Leave a message
Showing posts with label पत्र. Show all posts
Showing posts with label पत्र. Show all posts

Wednesday, May 22, 2024

कानिटकरांनी लिहिलेल्या पत्राला पुलंचे उत्तर..

पुलंचा सत्कार करावा म्हणून कानिटकरांनी पत्र लिहिलं त्याला उत्तर देताना (दिनांक ९.४.७७) पु.ल. म्हणतात..

तुमचे पत्र मिळाले तुमच्या आणि आनंदच्या सदभावना मी समजू शकत नाही असे नाही. परंतु तुम्ही योजित असलेल्या सत्काराला मान्यता द्यायला माझ्या मनाला प्रशस्त वाटत नाही.

हाती आलेल्या पैशांचा समाजिक सत्कार्यासाठी उपयोग करावा या भावनेनेच मी व सुनीताने आवश्यकतेहून अधिक पैसे न खर्च करता संसार केला. फार मोठे त्यागपूर्ण जीवन जगलो असे नाही. परंतु चैनीच्या बाबी मर्यादित ठेवल्या. विशेषतः सुनीताने घरात नोकरचाकर, स्वैपाकी वगैरे न ठेवता सारी कामे, एखाद्या मध्यम उत्पन्नात संसार करणाऱ्या गृहिणीसारखी स्वतःच केली. ही सारी काटकसर आणि व्यवहाराबाबतची दक्षता आपल्या मिळकतीचा लाभ सामाजिक कार्याला मिळावा ह्या हेतुनेच पाळलेली होती. सुदैवाने आम्हा दोघांनाही भपकेबाज राहणीची हौस नाही. त्यामुळे हे सारे जमले. ह्याबद्दल सत्कार किंवा गौरव याची खरोखरच अपेक्षा ठेवली नाही. तेंव्हा आजवर जे टाळत आलो ते तसेच चालू ठेवावे असे वाटते.

तुम्ही आणि आनंद यादव भेटलात तर आनंदच वाटेल. आधी फोन करून कळवा म्हणजे निवांतपणे गप्पागोष्टी करता येतील.

तुमचा
पु. ल. देशपांडे


Wednesday, November 1, 2023

वो फिर नही आते...! - (संजीवनी इतक्याल)

आपल्या आयुष्यात काही लोकांचे स्थान अतिशय जवळचे असते. त्यांचा आणि आपला जणू वेगळाच ऋणानुबंध असतो. आपण कधीही त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतो. आपल्या ज्या गोष्टी कोणाला सांगायला धजावणार नाही अशा गोष्टी त्यांना सांगत असतो. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत असतो. त्यांच्यावर हक्काने रागावत असतो, रुसत असतो.

आपल्याकडे एखादे कार्य असले आणि ते नाही आले तर खूप रुखरुख लागून राहते. सगळे आले आणि कार्यही सुंदर रीतीने पार पडले तरी. आणि त्यांच्याकडे एखादा कार्यक्रम असला आणि आपण नाही जाऊ शकलो तर त्यांनाही असेच वाटते.

पण कधी तरी बोलण्यातून एखादा गैरसमज होतॊ. आपण संतापून किंवा रागावून त्या व्यक्तीला असे काही बोलतो की ती व्यक्ती आपल्याला कायमची दुरावते.

मी मधू गानू यांचं 'सहवास गुणीजनांचा ' हे पुस्तक वाचत असताना "पु ल देशपांडे" यांनी "मधू गानू" यांना लिहिलेलं एक पत्र माझ्या वाचनात आलं. सहसा पु ल गंभीर लिहीत नाहीत. पण हे पत्र मात्र तशा प्रकारचं आहे. हे पत्र वाचताना पुलंच्या हळव्या आणि संवेदनाक्षम मनाचा प्रत्यय येतो. वाचता वाचता नकळत आपणही अंतर्मुख होतो.

या पत्राचं वैशिष्ट्य असं की हे पत्र पुलंनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात लिहिले आहे. त्यात निरवानिरवीची भाषा आहे. इतरांसाठी पुलंनी आणि सुनीताबाईंनी केलेल्या त्यागाचा उल्लेख आहे. त्यामुळे हे पत्र आपल्या घरातीलच कोणी वडीलधाऱ्या माणसाने आपल्याला लिहिलं आहे असं वाटतं.

या पत्राची पार्श्वभूमी थोडक्यात अशी. "मधू गानू" हे पुलंच्या अत्यंत निकटचे. जणू त्यांच्या घरातीलच एक. पण काही कारणाने मधू गानूंचा गैरसमज झाला आणि त्यांनी संतापून पुलंना नको ते लिहिले आणि जणू त्यांच्यातले संबंध तुटणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. या प्रसंगी पुलंनी त्यांना जे पत्र लिहिलं ते अप्रतिम आहे. निमित्त जरी मधू गानूंचं असलं तरी ते तुम्हा आम्हा सर्वांनाच मार्गदर्शक आहे. या पत्रात पुल म्हणतात -

'' ...माणसाने एकदा स्वतःच्या विचारशक्तीचा ताबा रागाच्या स्वाधीन केला की प्रत्येक कृती विपरीत दिसायला लागते. सहानुभूतीपूर्वक, समजूतदारपणे विचार करण्याची शक्तीच नाहीशी होते. तू रागावलास, रुसलास, चिडलास तरी हरकत नाही. आपण कोणीच रागलोभ जिंकलेले संतमहंत नाही. पण त्याची परिणीती ' मधू मेला ' अशासारखी वाक्ये लिहिण्यात होऊ नये... तू आमच्या घरी येणार नाही असे म्हटलेस तरी तू जिथे असशील तिथे आम्हाला यावे लागेल. आयुष्यात फारतर एक किंवा दोन माणसे अशी येतात, की जिथे क्षुद्र व्यक्तिगत मानापमानाचे विचार उद्भवण्यापूर्वीच मोडून टाकावे लागतात. अशी स्नेहबंधने फार नसतात. तसे परिचित किंवा मित्रआप्त वगैरे खूप असतात. पण जिथे स्नेहबंधने एकरूपता असते अशी नाती कुठल्या तरी पूर्वयोगाने जमली असावी असे म्हणण्याइतकी दुर्मिळ असतात. सुखदुःखाच्या क्षणी त्यांनी जवळ नसणे हे दुःसह असते. अशा माणसांनी ही अशी आततायी वृत्ती धरून चालत नसते. "

पुल पुढे लिहितात, " हसून खेळून आयुष्यातली दुःखे कमी करीत जगण्याची संधी असताना आपणच आपली आयुष्ये रागाने मलीन करीत असतो. राग येणे आपल्या हाती नसेल पण तो वाढीला न लागू देणे आपल्याच हाती असते. आपल्या अडचणी किंवा दुःखे व्यक्त करायच्या जागा माणसाला फार थोड्या लाभतात. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसे याच त्या जागा... "

असे खूप काही सुंदर या पत्रात आपल्याला वाचायला मिळेल. ज्यांना इच्छा असेल त्यांनी मुळातून वाचावे. जागेच्या आणि वेळेच्या मर्यादेअभावी येथे सर्व लिहिणे शक्य नाही.

पण हे पत्र वाचल्यावर मला "किशोरकुमारने" गायलेलं

'जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम
वो फिर नही आते...'

हे 'आपकी कसम' या चित्रपटातलं गाणं आठवलं. एकदा अशी माणसं दुरावली की ती पुन्हा नाही येणार. म्हणून जपा आपल्या माणसांना जी आपल्यावर जीवापाड प्रेम करतात.

- संजीवनी इतक्याल

Friday, December 9, 2022

हसरे दुःख

प्रिय भा. द.

'हसरे दुःख' वाचून झाले. ह्यापूर्वीच पत्र पाठवायला हवे होते. परंतु गेले दोन- तीन महिने फार गडबडीचे गेले. त्यामुळे निवांतपणे पत्र लिहिणे जमले नाही. त्यातून हल्ली मला जडलेल्या कंपवाताच्या विकारामुळे हात थरथरतो आणि लेखन कष्टदायक होते. दुर्वाच्यही होते. लिहिण्यातला उत्साह ओसरतो. नाईलाज आहे. 

चॅप्लिन हा विनोदी लेखक, नट, चित्रपट-दिग्दर्शक. अशा कलावंतांचा परात्पर गुरु आहे. त्यांच्या निर्मितीतला आनंद लुटताना संगीतातल्या स्वयंभू गंधारासारखा, जीवनात वारंवार येणाऱ्या कटु अनुभवांचा अनाहत नाद उमटतो. त्या अनुभवाला तोड नाही. जगण्याची ही 'कळवळ्याची रीती' त्याच्या दर्शनी विनोदी असणाऱ्या कथेतून आणि अभिनयातून सतत जाणवत राहते. चॅप्लिनच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा हा मूलमंत्र तुम्ही नेमका टिपला आहे.

प्रचंड दारिद्र्य आणि त्या पोटी जन्माला येणारी भूक, मानहानी, आजार ही भुतावळ दरिद्री माणसाच्या मानगुटीवर सदैव बसलेली असते. त्यात 'भूक' हे महाभूत. ह्या भयंकर भुताने छळलेले चॅप्लिन कुटुंब! रोजची दुपार कशी ढळेल याची चिंता करीत त्या दरिद्री संसाराचा गाडा ओढणाऱ्या हॅनाची ती जीवघेणी धडपड, चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांच्या अभागी बालपणातले मनाला चटका लावून जाणारे प्रसंग तुम्ही कमालीच्या आत्मीयतेने रंगवले आहेत. चरित्रनायकाशी तुम्ही साधलेली एकरुपता हे तुमच्या ग्रंथाचे ठळक वैशिष्ट्य मानले पाहिजे. केवळ तपशिलाने भरलेली माहिती असलेले हे लेखन नाही. चॅप्लिनच्या अभिनयाचे, त्याच्या कथांचे विश्लेषण वगैरे करण्याचा इथे अट्टाहास नाही. खूप सहृदयतेने आणि जिव्हाळ्याने सांगितलेली चार्ली नावाच्या महान कलावंताच्या जीवनाची कहाणी आहे.

ह्या रचनेत कल्पनाविलास नाही. इष्ट परिणामासाठी घुसडलेल्या निराधार दंतकथांना इथे स्थान नाही. या कहाणीतला जिव्हाळ्याचा सूर मात्र मन हेलावून टाकणारा आहे. 

हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी तुम्ही चार्लीचे चित्रपट आणि चॅप्लिनविषयक साहित्य याचा कसून अभ्यास केल्याचे ध्यानात येते. पण तुमची भूमिका कलावंत साहित्यिकाची आहे. तपशील गोळा करून ते ओझे कागदावर रिकामे करणाऱ्या पढिक पंडिताची नाही. चॅप्लिनचे मोठेपण जाणवते ते तुमच्या कसलाही आव न आणता केलेल्या साध्या लिखाणामुळे. म्हणून चॅप्लिन हा मोठेपणाच्या उच्चास्थानावर बसलेला थोर माणूस वगैरे न वाटता वाचकाला मित्रासारखा वाटतो. वाचकाशी चरित्रनायकाचा असा स्नेहभाव जुळवणे ही तुमची किमया आहे. ह्यातच तुमचे चरित्रकार म्हणून यश आहे. कथेचा ओघ कुठेही न अडता चालू राहिला आहे. 

मराठीत एक चांगले चरित्र आल्याचा आल्हाददायक प्रत्यय आला. मनाला खूप समाधान वाटले. तुमचे अभिनंदन करतो आणि चार्ली चॅप्लिनचा एक परमभक्त या नात्याने तुम्हाला धन्यवाद देतो. 

