नाटक संपल्यावरही हलकेच मनात त्यांची सोबत करत राहतात.. अगदी काही दशकांपूर्वीच्या काळातील त्या व्यक्ती अगदी ह्या काळातही त्यांना भेटत राहतात.. खरंच अगदी अद्भुत वाटतं सारं! म्हणूनच ते इंग्रजी मध्ये म्हणतात ना ‘अ फ्लाय ऑन द वॉल’ अगदी तसच त्या चष्म्यात बसून त्यांना काय काय आणि कस कसं दिसतं ते बघत राहावं .. अगदी तासनतास .. दिवसेंदिवस .. वर्षानुवर्षे पण म्हणजे आत्ता नाही हं कित्येक दशकं मागे जाऊन अगदी पार ६०च्या दशकापासून!
- प्रेरणा कुलकर्णी

Saturday, November 18, 2023

मी आणि पु.ल. - (सई ललित)

मी आणि पु.ल आमच्यामधे एक सहृदयतेचा पुल मी दहा बारा वर्षाची असताना बांधला गेलाय.तो एवढा मजबूत आहे की मी मरेपर्यंत तो टिकेलच.पण त्या पुलावरुन माझी मुलं नातवंडं पण आरामात आवडीने जातील .याची खात्री वाटते. कदाचित पुढच्या पिढीचं वाचन कमी होईल.

कारण त्यांची त्रोटक वाचायची सवय डेव्हलप झालीय. मग त्यासाठी पुलंच्या आॕडीओ कॕसेट आहेत.व्हिडीओ आहेत.ते इतके सुंदर आहेत की आपल्याला वेगळ्या काळात खेचून न्यायचं सामर्थ्य त्यांच्या मधे आहे.

मी तर पुल वाचायच्या आधी त्यांच्या कॕसेटच (अलुरकरांच्या ) ऐकल्या होत्या . एवढा प्रसन्न खेळकर चतुर मिस्कील बावळट भासणारा विनोदी माणूस मी पहिल्यांदाच कानांनी बघत होते. मग दहावीला असताना बटाट्याची चाळ मधला एक लेख भ्रमणमंडळ धडा म्हणून अभ्यासाला आला.तो शिकवत असताना (माझी आईच दहावीला मराठी शिकवायची ) आम्ही सर्व जण वर्गात किती हसलो होतो.


माझे बाबा अत्यंत कडक शिस्तीचे होते.सार्वजनिक जीवनात ते दिलखुलास असले तरी घरी बडबड त्यांना चालायची नाही. त्यांनीच नवीन टेपरेकॉर्डर आणि ह्या कॕसेट त्या काळी आणल्या होत्या .ही गोष्ट मला महान आश्चर्याची वाटली होती.आणि बाबा त्यातले विनोद ऐकून उघडपणे हसत होते.ते बघून शोले मधला गब्बरसिंग हसल्यावर जसे बाकीचे दरोडेखोर सावकाशीने घाबरत घाबरत हसतात तसे आम्ही हसलो होतो.हे बघून आईला पण हसु आवरत नव्हतं ! मग हळुहळु भीड चेपत गेली.बाबांना पुल आवडतात म्हटल्यावर पुलं बद्दलचा आदर सहस्त्र पटीने वाढला.कारण पुलं मुळे आम्ही घरात मोठ्याने हसु शकलो.

काॕमेडीचं एक वेगळं दालन कॕसेटच्या रुपात खुलं झालं .( बाय द वे अंध मुलांच्या शाळेत या आॕडीओ कॕसेट लावल्या जातात का ? नसतील तर जरुर लावाव्यात.) अजूनही घरात काही कॕसेटी असतील.पोटात लांबलचक आतडी असलेल्या या कॕसेटी तेव्हा घरोघरी दिसायच्या.मधेच ते आतडं बाहेर पडायचं मग आम्हीच ते सर्जन होवून हिराने नीट आत ढकलायचो. आमची सर्जनशीलता अशी बहराला यायची.

पुलं बरोबरच वपु काळे होते. शिवाजीराव भोसले होते.ते पण ऐकायला आवडायचे.पण पुलंची जादू वेगळीच होती.घरेलु प्रसन्न वातावरण त्यात खेळत असायचं. एकतर त्यांना नेहमी सोताकडे कमीपणा घ्यायची सवय.त्यामुळे चला हा माणूस आपल्या सारखाच आहे.असं तेव्हा वाटायचं .आपुलकी वाढीस लागली होती.आता कळतय ते बावळट नव्हते आणि नाहीत.पण फार व्यवहाराने किंवा काटेकोरपणे जगणे त्यांच्यातल्या माणसाला अवघड जायचं . असं जगून आपण काय साधणार हा त्यांचा साधा विचार असावा.

लबाड, ढोंगी, स्वार्थी ,उथळ ,कद्रु ,दिखावू ,मत्सरी, आपलं तेवढं साधून घेणाऱ्या अति शहाण्या माणसांना ते ओळखून होते. नाही असं नाही.पण त्यांना उघडं पाडणं त्यांच्या जीवावर यायचं. या अर्थाने ते आळशी होते.कारण एकदा वैर पत्करलं की ते झक मारत जोपासत ठेवावं लागतं. डाव प्रतिडाव, शह प्रतिशह लय राबणूक असते. त्यापेक्षा साधी माणूसकी जोपासायला सोपी. हिणकसपणाची कलाकुसर करावी लागत नाही.

शिवाय आपल्या समोर कुणाचा चेहरा पडलाय..किंवा आपल्या मुळे कुणाची मानहानी झालीय , कुणी तोंड फिरवलय ही गोष्ट त्यांना अजिबात रुचायची नाही. या बाबतीत मी अगदी पु.लं.सारखीच आहे.
काही माणसांना मात्र दिवसातून चार माणसांचे तरी धडधडीत अपमान केल्याशिवाय..आणि दहा एक माणसांचे चेहरे पाडल्या शिवाय अन्नच गोड लागत नाही.आणि त्यालाच ती आपली बुध्दीमत्ता समजतात.
ज्याला ज्यात आनंद आहे ते करुदेत. आपण मात्र त्यांच्या पासून लांब राहायचे. कदाचित असल्या माणसांशी डावपेच खेळत राहण्यापेक्षा तो वेळ साहित्य ,नाटक , गाणं बजावणं यात सत्कारणी लावावा असा त्यांचा विचार असावा.
     
पुलंचं आणि माझं एक महत्वाचं साम्य म्हणजे माझे पुढचे दोन दात सेम पुलं सारखे आहेत. आम्हाला खाण्या विषयी असलेली आवड..म्हणजे केवळ पदार्थ खाण्याविषयी नाहीतर पदार्थ करण्याचं जस्ट मनात आल्या पासून ते खिलवण्या पर्यंतचे सर्व प्रकारचे सोपस्कार..वगैरे वगैरे आणि वगैरे.

पुलंना विनोदी लेखन करायला खूप आवडायचं.ते करताना त्यांच्या मनावर कसलाही ताण नसायचा.ते अगदी सहज असायचं .माझं सुध्दा अगदी सेम असं..असं म्हणण्याचा मी महाआगावूपणा करणार नाही. पुलं जबरदस्त परफाॕर्मर होते..हा गुण त्यांना इतर विनोदी लेखकांपेक्षा श्रेष्ठ ठरवतो. मला सर्वात जास्त कौतुक वाटतं ते त्यांच्या हार्मोनियम वादनाचं संगीत प्रेमाचं आणि अभ्यासाचं.लहानपणी खूप संगीत ऐकून ऐकून आपोआप अभ्यास झाला असं ते म्हणतात .पण तो नुस्ता अभ्यास नाही..रसिला अभ्यास आहे.अभ्यास म्हटलं की एक प्रकारची रुक्षता निदान मला तरी जाणवते.ती यात दिसत नाही .एका रसिक आनंदाची निर्मळ देवाणघेवाण यात दिसते. वादक लोक न बघता पेटी वाजवतात याचं मला कमालीचं आश्चर्य वाटतं !आम्हाला दोन डोळे सताड उघडे ठेवले तरी धोंडे काय वाजवता येत नाही. त्यात पुल पट्टीचे सुरेल वाजवणारे..!संगीताची आवड ज्ञान आणि त्यांना अवगत असलेली कला यामुळे त्यांना आयुष्याचा आनंद शतपटीने घेता आला.

खरोखरच ही दैवी प्रतिभाच होती. पुलंच्या साहित्याचं जर पारायण केलं तर तत्वज्ञानाची वेगळी पुस्तकं वाचायला नकोत. पुलंची पुस्तकं एक प्रकारे मानसिक समाधान वाढवणारी आहेत. पुलं वाचलेला पचवलेला माणूस आत्महत्या करुच शकत नाही.हे त्यांच्या साहित्याचं सर्वात मोठं योगदान आहे. आणि म्हणून..मानसोपचाराचा भाग म्हणून त्यांची पुस्तकं नियमीत अभ्यासाला लावली पाहिजेत..असं माझं आपलं अभ्यासू मत आहे.

- सई ललित

Wednesday, March 1, 2023

आठवणीतील पु.ल. - मंगेश पाठक

पुलंच्या निधनानंतर साहित्य किंवा चित्रपटसृष्टी- प्रमाणेच आणखी एक मैफल सुनी झाली. ती साहित्यिक गप्पांशी किंवा वाङमयीन वैशिष्ट्यांशी संबंधित नाही, पुलंच्या धमाल विनोदी नाटकांशीही संबंधित नाही. ही मैफल आहे कायमस्वरुपी स्मरणात राहणाऱ्या पुलंच्या फिरक्यांची ! वेळोवेळी संधी मिळेल तिथे पुलं हास्याची कारंजी फुलवायचे. त्यांच्या धमाल विनोदांमुळे आणि कोट्यांमुळे छोट्या वाटणाऱ्या अनेक गाठीभेटीही अविस्मरणीय झाल्या. प्र. के. अत्रे एकदा एका अंत्ययात्रेला गेले तेव्हा तिथले गंभीर वातावरणही बदलले. तशा वेळी अवघड परिस्थितीतही हास्यतुषार उडू लागले अशी आठवण सांगतात. पुलंबाबत असं घडल्याचं ऐकीवात नसलं तरी त्यांच्या मृत्युच्या बातमीनंतरही त्यांचे सुहृद अशा किस्स्यांबाबत आवर्जून बोलले. दुःखावेग आवरत त्यांनी अशा किस्स्यांना वाट मोकळी करुन दिली. कारण हे केवळ किस्से नव्हते तर त्यात अस्खलित विनोदबुध्दी आणि उच्च श्रेणीचा हजरजबाबीपणा यांचा मिलाफ होता. कदाचित म्हणूनच एका डोळ्यातून आसवं वाहताना दुसरा डोळा ठराविक प्रसंग समोर उभा करून विनोदात रमताना दिसत होता.

