Leave a message
Showing posts with label bhaai. Show all posts
Showing posts with label bhaai. Show all posts

Wednesday, June 24, 2020

आनंदपुरुषोत्तमाचे टपाल तिकीट - सतीश पाकणीकर

पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर पूर्वी व्हरायटी स्टोअर्स नावाचे एक स्टोअर होते. शाळेतून येताना बऱ्याच वेळा त्या दुकानाच्या बाहेर उभा राहून, भल्यामोठ्या काचेतून आतील रॅक्सवर ओळीने मांडून ठेवलेल्या अनेक वस्तू मी पाहत बसे. त्यावर पाडलेल्या प्रकाशामुळे त्या वस्तूंचा चकचकीतपणा अजुनच खुलून दिसे. त्यात अगदी काचेच्या जवळ काही अल्बम ठेवलेले असत. पोस्टाची तिकीटे गोळा करणाऱ्यांसाठी ते अल्बम म्हणजे चैनीचा भाग असे. त्रिकोणी, चौकोनी, आयताकार, षटकोनी तिकिटे चिकटविण्यासाठी त्या आकाराच्या ठिपक्यांच्या ओळी असलेली ती पाने पाहिली की आमची तिकीटांची साधी वही एकदम केविलवाणी वाटू लागे. पैसे साठवून कधीतरी तो अल्बम घ्यायचाच हा विचार करीत तेथून पाऊले हलवावी लागत. वर्गातल्या काही मित्रांना काड्यापेटीचे छाप जमवण्याचा छंद असे. पण पोस्टाची तिकीटे गोळा करून त्यांचा संग्रह करणारे जरा उच्च श्रेणीतले समजले जात. कारण ज्यांच्या घरी पत्र-व्यवहार जास्त होत असे त्यांच्याकडे जास्त तिकीटे गोळा होत. त्यातही ज्यांचे नातेवाईक परदेशात असत त्या मुलांचा भाव जास्त असे. कारण त्यांच्या संग्रहात विदेशी तिकिटेही असत. मग त्यांची देवाण-घेवाण होत असे. एखादे दुर्मिळ तिकीट मिळाले की खूप आनंद होत असे. ते मित्रांना कधी दाखवू असे होऊन जात असे. बरीच वर्षे हा छंद टिकला. मग कॉलेज शिक्षण व व्यवसाय यात तो छंद एकदम मागे पडून गेला. विस्मरणात गेला.

त्या छंदाची आठवण उफाळून यावी अशी एक घटना घडली. २००२ सालचा मार्च महिना असेल. मला एक फोन आला. पलीकडची व्यक्ति बोलली- “ मी पी.एम.जी. अनिल जोशी बोलतोय. माझं तुमच्याकडे एक तातडीचं काम आहे. कधी भेटू शकतो आपण?” मला अनिल जोशी हे नाव कळले होते. पण पी.एम.जी. म्हणजे काय हे कळले नव्हते. अज्ञान प्रकट करायला लागणार होते. तसे मी ते केले. त्यावर ते म्हणाले – “ मी अनिल जोशी, ‘पोस्ट मास्टर जनरल’, पुणे, म्हणून नुकताच रुजू झालोय. कधी भेटू या?” मग मला वाटले की त्यांच्याकडून राँग नंबर लागलाय. मी तसे म्हटल्यावर ते घाईने म्हणाले- “ नाही हो. मी भेटल्यावर तुम्हाला सांगतो. फोनवर सर्व सांगता येणार नाही. पण काम महत्वाचे आहे आणि तातडीचंही!” वेळ ठरली संध्याकाळी साडेचारची. ठिकाण लॉ कॉलेज रोडला फिल्म इंन्स्टिट्यूटच्या बाहेर.

