Leave a message
Showing posts with label पु.ल. च्या कविता. Show all posts
Showing posts with label पु.ल. च्या कविता. Show all posts

Monday, January 20, 2020

माझे जीवनगाणे - डॉ. प्रतिमा जगताप

सात नोव्हेंबर हा पं. जितेंद्र अभिषेकी यांचा स्मृतिदिन, तर आठ नोव्हेंबर हा पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन. याचं औचित्य साधून ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या ‘माझे जीवनगाणे’ या मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या, अभिषेकीबुवांनी गायलेल्या आणि ‘पुलं’नी संगीत दिलेल्या गाण्याबद्दल...  
‘माझे जीवनगाणे’ हे गाणं ऐकतांना गाण्यातल्या पहिल्या तीन शब्दांबरोबर एकाच वेळी अभिषेकीबुवा, पु. ल. देशपांडे आणि मंगेश पाडगावकर या तीन महान व्यक्तींचं स्मरण होतं. एखादं गाणं असं जन्मत:च रत्नजडित स्वरमुकुट लेवून येतं. अनमोलत्वाचं बिरुद घेऊनच जन्माला येतं. तसंच या गाण्याचं झालं असं वाटतं... गाणं सुरू झाल्याबरोबर रसिकमनात आनंदलहरी उमटू लागतात. आपलं अवघं भावजीवन व्यापून टाकणारे मंगेश पाडगावकरांचे शब्द, अभिषेकीबुवांचे स्पष्ट उच्चार आणि लयकारीनं नटलेली गायकी आणि ‘पुलं’चं हवंहवंसं, रसिकांना आपलंसं करणारं, नव्हे पुलकित करणारं संगीत म्हणजेच ‘माझे जीवनगाणे’ हे गीत. रसिकहो हे लिहिता लिहिताच गाणं कानामनात सुरू झालंय...

माझे जीवनगाणे
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा ना दिसू दे
गात पुढे मज जाणे... माझे जीवनगाणे...


कुणाचं आहे हे स्वगत? कवी पाडगावकरांचं, बुवांचं की ‘पुलं’चं ? आत्ता या क्षणी वाटतंय, की तिघांचंही... पं. जितेंद्र अभिषेकी यांचा आज स्मृतिदिन. उद्या म्हणजे आठ नोव्हेंबरला ‘पुलं’चा जन्मदिन... या दिग्गजांच्या स्मरणयात्रेत कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या शब्दांची पालखी मन:चक्षूंपुढे झुलत चाललीय. खरंच हे गाणं ऐकणं म्हणजे एक अलौकिक अनुभव! शब्दांचा, स्वरांचा आणि गायनाचा... हा त्रिवेणी संगम आकाशवाणीतच व्हावा हा किती सुंदर योगायोग. ‘पुलं’ आकाशवाणीतच नाट्यनिर्माते होते, पाडगावकरही आकाशवाणीत कार्यरत होते आणि अभिषेकीबुवांनीही एका मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांनीही जवळजवळ साडेनऊ वर्षं आकाशवाणीत काम केलं होतं. ‘रेडिओत नसतो, तर असं चौफेर मी काहीच करू शकलो नसतो. नाटक, संगीत, दिग्दर्शन, स्वररचना या सगळ्या गोष्टी मी रेडिओमुळे मी करू शकलो,’ असं त्यांनी म्हटलं होतं. अभिषेकीबुवा १९४२च्या सुमारास पुण्यात आले. ‘गाणं हेच आपलं जगणं’ हाच ध्यास घेऊन बुवा मार्गक्रमण करत राहिले. अभिषेकीबुवांबद्दल ‘पुलं’ म्हणायचे, की दत्तगुरूंसारखे २१ गुरू त्यांनी केले. अभिषेकीबुवांनी विविध घराण्यांचा अभ्यास केला. मिंड, मुरकी, तान अशा प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास केला, प्रचंड मेहनत आणि रियाजानं कमावलेला आवाज ही बुवांची वैशिष्ट्यं. या सर्व वैशिष्ट्यांनिशी बुवांचं गाणं बहरत गेलं.

कधी ऐकतो गीत झऱ्यातून
वंशवनाच्या कधी मनातून
कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून
झुळझुळतात तराणे... माझे जीवनगाणे...


‘पुलं’ नाट्यनिर्माते म्हणून आकाशवाणीत असताना त्यांनी ‘भिल्लण’ ही संगीतिका केली होती. मंगेश पाडगावकरांचं काव्य, ‘पुलं’चं संगीत, मुख्य गायक पं. जितेंद्र अभिषेकी, विदुषी किशोरी आमोणकरही होत्या. आकाशवाणीवरून ही संगीतिका प्रसारित झाली होती, तेव्हा रसिक श्रोत्यांना श्रवणसुखाची पर्वणी अनुभवायला मिळाली असेल! आसमंतात ध्वनिलहरींऐवजी आनंदलहरी प्रसारित झाल्या असतील. ही संगीतिका प्रसारित होणार होती, तेव्हा बुवांनी आपल्या आईला, बहिणीला मोठ्या अभिमानानं सांगितलं होतं, ‘आज रात्री साडेआठ वाजता रेडिओ ऐका. तुम्हाला कळेल, की मी कोणत्या कामात गुंतलो होतो.’ रेडिओवर संगीतिका प्रसारित झाली आणि त्या संगीतिकेतील गाण्यांच्या आनंदलहरींवर आजतागायत मराठी मनं पुलकित होताहेत.


‘पुलं’ नेहमी म्हणायचे, की माझं पहिलं प्रेम संगीत! आणि मग साहित्य... बालगंधर्वांचं गाणं बालपणी कानावर पडलं आणि चांगल्या गाण्याचा बालमनावर झालेला संस्कार कधीही पुसला गेला नाही. गवई होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही; पण उत्तम संगीतकार म्हणून ‘पुलं’ची ओळख अवघ्या संगीतविश्वाला झाली. ‘मी गाणं शिकतो’ या ‘पुलं’च्या एका लेखात त्यांच्या गाणं शिकण्याच्या धमाल गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. मुंबईला गेल्यावर पांडुबुवांकडच्या गायनाच्या क्लासच्या गमती वाचून आपली हसून हसून पुरेवाट होते. पांडुबुवा सगळ्यांना ‘देवराया’ म्हणायचे. हे सांगून ‘पुलं’नी गाण्याच्या क्लासमधल्या गंमती सांगताना त्यांच्यातला एक मजेदार संवाद लिहिलाय.


‘आवाज आणि आवाजी यात फरक कोणता?’ मी तसा चेंगट आहे.
‘तसा फरक नसतो देवराया.’
‘पण मग आवाज केव्हा म्हणायचा न् आवाजी केव्हा म्हणायचं ?’
‘हे पहा, एखाद्या बाईला बाई केव्हा म्हणायचं न् बया केव्हा म्हणायचं, याचा काही कायदा आहे का? पोराला पोरगंही म्हणतात, कार्टंही म्हणतात. आमचंच बघा ना, गायन क्लासला कधी आम्ही कलेची सेवा म्हणतो, तर कधी पोट जाळण्याचा धंदा म्हणतो. आता ‘सा’ लावा देवराया.’
‘का हो बुवा, ‘सा’ला ‘सा’ का म्हणतात?’
‘देवराया, आता आपलं डोकं...’
‘काय?’
‘नाही, उदाहरणार्थ... आपलं डोकं..’
‘माझं डोकं, त्याचं काय?’
‘आपल्या डोक्याला काय म्हणतात?’
‘डोकं’
‘डोकं, खोकं का नाही म्हणत? तसंच ‘सा’ला ‘बा’ म्हणून कसं चालेल ?’
आणि मग मी ‘सा’ लावला.

‘पुलं’च्या गळ्यातल्या ‘सा’ऐवजी पेटीवरचा ‘सा’ मात्र फुलत गेला. त्या ‘सा’ने त्यांची आयुष्यभर संगत केली. संगीतातला ‘सा’ आणि साहित्यातला ‘सा’ त्यांचं जीवनगाणं बनून राहिले. पार्ल्यातल्या अजमल रोडवरच्या त्रिंबक सदनात २२ रुपयांना विकत घेतलेली पेटी ‘पुलं’ना खूप प्रिय होती. पुलं म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व. त्यांच्या नुसत्या नावानं मराठी मन हरखून जातं. तुसड्या, माणूसघाण्या चेहऱ्यावरही स्मितरेषा उमटवणारं नाव म्हणजे ‘पुलं’! जिवंतपणी दंतकथा होण्याचं भाग्य लाभलेलं नाव म्हणजे ‘पुलं’! संगीतकलेबद्दल विलक्षण प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता असणाऱ्या ‘पुलं’नी संगीताविषयी भरभरून लिहिलंय. आपल्या भाषणांमधून सांगितलंय. भावगीत गायनाबद्दल अतिशय तळमळीनं त्यांनी लिहिलंय, ‘भावगीत गायन हा संगीत प्रकार टिकावा, असं गायकांना वाटत असेल, तर अभिजात संगीताचा अभ्यास अपरिहार्य आहे. त्याशिवाय लयीची आणि स्वरांची मूल्यं समजणं अशक्यच आहे.’


पं. जितेंद्र अभिषेकी यांचा आज स्मृतिदिन आणि उद्या ‘पुलं’चा जन्मदिन साजरा करताना कवी मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली आणि या दोन दिग्गजांच्या संगीतकलेनं मोहरलेली कविता गुणगुणत राहू या...

गा विहगांनो माझ्या संगे
सुरावरी हा जीव तरंगे
तुमच्या परी माझ्याही सुरातून
उसळे प्रेम दिवाणे... माझे जीवनगाणे...



- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४
(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)
(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदराचे पुस्तक आणि ई-बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Monday, December 9, 2019

माझी आ‘पुल’की - मधुरा दातार

अष्टपैलू कलाकार आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या बहुरूपी पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल काही लिहिण्याइतकी मी फोठी नाही. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची अनेक रसिकांप्रमाणेच मीही एक चाहती आहे. एकदा संध्याकाळी कमला नेहरू उद्यानाजवळ मला पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई दिसले. त्यावेळी मी फक्त सात वर्षांची होते. आई-बाबांकडे हट्ट करत मी त्यांच्या पाठोपाठ गेले आणि त्यांना विचारलं, ‘तुम्ही पु. ल. देशपांडे ना? तुमचा निवडक पु.ल. हा कार्यक्रम मला फार आवडतो.’ तेव्हा काहीही ओळख नसताना त्यांनी आणि सुनीताबाईंनी मला आणि आई-बाबांना अगदी प्रेमानं त्यांच्या रूपालीमधल्या घरी नेलं.

मी दुसरीत होते. मला काहीच कळत नव्हतं. त्यांनी मात्र त्यांच्या स्वभावाप्रमाणे इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, की आपण आपल्या आजी-आजोबांशीच बोलतो आहोत, असं मला वाटलं. अगदी साध्या, सरळ, घरगुती गप्पा झाल्या. मी मराठी माध्यमात शिकते हे कळल्यावर, ‘बरं झालं. नाहीतर इंग्लिश मीडियममध्ये शिकणारी आजची मुलं आज गोकुळाष्टमी आहे, हे सांगताना आज लॉर्ड क्रिश्नाचा बर्थ डे आहे, असं सांगतात,’ अशी खास पु.ल. शैलीतली प्रतिक्रियाही दिली.

माझ्या प्रगतीपुस्तकावर ‘शाब्बास मधुरा!’ ही त्यांनी दिलेली कौतुकाची थाप आणि माझ्या वाढदिवसाला खूप मोठ्ठी हो, असा माझ्या वयाएवढा ‘ठ’ काढून पत्रातून दिलेला आशीर्वाद, या फक्त आठवणीच राहिल्या आहेत.

 
त्यांच्या एका भेटीत माझ्या विनंती आणि आग्रहामुळे पु. ल. आजोबा आणि सुनीता आजींनी फोटो काढून घेण्यासाठीही संमती दिली. खरं म्हणजे सुनीता आजी कधी फोटो काढून घेत नसत. ‘आज तू मला माझे सगळे नियम तोडायला लाव,’ असं कौतुकानं म्हणत त्या फोटोसाठी तयार झाल्या.

मी दर वर्षी ८ नोव्हेंबरला त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या घरी जायचे. तेव्हा त्यांच्या घरात अनेक मोठ्या कलाकारांपासून सामान्यांपर्यंत साऱ्यांचीच गर्दी असायची. ते सर्वांशी आपुलकीनं बोलायचे. खरंतर आपुलकी या शब्दातच पु.ल. दडलेले आहेत. पुलंनी आपल्याला काय दिलं नाही? त्यांच्या प्रत्येक पैलूनं आपल्याला भरभरून आनंद दिला. आपल्या लिखाणातून त्यांनी मराठी मनाची अस्मिता जपली. अपूर्वाई, पूर्वरंग, बटाट्याची चाळ यांसारख्या अनेक पुस्तकांतून आणि ती फुलराणी, सुंदर मी होणार यांसारख्या नाटकांतून त्यांनी आपल्याला खूप काही दिलं आहे. ‘विधात्यानं तुमच्या प्रतिभेचा एक अवयव तुमच्या कानात बसवला आहे की काय,’ असं समीक्षक अरुण आठल्यांनी म्हटलं आहे. ती फुलराणी सारखं नाटक बघताना त्याची प्रचीती येते.

आजूबाजूच्या परिस्थितीचं, माणसाचं सूक्ष्म निरीक्षण करून, त्यातली विसंगती हेरून, त्यांनी ती अशा काही खास शैलीत सांगितली, की सारा महाराष्ट्र खळखळून हसला. त्या शैलीला विनोदाची झालर आणि त्या जातिवंत विनोदाला कारुण्याची किनार.

म्हणूनच त्यांनी ५० वर्षांपूर्वी लिहिलेल्या साहित्याची अपूर्वाई कणभरही कमी झालेली नाही. आज मी जेव्हा जेव्हा ‘हसले मनी चांदणे’, ‘कौसल्येचा राम बाई’, ही गाणी गाऊन

रसिकांची दाद मिळवते, तेव्हा पुलंची प्रकर्षानं आठवण होते. ‘गुण गाईन आवडी’ असं म्हणत मला प्रोत्साहन द्यायला आज ते नाहीत. आज १२ जून. पुलंना आपल्यातून जाऊन १७ वर्षं झाली; पण त्यांच्या नावामागे कैलासवासी हा शब्द लिहायला मन तयारच होत नाही. आजच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात नसती उठाठेव करणारी मंडळी पाहिली, की त्यांची खिल्ली उडवून हसत हसत डोळ्यांत अंजन घालायला पुलं हवे होते, असंच वाटतं.

मधुरा दातार
१२ जून २०१७
महाराष्ट्र टाईम्स

Saturday, October 5, 2019

पु.ल. पुनः पुन्हा आयुष्यात येतात... - अमृता सुभाष

‘अभिनयापासून व्यक्तिगत आयुष्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक सुख-दुःखाच्या क्षणात ‘पुलं’ त्यांची पात्रं, त्यांची कला किंवा अन्य सादरीकरणाच्या माध्यमातून परत परत आयुष्यात येत राहतात आणि प्रेरणा देतात...’ सांगत आहे ‘ती फुलराणी’मधली ‘फुलराणी’ साकारलेली गुणी आणि संवेदनशील अभिनेत्री अमृता सुभाष... ‘पुलं’च्या जयंतीनिमित्त तिने व्यक्त केलेल्या या भावना...
                   
‘पुलं’ परत परत आयुष्यात येतात असं मला वाटतं. तसे ते लहानपणापासूनच येत राहिले. लहानपणी ते पुस्तकाच्या रूपाने असायचे. अगदी लहान असताना मी अभिनयाचे जे पहिले धडे गिरवले, ते त्यांच्यामुळेच. विशेष म्हणजे वाचिक अभिनयाचे धडे गिरवताना, ‘पुलं’च्या ‘म्हैस’पासून ते ‘नारायण’पर्यंत ज्या कॅसेट्स निघाल्या होत्या, ज्यात त्यांनी स्वतः वाचन केलं होतं, ते सगळं माझ्या घरी होतं. त्यामुळे त्यांची मी अक्षरशः पारायणं केली होती. ते परत परत ऐकताना खूप मजा यायची. ते वाचन त्यांच्या नकलेसहित मी परत स्वतःशी करून पाहायचे. ‘पुलं’ ज्या पद्धतीने आवाज बदलून प्रत्येक पात्र निर्माण करायचे, अगदी तशीच, त्याच आवाजात नक्कल करण्याचा मी प्रयत्न करत असे. या सगळ्यांतून मी शिकत गेले. कोणत्याही आवाजावर पकड मिळवण्याची, हुकुमत मिळवण्याची त्यांची जी पद्धत होती, जो अभ्यास होता, तो अफलातून होता. अशा पद्धतीने ‘पुलं’ आयुष्यात येत राहिले.

पुढे ‘ती फुलराणी’च्या निमित्ताने अर्थातच ‘पुलं’च्या भाषेचा खूप अभ्यास झाला. वामन केंद्रे यांच्यासोबत ‘ती फुलराणी’ करत असताना, त्यामध्ये गाणी घेतली जावीत, त्याचा थोडा फॉर्म बदलला जावा, असं वामन केंद्रेंना वाटत होतं. त्यासाठी कवी सौमित्रला बोलावलं गेलं होतं. यामध्ये काही नवीन गाणी किंवा कविता लिहिता येतील का, असं त्याला विचारलं गेलं होतं; पण ‘पुलं’च्या भाषेला मध्येच तोडणं शक्यच होणार नाही, असं तो म्हणाला. नंतर आमच्याही लक्षात आलं, की हे अवघड आहे. तेव्हा मग वामनकाकांनीच यावर एक सुंदर मार्ग शोधला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘पुलं’च्या संवादांनाच एक प्रकारची गेयता आहे. एक लय आहे. त्यामुळे त्यातील संवादांनाच चाली लावून फॉर्म बदलला. हे करत असताना वेगळं असं काही लिहावं लागलं नाही. कारण ‘पुलं’च्या भाषेला ती गेयता आहेच, याचा अनुभव घेतला.

‘पुलं’ना ऐकत असताना सगळा ताण, त्रास विसरायला होतो, असादेखील माझा व्यक्तिगत अनुभव आहे. आजारी असताना, तब्येत बरी नसताना त्यांचं सादरीकरण ऐकलं, तर त्या निखळ हास्यातून एक वेगळंच टॉनिक मिळतं हे मी अनुभवलंय. ‘पुलं’च्या असण्यात एक ताकद होती. त्यांच्या विनोदात असलेल्या निखळ हास्याच्या ताकदीमुळे आपल्या आयुष्यातील इतर रेट्याला सामोरं जाण्याचं बळ मिळतं. याचा अनुभव वारंवार येतो. अजूनही जेव्हा खूप काम झालं किंवा हताश होण्यासारखं काही घडलं, तर ‘पुलं’च्या डीव्हीडी पाहणं हा या सगळ्यावरचा एक प्रकारचा उतारा आहे असं वाटतं. अशा वेळी तुमचा संपूर्ण मूड बदलून टाकण्याची ताकद त्यामध्ये नक्कीच असते.

