Leave a message
Showing posts with label पुलकित लेख. Show all posts
Showing posts with label पुलकित लेख. Show all posts

Tuesday, December 3, 2024

गांधीयुग व गांधीयुगांत

परतंत्र भारतातील जनतेमध्ये भय, दारिद्र्य, आलस्य, अविश्वास इत्यादि जे दोष निमाण झाले होते, ते नष्ट करण्यासाठी गांधीजींनी जनतेच्या हाती अहिंसक प्रतिकाराची समर्थ आयुधे कशी दिली, याची मीमांसा पुढील लेखात केली आहे. त्याचप्रमाणे, स्वातंत्र्यकाळात गांधीय मूल्यांचा लोप भारतामध्ये झालेला कोठे कोठे दिसतो, हेही त्यात विवेचिले आहे.

गांधीजींनी एके ठिकाणी म्हटले आहे की, “ गांधीवाद नावाची कोणत्याही प्रकारची वस्तू नाही. आणि माझ्यामागे कोणताही असा पंथ चालू व्हावा अशी माझी इच्छा नाही. मी एखादे नवे तत्त्व किवा एखादा नवा सिद्धान्त शोधून काढला, असा दावाही मला करावयाचा नाही.'' गांधीजींच्या या उद्‌गारावरून मला तुकोबांच्या अभंगातील ओळ आठवली:-

“आम्ही वैकुंठवासी। आलो याचि कारणासी ।
बोलिले जे ऋषि । साच भावे वर्ताया ॥”

ऋषींनी शोधलेली आणि माणसामाणसाला निरामय, सुंदर जीवनाचा आनंद देणारी सनातन तत्त्वे संतांनी आचरून दाखविली. ज्ञानेश्‍वरांनी ह्या अशा शुद्ध, निर्भय आचरणालाच उद्देशून म्हटले आहे, “जयांच्या लीळांमाजी नीति जियाली दिसे.'' त्यांचे आचरण पाहणे म्हणजेच नीतितत्त्वांचा विकास पाहणे आहे. गांधीजींचा शोध हा त्यांच्या लेखनातून किवा वक्‍तृत्वातून घेण्यापेक्षा आचरणातून घ्यायला हवा. वक्तृत्वापेक्षा कर्तृत्वातून त्यांना शोधायला हवे. त्यांच्या शब्दापेक्षा त्यांचं मौन अधिक बोलके असे आणि उपदेशापेक्षा उपोषणातून अधिक सामर्थ्य प्रकट होई. म्हणूनच गांधीवाद गांधींना मंजूर नव्हता.वादात प्रतिपक्षावर मात करण्याचा अभिनिवेश असतो. तिथे बहुधा जो तो बुद्धीच सांगतो आणि उरते ते करंटेपण. वाचाळतेला क्रियेचा आधार नसला तर 'शब्द बापुडे केवळ वारा' होऊन जातात. गांधींचे तत्त्वज्ञान त्याच्या प्रत्येक क्रियेतून दर्शन देत गेले. ईश्वर आणि प्रार्थना ह्यांवर नितान्त श्रद्धा असणारे गांधीजी त्या ईश्वराचे दर्शन भारतातल्या बहुसंख्यांना भाकरीतूनच घडवावे लागेल हे ओळखून होते. त्यांना भरल्या पोटातला वेदान्त नको होता आणि उपाशी पोटोबांना विठोबाची भक्ती सांगायची नव्हती. म्हणूनच त्यांच्या अध्यात्माचा टाळकुटेपणा झाला नाही. भगवन्ताचे अधिष्ठान आणि चळवळीचे सामर्थ्य ह्यांचा संगम झाला पाहिजे. नुसत्या भगवन्ताच्या अधिष्ठानाच्या जयजयकारातून आळसाला आणि भोंदूपणाला उत्तेजन मिळते. आणि सात्त्विक अधिष्ठानाशिवाय होणाऱ्या सामाजिक वा राजकीय चळवळीतून द्वेषाचे विषारी वातावरण तयार होते, तत्त्वच्युती होते, अविश्वास निर्माण होतात. अविश्वासातून भय आणि भयातून हिंसा जन्माला येते. दुर्बलांचे दुर्बलत्व वाढते आणि सबलांचे दानवीकरण होते.

गांधीजींनी सत्य, अहिंसा यांसारख्या सनातन मूल्यांचे स्वरूप कृतीतून प्रकट करण्यात आयुष्याचा प्रत्येक क्षण वेचला. सामान्य माणसाला हवा असतो तो त्याच्या डोळ्यांना दिसणारा आचरणाचा धर्म. आणि हा धर्म सांगणारा माणूस आपल्यांतच आहे, आपल्या वेदना जाणणारा आहे, त्या वेदना भोगलेला आहे, हा विश्‍वास ऐकणाराच्यात निर्माण व्हावा लागतो. गांधीजींचे हे लौकिकत्व अत्यंत अलौकिक होते. म्हणूनच त्यांचे अनुयायीत्यांच्यासमवेत पुढारी आणि अनुयायी ह्या नात्याने न चालता त्यांचे कुटुंबीय म्हणून चालले. ते महात्माजी होते, पण त्याहूनही अधिक ते ‘बापू’ होते. सरदार वल्लभभाई म्हणजे नखशिखान्त विलायती बालिष्टर. पण बापूंच्या सहवासांत आले आणि हा पोलादी पुरूष बापूंची दात घासण्याची लिंबाची काडी तयार करणे, फळे कापणे, मधपाण्याचे मिश्रण करणे ही कामे मागून घेऊन करू लागला. असामान्य बुद्धिमत्ता आणि प्रखर पांडित्य असलेले विनोबा आश्रमात गांधीजींच्या जोडीला बसून धान्य निवडीत, दळण दळीत. जनाबाई दळिता कांडिता विठ्ठलाचे गीत गात होती, कबीर शेले विणताना माणसांच्या वेदना पाहून रडत होता, चोखामेळा रस्ता झाडत देवाचे नाव घेत होता, सावता माळी मळ्यातल्या कांद्यामुळ्यांच्या लागवडीत विठ्ठलाचे रूप पाहत होता. महात्माजींच्या आश्रमांत ही सारे कामे देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन चालली होती. व्यासपीठावरून भाषणे करणारे, सरकारशी शाब्दिक किंवा शस्त्र धारण करून चकमकी करणारे पुढारी जनतेला ठाऊक होते. ते वंद्यही होते. ते तुरूंगवासही सहन करीत. त्यांच्या शौर्याविषयी लोकांना आदरही होता. परंतु पुढ्यात चरखा घेऊन सूत काढणारा आणि आपल्यासारखेच दळणटिपण करणाराआणि आपल्यासारखेच गरीबीचे जिणे जगणारा, तसाच अर्धनग्न असणारा हा माणूस आपल्या दु:खाशी सर्वस्वी परिचित असणारा आपला तारक आहे ही जाणीव गांधींना विलक्षण जवळीक देऊन गेली. गांधींच्या काळात भारत हा एक विशाल कुटुंब बनला तो गांधींच्या ह्या लोकविलक्षण लौकिकत्वामुळे. भारतातल्याच नव्हे, तर जगातल्या कुठल्याही माणसाला सवंसंगपरित्यागी माणसाकडे सदैव जिव्हाळा आणि आदर अशा संमिश्र भावनेनेच पहायला आवडते. भारतात तर त्याचे विशेषच कौतुक. म्हणूनच गांधीजींच्या सार्वजनिक जीवनातल्या उदयाबरोबर गांधीवादाचा जन्म न होता गांधीयुगाचा जन्म झाला. वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवनांत मानवी समाजाच्या धारणेला अत्यावश्यक असणाऱ्या सनातन मूल्यांचा आधार असलेले नवे विचार गांधींनी दिले. गांधींनी नवा धर्म दिला. नाही, नवी व्रते गांधींच्या आचाराधिष्ठित विचारांना गांधीवाद न म्हणता गांधीयोगच म्हणायला हवे. योगात जोडण्याची कल्पना येते, आणि जोडायला दुवा लागतो. भारतातला 'दारिद्र्य' हा दुवा गांधींनी सर्वांत महत्त्वाचा मानला. सार्‍या व्यथांचे मूळ दारिद्रयात आहे, हे सनातन सत्य आहे.

ह्या देशात गांधीजींच्या काळात आणि आजच्याही काळात जास्तीत जास्त लोकांची समान व्यथा म्हणजे दारिद्र्य. विवेकानंदांनीही लक्ष्मीनारायणापेक्षा दरिद्री- नारायणाच्या उपासनेलाच महत्त्व अधिक दिले. भारतात आर्थिक दारिद्र्याइतकेच भयानक आध्यात्मिक दारिद्र्य आहे. ईशावास्याची घोषणा ज्या देशात झाली त्या ह्या देशाइतका अध्यात्मदृष्ट्या दरिद्री देश भौतिकवादी म्हटल्या गेलेल्या यरोपखंडातही नसेल. सर्वाभूती एकच ईश्वर असल्याचा आपण गजरच अधिक करतो. साक्षात्‌ त्या देवाच्या दारातच आम्ही स्पृश्याला घडविणारा ईश्‍वर आणि अस्पृश्याला घडवणारा ईश्‍वर असे त्या ईश्वराचेच दोन तुकडे केले. आम्हाला दारिद्रयामुळे माणुसकी परवडत नाही की माणुसकी नाही म्हणून आम्ही दरिद्री, कोण जाणे. दारिद्र्याच्या खातेऱ्यात लोळणार्‍या माणसांकडे आपण चांगल्या कोरड्या डोळयांनी आणि त्याहून कोरड्या मनाने पाहू शकतो. रोटीबंदी, बेटीबंदी, स्पर्शबंदी यांसारख्या अमानुष आचरणपद्धतीत भारताला अग्रमान मिळावा, असला हा देश राजकीयच काय पण धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक किवा वैचारिक पारतंत्र्यात न पडता तरच आश्‍चर्य. गांधीजींनी पहिले बोट ठेवले ते ह्या आध्यात्मिक आणि आर्थिक दारिद्रयावर. ह्या आध्यात्मिक दारिद्रयाविरुद्ध आणि त्यातूनच निर्माण होणार्‍या सहानुभूतिशून्य जगण्यावर अत्यंत तीव्रतेने आघात करणारा गांधींच्याही आधीचा महात्मा ज्योतिबा फुले. उपास, दैन्य, उपेक्षा ह्यांच्या संगतीत नांदणारा आणि भिक्षुकशाहीने निर्माण केलेल्या भगवंताच्या भुताला देव मानणारा शेतकरी आणि त्याच भिक्षुकशाहीला बळी दिलेल्या विधवा आणि अस्पृश्य, ह्यांच्याविषयीच्या कळवळ्याने, अत्यंत तीव्रतेने जीवनातील सत्याचा शोध घ्यायला निघालेले ज्योतिबा फुले मला इतर कुठल्याही पुढाऱ्यापेक्षा गांधीजींचे खरे पूर्वसूरी वाटतात. फुल्यांची वाणी कठोर हाती, पण अंतःकरण माणुसकीने ओथंबलेले होते. गांधींचे अंत:करण आणि वाणी दोन्हीही मृदु असली तरी निर्धार वज्राला भेदणाराच होता. महात्मा फुल्यांच्या कार्याची मर्यादा महाराष्ट्रापुरतीच राहिल्यामुळे भारतीय पातळीवर त्यांच्या कार्याचे कौतुक झाले नाही. पण त्यांनी जी चळवळ सुरू केली ती सत्यशोधनाचीच होती. गांधींनीही प्रथम प्रयत्न सुरु केले ते सत्याचेच प्रयोग. प्राचीन भारतीय ऋषी हे प्रयोग करणारे वैज्ञानिक होते. गांधींच्यात सामान्य आणि असामान्य दोघांनाही प्रयोग करणारा ऋषी आढळला. फरक इतकाच की, हा ऋषी सामान्यांच्यात वावरणारा सन्त होता. हिमालयांत जाऊन बसणारा योगीराज नव्हता.हा आपल्यात राहणारा, आपल्यासारखाच, आपल्याला समजणारी भाषा बोलणारा आणि आपल्या दुःखांना वाचा फोडणारा, ती दुःखे हलकी करण्याच्या कृती शोधून काढणारा आहे, ह्याची जाणीव, जिथे प्रकाशाचा कसलाही किरण पोहोचू शकत नव्हता, असल्या खेड्यांतल्या सामान्यांतल्या सामान्य माणसाला झाली.

स्मृतिकारांनी 'ज्ञानी' माणसाच्या वागण्याचे मोठे मार्मिक वर्णन केले आहे.:-
यं न सन्तं न चासन्तं
नाश्रुतं न बहुश्रुतं ।
न सुवृत्तं न दुर्वृत्तं
वेद कश्चित्स ब्राह्मण: ॥

जो संतांसारखा असामान्य नाही किवा जो संतपणाला पारखाही नाही, जो अविद्वान नाही आणि विद्याभ्यासजडही नाही, जो सदाचाराचा बडेजाव करणारा नाही किवा दुराचारीही नाही, असा लौकिकांत लौकिक आणि अलौकिकांत अलौकिक असणारा माणूस पोथीनिष्ठांना बुचकळ्यात पाडीत असला तरी सामान्यांना आपल्याहून थोर असल्याची जाणीव असूनही आपला वाटतो. म्हणूनच राजकारणातील पंडितांना गांधीजींची जी 'फॅड्स्‌' आहेत असे वाटत होते, ती सामान्य जनांना अहिंसामय प्रतिकाराची समर्थ आयुधे वाटली. गांधी पंचा नेसून उघडे राहिले. वस्त्राधिष्ठित संस्कारांना सुधारणा समजणाऱ्या लोकांना त्यांत ढोंग दिसले, परंतु कोट्यवधी अर्धनग्न भारतीयांना त्यात हा माणूस आपल्यासारखा वाटला. गांधींच्या आधी हा वेडेपणा (?) फक्त ज्योतिबांनी इंग्रजांच्या मुंबईत भरलेल्या दरबारी जातांना केला होता. गांधीजींच्या उदयापूर्वी 'स्वराज्य' हा भारतीय बुद्धिमंतांचा आणि शस्त्रवंतांचा इंग्रज बुद्धिमंतांशी आणि शस्त्रवंतांशी चाललेला झगडा होता. गांधीजींनी तो न्यायाचा अन्यायाविरुद्ध चाललेला, माणुसकीचा अमानुषत्वाशी चाललेला झगडा केला.हा झगडा केवळ राष्ट्रीय नव्हता. जगातल्या दलितांचा त्यांना दलितावस्थेत ठेवणारांशी चाललेला हा झगडा होता. गांधींनी राजकारणाचे अध्यात्मीकरण केले ते सायंप्रार्थनेने नव्हे, तर जात, धर्म, राष्ट्र, वेश ह्या कृत्रिम तटबंदीविरुद्ध पुकारलेल्या पवित्र शंखनादाने. डॉ. मार्टिन ल्यूथर किंगच्या बलिदानामुळे गांधींच्या आंतरराष्ट्रीय प्रभावाची जाणीव जगाला अधिक झाली, तरी एकोणीसशे एकोणतीस साली म्हणजे डॉ. किंग ज्या साली जन्माला आले आणि वयाने अवघे सात महिन्यांचे होते, त्या वर्षी गांधींनी निग्रोंच्या दास्यमुक्तीच्या चळवळीला त्यांच्या 'क्रायसिस' नावाच्या मासिकासाठी संदेश पाठविता होता. त्यात त्यांनी म्हटले होते- “गुलाम असणे यात कोणताच कलंक नव्हता. गुलामांचे मालक असणे यात खरा कलंक होता. परंतु ते जाऊ द्या. गतकाळाचा हा संदर्भ उकरून काढणे आता बरोबर होणार नाही. भविष्यकाळाकडे आपण नजर ठेवू. जे लोक सत्य, पावित्र्य व प्रेम यांचा आग्रह धरतील तेच आगामी काळाची घडण करू शकतील.” इतकेच नव्हे तर त्यानंतर सहाच वर्षांनी म्हणजे १९३५ साली गांधींच्या भेटीला निग्रो कार्यकर्त्यांचे एक पथक भारतात आले होते. त्या पथकाला गांधींनी सांगितले, “अखेरीस अहिंसेचा पवित्र संदेश जगाला पोहोचविण्याचे ऐतिहासिक कार्य निग्रोंच्याच द्वारा होणार आहे.” गांधीजींना अभिप्रेत होते ते सार्‍या मानवी समाजाचे स्वातंत्र्य. लिकनने म्हटले आहे, “मी कुणाचा जसा गुलाम होणार नाही, तसाच कुणाचा मालकही होणार नाही.''