मी पाच मिनिटे आधीच जाऊन पोहोचलो. बरोबर साडेचारला एक पांढरी ॲम्बॅसिडर गाडी तेथे येऊन पोहोचली. मी अंदाजाने ओळखले. त्यांनीही मला गाडीत बसण्याची खूण केली. मी गाडीत बसल्यावर अनिल जोशी यांनी सांगायला सुरुवात केली. “ मी रुजू व्हायच्या आधी काही दिवस येथे उत्तर हिंदुस्थानी बाई ‘पीएमजी’ होत्या. त्यांच्या काळात पु.ल.देशपांडे यांच्यावर टपाल तिकीट काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यांना पु लं विषयी फारशी माहिती नव्हती. त्यांनी परस्पर त्यांच्या एका कनिष्ठ सहकाऱ्याला पु लं च्या घरी त्यांचे फोटो आणायला पिटाळले. तो तेथे गेला व त्याने सुनीताबाईंना फोटो हवे आहेत असे सांगितले. कामाचे स्वरूप लक्षात घेऊन सुनीताबाईंनी त्याला चार-पाच दिवसांनी या असे सांगितले. सुनीताबाईंनी मुंबईहून फोटो मागवले. त्या फोटोग्राफरने दोनच फोटो पाठवले होते. एक पु. ल. व विजया मेहता असा. व दुसरा पु. ल. सिगारेट ओढत आहेत असा. ते फोटो घेऊन तो माणूस ऑफिसवर पोहोचला. ते फोटो मग दिल्लीस पाठवले गेले. पण असे फोटो तिकिटासाठी चालणार नव्हते. त्यामुळे ते रिजेक्ट झाले. तेथून तशी सूचना आली. त्यानुसार परत एकदा तीच व्यक्ती सुनीताबाईंच्यासमोर पोहोचली. त्याने सरळ सुनीताबाईंना सांगितले की “तुम्ही दिलेले फोटो रिजेक्ट झालेत नवीन फोटो द्या.” त्या व्यक्तीचे असे बोलणे ऐकून सुनीताबाई वैतागल्याच. त्या म्हणाल्या – “ माझ्याकडे फोटो नाहीत. तुम्ही पुलं वर तिकीट काढूच नका. नाहीतरी तुम्ही माझ्या नवऱ्याचे तिकीट प्रसिद्ध करणार आणि त्याच्या चेहऱ्यावर परत शिक्का मारणार. त्यापेक्षा तुम्ही तिकीटच काढू नका ना!” असे म्हणून त्यांनी त्याची बोळवण केली. त्यामुळे तो प्रस्ताव मागे पडला. मी चार्ज घेतल्यावर आधीचे सर्व प्रकल्प बघताना माझ्या ही गोष्ट लक्षात आली. इतक्या महत्वाच्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग केवळ माहिती करून न घेतल्याने घडला आहे हे जाणवून मी आता त्याला प्रथम प्राधान्य दिलेले आहे. एक मराठी म्हणून मला अभिमानाने सांगता येईल की माझ्या कारकीर्दीत मी पुलं वर तिकीट काढू शकलो. मी नुकतेच एका पुस्तकात तुम्ही काढलेले पुलं चे फोटो पाहिले. मग नाव सर्च करून तुमचा नंबर मिळवला व फोन केला.”

आता माझ्या मनात विचार आला की – ‘यांना आपण फोटो दिले की काम झालं असतं. त्यासाठी इथे असं बोलावण्याचं काय प्रयोजन?’ त्यांनी बहुतेक माझा विचार ओळखला असावा कारण ते लगेचच म्हणाले – “ आपण आत्ता येथूनच सुनीताबाईंना भेटायला जाऊ. मी तुमच्याकडून फोटो घेणार आहे हे त्यांना सांगीन. पण त्यांची त्या आधी समजूत काढावी लागेल. म्हणून तुम्ही बरोबर चला.”

रागावलेल्या सुनीताबाईंच्या समोर आणि तेही त्यांना आधी फोन न करता जाणे हे धाडस होते. पण मी आधीही बऱ्याच वेळी त्यांना फोन न करता गेलो असल्याने व त्यांनी मला सहन केलेलं असल्याने मी होकार दिला.

आम्ही त्यांच्याच गाडीतून पाच मिनिटात ‘मालती-माधव’ येथील त्यांच्या घरी पोहोचलो. बेल वाजवल्यावर सुनीताबाईंनीच दरवाजा उघडला. त्यांच्या नेहमीच्या आवाजात म्हणाल्या- “ हं, काऽऽय हो?” मी त्यांना अनिल जोशी यांची ओळख करून दिली. सुनीताबाईंच्या लगेच सगळं लक्षात आलं. त्या म्हणाल्या – “काऽऽय हो तुमची माणसं? कसं बोलायचं असतं याचं त्यांना काही शिक्षण दिलेलं नसतं का?” अनिल जोशी यांनी लगेच त्यांची माफी मागितली. अर्थात सुनीताबाईही लगेचच निवळल्या. त्यांचं नेहमीचं मंद हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आलं. त्या परत म्हणाल्या – “ आता मी काय करू तुमच्यासाठी?”

ही संधी साधत अनिल जोशी यांनी सुनीताबाईंना ‘फिलाटेली’ विषयी इथ्यंभूत माहिती द्यायला सुरुवात केली. “ जगभरात लहान–थोर असे करोडो लोक पोस्टाची तिकिटे जमवण्याचा छंद जोपासतात. त्यातून आपल्याला जगभराचा चित्रमय इतिहास पाहायला मिळतो. प्राणि, फळे-फुले, शास्त्र, कला, उद्योग याबरोबरच जगभरातील महान व्यक्ती, इतिहासकार, कलाकार, शास्त्रज्ञ, राजनीतीज्ञ यांचे स्मरण आपल्याला पोस्टाच्या तिकिटांवर झालेले दिसते. अशी प्रसिद्ध झालेली तिकीटे जमवण्याच्या छंदास ‘फिलाटेली’ असे म्हटले जाते. फिलाटेलीस्ट हा फक्त तिकीटे जमवतो असे नाही तर त्या तिकीटांच्या व त्या अनुषंगाने छापल्या जाणाऱ्या एरोग्राम, पोस्ट कार्ड, पत्रके, नोंदणीकृत लिफाफा, मुद्रित लिफाफा, प्रथम दिवस आवरण या सर्वांच्या छपाई, संरचना यामध्येही त्याला रस असतो व या सर्वांचा संग्रहही तो करीत असतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट एकदा म्हणाले होते की- “ माझा तिकीट संग्रह ही अशी एक जागा आहे की जेथे सर्व देश गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात.” हा असा छंद आहे की ज्यामुळे लोकांच्या मनात शांती आणि प्रेम याचा संदेश आपोआप पसरला जातो.” असे सांगत त्यांनी पुलंवरील स्मरणार्थ तिकिटाचे आपल्याला कसे महत्व आहे हेही पटवले.

