Leave a message
Showing posts with label सुनीताबाईंच्या लेखणीतुन. Show all posts
Showing posts with label सुनीताबाईंच्या लेखणीतुन. Show all posts

Tuesday, March 14, 2023

यक्षाचं तळं

प्रत्येक सुखाला, दुःखाला संदर्भ असतात. या धामापूरच्या तलावालाही माझ्या जीवनात, स्मृतीत संदर्भ आहेत. प्रत्यक्षात मी त्या तलावाच्या पोटात गेले तर मृत्युनंतर तरंगत वर येणाऱ्या माझ्या ऐहिक मेंदूबरोबर ते संदर्भ नाहीसे होतील की त्या जलाशयाच्या गर्भाशयात पुनर्जन्मासाठी, पुनर्निर्मितीसाठी, दुगदुगत राहतील? तिथे त्यांना पोसणारी नाळ कोणती? 

असंख्य दुःखतांनी सासुरवाशिणींनी, चोचीतच दुखावलेल्या राजबंशी पाखरांनी शेवटच्या क्षणी विहिरीचा आसरा घेतला आहे. ज्या पाण्याची त्यांना अखेरीला ओढ लागली. त्याच्या पृष्ठभागापर्यंतचा त्या जीवांचा प्रवास गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने, गतीने झाला, हे मान्य आहे. पण त्या पृष्ठभागाला त्यांचा स्पर्श झाल्या क्षणापासून प्राण जाईपर्यंत क्षणापर्यंत त्या पाण्याच्या पोटात काय घडले? सोबत आणलेले ते सगळे दुःख, तो जिवंतपणा तो लाख मोलाचा प्राप्त ती ताटातुटीची हुरहूर, क्वचित त्या हतबल क्षणींचा पश्चाताप सगळे सगळे संचित त्या पाण्याच्या पोटात जपून ठेवायला त्याच्या स्वाधीन केले गेले असणार. अशी किती जणांची, युगानुयुगांची या तलावाच्या पाण्याला पहिला मानवी स्पर्श झाला तेव्हापासूनची किती संचिते इथे गोळा झाली असणार! ती वाचायला मला प्रत्यक्षच तिथे जायला हवे? एक्स-रे रेसारखा एखादा नवा किरण ती टिपून उजेडात आणू शकणार नाही का? त्या पाण्यातले सनातन दगड, सूर्यकिरण, मासे, इतर जलचर, तिथे वाढणाऱ्या वनस्पत्ती, काठावरच्या झाडांची पाळेमुळे, पण्याचा तळाचा भूभाग, यांना कुणाला या साऱ्याची पुसटशी तरी कल्पना असेल का? हा धामापुरचा तलाव म्हटला की त्याच्या अंतरंगात शिरून तिथल्या कविता वाचाव्या.

अशीच जबरदस्त ओढ मला लागते खरी. या तलावाच्या तिन्ही बाजूंना झाडाझुडपांनी भरलेल्या टेकड्या पुरातन काळापासून तशाच आहेत. चवथ्या बाजुच्या टेकडीवर ही भगवती केव्हा वस्तीला आली मला माहीत नाही. पण कोणे एके काळी ज्या कुणी या टेकडीवर हे भगवतीचे देऊळ बांधले, त्यानेच बहुधा त्या टेकडीवरून तलावाच्या काठापर्यंतच नव्हे तर पाण्यातही अगदी आतपर्यंत बऱ्याच पायऱ्याही बांधून काढल्या आहेत. एके काळी म्हणे गावातल्या जनसामान्यांपैकी कुणाकडे लग्नकार्य असले आणि दागदागिने कमी पडत असले तर हाच तलाव गरजू गावकऱ्यांना सोन्यारुप्याचे, हिऱ्यामोत्यांचे दागिने पुरवत असे. आपल्याला हवे ते दागिने कळ्या फुलांचे करायचे आणि ती परडी संध्याकाळी तळ्याकाळी पायरीवर येऊन ठेवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी खऱ्या दागिन्यांनी भरलेली ती परडी घेऊन जायची आणि कार्यसिध्दीनंतर ते दागिने तलावाला परत करायचे. गावावर अशी माया करणारा, पाखर घालणारा हा तलाव. काम झाल्यावरही दागिने परत न करण्याची दुर्बुध्दी झालेल्या कुण्या गावकऱ्याला ज्या दिवशी धामापुराने सामावून घेतले त्या दिवशी त्या तलावाच्या मनाता केवढा हलकल्लोळ उडाला असेल! मायेचे मोल न उमजणाऱ्या लेकरांना तो अजूनही पाणी देतो; पण केवळ कर्तव्यबुध्दीने.
      
आणि त्या टेकड्या? भोवतालच्या जीवसृष्टीतले किती जन्म आणि किती मरणे त्यांनी तटस्थतेने पाहिली असतील!  इथले हे प्रचंड दगड युगानुयुगे कुणाची वाट पाहत इथे उभे असतील? शांत, थंड, पण शक्तीशाली दगड! या दगडदगडांतही किती जाती, पोटजाती आहेत! कलावंताच्या अपयशाने अशा दगडांच्या काळजाच्या ठिकऱ्या उडतात. पण यशाने मात्र त्यांची छाती फुगत नाही, उलट एक सात्विक, नम्र भाव त्यांच्या रोमारोमांतून प्रगट होतो.

ऐकून तिच्या पाठिवरून हात फिरवायला आणि आडोसा करायला धावून आलेले ढग नक्की निळेसावळेच ; असणार. माझा हा तलावही एरवी सदैव मला निळासावळाच दिसतो. माझा तलाव, या पुरातनाच्या संदर्भात मी कोण, कुठली, आणि कितपत ? हे सगळे प्रश्न | खरेच आहेत. पण त्याचबरोबर त्या तलावाशी माझे काहीतरी नाते आहे, हेही एक शाश्वत सत्य आहे. । त्याशिवाय का ही भरती ओहटीसारखी ओढ चालू राहील.

आज या सुंदर काळ्याभोर रात्री काळी वस्त्रे लेऊन आणि काळी घागर घेऊन मी गुपचूप तुझ्यापाशी आले आहे. मला आज तुझ्या पोटात शिरून तिथले वैभव एकदा डोळे भरून पहायचे आहे. तुझ्या काठाशी पायरीवर बसून तुझ्यापाशी आले आहे. मला आज तुझ्या पोटात शिरुन तिथले वैभव एकदा डोळे भरून पहायचे आहे. तुझ्या काठाशी पायरीवर बसून तुझ्या त्वचेला मी आजवर अनेकदा स्पर्श केला. पण या क्षणी तुझ्या पोटात शिरताच लक्षात आले ते सुर्यप्रकाशात दिसणारे छोट्या छोट्या माशांचे विभ्रम तो पावलांना आणि हातांच्या बोटांना जाणवणारा गारवा, हे सगळे तुझे वरवरचे रुप आहे. हा आतला ओलावा या जिवंत ऊर्मी, या आजीच्या आई- आप्पांच्या स्पर्शासारख्या रेशमी आहेत. उन्हात उडणारी पाखरे आपल्या पंखांनी निळ्या हवेचा वारा घेतात ना तशी माझ्या हातांनी मी हे तुझ्या पण्याचे काळे झुळझुळीत रेशमी शेले पांघरत आत आत शिरते आहे. द्रौपदीनेही एकटेपणाच्या त्या अंतिम क्षणी असेच कृष्णाच्या मायेचे अनंत रेशमी शेले पांघरले नव्हते का? मीही आता तशीच निर्धास्तपणे कुठल्याही यमाच्या राजदरबारात जाऊ शर्केन.

आजवरची सगळी धावपळ कधीच मागे पडली आहे. तुझ्या अंतरंगातल्या या प्रवासाचा मार्ग आखीव नाही. त्यामुळे किती मोकळे वाटते आहे! निवृत्त होऊन या जगात स्थिर होण्यापेक्षा मृत्युच्या दिशेने नेणारी का होईना पण गती किती सुंदर, विलोभनीय असते! जिवंत पाण्याने भरलेला हा आसमंत. खऱ्याखुऱ्या शांतीचा साक्षात्कार आज प्रथम होतो आहे. श्वासाचीही हालचाल. नसलेली, केवळ जाणिवेतली शांती. तुझे सगळे वैभव पाहायला पाहुणीसारखी आज कसल्या तरी अनाकलनीय ओढीने ही माहेशवाशीण तुझ्या राज्यात प्रवशे करतेय.

तुझ्या आसऱ्याला आलेल्या साऱ्या दुःखितांना तू तुझ्या लौकिकाला साजेसाच निरोप दिला असशील. सतीला शृंगारतात तसे दागदागिने घालून, शेवाळी शालू नेसवून, ओटी भरून, जलचरांची सोबत देऊन किंवा कसाही, पण तुझ्या परिने भरभरून. पण मी त्या अर्थी दुःखजडीत होऊन इथे आलेली नाही. तशी मी संपन्न आहे. मला काही म्हणता काही कमी नाही हे तूही जाणतोसच ना ? पण माझ्या भाळी सुखाची व्याख्या लिहिताना नियतीने एक वेगळीच अदृश्य शाई वापरली आहे. ती व्याख्या, ते सुख तुलादेखील वाचताही येणार नाही आणि पुसताही येणार नाही. म्हणून सांगते, इथून परतताना मी मोकळ्या हातीच माघारी येणार आहे. माझी ही भरली घागरही मी तिथेच ठेवून येणार आहे.

तुझ्याकंडे यायला निघाले तेव्हा मी पाण्याला म्हणून इथे आले खरी, पण आता ती तहानही निवाली आहे. परतीच्या प्रवासात शिदोरी म्हणून मला एकच निश्वास सोबतीला हवा आहे. हा तुझा, माझा आणि आपल्या जातीच्या साऱ्यांचा अटळ एकटेपणा आहे ना, त्याच्या वेणा आतून जेव्हा जेव्हा टाहो फोडू लागतील. त्या त्या क्षणापुरती तरी तुझी ही मौनाचीच भाषा माझ्या ओठी नांदेल, असा आशीर्वाद मला देशील का?

सुनीता देशपांडे 
साभार : सोयरे सकळ
लोकसत्ता २०११

हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.

Tuesday, February 14, 2023

वेध सहजीवनाचा !

'आहे मनोहर तरी' या आत्मलेखनातून सुनीताबाईंनी पुलंसोबतच्या सहजीवनाचा वेध घेतला आहे. त्यांच्या लेखनशैलीचा हा एक संक्षिप्त परिचय...

भाई आणि मी. दोन क्षुल्लक जीव योगायोगाने एकत्र आलो. त्यानंतरचा आजपर्यंतचा आयुष्याचा तुकडा एकत्र चघळताना अनेक लहानमोठी सुखदुःखे भोगली. कधीतरी हे संपून जाईल. राहिलीच तर भाईची पुस्तके तेवढी, त्यांचे त्यांचे आयुष्य सरेपर्यंत त्याच्या मागे राहतील.