स्वातंत्र्य ह्याचा अर्थच मुळी भयशून्य होणे हा आहे. भारतीय तत्त्वज्ञानात चित्त भयशून्य करणे हा गीताप्रणीत अंतिम आदर्श आहे. लोकमान्य आणि गांधी ह्यांची गीतेवरची अपार निष्ठा ह्या भयशून्य होण्याच्या साधनेतूनच आली. “आनंदं ब्रह्मणो विद्वान्‌ न विभेति कदाचन।” भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात बहुतेक साऱ्या क्रांतिकारकांना गीतेचे आकर्षण भयशून्य होण्याच्या तत्त्वज्ञानाचा मार्गदर्शक ग्रंथ म्हणूनच होते. भयशून्यता ही स्वातंत्र्याचीच नव्हे, तर जीवनातल्या सार्‍या थोर कर्तृत्वाला आवश्यक असणारी अटच आहे. याच संपूर्ण मुक्तीच्या कल्पनेमुळे गांधींना इंग्रज मालक जाऊन देशी मालक यावा, हे अभिप्रेतच नव्हते. म्हणूनच त्यांनी सारी शक्‍ती माणसामाणसांतल्या उच्नचनीचतेच्या कल्पना नष्ट करण्याकडे लावली. मानवी इतिहासातला हा काही पहिलाच प्रयत्न नव्हे. परंतु विसाव्या शतकात इतक्या निकराचा प्रयत्न गांधीजींनीच केला. गांधीजींच्या लेखी एखादा वैज्ञानिक आणि केवळ अंगमेहनत करणारा भंगी ही दोन टोके नव्हती. समाजपुरुषाच्या शरीरातील समान महत्त्वाची घटके होती. शौचकूप गलिच्छ झाल्यावर मायक्रोस्कोपऐवजी झाडू हवा आणि मलरोग तपासायला मायक्रोस्कोप वापरता यायला हवा. त्या त्या वेळी ती कामे समान महत्त्वाची. म्हणूनच गांधीनी लेखणी, टकळी आणि झाडू एकाच तोलाने वापरली. गांधीजी खरे कर्मयोगी होते. कारण हाती असलेल्या प्रत्येक कर्मातल्या “ कौशल्याला” ते अतिशय महत्त्व देत. प्रार्थनेची जागा आणि शौचाचा संडास ह्या दोन्ही स्थानांविषयी त्यांनी तितक्याच उत्कटतेने विचार केला. गांधीजींच्या निकट सहवासाचे भाग्य लाभलेले एक गृहस्थ मला सांगत होते की, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत गांधीजी जे जे काही करीत असत ते पाहणाऱ्याला असे वाटे की, गांधीजींना तेवढेच काम आहे.नुसते स्नान करीत असले तरी एखाद्याला वाटावे की, ह्यांना स्नानाचाच शौक आहे. आणि मैला साफ करीत असताना वाटावे की, गांधीजींना मैला साफ करणे एवढेच सर्वात महत्त्वाचे वाटते. हिशेबाबद्दलची दक्षता पाहून त्यांना कोणी पक्का बनिया समजावे, तर मुलांशी खेळतांना पाहून असला रिकामा आजोबा आपल्याही घरात असावा असे वाटावे. नुसते झोपले तरी इतके गाढ झोपायचे की, ही झोप चांगली पाचसहा तास चालणार असा अंदाज करावा, तर विसाव्या मिनिटाला त्या गाढ निद्रेतून त्यांना जाग येत असे. गांधीजी पंचाच नेसत. पण त्या पंचाची काळजी एखाद्या रेशमी वस्त्रासारखी घेत. सूत काढताना बोटभर सूत फुकट जाऊ देत नसत. उघडे असत, पण अजागळासारखे उघडे नसत.त्यांनी शरीराचे चोचले पुरविले नाहीत, पण एखाद्या तलवार बहाद्दराने आपली तलवार लखलखीत आणि धारदार ठेवावी तसे आपले शरीरही लखलखीत ठेवले. शरीर हे जीवित-कार्यातल्या साधनासारखे वापरले. ते गंजू दिले नाही. साधे पत्र लिहिताना कागदाचा एक कपटा वाया घालवू दिला नाही. शब्दांचा वापरदेखील असाच काटेकोरपणाने केला. गांधीजींची शब्दयोजना हा तर साहित्यिकांनाही हेवा वाटावा असा विषय आहे. ते मितभाषी नव्हते की अमितभाषी नव्हते. यथार्थभाषी होते, गंभीरातला गंभीर प्रसंग देखील एखाद्या प्रासंगिक विनोदी उद्गाराने ते सुसह्य करून टाकीत. विनोद हा तर गांधीजींच्या अहिंसक भात्यातला रामबाण होता. अश्रू आणि हास्य हे माणसाला जोडणारे केवढे बळकट दुवे आहेत! भयग्रस्त माणूस हसू शकत नाही आणि अमानुषाच्या डोळ्यात सहानुभूतीचे अश्रू उभे राहात नाहीत. असला हा लौकिकातला लौकिक आणि अलोकिकातला अलौकिक माणूस आपल्या देशात ज्या काळी आपल्या आचरणाने नवे चैतन्य निर्माण करीत होता तो काळ म्हणजे गांधीयुग. युगाचा हिशोब तारीखवार करता येत नाही. परंतु एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांनी असहकारितेचे पर्व सुरू केल्यापासून ते भारत दुभंगला जाऊन पाकिस्तान आणि भारत अशी दोन शकले होऊन मिळालेल्या स्वातंत्र्यापर्यंतचा काळ हे गांधीयुग, असे मला वाटते.

ह्या युगात देशातल्या लहानापासून थोरांपर्यंत सर्वांना कुठल्याही विषयावर महात्मा गांधी काय म्हणतात ते जाणून घेण्याची ओढहोती. आमची दुःखे समजणारा हा नेता आहे, असा विश्‍वास अनुयायांना वाटल्याखेरीज त्या नेतृत्वाला काहीच अर्थ नसतो. मग ते दुःख वैयक्तिक असो वा सामाजिक. माझ्या मुलांच्या शिक्षणापासून ते माझ्या आरोग्यापर्यन्त गांधी माझी चिन्ता करताहेत असे वाटे. समाजातल्या प्रत्येक माणसासाठी गांधीजींनी कार्यक्षेत्र निर्माण केले होते. देशभक्ती व्यासपीठावरून उठून थेट स्वयंपाकघरापर्यंत जाऊन पोहोचली. शांतिमय लढाईची दैनंदिन तालीम केल्याशिवाय ह्या लढ्यांतला सैनिक होता येत नाही, हे लोकांना उमजले.त्यासाठी गांधींनी लोकांना कितीतरी प्रकारची व्रते दिली. व्रताशिवाय शिस्त येत नसते. शिस्त ह्याचा अर्थ मनाला तालात पावले टाकायला शिकवणे. मिलिटिरी किंवा एन. सी. सी. तली शिस्त ही प्रासंगिक असते. परेड ग्राउंडवरून निघालेली एन्‌. सी. सी. तील मुले किवा सुट्ट्यांच्या दिवशी हिंडणारे लष्करी जवान सार्वजनिक जीवनातली शिस्त पाळतातच असे नाही. त्यांची शिस्त वरिष्ठांच्या हुकुमातून पाळली जाते. स्वत:च्या मनाला हुकूम दयायची त्यांना सवय नसते. सत्याग्रही सैनिकाचा अधिकारीही तोच आणि साधा सैनिकही तोच. व्रताला हृदयपरिवर्तन व्हावे लागते. वेषपरिवर्तन नव्हे. हृदयपरिवर्तनापेक्षाही बुद्धीने घासून घेऊन स्वीकारलेले व्रत अधिक कसोशीने पाळले जाते. गांधीजींनी हृदयपरिवर्तन म्हटले, तरी केले ते विचारपरिवर्तन. ते झाल्यावर परदेशी कापड अंगाला लावणार नाही म्हणणाऱ्या सामान्यातल्या सामान्य माणसाला निर्भयतेचा दिव्य स्पर्श होऊन गेलेला असे. “गांधीजी तुरुंगात आहेत ना? मग आपण दिवाळीचे फक्त स्नान करायचे, फराळ करायचा नाही, अंगाला उटणी लावायची नाहीत, विलायती साबण लावायचा नाही.” एवढे साधे व्रत करणार्‍या कुटुंबालाही केवढा धन्यतेचा साक्षात्कार होत असे. हे सारे निर्णय सचिवालयातून आलेले नसत की भडक प्रचाराचीही साधने वापरली जात नसत. ज्या ब्राह्मण कुटुंबात-शिवाशिवीचा सैतान धुमाकूळ घालायचा, त्या कुटुंबातल्या वयोवृद्ध कर्मठ बायका देखील सत्याग्रही म्हणून तुरुंगात गेल्या आणि तुरुंगातील विटाळ कालवलेली (?) भाकरी खाऊन धर्माच्या खऱ्या साक्षात्काराचे नवे पुण्य संपादून परतल्या. ज्या गुजरातेत पुरुषांपुढे येताना बायकांना तोंडासमोर हातभर लांब घुंगट घेऊन यावे लागे, त्या गुजराती स्त्रिया हजारोंच्या संख्येने सत्याग्रहात दाखल झाल्या. पदराखालच्या पित्या पोराला म्हातार्‍या सासूच्या हवाली करून निःशस्त्र प्रतिकाराला निघालेल्या भारतीय बायका, दारूबाजांचे अश्लील बरळणे आणि पोलिसांच्या लाठ्या ह्यांना न जुमानता दारूच्या अड्ड्यावर पिकेटिंगला उभ्या राहिलेल्या सत्याग्रही स्त्रिया, ज्यांच्या सुकुमार तळव्यांना दिवाणखान्यांतला गालिचा देखील टोचावा असल्या तरुणींनी भर उन्हात मिठाच्या सत्याग्रहासाठी केलेली पायपीट आणि पोलिसाहाती खाल्लेला मार ह्यांच्या स्मरणाने देखील आजच्या सर्वस्वी विपरीत परिस्थितीत, माझ्या बालपणी मी पाहिली होती. ती स्वप्ने होती की सत्य होते असा संदेह निर्माण होतो. मुंबईच्या लॅमिंग्टन रोड पोलिस स्टेशनपुढे सत्याग्रह्यांवर लाठीहल्ला चालू होता. बघ्यांचीही गर्दी होती. त्यातच एक स्त्री होती. अंगावर दागिने होते. तिने ते दृश्य पाहिले. अंगावरचे दागिने उतरवले. शेजारी एक अनोळखी माणूस उभा होता, त्याच्या हाती ते दागिने दिले, त्याला आपल्या घरचा पत्ता दिला आणि सांगितले, “हे दागिने माझ्या घरी पोहोचव आणि घरच्या माणसांना सांग की, मी सत्याग्रहांत दाखल झाले.'' तो माणूस म्हणाला, “पण बाई, मी अनोळखी माणूस. कुठल्या विश्‍वासाने हे दागिने तुम्ही माझ्या हाती देता? '' बाई म्हणाली, ” तुमच्या अंगावर खादी आहे ना? तेवढा विश्वास मला पुष्कळ आहे.''

आज त्याच खादीच्या संदर्भात ही कथा “अरबी भाषेतल्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी” सारखी वाटेल. कृष्ण गेल्यावर युद्धविजेत्या अर्जुनाला चोरांनी बदडावे आणि गांधी गेल्यावर पांढर्‍या खादीला स्वार्थाने बरबटलेल्या अभद्र वस्त्राचे, कोड फुटल्यासारखे पांढरेपण लाभावे हा काय भयानक दुर्विलास आहे! गांधीयुग एखाद्या स्वप्नासारखे संपले आणि वास्तवांत गांधीयुगान्त सुरू झाला. यंदा साजरा होत असलेला गांधीजन्मशताब्दीचा उत्सव मला तरी सुतकातल्या सणासारखा वाटतो आहे. गांधींचे आम्ही काय ठेवले आहे म्हणून आम्ही त्यांच्या जन्मशताब्दीच्या उत्सवाचा अधिकार सांगावा? सद्गुणी बापाच्या दुर्गुणी पोराने कुठल्या आधारावर पितृश्राद्ध करावे? केवळ रूढी म्हणून! नाही केले तर लोक नावे ठेवतील म्हणून! सत्ताधीशांनी तर खादी पांघरून आपले लांडगेपण दडवलेच, परंतु गांधीयोगाचा गांधीवाद करणारांनी आणि असल्या सत्ताधीशांचा सदैव आधार घेऊन जगणारांनी तर खादीचे धर्मांधांसारखे सोवळे केले. सोवळ्यातला अहंकारी ब्राह्मण आणि खादीचा पंचा नेसून स्वतःला चारचौघांपेक्षा श्रेष्ठ मानणारा गांधीवादी ह्यांत मला तरी फरक वाटत नाही. एकाने खादीचे कवच केले, दुसऱ्याने सामान्यांना दूर लोटणारे सोवळे केले.


आता तर काय? सारी सृष्टीच बदलली. पिकेटिंग करणाऱ्या बायकांनी पोलिसांच्या लाठ्यांतून फुटलेल्या रक्‍ताला कुंकू मानून दारूबाजांना परावृत्त केले होते. व्यसनमुक्‍ती लाभली नाही तरी आपण पोराबाळांना उपाशी टाकून ताडीचे मडके पोटांत रिचवतो, ह्याची लाज निर्माण होत होती. नुकतीच मी मुंबईत दादरच्या भरवस्तीत पाटी वाचली. ‘सरकारमान्य ताडी-माडी विक्री केंद्र.' आत डोकावलो असतो, तर तिथे सुताचा हार घातलेला राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटोही आढळला असता. एका बाजूला गांधीजींच्या जन्मशताब्दीचा सोहोळा, तर दुसरीकडे ताडीमाडी-विक्री केंद्राची उद्‌घाटने. आपल्या सार्वजनिक जीवनाची भयंकर परवड आहे ही! आपल्या देशाने दारूबंदी हे एक व्रत म्हणून स्वीकारले होते. व्रताच्या पालनासाठी प्राण पणाला लावावे लागतात. जीवनातली प्रत्येक गोष्ट तर्कावर घासता येत नाही. राष्ट्रीय निशाण हेही एक फडकेच असते. पण त्याच्या इज्जतीसाठी माणसे प्राण देतात. जुन्या राष्ट्रीय निशाणाचा, बूट पुसायचे फडके म्हणून, आपण वापर करीत नाही. निरनिराळया भावनेमुळे हिदू गोमांस खात नाही आणि मुसलमान सूकर भक्षण करीत नाही. प्रत्येक धर्माने टिकावासाठी अशी व्रते दिली आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात गांधीजींनीही अशी व्रते दिली होती. राष्ट्रभाषा शिकण्यापासून ते रस्ते झाडण्यापर्यंत अनेक व्रते होती. आणि सर्वदेवनमस्कार केशवाप्रत जातात, तशी ही सर्व व्रते अखेर स्वराज्याप्रत जाताहेत, अशी गांधीयुगांत लोकांची श्रद्धाही होती. फार मोठ्या प्रमाणावर आपल्या देशांत ह्या व्रतांचे पालन होत होते. मात्र जसजसे स्वराज्य दृष्टिपथात येऊ लागले आणि सत्तेच्या सिहासनांच्या अंधुक आकृत्या दिसू लागल्या, तसतसा एक एक चिरा ढासळू लागला. आपण केलेल्या त्यागाचे आता आपल्याला सामुदायिक नव्हे तर व्यक्तिगत मोल मिळायला हवे, अशी वासना होऊ लागली. चातुर्मास संपत यावा आणि अभक्ष्य भक्षणाची खायखाय सुटावी तसे झाले.

असल्या सत्तेच्या सिंहासनाची स्वप्ने पडत नव्हती फक्त गांधीजींना. त्यांना स्वतंत्र भारतात राज्यकर्ते नको होते. त्यांना हवे होते राज्यकारभार करणारे जनतेचे विश्वस्त. मत्ताधीशांना विश्‍वस्त म्हणणारे गांधी सत्ताधीशांकडूनही तीच अपेक्षा करीत होते. त्यांचे सत्याचे प्रयोग संपले नव्हते. पण आता सत्तेचे प्रयोग सुरू होतील, ह्याची चिन्हे त्यांना दिसू लागली होती. आणि म्हणूनच त्यांनी काँग्रेसच्या विसर्जनाची सूचना केली होती. हंगामी मंत्रिमंडळाच्या काळांत काँग्रेसमधल्या पुढाऱ्यांना सत्तेच्या रक्ताचे काही थेंब चाटायला मिळाले होते. सत्तेच्या तुकड्यांसाठी चाललेले ते जिभल्या चाटणे गांधींनी पाहिले होते. सत्ता आली की ती गाजवण्याचा मोह आलाच. म्हणूनच गांधीजी म्हणाले होते की, ज्याला म्हणून चांगले राहायचे आहे आणि कुठल्याही परिस्थितीत चांगले असेल तेच करायचे आहे, त्याने सत्ताधीश होता कामा नये. डॉ. झाकीरहुसेन यांना लिहिलेल्या उत्तरात गांधीजींनी स्पष्ट म्हटले आहे- “राजकीय सत्तेची प्राप्ती झाल्यावर आपल्या कामाचे बक्षिस म्हणून जर आपण सत्ता धरून बसू लागलो तर त्यात आपला अध:पात होईल.”

व्हिन्सेंट शीन ह्या त्यांच्या चित्रकाराने त्यांना स्पष्ट विचारले होते, “आपलं काय मत की, सत्ता नेहमीच अधःपाताला कारणीभूत असते?” गांधींनी एका शब्दांत तितक्याच स्पष्टपणे सांगितले, “होय!”

