Leave a message
Showing posts with label हसवणूक. Show all posts
Showing posts with label हसवणूक. Show all posts

Friday, July 19, 2024

फलाट

आदर्श टुमदार सुंदर खेड्याबद्दल माझ्या काही अपेक्षा असतात. त्या खेड्याच्या उशाशी टेकडी असावी. त्या गावाच्या गळ्यात जाता जाता लडिवाळपणे हात टाकून गेलेली नदी असावी. घाटदार कळसाचे देऊळ असावे. गावाच्या पाठीशी पहाऱ्याला रमे असलेले उंच आकाश-निंब असावेत. पिंपळाचा पार असावा. त्या पारावर घडलेली कहाणी असावी. गावाकडून वाट मुरडत मुरडत यावी आणि एखाद्या अगदी चिमुकल्या स्टेशनाला मिळावी. स्टेशन इतके चिमुकले हवे की, तिथल्या फलाटाला "प्लॅटफॉर्म" म्हटलेले ऐकल्यावर त्याने लाजावे! एखाद्या शेतकऱ्याच्या धाकल्या सुनेला तिच्या माहेरच्या माणसाने "काय पाटलीणबाई" म्हटल्यावर ती लाजेल, तसे लाजावे !

असल्या ह्या चिमुकल्या फलाटाचे मला विलक्षण आकर्षण आहे. तिथे एखाद-दोन येणाऱ्या आणि एखाद-दोन जाणाऱ्या एवढ्याच पाशिंजर गाड्या थांबाव्या. भुकेची वेळ झाल्यावर पाळण्यातले तान्हे जसे चुळबुळते, तसे गाडी येण्या-जाण्याच्या सुमाराला थोडेसे जागून झोपणारे स्टेशन हवे ! सकाळच्या पाशिंजरला कोण आले न् सांजच्याला कोण गेले, हे साऱ्या गावाला कळावे. असली जवळीक असलेला फलाट, आणि "काय पाटील
, आकाताई चालल्या का सासरी ?" म्हणणारा स्टेशनमास्तर आणि ''अगऽ आन्सूये, पोराला कुंची बांधावी का न्हाइ नीट ? वारं कसं झणाणतंय - सर्दी भरली म्हंजी मऽग ?” म्हणणारा निळ्या कपड्यांतला, कपाळाला बुका न् गळ्यात तुळशीमाळ घातलेला पोर्टर हवा. मग मास्तरसाहेबांस्त्री पाटलाच्या पोरीचा भर फलाटावर वाकून नमस्कार बडावा, आणि "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव" म्हणताना जमशेटपूर किंवा असल्याच दूरच्या ठिकाणी दिलेल्या आपल्या मुलीच्या आठवणीने मास्तर आपले गहिवरणे दडवायला "सेवण्टीन अप लेट आहे आज..." म्हणत खिडकीशी आलेल्या माणसाला तिकीट द्यायला निघून जावेत. असल्या आपुलकीचा फलाट !

गावंढी माणसे शब्दांचे टोचणारे कोपरे काय सुरेख घासतात. प्लॅटफॉर्मचा 'फलाट' करतील. स्टेशनाचं 'ठेसन' झाल्याबरोबर त्याला प्राण आला. ठेसनाला जीव आहे. 'स्टेशन' हे टाइमटेबलातल्या नामावळीत ठीक आहे. पण 'ठेसन' म्हटल्यावर तिथे तहेतऱ्हेच्चे भाव दाटतात. "पोचल्याबराब्बर कार्ट टाकायचं बरं अंतुल्या, इसरायचं न्हाई..." इथपासून "बराय... बघू पुन्हा केव्हा जमतं ते. सध्या लीव्ह-बीव मिळवायची म्हणजे देअर आर हंड्रेड अँड वन् डिफिकल्टीज..." इथपर्यंत असंख्य भाव दाटतात. काही बोलके, काही मुके- म्हणून अधिक बोलके, लोकांच्या अनवाणी आणि पायताणी तळव्यांची भृगुचिन्हे मिरविणाऱ्या ह्या फलाटांनी काय काय म्हणून पाहिले असेल ! कान लावून फलाटाचे बोलणे ऐकता आले पाहिजे.

- पु. ल. देशपांडे
काही अप - काही डाउन 
हसवणूक
 

Monday, June 10, 2024

मांजर

हल्ली मांजरे उंदीर पकडीत नाहीत हे मी स्वानुभवावरून सांगतो. आमच्या घरी उंदीर झाले. गेल्या युद्धात रूझवेल्ट, चर्चिल आणि स्टालिन कुठेसे भेटले होते, त्याच सुमाराची गोष्ट आहे. घरात सर्वत्र उंदीर झाले होते. उंदराच्या गोळ्या खाऊनही ते जिवंत राहत. रात्रंदिवस खुडखूड चाले. सापळे झाले. पिंजरे झाले. ओली पिंपे आणली. आता पिंपे ओली करायची, की उंदीर ओले करून त्यांत टाकायचे, ह्यावर घरात मतभेद होता. शेवटी नाइलाजाने मांजरी आणली.

प्राणिपालनाविषयी आमच्या खानदानात कुणालाच फारशी आस्था नाही. षौकाने काहीतरी ठेवून असावे असे कुणाला कधी वाटले असल्याचा कुठेच पुरावा नाही. प्रस्तुत मांजरी ही केवळ विशिष्ट कामगिरीवर ठेवण्यात आली. परंतु ह्या मांजरीने घरातल्या दुधाशिवाय आपण होऊन दुसऱ्या कशालाही तोंड लावले नाही. घरात रिकामी घाट असती, तर आमच्या उंदरांनी एखाद्या बोक्याच्या अध्यक्षतेखाली तिच्या गळ्यात समारंभपूर्वक बांधली असती याची मला खात्री आहे. फार काय, समोरून दोनतीन उंदीर चाल करून आले, तर हीच पांघरुणात लपायची. हे म्हणजे नौसेनादलाच्या एखाद्या रिअर अॅडमिरलला मालवणच्या बंदरातला पडाव लागून उलट्या होण्यापैकी आहे. पण आमच्या नशिची आलेली मांजरी तशीच होती. आणि पडाव लागण्याचा प्रकार भारतीय नौसेनादलात अगदीच अशक्य आहे, असेही मानण्याचे कारण नाही. एके दिवशी मांजरीकडून कसलीच झटापट होत नाही हे पाहून ते उंदीर आल्या वाटेने हताश होऊन निघून गेले. पण मांजरी राहिली. तिला कुणीही कधीही जवळ केली नाही.

शेवटी घरात दुर्लक्षिलेल्या, वयात आलेल्या मुली जे करतात तेच तिने केले. गल्लीतल्या एका मवाली बोक्याशी सूत जमवले. तिचा सारा दिवस आरशासमोर राहून अंग चाट, मिश्या साफ कर, शेपूटच फेंदारून पाहा, असल्या गोष्टींत जाऊ लागला. पुढे-पुढे तो निर्लज्ज बोका फारच बोकाळू लागला. रात्री खिडकीखाली येऊन आर्त स्वरात हाका मारीत असे. आमची खिडकी आणि समोरच्यांची ओसरी ह्यांतून द्वंद्वगीते चालत. बाकी बोका आणि मांजरी ह्यांचा प्रेमसंवाद हा जवळजवळ माणसाच्या बोलीत चालतो. मला तर बोक्याच्या स्वरातून "माझ्या मनिचें हितगुज सारें ऽऽ” अशासारखे शब्दही ऐकू येत. त्या वेळच्या मन्या फारशा गात नसत. मधूनच "म्यां यावें कसें-रे-बोक्या सख्या" म्हटल्यासारखे वाटे. हल्ली मनीच "माझा होइल का ? बोका" अशी आपण होऊन प्रस्तावना करते म्हणतात. ती काय बिचारी मुकी जनावरे. भोवताली पाहतात, त्यातून घेतात एकेक. असो. पुढे बोक्याची म्याँवगीते बंद झाली, आणि आमच्या मनीची कूस धन्य झाली. तेव्हापासून प्रत्येकाच्या पांघरुणात एक ह्या दराने मांजरे वाढली.पंक्तीला प्रत्येक जण डाव्या हातात छडी घेऊन बसायला लागला. एका हाताने छडी आपटीत आणि बंड्याच्या कृपेने फुललेल्या मनीच्या वंशाची पांगापांग करीत जेवणे उरकावी लागत. गोणत्यातून सोडा, बसमध्ये विसरून या, विरार लोकलमध्ये टाका - पुन्हा आपले जैसे थे ! इकडे बंड्याही ऐकेना. शेवटी मांजरे घर सोडीनात, म्हणून आम्ही सोडले. आणि ही जात अशी कृतघ्न, की इतक्या वर्षाच्या खाल्लया अन्नाला स्मरून त्यांतले एकही मांजर आम्हांला दाराशीदेखील पोहोचवायला आले नाही. उलट, सोवळ्यातल्या लोणच्या-पापडाच्या बरण्या वगैरे बिऱ्हाड-बदलीतला शेवटला किंमती ऐवज घेऊन व्हिक्टोरियात बसलो, त्या वेळी कौलावर आमची मनी शेजारच्या बंड्या बोक्याचे लाडात येऊन अंग प्वाटीत होती. मांजर माणसाला नाही, घराला धार्जिणी, म्हणतात ते खोटे नाही. असल्या दगडा-विटांत गुंतणाऱ्या प्राण्याला माणसे का पाळतात, देव जाणे.

पाळीव प्राणी (पु. ल. देशपांडे)
पुस्तक - हसवणूक
संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.
https://amzn.to/3UfqOxi

Wednesday, April 24, 2024

कावळा

पशुपक्ष्यांत ज्या काळी मन रमायचे त्या वेळी रमले नाही, आणि आता वेळ निघून गेली. माझ्या शहरी जीवनात पहिला पक्षी आला तो कावळा! माझे बालपण शहरात गेल्याचे मला दुःखही नाही, तसेच माझ्या पाचवीला कावळा पुजल्याचेही नाही. "कावळा म्हणे मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा," अशी आम्हांला एक कविता असे. लहान मुलांच्या कवितेलाही त्या काळी कविताच म्हणत, बालगीत नव्हे. कावळा आम्ही रोजच पाहत होतो. पण सफेत बगळा मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच पाहिला. आमच्या बालपणी बगळे फारसे नसावेत. पक्षीसृष्टीचा पहिला प्रतिनिधी म्हणून बालजीवनात कावळा हा अतिसामान्य प्रतीचा पक्षी आल्यामुळे त्या एकूण त्याच काळात वैराग्य उत्पन्न झाले. ह्या पक्षाच्या सर्व लीला मी बारकाईने पाहिल्या आहेत. वास्तविक हा तसा अगदीच गरीब परिस्थितीतला. पण मुंबईच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'साला आखडू' आहे. पूर्वी कडक कॉलर नावाचा, पांढऱ्या- स्वच्छ कापडी बांधणीचा, एक लाकडी गळफास पैरणीला जोडीत. ती कडक कॉलर वापरणारी मुंबईकर मंडळी थेट कावळयासारख्या माना फिरवीत. ते पाहणे खटखटक चाले काळे डगले किंवा सूट आणि कावळे यांचे माझ्या मनात तेव्हापासून समीकरण बसले आहे.