आजच्या काळातला एक मराठी लेखक म्हणून भाईचे निश्चितंच एक स्थान आहे, असे मला वाटते. तो अमक्या कवीपेक्षा श्रेष्ठ आहे का किंवा तमक्या कथालेखकापेक्षा अगर कादंबरीकारापेक्षा त्याचे स्थान वरचे आहे का, हा प्रश्नच अप्रस्तुत आहे. हे सगळे स्वतंत्र वाङ्मयप्रकार. त्यांची तुलना करणेच चूक; पण भाईच्या लिखाणाचेही एक खास वैशिष्ट्य आहे. ते सदैव ताजे, प्रसन्न, वाचतच राहा - वे, असे वाटण्याच्या जातीचे आहे, असे मला वाटते. स्वच्छंदी फुलपाखरासारखे. मनोहारी, आनंदी, टवटवीत. फुलपाखरांच्या लीलांकडे केव्हाही पाहा, लगेच आपला चेहरा हसराच होतो. ते आनंदाची लागण करत भिरभिरते. शेवटी सुबुद्ध, सुसंस्कृत मनाच्या वाचकांची मोजदाद केली. तर भाईला अशा वाचकांचा फार मोठा वर्ग लाभला आहे, हे कबूल करण्यावाचून गत्यंतर नाही. आता टिकाऊपणाचाच विचार करायचा झाला तर भरधाव वाहत्या काळाच्या संदर्भात एखादाच शेक्सपिअर, सोफोक्लिस किंवा व्यास यांच्यासारख्यांना फारतर टिकाऊ म्हणता येईल. आजच्या साहित्याला असा कस लावायचा झाला, तर त्यासाठी इतका काळ जावा लागेल, की त्या वेळी आपण कुणी तर नसणारच; पण आपल्या पुढल्या अनेक पिढ्याही मागे पडलेल्या असणार. त्यात आपण टिकणार नाही, केव्हाच विसरले जाणार, याची जाणीव भाईला स्वतःलाही पुरेपूर आहे. पण शेवटी तोही माणूसच. - स्वतःच्या हयातीतच विसरले गेलेले काही साहित्यिक किंवा समीक्षक जेव्हा त्याच्या लिखाणाला उथळ म्हणतात, तेव्हा तो नको तितका दुखावतो. 'गेले उडत!' म्हणण्याची ताकद त्याच्यात नाही. ती वृत्तीही नाही. 
जरादेखील असूयेचा स्पर्श न झालेल्या माझ्या पाहण्यातला हा एकमेव माणूस. त्याच्या आंतरमनातले सगळे स्वास्थ्य त्याला या दैवी गुणातून लाभले आहे; पण हे सुख तो प्रत्यक्ष भोगत असतानाही, साहित्याच्या अधूनमधून होणाऱ्या मूल्यमापनात त्याची क्वचित उपेक्षा झाली, की लगेच त्याची 'मलये भिल्लपुरंध्री' सारखी अवस्था होते आणि तो मग आपल्यातल्या इतर साहित्यबाह्य गोष्टींतल्या मोठेपणाला घट्ट पकडून ठेवू पाहतो. भूषवलेली पदे, केलेलं दान, मिळालेला मानसन्मान वगैरे. त्याचे चाहते त्याच्या या असल्या पराक्रमांचे पोवाडे गातात ते तो लहान मुलासारखा कान देऊन ऐकतो. ही एक मानवी शोकांतिकाच असावी. अशा वेळी मी फार दुःखी होते. वाटते, त्याला पंखाखाली घ्यावे आणि गोंजारून सांगावे, "नाही रे, या कशाहीपेक्षा तू मोठा आहेस. तुझी बलस्थानं ही नव्हेत. थोडं सहन करायला शिक म्हणजे तुझ्या लक्षात येईल, की साहित्यिक म्हणून या आयुष्यात तरी ताठपणे उभं राहण्याचं तुझ्या पायात बळ आहे. या कुबड्यांची तुला गरज नाही." याचा उपयोग होतोही; पण तो तात्कालिक; टिकाऊ नव्हे. प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. त्याने ढळू नये. आपल्या मातीत पाय रोवून ताठ उभे राहावे वृक्षासारखं. आपल्या वाट्याचं आकाश तर हक्काचं आहे! माझ्यासारख्या वठलेल्या झाडाला हे कळतं, तर सदाबहार असा तू. तुझ्या वाट्याला गाणं घेऊन पक्षीही आले. तुला आणखी काय हवं?... हे असले सगळे मी डोळे मिटून सांगते; पण कान मिटता येत नाहीत. त्यामुळे मग देशपांडे घोरायला लागले की उपदेशपांडेही त्या वेळेपुरते प्रवचन थांबवून झोपायला निघून जातात.

अनेकदा वाटते, या माणसाकडून माझ्यावर थोडाफार अन्यायच झाला. तो त्याने जाणूनबुजून केला असता तर मग त्याची धडगत नव्हती. मी त्याचा बदला घेतलाच असता, मग त्यासाठी कितीही किंमत द्यावी लागो, कारण माझ्यात 'दयामाया' नाही असं नाही; पण त्या प्रांतावर 'न्याया'चं अधिराज्य आहे. त्यामुळे माझ्याकडून त्याला खासा न्यायच मिळाला असता; पण झाले असे, की त्याला प्रेम करताच आले नाही. ती ताकद यायला जी विशिष्ट प्रकारची प्रगल्भता लाभते ती वयाप्रमाणे वाढत जाते.

दुर्दैवाने या बाबतीत त्याचे वय वाढलेच नाही. तो मूलच राहिला आणि लहान वयालाच शोभणारा स्वार्थ म्हणा किंवा आत्मकेंद्रितता म्हणा, त्याच्या वाढत्या वयातही त्याच्यात वसतीला राहिली. इतर सर्व बाबतींतले त्याचे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व घराबाहेरच्यांना लाभले आणि हे मूलपण माझ्या वाट्याला आले.

लोकसत्ता 
संपादकीय 

Wednesday, October 27, 2021

सुनीताबाईंच्या प्रेमाचं कठीण कोवळेपण - शुभदा पटवर्धन

सुनीताबाईंच्या ‘आहे मनोहर तरी’ या आत्मपर लेखनातून त्यांच्यातले स्वभावविशेष अधिक ठळकपणे वाचकांसमोर आले आणि तोपर्यंत एका ठरीव ठशाचं साहित्य वाचण्याची सवय झालेलं साहित्यविश्व ढवळून निघालं. मंगला गोडबोले यांनी लिहिलेलं ‘सुनीताबाई’ हे पुस्तक वाचायला घेताना ही पाश्र्वभूमी मनात तयार होते. ‘हा स्मृतिग्रंथ किंवा गौरवग्रंथ भाबडय़ा भावुक स्मरणरंजनाची पखरण करणारा आरतीसंग्रह नाही.’ ही या पुस्तकामागची भूमिका मंगलाबाईंनी मनोगतातच स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुस्तकाकडे बघण्याच्या आपल्याही दृष्टिकोनाला दिशा मिळते.

‘त्यांच्या घरी जाते आहेस, पण घरात ये म्हणतीलच अशी अपेक्षा ठेवून जाऊ नकोस हं.’

‘ज्या वेळेला बोलावलं आहे, तेव्हाच पोच. पाच मिनिटंसुद्धा मागेपुढे नको.’

‘बोलतीलच याची खात्री नाही आणि बोलल्याच तर नेमकी उत्तरं दे. उगीच फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची.’

‘एकदम कडक काम आहे. पुलंच्या अगदी विरुद्ध. त्यामुळे जरा जपूनच.’
काही वर्षांपूर्वी अगदी पहिल्यांदा सुनीताबाईंना भेटण्यासाठी जाणार होते, तेव्हा मिळालेल्या या सूचना.

खरं तर ज्या कामासाठी जाणार होते ते काम तसं काही फार महत्त्वाचं नव्हतं. त्यांच्याकडून फक्त एक लेख आणायचा होता. ‘सुनीताबाईंकडून लेख आणायचा आहे, कुणालाही पाठवून चालणार नाही,’ अशी सावध भूमिका घेत संपादकांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली आणि मीही नाही म्हटलं नाही. इतकंच. तरीही एक प्रकारचं दडपण मनात घेऊनच गेले. प्रत्यक्षात मात्र अगदी सर्वसाधारणपणे जसं आगतस्वागत होईल, तसंच झालं. खूप उबदार नाही पण अगदीच कोरडंठक्कही नाही. दोन्हीच्या मधलं. समंजस. त्या अशा वागतील, तशा वागतील असं जे चित्र निर्माण केलं गेलं होतं, तसं काहीही झालं नाही. ‘वाचते मी तुमचं लिखाण’, असं सांगून एक धक्काच दिला. एवढंच नाही तर हे तोंडदेखलं म्हणत नाही हे दर्शवण्यासाठी काही लेखांचाही उल्लेख केला. हे सगळं माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होतं. गेल्या पावलीच परतायचं असं मनाशी ठरवून गेलेली मी चक्क अध्र्या तासानंतर बाहेर पडले. पुढच्याही मोजक्या भेटींमध्ये कधी ‘असा विक्षिप्त’ अनुभव आला नाही आणि त्यामुळे असा ताणही कधी जाणवला नाही. पहिल्या भेटीची आठवण नंतर कधी तरी त्यांना सांगितल्यावर काहीही न बोलता त्या फक्त हसल्या होत्या. पण एखाद्या घटनेची, गोष्टीची, विधानाची कानगोष्ट व्हायला वेळ लागत नाही. सुनीताबाईंच्या बाबतीत असंच झालं. सामाजिक रूढ चौकटीत न बसणाऱ्या त्यांच्या स्वभावविशेषांची आवर्तनं पुन:पुन्हा आळवली गेली आणि कळत-नकळत त्यावर शिक्कामोर्तबही होऊन गेलं.

सुनीताबाईंच्या ‘आहे मनोहर तरी’ या आत्मपर लेखनातून त्यांच्यातले हे आणि इतर बरेच स्वभावविशेष अधिकच ठळकपणे वाचकांसमोर आले आणि तोपर्यंत एका ठरीव ठशाचं साहित्य वाचण्याची सवय झालेलं साहित्यविश्व ढवळून निघालं. मंगला गोडबोले यांनी लिहिलेलं ‘सुनीताबाई’ हे पुस्तक वाचायला घेताना ही पाश्र्वभूमी मनात होतीच. ‘हा स्मृतिग्रंथ किंवा गौरवग्रंथ भाबडय़ा भावुक स्मरणरंजनाची पखरण करणारा आरतीसंग्रह नाही.’ ही या पुस्तकामागची भूमिका मंगलाबाईंनी मनोगतातच स्पष्ट केली आहे, ते बरं झालं. पुस्तकाकडे बघण्याच्या आपल्याही दृष्टिकोनाला दिशा मिळते. कारण आजकाल एखादी नामवंत व्यक्ती गेल्यानंतर विविध ठिकाणी प्रसिद्ध होणाऱ्या श्रद्धांजलीपर लेखांचं संकलन करून पुस्तकं प्रकाशित होतात. अशा संकलनाची एक वेगळी गोडी असते. नाही असं नाही. पण तरीही त्यातला सरधोपटपणा त्रासदायक होतोच. सुनीताबाईंसारख्या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाला या सरधोपट चौकटीत बसवण्याची कल्पनाही करवत नाही. पण वाचकांची नस अचूक ओळखलेल्या राजहंस प्रकाशनानं ‘असं जगणं’ (जन्मापासून ते मृत्युपर्यंतचा कालावधी), ‘असं लिहिणं’ (लेखनप्रवास) आणि ‘असं वागणं’ (स्वभाव वैशिष्टय़) या तीन धारणा आणि जोडीला अरुणा ढेरे यांचा दीर्घ लेख अशा चौकटीतून सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतलेला आहे.

विनायक प्रसादमधील एक खोलीच्या छोटय़ा बिऱ्हाडापासून ते लंडन-पॅरीसमधल्या बिऱ्हाडांपर्यंत अशा अनेक घरांबद्दल सुनीताबाईंच्या चांगल्या-वाईट अनेक आठवणी निगडित आहेत. कुठे मर्ढेकरांची पिठलं-भाकरीची फर्माईश पूर्ण केल्याचा आनंद, तर कुठे पुलंमधले कलागुण बहरायला लागले, म्हणून समाधान.

सुनीताबाई आठ भावंडांतल्या चौथ्या. लहानपणापासूनच वेगळेपणामुळे उठून दिसत. पण त्यांचं व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थानं झळाळून उठलं ते बेचाळीसच्या चळवळीतल्या सहभागानं. स्वत:मधल्या क्षमता त्यांना कळल्या. त्यामुळेच परजातीतल्या - निर्धन - बिजवराशी लग्न करण्याचा निर्णय त्या घेऊ शकल्या आणि हा निर्णय घरच्यांच्या गळी उतरवण्यातही यशस्वी झाल्या. लग्नानंतर त्यांचं सगळं आयुष्यच बदललं. आयुष्यभरात सात गावं आणि बावीस घरांमध्ये बिऱ्हाडं मांडावी लागली. अशा किती जागा बदलायला लागल्या तरी प्रत्येक नव्या ठिकाणी सुनीताबाई त्याच उभारीनं उभ्या राहात. कितीही अडीअडचणी आल्या तरी कर्तव्यदक्षतेत कधी कमी पडल्या नाहीत. कुठेही मनापासून रुजायची जणू त्यांनी मनाला ताकीदच दिली होती. पुलंच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं व्रत घेतलं असल्यामुळे येणाऱ्या अडीअडचणींची झळ त्यांनी पुलंना कधी बसू दिली नाही.

असं लिहिणं’ हे प्रकरण अर्थातच सुनीताबाईंच्या लेखिका या भूमिकेतील प्रवास मांडते, पण लेखिका म्हणून त्यांच्या आयुष्यातलं पर्व सुरू झालं तेच मुळी साठीनंतर. तोपर्यंत लेखिका होण्यासाठी पोषक अशी परिस्थिती असतानाही सुनीताबाईंनी कधी या वाटेचा विचारही केला नव्हता.

