Leave a message
Showing posts with label बटाट्य़ाची चाळ. Show all posts
Showing posts with label बटाट्य़ाची चाळ. Show all posts

Monday, January 10, 2022

राघुनानांची कन्येस पत्रे यातील शेवटचे तीन उतारे

उपसंहार :

एवंगुणविशिष्ट, श्री. राघूनाना सोमण यांच्या कन्येस पाच पत्रेरूपी मधू वाचकरूपी वाङ्मयमधुकारांपुढे लेखरूपी द्रोणातून सादर करीत आहो. यापुढे नानांनी बरेच दिवस पत्रे लिहिली नाहीत. याचे कारण पुसता, त्यांनी 'गोदीचे नानांस उत्तर' काढून आमच्या हाती दिले. आजवर 'कन्येस पत्र' सर्वांनी प्रसिद्ध केली आहेत. परंतु कन्येचे पित्यास पत्र आम्ही प्रथम प्रकाशित करत आहो. राघूनानांची ही कन्या महाराष्ट्रातली आद्य पत्रलेखिका ठरावी.

चि. गोदीचे ती. नानांस उत्तर१२ :

ती. नाना यांस त्रीकालचरणी मस्तक ठेऊन बालके गोदावरीचा शीर सास्टांग नमस्कार विनंती विशेष. तुमची मोठ्ठीमोठ्ठी पत्रे पोचली. एवढी मोठी पत्रे का पाठवतां असें आईने विचारले आहे. पोस्टाची तिकिटे आपल्याला काही फुकट मिळत नाहीत म्हणावे. आणि खुशाली कळवण्यास काय होते. तुमचे लक्षण लहानपणापासून आसेच, आसे आजी म्हणाली व एकदा हातींपायी धड सुकरूप येवूं दे म्हणाली. गंधाची बाटली व आईने बुंदी पाडायचा लहानसा बेताचाच आणा म्हणावं झारा आणावयास सांगितले आहे.

तुमची पत्रे वाचावयास वेळ लागतो. तुम्ही आल्यावर वाचून दाखवा. आम्ही सर्व खुशाल आहो. दुसऱ्या मजल्यावरच्या भीमामावशी जिन्यावरून पडल्या व त्यामुळे कठडा मोडला आहे. म्हणून दुसऱ्या मजल्यावरच्या भीमामावशींच्या एजमानांचे व चाळीच्या भय्याचे भांडण झाले. आई सौ. लिही मागे व आजी गं. भा. लिहायचं खुशाल आहेत. हे पत्र मी लीहलं आणि मधूनमधून आई सांगत होती. तरी गंधाची बाटली व रिबिनी वीसरू नये.

तुमची अध्याकारक
गोदी कु.

हे पत्र श्री. सोमणांनी हताशपणे आमच्यापुढे फेकले. ह्या हताशपणाचे कारण आम्हांला कळले नाही. त्यांचा हा अकारण आलेला हताशपणा, हे औदासिन्य जावे आणि दुरिताचे तिमिर जाऊन पत्ररूपी सूर्याने प्रकाशावे अशी इच्छा व्यक्त करून हे संपवतो.

रसिकांचा पादरविन्द
म. म. अणणुराव शेषराव मोगलगिद्दीकर
पत्रेतिहासमंडळ, हलकर्णी (मु. व पो.)


पुस्तक - बटाट्याची चाळ 
लेखक - पु.ल. देशपांडे 

Monday, October 18, 2021

समेळकाकांची मुलगी रतन समेळ हिच्या वासरीतील (डायरी) काही पाने..

समेळकाकांची मुलगी रतन समेळ हिच्या वासरीतील (डायरी) पाने फारच रम्य आहे. तिच्यातली काही पाने एकही अक्षर कानामात्रेसह न बदलता देत आहोत.

१ जानेवारी : "जगात शुद्ध प्रीतीला स्तान नाही हे चाळींतले सुप्रसीद्द काद्रंबरीकार माळसाकात पोंबुरपेकर यांचे मत मला अगदी पटलें. - मधूजवळ मी आज दूपारीं जीन्याखाली बोलत असतांना त्यांच्या बाबांनी पायलें आणि त्याच्यावर ते रागावले. - खरं म्हणजे माजं त्याच्यावर व त्याचं माज्यावर शूद्द प्रेम आहे. -मधूचें मन हळूवार आहे. त्याची मत्वाकांक्षा एक अभिनयपटू सीनेमांतील हीरो व्हायची आहे. मलाहि चाळींत सर्वजण नरगीस म्हणतात. मधू डायरेक्टर होऊन मला हीराइनचीं कामें देणार आहे. फील्म लाइनमदी त्यांचे कीतीतरी दोस्त आहेत. मधू गाणं कीती छान बोलतो. तो मूजिक डायरेक्टरसुद्धा होईल. चाळीतल्या गणेशोत्सवांत आमच्या 'राणी चंपावती' नाटकांत त्याने किती छान मूजिक डायरेक्शन केलें होतें. पण जगाला कलावंताची पारक नाही. मधू म्हणतो की सर्वच कलावंताना हालपेष्टाच काढाव्या लागतात..."

८ जानेवारी : "काशीनाथ नाडकर्ण्याचा मूलगा दूष्ट आहे. त्यानेच बहुतेक बाबांना नीनावी पत्र लीहीलं असेल. मधूने मला जिन्यांत प्रेमपत्र दीलें. कीति छान आहे. मधू कवीता पण काय लीहतो! - तुझी माझी प्रीत - चंद्राची आणि चांदणीची... अय्या - मधू चंद्र आणि मी चांदणी ही कल्लपना कीती सुंदर आहे..."

२ मार्च : "मधू फार वाईट आहे. चौबळांच्या कुमुदला घेऊन तो सीनेमाला गेला होता असें काशीनाथ नाडकर्ण्याच्या मुलाने मला सांगितलें. - काशीनाथ नाडकर्ण्याच्या मुलाने मला 'जादुई नग्री' चा फुकट पास दिला. पण उद्यापासून परिक्षा आहे. - मला परिक्षेला बसायला आवडत नाही. देवाने परिक्षा नीर्माण का केल्या? वाळिंबेबाई दूष्ट आहेत. वर्गात 'आता बापाला सांगा उजवायला' असं मला म्हणायला लाज वाटत नाही? - तरी बरं, केस पीकले तरी लग्नाचा पत्ता नाही स्वतःच्या..." 

१० नवेंबर : "पुढल्या महिन्यांत पिक्चरचं शूटिंग सुरु होणार. तोपर्यंत मधू एक नाटक कंपनी काढणार आहे. सुरुवातीला नाटकांत काम केलं की सीनेमात काम करणं अगदी सोप्पं. नाटकांत मात्र मला हीराईनचं काम आहे.."     

२४ नवेंबर: "मी आणि मधू लालबागला गेली. तिथे नटवर्य माष्टर सावळाराम मिठबावकर ह्यांच्या सांतेरीप्रसादसुबोनाट्यमंडळाच्या नव्या नाटकाचा मुहूर्त झाला. नाटकाचं नांव  'हातांत हात' असं आहे. मधुने माझी ओळख आपली मीसेस अशी करून दिली. मला खूप लाज वाटली. मधू मिस्चिफ आहे. पण असं सांगावं लागतं असं मधू म्हणाला, म्हणून मी रागावली नाही. कलेसाठी प्राण दिले पाहिजेत असं मधू म्हणतो..." ;

१ डीसेंबर : "काशीनाथ नाडकर्ण्याच्या मुलग्याने बाबांना मला लालबागला पाह्यली हे सांगितलं. मी शाळेत गेली होती म्हणून सांगितलं. दुपारी बाबा शाळेत गेले. मी सबंध वर्षात शाळेंत गेलीच नाही, असं वाळींबेबाईंनी बाबांना सांगितलं. म्हणून रात्री बाबांनी आणि आईनी मला उपाशी टाकून स्वैपाकघरांत कोंडलं. मी सगळीजण झोपल्यावर दुध पिली. असल्या लोकाशी असच वागलं पायजे. बाबांच्या गजकर्ण फार्मशीच्या मलमाच्या बरण्या सैपाकघरात होत्या. त्यांत मिर्चीची पूड कालवून ठेवली आहे..."

काही वासऱ्या 
बटाटयाची चाळ 
पु. ल. देशपांडे 

Tuesday, July 27, 2021

पु.ल. भेटतच राहतात.. -- निखिल असवडेकर

ब्लॉगसाठी हा लेख लिहायला सुरवात तर केली पण बटाट्याच्या चाळीतल्या सोकाजीनाना त्रिलोकेकरांप्रमाणे ‘सुरवातीची beginning’ मराठीतून करावी का इंग्रजीतून असा प्रश्न पडला आणि PuLa has always been अशी सुरवात होऊन गाडी शेवटी मराठीकडे वळली.. मराठी साहित्याला ज्या व्यक्तीने अढळ स्थान प्राप्त करून दिलंय त्या व्यक्तीवर मराठीतूनच लिहूया असा विचार केला.

आज पुलंसंबंधी लिहायचं विशेष कारण काय असा प्रश्न साहजिकच मनात येईल पण फक्त जन्मदिन आणि स्मृतीदिवस यापलीकडे हा माणूस आपलं आयुष्य व्यापून राहिलाय याची गेले काही वर्ष सदैव जाणीव होती आणि आणि या जाणिवेतूनच पुढे हा विषय..

मला तर गेल्या २-३ वर्षातून एकही दिवस असा आठवत नाही ज्यादिवशी पुलंची भेट झालेली नाही.. कितीही गडबडीचा किंवा कटकटीचा दिनक्रम असो.. पु.ल. रोज येतातच.. भले अगदी ५-१० मिनिटं का असेना! आपल्या दैनंदिन जीवनात भेटणारी माणसं, आजूबाजूला घडणाऱ्या घटना यांचा जरा बारकाईने विचार केला तर “अरे, पुलंनी लिहिलेलं साहित्य आपण प्रत्यक्ष जगतोय कि काय?” असा विचार मनात येतो.

आपण सर्वजण विद्यार्थी’दशे’त नक्कीच कोणातरी ‘सखाराम गटणे’ ला भेटलो असूच.. त्याचप्रमाणे आपणही कोणत्यातरी इयत्तेत ‘दामले’ मास्तरांप्रमाणे अनिष्ट होऊन राशीला बसणाऱ्या ‘गुरूं’चा त्रास सोसला असणारच! गणपतीत आरती करताना ‘भक्तसंकटी नाना….’ म्हणताना आवाज लावणारा कुणी असला कि हरितात्यांची आठवण झालीच म्हणून समजा. मधे एकदा डाॅमिनोज् च्या पिझ्झाबाॅयकडे आधी 20$ ची नोट घेऊन जाणारा, त्याच्याकडे सुटे नाहीत हे कळल्यावर मग आम्हा सर्वांकडून 3$ सुटे जमा करून मग 20$ गेले कुठे शोधणारा एक मित्र जेव्हा पहिला तेव्हा तर खुद्द ‘बाबुकाका खरे’ पहिल्याचा साक्षात्कार झाला. साखरपुडा-लग्न अशा सोशल समारंभांमध्ये पुढे पुढे करणारे ‘नारायण’ही सर्वत्र दिसतात.. पुणेरी स्वाभिमान असो, नागपुरी खाक्या असो किंवा मुंबईची ‘आङ्ग्लोद्भव मराठी’.. “I am going out बरं का रे Macmillan!!” म्हणणाऱ्या देशपांडे श्वानसम्राज्ञीही आता मुंबईच्या ‘टाॅवर संस्कृती’त नवीन नाहीत. एकदा इथे कंपनीत काम करताना मला ऑफिस मधल्या एका मित्राने त्याला नुकतीच सुचलेली इंग्रजी कविता वाचून दाखवली. तेव्हा इथे सातासमुद्रापार ‘हापिसच्या वेळेत आणि हापिसच्या कागदावर’ साहित्य रचणारा नानू सरंजामे (गोऱ्या कातडीचा) आठवला बघा! पुलंच्या नजरेने हेरलेले हे बारकावे केवढे अचूक होते हे जसजशी आपली भटकंती वाढते आणि आजूबाजूचं मित्रमंडळ विस्तारतं तेव्हा समजायला लागतं. ‘म्हैस’ मधील मांडवकर,बगूनाना, झंप्या, बुशकोटवाले डॉक्टर, उस्मानाशेठ, पंचनाम्यासाठी आलेला ऑर्डरली त्याचप्रमाणे ‘मी आणि माझा शत्रुपक्ष’ मधील कुलकर्णी, जुने फोटो दाखवून पुलंचा वेळ कुरतडणारे ते दाम्पत्य.. सर्व पात्रे पुलंनी अप्रतिम चितारली आहेत. सतत कोकणच्या प्रगतीचा पाढा वाचणारे काशिनाथ नाडकर्णी असोत अथवा किंवा अतिमवाळ स्वभावाचे कोचरेकर गुरुजी.. या सर्वांना आपण कोणत्या ना कोणत्या प्रसंगी अजूनही भेटतच असतो.

पुलंची साहित्यिक पात्रं (शाब्दिक आणि लाक्षणिक दोन्ही अर्थानी) आपल्या आयुष्यात कधी ना कधी डोकावून गेलेली आहेत. “काय हो.. हि सगळी मंडळी खरंच जिवंत होऊन तुम्हाला भेटायला आली तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल?” असं कुणीतरी पुलंना विचारलं होतं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं – “मी त्यांना कडकडून मिठी मारेन!”. मानवी व्यक्तिरेखा ह्या काल्पनिक असल्या, तरी त्यांचे स्वभाव हे काल्पनिक नसतात.. कदाचित त्यामुळेच ह्या व्यक्तिरेखांचा भास आपल्याला अवतीभवती होत असतो. त्या पात्रांनी कधी आपल्याला हसवलंय, रडवलंय आणि आपल्या प्रतिभेने स्तीमितही केलंय. “अहो आठ आणे खाल्ले कि चौकटीचा मुकुट घालून रत्नागिरीच्या डिस्त्रीक्ट जेलात घालतात आणि लाख खाल्ले कि गांधीटोपी घालून पाठवतात असेम्बलीत.. लोकनियुक्त प्रतिनिधी!!”, “अर्रे दुष्काळ इथे पडला तर भाषणं कसली देतोस??.. तांदूळ दे! तुम्ही आपले खुळे! आले नेहरू, चालले बघावयास!!” पु.ल. आपल्याच मनातला राग व्यक्त करतायत असं वाटत. “कोकणातल्या फणसासारखी तिथली माणसं.. खूप पिकल्याखेरीज गोडवा येत नाही त्यांच्यात” हि आपल्या मनातली सुप्त भावना.. पण पुलंनी शब्दांमध्ये केवढी छान रंगवलीये. सामान्य माणसाच्या आयुष्यात येणारे सामान्य प्रसंग असामान्य पद्धतीने रंगवणं यातंच ते. बाजी मारतात. सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या विनोदाला कधीही तत्कालीन प्रसिद्ध कलाकारांची किंवा पेज-3 पुरस्कृत धुरिणांची गरज भासली नाही आणि त्यांनी अख्ख्या मराठी समाजाला वेड लावलं. पुलंची हि धुंदी कधीही उतरणारी नाही.