आणि सत्तेचा मोह काँग्रेसच्या पुढार्‍यांना सुटला नाही. भयानक रक्‍तपाताने झिजलेल्या दिल्लीमध्ये दुभंगलेल्या भारताचा स्वातंत्र्योत्सव साजरा होत होता आणि मुस्लीम लीगच्या रक्‍तपिपासू लांडगेतोडीने छिन्नविछिन्न झालेल्या, पाशवी अत्याचारांनी धाय मोकलणाऱ्या मायमाऊल्यांच्या वेदनांनी व्याकुळलेली गांधीजींची वृद्ध पावले तिथे “एकला चालो रे” करीत निघाली होती. गांधीयुगान्ताचे भेसूर शिंग स्वातंत्र्यदिनीच फुंकले गेले. ज्या मुसलमानांच्या प्रेमाने गांधींनी हिदूंचे शाप सारखे झेलले त्या मुसलमानांनी त्यांचे मानले नाही आणि भरतखंडाची शकले झाल्यामुळे हिदूंचा संताप अनावार झाला. ज्यांना गांधींनी आपले अनुयायी मानले होते, कालपर्यंत जे त्यांचे वाक्‍य वेदवाक्‍याइतके पवित्र मानीत असल्याचे दाखवीत होते, त्यांनीही आपला मार्ग बदलला. ते नव्या राजप्रसादांच्या दिशेला गेले आणि गांधीजींचा वनवास चालूच राहिला. गांधींना हवा होता तो भारतीय आदर्शातला ‘जगाचा उपभोगशून्य स्वामी असणारा राजा’. प्रत्यक्षात गोरे राज्यकते गेले आणि काळे राज्यकर्ते आले. गोऱ्यांच्या राजवटीत कागदी घोडे नाचवणार्‍या नोकरशाहीने तिकडले मुजरे इकडे केले. मुजोरी न सोडता! पुन्हा एकदा राजा आणि गुलाम हे नाते सुरू झाले. काल लोकांच्या जोडीने अनवाणी चालणारे नेते सत्तेवर येताच अलीशान बंगल्यांत राहू लागले. दारावरचा उर्मट दारवान हलला नाही. गरिबांचे राज्य आल्याची दवंडी झाली. राज्यावर बसलेला गरीब मात्र दिसेना. लोकशाहीत लोक होते तिथेच राहिले. तसेच आशाळभूत. तसेच भयग्रस्त. तसेच अडाणी तेच उपाशी. साहेबांच्या राज्यांत अगम्य इंग्रजीत कारभार चाले. स्वराज्याचा कारभारही त्याच भाषेत आणि त्याच लालफितांच्या दिरंगाईचा गुण घेऊन चालला. ब्रिटिश नोकरशाहीची लोखंडी चौकट अभंग राहिली. गांधीजींची जीवनस्पर्शी व्रते आता केवळ प्रतीकात्मक राहिली, सणासुदीला सूतकताई होऊ लागली. रस्त्यांची नावे बदलली. कडेच्या फूटपाथनिवासीयांचे निवासस्थान बदलले नाही. साहेबांचे घुतळे गेले पण नव्या पुतळ्यांच्या पायऱ्यांवर तेच दळिद्र रात्रीच्या विसाव्याला पडत होते. निधर्मी राज्याची घोषणा झाली. परंतु निवडणुकीचे उमेदवार निवडताना कग्रेसने देखील सत्पक्षाचे यश न मानता आपल्या पक्षाच्या यशावर डोळा ठेवून जात हाच विचार महत्त्वाचा मानला. संस्थाने खालसा झाली, पण करोडो खाजगी मालमत्ता असणाऱ्या संस्थानिकांना आम्हीं गलेलट्ठ तनखे दिले. कसायांना गाईनी सुरे मोडल्याची नुकसानभरपाई दिली. काही संस्थानिकांनी तर अंगावर खादीही पांघरून नव्या अधिकाराच्या जागा मिळवल्या. गांधींनी विधायक कार्य करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या सार्‍या संस्थांची संस्थाने झाली आणि प्रत्येक ठिकाणी, बाबा आमट्यांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे फक्त 'मतपेटीशी प्रणयाराधन सुरू झाले. प्रणयात आणि समरात सारेच साजून दिसते. तेव्हा तत्त्वाशी तडजोडी आल्याच! समाजोपयोगी कार्याला महत्व न राहता राज्यकर्त्यांचे प्रत्येक पाऊल निवडणुकांचे कौल आपल्या बाजूने कसे पडतील ह्याचाच फक्त विचार करून टाकण्यात येऊ लागले. कार्यसिद्धीपेक्षा कार्यप्रसिद्धीला महत्त्व आले. गांधी सामाजिक जीवनात नीती हा निरपवाद नियम म्हणून मानीत होते. आता नीती हा एक अपवाद ठरला आहे. राजसत्तेला ठाऊक असलेली नीती एकच! वारांगनेची! गांधीयुगामध्ये खरोखरीच त्यागाला मागेपुढे न पाहणाऱ्या नेत्यांनी सत्तेवर येताच तो त्याग जणू काय भावी भोगाच्या आशेने चढवलेला मुखवटा होता की काय अशी शंका येण्यासारखे अभद्र व्यवहार सुरू केले. लोकराज्यातही लोक आणि राज्यकर्ते असे तट पडले. आणि दिल्ली ही लोकधानी न होता राजधानीच झाली. निष्ठावन्त विधायक कार्यकर्त्यांनाही आश्रितांचे जिणे जगावे लागले. माधुकऱ्याच्या चौपदरीत सणासुदीला एखादी जिलेबी टाकावी तसली अनुदाने त्यांना मिळू लागली. त्यांतल्या धूर्तांनी निरनिराळया अखिल भारतीय बोर्डात आपली वर्णी लावली आणि दरिद्रीनारायणाच्या सेवेला भल्याभक्कम लांबलचक अमेरिकन् मोटारीत बसून हे महन्त हिंडू लागले. सत्याचा आणि सेवेचा धर्म खरोखरीच मानणारा एखादा गांधीयोगी कुठे तरी संडास साफ करीत, नाहीतर खादीच्या चिंध्या फाडीत वसला. एखाद्या म्हाताऱ्या बेकार नटाने उगीचच आपल्या तरुणपणीच्या भूमिकांतली भाषणे आपल्या चाळीतल्या एका खोलीच्या बिऱ्हाडी पाव्हण्यांना म्हणून दाखवावीत, तशी ह्या जुन्या निष्ठावान विधायक कार्यकर्त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या प्रवचनांची स्थिती आहे. फक्त केविलवाणी!
(अपूर्ण..)

पु. ल. देशपांडे
(गांधी जन्मशताब्दीनिमित्त 'महाराष्ट्र गांधी स्मारक निधी', पुणे, यांनी प्रसिद्ध केलेल्या 'महात्मा गांधी गौरव ग्रंथा'तून)

Saturday, March 23, 2024

असा मी... असा मी (उरलंसुरलं)

पूर्ण नाव : पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

पत्ता : पुणे ४ (एवढ्या पत्त्यावर पत्र येतं . सगळा पत्ता दिला तर पाहुणे! पुणेकर सुज्ञास अधिक काय सांगावे?)

शिक्षण : शाळा कॉलेजात गेलो पण ' शिक्षण ' झाले असे ठामपणे म्हणता येणार नाही .

व्यवसाय : सुशिक्षित बेकार

फावल्या वेळचे छंद : मुख्य छंद , झोप काढणे .वेळ उरल्यास अधिक झोप काढणे

महत्वाकांक्षा काय होती : प्रथम , कोहिनुर सिनेमाचा डोअरकीपर ! नंतर फिल्म सेन्सॉर बोर्डाचा सभासद

महत्वाकांक्षा पूर्ण झाली का : छे !

सर्वात आनंदाचा क्षण : पुण्यातील एका दुकानदाराने मला दुकानाची पायरी चढत असताना "या साहेब" म्हटले होते, तो .

सर्वात दुःखाचा क्षण : माझ्या एका कविमित्राने स्वतःच्या कवितांचे बाड पानशेतच्या पुरातूनही सुखरूप राहिल्याचे वृत्त सांगितले तो क्षण .

देव मानता का? : अर्थातच. शंकरराव देव, यशवंत देव, रमेश-सीमा देव आणि इतर अनेक नेहमीचे यशस्वी. देव, सगळ्यांना आपण मानतो. सॉरी सॉरी. तुम्ही तो ऊपरवाला देव म्हणत असाल तर, इतकी भेसळयुक्त धान्य-तेलं-क्षणात होत्याचा नव्हता करणारी इंजेक्षनं, गोळ्या, भयानक मृत्युगोलासारखी रहदारी यांतून अद्याप जगून वाचून राहिलो आहे ते केवळ देवाच्या कृपेशिवाय इतर कशाने ?

आवडता नेता : जवळच्या रस्त्याने इष्टस्थळी योग्य भाड्यात नेणार रिक्षावाला.

आवडता राजकीय पक्ष : लवकरच स्थापन करावा म्हणतो. कसें?

आवडता लेखक: शेक्सपिअर, डॉस्टो (की दोस्तुया) व्हस्की, सार्च, काफ्का आणि 'राकेल संपले आहे' ह्या ज्वालाग्राही संगीत नाटकाचे लेखक रामभाऊ (कुलकर्णी की देशपांडे ते विसरलो.)

आवडते पुस्तक : अंकलिपी , बँकबुक , रेल्वेचे टाईमटेबल , टेलिफोन डिरेक्टरी यासारखी सामाजिक बांधिलकी असलेली पुस्तके .

आवडते नाटक: लवकरच येत आहे. तारखेकडे लक्ष ठेवा.

आवडता चित्रपट: वीररसपूर्ण 'हंटरवाली' आणि भक्तिरसपूर्ण संत यम्० यस्० रंगुअम्मा (मल्याळी किंवा तामीळ असावे.) प्रसिद्ध कुत्रपटातील 'भालू'.

आवडता कलावंत आवडता गायक / गायिका :वर्षानुवर्षे तेच राग आणि त्याच चिजा म्हणणाऱ्या गवयांप्रमाणे गळा काढून तीच मंगळाष्टके म्हणणारे भटजी.

आवडते गाणे : 'रणगगनसदनसमअमरा' आणि 'ललनामना नचअघ- नवलवशंकाअणुहि सहते करा' यांसारखी सुबोध प्रासादिक गाणी आवडतात.

आवडता मित्र / मैत्रीण : म० टा० (पत्र नव्हे मित्र). मैत्रीण? इल्ला.

आवडता पोशाख : बाराबंदी , सुरवार, चिलखत , जिरेटोप , चढाव

आवडता खाद्यपदार्थ : हवा.

आवडता खेळ : जुगार.

आदरणीय प्रतिस्पर्धी : खोमेनी.

देशाची सद्यःस्थिती : अर्थात आशादायक. एकदा एकविसावं शतक सुरू होऊ द्या, (आशादायक की निराशादायक ?) म्हणजे कळेल.

असा मी... असा मी
(संदर्भ : उरलंसुरलं)
पुलंचे हे पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Tuesday, December 26, 2023

पुणेरी 'दुकानदार'

पुणेरी 'दुकानदार' हा अपुणेरी मंडळींच्या टीकेचा आवडता विषय आहे. आर्थिक फायदा हा मुळी पुणेकर दुकानदाराचा मूळ हेतूच नसतो. 'गिन्हाईक' हा आपला निष्कारण वेळ खायला येणारा प्राणी आहे, ह्या तत्त्वावर त्याचा अढळ विश्वास आहे. 'गि-हाइकाचं म्हणणं खरं असतं' हा जागतिक व्यापाऱ्यांचा सिद्धान्त झाला. पण पुणेकर दुकानदाराचा सिद्धान्त, 'दुकानदाराचं म्हणणंच खरं असतं' असा आहे. गि-हाईक पटवण्यापेक्षा कटवण्यातला आनंद त्याला मोलाचा बाटतो. आपण चांगला माल विकतो, ही एक सामाजिक सेवा आहे. ह्या भावनेने तो वागत असतो.

पुणेरी दुकानदाराचा हा स्पष्टवक्तेपणा पुणेकर गिऱ्हाइकालासुद्धा आवडतो. उद्या एखादा मराठी दुकानदार गि-हाइकाशी गोड बोलायला लागला, तर हा आपल्याला नक्की फसवतो आहे, असंच पुणेकर गिऱ्हाइकाला वाटणार! याउलट, 'जिलबी ताजी आहे का?' या प्रश्नाला 'इथं आम्ही शिळ्या विकायला नाही बसलो!' हा जबाब मालाची खातरी पटवून जातो. लबाडीच्या व्यवहाराला उद्धटपणा मानवत नाही. त्यामुळे, 'हॉटेलात गरम काय आहे?' हा प्रश्न वेटरला अस्सल पुणेकर कधी विचारत नाही. कारण पुणेरी हॉटेलातला सगळ्यांत 'गरम' पदार्थ 'हॉटेल मालक' हा असतो हे तो जाणून आहे.

खरं तर मराठी दुकानदारी हा एक संपूर्ण प्रबंधाचा विषय आहे. 'गिऱ्हाईक' कटवण्याचे शंभर सुलभ मार्ग, हा ग्रंथ अजून लिहिला कसा गेला नाही, कोण जाणे !

पु. ल. देशपांडे
पुणे : एक मुक्तचिंतन
पुस्तक -  गाठोडं

हा लेख संपूर्ण वाचण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.

Monday, February 20, 2023

रोज एक . . . - उरलंसुरलं

मेहेरबाण संपादक ' अणिल ' यास
संभा नाभाजी कोतमिरे याचे
प्रेमप्रूर्वक दंडवत ...

अनंतचतूर्दशीला श्री. गनरायाचे वीसर्जण केले आनी तुम्हास हे पत्र लीहावयास बसलो आहे. खरोखर त्या दाहा दीवसांत शेकेट्री म्हनून माला जे अणुभव आले ते तुम्हांला दाहा पुस्तके वाचूण सूधा येनार नाहीत. आपल्या देशात जे जे काही चालत आहे — ज्या ज्या भयंकर गोस्टी घडत आहेत त्या सर्वांचे काय कारन असावे याचा अणुभव मला त्या दाहा दीवसांत आला. फक्त कुठल्याही बाबतीत शीस्त नाही हेच खरे.

सादी गोश्ट. मंडपामधे बायकांणी कूठे बसावे व पुरसाणी कुठे बसावे ह्याचे केवढे मोठे बोरड लावून ठेवले होते. पन एकजन शीस्तीणे बसले तर शपथ. तरी बरे, मी स्वैंयसेवकाची टोळी शिकवून तालिममास्तराच्या हाताखाली तयार ठेवली होती. पन काही उपयोग नाही. सर्व गोंधळ. नऊचा कार्यक्रम आसला तर दाहापासून येक वाजेपर्यंत केव्हाही यावे, केव्हाही जावे.

भासन असो वा चांगले गाने असो यांच्या आपल्या गफ्फा चाललेल्या. मग त्या गानाराबोलना-याला आपन कीती गोंधळात टाकीत आहो याचा वीचारच नाही. बरे मधूनच एकदम उठून जाने—जाताना नीमूटपणे जावे तेही नाही. आपल्या कुठेकुठे बसलेल्या पोराबाळांना मोठमोठ्याणे हाका मारीत सर्व मंडळींचा चालू कार्यक्रमातील लक्ष्य काढूण आपल्याकडे ओढने असला आचरटपणा करन्यात आपले लोकांणा काडीचीही लाज वाटत नाही हे पाहून मी मणातल्या मणात भडकून जात असे. प्रंतु मी जबाबदारीच्या जागेवरआसलेणे आपले डोक्यावर बर्फाचा खडा आहे आशा समजुतीणेच वागन्याचे ठरिवले होते. त्यामुळे शक्य तीतके भांडनतंट्याचे प्रसंग टाळले.
प्रंतु दूर्दैवाणे एक प्रसंग मला टाळता आला नाही. स्त्रियांचा कार्यक्रम चालू असताणा काही हलकट लोक आचरटपना करन्याच्या ऊदेशाणे तेथे आलेले दीसले. त्यांच्यापैकी एक नीसटला पन् चौगेजन मात्र खात्रीणें हळदमीटाचे पलिस्तर बांदून बसले आसतील. भलता चावटपना माला खपत नाही आनी तसा दीसला तर मी तोंडाचा ऊपयोग न करता हाताचाच करतो.

आपले लोकांणा बरेच गोशटीचे शीक्षण द्यावयास पाहिजे हे मात्र खरे. ऊदाहरनार्थ रस्त्यात पाण खाऊन थूकने. परवा आमच्या मंडपात एकजन पीचकारी मारत आसताना आमच्या मेव्हन्याने त्याचे तोंड भाहेरुणही रंगिवले. माला वाटते बरेच वेळा पायातल्या वहानेला हाताशी धरल्याशिवाय सुदारना होत नाही. हा आपला माजा रांगडा न्याय आहे. पन जगात दुबळेपना सारका श्राप नाही. नम्रपना असावा पन लाचारी नसावी. आता मी यवढ्या मोठमोठ्या बंगलेवाल्यांकडे चीकी विकतो पन कदी कोनाची लाळ घोटत नाही. ऊगाच ' साहेब ' 'हुजूर ' कशाला ? माला येक गोश्ट कळते. चीकी अशी हवी की जी पाहून तोंडाला पानीच सुटले पायजे. मग ते तोंड कुनाचे आहे हा सवाल नाही. एकदा त्या वस्तूवर मण गेले की मानूस ते घेनारच. फक्त लोकांची मणे ओढन्यासाठी तुम्ही मासीकवाल्याप्रमाने बायाबापड्यांची रंगीबेरंगी अब्रू चवाठ्यावर मांडली नाही. म्हनजे झाले ! चिकीच्या वरच्या कागदावर बाईचा मुखवटा चिटकावून चीकी खपवन्याची पाळी जर मजवर आली तर खुशाल हमालाचा धंदा करीन.