पुलंबाबत एक आठवण सांगितली जाते. आयुष्यातलं पहिलंच भाषण करताना बाल्यावस्थेतील पुलं नेमक्या क्षणी अडखळून बसले. त्यांचं भाषण पुढे सरेना. परिणामी बोबडी बंद झाली. पण वेळ मारुन न्यायचे आणि हजरजबाबीपणाचे बाळकडू त्यापूर्वीच त्यांना मिळाले असावे. म्हणून तर 'आता माझी दूध घ्यायची वेळ झाली' असा बहाणा करत पुलं तिथून निघून गेले. पुलंच्या व्यक्तिमत्वापासून तसूभरही दूर न करता येण्याजोग्या अशा किस्स्यांची कमतरता त्यांच्या साहित्यिक मित्रांना कधीच जाणवणार नाही. ज्येष्ठ समीक्षक बापू वाटवे यांनी असाच किस्सा कथन केला होता. बापूंचा पुलंशी जवळचा परिचय होता. त्यांना पुलंच्या घरी जाण्यासाठी कधीच परवानगी लागायची नाही. एकदा बापू असेच गणांगण रंगवण्यासाठी पुलंच्या घरी पोहोचले. पुलं झोपले असतील किंवा विश्रांती घेत असतील असा त्यांचा अंदाज होता. कारण त्या सुमारास त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची चर्चाही सुरु होती. बापूंनी दबकतच त्यांच्या घरी पाऊल ठेवलं आणि पाहतात तो काय, पुलं एका हातात पेटीचा भाता ओढत गायन- वादनात रमले होते. हे दृश्य पाहून बापूही चक्रावले. विनाविलंब पुलंच्या मैफलीत सहभागी होत त्यांनी कौतुक सुरू केलं. शेजारीच भरपूर उकडलेल्या शेंगा होत्या. त्या रसरशीत शेंगांची चव चाखत बापूंनी संगीताला दाद द्यायला सुरूवात केली. बराच वेळ ती मैफल रमली. मैफल संपताच बापू म्हणाले, 'वा भाई, छानच पेटी वाजवली. या वादनाचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर लोकांना पैसे मोजावे लागतात. मी तर फुकटातच आनंद घेतला'. बापूंचं बोलणं ऐकून शांत बसतील ते पुलं कसले ? एक क्षणही न गमवता त्यांनी विचारलं, 'फार वाईट वाटतंय का ? तसं असेल तर पाच-पंचवीस रुपये देऊन टाक!' पुलंच्या या मल्लिनाथीनंतर उपस्थित हास्यसागरात बुडून गेले.

असाच आणखी एक किस्सा बापूंनी रंगवला होता. पुलंच्या आजाराविषयी सर्वत्र चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना काळजी वाटू लागली. जवळचे मित्र अनेक डॉक्टरांची आणि उपचारपध्दतींची माहिती देऊ लागले. पण दूरदूरचे काही हितचिंतकही पुलंकडे गर्दी करु लागले. त्यांना नव्या आणि वेगळया उपचारपध्दतींविषयी माहिती देऊ लागले. अशाच एक बाई पुलंना भेटायला आल्या. त्या सुमारास 'रेकी'ची बरीच चर्चा होती. या उपचारपध्दतीचा पुलंना फायदा होईल असं वाटल्याने ती "बिचारी बाई लांबून आली होती. पुलंकडे बराच वेळ थांबून त्या बाईने रेकीची माहिती सांगितली. बराच वेळ ती बाई या उपचारपध्दतीचा फायदा पुलंनी घ्यावा असं सुचवत होती. पुलंच्या लेखी तिचं समजावणं आणि मागे लागणं थोडसं अतीच होत होतं. पण ते काही बोलले नाहीत. थोडया वेळाने त्या बाई निघून गेल्या. बापू त्यावेळी तिथेच होते. त्या बाई निघून जाताच पुलंनी दार लावून घ्यायला सांगितलं. दार लावून घेताच बारीक नजरेने तिथे पहात ते बापूंना म्हणाले, 'काय रे ती 'अति-रेकी' गेली का ?' पुलंनी केलेली ही कोटी त्यावेळी चांगलीच दाद मिळवून गेली. बघता बघता दोघेही जोरजोरात हसू लागले.

पुलंना ज्या प्रयाग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथल्या मंडळींनाही पुलंनी सोडलं नाही. डॉ. शिरीष प्रयाग यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह जुळला होता. १९८६ मध्ये डॉ. प्रयाग यांच्या रुग्णालयाचं उद्घाटन पुलंनीच केलं होतं. या उद्घाटनप्रसंगी पुलंनी डॉ. प्रयाग यांची फिरकी घेतली. त्यांनी भाषणाला सुरूवात केली आणि संपूर्ण रुग्णालयावर एक नजर टाकली. आजूबाजूला डोकावून पाहिल्यानंतर ते उत्तरले, 'शिरीषकडे येणारे रुग्ण अत्यवस्थ असू शकतात. शक्यतो लोकांना त्याच्याकडे यायची गरज पडू नये. पण अशी गरज पडलीच तर हे रुग्णालय सर्व बाबतीत सुसज्ज आहे'.पुलंचं हे म्हणणं ऐकून उपस्थित मंडळींमध्ये चांगलीच खसखस पिकली होती.

एखाद वेळी स्वत: एखाद्या कामासाठी जवळच्या स्नेह्याला फोन केला तरी पुलंची विनोदबुध्दी जागृत असायची. आपलं काम आहे म्हणून ते समोरच्याची फिरकी टाळायचे नाहीत. त्यांच्यासंदर्भातला असाच एक किस्सा इथे सांगण्याजोगा. एकदा पुलंना 'धर्मात्मा'चं बुकलेट हवं होतं. त्या बुकलेटवरील बालगंधर्वांचा फोटो ते शोधत होते. एका मित्राला त्यांनी फोन केला आणि म्हणाले, 'काय रे, तुझ्याकडे 'धर्मात्मा'चं बुकलेट आहे का ? मला ते हवं आहे.' पलिकडून मित्र म्हणाला, 'हो, माझ्याकडे ते बुकलेट आहे.' यावर पुलंनी विचारलं, 'काय रे, तुझ्याकडे हे बुकलेट कुठून आलं? तू तर 'धर्मात्मा'मध्ये कामही केलं नव्हतस.' मित्र उत्तरला, 'अरे मी काम केलं असतं तर तो चित्रपट चालला असता ना !' मित्राच्या या विधानावर पुलंची प्रतिक्रिया आली नाही. हे लक्षात येताच त्याने पुन्हा विचारलं, 'काय पीएल, दुसऱ्याच्या विनोदांना हसायचा रिवाज तुमच्याकडे नाही का? का आम्हीच तुमच्या विनोदांना दाद द्यायची?'

मित्राच्या या प्रश्नावर पुलं शांतपणे उत्तरले, 'अरे मित्रा, विनोदाला दाद देण्याचा रिवाज आमच्याकडे अवश्य आहे. पण त्यासाठी मुळात विनोद घडायला हवा ना.' पुलंचा हा शेरास सव्वाशेर प्रतिसाद ऐकल्यानंतर मात्र मित्राची आणखी काही प्रश्न विचारायची हिम्मत झाली नाही. पुलंनी परिचित, स्नेही, मित्रमंडळी सर्वांनाच आपल्या फिरकीचं लक्ष्य बनवलं. मात्र, स्वत: वरील विनोदही नाकारले नाहीत. प्रयाग हॉस्पिटलबाहेर चित्रपट निर्माते राम गबाले, जब्बार पटेल, दिलीप माजगावकर आणि इतर अनेकजण पुलंबद्दल भरभरुन बोलत होते. त्याच वेळी आणखी एक आठवण पुढे आली. शेवटी पुलंना पायावर जोर देऊन उभं राहता यायचं नाही. ते व्हिलचेअरवरच असायचे. अशाही परिस्थितीत मित्रमंडळींना बोलावणं, त्यांच्याशी गप्पा मारणं कमी केलं नव्हतं. मित्रमंडळीही चलाख. पुलंबरोबर गप्पा मारायची संधी मिळाली की त्यांची थोडीशी टर खेचायची संधी तेही सोडायचे नाहीत. पुलं व्हिलचेअरवर बसून गप्पा मारताना त्यांना पाय टेकवून उभं राहता येत नाही हे एका मित्राच्या लक्षात आलं. त्याने लगेच मल्लिनाथी केली, 'आता पीएलचे पाय जमिनीला लागत नाहीत पहा.' त्याचं हे विधान ऐकून एक समयोचित सुंदर विनोद घडल्याचं पाहून सारे जण हसू लागले. पुलंनीही समरसून त्यांना दाद दिली. पुलंच्या अशा असंख्य आठवर्णीना अजूनही उजाळा दिला जातो. त्यांच्या शाब्दिक कोट्या, प्रसंगनिष्ठ विनोद आणि हजरजबाबीपणा यावर आवर्जून बोलले, लिहिले जाते. खंत एकच आहे, ती म्हणजे आता अशा कोट्या फारशा ऐकायला मिळत नाहीत आणि प्रसंगनिष्ठ विनोदातली ती नजाकत दुर्मिळ झाली आहे.

मंगेश पाठक
दैनिक महानगर

Monday, November 21, 2022

पु.ल. आज तुम्ही हवे होता - निकेत पावगी

आठ नोव्हेंबर आणि बारा जून हे दोन दिवस पुलप्रेमींसाठी महत्त्वाचे आणि मनात विविध प्रकारचे कल्लोळ उठवणारे दिवस.

"कशाला आला होता हो बेळगांवात?" अशा स्वरूपाचा विदीर्ण टाहो काही जणं फोडत होती, असतील, रहातील - मनातल्या मनात.

पुलोत्सव वगैरे आयोजित करणारी मंडळी आता साठीच्या आसपास असतील आणि उत्सव साजरे करण्याची सध्याची किंमत बघता, असे उत्सव साजरे न करणेच त्यांना योग्य वाटत असेल.
आज तुम्ही हवे होता - असं वाटत रहाण्याचे दिवस गेले. उलट, तुम्ही गेलात तेच बरं झालं -: असं राहून राहून वाटत रहाण्याचे प्रसंग वारंवार येत रहातात.

थोर थोर विचारवंत, साहित्यिक लोकांची विविध पध्दतीने अवहेलना बघून तुम्ही स्वस्थही राहू शकला नसता आणि काही करण्याचा विचारही सुचला नसता. तुम्हालाही कोणत्याही एखाद्या वर्गाचे प्रतिनिधित्व देऊन कुणीतरी ठोकून काढलं असतं आणि तुमच्या कार्याची चिरफाड संकुचित चष्मे लाऊन झाली असती. तुमच्या लेखनातील एखादा लचका तोडून एखादे आंदोलन वगैरे झाले असते आणि त्यावर विचित्र पद्धतीने वाद - प्रतिवाद, प्रतिक्रिया उमटल्या असत्या. त्याला एखादा रंग कुणीतरी दिला असता. त्याउपर आपल्याच काही जाहीर चाहत्यांनी सपशेल कुस बदलून ते रंग गडद करण्यासाठी हातभार लावला असता. तुमचे मोजके पुतळे काही ठिकाणी अजूनही सुरक्षित आहेत, हे आमचे भाग्य. पण काही भरवसा वाटत नाही.

