Leave a message
Showing posts with label बाबासाहेब पुरंदरे. Show all posts
Showing posts with label बाबासाहेब पुरंदरे. Show all posts

Tuesday, April 21, 2020

बळवंत मोरेश्वर पुरंदरे

पु. ल. देशपांडे यांच्या “गणगोत” मधील बाबासाहेब पुरंदरे वरील लेख

मी त्या वेळी दिल्लीला सरकारी चाकरीत होतो. सुटीत मुंबईला आलो होतो. उत्तरेस कूच करण्यापूर्वी सोबतीला चार मराठी पुस्तके घ्यावीत म्हणून एका पुस्तकाच्या दुकानात शिरलो. केवळ योगायोगाने काउंटरवर पडलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड हाती पडला. साऱ्या महाराष्ट्रातल्या शुभदेवतांना केलेल्या सुरुवातीच्या आवाहनानेच मनावरची धूळ झटकली. “सुदिन सुवेळ मी शिवराजाच्या जन्माचं व्याख्यान मांडलंय-आई, तू ऐकायला ये” ही तुळजाईला घातलेली हाक जिवाला चेतवून गेली. त्या शिवचरित्रातला ‘उदो उदो अंबे’चा जागर म्हणजे महाराष्ट्राचा पाना- दोन पानांत उभारलेला सांस्कृतिक इतिहास आहे. बळवंत मोरेश्वर पुरंदरे नामक कोण्या इतिहासकाराने लिहिलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड वाचत मी काउंटरपाशीच खिळून राहिलो. ते दहाखंडी चरित्र विकत घेऊन मी निघालो. दिल्लीला पोचेपर्यंत अखंड चोवीस तासांच्या सफरीत ते दहाही खंड संपवले. आपण काही तरी अद््भुत अनुभवातून न्हाऊन बाहेर पडल्यासारखे वाटले. महाराष्ट्रात जन्माला आल्याच्या धन्यतेने मी फुलून निघालो होतो.

जगण्यासाठी महत्त्वाची गोष्ट मिळवावी लागते; ती म्हणजे जगण्याचे प्रयोजन. पुरंदऱ्यांना हे प्रयोजन वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षीच गवसले. एका ड्रॉइंग मास्तराच्या बळवंत नावाच्या मुलाला शिवनेरीच्या शिवरायाने झपाटले. त्या झपाटल्या अवस्थेतच त्यांच्या जीवनाचा प्रवास चालू आहे, यापुढेही चालणार आहे. इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे, भक्त आहे; पण त्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधान करायचे नाहीत, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. उगीचच ‘शिवाजी’ म्हटल्यावर हाताचे आणि जिभेचे पट्टे फिरवणे नाही. त्यांच्या अंतःकरणातला कवी मोहोरबंद, गोंडेदार भाषा लिहितो; पण हातातला इतिहासाचा लगाम सुटत नाही, वर्तमानाच्या रिकिबीतून पाय निसटत नाही की नजर डळमळत नाही.

पुरंदरे इतिहासात सहजतेने डुबकी घेतात. माशाला पोहायची ऐट मिरवावी लागत नाही, तशी पुरंदऱ्यांना शिवभक्तीचा दर्शनी टिळा लावण्याची आवश्यकता भासत नाही. आणि म्हणून जाणत्या इतिहासकारांनी घालून दिलेले दंडक सांभाळून शिवचरित्र आणि त्या अनुषंगाने इतर इतिहासविषयक लिखाण सामान्यांपर्यंत अत्यंत सचित्र भाषेत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. इतिहास संशोधन हे शास्त्र आहे याची त्यांना पक्की जाणीव आहे आणि म्हणूनच हा तरुण मोकळ्या मनाने सांगतो, की “माझ्या रचनेतल्या चुका दाखवा. पुढल्या आवृत्तीत दुरुस्त करीन. इतिहास ही माझी एकट्याची मिरास नाही. ते साऱ्यांचं धन आहे. त्यात कुठं हीण आलं असेल तर ते पाखडून फेकून द्यायला हवं! इथं वैयक्तिक अहंकार गुंतवण्याचं कारण नाही.” त्यांच्या शिवचरित्राच्या खास आवृत्तीच्या प्रकाशनाच्या दिवशी ते म्हणाले होते, “शिवाजीला मी माणूस मानतो, अवतार नव्हे. आजवर ठपका द्यावा, असा ह्या माणसाविरुद्ध सबळ पुरावा आढळला नाही. आढळला तर न लपवता तो शिवचरित्रात घालीन.” आणि म्हणूनच पुरंदरे ऐतिहासिक घटनांविषयी बोलताना कोणत्याही नाटकी अभिनिवेशाने बोलत नाहीत.