पु. ल. देशपांडेकोणत्याही कलेत टायमिंग साधता येणं, हे खूप महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. ‘पुलं’चं हे टायमिंग साधणं कमाल असायचं. त्यांना आजवर मी जे ऐकलंय, त्यातून अभिनयाच्या बाबतीत सर्वांत मोठी आणि अमूल्य अशी एक गोष्ट मी शिकले ती म्हणजे संवादाचं टायमिंग साधणं. विनोदाच्याही बाबतीत संवादाच्या टायमिंगला खूप महत्त्व असतं. लहानपणापासून त्यांना ऐकत असताना कुठेतरी कळत-नकळत या सगळ्या गोष्टी आत भिनत गेल्या होत्या आणि मग ‘फुलराणी’च्या वेळी त्या उपयोगी पडल्या.

खरं तर माझ्या व्यक्तिगत आयुष्यातही ‘पुलं’ नेहमीच असतात. आम्ही बऱ्याचदा त्यांच्यावर चर्चा करतो. यातून आणखी एक गोष्ट लक्षात येते, ती ‘पुलं’ची सुखी आयुष्याची व्याख्या... ‘पहाटे चार वाजेपर्यंत मैफल रंगलेली आहे. मग छान १० वाजता उशिरा उठलो आहे. बायकोने बनवलेलं छान जेवण जेवलो आहे, परत दुपारी झोप झाली आहे..’ असं सगळं असणं म्हणजेच आजच्या धावपळीच्या आयुष्यात हा थोडा जो निवांतपणा असलेलं ते जे सांगतात, ते भन्नाट आहे.

‘पुलं’नी रंगवलेली पात्रंही अप्रतिम होती. एखादं पात्र उभं करताना ते सर्व बाजूंनी त्याचा अभ्यास करायचे आणि त्यातून प्रत्येक पात्र जिवंत करायचे. यातून प्रत्येक पात्राचा सूर कसा असला पाहिजे, आवाजाचा टोन कसा असला पाहिजे हे अगदी अचूक लक्षात येतं. आज आम्ही एखाद्या पात्राचा अभ्यास करत असताना त्यांच्या त्या वाचलेल्या पात्रांच्या अभ्यासाचा फायदा होतो.

अमृता सुभाषमी अभिनयाव्यतिरिक्त नृत्य म्हणजेच भरतनाट्यम् आणि पार्श्वगायक म्हणून जे काही काम आजवर केलं, तिथेही ‘पुलं’चा संदर्भ येत गेला. ‘पुलं’नी एका वेळी अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर काम केलेलं आहे. म्हणजे नाटक, चित्रपट, अभिनय, लेखक अशा विविध गोष्टींमध्ये काम करत असताना ‘पुलं’ प्रत्येक बाबतीत तेवढ्याच सक्षमतेने काम करत गेले. प्रत्येक गोष्टीला त्यांना न्याय देता आला. मी अभिनयाबरोबर नृत्य आणि गायन या दोन्ही क्षेत्रात काम करताना तिथेही याबाबतीत ‘पुलं’ एक आदर्श म्हणून समोर होतेच.

‘पुलं’च्या हार्मोनियमच्याही खूप कॅसेट्स मी लहानपणी आई-बाबांबरोबर ऐकल्या आहेत. त्यांच्यात इतरही अनेक गुण होते आणि त्या प्रत्येकात ते रमले. सगळ्या कला एकमेकींच्या बहिणी आहेत असं मला वाटतं आणि त्या मग एकमेकींना हातात हात घालून पुढे नेत असतात. अगदी याच न्याचानं ‘पुलं’च्या सादरीकरणात सगळ्या कलांचा समन्वय होता. हे सगळं मला ‘ती फुलराणी’च्या वेळी खूप उपयोगी पडलं. ‘फुलराणी’मध्ये मला तो समन्वय साधायचा होता. त्यात ती अभिनयही करते, गाणंही म्हणते. त्यातही ते विनोदी असल्यामुळे त्याचं योग्य असं टायमिंगही साधायचं होतं. सगळ्या कलांचा समन्वय त्यांनी जसा साधला, तसा तो मलाही साधता यावा, यासाठीची प्रेरणा मला त्यांच्याकडून मिळते.

आयुष्यातील कोणत्याही त्रासदायक गोष्टीकडे विनोदबुद्धीने पाहण्याची ‘पुलं’ची हातोटी होती, ती खूप काही शिकवणारी आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी ‘पुलं’कडून शिकले, ती म्हणजे आपल्याला स्वतःवरही हसता आलं पाहिजे. आपण सगळेच स्वतःला नेहमीच अगदी गंभीरतेने घेत असतो; पण आपणही एक माणूस आहोत आणि आपल्यातही अशा काही गमतीशीर गोष्टी आहेत हे समजलं पाहिजे आणि त्यावरही आपल्याला हसता आलं पाहिजे. हे सगळं ‘पुलं’नी त्यांच्या लिखाणातून केलं आहे. स्वतःलाही अनेकदा कोपरखळ्या मारल्या आहेत. ही त्यांची गोष्ट खरंच निराळी आहे.

त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांना मी सलाम करेन. खरंच आपण सगळे त्यांचे ऋणी आहोत. आपल्याला त्यांना बघायला, ऐकायला मिळालं. त्यामुळे आपण खरंच भाग्यवान आहोत, असं वाटतं.

(शब्दांकन : मानसी मगरे)
बाइट्स ऑफ इंडिया

Thursday, August 1, 2019

| परी या सम हा |

परमेश्वर एखादया व्यक्तीला काय काय आणि किती देऊ शकतो ? उत्तम लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, गायक, नाटककार. विश्वास बसू नये, येवढे गुणसंपन्न व्यक्तिमत्व म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ़ रसिकांचे लाडके पु.ल. आणि माझे "पुलदैवत". 
माझा आणि पु.ल. यांचा परिचय झाला व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाच्या माध्यमातून , जे मला बक्षिस म्हणून मिळाले होते. जसं जसं मी ते वाचत गेलो, तसा तसा त्यांच्या जबरदस्त अवलोकनशक्तीचा अचंबा वाटू लागला. नारायण, अंतू बर्वा, चितळे मास्तर, हरितात्या, नंदा प्रधान, नाथा कामत, बबडू व इतर हे माझे नातेवाईक असावेत असं वाटू लागलं. हा चमत्कार या जादूगाराच्या लेखणीचा होता. मग मात्र पु. ल. यांना प्रत्यक्ष पहाण्याचे दैवी योग आले.

१९६४ साल असेल. आम्हा एन.सी.सी.च्या मुलांची त्यांच्याबरोबर भेट होण्याचा योग आला. पार्ला कॉलेजचे प्रिन्सिपॉल माननीय श्री. सी.बी. जोशी यांच्या ख़ास आमंत्रणावरून पु. ल. देशपांडे, आम्हाला कविवर्य ग.दि. माडगूळकर यांचे “जिंकू किंवा मरू” हे समरगीत शिकवण्यासाठी आले होते. त्या काळी मराठीच्या नांवाने कंठ दाटून न बोलतासुद्धा किंवा तोड-फोड़ आंदोलने न करतासुद्धा, मराठीवर मनापासून प्रेम करणारे लाखो लोक मुंबईत होते. रोझ डे, पिझ्झा डे, रिस्ट बँण्ड डे, फॅशन डे यांची लागण कॉलेजांना झाली नव्हती. स्वतःच्या मुलांना कॉन्व्हेंण्ट मिडियम शाळेमध्ये घालून, भर सभेत मराठी संस्कृती, मराठी भाषा/परंपरा याविषयी मुठी आवळून व शिरा ताणून बोलणारी नेते मंडळी अजून जन्माला आलेली नव्हती. मुंबईत मराठी बोलतांना कोणालाही लाज वाटत नसे (हल्लीच्या ‘शोभाडे’ परिभाषेत डाउनमार्केट). उलट अभिमानाने लोक मराठी बोलत. भाजीवाले वसईचे असत. त्यांच्या व्यवसायाशी ईमान राखत. दूधवाले स्वत:ला गवळी म्हणवत. हिंदी भाषा ही हिंदी चित्रपटांपुरतीच मर्यादित होती.

तर सांगत काय होतो, तेव्हां पु.ल. देशपांडे यांनी आम्हाला ‘माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू’ हे समरगीत आमचे दिव्य आवाज सहन करीत आम्हाला शिकवलेच पण त्यानंतर ‘वंदे मातरम्’ हे बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय यांचे स्फूर्तिदायक गीतही आमच्याकडून म्हणवून घेतलं.

त्यानंतर बटाट्याची चाळ, वाऱ्यावरची वरात, हंसवण्याचा माझा धंदा यामधून रंगभूमीवरचे पु. ल. भेटतच राहिले. आणि नस्ती उठाठेव, खोगीरभरती, असा मी असा मी, बटाट्याची चाळ, हंसवणूक, पूर्वरंग, अपूर्वाई, जावे त्याच्या देशा, तुझं आहे तुजपाशी, पु. ल. एक साठवण, गणगोत या पुस्तकांतून आमच्याशी संवाद साधत राहिले.

