Friday, June 28, 2024

शाहूमहाराज - आकाशाएवढा मोठा राजा

.....'संस्थानिक' ह्या कल्पनेला चांगल्या अर्थाने तडा देणारी जर कुणा एका संस्थानिकाची कथा माझ्या कानावर माझ्या लहानपणी पडली असेल तर ती कोल्हापूरच्या शाहूमहाराजांची. त्याला कारण होते. माझे आजोबा कोल्हापूर संस्थानात भाग-कारकून नावाच्या महिना तीनचार रुपयांचे वेतन मिळवायच्या हुद्द्यावर होते. 'करवीर दरबारातली नोकरी' असा ह्या नोकरीचा प्रौढ भाषेतला उल्लेख असायचा. माझ्या वडिलांचा जन्म आणि शिक्षण कोल्हापूरला. माझ्या आत्या कोल्हापूरच्या आसपासच्या एकदोन खेड्यांतल्या कुटुंबांत दिलेल्या. त्यामुळे 'कोल्हापूर 'विषयी मनात ओढ होती. अशा काळात मला माझ्या आत्याबाईने शाहूमहाराज आपल्या संस्थानातल्या एका शेतकऱ्याच्या झोपडीत जाऊन त्याच्याबरोबर भाकर खायला बसले होते ही कथा सांगितली होती.. माझ्या लहानपणी कोल्हापूर संस्थानातल्याच एका खेड्यात शेती करणाऱ्या माझ्या आत्याने सांगितलेल्या कथेतले शाहूमहाराज हे खेड्यातल्या पारावर बसून फिरत्या चिलमीच्या लयीत रंगणाऱ्या कथांतले लोकप्रिय कथानायक होते. उत्तुरजवळच्या त्या माझ्या आत्याच्या खेड्यातले सुट्टीच्या दिवसांतले माझे मुक्काम मला खूप आठवतात.

'शाहूम्हाराजांच्या वख्ताला' असा पीस जोडून महाराजांच्या कथा उलगडणारी बरीचशी मंडळी आता देवाघरी गेली. त्या कथांत त्यांच्या शिकारींच्या शौर्याच्या कथा असत. गोरगरिबाच्या दारात न सांगता दत्त म्हणून उभे राहण्याच्या असत. खेड्यातल्या गरीब माणसाचे दुःख महाराजांनी जातीने लक्ष घालून कसे दूर केले ह्याच्या असत. 'कुणा स्नेह्याच्या लग्नाच्या पंक्तीत भज्यांचा हाराच्या हारा कसा फस्त केला' यासारखी त्या भज्यांची संख्या मनसोक्त वाढवून सांगितलेली कथा असे. जुलमी अधिकाऱ्यांची फटफजिती कशी केली याच्या कथा असत. आणि "आता त्ये समदं ग्येलं म्हनाना..." असे सुस्काऱ्याच्या साथीतले भरतवाक्य असे. ह्या साऱ्या कथांतून शाहूमहाराजांचे एक मोठे लोभसवाणे चित्र डोळ्यांपुढे रंगत असायचे. असला धिप्पाड राजा आपल्याला बघायला मिळायला हवा होता असे वाटे. त्या कथांतून दिसणाऱ्या लोभसवाणे- पणाबरोबर एका थट्टेखोर काहीशा खट्याळ पण चेष्टा करता करता फार मोठा शहाणपणा शिकवणाऱ्या राजाचे चित्रही डोळ्यांपुढे उभे राही. देहाच्या धिप्पाडपणासारखा मनाचाही धिप्पाडपणा दिसे. वाढत्या वयाबरोबर वाचनही वाढले. स्वातंत्र्याच्या चळवळी डोळ्यांपुढे चाललेल्या असताना त्यांतला संस्थानिकांचा वाटा फारसा अभिमानास्पद नव्हता हेही दिसायला लागले. पण त्याबरोबर औंधचे महाराज, सयाजीराव गायकवाड, शाहू छत्रपती यांची चित्रे त्या इतर संस्थानिकांशी मिळतीजुळती नाहीत हे ध्यानात यायला लागले. औंध किंवा बडोदे ह्या संस्थानांशी माझे काही नाते नव्हते, पण कोल्हापूरशी होते. त्यामुळे तसे काही खास कारण नसूनही ह्या राजाविषयीचे कुतूहल वाढीला लागले. 'शेतकऱ्याच्या झोपडीपाशी जाऊन त्याच्या चुलीवरची भाकर खाऊन ढेकर देणारा राजा' ह्या प्रतिमेने मनात घर केले होते. ते आजतागायत तसेच आहे. त्यानंतर शाहूमहाराजांविषयी खूप वाचायला मिळाले आणि दिवसेदिवस ही प्रतिमा उज्ज्वलच होत गेली.
    
माझ्या सुदैवाने मी जिथे धर्म-जाती असला भेदाभेद नाही अशा कुटुंबात वाढलो. आमच्या आप्तमंडळीत जरी देवाधर्माचे महत्त्व असले तरी माझ्या घरी देवबाप्पांचे फारसे लाड झाले नाहीत. पूजेचे भटजी येऊन एखादे धर्मकृत्य करताहेत हे दृश्य मी माझ्या बालवयात क्वचित पाहिले असेल. पुढे घरात गणपतिबाप्पा आले तरी त्यांच्या पूजेला भटजीबुवा आले नाहीत. माझ्या वडलांच्या निधनानंतर तर श्राद्धपक्ष वगैरेही आम्ही केले नाही. अशा वेळी समान विचाराच्या शोधात मन हिंडत असतानाच बुद्धीला न पटणाऱ्या ह्या रूढीविरुद्ध जे निबंध किंवा ग्रंथ लिहिले गेले, असल्या बंडखोरांची जी चरित्रे वाचली त्यांतून जन्मजात श्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवण्याच्या प्रवृत्तीची चीडच येत गेली, मग ते श्रेष्ठत्व मानणारा ब्राह्मण असो की क्षत्रिय असो. मला आपण अमुक गोत्री ब्राह्मण आहे हे सांगणारा माणूस जितका हास्यास्पद वाटतो तितकाच आपण शहाण्णवकुळी असल्याचा अभिमान मिरवणारा मराठाही हास्यास्पद वाटतो. आणि ही रूढी मोडायला निघालेला प्रत्येक माणूस माझा वाटतो. शाहूमहाराजां- विषयीचे माझे 'माझेपण' त्यांच्या ह्या जन्मजात वर्चस्वाला ठोकरण्याच्या त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा जो मला इतिहास वाचायला मिळाला त्यातून निर्माण झाले आहे. शाहूमहाराज 'हा किती मोठा राजा होता त्यापेक्षा किती मोठा माणूस होता हे पाहणे मनाला आनंद देणारे आहे.