पुलंचं आयुष्यात अजूनही असणं हेच आपलं जीवन सुखकर बनवतं. म्हणजे आपण आनंदी असलो कि पु.ल. हसवतात पण जेव्हा कधी दु:खी, निराश असू तेव्हा आयुष्याचं तत्वज्ञान आपल्याला सांगून जातात.. “ज्या दिवशी जन्माला येणं जस्टीफाएबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात.” पुलंनी त्यांचे मित्र चंदू ठाकूर यांना लिहिलेल्या सांत्वनपर आणि प्रेरणादायक पत्रातील हे काही शब्द.. आपली विचार करण्याची किंवा आपल्या कल्पनेची, सामर्थ्याची रेघा किती सीमित आहेत याची जाणीव करून देतात. ‘हसविण्याचा माझा धंदा’ याप्रमाणेच या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक म्हणूनही आपली मोठी जबाबदारी आहे याची पुलंना नितांत जाणीव होती हे यावरून लक्षात येईल. चित्रपट-मालिका- नाटकांमधून राजे महाराजे, स्वातंत्र्यसेनानी साकारत सिंहगर्जना करणारे आपल्या पिढीतले कलाकार जेव्हा राजकीय सभा-समारंभांमध्ये कोणा स्वयंघोषित पक्षप्रमुखांच्या उगाच पुढे-मागे करत त्यांच्या ताटाखालचं मांजर झालेलं आपण पाहतो तेव्हा नक्कीच त्या प्रकारची कीव येते अन मन विषण्ण होतं. आपल्या प्रतिभेला समाजमान्यता हवी यासाठी खरंच अशा थोतांडाची गरज आहे का असा विचार साहजिकच मनात येतो. मात्र कोणत्याही संकुचित राजकीय वा जातीय-सामाजिक चक्रव्यूहात पुलंची प्रतिभा फसली नाही की लोकप्रियतेच्या लाटेत वहावत जाऊन त्यांची साहित्यसंपदा कधी भरकटली नाही . तो त्यांचा पिंडच नव्हता. अलौकिक प्रतिभामंथनातून जोपासले गेलेले विचार आणि भावना त्यांनी वेगवेगळया वेळी, वेगवेगळया प्रासंगिक निमित्तांनी आपल्या लेखांत-भाषणांत-नाटकांत सुयोग्य चेहऱ्यांचा त्यावर मुखवटा लावून, आपल्या स्वाभाविक, सहज व अतिशय बोलक्या भाषेत कथन केल्या. पुलंचा एक ‘डाय हार्ड’ फॅन आणि त्यातही एक पार्लेकर असूनही त्यांना प्रत्यक्षात कधी न भेटता आल्याची खंत कायमच सतावत राहील पण ह्या निरनिराळ्या अवतारांनी ते मला अजूनही भेटतच राहतात.. रोजंच!!

– निखिल असवडेकर

(वरील लेखात अधे-मधे आलेले इंग्रजी शब्द ‘अव्हाॅईड’ करण्याचा प्रयत्न चुकूनही केला नाही.. शेवटी मी पडलो पक्का ‘मुंबईकर’!! )

मूळ स्रोत -- > https://nikhilasawadekar.wordpress.com

Thursday, December 5, 2019

साहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी - (डॉ रमा खटावकर)

भाईंचंच एक वाक्य आहे, 'पंढरीच्या पांडुरंगापेक्षा त्याला उराउरी भेटणारा वारकरीच मला जास्त भावतो.' भाईंच्या चाहत्यांबाबतही मला बऱ्याच वेळा हाच अनुभव येतो.

भाईंचे चाहते जगभर पसरले आहेत, त्यांच्या पुस्तकांची पारायणे होत असतात. त्यांच्या लेखनातील उतारेच्या उतारे तोंडपाठ असणारीही बरीच मंडळी आहेत. पण माझ्या पहाण्यातले काहीजण खरंच अवलिये आहेत. पुलप्रेम, म्हणजे किती मर्यादेपर्यंत जाऊ शकतं, हे त्यांच्याकडे पाहून कळतं. अशाच एका पुलप्रेमी वारकऱ्याची भेट करून द्यायचा आज विचार आहे.

निमित्त झाले आमच्या भिलार भेटीचे. अशिया खंडातील पहिले ' पुस्तकांचे गाव' म्हणून प्रसिद्ध असलेले, पाचगणी महाबळेश्वर सारख्या निसर्गरम्य परिसरात वसलेले हे छोटंसं गाव. अमाप कुतूहल मनात घेऊन या गावात आम्ही भटकत आहोत. कादंबरी, ऐतिहासिक, बालवाङ्मय, अशी एकेक घरे पहात पहात एका घरासमोर पावले थबकतात. ' विनोदी ' अशी पाटी या घरावर आहे. घरमालक श्री. संतोष सावंत. घराच्या एका खोलीत विनोदाला वाहिलेली खोलीभरून पुस्तके वाचकांसाठी सज्ज आहेत, आणि या विषयाचे सम्राट आपले पुल, असं सांगणारी एक गोष्ट इथे नजरेत भरत आहे. त्याविषयीच मला बोलायचं आहे.

घराबाहेरच्या भिंती, कट्टे विनोदी लेखकांच्या .अर्कचित्रांनी (कॅरीकेचर्स) सजलेल्या आहेत. (अत्र्यांच्या लेखणीचा काटेरी दंडुका झालाय, मधु मंगेश कर्णिक माशाचा आधार घेऊन उभे आहेत, इ. इ.) असं सगळं पहात पहात आपण पुढे जातो भिंतीकडे लक्ष जाताच नजर खिळून रहाते. भिंत भरून आकाराचं भाईंचं एक सुरेख अर्कचित्र आपल्याकडे पाहून मिश्किल हसत असतं. त्यांचे ते सुप्रसिद्ध, पुढे आलेले दोन दात पुस्तकाच्या बांधणीने शिवलेले दिसतात. चष्मा आणि पुस्तकासकट चमकणारे डोळे, पुस्तकावरची फूल, देश, पान, डे, ही गंमत, आणि हे सगळं टवटवीत. गुलाबी कमळाच्या आकारात. हे सगळं गमतीजमतीने निरखत असताना नजर जाते, ती चित्राच्या उजवीकडे असलेल्या साक्षात् भाईंच्या लफ्फेदार सहीवर.

आश्चर्याने डोळे विस्फारतात. पुलंची सही? इथे? या भिंतीवर? चित्रावर ? कशी ?

आता चौकशी करणं आलंच. मग आपण सामोरे जातो, ते या घरातल्या गृहलक्ष्मीच्या प्रसन्न स्वागताला.

हसऱ्या चेहऱ्याने, उत्साहाने सौ. शिल्पा सावंत सगळी माहिती सांगत असतात. भाईंच्या या अर्कचित्राचे, आणि इथल्या सगळ्याच चित्रांचे चित्रकार श्री. विजयराज बोधनकर. मूळ कागदावरचे चित्रही त्यांच्याच हातचे आहे.

४ मे २०१७ रोजी भिलार गावाचे उद्घाटन जेव्हा औपचारिक रित्या ' पुस्तकांचे गाव ' म्हणून झाले, त्यापूर्वी तीन दिवस एक बस करून बरेच चित्रकार इथे आले. त्यावेळी श्री. बोधनकर यांनी हा विनोद विभाग सजवला. भिंत भरून असलेले हे पुलंचे कॅरीकेचर, त्याखाली असलेल्या लांबलचक सुबक लाल लाल पायऱ्या, हा सगळा परिसर हा भिलारचा सेल्फी पॉईंट बनलाय. येणारा प्रत्येक जण भाईंसोबत इथे सेल्फी घेतोच. (आम्हीही अर्थातच याला अपवाद ठरलो नाही.)

आणखी काही महिन्यांनी शिल्पाताईंकडे रहाण्याचा योग आला. अविस्मरणीय असे अगत्य, आपुलकी, रुचकर अल्पोपहार, नेमक्या वेळी मिळालेला वाफाळता चहा, या सगळ्या पाहुणचाराबरोबर एक गोष्ट मनाला भिडली. आमच्यासाठी त्यांनी दिवसभर आणि रात्रभर पुस्तकांची खोली उघडी ठेवली होती. कुणाच्याही देखरेखीशिवाय. हा विश्वास एक रसिकच दुसऱ्या पुस्तकप्रेमीबद्दल दाखवू शकतो.

शिल्पाताईंकडून चित्रकार, साहित्यिक श्री. विजयराज बोधनकर यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्यांचा संपर्कक्रमांक मिळाला. पुलंच्या चित्राबद्दल, आणि विशेषतः त्या सहीबद्दल खूप उत्सुकता मनात होती. त्यांना फोन लावल्यावर दिलखुलास अशी त्यांची एक मुलाखतच हाती आली.

भिलार आणि भाईंचे कॅरीकेचर हा विषय निघाल्यावर चित्रकार भरभरून बोलू लागले. प्रत्त्येक पुलप्रेमी आपल्या लाडक्या दैवताचा विषय निघाल्यावर असाच खुलून येतो.

चित्राला आणि सहीला तर इतिहास आहेच, पण त्याचे निर्माते कलाकार श्री. विजयराज बोधनकर यांचा इतिहासही रोचक आहे.

भरपूर समृद्धी असूनही यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी घर सोडलं. घरात सात पिढ्यांची चित्रकारीची परंपरा, परंतू साचलेपणामुळे वाढ नाही, म्हणून हा साचलेपणा मोडून कलेची जोपासना करण्यासाठी मुंबईला आले. त्यानंतर जवळजवळ ३९ वर्षे वडिलांचा एकही पैसा न घेता प्रवास चालू आहे. यात शिक्षण, पदवी, विवाह, घर, सगळे आले.

पुस्तक विचार देऊ शकतं, पुस्तकांमुळे आयुष्याला दिशा मिळू शकते हा त्यांचा अनुभव आहे. सोशल मिडियाच्या आहारी गेलेल्या आजच्या पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे, या तळमळीतून साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील सुमारे ९० व्यक्तींची अर्कचित्रे त्यांच्या कुंचल्यातून साकारत गेली. यांची प्रदर्शने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरघोस प्रतिसादात होऊ लागली. कुठलाही मोबदला न घेता.

या अर्कचित्रांचे नंतर एक पुस्तकही निघाले.

full Imperial size ची ही कॅरीकेचर्स आहेत. (यात बा.भ.बोरकर ढगांवर बसलेले आहेत, व्यंकटेश माडगूळकरांच्या चेहऱ्याला हरणाची शिंगं आहेत, दुर्गाबाई भागवतांच्या पेनाला आग लागलीय, तर गदिमांच्या लेखणीला पालवी फुटलीय.) ज्यांचं जे व्यक्तीचित्र, तेच अर्कचित्रात उतरलंय.

भाईंच्या या अर्कचित्राबद्दल बोलताना ते म्हणतात,

" पुलं कसे आहेत, तर कमळासारखे, गुलाबासारखे. त्यांनी दु:ख कधी जास्त उगाळलं नाही. सगळ्यांना प्रसन्न करीत राहिले, आणि त्यांचा वाचक भुंगा होऊन या कमळाभोवती गुंजारव करीत राहिला."

(चित्रात पण हा भुंगा दिसतोय बरं का.)

" आजही पुलं म्हटलं, की सगळं टेन्शन जातं. हा गेल्या तीन पिढ्यांचा अनुभव आहे. अस्सल साहित्य जुनं होत नाही. ते कालातीत आहे."
       
मुंबईत आल्यावर, वयाच्या अंदाजे १९ वर्षाच्या आसपास, कामधाम नसलेल्या अवस्थेत निरुद्देश भटकताना असंच तिकिट काढून शिवाजी मंदिरला जाऊन बसले. तिथे एक पांढऱ्या केसांचे गृहस्थ, आणि त्यांच्याच वयाच्या एक बाई अतिशय रसाळ पद्धतीने कविता वाचनाचा कार्यक्रम सादर करीत होत्या. न राहवून त्यांनी शेजाऱ्याला विचारले, की हे कोण ? शेजाऱ्याने रागावूनच पाहिले, आणि म्हटले,

" हे पु.ल.देशपांडे, आणि त्या त्यांच्या पत्नी सुनिताबाई."

हे भाईंचे झालेले पहिले दर्शन. यानंतर भाईंचे बोरकरांच्या कवितांचे सादरीकरण, एकपात्री प्रयोग,आणि असेच कार्यक्रम ते पहात गेलो. पुलंची पुस्तके एक एक करीत खरेदी करीत सुटलो, आणि ती वाचता वाचता आयुष्याची प्रचिती येत गेली." (हा त्यांचाच शब्द.)

यानंतरचा त्यांचा अनुभव ऐकण्यासारखा.

लग्नानंतर एकदा मलेरिया झाला. दुसरं काहीच करता येण्यासारखं नव्हतं, तेव्हा 'व्यक्ती आणि वल्ली', आणि 'बटाट्याची चाळ' ही दोनच पुस्तकं आलटून पालटून सतत वाचत राहिले. इतकं, की ते मेंदूत केमिकल लोचा म्हणतात, तसं झालं. नारायण, हरी तात्या, अंतू बर्वा, नामू परीट, ही माणसं प्रत्यक्षात दिसायला लागली. मग त्यांची अर्कचित्रे काढली. ती काढता काढता भाईंचीही बरीच चित्रे काढली. भिलारच्या भिंतीवरचं चित्रं त्यातलंच.

आता या चित्रावरच्या सहीचा किस्सा.

या चित्रांवर भाईंच्या सह्या घ्याव्यात, ही खूप इच्छा होती. तसा योग जुळूनही आला.

मुंबईच्या एशियाटिक लायब्ररीमधे चित्रकार बोधनकर यांचा सत्कार होता, तिथे पुलं येणार होते. त्यावेळी बाळासाहेबांनी साहित्यिकांना बैल म्हटल्याने वातावरण गरम होते. ठाकरे- पु.ल. वाद रंगला होता. त्या सगळ्या गोंधळात कार्यक्रमाला पुलं आलेच नाहीत. सह्यांचा विषय बारगळला.

काही काळानंतर एका म्युझियममधे भाईंचे भाषण होते. त्यावेळी त्यांना माईक लावून द्यायचा, आणि तासभर त्यांच्याजवळ उभे रहायचे, असे काम बोधनकरांना मिळाले. त्यावेळी ती सगळी व्यक्तीचित्रे त्यांनी पुलंना दाखवली. त्यांनी चित्रांचे खूप कौतुकही केले. सह्या मागितल्यावर भाई सह्या करू लागले. पार्किन्सन्समुळे त्यावेळी त्यांच्या हातामध्ये कंप होता. (आपल्याला तो कंप सहीमधेही दिसतो.)

दोन चित्रांवर सह्या मिळाल्या, त्यात हे भाग्यवान चित्र होतं. थरथरत्या हाताने भाई तिसऱ्या चित्रावर सही करू लागले, त्यावेळी मात्र या त्यांच्या भक्ताने त्यांना थांबवलं. त्यांचा त्रास यांना पहावला नाही.