त्यांच्या या सविस्तर कथनाने सुनीताबाईंच्या मनातील आधीच्या भावना नाहीश्या झाल्या. त्या उठल्या व त्यांनी पुलंवरील ‘चित्रमय स्वगत’ हा ग्रंथ जोशी यांना दाखवत म्हणाल्या – “ याचा काही उपयोग होईल का पहा. यात भाईचे शेकडो फोटो आहेत.” जोशी यांनी तो ग्रंथ चाळला. व म्हणाले- “ मी जाता जाता डेक्कन जिमखान्यावरून हा ग्रंथ घेईन.” अचानकपणे सुनीताबाई माझ्याकडे हात करीत म्हणाल्या- “ अहो, ह्यांनी काढले आहेत की खूप फोटो भाईंचे. यांच्याकडून घेता येतील तुम्हाला.” जोशी म्हणाले – “ हो मला माहित आहे. त्यांना मी सांगणारच आहे.” चहापान झाले आणि आम्ही तेथून आनंदात निघालो. मलाही हुश्श झाले होते.

जोशी यांनी केलेले वर्णन ऐकल्यामुळे मी त्यांना म्हणालो- “ मी तुम्हाला काही फोटोंच्या प्रिंट्स करून देतोच पण त्या बरोबर स्टॅम्प, फर्स्ट डे कव्हर व कॅन्सलेशन स्टॅम्पचे डिझाईनही करून पाठवतो. त्याची निवड झाल्यास उत्तमच नाहीतर मला मी काही काम केल्याचे समाधानही मिळेल.” आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पुढच्याच आठवड्यात अनिल जोशी यांना मी त्यांच्या मुख्य पोस्ट ऑफिसमधील कार्यालयात सर्व साहित्य नेऊन दिले. त्यांनी ‘चित्रमय स्वगत’ व मी दिलेले सर्व साहित्य दिल्लीस पाठवून दिले.

जवळजवळ दीड महिन्याने मला अनिल जोशी यांचा फोन आला. तारीख होती ६ मे २००२. त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि म्हणाले- “ पाकणीकर, तुमचा फोटो पुलंच्या तिकीटासाठी निवडला गेला आहे. त्या तिकीटाचं डिझाईन आजच मला दिल्लीहून आलं आहे. पण तुम्ही आत्ताच ही बातमी कोणाला सांगू नका. पुढच्या महिन्यात १६ जूनला पुण्यातच त्याचं प्रकाशन माहिती आणि नभोवाणी मंत्री श्री. प्रमोद महाजन यांच्या हस्ते होणार आहे. निमंत्रण मी देईनच तुम्हाला.” त्या फोन नंतर काहीच वेळात त्यांनी मला त्यांना आलेली मेल फॉरवर्ड केली. झाले ते सर्व स्वप्नवतच घडले होते.

१६ जून २००२. आपल्या लाडक्या व्यक्तीमत्वाच्या सन्मानार्थ निघणाऱ्या पोस्टाच्या तिकिटाचा कार्यक्रम ‘याचि देही याचि डोळा’ पाहता यावा यासाठी बालगंधर्व रंगमंदिरात रसिकांनी तुफान गर्दी केली होती. प्रमुख पाहुणे होते आदरणीय पं. भीमसेन जोशी. “बहुविध गुण असणाऱ्या ऋषीतुल्य पु.ल.देशपांडे यांच्या सन्मानार्थ त्यांचे टपाल तिकीट काढून कळत न कळत मी पुलंना आपली गुरूदक्षिणा अर्पण केली आहे. ते आम्हाला पुण्यात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात रेडिओ पत्रकारिता हा विषय शिकवण्यास येत असत. हे ऋण फेडण्याची संधी योगायोगाने मी या खात्याचा मंत्री असताना मिळाली हे मी माझं भाग्य समजतो.” अशा भावपूर्ण उदगारांसह प्रमोद महाजन यांनी ते तिकीट, प्रथमदिवस आवरण व कॅन्सलेशन स्टॅम्प या सर्वांचे प्रकाशन केले. तर भीमसेनजी म्हणाले – “ गाणे, साहित्य आणि कलांवरील प्रेमामुळे पु.ल.देशपांडे कायम अमरच आहेत.”

पुलंची बहुविविधता दाखवण्यासाठी या तिकीटावर त्यांच्या प्रकाशचित्रासह, मागे ‘जोहार मायबाप’ मधील त्यांनी साकारलेला चोखा मेळा, लेखणी, पुस्तक, रंगमंच, चित्रफित व त्यांची स्वाक्षरी अशी चित्र विराजमान आहेत. प्रथम दिवस आवरणावर त्यांच्या ‘बटाट्याची चाळ’ मधील सहा प्रतिमा तर कॅन्सलेशनच्या खास शिक्क्यात तानपुरा व लेखणी एकाकार झाले आहेत.