......
ज्योतिबा फुल्यांनी 'सार्वजनिक सत्य' नावाचा सुंदर विचार सांगितला आहे: देवाची आराधना करून एका माणसाने मोक्ष किंवा स्वर्ग मिळवण्याला अर्थ नाही. त्यातून देवाचेही मोठेपण सिद्ध होत नाही आणि त्या माणसाचेही नाही. परंतु जेव्हा सार्वजनिक सुखासाठी प्रयत्न होतो त्या वेळीच त्या आराधनेला किंमत असते. गावची जत्रा जशी साऱ्या गावाला सुख देऊन जाते त्याचप्रमाणे गावची विहीर सर्वांना पाणी देऊन गेली पाहिजे. एका माणसाला उत्तम वैद्यकीय मदतीची सोय असावी, पैशाच्या बळावर त्याला धन्वंतरी विकत घेता यावा आणि उरल्या गावाने औषधावाचून तडफडावे ही लोकशाहीची रीत नाही. रयतेच्या पोरांना मुन्शिपालटीची काळोखी शाळा आणि व्यक्तिगत श्रीमंतीच्या बळावर दोघाचौघांच्या पोरांसाठी अद्ययावत ज्ञानसाधनांनी युक्त अशी विद्यालये ही समाजाला सार्वजनिक बौद्धिक श्रीमंती न देता पुन्हा एकदा सत्तेच्या नव्या सोयी करून देणारा नवा ब्राह्मणच निर्माण करतील. एकाच लोकशाहीत पुन्हा एकदा बडे लोक आणि छोटे लोक असे घटक तयार होतील आपल्या योजनांचा हा असा बोजवारा का उडावा ?

मला याचे एकच कारण दिसते. ते म्हणजे ह्या सर्व कार्यामागे मला कुठे अंतःकरणाचा ओलावा दिसत नाही. ह्या योजना करणाऱ्यांच्या डोळ्यांपुढे तो पटकुरे नेसलेला माणूस येत नाही. ह्या साऱ्या योजना कागदावर होतात आणि कागदासारख्या कोरड्या राहतात. ही केवळ आकडेबाजांची हातचलाखी होते. शहरांत हजारो स्त्रीपुरुष भर रस्त्यात शौचाला बसताना दिसतात, हजारो पोरे कचऱ्याच्या ढिगाऱ्यांतून पावांचे तुकडे शोधताना आढळतात. ह्या दृश्याने अंतःकरण द्रवून अस्वस्थ होणारे लोकनियुक्त प्रतिनिधी अभावानेच आढळतात. माणसांना किड्यांसारखे जगायला लावणारी झोपडपट्टी हा त्यांना लोकशाहीचा अपमान वाटत नाही. हरिजन स्त्रियांवरील अत्याचारांची सत्ताधीशांच्या मनाला जखम होत नाही. फक्त चौकशीची कायदेशीर भाषा ऐकू येते. रॉकेलच्या रांगा पाहून स्वतःला मंत्री, जिल्हा- परिषदेचा अध्यक्ष वगैरे म्हणवून घेताना खेद वाटत नाही. सकाळी शिवाजीमहाराजांचा उत्सव आणि रात्री 'ओबेराय शेरेटन' मध्ये जागतिक सौंदर्यस्पर्धा ह्या दोन्ही कार्यक्रमांना आमचे लोकनेते निर्लेप मनाने जातात. अशा वेळी सर्व स्पृश्य समाजाच्या तथाकथित धार्मिक भावना टाचेखाली तुडवून अस्पृश्याने उघडलेल्या हॉटेलात चहा प्यायला जाणारा हा राजा, राजा म्हणून आणि माणूस म्हणून आकाशाएवढा मोठा वाटायला लागतो. ह्या थोर माणसाने भारतीय समाजाच्या अभ्युत्थानातले अग्रक्रम नेमके ओळखले होते. सरंजामशाही संस्कारांत वाढलेला हा राजा लोकशाहीच्या उभारणीची बीजे पेरत होता आणि आमचे लोकशाहीतले राजे आणि राण्या भाडोत्री गर्दी जमवून स्वतःवर पुष्पवृष्ट्या करून घेताना भुकेल्या जिवांचे आक्रोश आपल्या कानी पडू नयेत याची खबरदारी घेताना दिसतात.

महाराष्ट्राच्या राजाच्या गळ्यात कवड्यांची माळ, असे म्हणतात. मला ती माळ फार सूचक वाटते. लोकांचा राजा म्हणून ज्याला जगायचे असते त्याने स्वतःचे जीवन कवडीमोल मानायची तयारी ठेवावी लागते. 'उपभोगशून्य स्वामी' ह्यासारखी सत्ताधीशाला सुंदर बिरुदा- वली नाही. शाहूमहाराजांच्या पुण्यस्मरणाच्या वेळी आमचे लोकनियुक्त सत्ताधीश 'उपभोगशून्य स्वामी' हे बिरूद मोलाचे मानून स्वतःच्या आचरणाने ते सिद्ध करण्याची ज्या दिवशी प्रतिज्ञा घेतील त्या वेळीच असल्या शतसांवत्सरिक उत्सवाला काही अर्थ येईल. एरवी उत्सवप्रिय भारतात आणखी एक उत्सव साजरा झाला याहून त्याला काहीही महत्त्व राहणार नाही. ही प्रतिज्ञा कोल्हापुरात घेतली गेली तर त्या नगरीशी जुळलेल्या माझ्या बालपणा- पासूनच्या ऋणानुबंधामुळे मला अधिक गोड वाटेल. चांगल्या कार्याचा आरंभ कुठेही झाला तरी चांगला हे खरेच, पण आपल्या गावी झाला ह्याचा अभिमान वाटला तर ते चूक नाही !

(अपूर्ण)
लेख - शाहूमहाराज : एक धिप्पाड माणूस
पुस्तक - मैत्र
लेखक - पु. ल. देशपांडे
संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून पुस्तक घरपोच मागवा.

Wednesday, June 26, 2024

पु. ल. आज तुम्ही हवे होतात. - (अविनाश चंदने)

पु. ल. देशपांडे यांचा जन्म हा देण्यासाठीच झाला होता. त्यांनी महाराष्ट्राला उत्तम साहित्य दिले, उत्तम संगीत दिले, सुंदर काव्य दिले, मराठीजनांना पोट धरून हसवले, सामाजिक संस्थांना न बोलता ओंजळी भरून दिले. गुणीजनांचे तोंडभरून कौतुक करण्याची ख्याती पुलंचीच! साहित्य, नाटक, चित्रपट, एकपात्री प्रयोग, संगीत मैफल या सर्वांवर त्यांची हुकूमत होती. पुलंनी प्रत्येक गोष्टीला चार चाँद लावले. आजच्या इंटरनेटच्या युगात पुलंचे सर्व साहित्य, त्यांचे प्रयोग यूट्यूबवर उपलब्ध आहेत. आजही त्याचा आनंद घेतला जात आहे. १२ जून रोजी पुलंचा २४ वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने या निर्लेप, सज्जन मनाच्या माणसाची ही आठवण.