माज्या म्हनन्याचे तात्पर्य हेच. धंदा असो, लीहीने छापने असो, आथवा चारचौघांत वागने असो आपल्या लोकांला जंवर शीस्तीची आवड नाही तंवर आपल्या देशाचे पाऊल कधीच फुडे पडनार न्हाई. स्वताच्या जबाबदारीची जानीवच आपनाला नाही. परवाच येका शाळेच्या दारात मी चीकी वीकत उभा होतो. पाच मास्तरांपैकी चार मास्तरांची धोत्रे कळकट दाड्या वाडलेल्या आनी चेह-यावर मुडद्याची कळा ! धोत्रे फाटकी आसती तर गरीबुमुळे आहेत म्हटले आसते पन कळकटपनाचे गरीबीशी काय नाते ? बरे साहापैशाच्या पात्यात दाहा दाढ्या होतात. आता संपादक माहाराज , तुम्हीच सांगा पोरांना वळन लावना-या मास्तरांना स्वताची शीस्त सांभाळायला नको का ?

परवाच्या ऊच्छवात असेच. दोनतीन भाषने ठेवली होती. पन भाव न देनारा एक जन वेळेवर आला आसेल तर शपत. कोन तास भर ऊशीरा तर कोनाचा येतच नाही म्हनून निरोप ! आनी हिते आपला शेकेट्री बसला आहे ताम्हनात देव बुडवून ! आनी लोक जांभया किंवा शिव्या देताहेत. आपल्याला आपल्या कामाचे, वेळेचे, जबाबदारीचे, कसलेच महत्त्व नाहि त्यामूळे आसे होते. पन ह्या सर्वांचे मूळ ती 'शीस्त' तीचा दुष्काळ ! मग सुदारना कसली नी काय कसले ?

तुमचा क्रुपाबिलाशी,
संभा नाभाजी कोतमिरे
( चीकीचे व्यापारी )
अनिल साप्ताहिक, १८/०९/१९४७

— पु. ल. देशपांडे 
संग्रह - उरलंसुरलं

ता.क. — पंतप्रधानांनी केलेले सार्वजनिक स्वच्छतेचे आवाहन अन् 'आप'च्या झाडूने राजधानीत केलेली ' राजकिय साफसफाई ' या पार्श्वभूमीवर पुलंचा १९४७ मधे लिहिलेला सार्वजनिक शिस्तीवरचा हा लेख खरोखरचं अप्रतिम !!!
उपरोक्त ता.क. नुसार फेब्रुवारी २०१५ साली प्रसृत केलीली ही पोस्ट आहे...
संग्रहक -  संजय आढाव

Friday, January 27, 2023

पंडित गजाननराव

श्री. गजाननबुवांच्या वयाला ६१ वे वर्ष लागत असल्याच्या प्रसंगी त्यांचा गौरव करण्याची योजना केल्याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन.
         
मी पुण्याला कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हापासूनचा म्हणजे सुमारे तीस वर्षांपूर्वीपासूनचा त्यांचा आणि माझा परिचय आहे. टिळक रोडवरील गोखल बिल्डिंगमध्ये बुवांचे बिन्हाड असे, तळमजल्यावर. समोर बहावा टिळक रोड. हल्लीच्या इतका धोधो वाहणारा नसला तरी वर्दळीचाच रस्ता. बुवांची तिथे सतत मेहनत चाले. व्हायोलिन वादक म्हणून त्यांचा खूप लौकिक झालाच होता. परंतु त्यांनी आता गायनाकडे अधिक लक्ष द्यायला सुरवात केली होती. आवाजाची तयारी एखाद्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे चाले. वास्तविक गाण्याच्या मेहनतीला ती जागा अत्यंत गैरसोयीची. म्हणजे बिऱ्हाडाचे प्रवेशद्वार फुटपाथवरच उघडते. पण तिथे भान हरपून बुवांची मेहनत चाले. तशी ती खोली नशीबवान आहे. तिथे बुबांच्या वेळेपासून जी सुरांची साधना सुरू झाली ती आजतागायत श्री. मारुलकर युवा वगैरे मंडळीनी चालू ठेवली आहे.

गेल्या महायुद्धाचे दिवस. वातावरण संगीताला प्रतिकूल, विलक्षण आर्थिक कुचंबणा, अशा परिस्थितीत बुवांनी जे मेहनतीचे पहाड फोडले त्याला तोड नाही. त्यांचे तीर्थरूप कै. अंतुबुवा ह्यांच्याकडून मिळालेला वारसा त्यांनी नुसताच सांभाळला नाही तर त्यात आणखी भर घातली. स्वतः गायक-वादक म्हणून कीर्ती मिळविली. याहूनही मला त्यांचा गौरव, स्वतःला लाभलेली आणि मेहनतीने मिळविलेली विद्या कंजूषपणाने लपवून न ठेवता योग्य शिष्याना त्यानी मोकळ्या मनाने दिली, ह्यासाठी करावा असे वाटते.

मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ति झाली होती. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांना लवकर निवृत्त व्हावे लागले. परंतु त्या अवधीत त्यानी आपल्या तालीम देण्याच्या पद्धतीने नव्या पिढीतल्या विद्यार्थ्यांतही अभिजात गायकी विषयी फार मोठी आवड उत्पन्न केली. वरपांगी परंपराभिमानी वाटणारे 'बुवा' कमालीचे चौकस आहेत. नवे प्रयोग काय चालले आहेत हे समजून घेण्याविषयी उत्सुक आहेत.

आयुष्यभर 'सूर आणि लय' ह्याखेरीज दुसरा कसलाही विचार न करता जगणारी ही बुवांसारखी माणसेच संगीतकलेची खऱ्या अर्थाने उपसना करतात. त्यांची ही 'पार्ट-टाइम' उपासना नसते, किंबहुना जीवन ह्याचा अशा माणसांच्या कोशातला अर्थ 'सुरलयीची उपासना करायला नियतीने दिलेली संधी हाच असतो. बुवा साठी ओलांडीत आहेत. आणखी अनेक वर्षे त्यांना प्रिय असलेले स्वरमय जीवन जगण्यासारखे सर्व प्रकारचे स्वास्थ्य त्यांना लाभो ही ह्याप्रसंगी शुभकामना व्यक्त करतो.

- पु. ल. देशपांडे

Tuesday, November 22, 2022

पंचनामा

सगळ्या पोलिसी व्यवहारात 'पंचनामा' हा तर एक अजब प्रकार आहे. नमुनेदार पंचनाम्यांचा संग्रह जर कुणी छापला, तर तो एक उत्तम विनोदी ग्रंथ होईल. एका चोरीच्या प्रकरणातला पंचनामा मला वाचायला मिळाला होता. त्यात हवालदारासाहेबांनी पहिलेच वाक्य लिहिले होते - “चोरट्यांनी मालकांची परवानगी न घेता घराच्या दक्षिण दिशेच्या खिडकीतून प्रवेश केला होता.” मी हवालदारांना विचारले, "अहो हवालदारसाहेब, चोर कधी आगाऊ परवानगी घेऊन, 'आपली हरकत नसेल, तर थोडीशी चोरी करावी म्हणतो' अशी विनंती करून गज वाकवायला घेतात का ?” हवालदारांनी मला, “फालतू बकबक नाय पायजे" म्हणून चारचौघांपुढे बजावले आणि अशा थाटात माझ्यावर नजर रोखली की मालकाची परवानगी न घेता त्या दक्षिणेच्या खिडकीतून शिरलेला चोर मीच असेन अशी त्याला शंका आली की काय, असे मला वाटायला लागले.

जमिनीच्या कज्ज्यात सातबाऱ्याच्या उताऱ्याचे जे स्थान, तेच फ़ौजदारी कज्यात पंचनाम्याचे. पण खरी गोम आहे ती म्हणजे पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून सही ठोकणारे पंच न्यायालयात चक्क उलटतात ते. खोटी साक्ष देणे हा परदेशात फार मोठा गुन्हा मानला जातो. आपल्याकडे पंचनाम्यात एक आणि कोर्टापुढल्या जबानीत नेमके त्याच्या उलट हा प्रकार वैध मानला जातो. त्यामुळे 'पंचनामा' हा प्रकार खऱ्याखोट्याची फारशी चाड बाळगणारा नाही अशीच सर्वांची कल्पना असते. असल्या ह्या नुसत्या बोटावरची थुंकी चालवण्यासारख्या खेळात गुन्हेगार सुटण्याची शक्यताच अधिक दिसल्यावर पोलिसांना वैफल्याची भावना आली, तर त्यात नवल नाही.

अशा परिस्थितीत कायद्याबद्दलचा आदरच नाहीस व्हायला लागला आहे. आपण वेळोवेळी लोकशाही आणि लोकशाहीतल्या नागरिकस्वातंत्र्याच्या घोषणा देत असतो. पण ह्या स्वातंत्र्याच्या योग्य वापरासाठी आपल्या कर्तव्याला जागण्याची अट स्वतःवर लादून घ्यायला तयार नसतो. तिथे फक्त स्वार्थच पाहतो.

(मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर श्री. वसंतराव सराफ ह्यांना १८ ऑक्टोबर १९८९ रोजी पाठवलेल्या पत्रातून)
पुस्तक - गाठोडं

संपूर्ण पत्र वाचण्यासाठी खालील लिंकवरून पुस्तक मागवा.


Tuesday, October 18, 2022

मला पाह्यला आवडतात माणसे..

कुठल्याही गावी गेल्यानंतर हे जे काही प्रेक्षणीय स्थळे पाहणे प्रकरण असते, त्याच्याशी माझे गोत्र जमत नाही. बरेचसे पाहणे उगीचच 'पाहिले नाही' म्हणायला नको, ह्या भीतीपोटीच होते की काय कोण जाणे.

मला पाह्यला आवडतात माणसे! सकाळी उठून पर्वतीला फिरायला जाणारी माणसे. विशेषत: पेन्शनर मंडळी, त्यांच्यामागून जावे. रोज सकाळी न कंटाळता उठणारी, न कंटाळता स्वतःला लोकरीत गुंडाळून घेणारी आणि न कंटाळता आपली विट्याहून अष्ट्याला बदली झाली, तेव्हा काय गंमत झाली ते सांगणारी ! ह्या म्हाताऱ्या माणसांसारखीच प्राथमिक शाळेतली पोरे शाळा सुटल्यावर गटागटांनी जातात तेव्हा त्यांच्याहीमागून त्यांच्या नकळत जाण्यात विलक्षण आनंद असतो ! ज्याला विशेष काही बोलायचे असते तो मुलगा त्या गटाच्या पुढे येऊन रस्त्यात उलटा उलटा जात असतो. दहा मिनिटे त्यांच्यामागून चालावे; विषयाचा पत्ता लागत नाही, पण सगळी तोंडे हलत असतात. त्यातून मग त्या गटाच्या चार पावले मागे राहून चालणाऱ्या चिमण्या सखूबाई-साळूबाईचे काही विशेष हितगूज चालू असते. चालताचालता थांबून उगीचच एकमेकींच्या कानांत काही तरी गुप्त गोष्टी सांगितल्या जातात. 'अगदी कंठाशप्पत' म्हणून गळ्याला चिमटा काढला जातो आणि पुन्हा वाटचाल सुरू होते !

अश्याच प्रेक्षणीय माणसांच्या यादीतली माझी आवडती माणसे म्हणजे रस्त्यावर खडी किंवा डांबर पसरून, तांबड्या फडक्याचा बावटा रोवून जवळच्या एखाद्या झाडाखाली तंबाखू चोळीत बसणारे मजूर ! ह्यांचेही विषय अफाट असतात. सारांश काय, माणसाने माणूस पाहावा ! तरुण पाहावा, म्हातारा पाहावा, सुरूप पाहावा, कुरूप पाहावा. पुष्कळदा वाटते की, जीवनाविषयीचे चिंतन माणसांच्या गर्दीत होते तसे एकान्तात होत नाही.

परदेशच्या प्रवासात मला सगळ्यांत अधिक ओढ होती ती तिकडची माणसे पाहण्याची, त्यांच्याशी बोलायची. पण हे कलम म्हणावे तसे जमले नाही. 'भावबंधना'तल्या धुंडिराजाच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'जो तो आपला ह्यात ! ' बरे, जी ओळखपाळख झाली ती सुंदर शिष्टाचारांचा मेकप करूनच बोलायची. तुम्ही किती चांगले, आम्ही किती चांगले, यापुढे भाषणाचे तट्रू पुढे सरकायचेच नाही !

- पु. ल. देशपांडे 

Tuesday, July 26, 2022

भारतीय संस्कृतीचे आकंठ दर्शन - पु.ल. देशपांडे

इंग्लंड वरून परततांना बोटीवरील हिंदी पोरांच्या इंग्रजी बायका आणि त्यांचे प्रयत्न बघून मनात आलेले विचार मांडताना पु.ल. 'अपुर्वाई'त म्हणतात,

माझ्या बोटीवर ज्या काही गौरकाय सुनबाई दिसत होत्या, त्यांची मात्र मला मनापासून दया येत होती. त्या बिचाऱ्या आपल्याकडून अगदी खूप साड्या नेसायचा आणि कुंकू लावण्याचा प्रयत्न करीत होत्या. पण पदरदेखील नीट न सावरता येणाऱ्या पोरी इथे संसार कसा सावरणार, ह्याची मला उगीचच चिंता वाटत होती. पुष्कळजणी खूप उत्साहाने येतात आणि तितक्याच निराशेने परततात. पण आमच्या तरुणांनी तिथे जी गौरांगनांसह बिऱ्हाडे थाटली आहेत, त्यांची तर अवस्था फारच करुण आहे. हिंदी लोकांच्या संगतीला हे मडमांचे देशी नवरे सारखे टाळतात आणि गोऱ्यांच्या कुटुंबात त्यांचे स्वागत फारसे मनापासून होत असावेसे वाटत नाही.
 
गोऱ्या बाईशी लग्न केलेल्या एका मराठी मित्राची एक गोष्ट मला आठवते. तिने मराठी शिकायचा खूप प्रयत्न केला होता. पण तिला ‘खरकटं’ म्हणजे काय ते समजावून सांगता सांगता आमचा मित्र टेकीला आला होता. ती म्हणे, “जेवून ताटात उरलेलं जर खरकटं, तर हात कसा खरकटा? पेला कसा खरकटा?” मला वाटते, संसारात भावनात्मक एकात्मता वगैरे गोष्टी फार दूरच्या आहेत. खरकटे म्हणजे काय? पारोसे म्हणेज काय? पाण्यातली दशमी ओवळ्याची आणि दुधातली सोवळ्याची कशी? निऱ्या काढणे आणि घडी करणे ह्यातला फरक करणारी रेषा कुठली? कुंकवाची पिंजर कधी होते आणि लसणाचा ठेचा केव्हा होतो आणि चटणी कधी होते? पिठले आणि झुणका ह्यांच्या सीमारेषा कुठल्या? हे कळणे अधिक महत्वाचे! जेवताना सणसणीत भुरका जोपर्यंत मारता येत नाही तोपर्यंत भारतीय संस्कृतीचे आकंठ दर्शन कसे होणार?
धागे जुळतात ते अशा चिल्लर गोष्टींनी!
ओंजळीतले तीर्थ पिऊन तो ओला तळवा डोळ्यांना लावताना जे गार वाटलेले असते, ते बर्फाचा खडा घेऊन वाटत नाही. माणसाची घडण काय असंख्य चमत्कारिक गोष्टींनी होते! इंग्लंडच्या मुक्कामात मला चटकन हिंदुस्थानात जाऊन केळीच्या पानावर मऊ मऊ भात, वरण, लोणकढे तूप आणि ताज्या लिंबाची फोड त्यावर पिळून दोन घास खाऊन यावे, असे डोहाळे लागले होते. आजन्म पाश्चात्य वातावरणात राहिलेल्या माझ्या जेष्ठ मित्राने मृत्युशय्येवरून पिठलंभात खायची इच्छा व्यक्त केली होती. रक्ताच्या थेंबा थेंबात लपलेला तो आत्माराम अशा काही चमत्कारिक गोष्टींची मागणी करतो आणि – ‘गड्या तू वंशाचा दिवा नाहीस तर केवळ दुवा आहेस’ याची जाणीव करून आपल्याला एकदम लहानांत काढून टाकतो.

'अपूर्वाई' मधे इंग्लंड/फ्रान्स फिरून झाल्यावर परतीच्या प्रवासात पु.ल. म्हणतात
 
'मला सदैव वाटे की, इंग्रजी अन्न्पाण्याचे माझ्या नसांतून रक्त झाले नाही. केवळ देह्धारणेच्या ते कामी आले. पॅरीसला सर्व प्रकारची मुक्तता असूनही सीन नदीच्या काठी एका संध्याकाळी आम्ही भटकत असताना कोणी नाही असे पाहून मी जोरजोरात 'मनाचे श्लोक' ओरडून घेतले तेव्हा जिवाला गार वाटले.'