कावळा हा काही पाळीव पक्षी नव्हे. पिंजऱ्यात घातलेला कावळा मी एकदाच पाहिला. लंडनच्या झू मध्ये. अगदी पोपटाच्या ऐटीत हा कावळा बसला होता. आपला हिंदी कावळा. पिंजऱ्याबाहेर नावाची पाटी होती 'इंडियन क्रो' अशी. एखाद्या अस्सल इंग्लिश कंपनीत गोऱ्या साहेबांच्या पंक्तीत एखादा डिसोझा बसतो तसा. लंडनमधले इतर हिंदी साहेब जसे एकमेकांना पाहून न पाहिल्यासारखे करतात, तसेच काहीसे मला पाहून ह्या कावळ्याने केल्याचे मला अंधुक स्मरते. वास्तविक इतर रंगीबेरंगी पक्ष्यांत त्यालाही स्वतंत्र पिंजऱ्याचा मान मिळालेला पाहून मलाही बरे वाटले होते. कारण कावळा हा पाळीव नसल्यामुळे त्याचे माझे काही भांडणच नाही. इतर पक्ष्यांच्या मानाने हा पक्षी कितीतरी समंजस दिसतो. त्या काव काव" ओरडण्याचा 'काव काव" एवढाच अर्थ असतो. माणसाची बोली बोलण्याचा आव नसतो. सहसा पक्ष्यांच्यात न आढळणारा एक चार पावसाळे पाहिल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर असतो. काकाकुव्याच्या चेहऱ्यावर रिटायर व्हायला आलेल्या हायकोर्ट जजाचे गांभीर्य असते. फार वेळ ह्या पक्ष्याकडे पाहत राहिले, की काही वेळाने जस्टिस काकाकुवा एकदम " ज्यूरीतील सभ्य गृहस्य हो, ” अशी सुरवात करील काय, अशी मला नेहमीच धास्ती वाटत आली आहे. चारपाच कावळे तीन तिडयावर रिंगण करून बसले, की म्हाताच्या वकिलांची मुरब्बी टोळी एखाया दिवंगत इंग्रज न्यायाधीशाविषयी एकमेकांना आख्यायिका सांगत बसल्यासारखी वाटते. कावळा मेल्यावर इतर कावळे शोकसभा घेतात, आणि दिवंगत काकासाहेबांनी आपल्या ज्ञातीच्या उन्नतीसाठी फार प्रयत्न केले, ह्या चालीवर गुणवर्णनपर करतात असेही मी ऐकले आहे. कावळ्यांची ही कौतुके मी काही प्रत्यक्ष पाहिलेली नाहीत.

कावळा खिडकीशी बोलू लागला तर पाहणा येतो, असा एक समय आहे. हे खरे असते, तर मुंबईत खोली- दीडखोलीच्या खुराड्यात राहणाऱ्या सगळ्यांनी एव्हाना पिंडाला शिवण्यापुरताही कावळा जिवंत ठेवला नसता. एके काळी तो निरोप वगैरे आणीत असावा. त्याशिवाय त्या " काऊचे सोन्याने मढविन पाऊ" म्हणणारे निघाले नसते. हिंदीतही कागाला संदेसवा देण्यासाठी धाडले आहे. पण आमच्या पाहण्यातले कावळे असले काहीही करताना आढळले नाहीत. त्यामुळे त्याचे आवर्जून कौतुक करावे असे ज्याप्रमाणे काही घडले नाही, त्याचप्रमाणे त्याला नाव ठेवावे असेही त्याने काही केले नाही. क्वचित म्हशीच्या पाठीवरून सहलीला निघालेला कावळा पाहून पक्ष्यांनाही उडण्याचा कंटाळा येतो असा बोध मी घेतला आहे. मात्र पाळीव नसूनही ज्याच्याविषयी कौटुंबिक कथा बऱ्याचश्या आहेत असा हा एकच पक्षी. कारण पिंडाला शिवण्याशी त्याचा संबंध येतो. पिंड ठेवले. कावळा शिवला. आणि मंडळी परतली. इतक्या तीन सरळ वाक्यांत ते शेवटले कार्य आटोपलेले क्वचित ऐकायला मिळते.


आमच्या एका मित्राची आजी एकदा - आणि एकदाची वारली. आता तिच्या पिंडाला न शिवण्याचे कावळ्याला काहीच कारण नव्हते. चांगली नव्वद व्याण्णव वर्षे पाहून तिने डोळे मिटले होते. मंडळी बुचकळ्यात पडली. 'तुझ्या मुलाबाळांची काळजी घेऊ," म्हणावे, तर मुलगा म्हणायचा तोच बावीस वर्षे पोष्टातून पेन्शन खाऊन आणखी बावीस वर्षे खाण्याइतका टुणटुणीत. (असो बापडा !) लेकी, सुना, नातू, पणतू सगळे काही 'यथासांग होते. शेवटी कोणीतरी "आजीबाई, एक मोठी बरणी आणि चार कपबश्या आल्या, तरच तुमची शालजोडी देईन हो बोहारणीला," असे हात जोडून म्हटले, आणि पटकन कावळा शिवला. कावळा हा प्राणी कौटुंबिक गोष्टीत इतक्या बारकाईने लक्ष घालीत असेल याची कल्पना नव्हती मला एरवीचा हा अतिपरिचयामुळेअवज्ञेला पोहोचलेला पक्षी त्या विशिष्ट ठिकाणी इंगा दाखवून जातो. स्टैंडवर डझनभर टांगे उभे असल्या वेळी "साहेब, बसा की. आपला टांगा आहे. " म्हणणारा लाचार टांगेवाला, एकटाच असला, आणि डेकन क्विनचा टाइम भरत आलेला असला, म्हणजे जी बेफिकिरी दाखवितो ती, आणि ही जात एकच अडचणीत गाठल्यावर कोण कसा वागेल, सांगता येत नाही. दुपारची रणरणती वेळ, माणसे वैतागलेली, भटजीच्या पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांची काव काव ऐकू येत असते, अशा वेळी हा कावळा अडून बसतो. इथे त्याचा दोष नाही. एकेकाची वेळ असते.

- पाळीव प्राणी (पु. ल. देशपांडे)
पुस्तक - हसवणूक

संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.

Tuesday, December 20, 2022

साता वारांची कहाणी - हसवणूक

सोमवार हा अत्यंत अरसिक वार! त्याला फक्त पोटासाठी लोकांना राबायला लावायचे, इतकेच माहीत. सोमवार हा पिशवी घेऊन वावरत असतो. ह्या वाराचे आणि मोहकपणाचे वावडे आहे. एवढेच नाही, तर हा अत्यंत रुक्ष आहे. हा मासे खात नाही. तसा गुरुवारदेखील कांदा खात नाही. उपास करतो. पण दत्ताचा पेढा खातो, शिकरण खातो. सोमवारला तेही सुख पचत नाही. आदल्या दिवशी रविवार झालेला असतो. त्यामुळे ह्या वाराला पक्वान्न नाही - काही नाही. ह्याला गाणे, नाटक कशाची आवड नाही. खाली मान घालून राबणारा हा कारकुन-वार आहे.

दिवाळीच्या सुट्टीनंतर पहिल्या दिवशी पहिल्या तासाला दिवाळीच्या सुट्टीत कोणी कोणी काय काय केले, दिवाळी कशी साजरी केली, यापैकी एकाही गोष्टीची चौकशी न करता एकदम वर्गात आल्याबरोबर जॉमेट्रिचा थिअरम शिकवायला घेणाऱ्या मास्तरासरखा हा वार आहे. सोमवार नुसता नाकसमोर जाणारा. सोमवार कधी हसत नाही. हा सोमवार रुक्ष आहे,अरसिक आहे, पण कोणाच्या अध्यात ना मध्यात! आपले काम बरे की आपण बरे! आणि म्हणूनच एखादे दिवशी त्याला सुट्टी मिळाली की त्याची पंचाईत होते. दिवसभर बिचारा घरी पडून राहतो.

मंगळवाराचे श्रावणी सौंदर्य अफाट आहे. हा पठ्ठया त्या वेळी एरवीची सारी उग्रता विसरून कुटुंबातल्या सात्त्विक पुरुषासारखा वागायला लागतो ! घरोघर जमलेल्या पोरींना एरवी मनात आणील तर हाताला धरून खेचून फरफटत रस्त्यातून ओढीत नेण्याचे सामर्थ्य असलेल्या ह्या मंगळाचे मंगलात रूपांतर होते. ओठावर आणि हनुवटीवर दाढीची कोवळी पालवी फुटलेल्या काळात ह्या श्रावणातल्या मंगळवाराने आमची शनवाराची दृष्टी आपल्याकडे खेचली होती. त्यातून पाच मंगळवारांचा श्रावण आला, म्हणजे अधिकच रंग येई. लेकी-सुनांच्या मेळाव्यांतून, हिरव्या पत्रीतून लालसर कळ्या शोधाव्या, तशा (इतरांच्या) लेकी मन वेधून घेत. खालच्या माजघरात मंगळागौरींचा हसण्याखिदळण्याचा धिंगाणा सुरू झाला की, वरच्या खोलीतून पुस्तकावरचे लक्ष उडे. आणि मग कुठे पाणी पिण्याचे निमित्त कर, कुठे माजघरातल्या घड्याळाबरोबर आपले रिस्टवॉच जुळवायला जा, (हे बहुधा फर्स्ट इअरच्या परीक्षेत पास झाल्यावर मिळे!) असली निमित्चे काढून त्या खळखळत्या हास्याच्या काठाकाठाने उगीच एक चक्कर टाकून यावीशी वाटे ! अशा वेळी वाटे की, ही श्रावणी मंगळवारची रात्र संपूच नये.