पुरंदऱ्यांची तपशिलांवरची पकड भलतीच कडक आहे. स्मरणशक्ती विलक्षण. त्यांच्याशी बोलताना-म्हणजे ते बोलत असून आपण ऐकत असताना-इतिहास हा वर्तमानापासून तुटला आहे असे वाटतच नाही. अतिशय रंगतदार भाषेत बोलतानादेखील इतिहासकार म्हणून ते एक प्रसन्न अलिप्तपणा सांभाळू सकतात. आज इतकी वर्षे मी त्यांच्या तोंडून शिवचरित्रातले प्रसंग ऐकतो, पण कधी मुसलमान व्यक्तीचा मुसलमान म्हणून त्यांनी तुच्छतापूर्वक उल्लेख केलेला मला स्मरत नाही. परधर्मीयांची कुचेष्टा नाही. अवहेलना नाही. इतिहास ही वस्तू अनेक जण अनेक कारणांनी राबवतात. खुद्द शिवाजी महाराजांचे चित्र दुसऱ्या महायुद्धात रिक्रूटभरतीसाठी राबवले होते. “सोळा रुपये पगार, कपडालत्ता फुकट…शिवाजी न्यायासाठी लढला” हे पोस्टर अजून आठवते. काहींना इतिहासातले नाट्य रुचते. काहींचा रोख आजवर झालेले इतिहास संशोधन चुकीचे होते आणि आपलेच कसे खरे हे अट्टहासाने दाखवण्यावर असतो. इतिहासाचे काही भक्त तर सदा उन्मनी अवस्थेतच असल्यासारखे वागतात. उगीचच ‘रायगड रायगड’ करीत उड्या मारण्याने शिवरायांवरची आपली निष्ठा जाज्वल्य असल्याची लोकांची कल्पना होते, अशी यांची समजूत असावी; पण शिवाजी महाराजांच्यावर प्रेम असायला प्रत्येक किल्ल्याचा चढउतार केलाच पाहिजे, असे मानायचे कारण नाही.
      
दरवर्षी रायगडावर जाऊन डोळे गाळायचे ही शिवभक्ती नसून शिवभक्तीची जाहिरात आहे. आणि म्हणूनच गड-कोटांविषयी पुरंदरे बोलायला लागले की शिवाजी महाराजांच्या जीवनाचे मूळ सूत्र जो विवेक न गमावता ते रंगून बोलतात, म्हणून मला त्यांचे कौतुक अधिक वाटते. स्वतःच्या डोळ्यात आधीच लोटीभर पाणी आणून ऐतिहासिक कथा सांगण्याचा देखावा त्यांनी कधी केला नाही-ते करणारही नाहीत. कारण त्यांनी इतिहासाकडे “हरहर ! गेले ते दिवस!’’ असले उसासे टाकीत पाहिले नाही.

पुष्कळदा वाटते की, त्यांनी शिवचरित्र कसे लिहिले याचा इतिहास एकदा लिहावा. किती निराशा, कसले कसले अपमान, केवढी ओढग्रस्त! त्यातून पुरंदऱ्यांचे खानदान मोठे! वडील भावे स्कुलात ड्राॅइंग मास्तर. पर्वतीच्या पायथ्याशी पुरंदऱ्यांचा वाडाही आहे. भिक्षुकी, मास्तरकी हे व्यवसाय अफाट दैवी संपत्तीचे धनी करणारे. त्या धनातून मंडईतली मेथीची जुडीदेखील येत नसते. महागाईच्या खाईत भारत इतिहास संशोधक मंडळाकडून मिळणारे माहे पाऊणशे रुपये घेऊन पुरंदऱ्यांनी संसार सजवला. रुपयांचा अखंड शेकडा एकजिनसी न पाहिलेले ग. ह. खरे हे पुरंदऱ्यांचे गुरू. ऋषी हा शब्द फारच ढिलेपणाने वापरला जातो; पण ऋषी म्हणावे अशी खऱ्यांसारखी माणसे क्वचित आढळतात. खऱ्यांचे सहायक म्हणून पुरंदऱ्यांनी खूप वर्षे भारत इतिहास संशोधक मंडळात काम केले.