कार्यक्रम संपन्न झाला. पण तो पाहण्यास सुनीताबाई मात्र येऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे काही मोजक्याच व्यक्तींसह श्री. प्रमोद महाजन ‘मालती-माधव’ वर पोहोचले. अनिल जोशी यांनी मलाही येण्याचे आमंत्रण दिले. आम्ही सर्व पोहोचलो. तिकीट व त्याबरोबरचे सर्व साहित्य पाहून सुनीताबाईंना किती आनंद झाला आहे हे त्यांच्या डोळ्यात जमलेले आनंदाश्रूच सांगत होते. श्री. अनिल जोशी यांनी पुढे येत श्री. प्रमोद महाजन यांच्या हस्ते मला भारतीय टपाल खात्यातर्फे तिकीट, प्रथमदिवस आवरणावर चिकटवलेले तिकीट, त्यावर उमटवलेला कॅन्सलेशन स्टॅम्प व या तिकीटाची विवरणिका (ब्रोशर) असा एक सुंदर अल्बम भेट म्हणून दिला.

कविवर्य कुसुमाग्रज पुलं विषयी यथार्थपणे म्हणतात- “ आपापले कार्यक्षेत्र व्यापून टाकणारे प्रतिभावंत असतात, पण त्यातला एखादाच आपल्या समाजाच्या समग्र संस्कृतीलाच व्यापून उरतो. पी.एल. हे असे विरळा प्रतिभावंत आहेत. मराठी संस्कृतीच्या वेगवेगळ्या अंगात जे जे सत्वशील, सुंदर, उदात्त, उन्नत, नवनिर्मितीशील, सुरेल, नाट्यपूर्ण व मूल्ययुक्त आहे ते ते पी.एल. च्या व्यक्तिमत्वात आणि कलानिर्मितीत व्यक्त झाले आहे.”

व्हरायटी स्टोअर्सच्या त्या काचेमागील ते तिकीटांचे अल्बम तेव्हा माझ्या नशिबात नव्हते. पण मराठी सारस्वताचा मुकुटमणी असलेल्या, मला वेगवेगळ्या संगीत मैफलींना आमंत्रण देऊन संपन्न करणाऱ्या, माझ्या सुरुवातीच्या काळात माझं मनोमन कौतुक केलेल्या, एन.सी.पी.ए. च्या संगीत विभागासाठी माझी प्रकाशचित्र विकत घेणाऱ्या त्या आनंदपुरुषोत्तमाच्या सन्मान तिकीटावर मी टिपलेलं त्यांचं प्रकाशचित्र निवडलं जावं व त्यांच्या ऋणातून काही अंशानं का होईना उतराई व्हावं हे त्या नियतीच्याच मनात होतं नां? आणि आदरणीय सुनीताबाई, पं. भीमसेनजी व श्री. प्रमोद महाजन यांच्या स्वाक्षऱ्यांसह अमूल्य झालेला तो खास असा तिकीट अल्बम माझ्या संग्रही कायम राहावा हे ही त्या नशिबानेच ठरवले असणार नां ?

- सतीश पाकणीकर
http://www.sateeshpaknikar.com/

Monday, June 15, 2020

तरुणाईचे लाडके पु.ल.

पुलंना जाऊन (१२ जून रोजी ) आता वीस वर्ष लोटलीत. परंतु त्यांचं मराठी जनमानसावरील अधिराज्य अजूनही कायम आहे. तरुणाईच्या मनांवरही ते तितकंच गडद, गहिरं आहे. याचाच हा वानवळा..
                     
जीवनात एक वेळ अशी येते की जिथे आपल्याला आपली वाट गवसते किंवा चुकते. मला माझी वाट २००० साली गवसली. महाराष्ट्र त्यावेळी एका मोठय़ा धक्क्य़ातून सावरत होता. पु. ल. देशपांडे निवर्तले होते. दुसऱ्या दिवशी सगळ्या मराठी वर्तमानपत्रांतून पुलं गेल्याची बातमी छापून आली होती. जवळजवळ अख्खा पेपर ‘पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे’ या नावाशी संबंधित लेखांनी भरलेला पाहिला. तत्पूर्वी पु. ल. देशपांडे नावाचे एक थोर साहित्यिक आपल्या महाराष्ट्रात आहेत, एवढंच जुजबी ज्ञान माझ्या बालमेंदूत शिक्षण खात्यानं घुसवलेलं. त्यामुळे प्रत्यक्षात पु. ल. देशपांडे ही काय चीज आहे मला माहीत नव्हतं. मग मी ‘पुलं कोण होते’ याचा शोध घेण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. कॅसेट हाऊसमधून पुलंच्या ‘रावसाहेब’, ‘नारायण’ व ‘सखाराम गटणे’ या कथाकथनाची कॅसेट आणली आणि प्लेयरवर लावली.