पु.ल.देशपांडे
-अपूर्वाई

संपूर्ण पुस्तक मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

केशवराव एक चांगला माणूस - पु.ल. देशपांडे

केशवराव हे अशा एका व्यवहारात होते की ज्यात 'लेखक' नावाच्या काहीशा 'स्फोटक' घटकाशी सतत संबंध येतो. केशवरावांनी हे सारे स्फोटक पदार्थ खूप चातुर्याने सांभाळले. मला वाटतं, त्यांना पुस्तक आणि पुस्तकाशी संबंधित असणारा जो कोण असेल त्याच्याविषयी आतूनच प्रेम असावं. 'पुस्तक' या गोष्टीवरच त्यांचं अतोनात प्रेम होतं. म्हणूनच त्यांनी केवळ स्वत: प्रकाशित केलेल्या पुस्तकांवरच प्रेम केलं नाही, आपल्या पुस्तकालयात सर्व मराठी प्रकाशकांकडची पुस्तकं ठेवली. मॅजेस्टिक ग्रंथप्रदर्शनात सगळ्या मराठी साहित्याच्या वैभवाचं प्रदर्शन दिसेल याची दखल घेतली.
लेखकांत आपले लेखक आणि इतर प्रकाशकांचे लेखक असा पंक्तीप्रपंच केला नाही. उत्तम पुस्तकाला पुरस्कार देतांना ते मॅजेस्टिकचं प्रकाशन असावं असा कधी अप्रत्यक्ष सूचनेतून सुध्दा प्रयत्न केला नाही. या ग्रंथप्रेमामुळेच ते संबंध आलेल्या प्रत्येक ग्रंथप्रेमी माणासाला सोयरे सकळ आप्तजन या भावनेनेच भेटले. आणि त्यांच्याशी संबंध आलेल्या प्रत्येकाला जाणवला तो हा त्यांच्या आप्तभावापोटी आलेला चांगुलपणा.

मॅजेस्टिक गप्पा ऐकायला आनंदाने जमणारा ग्रंथप्रेमी श्रोत्रृसमुदाय पाहणे याचाच आनंद त्यांना मोठा होता. ग्रंथजत्रेला जमणारी आबालवृध्दांची गर्दी हे त्यांचं टॉनिक होतं. लेखकांच मन:पूर्वक आदरातिथ्य करणं हा व्यावहारिक डावपेचाचा भाग नसून एक प्रकारचा कुळाचार असल्यासारखा हा प्रसंग ते साजरा करीत. या सर्व उपक्रमांचं नेतृत्व पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असे. पण चुकूनही त्यांनी कधी ते नेतृत्व किंवा यजमानपण मिरवलं नाही. मॅजेस्टिक गप्पांना येणार्‍या, ग्रंथप्रदर्शनात हिंडणार्‍या, ग्रंथ विकत घ्यायला येणार्‍या कित्येकांनी केशवराव कोठावळे यांना पाहिलेलंही नसेल. किंबहुना आपण दिसावं यापेक्षा आपण दिसू नये याच धडपडीत ते असायचे.

केशवरावांचं हसणं मिस्किल असे. ते कधी आवाज चढवूनही बोलत नसत. व्यवसायाचा व्याप प्रचंड होता. पण आसपासच्या मित्रमंडळींना त्यांनी कधी तो व्याप किती प्रचंड आहे, हे भासूही दिलं नाही. एक विलक्षण शांत, संयमी आत्मविश्वासानं ते हा व्याप सांभाळत असत. त्या व्यापाचा त्यांनी स्वत:चं मोठेपण सिध्द करायला कधी बाऊ करून दाखवला नाही.

लक्षावधी रूपयांची उलाढाल करणार्‍या या माणसानं स्वत:च्या यशाची जाहिरात सदैव टाळली. यामागे नुसती खुबी नव्हती. एक प्रकारची सभ्यता होती. आपलं मोठेपण सतत दुसर्‍याच्या डोळ्यात खुपेल अशा पध्दतीनं मिरवणं ही असभ्यता आहे- नव्हे बराचसा अडाणीपणा आहे. अशा रीतीनं मिरवणं हास्यास्पद ठरतं हे कळण्याच्या सभ्यतेइतकीच सूक्ष्म विनोदबुध्दीही केशवरावांना होती. त्यांच्या सार्‍या वागण्या वावरण्यात एक प्रकारचा साधेपणा होता. कुणावर छाप टाकण्याचा प्रयत्न नव्हता. आपलं श्रेष्ठत्व सिध्द करण्याचा अट्टहास नव्हता. त्याबरोबरच गुळमट गोडवा किंवा भावनांचं प्रदर्शनही नव्हतं.

एखाद्या पुस्तकाची भरमसाठ स्तुती करतांना मी त्यांना कधी ऐकलं नाही किंवा नावड्त्या पुस्तकाची किंवा लेखकाची अकारण निंदा करतानाही पाहिलं नाही. मतभेदाचा आग्रह किती ताणायचा याबद्दलही त्यांचे काही आडाखे होते. आपल्याला न पटणारी गोष्ट मुळात कुणालाही पटण्याच्या लायकीची नाही अशा हट्टाला पेटून ते कधीच उभे राहिले नाहीत..

- पु.ल.देशपांडे


मॅजेस्टिक कोठावळे
संपादन : वि.शं. चौघुले
आभार आणि सन्कलन : शुभदा पट्वर्धन
मॅजेस्टिक प्रकाशन,

संपूर्ण पुस्तक मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


Saturday, July 16, 2022

मनात घर करून बसलेला 'लंपन'

१९६४ साली, सत्यकथेत 'वनवास' नावाची, प्रकाश नारायण संत याची एक कथा छापून आली होती. त्यातला शाळकरी वयाचा 'लंपन' वर्षानुवर्ष मनात घर करून बसला होता. पौगंडावस्थेतल्या मुलांचं जग त्या कथेतून एखाद्या सुंदर चित्रपटासारखं डोळ्यापुढून सरकून गेलं होतं. ज्या भाषेत ह्या लंप्यानं आपली ही शाळकरी वयातली कथा सांगितली होती ती बेळगावकडची मराठी होती. मराठीला कानडी चाल लावलेली. त्या चालीवरचं मराठी बोलणं अतिशय लोभस - अतिशय आर्जवी. एखाद्या गाण्यासारखं मनात रुंजी घालणारं.


सत्यकथेत तीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली ही कथा आजही तितकीच टवटवीत राहिली आहे. ज्या उत्सुकतेनं आणि आनंदानं मी ती त्या काळी वाचली तितक्‍याच उत्सुकतेनं आणि आनंदानं, प्रकाशने तीस वर्षांच्या मौनानंतर लिहिलेल्या आणि ह्या संग्रहात आलेल्या लंपनच्या कथा वाचल्या. पौगंडदशेतल्या छोट्या छोट्या अनुभवांच्या मार्मिक तपशिलानं जिवंत केलेल्या ह्या कथा आहेत. बाळगोपाळांच्या चिमुकल्या दुनियेचं प्रकाशने घडवलेलं हे दर्शन अपूर्व आहे.
          
पौगंडदशा ओलांडताना यौवनाच्या सुगंधी झुळुका अंगावरून जाताना अस्वस्थ करून टाकणारा हा कालखंड. लंप्या म्हणतो तसं 'सुमीची आठवण आली की पोटात काहीतरी गडबड होते आहे' असं वाटायला लावणारी ही अवस्था, कोणीतरी ह्या वयाच्या अवस्थेला 'Emotional Sea-Sickness' म्हटलं आहे. ह्या अवस्थेचं इतक्या सहजतेनं दर्शन घडवणारं लेखन माझ्या तरी वाचनात यापूर्वी आलेलं नाही. लंप्याची ही कथा त्या वयाचा मॅडनेस अंगात मुरवून लिहावी लागते. त्या लेखनात प्रकाश यशस्वी झाला आहे.

लंप्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे, 'एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा मॅडसारख्या वाचल्या' तरी त्या ताज्याच वाटतील. एक निराळ्याच शैलीचा आणि वाचकाशी चटकन संवाद साधून त्यालाही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येतो आहे ह्या आनंदात मी आहे.

प्रकाशला धन्यवाद आणि त्याचं अभिनंदन.
- पु.ल. देशपांडे

वनवास पुस्तक खालील लिंकवरून मिळवता येईल.
--> वनवास - प्रकाश नारायण संत

Friday, April 29, 2022

रसिकतेचा महापूर : आणि मी एक पूरग्रस्त

एके काळी मला प्रश्न पडायचा की, माणसं इतक्या अरसिकपणानं जगूच कशी शकतात? आयुष्यात एकाही गाण्याला न गेलेली, नाटक न पाहिलेली, क्रिकेटमध्ये काय पाहायचं म्हणून विचारणारी, हॉटेलात भूक लागली तरच जायचं असतं असं मानणारी- अशी अरसिकतेच्या क्षेत्रातली एकाचढी एक मातब्बर माणसं मी पाहिली आहेत. त्या उलट रात्र ही गाण्या-बजावण्यासाठी किंवा नाटक-सिनेमा पाहण्यासाठी किंवा (परीक्षेला न लावलेलं) मस्त पुस्तक वाचण्यासाठी निसर्गानं निर्माण केलेली सोय आहे, अशी आमची धारणा असल्यामुळे ही घनगंभीर माणसं पाहिली की, एके काळी मला भीती वाटे. आपण रसिक आहोत अशी आपली बदनामी होऊ न देण्याची खबरदारी घेत ही माणसं आपली अरसिकता कसोशीनं जपत जगायची, पण आता मात्र अमक्या अमक्याला साहित्य-संगीत-कला यात अजिबात रस वाटत नाही असं ऐकलं की त्या माणसाला कडकडून भेटावं असं मला वाटतं. असली माणसं नवकवितेतल्या प्रतिभासृष्टीबद्दल बोलायची आपल्यावर सांस्कृतिक जिम्मेदारी आहे असं मानत नाहीत. कधी बायकापोरांनी फारच टुमणं लावल्यामुळे नाटक पाहायला गेले तरी नाटककारांनी नायिका परंपरानिष्ठ रंगवली आहे, की बंडखोर रंगवली आहे, याची त्यांना काळजी पडत नाही, उलट समोर जी दिसली तिला मेकअप करणाऱ्यांनी रंगवली होती, याची त्यांना खात्री असते. नाटक पाहायला गेलं की, रडू आलं तर रडायचं, हसू आलं तर हसायचं आणि पहिला अंक पडला की बटाटेवडा खायचा एवढंच त्यांना ठाऊक असतं आणि तेवढंच पुरतं. अशी सरळ गाण्याला गाणं म्हणणारी, नाटकाला नाटक, गोष्टीला गोष्ट आणि नाचाला नाच म्हाणणारी माणसं आता अल्पमतात जायला लागली आहेत.

एके काळी माणसं इतकी कलासक्त रसिक वगैरे झाली नव्हती आणि मुख्य म्हणजे त्यामुळे आपल्याला दुय्यम नागरिकत्व येतं अशी त्यांच्या मनाला खंत नव्हती, पण आता हे रेडिओ, व्हिडिओ, टी. व्ही., टेपरेकॉर्डर, सिनेमे, नाटक, एल. पी., टी. व्ही., टेपरेकॉर्डर, सिनेमे, नाटक, एल. पी., साहित्यजत्रा, पुस्तकदिंड्या, दरमहा भरणारी नाना प्रकारची साहित्य संमेलनं, परिसंवाद या भानगडीमुळे रसिकतेची लागण न झालेला निरोगी माणूस भेटणं मुश्कीलच झालं आहे. त्यातून तुम्ही , गायक, नट वगैरे होऊन चुकलेले असलात तर तो आकाशातील प्रभूच तुमचं रक्षण करो! तुमच्याशी बोलणारा “इरेस पडतो तर बच्चमजी मीही लेखक झालो असतो” अशा थाटात स्वतःची रसिकता तुमच्यावर फेकायला लागतो. नुकताच मी एका पंचतारांकित संस्कृतीतल्या नवरसिकाच्या तावडीत सापडलो. त्याच्या बायकोला- चुकलो मिसेसना “इकेबाना'मध्ये टेरिबल इंटरेस्ट आहे. माझ्यासारख्या रायटरनं एकदा 'विथ युवर ओन आईज' रेखानं केलेली इकेबाना फ्लॉवर अरेंजमेंट पाहावी, अशी त्याची इच्छा होती. त्यावर “रेखा कोण?” हा आमचा येडपट प्रश्न. त्यावर त्या फाइव्हस्टार गृहस्थाचं “रेखा म्हणजे माय वाईफ.” त्यावर “असं असं, युवर ओन वाईफ होय?” हा आमचा 'विथ युवर ओन आईज" मधला “ओन? डोक्यात चिकटल्यामुळे झालेला भोटमपणा. एवढं सगळं यथासांग झालं. मी म्हणालो, “मला काय कळतं?” ते म्हणाले, “जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात रस घेऊन जगावं-नाही तर ती नुसती श्वास घेतल्याची आणि सोडल्याची घटना झाली - इट इज नॉट जीवन! असं आपणच म्हटलंय...” (माझ्या कुठल्यातरी लेखात बेसावधपणे लिहून गेलेलीच वाक्यं लोक लक्षात का ठेवतात कोण जाणे!) शेवटी त्याच्या इम्पोर्टेड गाडीत बसून त्याच्या अठ्ठाविसाव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये गेलो. ज्याच्या घराणातल्या दहा पिढ्यांच्या आधीपासूनचे पूर्वज हसले नसतील अशा एका गांभीर्यमूर्ती नोकरानं दार उघडलं - दिवाणखान्यात हल्ली प्रचंड कापड दुकानात दर्शनी काचेच्या मागे जिवंत बाईसारखी दिसणारी शाडूची बाई साडीबिडी नेसवून उभी करतात त्या नमुन्याची स्त्री उभी होती. असल्या बायकांना पूर्वीचे कवी 'कमनीय' वगैरे म्हणायचे. “ही रेखा”, त्यांनी आपल्या मिसेसची ओळख करून दिली. मग रेखाबाईंनी मला मेणाच्या प्रदर्शनातल्या बाहुलीसारखा कळसूत्री नमस्कार केला आणि टी. व्ही.वर आजच्या बातम्या संपल्यानंतरच्या छापील हास्यासारखं हास्य केलं.

दिवाणखाण्यात पाहावं तिकडं नाना प्रकारच्या फुलदाण्यांत रंगीबेरंगी फुलं, देठ, गवताची पाती, नाना प्रकारचे अंगविक्षेप करीत उभी करावीत तशी मांडली होती, कर्तव्यबुद्धीनं मी ती पाहत होतो. वा! छान! वगैरे म्हणत होतो. वास्तविक 'इकेबाना' हा शब्द जरा जास्त ठसक्यात उच्चारला तर मराठीत शिवी म्हणून खपून जाईल. आणि रेखाबाई मला जपानमध्ये घराणी आहेत वगैरे ऐकवत होत्या व पुन्हा आपल्यासारख्या साहित्यिकांना आम्ही काय सागणार?" हे होतंच. आम्ही चांगले चार-पाच प्रकाशक पचवलेले साहित्यिक असल्यामुळे हे वाक्य नुसतेच 'गुगली' आहे हे ओळखून होतो. तेवढ्यात त्या देवीजींनी 'आपल्या देशात फुलांचं मनोगत जाणून घ्यायची कुणालाच कशी ओढ नाही" वगैरे सांगून आपली तलम रसिकता माझ्या लक्षात आणून दिली.

'फुलांचं मनोगत' वगैरे लेखी शब्द तोंडी झालेले पाहून चमकलोतच. माझ्या डोळ्यांपुढे फुलांचा मोठासा हार विकत घेतल्यावर “साहेब, पुड्यात तुळशीची पानं टाकायची ना?” हा प्रश्न विचारणारे आमचे मामा फुलवाले आले. फुलांचा उपयोग मयत, देव आणि पुढारी या व्यतिरिक्त इतर कशासाठीही केलेला खुद्द आमच्या फुलवाल्यालाच अमान्य - फार तर लग्नात नवरा-नवरीच्या गळ्यात टाकायला आणि इथे रेखादेवी फुलांच्या मनोगताच्या गोष्टी सांगत होत्या. फुलांच्या बाबतीत देव, मयत आणि पुढारी या वास्तव्यापासून दूर असलेल्या रेखाबाईंच्या त्या अर्ध्या टक्क्याच्या संस्कृतीबद्दल चार शब्द ऐकवणार होतो. (मी चालू साडेतीन टक्‍क्‍यांच्या संस्कृतीतल्या जमाखर्चातला अर्धा टक्‍का दहाव्या मजल्याच्या वरच्या मजल्यावर राहणारांसाठी राखून ठेवला आहे.) तेवढ्यात “आपण काय घेणार?” हा आल्हाददायक प्रश्न आणि तोही नाजूक स्त्रीस्वरात ऐकू आला आणि साडेठशहाण्णव टक्क्यांचं प्रतिनिधित्व करायचं माझं अवसान एकदम गळून पडलं.