गेल्या आठवड्यात रत्नागिरीहून माझ्या जुन्या मित्राचा मुलगा भेटायला आला होता. एसटीने आलो म्हणाला आणि डोळ्यासमोर उभी राहिली ती पुलंची ‘म्हैस’. मी त्याला हातखंब्याविषयी विचारले आणि अजूनही तिथे एसटीसमोर म्हैस आडवी येते का असे विचारले. त्याला काही कळले नाही, मात्र माझ्या चेहर्‍यावरचे हसू त्याच्या नजरेतून सुटले नाही. मग त्याने कारण विचारले. त्याला एकच उत्तर दिले, एकदा पुलंची ‘म्हैस’ ऐक नंतर मला विचार. लगेच त्यांनी यूट्यूबवर म्हैस शोधली आणि ऐकली. त्यानंतर पुलंचे बरेच एकपात्री प्रयोग पाहिले, ऐकले आणि एकदम खूश झाला.

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राला लाभलेले दैवी देणे होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अशीच त्यांची ओळख होती. साहित्य, संगीत आणि कला क्षेत्रात त्यांचा सिद्धहस्त वावर होता. त्यांना अख्खा महाराष्ट्र ‘पुल’ म्हणून ओळखतो आणि फिल्म इंडस्ट्रीत तसेच देशात ‘पीएल’ नावाने त्यांना हाक मारायचे. हे सांगण्याचे कारण म्हणजे पुलंना जाऊन दोन तपं झालीत. 12 जूनला पुलंचा 24 वा स्मृतिदिन आहे. 12 जून 2000 रोजी पुलंनी शरीराने हे जग सोडले, मात्र त्यांनी साहित्याची, कलेची, त्यांच्या संगीतप्रेमाची छाप कायमची अवघ्या मराठीजनांवर सोडली आहे. तिचा कधीही कुणाला विसर पडणार नाही. 

पु.ल. म्हटले की डोळ्यांसमोर सर्वात प्रथम येतात ती त्यांची ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील पात्रे. ज्यांनी पु.ल. देशपांडे वाचले आहेत तो माणूस हातखंब्याला आला की हमखास एसटीतून बाहेर डोके काढून बघणार! न जाणो एखादी म्हैस एसटीला आडवी येईल आणि मग उगाचच तीन-चार तासांचा खोळंबा येईल, मात्र तो खोळंबा सर्वांना हवाहवासा वाटेल. कारण त्यात बाबूतात्या, खादीवाले, उस्मानशेट, मास्तर, मुलस्ट्यांचा मधू, ती सुबक ठेंगणी या सर्वांच्या भेटी होतील. ही सर्व पात्रे पुलंनी रत्नागिरी ते मुंबई या एसटी प्रवासात अजरामर करून ठेवली आहेत.

पुलंचे आणखी एक असेच विशेष पात्र म्हणजे ‘नारायण’, जो सगळी कामे बिनदिक्कतपणे करतो आणि त्यानंतर नामानिराळा होतो तो नारायण. पुलंनी नारायणाला असा काही घडवला आहे की विचारू नका! काही वर्षांपूर्वी लग्नानिमित्ताने पुण्याला मुक्कामी होतो. सर्व काही सुरळीत सुरू होते आणि तिथला एकजण सारखी धावपळ करत होता. जणूकाही लग्नाची सर्व सूत्रे त्याच्या हातात दिली होती. हे पाहून एका पाहुण्याने मला विचारले, हे सद्गृहस्थ आहेत तरी कोण? नारायण, असे उत्तर माझ्या तोंडून नकळत बाहेर पडले. 

लग्नसोहळ्यात एखादी व्यक्ती अशी असते जिच्याशिवाय पानदेखील हलत नाही. तो ‘नारायण’ असे पुलंनीच म्हटल्याने नारायण अजरामर झाला. पुलंची सर्व पुस्तके गाजली. त्यांना कायम मागणी राहिली. या सगळ्यांत ‘व्यक्ती आणि वल्ली’ने अमाप लोकप्रियता मिळवली. ही पात्रे पुलंना खरंच भेटली होती का, असा प्रश्न सर्वांना पडतो. त्यावर ‘म्हटले तर भेटली आहेत, म्हटले तर नाहीत,’ असे उत्तर पुलंनी दिले होते.

पुराव्यानं शाबीत करीन म्हणणारे ‘हरितात्या’, ‘परोपकारी गंपू’, विलेपार्ले ते चर्चगेट हा प्रवास कधीही बसून न करणारा आणि बाबा रे तुझं जग निराळं आणि माझं निराळं म्हणणारा ‘नाथा कामत’, नुसतीच सोबत करणारा टेस्टलेस-कलरलेस-ओडरलेस ‘गजा खोत’, पोरगं तावडीत सापडलं की त्याला घासून पुसून जगात पाठवणारे ‘चितळे मास्तर’, बुद्धीजीवी ‘लखू रिसबूड’, बदनाम झालेला ‘बबडू’, बेळगावमध्ये वेव्हलेन्थ जुळलेले ‘रावसाहेब’, पावणेसहा फूट उंच आणि निळ्या डोळ्यांचा ‘नंदा प्रधान’, रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीतील लोकोत्तर ‘अंतु बर्वा’, प्राज्ञ मराठी बोलणारा ‘सखाराम गटणे’ ही आणि अशी अनेक पात्रे केवळ आणि केवळ पुलंनी जन्माला घातलीत आणि त्यांना चिरंजीव केले.

पुल केवळ साहित्यात रमले असे नाही तर ते संगीत, गायन, वादन, नाटक, चित्रपट अशा सर्व ठिकाणी त्यांनी उत्तम तेच दिले. जे उत्तम असेल, चांगले असेल त्याचे पुल कौतुक करायचे. नवोदितांना प्रोत्साहन द्यावे तर पुलंनीच. ‘वस्त्रहरण’ हे मच्छींद्र कांबळी यांचे नाटक सर्वांना माहीत आहेच. हे नाटक सुरुवातीला चालले नाही. पुलंनी ते पाहिले, त्याचे जाहीर कौतुक केले. त्यानंतर अख्खा महाराष्ट्र आजपर्यंत या नाटकाचे कौतुक करताना दमला नाही. ‘कोसला’ कादंबरीचेही असेच आहे.

पुलंनी ‘कोसला’चे जेवढे कौतुक केले तेवढे कदाचित कुणीही केले नसावे. विशेष म्हणजे ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे आणि पुलंचे फारसे कधी जुळले नाही, मात्र ‘कोसला’चे कौतुक करताना त्यांच्यातील मतभेद कधीही दिसले नाहीत. साहित्य, नाटक, संगीत, चित्रपट आणि हो माणसांत रमणार्‍या पुलंना महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. त्यांची पुस्तके, त्यांचे एकपात्री प्रयोग हे सर्व आजही मराठी माणसाच्या मनात घर करून आहेत.