तेवढ्यात एखादी जाणती आत्या "काय रे, फारशी तहान लागली तुला?" म्हणून टपली मारी, आणि कानामागे झिणझिणी येई. नेमकी ह्याच वेळी नव्या वहिनींची निळ्या डोळ्यांची धाकटी बहीण आपल्याकडे का पाहत होती हे कोडे उलगडत नसे. आजच दुपारी मधल्या जिन्यात तिने आपल्याला “ऑलजिब्राच्या डिफिकल्ट्या सोडवून द्याल का ?" म्हणून प्रश्न विचारला होता. डोक्यात एखाद्या गाण्याच्या चरणासारखा तो प्रश्न घोळत असे. मंगळवार आवडला तो फक्त तेव्हा. एरवी, हा वार सगळ्यांत नावडता.

बुधवार हा सात वारांतला हा मधला भाऊ. बुधवार हा थोडक्यात बिनबुडबंधू भाऊ आहे. ह्या वाराला कोणत्याही प्रकारचे व्यक्तिमत्वच नाही. दिवसाच्या व्यवहारात अकरा-साडेअकराच्या सुमाराला कसलेही वैशिष्ठ्य नाही, रंग-रूप-आकार नाही, त्याचप्रमाणे ह्या बुधवाराला काहीही आगापिछा नाही. एखाद्या श्रीमंत कुटूंबात एखाद्या भावाला जसे एखाद्या पेढीवर कोणतेही महत्वाचे काम न देता नुसते बसवून ठेवतात, तसे ह्या वाराला दोन्ही बाजूंनी दोन वार देऊन रविवारने बसवून ठेवले आहे. तापट मंगळवार आणि सौम्य गुरुवार यांच्या मधे उभा राहून हा दोन्हीकडे आपली गचाळ दंतपंक्ती विचकत गुंडाचा आणि संताचा आशीर्वाद घेऊन स्वत:चे स्थान टिकवू पाहणाऱ्या गावठी पुढाऱ्यासारखा आहे. बुधवारच्या नशीबी काही नाही. हिंदूचा गुरुवार, मुसलमानांचा शुक्रवार, यहुद्यांचा शनिवार आणि ख्रिस्त्यांचा रविवार. पण बुधवार कुणाचाच नाही.

गुरुवार सज्जन आहे, पण गचाळ नाही. हा दोन-दोन बोटे दाढी वाढवून मातकट धोतर आणि कुडते घालणाऱ्या सज्जनांतला नव्हे. हा मुळातलाच सात्विक, सौम्य, हसऱ्या चेहऱ्याचा, सडपातळ, गहू वर्णाचा, मिताहारी. हा शाकाहारी खरा, पण त्या आहाराने अंगावर सात्विकतेचे तूप चढून तुकतुकणारा नव्हे. मला शनिवारच्या खालोखाल गुरुवार आवडतो. मुख्य म्हणजे हा व्रत पालन करणारा असूनही मऊ आहे. कडकडीत नाही.

शुक्रवार थोडासा चावट आहे. पण स्वभावात नव्हे. खाण्यापिण्यात. कुठे चणेच खाईल, फुटाणेच खाईल. हा पठ्ठ्या केसांची झुलपे वाढवून, गळ्यात रुमाल बाधूंन हिंडतो. दिवसभर काम-बिम करतो, पण संध्याकाळी हातांत जाईचे गजरे घालून, अत्तर लावून हिंडेल. ह्याला उपासतापास ठाऊक नाहीत.

स्वभावाने अतिशय गुल्ल्या ! कपड्यांचा षौकिन ! वास्तविक शुक्रवार शनिवारसारखा थोडासा रंगेल आहे. पण त्याला गुरुवारच्या सौम्य देखरेखीची किंचीत बूज असते. गुरुवारच त्याला उठवून कामाला लावतो.

...शनिवार नावाच्या गृहस्थावर माझे मन जडले. वास्तविक शनिवार हा इतरांच्या दृष्टीने न-कर्त्यांचा वार आहे. पण आजदेखील मला शनिवारचे आकर्षण विलक्षण आहे. शाळेत असताना मी शनिवारची वाट जितकी पाहिली, तितकी रविवारची नाही. काही चतुर मुले शनिवारी अभ्यास उरकीत आणि रविवार मोकळा ठेवीत. ज्याने शनवारच्या स्वभावातला खट्याळपणा ओळखला नाही, अर्धाच दिवस पोटासाठी राबून उरलेल्या अर्ध्या दिवसात आणि संपूर्ण रात्रीत गंमत केली नाही, त्याने जीवनातला महत्वाचा वार ओळखला नाही. जीवनात रंगणाऱ्या लोकांचा हा वार आहे. शनिवारी संध्याकाळी जसे जग दिसते, तसे रोज संध्याकाळी ज्यांना पाहता आले, त्यांच्यासारखे भाग्यवान तेच ! अर्थात शनिवारचे मोठेपण रविवारच्या मोकळ्या स्वभावामुळे आहे हे अमान्य करु नये.

रविवार हा काही झाले तरी 'दादा' आहे. किंबहुना, घरातला कर्ता पुरुष आहे. एकत्र कुटुंबातला कर्ता पुरुष जसा स्वतः भाकरी बांधून कामाला जात नाही, त्याप्रमाणे इतर भावांप्रमाणे हा जरी स्वतः राबत नसला, तरी बाकीचे भाऊ याला मान देतात. हे सारे भाऊ आठवड्याच्या शेवटी याच्या जवळ येतात. सगळ्यांची हा प्रेमाने विचारपूस करतो. जेवू-खाऊ घालतो; आणि दुसऱ्या दिवसापासून सारेजण कामाला लागतात.

रविवार मात्र कर्त्या पुरुषाची सगळी जबाबदारी उचलतो. पोराबाळांना एरंडेल दे, कडुलिंबाचा पाला उकळून गरम पाण्याने आंघोळ घाल, बागेतला पाचोळा काढून जाळ, दुपारी जरा गोडाधोडाचे जेवण घाल, वगैरे कार्ये आपल्या देखरेखीने करून घेतो. एका गोष्टीसाठी मात्र मला रविवार आवडतो. तो दुपारी जेवून मस्तपैकी झोपतो. आजोबा देखील वामकुक्षी करीत - चांगली बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत. मग त्यांना चहासाठी उठवावे लागे. हे काम कठीण होते. पण आजीची त्यालाही युक्ती होती... गजबजत्या कुटुंबात एखादे तरी तान्हे मूल असायचेच ! त्याला घेऊन आजोबांच्या झोपायच्या खोलीत जायचे, आणि त्यांच्या श्वासाबरोबर वर खाली होणारे पोटावर ते रांगते मूल सोडून द्यायचे! ते पोर आपली बाळमूठ उघडून आजोबांच्या पोटावर चापटी मारून 'तँ पँ कँ पँ असे काहीतरी करी. मग आजोबा जागे होत. आणि संतापाची शीर फुगण्याच्या आत आपल्या पोटापर्यंत चढलेल्या नातवाला पाहिल्यावर "हात् गुलामा ! " म्हणून उठत. आजोबा उठले, की घरातला सारा रविवार उठे! आणि आजी हळूच म्हणे, "उठा, चहा झालाय केव्हाचा!" आजोबा उठत आणि आजी मोरीत चूळ भरायला तांब्या ठेवीत असे. चतुर होती माझी आजी. सगळ्या आज्या असतात तशी वारांची कहाणी सांगणारी आजी !

(अपूर्ण)
- साता वारांची कहाणी
पुस्तक -  हसवणूक
पु.ल. देशपांडे

हा लेख संपूर्ण वाचण्यासाठी पूर्ण पुस्तक खालील लिंकवरुन घरपोच मागवू शकता.


Thursday, January 20, 2022

माझे खाद्यजीवन - हसवणूक

हसवणूक पुस्तकातील 'माझे खाद्यजीवन' ह्या अप्रतिम लेखातील काही निवडक उतारे.

"एका जुनाट घरातले स्वैपाकघर आहे. काळोखे. कोनाड्यात रॉकेलची चिमणी भणभणते आहे. एके काळी लाल असलेल्या पाटासमोर पत्रावळ मांडलेली आहे. चुलीवरच्या भाताला भांड्यातल्या भांड्यात गुदगुल्या होत आहेत. पोटात भुक आहे. डोळ्यांत निज आहे. दारातून वाकून वडील आत येत आहेत. ते काहितरी गुण-गुणताहेत. पलिकडे झोळण्याच्या पाळण्यात धाकटा भाऊ ट्यॅ ट्यॅ करुन रडणे आणि बोलणे ह्यांच्या सीमारेषेवरचे आवाज काढत आहे. इतक्यात निखार्‍यावर टाकलेल्या पापडांचा वास येतो. झोप उडाल्यागत होते. पोटाची मागणी वाढते. "झालं हं---" म्हणून आई तो चिमटीत धरुन फू~~ फू~~ करते. वडील शेजारच्या पाटावर बसतात. इतक्यात कढईच्या पोटात चर्र होते. पळीतून अंबाडीच्या भाजीच्या पोटात शिरलेली लसूण सार्‍या घराचा ताबा घेते. झोप पळते. पोटात रणकंदन सुरू होते. चुलीच्या एका बाजुला भिंतीला पाठ लावून उभ्या असलेल्या भाकरी चतकोरा-चतकोराने पानात पडतात. "आज काय शिकवलं रे मास्तरांनी?" ओट्यावर नित्यनियमाने येऊन बसणारे शेजारचे दादा कणखर आवाजात विचारतात आणि गरम भाकरीच्या तुकड्यात दडलेला आंबाडीच्या खमगं वास घश्यात अडकतो.