विनायक प्रसादमधील एक खोलीच्या छोटय़ा बिऱ्हाडापासून ते लंडन-पॅरीसमधल्या बिऱ्हाडांपर्यंत अशा अनेक घरांबद्दल सुनीताबाईंच्या चांगल्या-वाईट अनेक आठवणी निगडित आहेत. कुठे मर्ढेकरांची पिठलं-भाकरीची फर्माईश पूर्ण केल्याचा आनंद, तर कुठे पुलंमधले कलागुण बहरायला लागले, म्हणून समाधान. कुठे घरात जेवण बनवता येत नसे, तर कुठे खालून पाणी भरायला लागत असे. पुलंना आकाशवाणीत नोकरी लागल्यानंतर ते प्रॉक्टर रोडवरील ‘केनावे हाऊस’मध्ये राहायला लागले. या घराच्या घरमालकाला साहित्याबद्दल ना फारशी गोडी होती ना जाणकारी. पण पुलंबद्दल मात्र प्रचंड अभिमान. पुलं लिखाणात गर्क असताना हा घरमालक भक्तिभावानं त्यांच्यासमोर बसून राहात असे. या घरातील वास्तव्यादरम्यान पुलंच्या आकाशवाणीवरील कामगिरीची सरकारदरबारी तसंच रसिकमनात नोंद झाली होती. ‘तुज आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ही इतिहास घडवणारी नाटकं, तसंच ‘मोठे मासे छोटे मासे’ या एकांकिकेनं याच घरात जन्म घेतला होता. केनावे हाऊस सोडल्यानंतर ते ‘आशीर्वाद’मध्ये राहायला गेले. या बििल्डगमध्ये अकरा खोल्या आणि तीन बिऱ्हाडं राहात होती. त्यात सुनीताबाईंचे भाऊ डॉ. श्रद्धानंद ठाकूर आणि त्यांची पत्नी निर्मलाबाई, त्यांचे मेहुणे नारायण देसाई आणि त्यांच्या पत्नी नलिनीबाई, आणि पुलं व सुनीताबाई राहात असत. म्हणजे नलिनीबाईंची नणंद निर्मलाबाई आणि निर्मलाबाईंची नणंद सुनीताबाई असा नणंद-भावजयांचा गोतावळा तिथं एकत्र आला होता. यावर पुलंनी मल्लिनाथी केली नाही तरच नवल. पुलं या बििल्डगचा उल्लेख ‘नणंदादीप’ असा करत असत. मान्यवरांच्या घरावर महापालिका पाटय़ा लावते, पण इतक्या वेळा बिऱ्हाडं बदलली असल्यामुळे इतक्या घरांवर पाटय़ा लावणं महानगरपालिकेला परवडणार नाही, असंही गमतीत ते म्हणायचे. पॅरीसमध्ये माधव आचवल त्यांच्या शेजारी राहात आणि त्या काळात भारतीय जेवण मिळत नसल्यामुळे सुनीताबाईंकडे जेवायला येऊ लागले. दिल्लीतलं त्यांचं घर तर ‘महाराष्ट्र सांस्कृतिक केंद्र’च झालं होतं. आशीर्वादमधून पुलं आणि सुनीताबाई ‘मुक्तांगण’ या स्वत:च्या मालकी हक्काच्या घरात राहायला गेले. हे घर सुनीताबाईंच्या मनासारखं असलं तरी पुलंनी निवृत्त आयुष्य पुण्यात काढायचं ठरवलं आणि ते ‘रूपाली’त राहायला गेले. यानंतरचा शेवटचा टप्पा होता तो ‘मालतीमाधव’चा. कारण तोपर्यंत सगळ्यांचीच वयं झाली होती, तब्येतीच्या कुरबुरी सुरू झालेल्या होत्या, त्यामुळे ठाकूर कुटुंबीयांना एकत्र राहावंसं वाटायला लागलं होतं. मालतीमाधव पुलं आणि सुनीताबाईंच्या मृत्यूची साक्षीदार ठरली. ऐंशी र्वष सुंदर-संपन्न आयुष्य जगल्यानंतर मृत्यूही वैभवशालीच यावा असं सुनीताबाईंना वाटत असलं तरी ते दोघांच्याही बाबतीत खरं झालं नाही. पुलंची अवस्था तर शेवटी शेवटी इतकी केविलवाणी झाली होती की पूर्णपणे परावलंबन नशिबी आलेलं होतं. मृत्यूनंच त्यांची या अवस्थेतून सुटका केली. सुनीताबाईही जाण्याआधी दीडेक वर्ष अशाच क्लेशपर्वातून गेल्या.

‘असं लिहिणं’ हे प्रकरण अर्थातच सुनीताबाईंच्या लेखिका या भूमिकेतील प्रवास मांडते, पण लेखिका म्हणून त्यांच्या आयुष्यातलं पर्व सुरू झालं तेच मुळी साठीनंतर. तोपर्यंत लेखिका होण्यासाठी पोषक अशी परिस्थिती असतानाही सुनीताबाईंनी कधी या वाटेचा विचारही केला नव्हता. सुनीताबाईंचं वाचन दांडगं होतं. इंग्रजी, बंगाली, उर्दू भाषाही त्यांना अवगत होत्या आणि या भाषातील साहित्य त्यांनी वाचलं होतं. कविता हा त्यांचा एक हळवा कोपरा होता. त्यामुळे भाषिक आकलन आणि जाणिवाही चांगल्या विकसित झाल्या होत्या. पुलंनीही कधी त्यांच्यावर अशी बंधनं घातलेली नव्हती. जी. ए., श्री. पु. भागवत, माधव आचवल यांनी वारंवार त्यांना हे सुचवलं होतं, त्यालाही सुनीताबाईंनी कधी भीक घातली नाही. मोठय़ा प्रमाणावर पत्रलेखन करणाऱ्या सुनीताबाई साहित्यनिर्मितीचा विचारही करायला तयार नव्हत्या. स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्याची रसरशीत क्षमता असूनही ‘पुलंची बायको’ याच चौकटीत राहात होत्या. पुलंच्या सगळ्या व्यापातील पडद्याआडची भूमिका त्यांनी स्वीकारली होती आणि अतिशय कर्तव्यकठोरतेनं सांभाळली, हे मान्य केलं तरी त्यामुळे त्यांना लिखाणाकडे लक्ष देता आलं नसावं असं वाटत नाही. कारण त्यांची एकंदरीतच काम करण्याची अत्यंत काटेकोर आणि नेमस्त पद्धत पाहिली तर वेळ मिळत नाही हे कारण त्यांच्या बाबतीत तरी लागू होत नाही. त्यामुळे वयाच्या साठीपर्यंत सुनीताबाईंनी लेखन का केलं नाही, या अनेक वषर्ं अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर याही पुस्तकात सापडत नाही. अर्थात ‘देर आये दुरुस्त आये’ असं काहीसं झालं. साठीनंतर मात्र अचानक एकदम त्यांनी लेखणी हाती धरली आणि ‘आहे मनोहर तरी..’ सारखं पुस्तक लिहून जी झेप घेतली ती अतुलनीय होती. आता पुस्तक लिहायचं म्हणून लिहिलेलं हे पुस्तक नव्हतं, तर वेळोवेळी लिहून ठेवलेल्या या आठवणी एवढंच त्यांचं प्राथमिक स्वरूप होतं. या आठवणींचा काही भाग महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला आणि त्याला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला त्यावरून या आठवणी पुस्तकरूपात प्रसिद्ध कराव्यात असं निश्चित झालं. खरं तर आधीही एकदा या आठवणी सुनीताबाईंनी श्री. पु. भागवतांना वाचायला दिल्या होत्या, पण तेव्हा ‘काही काळ हे लिखाण बाजूला ठेवून द्यावं’ असा सल्ला त्यांनी दिला होता. कदाचित या लिखाणाचं स्वागत वाचक कसं करतील अशी सुनीताबाईंप्रमाणेच त्यांच्याही मनात शंका असेल. कारण मुळात हे आत्मचरित्र नाही. त्यामुळे आत्मचरित्राचा गुळगुळीत बाज त्यात नव्हता. उलट हे पुस्तक म्हणजे आपल्याच आयुष्याची अत्यंत निष्ठुरपणे फेरतपासणी करत घेतलेला आत्मशोध. सुनीताबाईंच्या कडक-करकरीत स्वभावाला साजेल अशा पद्धतीनं केलेला. यात त्यांनी स्वत:ला ‘गुण गाईन आवडी’ या पद्धतीनं सादर केलं नाही, तसं पुलंनाही केलं नाही. पती-पत्नी नात्यातले वेळोवेळी जाणवलेले पीळ उलगडून दाखवताना त्यांनी हातचं काही राखलं नाही. त्यामुळेच पुलंच्या प्रेमात असलेल्या वाचकाला हे रुचेल? पटेल? अशी शंका मनात होतीच. पण मायबाप वाचकांनीच या आठवणीवजा लेखाला कौल दिल्यानंतर या आठवणींचं पुस्तक प्रकाशित करणं आणि तेही मौजेनं प्रकाशित करणं हे अपरिहार्य होतं. या पुस्तकानं साहित्यविश्वात अनेक विक्रम घडवले. या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले. चर्चा-परिसंवाद झाले. उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पत्रव्यवहार झाला. साहित्यविश्व आणि समाज दोन्ही ढवळून निघाला. त्यानं सुनीताबाई सुखावल्या. पण त्याहीपेक्षा ‘आपलं पुस्तक वाचून सर्वसामान्य महिलांना मन मोकळं करावंसं वाटलं. सामान्य माणसं निर्भय होत आहेत हेच लेखक म्हणून आपल्याला मोठं प्रशस्तिपत्रक वाटतं’, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘आहे मनोहर तरी..’च्या यशानंतर ‘सोयरे सकळ’. ‘मण्यांची माळ’. ‘प्रिय जी. ए.’, ‘मनातलं अवकाश’ ही पुस्तकेही प्रसिद्ध झाली. सुनीताबाईंनी कवितांवर मनापासून प्रेम केलं. या प्रेमानेच त्यांना आणि पुलंना एकत्र आणलं. एवढंच नाही तर ज्या व्यक्तीला कविता आवडते, त्या व्यक्तीशी त्यांची नाळ पटकन जुळायची. कवितेच्या प्रेमापायीच त्यांनी काव्यवाचनाचे कार्यक्रम केले आणि काव्यवाचन कसं असावं याचा एक आदर्शच निर्माण केला. कविता हे त्यांच्यासाठी जगण्याचं माध्यम होतं. जी.एं.बरोबरचं मत्र यामागंही कवितेची ओढ हे एक कारण होतंच.

एखाद्या व्यक्तीमध्ये किती परस्परविरोधी गुण एकवटलेले असावेत, ते एकाच तीव्रतेचे असावेत आणि त्याचा एकत्रित परिणाम होऊन एक अमिट ठसा कसा उमटावा, हे ‘असं जगणं’ या प्रकरणावरून लक्षात येतं. जीवन कसं जगायचं यासाठी सुनीताबाईंची विशिष्ट विचारांवर श्रद्धा होती. याच निष्ठांवरच्या अढळ श्रद्धेतून त्यांनी आंतरिक बळ मिळवलं. महत्त्वाचं म्हणजे जीवनविषयक त्यांच्या या निष्ठा ठाम होत्या. वयोपरत्वे त्या डळमळीत झाल्या नाहीत की परिस्थितीला शरण गेल्या नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या या निष्ठांची झळाळी कमी झाली नव्हती. हे जमवणं किती कठीण असतं, हे या वाटेवरून चालणाऱ्यांनाच कळू शकतं. आज अशा निष्ठावान व्यक्ती शोधायलाच लागतील. सुनीताबाईंचं वेगळेपण अधोरेखित होतं ते याच बाबतीत. म्हणूनच अरुणा ढेरे म्हणतात, ‘सुनीताबाईंच्या प्रेमाचं कठीण कोवळेपण इतरांना समजणं अवघडच. फार फार अवघड.’ पसा, प्रसिद्धी, पत, प्रतिष्ठा याचं आणि फक्त याचंच व्यसन असलेल्या आणि त्यासाठीच आयुष्य पणाला लावणाऱ्या समाजाला कमीत कमी गरजा, जीवननिष्ठांमधला कर्मठपणा, साधेपणाची ओढ, काटकसरी स्वभाव, काटेकोर वृत्ती, टोकाचा स्पष्टवक्तेपणा, सत्यप्रियता, स्वच्छता, नीटनेटकेपणा, साधनशुचिता, कर्मवाद, त्याग, आत्मसमर्पण, व्यक्तिस्वातंत्र्याची आस, श्रमप्रतिष्ठेचा ध्यास.. असे अनेक गुण अनाकलनीय वाटले तर नवल नाही. पण याच गुणांच्या बळावर सुनीताबाईंनी आíथक नियोजन ज्या पद्धतीनं केलं आणि वाचनालयं, प्रयोगशाळा, नाटय़मंदिरं, शिक्षणसंस्था, बालवाडय़ा, हॉस्पिटल्स, व्यसनमुक्ती, विज्ञानप्रसार, सांस्कृतिक कार्य आणि चळवळी, अंधश्रद्धा निर्मूलन, गिर्यारोहण.. अशा अनेक उपक्रमांना पु. ल. देशपांडे प्रतिष्ठाननं सढळ हातानं मदत केली. या मदतीतला सुसंस्कृतता, पारदर्शीपणा आणि निर्मोहीपणा याची अनेक उदाहरणं या प्रकरणात सापडतात आणि सुनीताबाईंना एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. ‘पु. ल. देशपांडे प्रतिष्ठान’ ही एक अत्यंत नमुनेदार ‘एन. जी. ओ.’ होती असं वर्णन केलं जातं ते उगीच नाही. आíथक मदत मागण्यामागचं कारण उचित आहे का नाही, याची सुनीताबाई कठोरपणे तपासणी करायच्या. आपला पसा योग्य ठिकाणीच खर्च होणार आहे, याची खात्री पटली की, कोणीच त्यांच्याकडून विन्मुख परत जायचा नाही आणि या मदतीचा त्यांनी कधी गवगवाही केला नाही. किंवा प्रसिद्धी मिळवण्याचं साधन म्हणूनही उपयोग केला नाही.