धन्य ते पु.ल.! हात थरथरत असूनही चाहत्याचे मन राखण्यासाठी कष्ट घेतले, आणि धन्य त्यांचा भक्त ! त्यांच्या सहीचा अनमोल ठेवा स्वत:च्या कलाकृतीवर मिळत असतानाही, केवळ त्यांचा त्रास पहावत नाही, म्हणून त्यांना थांबवले.

तर असा हा सहीचा इतिहास.

हेच अर्कचित्र पीएल् यांच्या सही सही सहीसकट भिलारच्या सावंतांच्या घरी, त्या भिंतीवर सेल्फी पॉईंट म्हणून विराजमान झाले आहे.

मुद्दाम सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे.

पुलंची सही असलेले जे चित्र भिंतीवर काढले आहे, त्यावर कलाकाराने स्वत:ची सही केलेली नाही. त्यांचे नावही कुठे नाही.

न केलेल्या या सहीतून खूप काही त्यांनी सांगीतले आहे.

बोधनकरांनी काढलेल्या, भाईंची सही न लाभलेल्या बाकीच्या चित्रांचाही एक गमतीदार किस्सा त्यांनी सांगीतला.

पुलंचे बंधू श्री. रमाकांत देशपांडे, यांच्याकडे ती चित्रे दाखवायला हे घेऊन गेले. प्रथम इतर काही चित्रे दाखवली, तेव्हा 'चहा कर गं' , अशी सूचना स्वयंपाकघराकडे गेली. नंतर जशी पुलंची, आणि वल्लींची चित्रे येऊ लागली, तशी "आता कांदेपोहेच कर." अशी ती सूचना बदलली.

तर असे पुलवेडाचे हे किस्से.

मराठी साहित्याची जर पंढरी असेल, तर इथल्या पांडुरंगाचा मान निर्विवादपणे पद्मश्री पु.ल. देशपांडे यांचाच आहे.

या पांडुरंगाच्या आणखी काही अचाट अफाट वारकऱ्यांचे किस्से परत कधीतरी.

डॉ रमा खटावकर.

Tuesday, December 3, 2019

पु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा

नमस्कार मंडळी. पु लंचं हे जन्मशताब्दी वर्ष. महाराष्ट्राचे लाडके दैवत पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त माझा ‘पु. लं. आणि दि टॉवर ऑफ बटाटा’ हा लेख 'सारस्वत चैतन्य'च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. जर कां 'बटाट्याच्या चाळी' चा पुनर्विकास (Redevelopment ) झाला तर ..... हा लेख मी माझ्या वाचकांना सादर करत आहे.

पु लं च्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली आणि ‘पुल’कित विनोदाचं लेण ल्यायलेली बटाट्याची चाळ म्हणजे मराठी मना मनाचा अमोल ठेवाच म्हणावा लागेल. पु लं च्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून पु लं आणि ‘दि टॉवर ऑफ बटाटा’ चे रेखाटन करायचा प्रयत्न केला आहे. पु लं परत आले तर..

हल्लीचे दिवस चाळींचे पुनर्विकास करण्याचे दिवस आहेत. चाळीचे टॉवर संस्कृतीत होणारे संक्रमण बटाट्याच्या चाळीच्या पात्रांना धरून रेखाटन करण्याचा प्रयत्न केला आहे - ती ही पु.लं. ची माफी मागून - )



पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे - म्हणजे आपले पु लं - भाईंनी १८ वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावरून एक्झिट घेतली. परंतु त्यांच्या अमोघ साहित्याने मराठी मनामनावर अधिराज्य केले. असा मना मनावर राज्य करणारा अनभिषिक्त सम्राट एकमेवाव्दितीयच ! त्याच रसिकांचं प्रेम मनात घेऊन भाई २००० साली गेले खरे, परंतु त्यांच्या मनातून त्यांच्यावर प्रेम करणारे रसिक काही जाईनात !

एकदा तरी त्या रसिकांची भेट घेऊन यावं, असं पु .लं. ना मनापासून वाटू लागलं. शेवटी, चित्रगुप्तांकडे एक दिवसाच्या ‘कॅज्युअल लीव्ह’ चा अर्ज दिला, तोही घाबरतच, आणि ती रजा मंजूर झालेली पाहताच, पु. लं. च्या आनंदाला पारावार उरला नाही..... कधी एकदा पृथ्वीवर जातो आणि समस्त रसिकांना भेटतो, असं त्यांना झालं..... त्यांना त्यांचं घर, चाहते, नाट्यप्रेमी मंडळी - सारे सारे आठवू लागले आणि …. आणि त्यांच्या लेखणीतून साकारलेली अजरामर बटाट्याची चाळ ..... ते बाबूकाका, त्रिलोकेकर, अण्णा पावशे - पु. लं. ना त्यांच्या मानस पुत्रांची, बटाट्याच्या चाळीची अनिवार्य ओढ वाटू लागली. झालं …. नक्की ठरलं, यावेळी फक्त बटाट्याच्या चाळीलाच भेट द्यायची, असं त्यांनी मनाशी ठरवलं.

बटाट्याच्या चाळीचे, पूर्वीचे ते दिवस आठवत, पु. लं. बटाट्याच्या चाळीच्या गल्लीत शिरले. इतक्या वर्षांत गिरगावात बरेच बदल झालेले, त्यांच्या संवेदनशील मनाने लागलीच टिपले. पण दूरवर नजर टाकली तरी, ती भली थोरली बटाट्याची चाळ काही दृष्टीस पडेना..... गेली कुठे ? रस्ता-गल्ली चुकलो तर नाही नां ? याची पु.लं. नी खातरजमा करून घेतली. पण छे, ‘बाप आहे मी, कधी विसरेन कां ?’ असंही त्यांच्या मनात क्षणभर येऊन गेलं.

पु.ल.ची भीती खरी होती. बटाट्याच्या चाळीच्या जागी, गगनचुंबी प्रकारात मोडणारी टोलेजंग इमारत उभी होती. त्या इमारतीचे मजले मोजायचा पुलंना मोह झाला ! मान दुखेल की काय, या विचारांनी त्यांनी तो विचार दूर सारला. उगीचच, त्यांना श्यामच्या डोक्यावरून खाली पडलेल्या टोपीची आठवण झाली ! तेवढयात, त्यांचे लक्ष इमारतीच्या पाटीवर गेले. ‘दि टॉवर ऑफ बटाटा’ ! बटाटा नावापाशी ते काहीसे घुटमळले आणि गेट मधून आत जाऊ लागले. लागलीच वॉचमनने त्यांना हटकले, ‘किधर जाने का है ?’ असा प्रश्न भाईंना नवा होता. बटाट्याच्या चाळीत शिरायला काय, किंवा कुणाच्या घरात शिरायला काय - कधी कोणाच्या xxxची परवानगी घ्यावी लागत नसायची !

“इधर वो चाल … वो लंबाचौडा चाल था … वो किधर गया ?” पु.लं.नी तरी मनातली शंका विचारून घेतलीच.

तो उत्तर भाषिक वॉचमन बुचकळ्यात पडला. तरी, भाईंना समजावत म्हणाला, “नही, यहां कोई चालवा नही है. तुम का गलत फैमी हुई गवा, हम सात साल से इधर नौकरी कर रहा हूं “

भाईंचा चेहरा गोंधळला. आपण या चाळीचे जनक ....... चाळ जमीनदोस्त झाली की काय ?, या विचारानेही त्यांच्या पोटात कालवाकालव झाली. मग आपल्या मानसपुत्रांचं काय ? ते त्रिलोकेकर शेट, बाबूकाका, अण्णा पावशे ........ तरी भाईंना काही शांत बसवेना...... “इधर वो त्रिलोकेकर शेट रहते थे...... वो बाबूकाका ...... या तो वो अण्णा ....... अण्णा पावशे ?” भाईंनी एकेकांची नाव घ्यायला सुरुवात केली ...... वॉचमन तर काही ऐकायला तयार नव्हता. तो ही आपल्या भाषेत मोठमोठ्याने बडबडू लागला.

गेटवर काही बाचाबाची झालेली पाहून, तीन-चार पेन्शनर मंडळी तिथे जमा झाली. पैकी एकाने डोळ्यांवरचा चष्मा वर-खाली केला, गळ्यातल्या मफलरने नीट पुसला, पुन्हा पाहिले, “अरे ये तो साला भाई लगता है !”

बाकीची मंडळी ‘भाई’ ऐकताच पळायच्या तयारीत राहिले, तर ते “अरे भागतो कशाला रे ? तो बंदूक वाला भाई नाय..... आपला भाई..... चाल वाला भाई- पी. एल. रे - देशपांडे !”

तेव्हा कुठे त्यांचे पेन्शनर मित्र थांबले व डोळे बारीक करून ओळख पटते का ते पाहू लागले ..... भाईंना देखील आवाज ओळखीचा वाटू लागला...... त्रिलोकेकर शेट तर नव्हे नां ?, अशी शंका वाटू लागली. कारण त्यांनी रेखाटलेले त्यावेळचे त्रिलोकेकर शेट आणि आज त्यांच्या पुढ्यात उभे असलेले पात्र - यांत जमीन-अस्मानाचे अंतर होते - गळ्यात मफलर, नाकावर फॅशनेबल चश्मा, पायात ट्रॅक सूट, टी-शर्ट आणि स्पोर्ट शूज ! - असा जामानिमा होता. पण आवाज आणि बोलण्याची लकब मात्र चाळीतल्या त्रिलोकेकर शेटची होती !

“भाई, मी सोकाजी …. सोकाजी दादाजी त्रिलोकेकर - ओळखला नाय काय ?”, त्रिलोकेकर शेठनां पाहताच भाईंना प्रेमाचे भरते आले. वयोवृद्ध त्रिलोकेकर शेटनी भाईंचे पाय पकडले, त्यांना नमस्कार केला.

“अहो, असं काय करता त्रिलोकेकर शेठ ?,“ भाई काहीसे गहिवरले. “अरे, तुम्ही तर आमचा बाप !”, त्रिलोकेकर शेट.

भाईंचे डोळे विस्फारले…. “त्रिलोकेकर शेट, तुम्हाला जनक म्हणायचे आहे का ?”, भाईंनी त्यावेळीही त्रिलोकेकर शेटची चूक दुरुस्त केली.

त्रिलोकेकर शेट , “तेच नां ? बाप, फादर ..... तुमी म्हणते तो ..... जनक, एकच नां ?,” भाईंच्या चेहर्‍यावर हास्य पसरले. त्रिलोकेकर शेटनी बरोबरच्या पेन्शनर्सची ओळख करून दिली, “अरे भाई, हे लोक बघ ..... जुना बटाट्याची चाळ वाला ..... हा बाबूकाका - अरे खरे रे … हिस्ट्री वाला .......”, धोतर-सदरा, हातात काठी घेतलेले बाबू काका कान देऊन ऐकू लागले, “आं ?”

“अरे बाबूकाका, साला ते कान मंदी घालायचा मशिन तू खिशा मंदी कशाला ठेवते ? कान मंदी घाल नां !” भाईंकडे वळून म्हणाले, “अरे, आता ओल्ड झाल्यावर बाबूकाकाला कान मंदी काय पण ऐकू येत नाही.”

बाबूकाकांनी शर्ट-पँटीचे सगळे खिसे थरथरत्या हातांनी चाचपडले आणि कानांत यंत्र घातले. भाई त्यांच्या या मानस पुत्राचं वार्धक्य जवळून निरखीत होते. त्रिलोकेकर त्यांच्या कानाशी कुजबुजले, “आपला भाई हाय रे …. बटाटा चाल वाला.....”

ओळख पटताच बाबूकाकांना कोण आनंद झाला. प्रेमाचं भरतं आलं, त्यांनी भाईंना चक्क मिठीच मारली ! इतकी कडकडून मिठी मारली की, बाबूकाकांना अफजलखानाने शिवाजी महाराजांना मारलेली मिठी आठवली असावी ! “भाई, ...... इतका आनंद झाला की.......”, त्यांना शब्द फुटेना. भाईंनी त्यांच्या प्रेमळ मिठीतून कशीबशी सुटका करून घेतली !

“भाई, मी अष्टेकर - कुशाभाऊ अष्टेकर”, कुशाभाऊंनी स्वत:ची ओळख स्वतःच करून दिली. भाई बारीक डोळे करून, त्यांना न्याहाळू लागले. कुशाभाऊंमध्ये फारसा फरक पडलेला भाईंना काही जाणवला नाही. केस पिकले असावेत, पण कलप इतका बेमालूम पणे लावला होता की, कुठूनही रुपेरी छटा दृष्टीस पडत नव्हती आणि शरीराचाही फापटपसारा नव्हता. नाट्यभैरव म्हणून चाळीत कुशाभाऊ प्रसिद्ध होते. म्हणजे, त्याकाळी ते ‘स्वयंघोषित’ नाट्यभैरव होते ! गंधर्व नाट्य कंपनीत ते होते आचारी, पण रुबाब मात्र मुख्य नटाचा होता ! त्यानुसार त्यांनी स्वतःची शरीरयष्टी तशी प्रयत्नपूर्वक राखली असावी. न जाणो, कधीकाळी, नाटकात भूमिका मिळाली तर .....

कुशाभाऊ जेष्ठ नागरिकांत मोडत असले तरी, आपलं शारीरिक तारुण्य त्यांनी जपलं होतं. त्यांच्या चालण्या-बोलण्यात काहीसा चपळपणा होता. “भाई, आशीर्वाद असावा,” असं नाटकातलं वाक्य फ़ेकावं, तसं म्हणत, भाईंना त्यांनी वाकून नमस्कार केला. भाईंनाही गहिवरून आलं !

“आणि भाई, हेनला ओळखलं का ?” पुढच्या पेन्शनर कडे वळत त्रिलोकेकर शेटनी विचारले.

भाई आपल्या स्मृतीला ताण देऊ लागले. चेहऱ्यावरचे ते पूर्वीचे हसू मात्र तसेच ठेवले. बरेचदा हसून वेळ मारुन नेता येते, हे भाईंना अनुभवांने माहीत होते. त्यांच्या मनात आले, मी जनक असलो तरी, जन्मलेलं बाळ आणि बाळसं घेतलेलं बाळ, यात फरक असणारच नां ? त्यावेळची ती मध्यमवयीन व्यक्तिरेखा आणि आणि आत्ताची ही वृद्धापकाळाने थरथरणारी व्यक्ती - यांचा ताळमेळ जुळवणे भाईंनाही नक्कीच भारी होतं ! शाळेतल्या कुठल्यातरी कठीण प्रश्नाचे उत्तर गुरुजींनी विचारल्यावर, उत्तर येत नसेल तर, विद्यार्थ्याचा जसा चेहरा होतो, तसा बाईंचा झाला होता !

“अरे भाई ...... हा तर साला पावशा रे !”, त्रिलोकेकर भाईंच्या मदतीला धावून आले. म्हणजे कोडयातही तेच टाकत होते नि उत्तरही तेच देत होते ! भाईंनी स्मृतीला ताण दिला...... अण्णा पावशे ..... म्युनिसिपालिटीच्या पाणी खात्यात नोकरी ...... ज्योतिषाची आवड ......

“हां हां ....... अण्णा पावशे !”, भाईंनी त्यांना ओळखले.