कदाचित एखादा Stand up comedy show करण्यासाठी तुम्हाला आग्रह झाला असता. घरोघरी पैदास झालेल्या साहित्यिकांचे तुमच्या स्वभावानुसार कौतुक करता करता तुमची लेखणी थिजून गेली असती.

कालातीत रहाणे फार कठीण असते. जवळपास अशक्यच. कालानुरूप परिस्थिती, संदर्भ बदलत असतात. पण काही भुमिका, दृष्टीकोन आणि शैली अजरामर असतात. समस्त जगातील मराठी बांधवांच्या ज्या सर्वसमावेशक गटाचे तुम्ही लाडके व्यक्तिमत्त्व होता, तो गट आता शिल्लक राहिला नाही. त्यापैकी कित्येकांनी इहलोक सोडला आणि त्यापेक्षा जास्त मंडळींनी मायभूमी सोडली. तुम्हाला जे सांगायचे आहे, दाखवायचे आहे आणि वाटायचे आहे ते समजणारी आणि ते समजून आनंदाने चकित होणारी मंडळी आता क्षीण झाली आहेत.

तुमच्या नांवाचें समुह अजूनही नवीन आणि तुमच्यासाठी अनोळखी अशा माध्यमातून सक्रिय आहेत. तुमची लेखी वाक्य शेकडो मंडळी कपड्यांवर मिरवत असतात. पण आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनावर तुम्ही जे कोरलंत ते मिरवावे असं वाटत नाही आणि जे मिरवतात त्यांच्या मनापर्यंत ते रूजलं आहे का, समजत नाही.
अजातशत्रूत्वाला एक प्रकारची चतुराई लागते- तुम्ही लिहून गेलात. तुमच्यात ती चतुराई नसूनही तुम्ही कितीतरी दशकं अजातशत्रू राहिलात. ते तुमच्या मोकळ्या मनस्वीपणामुळे आणि मुख्य म्हणजे स्वतः कडे सहज कमीपणा घेणाऱ्या तुमच्या निरागसपणा मुळे. ती निरागसता हल्ली इयत्ता पहिलीत सुध्दा शिल्लक राहिली नाही. नवरसांमधील कणांपासून विविध प्रकारच्या जणांपर्यंत ज्यात तुम्हाला उदात्त, उत्कट, मंगल असे जाणवले त्या सगळ्यांना दाद देत तुम्ही निर्मिती करत राहिलात. वाईटातूनही चांगलं दाखवण्याच्या शैलीतून. त्या चांगल्याची आणि मांगल्याची जी जाणीव निर्माण झाली ती नुसती आनंददायी नाही तर सकारात्मक स्फूर्तीदायी आहे. आज चांगल्यातूनही नेमकं वाईट तेवढे शोधून पसरविणारी लोक वाढत चालली आहेत.

तंत्रज्ञान फारच प्रगत झाले आहे. आजच्या तंत्रयुगात तुमच्यासकट, तुम्ही पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या समस्त प्रतिभावंतांनी काय कमाल केली असती असा विचार मनात येतो. पण त्या अभिजाततेसाठी पोषक असे समाजाचे कोंदणसुध्दा त्या प्रतिभावंतांना आवश्यक असते. रात्रभर चालणाऱ्या मैफलींमधून होणारी रसनिर्मिती कधीच नाहीशी झाली. त्यानुरुप होणारी प्रतिभा दुर्मिळ झाली तर दोष कुणाचा?

तरीही तुम्ही असता तर नक्कीच काहीतरी चिंतनाला आवाहन करणारी निर्मिती झाली असती. अद्वैताचे प्रतिरुप असणाऱ्या तुमच्या जोडीदाराला थोडे जास्त कठोर होऊन त्यासाठी तुम्हाला उद्युक्त करावे लागले असते, ते त्यांनी सजगपणे आणि अधिकाराने केले असते.

टिळक - गांधी पुण्यतिथी/ जयंती च्या दिवशी व्यक्तीगत पातळीवर आपापल्या परीने आदरांजली वाहणारी आमच्या आजी आजोबांची सहृदय पिढी कधीच नाहीशी झाली. कुणी लंघन करायचे, कुणी मौन व्रत त्या दिवशी धारण करायचे. काळ बदलत गेला. ती पिढी गेली, ते आवाज गेले, धुसर होत अदृश्य झाले.
तुम्ही गेलात हे एक प्रकारे बरं झालं असा व्यावहारिक विचार मनात गडद होत जातो आणि तरीही तुम्ही असायला हवे होतात हेही प्रकर्षाने जाणवत रहातं.
निखळ आनंदाची देवाणघेवाण सुरू झाली आणि निरपेक्ष दाद दिली घेतली जाऊ लागली कि मात्र सभोवताली कुठल्यातरी स्वरूपात तुम्ही असल्याचा साक्षात्कार होतो.
आठ नोव्हेंबर आणि बारा जून रोजी आयुष्यातील अशा सगळ्या साक्षात्कारांची उजळणी मनात सुरू असते....
मौनव्रत आणि उपास मागे गेले....
ही उजळणी मागे पडणे शक्य नाही.

निकेत पावगी
०८/११/२२

१०३ नॉट आऊट पु.ल. - मृणाल जोशी

८ नोव्हेंबर दैवताचा म्हणजे पु.ल. तुमचा १०१वा वाढदिवस... बाप्रे!!

तुमचं काय, तुम्ही सध्या चैनीत असाल म्हणा. तुमच्याच प्रमाणे रंभा तुमच्या डोक्यावर तेल थापत असेल आणि उर्वशी वारा घालत असेल नाही का?
        
पुलं, तुमचं नाव घेतलं की आपसूक तोंडावर स्मितहास्य उमलतं आणि काय काय नाही आठवत हो...

किती पिढ्या झाल्या तुमची म्हैस अजून काही म्हातारी होत नाही आणि अंतू बर्वे म्हातारा हुन काही मरत नाही, गटणे अजुनी खाकी चड्डीत दिसतो, त्रिलोकेकर याचं इंग्लिश अजुनी कानात साला इडियट म्हणून घुमत असतं, नाथा कामतचे "बाबा रे तुझं जग वेगळं माझं जग वेगळं" हे कुठूनही ऐकू येतं.
पेस्टनजी यांनी कुठली ही बाब परसेन्ट शिवाय बोललीच नाही. कुठे ही कुत्रा दिसला की 'जिम्या भाड्या'ची आठवण येते आणि माकड दिसला की लक्ष त्याच्या आचरटपणा करणाऱ्या मालकाकडे आधी जातं.
चाळीतल्या नळाचे भांडणं असोत किंवा तुमचा उपास असो, मद्राशी राम बघायची शंकऱ्याला घाई असो किंवा तुम्हाला भेटायची सव्याची अप्सव्य करणारी आपली सरोज खरे असो, आजही कुठे भांडण झालं की आम्हाला आधी आठवतं ते बाचाबाची.
कोणी घर पाहायला बोलावलं की पोटात आधी गोळा येतो.
हरितात्यामुळे आम्ही इतिहासात फिरून येतो.
तुमच्यामुळे कधी दामले तर कधी चितळे मास्तर आठवतात तसे चार्ली चॅप्लिन तर कधी पी जी वुडहाऊस किंवा रवींद्रनाथ आठवतात.
कधी तुम्ही संगीत दिलेल्या ओळी ओठांवर येतात आणि खडीसाखरे प्रमाणे तिथेच घट्ट चिकटून असतात.
किती तरी वेळ कधी मर्ढेकर कधी कवी गिरीश तर कधी बोरकर तुमच्याच मुळे आठवतात हो...

साहित्यात संगीतात आणि कलेत तुम्ही एकही शाखा नाही सोडली आणि ह्या सर्वांवर तुम्ही अमाप प्रेम केलं.
आम्हाला हे सगळं मिळालं नाही पण पुलं आम्हाला तुम्ही आणि तुमच्या कलेचा सहवास लाभला ह्याहून मोठा आनंद काय असेल?

तुम्ही कधी पुस्तकांतून, कथाकथन, संगीतातून , कोट्यातून, शब्दातून, तुमच्या आनंदातून भेटतात...
पुलं आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्ही सांभाळलं...
ही किमया तुमच्या लिखाणातील.

तुमच्या लिखाणावर आम्ही लिहून लिहून किती कागदाच्या रिमा वाया घालवणार?
तरी इथे महत्वाचं आहे ते पुलं... तुमच्या सोबत संवाद साधणे.
सर्वांना सर्व काही तोंडी पाठ आहे, मग म्हैस असो, शत्रूपक्ष असो, अंतू बर्वे, नामु परीट, नाथा कामत, नारायण, नंदा प्रधान, चाळ, वरात, असामी असामी काही ही असो, सगळ्यांना रामरक्षे प्रमाणे पाठ आहे.
तरी प्रत्येकाची आतुरता की पुलं यांच्याशी संवाद व्हावा.

आधी असं वाटायचं की व्यास, वाल्मिकी, आणि समर्थ रामदास यांनी जे लिहिलं त्यानंतर कोणी काही लिहू नये. कारण त्याच्याही पलीकडे काही असू शकेल याची शाश्वती कुणालाही वाटली नाही.
नंतर तुम्ही आला आणि त्यांच्या 'बिटविन द लायन्स' तुम्ही शोधल्या आणि लिहिल्या.
पण एक सांगतो तुम्ही सगळ्या लेखकांची सॉलिड गोची करून ठेवली आहे.
तुम्ही जे लिहिलं आणि जे ऐकवलं त्या नंतर काही उरलं असेल असं मला तरी वाटतं नाही.

तुम्ही गेला?
छे छे मला असं अजिबात वाटतं नाही.
तुम्ही कधी ऑडिओमधे समोर येतात, कधी व्हिडीओत, कधी कोणाच्या संगीतात, कधी कोणाच्या बोलण्यात, कधी ऐकण्यात.
हल्ली तुमचे ग्रुप्स सुद्धा आहेत.
तुमचे फोटो हल्लीच्या राजनैतिक वातावरणावर ट्रोल होतायत.
आता तर तुम्ही चित्रपटात झळकलायत.
पण खरं सांगू का तुम्ही मला कुठे ही भेटतात.
तुम्हीं कधी कुणाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत भेटतात, कधी कोणी लेखक पुस्तकं तुम्हाला समर्पित करतो तुम्ही तिथे भेटतात, कधी पुरचुंडीच्या दोन फडक्याच्या गाठीत भेटता, कधी चाळीच्या कुठल्या कोपऱ्यात उभे दिसतात, कधी एकाकी खांद्यावर शबनम घेऊन पांढऱ्या सदरात आणि पायजम्यात दिसतात.
कधी पेटी दिसली की त्या 'काळ्या तीन'मधे तुम्ही बोटांनी गाताना दिसतात.
कधी असामीमधल्या तुमच्या वडिलांच्या घड्याळीत वेळ बघताना दिसतात.
कधी चार्ली पहिला की तुम्ही मागून झाकून बघताय अस दिसतं.
कधी लता गाते आणि तुमचा आवाज येतो -
"पोरी औक्षवंत हो."