‘एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही..’ हे पुलंचं पहिलं वाक्य कानावर पडलं आणि माझी त्यांच्याशी त्याच दिवशी वेव्हलेंग्थ जुळली. त्यानंतर पुलंच्या विचाराशिवाय एकही दिवस गेला नाही. पुलंच्या ऑडियो क्लिप्स ऐकून आणि त्यांची पुस्तकं वाचून झालेलं तृप्तीचं समाधान अतुलनीय आहे. एखादा विचार व्यक्त करत असताना योग्य शब्द निवडण्याचं कसब पुलंना सहजी अवगत होतं. शाळकरी मुलापासून ते नव्वदीत पोचलेल्या वृद्धांपर्यंत वाचकांची मोठी रेंज लाभणं- यातून पुलंच्या साहित्याचा समाजावरील गहिरा प्रभाव दिसून येतो. पुलंच्या समकालीन किंवा सद्य:कालीन अन्य कुणा लेखकाला हे भाग्य लाभलेलं दिसत नाही. पुलंनी दैनंदिन जीवनातील घडामोडींचं सूक्ष्म निरीक्षण करून त्याला अनुपमेय शब्दरूप दिलं आणि समाजाला जीवनाकडे सौंदर्यदृष्टीने पाहण्याची दृष्टी दिली. ती देताना त्यांची भाषा कुठेही प्रचारकी नव्हती. आजची पिढी पुलंची वाक्यं एखाद्या संदर्भात वापरते त्यावरून खात्रीनं वाटतं, की पुलं हेच मराठी साहित्यातील सर्वात जास्त लोकप्रिय लेखक आहेत. उदाहरणादाखल सांगायचं तर पुलंची जन्मशताब्दी साजरी झाली त्यानिमित्ताने ‘मालती-माधव’मधल्या पुलंच्या घरी त्यांचा सहवास लाभलेले कित्येक स्नेहीसोबती जमले होते. या कार्यक्रमाला पुलंवरच्या प्रेमापोटी आम्ही तरुणांनी बनवलेल्या ‘आम्ही असू ‘पुलं’कित’ या ग्रुपच्या सदस्यांना ठाकूर दाम्पत्याने मोठय़ा आपुलकीनं बोलावलं होतं. मुंबई, पुणे, सांगली, मिरज, कोल्हापूर ते पार बेळगावहून मंडळी जमली होती ती केवळ पुलंवरील प्रेमामुळेच. वाटावं- हे एकच कुटुंब आहे! डॉ. जब्बार पटेल, बाबासाहेब पुरंदरे, जयंत नारळीकर, श्रीकांत मोघे, अरुणा ढेरे, माधव वझे, सुधीर गाडगीळ यांसारखी कलाक्षेत्रातील मंडळी त्या दिवशी जमली होती. त्यांच्यासमवेत वयाचा, ज्ञानाचा, कर्तृत्वाचा कसलाही भेद न बाळगता आम्हा मुलांना ‘मालती-माधव‘मध्ये काही तास घालवता आले ही कदाचित आमची पूर्वजन्मीची पुण्याईच! दिवसभर चाललेल्या या स्नेहमेळाव्यात एकमेकांशी बोलताना आम्हा मुलांच्या तोंडी फक्त पुलंचीच वाक्यं होती. जसं की आमच्यातला मृणाल ‘सर, हे पेढे!’ म्हणत गटण्याच्या भूमिकेत शिरून सर्वाना पेढे वाटत होता. मी बाबासाहेब पुरंदरे, जब्बार पटेल, माधव वझे यांच्याशी बोलताना एकच वाक्य म्हणायचो- ‘आपल्याशी एकदा (पुलं) या विषयावर बोलायचंय!’ डोंबिवलीहून आलेल्या आनंद मोरेंची ओळख करून दिली तर ते एकदम ‘म्हैस’मधल्या बाबासाहेब मोरे या पुढाऱ्याच्या भूमिकेत शिरून म्हणाले, ‘(मंत्रालयात) मालती-माधवमध्ये मीटिंग आहे..’ दुपारी जेवताना आम्ही एकमेकांना ‘अरे, घ्या.. घ्या, लाजताय काय च्यायला स्वत:च्या घरी असल्यासारखे!’ अशी टपली मारत होतो. पुलंच्या लोकप्रियतेचा मला आलेला एक अनुभव सांगतो. २०१५ साली मी मित्रांसमवेत तोरणा किल्ल्यावर अभ्यासासाठी गेलो होतो. चालून थकल्यामुळे दुपारच्या वेळी गडावर सावलीत निवांत झोपलो होतो. अचानक दुरून बारीक आवाजात ‘गोदाक्का, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ बघू?’ हे चितळे मास्तरांचं वाक्य कानावर पडलं. कुठल्याशा कॉलेजात शिकणारी मुलं सुट्टीत गडावर फिरायला आली होती. त्यातल्याच एकाच्या खिशातून ‘चितळे मास्तर’ ऐकू येत होते. गड चढताना कष्ट जाणवू नयेत म्हणून त्याने मोबाइलवर चितळे मास्तरांची क्लिप लावलेली आणि बाकीचे मन लावून ते ऐकत ऐकत गड चढत होते. वयोगट साधारणत: २०-२१ वर्षे. असं काही अनुभवलं की वाटतं, जगात आपल्यासारखे ‘पुलंयेडे’ बरेच आहेत.