वर्तमानातून इतिहासात पुरंदरे अगदी सहजतेने डुबकी घेतात. हा माणूस किती शांतपणे माणसांच्या अंगावर रोमांच उभे करतो. कुठेही राणा भीमदेवी थाट नाही, अश्रुपात नाही, मुठी आवळणे नाही. त्या पूर्वदिव्यावर पडलेल्या कालवस्त्राला अलगद दूर करून पुरंदरे इतिहासाचे दर्शन घडवतात. त्यांना वक्तृत्वाची देणगी आहे. शब्दकळा तर अतिशय साजरी आहे. सूक्ष्म विनोदबुद्धी आहे. पण ही सारी लक्षणे मिरवीत येत नाहीत. भाषेच्या अंगातून अलगद ओसंडत असतात. कुठलीही ऐतिहासिक घटना पचवून ते लिहितात किंवा बोलतात. “मला अमुक एक ऐतिहासिक कथा ठाऊक नाही, किंवा निश्चित पुरावा नाही म्हणून मी मत देत नाही” हे सांगायची त्यांनी भीती वाटत नाही.

इतिहास हा आम्ही हातच्या कागदपत्रांइक्याच वयाने आणि त्याहूनही मनाने जीर्ण लोकांच्यावर सोपवलेला विषय समजतो. अशा वेळी शिवचरित्राच्या रूपाने त्या इतिहासाचे पाठ लोकमानसात नेऊन सोडणाऱ्या पुरंदऱ्यांचे खूप कौतुक व्हायला हवे होते. त्यांनी इतिहासकाराची पंडिती पगडी चढवली नाही. कुणाही पंडिताने धन्योद््गार काढावेत इतका अभ्यास केला आणि मांडला मात्र गद्यशाहिरासारखा. त्या चरित्राला ते आधारपूर्वक लिहिलेली बखर म्हणतात. इतिहास हा “माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळण्यापर्यंत गेला पाहिजे. इतकंच नव्हे, तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकी-सुना गरोदर असतील त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,” असे म्हणणारा हा इतिहासकार मला तरी आमच्या आजवरच्या भारतीय इतिहासकारांपेक्षा एक निराळी – लोकशाहीला अत्यंत पोषक भूमिका घेऊन उभा राहिलेला दिसतो.

वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षापासून आजतागायत आपल्या सुखाचे, स्वास्थ्याचे नव्हे, तर आयुष्याचे दान देऊन गोळा केलेले हे शिवचरित्राचे हे धन. एका मास्तरचा हा मुलगा शिवरायाचे चरित्र आठवीत आडरानातल्या वडपिंपळाखाली पालापाचोळ्याचे अंथरूण आणि दगडाची उशी करून झोपला. हल्ली रस्त्यारस्त्यातून जिल्हा परिषदेच्या जीपगाड्या धावताना आढळतात.

शिवाजी महाराजांच्या पावलांच्या खुणा शोधत जाणाऱ्या पुरंदऱ्यांना कोण जीपगाडी देणार! पार्लमेंटात हात वर करण्यापुरते जागे असणाऱ्या सभासदांना आसेतुहिमाचल आगगाडीच्या पहिल्या वर्गाचा फुकट पास असतो. पुरंदरे कुठल्याशी गावी कागदपत्रं मिळायची शक्यता आहे, हे कळल्यावर थर्ड क्लासच्या खिडकीपाशी तिकिटासाठी रांग धरून उभे असतात !

निरनिराळ्या जागा धरून किंवा अडवून ठेवण्याच्या ह्या युगात उदात्त वेडाने झपाटलेली माणसे एकूणच कमी. बाराशे मावळे दीड लाख मोगली फौजेचा धुव्वा उडवीत होते. कारण ते बाराशे मावळे “हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा!” ह्या शिवाजीराजाने त्यांच्या कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले होते. कोणत्याही कार्याच्या सिद्धीला असा एखादा मंत्र लागतो; पण सिद्धीपेक्षा प्रसिद्धी मोठी, अशी भावना रुजायला लागते तेव्हा माणसांची बाहुली होतात. पुरंदरे शिवाजीचे चरित्र गाईन हा संकल्प सोडून जगताहेत. इतिहासाच्या त्या धुंदीत वावरणाऱ्या पुरंदऱ्यांना वर्तमान आणि भुताची चित्रे एकदम दिसतात. हे दिसणे भाग्याचे ! ही भाग्याची वेडे !