1942 चा लढा असो किंवा 1977 चा आणीबाणीचा संघर्ष, पुलंनी लेखणी बाजूला ठेवून राजकारणात उडी मारली होती. तिथे त्यांनी अनेकांची भंबेरी उडवली होती, मात्र हेतू साध्य झाल्यावर राजकारणातून अंग बाजूला काढून ते पुन्हा लिखाणाकडे वळले. पुल ही व्यक्ती अगदी हटके होती. आताच्या जनरेशनला कदाचित ठावूक नसेल म्हणून पण भारतात दूरदर्शनचा पहिला कार्यक्रम सादर करण्याचा मान पुलंना मिळाला होता.

त्यासाठी त्यांना लंडनमध्ये ब्रॉडकास्टिंग आणि टेलिव्हिजनचे प्रशिक्षण देण्यात आले होते. दूरदर्शनमध्ये सर्वकाही उत्तम चाललेले असताना त्यांनी ते सोडले. पुल कधीही एका जागी स्थिर राहिले नाहीत. राज्याच्या साहित्य, कला, संगीत क्षेत्रासाठी पुलंचे एका जागी स्थिर न होणे जमेची बाजू ठरली. पुल सर्व क्षेत्रात वावरले म्हणूनच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ऐश्वर्यात आणखी मोठी भर पडली.

पुलंनी पन्नाशीनंतर म्हणजे 1970 च्या सुमारास बंगाली शिकण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी ते गुरुवर्यांच्या (रवींद्रनाथ टागोर) पश्चिम बंगालमधील शांती निकेतनमध्ये गेले होते. ते बंगाली नुसते शिकलेच नाहीत तर त्यांनी बंगाली भाषेवर प्रभुत्वही मिळवले होते. बेळगावमधील राणी पार्वतीदेवी कॉलेज, मुंबईतील कीर्ती कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. मालेगावमधील महात्मा गांधी विद्यामंदिराचे ते प्रमुख होते.

मुंबई, पुणे तसेच दिल्लीच्या आकाशवाणीत त्यांनी नोकरी केली. पुलंना काहीही वर्ज नव्हते. त्यांची नजर जिथे जायची त्यात ते पारंगत होत असत. असे असले तरी संगीत त्यांच्या नसानसात होते. पं. वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व आदींशी पुलंची खास मैत्री तर बालगंधर्व यांच्याविषयी त्यांच्या मनात हळवा कोपरा होता. संगीत मैफलीत पुल रमून जायचे.

पुलंची ‘वार्‍यावरती वरात’, ‘रविवारची सकाळ’, ‘बटाट्याची चाळ’ यांचे प्रयोग तर प्रेक्षकांनी उचलून धरले होते. यांचे प्रत्येक प्रयोग कायम हाऊसफुल्ल होत असत. पुलंनी त्या काळी चित्रपटसृष्टीही गाजवली होती. त्यातील ‘गुळाचा गणपती’ चित्रपटाला सबकुछ पुल म्हटले जाते. म्हणजे याची कथा, पटकथा, संवाद, गीते, संगीत आणि दिग्दर्शन पुलंनीच केले होते. विशेष म्हणजे चित्रपटाचे नायकही पुल होते. आता गंमत पाहा, हा चित्रपट खूप चालला, चांगली कमाई केली, पण दुर्दैवाची बाब ही की चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रणही नव्हते. तिकीट काढून पुलंनी तो चित्रपट पाहिला होता.

व्यवहारी जगात पुलांना अनेकांनी फसवले होते, मात्र पुलंनी कधीही कुणावर राग धरला नाही की फसवणूक करणार्‍यांना त्यांनी कधी कोर्टात खेचले नाही. एवढेच कशाला फसवणूक करणार्‍यांबद्दल कुणाजवळ वाईटही बोलले नाहीत. कारण पैसा ही त्यांची गरज नव्हती, तर पुलंची कमाई ही सामाजिक गरज होती.

पुलंनी कुठलाही गाजावाजा न करता समाजाला भरभरून दिले. पुस्तकातून दिले, प्रयोगातून दिले, कवितांच्या कार्यक्रमातून दिले आणि खिशातून न मोजताही दिले. अनेक सामाजिक संस्थांना पुलंनी कुठलीही वाच्यता न करता आर्थिक मदत केली. त्यांच्यासाठी कायमची आर्थिक तजवीजही केली. त्यांनी उजव्या हाताने केलेले दान त्यांच्या डाव्या हातालाही कळले नसेल इतके पुल निर्लेप आणि सज्जन मनाचे होते.

– अविनाश चंदने
९ जून २०२४
उप वृत्तसंपादक आपलं महानगर
मूळ स्रोत - https://www.mymahanagar.com/featured/saransh/pu-la-today-you-are-wanted/752763/

Tuesday, June 18, 2024

स्वरयात्री पु. ल. - (अमृता देशपांडे)

'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' पु. ल. देशपांडे हे जग सोडून गेले, त्याला आज २४ वर्षं पूर्ण होत आहेत. अष्टपैलू प्रतिभेचे धनी असलेल्या पुलंचं 'संगीतकार' हे रूपही अतिशय सुरेल होतं. त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी व पुलंच्या संगीतप्रेमाविषयी...

१२ जून २००० या दिवशी पुलंचं देहावसान झालं. त्या दिवशी पु. ल. देशपांडे नामक व्यक्तीचा मृत्यू झाला नव्हता, तर अवघ्या महाराष्ट्राचा साहित्य आणि संगीतातल्या अमूल्य आठवणींचा ठेवा स्वर्गातल्या देवांचं मनोरंजन करायला निघून गेला होता. त्यांनीच म्हटलंय, 'स्वर्गात गेल्यावर ब्रह्मदेव मला विचारेल, 'वत्सा पुरुषोत्तमा, विनोदाचं भांडवल देऊन मी तुला पृथ्वीवर पाठवलं ते तू कुणाकुणाला दिलंस?' तेव्हा मी उत्तर देईन, 'मी कुणाला काय दिलं याचा हिशेब ठेवत नाही; पण तमाम मराठी माणसांनी मला आपलं अनमोल हास्य दिलं; हे मी कधीही विसरणार नाही !'

अजूनही मराठी रसिकांचा दिवस 'इंद्रायणीकाठी देवाची आळंदी' या भजनानं किंवा 'कबिराचे विणतो शेले' अशा गाण्यांनी होतो, तर 'दूर कुठे राऊळात दरवळतो पुरिया...', 'सख्यांनो करू देत शृंगार' ही गाणी ऐकण्यानं एखादी संध्याकाळ फुलून येते. कधी जीवनातल्या अवघड वळणावरून जाताना 'माझे जीवनगाणे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मी जाणे' अशी त्यांनी संगीत दिलेली गाणी जगण्याचा धीर आणि जीवनातला आनंद देऊन जातात. 'शब्दावाचून कळले सारे'सारखी अत्यंत तरल चालीची गाणी प्रेमातल्या पूर्णत्वाचा आश्वासक आनंद देऊन जातात. पुलंच्याच शब्दांत 'कशासाठी जगायचं, तर संगीत ऐकण्यासाठी जगायचं' हा जीवनाचा हेतू देऊन जातात.