या पुस्तकात पानोपानी विखुरलेल्या सुनीताबाईंमधील गुणांबद्दल लिहावं तेवढं थोडंच आहे. त्यामुळे हे पुस्तक परत परत वाचावं, सुनीताबाईंच्या जीवननिष्ठा समजून घ्यायचा प्रयत्न करावा. आज ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, आयुष्याला वळण देण्याचा प्रयत्न करावा, पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करावा, लवून नमस्कार करावा असं मनापासून वाटावं, अशी उत्तुंग व्यक्तिमत्त्वं अभावानंच सापडतात. ‘सुनीताबाई’ या पुस्तकाच्या रूपात एक असं व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यांसमोर उभं करून मंगला गोडबोले यांनी आपल्यासमोर एक आव्हानच ठेवलं आहे. सुनीताबाईंचे विचार, धारणा, निष्ठा जेवढय़ा झिरपवता येतील तेवढय़ा झिरपवून आपल्या जीवनाचा आणि जगण्याचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न करावा, यासाठी.

शुभदा पटवर्धन
४ जुलै २०११
लोकसत्ता 

Thursday, January 28, 2021

रफ स्केचेस् – सुनीताबाई

कव्हर झालं. ब्राऊन पेपरवर पांढऱ्या रंगाने वारकऱ्याच्या कपाळावरचा टिळा बोटाने ओढला होता आणि खाली काळ्या बुक्क्य़ाचा ठिपका.

१९७८- ८०च्या आगची मागची गोष्ट असेल. पुण्यात होतो. चिक्कार काम असे. एकदा मधुकाका कुलकर्णी म्हणाले, ‘‘अरे, पुलंचं नवं पुस्तक करतो आहे ‘तुका म्हणे आता’ नावाचं. कव्हर कर की!’’ 

मी म्हटलं, ‘‘करतो. त्यात काय?’’

पुलं नेहमी भेटत. गप्पाटप्पा चालत. तोवर पुलंच्याभोवती बरीच प्रभावळ विणली गेलेली होती; पण मला तेव्हा कशाचा म्हणता कशाचा पत्ता नसे. त्यांचं लेखन सोडलं तर त्यांच्याबद्दल बाकी फार काही माहिती नव्हतं. बरंच होतं ते म्हणजे.

कव्हर झालं. ब्राऊन पेपरवर पांढऱ्या रंगाने वारकऱ्याच्या कपाळावरचा टिळा बोटाने ओढला होता आणि खाली काळ्या बुक्क्य़ाचा ठिपका.

मधुकाका खूश! मला म्हणाले, ‘‘मी पुलंना फोन करून ठेवतो. तूच जाऊन त्यांना एकदा दाखवून ये!’’

मी म्हटलं, ‘‘जातो!’’

आणि गेलो एका सकाळी. जोशी हॉस्पिटलच्या शेजारची ती ‘रूपाली’.. दार बंद वगैरे!

बेल वाजवली. दारात बाई. मला म्हणाल्या, ‘‘कोण तुम्ही?’’

मी म्हटलं, ‘‘सुभाष अवचट.’’

‘‘म्हणजे कोण?’’

माझ्या डोक्यात खटकी पडलीच. तरी म्हटलं, ‘‘चित्रकार!’’

बाईंनी विचारलं, ‘‘काय काम आहे?’’

मी सरळ म्हणालो, ‘‘माझं काहीही काम नाही. मधुकाका कुलकर्णीनी भेट सांगितलं, म्हणून आलो होतो. आता चाललो.’’

तेवढय़ात घरातून हालचाल झाली. ते पुलं होते. म्हणाले, ‘‘अगं, येऊ दे, येऊ दे त्याला.. ये रे, ये तू!!’’

स्वत: पुढे येत पुलं मला हाताला धरून बैठकीच्या खोलीत घेऊन गेले. मऊ, ऊबदार घर. सकाळचा सुंदर प्रकाश. पुलंना कव्हर दाखवलं. फार खूश झाले. मला म्हणाले, ‘‘मस्त रे!!!’’

बाई तिथेच बसलेल्या.

म्हणाल्या, ‘‘बघू काय केलंय ते!!’’

माझं आर्टवर्क बघतानाची त्यांची ती धारदार नजर मला आवडली नाही. वरून प्रश्न.. ‘‘काय आहे हे? असंच का केलंय? यातून काय सांगायचंय?’’

मला या असल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला अजिबात आवडत नाहीत. त्यातून डोक्यात खटकी पडलेलीच होती.

मी काहीही बोललो नाही. विषय बदलत म्हणालो, ‘‘अहो बाई, एवढी मस्त सकाळ आहे. जरा चहा टाका की आमच्यासाठी!!’’

एक तर या बाई कोण, त्या माझ्या आर्टवर्कबद्दल का बोलतायत असे प्रश्न मला पडलेले. पुलंनी सावरून घेतलं. ‘चहा हवाच आता..’ म्हणाले.

बाई नाइलाज असल्यासारख्या उठून चहा टाकायला आत गेल्या.

मी सहज पुलंना विचारलं, ‘‘कोण हो या?’’

ते म्हणाले, ‘‘अरे, ही सुनीता. माझी बायको. ओळखलं नाहीस का?’’

बापरे! मी झटका बसल्यासारखा गप्पच बसलो!

काहीच सुचेना. तेवढय़ात सुनीताबाई चहा घेऊन आल्या. माझ्यासमोर कप धरत म्हणाल्या, ‘‘घे चहा!!’’

घशातून गरम जाळ खाली उतरल्यावर मग मला जीभ उचकटायला थोडा धीर आला. पुलं होतेच, त्यांनी वातावरणातला ताण अलगद काढला. मग बाईही खुलल्या. गप्पा झाल्या.

ही अशी सलामी. ती झडली त्या पहिल्या दिवशी आपल्याला एक ताठ कण्याची मैत्रीण मिळणार आहे, हे मला माहिती नव्हतं.

हळूहळू भेटी व्हायला लागल्या. सूर जुळले. सुनीताबाईंच्या नजरेतल्या करारी पाण्याला स्नेहाची मऊ धार असे.. ती दिसायला लागली.

त्याचदरम्यान काही काळासाठी भांडारकर रोडवरच्या एका बंगल्यात मी माझा स्टुडिओ थाटला होता. दगडी, गारेगार भिंतींचा देखणा बंगला. भोवती झाडी आणि मस्त शांतता. बंगल्याच्या आऊटहाऊसमध्ये माझा स्टुडिओ. तिथे मी काम करीत बसलेला असे. समोरच्याच गल्लीत माझं घर होतं. माझी बायको सुमित्रा. दोन छोटी मुलं.

पलीकडे तात्या माडगूळकर. आणि आम्ही दोघेही पुलंच्या फिरायला जायच्या रस्त्यावरच अगदी.

फार श्रीमंत दिवस होते ते. संध्याकाळ उतरली की पुलं चक्कर मारायला जाताना दिसत. खरं तर त्यांचा स्वभाव बैठा. त्यांना अशा चालण्या-बिलण्यापेक्षा मस्त बैठक जमवून गप्पा-गाणी करायला जास्त आवडत. त्यामुळे स्टुडिओत मी दिसलो की चालणं सोडून ते सरळ आत येत. मला म्हणत, ‘‘काय चित्रकार? काय चाललंय?’’

ते बसतात, तोवर अनेकदा तात्या माडगूळकर डोक्यावर टोपी चढवून आणि हातात त्यांची ती लाडकी काठी घेऊन रमतगमत बंगल्याच्या फाटकातून आत शिरत! की झालंच मग! सगळा कल्ला नुसता!!! माझ्या रंगांच्या उघडय़ा टय़ुबांना झाकणं लागलीच लगेच!! ज्या काय गप्पा रंगत.. तोड नाही!

क्वचित कधीतरी वि. म. दांडेकरांना फिरता फिरता आतल्या माहोलाचा सुगावा लागे. मग ते फाटकातून जोराने हाक देत, ‘‘हं.. काय रे?’’

की मी बाहेर जाऊन त्यांना आत घेऊन येई!! मज्जा!!

संध्याकाळ उतरणीला लागली की तात्यांना मूड आलेला असे. ते डोळे मिचकावत म्हणत, ‘‘मग काय अवचट, काही वाईट विचारबिचार येतायत की नाही मनात?’’

आम्ही तयारच असायचो मैफिलीला! दांडेकरांकडे अनेकदा विमानतळावरून डय़ुटी-फ्रीमधून आणलेली महागडी स्कॉच असे. ते म्हणत, ‘‘थांबा, मी आलोच!’’

पुलंचा पाय असा सुट्टा नसे. ते म्हणत, ‘‘बसलो असतो रे आज.. पण सुनीताला कोण सांगणार?’’

मी लगेच उडी मारून म्हणायचो, ‘‘थांबा, मी करतो फोन. माझं ऐकतात त्या!’’

नुस्तं ‘हॅलो’ म्हटलं की सुनीताबाई वेळ-काळ बरोब्बर ओळखत. म्हणत, ‘‘चित्रकारा, काही सांगू नकोस तू. भाई आत्ता तुझ्याकडे आहे आणि त्याला यायला उशीर होईल, शिवाय तो जेवायला नसेल; हेच ना? माहित्ये मला ते!’’

पण हे इथेच संपत नसे.

घरी माझी बायको सुमित्रा एकटी आहे, ही इतकी माणसं आयत्यावेळी जेवायला नेऊन मी तिला त्रास देणार आहे; याबद्दल आधी माझी यथास्थित खरडपट्टी निघे. मग म्हणत, ‘‘बरं, किती जण आहात जेवायला? सुमित्राला सांग, काळजी करू नकोस. मी दोन-तीन पदार्थ आणते करून!’’

आमची जमवाजमव होऊन आम्ही समोरच्या गल्लीतल्या माझ्या घरी पोचतो म्हणेतो गरमागरम जेवणाचे डबे बास्केटमध्ये घालून सुनीताबाई हजर!!

माझा मुलगा धृव तेव्हा अगदी लहान होता. आम्ही त्याला ‘बन्या’ म्हणू. ख्यालीखुशाली होऊन आम्ही गच्चीवर बैठक जमवायला निघालो की आमच्या पायापायात करत बन्याही आमच्या मागोमाग येई. ग्लास मांडणं, खाण्याचे पदार्थ वर आणणं या सगळ्यात मदतीला बन्या पुढे! मग जी मैफल रंगे.. काय विचारता!!!

मद्यपान नाममात्रच. खरी मजा गप्पांची. पुलं म्हणत, ‘‘पेटी हवी होती रे सुभाष! आणतोस का घरून?’’

मी म्हणायचो, ‘‘मुळीच नाही! इथे गाणी नकोत तुमची!! गप्पा कशा होणार मग आपल्या? आपल्या गप्पा हाच पूरिया धनश्री आहे असं समजा!’’

पुलंशी मी हे असं भांडण काढलं की सुनीताबाई नुसत्या हसत बसत. त्या गप्पा, तो सहवास, त्या रंगलेल्या रात्री.. मोठी श्रीमंती आहे ती माझी!