----
मी शाकाहाराचा भोक्ता आहे, तसाच स्वाहाकाराचा! मला तळलेले निषिद्ध नाही, पोळलेले नाही. लाटलेले (दुसऱ्याचे नव्हे, पोळपाटावर) नाही, वाटलेले नाही. ऊन-ऊन भात, वरण, लिंबू, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, चटणी, चांगले ताक हा मेनू मला जितका प्रिय, तितकीच 'तिरफळ' घालून केलेली बांगड्याची लालभडक आमटी, भात आणि खोबरेल तेलाचे बोट लावलेला पापड, सोलाची कढी! मात्र दुसऱ्या मेनूनंतर नुकत्याच फोडलेल्या नारळाची कातळी हवी, आणि पहिल्या मेनूनंतर पान हवे. भारतीय संस्कृतीबद्दलचा माझा आदर दर सणामागल्या पक्वान्नातून (ताटाबाहेर) सांडतो. होळीच्या पोळीची चव रामनवमीला नाही. रामनवमीचा सुंठवडा कृष्णजन्माला पटत नाही. बुंदीचा लाडू दिवाळीला चालतो, तसा दसऱ्याला चालवून पाहावा! आणि भुसभुशीत मोतीचूर लाडवावर माझी श्रद्धा नाही. मुगदळाच्या आणि बुंदीच्या लाडवांनी दातांची खोलवर चौकशी केली पाहिजे. अनारशावर आणि चिरोट्यावर मात्र माझी अजिबात भक्ती नाही. अनारशाला काही 'कॕरेक्टर'च नाही. अनारशामागे कोणतीच संस्कृती उभी नाही. आणि चिरोटा? कुण्या पुस्तकी सुगरिणीचा घरी करायला घेतलेल्या खाऱ्या बिस्किटांचा साचा मीठ घालायला विसरून बिघडला,आणि ते पीठ थापून त्याच्यावर साखरपेरणीची मखलाशी करून बिस्किटाऐवजी चिरोटा म्हणून तिने नवऱ्याला बनवले.

खाद्यांचेदेखील एक खानदान आहे. ह्या खानदानाचा ते पदार्थ तिखट-गोड किंवा आंबट-तुरट असण्याशी काही संबंध नाही. चकलीला खानदान नाही. ती उपरी आहे. तिच्याभोवती वातावरण नाही. ती खुसखुशीत असो, अरळ झालेली असो, पण तिला आपला असा स्वभाव नाही. नुसतीच तुकडेमोड आहे. पण कडबोळ्याला मात्र कूळ आहे. उद्या पदार्थांच्या जातीच करायच्या ठरविल्या, तर कडबोळे हे देशस्थ वैष्णव कुळीचे, कानडी उच्चाराने मराठी बोलणारे आहे म्हणावे लागेल, तर चकली आंतरजातीय विवाहातून जन्मलेले अपत्य आहे. कारवारकडे कडबोळ्याचेच दोन वळसे कमी करून मुदी करतात. कारवारीत मुदी म्हणजे अंगठी. चकली भानगडगल्लीतली, तसा चिवडाही. पण चिवड्यात अठरापगड गोष्टी असून त्याच्या भोवती मित्रमंडळीच्या अड्ड्याचे कुंपण आहे. मात्र चिवडा हा एकट्याने खाण्याचा पदार्थ नव्हे. चिवड्याची चव खाणाऱ्यांच्या संख्येने गुणले असता वाढते! पण चिवड्यातला अत्यंत चविष्ट भाग तळाशी उरलेले तिखट-मीठ इतरांची नजर चुकवून तर्जनीने चेपून ती जीभेवर दाबल्यावर कळतो. ह्याला धैर्य लागते! चिवड्याचे मूळ स्वरूप म्हणजे भत्ता. ह्याला मजूर-चळवळीच्या प्रथम चरणात 'लेनिन मिक्श्चर' म्हणत असत. म्हणजे भोवती मार्क्सवादी गप्पा सुरू झाल्या की भत्त्याचे लेनिन मिक्श्चर होत असे! कुरमुरे, डाळ, दाणे, कांदा, बारीक शेव, कोथिंबीर, मिरच्या आणि उघड्यावर गप्पा! चारचौघांत जो ओतला की "अरे बाप रे! एवढं हे कोण संपवणार?" असा सार्वजनिक उद्गार निघून ज्याचा शेवट रिकाम्या कागदाखाली पडलेला शेंगदाणा हळूच उचलून तोंडात टाकण्यावर होतो, तो खरा भत्ता!

----
महाराष्ट्रातल्या चारी वर्णांनी आणि सार्‍या जाती-जमातींनी जर एकमताने मान्य केलेली गोष्ट कुठली असेल, तर पुरणपोळी ! हीसुद्धा जसजशी अधिक शिळी होत जाते, तसतशी तिची चव वाढते. ती दुधाबरोबर खावी, तुपाबरोबर खावी किंवा कोरडी खावी. महाराष्ट्राच्या सीमा ठरविताना पुरणपोळीचा निकष वापरायला पाहिजे होता. मात्र हे नाजूक हाताचे काम नव्हे. चांगल्या पुरणपोळीला चांगले तीस-पस्तीस वर्षांचे तव्याचे चटके खाल्लेला हात हवा. म्हणूनच आज्जीने केलेल्या पुरणाच्या पोळीची सर आईच्या हाताला येत नाही; पत्नीच्या तर नाहीच नाही. वडीलधार्‍यांनी ती करावी आणि लहानांनी खावी !
----
भेळ, मिसळ आणि उसळ ह्या ’ळ’-कारान्त चिजांनी जिभेचा चावटपणा खुप वाढवला. इथे ’चावट’पणा हा शब्द गौरवार्थी आहे. कारण चावट हा शब्दच मुळी ’चव’ ह्या धातूचे लडिवाळ स्वरूप आहे. चविष्ठ --> चविट्ट --> चावट्ट आणि चावट ! ह्या शब्दाचा चावण्याशी काही संबंध नाही. बेचव शब्दपंडितांनी तो जोडला आहे.
---
शाकाहारी मंडळींना शाकान्न आणि शाक्तान्न जोडीजोडीने कसे नांदते हे कळणार नाही. तुरीच्या डाळीच्या सांबाऱ्याबरोबर भाजलेल्या सुक्या बांगड्याचा तुकडा काय विलक्षण साथ जमवून जातो | मटारीत कोलंबी आणि वांग्यांत सोडे. व्हिस्की-सोडा आणि वांगे-सोडा ह्या जोडीत श्रेष्ठकनिष्ठ ठरविणे कठीण आहे. काळ्या वाटण्याची किंवा मसुरची मसालेदार आमटी असली, तर उगीच जोडीला कोलंबी किंवा ताजे बोंबील तळून पाहावे. स्वर्ग ताटात येतो! मटणात बटाटा घरच्यासारखा येऊन बसतो. पण कोंबडी एरवी स्वतः शाकाहारी असली, तरी पकवल्यावर तिला पालेभाजीचा सहवास चालत नाही. तीच गत हरभऱ्याची. हरभरे आणि मासे यांचे जमत नाही. म्हणून पिठल्याच्या जोडीला मासेमटण 'चालत नाही. मसूर ही जातीने शाकाहारी असली तरी वृत्तीने सामिष. नागपुरी वडाभात हा पुढे अक्खी दुपार झोपायला मोकळी असली तर खावा. आणि डाळबाटे या इंदुरी प्रकारात बाटे हुकवून नुसती डाळ ओरपता आली तर पाहावी.
----
माणसाचा सारा इतिहास म्हणजे त्याच्या खाण्याचा इतिहास आहे. चराचर सृष्टी याचा अर्थच मुळी कशावर तरी चरणारी सृष्टी असा आहे. आदिमानव मिळेल त्यावर चरला. पुढे तो सुधारला आणि चरता चरता दुसरयाला चारू लागला. त्यानंतर फारच सुधारला तेंव्हा इतरांचे चोरून स्वतः चरू लागला. मानवाची सारी वाटचाल स्वतःच्या हाताने चरणे, चारणे, चिरणे, आणि चोरणे ह्या चकारी बाराखडीतून होत होत ' चम-' चः ' पर्यंत आली आहे.
----
बाकी भोजनाचे ताट हेदेखील एखाद्या चित्रातल्यासारखे रंगसंगती साधून जाते! पहिला भात मूदस्वरूपात असावा. वरण-भाताबरोबर डाळिंब्या असाव्यात. बाकी वाल खावे कायस्थांनी. असे बिरडे अन्यत्र विरळा! बटाटा जसा मुंबईला झावबाची वाडी ते भाई जीवनजी लेन ह्या परिसरात 'गोडी बटाटीचा रस' होऊन शिजतो, तशी वालाची डाळ कायस्थाघरीच शिजते, अन्यत्र नाही. आधुनिक जमान्यात जातीय दृष्टी वाईट खरीच. पण जीभ जर योग्य वळणाने वळेल, तर भोजन हे उदरभरण न राहता एक मैफिल होऊन जाईल. पुष्कळदा मला केवळ या खाद्यविशेषांच्या परंपरागत संरक्षणासाठी जाती टिकाव्यात, असे वाटते! उद्या सगळ्यांचे खाणेपिणे सारखे झाले की महाडच्या सोड्यांचे कळावं खायला जायचे कुठे? कोल्हापूरच्या पाणकोंबडीने सद्गतीसाठी कुठल्या सवळेकराकडे पाह्यचे? भेजा आणि कालेज तळायचा नाय, असे मटनप्लेट हाउसवाल्यांनी ठरवले, की खेळ खल्लास! आंतरजातीय विवाह व्हावेत, पण उभयपक्षी खाद्यस्वातंत्र्याच्या करारावर सह्या होऊन. अगदी कळाहीन जेवण पाहायचे असेल तर, नवश्रीमंतांच्या घराच्या पार्टीला दिल्लीला जावे. एक तर पंगत नाही. आणि टेबलावर पायरेक्स डिशेसमध्ये तेच पदार्थ! तोच निस्तेज मसाला घातलेली मुर्गी, तीच कळाहीन बिर्यानी, तीच ती फ्लावरची नि:स्वाद भाजी, त्याच टमाटो-मुळं-कांदे-बीटच्या चकत्या, तीच मटणबॉल्सची करी, त्याच पुऱ्या, तीच पंडुरोगी चटणी, आणि तेच दहीवडे! अत्यंत संस्कृतीशून्य जेवण! आपणच ओढायचे आणि आपणच गिळायचे! ज्या कोंबडीच्या आणि आपल्या पहिल्या ओठीभेटीत डोळे पाणावत नाहीत, ती कोंबडी खाण्याऐवजी दुध्या भोपळा खाल्लेला काय वाईट? जो बोकड जाता जाता जिभेला चटका लावून जात नाही. त्याचा निष्कारण बळी का द्यायचा.? पाश्चात्यांचे हे नुसतेच उकडणे म्हणजे आधुनिकता, असं समजण्याच्या काळात भारतीय खाद्ये आपली सांस्कृतिक पातळी (आणि जाडी) गमावून बसताहेत. दहीवडा हा काय रात्रीच्या जेवणाबरोबर खायचा पदार्थ आहे? मला 'दहीवडा' हा शब्द मोठ्याने म्हणायलादेखील आवडत नाही. 'गोसावडा' म्हटल्यासारखे वाटते.
----
ज्या पुण्याची 'लग्न' ह्या उद्योगधंद्याबद्दल उगीचच ख्याती आहे, तिथल्या पंगतीतल्या जेवणाइतकी तर जेवण या संस्कृतीची इतर कोणीही अवहेलना केली नसेल. एक तर 'पत्रावळ' हा प्रकार गळ्यात काड्या अडकवणारा. त्यातून महत्वाच्या जागी उसवणे हे पत्रावळीने तुमानीकडून शिकून घेतले असावे. चुकून एखादी भाजी आवडलीच, तर ती जिथे वाढली जाते तिथेच नेमकी पत्रावळ आ वासते.! असल्या त्या पत्रावळीत-मिठात ओघळलेले लोणचे, कोशिंबीर ह्या नावाखाली केलेला टोमॅटो आणि शेंगदाण्याचा सत्यानाश, त्यात घुसणारे जळकट खोबऱ्याचे तुकडे टाकलेले पंचामृत, त्याच्या बाजूला मठ्ठ्याच्या द्रोणाला टेकण ह्याहून अन्य कार्य न साधणारा तो वांग्याची भाजी नामक चिखल, ह्या सर्व पदार्थांना पानशेतच्या लोंढ्यासारखा वाहून नेणारा अळवाच्या फतफत्याचा लोंढा, गारगोट्या भाताची उदबत्त्या लावायच्या सोंगटीएवढी मूद, तिच्यावर डाळीपासून फटकून निघालेले वरण आणि त्या मुदीची गोळी पोटात जाईपर्यंत तिथे येऊन कोसळणारा मसालेभात नावाचा भयाण ढीग.! एवढ्याने संपले नाही, म्हणून नुसतेच तळून काढलेले भज्याचे पीठ आणि मग 'जिलेबीचे जेवण' ह्या मथळ्याला शोभणारा मजकूर नसला तरी ठसठशीत मथळा हवा म्हणून पडणारी ती अंगठ्या एवढी जाड वळणाची जिलबी.! एवढ्याने संपत नाही. मग "मठ्ठा, मठ्ठा" असा आरडाओरडा होतो, आणि त्या लवंड्या किंवा बिनलवंड्या द्रोणात कोथिंबिरीच्या देठासकट पाचोळा घातलेले आंबूस पाणी ओतले जाते.! कोंड्याचा मांडा करून खावे हे खरे, पण उगीचच उंदराला ऐरावत म्हणून कसे चालेल.? ज्याला 'ताक' म्हणणे जीवावर येते, त्याला 'मठ्ठा' कसे म्हणावे.? आणि असल्या भोजनाला अमका बेत होता, तमका बेत होता, म्हणून वाखाणायचे.! प्राणाखेरीज इतर कशाशीही न बेतणारा हा बेत 'पेशवाई थाट' वगैरे शब्दांनी गौरविला जातो.
----
आपण "खातो" हे सांगण्याचीही एक नवी ऐट आहे. जन्मजात 'खाणारा' आपण कधी मासा खाल्ला किंवा मटण खाल्लं. हे मुद्दाम म्हणून बोलणार नाही. "आज काय मिळालं होतं हो?" ह्या प्रश्नाचे उत्तर बांगडा, कर्ली, पापलेट, कुर्ल्या किंवा जैतापूरची कालवे ह्यांपैकी कुठल्यातरी अर्थाचे हवे असते. त्यामुळे "आम्ही आज फिश खाल्लं," म्हणणारी मंडळी ही होतकरू आहेत, हे समजावे! "आम्ही नॉनव्हेज खातो बुवा!" हे एक असेच बावळट वाक्य.