मला वाटतं, पुलंना केवळ ‘विनोदी लेखक’ म्हणून जी ओळख मिळाली ती जरा अन्यायकारकच आहे. खरे पुलं त्यांच्या भाषणांतून आणि वैचारिक लेखांतून समजतात. पुलंच्या एकूण साहित्यसंपदेपैकी विनोदी साहित्याचं प्रमाण हे वैचारिक साहित्यापेक्षा कमीच असावं. पुलंची गोळी कडू नसे. त्यामुळं ती घेणाऱ्याचं तोंड कधीही कडवट झालं नाही. परिणाम मात्र योग्य तो व्हायचाच. पुलं वाचताना आपण उगाच काहीतरी गहन वाचतोय असं निदान मला तरी कधी वाटलं नाही. हो, अंतर्मुख जरूर झालो. अगदी पुलंचं विनोदी साहित्यही वाचूनही. पुलं वाचताना नेहमी मला संवादाचा भास होतो. माझं आपलं असं कुणीतरी माझ्याशी गप्पा मारतंय असं वाटत राहतं. ‘हा माणूस आपला आहे’ असं वाटणं ही भावना वाचकाचं लेखकाशी अदृश्य नातं जोडते. यामुळंच पुलं प्रत्येक पिढीशी आपलं नातं जोडून आहेत.

पुलं एक कमाल आस्वादक होते. जीवनाचा आनंद त्यांनी स्वत: तर घेतलाच आणि तो इतरांनाही वाटला. समाजातलं उत्तम ते- ते पाहावं, आस्वादावं आणि आयुष्य आनंदानं जगावं ही मूलभूत शिकवण पुलंनी आपल्याला दिली. पुलंमुळे मी पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे यांचं गाणं ऐकणं शिकलो. चार्ली चॅप्लिन समजला. व्यक्त होणं शिकलो. उत्तम मैत्र जोडणं शिकलो. कला, साहित्य, संगीत, नाटक यांत मनापासून काम करणाऱ्या मंडळींशी गट्टी जमवून आपली सांस्कृतिक भूक भागवणं शिकलो. रवींद्रनाथ टागोर समजावेत म्हणून वयाच्या पन्नाशीत पुलं शांतिनिकेतनमध्ये बंगाली भाषा शिकायला गेले होते, ही गोष्ट खूप काही सांगून जाते. त्यांनी रवींद्रनाथांचं भाषांतरित साहित्य वाचलं असतं तरी चाललं असतं, पण पुलंनी ते टाळलं. जीवनाचा सर्वार्थाने आनंद घेणं ते हेच.

मी मुद्दाम कुणाला ‘पुलं’ ऐकवण्यापेक्षा माझ्यासाठी त्यांची ऑडियो क्लीप लावतो. तो आवाज ज्या- ज्या माणसांच्या कानांवर पडेल, त्यांतून ज्याला जे भावेल तो पुलंचा झाला असं साधं-सरळ समीकरण आहे. समाधानाची बाब ही, की पुलंच्या लिखाणाला काळाचं बंधन नसल्यामुळे ज्याला मराठी भाषेचा सेन्स आहे अशा प्रत्येकाला पुलं भावतात. त्यामुळं ‘आजच्या पिढीला पुलं समजायला हवेत’, ‘इतरभाषिकांना पुलं समजायला हवेत’ वगैरे कल्पना वांझोटय़ा आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. अभिजात गोष्टी शाश्वतच असतात. कदाचित दृश्य किंवा वस्तूरूपात त्यांचं अस्तित्व नष्ट होईलही; परंतु परिणामस्वरूपात त्या काळावर मात करतात. पुलंचं कलेतलं योगदान शाश्वत आहे. ते बरोब्बर जिथं पोचायचं तिथं पोचणारं आणि चिरंतन टिकणारं आहे. त्यासाठी आपण वेगळे काही प्रयत्न करण्याची गरज नाही.

अमोल लोखंडे
amolslokhande1984@gmail.com
लोकसत्ता
१२ जून २०२०

Monday, March 11, 2019

चरित्रपट की विडंबनपट?

सुनीताबाई देशपांडे यांचे बंधू सर्वोत्तम ठाकूर, त्यांच्या पत्नी अंजली ठाकूर, त्यांचे चिरंजीव उमेश ठाकूर आणि पुलं-सुनीताबाईंचे मानसपुत्र दिनेश ठाकूर, पुलंचे स्नेही रामभाऊ कोल्हटकर ही पुलं-सुनीताबाईंची निकटवर्ती माणसं. त्यांचे ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चरित्रपटावरील आक्षेप..

‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या पुलंवरच्या तथाकथित ‘चरित्रपटा’चे दोन्ही भाग नुकतेच प्रदर्शित झाले.चरित्रपटातील असंख्य प्रसंगांत दाखविलेली वास्तवाशी अनावश्यक फारकत, सत्य प्रसंग वाट्टेल तसे बदलून केलेले विद्रूपीकरण, कल्पनादारिद्रय़, त्याचबरोबर चरित्रनायकाच्या आणि कलाक्षेत्रातल्या अनेक मान्यवर व्यक्तिमत्त्वांच्या तोंडी घातलेले अतिसामान्य, टुकार, न शोभणारे (uncharacteristic) संवाद, त्यांचे या चरित्रपटातील अत्यंत उथळ, बेजबाबदार व बदनामीकारक चित्रण अशा अनेक गोष्टींवर कित्येक जाणकार रसिकांकडून, चाहत्यांकडून, मान्यवरांकडून जोरदार टीकाही झाली. खरं तर पुलंचे जन्मशताब्दी वर्ष म्हणजे जगभरातील मराठी माणसांना आनंदोत्सव साजरा करायला, त्यांच्या सुंदर आठवणींत रमायला मिळालेली सुवर्णसंधी. पण याला गालबोट लागले ते या चरित्रपटाने, हे दुर्दैव.

या चरित्रपटाच्या दिग्दर्शकांनी ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०१७ च्या सुमारास दिनेश यांच्याशी आपल्याला पुलंवर बायोपिक करायचा आहे; त्यासाठी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग सांगा म्हणून संपर्क साधला. दिनेश यांनी त्यांना पुलंची पुस्तके, त्यांच्यावरील डॉक्युमेंटरीज् वगरे स्वाभाविक माहिती पुरवत असताना त्यांना असे उत्तर मिळाले की, ‘‘मी काही पुलंची पुस्तके वाचलेली नाहीत, डॉक्युमेंटरीज् बघितलेल्या नाहीत. मला त्याची गरजही वाटत नाही. मी त्यांच्या आयुष्यातले नव्वद प्रसंग गोळा करणार. त्यातले साठ निवडून, चित्रित करून त्यावर ८ नोव्हेंबर २०१८ ला चरित्रपट प्रदर्शित करणार.’’ यावर दिनेश यांनी पुलंच्या व्यक्तिमत्त्वाचे चांगले आकलन झाल्याशिवाय (खरं तर झाल्यानंतरही) पुलंसारखे अष्टपैलू, बहुरंगी व्यक्तिमत्त्व चरित्रपटाच्या स्वरूपात उभे करणे कठीण आहे, असे सांगून दिग्दर्शकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. उत्तम चरित्रपट काढण्यासाठी लागणारा अभ्यास, तो करायची तयारी, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, मेहनत, चरित्रनायकाबद्दल वाटणारी व्यक्तिगत आपुलकी, आस्था, आत्मीयता या सगळ्याचाच अभाव भासल्याने- केवळ पुलंच्या नावाचे चलनी नाणे जन्मशताब्दीनिमित्त खपवायचे आहे- अशी रास्त शंका आल्याने दिनेश यांनी अशा प्रकारच्या निर्मितीसाठी आपली नाराजी दाखवून यात आपण सहभागी होऊ शकणार नाही असे त्यांना सांगितले.

या पार्श्वभूमीवर हा चरित्रपट सुमार दर्जाचा असणार, हा अंदाज दुर्दैवाने खरा ठरला. तेवढेच असते तर दुर्लक्ष करून सोडूनही देता आले असते. परंतु या चरित्रपटात cinematic liberty किंवा ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ अशा मोठमोठय़ा शब्दांच्या ढालीमागे लपत, स्वत: पुलं आणि सुनीताबाईंनी वर्णन केलेल्या, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या प्रसंगांचा केलेला विपर्यास, त्यांचे केलेले बेजबाबदार विकृतीकरण यांमुळे या चरित्रपटात पुलंचे व्यक्तिमत्त्व आत्मकेंद्रित, उथळ, वेंधळे दर्शवले गेले आहे.