पु.ल. यांच्या साहित्याचं एक वैशिष्टय आहे. त्यांची वाक्यं आपल्याला मुद्दाम लक्षांत ठेवावी लागत नाहीत. ती वाचता वाचता आपल्या शरीरांत भिनून जातात. आपली होऊन जातात. मग ते चितळे मास्तरांचे “अरे पुरुषोत्तम, या मास्तराच्या बायकोच्या गळ्यात नाही पण डोळ्यांत मात्र मोती पडले हो !” हे वाक्य असो किंवा “कशाला हवी ती वीज ? हे दळीद्रच बघायला ना ? या पोपडे उडालेल्या भिंती, ही गळणारी कौलं बघायला वीज हो कशाला ?” हे अंतू बर्व्याचं वाक्य असो. ते थेट अंत:करणाला भिडतं. “मुळांत मला तो मुद्दलातला घोडाच दिसत नव्हता, तर त्यावर चढ़लेलं हे व्याज कुठून दिसणार ?”......“सांगा बघू हा फोटो कुणाचा...तीन चान्स” अहो म्हणाले. वास्तविक त्या फोटोतली व्यक्ती चांगल्या तीन हनुवट्याचा भार घेउन, माझ्या समोर बसली होती. “ही देविकाराणी किंवा दुर्गा खोटे कां हो ?” माझ्या या वाक्यावर ‘अहो’ तुडूंब खूष झाले. “परवा तो गजानन तुला काय समजला ग ?” “ईश्श वहिदा रेहमान.” जमेल तेवढं लाजत सौ म्हणाल्या. माझ्या आधी त्या घरांत गजानन नांवाचा चतुर पुरुष येउन गेला होता हे मी ताडले. ” असे शब्दनिष्ठ विनोद किंवा प्रसंगनिष्ठ विनोद ही जरी पु.ल. यांच्या विनोदाची खासियत असली, तरीही त्यांच्या कथेचा शेवट बऱ्याच वेळा कारुण्याकड़े झुकतो. मग तो नारायण या व्यक्तिचित्राचा शेवट असो किंवा हरितात्या असो किंवा बटाट्याची चाळीचं स्वगत असो. वाचकाच्या डोळ्यांत हंसता हंसता पाणी आणण्याची ताकद त्यांच्या शब्दांत आहे.

पण पु. ल. यांचं पुस्तक घरातच वाचावं. अहो बसमध्ये वाचत असतांना अचानक "आणि हा आमचा संडास"... “अरे वा !!इथे पण ऑटोमेटिक होतं की कुंथावं लागतं ?(मी आणि माझा शत्रुपक्ष)” असं वाक्य आलं आणि हंसू अनावर झालं तर इतर लोकं, हा येडा एकटाच कां हंसतो आहे ? असा चेहरा करून बघतील.

पु. ल. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा पार्ल्याला टिळक मंदिराच्या प्रांगणात त्यांची सत्कार सभा झाली. आचार्य अत्रे, दाजी भाटवडेकर, श्रीकांत मोघे, रामुभय्या दाते अशी बड़ी बड़ी मंडळी (आत्ताच्या भाषेत सेलिब्रेटी) व्यासपीठावर होती. आचार्य अत्रे यांनी आपल्या भाषणात सांगीतलं “आम्ही फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. होऊन बाहेर पडलो आणि पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म झाला.” या अत्यंत बादरायण संबंध असलेल्या वाक्याला, केवळ अत्रे बोलले म्हणून श्रोते हंसले. त्यानंतर पु. ल. बोलायला उभे राहिले तेव्हां अत्रे यांच्या त्या वाक्याचा संदर्भ घेत पु. ल. म्हणाले “आचार्य अत्रे बी.ए. झाल्यावर माझा जन्म झाला, असे म्हणण्याऐवजी, राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर नऊ महिन्यांनी माझा जन्म झाला असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल.” आणि टाळ्याच्या कडकडाटाने तो परिसर दणाणुन गेला.


साहित्य अकॅडमीचं पारितोषिक पु. ल. यांना मिळालं,त्या पारितोषिक वितरणसोहाळ्याप्रसंगी दिल्ली येथे इंग्लिशमधून भाषण करतानाही त्यांनी नर्म विनोदाची पखरण केली. उदाहरणच द्यायचं तर : “I had written about Barbers in one of my articles and there was a full throated protest from Barber community. They sent me a Legal Notice, which said that “I have hurt their professional Pride”. However there was a printing error. Instead of Professional Pride, it said Professional Bride. And now even my wife is watching me with suspicion” या वाक्यावर ते सभागृह हास्यस्फोटात बुडून गेलं.


ज्ञानपीठ पारितोषिकावरून आठवलं. कविवर्य कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहिर झालं होतं. पार्ले टिळक शाळेच्या मैदानावर त्यांचा सत्कार समारंभ होता. व्यासपीठावर स्वत: कुसुमाग्रज, ना. ग. गोरे, शंकर वैद्य, डॉ. सरोजिनी वैद्य, पु.ल. देशपांडे असे मान्यवर होते. शंकर वैद्य सरांनी कुसुमाग्रजांच्या काव्य प्रतिभेचे रसग्रहण करतांना “काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, दिवसाच्या वेशीवर उभे प्रकाशाचे दूत” या कवितेतील हळवा प्रणय अशा ओघवत्या भाषेत उलगडला की श्रोते काव्यानंदांत धुंद झाले. वैद्य सरांनंतर पु. ल. बोलायला उभे राहिले. पु. ल. म्हणाले कुसुमाग्रजांच्या कवितांनी आमचं तरुणपण रोमँण्टिक केलं. पण आत्ता शंकर वैद्य ती कविता अनुभवताना इतके रंगले होते, की पाठीमागून सरोजिनी बाई “अहो पुरे...अहो पुरे” म्हणताहेत, याचं सुद्धा त्यांना भान नव्हतं. पु. ल. यांच्या या अवखळ टिप्पणीवर कुसुमाग्रजांनी जोरांत हंसून ना. ग. गोरे यांना टाळी दिली आणि समस्त श्रोत्यांनी जोरदार हास्याने सलामी दिली. पु. ल. मात्र ‘आपण त्यांतले नव्हेच’ असा मिष्किल चेहरा करून बघत होते.

हजरजबाबीपणात पु.ल. यांचा कोणी हात धरू शकणार नाही. एकदा एका मुलाखतीत त्यांना विचारलं गेलं, ओरिएंट हायस्कूल मध्ये तुम्ही शिक्षक म्हणून असतांना ‘सत्तेचे गुलाम’ या मामा वरेरकर यांच्या नाटकांत तुम्ही व सुनिता ठाकुर यांनी एकत्र काम केलं होतं. त्याचं पुढे काय झालं ? एक क्षणही न दवड़ता पु. ल. म्हणाले ‘ काय होणार. तिच्याकडे सत्ता गेली. मी गुलाम झालो’ आणि मुलाखतकर्त्यालाही हंसू आवरेना.

एकदा एका समारंभात पु. ल. दामूअण्णा मालवणकर व आणखी एक त्यांचे स्नेही बसले होते. तेवढ्यात भारती मालवणकर तिथे आल्या व दामूअण्णांशी बोलून गेल्या. स्नेह्यांनी पु. ल. यांना विचारले “या कोण ?” त्यावर पु.ल. यांनी त्या दामूअण्णांच्या कन्या” असे उत्तर दिले. ‘वाटत नाहीत’ अशी त्या स्नेह्यांची प्रतिक्रया आल्याबरोबर पु.ल. म्हणाले “त्यांचा ‘डोळा’ चुकवून जन्माला आली आहे.”

एकदा सुधीर गाडगीळ माणिक वर्मा यांची मुलाखत घेत होते. माणिक ताई आणि त्यांचे पती यांची भेट कशी झाली. कोण कुणाला काय बोलले ? प्रेमाची प्रथम कबूली कोणी दिली ? असे प्रश्न गाडगीळ खोदून खोदून विचारत होते. व माणिकताई संकोचाने उत्तर द्यायचे टाळत होत्या. तेवढ्यात समोर बसलेले पु.ल. मोठयाने म्हणाले “ अरे सुधीर, त्यांच्या वर्मावर बोट ठेवू नको रे ” आणि सभागृहांत एकच हास्य कल्लोळ झाला.

"आम्ही जातो आमुच्या गांवा" या चित्रपटांत नायिकेला पहायला एक फॅमिली येते. तो मुलगा नायिकेला पसंत नसतो. त्याला पिटाळून लावण्यासाठी तीन चोर त्यांच्या जेवणांत जमालगोटा मिसळतात व मग त्या फॅमिलीची टॉयलेटच्या दिशेने पळापळ होते, असा तो विनोदी सीन होता. या चित्रपटाबद्दल पु.ल. देशपांडे यांना त्यांची प्रतिक्रिया एका समिक्षकाने विचारली. यावर चेहरा गंभीर ठेवून पु.ल. म्हणाले " चित्रपटाला 'मोशन पिक्चर' असं कां म्हणतात ते मला आज कळलं".

पण रसिकांना सतत हंसत ठेवणाऱ्या या देवदूताचं आगळवेगळं रूप लोकांनी पाहिलं ते “१९७६च्या आणिबाणी पर्वांत”. त्यावेळी पु.ल.च्या शब्दांना खड्गाची धार चढली होती. अवघा महाराष्ट्र त्यांनी आपल्या लेखणी आणि वाणीने ढवळून काढला. सत्तधाऱ्यांना कांपरे भरले. त्यांनी सारासार विचारबुद्धी बाजूला ठेवून पु.ल. यांच्यावर गर्हनीय टीकास्त्र सोडलं. पण हा पु.ल. यांच्या अन्यायाविरुद्ध दंड थोपटण्याच्या पवित्र्याचा विजय होता. ज्यांनी पु.ल.विरुद्ध ते उदगार काढले, त्यांनी त्या पर्वानंतर स्वत:च्या मूर्खपणाबद्दल खेद व्यक्त केला. अर्थांत पु.ल. ना कशाचीच गरज नव्हती. सरकारच्या मेहरबानीवर ते जगत नव्हते. उलट त्यांनी आपल्या साहित्यातून, नाटकातून जो पैसा कमावला त्याचा विनियोग समाजातील दुर्बळ घटकांना बळ देण्यासाठी केला. कित्येक लाख रुपयांचा दानधर्म त्यांनी सेवाभावी संस्थांना मदत म्हणून केला. पण हे करतांना कॅमेरा, मिडिया, प्रसिद्धि या सर्व प्रलोभनापासून ते दूर राहिले. “इदंम् न मम” हे त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं. आणि या सर्व प्रवासांत त्यांना सांवलीसारखी साथ केली ती त्यांच्या सहचारिणी सुनिताबाई यांनी. पु.ल. यांच्या साहित्यिक व कलेच्या जीवनाला त्यांनी शिस्त लावली. आर्थिक मदत कोणत्या संस्थेला करायची ते त्या ठरवत. आणि त्यांचे निर्णय योग्य असत. पु.ल. यांच्यासाठी त्यांनी प्रसंगी वाईटपणाही घेतला. पण त्या खंबीर राहिल्या म्हणून पु.ल. त्यांची रंगभूमी व साहित्याची सेवा प्रभावीपणे करू शकले, हे सत्य आहे.