.. युरोपातील प्रत्येक चांगली गोष्ट ज्याप्रमाणे त्यांनी आमच्याचकडून उचलली असे चांगल्या चांगल्या विद्वानांचे मत आहे, त्याप्रमाणे हे 'सूप'देखील त्या लोकांनी आमच्याचकडून चोरले, आणि आमच्या चांगल्या गोष्टी पाहायला आम्हांला आता तिथे जावे लागते तसे चांगले सूप प्यायलादेखील आता युरोपात जावे लागते! एरवी, आपल्या भोजनविद्देला 'सूपशात्र' कशाला म्हटले असते? ज्यात सूप अजिबात नाही ते सूपशात्र होईलच कसे? मात्र युरोपाने सुपाची कितीही ऐट केली, तरी 'सूप' करावे चिन्यांनीच. सध्या चिनी मंडळी आपल्याकडे जरा तिरक्या डोळ्यांनी पाहू लागली असली, आणि 'हिंदी-चिनी भाऊ-भाऊ' हे राहिले नसले, तरी 'हिंदी-चिनी भोजनभाऊ' हे मान्य करावे !
माझ्या खाद्यजीवनात मी उत्कृष्ट म्हणवणाऱ्या हॉटेलांना निकृष्ट स्थान दिले आहे. तिथे पार्टी देता येते, चवीने खाता येत नाही. ज्या पंगतीत "अरे, जरा मसालेभात फिरवा--", "वाढ-वाढ, मी सांगतो, वाढ जिलबी---" असल्या आरोळ्या उठत नाहीत ती काय पंगत आहे? पंगत ही तिथल्या आरड्याओरड्याने रंगत असते, पानातल्या पदार्थानी नव्हे!

हल्ली हाॅटेलना नंबर दिले आहेत .हे नंबर तिथल्या चवीच्या गुणानूक़माने नसून टेबलावरच्या काटे चमचा ,वेटरचा गंभीरपणा ,मॅनेजरचा सुट आतली कृत्रिम थंडी ,आणि अनेक दिवे लावून केलेला अंधार या कारणाने दिले आहेत .खाणार्याने सावध राहावे. आपल्या आरोग्यापेक्षा खिसा पाकीट सांभाळावे. टेबलावरच्या त्या चकचकीत सुरयानी लोणी कापले जात नाही पण खिसे मात्र सफाईने कापले जातात. खरी हाॅटेले म्हणजे जिथे माणसे माशा आणि "ए पोरया फडका मार;ही आरोळी सुखाने एकत्रीत नांदतात. ती विशेषतः "पोरया फडका मार:आणि दोनिस्सवं यातल्या पहिल्याचा खर्ज व दुसर्यातला तार सप्तक एक हामंनी साधून जाते. ते हाॅटेल. तिथला बटाटावडा नुसती जीभ
,झणझणारे कान ,आणि डोळेच काय सारे पंचेद्रीयाची खबर घेऊन जाते. इथल्या वेटरला टीप दिली तर गिराईक खुळे वाटते. त्या मोठ्या हाॅटेलमधे वेटरला केवळ टिप घेण्यासाठी नेमलेले असते त्यातून आपण देशी भाषेतून बोलणारे असलो की ,खेळ खल्लास !ही मोठी हाॅटेल व खाणावळी महणजे जेवणाच्या जागाच नव्हेत. मोठ्या
हाॅटेलमधून केवळ फॅशन म्हणून व खाणावळीत अविवाहित किंवा कुटुंब माहेरी गेले म्हणून जायचे असते .

---
माझी सुखाची कल्पना एकच आहे. आदल्या रात्री चार-साडेचार वाजेपर्यंत गाण्याची मैफल रंगलेली असावी. सकाळी दहा वाजता उठून दोन वेळा चहा झालेला असावा. हवा बेताची गार असावी. हातातली एखादी, लेखकावरून जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी संपत आणलेली असावी. ती वाचून शेवटले पान उलटता उलटता बारा-साडेबारा व्हावे. आणि आतून तव्यावर पडलेल्या सरंग्याच्या तुकड्याने साद घातल्यासारखा स्वाद घालावा. दोन मिनिटांत आंघोळ उरकेपर्यंत पाने मांडली जावी. आणि क्षणार्धात आंबेमोहोर भाताच्या वाफेने ताट खुलून यावे. यथेच्छ भोजन व्हावे. मस्त पान जमावे. इब्राहिमी जर्द्याचा तोंडात गिलावा व्हावा. गार पाणी प्यावे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुणीही झोपेतून उठवू नये!

कधी कधी देवाजी करूणा करतो, आणि असे घडतेही. त्या दिवशी मी इतका आनंदात असतो की, संध्याकाळी बायकोबरोबर इमानी आणि सालस नवर्यासारखा फिरायला देखील जातो; विश्वास ठेवा अगर ठेवू नका, तिला वेणी देखील घेऊन देतो!

--
माझे खाद्यजीवन
हसवणूक
पु. ल. देशपांडे

Thursday, August 12, 2021

कशाला जन्म घेतला होता हो महाराष्ट्रात? - अविनाश चंदने

दासबोधाची इतकी पारायणं करून अव्यवहारी राहिलेले ‘हरी तात्या’ असोत की धोंडो भिकाजी जोशी हा वेव्हार न कळणारा 'असामी', परंतु वास्तव हेच होतं, की खुद्द पुलंना आयुष्यात व्यवहार जमलाच नाही. या पार्श्वभूमीवर पु.ल. जर आज आपल्यात असते तर...?

एकविसावे शतक उजाडायला अवघे साडेसहा महिने शिल्लक असतानाच पु. ल. देशपांडे यांनी १२ जून २००० रोजी विसाव्या शतकाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली, परंतु त्यांचा करिश्माच असा आहे, की ते शरीरानं आपल्यातून गेले असले तरी साहित्य, रंगभूमी आणि दातृत्वानं आजही सर्वांशी जोडले गेलेले आहेत. तरीही हुरहूर आहेच, आज पुल आपल्यात हवे होते याची... परंतु आजच्या या व्यवहारी जगात पुलंचा खरोखरच निभाव लागला असता का, असा प्रश्न उपस्थित होतो आणि वाटतं...

एक बरं झालं पु.ल. तुम्ही विसाव्या शतकातच गेलात ते, कारण आजच्या समाजसेवकांच्या गर्दीत तुम्ही साफ हरवून गेला असता. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना हजारो रुपयांच्या वह्या-पुस्तकं देण्याच्या दानशुरांच्या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च करणारे दानशूर तुम्हाला पाहावे लागले असते. स्वत:चा उदोउदो केल्याशिवाय इथे पानदेखील हलत नाही. तुम्हाला हे जमलं नसतं पु.ल., कारण तुम्ही समाजाला भरभरून हसवतानाच स्वत:चा खिसादेखील याच समाजासाठी रिता केलात. एवढंच नाही, तर काही संस्थांची भविष्यात आर्थिक व्यवस्था लावण्याची तजवीजदेखील केलीत. त्यामुळे हे कथित दातृत्वाचं असलं कर्तृत्व दाखवणं तुम्हाला जमलं नसतं पु.ल.!