खरे तर चरित्रपट करताना चरित्रनायकाच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण, सखोल अभ्यास केल्यावरही काही बारकाव्यांची नोंद सापडतच नसेल तेव्हा आणि फक्त तेव्हाच अत्यंत काळजीपूर्वक आणि परिपक्वतेने cinematic liberty वा अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरणे वावगे ठरत नाही. इकडे तर पुलंची स्वत:ची इतकी पुस्तके, त्यांच्यावरील तीन उत्तम डॉक्युमेंटरीज् (पैकी दोनांत पुलं स्वत:च त्यांच्या आयुष्याबद्दल भरभरून बोलले आहेत.), त्यांची भाषणे, रेकॉìडग्ज्, सुनीताबाईंची पुस्तके, तसेच पुलंवर आणि चरित्रपटात दाखवलेल्या त्यांच्या निकटवर्तीयांवरही इतके अमाप साहित्य, माहिती उपलब्ध असताना त्याचा काटेकोरपणे वापर न करता असे उथळ, बेपर्वाईचे आणि विसंगत चित्रण का करावे? पुलं आणि सुनीताबाईंचे एकमेकांना पूरक असलेले सुंदर भावनिक नाते आणि सांस्कृतिक श्रीमंतीचे आयुष्य तर इथे दिसतच नाही. सुनीताबाईंना आणि इंग्रजीला घाबरणारे, आत्मविश्वास नसलेले, दुसऱ्याच्या सल्ल्याने वागणारे असे पुलंचे सत्याशी विसंगत व्यक्तिमत्त्व दाखवण्यामागचा हेतू तरी काय?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा चरित्रपट संदर्भ म्हणून (जो ‘बायोपिक’चा एक महत्त्वाचा उद्देश असतो.) पुलंसारख्या महाराष्ट्राच्या मोठय़ा व्यक्तिमत्त्वाच्या अभ्यासासाठी वापरण्याच्या लायकीचा नाही. मराठी शिकणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यांला पुलंवर, त्यांच्या साहित्यावर; फक्त विनोदीच नव्हे तर त्यांच्या विपुल वैचारिक साहित्यावर, विविध क्षेत्रांतल्या योगदानावर, त्यांच्या आयुष्यावर रिसर्च करायचा असल्यास पुलंवरचा हा चरित्रपट चुकूनही प्रमाण मानल्यास तो अनर्थच ठरेल. याच उद्देशाने पुलं-सुनीताबाई आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या आयुष्यातल्या वास्तव घटना आणि चरित्रपटात केलेले त्यांचे विकृतीकरण यामधील विसंगतींची नोंद होणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, चरित्रपटातील abortion चा प्रसंग.. सुनीताबाईंना दिवस गेल्याचे त्या पुलंना सांगू पाहतात- ते दुर्लक्ष करतात- त्या स्वत: एकटय़ाच निर्णय घेऊन, एकटय़ाच गर्भपात करून येतात असा दाखवलेला गडद आणि बटबटीत प्रसंग. तर हाच प्रसंग ‘आहे मनोहर तरी’ या सुनीताबाईंच्या पुस्तकात त्यांच्याच शब्दांत किती संवेदनशीलपणे आला आहे. (प्रथम आवृत्ती, पृष्ठ क्र. १९५-१९६) ‘‘डोहाळ्यांचा त्रास होऊ लागला... भाई मोठ्ठं डाळिंब घेऊन आला... आमच्यावरच्या जबाबदाऱ्या संपेपर्यंत स्वत:वर असली दुसरी कोणतीही जबाबदारी नको असा आम्ही दोघांनी विचारपूर्वक निर्णय घेतला.’’

‘अंमलदार’ प्रसंग (‘आहे मनोहर तरी’- पृष्ठ क्र. १७८)- सुनीताबाईंनी पैज जिंकल्यावर चैनीच्या गोष्टी न मागता ‘अंमलदार’ नाटक पूर्ण करून मागितले याचे केलेले सुंदर वर्णन! तर चरित्रपटात सिगारेट तोडण्याच्या दमदाटीने आणि भीतीने ‘अंमलदार’ पूर्ण झाले- हे त्याचे केवळ विचित्रीकरण.

विजया मेहता- ‘सुंदर मी होणार’ वाचनाचा प्रसंग- ‘आहे मनोहर तरी’ पृष्ठ क्र. १४५-१४६ शी ताडून पाहावा.

चरित्रपट बनवणाऱ्यांनी योग्य तो अभ्यास करूनच चरित्रपट बनवला असेल असा भाबडा विश्वास टाकणाऱ्या अनेक प्रेक्षकांचा हा विश्वासघातच नाही का?

वास्तवात आचार्य अत्र्यांचे, गडकऱ्यांचेच नव्हे, तर कुठचाही ऐकलेला चांगला विनोद मैफिलीत, गप्पांत खुलवून सांगणारे पुलं- ‘‘विनोद फक्त मी करायचे!’’ असला भिकार विनोद (?) पुन्हा पुन्हा करताना दाखवले आहेत. बरं, यावर पुलंच्या कोटय़ा लोकांना माहितीच असल्यामुळे आपल्याच कोटय़ा पुलंच्या तोंडी खपवल्याची कबुली संवादलेखकांनी दिलीच आहे. (मॅजेस्टिक गप्पा- पार्ले, १६ फेब्रुवारी २०१९) मग बायोपिकला पुलंचे नाव का?

तर अशा अनेक वास्तव घटनांची वाट्टेल तशी चिरफाड करून, तर काही न घडलेले प्रसंग कल्पनेने (की ‘कल्पनादारिद्रय़ाने’ म्हणावे?) या चरित्रपटात घुसडले आहेत. या चित्रपटातील अशा असंख्य विसंगतींची पुराव्यासकट नोंद अभ्यासूंना उपयोगी पडेल म्हणून आणि रसिकांनाही सत्य कळावे म्हणून आम्ही तयार करीत आहोत.

पुलं आणि त्यांच्याबरोबर ‘चरित्रपटा’त ये-जा करणारी इतर थोर व्यक्तिमत्त्वे आम्हाला अशीच दिसली, असे वेळोवेळी सांगून लेखक-दिग्दर्शकांनी आपल्या दृष्टिदोषाची तर कबुलीच दिली आहे. यात केवळ कमजोर आकलनशक्ती आहे, की मत्सराचा/ आकसाचा चष्माही आहे, की दारू, सिगरेटच्या मागे धावणारी बेजबाबदार, आत्मकेंद्रित व्यक्तिमत्त्वे यांना आरशात दिसली, असा प्रश्न पडतो.


१० मार्च २०१९
लोकसत्ता

https://www.loksatta.com/lokrang-news/article-about-autobiography-or-parody-movie-1854473/

Times of India Article -->
a