कधी सावरकरांवर बोलताना दिसतात तर कधी भीमसेन कधी वसंतराव यांच्या सोबत मैफल गाजवताना तर कधी पुण्यात गुलजार समवेत सुद्धा दिसतात.
कधी तुम्ही आणि सुनीताबाई दोघे ही आनंदवनात दिसतात तर कधी ग्रेस यांच्या दाराशी थांबलेले दिसतात.
कधीमधी तुम्ही 'एक शून्य मी'च्या प्रश्नचिन्हाखाली त्या टिंबात आम्हाला नवं कोडं घालतायेत असं दिसतात.

तुम्ही विनोदी म्हणून जगविख्यात आहेतच पण संवेदनशील रंगकर्मी, आणि मनाला भिडणारा लेखक म्हणून मला ज्यास्त भावतात.
तुम्ही जे जे संवेदनशील लिहिलं ते खरंच अजोड आहे, टच कण डोळ्यांतून पाणी काढणं आणि पुढच्या क्षणी हसवता हसवता रडवणे हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे.
तिथे पाहिजे जातीचे कलावंत!

विनोद बुद्धी खरंच दैवी देणगी असते.
मान्य पण आपण जे संवेदनशील लेखक म्हणून लिखाण केले त्याला तोड नाहीच.

तुम्हीच आमच्या सारख्या दुःखात असणाऱ्या, एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या आणि आपल्यालाच बघणाऱ्या नजरा असणाऱ्यांना आमच्यासारख्या लोकांना वाचायला, चांगलं ऐकायला प्रवृत्त केलं आणि आमची पिढी धन्य झाली.

तुमचं नवं कोरं पुस्तक जेंव्हा विकत घेतो न, मला त्यात तुमचा सुगंध दरवळतो!
स्वतः इंदूर इथला असल्यामुळे, त्या इतिहासाचा गंध सांगणाऱ्या वास्तू पाहिल्यात जिथे तुम्ही कुमार गंधर्व, रामुभैया दाते यांच्या समवेत मैफल सजवल्यात, रंगावल्यात आणि अर्थातच गाजवल्यात.

पुलं...
तुम्ही जे दिलं, जे आम्ही अनुभवलं त्याला तुलना नाही!

पुनःश्च धन्यवाद!

पुलं पुन्हा तुम्हाला कडकडून भेटावंस वाटतंय...

- मृणाल जोशी
०८.११.२१

Wednesday, November 9, 2022

शैलीमुळे कालातीत ठरणाऱ्या पुलंच्या रेडिओवरील श्रुतिका - रजनीश जोशी

पु. ल. देशपांडे यांनी रेडिओ माध्यमासाठी काम करताना केलेलं लेखन त्या त्या काळातलं आहे. त्यांनी त्यातून मांडलेले विषय तत्कालिक आहेत. पण त्यांची शैली मात्र कालातीत आहे. रेडिओच्या श्रोत्यांशी संवाद साधणारं लेखन कसं असलं पाहिजे, याचा वस्तूपाठ म्हणजे त्यांचं श्रुतिका लेखन आणि भाषणं. पु. ल. स्मृतिग्रंथासाठी लिहिलेल्या लेखातील काही भाग !

साल होतं १९५५. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावच्या माळरानाचं नंदनवन करण्याच्या एका प्रकल्पासाठी पु.ल.देशपांडे तिकडं गेले, पण तिथली दांभिकता आणि फोलपण लक्षात आल्याने ते काम सोडून परत मुंबईला आले. त्यांच्याकडं कुठलंच काम नव्हतं. अशा अत्यंत गरजेच्या वेळी त्यांना आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर सहनिर्माते म्हणून नोकरी मिळाली. पुलंच्या शैलीत या घटनेचं वर्णन करायचं तर ''तोपर्यंत 'दीनवाणी' असलेली 'नभोवाणी' एकदम 'गोजिरवाणी' तर झालीच पण खूप श्रवणीयही झाली.'' व्यंकटेश माडगूळकर यांच्यासमवेत ग्रामीण भागातील जनतेसाठी कार्यक्रम करण्याचे काम त्यांच्याकडे होते. पुलंनी या कालखंडात अधिकाधिक श्रुतिका लिहिल्या, प्रसंगपरत्वे विविध विषयांवर भाषणे दिली. पॉल न्युरेथ नावाचे एक अधिकारी 'रेडिओ फार्म फोरम' नावाचा एक कार्यक्रम करीत असत. शेतकऱ्यांना मार्गदर्शनाच्यादृष्टीने या कार्यक्रमाचं महत्त्व मोठं होतं. त्यांनी या मंडळींना मार्गदर्शन केलं होतं. रेडिओची खासियत म्हणजे निरक्षरांनाही त्याचा उपयोग होतो. ५५ च्या सुमारास आपल्याकडील खेड्यापाड्यातील लोकांचं, शेतकऱ्यांचं शिक्षण बेतास बात होतं, किंबहुना अनेकजण निरक्षरच असत. त्यांना शेतीबाबत आणि तत्सम मार्गदर्शनासाठी रेडिओ उपयुक्तच होता. तथापि, नुसती भाषणं किंवा तज्ज्ञांच्या मुलाखतीसारख्या कार्यक्रमामुळं खेड्यातल्या श्रोत्याला जोडून ठेवणं थोडं अवघडच होतं. त्यासाठी संवादात्मक कार्यक्रम केले, त्यातही एखादं पात्र खेडुताचं असेल तर लोकांना अधिक जवळचं वाटेल हे पुलंनी हेरलं होतं. 'नभोवाणी शेतकरी मंडळा'च्या माध्यमातून मग 'बया दार उघड' सारखा कार्यक्रम त्यांनी सुरू केला, तो लोकप्रिय झाला. शेतकऱ्यांसाठी, गावकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम होता. तुमच्यासाठी हे ज्ञानाचे भांडार उघडले आहे, तेव्हा तुम्हीही आपल्या मनाचे दार उघडा आणि शहाणे व्हा, असा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमामध्ये पुलंचा सहभाग असल्याने त्याची रंजकता अपार होती, शिवाय गीत-संगीताचाही उत्तम उपयोग त्यात करण्यात आला होता.

फक्त शेतकरी बांधवांपुरतेच त्यांचे लेखन मर्यादित नव्हते. रेडिओ हे पुलंचे आवडते माध्यम होते. त्याचा यथायोग्य अभ्यास त्यांनी केलेला होता. शब्दप्रधानता हे त्याचे वैशिष्ट्य आणि पुलंना तर शब्दांचं वेड अतोनात होतं. ते म्हणतात : ''माझं पहिलं वेड शब्दांचं आहे, रंगांचं नाही. रंगदेखील मला शब्दांतून अधिक चांगला दिसतो. किंबहुना, साऱ्या विश्वाची सुरूवात परमेश्वराच्या ओंकाररूपी हुंकारातून झाली या कल्पनेचं मला अधिक वेड आहे.'' रेडिओवरील श्रुतिका व तत्सम कार्यक्रमांचं आणि नाटकांचं दिग्दर्शन करताना त्यांनी सर्वाधिक महत्त्व शब्दांनाच दिलं आहे. एखाद्या पात्राला त्याच्या भूमिकेसाठी अशुद्ध उच्चार करायचे असतील तर ते तसेच आले पाहिजेत, अशावेळी पानीऐवजी पाणी किंवा आनिऐवजी आणि शब्द उच्चारला गेला तर ते अस्वस्थ होत. ''शब्द गळला की नाट्यशरीराला जखम झाल्याची वेदना मला होते, वाक्य चुकलं की नाटकाला ओरखडा गेल्याचं दुःख मला होतं,'' असं त्यांनी संहितेतील शब्दांच्या उच्चारणाविषयी लिहून ठेवलं आहे.

पुलंनी एकेठिकाणी म्हटलंय की ते लेखक झाले नसते तर गायक झाले असते. संगीत त्यांच्या खूप आवडीचा प्रांत. आकाशवाणी असो किंवा त्यांनी लिहिलेल्या कोणत्याही लेखनाचा प्रकार असो, त्यात कोणत्या ना कोणत्या रूपात संगीत अपरिहार्यपणे येतेच. आरंभीच्या काळात त्यांनी 'सत्यकथा', 'अभिरूची' अशा नियतकालिकांत कथा लिहिल्या, त्यातही संगीताचा उल्लेख आढळतो. रेडिओसाठीच्या श्रुतिकांमध्येही तो आहेच. 'नभोवाणी शेतकरी मंडळा'च्या कार्यक्रमात त्यांनी संगीताचा वापर केला, पण त्याशिवायदेखील त्यांनी अनेक संगीतिका सादर केल्या. जनाबाई किंवा अमृतवृक्ष वगैरेंचा उल्लेख त्यादृष्टीने करता येईल. कौटुंबिक श्रुतिका लिहून सादर करणं पुलंच्या आवडीचीच गोष्ट होती. 

रेडिओवर नोकरी लागल्यानंतर वर्षभरातच नभोवाणी सप्ताहासाठी त्यांनी लेखन केलं. १९५६ साली पुलंना पदोन्नती मिळाली. ते मुंबई आकाशवाणी केंद्रावर नभोनाट्य विभाग प्रमुख रुजू झाले. आकाशवाणीसाठी लेखन करताना मनोरंजन आणि प्रबोधन अशा दोन्ही गोष्टींकडं लक्ष देणं आवश्यक आहे. पुलंनी केलेल्या तशा लेखनाचं एक महत्त्वाचं उदाहरण 'सर्वोदय' या श्रुतिकेच्या रूपानं देता येईल. विनोबा भावे यांनी भूदान चळवळीमधून भूमिहिनांना जमीन देण्यासाठी देशभरात यात्रा काढली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत होता. शेकडो एकर जमीन भूदान यज्ञ म्हणून विनोबाजींना दिली जात होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतरची ही खूप मोठी चळवळ होती. त्याविषयीचा एक संदेश मिळवण्यासाठी पु.ल.देशपांडे आणि आकाशवाणीतील त्यांचे सहकारी कवी मंगेश पाडगावकर यांनी विनोबाजींबरोबर कर्नाटकात यात्रा केली. त्यांच्याकडून संदेश मिळवला. पण 'सर्वोदय' नावाची जी श्रुतिका म्हणण्यापेक्षा नभोनाट्यच पुलंनी लिहिलं. ते त्यांच्या प्रतिभेचं दर्शन घडवणारं आणि विनोबाजींच्या कार्याचा यथोचित गौरव करणारं आहे. त्यातून रंजनही होतं आणि प्रबोधनही. महात्मा गांधीजींचा आवडता शिष्य अशी विनोबाजींची ओळख होती. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिला सत्याग्रही. गांधीजी त्यांना 'आश्रमातला माझा भीम' असं म्हणत. पवनारच्या आश्रमातून त्यांची पदयात्रा सुरू झाली. पुलं लिहितात : भारतीयांना शहाण्या, सुज्ञ, व्यवहारी, चतूर शहाण्यांमागून जाणं आवडत नाही. त्यांना असल्या वेड्यांचच वेड आहे. राजभोग त्यागून विषप्याला घेणारी वेडी मीरा, वेडे रामकृष्ण, दुकानाची दारं बंद करून विठ्ठलाच्या दाराशी बसलेला वेडा तुकाराम – ह्या वेड्यांनीच आम्हाला शहाणं केलं आहे. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आम्ही भाषा ओळखतो ती त्यांची, कारण त्यांना एकच भाषा येते, 'अंतःकरणाची.'

