Leave a message
Showing posts with label पुरचुंडी. Show all posts
Showing posts with label पुरचुंडी. Show all posts

Thursday, September 28, 2023

अंगण हा घराचा आरसा

एकदा एका खेडयात गेलो होतो. अंगणात बसलो होतो. सिगरेट काढली. नेहमीप्रमाणे  काडी नव्हती. पाटीलबुवांनी पोराला सांगितलं, "बावच्या आज्जाच्या कोपऱ्यांतून आगपेटी आन्!" आज्जाचा कोपरा! त्या चिमण्या घरातल्या एका कोपऱ्यात वर्षानुवर्षं म्हातारा आज्जा तरट टाकून बसायचा. त्यामुळं तो कोपरा आज्जाचा होता. आता आज्जा गेल्याला धा वर्स झाली तरी तो आज्जाचा कोपरा!

धोबी आणि तलाव दोघेही गेले तरी धोबीतलाव राहिला आहे तसा! अचेतनाला अशी सचेतनाच्या आठवणींची संगत असली की, लाकूड दगड-विटाही बोलक्या होतात. म्हणून मला 'नाना पेठ' म्हणणारांपेक्षा 'नानाची पेठ' म्हणणारी माणसं आवडतात. अजूनही पुण्यात 'शाळूकर बोळ' म्हणण्याऐवजी 'शाळूकराचा बोळ म्हणणारी माणसं भेटली शिवाजीनगरला भांबुर्ड म्हणणारे भेटले किंवा मुंबईच्या पाली हिलला, 'मोतमावली' म्हटलेलं आढळलं आणि सायनला, 'शीव' म्हणणारा दिसला की, माणूस माझ्या गोत्रातला वाटतो. मामंजी जाऊन पंचवीस वर्षं झाली तरी खोली मामंजींचीच झाली पाहिजे. बाप्पांच्या ओटीला बाप्पाचे पाय लागून दहा वर्ष होऊन गेली असतील, पण ती बाप्पांची ओटी! मग त्या ओटीला इतिहास येतो. तिथल्या आरामखुर्चीवर एकदम बसवत नाही. जस्ती काड्यांचा चष्मा लावून 'बलवंतराव म्हणजे अजब बुद्धीचा माणूस' म्हणणारे आणि पंचावन्नाव्या खेपेला 'गीतारहस्या'चं पारायण करणारे बाप्पा दिसतात आणि मग त्या खुर्चीवर बसून पुष्ट नितंबांचं वर्णन करणारी कथा वाचायला मासिक उघडायचं धैर्य नाही होत. मागली भिंतदेखील जस्ती काड्यांचा चष्मा लावून, "बघू रे, काय वाचतोस ते-" असं म्हणेल की, काय अशी भीती वाटायला लागते.

मुख्य म्हणजे असल्या घरांना अंगण असतं. अंगण हा घराचा आरसा आहे. आरश्यासारखं लख्ख सावरलेलं असतं म्हणून नव्हे. घरातलं कुटुंब किती नांदतय किती गाजतंय ते अंगणात पाहून घ्यावं. वयाची अदब सांभाळत पांडवासारखे बसलेले कर्ते मुलगे, माहेरवाशिणी, एकदोन पोक्त्यपूर्वतया आणि गुढग्यावर लुटलुटत अंगणपालथं घालणाऱ्या गुंड्यापासून ते दारीच्या आंब्यावर झोके काढणाऱ्या नातवंडांच्या संख्येवरून ते सारं घर पारखता येतं. 'अस्स अंगण सुरेख बाई' म्हणतात ते हेच! हे अंगण लखलखतं ते वडीलमंडळीविषयीच्या आदरातून, लेकी सुनांच्या गळ्यातल्या मण्यातून, आजी मावशीच्या लाडांतून आणि उघड्याबंब शरीराची लाज न बाळगता बसलेल्या तगड्या मुलांच्या गप्पातून! संसारातील सारी सुखं दुःख दारच्या प्राजक्तासारखी त्या अंगणात सांडलेली असतात. ती वेचत ही बैठक बसलेली असते.