पु,ल. देशपांडे या व्यक्तिमत्वाशी आपण प्रत्यक्ष भेट घेऊन बोलावं , असं माझ्यातल्या ‘सखाराम गटणेला’ खूप वेळा वाटे. पण ते शक्य झालं नाही. वास्तविक पु.ल. यांची सख्खी बहिण (भास्करभाई पंडित यांची आई) ही माझ्या सासऱ्यांच्या सख्ख्या धाकट्या बहिणीची सासू. भाऊबीजेच्या निमित्ताने पु.ल. देशपांडे आपल्या बहिणीकड़े मालाड येथे जात. व माझे सासरेपण त्यावेळी तिथे असत. दोघांचा चांगला स्नेह होता. भास्करभाईना सांगून मला पु.ल. यांना भेटता आलं असतं. पण माझ्या भिडस्त स्वभावामुळे ते प्रत्यक्षांत येऊ शकले नाही. जयाकाकांना (सुप्रसिद्ध साहित्यिक/नाटककार श्री.जयवंत दळवी) मी सांगितले असते, तरी त्यांनी मला निश्चित पु.ल. यांना भेटवलं असतं. पण असो ! गतम् न शोच्यम् | हेच तात्पर्य.

पु. ल. यांच्या विनोदातील बारकावे समजायला मराठी भाषा मात्र व्यवस्थित यायला हवी. “मराठी लँग्वेज स्पिकायला ज़रा प्रॉब्लेम होतो” या वर्गातल्या मंडळीना पी.एल.देशपांडे यांच्या लिटरेचरमध्ये कसला एवढा ह्यूमर कंटेंट आहे ?असाच प्रश्न पडेल. .

पु. ल. नांवाचा हा महासागर माझ्या या चार ओळीच्या छोटया ओंजळीत मावणं अवघड आहे. तस्मात ‘आणखी पु. ल.’ नंतर सावकाशीने.

@ © अनिल रेगे.
१२ जून २०१९.
मोबाईल : 9969610585

Wednesday, November 8, 2017

माझा अनमोल खजिना !

पुलंची स्वाक्षरी असलेलं "चित्रमय स्वगत" हे पुस्तक मला २००७ साली कसं गवसलं याची ही गोष्ट खास पुलंप्रेमींसाठी... —

२००७ मधला फेव्रुवारी महिना होता. तेव्हा मी भायखळा येथील मुंबई महानगरपालिकेच्या 'ई' विभाग कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होतो. मदनपुरा नामक अत्यंत गजबजलेल्या विभागातील रस्ते, फूटपाथ, घरगल्ल्या आणि ड्रेनेज व्यवस्था यांच्या दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी हे 'स्थापत्य अभियंता' म्हणून माझ्या कामाचं स्वरुप... अत्यंत जीर्ण अवस्थेतील जुन्या काळातील मुंबईच्या वैभवाची आठवण करुन
देणा-या इमारतींची दुरुस्तीची कामं सोबत दाटीवाटीने कायम लोकांचा राबता असलेल्या गल्लीबोळातून करावी लागणारी पायपीट... हे सर्व इतकं सविस्तर सांगण्याचं कारण म्हणजे रोज सकाळी नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी या अत्यंत 'गलिच्छ' भागातून फेरफटका मारावा लागत असल्यामुळे काम करण्याचा उत्साहचं नाहीसा होत असे...

परंतु सकाळी तासभर कामानिमित्त ही 'भटकंती' केल्यानंतर, दुपारपर्यंत निवांत मिळणारे ऐक-दोन तास ही त्यातली अत्यंत जमेची बाजू होती... कारण या वेळेत मी माझा वाचनाचा आनंद उपभोगत असे... "वाचन"—मला आवडणारी अन् गेली कित्येक वर्ष जोपासलेली एक उत्तम गोष्ट... आज मी तुम्हाला या वाचनानेचं मला दिलेल्या स्वर्गीय आनंदाची गोष्ट सांगणार आहे...

भायखळ्याचा मदनपुरा, आग्रीपाडा, नागपाडा, कामाठीपुरा सारखा परिसर आणि तिथे असलेली मुस्लिमबहुल वस्ती बघता , अशा ठिकाणी एखाद्या मराठी सारस्वताच्या साहित्यविषयक कार्यक्रमाची कल्पना करणे म्हणजे जणू दिवास्वप्नचं... परंतु अशाच एका कार्यक्रमाची वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली अन् आश्चर्य वाटले— चक्कं कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम !

मुंबईमध्ये नुकतीच माॅल संस्कृतीची मूळं रुजायला सुरुवात झाली होती. मुंबई सेंट्रल बस डेपोच्यासमोर " सिटी सेंटर " नावाचा एक भव्य माॅल उभा राहिला होता. तिथल्याचं एका पुस्तकाच्या दुकानाच्या उद् घाटन प्रसंगी तिथे चक्क मराठी काव्यवाचनाचा कार्यक्रम झाला होता. माॅलमध्ये मराठी पुस्तकाचं दुकान ही कल्पनाचं तेव्हा ग्रेट वाटली म्हणून मग मी एका मित्राबरोबर त्या माॅलमधल्या दुकानात जायचं ठरवलं. निमित्त होतं ' मराठी राजभाषा दिन ' अर्थात २७ फेब्रुवारी - कुसुमाग्रजांचा जन्मदिन !

दुस-या मजल्यावरच्या त्या भव्य दालनासमोर मी जेव्हा उभा राहिलो, तेव्हा याचं ठिकाणी काल कविवर्यांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम झाल्याच्या आठवणीने माझा ऊर अभिमानाने भरुन आला. परंतु जेव्हा त्या पुस्तकांच्या वातानुकुलित भव्य दालनात प्रवेश केला तेव्हा तिथं मराठी पुस्तकं कुठंच दिसेनात ? संपूर्ण दालन फिरुन झाले तेव्हा एका कोप-यात काही मराठी पुस्तकं मांडलेली आढळली.
तिथं उभ्या असलेल्या मदतनीस मुलीला जेव्हा मी पुस्तकांविषयी विचारले तेव्हा तिनं सांगितलं की सध्या इतकीचं मराठी पुस्तकं असून अद्याप काही त्या पेटा-यातून काढून मांडायची आहेत.

मग मी अन् माझा मित्र , आम्ही तिथंली पुस्तकं चाळायला लागलो. माझ्या वाचनाच्या आवडीमुळे मी आतापर्यंत पुलं, वपु यांच्याबरोबरचं मराठीतील वाचनीय आणि संग्राह्य पुस्तकं विकत घेतलेली असल्यामुळे त्या भव्य दालनातील तो ' मराठी कोपरा ' पाहून मन खट्टू झाले. तिथं अद्याप न मांडलेली पुस्तकं बघावी म्हणून सहजच मी तो पेटारा उघडला अन् तिथं दिसलेलं पुस्तक बघून माझी उत्सुकता चाळवली गेली. मी ती प्रत उघडून पाहिली आणि मला आश्चर्याचा धक्काचं बसला.

१९९६ साली प्रकाशित झालेलं आणि दस्तुरखुद्द लेखकाची त्यावर स्वाक्षरी असं ते पुस्तक... ती प्रत पाहिल्यावर मला हर्षवायू व्हायचाचं तेवढं बाकी होतं. अचानकपणे एक अशी गोष्ट माझ्या हाती लागली होती ज्याची मी स्वप्नातही कल्पना करु शकत नव्हतो.
ते पुस्तकं होतं , महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पुलंचं स्वाक्षरी केलेलं —
'' चित्रमय स्वगत '' ...
मी अत्यानंदाने माझ्या सोबत्यालाही ती प्रत दाखवली आणि त्यानेही आश्चर्य व्यक्त केलं...

मी एक सामान्य वाचक... पुलंचा चाहता... निस्सिम भक्त... त्यांच्या पुस्तकांनी आजवरच्या आयुष्यात अनेक चढउतारांतुन सावरलेलं... त्यांची सर्व पुस्तकं आपल्या संग्रही असावी, ही माझी मनोकामना अन् म्हणूनचं आतापर्यंत मी त्यांची जवळपास सर्वचं पुस्तकं विकत घेतलेली... परंतु , अद्याप १६०० रुपये किंमत असलेलं त्यांच एकमेव ' चित्रमय स्वगत ' हे पुस्तक मी विकत घेतलेलं नव्हतं...

कारण १९९६ साली ' मौज ' ने हे पुस्तक प्रकाशित केलं होतं तेचं मुळी LIMITED EDITION आणि COLLECTORS ISSUE अशा स्वरुपात, शिवाय त्याच बरोबर त्या प्रतींवर दस्तुरखुद्द पुलंनी स्व:ताच्या हस्ताक्षरात स्वाक्षरी केलेली होती... हे सर्व माहित असल्यामुळे 'ते' पुलंच्या स्वाक्षरीचं पुस्तक आपल्या संग्रही असणं ही माझ्यासाठी एक न घडणारी गोष्ट होती...

आणि आज अचानकपणे ते पुस्तक माझ्या हातात होतं... पुलं गेल्यानंतर सात वर्षांनी...