– पु. ल. देशपांडे

Wednesday, August 1, 2012

॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥

१९६४-६५ च्या सुमारास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्रावरील भाषणांचा कार्यक्रम मुंबईत विलेपार्ले येथे पु. ल. देशपांडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. पु. लं. नी बाबासाहेबांना लिहिलेले मानपत्र त्याप्रसंगी काढण्यात आलेल्या स्मरणिकेत प्रसिद्ध झाले होते. आज ती स्मरणिका उपलब्ध नाही. परंतु पु. लं. च्या हस्ताक्षरात सापडलेला हा कच्चा खर्डा पु. लं. चे मानसपुत्र दिनेश ठाकूर यांनी खास ‘लोकसत्ता’साठी उपलब्ध करून दिला.. आज नव्वदी पार करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या झपाटल्या व्यक्तिमत्त्वाचा हा ‘पुल’कित प्रत्यय..


श्री बलवन्त मोरेश्वर तथा बाबा पुरंदरे यांसी-
शिवराय मंडळाच्या समस्त सदस्यांचे आणि हितचिंतकांचे सादर प्रणाम.
आपणास मनापासून जी गोष्ट मानवत नाही, ती आज आम्ही करीत असल्याबद्दल प्रथम आपली क्षमा मागतों. आपल्या स्नेहाचा मान लाभलेले आम्ही आपले सवंगडी आहों. मानसन्मानापासून अलिप्त रहाण्याचा आपला स्वभावधर्म आम्हास ठाऊक आहे. आपला स्नेह हा जसा आमचा सन्मान आहे, तसाच त्या स्नेहापोटी आम्हाला आपल्यापाशीं कांहीं हट्ट धरण्याचा अधिकारही आहे. त्या अधिकारापोटींच आम्ही ह्य़ा मानपत्राचा स्वीकार करण्यास आपणास भाग पाडणार आहों.

‘शिवरायाचे आठवावे चरित्र। शिवरायाचा आठवावा प्रताप।’ ही ऊर्मी आपण आमच्या मनांत उत्पन्न केलीत. जिथे कोणी कोणाचा नाहीं ह्य़ा भावनेपरती दुसरी भावना निर्माण होत नाहीं अशा ह्य़ा अफाट मुंबई शहरांत आपण शिवरायाचे चरित्र आमच्यापुढें उलगडून दाखवलेत आणि आमची अंत:करणे एका अलौकिक आणि चैतन्यमय बंधनाने एकत्र आणलीत. कैलासापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या ह्य़ा अफाट देशाला आपण सारे एका नात्यानें, पावित्र्याच्या एकाच कल्पनेने बांधलेले लोक आहों.. ह्य़ा लोकांचे हिंदवी स्वराज्य असावे ही श्रीं ची इच्छा आहे.. हा एकतेचा पहिला पाठ देणाऱ्या श्री शिवरायाच्या चरित्राच्या वाचनानें आमच्या मनातली किल्मिषें दूर झाली. परकीयांच्या अमलाखालीं केवळ स्वरक्षणार्थ बाहेर पडणाऱ्या म्यानांतल्या तलवारीच गंजत नाहीत, तर मनेही गंजतात. प्रथम घासूनपुसून उजळावी लागतात ती मनं. मनं उजळली की मनगटं उफाळतात. साडेतीन हात उंचीच्या मावळ्यांची भेदरलेली मनं सह्य़ाद्रीच्या गगनचुंबी कडय़ाएवढी उंच आणि कणखर करणाऱ्या शिवरायांच्या चरित्राचे आपल्या तेजस्वी शैलीतले लेखन हा आजच्या निराशजनक वातावरणांत आम्हाला दिसलेला पहिला आशेचा किरण.