विनोबाजींचा हा भूदान यज्ञ किती खडतर होता, त्याचं प्रत्यंतर त्यांनी स्वतः घेतलं होतंच. पण तेलंगणातील जमीनदारांची प्रचंड दहशत होती. हिंसक अत्याचारांनी तिथली जनता भयभीत झाली होती. दिवसासुद्धा दारं मिटून बसत होती. त्यांची व्यथा ऐकून विनोबाजींनी भूमीचा प्रसाद मागितला. त्याचं वर्णन पुलंनी केलं आहे, श्रोत्यांच्या काळजाला हात घालणाऱ्या त्या शब्दांनी त्यांच्या मनात थरार निर्माण केला नसला तरच नवल. पुलं लिहितात : भारतीय इतिहासातील हा एक अत्यंत करुणोदात्त प्रसंग. दाता आणि घेता दोघेही कंगाल. जमीन देणारा परमेश्वर कुणाच्या मनात उभा राहणार? अनेक भूमिहिन आणि भूमिवान तिथं हजर होते. त्यातच रामचंद्र रेड्डी नावाचे गृहस्थ होते. पक्ष्याचं दुःख पाहून वाल्मिकीच्या शोकाचा श्लोक झाला. त्या श्लोकातून पुढं रामायण झालं. भूमिहिनांची प्रार्थना आमि विनोबांचा ''या गरीबांना जमीन देणारा आहे कुणी दाता?'' हा प्रश्न रामचंद्र रेड्डींचं काळीज कापत गेला आणि ते एकदम ओरडले, ''माझी शंभर एकर जमीन मी या भूमिहीन हरिजनांना दान देतो.'' भूदानगंगा अशा या पावन स्वरूपात तेलंगणातल्या पोचमपल्ली नावाच्या खेड्यात १८ एप्रिल १९५१ रोजी प्रकटली. पोचमपल्ली ही भूदानाची गंगोत्री. सर्वोदयगाथेचं मंगलाचरण.

आणि मग अंध कार्यकर्त्यानं मध्यरात्री येऊन आपली जमीन दान देणं, एका बाईनं आपली सगळी जमीन दान देऊन रोजीरोटीसाठी दुसरीकडं कामाला जाण्याचा निश्चय करणं अशी अनेक उदाहरणं देत हे नाट्य पुढं जातं. भूदानयज्ञामुळं शेतीचे लहानलहान तुकडे पडतील वगैरे अनेक शंका घेतल्या गेल्या, त्यांचंही निरसन त्यांनी केलं आहे. तीस हजार मैल फिरून यशस्वी केलेल्या भूदान यात्रेमुळे सगळ्या जगाला प्रेमाचा, शांतीचा संदेश पोचल्याचं ते लिहितात. ही श्रुतिका किंवा नभोनाट्य वाचणं हादेखील एक समृद्ध करणारा अनुभव आहे.

पुलंची आकाशवाणीवरची कारकीर्द खूपच बहरली. पुण्यातून मुंबईत त्यांना बढती मिळाली. त्यांच्या कामाचा आवाका आणि दर्जा पाहता सरकारने त्यांना दूरदर्शनच्या निर्मिती प्रक्रियेसाठी दिल्लीत निमंत्रित केलं. त्यासाठी त्यांचा परदेशात अभ्यास दौराही झाली. नंतरच्या काळात आकाशवाणीवर अनेक मान्यवरांनी श्रुतिका लिहिल्या, नभोनाट्ये लिहिली. पण पुलंनी त्याला भाषेची जी उंची दिली ती अभूतपूर्वच होती. नभोनाट्य किंवा श्रुतिका कशा लिहावी याचंही विवेचन पुलंनी केलं आहे. रेडिओसाठी कसं लिहावं? या प्रश्नाचं उत्तर ते एका शब्दात देतात : 'बोलल्यासारखं.' रंगभूमी, चित्रपट किंवा रेडिओवर सादर होणाऱ्या नाटकातून रसिकांना आनंद झाला पाहिजे, हे मूळ सूत्र आहे. चित्रपट अगर नाटकात डोळे आणि कान एकमेकांच्या मदतीला धावून जातात. शब्द कानात शिरला नाही तर दृश्य खुलासा करीत असतं. चुकीच्या प्रकाशयोजनेमुळं पात्रं दिसलं नाही तर दृश्य खुलासा करत असतं. रेडिओत हे अगदी अशक्य! रेडिओ घरात चालू असतो, त्याचवेळी आत स्टोव्ह पेटत असतो. कदाचित नोकरांशी भांडण सुरू असतं. मुलांना कविता पाठ करायची लहर येते. शेजारचे गृहस्थ ऐनवेळी दारावर 'ठो' 'ठो' करून वर्तमानपत्र मागायला येत असतात. रस्त्यातून बँड लावून लग्नाची वरात जात असते. अशा एकूण विसंवादी परिस्थितीत रेडिओ ऐकायचा असतो. त्यामुळं रेडिओ-श्रुतिकेच्या लेखनाला काही विशिष्ट त्रुटींमधून मार्ग काढायचा असतो. शिवाय श्रुतिका लेखनावर तंत्राच्या काही मर्यादा असतात. त्यात कालमर्यादा पहिली. केवळ ध्वनी एवढंच रेडिओ श्रुतिकेचं साधन. रंग, रूप, रस, गंध यापैकी कोणतीही इतर साधनं वापरता न आल्यानं श्रुतिका कितीही परिणामकारक संवादांनी अगर साऊंड इफेक्ट्सनी नटवलेली असली, तरी तीस ते पंचेचाळीस मिनिटांहून अधिक वेळ ती टिकाव धरू शकत नाही. केवळ श्राव्य अशा या नाटकात श्रोत्याच्या कल्पनाशक्तीला फार ताण द्यावा लागतो. नाटक किंवा सिनेमा पाहायला गेलेला रसिक उठून नाट्यगृहात गेलेला असतो इथं नाटक आपल्या घरी आलेलं असतं. आणि घरातल्या सर्व परिस्थितीचा त्या नाटकाला, म्हणजे पर्यायानं नाटककाराला विचार करावा लागतो.

रेडिओचं तंत्र पुलंनी झटकन आत्मसात केलेलं होतं. चटकदार संवाद आणि शब्दांचा खेळ यात पुलं रमत होते, पण त्याचबरोबर पुरक अंगांचाही विचार त्यांनी केलेला होता. त्यांच्या एका नभोनाट्यात गरूड झेपावतो अशा आशयाचं वर्णन होतं. रेडिओवर गरूडाची झेप कशी दाखवणार. त्यांनी वर्तमानपत्रांच्या पानांची फडफड करून पाहिली, पण त्यातून अपेक्षित परिणाम साधत नव्हता. थोडक्यात, शब्दांबरोबर अन्य इफेक्ट्सची गरज तंत्राला असते. श्रुतिकेतील पात्रयोजना श्रोत्यांना कळायला हवी. त्यासाठी संबंधित पात्राच्या नावाचा उल्लेख करावा लागतो. सुरूवातीला अशा उल्लेखानं संबंधित पात्राची भूमिका करणाऱ्या कलावंताचा आवाज 'एस्टॅब्लिश' झाला की मग ते कमी केले तरी चालतात. 'टार्गेट ऑडियन्स' हा आजच्या काळाचा सर्वच क्षेत्रांना लागू होणारा मूलमंत्र असला तरी श्रुतिकेबाबत तो अधिक नेमका आहे. श्रुतिका ही घरातल्या सर्वांसाठी असते. त्यात आई-बाबा, काका-काकू, आजी-आजोबा, मुलगा-मुलगी, शेजारी अशा सगळ्यांचा अंतर्भाव असतो. त्यांना गृहित धरून ती लिहावी लागते. पुलंनी त्याचा बारकाईने विचार केला आहे. 'भगिनी मंडळात भाऊगर्दी'सारखी त्यांची श्रुतिका विविध वैशिष्ट्यांनी नटलेली आहे. लेडिज क्लब किंवा भगिनी वर्गात एक भाषण, एक नाट्यछटा आणि संवाद असा त्रिवेणी संगम, शिवाय जोडीला गाणं असा मसाला त्यांनी भरला आहे. ज्या काळात पुलंनी हे लेखन केलं, त्या काळात महानगरांमध्ये लेडिज क्लब, सखी मंडळ वगैरेंची नुकतीच सुरूवात झालेली होती. श्रीमंतांच्या बायका वेळ घालवण्यासाठी अशा क्लबांमध्ये सामील होत. त्यातही अनेकजणींना मिरवण्याची हौस असते. आपल्या नवऱ्याच्या नोकरीतील किंवा समाजातील पदाचा-प्रतिष्ठेचा फायदा त्या उठवत. हे सगळं हेरून त्यांनी आपलं लेखन विविधांगी केलं आहे. त्यांचं स्वतःच संगीतप्रेम मात्र अनेक ठिकाणी अगदी सहज श्रोत्यांच्या भेटीला येतं. कधी ते विडंबनाच्या आधारानं तर कधी थेट गायनाच्या स्वरूपात. 'भगिनी मंडळात भाऊगर्दी'मध्ये त्यांनी एका वक्त्याला चक्क 'नवऱ्याचं संगोपन' या विषयावर भाषण द्यायला लावलं आहे. शिशूसंगोपन, गोसंगोपन वगैरे आपल्याला ठाऊक आहे, पण नवऱ्याचं संगोपन या विषयातूनच ते विनोदनिर्मिती साधतात. पतीसंगोपनाचा पहिला धडा देताना श्रुतिकेतील पात्राच्या तोंडून ते म्हणतात, 'पतीचं संगोपन करायचं आहे, हा विचार सोडून द्या...' आणि मग नवराबायकोच्या साध्या संवादातून त्यांनी जी धमाल आणली आहे ती पुलंच्या शैलीचं अफलातून दर्शन घडवणारी आहे. त्यानंतरचा वक्ता चक्क 'लोकरीचे विणकाम आणि स्त्रिया' या विषयावर बोलतो. लोकर, सुया, रिकामा वेळ आणि नवऱ्याचं पाकीट रिकामं करण्याची शक्ती या विणकामाला आवश्यक गोष्टी आहेत, अशा वाक्यातून पुरूष श्रोत्यांकडून ते हशा वसूल करतात. सुज्ञ महिला श्रोतेही त्यात सामील होतात. पत्नी माहेरी जाणं हा वर्षानुवर्षे संसार केलेल्या नवरोजींसाठी कपिलाषष्ठीचा योग समजला जातो. अशावेळी नवऱ्याची जी धांदल उडते, ते नमूद करणारी नाट्यछटा भरपेट हसवते. बायकोची माहेरची ओढ, तिला स्टेशनवर वेळेपूर्वी सोडण्याची मनःपूर्वक दाखवलेली तयारी अशा अनेक गोष्टींचा उहापोह करणाऱ्या या नाट्यछटेनं ही श्रुतिका श्रोत्यांना रेडिओशी खिळवून ठेवू शकते. श्रुतिका लिहिताना पुलंनी योग्य भाषेचा काटेकोर वापर केला आहे. त्यांच्यामते काही शब्द वाचताना फारसे त्रासदायक नसतात, पण उच्चारल्यानंतर ते प्रक्षोभक होतात. त्याचं भान सतत ठेवलं पाहिजे. कौटुंबिक श्रुतिका लिहिताना त्याचा विचार अगत्यानं करायला हवा. लहान मुलांचं अनाठायी कुतुहल जागृत होऊ न देण्याची खबरदारी श्रुतिका लेखकाला घ्यावी लागते. त्यामुळं विषयाची निवड आणि मांडणी करताना निरनिराळ्या वयोमर्यादा व बुद्धिमर्यादेचे गट एकत्र असणार आहेत, याची जाणीव लेखकाला असावी, असं ते आवर्जून सांगतात.