विनोदी लेखक, नाटककार, कथाकार, पटकथाकार, अभिनेते म्हणून पु. ल. महानच होते. उभ्या महाराष्ट्राला त्यांनी हसवलं. त्या पुलंचा मला अतिशय भावणारा गुण म्हणजे त्यांच्यातला सूरग्राही संगीतज्ञ... गायक, वादक आणि संगीतकार !

त्यांना लहानपणापासूनच सुरांची विलक्षण ओढ होती. लहानपणच्या अगदी पुसट आठवणींबद्दल बोलतात, तेव्हा ते प्रसंगांपेक्षा सूरांचींच आठवण अधिक असल्याचं सांगतात. त्यांची आई खूप चांगली पेटी वाजवत असे आणि आजोबा कीर्तनकार होते. त्यांच्या घरात गाणं-बजावणं कायम होतंच. आवाजाच्या आणि सूर-लयीच्या ओढीबद्दल ते म्हणतात, 'ज्या काळात लहान मुलांचं लक्ष प्रसादाच्या खिरापतीकडे असतं, त्या काळात माझं लक्ष कीर्तनकाराच्या कथेमधे आणि अभंग, श्लोक, आर्या यांच्यामधे असायचं.' वयाच्या अगदी आठव्या दहाव्या वर्षापासून त्यांनी बालगंधर्व, बाई सुंदराबाई, सवाई गंधर्व, मास्टर कृष्णराव, हिराबाई बडोदेकर, फैयाझ खाँ, मल्लिकार्जुन मन्सूर यांचं गाणं ऐकलं. या सगळ्यांच्या गाण्याचे सूर त्यांच्या मनात आणि हृदयात घट्ट वसले होते. त्यांच्याच वयाचे असणारे पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याशी त्यांची मैत्री आजन्म राहिली. त्यांच्या मैत्रीतली एकतानता 'इंद्रायणीकाठी', 'ही कुणी छेडिली तार...' अशा अनेक गाण्यांतून दिसते.

पुलंना सगळ्या प्रकारची गाणी आवडायची. नाट्यगीतं तर ते अगदी समरस होऊन गायचे. बालगंधर्वांवर पुलंचं निरतिशय प्रेम. त्याबद्दलचे अनेक किस्से आहेत. लहानपणी ते पेटी शिकायला दत्तोपंत राजोपाध्ये मास्तरांच्या क्लासला जात असत. त्यांच्या क्लासचं स्नेहसंमेलन होतं. त्याला अध्यक्ष म्हणून प्रत्यक्ष बालगंधर्व आले होते. त्यांच्यासमोर अकरा वर्षांच्या पुरुषोत्तमानं पेटीवर त्यांचीच नाट्यगीतं वाजवायला सुरुवात केली; तसे बालगंधर्व खुर्चीवरून उठून पुलंच्या समोर येऊन बसले आणि भरभरून आशीर्वाद दिले. बालगंधर्वांची गायकी पुलंनी आयुष्यभर आपल्या हृदयात साठवली.

लेखक व्हायच्या आधी पुलंना गायकच व्हायचं होतं. ते संपूर्ण महाराष्ट्रभर गाण्याचे कार्यक्रम करीत असत. पुढं वसंतरावांची आणि पुलंची ओळख झाली. पु. ल. वसंतरावांसमोर गायले. वसंतरावांनीही पुलंच्या गाण्याचं कौतुक केलं; पण वसंतरावांनी आपली गायकी पेश केली, तेव्हा आपण काहीच नाही असं वाटून पुलंनी गाणं म्हणणं सोडून दिलं. आयुष्यभर पेटी वाजवली अन् गाण्यांना संगीत दिलं. वसंतरावांच्या गाण्याबद्दल पु. ल. म्हणतात, 'वसंताची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवणारी नाही. ती दऱ्याखोऱ्यांतून बेफाम दौडत जाणाऱ्या घोडेस्वारासारखी आहे.'
        
पेटी वाजवण्याबरोबरच अभिनय, नाट्यलेखन, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण आणि फार काय; पण त्यांनी तमाशाही लिहिला आहे. हे सगळं एकच माणूस करतो, हे आजच्या 'स्पेशलायझेशन'च्या पिढीला खूप आश्चर्यकारक वाटण्यासारखं आहे. याबद्दल ते म्हणतात, 'एक विदूषक, एक गायक आणि एक लेखक माझ्यामध्ये लहानपणापासून दडलेला आहे. यांच्यापैकी कोण केव्हा उसळी मारून वर येईल काही सांगता येत नाही.' त्यांनी रेडिओ आणि 'दूरदर्शन'मध्ये नोकरी केली. त्यानिमित्तानं देशाभरातल्या अक्षरशः शेकडो संगीत कलाकारांशी त्यांची चांगलीच गट्टी जमली. संगीतप्रेमी मंडळींशीही स्नेह जुळला. तिथंच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं विपुल संगीत ऐकलं. पुलंना कोणतंही गाणं वर्ज्य नव्हतं. याबद्दल त्यांनी एका ठिकाणी खूप सुंदर लिहिलं आहे. ते म्हणतात, 'मी सूर-तालाचा लोभी आहे. त्या लोभात सारंगीही आहे आणि एकतारीही आहे. मृदंगही आहे आणि ढोलकीही आहे. कपाळभर आडवं गंध लावलेला धृपद धमार आहे आणि डोळ्यात सुरमा घातलेली गझलही आहे...'

किती रसिकतेनं लिहिलं आहे हे! पुलंनी संगीत दिलेली गाणी आजही आपल्या मनात ताजी आहेत. त्यात ज्योत्स्नाबाई भोळेंनी गायलेलं पहाटेचं चित्रमय वर्णन करणारं 'झाली पहाट झाली पहाट' हे गाणं, मागच्या अनेक पिढ्यांनी ज्या गाण्यावर ठेका धरला ते आशा भोसलेंच्या आवाजातलं 'नाच रे मोरा नाच' आहे, तर माणिक वर्षांनी गायलेलं खट्याळ चालीतलं 'हसले मनी चांदणे'ही आहे. या गाण्यांच्या आठवणीही अत्यंत रमणीय आहेत. एकदा गदिमा आणि पु. ल. रस्त्यानं जात होते. तेव्हा गदिमांनी पुलंना आपल्याला ते रागविग काही कळत नसल्याचं म्हटलं आणि 'केदार राग कसा असतो,' असं विचारलं. त्यावर पुलंनी उत्तर दिलं, 'समोर प्राजक्ताचं डवरलेलं झाड दिसतंय ना तोच केदार!' क्या बात है! गदिमाही काय समजायचं ते समजून चुकले आणि एक गीत त्यातून तयार झालं, 'ही कुणी छेडिली तार, प्राजक्ताच्या मधुगंधासम कुठुनी ये केदार...' या गाण्याला पुलंनी केदार रागातच चाल दिली !