जेवायची तयारी झाली की कधी तात्यांच्या, कधी दांडेकरांच्या, सुनीताबाईंच्या मांडीवर बसलेला बन्या खाली जाऊन त्याची एक हॅट होती ती घेऊन येई. प्रत्येकासमोर धरून म्हणे, ‘टिप प्लीज..’ पुलंच्या खिशात कधी एक नाणंही नसे. ते त्यांचा रिकामा खिसा उलटा करून बन्याला दाखवत. मग सुनीताबाई आपल्या कमरेची चंची काढून बन्याला टिप देत आणि त्याच्या गालावर हात फिरवून दुरूनच मुका घेत.

गप्पांच्या मैफिलीनंतर रात्री उशिरा जेवणं आवरली की स्वयंपाकघर आवरून, उरलंपुरलं भांडय़ांत काढून ठेवून, खरकटी भांडी घासूनपुसून जागच्या जागी गेली, की मगच सुनीताबाई कमरेच्या चंचीतली गाडीची किल्ली काढून पुलंना घेऊन घरी जायला निघायच्या. सुमित्राला अगदी कसंनुसं होऊन जाई. पण बाईंच्या कामाच्या झपाटय़ापुढे आम्ही कुणीच काही बोलू शकायचो नाही.

हळूहळू आम्ही एकमेकांच्या स्वभावांना रुळलो आणि कुठे नाटक-सिनेमाला जायचं असेल तर सुनीताबाई फोन करून विचारू लागल्या,

‘‘काय चित्रकार, येणार का?’’

मी तयारच असायचो. एकदा असेच लक्ष्मीनारायण थिएटरमध्ये ‘झोर्बा द ग्रीक’ हा अफलातून सिनेमा पाहायला गेलो होतो. त्यांची ती फियाट चालवायला सुनीताबाई स्टिअरिंगवर. वाटेत कुणीतरी अचानक मधे आलं तर बाईंनी करकचून ब्रेक दाबले.

म्हटलं, ‘‘काय हो हे?’’

तर म्हणाल्या, ‘‘अरे, महाराष्ट्रातली दोन मोठी माणसं तुम्ही! माझ्या गाडीत तुम्हाला काही झालं, तर लोक फाडून खाणार नाहीत का मला?’’

दिसणं, बोलणं सगळं कसं अगदी शिस्तीत. रेखीव आणि नेटकं. ही एक लवलवती ताठ रेघच आपल्याभोवती वावरते आहे असं मला वाटे. मी अनेकदा उगीचच त्यांच्याकडे नुसताच पाहत बसलेलो आहे.

गप्पा व्हायला लागल्या तसे एकमेकांच्या जिव्हाळ्याचे विषयही उमजू लागले. जी. ए. कुलकर्णी गेले तेव्हाची गोष्ट. महाराष्ट्र टाइम्सचे संपादक होते गोविंदराव तळवलकर. जीएंच्या बातमीच्या मागोमाग गोविंदरावांचा फोन आला. मला म्हणाले, ‘‘जीए गेल्याचं आत्ताच कळतं आहे, तर तू त्यांच्यावर एक लेख लिही महाराष्ट्र टाइम्ससाठी!’’

गोविंदरावांना कोण नाही म्हणणार?

मी म्हटलं, ‘‘लिहितो की.. त्यात काय?’’

लिहायला बसलो, लिहीत गेलो. पण नंतर मात्र फाटली. म्हटलं, एवढा मोठा साहित्यिक! आपण उगीच काही चावटपणा तर नाही ना केलाय?

मला एकदम विंदा आठवले. ते मला म्हणत, ‘‘अवचटा खवचटा, फार भरवसा धरू नये रे आपल्या अकलेचा!’’

आता आली का पंचाईत!

मी सरळ सुनीताबाईंना फोन लावला. म्हटलं, असं असं आहे.. ‘‘मी आत्ताच्या आत्ता तुमच्याकडे येतो. मी लिहिलंय ते काय लायकीचं आहे ते मला सांगा!’’

मला म्हणाल्या, ‘‘ये! तुझ्यासाठी चहा टाकतेच आहे मी!’’

गेलो. पुलं आणि सुनीताबाई दोघेही घरी होते. म्हटलं, ‘‘ऐका!’’

सरळ वाचत गेलो. लेख संपला तरी दोघे होते तस्से बसून. काही प्रतिक्रिया नाही. म्हटलं, मेलो! आता चंपी!

काही वेळाने पाहतो तर सुनीताबाईंच्या डोळ्यांना पाण्याची धार लागली होती. जवळ येऊन माझ्या हातावर हात ठेवत मऊ आवाजात मला म्हणाल्या, ‘‘अरे नालायका, तू काय तोडीचं लिहिलंयस माहिती तरी आहे का तुला?’’

जीएंवरचा माझा तो दीर्घ लेख त्या दोघांना इतका आवडला, की सुनीताबाईंनी तात्काळ ठरवून टाकलं : आता या लेखाचं पुस्तकच होणार. त्यात चित्रं जाणार. फोटो जाणार. हा लेख वर्तमानपत्रात छापून येणारच नाही.

मी घाबरून म्हणालो, ‘‘अहो, पण गोविंदराव?’’

सुनीताबाईंनी काही न बोलता गोविंदरावांचा नंबर फिरवला. ‘सुभाषचा लेख तुम्हाला मिळणार नाही,’ असं स्पष्ट सांगितलं. मागोमाग श्रीपुंना फोन केला आणि जीएंवर सुभाषचं पुस्तक मौज करणार आहे असं स्वत:च जाहीर करून टाकलं.

मी नुस्ता पाहत बसलो होतो मख्खासारखा!

पुढे सुनीताबाईंनी माझं ते दिव्य अक्षरातलं हस्तलिखित आपल्या ताब्यात घेतलं आणि माझ्या पुस्तकाचं बाळंतपण एकहाती निभावलं.

अशा! प्रेम करतील तर तेही असं करारी!!

एकदा मला दुपारीच फोन आला. मला म्हणाल्या, ‘‘अरे चित्रकारा, आज संध्याकाळी मी बालगंधर्वमध्ये बोरकरांच्या कविता वाचणार आहे. येतोस का माझ्याबरोबर!’’

मी उडी मारून म्हणालो, ‘‘म्हणजे काय? येईन की!’’

ठरल्या वेळी सुनीताबाई गाडी घेऊन मला न्यायला आल्या. आम्ही दोघेच गेलो. बालगंधर्व खचाखच भरलेलं. त्या भल्या प्रशस्त स्टेजवर काही म्हणता काही प्रॉपर्टी नाही. चौकोनी ठोकळ्यांची एक काळी बैठक आणि समोर एक माईक. एवढंच!! ना लाइट्सची जादू, ना संगीत, ना ड्रेपरी.. काही म्हणजे काहीच नाही. आणि समोर ही गर्दी! पहिल्या रांगेत बसून मी आपला काळजीत.. कसं होणार या बाईंचं? त्यात कविता अशा जाहीरपणे वाचतात ते मला कधी आवडायचं नाही. कविता ही खाजगी गोष्ट.. ती एकटय़ाने एकटय़ापुरती वाचायची असते असं मला वाटे. अजूनही वाटतं. त्यामुळे मी कधी कवितावाचनाच्या वाटेला गेलोच नव्हतो.. आणि बालगंधर्वमध्ये तर लोकांचा समुद्र उसळलेला.

पडदा बाजूला झाला- तर समोर गोऱ्या, लखलखत्या, तेजस्वी सुनीताबाई! काळ्या पडद्यासमोर एक शुभ्र ताठ रेघ. माईकसमोर बसलेली. उगीच मान वेळावणं नाही, गळेपडू प्रास्ताविक नाही. थेट कविताच. बोरकरांच्या. एकामागून एक. जादू उलगडत जावी तशा. ते अनपेक्षित लाघव मला पेलवेना. मी खुर्चीत थिजून गेलो. त्या संध्याकाळी अख्खं बालगंधर्व बोरकर नावाच्या लाटेवर उसळून ओसंडून जात राहिलं.. एका साध्या माईकच्या समोर बसलेल्या त्या शुभ्र, ताठ रेघेने हा उसळता दर्या एकटीने उभा केला होता!!!

कार्यक्रम संपवून परत निघालो. गाडीत मी गप्प. दातखीळच बसल्यासारखी झालेली. हे आपण काय पाहिलं, ऐकलं, अनुभवलं; माझं मलाच उलगडत नव्हतं. सुनीताबाईंनी विचारलं, ‘‘काय? कसं वाटलं तुला? जमलं का रे आज?’’

मी म्हटलं, ‘‘बाई, तुम्ही काहीतरी अद्भुत उभं केलं होतंत आज. मला काही सुचत नाहीये कसं सांगू तुम्हाला ते. मी तुम्हाला एक पत्र लिहून कळवीन!’’

म्हणाल्या, ‘‘चालेल चालेल! पण नक्की लिही बरं का! टांग नको देऊस!’’

मी म्हटलं, ‘‘नक्की लिहितो!’’

भेटी होत राहिल्या. स्नेह जडला होताच; तो अधिक घट्ट झाला. सुनीताबाईंशी भांडण काढायची भीती अशी कधी नव्हतीच. पण वादविवाद झाले की मजा यायला लागली.

हळूहळू मी कामात अधिक बुडत गेलो. प्रवास वाढले. त्यांच्यामागेही अनेक व्यवधानं होती. शिवाय नवनवी व्यवधानं लावून घेण्याची असोशीही होती.

एव्हाना महाराष्ट्रदेशी आणि परदेशीही पुलं आणि सुनीताबाई हे एक मिथक तयार झालं होतं. गोतावळा, गोष्टी, कथा, दंतकथा सगळ्याला पूरच येत गेला. मी त्यापासून लांब होतो.

त्यातच केव्हातरी सुनीताबाईंनी एक पुस्तक लिहून मराठी वाङ्मयाच्या चिमुकल्या वर्तुळात बॉम्ब फोडला. ‘आहे मनोहर तरी’! मी वाचलं आणि बाजूला ठेवलं. माझा अपेक्षाभंग झाला होता. म्हटलं, मुद्दाम कशाला सांगायला जा?

पण सुनीताबाईंचा कधीतरी फोन आलाच. त्यांना माझ्या प्रतिक्रियेची उत्सुकता होती. मी म्हटलं, ‘‘असं फोनवर नाही, पुण्यात भेटायला येतो. माझ्यासाठी चहा टाका तुम्ही. मग सांगतो.’’

गेलो.

विषय त्यांनीच काढला. कसं वाटलं सांग म्हणाल्या. समोर पुलं बसलेले. आता आली का पंचाईत!

पण म्हटलं, असतील! खरं बोलायला आपलं काय जातं?

सुनीताबाईंना म्हटलं, ‘‘ते तुमचं कौतुक वगैरे होतंय ते सगळं ठीक आहे हो.. पण रात्री उशिरा मैफल रंगात आलेली असताना कुमार गंधर्वाना साधा चहा हवा होता, तर तुम्ही नाही म्हणजे नाही दिलात, हे काही मला आवडलेलं नाही!’’

त्या उसळून म्हणाल्या, ‘‘अरे, पण कुमारला रात्री दुधातून औषध द्यायचं होतं; म्हणून नाही दिला मी चहा! लिहिलंय की त्यात!’’

‘‘तेच- कशाला लिहिलंय म्हणतो मी!’’ मी मागे हटायला तयार नव्हतो. पुलंचं अख्खं आयुष्य ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीची एवढी प्रदीर्घ कहाणी आहे, ती तुमच्यादेखत घडली. तुमच्या काळातली आकाशाएवढय़ा उंचीची अनेक माणसं तुमच्या आयुष्यात, घरात राहून, वावरून गेली. अनेक प्रसंगांना, गप्पांना, महत्त्वाच्या वादविवादांना तुम्ही साक्षी होतात. हे सगळं नोंदवणारी, टिपू शकणारी, त्याचं महत्त्व माहिती असणारी प्रखर बुद्धिमत्ता तुमच्यापाशी होती; तर तुम्ही त्यातलं काहीही न लिहिता पुलंनी कपाटात ठेवलेल्या शर्टाच्या घडय़ा मोडून त्यांची इस्त्री कशी विस्कटली, हे इतकं सामान्य काहीतरी कसं काय लिहिता तुमच्या पुस्तकात? याला काही अर्थ तरी आहे का?’’

मी सुटलो होतो.

मला मध्ये मध्ये अडवत त्या म्हणत, ‘‘अरे, मला काही डॉक्युमेंटेशन नव्हतंच मुळी करायचं. मी वेगळ्या दृष्टीने लिहिलं आहे हे!’’

त्या खुलासे देत राहिल्या, मी त्यांच्याशी भांडत राहिलो.