खरचं ही पुलंची स्वाक्षरी असलेली प्रत असावी का ? अजूनही विश्वास बसत नव्हता... मग मी 'मौज' ला फोन करुन याबद्दल चौकशी केली. परंतु मौजेकडून काही योग्य उत्तर मिळाले नाही असे वाटल्यामुळे मी पुन्हा 'डिंपल प्रकाशन'चे श्रीयुत अशोक मुळे यांना फोनवर सविस्तर प्रकार सांगितला. थोड्या वेळाने श्री. मुळे यांनी मौजेशी संपर्क करुन कदाचित त्यांनी त्या प्रती तिथं विक्रीसाठी ठेवलेल्या असू शकतात असा निरोप दिला...

माझ्यासाठी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट घडली होती... मी ताबडतोब तिथं उपलब्ध असलेल्या पुस्तकांच्या पाच प्रती क्रेडिटकार्ड वापरुन विकत घेतल्या आणि माझ्याजवळ असलेल्या पुलंच्या पुस्तक संग्रहात एका अतिशय अनमोल गोष्टीची भर पडली —

चित्रमय स्वगत - पु. ल. देशपांडे !!!



परंतु माझ्यासारख्या पुलंप्रेमींसाठी अनमोल असलेलं हे पुस्तक त्या माॅलमधल्या एका कोप-यात असं विक्रीला ठेवलेलं होतं याचं मला आजही आश्चर्य वाटतं ...

पुलंच्या निधनानंतर त्यांची स्वाक्षरी असलेलं पुस्तक पुलंप्रेमींकडून चढ्या बोलीने विकत घेतलं गेलं असतं... असं असताना "मौजे'ने त्या प्रती सिटी सेंटर माॅल मधल्या त्या वातानुकुलीत दालनाच्या एका कोप-यात का म्हणून विक्रीस ठेवल्या असतील ?

माझ्यासारखा सामान्य पुलंप्रेमी जर यथाशक्ती पाच प्रती विकत घेऊ शकत असेल तर हा प्रकाशकांचा करंटेपणा असावा का की त्यांनी हा 'अनमोल ठेवा' अशा अडगळीच्या ठिकाणी विक्रीस ठेवला असावा ?

मला यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत, परंतु माझ्या हाती एक अनमोल खजिना लागला याचा मात्र मला अत्यंत आनंद आहे...
ते "चित्रमय स्वगत" हे पुस्तक माझ्यासाठी पुलंचा आशिर्वाद आहे !!!

आजच्या "मराठी राजभाषा दिनाच्या" निमित्ताने मी आपल्याशी माझा हा अनुभव शेअर करत आहे...

"वाचाल तर वाचाल !!! " धन्यवाद !!!

— संजय आढाव (२७/०२/२०१५)

Monday, June 13, 2016

एक होता विदुषक

हा विदुषक जर आज हयात असता तर त्याने ९६ वर्षे पुरी केली असती. १५ वर्षापूर्वी अवघ्या महाराष्ट्राला हसवणाऱ्या आवाजाने अखेरचा श्वास घेतला. प्रयाग चे अथक परिश्रम निकामी ठरले. मी त्या काळी मुंबईला असे. अखेरचा निरोप देण्यासाठी डेक्कन वरचा माणसांचा महापूर पेपरमध्ये पहिला. त्या गुरुतुल्य विदुषकाची प्रत्यक्षात भेट झाली नाही ह्याची सदैव हुरहूर राहील. त्यामुळे जवळच्यांसाठी ते भाई असतील, काहींसाठी पि. एल., पण आमच्यासाठी फक्त ‘पुलं’ राहिले.

माझे 'पुलं' संस्कार वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षा पासून सुरु झाले. आजुबाजू ला सतत कानी येई - पुलंचे पुस्तक, पुलंचे गाणे, पुलंची पेटी, पुलंची क्यासेट. माझ्या इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या बाल मनाला वाटले कि ह्या माणसाचे नाव पु. लं. देशपांडे आहे, आणि तसे मी उच्चारूही लागलो. नंतर मला समजवण्यात आले की 'ल' लक्ष्मण चा, ‘लं’केचा नव्हे. असामी आसामी चे पुस्तकाचे शीर्षक वाचल्यावर मला वाटले कि हे एक आसामी (आसाम मध्ये राहणारा) माणसाबद्दल असणार. त्या वेळी मी ते वाचायची हिम्मतही नाही केली. पितृकृपेने घरात पुलंची अनेक पुस्तके येत गेली, पण काही वाचायचा योग नाही आला. खरं तर हे आधीचं वाक्य लिहिताना जरा बरं दिसावं म्हणून लिहिले. पुलं काय आहेत ह्याची तेव्हा अक्कलच नव्हती. पण योग आला नाही म्हणलं कि कसं भारदस्त वाटतं. त्या नंतर एकदा गणपतीत टीव्हीवर "वाऱ्यावरची वरात" दाखवलं गेलं. त्यातला नाट्याविष्कार फार काही समजला नाही परंतु हास्याच्या सर्वोच्य स्थानावर अलगदपणे घेऊन घेणाऱ्या ह्या बादशाहचा जवळून परिचय झाला. पुढे कधीतरी विजया मेहतांनी ल्यामिंगटन रोड वरून पुलंबरोबर वरातीच्या तालमीला जातानाच्या उत्साहाचे वर्णन ऐकले, तेव्हा त्याची नशा काय असेल ह्याची कल्पना आली.

माझ्या किशोर अवस्थेत आणि पुलं हयात असताना माझी पोच असामी आसामी, पुलं एक साठवण, आणि क्यासेट मधल्या पुलंपर्यंत झाली. आमच्या शेजारच्या घाणेकरांनी जेव्हा मला "बहुरूपी पुलं" ऐकायला बोलावले, तेव्हा मी साफ नकार दिला होता . पुलंचे पेटीवादन ऐकणे ही कल्पनासुद्धा मला मान्य नव्हती. पुलं म्हणजे हसणे. त्यामुळे आल्यागेल्यांवर छाप पडावी म्हणून त्यांना असामी ऐकवणे, साठवण मधले मथळे ऐकवणे, हे कार्य सुरु केले. शाळेत असताना सदु आणि दादू चे नाटक सुचवून त्यात काम सुद्धा केले.

चाळीचा आणि व्यक्ती आणि वल्लीचा परिचय तसा नंतरचा काळ. चाळ तर आधी ध्वनी रूपातच बघितली. अपूर्वाई, पूर्वरंग, जेवे त्यांच्या देशा, हसवणूक, खोगीरभरती आजूबाजूला असून फक्त बघत होतो. नंतर कामानिमित्त एक वर्ष डोंबिवली ला गेलो असताना असामी नीट वाचलं. त्यातला वाचनातला एक प्रसंग आठवतो. पार्ल्याच्या मावशी चे घर शोधात असताना पुलंना एक म्हातारे ग्रहस्त भेटतात आणि त्यांचा पुलंच्या कुटुंबाशी भर रस्त्यात संवाद सुरु होतो. त्याच संवादात ते आजोबा शंकऱ्या ला विचारतात " काय नाव तुझं बाळ?" आणि शंकऱ्या म्हणतो " छत्रपती शिवाजी महाराज". वास्तविक तो एक पाटी वाचत असतो, पण ते इतक्या मजेशीर पणे लिहिले होते, कि मी अक्षरशः गडबडा लोळून हसत सुटलो. ते पाहून माझ्या त्याकाळचा रूम पार्टनर आनंदकुमारने माझ्याकडे ज्या नजरेने पहिले होते ते मला अजूनही आठवत आहे.

त्यानंतर पुलंची पुस्तके आणि वाचन दोन्ही वाढत गेल्याचे आता स्मरते. पुलंशी नाते वाढत चालले असता ज्या माणसाने सगळ्यांना जन्मभर हसवत ठेवलं, त्यानी साऱ्यांच्या डोळ्यात अचानक आसवे उभी केली. दुर्दैवाने पुलं गेल्यानंतर पुलं जास्त उमगले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे नवीन पैलू समोर येऊ लागले.

बहुरूपी पुलं ऐकण्यासाठी आता धडपडू लागलो. त्यांची भाषणे ऐकण्याचा सपाटा सुरु केला. मित्रहो, श्रोतेहो, रसिकहो, गणगोत, मैत्र, उरलंसुरलं, शांतीवन मध्ये नव नवीन पुलं पाहायला मिळाले, आणि लक्षात आले कि ह्या माणसाचा विस्तार केवढा मोठा आहे. पुलंच्या विचारांचा प्रभाव दैनंदिन जगण्यावर आपसूक पडू लागला. पुस्तकांची पारायणे होऊ लागली. प्रत्येक वेळेस नवीन बोध होऊ लागला. चाळीचे चिंतन मनात कोरले गेले. असामी आसामी मधला " In tune with the tune" लिहिणाऱ्या इसमाचे पहिले वाक्य " गुरुदेवांना बरं का साहेब, सगळे सारखे" आणि त्याचेच शेवटचे वाक्य " पण गुरूदेवांचा बहुबल आहे, सगळीकडे वशिलेबाजी आहे साहेब" ह्यातला मार्मिकपणा दिसू लागला. गजा खोत आणि सखाराम गटणे सोडले तर, प्रत्येक व्यक्तीचा (किंवा वल्लीचा) आत्मविश्वास प्रखरपणे समोर येऊ लागला. एक शुन्य मी ने एक वेगळ्या पुलंचे दर्शन घडवले. माणसातल्या माणूसपणाचे दर्शन झाले. तात्पर्य काय, मी पुलकित झालो.