-भाई

Tuesday, November 22, 2022

पंचनामा

सगळ्या पोलिसी व्यवहारात 'पंचनामा' हा तर एक अजब प्रकार आहे. नमुनेदार पंचनाम्यांचा संग्रह जर कुणी छापला, तर तो एक उत्तम विनोदी ग्रंथ होईल. एका चोरीच्या प्रकरणातला पंचनामा मला वाचायला मिळाला होता. त्यात हवालदारासाहेबांनी पहिलेच वाक्य लिहिले होते - “चोरट्यांनी मालकांची परवानगी न घेता घराच्या दक्षिण दिशेच्या खिडकीतून प्रवेश केला होता.” मी हवालदारांना विचारले, "अहो हवालदारसाहेब, चोर कधी आगाऊ परवानगी घेऊन, 'आपली हरकत नसेल, तर थोडीशी चोरी करावी म्हणतो' अशी विनंती करून गज वाकवायला घेतात का ?” हवालदारांनी मला, “फालतू बकबक नाय पायजे" म्हणून चारचौघांपुढे बजावले आणि अशा थाटात माझ्यावर नजर रोखली की मालकाची परवानगी न घेता त्या दक्षिणेच्या खिडकीतून शिरलेला चोर मीच असेन अशी त्याला शंका आली की काय, असे मला वाटायला लागले.

जमिनीच्या कज्ज्यात सातबाऱ्याच्या उताऱ्याचे जे स्थान, तेच फ़ौजदारी कज्यात पंचनाम्याचे. पण खरी गोम आहे ती म्हणजे पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून सही ठोकणारे पंच न्यायालयात चक्क उलटतात ते. खोटी साक्ष देणे हा परदेशात फार मोठा गुन्हा मानला जातो. आपल्याकडे पंचनाम्यात एक आणि कोर्टापुढल्या जबानीत नेमके त्याच्या उलट हा प्रकार वैध मानला जातो. त्यामुळे 'पंचनामा' हा प्रकार खऱ्याखोट्याची फारशी चाड बाळगणारा नाही अशीच सर्वांची कल्पना असते. असल्या ह्या नुसत्या बोटावरची थुंकी चालवण्यासारख्या खेळात गुन्हेगार सुटण्याची शक्यताच अधिक दिसल्यावर पोलिसांना वैफल्याची भावना आली, तर त्यात नवल नाही.

अशा परिस्थितीत कायद्याबद्दलचा आदरच नाहीस व्हायला लागला आहे. आपण वेळोवेळी लोकशाही आणि लोकशाहीतल्या नागरिकस्वातंत्र्याच्या घोषणा देत असतो. पण ह्या स्वातंत्र्याच्या योग्य वापरासाठी आपल्या कर्तव्याला जागण्याची अट स्वतःवर लादून घ्यायला तयार नसतो. तिथे फक्त स्वार्थच पाहतो.

(मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर श्री. वसंतराव सराफ ह्यांना १८ ऑक्टोबर १९८९ रोजी पाठवलेल्या पत्रातून)
पुस्तक - गाठोडं

संपूर्ण पत्र वाचण्यासाठी खालील लिंकवरून पुस्तक मागवा.


Sunday, September 11, 2022

वैवाहिक जीवनातील समस्यांबद्दल पुलंचे एक सुंदर पत्र

पुलंच्या प्रचंड पत्रव्यवहारातील हे एक वेगळे पत्र. वैवाहिक जीवनातील समस्यांबद्दल पुलंनी अतिशय समजुतीच्या सुरात लिहिलेल्या या पत्राचे म्हणूनच महत्त्व. या पत्रातील नावे मुद्दाम बदलण्यात आली आहेत.

सुमन,

मुंबईहून परत आल्यावर तुझे पत्र मिळाले म्हणून उत्तर पाठवायला उशीर झाला. तुझे पत्र वाचून खूप वाईट वाटले. अत्यंत समंजस सुशिक्षित सुसंस्कृत अशा तुमच्यासारख्या तरुण जोडप्याच्या आयुष्यात ही अशी विपरीत घटना का घडून यावी हे समजत नाही. त्यातून पती-पत्नी संबंधांचे धागे इतके नाजूक आणि गुंतागुंतीचे असतात की त्यातून दुःखदायक तणाव नेमके कशामुळे निर्माण झाले हे त्रयस्थाला कळणं जवळजवळ अशक्य असतं. अशावेळी हे धागे जोडून ठेवावे की तोडून ठकावे याबद्दलचा सल्ला द्यायला आपण खरोखरीच समर्थ आहोत का, असा विचार मनाला कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचू देत नाही.

परदेशात लग्न हा एक करार आहे. इतर कराराप्रमाणे तो कोरडेपणाने तोडला जातो. पण वरपांगी तो जरी कोरडेपणाने तोडला गेल्यासारखा वाटला तरी पती-पत्नी या नात्याने एकदा एकत्र आल्यावर ते नाते करारासारखे कोरडे राहूच शकत नाही. कारण कितीही नाकारले तरी त्यात एकमेकांच्या सहवासात काढलेल्या सुखदुःखाच्या, सुख द्विगुणित केल्याच्या दुःख विभागून हलके केल्याच्या आठवणी मनात रुजलेल्या असतात. त्या संपूर्णपणाने उपटून टाकता येत नाहीत. एखाद्या संगीताच्या मैफिलीचा आस्वाद जोडीने घेतलेला असतो. एखादी सुरेख कलाकृती जोडीने पाहून तिचा आस्वाद घेतलेला असतो. एखादी कविता जोडीने वाचलेली असते. एखादा सूर्योदर्य / सूर्यास्त सोबतीने पाहिलेला असतो. एखाद्या क्षणी झालेल्या स्पर्शाने अंगावर काटा फुललेला असतो. या सार्‍या सुखद अनुभूती जाळून नष्ट करता येत नाहीत. पती- पत्नी म्हणून एकत्र नांदले नाही तरी जोडीने काढलेल्या आयुष्यातल्या या आठवणी पुन्हा त्या दिवसांत मनाने नांदायला घेऊन जातच असतात. अशा नाजूक नात्यात विकल्प निर्माण होण्याची कारणेही अनेक असू शकतात. आणि आजवर या परिस्थितीत सापडलेल्या पती-पत्नीमधील दुरावा नाहीसा करण्याच्या प्रयत्नांत माझ्या लक्षात एक गोष्ट आली आहे ती म्हणजे हा दुरावा नेमका कशामुळे निर्माण झाला याचा पत्ता त्रयस्थाला लागतच नाही: 'पटत नाही तर घटस्फोट घ्या' असा उपदेश करणारे तुला भेटतील. पण मला मात्र हा उपाय तुझ्यासारख्या चारित्र्य, शील इत्यादी मूल्यांवर श्रद्धा ठेवणाऱ्या कुटुंबातल्या उत्तम संस्कारात वाढलेल्या मुलीला पुढील आयुष्यात सुखकारक ठरेल असे वाटत नाही. म्हणून हा निर्णय घेण्यापूर्वी झाले-गेले विसरून जाण्याचे सर्व मार्ग मिटले आहेत की काय, याचा शांत मनाने विचार करावा.

ज्या कारणांमुळे आपले एकत्र राहणे शक्‍य वाटत नाही, ती कारणे खरोखरीच दूर करण्यासारखी नाहीत की काय, याची खात्री करावी, शेवटी संसार म्हणजे तडजोड आणि तडजोड याचा अर्थ अन्याय निमूटपणाने सहन करणे असा नव्हे आपला अहंकार काही ना काही कारणाने दुखावला जातो आणि प्रेमाचे दुवे तुटल्यासारखे वाटतात. ज्यामुळे आपला अहंकार दुखावला गेला ते कारण लग्नबंधन तोडण्याइतके महत्त्वाचे आहे का, याचा विचार करायला हवा. अशा प्रकारचे आत्मपरीक्षण ज्याचे त्यानेच करायचे आहे. सुदैवाने माझी तुझ्या सासू-सासऱ्यांशीही ओळख आहे. इतर ठिकाणी आपण ऐकतो त्याप्रमाणे तुला वाटणारा त्रास हा तुझ्या किंवा तुझ्या वडिलांकडून द्रव्य उपटण्याच्या लोभावून होत असेल असे चुकूनही मला वाटणार नाही. त्यांचे शत्रूदेखील त्यांच्यावर अशा प्रकारच्या स्वार्थाचा आरोप करणार नाहीत. उलट तुमच्या वैवाहिक जीवनाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये हीच त्यांची इच्छा असणार तुझ्या वडिलांचीही तुझा संसार मोडला जाऊ नये हीच इच्छा असणार. अशा परिस्थितीत मला सुचतो तो उपाय असा... तू. तुझे आई-वडील, उमेश व त्याचे आई-वडील एवढ्यांनीच एकत्र बसून आपली मने एकमेकांपुढे त्या बैठकीत मोकळी करावीत. बैठकीला बसताना हे संबंध तोडायचे नसून जोडायचेच आहेत या भावनेने एकत्र यावे. It is never too late to mend human relations याबाबतीतही लागू आहे. तोडून टाकण्यात आपल्या अहंकाराला समाधान लाभते. पण अहंकार पोसणे एवढे एकच सुखाचे साधन नसते. तू अजून लहान आहेस. पण एका मुलाची आई आहेस. त्या मुलाचा तुला कायदेशीर ताबा मिळेल. पण त्याची मानसिक वाढ होताना आपल्याला वडील नाहीत- या आघाताचा त्याच्यावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्‍यता आहे. आपल्या समाजात पाश्चात्यांप्रमाणे घटस्फोटिता माता ही घटना सहजपणाने स्वीकारली जात नाही. अशा स्त्रीशी आणि तिच्या मुलाशी आजूबाजूची माणसे पुष्कळदा तऱ्हेवाईक रीतीने वागतात. त्याचा मानसिक जाच फार होतो. या सार्‍या भावी यातनांची शक्‍यता टाळता येण्यासारखी स्थिती उरलीच नाही का, याचा विचार करायला हवा.

दुर्दैवाने आपली संस्कृती पुरुषप्रधान आहे. ती परिस्थिती बदलण्याची चिन्हे मला दिसत नाहीत. त्यामुळे घटस्फोटानंतर एका जाचणाऱ्या बंधनातून स्त्रीला मुक्ती मिळाली तरी तिला आपला परंपराप्रिय समाज सुखाने जगू देत नाही असाच अनुभव आहे. सदैव एक प्रकारचे असुरक्षित आयुष्य तिला कंठावे लागते. परत विवाह केला तरी पूर्वानुभव प्रतिकूल असल्यामुळे नव्या वैवाहिक जीवनाच्या यशापयशाबद्दलही मन साशंकच राहते. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की दोन माणसांना एकत्र राहायचे असेल तर तडजोड ही अपरिहार्य आहे. आणि परस्परांत प्रेमभाव असला की ती तडजोड आपण दुय्यम भूमिकेवर आहोत असे आपणाला वाटूच देत नाही. तसं पाहिलं तर समाजात जगताना सर्वस्वी मुक्‍त रीतीने कुणी जगूच शकत नाही. अनेक आवश्यक-अनावश्यक बंधने पाळतच जगावे लागते. पदोपदी तडजोड करावी लागते, पडते घ्यावे लागते. 'सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम्‌ त्यजाति पंडितः' म्हणतात तसे काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यातूनच आपण बचावतो. मात्र, ज्या तडजोडीसुळे आपण ज्या जीवनमूल्यांना पवित्र मानून जगत आलो तीच टाकून द्यावी लागत असतील तर तसली तडजोड करण्यापेक्षा आपल्या मूल्यांना उराशी धरल्यासुळे भोगाव्या लागणाऱ्या यातना अधिक सुखदायक ठरतील. तेव्हा तुझा हा झगडा तुला सर्वात महत्त्वाच्या वाटणाऱ्या मूल्यांचा आहे, की केवळ तपशिलातीलच 'भेदातून निर्माण झालेला आहे की संपूर्ण गैरसमजावर आधारलेला आहे हे तुमच्या या चर्चेतून निष्पन्न होईल आणि तुला निर्णय घेता येईल. तो निर्णय दुरावलेले संबंध पुन्हा जुळवणारा व्हावा अशी माझी इच्छा आहे. आज उभा राहिलेला पेचप्रसंग तात्पुरता ठरो आणि तुझे जीवन सुखाचे जावो, हीच शुभेच्छा.

माझे हे पत्र सुरेशला दाखवायला माझी हरकत नाही.

तुझा,
पु. ल. देशपांडे
(आणखी पु.ल. - लोकसत्ता)

Monday, August 22, 2022

पार्ले टिळक विद्यालयाच्या अमृत महोत्सव प्रसंगी पुलंनी पाठविलेले पत्र

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे पार्ले टिळक विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. शाळेच्या अमृत महोत्सव प्रसंगी त्यांनी पाठविलेले पत्र.