'सुखी संसार' या श्रुतिकेत पुलंनी 'दोन किंवा तीन मुले' असतील तरच संसारात गोडी राहते, हे अगदी रंजक पद्धतीनं सांगितलं आहे. नारूमामा आणि रामराव या दोन मित्रांच्या भेटीतून ही श्रुतिका खुलत जाते. नारूमामाला नऊ मुलं आहेत तर रामरावांना तीन. त्यांची गावं वेगवेगळी असली तरी हे दोघे बालमित्र असतात. कारण त्या दोघांचं आजोळ एकाच गावात. एकेदिवशी एका गावच्या आठवडा बाजारात भल्या मोठ्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी नारूमामा बैल विकायला जातात तर तिथं रामराव बैल खरेदीला आलेले असतात. त्यांची भेट होते आणि रामरावाच्या आग्रहामुळं, परतीच्या वाटखर्चाला पैसे दिल्यामुळं नारूमामा त्याच्या गावी जातात. तीन मुलांचं त्याचं सुखी कुटुंब पाहून नारूमामाला आपली चूक कळते. खाणारी तोंड वाढली की उत्पन्न वाढवावं लागतं, ते नसलं तर उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसती कचकच सुरू. रामराव आपल्या मुलांना बगीचा करून देतात, मुलीला गुलाबाची तर मुलांना भाजीपाल्याची देखभाल करायला लावतात. ही मुलं आणि त्यांची आई सुखानं नांदत असतात. त्याचवेळी नारूमामांना आपल्या नऊ मुलांची कटकट आठवते. शेवटी 'मुले थोडी तर संसारात गोडी' हा संदेश ते देतात. कुटुंबनियोजनाचं महत्त्व सांगणाऱ्या या श्रुतिकेत कुठंही सरकारी प्रचाराचा थाट नाही. पण संदेश मात्र नेमका दिला आहे. रेडिओ सरकारी माध्यम असलं तरी त्यात रुक्षता कशाला, विनोदाची पखरण करत हवा तो संदेश लोकांपर्यंत प्रभावीपणे देता येतो, हे पुलंनी या श्रुतिकेतून दाखवून दिलं आहे. अशा श्रुतिकेत वासनांच्या आहारी जाऊन चालत नाही, असं सांगताना योग्य त्या शब्दांचा वापर त्यांनी केला आहे. जोडीला संत रामदासांचं 'लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघोन गेली, बापडी भिकेस लागली काही खाया मिळेना...' या वचनाचा उल्लेख केला आहे.
 
पुलंनी लिहिलेल्या श्रुतिकांमध्ये पात्रसंख्या जाणीवपूर्वक कमी ठेवली आहे. जास्त पात्रं असतील तर कोण कोणता संवाद म्हणतंय, आणि कुणाच्या प्रश्नाला कोण उत्तर देतंय हेच श्रोत्यांना कळत नाही. म्हणून पुलंनी दोन किंवा तीन पात्रेच घेतली आहेत. गरजेनुसार लहान मुले किंवा एखाद दुसरं पात्र वाढवलं आहे. तथापि, ती विषयाची गरज म्हणून. पात्रं बोलताना त्यांचे संवाद दोन किंवा तीन-चार शब्दांचे ठेवूनही चालत नाही. त्यामुळं गुंता अधिकच वाढतो. प्रत्येक पात्राची विशिष्ट लकब किंवा शैली ठेवली तर ते आणखी सोपं होतं. काही जणांना 'काय हो' किंवा 'बरं का' अशी सुरूवात करून बोलायची सवय असते. ती एखाद्या श्रुतिकेत वापरता येते. त्याचप्रमाणं एखाद्याच पात्राला भरपूर संवाद आणि दुसऱ्याला एखाद-दुसऱ्या शब्दाचा हुंकार असं लेखन उपयोगाचं नाही, असंही ते सुचवतात. फक्त दोनच पात्रांच्या म्हणजे नवरा-बायकोच्या संवादाच्या 'एकेकाची हौस'सारख्या श्रुतिका श्रोत्यांना खिळवून ठेवतात.

'एकेकाची हौस'ची सुरूवातही गंमतीशीर केली आहे. बायको नवऱ्याला जेव्हा 'अहो ऐकलं का' असं म्हणते तेव्हा काहीतरी गडबड होणार हे त्यानं गृहित धरलेलंच असतं. पण तसं उघडपणे म्हणण्याची सोय नसते. चुकून तसा काही उदगार त्यानं काढलाच तर विसंवादाला म्हणजे भांडणाला सुरूवात.

वर्तमानपत्र वाचण्यात रमलेल्या नवऱ्याला बायको म्हणते, 'अहो ऐकलं का' आणि तो अभावितपणे उद्गारतो, 'अरे बाप रे.' आणि मग उभयतांच्या विसंवादी संवादाची फटाक्याची माळ उडू लागते तेव्हा श्रोत्यांना हसून हसून पुरेवाट होते. अरे बापरे म्हणायचं कारण काय, असं ती विचारते, त्यावर आपली चूक कळून ती सावरण्यासाठी तो म्हणतो, वर्तमानपत्रात बातमी आलीय, नागपूरचं तापमान ११७ डिग्री झालंय म्हणून. मग ती चतूर बायको वर्तमानपत्र पाहते. बातमी नसतेच. मुद्दा असतो तो तिच्या माहेरची माणसं राहण्यासाठी येणार असतात. शेवटी नवऱ्याला आपली वळकटी वऱ्हांड्यात पसरावी लागते आणि बायकोच्या माहेरच्या माणसांना जागा करून द्यावी लागते. मुंबईसारख्या शहरामध्ये एखाद्या दुसऱ्या खोलीत राहणाऱ्या लोकांना पाहुणे हे संकट वाटते. त्यातही ते राहायला येणार आहेत, म्हटल्यावर तर अडचणीत भरच. त्याचं खुमासदार वर्णन पुलंनी आपल्या कमावलेल्या शैलीत केलं आहे.

पुलंच्या कौटुंबिक श्रुतिका रंगण्याचं कारण त्यांचं निरीक्षण. ज्येष्ठ नाटककार वसंत सबनीस यांनी पुलंच्या या गुणाचं वर्णन करताना एके ठिकाणी म्हटलंय : पुलंची निरीक्षणशक्ती फार सूक्ष्म आहे. माणसांचे आणि माणसांच्या स्वभावातील तपशील त्यांना चटकन जाणवतात. सहज बघितले तरी अनेक बारकावे त्यांच्या लक्षात येतात. एखादी व्यक्ती समोरून गेली तरी ती व्यक्ती कोण असेल, तिचा व्यवसाय काय असेल, तिची परिस्थिती काय असेल, ती घरात कशी बोलत असेल याचे अंदाज ते सहज बांधतात. अशा व्यक्ती पाहून ते संवाद बोलत असत. हा त्यांचा खूप जुना छंद आहे.

श्रुतिकांमधील व्यक्तिरेखा नमुनेदार वठण्यासाठी पुलंच्या या गुणाचा उपयोग निश्चितच झाला आहे. पुलंचं मराठीवर असलेलं प्रभुत्व. त्यांनी केलेली माणसांची निरीक्षणं यातून त्यांच्या श्रुतिका आणि नाटकेही उत्तम उतरली आहेत. पुलंनी गडकऱ्यांची भाषा संत, पंत आणि शाहिरी अशी तीन्ही वळणे लीलेने घेते असं म्हटलं आहे. पुलंनीदेखील भाषेला हवे तसे वाकवले आहे. सुभाषितवजा वाक्यं लिहिताना त्यांनी म्हणी आणि वाक्प्रचारांचा केलेला वापर, नव्याने 'कॉईन' केलेले शब्द, म्हणी पाहिल्या की थक्क व्हायला होतं. सातारी, कोल्हापूरी, वऱ्हाडी वळणाचं त्यांचं लेखन विविध पात्रांच्या मुखातून ऐकायला मिळतं. पुलंच्या श्रुतिकाही श्रोत्यांना रोचक वाटतात, त्याचं कारण त्यांचं बोलल्यासारखं लिहिणं. वास्तविक, पुलंच्या सगळ्याच लेखनाबाबत तसं म्हणता येईल. त्यांचं लेखन बोलल्यासारखंच आहे. प्रथमपुरूषी एकवचनी उल्लेख असल्यानं त्यांचा लेख वाचताना ते समोर बसून आपल्याशी बोलत आहेत, असंच वाटतं. 'अत्र्यांच्या लेखनात मला बोलक्या शब्दांची क्वॉलिटी सापडली. अत्रे उत्तम वक्ते होते, त्यामुळं त्यांना शब्दांच्या प्रवाहाचा साक्षात्कार झाला होता,' असं त्यांनी म्हटलं आहे. 'शब्द गाते-बोलते हवेत,' अशी त्यांची धारणा होती. बोलल्यासारखं लिहिल्यावर लिहिलेलं पुन्हा कसं बोलावं? हाही प्रश्नच आहे. ते म्हणतात : रेडिओ हा मुख्यतः बोलविता धनी आहे, वाचविता नाही. 'बोलेल तो करील काय?' या प्रश्नाला रेडिओनं चांगलं उत्तर दिलं आहे. जो चांगला बोलेल, तो उत्तम रेडिओ लेखक होईल. हा 'रेडिओ लेखक' शब्द जरा धेडगुजरी झाला. थोडासा वदतो व्याघातही त्यात आला. रेडिओ जर बोलविता आहे, तर तो लिहविता आणि वाचविता कसा? एवढ्यासाठी की इतर काही बंधनापूर्वी तो वेळेचं बंधन मानतो. तुम्ही नाटक लिहा, भाषण लिहा, कविता वाचा, बातम्या सांगा – काय वाटेल ते करा, समोरचा मिनिटाचा पंजर विसरून काहीही करता येत नाही. इथं शब्द सेकंदाच्या तालात मोजून लिहावे लागतात. पण ऐकणाऱ्याला बोलणारा मोजूनमापून बोलतो आहे हे न कळता मोजूनमापून बोलावं. म्हणजे सहजतेची गंमत हवी, आणि चालायचं आहे तारेवर.