पुलंचे बालगंधर्वांवर झालेले भाषण ऐकून खरंतर नाट्यसंगीत आणि अभिजात संगीताबद्दल ओढ अधिक तीव्र वाटू लागली. जिथे संगीत तिथे पुलं हे समीकरण कळू लागले. इंद्रायणी काठी कसं घडलं ते कळलं, केसरबाई कशा प्रेमाने फटकारायच्या ते समजले, आणि बेगम अख्तर कशा बेहोश होवून गायच्या ते उमजले. पुलं - वसंतरावांची दोस्ती दिसली, भीमसेन ची पुलंच्या घरची पुण्यातली पहिली मैफिल दिसली आणि नारायणराव बालगंधर्वांवरची भक्ती दिसली. मल्लिकार्जुन आणि माणिक वर्मांचा परिचय झाला, वझेबुवांचा कष्टाचा इतिहास नजरे समोर आला आणि अब्दुल करीम खांसाहेबांची ‘ओडियन’ ची " पिया बिन" कानी घुमू लागली. पुष्प पराग सुगंधित मधील सुद्ध मध्यम किती सूक्ष्म रीतीने लागत आहे हे धुंडू लागलो आणी कुमार गंधर्वांची रामू भैय्या दात्यांकडे मैफील चालू आहे, भीमपलास चालू आहे, पुलं पेटीवर आहेत आणि मी समोर बसलो आहे असा जागेपणी भास होऊ लागला.


कवितांच्या आनंद यात्रेत बुडून आयुषभर पती पत्नीने एवढे समाज कार्य आणि दान धर्म केला पण कुठेही वाच्यता नाही केली. म्हणूनच वाटते हा विदुषक नव्हता, होता एक राजा आणि त्याची होती एक आनंदाची अद्भूत नगरी, जणू काय - सा रम्या नगरी महान्स नृपतिः सामन्तचक्रं च तत्…. गडकऱ्यांनी ‘राजसन्यास’ मध्ये साबाजीच्या च्या तोंडी वाक्य घातले आहे. " थोरले महाराज जाऊन आज इतके वर्षे झाली पण त्यांच्या नावाची नशा काही उतरत नाही". अशीच पुलंच्या नावाची नशा काही अजून उतरत नाही. त्यांच्या साठाव्या वाढदिवसाला त्यांनी सांगितले होते कि जर कधी त्यांचा पुतळा बांधला गेला तर त्या खाली एवढेच लिहावे - ह्या माणसाने आम्हाला हसवले. तर मी असे लिहीन - ह्या माणसाने आम्हाला नुसते हसवलेच नाही, तर घडवले.!! पुलं म्हणाले होते की कोकणातल्या माणसांमध्ये कोकणातल्या फणसासारखा खूप खूप पिकल्या शिवाय गोडवा येत नाही. पण काही काही लोकांमध्ये तसा गोडवा त्यांच्या पाश्च्यातही अवीट असाच राहतो.

-- अभिताभ दिलीप होनप
ahonap@gmail.com
८-११-२०१५

Saturday, December 12, 2015

पुलंना लिहिलेलं पत्र

मी अमोल लोखंडे. भाईंचा चाहता. किती मोठा ते सांगायला उचित परिमाण सध्यातरी उपलब्ध नाहीये. गेल्यावर्षी वाढदिवसानिमित्त मी त्यांना पत्र लिहिलं होतं. तुमचे ब्लॉग वाचत असता असं वाटलं की तुमच्याशी ते पत्र शेअर करावं!
जरूर वाचा!!


तीर्थस्वरूप भाई,
आपल्या चरणी बालके अमोलचा साष्टांग नमस्कार.
पत्र लिहिण्यास कारण की, येत्या आठ नोव्हेंबरला तुमचा जन्मदिवस आहे. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! खूप दिवसांपासून... नाही खूप वर्षांपासूनचा आपला स्नेह आहे. (स्नेह हा शब्दही काही योग्य वाटत नाहीये.. त्यापेक्षा नातं हा शब्द योग्य) तर खूप वर्षांपासूनचं आपलं नातं आहे. मी तुमचा नातू आणि आमचे आजोबा! बरोबर ना? हे काही एका रात्रीत निर्माण झालेलं नातं नाहीये किंवा कुणी लादलेलंही नाही. हे आपोआप निर्माण झालेलं स्वीकृत नातं आहे. तसंही सध्याच्या काळात लादलेल्या नात्यांपेक्षा आपणहून स्वीकारलेली नातीच जास्त टिकाऊ असतात. माझ्या दुर्दैवाने मला तुमचं प्रत्यक्ष दर्शन झालं नाही. तसा मी काही सखाराम गटणे नाही; त्यामुळं माझं वाचन अफाट वगैरे नाही. दहावीनंतरच्या सुटीत सहज उत्सुकता म्हणून मी तुमच्या रावसाहेब, हरीतात्या व नारायण या कथा ऐकल्या. विश्वेश्वराचा तो एक संकेतच असावा! मी आयुष्यभर ऋणी आहे त्या क्षणाचा ज्याने माझ्या मनात तुमच्याबद्दल आकर्षण निर्माण केलं. कारण भरकटण्याच्या त्या अजाण वयात मला एका वेगळ्या खजिन्याचा शोध लागला होता. असा खजिना जो कितीही लुटला तरी न संपता वाढतच जाणारा. आयुष्यात पहिल्यांदा मला खरा आनंद गवसला. तुमच्यापासून काय लपवणार म्हणा! तुमच्या कथाकथनाच्या जवळपास सगळ्या ध्वनीफितींचा संग्रह हा मी बाबांच्या खिशातून पैसे चोरून केलाय. काय करणार! व्यापारी प्रवृत्तीच्या दृष्टीने जिथे 'साहित्य' म्हणजे ज्याची विक्री करून चार पैसे नफा मिळवण्याचीच गोष्ट असते तिथे हे माझं नवं वेड कसं मान्य होणार? तरी त्यातून कसंबसं अंग चोरत मी माझी हौस पुरी करत होतो. आजपर्यंत तुमच्या सगळ्या ध्वनीफितींची असंख्य पारायणं झाली पण तरीही त्यातून प्रत्येक वेळी काहीतरी नवीनच शोध लागला. सततच्या अशा ऐकण्याने माझ्या डोक्यात केमिकल लोच्या झाला आणि जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी मला तुमचीच ती मिश्कील मूर्ती दिसू लागली. एकदा (एकदा नाही कैकदा) तुम्ही माझ्या स्वप्नात आला होतात. तुम्हांला आठवतंय? अशाच एका स्वप्नात रावसाहेबांनी मला फोनवरून तुम्ही बेळगावात येणार असल्याची वर्दी दिली होती आणि मी धावतपळत पडत तुम्हाला भेटायला आलो होतो. 'रिझ' थेटराच्या त्या कट्ट्यावर कितीतरी वेळ आणि कितीतरी विषयावर आपण गप्पा मारत बसलो होतो. चार्लीबद्दल, अॉस्कर वाईल्डबद्दल काय भरभरून बोलला होतात तुम्ही! चार्लीबद्दल मी आधीपासून बरंच ऐकून होतो पण अॉस्कर वाईल्ड हे नाव प्रथम तुमच्या तोंडूनच प्रथम ऐकलं. त्यारात्री इंटरनेटवरून अॉस्कर ची चार नाटके ध्वनीफितीच्या स्वरूपात मिळवली आणि ऐकली. 'The Picture of Dorian Gray', 'A Woman of No Importance', 'The Importance of Being Ernest' आणि 'Lord Arthur Savile's Life' इ. नाटकांचं ध्वनीप्रसारण बीबीसी रेडिओवरून झाले आहे. तसं माझंही इंग्रजीचं ज्ञान हे इंग्रजांनी हाय खावी असंच आहे. पण तरीही अॉस्करची शैली इतकी साधी आणि सरळ होती की मला समजण्यास जास्त अडचण आली नाही. अजून त्याचं खूप काही वाचणार आहे.

चार्लीबद्दल तर काय सांगावं? उगाच शब्द वाया घालवणार नाही. अफलातून माणूस एवढंच म्हणेन. त्याचे बहुतेक सर्व सिनेमेही मी कैकवेळा पाहिले आहेत. याचे सिनेमेही काळाच्या समांतर जातात. द किड, सिटीलाईटस्, मॉडर्न टाईम्स, द सर्कस, द ग्रेट डिक्टेटर किती नावं सांगू!