अण्णा पावशे भाईंनी रेखाटलेले मध्यमवयीन गृहस्थ होते, आणि आणि आत्ताचे हे अण्णा, तोंडाचं बोळकं झालेले, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा लावलेले, कृश झालेले - आणि त्यांचा तो कृश देह सतत थरथरत होता......

“भाई, बघ रे , या पावशाचा काय झाला...... साला पार्किन्सन झाला ...... ओल्ड एज लई बॅड रे ..... लई बॅड..... सारखा थरथरतो ....... थरथरतो ! हात पाय थरथरतो. आमी लोक तेला सांभाळतो. जुना नेबर नां चालवाला ?, “

भाई आपल्या मानसपुत्राची ही अवस्था विषण्णपणे पहात होते.

“भाई,” म्हणत अण्णा पावशांनी भाईंवर स्वतःला झोकून दिले. भाईंना त्यांचा अचानक आलेला भार सोसवेना, त्यांचा तोल जाऊ लागला ..... बाकीची मंडळी त्यांना सावरायचा प्रयत्न करू लागली. त्यांचीही ही ताकद यथातथाच होती. पण प्रसंगावधान राखून ‘द टॉवर ऑफ बटाटा’ चा वॉचमन पुढे आला आणि त्याने ‘टेकू’ दिला ! त्यामुळे भाई आणि अण्णा जमिनीवर लोटांगण घेण्यापासून वाचले !

अजून किती म्हातार्‍यांना आपल्याला ‘टेकू’ द्यावा लागेल या विचाराने बहुदा, “अरे, आप लोग वो बेंच पे बैठो नां ? “ वॉचमन सूचना केली आणि ती सगळ्यांना पटली.

“हां हां … यू आर राईट,” म्हणत त्रिलोकेकर भाईंकडे वळले आणि म्हणाले, “चला भाई, तिकडे बेंच हाय ..... तेच्यावर बसू...... “, सगळी चमू ‘द टॉवर ऑफ बटाटा’ च्या बाकड्यावर जाऊन विसावली आणि शिळोप्याच्या निवांत गप्पांना रंग चढला !

“अरे, आपली चाळ कुठे गेली ?,” भाईंच्या मनात दुःख खदखदत होतं.

“चाळ पाडली,” अण्णा पावशे थरथरते हात हवेत उडवून ताडकन बोलले.

“चाळ ही वास्तू इतिहास जमा झाली,” बाबूकाकांमधील इतिहासाचार्य मधूनच डोके वर काढत होता.

“सात वरस झाली ...... सेवेन इयर्स ..... “, त्रिलोकेकर उंच टॉवर कडे बघत बोलले .

“म्हणजे आपली बटाट्याची चाळ मालकाने - तिवारीने विकली,” कुशाभाऊंना मध्येच थांबवत बाबूकाका म्हणाले,

“त्या चाळीचा मूळ मालक धुळा नामा बटाटे - क्रॉफर्ड मार्केटचा टोपल्याचा व्यापारी,” प्रत्येक वेळी इतिहासाचे दाखले देण्याची बाबूकाकांची सवय आजमितीही कायम होती, हे भाईंनी हेरले.

“तर, नंतरचा मालक - तिवारीने ती एका बिल्डरला विकली आणि या चाळीचे रि-डेव्हलपमेंट झाले,” कुशाभाऊ वर्तमानात होते, “आणि आणि हा ‘टॉवर ऑफ बटाटा’ त्या जागेवर उभा राहिला नां !”

“ते चाल.....डिमॉलिश केला नां ..... तेव्हा काय दुःख झाला रे ...... मी आणि बाबलीबाय - माय वाईफ रडला रे रडला,” त्रिलोकेकरांचा आवाज कातरला.

भाईंच्याही पोटात गलबललं. त्यांच्या डोळ्यासमोरून चाळ जमीनदोस्त होतानांची काल्पनिक दृष्य चलचित्रपटासारखी सरकू लागली. ...... चाळ उभारतानां ....... चाळीची निर्मिती करतानां, भाईंच्या लेखणीने अमाप कर्तृत्व दाखवले होते ! विनोद- हशांनी त्यावर इमले चढवले होते !

“अरे भाई, आमचा होल लाइफ त्या खोलीमंदी गेला नां !” त्रिलोकेकर त्याच दुःखात होते.

“भाई, आमच्या पण पोटात कालवाकालव झाली ..... कोकणातून येऊन इथेच - चाळीत राहिलो नां - चुलत्याच्या बिऱ्हाडांत ! चाळीशी एक प्रकारची जवळीक होती !”, अण्णा पावशे सुद्धा जुन्या स्मृतींमध्ये गेले.

“हया टोलेजंग - उंच इमारतीत चाळीचे रूपांतर झाले,” कुशाभाऊ भाईंना सगळी माहिती देत होते, “प्रत्येकाला एकेक खोली आधी चाळीत होती. आता प्रत्येकाला ७५० स्क्वेअर फूटचा ब्लॉक मिळाला !”

“हो का ?” भाई चकित झाले. आपल्या बटाट्याच्या चाळीची भविष्यकाळात अशी काही उन्नती होईल, अशी त्यांना निर्मितीच्या वेळी कल्पनाही नव्हती !

“एका खोलीत सात-आठ माणसं गुण्यागोविंदाने राहायचो, त्यावेळी !” अण्णा पावशे जुन्या दिवसात रमले होते.

“आता प्रत्येक ब्लॉक मध्ये तीन किंवा चार माणसं !”, कुशाभाऊ.

“पाचवा माणूस आला की, गर्दी होते आत्ताच्या काळात !,” बाबूकाकांनी मनातली मळमळ ओकून टाकली.

तोवर कुशाभाऊंनी मोबाईल वरून बाजूच्या चहावाल्याला फोन केला. बघता बघता, लहान थर्मास व कागदी ग्लास घेऊन, चहावाला पोऱ्या आला. त्याने सगळ्यांना चहा दिला.

“भाई, चहा घ्या, बाजूच्या हॉटेल मधला आहे,” कुशाभाऊ.

“ असं कां ?”, भाईंना हे नवीनच होतं.

“तर काय भाई, इथे सगळं आता फोनवरून होतं - चहा, दूध, फळे, भाज्या, धान्य, हॉटेलचं खाणं ...... फोन करायचा, ऑन-लाइन पेमेंट करायचे, घरात सगळे हजर ! खिशात पैसा असायची गरज नाही !”

“पण साला..... अकाउंट मंदी पैसा पाहिजे ना !,” त्रिलोकेकर शेटनी मध्येच जोक मारला. सगळे त्यावर खळखळून हसले.

“या फ्लॅट मंदी लय सुविधा हाय …. मस्त हाय. पण चाल मंदली मजा नाय,” त्रिलोकेकर चाळीला मिस करत होते.

“आता घराघरात नळ, त्याला धो धो पाणी,” अण्णा पावशे.

“ त्यामुळे नळावरची भांडण थांबली नां !,” बाबूकाका.

“ आपला तो रामा गडी - त्याची सून येते इथे काम करायला ! ओळखता येणार नाही - शर्ट पॅन्ट घालते,” अण्णांनी बातमी पुरवली.

‘आणि ते……. आपले एचच मंगेशराव गायक आणि त्यांच्या त्या सौ. वरदा बाई ..... नृत्य ...... “, भाईंना एकेकाची आठवण येत होती

“हो हो, ते गातात नां ...... गाणं कसं सोडतील एचच. मंगेशराव ?,” कुशाभाऊ.

“फक्त दरवाजे- खिडक्या बंद करून गातात ! त्यांच्या गाण्याने आमची झोपमोड होते, अशी तक्रार त्यांच्या शेजाऱ्यांनी केली म्हणे,” बाबूकाका.

“असं कां ?,” भाई.

“आणि त्यांच्या त्या सौ. ...... कंबर दुखते म्हणून, पट्टा दिलाय डॉक्टरांनी ! तो घालून डान्स करतात. पूर्वी नृत्य करायच्या, आता पाश्चात्य संगीतावर तो रोंबा सोंबा का काय तो नाच करतात,” अण्णा पावशे.

“पण दरवाजे- खिडक्या बंद करून …. !,” बाबुकाका.

सगळे मनमुराद हसले.

“नाही म्हणजे, आम्हाला त्यांची कला पाहायला मिळते, गणेशा फेस्टिवल मध्ये - कार्यक्रमात !”, कुशाभाऊ.

“भाई, पूर्वीची चाळीतली मजा, एकमेकांमध्ये असलेले प्रेम - जिव्हाळा आता या टॉवर संस्कृतीत राहिलेला नाही, हे मात्र खरं ! गणेशोत्सव आता दि गणेशा फेस्टिवल झाला आहे !”, बाबूकाका.

“तेचा काय आहे भाई, आफ्टर रि-डेव्हलपमेंट आमी लोकांनला बिल्डरने फ्लॅट दिला. बाकीचा फ्लॅट विकला - ते मारवाडी- गुजराती लोक नी बाय केला,” त्रिलोकेकर.

“त्यांच्याकडे पैसा हाय नां, त्यामुळे त्यांची संख्या आता जास्त आहे. गणेशोत्सव होतो पण, पूर्वीसारखा नाही, “ अण्णा पावशे.

“मराठी सांस्कृतिक वातावरण लयाला गेलं !,” बाबूकाका.

“साला ..... मिक्स कल्चर आला इकडे !,” त्रिलोकेकर.

भाई सारं काही ऐकत होते.

“जरा काय झाला की, फोन करतात. समदी कामं साला फोनवरून करतात,” त्रिलोकेकर.

“माणसा-माणसांमध्ये भिंती उभ्या राहिल्या आहेत, प्रेम - ओलावा आटलाय. कोणाच्या घरी जायचं तरी इंटरकॉमवरून ‘ येऊ का ?’ विचारतात. अपॉइंटमेंट घेतल्यासारखे”, बाबूकाका.

“श्रीमंती आली, गाड्या आल्या, कॉम्प्युटर आले. पूर्वीची मुलं खाली मैदानात खेळायला यायची, आता एक तर, शाळेत डाबून ठेवतात, नंतर शिकवण्याना घालतात. उरला वेळ, तर ती मुलं कॉम्प्युटरवर खेळतात. पूर्वीसारखं व्हरांड्यात खेळणे राहीलेलं नाही, “ अण्णा पावशे.

“भाई, खूप बदल झाले हो, बटाट्याची चाळ ते द टॉवर ऑफ बटाटा - हे संक्रमण अनुभवणे आणि टॉवरची संस्कृती पेलणं , आम्हाला जड झालं - किंबहुना जड जातंय अजूनही ! ते पचनी पडत नाही आहे, “ बाबूकाका ताशेरे मारण्यापेक्षा खूपच भावनिक झाले होते

भाईंनाही हे संक्रमण पेलवणं जड जात होतं. वारंवार त्यांचा कंठ दाटून येत होता. त्यापेक्षा आपण ..... परत आपल्या स्थानी गेलेलं बरं, असं त्यांना वाटू लागलं.

त्यांनी त्यांच्या मानसपुत्रांकडे निरोप घेण्याची गोष्ट काढतातच, ते चौघेही गलबलले.

“भाई, बटाट्याच्या चाळीने आम्हाला काय काय दिलं, ते शब्दातीत आहे ..... आम्हाला - आमच्या व्यक्तिरेखांना आपण अजरामर करून ठेवलंय !,” कुशाभाऊंचा वाक्यांमधून नाटक डोकावत असलं तरी, अंतर्मनातील भावना त्यांना लपवता येत नव्हत्या.

बाकीच्यांना भावनावेगाने शब्द फुटत नव्हते. भाईंचा वियोग त्यांना सहन करणं कठीण जात होतं.

एकटे कुशाभाऊ काय ते भावना व्यक्त करत होते, “भाई, आपल्या बटाट्याच्या चाळीने मराठी मनामनावर अधिराज्य केले आहे आणि आजही अजूनही ते कायम आहे ! जोवर, मराठी भाषा आणि संस्कृती या पृथ्वीतलावर अस्तित्वात राहील, तोवर भाई आपल्या ‘बटाट्याच्या चाळी’च्या पाऊलखुणा अजरामर राहतील, यात तीळमात्र शंका नाही !

भाईंनी डबडबलेल्या अश्रूंनी ‘दि टॉवर ऑफ बटाटा’ चा निरोप घेतला...... जड पावलांनी ते परतीच्या प्रवासाला निघाले ....................

नेत्रा श्रीपाद वैद्य

Wednesday, November 20, 2019

माझ्या आठवणीतले पु.ल.

पु.लं. बद्दल काही लिहायचं, म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. श्री रामा ला ते जमलं कारण ते एक अवतार होते, पण आमच्या सारख्याला ते कसं जमायचं, कारण आमचा अवतार पाहाल, तर अगदीच अवतार आहे. तरी देखील, पु.लं नी जे काही दिलं आहे, माझ्या आणि माझ्या सारख्या अनेकांच्या 'आयुष्यात' जे सुख आणि आनंदाचे क्षण दिले आहेत, त्या प्रती क्रुतज्ञता म्हणून हा सगळा खटाटोप. (इथे मुद्दामहून 'जीवनात' हा शब्द टाळला आहे, कारण सखाराम गटणे मध्ये पु. लं.नीच, त्यांना जीवन वगैरे शब्दांची भीती वाटते असे म्हटलं आहे) तसं पाहायला गेलं तर, पु.लं. नी जो काही आनंद दिला आहे, त्याला शब्दात मांडणं कठीण आहे. तरी सुद्धा, अनेक वर्षं मनात दाटून राहिलेल्या भावना व्यक्त कराव्यात असं सारखं वाटत होतं, आणि व्यक्त होत राहणे हा तर आपला स्थायी भाव आहे, म्हणून केलेला हा एक छोटासा प्रयत्न. एवढं असूनही, लेख चांगला असेलच याची शास्वती नाही, तरी सगळ्यांनी हा लेख गोड मानून घ्यावा ही विनंती.

तर...