एक विशेष गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे पुलंनी 'बिल्हण' या मूळ संस्कृत नाटकाचं मंगेश पाडगावकरांना मराठीत रूपांतर करायला सांगितलं. मंगेश पाडगावकरांनी ही सांगीतिका - लिहिली. त्याला पुलंनी संगीत दिलं. ही सांगीतिका आकाशवाणीवर दोनदा प्रसारित झाली. एकदा किशोरी आमोणकर आणि पं. भीमसेन जोशी यांनी गायली, नंतर पं. जितेंद्र अभिषेकी आणि किशोरी आमोणकर यांनी गायली. त्यात शोभा गुर्टू, रामदास कामत आणि पं. हरिप्रसाद चौरसिया असे अनेक मातब्बर कलाकार होते. या सगळ्यांची मोट पु. ल.च बांधू शकतात. याच्या रेकॉर्डिंग आता फारशा उपलब्ध नाहीत. त्यातलं एकच अप्रतिम गाणं 'सात समुद्रापलीकडून विहंगाला......' ऐकायला मिळतं. पुलंच्या अशा अगणित आठवणी आहेत. हा आपल्याला मिळालेला अमूल्य ठेवा कितीही वाटला तरी न संपणारा आहे. पुलंच्याच शब्दात सांगायचं म्हटलं, तर 'आपलं संगीतच मुळात चिरतरुण आहे'. म्हणूनच पुलंची आठवण आल्यावर मागच्या संपूर्ण शतकाचा संगीतपट व डोळ्यासमोर उभा राहतो, डोळ्यांच्या कडा ओलावतात आणि टागोरांच्या कवितेतल्या ८. त्यांच्याच ओळी, त्यांच्याच आवाजात मनात निनादत राहतात...

हसेन खळखळ, गायीन कलकल
धरुनी ताल मग टाळी देईन,
माझ्यापाशी कथा किती तरी,
गाणी किती तरी,
प्राणांची अन शक्ती किती तरी..
सुखे किती, अनंत ऊर्मी,
मम जीवाची कोण उभारी...


अमृता देशपांडे
संपर्क क्रमांक - ९६८९९४७०१४
(लेखिका संगीत अभ्यासक आहेत.)
महाराष्ट्र टाईम्स
१२ जून २०२४

Monday, June 17, 2024

एक चाळीशी.. हवीहवीशी - (प्रेरणा कुलकर्णी)

गेल्या आठवड्यात पुलं चा स्मृतिदिन होता त्यानिमित्त हा लेख. कितीतरी महिने हे डोक्यात घोळत होतं. आज त्याला शब्दरूप देता आलं. पुलं च्या स्मृतीस त्रिवार वंदन!

गेल्या दोन तीन वर्षांपासून मला एका गोष्टीचं अत्यंत कुतूहल वाटतंयं. काळा जाड्या फ्रेमचा चष्मा आणि अर्थात त्यामागील ते मिश्किल, प्रेमळ, आणि हसरे डोळे.. म्हणजे इतकं की तुम्हाला काय व्हायला आवडेल असा एखादा निबंधाचा विषय दिला तर माझा विषय अगदी पक्का- तो जाडा काळा चौकोनी चष्मा किंवा त्यापलीकडची ती दृष्टी.. ती जादुई नजर. तसं तर आपल्या सगळ्यांनाच रोज शेकडो लोकं दिसत असतात. मुंबई सारख्या महानगरात राहत असू, लोकलने जात असू तर तोच आकडा हजारावरही जाऊ शकतो.

ही लोकं, काही अत्यंत कंटाळवाणी अगदी टाळू वाटावी अशी तर काही महाभयंकर अगदी चार हात दूर राहाव अशी, काही रागीट तर काही अतिप्रेमळ, काही बेफिकीर, तर काही बेरकी, काही भोळसट तर काही परोपकारी तर काही चाकोरीबद्ध जीवन जगणारी. हातावर पोट असणारी, दोन पैसे गाठीशी बाळगणारी, ऋण काढून सण साजरा करणारी, पोटाला चिमटा काढून पै न पै साठवणारी. अशी नाना प्रकारची, नाना स्तरावरची, आपणही त्यांच्याशी कधी हसतो, बोलतो, चिडतो, टाळतो, दुर्लक्ष करतो, प्रेम करतो, द्वेष करतो, कौतुक करतो किंवा क्वचित कधी थोडी असुयाही बाळगतो.

आपण अगदी सामान्य माणसं, म्हणजे सूर्योदय किंवा सूर्यास्त बघितला म्हणजे काही लगेच आपल्याला कविता स्फुरणार नाही, की झाडाखाली बसलो म्हणून न्यूटन सारखे शोध लागणार नाहीत, किंवा परिस्थितीने चटके दिले वा प्रेमात पडलो म्हणून लगेच कादंबरी लिहायला सुचणार नाही. तेथे पाहिजे जातीचे. या लेखक, कवी, नाटककार मंडळींचं आपल्यापेक्षा सगळंच वेगळं. पण तरी त्यातही डावं उजवं असतंच नाही? म्हणजे बघा अगदी कितीही श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लेखक म्हंटला तरी त्यांची काही पुस्तकचं लोकप्रिय होतात.. त्यातही एखादी लेखांची पुस्तकांची मालिका लिहिली की त्यातील एखादे पात्र अजरामर होणार.

पण मग असा एखादा अवलिया, ज्याच्या एका पुस्तकात त्याने वीसेक पात्र तरी खुबीनं रंगवलीयेत आणि ती सगळी लोकप्रिय झालीयेत. आणि हे असं एखादच पुस्तक नाही तर कितीतरी पुस्तकं, नाटकं, कलाकृती.. आणि त्या प्रत्येक कलाकृतीतली अनेक पात्र, व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्यात नव्हे तर अजरामर झाल्यात. इतक्या की नंतरच्या तिसऱ्या, चौथ्या पिढीलाही एखादा शब्द किंवा वाक्य त्यांच्या कुठल्या पुस्तकातील कुठल्या पात्राच्या तोंडी होत हे अगदी तत्परतेनं सांगता येतं. बरं ती पात्र किंवा व्यक्ती रेखाही काही शूरवीर राजे महाराजे, किंवा अमानवी शक्ती असलेले जादूगार किंवा देवदूत नाहीत तर अगदीच सामान्य किंवा अतिसामान्य माणसं… परिस्थितीचे तडाखे सोसलेली, जनरीतीच्या रहाट-गाडग्यात फिरणारी तुमच्या आमच्यासारखीच सुख दुःख असलेली.. किंबहुना
कदाचित ती तशी होती म्हणूनच ती इतकी लोकप्रिय झाली असावीत का?