‘‘तुमच्या इतक्या श्रीमंत आयुष्यातल्या इतक्या महत्त्वाच्या माणसांबद्दल, घटना-प्रसंगांबद्दल न लिहिता तुम्ही हा असला कचरा का भरलाय पुस्तकात? मराठी माणसांच्या पुढल्या पिढीला कशी कळणार ही श्रीमंती? तुमच्याशिवाय कोण सांगणार आम्हाला? का नाही सांगितलं तुम्ही? का नाही लिहिलं?’’

शेवटी आम्ही दोघंही थकलो आणि विषय संपला. पुलं मंद हसत आमची ही कुस्ती शांतपणे बघत बसलेले होते.

सुनीताबाईंनी माझ्यासाठी चहा टाकला.

मग मध्ये काही र्वष गेली.

मग तर पुलंही गेले.

सुनीताबाई एकटय़ा पडल्या. त्यांच्यात शिगोशिग भरलेली तेजस्वी, चमचमती जादू मग मंदावतच गेली.

असाच केव्हातरी त्यांना भेटायला गेलो होतो पुण्यात. घर बदललेलं. सुनीताबाईही पूर्वीच्या नव्हत्याच उरलेल्या.

मला तिथे त्यांच्यासमोर बसवेना.

मी सहज म्हटलं, ‘‘आज चहा नको मला!’’

तर त्या खोल हसून म्हणाल्या, ‘‘अरे चित्रकारा, मी कुठून देणार आता तुला चहा? मला नाही जमत रे पूर्वीसारखा! चहासुद्धा नाही जमत आता!!’’

त्यांच्या जवळ जाऊन मी एक हलकी मिठी मारली आणि निघालो.

डोळे भरून आले होते. सुनीताबाईंच्या नजरेतली अजूनही अखंड तेवणारी मऊ धार लखलखताना दिसली, ती शेवटची!

मग त्या गेल्याच.

त्यांना कबूल केलेली एक गोष्ट मी शेवटपर्यंत केली नाही. बालगंधर्वमधली त्यांची कवितावाचनाची मैफल मला किती आवडली, हे त्यांना कळवणारं पत्र लिहिणार होतो मी. नाही लिहिलं.

आज सांगतो..

सुनीताबाई, त्या संध्याकाळी तुम्ही जे जादूचं जग उभं केलं होतंत, ते माझ्या मनातून आजतागायत विझलेलं नाही...

-सुभाष अवचट
लोकरंग
लोकसत्ता
24 Jan 2012

Saturday, April 11, 2020

तेजस्वी सुनीताबाईंविषयी...

सुनीताबाई.. काही मोजके साहित्यप्रेमी वगळता त्या आता जणू सर्वांच्या विस्मरणातच गेल्याहेत. मंगला गोडबोले यांच्या " सुनीताबाई" या पुस्तकानं त्यांच्याबाबतच्या विचारांना चालना दिली. त्यानिमित्ताने हे लेखन....

पु.ल. देशपांडे या खेळिया ची ही अर्धांगिनी. त्यांच्याइतकीच कर्तृत्ववान, त्यांच्यारखीच प्रतिभावान अन् त्यांच्यापेक्षा सामर्थ्यवानही!
सुनीताबाईंचं सामर्थ्य अनेक बाबतीत लख्ख जाणवणारं आहे. एका चांगल्या घरची ही मुलगी पुढे बेचाळीसच्या चळवळीत भूमिगत क्रांतिकारक/ कार्यकर्तीचं काम धडाक्यात अन् जबाबदारीने पार पाडते. नंतरच्या आयुष्यात जेव्हा स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनचा मुद्दा येतो तेव्हा नया पैसा घ्यायलाही नाकारत म्हणते, " देशसेवा हे माझं कर्तव्य होतं. मी केलं. ती काय नोकरी नव्हती पेन्शन घ्यायला." खोटे दाखले जोडून जेव्हा काहीजणांकडून आयुष्यभर पेन्शन मिळवली जाते तेव्हा असं करणा-या सुनीताबाईंचं तेजस्वीपण अधिक तळपदारपणे समोर येतं.

त्यांचा सर्वत्र संचार असाच होता हे अनेकजण सांगतात. खरंतर आम्ही जरा कुठे वयात आलो, चार गोष्टी उमगू लागल्या तेव्हा हे दोघंही उतारवयात होते. बहुतेक सर्वच कार्यक्रम बंद झालेले. क्वचित कुठेतरी भाषणाला पु. ल. जात असायचे. आमच्या चिपळूणच्या वाचनमंदिराच्या इमारतीचा जीर्णोध्दार झाला तेव्हा पुलंनी केलेलं भाषण ऐकलेलं. तितपतच त्यांचा वावर उरलेला.


त्यामुळे माझ्या पिढीला पु.ल.- सुनीताबाई भेटले ते मुख्यत: पुस्तकांतून, आॅडियो- विडियो रेकाॅर्डिंग्ज मधूनच.

" आहे मनोहर तरी.." मधून किंवा " जीएंच्या पत्रसंवादातून" सुनीताबाई सामो-या आल्या होत्याच. तर नंतरच्या काळात सोयरे सकळ किंवा मण्यांची माळ सारख्या पुस्तकांतूनही. मात्र त्यापेक्षा जास्त ठसठशीत असं त्यांचं दर्शन जे घडलंय ते इतरांच्या लेखनातून.


***

बहुतेकांच्या लेखनात त्यांचं कठोरपण, करारीपण, बारीक बारीक तपशील पहाण्याची काटेकोर नजर व छानछोकीत न रमलेलं साधेपण जाणवतंच. त्या पलीकडे जात आपल्या नव-याला जपणारी, त्याचं कलाविश्व फुलतं रहावं म्हणून अनेक गोष्टी सांभाळणारी, प्रसंगी बदनामी स्वीकारायला तयार अशी जी खमकी स्त्री दिसते ती भन्नाट आहे.


त्यात परत गंमत अशी की त्यांनाही प्रतिभेचं वरदान आहे, त्यांच्याही अंगी उत्तम अभिनयक्षमता आहे, त्यांच्याही लेखणीवर सरस्वतीचा वरदहस्त आहे तरीही कोणतीही ईर्षा न बाळगता, त्या स्वत:चं सगळं बाजूला सारुन नव-याला फुलू देतात. तेही पुन्हा युगायुगांच्या सोशिक स्त्रीमूर्तीसारखी न बनता..! प्रसंगी नव-याला लेखनातल्या चुका परखडपणे सुनावतात. कित्येक गोष्टी पुन्हा लिहायला उद्युक्त करतात.

नव-याच्या सवयींचे लाडकोड पुरवताना त्याच्यासोबत अनेक कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवतात. प्रसंगी कौतुकाची अपेक्षा न करता, झालेल्या कौतुकानं शेफारुन न जाता नवनिर्मितीचा ध्यास बाळगतात.

हे सारं करताना त्यांच्यातलं गृहिणीपण कधीही सुटत नाही. म्हणूनच पैसा असो वा ओढग्रस्तीचे दिवस, त्या सगळ्या गोष्टी निगुतीनं निभावून नेतात. परत काहीही करताना तडजोड करत कसंतरी न उरकता केलेल्या प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम दर्जा जपायची अथक धडपड करतात.


मंगला गोडबोलेंच्या पुस्तकात या सर्व गोष्टी जाणवू देणारं मग बरंच काही दिसत रहातं.

उदा. हे पत्र पहा.. मोहन ठाकूर हे बंधू त्यांच्या पत्रात सुनीताबाईंविषयी लिहितात,

" माईच्या काटकसरी रहाण्याची आम्ही काहीजण खूप चेष्टा करायचो. उधळपट्टी न करण्यामागे तिचा एक उद्देशही होता. सांसारिक गरजा अधिक असल्या की मग त्या भागवण्यासाठी पैसे कमवायचे आणि ते कमवण्यासाठी काही न काही तडजोडी करायच्या. भाईंना आपल्या आयुष्यात अशा कोणतीही तडजोड करायला लागू नये यासाठी माईच्या काटकसरी वागण्याचा खूप फायदा झाला.

पुढे जेव्हा स्वकष्टार्जित पैसे मिळू लागले तेव्हासुध्दा जास्ती पैसे आले तर ते समाजकार्याला खर्च करावे पण स्वत:च्या गरजा विनाकारण वाढवू नये हा दोघांचाही स्वच्छ उद्देश राहिला.."


हे समाजकार्य करतानाही सुनीताबाईंनी कधी स्वत:चा उदोउदो केला नाही हे मला फार महत्वाचे वाटते. आजकाल पतीची ऐपत, त्याची पदं, त्याची प्रतिष्ठा इतकंच नव्हे तर मुलांची शाळा त्यांच्या अॅक्टिव्हिटीज याबाबत कित्येकजणी इतकी फुशारकी मारत असतात की ऐकायचा वीटच येतो. त्याचवेळी सुनीताबाईंचं हे निस्पृह वागणं मनाला भिडतं. त्या बहुतांश कार्यक्रमात कधीही स्टेजवर पुलंसोबत बसल्या नाहीत. इतकंच नव्हे तर निमंत्रण पत्रिकेतदेखील आपलं नाव येणार नाही याची दक्षता अनेकदा घेत राहिल्या. ज्या अनेक संस्थांना लाखो रुपये ' पु ल देशपांडे प्रतिष्ठान' मार्फत दिले गेले तिथे कुठेही आपलं नाव येऊ नये यासाठी सजग राहिल्या.

अपवाद काही 2, 3 संस्थांच्या वेगळ्या कार्यक्रमांचा.


एक वेगळा प्रसंग मंगलाबाईंनी नोंदवलाय तो खरंच कौतुकास्पद.


"रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलला 100 वर्षं झाल्याबद्दल त्यांनी एक वैयक्तिक धनादेश दिला. मात्र ते पैसे कोणताही वर्ग किंवा अन्य काही बांधायला नव्हे तर शाळेच्या परिसरातील मुलींच्या प्रसाधनकक्षाच्या बांधकामाला दिले. आज अनेक शहरातील बहुतेक सर्व शाळांमधली प्रसाधनगृहं ही अस्वच्छ, गलिच्छ असतातच. मात्र त्यासाठी कुणीच मदत करत नाही. सुनीताबाईंचं मोठेपण यासारख्या कृतीतून ठळकपणे नजरेत भरतं. इतकंच नव्हे तर त्यांनी मुद्दाम आपल्या देणगीचा फलक त्या प्रसाधनगृहावर लावायला सांगितला व हे पाहून आता इतरही लोक याचे अनुकरण करतील हे सूचित केले."

आपण एकट्यानं दान देऊन फार मोठा फरक पडणार नाही पण त्यामुळे इतरांच्या मनात दानाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी त्यांची धडपड असायची.


***

सुनीताबाईंचे विचार व आचार यात कधी तफावत नसायची. त्यांचे तिखट विचार त्या स्वत: आधी आचरणात आणून दाखवायच्या. अगदी देवपूजा, कर्मकांडांचंच उदाहरण घ्या ना.

त्यांना स्वत: ला कधीच दैववाद मंजूर नव्हता. आयुष्यात कधीही त्यांनी देवपूजा केली नाही. मात्र याबाबत इतरांचे स्वातंत्र्य कधी नाकारले नाही. ' वा-यावरची वरात' च्या काळात त्यांच्याकडे गफूर नावाचा एक मदतनीस होता. प्रयोगापूर्वी नारळ फोडणे, धूपदीप करणे हे त्याला गरजेचं वाटे. त्याला सुनीताबाईंनी कधीच हरकत घेतली नाही. तसंच सहवासात आलेल्या पं. मल्लिकार्जुन मन्सूर, साधनाताई आमटे, विजया राजाध्यक्ष आदि स्नेह्यांची पूजापाठाची वेळ, त्याची साधनं हे सांभाळत राहिल्या.

पुलंचे आजारपण असो किंवा तत्पूर्वीच्या आयुष्यातील अनेक अडचणीचे दिवस असोत त्या नेहमीच प्रयत्नवादी राहिल्या. कधीही नवसायास, पूजापाठ करत राहिल्या नाहीत.


आपल्या कर्तव्यात कधीही कुचराई करत राहिल्या नाहीत.

पुलंच्या मातुश्री लक्ष्मीबाई एका पत्रात म्हणतात की, " सुनीता खंबीर आहे म्हणून भाई आहे. नाहीतर त्याची परवड झाली असती. सिनेमाच्या दिवसात भाई रात्रीचं शूटिंग करुन पहाटे चारला घरी यायचा. तेव्हा सुनीता तोवर उपाशी असायची. रात्री दोन नंतर स्वैपाक सुरु करायची, चारला नव-याला जेवायला गरमगरम वाढून मगच स्वत: जेवायला बसायची."

हे करणा-याही सुनीताबाईच असतात !