दिनांक: २१ डिसेंबर १९९५
श्रीमती मालविका वाटवे
मुख्याध्यापिका
पार्ले टिळक विद्यालय
विलेपार्ले

स.न.

यंदा साजर्‍या होणाऱ्या आपल्या शाळेच्या अमृतमहोत्सवाचे प्रसंगी माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित केल्याचे वृत्त वाचून आनंद झाला. गेल्या पंचाहत्तर वर्षात शिक्षण क्षेत्रात अभिमान वाटावा, असे आपल्या शाळेचे स्थान आहे. या काळात पार्ले टिळक विद्यालय सर्वांगिण विकास व्हावा, या ध्येयाने प्रेरित झालेले पार्ल्यातले एक सांस्कृतिक केंद्र ठरले आहे. पारतंत्र्याच्या काळात विद्यार्थ्यांना बंदिस्त करून केवळ परीक्षार्थी न बनवता जीवनात चांगल्या मूल्यांचे जतन करणारे नागरिक बनवण्यासाठी सतत विकासाचे निरनिराळे कार्यक्रम हाती घेतले. विद्यार्थ्यांमध्ये उपजत असणाऱ्या निरनिराळ्या गुणांची वाढ करण्याला सतत प्रोत्साहन दिले. शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुदैवाने सुरुवातीपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची काळजी घेणारे शिक्षक शाळेला लाभले. कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांत प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी तयार झाले. अध्यापन हा केवळ उपजीविकेचा व्यवसाय न मानता शिक्षकांनी आपले व्रत मानले. बदलत्या समाज परिस्थितीत शिक्षणाच्या कार्याला बाजारी स्वरुप येणार नाही, याची दक्षता घेतली.

माजी विद्यार्थांच्या मेळाव्यात शाळेकडून आपल्याला आयुष्यात मोलाचे वाटावे, असे 'काय लाभले, याची चर्चा माजी विद्यार्थी करतीलच.


माझ्या सुदैवाने माझ्या वयाच्या आठव्या नवव्या वर्षापासून माझ्यातल्या साहित्य - संगीत - नाट्य इत्यादी क्षेत्रातल्या लहानशा गुणांचे माझ्या शालेय जीवनात कौतुक करून या शाळेने मला सतत प्रोत्साहन दिले. या कलांच्या क्षेत्रात आपण काहीतरी चांगलं करून दाखवू शकू, हा विश्वास माझ्या मनात निर्माण केला. आजचा माजी-बविद्यार्थी मेळाव्याचा प्रसंग त्या उपकारकर्त्या गुरूजनांचे कृतज्ञ भावनेने स्मरण करणे हा आहे. या प्रसंगी माझ्या गुरूजनांना स्मरणपूर्वक वंदन करतो आणि माझ्याहून वयाने लहान असलेल्या माजी विद्यार्थ्यांना वयाच्या वडीलकीचा आधार घेऊन यशस्वी व्हा, असा आशीर्वाद देतो.

(पु. ल. देशपांडे)
(संदर्भ: पार्ले टिळक विद्यालयाची अमृतमहोत्सवी स्मरणिका, इ.स. १९९६)


Thursday, August 11, 2022

जन गण मन आणि रवींद्रनाथ टागोर - पु.ल. देशपांडे

श्री. रवींद्रनाथांचे 'जनगणमन' हे गीत राजे पंचम जॉर्ज ह्यांच्या स्वागतासाठीच लिहिले होते, अशा अर्थाचे श्री. बाळ जेंरे यांचे पत्र ३ मे'च्या अंकात मी वाचले. आपल्या मताला आधार म्हणून त्यांनी तत्कालीन अँग्लो इंडियन वर्तमानपत्रापैकी 'स्टेटसमन', 'द इंग्लिशमन' ह्यांत आलेल्या मजकुराचे उतारे, दिले आहेत. 'रॉयटर' ह्या इंग्लिश वृत्तसंस्थेनेही तशीच बातमी दिली होती. पण २७ डिसेंबर १९१९ रोजी भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे जे वृत्त आहे त्यात श्रो. जेंरे म्हणतात त्याप्रमाणे पंचम जॉर्ज बादशहांच्या स्वागतार्ह रचलेले 'जनगणमन” हे गीत गाण्यात आले, असे. म्हटलेले नाही. ते वृत्त असे आहे : “काँग्रेसच्या २८व्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 'वंदेमातरम्‌' गाण्यात आले. दुसर्‍या दिवसाचे कामकाज बाबू रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या देशभक्तिपर गीताने (पेट्रीऑटिक साँग) सुरू झाले. (त्यानंतर मित्रांकडून आलेल्या संदेशांचे वाचन आणि राजनिष्ठेचा ठराव स्वीकृत झाल्याचा वृत्तान्त आहे.) त्यानंतर ह्या प्रसंगासाठी रचलेले सम्राट आणि सम्राज्ञीचे स्वागतगीत वृंदगायकांनी गायिले.'' याचा अर्थ रवींद्रनाथांचे जनगणमन हे गीत राष्ट्रभक्तिपर गीत म्हणून गाऊन झाल्यावर संदेशवाचन, ठराव वगैरे झाले आणि त्यानंतर दुसरे एक गीत बादशहाचे स्वागतगीत म्हणून गायले गेले.

आता २८ डिसेंबर १९११ रोजी छापलेला 'अमृतबाजार' पत्रिकेतला वृत्तान्त पहा कामकाजाची सुरुवात बंगाली भाषेतल्या ईशप्रार्थेने झाली. (साँग ऑफ बेनेडिवशन' असे मूळ इंग्रजी शब्द आहेत.) नंतर राजनिष्ठेचा ठराव झाला.
त्यामागून बादशहाच्या सन्मानार्थ दुसरे एक गीत गायिले गेले. (अनदर साँग )

२८ डिंसेंबरच्याच 'दि बेंगॉली' ह्या वृत्तपत्रातील ही बातमी पहा : "कामकाजाची सुरुवात बंगालचे अग्रगण्य कवी बाबू रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या देशभक्तिपर पदाने झाली. त्यानंतर (राजनिष्ठेचा ठराव वगैरे संमत झाल्यावर) बंगाली मुला-मुलींच्या वृंदाने सम्राज्ञीना अंत:करणपूर्वक अभिवादन करणारे (पेईंग ए हार्टफेल्ट होमेज') हिंदी भाषेतले पद म्हटले." काँग्रेसच्या अधिकृत इतिवृत्तात आणि देशी वृत्तपत्रांनी दिलेल्या बातमीवरून रवींद्रनांथांनी रचलेले गीत हे देशभक्तिपर होते; आणि बादशहांच्या स्वागताचे म्हणून त्यानंतर गायिलेले हिंदी गीत ते 'जनगणमन' नव्हे हे लक्षात येते. 'जनगणमन' हे बंगाली गीत आहे. अँग्लोइंडियन वर्तमानपत्रांच्या वार्ताहरांना पहिल्या आणि दुसर्‍या गाण्यातला फरक न कळल्यामुळे त्यांनी चुकीचे वृत्त दिले.

१९११च्या डिसेंबरात भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनानंतर लगेच जानेवारीत म्हणजे महिन्याभरातच 'जनगणमन' हे गील आदिदब्राह्मसमाजाच्या 'तत्त्वबोधिनी पत्रिकेत 'भारतभाग्यविधाता' ह्या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले. त्याचे उपशीर्षक 'ब्राह्मसंगीत' असे आहे. 'भारतभाग्यविधाता” ही गीतातली कल्पना दुष्कृत्यांचा विनाश करण्यासाठी प्रत्येक युगात अवतरणाऱ्या भाग्यविधात्यासंबंधीची आहे. ह्या गीताचे तिसरे कडवे वाचले की, ती स्पष्ट होते.

पतन अभ्युटय बंपुरे पंथा, युगयुग धावित धात्री ।
हे चिरसारधि तव रथचक्रे मुखरित पथ टिनरात्रि ।
दारूण विप्लव माझे तव शंखध्वनि बाजे / संकट दु:जाता ।

ह्यातला 'चिरसारथि' हा शब्द गीतेतल्या अवतारी सारथ्याचे स्मरण करून देणाग आहे. दारुण विष्लव माझे म्हणजे. भयंकर अशा संकटामध्ये 'तव शंखध्वनि वाजे' ही शब्दपंक्तीही पाहायला हवी. धर्मकृत्यांच्या आणि धर्मयुद्धाच्या
प्रसंगी सुरूवातीला चैतन्य प्रात करून देणारा शंखध्वनी करणे हीदेखील भारतीय परंपरा आहे. अजूनही बंगालात मंगल समारंभाच्या सुरुवातीला शंख फुंकण्याची पद्धत आहे. 'हे विस्सारथि' ह्या संबोधमातून हा जयजयकार गीताप्रणीत परमेश्वशी अवताराचा आहे हे हिंदुतत्त्वज्ञानाची माहिती असणाऱ्यांच्या ध्यानात आले; पण अँग्लोइंडियन पत्रकारांना ते न समजून सुरुवातीचे गाणे म्हणजे स्वागतपर पद्य अशी त्यांची प्रामाणिक समजूत झाली असेल. त्या काळात काँग्रेसच्या अधिवेशनात राजनिष्ठा व्यवत करणारा ठरव असायचाच. त्यातून त्याच वर्षी सम्राट-सम्राज्ञीचे भारतात आगमन झाले होते. त्यामुळे अँगलोइंडियन पत्रकारांनी त्या गाण्याचा संबंध बादशहाच्या स्वागताशी जोडला. पण रवीन्द्रनाथांची निष्ठा ब्रिटिश साप्राज्यशाहीशी नाही हे तत्कालीन सरकारला ठाऊक होते. कारण “जनगणमन' हे गीत गायल्यानंतर एक महिन्याच्या आत इंग्रजी राजवटीतल्या पूर्व बंगाल आणि आसाम विभागाच्या डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शनने गुप्त सक्युलर काढले. कुठून तरी ते 'दि बेंगॉली' ह्या वर्तमानप्रत्रवाल्यांना सापडले. त्यांनी ते २६ जानेवारी १९१९च्या अंकात प्रसिद्ध केले. त्यात सरकारी नोकरांनी आपली मुले शांतिनिकेतनात पाठवण्यावर बंदी घालण्यात आली होतो. इतकेच नव्हे तर ''मुले त्या संस्थेत विद्यार्थी म्हणून ठेवली तर त्यांच्या पुढील आयुष्यातील हिताबाबत सरकारी मन कलुषित होईल'' अशा अर्थाची कडक तंबी देण्यात आली होती. सरकारी नोकरीतल्या पालकांनी आपल्या मुलांची नावे शांतिनिकेतनातन काढन घेतली होती संस्थेवर गंडांतर आले होते.

श्री प्रबोधचंद्र सेन यांनी म्हटल्याप्रमाणे 'रवींद्रनाथ जर सम्नाटांचे स्तुतिस्तोत्र गायच्या पातळीवर उतरले असतील तर अशा प्रकारच्या हुकमाची गरज नव्हती. शांतिनिकेतनाकडे सुरुवातीपासून इंग्रजी सरकार संशयाच्याच दृष्टीने पाहत होते हे रवीन्द्रनाथांच्या चरित्राच्या वाचकांना चांगले ठाऊक आहे.

'भारतभाग्यविधाता' ही देवाविषयीची कल्पना प्रस्तुत गीत लिहिण्याच्या एक वर्ष आधी लिहिलेल्या 'गोरा' ह्या रवीन्द्रनाथांच्या कादंबरीतही आढळते. त्यात शेवटी कादंबरीचा नायक गोरा हा परेशबावूंना म्हणतो : ''...आपल्यापाशीच हा मुक्तीचा मंत्र आहे. म्हणूनच तर आपण कुठल्याही समाजात (इथे पंथात ह्या अर्थी) स्थान मिळवू शकला नाही. मला आपले लेकरू माना. मला आज अशा एका देवतेचा मंत्र द्या की, जी हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बाह्यो, सर्वांची आहे. जिच्या मंदिराची दारं कुठल्याही जातीला, कुठल्याही व्यक्‍तीला कधीही बंद राहणार नाहीत.'