- (अपूर्ण ) 
हि घरं ती घरं (पुरचुंडी)
हा लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा .

Monday, June 12, 2023

पहिला पाऊस

उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीवर पहिला पाऊस पडला ती तापलेली माती जी गंध घेऊन उठते त्याला तोड नाही. एका खोलीत बसून तो घ्यायचा नसतो. तो अनपेक्षित रीतीने यावा लागतो आणि तो वास घेताना उघड्यावर जाऊन तृप्त धरतीची तृप्तीही डोळे भरून पहावी लागते. उन्मत्त ढगातून वीज खेळायला लागल्यावर तिचा संचार तरुण शरीरातही व्हावा यात काय आश्चर्य? त्या जलधारात न्हाऊन निघालेल्या ललनांच्या स्वखुषीने प्रियकरांना दिलेल्या आलिंगनांच्या स्मरणानं चारुदत्तालाच काय पण कुणालाही, "तेचि पुरुष दैवाचे" असंच म्हणावसं वाटणार.

पहिला पाऊस आणि इंद्रधनुष्य पाहण्याची उत्सुकता कधी संपू नये. रस्त्यातून बँड वाजत निघालेला पहायची हौस संपली की बालपण संपलं असं समजावं आणि पाऊस आणि इंद्रधनुष्य पहायची हौस खतम झाली की आपण जिवंत असूनही खतम झालो असं समजावं. पाणी आणि गाणी यांचा संबंध नुसता यमकापुरता नाही. पाण्याने तहान भागते आणि गाण्याने श्रम हलके होतात. ही झाली नुसती उपयुक्तता. पण माणसाच्या जीवनाला उपयुक्ततेपलीकडचंही एक परिमाण आहे. म्हणूनच पाऊस कल्पनेच्या वेलींनाही फुले आणतो.

वर्षातला पहिला पाऊस आजही मला शाळकरी वयात घेऊन जातो. जून महिन्यातल्या पावसाच्या आठवणी जडल्या आहेत त्या नव्या छत्रीवर पडलेल्या पाण्याच्या वासाशी, नव्या क्रमिक पुस्तकांच्या वासाशी, कोवळ्या टाकळ्याच्या भाजीशी, उन्हाळ्यात फुटलेले घामोळे घालवायला पहिल्या पावसात भिजायला मिळालेल्या आईच्या परवानगीशी, रस्त्यातली गटारे तुडुंब भरून वाहू लागल्यावर त्यात लाकडाची फळकुटे टाकून त्याचा प्रवास कुठवर चालतो ते पाहत भटकण्याशी आणि आषाढात गावातल्या विहिरी काठोकाठ भरल्यावर आपापल्या आवडत्या विहिरींवर आवडत्या मित्रांबरोबर जाऊन मनसोक्त पोहण्याशी.

पाऊस हा असा बालकांना नाचायला लावणारा, तरुणांना मस्त करणारा आणि वृद्धांना पुन्हा एकदा तारुण्याच्या स्मरणाने विव्हल करणार असतो. चार महिन्यांचा हा पाहुणा, पण प्रत्येक महिन्यात त्याच्या वागणुकीत किती मजेदार बदल होत असतो. म्हणूनच की काय, वयस्कर माणसं अनुभवांचा आधार देताना, "बाबा रे, मी चार पावसाळे जास्त पाहिले आहेत" असं म्हणतात.