पु.लं ची आणि माझी पहिली ओळख, दूरदर्शन वरील त्यांच्या 'निवडक पु.लं' या मालिकेतून झाली. मला पहिल्या पासूनच वाचनाची आवड होती, शाळेत सुद्धा, भाषा व इतिहास हे गद्य विषय माझ्या खास आवडीचे. कॉलेजमध्ये आल्यानंतर, माझे अभ्यासक्रमाच्या बाहेरचे वाचन वाढले. कॉनव्हेंट मध्ये शिक्षण झाल्याने, सुरवातीला इंग्रजी पुस्तके वाचण्याकडे माझा कल होता, मग एके दिवशी बाबांनी सल्ला दिला, "इंग्रजी बरोबरच मराठी साहित्य सुद्धा वाचत जा". मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात त्यांचे आजीवन सभासदत्व होते, मग मी माझा मोर्चा तिकडे वळवला. मराठी साहित्याबद्दल फारशी माहिती नसल्याने, काय वाचावे, कोणत्या लेखकाचे पुस्तक घ्यावे हा एक प्रश्नच होता. परंतु, पु.लं. ची थोडीफार तोंड ओळख झाली असल्याने त्यांच्या पासूनच सुरुवात करावी असं ठरवलं. आणि मग सुरू झाला एक अतिशय आनंदाचा आणि सुखाचा प्रवास...
खोगीरभरती, ह'फ'सवणूक, नसती उठाठेव, व्यक्ती आणि वल्ली, अघळपघळ, उरलंसुरलं, खिल्ली, अशा अनेक पुस्तकांनी मनमुराद हसवलं. 'निवडक पु.ल.' पाहिले असल्याचा एक फायदा असा झाला, की मी ती सगळी पुस्तकं पु.लं. च्या आवाजात वाचू शकलो, म्हणजे, मनातल्या मनात वाचताना सुद्धा मला पु.लं. च आपल्याला वाचून दाखवताहेत असे वाटायचे. त्यांच्या त्या खास जागा, विशिष्ट पद्धतीने उच्चार करण्याची लकब, त्यांचे एकूणच अभिवाचन, अगदी सगळं सगळं मी अनुभवत होतो. त्यामुळे त्या वाचनाचा आनंद द्विगुणित झाला. त्यांचं निरीक्षण ईतके सूक्ष्म व विलक्षण असायचं आणि तितकंच लिखाण सजीव, की त्यांच्या पुस्तकातील अनेक प्रसंग, व्यक्तीरेखा, या खर्याखुर्या व जीवंत वाटायच्या, त्यातील अनेक प्रसंग आपण देखील अनुभवले आहेत व त्यातील अनेक व्यक्तीरेखा या आपल्या आयुष्यात सुद्धा आहेत असेच वाटायचं. किंबहुना ते बर्याचदा तसंच असायचं.

त्यांचा नामु परीट असो किंवा पेस्तनकाका, सखाराम गटणे असो किंवा भय्या नागपूरकर, सगळे आपले आपलेसे आणि ओळखीचे वाटायचे. हसवता हसवता मध्येच एकदम, चितळे मास्तर, अंतू बर्वा, हरी तात्या ही मंडळी अचानक काळजाला हात घालुन जायची आणि डोळ्यांच्या कडा नकळत ओल्या व्हायचा. या मंडळींना देखील आपण कुणा ना कुणात, कुठे ना कुठे पाहिलेले असायचे. एसटी चा प्रवास करताना आपण देखील सुबक ठेंगणी पाहिलेली आहे, ईतकी चूकीची माहिती ईतक्या आत्मविश्वासाने सांगणारे मास्तर सुद्धा भेटले आहेत, झंप्या दामले असो वा मधु मलुश्टे, ऑरडरली साहेब असो वा पुढारी, उस्मान शेठ असो किंवा बगु नाना, ही मंडळी आपल्याला देखील ठाऊक आहेत. "कैसा पान लगाऊ साहेब" असं आपल्या पानवाल्याने विचारलं, तर त्याला सुद्धा "तूच का तो ब्रूटस" असं कित्येकदा आपल्याला देखील म्हणावसं वाटलंय, बाबांची पोष्टातील कामं करायला पोष्टात गेलो की आख्खं पोष्टीक जीवन डोळ्यासमोर ऊभं राहिलंय. आज देखील, कुणीही वीट आला असं म्हटलं, तर एका हातातील बाजारातील वीट आणि दुसऱ्या हातातील स्वतःच्या भट्टीतील वीट आठवते. आजकाल फेसबुक चा जमाना आहे म्हणून बरंय, नाहीतर घरी बोलावून कुणी फोटो दाखवायला बसवलं असतं, तर मात्र माझी आणि माझ्या शत्रुपक्षाची चांगलीच जुंपली असती. कुणाच्या घरी बोलणारा पोपट किंवा शेकहँड वगैरे करणारा कुत्रा दिसला, की पाळीव प्राणी आठवतं आणि ती वँक वँक करणारी सिंडरेला नामक चेटकी आठवल्या खेरीज राहत नाही. "महाराषट्राचा संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून विभक्त पणाची भावना अधिक बळावली आहे" हे पु.लं. च वाक्य प्रत्येक मुंबईकर, पुणेकर आणि नागपूरकराने खरं केलंय.

बटाट्याची चाळ आणि असामी असामी वाचल्यावर तर पु.लं बद्दल प्रेम अधिक की आदर असा प्रश्न पडतो. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दैनंदिन व्यवहारात, धकाधकीत इतकी गंमत दडली आहे, हे केवळ पु.लं. नीच जाणून दिलं. आपल्या मध्यम वर्गीय माणसाच्या अडीअडचणींंने भरलेल्या आयुष्याकडे, विनोद बुद्धीने पाहायला आणि त्यातील गंमती हुडकायला, पु.लं. नीच शिकवलं, आणि माझ्या मते हे त्यांनी आपल्याला दिलेलं सर्वात मोठं देणं आहे. चाळीतंच लहानाचा मोठा झाल्यामुळे, माझ्या सारखे अनेकजण, बटाट्याची चाळ अक्षरशः जगले आहेत. आमच्या चाळीत, सोकाजीनाना त्रिलोकेकर पासून ते समेळ काकांपर्यंत आणि अण्णा पावशे पासून ते बाबा बर्वयांपर्यंत सगळे नमुने आम्ही जवळून पाहिले आहेत. "त्या तिथे वसत असे चाळ बटाट्याची" यातील कळवळा आम्ही समजू शकतो. काळ बदलला तरी आजच्या काळातले आप्पा भिंगारडे, नानू सरंजामे, वगैरे मंडळी हापिसात भेटतातच. आपल्या घरी देखील आपला शंकर्या अथवा शरयू आपण किती फॉग आहोत अथवा टॉप्स आहोत ह्याची जाणीव करून देत असतात. जुन्या आणि नव्या पिढीतील चढाओढ अजूनही चालूच असते. "अंग किती गोरं आहे नाही" असं म्हटल्यावर आजदेखील आपली सौ डोळे वटारून "गोरं!!!" असाच प्रतिसाद देते. आता मुलांच्या शाळेत जाण्याचा योग आला की ओठांना ओठ न लावू देता (म्हणजे स्वतःचे) बोलणारी हेडमास्तरीण बाई भेटली की आपली ही अवस्था धोंडू भिकाजी जोशींच्या सारखीच होते. त्यामुळे मला असं वाटतं, की पु.ल. हे कालातीत साहित्यिक आहेत, त्यांचं साहित्य हे पिढ्यानपिढ्या साठी आहे आणि प्रत्येक पिढीला ते आपलं वाटतं, त्यांच्या आयुष्याशी सुद्धा ते समरस आहे, म्हणून तर बिगरी ते मँट्रीक हे प्रत्येकाला त्याच्या शाळेत घेऊन जातं, दामले गुरुजी, ड्रॉईंग चे मास्तर, संस्कृत चे गुरुजी, ईतिहास मधील वंशावळ्या, भूगोलातील वारे, भूमिती साठी वापरली जाणारी कंपास पेटी, करकटक वगैरेशी भेट घडवते.

हा "हसवण्याचा धंदा आपुला" करत असतानाच पु.लं. नी; आपुलकी, मैत्र, गणगोत सारख्या पुस्तकातून; बाल गंधर्व, वसंतराव देशपांडे, वसंत सबनीस, शरद तळवलकर, केसरबाई केरकर, खानोलकर ऊर्फ आरतीप्रभू,शाहू महाराज, वूडहाऊस, चिंतामणराव कोल्हटकर, बेगम अख्तर तसंच रावसाहेब सारख्या थोरामोठ्यांचे, जवळून दर्शन घडवले. जावे त्यांच्या देशा, पूर्वरंग सारख्या प्रवासवर्णनातून आपल्याला विविध देश फिरवले, तेथील संस्कृतीचे दर्शन घडवले. आयुष्याकडे, जगाकडे पाहण्याचा, माणसाकडे पाहण्याचा एक नवा द्रूष्टीकोण दिला.

असो, सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे, पु.लं. नी जो आनंद दिलाय तो शब्दात सांगणं कठीण आहे, त्यांच्या बद्दल कितीही लिहीलं तरी कमीच आहे. तेव्हा माझा हा लेख आटोपता घेतो आणि आपल्या सर्वांना अतोनात आनंद देणाऱ्या या आनंद यात्रीला शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याबद्दल अभिनंदन करतो व असेच आम्हाला पिढ्यानपिढ्या हसवत आल्याबद्दल आभार मानतो.

हिमांशू हाते
https://www.facebook.com/himanshu.hate.9

Tuesday, September 10, 2013

बटाट्याच्या चाळीतील गणेशोत्सव - प्रभाकर बोकील

पु. ल. देशपांडे नामक असामीने बटाट्याच्या चाळीतील इरसाल व्यक्ती आणि वल्लींना हाताशी धरून, चाळीचा (गाळीव) इतिहासवजा बखर लिहिली अन्‌ "बटाट्याची चाळ' उजेडात आली. चाळीत सतत होणाऱ्या सामुदायिक - "सांस्कृतिक' चळवळी, आंदोलनं, भ्रमणमंडळं, शिष्टमंडळं वगैरेंवर भरपूर प्रकाश पडला. तरी एक रुखरुख राहिलीच. चाळीचा, सार्वजनिक गणेशोत्सव! साऱ्या बखरींत या गणेशोत्सवावर एकत्रित असा प्रकाश पडत नाही. आहेत ते विखुरलेले कवडसे. त्यावरून केवळ संपूर्ण चित्राचा अंदाज बांधायचा. चाळीत पुन्हा एकदा फेरफटका मारून जमविलेल्या कवडशांचा हा कॅलिडोस्कोप- अर्थात कोलाज.

सवाशे वर्षांपूर्वी म्हणजे १८८० मध्ये कै. धुळा नामा बटाटे (क्रॉफर्ड मार्केटमधील टोपल्यांचे व्यापारी) यांनी भर गिरगावात, खेतवाडीतील वाघूळ गल्लीत, एक चाळ बांधली, ६० बिऱ्हाडांची. साथीच्या आणि लढाईच्या दिवसांत आजूबाजूच्या चाळी ओस पडल्या; मात्र ही चाळ तशीच राहिली. ढिम्म लागू दिला नाही इथल्या माणसांनी प्लेगला अन्‌ जर्मन-जपान्यांना! या चाळीतील ढेकूणही मेला नाही, इतकी ही चाळ टणक. (खेतवाडी म्हणजे शेतवाडी, शेतं संपल्यावर भुते संपली अन्‌ आपण इथे राहायला आलो- इति चाळ रहिवासी - उत्साहमूर्ती राघूनाना सोमण.) असो! तर अशीही चाळ प्रकाशात मात्र आली तब्बल ७५ वर्षांनंतर, १९५८ मध्ये. निमित्त अर्थातच पु. ल. देशपांडे नामक असामीने चार-पाच दिवाळ्या या चाळीत केलेला मुक्काम! त्यांनी या चाळीतील इरसाल व्यक्ती आणि वल्लींना हाताशी धरून, चाळीचा (गाळीव) इतिहासवजा बखर लिहिली अन्‌ "बटाट्याची चाळ' उजेडात आली. चाळीत सतत होणाऱ्या सामुदायिक - "सांस्कृतिक' चळवळी, आंदोलनं, भ्रमणमंडळ, शिष्टमंडळं वगैरेंवर भरपूर प्रकाश पडला. इतकंच नव्हे, तर चाळकऱ्यांच्या व्यक्तिगत वासऱ्या अर्थात डायऱ्या, आत्मचरित्रांचे संकल्प, कन्येस लिहिलेली पत्रंदेखील सार्वजनिक झाली. तरी एक रुखरुख राहिलीच. चाळीचा, सार्वजनिक गणेशोत्सव! साऱ्या बखरींत या गणेशोत्सवावर एकत्रित असा प्रकाश पडत नाही. आहेत ते विखुरलेले कवडसे. त्यावरून केवळ संपूर्ण चित्राचा अंदाज बांधायचा. चाळीत पुन्हा एकदा फेरफटका मारून जमविलेल्या कवडशांचा हा कॅलिडोस्कोप- अर्थात कोलाज. खरं तर पु. लं.च्याच शब्दातील ही "गोळाबेरीज'! "चळवळीच्या सामर्थ्याला भगवंताचे अधिष्ठान हवे म्हणून बटाट्याच्या चाळीत मी गणेशोत्सव सुरू केला, असा ठसठशीत उल्लेख चाळीतील (एकमेव) आत्मचरित्रकार (आगामी) हणमंतराव दशपुत्रे यांनी या बखरींत केलेला आढळतो. आत्मचरित्रातील सर्वच खरं असतं, असं नसलं तरी वरील विधान कुणी नाकारीतही नाही, तोपर्यंत हेच सत्य मानायला हरकत नसावी! तर "सालाबादाप्रमाणे यंदाही' या पद्धतीचा हा गणेशोत्सव चाळींत अखंडितपणे साजरा होत राहिला. अर्थात, बाजूच्या तेजुमल काजूमल चाळीच्या २०० भाडेकरूंच्या धडाक्‍याने होणाऱ्या उत्सवापुढे, ६० बिऱ्हाडांच्या बटाट्याच्या चाळीचा गणेशोत्सव नेहमीच उपेक्षिला गेला; परंतु या गणपतीला ऐतिहासिक महत्त्व होते. हा गणपती पहिल्या महायुद्धात विकत घेतला, तेव्हापासून (जन्मतिथीच्या भू-घोळाशिवाय इतिहास कसा!) वर्षातून एकदा मधला चौक साफ करून तिथे बसविण्यात यायचा. विसर्जनाच्या रानटी रूढीपासून वाचलेला गणनायक, पुढे रंग उडाल्यामुळे "ऍनिमिक' दिसायचा. वयोमानाप्रमाणे मूळच्या एकदंतावर, दंतविहीन होण्याचा प्रसंग आला होता; परंतु त्या जागी एक खडू बसविल्यामुळे नवी कवळी लावलेल्या वृद्धाचा टुणटुणीतपणा त्याला प्राप्त झाला होता.