पण तो चहा, केक, बिस्किटं आणि सांजा वगैरे गोष्टी मला भलत्याच महागात लागल्या. सांजाबिजा होईपर्यंत मिस्टरांनी आणलेल्या स्टिरिओ-साऊंड-टेपडेक वगैरे भानगडीवर मला रवीची सतार आणि त्यावरचं रसग्रहण ऐकावं लागलं. या सर्व वाजंत्रीवाल्यांचा उल्लेख रवी, विलायत, झाकीर, हरी असा एकेरी सलगीनं करणं हाही एक आपल्या रसिकतेची पिचकारी ऐकणाऱ्यांच्या अंगावर उडवायचा प्रकार आहे. तेवढ्यात रेखादेवींना 'इकेबाना'च्या जोडीला कवितेतसुद्धा इंटरेस्ट असल्याचं मिस्टरांनी सांगितलं. वास्तविक फुलांचं मनोगत वगैरे शब्दयोजनेतून मला या धोक्याचा अंदाज यायला हवा होता. काय घेणार? या प्रश्नानं घोटाळा झाला होता. "आपल्यासारख्या ख्यातनाम सा साहित्यिकांना माझ्यासारखीनं स्वतःची कविता वाचून दाखवायची म्हणजे एक प्रकारचे धाडसच आहे - पण....” अशी आणखी थोडी थोडी गुगली बॉलिंग करून त्यांनी आपली वही उघडली. अठठाविसाव्या मजल्यावरून आपण खाली उडी मारली तर आपण नक्कीच मरू की नुसत्याच तंगड्या मोडतील? हा प्रश्न माझ्या मनात चटकन तरळून गेला. तोवर अत्यंत कातर स्वरात कानावर पहिली ओळ आली. बाई भलत्याच भावनाबंबाळ झाल्या होत्या. “कवितेचे नाव आहे एक उदास सांज...' माझ्या डोक्यात उगीचच “आता माझा प्रवास आहे सांज्याकडून सांजेकडे' ही ओळ उड्या मारून गेली. इकडे बाई त्या कवितेतून निर्माल्य, अश्रूफूल, वेदनांनी झुकलेली वेल वगैरे बरंच काही होत चालल्या होत्या. मी कविता ऐकण्यात तल्लीन झाल्याचा अभिनय करीत शेवटच्या ओळीची वाट पाहत होतो. किंचित अळणी असलेल्या सांज्यात काही मिनिटांपूर्वी घातलेल्या मिठाला तरी जागणं प्राप्त होतं. शेवटी त्या उदास सांजेला कवयित्री धुळीत पडलेली कळी झाल्या आणि पाच-सहा सेकंद पुढची ओळ कानावर आली नाही. तेव्हा कविता संपली असेल याची खात्री पटून (आणि सांज्याला स्मरून) “वा छान!” म्हणालो. “उगाच!” रेखादेवी म्हणाल्या. “उगाच ना. खरंच,” मी. “उगाच हे माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे!" रेखादेवी. आपण सिक्सर मारली अशा भ्रमात असलेल्या फलंदाजाला आवाज आला तो आपल्या बॅटचा नसून त्रिफळा उडाल्याचा होता, हे लक्षात आल्यावर जे काही वाटत असेल ते याहून निराळं नसणार. मग ती 'उगाच' सुरू झाली. “आज पाखरं का आली? उगाच! आज आसू का आले? उगाच! हे का झालं? उगाच! ते का झालं? उगाच! विष्णूसहस्त्रनामासारखं हे उगाच सहस्त्रनाम चालू होतं. मी नाइलाजानं त्यातल्या प्रत्येक उगाचला सलाम करीत ते उगाचच उगाळणं चालू असताना तो सगळा इम्पोर्टेड दिवाणखाना पाहून घेतला. “ही कविता म्हणायची रेखाला, कविसंमेलनात फार फर्माईश होते,” रेखापती म्हणाले. “मी मी आसू आसू झाले! डोळ्यातच बुडुनी गेले!” रेखाबाईनी आणखी एक पान उलटलं होतं. मला एक कोडं आहे. कवयित्री जितकी श्रीमंत तितकं तिच्या दु:खाचं माप जास्त. असं का? इथे चारी बाजूला घट्ट गादीतून कापूस उसवावा तशी त्या फ्लॅटमध्ये श्रीमंती उसवून बाहेर सांडत होती. आणि बाई कवितेतून सुई टोचल्यासारखी सारखी स्स-स्स-स्स करीत बसली होती. आणि तिला इतक्या सुखात ठेवणारा हा तिचा हा तिचा नवरा तिचं ते दु:ख नुसता ऐकत नव्हता तर चारचौघांना चहाबिहा देऊन ऐकवीत होता. आणि हे सारं करा पण आम्हांला रसिक म्हणा” यासाठी!

अशा वेळी सतार आणि तुणतुणं यातला फरक आपल्या बापालासुद्धा कळला नाही, असं सांगून सतारीच्या कार्यक्रमाची तिकिटं गळ्यात घालायला आलेल्या कुठल्याशा संस्थेच्या सेक्रेटरीला दारातूनच वाटेला लावणारे आमचे आप्पा सामंत मला शूरही वाटतात आणि सुखीही वाटतात. घरी जेवायला बोलावलं की सामंत वैनी ताजे फडफडीत मासे तळतात - मस्तपैकी बांगड्याची आमटी करतात. सोलाची कढी करतात- आग्रह करतात, कविता करून ऐकवीत नाहीत. आप्पा सामंत फक्त मासे या विषयावरच बोलतात. जेवताना उगीचच टेपरेकॉर्डरवर रविशंकर लाव, संतूरचं तुणतुणं चालू ठेव, भीमसेनचं (त्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे) 'हा हू' ऐकव, असला रसिकपणा उधळीत नाहीत. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कुठल्याही कलेची किंवा कलावंताची सावली आपल्या अंगावर पडू दिली नाही. त्यामुळे त्यांची कुठे थयथयही झाली नाही. आहार, निद्रा, भय मैथुनाच्या मस्त पातळीवर जगत आले.

“साहित्य-संगीत-कलाविहीन माणूस हा शेपूट किंवा वशिंड नसलेला साक्षात बैल आहे,' असं कुठल्याशा सुभाषितकारांनी म्हणून घोळ करून ठेवला आहे. पण साहित्य-संगीताची आवड नसलेले बैल दु:खी असतात म्हणून कुणी सांगितलं? आणि असलंच दुःख तर ते चूपचाप भोगतात. त्याच्या कविता करून इतरांना ताप देत नाहीत किंवा आपली गरिबी, दैन्य, वेदना वगैरे साहित्याच्या बाजारात मोडून खात नाहीत.

या सर्व प्रकारांत साहित्याइतका तर बिनभांडवली धंदा नसेल. बरं, एके काळी लेखक मंडळी आपला साहित्यिकपणा ग्रंथातून किंवा मासिकातून प्रकट करायचे! आपला साहित्यिकपणा प्रकट करून “हम भी कुछ कम नही' हे दाखवायची जबाबदारी वाचकांवर हल्लीसारखी पडली नव्हती. त्यातलं सगळ्यात कीव आणणारं प्रकरण म्हणजे हल्लीच्या लडिवाळ साहित्यिक लग्नपत्रिका! “आमच्या रंजूच्या लग्नाला नक्की या हं' असल्या लाडेलाडे ओळींची संपणारी आमंत्रणपत्रिका आली की मी ते लग्न टाळतो. तसल्या पत्रिकेतून इतकं लालित्य आणि लडिवाळपणा सांडत असतो की, त्या रंजूची मम्मी आपलं स्वागत गालगुच्चा घेऊन करील आणि “आयशकलीम खाऊन जायच्यं बरं का-” असं काहीतरी करील अशी भीती मला वाटते. माझ्या डोळ्यापुढे जुन्या लग्नपत्रिका उभ्या राहतात. त्यात कुणाचं लग्न कुठे, किती वाजता सगळं स्पष्ट असायचं. साहित्यिकपणा नव्हता. उलट लग्नांना 'शरीरसंबंध' वगैरे म्हणून माणसं सत्याच्या जरा अधिक जवळ जात होती. आणि इथे माझ्या पुढ्यात एक लग्नपत्रिका पडली आहे. त्यातली पहिलीच ओळ, “ओळखा पाहू कोण आहे ते?” अशी आहे. आता नुसती पत्रिका पाहून काय ओळखणार? मी आमंत्रणपत्रिकेच्या खाली आपले नम्रबिम्न काही दिसताहेत की काय ते पाहायला लागलो. त्यात नुसतं विसू आणि नलू एवढंच होतं. विसू आणि नलू या नावाची लेबलं चिकटलेली काही डझन मनुष्यमात्रे माझ्या ओळखीची आहेत कोण हे विसू-नलू म्हणत मी ती आमंत्रणपत्रिका वाचायला सुरुवात केली आणि माझ्या प्रतिक्रिया उमटत गेल्या. “ओळखा पाहू कोण ते?” (मी नाही ओळखत-गेलात उडत.) “तुम्ही तिला पाहिली असेल पाळण्यात.” (आम्ही शेकडो पोरं पाळण्यात पाहिली आहेत.) “ऐकले असतील तिचे बोबडे बोल” (पोरांपेक्षा आयाच जास्त बोबडं बोलतात.) “आमची पिंकी एक कळी उमलते आहे.”(नो कॉमेंट्स) “पिंकी आता नववधूच्या वेशात उभी राहणार आहे,” (नववधू ही काय भानगड आहे? जुनी वधू असते का?) “पिंकीला पप्पूसारखा जीवनसाथी मिळतोय,” (आता का? नववर म्हणा की!) स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी करावी असे हे दृश्य." (देवांना दुसरा धंदा नाही.) “नक्की या हं!” (हा मराठीतला "हं कुणीतरी तडीपार करून कानडी नाहीतर गुजरातीत नेऊन टाकारे.) “तुमचे विसू आणि नलू.”

आता ही काय लग्नाची आमंत्रणपत्रिका आहे, की बेबीफूडची जाहिरात? त्या पत्रिकेवरच माझ्या प्रतिक्रिया लिहून त्या विसू-नलूला पाठवाव्या म्हणून पत्ता पाहायला लागलो, पण आपण साहित्यिकपणा मिरवायच्या नादात विसू-नलू पत्ताच काय, पण ते लग्न कुठल्या कार्यालयात आहे याचासुद्धा तपशील छापायला विसरले होते.

रसिकपणाची मी अशी हाय खाल्ल्यामुळे सांस्कृतिक सप्ताह, संगीत महोत्सव, हेमंत व्याख्यानमाला, नवरात्र महोत्सव वगैरे जाहिराती पाहिल्या की मला धडधडायला लागतं. माणसाला इतकी व्याख्यानं, गाणी, परिसंवाद, नाटकं, नाच वगैरे मिसळलेले हे इतकं सांस्कृतिक आंबोण खायची गरज आहे का?

त्यात पुन्हा शासनानं 'सांस्कृतिक खातं' काढून आणखी घोळ करून ठेवलाय, खरं तर साहित्य, संगीत कलांचा हा महापूर आवरता कसा येईल याचा विचार करायला हवा. अशाच विचारात मी एका सांस्कृतिक सप्ताहाच्या उद्धघाटनाला मुंबईला डेक्कन क्वीननं निघालो होतो. (चालू बांधिलकीच्या जमान्यात लेखकांनी स्वतः होऊन डे. क्वी.सारख्या भांडवलशाही गाडीच्या पहिल्या वर्गातून प्रवास केल्याचा जाहीर बभ्रा करू नये. गुपचूप जावे आणि कथा किंवा कविता लोकलमधून लोंबकळून जाणाऱ्यांवर लिहावी, हे साहित्यक तंत्र मी जाणतो. पण सत्य सांगायला हवे म्हणून डेक्कन क्वीनचा उल्लेख.) एक पहिलवान संघटनेचे किंवा तंबाखू अडत दुकानदार परिषदेचे अध्यक्ष वाटावेत असे गृहस्थ माझ्या शेजारच्या रिकाम्या सीटवर स्थानापन्न झाल्याच्या थाटात बसले. त्यांच्याबरोबरचा माणूस चेहऱ्यावर आदबीचा थर थापून उभा होता. काही वेळाने त्या आदबशीर गृहस्थांनी यांच्या हातात एक कागद दिला, आणि माझ्या कानावर प्रश्न पडला, “का हो भिरुंडे, हा बालगंधर्व म्हटांत तो होता कोण?” पुणे-मुंबई प्रवासात “बालगंधर्व कोण होता?” हा प्रश्न अस्सल मराठीत इतक्या खणखणीत आवाजात विचारणारा महाभाग आपल्याला प्रवासात शेजारी म्हणून लाभल्यामुळे पुढचे चारेक तास सुखात जाणार या आनंदात मी होतो, तेवढ्यात त्यांनी मलाच सवाल केला, “काय बाम्भेला निघाला का?” “हो!” “काय बिजनेस आपला?" “बिजनेस वगैरे काही नाही-पुस्तकं लिहितो.” “कितवीची?” “शालेय नाही, ललित साहित्याची लिहितो.” या उत्तराऐवजी मी नुसतं क ख ग घ ड म्हटलं असतं तरी चाललं असतं. “काय नाव?” प्रश्न आला. मी माझं नाव सांगितलं, ते त्यांच्या कानावर यापूर्वी कधीही पडलेलं नव्हतं. एके काळी मी थोडासा खट्टू झालो असतो. पण आज मी खुषीत होतो. “काय मिटिंग बिटिंगला निघाला काय?” “हो!” “तरीच फस्टक्लास. टीयेडीये असेल... स्वत:च्या पैशांनी आजकाल कोण जाईल फसमधून. आम्ही नेहमी कारनीच जातो, आज कार बोंबलली तेव्हा ट्रेननी जाणं आलं!”

“नक्की तंबाखू अडत दुकानदार परिषदेचे अध्यक्ष,' मी मनात म्हटलं.

“आपले नाव?” “आम्हाला वळखलं नाही का? भिरुंडे, सायबांना पेप्रातला फोटो दाखवा.” मग भिरूंड्यांनी पेपरातला त्यांचा फोटो दाखवला. फोटोखाली नाव होते आणि पुढे मजकूर होता. “सांस्कृतिक खात्याचे नवे मंत्री," मी, युरेका!' म्हणून ओरडायचं बाकी ठेवलं होतं.

सध्याचा सांस्कृतिक महापूर आवरायला असलंच भक्कम धरण पाहिजे होतं. रसिकतेच्या महापुरात वाहत चाललेल्या पूरग्रस्तांना हा केवढा दिलासा! साहित्य-संगीत-कला वगैरे भानगडींपासून निर्लेप राहिलेल्या त्या महा (काय) पुरुषाचं खडकी ते मसजिद बंदरपर्यंत चाललेलं घोरणं एखाद्या गवयाची दरबारातील आलापी ऐकल्यासारखी ऐकत राहिलो.

लेखक - पु. ल. देशपांडे
कालनिर्णय १९८४

Tuesday, March 29, 2022

माझे लेखनकलेतील प्रयोग - पु ल देशपांडे

जगात माणसावर अनेक करुण प्रसंग कोसळतात. विरहाचे प्रसंग, निधनाचे, द्रव्यनाशाचे, बेकारीचे, प्रेमभंगाचे करुण प्रसंगांची यादी हवी तितकी लांबविता येईल. परंतु मी काय विनोद केला हे समजावून सांगणे, हा सर्वात मोठा करुण प्रसंग आहे, असे मला वाटते. तसला प्रसंग आज मी ओढवून घेतला आहे. विनोदी लिखाणात मी काय काय प्रयोग केले, विनोदाच्या कोणकोणत्या तऱ्हा मी वापरल्या, हे माझ्याच लिखाणाकडे त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहून सांगणे, सुरुवातीला मला वाटले होते तितके सोपे काम नाही, असे या विषयावर विचार करताना वाटू लागले आहे.

माझे लेखनकलेतील प्रयोग हे शब्द उच्चारताना मला गांधीजींच्या सत्याच्या प्रयोगाची आठवण होते. स्वतःच्या जीवनाकडे इदं न मम अशा अलिप्तपणे पहायची गांधीजींसारखी ज्याची वस्तुनिष्ठ भूमिका घेण्याची साधना झाली आहे, त्यानेच आपल्या अंतःकरणाच्या प्रयोगशाळेत दुसऱ्याला डोकावण्य़ाची परवानगी द्यावी. नाही तर क्षणोक्षणी आपली आपण करी स्तुति अशांचा जो वर्ग समर्थांनी सांगितला आहे, त्यात तर आपण शिरत नाही ना, ही भीती सदैव अस्वस्थ करीत राहते. फाजील विनयाच्याही भूमिकेत ढोंग दडून बसलेले आणि स्वतःशी फाजील कठोर होण्याच्याही प्रकारात सूक्ष्म अहंकारपूजा चाललेली चाणाक्ष रसिकाला दिसू शकते. अशा परिस्थितीत माझ्या विनोदी लिखाणावर काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें म्हणून सुटका करून घेणे हा सर्वांत उत्तम मार्ग.

