Leave a message
Showing posts with label मालवणी. Show all posts
Showing posts with label मालवणी. Show all posts

Thursday, December 4, 2014

पु.ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट - गंगाराम गवाणकर

                      
साठ प्रयोग होईपर्यंत वस्त्रहरण नाटक सुमारे ऐंशी हजाराच्या तोट्यात होते. या नाटकाचा एक प्रयोग पुण्यात करून नाटक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. टिळक स्मारक मंदिरात रात्री वस्त्रहरणचा प्रयोग होता. ह्या नाट्यगॄहात येणा-या प्रेक्षकांना गुदगुदल्या केल्या तरी हसायला येणार नाही, असा प्रेक्षकवर्ग तिथे असताना त्यांना आपल्या नाटकातून हसवणं हे आमच्यासाठी आव्हानच होतं. त्यात पु. ल. देशपांडे यांनी नाटकाची बारा तिकीटं घेतली होती. पहिल्याच रांगेत पु. ल. होते. ज्या माणसाने आयुष्य नाटकात घालवलं अशा माणसाला हसवणं म्हणजे कठीणच होतं, त्यामुळे पोटात गोळाच आला होता. त्यावेळी मच्छिंद्र कांबळीला मी म्हटलं "आज आपली खरी कसोटी आहे, आज जर आपण जिंकलो ना तर ठीक आहे." पण नाटक सुरू झाल्यानंतर सहाव्या मिनिटाला पुलं हसायला लागले. त्यांना हसताना बघून माझ्या मनात आशा निर्माण झाली. पुण्यातील प्रेक्षकांना मालवणी कळणार नाही म्हणून जमेल तेवढा प्रयोग मराठीतच केला होता.

प्रयोग संपल्यानंतर प्रचंड खूष झालेले पु. ल. रंगपटात आले आणि म्हणाले "गवाणकरांनू हसल्यानंतर जा जा दुखाचा हा ना ता सगळा दुखूक लागला". त्यांनी सार्‍या कलावंतांचे तोंड भरून कौतुक केले. पण जाता जाता ते म्हणाले, "गवाणकर तुमचा ह्या नाटक मराठीत पाहताना माका मालवणी कोंबडी गरम मसाल्याशिवाय खाल्ल्यासारखी वाटला. एकदा संपूर्ण नाटक माका मालवणीत बगूचा आसा तुम्ही पुन्हा प्रयोग कराल ना तर मालवणी पंच टाका, महाराष्ट्रात कुठेही प्रयोग असला तरीही मी येईन." हे सांगता सांगता त्यांनी यात अटही घातली, ‘हा प्रयोग कितवाही असू दे, त्या प्रयोगाचं अध्यक्षस्थान मी करणार आणि हा प्रयोग शिवाजी मंदिर येथे करायचा." २६ जानेवारी १९८१ रोजी पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली या नाटकाचा १७५वा प्रयोग झाला. (पुलंनी त्या प्रयोगाच्या वेळी केलेले तुफान अध्यक्षीय भाषण खालील चित्रफितीत ऐकता येईल.)
काही दिवसांनी पुलं यांचं पत्रसुद्धा आलं आणि त्यातली शेवटची ओळ अशी होती की, "हे नाटक बघण्यापेक्षा मला या नाटकात छोटीशी भूमिका मिळाली असती तर मी स्वत:ला भाग्यवान समजलो असतो." एखाद्या थोर साहित्यिकाने दिलेली ही थाप आमच्यासाठी खूप मोठी होती. नाटकाची जाहिरात करताना त्यांनी पत्रात जे काही लिहिलं होतं त्यातली एक-एक ओळ त्यात टाकली आणि त्यानंतर प्रत्येक प्रयोगाला हाऊसफुल्ल चा बोर्ड लागायला लागला. वस्त्रहरण नाटक पु. लं. चं पत्र टप्प्याटप्प्याने जाहीर झाल्यानंतर चालायला लागलं ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. पुलं यांनी माझ्या नाटकाचं कौतुक केलं आहे, हे लोकांना कळलं तेव्हा लोकांनी त्यांना पत्रं पाठवली आणि त्यांना विचारलं ‘या नाटकात एवढं कौतुक करण्यासारखं काय आहे?’ यावर पुलं यांनी उत्तर दिलं, ‘परमेश्वर काहींना वास घेण्यासाठी नाक देतं नाही तर मुरडण्यासाठीच नाक देतो.’ त्यांनी माझ्या नाटकाचं कौतुकच केलं नाही तर पाठिंबाही दिला. एका थोर साहित्यिकाच्या शाबासकीमुळे ‘वस्त्रहरण’ या नाटकाला मोठय़ा संख्येने प्रेक्षक येऊ लागले. प्रेक्षकांची संख्या कित्येक पटीने वाढली आणि तिकीटं ब्लॅकने जाऊ लागली. नंतर या नाटकाने मागे वळून पाहिलं नाही. पुलं यांनी लिहिलेलं ते पत्र मी माझ्या ‘व्हाया वस्त्रहरण’ या पुस्तकात जसंच त्या तसं छापलंय.
                                       
पुलं यांच्या त्या पत्रामुळेच माझं नाटक चाललं. पुलंनी पाठीवर थाप दिली आणि तेव्हापासून नाटकाची जी घोडदौड सुरू झाली जी आजतागायत सुरू आहे. म्हणूनच पु. ल. माझ्यासाठी आणि 'वस्त्रहरण'साठी टर्नींग पॉइंट ठरले.

- गंगाराम गवाणकर
a