पु. ल. देशपांडे
पुस्तक - पुरचुंडी

Sunday, November 6, 2022

नाटकाचं वेड हा रक्तदोष

कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाच्या बाबतीत सुरुवातीचे दिवस म्हटले की कष्ट, परिश्रम, हालअपेष्टा वगैरे शब्द डोळ्यांपुढं उभे राहतात. पुष्कळदा मला “तुमच्या सुरुवातीच्या किंवा उमेदवारीच्या दिवसांबद्दल लिहा' असंही सुचवण्यात येतं. परवाच कोणीतरी “तुमच्या शागिर्दीच्या काळासंबंधी लिहा' असंही सांगितलं. मी म्हणतो, “मी शागिर्दी अशी कधी केलीच नाही.” त्याला माझं उत्तर उद्धटपणाचं वाटलं असणार. तो चटकन म्हणाला, “असं कसं शक्‍य आहे? तुम्ही कुणाला गुरू मानत नाही का?” मी म्हणालो, “कलेच्या क्षेत्रात ह्या गुरुप्रकरणामुळं बराचसा घोटाळा झाला आहे. कुणाला गुरू मानणं न मानणं ही एक मनात जतन करून ठेवायची गोष्ट आहे. गुरूच्या मोठेपणावर खपण्याची नाही. तुमच्या कलेतूनच तुमचं कर्तृत्व दिसावं लागतं. एखाद्या कलेच्या साधनेसाठी तुम्ही किती कष्ट केलेत, कुठल्या आर्थिक विपरीत परिस्थितीला तोंड दिलंत, तुम्ही लहानपणी श्रीमंत होता की गरीब ह्याला फारसं महत्त्व नसतं. नाटकात एकदा “शिवाजी' म्हणून उभं राहिलात की शिवाजीमहाराजांचं नाटककाराला अभिप्रेत असणारं “शिवाजीपण' तुम्ही किती समर्थपणानं करता हे महत्त्वाचं. मी स्वत: एखाद्या क्रीडांगणावर खेळायला जावं अशा भावनेनं रंगभूमीवर गेलो. नाट्यविषयाचा अभ्यास करणारे समीक्षक मला कधी कधी विचारतात की, रंगभूमीवर जाण्यामागली तुमची प्रेरणा कोणती?''

मला ह्या प्रश्नाचं उत्तर कधीकाळी देता येईल असं वाटत नाही. फार तर मी एकच म्हणेन की, जिथं जिथं मला आनंदनिधानं सापडली तिथं तिथं मी गेलो. मला वाटतं, मीच नव्हे तर कलेच्या क्षेत्रातली बहुतेक माणसं तिथं त्यांना आनंदाचा ठेवा लाभतो म्हणूनच जातात. पुढं त्यात यश, कोर्ती, धनलाभ इत्यादी गोष्टी येतात. पण त्या दिशेची पहिली धाव ही आनंदाच्या प्राप्तीसाठी असते.