पु.ल. बरं झालं तुम्ही एकविसाव्या शतकातील उगवता सूर्य पाहायला थांबला नाहीत ते, कारण आम्ही भाषिकवादानं वाजवलेला शंख तुमच्या कानांना मुळीच सहन झाला नसता. तुम्ही ४८ वर्षांपूर्वी म्हणजे १९७० साली बंगाली भाषा शिकण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये गेला होतात. तेव्हा तुम्ही वयाची पन्नाशी ओलांडली होती. तिथं तुम्ही गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये मुक्काम केलात आणि बंगाली भाषा ‌उत्तम अवगत केलीत. आज प्रांतिक अस्मितेनं डोकं इतकं वर काढलंय की आमचं इतर भाषांवरील प्रेम किती बेगडी आहे, हे तुम्हाला पाहावलं नसतं पु.ल.!

बरं झालं पु.ल. तुम्ही आज आमच्यात नाहीत ते, कारण तुमच्या काळात माणसं जेवढी दांभिक होती त्यातून कितीतरी दांभिक माणसं या एकविसाव्या शतकात आहेत. ‘सबकुछ’ तुम्ही असलेल्या ‘गुळाचा गणपती’ हा चित्रपट पुण्यात प्रदर्शित झाला तेव्हा तुम्हाला आमंत्रणपत्रिकादेखील नव्हती. हे कटूसत्य आज कदाचित लोकांच्या पचनी पडणार नाही, पण एक सांगू पु.ल., हा चित्रपट आजच्या शतकात काढला असता, तर कदाचित तुमचं नाव श्रेयनामावलीतूनदेखील वजा केलं असतं. एवढंच कशाला उलट ‘गुळाचा गणपती’ची कथा तुम्हीच चोरल्याचा आरोप करून तुमच्यावर कोर्टात दावादेखील ठोकायलादेखील कमी केलं नसतं.

पु.ल. तुम्ही आज आमच्यात नाही तेच बरं आहे, कारण नव्या शतकात तुमच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ आऊटडेडेट झाल्या असत्या आणि या पुस्तकाचे सिक्वेल काढण्याचे प्रसंग तुमच्यावर आले असते. ‘अपूर्वाई’च्या सिक्वेलसाठी खऱ्या भटकंतीऐवजी इंटरनेटसर्फिंग करण्याची वेळ तुमच्यावर आली असती. जे तुम्हाला कधी जमलं नसतं पु.लं.!

बरं झालं तुम्ही लवकर एक्झिट घेतलीत ते, कारण आजच्या युगात कुठल्याही राजकीय पक्षाच्या लेबलशिवाय तुम्हाला जगणं अशक्य झालं असतं. १९४२चा लढा असो किंवा १९७७मधील आणीबाणी! तुम्ही डोळ्यांसमोर एक ध्येय ठेवून राजकारणात सक्रिय झाला होता. कार्य संपल्यानंतर तुम्ही राजकारणापासून अलिप्त होऊन पुन्हा लेखनाकडे मोर्चा वळवला होता. आज ते तुम्हाला शक्य झालं नसतं. हे म्हणजे महाराष्ट्रात नुसते मराठी असून जमत नाही तर मुंबईकर, पुणेकर किंवा नागपूरकर असावं लागतं, तसंच महाराष्ट्रात कुठल्यातरी राजकीय पक्षाची पालखी उचलल्याशिवाय जगणं आज कठीण झालं असतं पु.ल. तुम्हाला!

आणखी एक बरं झालं पु.ल. तुम्ही चॅनेलची भाऊगर्दी होण्यापूर्वी निघून गेलात ते! वास्तविक, देशात दूरदर्शन सुरू झाल्यानंतर पहिला कार्यक्रम सादर करण्याचा मान तुम्हाला मिळाला होता. परंतु आजच्या शेकडो चॅनेलच्या गर्दीत तुम्हीच हरवून गेला असता. कदाचित दूरदर्शनवर पहिला कार्यक्रम सादर करणारा ‘मी पहिला आहे’ हे तुम्हाला भर पत्रकारपरिषदेत सांगण्याची वेळ आली असती.

कसंही असलं तरी पुन्हा पुन्हा एकच वाटतं पु.ल. तुम्ही आज हवे होतात! तुमच्या जाण्यानं आम्ही खूप काही गमावलंय हो! मनाला चटका लावल्यावर बेळगाव सोडताना रावसाहेबांनी तुम्हाला “कशाला आला होता हो बेळगावात?” असा प्रश्न विचारला होता. आज प्रत्येक मराठी माणूस हाच प्रश्न तुम्हाला विचारतो आहे, “जायचंच होतं तर कशाला जन्म घेतला होता हो महाराष्ट्रात?”

अविनाश चंदने
मुंबई

मूळ स्रोत -- > https://zeenews.india.com/marathi/blogs/avinash-chandane-blog-on-p-l-deshpande/451354

Tuesday, July 27, 2021

पु.ल. भेटतच राहतात.. -- निखिल असवडेकर

ब्लॉगसाठी हा लेख लिहायला सुरवात तर केली पण बटाट्याच्या चाळीतल्या सोकाजीनाना त्रिलोकेकरांप्रमाणे ‘सुरवातीची beginning’ मराठीतून करावी का इंग्रजीतून असा प्रश्न पडला आणि PuLa has always been अशी सुरवात होऊन गाडी शेवटी मराठीकडे वळली.. मराठी साहित्याला ज्या व्यक्तीने अढळ स्थान प्राप्त करून दिलंय त्या व्यक्तीवर मराठीतूनच लिहूया असा विचार केला.

आज पुलंसंबंधी लिहायचं विशेष कारण काय असा प्रश्न साहजिकच मनात येईल पण फक्त जन्मदिन आणि स्मृतीदिवस यापलीकडे हा माणूस आपलं आयुष्य व्यापून राहिलाय याची गेले काही वर्ष सदैव जाणीव होती आणि आणि या जाणिवेतूनच पुढे हा विषय..

मला तर गेल्या २-३ वर्षातून एकही दिवस असा आठवत नाही ज्यादिवशी पुलंची भेट झालेली नाही.. कितीही गडबडीचा किंवा कटकटीचा दिनक्रम असो.. पु.ल. रोज येतातच.. भले अगदी ५-१० मिनिटं का असेना! आपल्या दैनंदिन जीवनात भेटणारी माणसं, आजूबाजूला घडणाऱ्या घटना यांचा जरा बारकाईने विचार केला तर “अरे, पुलंनी लिहिलेलं साहित्य आपण प्रत्यक्ष जगतोय कि काय?” असा विचार मनात येतो.

आपण सर्वजण विद्यार्थी’दशे’त नक्कीच कोणातरी ‘सखाराम गटणे’ ला भेटलो असूच.. त्याचप्रमाणे आपणही कोणत्यातरी इयत्तेत ‘दामले’ मास्तरांप्रमाणे अनिष्ट होऊन राशीला बसणाऱ्या ‘गुरूं’चा त्रास सोसला असणारच! गणपतीत आरती करताना ‘भक्तसंकटी नाना….’ म्हणताना आवाज लावणारा कुणी असला कि हरितात्यांची आठवण झालीच म्हणून समजा. मधे एकदा डाॅमिनोज् च्या पिझ्झाबाॅयकडे आधी 20$ ची नोट घेऊन जाणारा, त्याच्याकडे सुटे नाहीत हे कळल्यावर मग आम्हा सर्वांकडून 3$ सुटे जमा करून मग 20$ गेले कुठे शोधणारा एक मित्र जेव्हा पहिला तेव्हा तर खुद्द ‘बाबुकाका खरे’ पहिल्याचा साक्षात्कार झाला. साखरपुडा-लग्न अशा सोशल समारंभांमध्ये पुढे पुढे करणारे ‘नारायण’ही सर्वत्र दिसतात.. पुणेरी स्वाभिमान असो, नागपुरी खाक्या असो किंवा मुंबईची ‘आङ्ग्लोद्भव मराठी’.. “I am going out बरं का रे Macmillan!!” म्हणणाऱ्या देशपांडे श्वानसम्राज्ञीही आता मुंबईच्या ‘टाॅवर संस्कृती’त नवीन नाहीत. एकदा इथे कंपनीत काम करताना मला ऑफिस मधल्या एका मित्राने त्याला नुकतीच सुचलेली इंग्रजी कविता वाचून दाखवली. तेव्हा इथे सातासमुद्रापार ‘हापिसच्या वेळेत आणि हापिसच्या कागदावर’ साहित्य रचणारा नानू सरंजामे (गोऱ्या कातडीचा) आठवला बघा! पुलंच्या नजरेने हेरलेले हे बारकावे केवढे अचूक होते हे जसजशी आपली भटकंती वाढते आणि आजूबाजूचं मित्रमंडळ विस्तारतं तेव्हा समजायला लागतं. ‘म्हैस’ मधील मांडवकर,बगूनाना, झंप्या, बुशकोटवाले डॉक्टर, उस्मानाशेठ, पंचनाम्यासाठी आलेला ऑर्डरली त्याचप्रमाणे ‘मी आणि माझा शत्रुपक्ष’ मधील कुलकर्णी, जुने फोटो दाखवून पुलंचा वेळ कुरतडणारे ते दाम्पत्य.. सर्व पात्रे पुलंनी अप्रतिम चितारली आहेत. सतत कोकणच्या प्रगतीचा पाढा वाचणारे काशिनाथ नाडकर्णी असोत अथवा किंवा अतिमवाळ स्वभावाचे कोचरेकर गुरुजी.. या सर्वांना आपण कोणत्या ना कोणत्या प्रसंगी अजूनही भेटतच असतो.