सदरहू गणपतीची ही "दंतकथा', हा तर इतर चाळकऱ्यांच्या थट्टेचा विषय होऊन राहिला होता! असो! "चाळीतला मधला चौक' यालादेखील एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होतं. चाळीला घाणीचं कधीच वावडं नव्हतं; पण कुठल्या खोलीतून कुठली घाण या चौकात पडावी यासंबंधीची चाळीची काही ठाम मतं होती. "अण्णा पावश्‍यांच्या घरातून निर्मात्याऐवजी, द्रोणांतून अंड्यांची टरफले पडायला लागली, तेव्हा चाळ शहारली होती!' "हा मधला चौक साफ करून, तेथे सामुदायिक सूर्यनमस्कार घालायची माझी कल्पना, कुणीच मान्य करीत नाही-' ही खंत व्यक्त झाली आहे ध्येयवादी बंडू सोमणच्या बासरींत; पण हा चौक साफ करून (वर्षातून फक्त एकदा) तिथे गणपती बसविला जायचा, त्याला सर्वांचाच हातभार लागायचा. एरवी सर्वगुणसंपन्न चाळीत एकमेकांचे जातिवाचक उल्लेख, तोतरा शेणवी, भटुरगी, परभटली मेली, कोळंबी खाऊ, सोनारडा.. वगैरे होत असले तरी गणपतीच्या १० दिवसांत सारे जातिभेद विसरले जात. कारण- प्रचंड गुणवत्तेचा साठा या ६० बिऱ्हाडांत ठासून भरला होता. या दारूगोळ्याला वात लावायची संधी गणेशोत्सवाशिवाय कधी मिळणार! ऐन गणपतीत दिवाळीची आतषबाजी... संगीतज्ज्ञ मंगेशराव हट्टंगडी ऊर्फ मंगेशराव, हे तर चाळीचे मूर्तिमंत संगीत. गणपतीच्या दिवसांत कितीही गर्दी झाली तरी मंगेशरावांच्या नुसत्या षड्‌ज-पंचमाने मंडपात सामसूम व्हायची! त्यांच्या पत्नी सौ. वरदाबाई हट्टंपडी (नृत्यचंद्रिका) यांना गणेशोत्सवात नाचायची विनंती केली, की नाचायला त्या एका पायावर तयार असत! "आपण नृत्यकला का सोडली' यावर "नृत्य साधे ना' हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं! तसेच महाविद्वान प्रा. नागूतात्या. खरं तर एका गणेशोत्सवात त्यांच्या व्याख्यानाचे वेळी, एकदा बोर्डावर चुकून "प्रा. नागूतात्या', असं लिहिल्याने प्राध्यापक ही उपाधीच त्यांना चिकटली होती. (एरवी जगातील सर्व प्राध्यापक गाढव आहेत, हे त्यांचेच मत!) नाट्यभैरव कुशाभाऊ अक्षीकर हे एकाच वेळी "नाट्यतज्ज्ञ' आणि "खाद्यपंडित' होते. कारण- एकेकाळी गंधर्व कंपनीत ते आचारी होते. गणेशोत्सवही त्यांना पंगत पर्वणीच! तेदेखील एकाच वेळी चाळीचे फडके अन्‌ खांडेकर होते.

गणपतीपुढे होणारी त्यांची नाटकं हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय. कवयित्री प्रा. कल्पकता फूलझेले या काव्याप्रमाणे खेळातही (प्रेक्षक म्हणून) हुशार होत्या. त्यांना चित्रकलेचेही वेड होते. चाळीच्या गणेशोत्सवात त्यांच्या चित्रकलेचे नमुने (!) जागोजागी टांगले जात. चाळीतील विदुषी डॉ. सौ. कल्पकलाबाई कोरके धसवाडीतील गणपतीत "नागरी जीवनातील अपौरुषेय वाङ्‌मय'सारख्या गहन गंभीर विषयावर भाषण देत; तर बटाट्याच्या चाळीतील गणपती थोडाच अपवाद असणार? (बिच्चारा!) शिवाय चाळीचे इतिहासकार महापंडित बाबूकाका खरे, आहारशास्त्रज्ञ सोकाजी नानाजी त्रिलोकेकर, ग्रहगौरव अण्णापावशे, आध्यात्मिक स्फूर्तिकेंद्र दे. भ. बाबा बर्वे, उत्साहमूर्ती राघूनाना सोमण... किती नावं घ्यावीत? हे राघूनाना सोमण कन्येस लिहितात, "गणपती ही विद्येची देवता आहे. गणपतीस्रोत्रांत त्याला गणांनां त्वां गणपतीर्हवामहे, कविः कवीणाम्‌ म्हटले आहे. गणांचा पती तो गणपती. कवी हादेखील गणमात्रांचा पती, म्हणजे गणपतीच नव्हे काय? गणपतीचे पुण्यातील महत्त्व पेशवे आणि बाळ गंगाधर टिळक या दोघांमुळे वाढले. भक्तांमुळे भगवंताला मोठेपण येते ते असे!' थोर (आगामी) चरित्रकार हणमंतराव दशपुत्रे; तर चाळीतील गणेशोत्सवातील कार्यक्रम "गाजण्या'वर प्रकाशझोत टाकतात... ""नंतरच्या आयुष्यात मी बटाट्याच्या चाळीतील गणेशोत्सवाच्या व्याख्यानांत, समोरच्या चाळकऱ्यांच्या आकसामुळे व खोडसाळपणामुळे भजी खाल्ली. केवळ "भजी मारा'च्या घोषणा झाल्या; प्रत्यक्ष स्टेजवर भजी आली नाहीत... तो प्रसंग मला आठवतो, "संस्कृती आणि जानवे' या विषयावर माझे भाषण होते. ते दिवस मोहनदास करमचंद गांधी या गुजराती पुढाऱ्याने चालविलेल्या सबगोलंकारी चळवळीचे होते; पण मी काही कच्च्या गुरूचा चेला नव्हतो! ब्रह्मतेजापुढे वाणी तेजाचा काय प्रभाव पडणार होता?'' प्रत्यक्ष गांधींची बरोबरी करणारे धडाडीचे वक्ते चाळीतच असल्यावर गणेशोत्सवाच्या नऊ दिवसांतच दिवाळीचे भुईनळे फुटणार नाही तर काय! दहाव्या दिवशी विसर्जन; पण या सार्वजनिक गणपतीचे विसर्जन कधी झालेच नाही! "(पर्यावरण' हा शब्ददेखील तेव्हा जन्मला नसेल!) तरीदेखील गणपतीला निरोप देताना अंतर्मुख व्हावं तसं, बखरीशेवटी चाळीचा निरोप घेताना पु. लं. "चिंतनात' शिरतात.... ""पूर्वी बर्व्यांच्या घरी तेवढा गणपती बसायचा. पण समेळकाकांचे दाजी मखर करीत. एच्च. मंगेशराव बाप्पा आरत्या गात.

चौपाटीवर बर्व्यांचा गणपती विसर्जनाला जायचा; पण पाट डोक्‍यावर घेऊन स्वतः जनोबा रेग्यांचे काका चौपाटीच्या समुद्रात शिरायचे! लाटा अंगावर घेत ते पाण्यात शिरले, की पोरे भ्यायची. मोठी माणसं म्हणायची, "काका बेतानं', काका आपल्या कोकणी मराठीत म्हणायचे, ""रे, समुद्राची भीती कोकण्यांक कित्याक घालतंस? माशाक आणि मासे खाणाऱ्याक पाण्याचा भय नसतां!'' त्या वेळी चाळीतल्या पोरांना त्रिलोकेकरशेठ्येफादर (त्यांना चाळीत सर्व जण "फादर' म्हणत) मोफतमंदी (हा त्यांचाच शब्द) भेळ खायला देत. त्या उत्सवाला कमिटी नव्हती; अकाऊंट नव्हता, हिशेबाबद्दल शंका नव्हती!' ही सारी गोळाबेरीज केल्यावरदेखील चाळीच्या गणेशोत्सवाबद्दल अंदाज येतो इतकंच. समाधान काही होत नाही. चाळ तर केव्हाच जमीनदोस्त झाली असंल. चाळीची मालकी मेंढे पाटील (कोथिंबिरीचे होलसेल मर्चंट) यांच्याकडे गेली तरी ती कायम ओळखली गेली "बटाट्याची चाळ'! बटाट्यातील "ब' गळून जाऊ? आता कदाचित, "टाटा टॉवर्स' ही इमारत उभी राहिली असेल. सिमेंट-कॉंक्रीटच्या असंख्य कपाटात माणसांना बंद करून ठेवणारी! मूळचे चाळकरी केव्हाच बोरिवली-डोंबिवलीपलीकडे देशोधडीला लागले असतील. त्यांची पोरं- नातवंडंदेखील आता सीनिअर सिटिझन्सच्या रांगेत स्टेशन्सवर पास-तिकिटाला उभे राहत असतील! चाळ तर ५० वर्षांपूर्वीच शेवटचा घाव कोण घालणार, याची वाट पाहत कशीबशी उभी होती. कधी वाटतं, जमिनीसपाट झालेली "बटाट्याची चाळ' पुन्हा तीन मजल्यांनी उठून उभी राहील अन्‌ म्हणेल, "पुलं, तेवढा गणेशोत्सव राहिला!'

- प्रभाकर बोकील

Tuesday, April 24, 2007

उपास -- (बटाटयाची चाळ)

बटाट्याच्या चाळीत लपून म्हणून काही राहत नाही! अण्णा पावशांच्या मुलींच्या कुंडल्या त्यांनी खणातून केव्हा काढल्या, गुपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमण बिल्डिंगमधल्या उकिडव्यांच्या घरी केव्हा नेल्या, ही गोष्ट पावशीण- काकूंना कळायच्या आत आमच्या कुंटुबाला कळली! एच्च. मंगेशराव हे चाळीतले संगीतज्ञ; परंतु त्यांना कुठल्या चिजांचे अंतरे येत नाहीत हे एरवी 'गाणे संपले' एवढेच गाण्यतले कळणा-या राघूनांनादेखील ठाऊक. बाबलीबाईंच्या पाटल्या गहाण पडल्याची गोष्ट गहाणखतावरची शाई वाळण्यापूर्वी सर्वांच्या तोंडी झाली. आणि रतन समेळ (न्यू गजकर्ण फार्मसीच्या समेळकाकांची मुलगी) हिने द्वारकानाथ गुप्तांच्या मधूला लिहीलेले प्रेमपत्र मधूच्या हातात पडण्यापूर्वी काशीनाथ नाडकर्ण्यांच्या मुलाने गॅलरीत उभे राहून परवचा म्हणतात तसे खाडखाड म्हणून दाखवले! सगळे बहीर्जीचे वंशज नाना जातींत आणि पोटजातींत जन्मून बटाट्याची चाळीत वस्तीला आल्यासारखे आले आहेत. वासविक माझ्या उपासाचा निश्र्चय मी आधी माझ्या' मना सज्जना 'खेरीज 'येरा कोणा'लाही सांगितला नव्हता. पण उपासाला सुरवात करून पुरे चार तास लोटले नाहीत तो वर्दळ सुरू झाली.

"पतं--(मला मंडळी उगीचच पंत म्हणतात. वास्तविक म्हणतात. वास्तविक 'पंत' वाटावे असे माझ्या काही नाही. चांगला टेलिफोन ऑपरटेर आहे मी. हं, आता आपल्याला बूटपॅंट आवडत नाही हे खरे, पण म्हणून काय 'पंत'?) पंत, हा काय साला म्याडनेस!" अशा थाटात सोकाजी त्रिलोकेकरांनी सुरूवात केली, "तुम्हाला काय वाटतं? साला तुमचा बॉस अशी करून लिव्ह सॅंक्शन करील?" 

"पण माझं ऎका--" मी चार तासांच्या उपासानंतर क्षीण होत चाललेल्या माझ्या आवाजात सोकाजीनानांची समजूत घालू लागलो. पण नाही! सोकाजी मला 'सर्मन' देण्याचा चंग बांधून आले होते! 

"माय गुड फ्रेंड-- साले फास्टनी काय होतं?.. हा तर मुळी बॉसला कन्विस करण्याचा वे~च नाय! लिसन -- तुम्हाला पायजे तर सिक नोट देतो. माझे कझिनचा साला एम. डी हाय. यू बिल गेट ऍज मच लिव--बट साला उपास काय?" 

"पण माझं ऎका--" 

"अरे काय ऎका? तू काय सांगणार? धिस इज हबंग!" 

चारपाच तासांच्या उपासाने माझी अशक्ततता कणकण वाढत होती आणि इथे सोकाजीनानांना जोर चढत होता. 

"साला लिसन--तू जेवून घे बंर. साला सोन्यासारखा संडे हाय--आज फीश काय मिळाली होती. पण तू उपासबिपास नको करू!" 

साधारण दिड तास त्रिलोकेकर बडबडून गेले आणि चाळीतले नाट्यभैरव कुशाभाऊ आले. त्यांनी तर 'एकच प्याला' तल्या 'सुधाकर, तुम्ही आमचे पाठचे भाऊ. आम्ही तुम्हांला सांगु नये; पण तुम्ही दारु सोडा!' ह्या चालीवर सुरुवात केली. 

"पंत- (इथे कुशाभाऊंनी माझ्या पाटीवरुन हातही फिरवला.) पंत, ऎका माझं. दोन घास खाऊन घ्या." (ह्या वाक्याने काही अत्यंत सुतकी संकेत माझ्या मनात डॊकावले!) 

"अहो पण--" 

पण नाही नि परंतु नाही. पंत, आपण चाळीत इतकी वर्षे राहिलो ते भावाभावांसारखे. आमची ही आताच म्हणाली, की तुम्ही उपवास सुरू केला आहे, जेवत होतो , तसाच उठुन आलो! नाही, पंत--तुम्ही जेवायचं नाही, तर कुणी? पंत, ऎका माझं. बाबा बर्व्याच्या नारुची मुंज आठवा . विस वर्षे होऊन गेली. पंचावन्न जिलब्या उठवल्या होत्या ना तुम्ही?" इथल्या 'तुम्ही' वर कुशाभाऊने एक हुंदका देखील काढला. कुशाभाऊंचा तो कळवळा पाहून आमच्या कुटुंबाने आत डोळे पुसले. "ते काही नाही पंत, तुम्ही जेवंल पाहीजे--- उपासानं काय होणार" अहो जनोबा रेग्याचं बोलणं एवढं काय मनावर घेता?" 

"जनोबाचा काय संबंध?"माझे हे वाक्य पुरे व्हायच्या आतच नाटकातल्यासारखा "काय संबंध!" एवढेच शब्द उच्चारून कुशाभाउ नाट्यभैरवाने एक प्रदीर्घ उसासा टाकला. 

"कळल्या आहेत, कळल्या आहेत मला सा-या गोष्टी! टमरेलची चोरी ती काय! अरे, जाताना बरोबर थोडीच न्यायची आहे आपल्याला ही चीजवस्तु ? सांर इथंच टाकून जायंच आहे बंर!"--कुशाभाऊ 

"टमरेल?" 

"पंत उजाडल्यावर टमरेल--नाही टमारेल उजाडल्यावर कोंबडं झाकलं काय उजाडल्या राहतंय थोडचं ! तिन दमडीचं टमरेल ते काय आणि त्याच्या चोरीचा आळ तुमच्यावर?" 

"चोरी?" मला काही कळेना. 

"पंत, तुम्ही नका कष्ट करुन घेऊ. मी जनोबापुढं शभंर टमरेलं भरून ठेवतो. वापर म्हणांव दिवसभर, पण पंत, तुम्ही हा उपासाचा नाद सोडा---ही अन्नब्र्म्हाची उपेक्षा आहे, पंत." 

"मला काही ऎकायचं नाही नि बोलायचं नाही. मला फक्त एकच पाहायचं आहे ते तुम्हांला भरपूर जेवताना. पंत, सोडा हा नाद --नाही हो, अंतःकरण पिळवटुन सांगतो मी तुम्हांला. नका, पंत, नका ह्या उपासापोटी आपल्या प्रकृतीचा सत्यानाश करू!" 

कुशाभाऊंना आवरणे मुश्किल झाले. शेवटी त्यांच्या गेल्याच आठवद्यात झालेल्या एका नाटकाबद्दल मी बोललो तेव्हा गाडीने रूळ बदलले. पण ते किती,अगदी थोडा वेळ, आणि गाडी पुन्हा मेनलाइनवर आली! 