जी केवळ हिंदुंचीच देवता नव्हे तर भारतवर्षाची देवता !

'जनगणमन'मध्ये जयजयकार आहे तो ह्या भारतवर्षाच्या. भाग्यविधात्या देवतेचा. 'भारतभाग्यविधाता' ह्या कल्पनेचा रवींद्रनाथांनी पुष्कळदा पुनरुच्चार केला आहे.

देश देश नन्दित कारे म्रित तव भेरी
आशिलो जो तो वीखुन्द आसन तव घेरि

अशी एक त्यांची कविता आहे. तीदेखील काँग्रेसच्या अधिवेशनात गायली जात असे. ती भगवंतालाच उद्देशूने आहे. त्यात रवींद्रनाथ म्हणतात :

जनगणपथ तव जयरथ नक्रमुखर आजि
स्पस्दित करि दिग्‌ दिगऱ्त उठिलो शंख आजि

तेव्हा जनगणाच्या मनामध्ये स्वत्व जागवण्यासाठी भारतवर्षाच्या देवाला रवींद्रनाथांनी 'जनगणमनअधिनायक" हे गीत लिहिण्यापूर्वीपासून गद्यातून आणि पद्यातून सतत आवाहन केले आहे. उपनिषदांच्या सतत अध्ययनाने ज्यांच्या
मनाचे पोषण झाले त्या रवीन्द्रनाथांना विश्वात्मक देंव आणि अधर्माचं उच्चाटन करायला परमेश्वरने अवतार घेणे ही कल्पना आकर्षक वाटणे साहजिक आहे.

ज्या 'स्टेटसमन'मधील वृत्ताचा श्री? जेरे हवाला देतात त्याच 'स्टेटस्‌मन'ने १९१९च्या डिसेंबगत 'जमगणमन' हे बादशहाच्या स्वागताचे गाणे असे वर्णन केले आणि त्याच 'जनगणमन' गाण्याचा '१९१७' च्या अधिवेशनात 'जे नॅशनल साँग' (देशभक्तिपर गीत) गायले गेले'' असा उल्लेख केला आहे. आता एकच गाणे एकदा बादशहाच्या स्वागताचे आणि दुसऱ्यांदा राष्ट्रभक्‍तीचे कसे होईल? शिवाय १९१७ साली काँग्रेस ही मवाळांच्या हातून जहालांच्या हाती गेली होती. त्या प्रसंगी केलेल्या भाषणात देशबंधू चित्तरंजन दास यांनी या गीताकडे श्रोत्यांचे लक्ष वेधून त्या गीताचा ''इट इज ए साँग ऑफ ग्लोरी अँड व्हिक्टरी ऑफ इंडिया'' असे म्हटले होते. बादशहाच्या स्तुतीच्या गाण्याला देशबंधू चित्तरंजन दासांसारखा राष्ट्रभक्त हे भारताच्या वैभवाचे आणि विजयाचे गाणे कसे म्हणेल? चित्तरंजन दास हे व्युत्पन्न गृहस्थ होते. कुणी गल्लीबोळातले पुढारी नव्हते. आता खुद्द रवीन्द्रनाथांनीच ह्या गीताच्या जन्मकथेबद्दल काय म्हटले आहे ते पाहा:

बऱ्याच काळानंतर सिमल्यातल्या एका बड्या सरकारी अधिकारी मित्राने विनंती केल्यावरून हे गीत बादशहाच्या स्वागतासाठी लिहिले होते अशी बातमी फैलावण्यावर त्या विनंतीसंबंधी श्री० पुलिन बिहारी सेन यांना लिहिलेले
र्वीन्द्रनाथांचे एक पत्रच उपलब्ध झालेले आहे. (९०.९१.३७) प्रभावकुमार मुखर्जींनी लिहिलेल्या रवीन्द्रजीवनीच्या दुसऱ्या खंडात ३३९व्या पानावर बंगालीत हे पत्र आहे. त्याचे मराठो भाषांतर वाचकांसाठी देतो. रवीन्द्रनाथ म्हणतात : ''...सरकारी अधिकाऱ्याची विनंती ऐकून मी विस्मित झालो. ह्या विस्मयाबरेबरच मनात संताप उफाळला. त्याच्या प्रबल प्रतिक्रियेच्या आपरातातून मी 'जनगणमन ह्या गाण्यात त्याच भारतभाग्यविधात्याची जयघोषणा केली आहे की जो पतन-अभ्युदय-बंधुर पंथावर युगानुयुगे धावणाऱ्या यात्रिकांचा चिरसारथी, जो जनगणमनाचा पथपरिचायक, तो
युगयुगान्तरतल्या मानवाचा भाग्यस्थचालक पाचवा किंवा सहावा किंवा इतर कितवाही जॉर्ज असू शकणार नाही, ही गोष्ट त्या राजनिष्ठ मित्राच्याही लक्षात आली. कारण त्याची राजभक्‍ती कितीही प्रबळ असली तरी त्याच्यात अकलेचा अभाव नव्हता, हे गाणे मी काही खास काँग्रेससाठी लिहिले नव्हते.'' ह्याच संबंधात १९.३.३९ला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात

I should only insult myseif if I cared to answer those who consider me capable of such unbounded stupidity as to sing in praise of George the Fourth or George the Fifth as the Eternal Charioteer leading the pilgrims on their journey through countless ages of the timeless history of mankind. (Purvasa, Phalgun, 1354, p. 738)

तेव्हा ह्या संदर्भात स्वत: रवींद्रनाथांनी कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण केल्याचे कोठेही आढळत माही, हे श्री. बाळ जेरे यांचे म्हणणे बरोबर नाही. स्वत: कवींनी नि:संदिग्ध शब्दात ह्या गीताची भूमिका सांगितली आहे. तीच मला स्वीकारार्ह वाटते. स्वातंत्र्याच्या चळवळीत ज्या गीताचा चित्तरंजन दास, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या बंगाली मातृभाषा असलेल्या थोर राष्ट्रभक्तांनी 'राष्ट्रभक्तिपर तेजस्वी गीत' म्हणून स्वीकार केला, वंगभंगाच्या चळवळीत बंगालात हजारो कंठातून जे गीत गायले गेले, त्या गीताविरुद्ध रवींद्रनाथांच्या विषयी आदर नसणाऱ्यांनी चुकीचे
लिहिले ते ग्राह्य मानावे असे मला वाटत नाही. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांच्याविषयी आदर नसलेले इंग्रज इतिहासकार व फारसी अखबारनवीस यांनी लिहिलेला मजकूरच ग्राह्म मानला तर शिवाजी हा लुटारू होता आणि तो जहन्नममध्ये राहण्याच्या लायकीचाच काफिर होता हेच बरोबर आहे, असे धरून चालावे लागेल. रवीन्द्रनाथांना विरोध करणारी अँग्लोइंडियन किंवा 'शनिवारेर चिठि' यांसारखी वर्तमानपत्रेच पुराव्याला घेऊन कसे चालेल?
'इंडियाज नॅशनल अँथेम' ह्या श्री. प्रबोधन सेनसंपादित आणि विश्वभारती-प्रकाशित पुस्तिकेतून श्री. जेंरे यांनी स्टेट्समन आणि 'शनिवारेर चिठि' यांतलेच उतारे घेतले. त्याच पुस्तिकेतले मी उद्‌घृत केलेले उतारे कां घेतले नाहीत? रवींद्रनाथांच्या पत्रातील उतारेही त्या पुस्तिकेत आहेत.

मला जाता जाता अलीकडच्या वाचकांच्या लक्षात हेही आणून द्यावेसे वाटते की, बंकिमचंद्रांचे 'वंदेमातरम्‌' हे रवींद्रनाथांचे आवडते गीत होते. १८९६ साली डिसेंबर महिन्यात कलकत्त्याला भरलेल्या काँग्रेस-अधिवेशनात पहिल्या दिवशी ह्या गीताला चाल लावून स्वत: रवींद्रनाथांनी 'उद्बोधन-संगीत' म्हणून प्रथम हे गीत म्हटले आणि नंतर कामकाजाला सुरुवात झाली तेव्हापासून ते गीत गायले जाते आहे. चाल बसवल्यावर तरुण रवींद्रनाथांनी खुद्द बंकिमचंद्रांना प्रथम त्या गीताचे चरण ऐकवले होते, अशी माहितीही 'आनंदबाजार' पत्रिकेत मिळते. (५ अश्विन वंगशक १३४४)

भारतचे राष्ट्रगीत 'वंदेमातरम्‌' असायला हवे होते की 'जमगणमन' हा मुद्दा निराळा आहे. देशप्रेमाची गीते म्हणून मला दोन्ही गीतें अप्रतिम वाटतात. परंतु कवितेतल्या भावार्थाकडे न पाहता 'जनगणमन'ला बादशहाचे स्वागतपर गीत
ठरवणे हे त्या गाण्यातील गीतेतल्या विश्वाचा युगायुगांचा चिरसारथी ह्या उदात्त कल्पनेचा अवमान केल्यासारखे मला वाटते. त्या संपूर्ण गीताचे मनात पूर्वग्रह न ठेवता मनन व्हायला पाहिजे.

श्री जेरे यांचा आणि वाचकांचा गैरसमज दूर व्हावा असे मला मनापासून वाटते म्हणून मी हे काहीसे विस्तृत उत्तर लिहिले आहे.

- पु.ल. देशपांडे
महाराष्ट्र टाईम्स 
१६ मे १९८०

मूळ स्रोत - > http://satyashodh.com/janaganaman/index.htm

Thursday, May 12, 2022

पुलंची शाबासकी एक मानाचं पान - (सौ. जयश्री देशपांडे)

आपले सर्वांचे लाडके पु. ल. देशपांडे “हसवणूक या पुस्तकातल्या खाद्यजीवन मध्ये लिहितात, “माणसाचा सारा इतिहास म्हणजे त्याच्या खाण्याचा इतिहास आहे." मला हे वाक्य अगदी मनापासून पटतं. मी गेली अनेक वर्षे केटरिंगच्या व्यवसायात असल्यामुळे चवीनं खाणाऱ्या लोकांना चवीपरीनं खाऊ घालण्यातील आनंद मी पुरेपुर अनुभवला आहे. केटरिंगच्या व्यवसायानिमित्त माझी पु. लं. या अष्टपैलू व्यक्तिमत्वाशी ओळख झाली आणि एवढंच नाही तर त्यांच्याकडून शाबासकीची थाप मिळविण्याचं भाग्यही मला लाभलं. लहानपणापासूनच लेखक म्हणून पु. लं. मला आवडत होते पण, प्रत्यक्ष भेटीचा योग मात्र आला नव्हता. तो योग पुण्यात माझ्या व्यवसायाने घडवून आणला.

एकदा प्रभात रस्ता येथे राहणाऱ्या मधू गानू यांच्याकडून मला काही व्यक्तींसाठी केटरिंगची ऑर्डर होती. ती पोहोचवणारा माणूस ऐनवेळी आला नाही. माल वेळेत पोहोचवणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. हाताशी कुणीच नव्हतं म्हणून मीच डबा उचलला आणि त्यांच्या घरी गेले. घरात प्रवेश केला तर समोरच पुलंचा फोटो. कुतूहलानं मी त्यांच्याबाबत चौकशी केली तेव्हा मधूजी म्हणाले, "अहो पु. लं. आमच्याकडे अनेकदा जेवायला येतात, तेव्हा तुमच्याकडून मागवलेलं जेवण आम्ही त्यांना देतो आणि ते त्यांना खूप आवडतं ह!"