पुलंनी 'रेडिओसाठी लिहावं कसं' यावर रेडिओवर दिलेल्या भाषणातून वरील मुद्दा घेतला आहे. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या कसोट्या त्यांच्याच श्रुतिका आणि नभोनाट्यलेखनाला लागू पडतात. पुलंचं लेखन उच्चारासह असतं. त्यांची भाषा लवचिक आहे. आपल्या नेहमीच्या बोलीभाषेतील संवादामुळं त्यांचं लेखन आपलंसं वाटतं.

'मी हात दाखवतो,' 'मी अभ्यास घेतो', 'मी कपडे शिवतो' अशा काही श्रुतिकांमधून पुलंनी मध्यमवर्गीय घराघरातील संवादांनी सर्वांना हसवलं आहे. 'मी हात दाखवतो'मध्ये ''तुम्ही नाही का म्हणाला, माझं इंग्लिश कच्चं आहे – सारखं इंग्लिश बोललं की सुधारेल म्हणून! इंग्लिश लोक सारखं इंग्लिश बोलतात म्हणून त्यांचं इंग्लिश सुधारतं. तुम्हीच नाही का सांगितलंत?'' किंवा वडिलोपार्जित इस्टेटीतील काही तरी येणार तुमच्यापर्यंत असं हस्तरेषातज्ज्ञ नाबर म्हणतात तेव्हा, '' वडलांना दमा होता आमच्या. तेवढा ठेवलाय आमच्यासाठी. त्याखेरीज काही ठेवलं नाही'', असं म्हणून ते हशा मिळवतात. भविष्याबाबत काही शंका विचारल्या तर त्याचं उत्तर देता यायचं नाही हे ओळखून हस्तरेषातज्ज्ञ नाबर सुनावतात, ''या भविष्याच्या बाबतीत भलत्या शंका विचारलेल्या रूचत नाहीत. मी स्पष्टच सांगतो. रागावू नका. मी कडक मंगळाचा माणूस, नको म्हटलं तरी तोंडातून शब्द जायचा तो जरा तिखटच!'' या श्रुतिकेतील अण्णा आणि त्याच्या कुटुंबाचं भविष्य सांगता सांगता नाबर अण्णांच्या पत्नीला शांताला त्यांचा गळा गोड असल्याचं सांगतात आणि सराव केल्यास उत्तम गायिका होण्याची चिन्हे असल्याचं भविष्य वर्तवतात.

नाबर – तुम्ही सकाळी उठून तंबोऱ्यावर स्वच्छ मेहनत करा.
अण्णा - मी?
नाबर – तुम्ही नाही हो! ह्या. नाही गळा तयार झाला तर दुसऱ्याचा सोडा, माझा हातदेखील मी हातात धरणार नाही - हां!

नाबर यांच्या अशा प्रोत्साहनानं मग शांताबाई गाणं शिकायला लागतात. 'मी अभ्यास घेतो'मध्ये त्यांच्या आवाज नसताना गाण्याच्या अट्टहासाची खिल्ली ते उडवतात. त्या गायला लागतात, तेव्हा अण्णा त्यांना म्हणतात, 'हळू.' कारण ते मुलांचा अभ्यास घेत असतात. एकाचवेळी शांताच्या गाण्याचा अभ्यास आणि दुसरीकडं मुलांचा अभ्यास यातून जी गंमत होते, ती पुलंनी सुरेख फुलवली आहे. शांताला अस्ताईचा सराव करायला सांगता सांगता, आईपेक्षा मुलगा शंकरच 'लट उलझी सुलझा' ही ओळ छान म्हणतो. तेव्हा छबीही तसं म्हणू लागते. अण्णा खेकसून म्हणतात, छबे गणित सोडवायचं ना तुला? तेव्हा शंकरनं गाणं म्हटलं की, असा हवाला ती देते. अण्णा म्हणतात, 'तो मुर्ख आहे.' छबी चटकन म्हणते, 'मग आई म्हणते ते? ती काय मुर्ख आहे?' तिच्या या बिनतोड युक्तिवादावर अण्णा निरूत्तर होतात. शेवटी छबी म्हणते की तिला आईसारखं गाणं म्हणायचं आहे. अभ्यास सोडून गाणं म्हणायला विरोध करण्यासाठी अण्णा म्हणतात, '' छबे, चावटपणा नाही -'' गाणं शिकवणारे नाबर गुरूजी त्यामुळं नाराज होतात. सुमार दर्जाचं असलं गाणं अण्णांना आवडत नसतं. पुलंनी असल्या शिकण्याची रेवडी मस्त उडवली आहे. 'गाणं ही सोपी गोष्ट नाही,' हेच त्यांनी ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. हौशी गायकांना मारलेला हा टोमणा मजेशीर आहे.
रेडिओ ऐकणारा जो वर्ग आहे, त्याची नस पुलंनी ओळखली होती, त्यामुळं त्यांच्या श्रुतिका त्यांच्या अन्य लेखनासारख्याच खुमासदार आहेत. रेडिओवर त्यांनी दिलेली विविध विषयांवरील भाषणेदेखील त्यांच्या खुसखुशीत लेखणीचा प्रत्यय देणारी आहेत. अफाट वाचन, सुक्ष्म निरीक्षण शक्ती, मानवी स्वभावातील उण्या-अधिक गोष्टी, विनोदी शैली यामुळं त्यांची भाषणं, श्रुतिका कलाक्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच भूरळ घालणाऱ्या आहेत. कारण नृत्य, नाट्य, गायन, वाद्यवादन, चित्रकार, इतकंच नव्हे तर सर्व प्रकारच्या कौशल्य असलेल्या शिंपी, धोबी, सुतार अशा माणसांबद्दल पुलंनी जाणीवपूर्वक किंवा जाता-जाता केलेली शेरेबाजी खूप शिकवणारी आहे. प्रत्येक पात्रासारखी होणारी त्यांची लवचिक भाषा श्रोत्यांना त्या पात्राबरोबर वाहवत नेते आणि हितगूज साधल्यासारखी त्यांची भाषणशैली पुलं आपल्या पुढ्यात बसूनच जणू आपल्याशी बोलत आहेत, असा प्रत्यय देणारी आहे. रेडिओ माध्यमाचं मर्म नेमकं ओळखलेल्या पुलंनी त्या माध्यमासाठी केलेलं लेखन विषयदृष्ट्या कालबाह्य वाटत असलं तरी शैली म्हणून ते लेखन चिरकाल अभ्यास करण्यासारखं आहे, यात शंका नाही.

रजनीश जोशी,
सोलापूर

Tuesday, November 8, 2022

निर्मळ, निखळ आनंदाचा दिवस - किशोरी तेलकर

नाटकांचं रूपांतरही असं अस्सल मराठीत केलंत, की कळूच नये हे रूपांतर आहे! नाटक असो वा सिनेमा, आपला शेर संपला, की तुम्ही तिथं न रेंगाळता पुढं निघालात. तुम्हीच आम्हाला दर्जेदार कवितांचा आस्वाद घ्यायला शिकवलंत.

प्रिय पु. ल.

वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आज तुम्ही १०३ वर्षांचे झालात... हो, झालातच! तुमच्याबाबत भूतकाळवाचक कुठलंही क्रियापद वापरायला मन धजत नाही. याचं कारण शरीरानं तुम्ही २२ वर्षांपूर्वी हे जग सोडून गेला असलात, तरी आजही तुम्ही तुमच्या अक्षर वाङ्मयाच्या रूपानं, तुमच्या सिनेमांच्या रूपानं, तुमच्या गाण्यांच्या रूपानं, तुमच्या एकपात्री व्हिडिओंच्या माध्यमातून आमच्यात आहातच. बहुतांश मराठी घरांत तुमचं एखादं तरी पुस्तक असतंच. आजही प्रवासाला जाताना ‘बोअर झालं तर वाचायला असावं’ म्हणून तुमचंच एखादं पुस्तक सहज बॅगेत टाकलं जातं. पुस्तक प्रदर्शनांतील पुस्तक विक्रीत तुम्ही आजही टॉपवर आहात. तुमच्या नावाचा सिनेमा निघाला, की तो पहिल्या दिवसापासून हाउसफुल्ल! तुमच्या नावे फेसबुकवर एखादा ग्रुप स्थापन झाला, की तो काही दिवसांत लाखभर सदस्यसंख्या सहज गाठतो. एकेकदा वाटतं, सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात तुम्ही असता, तर तुम्ही तेही जग केव्हाच पादाक्रांत केलं असतं; पण एक मन म्हणतं, नकोच ते! आजच्या या उथळ, थिल्लर आणि क्षणिक ‘मनोरंजना’च्या जमान्यातल्या कथित विनोदांपेक्षा तुमचा साधा-सोपा, निर्मळ, निर्विष विनोद किती तरी उच्च पातळीवरचा होता. महाराष्ट्रातल्या किती तरी पिढ्यांचं पोषण या दर्जेदार विनोदावर झालं आहे. अभ्यासातून, चिंतनातून, सूक्ष्म निरीक्षणातून तुम्ही मांडत असलेली विसंगती आम्हाला हसवता हसवता खूप काही शिकवून जात होती. तुमच्यामुळं आम्हाला परदेशी भाषांतलं दर्जेदार साहित्य मराठीत अनुभवता आलं. नाटकांचं रूपांतरही असं अस्सल मराठीत केलंत, की कळूच नये हे रूपांतर आहे! नाटक असो वा सिनेमा, आपला शेर संपला, की तुम्ही तिथं न रेंगाळता पुढं निघालात. तुम्हीच आम्हाला दर्जेदार कवितांचा आस्वाद घ्यायला शिकवलंत.