आपल्या भोवती चालणाऱ्या कोलाहलातून, गराड्यातून, माणसांच्या जत्रेतून छोटे छोटे बारकावे, त्यांच्यातील नातेसंबंध, देवाण-घेवाण टिपणारे, त्यांच्या लकबी, लय, ढब, शब्दफेक, चढउतार हेरणारे ते ठसठशीत काळ्या जाड्या फ्रेममागचे ते मिश्किल डोळे. वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षांपासून पुलंना ऐकायला, वाचायला सुरुवात केली, तेव्हापासून ते वेगवेगळे कळत गेले, उमजत गेले. अर्थात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ते ते उमजणं, आवडणं वेगळं होतं. शालेय किंवा महाविद्यालयीन दिवसांत त्यातला विनोद, कोपरखळ्या, गोष्टीवेल्हाळता ह्यांनी वेड लावलं.
पुढे नोकरी, संसार सुरु झाल्यावर त्यातील व्याप, ताणतणाव विसरायला लावून काही क्षण हसायला लावणारा तो एक हलकासा विरंगुळा झाला. चाळीशीच्या आसपास अजून आयुष्य, माणसे बघितल्यावर, त्यांचे अनुभव घेतल्यावर त्या विनोदामागचे कारुण्य, टोकदारता, विसंगती जाणवू लागली आणि तीच विसंगती, विक्षिप्त माणसे किंवा त्यांचे स्वभाव, परिस्थिती मग आपल्या स्वतःच्या आयुष्यात आल्यावर बसणारी तिची झळ जराशी सुसह्य होत गेली.
वाचता वाचता कधीतरी छोटे मोठे अनुभव, मनोगत लिहायला लागल्यावर मग मात्र पुलं च श्रेष्ठत्व, वेगळेपण अजूनच भावत गेलं. कारण त्यांची एक एक कलाकृती, आणि त्यात चपखल बसणारी ती पात्रं.

आता हेच बघा ना..
असामी असामी मधे फक्त ४०-५० च्या दशकातला कारकुनी करणारे धोंडोपंत जोशीच रंगवले नाही तर त्यांचं पूर्ण कुटुंब, कॉलनीतील, चाळीतील माणसे, कचेरीतील सहकारी, त्यावेळची मुंबई, आणि अर्थात सरोज खरे .. आपली .. सगळं सगळं चित्र शब्दसामर्थ्यावर उभं केलय. तीन मजली बटाट्याची चाळ त्यातील अनेक बिऱ्हाडकरुंसकट इतकी सुंदर रंगवलीये की चाळसंस्कृती कधीही न अनुभवलेला, पाहिलेला वाचक/ श्रोताही त्यात रंगून जातो.
व्यक्ती आणि वल्ली म्हणजे तर एक खजिनाच आहे. नावाप्रमाणेच अनेक वल्ली तुम्हाला भेटतात अगदी कडकडून.
त्यात उच्चभ्रू नंदा प्रधान, साठाव्या दशकात मराठी कुटुंबियांच्या घरात सर्रास आढळणारा नारायण, गुलछबू नाथा कामत, बेरकी नामु परीट, अभ्यासातील किडा सखाराम गटणे, भोळसट गज खोत, परोपकारी गंपू, इरसाल पण तरीही हतबल असा अंतू बर्वा, उच्चमध्यमवर्गीय सरळमार्गी गुळगुळीत ते चौकोनी कुटुंब, नगण्य तरीही विक्षिप्त असा मिडिऑकर लखू रिसबूड, मिश्किल खट्याळ पेस्तनकाका - काकी, स्वतः मुखवटा घालून दुनियादारी करणारा आणि अंतर्मुख व्हायला लावणारा ‘तो’.

सुंदर मी होणार मधील दीदीराजे, बेबी राजे किंवा तुज आहे तुजपाशी मधील जिंदादिल काकाजी, कठोर आचार्य किंवा ती फुलराणी मधील फुलराणी, प्राध्यापक किंवा रविवार सकाळ मधील एकेक हरहुन्नरी चाळकरी, मालू, तिच्या उच्चभ्रू मैत्रिणी किंवा वार्यावरची मधील गावातला महाबेरकी साक्षीदार, टुरिंग टॉकिज दाखवणारे गावकरी, स्वागत समारंभातील मान्यवर .. केव्हढा मोठा तो स्पेक्ट्रम! जिथे एका लेखकाला एक पात्र तयार करून ते लोकांच्या मनावर ठसवायला फक्त एक पुस्तक नाही तर पुस्तक मालिका कराव्या लागतात.

तिकडे एका नाटकात, पुस्तकात असणारी अनेक पात्रे त्यांच्या संवादासह प्रेक्षकांच्या, वाचकांच्या मनावर राज्य करतात आणि पुस्तक/ नाटक संपल्यावरही हलकेच मनात त्यांची सोबत करत राहतात.. अगदी काही दशकांपूर्वीच्या काळातील त्या व्यक्ती अगदी ह्या काळातही त्यांना भेटत राहतात.. खरंच अगदी अद्भुत वाटतं सारं! म्हणूनच ते इंग्रजी मध्ये म्हणतात ना ‘अ फ्लाय ऑन द वॉल’ अगदी तसच त्या चष्म्यात बसून त्यांना काय काय आणि कस कसं दिसतं ते बघत राहावं .. अगदी तासनतास .. दिवसेंदिवस .. वर्षानुवर्षे पण म्हणजे आत्ता नाही हं कित्येक दशकं मागे जाऊन अगदी पार ६०च्या दशकापासून!
- प्रेरणा कुलकर्णी

Monday, June 10, 2024

मांजर

हल्ली मांजरे उंदीर पकडीत नाहीत हे मी स्वानुभवावरून सांगतो. आमच्या घरी उंदीर झाले. गेल्या युद्धात रूझवेल्ट, चर्चिल आणि स्टालिन कुठेसे भेटले होते, त्याच सुमाराची गोष्ट आहे. घरात सर्वत्र उंदीर झाले होते. उंदराच्या गोळ्या खाऊनही ते जिवंत राहत. रात्रंदिवस खुडखूड चाले. सापळे झाले. पिंजरे झाले. ओली पिंपे आणली. आता पिंपे ओली करायची, की उंदीर ओले करून त्यांत टाकायचे, ह्यावर घरात मतभेद होता. शेवटी नाइलाजाने मांजरी आणली.

प्राणिपालनाविषयी आमच्या खानदानात कुणालाच फारशी आस्था नाही. षौकाने काहीतरी ठेवून असावे असे कुणाला कधी वाटले असल्याचा कुठेच पुरावा नाही. प्रस्तुत मांजरी ही केवळ विशिष्ट कामगिरीवर ठेवण्यात आली. परंतु ह्या मांजरीने घरातल्या दुधाशिवाय आपण होऊन दुसऱ्या कशालाही तोंड लावले नाही. घरात रिकामी घाट असती, तर आमच्या उंदरांनी एखाद्या बोक्याच्या अध्यक्षतेखाली तिच्या गळ्यात समारंभपूर्वक बांधली असती याची मला खात्री आहे. फार काय, समोरून दोनतीन उंदीर चाल करून आले, तर हीच पांघरुणात लपायची. हे म्हणजे नौसेनादलाच्या एखाद्या रिअर अॅडमिरलला मालवणच्या बंदरातला पडाव लागून उलट्या होण्यापैकी आहे. पण आमच्या नशिची आलेली मांजरी तशीच होती. आणि पडाव लागण्याचा प्रकार भारतीय नौसेनादलात अगदीच अशक्य आहे, असेही मानण्याचे कारण नाही. एके दिवशी मांजरीकडून कसलीच झटापट होत नाही हे पाहून ते उंदीर आल्या वाटेने हताश होऊन निघून गेले. पण मांजरी राहिली. तिला कुणीही कधीही जवळ केली नाही.