पुलंची साहित्यिक पात्रं (शाब्दिक आणि लाक्षणिक दोन्ही अर्थानी) आपल्या आयुष्यात कधी ना कधी डोकावून गेलेली आहेत. “काय हो.. हि सगळी मंडळी खरंच जिवंत होऊन तुम्हाला भेटायला आली तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल?” असं कुणीतरी पुलंना विचारलं होतं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं – “मी त्यांना कडकडून मिठी मारेन!”. मानवी व्यक्तिरेखा ह्या काल्पनिक असल्या, तरी त्यांचे स्वभाव हे काल्पनिक नसतात.. कदाचित त्यामुळेच ह्या व्यक्तिरेखांचा भास आपल्याला अवतीभवती होत असतो. त्या पात्रांनी कधी आपल्याला हसवलंय, रडवलंय आणि आपल्या प्रतिभेने स्तीमितही केलंय. “अहो आठ आणे खाल्ले कि चौकटीचा मुकुट घालून रत्नागिरीच्या डिस्त्रीक्ट जेलात घालतात आणि लाख खाल्ले कि गांधीटोपी घालून पाठवतात असेम्बलीत.. लोकनियुक्त प्रतिनिधी!!”, “अर्रे दुष्काळ इथे पडला तर भाषणं कसली देतोस??.. तांदूळ दे! तुम्ही आपले खुळे! आले नेहरू, चालले बघावयास!!” पु.ल. आपल्याच मनातला राग व्यक्त करतायत असं वाटत. “कोकणातल्या फणसासारखी तिथली माणसं.. खूप पिकल्याखेरीज गोडवा येत नाही त्यांच्यात” हि आपल्या मनातली सुप्त भावना.. पण पुलंनी शब्दांमध्ये केवढी छान रंगवलीये. सामान्य माणसाच्या आयुष्यात येणारे सामान्य प्रसंग असामान्य पद्धतीने रंगवणं यातंच ते. बाजी मारतात. सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या विनोदाला कधीही तत्कालीन प्रसिद्ध कलाकारांची किंवा पेज-3 पुरस्कृत धुरिणांची गरज भासली नाही आणि त्यांनी अख्ख्या मराठी समाजाला वेड लावलं. पुलंची हि धुंदी कधीही उतरणारी नाही.

पुलंचं आयुष्यात अजूनही असणं हेच आपलं जीवन सुखकर बनवतं. म्हणजे आपण आनंदी असलो कि पु.ल. हसवतात पण जेव्हा कधी दु:खी, निराश असू तेव्हा आयुष्याचं तत्वज्ञान आपल्याला सांगून जातात.. “ज्या दिवशी जन्माला येणं जस्टीफाएबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात.” पुलंनी त्यांचे मित्र चंदू ठाकूर यांना लिहिलेल्या सांत्वनपर आणि प्रेरणादायक पत्रातील हे काही शब्द.. आपली विचार करण्याची किंवा आपल्या कल्पनेची, सामर्थ्याची रेघा किती सीमित आहेत याची जाणीव करून देतात. ‘हसविण्याचा माझा धंदा’ याप्रमाणेच या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक म्हणूनही आपली मोठी जबाबदारी आहे याची पुलंना नितांत जाणीव होती हे यावरून लक्षात येईल. चित्रपट-मालिका- नाटकांमधून राजे महाराजे, स्वातंत्र्यसेनानी साकारत सिंहगर्जना करणारे आपल्या पिढीतले कलाकार जेव्हा राजकीय सभा-समारंभांमध्ये कोणा स्वयंघोषित पक्षप्रमुखांच्या उगाच पुढे-मागे करत त्यांच्या ताटाखालचं मांजर झालेलं आपण पाहतो तेव्हा नक्कीच त्या प्रकारची कीव येते अन मन विषण्ण होतं. आपल्या प्रतिभेला समाजमान्यता हवी यासाठी खरंच अशा थोतांडाची गरज आहे का असा विचार साहजिकच मनात येतो. मात्र कोणत्याही संकुचित राजकीय वा जातीय-सामाजिक चक्रव्यूहात पुलंची प्रतिभा फसली नाही की लोकप्रियतेच्या लाटेत वहावत जाऊन त्यांची साहित्यसंपदा कधी भरकटली नाही . तो त्यांचा पिंडच नव्हता. अलौकिक प्रतिभामंथनातून जोपासले गेलेले विचार आणि भावना त्यांनी वेगवेगळया वेळी, वेगवेगळया प्रासंगिक निमित्तांनी आपल्या लेखांत-भाषणांत-नाटकांत सुयोग्य चेहऱ्यांचा त्यावर मुखवटा लावून, आपल्या स्वाभाविक, सहज व अतिशय बोलक्या भाषेत कथन केल्या. पुलंचा एक ‘डाय हार्ड’ फॅन आणि त्यातही एक पार्लेकर असूनही त्यांना प्रत्यक्षात कधी न भेटता आल्याची खंत कायमच सतावत राहील पण ह्या निरनिराळ्या अवतारांनी ते मला अजूनही भेटतच राहतात.. रोजंच!!

– निखिल असवडेकर

(वरील लेखात अधे-मधे आलेले इंग्रजी शब्द ‘अव्हाॅईड’ करण्याचा प्रयत्न चुकूनही केला नाही.. शेवटी मी पडलो पक्का ‘मुंबईकर’!! )

मूळ स्रोत -- > https://nikhilasawadekar.wordpress.com

Monday, July 19, 2021

माशी

साखरेचे खाणार त्याला देव देणार, म्हणतात. माशीतर सदैव साखरेचेच खाणार ! तिच्याइतकी गुळाची चव असलेले प्राणी क्वचित आढळतील. क्वचित ती आपल्या आहारात बदल करते. माणसासारखी माणसे नाही श्वापदांचा आहार करीत ? तिथे माशीनेच काय घोडे मारले आहे ? माणसाला जरी ही निष्कारण दुसऱ्याचे घोडे मारायची सवय असली तरी माशीचे मात्र घोडयावर फार प्रेम असते. बाकी माशीचे हे सगळे घोडयाचे, गोडाधोडाचे आणि क्वचित प्रसंगी उकिरडा फुंकण्याचे किंवा घाणीत तोंड घालण्याचे प्रेम पाहिले, की गतजन्माची राजघराण्यातली मंडळी पुढला जन्म माशीचा घेऊन येतात की काय, असे वाटते.

..माशी शिंकण्यावरून आठवले. मी काही स्वतः माशी शिंकताना ऐकली नाही. किंबहुना, मी अनेकांना हा प्रश्न विचारला. पण भुताप्रमाणे हा प्रत्यक्ष अनुभव असलेली माणसे मला आढळली नाहीत. तरीही ती शिंकत असावी. त्याखेरीज लोक उगीच बोलणार नाहीत. नेहमी उघड्यावर वावरणाऱ्या माशीला सर्दी होणे अगदी साहजिकच आहे. प्रस्तुत दिवंगत माशीलादेखील सर्दी झाली असेल. औषधाच्या कारखान्यात अन्यत्र वावरणाऱ्या एखाद्या प्रौढ माशीने तिला सांगितलेही असेल की, "स्ट्रेप्टोमायसिनमध्ये एक बुचकळी घे, आणि दोन दिवस मिठाईवर जरा बेतानं बस. एवढी-एवढी साखर खा पलीकडल्या वाण्याकडील. चांगली उघड्यावर असते. शाळेपुढं गुडदाणीवाला बसतो, त्याच्या गुडदाणीवर बसत जा पाच मिण्ट ---फारच भूक लागली तर! एरवी, थोडा खाण्यावर कंट्रोल हवा !”


...पाश्चात्य देशांतले लोक मात्र माशीला उगीचच भितात. घरात एक माशी आली की वाघ शिरल्यासारखा हल्लकल्लोळ होतो. फवारे काय मारतील, माश्या मारायचे जाळीदार थापटणे घेऊन जिथे-जिथे ती बसली असेल ती जागा बदडून काय काढतील. त्या भिण्याला काही सुमार नाही. काळ -वेळ नाही. एका इंग्रज मित्राच्या घरी मी एकदा जेवायला गेलो होतो. पहिले सूप आले.( भारतीय संस्कृतीला आणि पाश्चात्य संस्कृतीतला हा भेद चिंत्य आहे. ते सूप आले की जेवण सुरू करतात, आपण हातात सूप घेऊन गेलो की मांडवातले पाहुणे पांगतात.) माझा इंग्रज मित्र चमचा सुपात बुडवणार, इतक्यात त्याच्या बायकोने काडकन त्याच्या तोंडात वाजवली. ती बराच वेळ आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होती. पण मी तो पाश्चात्य प्रेमाचा भाग समजत होतो. आपल्याकडे चारचौघांतच नवराबायको तोंडाला तोंड देत नाहीत. त्यांच्याकडे चारचौघात अधिक देतात. त्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांचे तिथे मुळीच लक्ष जात नाही. तोंडात फाडकन बसल्यावर माझा इंग्रज मित्र एकदम कावराबावरा झाला. दुसऱ्या क्षणी "सापडली !" म्हणून मड्डम ओरडली. त्यानेही सूपात नजर टाकून "डार्लिंग" म्हणून तिचे प्रेमभराने चूंबन घेतले. चौकशी अंती उघडकीला आली ती गोष्ट अशी : गेला तासभर साहेबाच्या चेहऱ्यावर माशी बसली होती.उडत नव्हती. ती माझ्याही लक्षात आली होती. किंबहुना, साहेबाच्या गालावरच्या दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या होत्या. एक म्हणजे त्याच्या उजव्या गालावर लिपस्टीकचा ठसा उमटला होता. आणि त्या लाल धनुष्यावरच माशी बसली होती.बंदुकीवर माशी असते, पण धनुष्यावर असते, ह्याचे मला नवल वाटले. मी साहेबाला सावध करणार होतो. कारण साहेब झाला, तरी तो एक हाडामासाचा नवरा होता, त्याची दुःख एक समदुःखी नवरा म्हणून मला कळत होती. कचेरीतली सेक्रेटरी मुलगी माझ्याकडे पाहून देखील हळूच गोड हसली होती.तिथे साहेब तर गोरापान ! त्याच्यावर ती निश्चीत खूष असणार. त्यामुळे ते लाल इंद्रधनुष्य पाहून माझे अंतःकरण वर्डस्वर्थसारखे नसले तरी निराळ्या अर्थाने उडाले होते. त्यामुळे त्या मुखभंगाचा मी निराळा अर्थ लावला. पण माझा रहस्यकथांचा व्यासंग मोठा, त्यामुळे कार्यकारणभाव चुकीचे लावण्याकडे ओढा अधिक ! वस्तुस्थिती अशी होती की, सकाळ पासून घरात एक माशी शिरली होती ! "ओ, दॅट हाॅरिबल थिंग !" कोकणात "चुलीवर फुरसं बसलं होतं" हे वाक्य देखील बायका सहज म्हणतात. पण मडमेने "माशी शिरली" ह्या वाक्याला भुवया वर नेल्या, ओठाचा चंबू केला, आपले सोनेरी केस उडवले, आणि दोन्ही हातांनी भरतनाटयममधल्या नर्तकी जसा शहारा आणल्याचा अभिनय करतात तसा केला. दिवसभर ती त्या माशीच्या मागे होती. (तिचा नवरा त्या सेक्रेटरी पोरी मागे असतो तशी !)