परंतु केवळ एवढ्याच एका कारणासाठी मी माझ्या विनोदी लिखाणासंबंधी त्याचे जे काही चुकून-माकून प्रयोग होऊन गेले असतील त्यासंबंधी बोलायला असमर्थ आहे असे नव्हे. तर ज्या मनाच्या अवस्थेत मी विनोदी लिखाण लिहिले अगर लिहितो ती अवस्था खरोखरीच आपण नवीन प्रयोग करायला बसलो आहोत याची जाणीव ठेवून लिहिणाऱ्या लेखकांची आहे का? मला वाटते, माझी भूमिका तशी नाही. आपण विनोदात नवीन प्रयोग करू या, असा संकल्प सोडून मी कधीही लिहायला बसलो आहे असे मला वाटत नाही. कारण विनोद हा जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. हा एक माझा स्वभावाचा दोष आहे. मला अत्यंत गंभीर प्रसंगी देखील नेमकी एखादी विसंगती दिसते आणि ती माझा छळ करू लागते. सुंदर दिवाणखान्यात उत्कृष्ट कोच, तिपाया, फुलदाण्या, पितळी कुंड्यांतले बालतमाल ह्यांच्या राजस मेळाव्यात गौतम बुद्धांचा पुतळा पाहिला की सामान्यतः कोणालाही त्या सौदर्यात भर पडल्याचा भास व्हावा. मला अशाच सुंदर दिवाणखान्याचा त्याग करून गेलेला सिद्धार्थ दिसतो. आणि त्या घराच्या मालकांची गंमत वाटते. तारतम्य सुटलेले दिसते, अनौचित्य दिसते आणि विनोदाचा कली नलाच्या न भिजलेल्या पावलांतून शिरलेल्या कलीसारखा माझ्या डोक्यात शिरतो. माझ्याच का विनोदबुद्धी असलेल्या कोणाच्याही डोक्यात शिरतो. त्यामुळे माझ्याआधीच्या विनोदी लेखकांनी केले नाही ते मी केले काय, असा प्रश्न मी स्वतःला विचारू लागलो की मला निश्र्चित उत्तर सापडत नाही. कोल्हटकर, गडकरी, अत्रे, चिंतामणराव जोशी, शामराव ओक, आणि अत्यंत नम्रतेने त्यांच्यामध्ये अंग चोरून बसलेला मी! ह्या ज्येष्ठ लेखकांनी हाताळला नाही असा विनोदाचा कुठला भाग मी उचलला, या प्रश्र्नाचे उत्तर कुठलाही नाही हे मला द्यावे लागेल.

आधुनिक लघुकथा अगर नवकविता यांचे तसे नाही. कथासूत्र नसलेली कथा हा मराठीतला नवा प्रयोग आहे. अगर अंतरमनाच्या भूलभुलैयामध्ये वाट चुकायला लावणारी नवकविता हा काव्यातला नवा प्रयोग आहे. शेंगेत प्रोफेसर कोंबणारा गंगाधर गाडगीळांच्या मनाचा चाळा यापूर्वी मराठी लघुकथेत नव्हता. संध्याकाळचा चेहरा त्यांनी पहिला आणि लोकांना दाखवला. मर्ढेकरांनी जीवनाचा कोटा उलटा करून पाहिला आणि आतली अस्तराची शिलाई दाखवली. रसिकांनी हे प्रयोग चांगले म्हणावे अगर त्याला नाके मुरडावी. परंतु मराठी भाषेच्या ह्या उपासकांनी साधनेचा नवा योग स्वीकारून त्यात नवे प्रयोग केले यांत शंका नाही. मराठीच्या संसारात त्यामुळे इतर काही आले न आले, तरी वैचित्र्य आले हे खास, साहित्याच्या मंदिरातील विनोदाच्या पोटमाळ्यावर माझ्या प्रतिमेचे जे उंदीर खडखडले ते फारसा काही निराळा पराक्रम करू शकले, असे मला प्रामाणिकपणे वाटत नाही. त्यामुळे मी फार तर माझ्या विनोदाची वैशिष्ट्ये सांगू शकेन.

गद्य विडंबन हे माझ्या लिखाणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असावे. काव्याच्या क्षेत्रात अत्र्यांच्या झेंडूच्या फुलांनी अलौकिक आघाडी गाठली. गद्य विडंबनांत मी तितका उंच पोहोचलो किंवा नाही कोण जाणे! परंतु मर्मभेद हे जे विडंबनाचे कार्य ते मात्र मी निश्र्चित केले. माझ्या खोगीरभरती आणि नसती उठाठेव ह्या दोन्ही संग्रहात जास्तीत जास्त संख्या असल्या गद्य विडंबनांची आहे. असल्या लेखांचा आढावा घ्यायला लागलो म्हणजे साहित्यक्षेत्रातल्या काही प्रवृत्तीची मी सगळ्यात जास्त विडंबने केली आहे, असे मला दिसते. विद्वत्तेचा जाड भिंगांचा चष्मा नाकावर ठेवून जीवनाकडे पुस्तकांच्या आडून पाहणारी मंडळी मला सतत विषय पुरवीत आली आहेत. विद्वत्ता ही चेष्टा करण्यासारखी गोष्ट नाही, परंतु विद्वत्तेचे प्रदर्शन दिसले की माझी लेखणी माझा हात धरून कागदावरून मला ओढीत नेते. आणखी एक रस आणखी एकच प्याला अगर एका विद्वत्तापूर्ण ग्रंथावरील अभिप्राय सहानुभाव संप्रदाय हे लेख असल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करणाऱ्या शैलीची विडंबने आहेत.

खेड्यांतून कुस्त्या ज्यांनी पाहिल्या असतील त्यांना आठवत असेल की, पहिलवानांच्या कुस्त्या आटोपल्या की, गल्लीतली पोरे उगीच दंड थोपटून त्या आखाड्यात माकडउड्या मारायला लागतात. साहित्यातदेखील गहनगंभीर विषयावर महामल्लांची युद्धे चालू असताना काही काडीपैलवान आपल्या चष्म्याच्या काड्या सावरीत लेखण्या उडवू लागतात! स्वतःच्या एखाद्या वाक्याचे ठिगळ जोडून दुसऱ्या विद्वानांच्या उताऱ्यांच्या गोधड्या मुद्रणयंत्रावरून वाळत टाकलेल्या दिसल्या की त्यांचा कोट ओढायची सुरसुरी मला अनावर होते. त्यांचा तो गांभीर्याचा आव पाहिला म्हणजे, प्राथमिक शाळेतला पहिली-दुसरीतला पोरगा औरंगजेबाच्या वेषात स्वतःच्या उंचीइतकी दाढी लावून आपल्याच वयाच्या संभाजीला छत्लपती संभाजी लाजे, आम्ही तुम्हांला गिलफदाल कलीत आहोत असे म्हणत, नसलेली छाती फुगवण्याचा प्रयत्न करीत असताना दिसतो. त्याची आठवण होते. आणि मग साहित्य आणि साहित्यातले रुसवे-फुगवे, केळवणे आणि मानपानांची मौज वाटू लागते. जातीला जात वैरी म्हणा हवे असले तर, परंतु साहित्यिकांमधील असल्या प्रवृत्तींचे विडंबन हे मी माझ्या लेखणीतले ठळक वैशिष्ट्य समजतो.

अर्थात इथे एका गोष्टीचा खुलासा करणे आवश्यक आहे. पुष्कळदा एखाद्या लेखांतून काही व्यक्तींचे तोंडवळे दिसतात. आणि हे विडंबन अमक्या एका लेखकाचे आहे असे म्हणण्यात येते. आणि वा! अमक्या अमक्याची छान खोड मोडलीतअसे सर्टिफिकेट देत काही मंडळी येतात. हा माझ्यावर अन्याय आहे, असे पुष्कळदा मला वाटते. मी आता म्हणालो त्याप्रमाणे विडंबन हे प्रवृत्तीचे आहे, व्यक्तीचे नव्हे. किंबहुना विद्वत्तेचे प्रदर्शन हे कुणी एकच साहित्यिक करतो असे नाही, अनेक करतात. फक्त चित्रकार ज्याप्रमाणे एखादे मॉडेल पुढे ठेवून चित्र काढतो त्याप्रमाणे आधाराला एखाद्या लेखकाची शैली घेऊन विडंबन करणे हे शक्य आहे. परंतु माझ्या लेखात तयार झालेली व्यक्ती ही अनेक व्यक्तींच्या विविध छटा घेऊन निर्माण झालेली तिसरीच व्यक्ती असते. किंबहुना ज्या ठिकाणी माझ्या लेखानंतर हे अमक्यालाच उद्देशून मी लिहिले आहे असे बऱ्याच वाचकांना वाटल्याचे मला कळते त्या ठिकाणी माझ्या विडंबनाचा व्यक्तींच्या पलीकडे जाण्याचा माझा हेतू फसला, असे वाटून मला वाईटही वाटते. कारण शैलीच्या, शब्दयोजनेच्या अगर तंत्राच्या दृष्टीने मी प्रयोग केले आहेत की नाही, हे माझे मलाच अजून नीटसे उमगले नसले तरी कोणत्याही व्यक्तीला नामोहरम करण्याचा हेतू मनात बाळगून मी विनोदी लिखाण केले आहे असे मला मनापासून वाटत नाही.

टीकाकार माझ्या विनोदाला बुद्धिनिष्ठ विनोद म्हणतात. साहित्य आणि साहित्यिक याभोवतीच माझा विनोद घोटाळत राहतो. त्यामुळे माझ्या वाचकांचे वर्तुळ फार मर्यादित होते, असाही एक आरोप माझ्या लिखाणावर केला जातो. धुंडिराज, कामण्णा, पांडुतात्या, चिमणराव, दाजी ह्यांच्यासारखी विनोदी व्यक्तिरेखा मी मराठीच्या कुटुंबात आणून सोडली नाही, असेही म्हणण्यांत येते, ते काही अंशी खरेही आहे. परंतु अशी व्यक्ती जरी आणली नाही तरी अशा व्यक्तींचा समूह मात्र मी बटाट्याची चाळ बांधून आणला. ह्या चाळीत माझी जीव रमतो. ही सर्व मंडळी मला आवडतात. सोकरजी त्रिलोकेकर, अण्णा पावशे, एच्च. मंगेशराव, म्हळसाकांत पोबुर्पेकर, नागूतात्या आढ्ये वगैरे मंडळी ह्या चाळीत राहतात, धडपडतात, रुसतात, रागावतात, पुन्हा एकत्र होतात. दोन खोल्यांच्या बिऱ्हाडांत राहणारी ही जनता अमर आहे.

बटाट्याची चाळ मला अनेक विषय पुरवीत आली आहे. मात्र तेथील जीवनातील विसंगती दाखवताना त्यांवरचे माझे प्रेम अजिबात कमी झाले नाही. त्यांची वागण्याची पद्धत त्यांनी बदलली असे मला वाटत नाही. आणि मीच काय परंतु ख्रिस्तापासून गांधीपर्यंत कोणीही सांगून ते ती बदलतील असे मला वाटत नाही. कारण त्यांच्या स्वतःच्या तत्त्वज्ञानाशी ती मंडळी रममाण झाली आहेत. तिथले सारे हर्षखेद त्यांना मंजूर आहेत. दोन खोल्यांच्या बिऱ्हाडात त्यांना कसलाच अडथळा वाटत नाही. ही परिस्थिती योग्य आहे की अयोग्य, हे ठरविण्याचे काम माझे नाही. किंबहुना जीवनात चांगले आणि वाईट ह्याचे पॅकबंद कप्पे करता येतील. असे मला वाटत नाही. बटाट्याची चाळ आजवर जशी चालत आली तशीच पुढे चालणार, असे मला वाटते. वरपांगी बदल होती पण पिंड कायम! अर्थात ह्या चाळीवरील लेखांत देखील विडंबनकर्त्याचा माझा पिंड दिसून येतो.

विडंबनाला कुण्या विद्वान टीकाकाराने बिनभांडवली धंदा म्हटले आहे. मला ते पटत नाही. जीवनाची चांगली ओळख असल्याखेरीज विडंबन करता येत नाही. शब्दांच्या बुरख्याआड दडलेले पांडित्य शोधायला डोळ्यांत सामर्थ्य लागते. व्यक्तिगत द्वेषाच्या भावनेच्या पलीकडे जावे लागते आणि जीवनातल्या साऱ्या धडपडींवर, साऱ्याच मानवी व्यापारांवर खूप प्रेम असावे लागते. मनात करुणेचा झरा वहावा लागतो, तरच विनोदी लिखाण संभवते. अन्यायाची चीड आली की विनोदाला उपरोध उपहासाची धार येते; परंतु त्यांतून अन्याय करणाऱ्या व्यक्तीच्या अज्ञानाची कींव नष्ट झाली की विनोदाला निंदेचे स्वरूप येते. मी जर कुठले प्रयोग सतत चालू ठेवला तर हा निंदेचा भाग टाळण्याचा. निंदेतून क्षणिक करमणूक होते, परंतु ;माणूस म्हणून लेखकाची किंमत घसरते आणि ती घसरली की कुठल्याही साहित्यप्रकाराला आणि साहित्यातल्या प्रयोगाला किंमतच उरत नाही. विनोद लिखाणात हा मी एक नवा प्रयोग म्हणत नाही. परंतु कोल्हटकरा-गडकऱ्यांनी विनोदात अनिष्ट प्रवृत्तींचे उपरोध-उपहासाने जे पितळ उघडे केले आणि व्यक्तिनिरपेक्ष असा जो विनोद रूढ केला, तीच परंपरा नव्या काळातल्या तसल्या प्रवृत्तींच्या बाबतीत चालू ठेवण्याचा प्रयोग हीच विनोदी लेखक म्हणून माझी धडपड आहे.

उदाहरणार्थ, कुठल्याही एका विशिष्ट पत्रकाराची चेष्टा करावी या उद्देशाने न लिहिता मजकुरापेक्षा मथळ्यांनाच महत्त्व देणाऱ्या वर्तमानपत्री लिखाणावर मी पत्रकार नावाच एक लेख लिहिला होता. त्यांत वर्तमानपत्री शैलीचे विडंबन करणे हा मुख्य हेतू आहे. उदाहरणार्थ, निळू ह्या बालपत्रकाराने स्वतःच्या मुंजीचे काढलेले निमंत्रण पहाः

वर मथळा ब्रह्मचर्य व्रताची कडकडीत प्रतिज्ञा

येथील सुप्रसिद्ध गृहस्थ (ह्यापेक्षा आमच्या तीर्थरूपांबद्दल आम्हाला काहीच लिहिता येण्यासारखे नव्हते) श्री वासुदेवराव धुंडिराज गायधनी यांचे ख्यातनाम व बालपत्रकार चिरंजीव लंबोदर उर्फ निळू यांनी रविवार दिनांक अमुक अमुक रोज सकाळी आठ वाजता आलग्न ब्रह्मचर्यव्रताची कडकडीत प्रतिज्ञा करायचे ठरविले आहे. सदरहू समारंभात पुण्यामुंबईचे बाल व प्रौढ ब्रह्मचारी जमणार आहेत असे कळते. तरी आपण आपल्या लेकीसुनांसह सदर अपूर्व समारंभास उपस्थित राहावे आणि असल्या कठोर व्रतपालनप्रसंगी बटूस धीर द्यावा.

पत्रिकेवर मारुतीरायाचा एक तीन इंची ब्लॉक टाकायलाही मी कमी केले नाही. कंपॉझिटरने मात्र आपल्या पूर्वजांच्या परंपरेला अनुसरून निष्काळजीपणाने मारुतीच्या ब्लॉकखाली माझे नाव छापले होते. इत्यादी. ह्यात वतर्मानपत्री मथळ्यांचेही विडंबन होते.

वर्गयुद्ध नावाच्या शाळेच्या हस्तलिखित दैनिकाचे काही मथळे पाहाः ;शेवटची परीक्षा हुकली जोशी सर, तुम्ही कुठे जाल? हेडमास्तरांच्या खोलीत रावण ड्रॉइंग मास्तर बाळंतीण झाले परवचाचे पाश तोडा, इत्यादी मथळ्यांची विडंबने काही प्रसिद्ध मथळ्यांवरून सुचली, हे सहज लक्षात येण्यासारखे आहे.

वर्तमानपत्राप्रमाणे काव्याच्या प्रांतातही नवकाव्याचा गाभा समजून न घेता अनेक येरू; नवकवितेशी दंगा करू लागले आणि आपापली काव्ये प्रसिद्ध करू लागले, तेव्हा मला त्याचे व्यवच्छेदक लक्षण हा लेख सुचला आणि चमत्कारिक असे नवसंकेत म्हणजेच नवकाव्य असे समजणाऱ्या बुटइष्टाकिण्या घालून साहेब बनू पाहाणाऱ्या माजी रावबहादुरांसारख्या कविमंडळींना जरा सबुराने घ्या असे सांगायची पाळी आली आहे असे मला वाटते, आणि

गटारांतल्या निळ्या पुराण्या,
जोड जानवी वरती काखा,
तबकडींतल्या मेल्या गाण्या,
शब्द फुटतसे फुटक्या शंखा

अशांसारख्या विडंबनाच्या ओळी मी लिहिल्या.