सुनीताबाईंच्या जोडीनं महाराष्ट्रभर कवितावाचनाचे प्रयोग करून तुम्ही रसिकांना अपरंपार आनंद दिलात. गांधीजींपासून रवींद्रनाथांपर्यंत अनेकांचं महत्त्वाचं समकालीन साहित्य भाषांतरित केलंत. रेडिओवर काम केलंत. ‘दूरदर्शन’चे पहिले निर्माते झालात. तुमच्याच डोळ्यांनी आम्ही लंडन, पॅरिसची ‘अपूर्वाई’ अनुभवली. तुमचंच बोट धरून सिलोन ते जपान असा ‘पूर्वरंग’ही बघितला. वयाच्या पन्नाशीत बंगाली शिकलात आणि ‘माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो,’ हे स्वत:च्या वागणुकीतून सिद्ध केलंत. तुम्ही या मातीवर, मराठी भाषेवर, इथल्या माणसांवर मनापासून प्रेम केलंत; जगण्याचं प्रयोजन शिकवलंत! समाजाचं देणं समाजाला कसं (न बोलता) परत करावं हे शिकवलंत. गुणग्राहकता कशी असते, हे स्वतःच्या वागणुकीतून दाखवून दिलं. आपणही असं अर्थपूर्ण जगलं पाहिजे, असं तुमच्या आयुष्याकडं बघून वाटावं, एवढं रसरशीत, स्वच्छ जगलात! विनोदाच्या माध्यमातून मराठी जनांच्या मनाची मशागत करीत तुम्ही विनोदाची ही दिंडी अभिमानानं आयुष्यभर खांद्यावर मिरविली. ही दिंडी एवढी चैतन्यशील आणि देखणी होती, की मराठी माणूस वारकऱ्यांच्या भक्तिभावाने तुमच्या मागून विनोदाचं, आनंदाचं गाणं गात गात चालत निघाला. म्हणूनच तुमची आनंदयात्रा आजही सुरूच आहे. तुमच्या साहित्यावर, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या रक्तात आता हा आनंदयात्री आहे!

- चकोर
महाराष्ट्र टाईम्स 

Monday, November 7, 2022

ब्रिज-देशपांडेंची भाईगिरी - मंदार केसकर

८ नोव्हेंबर पुलंचा जन्मदिन..

एखादी व्यक्ती आपल्या वक्तृत्वाने, लिखाणाने, शुद्ध सात्विक आचरणाने अनेक उत्तमोत्तम पिढ्या घडवू शकते याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे "पु.ल." ! सबकुछ पु.ल., पुलकित, पुलोत्सव, पुलमय, पु.ल. डे.... आणि बरचसं असच जे काही अप्रतिम ते सर्व फक्त "फुल्ल देशपांडे" च म्हणावं लागेल ! सर्व स्तरातील मित्रांशी लीलया मैत्री करून आपलं स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवण्याची खासियत शिकवणारा... साहित्य, कला, संस्कृतीच्या प्रांतात आपली "भाईगिरी" निर्माण करणारा एक "बाप माणूस" !

खरं तर "भाई" हा शब्द आजच्या काळात समाजात वेगळ्या अर्थानं रूढ झालाय पण सगळ्याच प्रांतात कोणीतरी एक "भाई" असतोच ! तसंच साहित्य, कला, संस्कृतीच्या प्रांतातही "पु.ल." नावाच्या "भाईनं" आपलं प्रेमळ साम्राज्य स्थापन केलय व ते अजूनही कित्येक शतकं टिकणारय यात काही शंकाच नाही. हा "भाई" अदृश्य रूपाने अनेकांची साथसंगत करतोय, कुणाला आपल्या साहित्यातून शहाणं करतोय, कुणाला समजावतोय तर कुणाला धीर देतोय व आपल्या "भाईगिरी"ची उपाधी सार्थ ठरवतोय हे मान्यच करावे लागेल. मला तर या "भाईने" बोटाला धरून शिकवल्याचा कधी कधी भास होतो. त्यांनी रंगवलेली व्यक्तिचित्र कोणत्या ना कोणत्या रूपाने सतत आपल्या अवतीभवती फिरल्याचा आभास होणं म्हणजेच ही "भाईगिरी" ...पण .... ती प्रेमाची, आपुलकीची !

ज्या व्यासपीठावर जातील तिथं "आपला माणूस" हा विश्वास निर्माण करणारे व "आपला माणूस" म्हणून Heart मध्येच रुतून बसणारे "पु.ल." म्हणजे साहित्यातील "तेजस्वीनावधीतमस्तु | मा विद्विषावहै। " या वेदातील शेवटच्या प्रार्थनेप्रमाणे आहेत. बालपणापासून गेली 30-35 वर्षे झाली मी पुलंच्या सर्व व्यक्तिरेखा आधी कॅसेट्स, मग सीडी व आता usb च्या माध्यमातून ऐकतोय पण प्रत्येकवेळी मला आजच ऐकतोय हा भास होतो. त्यामुळं त्यांची प्रत्येक व्यक्तिरेखा अजूनही माझ्या मनात त्याच वयाची व जिवंत झऱ्याप्रमाणे वाहतेय. उदाहरणच द्यायचं तर त्यांनी रंगवलेला "सखाराम गटणे" चा आज सहस्त्रचन्द्रदर्शन सोहळा झाला असेल किंवा "चितळे मास्तर" आज दीडशे वर्षाचे झाले असतील पण ही माणसं अजूनही हजारो लोकांच्या मनात ताजीतवानी आहेत ती केवळ पुलं च्या शब्द सामर्थ्यानेच ! पुलं नी आम्हा सर्व पिढ्याना माणसं वाचायला, ऐकायला, मिळवायला व जोडायला शिकवलं... त्यांच्या ऐकलेल्या व्यक्तिरेखेच्या जोरावर कोणत्याही गप्पांच्या मैफिलीत पहिल्या रांगेत बसण्याचं धाडस त्यांच्या साहित्यानं कित्येकांच्या अंगात निर्माण केलं अस म्हणणंच एकदम रास्त ठरेल !

प्रवासाला जाताना एस. टी. स्टँडवर पोट खपाटीला गेलेला एखादा वृद्ध कुठंतरी "अंतुबर्व्याची" आठवण करून जातो, शाळा सुटल्यावर रस्त्याच्या कडेने दोरी धरून सरळ जाणारा चपचपीत तेल लावून भांग पडलेला एखादा विद्यार्थी "सखाराम गटणे" सारखा दिसतो, कष्टाचे काम झाल्यावर तपकीर ओढत बसलेला एखादा चिवट म्हातारा उगीच "पेस्तनकाका" सारखा डोळे मिचकावून जातो, अंगात कोट व रस्त्याने चपल्या झिजवत आपल्याच स्वानंदात जाणारे एखादे आजोबा "चितळे मास्तर" सारखे भासून जातात. आपल्या नावीन्यपूर्ण कलेतून रसनिष्पत्ती करणारा जणू छोटेखानी विद्यापीठच चालविणारा "पट्टीचा पानवाला" हा "थुंकसांप्रदायिक" लोकांना जाता-जाता काही-काही फुटांवर 'भाईंची' आठवण करून देतो. "हरितात्या" इतिहासाच्या पानापानात जाऊन जगले पण कित्येक जण 'भाईंच्या' या पात्रांसोबत जगतायत ! एखाद्या संगीत मैफिलीला गेल्यावर आपली उगीच अवघडलेली मान सैल करण्यासाठी मानेला दिलेला हिसडा जेव्हा समोरच्या गाणाऱ्याला उत्तम दाद वाटते तेव्हा उगीच आपण "रावसाहेब" झाल्याचा फील देऊन जातो, तर एखाद्या मित्रमंडळींच्या कार्यात जीव तोडून event management प्रमाणे सिस्टीमॅटिक केलेले कष्ट सुद्धा "नारायणा" ची अचूकता साधायला थोडे कमीच पडतात आणि ओशाळल्यासारखी भावना निर्माण होते..यासारखी अनेक 'पुराव्यानी शाबित' होणारी 'हंड्रेड परसेंट रियल' विसंवादी पात्रं "भाई" आमच्या सोबतीला सोडून गेले आहेत.

निवांत वेळेत काम करताना, कुटुंबासोबत किंवा एकटे लांबच्या प्रवासात, ड्राईविंग करताना, रात्रीच्या वेळी कंटाळा आल्यावर दिवसातील कोणत्याही वेळी ही "भाई" ची माणसं तात्काळ हजर आहेत त्यामुळं एकटेपणा वाटायची काय बिशाद आहे ?

आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त या "भाईच्या ओसरीवर" वेळ मिळेल तसं खोडकर पणानं थोडंफार दंगा करून जावं म्हणजे तेवढंच ताजतवानं होईल म्हणून हा लेखप्रपंच..!

कारण त्यांच्या कोणत्याही व्यक्तिचित्राला वयाचं बंधन नाही. मी लहान असतानाही "रावसाहेबांच्या" अड्ड्याचा मेंबर होतो, आताही आहे आणि पुढेही राहणार व त्यांच्या दर तीन शब्दांनंतर येणाऱ्या "आलं तेच्या आयला...." सारख्या "झकासपैकी छप्पर उडवून देणाऱ्या" कचकावून दिलेल्या शिवीचा मनसोक्त आस्वाद घेणार !

अनेक व्यक्तीचित्र जीवंत ठेवलेल्या व्यक्तीवर चार ओळी लिहिणं म्हणजे सुध्दा त्यांच्याच भाषेत " पं. कुमारजींच्या मैफिलीत श्लोक म्हणून दाखवल्यासारखं" आहे... पण हे लिहिण्याचं धाडसही त्यांच्याच ऐकलेल्या, वाचलेल्या साहित्यामुळंच आहे हे मात्र 100% खरं ! कित्येकांचं साहित्य वाचताना "अनुवंशिकता" ही वाचलेल्या, ऐकलेल्या साहित्यातूनही निर्माण होऊ शकते हा विश्वास निर्माण झाला व कधीही भेट नसताना "पोटीचा जिव्हाळा" उत्पन्न झाला ! इतिहासात "बाजीप्रभू व मुरारबाजी देशपांडेंच्या" वीररसामुळे अनेक 'मावळ्यांना' लढण्याची उमेद निर्माण झाली तर आजच्या काळात "पुलं देशपांडेंच्या" साहित्यरसामुळे लिहित्या 'हातोळयाना' प्रेरणा मिळत गेली म्हणणेच योग्य होईल ! ह्या "ब्रिज देशपांडे (पुलं)" खालून माझ्यासारख्या सर्वसामान्यासारखे अनेक जण वहाते होत गेलेत व छान पैकी तरून जाताहेत ! तरुन जाताना या "ब्रिज" चा नक्कीच आधारासाठी उपयोग होतोय.... हा "ब्रिज देशपांडे" आम्हांला नेहमीच वाहते आणि लिहिते होण्यासाठी म्हणा किंवा मनं जोडण्यासाठी म्हणा "दीपस्तंभा" प्रमाणे अंतापर्यंत मार्गदर्शन करत राहणार ...!

"भाईंची"ही "भाईगिरी"..'बिगरी ते मॅट्रीक' च नाही तर 'बिगरी ते डिग्री' व त्याहीपुढे 'डिग्री ते तिरडी' पर्यंत आमच्यावर "राज्य" करणार हे नक्कीच !

मंदार मार्तंड केसकर, पंढरपूर
मोबा. 9422380146
mandar.keskar77@gmail.com

a