"नका--नका हो पंत, असं करू!"

"अहो , काय करतोय मी!" 

"कळतंय मला--तिळतीळ तुटतं माझं आतडं! पण पंत, सोडा हा अविचार!" 

आता मात्र मला काय बोलावे ते सुचेना. मी डोळे मिटून स्वस्थ बसलो. नाट्यभैरव कुशाभाऊ सुमारे पाऊण तास माझे अक्षरही ऎकून न घेता बडबडत होता.बाकी कुशाभाऊची ही तारीफ आहे. नाटकातदेखील उत्साहाच्या भरात त्याने स्वतःचे, स्वतःच्या नोकराचे, आणि 'पडद्यात गलबला' ही सगळी भाषणे एकट्याने केली होती. रंगभूमीच्या दुस-या कोण्त्याही सेवकाला टिकू म्हणून द्यायचे नाही हा त्याचा संकल्प असल्यासारखा तो वागतो. चाळीतले गडी जसे दुस-या गड्याला 'टिकू' देत नाहीत त्यातलाच प्रकार! नाट्यभैरव कुशाभाऊंच्या भीमदेवी भाषणाने सा-या चाळीला माझ्या उपासाची वार्ता पोचली! आणि बि-हाडात हळूहळु, पावले न वाजवता, मंडळी गोळा होऊ लागली. मी तोंड उघडले की सर्व जण एकमुखाने "तुम्ही बोलू नका--तुम्हांला त्रास होईल!" अशांसारखे उद्गार काळजीयुक्त स्वरात काढायचे. आचार्य बाबा बर्व्याखेरीज सर्व शेजारी जमले. 

तळमजल्यावरच्या किराणा-भुसार मालाचा व्यापारी शा चापशीतेखील आला! 

"असा कोणी अपासबापास करायला शरुवात केला म्हणजी आमाला तो लय धास्ती वाटते. आमची कच्छमदी ते एक रावळबाप्पा होता-- असाच अपास करून मरून गेला. पंत अपास नाय कर तू--आमाला धास्ती वाटते!" 

"बरोबर आहे --- सगळ्यांनी उपास करायचं तर ह्यांच दुकान कसं चालणार?" काशीनाथ नाडकर्ण्याच्या कानात जनोबा रेगे कुजबुजले. माझ्या उपासाचे एक सोडा, पण जनोबा कुठल्याच प्रसंगाचे गांभीर्य कळत नाही! 

मी स्वस्थ डोळे-मिटून पडलो होतो. बाकी त्याखेरीज मी काहीच करू शकत नव्हतो. मंडळी त-हे त-हेच्या मुद्रा करून माझ्याकडे पाहत होती. लहान मुले खिडक्यांच्या गजांतून आळीपाळीने डोकावत होती. 

"चिंत्याचे बाबा मरणार का रे चंदू?" कुठलेसे कारटे तेवढ्याच माझ्या जिवावरदेखील उठले! परस्पर त्याच्या पाठीत कोणीतरी धपका घातल्याचे मी ऎकले. 

आत येणारा प्रत्येक जण "पंताना स्वस्थ पडु द्या--" असे सांगत होता, आणि आपण स्वतःच आमच्या खोलीत गर्दी करीत होता. माझ्या पाकीटातले सगळे 'पिवळे हत्ती' चौकशीला आलेल्या मंडळींनी संपवले होते. सुपा-या लांबवल्या होत्या. तबकात फक्त 'देठ, लवंगा, साली' शिल्लक होत्या. मी काहीही बोलायला तोंड उघडले की ",पंत, नका. तुम्ही स्वस्थ पडा!" असा एकमुखाने आवाज उठायचा! तेवढ्याच कुणीतरी माझ्या उशाशी उदबत्तीदेखील आणून लावली! 

शेवटी अगदी कळवळून मी ओरडलो, "अहो, असं काही नाही. मी जो हा उपास सुरू केला आहे--" 

"तो सोडा, पंत सोडा, सोडा!" नाट्यभैरव कुशाभाऊला नाटकात दुस-याची वाक्ये तोडायची इतकी भंयकर खॊड की 'भाऊबंदकी' त राघोबाचे काम करताना रामशाश्र्याच्या पार्ट्याने 'देहान्त प्रायश्रित्ता'तला 'देहान्त'म्हटल्यावर "प्रायश्रित्तावाचून गत्यंतर नाही!" हे न्यायधीशाचे उरलेले वाक्य आपण राघोबा आहोत हे विसरून त्याने स्वतःच म्हणून टाकले होते!

माझ्या भोवतालची गर्दी ह्ळूहळू वाढत होती. आमचे कुटूंबदेखील वस्तादच.आत जमलेल्या बायकांना काय काय सांगत होते परमेश्र्वर जाणे! स्वयंपाकघरातून बाहेर पडणारी प्रत्येक बाई 'हे या महाभागाचं आता अखेरचंच दर्शन!' असा चेहरा करून माझ्याकडे पाहायची आणि बाहेर पदायची. एरवी कुठल्याही बाईने माझ्याकडे वर डोळा करून पाहील्याचे मला आठवत नाही. उपासाचे निराळे निराळे म्हणतात ते 'तेज' इतक्या लवकर तोंडावर चढत असेल याची मला कल्पनाही नव्हती! ह्या सा-या जमावातून माझी सुटका करायला गजेंद्रमोक्षाच्या वेळी साक्षात श्रीविष्णू धावत आले तसे एच० मंगेशराव सोबत तबला आणि आपल्या सुस्वर पत्नी वरदाबाई यांना घेऊन आले. वरदाबाईंच्या हातात तंबोरा होता. 

"पंत, येकट डिवोशनल सॉंग म्हणायचं इच्छा आहे--" अशी प्रस्तावना करून माझ्या कॉटच्या पायथ्याशी मंगेशरावांनी सपत्नीक तळ ठोकला व वरदाबाईंनी मीराबाईच्या 'तूमबिन मोरी' त तोंड घातले. वरदाबाई 'गोवरधन गिरीधारी' पर्यंत पोचल्याही नसतील. इतक्यात सोटाछाप मलमातल्या जाहीरातीत जसे 'उंदरास पाहून मांजर' न्यायाने रोग पळतात तसे आमचे सारे शेजारी पळाले! खोलीत फक्त मी आणि हट्टंगडी कुटूंबाचे संगीत एवढीच शिल्लक राहीलो. वरदाबाईंच्या स्वरातले आणि त्याहूनही एच्च० मंगेशकरावांच्या तबल्यातले सामर्थ्य त्या वेळी मला ख-या अर्थाने प्रतीत झाले! 'खडी सभामें द्रौपधी ठाडी- राखो लाज (वरदाबाई 'राकौ लाज्ज' म्हणत होत्या) अमारी' म्हणताना वरदाबाई असा एकेक सूर लावीत होत्या आणि मंगेशराव तबल्यावर अशा काही करामती करीत होते, की एखाद्या वेळी गोवर्धनगिरिधारी माझ्या उपासाची 'खबर' घ्यायला ख्ररोखरीच येईल की काय अशी धास्ती मला वाटायला लागली! माझ्या पोटात विलक्षण कालवाकालव सुरू झाली. (ती त्या संगीतामुळे होती की भुकेमुळे होती हे अजुनही मला उमगलेले नाही.) हट्टंगडी दंपतीचे संगीत केव्हा संपले कोण जाणे, मी जागा झालो त्या वेळी रात्रीचे साडेदहा वाजले होते. 

पहिल्या दिवसाच्या उपवासात मी फक्त कॉफी, कॆळी, एक अंडे (उकडून), दोन संत्री, भुईमूगदाणे आणि भुईमूगदाण्यांनी पित्त होऊ नये म्हणून लिंबाचा रस, कॉफीने मला बद्दकोष्ठ होतो म्हणून दूध आणि दुध पचायला जड जाऊ नये म्हणून काळ्या मनुका आणि दोन चमचे मध एवढ्यावरच भागवले. 

दुस-या दिवशी सकाळी उठल्याबरोबर चाळीतले एकमेव साहित्यिक म्हाळसाकांत पोंबुर्पेकर यांनी 'चाळकरी' ह्या चाळीतल्या हस्तलिखित मुखपत्राचा अंक आणून, एखाद्या राज्याच्या सनदा अर्पण कराव्या अश्या नम्रतेने माझ्या हातात दिला. 

"पंत, उपोषण-विशेषांक आहे." पोंबुर्पेकर म्हणाला. 

वास्तवीक 'चाळकरी' दैनिकाच्या साधा अंक अजून निघालाच नाही. प्रत्येक अंक हा विशेषांकच असतो. आज उपोषण-विशेषांक, कालचा स्वच्छता-विशेषांक, त्यापुर्वी चाळपुनर्रचनासमीति-विशेषांक (गच्चीपुरवणीसकट), एकदा भय्या-विशेषांक, दुस-यांदा भाडे-विशेषांक, नळ-विशेषांक---असे विशेषांकावर विशेषांक काढायची ह्या पोंबुर्प्याला खोडच आहे! त्यामुळे त्याच्या उपोषण-विशेषांकाचे मला विशेष काही वाटले नाही. अंकावरील ठळक मथळा पाहून मात्र मी स्तंभीत झालो: 

"चाळीय ऎक्यासाठी पंतांचे आमरण उपोषण" 

"पोंबुर्पेकर--" मी अठरा तासांच्या उपोषणानंतर शरीरात उरलेले सारे त्राण (महीन्याच्या शेवटी बि-हाडातल्या फणीकरंड्याच्या पेटीपासून ते रावळीपर्यंतच्या दिडक्या-आणेल्या एकवटून अखंड रुपया जमवतो त्याप्रमाणे) एकवटून ओरडलो. माझ्या ओरडण्याने पोंबुर्पेकर तिळमात्र हलला नाही. त्याच्या प्रत्येक अंकानंतर कोणी ना कोणी त्याच्यावर असेच ओरडतो! 

"काय?" शांतपणे तो विचारता झाला. 

"कुठल्या गाढवानं सांगीतलं, की मी चाळीय ऎक्यासाठी उपोषण करतो आहे म्हणून?" 

"सगळे जण असंच म्हणताहेत--" पोंबुर्पेकर उद्गारला. 

"मग सगळे जण गाढव आहेत!" मी म्हणालो. इटंरला मी लॉजिक घेतले होते; त्यामुळे दोन प्रमेयांतून हा सिद्धांत सटकन बाहेर पडला आणि पोंबुर्पेकर चूप झाला. 

"माझा हा उपास अगदी खाजगी स्वरुपाचा आहे. त्याचा चाळीशी काय संबंध?" 

"असं कसं? समेळाकाका म्हणाले, की चाळीतल्या जातीयतेविरूद्ध तुम्ही हे उपासांच शस्र उगारलंत!" 

"समेळकाका गेला खड्ड्यात!"--मी. 

"ठीक आहे. पावशे म्हणाले, की हेडक्लार्कनं तुमची लिव्ह सॅक्शन केली नाही म्हणून कारकुनांच्या दुःखांना तोंड फोडण्यासाठी तुम्ही हा उपास म्हणुन तुम्ही उपास केला--" 

"पावशे गेला मसणात!"---मी 

"ठीक आहे. नाट्यभैरव कुशाभाऊ म्हणतो, की जनोबा रेग्यांनी त्यांचं टमरेल चोरण्याचा आरोप केला, म्हणून त्यांच्या मनाची शुद्धी व्हावी म्हणून तुम्ही उपास केला--" 

"जनोबा गेला--" वरच्या दोन वाक्यांत खड्डा आणि मसण ह्या जागा भरल्यामुळे जनोबाला कुठे पाठवावे हे मला सुचेना! त्यामुळे जनोबा गेला "ह्यात", असे म्हणून मी सर्वनामावरच भागवले. परंतु पोंबुर्प्यावर परिणाम झाला नव्हता. रेफ्रिजरेटरमध्ये मेंदू ठेवल्यासारखा तो वागत होता. 

"ठीक आहे! उद्याचा अंकात तुमचा खुलासा प्रसिद्ध करू." 

"काही गरज नाही. माझ्या उपासाशी चाळीचा काहे संबंध नाही." 

"मग कशाशी संबंध आहे?" पोंबुर्पेकर म्हणाला. 

"माझं वजन उतरवण्याशी!" 

"ऑं?" 

"हो!" 

"पण उपास हा समाजात आपलं वजन वाढवण्यासाठी करतात ना?" 

"मला ठाऊक नाही. हे पाहा--" मी खण उघडून वजनाचे कार्ड त्याच्या डोळ्यांपुढे नाचवीत म्हटले, "वाचा!" 

"आप बहूत समझदार है!" पोंबुर्पेकर वाचू लागला. 

"ते काय वाचता? वजन वाचा-- हे पाहा,बारा स्टोन आणि तेरा पाउंड." 

"फक्त तेरा पाउंड वजन तुमचं पंत--" 

"आणि 'बारा स्टोन' वाचलं ते काय बारा गुणिले चौदा म्हणजे किती?" 

"किती?" पोंबुर्पेकर. 

"किती?"--मी. 

"किती?"--पोंबुर्पेकर 

"किती?"--मी. 

"किती?"--- पोंबुर्पेकर. 

"किती-किती काय करता? चौदा गुणिले बारा--चौदं बारे?" "चौदं दाहे चाळाशे--म्हणजे चाळीस--" "ऎकशॆ चाळीस ! अधिक चौदा दुणे अठ्ठाविस, म्हणजे किती झाले?" 

"हो!" 

"हो काय?"--एकशेअड्डूसष्ट अधिक तेरा म्हणजे एकशे एक्यायशी पाउंड!" 

"कुणाचं वजन आहे हे?" पोंबुर्पेकर तोच थंडपणा चालू ठेवून म्हणाला. 

"तुझ्या बापांच! मला दुस-याची वजनं करायची आहेत काय? हे माझं वजन आहे." 

"असेल!" 

"असेल नाही--आहे! आता सांग, माझ्या वजनाशी चाळीचा काय संबंध? एकशे एक्यायशी पौंड वजन झालं माझं--ह्यातून उद्या मला मधुमेह होणार- ब्लडप्रेशर होईल, हार्ट ट्रबल होईल! मेलो पटकन तर चाळ येणार आहे का मदतीला?" 

"का नाही येणार?" पोंबुर्पेकर म्हणाला, "पावश्यांची आजी वारली तेव्हा--" 

"बाहेर हो!" त्याच्या थंडपणाचा कळस झाला होता.

"रागावू नका पंत. पण हे तुम्ही आधी का नाही लोकांना सांगितलं?" 

"पण तुम्ही माझं ऎकाल तर ना!" 

हळूहळू माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!' अशी वाक्यी माझ्या कानांवर येऊ लागली. पण मी कोणत्याही टिकेला भीक घालणार नव्हतो! 

'ऎकशे एक्यायशी पौंड'! रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वन्न कमी झाले पाहिजे, ह्या विचाराने माझी झोप उडाली! झोप कमी झाली तर वजन उतरते ह्या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही ह्यावर माझ्या धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. "घोरत तर असता रात्रभर!" अशासारखी दुरत्तरे मला करीत असे. 