हे मधू गानू म्हणजे पु. ल॑. चे परममित्र. मी केलेला स्वयंपाक पु. लं. ना आवडतो हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मग पुढे एकदा स्वतः सुनीताबाईचाच मला फोन आला. त्यांनी आवर्जून माझ्या हातचे पदार्थ आवडतात असं सांगून काही पदार्थ बनवून द्याल का, असं विचारलं. मी ती ऑर्डर आनंदाने घेतली. असं पुढे दोन-चार वेळेस झालं, मग एके दिवशी सुनीताबाईच मला म्हणाल्या, “या ना आमच्याकडे एकदा. आम्हाला तुमच्या हातचा स्वयंपाक खूप आवडतो. भाईला कुतूहल आहे तुमच्याबद्दल. सार आणि बिरड्या तुम्ही ज्याप्रकारे करता त्यावरून तुम्ही कोकणस्थ वाटता, पण चिकनच्या पद्धतीवरून तुम्ही सारस्वत वाटता.” मग मी गेले तेव्हा पु. लं. चा पहिला प्रश्न होता, “तुम्ही नक्की कोण आहात?" मला हा संदर्भ लगेचच कळला. मी म्हटलं, 'मी देशपांडे म्हणजे आता देशस्थ, पण माहेरकडून कोकणस्थ!” पु. ल॑. ना माझ्या हातची मटण बिर्याणी, टोमॅटो सार, दहीवडा, वालाची उसळ,छोटे बटाटे घातलेली भरली वांगी आणि उपवासाची बटाट्याची भाजी हे पदार्थ खूप आवडायचे.

मी अशीच एकदा काही पदार्थ पोहोचवायला गेले होते, तर त्या दिवशी त्यांच्याकडे खरवस होता. पु. लं. नी मला विचारलं, खरवस आवडतो तुम्हाला? मी हो म्हटल्यावर मला त्यादिवशी आग्रहानं तो खाऊ घातलाच, पण माझी आवड लक्षात ठेवली. परत कधीतरी एकदा त्यांच्या घरी खरवस होता, तर 'अगं, यांना खरवस आवडतो हं! दे यांना” असं म्हणून अगत्यानं दिला.

सुनीताबाईंनी पुलंच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त काही पदार्थ बनवून द्याल काय? असं विचारायला फोन केला तेव्हा तर मला खूपच आनंद झाला, त्यांना चारशे माणसांसाठी हाताने पटकन उचलून खाण्याजोगे पदार्थ पाहिजे होते. खरंतर तेव्हा माझा एवढा आवाका नव्हता. पण मी ही ऑर्डर स्वीकारायचं ठरवलं. त्याप्रमाणे सामोसे आणि इतर बरेच पदार्थ केले आणि त्यांच्यासाठी पुस्तकाच्या आकाराचा स्पेशल केकसुद्धा केला. त्यांना सर्व पदार्थ केक आवडला की नाही, याची मला खूप उत्सुकता होती. पण त्यादिवशी त्यांचा फोन आला नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा फोन आणि म्हणाले, 'जयश्रीबाई सर्व पदार्थ नेहमीसारखे अगदी उत्तम झाले केकचं विचाराल तर एवढं सुंदर पुस्तक कापायचा काल काही माझा नाही. शेवटी आता केक कापला आणि तुम्हाला दाद देण्यासाठी केला.” खरोखर 'पु. लं. आणि सुनीताबाईसारख्या आपुलकी निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना माझ्या हातचे पदार्थ आवडायचे हेच मी माझे भाग्य मानते.

अजून एक अतिशय संस्मरणीय प्रसंग मला आठवतो. पु. लं. च्या अखेरीच्या काळात आजारपणामुळे त्यांची स्मृती मंदावली होती. काही महिने ते अमेरिकेलाही जाऊन आले होते. माझाही अनेक दिवसात त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. अचानक सुनीताबाईंचा फोन आला आणि म्हणाल्या, “जयश्रीताई, काल तुम्ही आमच्या स्नेह्यांकडची जेवणाची ऑर्डर घेतली होती ना! काल आम्ही त्यांच्याकडे जेवायला गेलो होतो. त्यांच्याकडच्या बिर्याणीचा नुसता वास येताच भाई म्हणाला, “सुनीता आतल्या पातेल्यांवरचं नाव बघून ये. ही नक्की जयश्रीताईच्याच हातची बिर्याणी आहे. “सुनीताबाईंकडून हा प्रसंग ऐकून मी खरंच भरून पावले.

अशाच एका भेटीत पु. लं. नी विचारलं होतं,"सध्या काय करताय?*' मी म्हटलं, ''"पाककलेवरचं एक पुस्तक लिहिते आहे' आणि लगेचच पुढे म्हटलं, ''त्यासाठी तुम्ही काही करू शकाल?” पु. लं. म्हणाले,"सध्या मी पुस्तकांना प्रस्तावना लिहिणं बंद केलंय, पण तरीपण बघूया काय करता येईल ते.'' मग एक दिवस पु. लं. कडून अचानक एक सुंदर पत्र मला मिळालं. पु. लं. च्या सांगण्यावरून स्वतः सुनीताबाईंनी ते लिहिलं होतं. हे पत्र म्हणजे माझ्या पाककलेला मिळालेली सवोच्च दाद असं मी समजते. या उत्तुंग व्यक्तिमत्वांकडून मिळालेली ही दाद माझ्या या 'हमखास पाकसिद्धी' मध्ये नेहमीच एक मानाचं पान” बनून राहणार आहे.

सौ. जयश्री देशपांडे





पु. ल. देशपांडे यांच्या आवडत्या पाककृती
* मटण बिर्याणी
* टोमॅटो सार
* दहीवडा
* वालाची उसळ
* भरली वांगी
* उपवासाची बटाटयाची भाजी

Wednesday, January 12, 2022

पुलंची मजेशीर पत्रे - ८

नोव्हेंबर १९४३ मध्ये पुलंचे पार्लेकर मित्र श्री. माधव खरे विवाहबद्ध झाले. त्यांना पुलंनी लिहिलेलं 'उपदेशपर' पत्र असं :
 
लग्न करणाऱ्या माणसाला आणि नोकरी शोधायला निघालेल्या माणसाला वाटेल त्याकडून उपदेश ऐकून घ्यावा लागतो.

१) मुख्य म्हणजे हाफीस सुटल्यावर तडक घरी येत जा.
२) बायकोला केवळ खूष करण्यासाठी म्हणून काही जिन्नस विकत आणायचा हा परिपाठ ठेवू नकोस. आज तू कौतुकाने बायकोच्या डोक्यावर गजरा चढवशील; पण चार दिवसांनी गजऱ्यासह ती तुझ्या डोक्यावर बसेल. (पुरे बुवा !)
३) महिन्यातून एकदोनदा रागवायची सवय ठेव. डोके दुखण्याची सवय कर पत्नी गाणारी असल्यास ती आपोआप होईल.
४) कॉलेजमधून प्रथम नाव काढून टाक
5) मित्रांना नेहमी जेवायला बोलवीत जा
6) ६) एक दत्ताची तसबीर आण. नट्यांचे विवस्त्र फोटो अलूरकरांना बहाल कर आणि ते अल्बम मला दे
7) ७) टिळक मंदिराच्या सामान्य सभासदत्वाचा राजीनामा दे. ह्या सात 'श्लील' आज्ञा आहेत. इतर तोंडी सांगेन. ह्या सप्तपदीच्या वेळी पावला पावलाला मनात म्हण, देव तुम्हा उभयतांचे कल्याण करो हा आशीर्वाद
आर्या : माधव नमाधव' कसा हे कूट सोडवा गाजी
प्रेमें सर्वासंगे दोघेहि सदैव गोड वागा जी ॥

(सध्या कुशलवोपाख्यानाचा अभ्यास चालू आहे- तेव्हा क्षमस्व)

*तळटीप (ही पत्राचा भाग नाही) : माधव खरे यांच्या पत्नी 'नर्मदा' , 'नमा' हे माहेरचं लाडकं नाव आणि न- माधव , नमा-धव ही पुलंची कोटी.


संदर्भ: अमृतसिद्धी

पुलंची मजेशीर पत्रे - ७

नंदा नारळकर यांना १९ जानेवारी १९७९ रोजी पुलंनी घटप्रभेहून पत्र लिहिलं, कर्नाटकातला मुक्काम म्हणजे भाषाही त्या ढंगाची लिहिणं ओघानं आलंच. त्या पत्रात पुल लिहितात,

प्रिय नारळकर अण्णा,
काल तुमचं भयंकर म्हणजे भयंकरच म्हणायचं असं आठवण झालं. काय झालं बघा तर संध्याकाळचं सूर्य अस्त जाण्यापूर्वीचं वेळ डोचकीवर झाडाचं सावली धरून अंगणात येकटच इजिच्येअरवर आंग आणि स्टूलवर पायगिय टाकून तुमचं वुड्डहौससाहेबचं युक्रिजचं गोष्ट वाचत होतो. ते साहेब- पोटात हासून हासून गोळी आणतंय बघा

'Who is he?"

'An uncle of mine," Ukridge.

"But he seemed respectable."

यवढं वाचलं आणि यकटाच ठोऽऽ करून हसलो तर झाडाचं मागची बाजूनी 'काय झालं हो साहेऽऽब ?' अशी आवाज आली. घाबरून पाळण्यातलं पोरगी आंग काढतात तसं अंग काढलं- काय भूतगीत काय की म्हणून तर आमचं जुनं ब्याळगावातलं वळकीचं गोव्याचं कपिलेश्वरी म्हणून येक थोड गवयकाम करणार- (पाप ! चांगलं माणूस) बरोबर हितलं पोष्टमास्तरण्णांना तुमच्या पायावर घालायला आणलं म्हणून घेऊन आलं बगा.


-सोनल पवार
संदर्भ :अमृतसिद्धी

पुलंची मजेशीर पत्रे - ६

श्री. वामनराव यांना मालवणीत पत्र लिहितानाही पु.ल. असेच मजा करून सोडतात.

प्रिय वामनरावांनू, तुमचा पत्र मेळला. वाचून खूब बरां वाटलां. कशाक म्हणश्याल तर तुमचो गाव धाम्पूरच्या तळ्याक लागून तशी माझी सासूरवाडी खुद्द धाम्पूरच. (धाम्पूरच खरा धामापूर न्हय.) तर सांगत काय होतो, धाम्पूरच्या ठाकुरांचो मी जावांय ! धाम्पूरच्या तळ्यात गुरां पाण्याक् घेवन् कोणच जात नाय ह्यां तुमचा म्हण्णा खरांच. पण चुकलां माकलां ढ्वार जाता मागसून गुराख्याचो पोर नसलेला. मगे बापडा पाय घसरून पडता तळ्यात , म्हणीचो अर्थ काय ? की माणसाक तान लागल्यावर खैसर जांवां आनि सर जांव नये ह्येचो इचार खणा नाय ! असां आपला माका वाटता, तां काय जरी आसला तरी धाम्पूरच्या तळ्याची सर काश्मीरच्या डाल लेकाक नाय. खरां की खोटां ? (१०-१-७८)

या पत्राच्या शेवटी "चुकीचं मालवणी वाचण्याचा तुम्हाला इतका त्रास दिल्याबद्दल क्षमा करा" अशी पुस्तीही पुल जोडतात. इतका लोभस त्रास पुनःपुन्हा दिला तरी चालेल, अशीच यावर वामनरावांची प्रतिक्रिया झाली असणार.

- सोनल पवार
संदर्भ :अमृतसिद्धी

Friday, December 24, 2021

परम संतोष जाहला

इतिहासाची पानें चाळतांना पुलंचे एक भन्नाट पत्र हाती लागले. ५ ॲागस्ट १९७८ रोजी 'भारतीय आयुर्विमा महामंडळ' या संस्थेने सोलापूर शहरात आपली दुसरी शाखा सुरू केली. महामंडळाचे एक अधिकारी श्री. विश्वास दांडेकर यांनी एक नाविन्यपूर्ण जाहिरात तयार केली. महामंडळाची अशा स्वरूपाची ही पहिलीच जाहिरात होती. त्या वेळचे आयुर्विमा महामंडळाचे प्रचार आणि प्रसार प्रमुख श्री. शरच्चंद्र मेघश्याम शिरोडकर हे होते. त्यांना ही जाहिरातीची कल्पना आवडली. श्री. शिरोडकर यांनी जाहिरातीतील मजकूर सेतूमाधवराव पगडी यांच्याकडे पाठवून तो दुरूस्त करून आणला होता.