गृहिणीपण त्यांना मनापासून आवडत असे. साधी भाजी चिरतानाही त्यात नीटनेटकेपणा असे. त्यांनी वाटण केल्यानंतर पाटा वरवंटा किंवा जेवल्यानंतरचं ताट ही पहात रहावं असं असे. किचनमधली प्रत्येक वस्तू जागच्या जागीच असायच्या. अगदी तसंच प्रत्येक पदार्थाची चवदेखील. कोणत्या पदार्थात काय घालायचे याबाबत त्या नेहमीच दक्ष असायच्या. तो पदार्थ चविष्ट बनवतानाच त्या पदार्थाचं रुपही देखणं असावं यासाठी बारीक सरीक काही करत रहायच्या.


सुनीताबाई स्वत: स्वतंत्र प्रतिभेच्या व्यक्ती होत्या. मात्र बिजवर अशा पुलंच्यासोबत प्रेमाचा संसार सुरु केल्यावर त्यांनी पुलंमधला खेळिया फुलवत ठेवायला जणू स्वत:च्या आवडीनिवडींना बाजूला ठेवलं.

डोळ्यात तेल घालून पुलंवर लक्ष ठेवलं.


पुलंचे एकपात्री प्रयोग हे तसे दमछ्क करणारेच. सुनीताबाई तेव्हा पटकन् घेता येईल इतकं घोटभर पाणी घेऊन विंगेत उभ्या रहात. रंगमंचावरच्या एखाद्या गिरकीत पटकन् पुलं तिथं येऊन ते घोटभर पाणी पिऊन पुढचा खेळ रंगवत, समोर प्रेक्षकांना याचा पत्ताही लागत नसे!


पुलंच्यात असामान्य प्रतिभा नक्कीच होती मात्र त्याचे थक्क करणारे प्रकट आविष्कार तसंच पुलंचं अष्टपैलू असं जे व्यक्तित्व आपल्यासमोर उभं राहिलं त्यामागे सुनीताबाईंच्या अथक परिश्रमांचा, पूर्वतयारीचा मोठा भाग आहे. ज्याकडे कधीच दुर्लक्ष करता येणार नाही.


हे सांभाळताना त्यांनी त्यांच्यातली लेखिका जरुर जागवत ठेवली मात्र स्वत: ला कधी लेखिका म्हणवून घेतलं नाही. त्या नेहमीच स्वत:च्या जाणिवांविषयी लिहीत राहिल्या. निसर्ग, माणूस, पशु पक्षी, झाडं- पानं फुलं अन् अनेक अनुभवांविषयी लिहीत राहिल्या. त्या नेहमीच स्वत: ला वाचक, एक रसिक मानत राहिल्या.

आयुष्यभर अनेक मानसन्मान, गौरव, कौतुकसोहळे करवून घेणं त्यांना सहज शक्य होतं. मात्र त्यांनी सदैव एकटेपण स्वीकारलं. पुलंच्या निधनानंतर मोजक्या व्यक्ती सोडल्या तर बहुतेकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. मात्र त्याचा त्यांना कधीच विषाद नव्हता. किंबहुना हे असंच घडणार यासाठी जणू त्यांची मानसिक तयारीच होती.


आयुष्याच्या अखेरच्या दिवसातही त्यांनी शांतपणे सगळ्याची तयारी ठेवत स्वत: ला चार भिंतीतच ठेवलं. अखेरच्या क्षणांपर्यत त्यांच्या सोबतीला राहिली त्यांची लाडकी कविता.


कवितेवर त्यांचं इतकं प्रेम की शेवटच्या काही दिवसात माणसांशी बोलणं, ओळखणं कमी झालं तरी कवितेविषयीची जाणीव लख्ख जागी राहिली. पडल्यापडल्या त्या कित्येक कविता पुटपुटत राहिल्या. कधी आरती प्रभूंची, कधी बोरकरांची, कधी मर्ढेकरांची....त्या कवितेनं त्यांची खरंच अखेरपर्यंत सोबत केली.

एक तेजस्वी, कणखर, बाणेदार अशी स्त्री चंदनासारखी आयुष्यभर झिजत राहिली अन् शांतपणे अनंतात विलीन झाली.

आज अनेक वर्षांनी त्यांच्याविषयी वाचताना ही किती थोर बाई होती या जाणिवेनं ऊर भरुन येतो. त्यांच्या आयुष्यातील कळालंल्या, न कळालेल्या अनेक जागा मग मनात आठवत राहतात...


कधी सुखावतात... कधी अस्वस्थ करतात.

- सुधांशु नाईक(९८३३२९९७९१) , कोल्हापूर. 🌿

( टीप :-
१) मंगला गोडबोले यांच्या पुस्तकाअखेरीस असलेला अरुणा ढेरे यांचा दीर्घ लेख खास जपावा असाच. पुस्तक विकत घेऊन अवश्य वाचा.
२) घरात बसून राहिल्यामुळेच हे असं लेखन शक्य होत आहे. त्यामुळे कोरोना संकटाचा मी तरी ऋणी आहे. )

Monday, November 18, 2019

गृहिणी-सखी-सचिव

“ काऽऽय हो ? काय म्हणताय ?” असा परिचित आवाज मला माझ्या नव्या लॅंडलाईनच्या रिसीवर मधून ऐकू आला आणि मला एकदम हुश्श झाले. म्हणजे ते दोघेही पुण्यातल्या त्यांच्या घरीच होते. मी पुण्यातच, गावातून कोथरूडला राहायला आलो होतो. माझ्याकडे नुकताच दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दूरध्वनी आला होता. आणि चक्क सुरूही झाला होता. मोबाईलचा जमाना इथे सुरू व्हायचा होता अन लॅंडलाईनला अजून महत्व होते. पहिलाच कॉल कोणाला करायचा तर तो मी १, रूपाली ७७७, शिवाजीनगर, पुणे येथे केला होता. अर्थातच सर्वांचे लाडके व्यक्तीमत्व असलेल्या पु लं च्या घरी. त्यांच्या ३३४६२८ या नंबरवर, दिवस होता १४ ऑगस्ट १९९६. पलीकडून सौ. सुनीताबाई देशपांडे बोलत होत्या. त्यांचा नेहमीच बोलताना येणारा “ काऽऽय हो ” चा आवाज मी झोपेतून उठवले तरी त्यावेळीही सहज ओळखू शकलो असतो. मी त्यांना नवीन फोनबद्दल सांगितल्यावर त्या क्षणी त्या म्हणाल्या – “ थांबा हं .... मी तुमचा नवीन नंबर डायरीत नोंद करून ठेवते.” त्यांनी लगेच तशी नोंदही केली आणि मगच रिसीवर भाईंच्याकडे सोपवला.

मी साधारण १० वीत असल्यापासून आठ नोव्हेंबरला न चुकता पु लं च्या घरी त्यांना शुभेच्छा द्यायला जात होतो. नंतर शिक्षण संपवून मी औद्योगिक प्रकाशचित्रणाचा व्यवसाय सुरू केला. आवड म्हणून संगीत क्षेत्रातील नामवंतांच्या भावमुद्राही टिपायला सुरुवात केली. माझी ती आवड त्या दोघांच्या नजरेतून सुटती तरच ते नवल. मग मला ते वेगवेगळ्या घरगुती मैफिलींची निमंत्रणे आमच्या वाड्यातील श्री. हर्डीकर यांच्या फोनवर देत असत. कधी त्यांचे फोटोचे काही काम असे. मी ते त्वरेने करीत असे. त्यामुळे वेळोवेळी मला त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळे. कधी माझ्याजवळ कॅमेराही असे. पण बऱ्याच दिवसांच्या परिचयानंतर मला हे उमगले होते की – पु लं ना फोटो काढून घेण्याचे वावडे नव्हते पण सुनीताबाई मात्र फोटो काढून घ्यायला विरोध करीत. त्यातून त्या दोघांचा फोटो काढलेला त्यांना अजिबात खपत नसे. याचं कारण त्या सर्वसाक्षीलाच माहित. पण मी मात्र मनाशी ठरवून टाकलं होतं की ते दोघे असताना, मग ते त्यांच्या घरी असोत की एखाद्या कार्यक्रमात, मी कॅमेरा बॅगमधून बाहेरच काढत नसे. अगदी पु लं च्या जन्मदिनाच्या निमित्तानेही मी तसा फोटो कधी काढला नाही. पण प्रत्त्येक जन्मदिनी येणाऱ्या पाहुण्यांचे अगत्याने स्वागत करणे, त्यांच्या हातावर लगेचच पेढा ठेवणे, कोणी फुले आणली असतील तर तो गुच्छ सोडवून आधी आलेल्या व त्यांनीच सुंदरतेने खोलीत मांडून ठेवलेल्या त्या पुष्परचनांत ती नवी फुले अलगद खोवून ठेवणे, मधेच कोणा महत्वाच्या व्यक्तीचा फोन आला तर तो घेऊन उत्सवमूर्तीला आणून देणे, जमलेल्या गप्पांमध्ये एखाद्या घटनेचा संदर्भ तारीख-वार सांगणे व ही सर्व कामे उत्साही आणि हसतमुख चेहऱ्याने करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते सुनीता पुरुषोत्तम देशपांडे.

माझं भाग्य असं की मी पु. ल. आणि सुनिताबाईंच्या स्नेहशील परिवारातलाच झालो होतो. सुनिताबाई जितक्या स्पष्टवक्त्या, व्यवहारी तेवढ्याच सहृदय, आतिथ्यशील होत्या. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे हे दोन्ही पैलू मी अनुभवले. साधेपणा हा तर एका वेगळ्याच लेखाचा विषय ठरेल. त्याचा एक अनुभव मला आला. दिनांक ८ नोव्हेंबर १९९८. पु ल ऐंशीव्या वर्षात पदार्पण करणार होते. लेखकाचा वाढदिवस कसा साजरा व्हावा? त्याच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनाने? हे तर उत्तमच. आणि त्या दिवशी तर पु लं च्या पुस्तकाच्या बरोबरच सुनिताबाईंच्या पुस्तकाचेही प्रकाशन होणार होते. पु लं चे ‘आपुलकी’ हे पुस्तक तर सुनिताबाईंचे ‘सोयरे सकळ’. त्यांच्या मालती-माधव या भांडारकर रोडवरील घराच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये हा छोटेखानी समारंभ होता. त्यावेळी पु. ल. व्हीलरचेअरवर होते. दुसऱ्या कोणी व्यक्ती असत्या तर अशा कार्यक्रमाला उंची असे कपडे आणि झगमगाट नक्कीच दिसला असता. पण इथे तर उत्सवमूर्तींनी अतिशय साधे कपडे घातले होते. पु ल साध्या खादीच्या बंडीत आणि पायांवर शाल पांघरलेले. तर सुनीताबाई जांभळ्या रंगांची फुले असलेली सुती साडी नेसलेल्या. डामडौल नसलेला पण दोन महनीय व्यक्तींचा असा कार्यक्रम.

सुनिताबाईंचे दोघे बंधू व इतर कुटुंबीय, साक्षेपी संपादक श्री. पु. भागवत, मधुभाऊ गानू, शांताबाई शेळके, ज्योत्स्नाबाई भोळे, राम गबाले, भक्ती बर्वे अशा काही मंडळींची आवर्जून उपस्थिती आणि या सगळ्यांचे स्वागत करीत होते रामभाऊ कोल्हटकर. सगळेच एकमेकांना परिचित. त्यामुळे गप्पांचा फड जमणे हे आलेच. काही वेळाने सुनिताबाईंनी सूत्रे हाती घेतली. त्यांनी दोन्ही पुस्तकांची पार्श्वभूमी कथन केली. पुस्तकांचे प्रकाशन अर्थातच ज्येष्ठ प्रकाशक श्री. पु. भागवत यांच्या हस्ते होणार होते. ‘आपुलकी’ चे प्रकाशन त्यांनी केले. ते पुस्तक पु लं नी ज्येष्ठ लेखक श्री. ना. पेंडसे यांना अर्पण केलेले. मग प्रकाशन झालं ‘सोयरे –सकळ’ चे. श्री पुं नी पुस्तकाचे मुखपृष्ठ जमलेल्या सर्वांना दाखवले. सुनिताबाईंच्या गाजलेल्या ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकानंतरचे हे दुसरे पुस्तक. त्यांनी ‘सोयरे –सकळ’ ची ती प्रत सुनिताबाईंच्या हातात दिली. याची अर्पणपत्रिका काय असणार? पु लं सकट सर्वांनाच उत्सुकता. त्या उत्सुकतेनी ते सुनिताबाईंकडे पाहत होते. सुनिताबाईंनी पहिले पान उघडले आणि पु लं समोर धरले. त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ‘सोयरे-सकळ’ हे पुस्तक सुनिताबाईंनी साक्षात पु लं नाच अर्पण केले होते. पु लं च्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली. सगळं वातावरणाच भावूक होऊन गेलं. त्या वातावरणात बदल घडवला तो ज्येष्ठ कवियत्री शांता शेळके यांनी वाचून दाखवलेल्या एका काव्याने. त्यानंतर परत सगळे एकमेकांशी बोलण्यात रंगले. त्या गप्पांच्या आवाजाने पार्किंग भरून गेले.