"दोन महिन्यांत पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!" अशी भिष्मप्रतीज्ञा करून मी आहारशास्रावरच्या पुस्तकांत डॊके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्क्त द्र्व्ये, वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. सा-या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्याच 'कॅलरीज' मला दिसू लगल्या आणि आनंदाची गोष्ट अशी की, वजन उतरविण्याच्या शास्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनावारीने भेटू लागले. इतकेच्काय, परंतू ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच डाएटचा सल्ला दिला. 

उदाहरणार्थ, सोकजी त्रिलोकेकर-- "तुला सांगतो मी पंत, डाएट कर साला बटाटा सोड! बटाट्यांच नाव काढू नकोस!" 

"हो! ,म्हणजे 'कुठं राहता?' म्हणून विचारलं तर नुसतं 'चाळीत राहतो' म्हणा! 'बटाट्याची चाळ' म्हणू नका. वजन वाढेल! खीः खीः खीः!" 

जनोबा रेगे ह्या इसमला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय! पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. 

"ए ईडियट! सगळ्याच गोष्टींत जोक कय मारतोस नेमी? मी सांगतो तुला पंत--तू बटाटा सोड." मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरु झाली. 

"बटाट्याचं ठिक आहे; पण पतं आधी भात सोडा!"-एक सल्ला. 

"भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं? आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळी सोडा!"--काशीनाथ नाडकर्णी. 

"मुख्य म्हणजे साखर सोडा!" 

"मी सांगू का? मीठ सोडा!" 

"लोणी-तूप सोडा--एका आठवड्यात दहा पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेडक्लार्कच्या वाइफचं घटलं." 

"तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा!"--बाबुकाका. 

"स्मोकिंग सोडा." 

"दिवसा झोपणं सोडा." 

"खरं म्हणजे पत्ते खेळायंच सोडा! बसून बसून वजन वाढतं." 

आणि सगळ्यात कहर म्हणजे भाईसाहेब चौबळ म्हणाले, "पंत, नोकरी सोडा!" 

"काय, म्हणता काय?" 

"उगीच सांगत नाही. दिवसभर खुर्चीवर बसून बसून वजन वाढत राहतं. फिरतीची नोकरी बघा!"

काही धुर्त लोकांनी मला 'मुंबई सोडा' असाही उपदेश केला. हा उपदेश माझ्या वजनाकडे पाहून केला नसून चाळीतल्या दोन खोल्यांच्या जागेकडे पाहून केला होता, हे न कळण्याइतका मी काही 'हा' नव्हतो! फक्त 'बायको सोडा' एवढे सांगणारा महाभाग भेटायचा राहीला होता. एकाने भर ट्राममध्ये मला 'धोतर सोडा' असे सांगून, तिकीट वगैरे घेतल्यावर, 'आणि पॅंट वापरायला सुरुवात करा म्हणजे पटटा बांधून पोट आवळता येईल!" असा उत्तरार्ध पुरा केला होता. 

मी मात्र ह्य सर्व जनांचे ऎकून मनाचे करायाचे ठरविले होते. पहीला उपाय म्हणून तीनचार निरनिराळ्या काट्यांवर वजन करून पाहिले. प्रत्येक ठिकाणी निरनिराळे वजन आले; परंतु एकशे एक्यायशीच्या खाली जायला कोणताही काटा तयार नव्हता. शेवटी रेल्वे-पार्सल-हपिसातल्या काट्यावर हूंडेक-याच्या वशिल्याने मी उभा राहिलो; आणि शेरा-मणाच्या बंगाली मण, देशी मण ह्या भानगडींत माझे वजन कधी शंभर पौंडांखाली तर कधी दोनशे पौंडांवर असे बदलू लागले. तिकिटवाल्या काट्यात तर वजनाबरोबर भविष्य़ेही बदलत होती. एका तिकीटावर मी स्वभावाने धूर्त, आपमतलबी आहे असे छापले होते, तर दुस-यावर माझ्याइतका साधा माणूस 'दुनिया में क्वचितही मिलेगा' असे वार्तिक होते. एका काट्याने माझे वजन दोनशे तीन पौंड दाखवून माझ्यावर कौटुंबिक संकट कोसळणार असल्याची पूर्वसूचना दिली होती! ह्या सा-या प्रकारात मला फक्त चौदाचा पाढा 'चौदे सोळे चोवीसदोन' पर्यंत येऊ लागला, एवढाच फायदा झाला. शेवटी आपले वजन हपीससमोरच्या इराण्याच्या काट्यावर करायचे ठरवुन मी 'आहारपरिवर्तन' सूरू केले. 

साखरेत सर्वात अधीक क्यालरीज असतात म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला. पहील्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही, घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखटामिठावर उरकायची अक्त ताकीद दिली. "मुलांसाठी म्हणुन काय थोंड गोडाधोडाचं करांयच ते कर" एवढी सवलत ठेवली. पहील्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. भात अजीबात वर्ज्य करणे अवघड होते, म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्यावर आला. आणि नेहमीच्या भाजीत 'ही' निराळे काय करते ह्याचा अजुनही अंदाज आला नाही. पहीला दिवस सुरळीत गेला आणि दुस-या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला! 

पहील्या दिवशी निम्म्याहून अधीक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती; परंतु दुस-या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने सा-या सेक्शनला पार्टी दिली, भटाने तर माझ्या 'डाएट' वर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. बरे, न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार! बिचारा सहा वर्षांनी 'एफिशिएन्सी बार' च्या जाळ्यातून बाहेर पडला होता. भटाने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. घासाघासागणिक सहस्रवधी क्यालेअरीज पोटात चालल्या होत्या! त्यामूळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटेवडे होते-- म्हणजे आणखी क्यालरीज! चिवडा अस्सल 'वनस्पती'तला, त्यामुळे आणखी क्यालरीज. आणि एवढे सगळे हादडून शेवटी "भज्ज्यांशीवाय पार्टी कसली?" या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौडाने भटाला भज्यांची परत आर्डार दिली. शेवटी मला राहवेना! भज्यांची सहावी प्लेट उडवल्यावर, मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी 'डाएट'वर असल्याचे सांगीतल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले! 

"अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध ?" भिकोबा मुसळे म्हणाला. "मी बघ एकवीस गुलाबजाम खाल्ले--एवढंच काय, आपण तर आयुष्य़ात एक्सरसाईज नाही केला. तुझी कुभं रास नि कुभं लग्न आहे. नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार! लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे!" "नॉन्सेन्स!" जगदाळे ओरडला, "रनिंग कर रोज." 

"रनिंगपेक्षादेखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट चाळीस पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी!" कु० कमलिनी केंकरे म्हणाली. 

ह्या सर्व लोकांच्या सल्ल्यांत स्वतःची पत्नी, शेजारी, चुलतभाऊ अगर मामेबहीण यांची वजने उतरल्याचे दाखले होते; स्वतःचे उदाहरण द्यायला कोणी फारसा राजी नव्हता. रनिंग आणि दोरेवरच्या उड्यां ह्यांत एक 'मी पोहावे' अशीही उपसुचना येऊन फेटाळली गेली! शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी साताव्या बशीमधले भजे उचलले. 

कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. कारण रोज काही ना काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती दोन पडवळे उकडून तिने मला खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा, वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, कॉलीप्लॉवर, वगैरे बाळसेदार मंडळींची सैपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहादेखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. 

बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. ह्याविषयी विशेष चौकशी करता कुटुंबाकडून खुलासा मिळाला तो तिच्याच शब्दांत सांगणे बरे. "म्हंजे मी आपलं मनाशी म्हटलं- बंर का (वायफळ शब्दांचे डबे जोडण्यात बायकांचा हात धरणे अशक्य आहे.) की आपलं तुमचं हे वजनाचं काढलंय तुम्ही ते-- म्हंजे नीट ध्यानात घ्या बरं का मी काय म्हणत्येय ते, नाही तर उगाच डोक्यात राख घालाल! (अजून मुद्याला स्पर्श नाही!) हो, तुमच्या घराण्याचाच गुण आहे तो! नीट ऎकायचं नाही नि मग एकदम खेकसायचं, गेल्या वर्षी सासुबाई आल्या होत्या--" 

"चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढंच सांग. उगीच वायफळ बडबड नको मला!" 

"हेच ते-- म्हटंल ते उगीच?.. अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हांला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी!" 

"नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस?" 

"अहो. थोडीशीच राहीली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली. आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता!" 

"म्हणजे खलास! अग किती लाख क्यालरीज गेल्या असतील माझ्या पोटात! कसलं कमी होतंय माझं वजन? पण सांगीतलं का नाहीस मला?" 

"उगीच आरडाओरड नका करू. वजनांच ते काय मेलं? होईल हळूहळू कमी! आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही; स्वतःच कमवुन खातोय म्हणावं! वाढलं तर वाढू ते वजन." मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवीत आणि माझ्या वजनक्षय -संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली. "लाडू कशाला केलेस साखर असेल त्यांत!" 

"इश्श! साखरेशीवाय लाडू आमच्या नाही घरण्यात केले कुणी!" 

कुटुंबाचे 'घराणे' हा एक स्वतंत्र विषय आहे. वादाच्या कुठल्याही प्रसंगी स्वतःच्या 'सदावर्ते' घराण्याचा एकदा तरी उद्गार झालाच पाहीजे असा संकल्प आहे तीचा. आणि त्याच्या तुलनेने आमचे घराणे हे कसे 'सामान्य' आहे, हे एकदा दाखवले की ती 'सूटते'! तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रुपाने काही क्यालरीज पोटात गेल्याच! 

दोरीवरच्या उड्यांना फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली! कारण आठ गुणिले दहाच्या आम्च्या दिवाणखाण्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड! एकदा डोक्यावरून दोरी पलिकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली! दुस-यांदा अर्धवट गॅलरीत आणि अर्धावट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बाबा बर्व्यांच्या गळ्यात! त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपवास करतो हे कळल्यावर चाळीतली सर्व मंडळी 'समाचारा'ला येऊन गेली. परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असुनही आले नाहीत. कारण 'उपास' हे त्यांचे खास राखीव कुरण होते.

"हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं; पण तुमच्या वयाला न शोभणा-या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता, तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हांला क्षम करतो." 

"पण... मी हे मुद्दाम केलं नाही, आचार्य! अहो, वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी." 

"काही उपयोग होणार नाही!" 

"का?" 

"का म्हणजे? जिभेवर ताबा नाहे तुमच्या. संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील!" 

"आता ह्या उड्या मारायला मी लाजदेखील सोडली हे पाहता ना तुम्ही, बाबा?" 

"ठीक आहे. प्रथम बोलणं सोडा!" 

"बोलणं सोडू?" 

"अजिबात! खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही पंत; पण बोलण्यासाठीदेखील त्याचा वापर बंद केल्याशीवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही." 

"पण मला बोललंच पाहिजे, बाबा." मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. 

"का पण? एवढा संयम नाही तुमच्यात ? मौनांच सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही....." उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा एक तास 'मौनाचं महत्व' ह्या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्यप्रवाह अडवून मी ओरडलो, 

"पण बाबा, मी बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय!" "मी टेलिफोन-ऑपरेटर आहे बाबा. दिवसभर बोलावंच लागतं मला." 

"मग कसलं वजन उतरवणार तुम्ही?" 

अत्यंत कारूण्यपूर्व कटाक्ष 'टाकूनिया बाबा गेला'! आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मघाशी मी गच्च आवळली का नाही, ह्या विचाराने मला पश्र्चाताप झाला! 

मग मात्र मी चिडलो आणि निश्र्चय केला की बस्स. यापुढे उपास-वजन उतरेपर्यंत उपास! मला मी काटकुळा झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिनसाखरेचा आणि बिनदुधाचाच काय, पण बिनचहाचा-देखील चहा पिऊ लागलो! साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. केवळ फळांवर मी जगू लागलो. केळी पाहिली की मला त्यांतली जीवनसत्वे दिसून अनादी तत्व सापडलेल्या ऋषिमुनींप्रंमाणे अष्टसात्विक भाव माझ्या अंगावर दाटू लागले. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटु लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या 'दुष्टपणाने व आकसाने' केलेल्या तक्रारींमुळे थांबवाव्या लागल्या. दहा उड्या पाय न अडकता मारण्यापार्यंत मी पोचलो होतो. कचेरी सुटली की मी गिरगावरस्त्याने घावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ दहाबारा दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता! लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोज उपटून पाहतात त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला. पण मी ती इच्छा दाबून धरली. 

बरोबर एक महिन्याने मी वजन करणार होतो. एक महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दुध! दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. 'गायींना चारा'वाल्या बायांकडल्या गायी इथूनतीथून सगळ्या भाकड निघाल्या. केवळ चौकशीपोटी दोन रुपयांचा चारा गायींना चारावा लागला. दोन रुपयांत सोळ दुणे बत्तीस गायींची चौकशी केली. दोनचार वेळा त्याच त्याच गायीची चौकशी झाल्यामुळे चारावाली बाईही उखडली. पण एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले. पंधरवडाभरात फक्त दोन वेळा साखरभात झाला-एकदा अण्णा पांवश्याकडेस त्यनारायणाला आमचे मेहूण गेले होते तेव्हा आणि एकदा आमच्याच घरी मी उपास सुरू केला तेव्हा हिने सत्यनारायण 'बोलून' ठेवला होता. त्या दिवशी. त्याशिवाय सोकाजीने चोरून एकदा कोळंबीभात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी परसवटवारांनी एकदा नागपूरी वडाभात पाठविला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात केमी गेली. 

माझा एकूण निश्र्चय पाहून चाळीतल्या मंडळीचा आदर दुणावल्याचे माझ्या सुक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझी, माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करीत होती त्यांनीच "पंत, फरक दिसतोय हं!" अशी कबुली द्यायला सुरूवात केली. जनोबा रेग्यांसारखा अत्यंत कुजकट शेजा-यालाही "पंत, भलतेच की हो रोडावलेत!" असे मान्य करावे लागले. 

मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची---म्हणजे मूठभर मांस वाढण्याची! पण असली तुरळक तारीफ ऎकून मी चळण्यासारखा नव्हतो. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हानियंत्रणानंतर कमीत कमी विस ते पंचवीस पौंडानी तरी माझे वजन घटलेच पाहीजे, अशी माझी खात्री होती व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी ह्याच यंत्राने माझे वजन एकशेक्यांयशी पौंड दाखवले होते. एक महिन्याचा उपास, निराहार, शास्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या, इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकीटावर वजन.... मिनीटभर माझा विश्र्वासच बसेना! एकशेब्याण्णव पौंड! आणि भविष्य होते: 'आप बहूत समझदार और गंभीर है!" 

सुमारे सहा आणेल्या मी त्या यंत्रात टाकल्या ---वजन कायम. फक्त भविष्य बदलत होते. शेवटी 'आपके जीवन में एक स्री आयेगी' हे वाचल्यावर मात्र मी हात आवरला. हल्ली मी वजन आणि भविष्य ह्या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडुन दिले आहे. आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे, छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यांतून जातो.

- पु.ल. देशपांडे 
बटाट्याची चाळ 
a