शेवटी घरात दुर्लक्षिलेल्या, वयात आलेल्या मुली जे करतात तेच तिने केले. गल्लीतल्या एका मवाली बोक्याशी सूत जमवले. तिचा सारा दिवस आरशासमोर राहून अंग चाट, मिश्या साफ कर, शेपूटच फेंदारून पाहा, असल्या गोष्टींत जाऊ लागला. पुढे-पुढे तो निर्लज्ज बोका फारच बोकाळू लागला. रात्री खिडकीखाली येऊन आर्त स्वरात हाका मारीत असे. आमची खिडकी आणि समोरच्यांची ओसरी ह्यांतून द्वंद्वगीते चालत. बाकी बोका आणि मांजरी ह्यांचा प्रेमसंवाद हा जवळजवळ माणसाच्या बोलीत चालतो. मला तर बोक्याच्या स्वरातून "माझ्या मनिचें हितगुज सारें ऽऽ” अशासारखे शब्दही ऐकू येत. त्या वेळच्या मन्या फारशा गात नसत. मधूनच "म्यां यावें कसें-रे-बोक्या सख्या" म्हटल्यासारखे वाटे. हल्ली मनीच "माझा होइल का ? बोका" अशी आपण होऊन प्रस्तावना करते म्हणतात. ती काय बिचारी मुकी जनावरे. भोवताली पाहतात, त्यातून घेतात एकेक. असो. पुढे बोक्याची म्याँवगीते बंद झाली, आणि आमच्या मनीची कूस धन्य झाली. तेव्हापासून प्रत्येकाच्या पांघरुणात एक ह्या दराने मांजरे वाढली.पंक्तीला प्रत्येक जण डाव्या हातात छडी घेऊन बसायला लागला. एका हाताने छडी आपटीत आणि बंड्याच्या कृपेने फुललेल्या मनीच्या वंशाची पांगापांग करीत जेवणे उरकावी लागत. गोणत्यातून सोडा, बसमध्ये विसरून या, विरार लोकलमध्ये टाका - पुन्हा आपले जैसे थे ! इकडे बंड्याही ऐकेना. शेवटी मांजरे घर सोडीनात, म्हणून आम्ही सोडले. आणि ही जात अशी कृतघ्न, की इतक्या वर्षाच्या खाल्लया अन्नाला स्मरून त्यांतले एकही मांजर आम्हांला दाराशीदेखील पोहोचवायला आले नाही. उलट, सोवळ्यातल्या लोणच्या-पापडाच्या बरण्या वगैरे बिऱ्हाड-बदलीतला शेवटला किंमती ऐवज घेऊन व्हिक्टोरियात बसलो, त्या वेळी कौलावर आमची मनी शेजारच्या बंड्या बोक्याचे लाडात येऊन अंग प्वाटीत होती. मांजर माणसाला नाही, घराला धार्जिणी, म्हणतात ते खोटे नाही. असल्या दगडा-विटांत गुंतणाऱ्या प्राण्याला माणसे का पाळतात, देव जाणे.

पाळीव प्राणी (पु. ल. देशपांडे)
पुस्तक - हसवणूक
संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.
https://amzn.to/3UfqOxi

Tuesday, June 4, 2024

रक्तदान हे राष्ट्रकार्य

इंग्लंडसारख्या देशात रक्तदान हा हिंदूंच्या सोळा संस्कारांसारखा संस्कार मानला जातो. तिथे रक्त विकणे ही कल्पनाच मानली जात नाही. आपल्या आध्यात्मिक देशात मात्र रक्त विकत देणारे लोक आहेत. रक्त विकून त्यांना पोटाची खळगी भरावी लागते. नित्य नेमाने रक्त विकणारी माणसे ह्या देशात आहेत. ह्या मुंबई शहरातल्या सार्वजनिक रुग्णालयात वर्षाला सुमारे एक लाख बाटल्या रक्ताची गरज असते. रक्त देणाऱ्यांना दहा बारा रुपये दरवेळी द्यावे लागतात. क्वचित प्रसंगी ही माणसे पन्नास रुपये बाटलीपर्यंत दर वाढवतात. दर आठवड्याला स्वतःचे रक्त विकून उपजिविका करणारी माणसे ह्या मुंबई शहरात आहेत. इतकेच नव्हे, तर ह्या धंदेवाईक रक्तविक्यांची आता युनियन झाली आहे. दरिद्री आणि गुंड लोकांचा ह्यात फार मोठा भरणा आहे. पैसे वाढवून द्या अशा त्यांच्या मागण्या आहेत.

दारिद्र्य, लाचारी, पाजीपणा, असहायता, अमानुषता, अनेक घृणास्पद आणि केविलवाण्या घटनांनी कुजून, नासून गेलेला आपला समाज ! वर तोंड करून पुन्हा आम्ही जगाला अध्यात्म शिकवायला जातो. पाकिस्तानने हल्ला केला त्या काळात मात्र लोकांनी फार मोठा उत्साह दाखवला. आमचे राष्ट्रप्रेमदेखील असे नैमित्तिक उफाळणारे आहे. विशेषतः युद्धाच्या वेळी ! त्या काळात जवानांसाठी रक्तदान करणे हे राष्ट्रकार्य होते, पण युद्ध आटपले आणि आमचे रक्तही थंड झाले.

आमचे रक्त आधीच गोठलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक, गांधी किंवा सावरकर, भगतसिंग असल्या लोकांनी ते उगीचच तापवले होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर ते पुन्हा गोठत गेले. दैन्य, दारिद्र्य आणि मानसिक अधःपतन नित्य पाहण्याइतके आपले रक्त थंड झाले आहे. आमची सामाजिक नीतिमत्ता तर फारच वरच्या दर्जाची. एका हॉस्पिटलमधल्या रक्त साठवण्याच्या थंड खोलीत हॉस्पिटलचे प्रमुख आपली भाजी, फळे वगैरे ठेवतात. थंड पाणी पिण्याच्या बाटल्या ठेवतात. त्या काढायला आणि ठेवायला शंभरवेळा ती खोली उघडतात. त्या खोलीचे तापमान बिघडते आणि मोलाने जमवलेले रक्त फुकट जाते. गुन्ह्याचे मूळ हे आर्थिक दारिद्र्य नसून मनोदारिद्र्य आहे. गरिबांनी शेण खाल्ले, तर भुकेपोटी खाल्ले म्हणता येते, पण श्रीमंत खातात त्याची कारणे कुठे शोधायची?

पु. ल. देशपांडे
नवे नाते रक्ताचे - भावगंध ह्या लेखातून