(अपूर्ण)
माशी - ह स व णू क
पु.ल. देशपांडे

Tuesday, July 13, 2021

(पु.ल. – नक्षत्रांचे देणे) - मोहित केळकर

पुलं म्हणजे एक साठवण,पुलं कधीच न पुसली जाणारी एक चिरंतन आठवण,
पुलं म्हणजे एक पर्व,
पुलं आम्हा मराठी जनांचा गर्व ॥ १ ॥

पुलंची एक-एक अजरामर कलाकृती,
त्यांच्या साहित्यातून डोकावते आपली मराठमोळी संस्कृती,
पुलं म्हणजे जणू साहित्यातील अथांग सिंधू,
पुलं आम्हा मराठी जनांचा मानबिंदू ॥ २ ॥

विविध नमुने जे दिसती आपणां दारोदारी गल्लोगल्ली,
त्यातूनच जन्माला आल्या पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली,
पुलंच्या वल्लींच्या आपण तपशीलात जातो जेव्हा,
वाटते त्यांच्या तरल निरीक्षणशक्तीचा वाटेल शेरलॉक होम्सलाही हेवा ॥ ३ ॥

फार फार पुढे जाण्याची लागली आहे आपणां सर्वांनाच घाई,
तरी वेगाला कावलेला ‘असा मी असामी’ आहे प्रत्येकाच्या ठायी,
‘टाईम्स हॅव चेंजड्‍’ म्हटले तरी संस्कार काही बदलत नाही,
सर्व सुखसोयीसंपन्न फ्लॅटमधला देव आपण हलवत नाही ॥ ४ ॥

बटाट्याच्या चाळीतल्यांनादेखील पुलंनी दाखवली अपूर्वाई-पूर्वरंग,
इतिहासात शिरून दाखवली सर्वांना कान्होजी आंग्रेंची जंग,
तुम्हाआम्हाला घेऊन पुलंनी काढली वार्‍यावरची वरात,
धनदौलत त्यांच्यासाठी क्षुल्लक त्यांना मिळाली निरागस हास्यांची खैरात ॥ ५ ॥

आभाळापलिकडल्या या महात्म्याचे होते जमिनीवर पाय,
गोरगरीबांवर पांघरली त्यांनी नेहमीच मायेची साय,
पैसाअडक्याचा मोह नव्हता कधीच, केला सत्पात्री दानधर्म,
माणुसकी हा त्यांचा धर्म व लोकांना हसवणे हे एकच कर्म ॥ ६ ॥

असेच महात्मे धरतीवर धाडत जा परमेश्वरा,
तुझे आजन्म राहू आम्ही ऋणी,
आमचे आयुष्य सुखकर करतात,
तुझी हीच नक्षत्रांची देणी ॥ ७ ॥

-- मोहित केळकर

मूळ स्त्रोत -- > https://mitramandal-katta.blogspot.com/p/blog-page_0.html

Monday, July 11, 2016

माझे पौष्टिक जीवन

"पंधरा पैशांचे ष्टांप द्या..."

"पलीकडच्या खिडकीत जा."

"अहो, पण..."

"पाटी वाचता येते ना?" माझ्या मुखमंडलात असा काय गुण आहे मला कळत नाही, पण बसकंडक्टर (सौजन्यसप्ताहातसुद्धा), पोष्ट-अगर-तारमास्तर, तिकीट-कलेक्टर, हॉटेलातले वेटर, कापड-दुकानातले पंचा-विभागातले लोक गुरकल्याशिवाय माझ्याशी बोलतच नाहीत. साऱ्या दिवसाचा उद्धटपणा माझ्यावर काढतात. अशावेळी आपण गेल्या जन्मी कोण होतो, म्हणून ह्या जन्मी हा भोग माझ्या नशीबी यावा, ह्या विचाराने मी हैराण होतो. आता हा पोष्टातला धाकटा मास्तर; त्याला "पाटी-वाचता-येते-ना?" असे कुत्सित बोलायचे कारण काय?
"पलीकडे जा. पब्लिकचा टाईम फुकट घालवू नका."

"अहो! पण ष्टांप कुठं मिळतात?"

"ते काय, 'चौकशी' असं लिहिलंय तिथं."

"पोष्टात ष्टांपाला 'चौकशी' म्हणायला लागले काय हल्ली?"

"विनोद घरी जाऊन करा!"

मी चौकशीच्या खिडकीपाशी गेलो. बाकी पोष्टाचे एक बरे आहे- ह्या खिडकीचा त्या खिडकीला पत्ता नसतो. 

"काय?" चौकशी-खिडकीत चौकशी झाली.

"पंधरा पैशांची एक चौकशी द्या." मी थंडपणाने सांगितले. 

"कायss" खिडकीमागून पूर्वीच्या नायिका फोडत तसली पण पुरुषी आवाजात 'अस्फुट आरोळी' आली. 

"पंधरा पैशांची चौकशी."

"चौकशी?"

"चौ-क-शी."

"काय मिस्टर, सकाळीच चढवून आलाय काय?"

"खिडकीबाहेर मुंडकं काढा, तुम्हांलाही चढवतो!"

शाळेत मी एकदा गणोजी शिर्क्याचे काम केले होते- तो आवाज पुन्हा लावला. अवघे पोष्ट हादरले. तारमास्तरच्या थरथरत्या बोटांतून 'कडकटृ'मधले नुसते कडकडकडकडकड एवढेच वाजलेले ह्या कानांनी मी ऐकले. 'क्यू'मधली दीड तासांची तपश्चर्या आणि चहाची टळलेली वेळ माझ्या संतापातून बोलत होती. शेवटी पब्लिकने "जाने दो, जाने दो यार. साला गवर्मींटका मामला ऐसाही हो ग्या-", वगैरे पाणी ओतले आणि ती पंधरा पैशांची तिकिटे विजयचिन्हांसारखी मिरवीत मी बाहेर पडलो आणि समोरच्या पेटीत पत्र टाकले. निम्मी वाट चालून गेल्यावर ती पंधरा पैशांची विजयचिन्हे त्या पत्राला चिकटवायची विजयोन्मादाच्या भरात विसरल्याचे लक्षात आले.

- माझे पौष्टिक जीवन (हसवणूक)

Saturday, May 10, 2008

बुट्टी /अधिकारी योग -- हसवणुक

`हसवणुक' मध्ये पुलंनी माणसाच्या कुंडलीतील काही अनिष्ट ग्रहयोग दिले आहेत. त्यातील एक...


लोकं अशी वागतातच का ते काही समजतच नाही बुवा ?
बहुतेक बुट्टी /अधिकारी योग त्यांच्या मागे लागला असावा.

काहीबाही खोटं ऑफिसचं कारण देऊन स्वत:चं पितळ झाकून ठेवावं, प्रकृती ठिक नसल्याचे कारण देऊन बुट्टी मारावी. ऑफिस मध्ये "बेडरिड्न " अशी तांत्रिक 'चिठठी' पाठवावी. घरातून मात्र नित्याप्रमाणे ऑफिस ला जातो असे सांगून निघावे, आणि तास- दोन तास "सेफ एरीया"त काढून दुपारच्या शो ला सिनेमाला जाऊन बसावे. नेमका आपल्या समोर आपला बॉस बसलेला असतो.

त्याला चकवून नुसती डॉक्युमेंट्री पाहून बाहेर सट्कावे तर काळोखात कुणाच्या तरी पायावर पाय पडतो, आणि "मेल्याचे डोळे फुटले!"असा अतिपरीचीत स्त्रीस्वर कानावर येतो. तो नकळत मंडळातल्या मैत्रिणीं ना घेऊन आलेल्या स्वपत्निचा असतो. कृत्रीम 'काळोखात' तिला दिसले नसले, तरी 'साहेबाने' पाहीलेलं असतं. पण तोही बोलत नाही. कारण इन्स्पेक्शनला म्हणून बाहेर पडून तो ही हळूच सेक्रेटरी पोरीला घेउन आलेला असतो.
पण आपल्या मागे हात धूऊन लागलेल्या "बुट्टी/अधिकारी" योगामुळे मधल्या मधे आपला सिनेमा बुडतो. पण..
"दारी नोकरी आणि घरी जीव वाचतो ".

१.घरी गेल्यावर पत्नी "मंडळात व्याख्यान छान झालं,"म्हणून सांगते.
२.दुसऱ्या दिवशी साहेब हापिसात ट्रे मधला चहा "शेअर "करु या म्हणून ट्रे पुढे करतो.
३.आणि ती सेक्रेटरी पोरगी आपल्या डब्यातलं सँडविच देते.(हा योग माणसाला दरी पर्यंत नेतो,पण खाली ढकलीत नाही.)

योगावर जन्मलेला "हवालदार" हातभटटी वाली कडे सब-इन्स्पेक्टर सायबाला चुकवून नियमित हप्त्यावरचे चायपानी मागायला गेला,तर त्याला तिथे हटकुन तो "साहेब"पहिल्या धारेची घेताना दिसलाच पाहिजे.
साहेबाला वाटतं हवालदाराने पाहिले;हवालदारला वाटते त्याने.

मग भट्टीवाली "अक्का" दोघां नाही पाजते.आणि चौकित आणून सोडते.तिथे त्या दिवशी नेमका अँटीकरप्शन वाला आलेला असतो.पण तो ही बोलत नाही.कारण "आपल्या तोंडाचा वास मारतो की काय याची त्याला भीती वाटत असते.

मग "आक्का" च्या अध्यक्षतेखाली चौकित........
"साली सगळी पब्लिक हल्ली "हरामी" कशी होत चाललीय," ह्यावर चर्चा होते.
बुट्टी/अधिकारी- योगा मुळे संकट असे हुतुतू करित येते आणि भिडूला न शिवता परत बोंबलत ,कांगावा, करत जाते.


- काही नवे ग्रहयोग
हसवणूक
a