श्री शिवरायांच्या महान कार्याला प्रत्यक्ष प्रारंभ होण्यापूर्वीचा तो पारतंत्र्याचा काळ. आपल्याच शब्दांची उसनवारी करून सांगायचं म्हणजे- हुंदकादेखील मोठय़ाने द्यायचा नाहीं असली दुरवस्था. साऱ्या जनतेची अवस्था ‘कोठें जावे, काय करावें’ अशी व्हावी ह्य़ात नवल नव्हतं. पण आज तर आम्ही आमचे धनी आहों, तरीही मनाच्या तसल्याच अवस्थेंत जगण्याचा प्रसंग उभा रहावा ही अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट. सर्वत्र निराशा. सर्वत्र अपेक्षाभंग. सर्वत्र ध्येयहीनता. असल्या ह्य़ा काळांत आपल्या अभ्यासिकेतला दिवा मात्र रात्र उलटून गेली तरी जळत होता. भोवती महागाईची खाई पेटलेली. पण आपण पानात पडलेल्या चतकोराला पक्वान्न मानून शिवचरित्राच्या लेखनांत रंगला होता. जिथे जिथे श्री शिवरायाचे चरण उमटले, त्या त्या ठिकाणची यात्रा करीत होता. जिवाची तमा न बाळगतां गडकोट चढत होतां. शिवचरित्राच्या ध्यासात रानावनातल्या काटय़ाकुटय़ांची आपल्या पायदळी जणु मखमल होत होती. भीषण रात्री, पावसाळी वादळें, अंगी चिकटून रक्त शोषण करणाऱ्या जळवा यांची तमा न बाळगतां शिवकालातला एखादा शिलालेख, एखादा कागद, एखादी नोंद, एखादे नाणे, एखादं शिवकालीन शस्त्र.. नव्हे, जिथे ह्य़ा हिंदवी स्वराज्यासाठी देहाची चाळण केलेल्या शिलेदार बारगिराच्या रक्ताचा थेंब सांडला असेल तिथली माती भाळी लावण्यासाठी आयुष्याची थोडीथोडकी नव्हेत, तर वीस र्वष आपण एखाद्या परिव्राजकाच्या निष्ठेने हिंडत राहिलात.