सामान्यतः विनोदी उपमा देताना ज्या वातावरणातील लेख असेल त्याच ;लायनीतल्या उपमा मी दिल्या आहेत. अंगुस्तान विद्यापीठ या लेखात शिंपी कॉलेजचे प्रिन्सिपॉल ठिगणे भाषण करताना त्यांच्या जीभेवर त्या दिवशी प्रत्यक्ष फाफचे मशीनच नाचत होते किंवा ठिगळ्यांच्या उत्साहाला नव्याने तेल दिलेल्या मशीनसारखा जोर चढला अगर एका शिंप्याने एकजुटीचे महत्त्व सांगताना आपण एकमेकांना असे चिकटून राहू की जसे कपड्याला अस्तर अशी काही उदाहरणे देता येतील.

अर्थात केवळ गद्य विडंबनेच मी लिहिली नाहीत. संगीत चिवडामणी अण्णा वडगावकर, बोलट लखू रिसवूड, प्रा. विश्र्व अश्र्वशब्दे अशी काही विनोदी व्यक्तिचित्रेही लिहिली. इथे देखील अनेक सारख्या चेहऱ्यांच्या मंडळीतून एक नवा चेहरा मी निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे सांगणे अत्यंत आवश्यक आहे. कारण फक्त एक व्यक्ती डोळ्यांपुढे ठेवून यांत्रिक फोटो काढता येईल. स्वतंत्र जिवंत चित्र काढता येणार नाही. आणि ललितसाहित्य हे हुबेहूब चित्र काढणाऱ्या फोटोग्राफीसारखे नाही. केवळ प्रतिकृती म्हणजे साहित्य नव्हे. ती कृती आहे, प्रतिकृती नाही. आणि विनोदी लिखाणही त्याला अपवाद नाही.

माझ्या विनोदी लेखनाची कथा ही अशी आहे. त्यातल्या प्रयोगांचा पत्ता मला नीट लागलेला नाही. वास्तविक हे कार्य माझे आहे, असे मला वाटत नाही. स्वैपाक्याने पदार्थ करावे. आरोग्यशास्त्राशी त्याला काय कर्तव्य आहे? साहित्यात देखील चिजा बनविणारी मंडळी आम्ही. रस पंडितांनी जाणावा. गद्य विडंबनाच्या आणि अन्य विनोदी चिजा बनवणारा एक लहानसा कारागीर म्हणून एवढी मात्र खबरदारी मी घेतो की, हातात धरलेल्यांची गुळगुळीत व्हावी, मात्र जखम अजिबात होऊ नये.

- पु.ल. देशपांडे
लोकसत्ता


Monday, January 24, 2022

काव्य आपल्याला जगायला कारण देतं - पु.ल. देशपांडे

मॅजेस्टिक बुक स्टॉलतर्फे प्रकाशित झालेल्या ‘पु. ल. : एक साठवण’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ १८ नोव्हेंबर १९७९ रोजी मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात झाला होता. त्या समारंभात ‘पुलं’नी केलेल्या भाषणातील काही अंश.

माझ्या साहित्याबद्दल सांगताना कविवर्य बोरकर, मं. वि. राजाध्यक्ष आणि श्री. पु. भागवत या तिघांनी सांगितलं, की मला कवितेचं प्रेम आहे. माझं म्हणणंच असं आहे, की कवितेवर ज्यांचं प्रेम नाही, तो कसलाच कलावंत होऊ शकणार नाही - विनोदी तर नाहीच नाही. जो चांगला वाचक आहे, तो मनातून कवितेचा वाचक असतो. एखादी गोष्ट काव्यमय आहे असं आपण म्हणतो, त्या वेळी त्याचं यमक-प्रास-वृत्त काहीही आपण पाहत नसतो. एखाद्याचं वागणं काव्यमय आहे, असं आपण म्हणतो - एखाद्याचं दिसणं किंवा एखादीचं दिसणं काव्यमय आहे असं आपण म्हणतो - वयाबरोबर आता ‘एखादी’चं वगैरे म्हटल्यावर लोक काय म्हणतील अशी मला भीती वाटायला लागली आहे!

काव्याशिवाय आपण राहू शकत नाही याचं कारणच असं आहे, की अन्न आपल्याला जगवतं आणि काव्य आपल्याला जगायला कारण देतं. कशासाठी जगायचं? जगायचं याच्यासाठीच, की जिथे माणसामाणसांतला प्रास जुळला आहे, माणसामाणसांतलं वृत्त जुळलं आहे - ह्याच्यासाठीच तर जगायचं! म्हणूनच ‘आधी वंदू कवीश्वर। जे शब्दसृष्टीचे ईश्वर’ असं म्हटलं आहे. आता ते आपल्यालाच म्हटलेलं आहे असं काही लोक समजतात, तो भाग निराळा! हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु कवीला उगीच वंदन केलेलं नाही. गणपतीला ‘कविः कविनाम्’ म्हटलेलं आहे. ‘कवी’ ही माणसाला मिळालेली सर्वश्रेष्ठ पदवी आहे. काव्याचं आणि विनोदाचं जमत नसतं असं नाही. विनोदी लेखकाला बेसूर जास्त जाणवतो. त्यामुळे तो सुरांच्या मागे जास्त जातो. त्याला जीवनाचा बेतालपणा जास्त जाणवतो. म्हणून जीवन तालात येण्यासाठी त्यातला बेतालपणा काय आहे, हे तो लोकांना दाखवतो. राजकारणातली माणसं नीट वागत असती, तर आम्ही कशाला लिहिलं असतं? आता तर त्यांनी आमच्याशी चांगलीच स्पर्धा सुरू केली आहे यात शंकाच नाही. रोज त्यांचे विनोदी कार्यक्रम पाहिल्यावर आता आमचं कसं होणार, अशी भीतीही आमच्या मनात उत्पन्न झाली आहे; पण तो भाग निराळा! आजच्या ह्या चांगल्या प्रसंगी उगाच भलती नावं तोंडून निघून जायची.

- पु. ल. देशपांडे
पुस्तक - पाचामुखी

Wednesday, January 19, 2022

भिकाऱ्याचे नाव

आमच्या घरासमोर उजव्या हाताच्या वळणावर एक भिकारी बसत असे. लहानपणी लवकर जेवलो नाही तर "हां, जेव लवकर, नाही तर त्या आंधळ्याला सांगते धरून न्यायला -" असे सांगून आमची आजी आम्हांला भेडसावत असे. शाळेत असताना परीक्षेच्या वेळी मारुतीच्या खडीसाखरेच्या नवसाबरोबरच त्या आंधळ्याला दिडकीचा दानधर्म करून देवाच्या हिशेबी आम्ही पोरे पास व्हायला उपयोगी पडण्याचा चांगुलपणा किंवा पुण्यही जमा करीत होतो. मोठेपणी - खोटे कशाला सांगू? ' बरोबरच्या मैत्रिणींबरोबर आपल्या सच्छील वर्तनाची छाप पाडायला उसन्या बेफिकिरीने त्याच्या वाटीत मी आणेल्याही टाकल्या होत्या. वळणावरचा आंधळा ! कितीतरी जुना होता ! दोन्ही डोळ्यांच्या पार खाचा झालेला आंधळा ! "आंधळ्याला दाता दे भगवान !" - किती वर्षे आम्ही त्याचा हा पुकार ऐकत आलो होतो, पण त्याच्याबद्दल कधी मुद्दाम दया उत्पन्न व्हावी असेही वाटले नाही, इतका तो नेहमीच होता.

आणि एकदा दुपारी कुठूनसा घरी परतत होतो. वळणावरचा आंधळ्यासमोर एक भिकारणीने अंगावरच्या चिरगुटांशी स्पर्धा करणारे फाटके कपडे पसरले होते, त्यावर वरणात बरबटलेले भाकरीचे तुकडे होते, आणि हातातला ॲल्युमिनियमचा गडवा उचलीत ती आंधळ्याला सांगत होती, "यवढी भाकर खाऊन घे ! मी कमिटीच्या नळावर पाणी भरुनश्यान आनते - बरं का मुरारी."

मुरारी ? आंधळ्या भिकाऱ्याचे नाव - भिकाऱ्याला नाव असते? - आज वीसपंचवीस वर्षात माझ्या मनात कधी चुकून विचार आला नव्हता की, वळणावरच्या भिकाऱ्याला नाव असेल.

मुरारी ! भिकाऱ्याला नाव असते? छे ! वळणावरचा आंधळा ! चावडीसमोरचा लंगडा ! देवळापुढला महारोगी ! ह्या सर्वांना नावे आहेत? छे ! भिकाऱ्याला नाव असू शकते ? त्याचे कधी बारसे झाले होते? शेजारच्या 'करत्यासवरत्या' आजीने कधी त्याच्या इवल्याश्या कानात कुर्र् करून बारशाला त्याचे नाव सांगितले होते ? आपल्या पोराला मुरारी म्हणून प्रथमच हाक मारताना त्याचा बाप किंचित लाजून मुरारीच्या आईकडे पाहून लाजला होता? छे! भिकाऱ्याला - भिकाऱ्याला नाव नसते, त्याला फक्त विशेषणे असतात -

आंधळा - लंगडा - थोटा - मुका -

- उरलंसुरलं 
पु.ल. देशपांडे

Wednesday, December 29, 2021

लोकशाही : एक सखोल चिंतन

..... ’लोकशाही म्हणजे लोकांनी चालवलेले लोकांचे आणि लोकांच्यासाठी असलेले - म्हणजे थोडक्यात आपल्यासाठी नसून लोकांसाठी असलेले सरकार - लिंकन (थोडा फेरफार करून. अधिक माहितीसाठी काही वाचण्याची गरज नाही)

इसापनीतीत एक गोष्ट आहे. बेडकांना एकदा वाटते, आपल्याला राजा हवा. वास्तविक त्यांना राजाची आवश्यकता का भासवी, कोण जाणे. भासली खरी. शेवटी देवाने ओंडका फेकला. बेडकांनी आठ दिवसात त्याच्यावर नाचायला सूरुवात केली - तेंव्हा देवाने अधिक कडक राजा हवा म्हणून बगळा पाठवला. पूर्वीचे चैनी राजे प्रजेच्या खर्चात विहार करीत, ते सोडून ह्या बाहेरुन शूभ्र दिसण्या-या राजाने, प्रजेचा चक्क आहारच करायला सूरुवात केली. बेडकांनी हाही राजा परतवला आणि आपल्यातून राजा निवडायचे ठरविले. तो अजूनपर्यंत निवडला गेला की नाही ते कळत नाही. आरडाओरडा मात्र चालोतो. दर पावसाळ्यात त्यांच्या सभा होतात. गळ्याचे गोळे फूगवून वृद्धदुर्दर भाषणे करतात. वर्षभर पून्हा काही ऎकू येत नाही. बहूधा मंडूकशाही सुरू झाली असावी वर्षातून एकदा निवडणूका देखील होत असाव्यात.
-----------------------------------------------------------

समजा अगदी एखादा नवा वझीर नेमायचा आहे. प्रोसिजर सरळ! गावात दवंडी पिटवायची. बरे, ही दवंडी पिटवताना देखील नुसते, ' नवा वझीर नेमायचा आहे हो ss.. गरजुंनी उदईक माध्यान्ही दिवाणेखासमध्ये हाजीर व्हावे होss..' अशी साधी दोन वाक्ये. दाखले, शिफारसी, वयाची अट, शिक्षण, पदवी वगैरे काही काही नको. उमेदवार-वझीर दरबारात येतात. मग सर्वांना मिळून सुलतान एखादे कोडे घाली. ' चाॅंद आसमानातच का राहतो? ' अशासारखा एखादा प्रश्न विचारला जाई. सारा दरबार आणि उमेदवार-वझीर बुचकळ्यात पडत. सगळीकडे सन्नाटा! मी मी म्हणणारे बुजुर्ग दाढीचे केस मोजू लागत. अशा वेळी एखाद्या उमेदवार-वझीराच्या घोड्याला खरारा करणारा मोतद्दार पुढे सरसावून तीन वेळा कुर्निसात करून विचारी,
' जहाँपन्हाॅं, आपल्या सवालाचा जवाब देण्याची गुस्ताखी मी करू का? '

' जवाब गलत निघाला तर जबान छाटली जाईल. '

' बेशक जहाँपन्हाॅं '

' दे जवाब, चाॅंद आसमानातच का राहतो? '

' हुजुर सलतनत बडी असो वा छोटी, जातीचा सुलतान नेहमी तख्तावरच बसणार. '

' बेशक.. पण मतलब? '

' मतलब हाच हूजुर, चाॅंद आसमान सोडून धरतीवर आला तर त्याला बसायला एकच तख्त आहे पण त्याच्यावर तर हुजुर तश्रीफ ठेवून राहिले आहेत. '

' मतलब? ' सुलतान प्रश्न विचारण्यात हुशार असला तरी उत्तर समजण्यात असेलच असे नाही.

' मालिक, आपण धरतीवर असताना चाॅंदच काय पण सूरज जरी आला तरी त्याला बसायला जागा कुठे आहे? म्हणून तो बिचारा आसमानातच राहतो. '

' शाबास! तुला दहा हजार अश्रफिया इनाम! काय नाव तुझे? '

' माझं नाव म्हमद्या! '

' तू रोजगार कोणता करतोस? '

' मी नवाब हारजंग तलवारजंग बहाद्दरांचा मोतद्दार आहे सरकार. '

' तुझा मालिक कुठे आहे? '

' बंदा हाजीर आहे खुदावंत ' नवाबसाहेब पुढे येऊन म्हणत.

' तू इथे कशासाठी हाजिर आहेस? '

' वझीर होण्यासाठी, हाजिर सो वजीर सरकार '

' खामोष! असला अफलातून दिमाग असलेल्या फनकार जवानाला घोड्याला खरारा करायला ठेवणारा बुद्धु कहीं का. बोल तुझा गुनाह कबुल? '

' कबुल खुदावंत '

' जलदी कबुल झालास म्हणून वाचलास. नवाब हारजंग आजपासून तुझं नाव
म्हमद्या ठेवलं आहे आणि म्हमद्या तुला नवाब हारजंग तलवारजंग बहाद्दरांचा किताब आणि जहागिरी देण्यात येऊन सलतनितीची वझीरी देण्यात आली आहे. दरबार बरखास्त! '

- पु.ल. देशपांडे
लोकशाही : एक सखोल चिंतन
खिल्ली

Wednesday, December 22, 2021

पुलंची मजेशीर पत्रे - ५

मं. वि. राजाध्यक्षांची कन्या मुक्ता एम.ए.ला. इंग्रजी हा विषय घेऊन पहिल्या वर्गात पास झाली. तिचं अभिनंदन करताना पुलंनी आपलं इंग्रजी फार गचाळ आहे असं सुचवीत अशा इंग्रजीची सुंदर नक्कल केली आहे.

My Dear Mukta

I was foning you for the last half hour to congratulate you on my behalf and on be/2 of my better/2 also, but no connexion yaar. So I said maro goli to this telephone and write letter. Fuss class in M. A. is no joke yaar. I never got it. To tell you privately, all bundle professors yaar, except your Bhai who is responsible for my great English... Offcourse I cannot write high English like you... High English has been a big stone in my way. Big stone means 'dhond'. Not capital 'D'. Capital 'D'-wallah Dhond* is your neighbour. Give my regards to him. For further details about dhond- not capital- kindly refer to your Bhai...

* राजाध्यक्ष यांच्या 'साहित्य सहवासा'त राहणारे प्राध्यापक म. वा. धोंड.


सोनल पवार 
संदर्भ: अमृतसिद्धी

पुलंची मजेशीर पत्रे - ४

श्री गणेशशास्त्री जोशी यांनी अमेरिकेचं वर्णन करणारं एक पत्र पुलंना संस्कृतमध्ये लिहून पाठवलं होतं. त्याला पुलंचं उत्तर घ्या संस्कृत तर संस्कृत. 'इरेस पडलो जर बच्चमजी !' पण ह्या पत्रातलं संस्कृत तसं ठाकठीक आहे हे लक्षात ठेवायला हवं. (शास्त्रीबुवांनीच पुढं याची प्रशस्ती केली.) त्यातला काही भाग.

पुण्यपत्तनम् ४
एप्रिल ६, १९७४

स्वस्ति श्रीगणेशशर्मा जोशीमहोदयेषु गीर्वाणभाषापण्डितवरेषु, अतिविनम्रतया पादाभिवन्दनं कृत्वा संस्कृतभाषायामेव पत्रोत्तरलेखनचेष्टां करिष्यामि । जानाम्येतन्महाधाष्टम् । आङ्ग्लभाषाधारेणाभवन्मम संस्कृतभाषाध्ययनम् । यत्र 'रम्भोरु'- 'द बनाना ट्री-थाइड् वन्' भूता लुट् टु वॅलो वा । गीर्वाणभाषादेवता ममेदृक्शारूकं चेष्टितं दृष्ट्वा मां ममैवं पुरातनेन पादत्राणेन ताडयिष्यति ।...

'आपले सुंदर पत्र मी पुनःपुन्हा वाचले, मित्रांनाही वाचून दाखवलें' असं गणेशशास्त्रींना सांगून विनयानं पुल पुढं लिहितात :

किन्तु मम पत्रोत्तरपठनमीदृशं भवता कथमपि न करणीयं, देवभाषाभिमानधारकाः पण्डिताः शम्बूकं स्मृत्वा मम शिरश्छेदं कर्तुमुद्युक्ता भविष्यन्ति ।...

आशीर्वचनाकांक्षी,
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपाण्डे


सोनल पवार 
संदर्भ :अमृतसिद्धी
a