कुणीसं म्हणे हिमालयाची शिखरं चढणाऱ्या एका गिर्यारोहकाला विचारलं होतं की, “तुम्ही डोंगर कशासाठी चढता?” त्यानं उत्तर दिलं, ''कारण ते तिथं असतात म्हणून." डोंगर हे चढण्यासाठीच असतात ह्यावर त्याची नितान्त श्रद्धा होती. नाटक हे लोकांपुढं करून दाखवण्यासाठीच असतं अशा श्रद्धेशिवाय नाटकात जाईलच कोण? आणि नाटक पाहण्याची क्रिया आपल्याला आनंद देते असं वाटल्याशिवाय नाटक पाहायला जाईलच कोण? महाराष्ट्र नाटकवेडा आहे वगैरे आपण म्हणतो. पण ह्या महाराष्ट्रातच अत्यंत सुसंपन्न अशी लक्षावधी माणसं अशीही असतील की त्यांना नाटक पाहावं असं चुकूनही वाटलं नसेल. मागं एकदा एका विद्यापीठाच्या कुलगुरूनं क्रिकेट मॅच पाहण्यात लोक आपला वेळ फुकट दवडतात असं म्हटलं होतं. एवढंच नव्हे तर रिटायर्ड लोकांना “रस्ते दुरुस्त करण्याच्या कामाला लावलं पाहिजे.' असंही त्यांचं मत होतं. माझ्या हातात सत्ता असती तर ह्या कुलगुरूला मी रस्ते दुरुस्त करतच ठेवलं असतं. ज्यांना जीवनातली “वेडं' कळत नाहीत, त्यांच्या तोंडून जे जे निघतं ते किती मूर्खपणाचं असतं ह्याचं हे आणखी एक उदाहरण आहे.
वाऱ्यावरची वरात ह्या नाटकात पु.ल. आणि सुनीताबाई
वाऱ्यावरची वरात ह्या नाटकात पु.ल. आणि सुनीताबाई 
हे वेड कां लागतं? कोण लावतो? ते कां वाढीला लागतं? ह्याची उत्तरं कोण देणार? रंगभूमीवर यश मिळवणाऱ्यांची तर गोष्ट सोडाच, पण तिथं सतत मार खात आलेला माणूसदेखील मार खात खात तिथंच राहतो. मग हे वेड नाटकाचं असो, गाण्याचं असो, 'की इतर कुठल्याही कलेचं असो. जुन्या नाटकमंडळ्यांतली माणसं किंचित टारगटपणानं ह्या वेडाला 'अण्णासाहेबांची भुकटी' म्हणत. अण्णासाहेब म्हणजे किर्लोस्कर. नाटकमंडळींच्या जेवणातलं हे तिखट, पिठल्याबरोबर एकदा पोटात गेलं की ते त्या माणसाला भुतासारखं झपाटतं. “लाइम लाइट' नावाचा चार्ली चॅप्लिनचा रंगभूमीवरच्या झगमगाटापासून दूर फेकल्या गेलेल्या नटाच्या जीवनावरचा बोलपट आहे. तो उपेक्षित नट पुन्हा पुन्हा थिएटरच्या आसपास रेंगाळत असतो. एकदा तरी ग्रीज पेंट लावायला मिळावा म्हणून तडफडत असतो. त्याच्यावर माया करणारी एक तरुणी त्याला म्हणते, “ह्या रंगभूमीनं तुला इतकं झिडकारलं तरी पुन्हा पुन्हा तिथं कशाला कडमडतोस? तुला तिटकारा येत नाही का तिचा?” चॅप्लिन म्हणतो, “येतो ना. मला कुठं रक्‍त सांडलेलं पाहूनदेखील तिटकारा येतो. पण माझ्या धमन्यांतून रक्तच वाहत असतं-त्याला काय करणार?”

आम्हां काही निकटच्या मित्रमंडळींत 'रक्‍तदोष' असा एक परवलीचा शब्द आहे. रात्र रात्र जागून आपण गाणी कां ऐकली? याचं उत्तर 'रक्‍तदोष.' नाटकांच्या तालमीपासून ते उभं करण्यापर्यंतची, घरचं खाऊन धडपड कां केली-रक्‍तदोष. थोडक्यात म्हणजे नाटक-तमाशे-गाणी असलं काही केल्याशिवाय तन आणि मन ह्या दोघांनाही राहवत नाही हेच खरं. सामान्यांच्या भाषेत ह्याला 'खाज' म्हणतात. नाटकात पैसा मिळतो म्हणून कोणीही इथं प्रवेश करत नाही. अगदी नाटकांचा काँट्रॅक्‍टरसुद्धा. त्या काँट्रॅकटरला नाटकं लावूनच फायदा करायची आणि फटका खायचीच हौस असते. इतकंच कशाला? तिकीटविक्रीवरची माणसंसुद्धा एका विशिष्ट हौसेनं तिथं बसलेली असतात. केवळ तिकीटविक्रीचं काम केल्याचे पैसे मिळतात म्हणून नव्हे.

“नाटक' म्हटल्यावर माझ्या डोळ्यांपुढं थिएटरातल्या तिकीटविक्रीवरची माणसं, डोअरकीपर, स्टेज सजवणारी माणसं, रंगपटातली, कपडेपटातली माणसं, नट-नटी, डायरेक्टर, लेखक असं सगळं कुटुंबच्या कुटुंब उभं राहतं. ह्यांतला प्रत्येक जण या ना त्या प्रकारचं नाटकाचं वेड घेऊनच आलेला असतो. केवळ नट होण्याचंच वेड नव्हे तर डोअरकीपर होण्याचंसुद्धा.

अपूर्ण..
(सुरुवातीचे दिवस - पुरचुंडी)
पु.ल. देशपांडे

संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील चित्रावर क्लीक करून पुस्तक घरपोच मागवा. 

a