तुमच्यामुळे माझ्या मनात जसं चार्लीबद्दल आकर्षण निर्माण झालं तसंच ते पंडित भीमसेनजी, पंडित वसंतराव देशपांडे, गदिमा यांच्याबद्दलही झालं. हे तुमचे माझ्यावर झालेले संस्कार आहेत असं मी मानतो. काय भारी चित्र असेल ना ते? तुम्ही सगळी मंडळी रात्र-रात्र वेगवेगळ्या विषयावर गप्पागोष्टी करत बसला आहात, अधूनमधून गाण्याच्या फर्माईशी पूर्ण करत आहात! याचा माझ्या मनावर असा काही परिणाम झाला की मी माझ्या आजूबाजूच्या कलाकार आणि कलंदर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेऊ लागलो. शोधल्याने सापडते. माझंही मैत्र विस्तृत झालं. यात वयाची, ज्ञानाची कसलीही अट नाही. प्रत्येकजण हा आनंदभोगी. कुणी गायक, कुणी वादक, लेखक, नृत्यकलाकार, चित्रकार.. खूप आणि खूपच. याबाबतीत मी रावसाहेबांचा आदर्श समोर ठेवला. मुक्त आस्वाद घेण्याचा. तुम्हाला एक सांगायचं राहिलंच; त्यादिवशी माझ्या घरी साक्षात् पंडित भीमसेनजी आले होते, आले ते आपल्या वाद्यवृंदासह तडक माझ्या खोलीत शिरले. मला काहीच कळेना. माझ्याशी एकही शब्द न बोलता पंडितजींनी 'जो भजे हरी को सदा' पासून ते राम, कृष्णाची सगळी भजने ऐकवली. सगळे एकामागून एक धक्के! शेवटी ती मैफिल संपली आणि त्यांचे सहकारी ती सगळी वाद्यं बंद करून गोल रिंगण करून बसले. फारच मजेशीर सीन होता तो. तुम्हाला सांगतो त्या रिंगणात मी असा कपाळावर प्रश्नचिन्ह घेऊन बसलेला की हे नेमकं काय चाललंय? आणि माझ्याशी अजूनही कुणी काहीच का बोलत नाही? माझ्यासमोर पंडितजी बसले होते शेवटी एकदाचे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, "आता बोल तुला काय बोलायचं आहे!" मी अजूनही धक्क्यातून नीट सावरलो नव्हतो. त्या परिस्थितीत मी त्यांना काय विचारावं? तर, "पंडितजी, तुम्ही पुलंचा सहवास अनुभवला आहात, त्यांच्यासोबत तुमची खूप चांगली मैत्री होती, तुमच्या कितीतरी मैफिलीत पुलंनी हार्मोनियमवर साथ केली. मला त्यांच्या काही आठवणी सांगाल का?" पंडितजी हसले व म्हणाले, "अरे खूप आठवणी आहेत. त्या सगळ्या सांगणं काही शक्य नाही पण भाईबद्दल एकच सांगतो. माझ्या पूर्वजन्मी देवाने प्रसन्न होऊन मला वर मागायला सांगितला होता. मी म्हटलं मला स्वर्गात राहायचं आहे." देव हसला आणि तथास्तु म्हणाला. पाहतो तो काय तर मी पुलंच्या काळात जन्मलो होतो. नुसता जन्मलोच नाही तर त्यांच्यासोबत मैत्रीही झाली." भाई, ते ऐकून माझ्या अंगावर शहारा आला आणि दचकून जागा झालो. तेव्हा समजलं की हे स्वप्न होतं. (त्यादिवशी मी बराच वेळ पंडितजींनी गायलेली भजने ऐकली होती बहूतेक त्यामुळेच हे स्वप्न पडलं असावं). अहो पंडितजींचं हे उत्तर ऐकून खरं सांगू का मला त्यांचा हेवा, असूया, मत्सर वगैरे वगैरे जे काही असतं ना ते सारं वाटू लागलं. मी ना भाई, सत्तरेक वर्षे आधी जन्मलो असतो तर खूप भारी झालं असतं. अजिबात तुमची पाठ सोडली नसती. (ती तशी आताही सोडलेली नाहीय हा भाग अलाहिदा!)
मी रत्नागिरीला शिकायला होतो त्यावेळी गाडी जेव्हा हातखंब्याच्या फाट्यावरुन जायची तेव्हा तुम्ही, तो मधू मलुष्टे, ती सुबक ठेंगणी, ते मास्तर, झंप्या, उस्मानशेट, स्थितप्रज्ञ कंडक्टर-डायवरची जोडगोळी, बिनधास्त कुठेही पानाच्या पिंका टाकणारा तो आर्डर्ली, असंख्य पिशव्या आणि मुख्य म्हणजे ते खादीधारी पुढारी व अपघातग्रस्त म्हैस या सर्वांची आठवण येत असे. यापैकी कुणीतरी तिथे दिसेल का म्हणून नकळत गाडीच्या खिडकीतून डोकावायचो आणि त्यापैकी बरीचशी पात्रे दिसायचीही; पण नाव बदलून! तशी तुमची सगळीच पात्रे मला सगळीकडे दिसतात. मी रत्नांग्रीत पाऊल टाकल्यावर पहिल्यांदा मधली आळी शोधून काढली. बरेच अंतू भेटले आणि अनुभवले. काही जणांना वाटतं की अंतू, नारायण, चितळे मास्तर, रावसाहेब म्हणजे विनोदी पात्रे आहेत आणि ती खळखळून हसवतात. 'पोफडे उडालेल्या भिंती आणि गळकी कौलै पाहायला वीज हो कशास हवी?', 'अरे दुष्काळ पडलाय इथे आणि भाषणे कसली देतोयस? तांदूळ दे!' 'अहो बायकोचं हेल्थ बोंबललं; कायतर टिबीगिबी झालं असणार! सिनेमाचं यवडा मोठा गल्ला येतंय फुड्यात!! कसं आवरणार मन?', 'वो पीयल, हे माणूस फुडारी होतंय म्हणजे काय शिकल्यावर होतंय वो सांगा की?', 'कशाला आला होता रे बेळगावात?', 'पुर्शा, फुकट रे तू! टाईम्स हँव चेंजड्' ही वाक्ये फक्त हास्याचे फवारे उडण्यासाठी नाहीत असं माझं ठाम मत आहे. भावूक नंदा, उचल्या हरी काळूस्कर, बढाईखोर नाथा कामत ही मात्र फार मजेशीर पात्रं आहेत. बाकी तुम्ही तुमच्या कथाकथनात या व्यक्तीरेखांना जे आवाज दिलेत ना ते अगदी त्यांचा स्वभाव व्यक्त करतात. त्यातल्या एकाचाही आवाज दुसऱ्या कुणाला दिलेला नाही हे विशेष. मी तुम्हाला विनोदी लेखकच नाही तर तत्त्ववेत्ता समजतो. तुमची भाषणे वाचल्याचा हा परिणाम दुसरं काय! अमेरिकेतील तुमचं अध्यक्षीय भाषण तर कळस आहे. १९८२ साली म्हणजे आजपासून साधारणपणे ३२ वर्षे आधी तुम्ही मुलांवर संस्कारांबद्दल तक्रार करणाऱ्या पालकांचे कान टोचणे खरंच गरजेचे होते. आई-वडिलांपेक्षा जास्त संस्कार हे आजी-आजोबा करत असतात. ह्यात जर ते नातवंड काँव्हेंटला शिकत असेल आणि घरात येऊन इंग्रजीतच बोलत असेल तर मग कसं होणार? अशामुळे आजीचा आणि नातवाचा संवाद संपत चाललाय हे तुम्ही जे म्हणालात ते मी अगदी तंतोतंत अनुभवलंय. आपलं रक्त आपल्या समोर बागडत असतं आणि आपण त्याच्याकडे परक्यासारखं पाहत राहतो हे चित्र फारच क्लेशदायक आहे. बरं त्या लेकराच्या आई-वडिलांचा इंग्रजीतच बोलण्याचा किती अट्टहास असतो बघा; स्वतःचं इंग्रजी बिनअस्तराचं आणि बाता अशा मारायच्या जणू त्यांच्या तोंडून शेक्सपियरच बोलतोय. असो. तुम्ही कान टोचणंच योग्य होतं.

तुमचं लिखाण हे काळाच्या समांतर जाणारं आहे म्हणूनच की काय आजच्या या टेक्नोसेव्ही महाराष्ट्रात तुमची लोकप्रियता टिकून आहे. आम्ही फेसबुक आणि व्हॉटसअपवर 'आम्ही असू पु.ल.कित' या नावाने एक समूह तयार केला आहे. तुम्हाला सांगतो या समूहात विशी ते अगदी सत्तरीत असणारे सदस्य आहेत. काहीजण अनेक वर्षांपासून परदेशात राहतायत. बरेचसे कॉलेजात शिकत आहेत आणि प्रत्येकजण हा तुमच्या साहित्याचा आनंदभोगी आहे. 'हे डूड, हाय बेब्स' म्हणणारी पोरं ज्यावेळी अंतूशेट, नारायण, रावसाहेब वगैरे मंडळींबद्दल एकमेकांना टाळ्या देत दिलखुलास गप्पा मारताना पाहतो त्यावेळी जगाला ओरडून सांगावंसं वाटतं की नाही हो नाही, आम्ही बिघडलेलो नाही! अजूनही आम्हांला चांगल्या-वाईटाची जाण आहे. भाई, तुमच्या लेखणीने आमच्या मृतप्राय संवेदना जागृत केल्या. जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघायला शिकवलं. आमची नजर सौंदर्यासक्त बनली व जीवन समृद्ध झालं. आयुष्यातील दुःखांची काटेरी टोकं तुमच्या नर्मविनोदी कानशीने बोथट झाली आणि मनं अनैतिक विचारांनी रक्तबंबाळ होण्यापासून वाचली. याहून अधिक ते काय हवं? देवाला समजलं की आपल्या सगळ्याच लेकरांचं दुःख आपण स्वतः काही हलकं करू शकत नाही. मग त्याने तुमच्यासारखे दूत निर्माण केले आणि या मर्त्यलोकात पाठवले. याबद्दल त्या देवाचे मात्र मी आभार मानतो. आता इथेच थांबतो. बाकी तिकडच्यांची चैनी असणार! रंभा-उर्वशी वगैरे काळजी घेत असतीलच!!
जन्मदिवसाच्या पुनश्च शुभेच्छा!

तुमचं अजाण नातवंड,
अमोल लोखंडे
७५८८०१९८८४
(या नंबरवर कॉल येतो. पूर्ण पत्ता दिला तर पाहूणे येतील.)

Thursday, October 16, 2008

मी पु. ल. दे.

मी एकदा आळीत गेलो
चाळ घेऊन बाहेर आलो
तोंडात भरली सगळी चाळ
मी तर मुलाखाचा वाचाळ

कधी पायांत बांधतो चाळ
उगीच नाचतो सोडून ताळ
वजन भारी उडते गाळण
पायांचीहि होते चाळण

गाळणे घेऊन गाळतो घाम
चाळणीमधून चाळतो दाम
चाळीबाहेर दुकान माझे
विकतो तेथे हंसणे ताजे

‘ खुदकन् हसू ’ चे पैसे आठ
‘ खो खो खो ’ चे एकशे साठ
हसवण्याचा करतो धंदा
कुणी निंदा - कुणी वंदा

कुणाकुणाला पडतो पेच
ह्याला कां नाही लागत ठेच ?
हा लेकाचा शहाणा की खुळा ?
मग मी मारतो मलाच डोळा
(उरलंसुरलं)
a