बाबासाहेब,
असल्या ह्य़ा तपश्चर्येतून निर्माण झालेले आपले शिवचरित्र. मुळांतच ओजस्वी. हिऱ्यासारखे लखलखणारे. त्या हिऱ्याला आपल्या तप:पूत प्रतिभेचे अलौकिक कोंदण लाभलें. आपण स्वत: इतिहासकार न म्हणतां बखरकार म्हणवतां. विद्वान न म्हणवतां शाहीर म्हणवतां. पण इतिहास म्हणजे केवळ तपशिलांची जंत्री नव्हे. इतिहासानें देशाचे शील दाखवावे; केवळ तपशील नव्हे. शिवरायाच्या स्मरणानें आपल्या भावना उफाळून येतात. ज्यांची अंत:करणे पूर्वजांच्या उपकारांची कृतज्ञता स्मरतात, ती उफाळून येणारच. शिवचरणांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या कडय़ाकपाऱ्यांच्या दर्शनाने जी अंत:करणे उचंबळून येत नाहीत त्यांच्या दुर्भाग्याची त्या दगडी कडेकपाऱ्याही कींव करीत असतील. पण आपल्या भावनांना शास्त्रकाटय़ांची कसोटी लागलेली असते. निरुपणामागे खात्री-पुराव्यांचे आधार असतात. प्रतिभेचे वारू सत्यावरची मांड सोडून उधळत नाही. प्रतिभेला परिष्करणाची जोड आहे. प्रज्ञेची धगधगती ज्वाला आहे. आपण शिवरायाच्या ठिकाणी सश्रद्ध आहात; अंधश्रद्ध नाहीं. आणि म्हणूनच आजच्या युगातही आमच्या अंतकरणाला स्पर्श करून जाते तें शिवचरित्रातील अंतर्यामीचे तत्त्व. लढायांचा तपशील नव्हे.
ज्या राज्यात अन्यायाचा नि:पात होईल, पापी माणसाला शासन होईल, शीलाचा सन्मान होईल, चारी धामाच्या तीर्थयात्रा सुखरूप पार पडतील, ज्याचा जो देव असेल त्याची उपासना तो तो निर्वेधपणे पार पाडील, शेतातल्या धान्याला शत्रूचा धक्का लागणार नाही आणि माताभगिनींच्या हातची कंकणं अखंड किणकिणत राहतील, असल्या शांतितुष्टिपुष्टियुक्त राज्याचे स्वप्न शिवरायांनी पाहिले. आपल्या आचरणानें प्रत्यक्षात आणले. आपण तो सारा चरित्रपट आमच्या डोळ्यांपुढे उभा केलात. आमच्या गंजू पहाणाऱ्या मनांना मानाने जगण्याचा अर्थ शिवचरित्रातून उलगडून दाखवलात.
बाबासाहेब, त्या कृतज्ञतेची ही पावती आहे. मानपत्राची भाषा आम्ही जाणत नाहीं. छत्रपतींच्या मावळ्याइतक्याच रांगडय़ा बोलीशी परिचय असलेले आम्ही आपले स्नेही. आपले संकल्प थोर. त्या संकल्पाचा जगन्नाथाचा रथ एकटय़ानें ओढण्याचे आपले सामथ्र्य आम्ही जाणतो. पण त्या रथाच्या दोराला आम्ही हात घातला तो आमच्या पदरी चिमुकल्या पुण्याचा संचय व्हावा म्हणून. शिवचरित्राचे सहस्रावधी श्रोत्यांपुढे आपल्या ओजस्वी वाणीने निरुपण करून आपण लक्ष रुपये समाजकार्याला देण्याचा संकल्प पार पाडलात. आज भोवताली द्रव्यलालसेची आणि सत्तालालसेची हिडिस भुतें नाचत असताना, केवळ आर्थिक गरिबीचा वसा घेतलेल्या शिक्षकाच्या आपल्यासारख्या सुपुत्राने लक्ष रुपये मिळवण्याचा संकल्प करायच्या या काळात लक्ष रुपये मिळवून एका महान कार्याला ते ‘इदं न मम’ ह्य़ा भावनेने अर्पण करण्याचा संकल्प करून तो पुरा करावा, हा एक चमत्कार आहे. व्यवहारी जगात हे वेड ठरेल. पण व्यवहारी जगाला ही भाग्याची वेडं कळत नाहींत. आम्ही आमच्या दुबळ्या डोळ्यांनी आणि चिमुकल्या अंत:करणांनी आपला हा पराक्रम पाहून चकित झालों आहोत. अंतर्यामी समाधान एवढेच, की ह्य़ा कार्यात आपल्यासोबत चार पावलें चालण्याचे भाग्य आम्हाला लाभले.
बाबासाहेब, हे महान कार्य करण्याची जिद्द आपणांत श्री शिवरायांच्या चरित्रामुळे निर्माण झाली हे तर खरेंच; परंतु आपल्या जीवनातल्या सहचारिणीचा- सौभाग्यवती निर्मलावहिनींचा गौरवपूर्वक उल्लेख केलाच पाहिजे. यज्ञकर्म हे यजमान आणि यजमानपत्नी दोघांनी जोडीने केले तर सफल होते. आपण मांडलेल्या शिवचरित्राच्या वाग्यज्ञातले आपल्या सहधर्मचारिणीचे स्थान फार मोठे आहे. आपला यज्ञ निर्वेध चालावा म्हणून विकल्प निर्माण करणाऱ्या कुठल्याही प्रसंगाची झळ आपणापर्यंत पोहोंचू न देण्याचे सौ. निर्मलावहिनींचे कार्य हे यज्ञातल्या संरक्षक देवतेसारखे आहे अशी आमची मनोमन धारणा आहे. म्हणून हे मानपत्री त्यांना आमचे लक्ष प्रणाम.

बाबासाहेब, महन्मंगल कुलस्वामिनी श्री जगदंबेच्या चरणी आमची शेवटी एकच प्रार्थना आहे कीं, आपणा उभयतांना आणि आपल्या सुकन्या-सुपुत्रांना उदंड यश आणि दीर्घायुरारोग्य लाभों. आपल्या महान कार्यात आम्ही सहाय्य तें कसले करणार? पण शिवचरित्राच्या कार्यविषयक चाकरी सांगावी, आम्ही इमानाने पार पाडू असे अभिवचन देतो. आम्हास साक्षात् रोहिडेश्वराची आण. सेवा करावया लावा। देवा हा योग्य चाकर.

लोकसत्ता 
रविवार , २९ जुलै २०१२

हा लेख ब्लॉगसाठी सुचविल्याबद्दल पिनाकीन गोडसे ह्यांचे आभार.

a