प्रसिद्ध होणारी जाहिरात श्री. श मे शिरोडकरांनी महाराष्ट्रातील चाळीस नामवंत लेखकांना पाठवून त्यांच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या. एकोणचाळीस लेखकांनी पत्राची साधी पोच पाठवण्याचेसुद्धा सौजन्य दाखवले नाही. फक्त पु. ल. देशपांडे यांनी जाहिरातीच्या भाषेतच श्री, शिरोडकरांना उत्तर पाठविले होते. जाहिरातीचा मजकूर आणि पु. ल. देशपांडे यांचे उत्तर मूळ स्वरूप असे :

जाहिरातीचा मजकूर

सकल गुणालंकारमंडित राजमान्य राजेश्री श्रीयुत विमेदार स्वामी यांचे हुजूरास विनंती अर्ज ऐसाजे. स्वामींचे उदार आश्रयेंकरून सोलापूर शहरीं आमचा भला उत्कर्ष जाहला असोन सांप्रत काळीं सुभे साताऱ्यामधील बिनीचा सन्मान शहर सोलापूर शाखेस लाभला हें स्वामीस विदित आहेच. इकडील काम फते होतें तें स्वामींचे आशीर्वादेंकरून. आमची हिंमत व नेट वाढावयास कारण तरी स्वामींचे पाठबळच. यास प्रमाण म्हणाल तर आपले शहरीं दुसरी शाखा मल्लिकार्जून बिल्डिंग, ४४२, पश्चिम मंगळवार पेठ ये स्थळी स्थापन होणार हा मनसुबा पक्का जाहला आहे. मुहूर्त १५ आगस्त १९७८ इसवी रोजी दुपारचा ३|| वाजतांचा धरलेला असोन समारंभासाठीं शिवछत्रपती रंगभवनाजवळील, फ्री मॕसन हॉल हा ठिकाणा मुक्रर केला आहे. आजवर सेवकाचें कवतिक जाहलें तें स्वामींचा वरदहस्त मस्तकीं असलेमुळेंच. याउप्परही स्वामींनीं कृपालोभ पुढे चालविला तरच सेवकाची कार्यवृद्धि होत जाईल ये विषयीं तिळमात्र शंका नसे.आमचें अगत्य असों द्यावें. इति लेखन सीमा।

लाइफ इन्शुअरन्स कॉर्पोरेशन ॲाफ इंडिया

भाईंची प्रतिक्रिया

१ रुपाली, ७७७,
शिवाजीनगर पुणे ४ 
गोकुळाष्टमी. ख्रिस्तमास अगस्त, 
सव्वीस एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर इसवी.

।।श्री मृत्यूंजयाविमाभवानी प्रसन्न।।

सकलगुणांलकारमंडित मानवयोगक्षेमचिंतानिवारणकार्यरत विमाप्रवर्तक राजमान्य राजेश्री श. मे. शिरोडकर यांचे चरणी माजी विमाधारक आणि सांप्रत विमाधारण कालातीत सेवक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे याचे विनम्र प्रणिपात. निमंत्रण पावोन समाधान जाहले. धन्यवादाप्रित्यर्थ चार उत्तरे लिहिण्याचा प्रेत्न करीत आहे. मर्यादातिक्रमाची प्रारंभी क्षमा मागतो. विमेदारांच्या उदार आश्रये करोन आपणांस लाभलेल्या सन्मानाचे वृत्त वाचोन परम संतोष जाहला.
भारतदेशाचे भूतपूर्व केंद्रीय अर्थमंत्री विद्वद्वर आणि परमश्रद्धेय माननीय सकलगुणांलकारमंडित राजमान्य राजेश्री चिन्तामण द्वारकानाथ देशमुख महोदयांच्या कर्तृत्वेकरोन इये देशी भारतीय विमा निगमाची प्रतिस्थापना जाहली. त्या उपरान्त प्रस्तुत निगमाने प्राणपणाने चालविलेल्या विमाधारकाच्या प्राणोत्क्रमणोत्तर योगक्षेमाची धुरा वाहण्याचे कार्य नाना प्रकारचे मनसुबे रचोन विस्तारिले आहे हे लोकविश्रुत त्याची थोरवी केवळ वर्णनातीत. त्या कार्यसिद्धीचे कवतिक करण्याचा अधिकार प्रस्तुत पत्रलेखकाचा नसोन संबंधित क्षेत्रस्थ मातबरांचा आहे. सेवकाची मर्यादा सेवक जाणतो.

मात्र,

विमाधारके नित्य हप्ते भरावे
देहे त्यागिता द्रव्यरुपे उरावे

हे विमासूत्र जनसामान्याने उत्तरोत्तर अधिकाधिक मात्रेत मनीमानसी बाळगोन स्वकुटुंबियांचे आणि स्वार्थ साधो जाता परमार्थी भावनेने विमानिगम कर्मचाऱ्यांचे वर्तमान व भविष्य विषयक भयाचे निवारण करण्याविषयी सदैव तत्पर राहावे ही शुभकामना व्यक्त करण्याची सेवक इजाजत मागत आहे. उण्याअधिकाची क्षमा असावी. आमचे अगत्य असो द्यावे ही प्रार्थना लेखनसीमा।।

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

--
श्री. निलेश साठे

Wednesday, December 22, 2021

पुलंची मजेशीर पत्रे - ५

मं. वि. राजाध्यक्षांची कन्या मुक्ता एम.ए.ला. इंग्रजी हा विषय घेऊन पहिल्या वर्गात पास झाली. तिचं अभिनंदन करताना पुलंनी आपलं इंग्रजी फार गचाळ आहे असं सुचवीत अशा इंग्रजीची सुंदर नक्कल केली आहे.

My Dear Mukta

I was foning you for the last half hour to congratulate you on my behalf and on be/2 of my better/2 also, but no connexion yaar. So I said maro goli to this telephone and write letter. Fuss class in M. A. is no joke yaar. I never got it. To tell you privately, all bundle professors yaar, except your Bhai who is responsible for my great English... Offcourse I cannot write high English like you... High English has been a big stone in my way. Big stone means 'dhond'. Not capital 'D'. Capital 'D'-wallah Dhond* is your neighbour. Give my regards to him. For further details about dhond- not capital- kindly refer to your Bhai...

* राजाध्यक्ष यांच्या 'साहित्य सहवासा'त राहणारे प्राध्यापक म. वा. धोंड.


सोनल पवार 
संदर्भ: अमृतसिद्धी

पुलंची मजेशीर पत्रे - ४

श्री गणेशशास्त्री जोशी यांनी अमेरिकेचं वर्णन करणारं एक पत्र पुलंना संस्कृतमध्ये लिहून पाठवलं होतं. त्याला पुलंचं उत्तर घ्या संस्कृत तर संस्कृत. 'इरेस पडलो जर बच्चमजी !' पण ह्या पत्रातलं संस्कृत तसं ठाकठीक आहे हे लक्षात ठेवायला हवं. (शास्त्रीबुवांनीच पुढं याची प्रशस्ती केली.) त्यातला काही भाग.

पुण्यपत्तनम् ४
एप्रिल ६, १९७४

स्वस्ति श्रीगणेशशर्मा जोशीमहोदयेषु गीर्वाणभाषापण्डितवरेषु, अतिविनम्रतया पादाभिवन्दनं कृत्वा संस्कृतभाषायामेव पत्रोत्तरलेखनचेष्टां करिष्यामि । जानाम्येतन्महाधाष्टम् । आङ्ग्लभाषाधारेणाभवन्मम संस्कृतभाषाध्ययनम् । यत्र 'रम्भोरु'- 'द बनाना ट्री-थाइड् वन्' भूता लुट् टु वॅलो वा । गीर्वाणभाषादेवता ममेदृक्शारूकं चेष्टितं दृष्ट्वा मां ममैवं पुरातनेन पादत्राणेन ताडयिष्यति ।...

'आपले सुंदर पत्र मी पुनःपुन्हा वाचले, मित्रांनाही वाचून दाखवलें' असं गणेशशास्त्रींना सांगून विनयानं पुल पुढं लिहितात :

किन्तु मम पत्रोत्तरपठनमीदृशं भवता कथमपि न करणीयं, देवभाषाभिमानधारकाः पण्डिताः शम्बूकं स्मृत्वा मम शिरश्छेदं कर्तुमुद्युक्ता भविष्यन्ति ।...

आशीर्वचनाकांक्षी,
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपाण्डे


सोनल पवार 
संदर्भ :अमृतसिद्धी

Thursday, December 16, 2021

पुलंची मजेशीर पत्रे - ३

५ ऑगस्ट १९७८ रोजी 'भारतीय जीवन विमा निगम'च्या सोलापूरच्या नव्या शाखेचं उद्घाटन झालं. त्या उद्घाटन समारंभाची जाहिरात ऐतिहासिक मराठी भाषेत आणि खलित्याच्या रूपात केलेली होती.

सकल गुणालंकारमंडित राजमान्य राजेश्री श्रीयुत विमेदार स्वामी यांचे हुजुरास विनंती अर्ज ऐसाजे.

स्वामींचे उदार आश्रयेंकरून सोलापूर शहरी आमचा भला उत्कर्ष जाहला असोन सांप्रत काळी सुभे साताऱ्यामधील बिनीचा सन्मान शहर सोलापूर शाखेस लाभला हे स्वामीस विदीत आहेच...

अशा सुरवातीची आणि वळणाची ही जाहिरात संस्थेचे जनसंपर्काधिकारी श्री. रा. म. शिरोडकर यांनी पुलंना पाठवली. ह्या जाहिरातीची नोंद घेणारं आणि कोपरखळ्या देणारं पत्र 'अगस्त सव्वीस एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ख्रिस्तमास' या दिवशी पुलंनी पाठवलं. त्यातला काही भाग असा :

श्री मृत्युंजया विमाभवानी प्रसन्न

सकलगुणालंकारमंडित मानवयोगक्षेमचिंतानिवारक विमाप्रवर्तक राजमान्य राजेश्री रा.म. शिरोडकर यांचे चरणी माजी विमाधारक आणि सांप्रत विमाधारणकालातीत सेवक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचे विनम्र प्रणिपात... भारतदेशाचे भूतपूर्व अर्थमंत्री विद्वद्वर आणि परमश्रद्धेय माननीय सकलगुणालंकारमंडित श्रीयुत चिन्तामण द्वारकानाथ देशमुख महोदयांच्या कर्तृत्वेकरोन स्वदेशी भारतीय विमा निगमाची प्राणप्रतिष्ठा जाहली त्या उपरान्त प्रस्तुत निगमाने अकल्पित रीतीने कुटुंबप्रमुखाचे प्राणोत्क्रमण जाहल्यावर ओढवणाऱ्या संकटातून अवलंबितांना आधार देण्याचे आणि विशेषेकरोन निगमाच्या कारभाराची धुरा वाहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगक्षेमाचा भार वाहण्याचे जे कार्य चालवले आहे ते लोकविश्रुतच आहे. त्या जनसेवेचे कवतिक करण्याचा अधिकार प्रस्तुत पत्रलेखकाचा नसोन संबंधित क्षेत्रस्थ मातबरांचा आहे. सेवकाची मर्यादा सेवक जाणतो.

याच पत्रात 'मरोनी विमा पालिसीने तरावे' किंवा, 'विमाधारकें नित्य हप्ते भरावे,' 'देहे त्यागिता द्रव्यरूपे उरावे' - अशी 'आधुनिक संतवचनं 'ही दिलेली आहेत.

सोनल पवार 
संदर्भ : अमृतसिद्धी

Monday, December 13, 2021

मोरोपंत - मराठी वाड़्गमयाचा गाळीव इतिहास

पंतांची दिनचर्या काय होती याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.परंतू पहाटे साडेचार वाजता उठून प्रातःकर्मे झाल्यावर ते उद्योगाला लागत असावेत.दुपारच्या भोजना पर्यंत शब्द नीट धरून अक्षरे सोडवून घ्यावयाचे अणि मग 'वदविला साच्या' जोडीला 'पदविलासाचा', 'वायसाराती' च्या जोडीला 'काय सारा ती', 'पद रमला' आणि 'पदर मला', ' न नाथ सा मान्य' आणि 'अनाथ सामान्य' अशा जुड्या बांधून ठेऊन द्यायचे.अशा चारपांचशे जुड्या झाल्या की त्यांचे साॅर्टिंग करून एकशेआठ रामायणापैकी कुठल्या रामायणात कुठली बसते हे पाहावयाचे. ('वाहतो ही आर्यांची जुडी' असे एक नाटकही ते लिहिणार होते."वस्तूंत जसें हाटक काव्यीं नाटक..." अशी जुडी जमली होती.पुढे इतरां छंदी जाण्यापेक्षा त्यांना आर्याच बरी असे वाटले असावे.) दुपारच्या भोजनानंतर तासभर विश्रांती घेत.

विश्रांतीच्या वेळी करमणुकीसाठी ओव्या,भुजंगप्रयात,वसंततिलका वैगेरे छंदात आख्याने वैगेरे पडल्या पडल्या लिहून काढीत. विश्रांती झाली की पुन्हा सकाळच्या यमकांच्या जुड्या उलगडून आर्या पु-या करीत. संध्याकाळी पुराण सांगून झाले की जरा फिरून येत. तिथेही करमणूक म्हणून श्लोक वैगेरे रचित. पुढेपुढे दुकानदारांशी वैगेरेसुद्धा ते आर्येतच बोलत. क्वचित प्रसंगी दुस-याने उच्चारलेल्या शब्दांचा अर्थ समजण्यात घोटाळा होई. भाजीवालीला टोपलीत काय आहे हे विचारल्यावर ती "भोपळा" म्हणाली आणि पंतांना वाटले, "भो पळा" असे ती फणका-याने म्हणाली,म्हणून पळू लागले.शेवटी घरी आल्यावर भोपळ्याची फोड चुकली हे त्यांच्या ध्यानी आले.एकशेआठ रामायणे,अनेक महाभारते,भागवताचा दशमस्कंध शिवाय शंभरसव्वाशे फुटकळ आख्याने,इतके रचावयाला गेला बाजार शब्दांच्या सहस्त्र कोटी जुड्या बांधाव्या लागल्यामुळे त्यांच्या कानी शब्द आला की त्याचे यमक उभे राही. "कसे काय पंत "? म्हटले की "बरे आहे" म्हणण्याऐवेजी संत,खंत,दंत,हंत असे काहीतरी सुरू व्हावयाचे.मग पोरीबाळी "पंतकाका, आम्हाला गाणे, आम्हाला गाणे" करून मागे लागत. त्यांच्यासाठी येताजाता,झोपाळ्यावर वगैरे म्हणावयाला गाणी करून देत. झोपण्यापूर्वी एक हजारबाराशे आर्या करून झोपत.

आजही बारामतीस, त्यांच्या लक्षावधी आर्यांपैकी एकीचाही कोणाला फारसा पत्ता नसला तरी त्यांचे राहते घर दाखवितात.मात्र "बारामती कशाबद्दल प्रसिद्ध आहे ?" ह्या प्रश्नाचे उत्तर "सहकारी साखर कारखान्यांबद्दल" असे लिहिले तरच मार्क मिळतात, हे लक्षात ठेवावे.

Tuesday, December 7, 2021

पुलंची मजेशीर पत्रे - २

घटप्रभेचे कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूटचे डॉक्टर विजय कुलकर्णी यांच्याकडून पुण्याला परत आल्यावर पुलंनी त्यांना ऐतिहासिक बखरीच्या भाषेत पत्र लिहिलं त्याची नुसती भाषाच नव्हे, तर लेखनाची धाटणीही हुबेहूब ऐतिहासिक वळणाची आहे.

भीषग्वर्य राजमान्य राजेश्री विजयराव कुळकरणी यासी मुक्काम पुणे येथोन पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे याचा शिरसाष्टांग नमस्कार विनंती ऐसाजे लग्न जुळवणेची मोहीम फत्ते करोन स्वाऱ्या पुनश्च कर्णाटक देशी मजल दरमजल करीत कूच करत्या जाहल्या हे स्वदस्तुरच्या आज तारीख अठ्ठावीस मे ख्रिस्ती शक १९७९ रोजी हाती आलेल्या खलित्यावरोन कळले. परमसंतोष जाहला. आपण काज हाती घ्यावे व ते फत्ते होवो नये ऐसे होणे नाही. हातास सदैव येशच येश मग ते विवाह जुळविणेचे असो अथवा कुक्कुटाधिष्ठित पाककौशल्याचे असो. विवाह जुळवणेचे काज अति साहसाचे येविषयी संदेह नाही. हे तो साक्षात कुळजुळवणी तेथे कुळकरणी चातुर्यच हवे.... बहुत काय लिहिणे. आमचे अगत्य असो द्यावे. लेखनसीमा

- सोनल पवार 
संदर्भ: अमृतसिद्धी

Friday, December 3, 2021

पुलंची मजेशीर पत्रे - १

मुंबईचे ना कुलकर्णी यांनी मराठीच्या सांप्रतच्या रहासाबद्दल १२ डिसेंबर १९९० ला पुलंना लिहितात.

"आपल्यासारख्या ग्रेट पर्सनला असे फ्लिपंट पत्र लिहिल्याबद्दल सॉरी. पण इंग्लिश व हिंदी लँग्वेजेसच्या जॉईंट अँटँकमुळे मराठी लँग्वेजची जी बँड कंडिशन झाली आहे त्याबद्दलची माझी स्ट्रॉग फीलिंग्ज एक्सप्रेस करण्यासाठी मला बेटर मेथड स्ट्राइक झाली नाही क्षमस्व.

ही स्ट्रॉग फिलींग्ज कशाबद्दल ? तर,या दिवसा दूरदर्शनीय मराठीय कार्यक्रमांमध्ये तथा मराठीय समाचार पत्रांमध्ये तिलक, सावरकर, आदी फडतूस इसमांनी दिल्या असलेल्या मराठीय संग्यांचा प्रयोग कमी होत जाऊन राहिला आहे. तथा त्यांच्या बदल्यामध्ये हिंदी संग्यांचा प्रयोग बड्या पैमान्यावर सुरू होऊन राहिला आहे. "

या पत्राला लगेचच १८-१२-९० रोजी उत्तर लिहिताना पुलंनी एकच धमाल केली आहे :

"एकवीसमी सदीत मराठीचा माहौल अजिबच राहून राहणार आहे. भाषा ही सोसायटीच्या बिहेवियरवर डिपेंड करते. रहनसहनमध्ये फर्क पडला की, भाषेतही फर्क पडतो. मुंबईसारख्या भेलपुडी संस्कृतीत, तर राष्ट्रभाषा हिंदी (सियावर रामचंद्रकी जय) गुजराती, बिगर मर्हेटी श्रीमंतीपुढे संकोचून कोन्यात उभी राहिलेली मराठी तर सगळ्या भाषा घुलमिलाकर एक नवीच मर्हेटी तयार होणार आहे... पहिले माणूस टू माणूस भाषा कानावर यायची आता पेपरवाल्याचे मराठी, रेडिओवाल्यांचे मराठी, दुर्दर्शनवाल्यांचं मराठी अशी भाषिक घुसखोरी सुरू झाली आहे . त्याला एकच उपाय म्हणजे इतर भाषांचं बिनधास्त मराठीकरण करणं. हमारी आयडिया समझा क्या ? सुज्ञको अधिक सांगणेची गरजच नही."

ह्या पत्राच्या खाली 'भवदीय पु.ल. देशपांडे' अशी सही केलेली आहे आणि सहीखाली कंसात लिहिलं आहे, “आमच्या नावातच मराठी देश आणि हिंदी पांडे आहे हेही ध्यानी यावे.”

- सोनल पवार
संदर्भ- अमृतसिद्धी

Tuesday, March 13, 2012

आयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा!

दिवंगत लेखक पु. ल. देशपांडे यांचं 'गाठोडं' हे पुस्तक नुकतच 'परचुरे प्रकाशन मंदिर'तर्फे प्रकाशित झालं. या पुस्तकातील 'मार्मिक'च्या चौथ्या वाढदिवसाला उपस्थित न राहता आल्याबद्दल पुलंनी बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे या बंधुंना पाठवलेलं हे 'मार्मिक' पत्र...

१४ ऑगस्ट १९६४
वरळी, मुंबई १८

प्रिय बाळ आणि श्रीकान्त,

तुम्हां दोघांपैकी कुणाच्याही हातात सापडलो असतो, तर आजच्या 'मार्मिक'च्या वाढदिवसाला मोठ्या आनंदाने अध्यक्षीय पगडी घालून बसलो असतो. तो योग हुकल्याचे मला खरोखरीच दु:ख होत आहे. दुसऱ्या एका कार्यक्रमाची सुपारी आधीच घेतल्यामुळे येता येत नाही. म्हणून ह्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी तुम्हांला, 'मार्मिक'ला, श्री. द. पां. खांबेटे आदी करोन तुमच्या समस्त सहकारी मंडळींना 'आयुष्यमान व्हा - यशस्वी व्हा' असा आशीर्वाद देतो.

अध्यक्ष म्हणून जे चार शब्द सांगितले असते, ते पत्रातूनच सांगतो. ह्या शब्दांना थोडा वडिलकीचा सूर लागला असला, तर रागावू नका. तो सूर थोडासा अपरिहार्य आहे. कारण आजही तुम्ही दोघे जण माझ्या डोळ्यांपुढे येता ते आपापली दप्तरे आणि अर्ध्या चड्ड्या सावरीत शाळेत येणारे दोन चुणचुणीत आणि काहीसे खट्याळ विद्यार्थी म्हणूनच. बाळने शाळेची हस्तलिखित मासिके सजवायची आणि श्रीकान्तने व्हायोलिन वाजवून गॅदरिंगमध्ये टाळ्या मिळवायच्या, हे तुमचे पराक्रम तुमच्या चिमुकल्या वयात मी पाहिले आहेत.

कुठल्याही कलेतला का असेना 'झरा मूळचाचि खरा' असावा लागतो, तरच तो टिकतो. उदाहरणच द्यायचे तर मार्मिकमधून येणारे तीर्थस्वरूप दादांचे आत्मचरित्रच पाहा. त्यांनी ऐन जवानीची वेस ओलांडल्याला कित्येक वर्षे लोटली, पण जन्माला येतानाच नसानसांतून वाहणारा त्वेष आजही टिकून राहिला आहे. अन्याय दिसला की तारुण्यातला हा तानाजी वार्धक्यात शेलारमामासारखा उठतो आणि स्वत:ला उदय भानू म्हणवणारे ते चिमटीत चिरडण्याच्या लायकीचे काजवे आहेत हे दाखवून जातो; आणि म्हणूनच वृत्तपत्रव्यवसायातच काय पण सर्वत्रच प्रलोभनकारांचा सुळसुळाट झालेल्या ह्या अव-काळात हा प्रबोधनकार आजही निराळा उठून दिसतो.

हे व्रत खडतर आहे. आपल्या हातून या व्रताचे पालन किती काटेकोरपणाने होत आहे, याचे आत्मपरीक्षण करण्याचा आजचा हा दिवस आहे. सुदैवाने असले निर्दय आत्मपरीक्षण करायला लागणारी विनोदबुद्धी तुम्हांला उपजत मिळाली आहे. निर्मळ विनोदबुद्धी हे देवाच्या देण्यातले एक ठेवणीचे देणे आहे. मत्सर, पूर्वग्रह, क्षुद्रता, वैयक्तिक हेवेदावे असल्या संकुचित आणि स्वत:लाच दु:खी करणाऱ्या भावनांपासून ह्या देण्यामुळे माणूस दूर राहतो; आणि म्हणूनच निर्मळ विनोदाचा उपयोग जेव्हा शस्त्र म्हणून करायचा, तेव्हा व्यक्तीचा द्वेष न राहता, वृत्तीतला दोष दाखवणे हे मुख्य कर्तव्य राहते. आणि जेव्हा व्यक्तिद्वेष नसतो, तेव्हाच निर्भयता येते. तोंड चुकवून पळावे लागत नाही किंवा स्वत:च्या क्षुद लिखाणाचे त्याहूनही दुबळे असे समर्थन करीत बसण्याची नामुष्की स्वीकारावी लागत नाही. सभ्यतेचा धर्म सोडून वर्म हुडकीत बसणे, हे अत्यंत क्षुद मनाचे लक्षण आहे. इष्ट आणि स्पष्ट बोलण्याची अगर तशी व्यंगचित्रे काढून दोषदिग्दर्शन करण्याची प्रतिज्ञा करणाराला इष्टाची ओळख हवी आणि स्पष्टपणाची सभ्य सीमारेषा कुठली, त्याचे तारतम्य हवे. घाव असा हवा की, मरणाऱ्याने मरतामरता मारणाऱ्याचा हात अभिनंदनासाठी धरावा. शेतातले काटे काढताना, धान्याची धाटे मोडणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागते. व्यंगचित्रकाराला अव्यंगाचे स्वरूप नीट पारखता आले पाहिजे. व्यंगचित्राने प्रथम हसवले पाहिजे. थट्टेमागे आकस आला, विनोदात कुचाळी आली की ते व्यंगचित्र निर्मळ पाण्यात रंग न कालवता गटारगंगेच्या पाण्याने काढल्याची घाण येते. उत्साहाच्या आणि गंमत करण्याच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या हीनपणावर आवेशाने तुटून पडण्याच्या भरात आपणा सर्वांच्या हातून मर्यादांचे उल्लंघन होते. सुदैवाने तुमच्यावर डोळा ठेवायला दादा आहेत. त्यांच्या स्वत:च्या हातून लेखनात मर्यादांचे जे उल्लंघन झाले असेल, ते तुम्हांला खिलाडूपणाने सांगण्याचे धैर्य त्यांना आहे. तुमचे भाग्य म्हणून तुम्हांला साक्षात जन्मदाताच गुरू म्हणून लाभला; पण गुरू जितका समर्थ, तितकी शिष्याची जबाबदारी अधिक.
                                
' मार्मिक'च्या छोट्याशा कारकिदीर्तल्या कार्याचा आढावा घेण्याचा माझा हेतू नाही, परंतु गेल्या वर्षातल्या तुमच्या ठळक कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. दोन-तीन बाबतींत मला तुमचे अभिनंदन करावेसे वाटते. शब्दस्पर्धा क्षेत्रांतली लबाडी तुम्ही उघडकीला आणलीत, त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. जुगाराला माझा विरोध नाही, पण तो खेळणाराने आणि खेळवणाराने हा जुगार आहे म्हणून खेळावे व खेळवावे. धर्मराजसुद्धा द्यूत हे द्यूत म्हणूनच खेळले. धर्मयुद्धासारखे ते धर्मद्यूत होते. पण ह्या शब्दकोड्यांच्या जुगारातून साहित्याची गोडी लागते, हे वाचून मात्र मी थंड पडत होतो. असल्या जुगाराला साहित्य प्रचाराचे साधन म्हणून परवानगी देणाऱ्या आपल्या राज्यर्कत्यांच्या निष्पाप मनाचे कौतुक करायला हाती मीठमोहऱ्याच हव्यात.

' मार्मिक'मधले माझे दुसरे आवडते सदर म्हणजे, सिने-प्रिक्षान. वास्तविक सिनेमा हे तर नियतकालिकांचे 'डोंगरे बालामृत' आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या जाहिरातींवर नियतकालिके बाळसे धरतात. त्या भूगंधर्वनगरीतल्या यक्षयक्षिणींना आणि त्यांच्या कुबेरांना प्रसन्न ठेवण्याची अहमहमिका लागलेली दिसते. मराठी भाषेत तर आता नवी विशेषणे निर्माण करण्याची वेळ आली आहे. महान शब्द केव्हाच लहान झाला. कलामहर्षी तर बाबूलनाथाच्या पायरीवरच्या बैराग्यांइतके वाढले आहेत. अभिनयाचे सम्राट आणि सम्राज्ञी वृत्तपत्रीय स्तंभास्तंभांना टेकून उभ्या आहेत. अशा वेळी बोलपटांतले कचकडे उघडे करून दाखवणे हे किती अव्यवहार्य धोरण; पण तुम्ही ते पाळले आहे, याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.

जगातल्या कुठल्याही चांगल्या व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींशी तुलना केल्यावर उणेपण वाटू नये, असे गुण तुमच्या व्यंगचित्रांमध्ये आहेत. आवश्यक निर्भयता आहे. रेखाटणांत विलक्षण सहजता आहे. आमच्या बोरूच्या बहादुरीपेक्षा तुमच्या कुंचल्याची शक्ती दांडगी. दोन रेषांत तुम्ही मी-मी म्हणवणाऱ्याला लोळवू शकता. कुठल्याही स्तंभलेखकापेक्षा तुमचे सार्मथ्य मोठे; पण सार्मथ्य जितके मोठे, तितके ते किती बेताने वापरावे, याची जबाबदारीही मोठी.

अत्यंत जिव्हाळ्याने तुम्हांला मी हे पत्र लिहीत आहे. त्यामुळे काही धोक्याच्या सूचना दिल्या, तर रागावू नका. हे पत्र आहे, मानपत्र नव्हे. शिवाय तुमच्या बाबतीत मास्तरकीची माझी जुनी छडी थोडा वेळ पुन्हा हाती धरतो. स्तुतीचा 'वा'देखील योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पडावा. भलत्या ठिकाणी 'वा' दिल्यावर 'नर'देखील 'वानर' होण्याची भीती असते. सिनेप्रिक्षान, ती. स्व. दादांची आत्मकथा किंवा खांबेट्यांचा गुरू-बाजीची करुण कहाणी सांगणारा लेख, असले अपवाद वजा केले, तर लेखी मजकूर तुमच्या व्यंगचित्रांच्या तोडीचा होत नाही. चित्रे इतकी चांगली आणि लेखी मजकूर मात्र सामान्य. विनोदी लेख तर कित्येकदा केविलवाणे असतात. चांगले आणि हुकमी विनोदी लेखन ही दुमिर्ळ गोष्ट आहे. अशा वेळी कै. दत्तू बांदेकरांची आठवण होते. माझ्या मते कै. दत्तू बांदेकर हे मराठी पत्रसृष्टीतील एकमेवाद्वितीय असे विनोदी स्तंभलेखक. विनोदी लिखाणाच्या दृष्टीने अधिक जोरदार खटपट हवी.

दंभस्फोटाच्या वेळी तुमच्या संपादकीय विभागातल्या लेखण्यांना धार चढते; परंतु काही वेळा जिथे चापटीने भागेल, तिथे तुम्ही एकदम दात पाडायला निघू नये. अलीकडेच कॉलेजातल्या टेक्स्ट बुकातील धड्यांसंबंधीचा लेख मला असाच भडकून लिहिल्यासारखा वाटला. तुमचा हेतू प्रामाणिक होता. यौवनाच्या उंबरठ्यावरच्या पोरांना अगदी सिनेमातले हिरो अगर हिरोइन बनवणारे शिक्षण देऊ नये हे खरेच. तसे ते कॉलेजातून दिलेही जात नाही. खरे म्हणजे विद्यार्थ्यांनी काय व्हावे, काय होऊ नये याची चिंता करण्यात आपली प्राध्यापक मंडळी वेळ फुकट घालवीत नाहीत; गाइडे लिहिण्यात त्यांचा किती वेळ जातो, याची तुम्हांला कल्पना नाही. इंटरला शेक्सपिअरचे रोमिओ-ज्युलिएटही असते, संस्कृत नाटकांत शृंगार असतो. 'कातरवेळ' ही मराठीतली एक अतिशय सुंदर कथा आहे. षोडश वर्षे प्राप्त झाल्यावर पुत्रांशी मित्रांसारखे वागा, असे शास्त्रवचन सांगते. पोरांचे 'हिरो' होऊ नयेत, पण त्यांचे 'मोरू'तरी का करावेत? तात्पर्य, तुमच्या व्यंगचित्रांच्या सोयीसाठी नाक ओढताना उगीचच गळा आवळला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. उत्साहाच्या भरात तारतम्य सुटू नये. विनोदी लेखक-चित्रकारांचे तर अजिबात सुटू नये. लोक तारतम्य सोडतात, तिथे विनोदी लेखकाचे काम सुरू होते. थोडक्यात म्हणजे गुळगुळीत करावी, पण रक्त न काढता! ज्याची झाली, त्यालादेखील आपण 'स्वच्छ' झालो; असे वाटले पाहिजे.

तुम्हांला उत्तरोत्तर यश मिळो आणि त्या वाढत्या यशाबरोबर 'अहंकाराचा वारा न लागो, पाडसा माझ्या विष्णुदासा, नामदेवा'!

ह्या प्रसंगी श्री. द. पां. खांबेटे यांचे व तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. तुमच्या यशात तुमच्या मातापित्यांच्या आशीर्वादाइतकाच त्यांच्या सहकार्याचाही वाटा आहे. वडिलांच्या तेजस्वी लेखनाची परंपरा चालू ठेवा आणि व्यंगचित्र साप्ताहिकाचे रामलक्ष्मण होऊन दुष्टांचे निर्दाळण करून सुष्टांच्या सदिच्छांचे मानकरी व्हा, असा आशीर्वाद केवळ वयाच्या वडिलकीचा आधार घेऊन देतो.

प्रत्यक्ष हजर राहता न आल्याबद्दल राग मानू नका, असे पुन्हा एकदा सांगून आणि मार्मिकच्या पंचविसाव्या वाढदिवसाला तुम्हां दोघांच्या हाती लागून, नव्हे हातांचा आधार घेऊन व्यासपीठावर प्रत्यक्ष येऊन भाषण करीन, असे आश्वासन देऊन हे लांबलेले पत्र संपवतो.

तुमचा,
पु. ल. देशपांडे

महाराष्ट्र टाईम्स
११ मार्च २०१२
(हा लेख पु.ल.प्रेम ब्लॉगसाठी सुचवल्याबद्दल श्री धीरज पाटील आणि श्री चंद्रशेखर मोघे ह्या पु.ल.प्रेमींचे मन:पूर्वक आभार)

Monday, November 22, 2010

पुलंचे एक प्रेरणादायी पत्र

पुलंच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या दिवशी लोकसत्तेने एक लेख प्रकाशित केला होता ज्यामध्ये पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या या देण्याच्या आनंदाचं अतिशय निर्मळ विवरण स्वत: पु लंनी एका पत्रातून केलेलं आहे. या पत्रात पु लं सगळ्या आयुष्याचं सार सांगून जातात. आपण जगायला का आलो इथपासून ते आयुष्याचा सर्वोत्कष्ट बिंदू इथवर ते सारं सांगतात.या पत्राचं निमित्त ही तसं वेगळं आहे. पुलंचे नातेवाईक, चंदू ठाकूर हे लष्करात – हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं.

त्याचंच हे उत्तर -


१० जुलै १९५७,
प्रिय चंदू


रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्‍याला बाबांकडे गेली आहे. वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो. मला गेल्या कित्येक दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले आठ दिवस मी राबतो आहे. आज ९ ३० ते १० हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून गेले. मला फक्त थकवा उरला आहे. मी विचार केला – फक्त थकवा च उरला आहे का?

वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही लागलो असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले. आणि जसजसा विचार येईल तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या सहाय्याने विचार करणार आहे.

तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला आहेस?

पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो.

तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो.

पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच.

तू तुझ्या पत्रात अखिल स्त्री जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस. बायका मूर्ख! का – तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलं आहेस न तू? त्याचं ती सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखदु:खाशी तिच्या इतकं कोणी रममाण झालं नाही. आणि माणसाला काय हवं असतं ठावूक आहे? स्वत: शी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी! काय भयंकर अहंकार आहे नाही?

तुझ्याशी स्वत:चं ‘स्व’त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे. पण तू असा विचार केला आहेस का? तू कुणाच्यात तुझा ‘स्व’ अर्पण करायला तयार आहेस का? निर्मम होऊ शकतोस का? नाही! तू होऊ शकत नाहीस. मी होऊ शकत नाही. होऊ शकतात फक्त स्त्रिया. ज्यांची तुला अजून ओळख पटली नाही.

तुझी आई पहा. ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे. पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले. माझ्याशिवाय तिला विचार नसतो. इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन पोहोचत. दु:खे निर्माण होतात ती इथे!

तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं – नाटकं लिहायची – विनोदी साहित्य लिहायचं-गायचं – गाणी करायची – कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे.

तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो.

हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे.
तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का?

जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो.

तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल!

लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे.

तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified.

My dear boy, whose deaths are justifiable?

माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का?

ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे.

जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात.

तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो.

.
कळावे,
भाई.

a