सुनिताबाईंनी टाळ्या वाजवत परत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आता त्या काय सांगतात याकडे सगळ्यांचे कान व लक्ष. त्या म्हणाल्या- “ जी गोष्ट आजपर्यंत कधीही घडलेली नाही अशी एक कृती मी आज आत्ता करणार आहे. तुम्ही सर्वजण त्याचे साक्षी असणार आहात. मी भाईला नमस्कार करते.” असे म्हणत त्यांनी पुढच्याच क्षणी पु लं ना वाकून नमस्कार केला. आयुष्यभर पु लं शी बरोबरीच्या नात्यानं वागणाऱ्या सुनिताबाईंच्या या कृतीनं सगळेच अचंबित झाले. वातावरणात एकदम शांतता पसरली. या शांततेचा भंग करीत पुढच्याच क्षणी पु लं नी मला हाक मारली व म्हणाले- “ सतीश, या घटनेचं प्रूफ मला हवयं. हा फोटो मला हवायं.” त्यांच्या या वाक्याने वातावरणातला तो ताण कुठल्याकुठे नाहीसा झाला. मग सुनिताबाईंनी परत एकदा वाकून पु लं ना नमस्कार केला अन तो क्षण मी कॅमेराबद्ध केला. आज त्या आठवणींनीही माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. इतकी मोठी ही माणसं अन किती साधेपणा.

जून १२, २००० ला पु. ल. अनंताच्या प्रवासाला निघून गेले. काही न काही कामानिमित्त माझं मालती-माधव मध्ये जाणं सुरूच राहिलं. भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या भावमुद्रा असलेल्या माझ्या पहिल्या थीम कॅलेंडरमध्ये मला पु लं नी माझ्या त्या प्रकाशचित्रांवर लिहिलेला अभिप्राय छापायचा होता. अभिप्राय होता – “या अप्रतिम छायाचित्रातून स्वर ऐकू येतात.” मी सुनिताबाईंना भेटलो. अभिप्राय मराठीत होता. कॅलेंडर इंग्लिश मध्ये. मी मित्राकडून त्याचं भाषांतर करून घेतलेलं. ते वाचल्यावर सुनिताबाई म्हणाल्या – “ हे भाषांतर फारच गद्य वाटतयं. मला जरा वेळ द्या. मी तुम्हाला याचं रूपांतर करून देते.” त्यांचा कवितांचा अभ्यास व प्रेम दोन्ही प्रचंड. संध्याकाळी चार वाजता मला त्यांचा फोन आला. म्हणाल्या- “ हं. घ्या लिहून. These excellent photographs create musical melodies in the minds.” ते समर्पक आणि काव्यात्मक रूपांतर ऐकून मी आनंदून गेलो. माझ्या त्या ‘म्युझिकॅलेंडर’ वर अवतरलेला पु लं चा तो अभिप्राय आणि त्याबरोबरच त्यांची स्वाक्षरी यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

सुनिताबाईंचा नेटकेपणा, त्यांची सौंदर्यदृष्टी ही नेहमी अनुभवास येत असेच पण माझ्या कायमच लक्षात राहील तो त्यांचा कोणत्याही गोष्टीतील अचूकतेचा ध्यास. ‘सोयरे-सकळ’ या पुस्तकानंतर त्यांचे प्रकाशित झालेले पुढचे पुस्तक म्हणजे ‘मण्यांचीमाळ’. ते प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी मी ते डेक्कन जिमखान्यावरून विकत घेतले. वेळ संध्याकाळची. तेथूनच मी त्यांना फोन केला. परत एकदा “ काऽऽय हो ? अशी त्यांची विचारणा. मी नुकतेच घेतलेल्या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी हवी आहे असे सांगितले. त्यांनी किती वेळात येऊ शकाल? असे विचारले. मी त्यांना म्हणालो- “ पाचच मिनिटात पोहोचेन. आत्ता डेक्कनवरच आहे.” आणि अक्षरशः पाच मिनिटात मी तेथे पोहोचलो. त्यांनी पुस्तकाचे पहिले पान उघडून सही केली “ सुनीता देशपांडे १५.१०.२००३.” मग इतर काही बोलणे झाले व मी लगेचच निघालो.

पुढच्याच दिवशी त्या छोटेखानी पुस्तकात मी पूर्ण गढून गेलो. एकतर मला त्यांची लेखनशैली अतिशय आवडे. व त्यांनी त्या पुस्तकात निवडलेले बारा लेखही अतिशय सुंदर. त्यातही ‘डोडी’ या त्यांच्या नातवाने पाळलेल्या आणि बराच वेळ त्यांच्याच घरात वास्तव्यास असलेल्या कुत्र्याविषयी लिहिलेला लेख फारच सुंदर. मी ते पुस्तक वाचत असतानाच मला सुनिताबाईंचा फोन आला. त्या म्हणाल्या – “ काल तुम्ही मण्यांचीमाळ या माझ्या पुस्तकावर सही घेऊन गेलात ना?” माझे उत्तर अर्थातच हो असे होते. त्या पुढे म्हणाल्या – “ उद्या तुम्ही ते सही असलेले पुस्तक परत घेऊन या.” मला काही उलगडाच होईना. पण काय बोलणार? मी त्यांच्या त्या म्हणण्याला होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी पुस्तक घेऊन त्यांच्या घरी हजर. त्यांच्या हातात मी ते पुस्तक दिले. काहीही न बोलता त्यांनी ते पुस्तक पूर्णपणे पान –अन – पान निरखून पाहिले. आणि मग माझ्या हातात परत दिले. आताही मला काही उलगडा होईना. मग त्यांनी कारण सांगितले- “ अहो, आज अजून एक गृहस्थ आले होते सही घ्यायला. त्या पुस्तकातील कागद खराब होता. त्यावर बरचसे काळे ठिपके होते. संपूर्ण पुस्तकभर ते ठिपके होते. आणि मग काही ठिकाणी अक्षरांवर एखादा ठिपका आला तर तो अनुस्वरासारखा दिसत असल्याने मजकुराचा अर्थच बदलत होता. मग मला तुमच्या पुस्तकावर केलेली सही आठवली. म्हणून मी तुम्हाला फोन केला. मी काही कॉपीही मागवून ठेवल्या आहेत.” पण सुदैवाने माझ्याकडची कॉपी स्वच्छ कागदाची होती आणि त्यामुळे सुनिताबाईंचे समाधान झाले होते.

अशी जागरुकता असलेले लेखक-लेखिका किती असतील? कोणी घेईल अशी तसदी? पण अशा व्यक्ती थोड्याच असतात आणि त्यांचा तो स्वभावच त्यांच्याबद्दल चुकीचे समज पसरवण्यास कारण ठरत असेल का?

काही व्यक्तींना एखादे काम कसेही झाले तरी ते फक्त होण्याशी मतलब असतो. काही व्यक्ती याच्यापेक्षा थोड्या पुढे असतात. त्यांना ते काम निगुतीने होण्यात थोडाफार रस असतो. त्यामुळे त्या कामात थोडं इकडं-तिकडं झालं तरी त्या ते चालवून घेतात. पण काही व्यक्ती अशा असतात की त्यांना एखादे काम त्याच्या नियोजित पद्धतीनेच झालेले आवडते उलटपक्षी ते तसेच व्हावे असा त्यांचा आग्रह असतो. आणि असं असण्याचा सगळा त्रास त्यांच्या वाटयाला येतोच. अशा व्यक्तींना ‘ए’ टाईप व्यक्ती म्हणतात असं एक डॉक्टर मला सांगत होते. पुस्तकाच्या पानांवर काळे ठिपके दिसल्याने व त्यातला एखादा ठिपका एखाद्या शब्दावर आल्याने अर्थ बदलतो म्हणून स्वतः सही केलेलं पुस्तकच बदलून द्यायला निघालेल्या सुनीताबाई या अशी व्यक्ती होत्या. त्या त्यांच्या सगळ्याच मतांशी अगदी ठाम असत. त्यापासून जरा देखील ढळत नसत. याचा अनुभव मला वेळोवेळी येत गेला होता.

माझ्या पहिल्या थीम कॅलेंडरमध्ये मला सहर्ष मदत करणाऱ्या सुनिताबाईंचा हा स्वभाव माहित असल्याने पुढच्याच वर्षी मी त्यांच्या घरी पोहोचलो ते ‘आनंदयात्री पु.ल.’ ही नवी थीम घेऊनच. त्यात मी काढलेली पुलंची प्रकाशचित्रे वापरणार होतो. त्याच्या पूर्वीच प्रकाशचित्रकार देवीदास बागूल आणि सुनीताबाई-पु.ल. यांच्यामध्ये फोटोंच्या स्वामित्व हक्कावरून तात्विक वाद बराच तीव्र झाला होता. बागुलांनी काढलेले पुलंचे फोटो पु. ल. सत्कार समितीने विनापरवानगी वापरल्याबद्दल त्यांनी पुलंशी पत्र व्यवहार केला होता. त्यात बागुलांबरोबर अनेक मान्यवरांच्या सह्या होत्या. मी बागुलांच्या स्वामित्वहक्काबाबतच्या भूमिकेशी सहमत होतो. या पत्रयुद्धात बागुलांना पाठिंबा देणारे महारथी हळूहळू मागे हटले आणि मी एकटाच बागुलांबरोबर राहिलो होतो.

पुलंच्या ‘चित्रमय स्वगत’ या पुस्तकासाठी सुनिताबाईंनी मी काढलेले काही फोटो मागितले होते. ते फोटो व त्याची परवानगी मी अतिशय आनंदाने दिली होती. पण मी बागुलांना त्यांच्या स्वामित्वहक्काबाबत दिलेल्या सहकार्याच्या भूमिकेमुळे थोडा तणावही होताच. तरीही प्रत्यक्ष समोरासमोरच्या भेटीत आदरातिथ्य, माझी विचारपूस करणे हे त्यांच्याकडून चुकले नव्हते. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता मी पुलंचे फोटो कॅलेंडरमध्ये वापरणार होतो. सुनिताबाईंची प्रतिक्रिया यावर कशी असणार याचाच मी विचार करीत होतो. माझे पुलंच्या त्या प्रकाशचित्रांचे एडिटिंगचे काम पूर्ण झाले होते. एकेदिवशी -“संध्याकाळी जरा वेळ ठेऊन घरी येऊ शकाल का?” असे विचारणारा सुनिताबाईंचा फोन आला. त्यावेळी त्यांच्या घरी त्यांचे एक स्नेही व मुंबईतील प्रसिद्ध प्रकाशचित्रकारही येणार आहेत हे त्यांनी मला सांगितले. मला कल्पना आली की ही बैठक नक्कीच ‘फोटोंचा कॉपीराईट’ याविषयी असणार आहे. मी संध्याकाळी ‘मालती-माधव’ या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो.

मला कल्पना होती की माझा सुनिताबाईंशी सामना होता आणि त्यांच्या बरोबर एक विख्यात, प्रथितयश व्यक्ती होती. विषय अवघड, संवेदनशील होता. स्वामित्व हक्काचा ! सुनिताबाईंच्या मते, मी काढलेल्या भाईंच्या फोटोंमध्ये माझ्याबरोबरच भाईंचाही कॉपीराईट आहे/होता. चर्चा सुरू झाली. त्या त्यांच्या आग्रहावर ठाम होत्या. मी त्यांना विचारले – “ तुम्ही फोटोग्राफी ही एक कला आहे असे मानता नां ?” त्यांचा अर्थातच होकार आला. मी म्हटले की, मी तुम्हाला चार प्रश्न विचारतो. त्यांच्या उत्तरानंतर मला तुमचे स्वामित्वहक्काविषयीचे मत सांगा. मी साक्षात ‘सरस्वतीपुत्राच्या’ घरीच बसलेलो. त्यामुळे असेल पण मला शब्द सुचत होते, बोलण्याचे धैर्य आले होते. मी प्रसंग उभा करू लागलो.

मी : “ मुंबईची गिरगाव चौपाटी आहे. वेळ संध्याकाळची आहे. निसर्गाची सुंदर प्रकाशयोजना आहे. सूर्यास्त होत आहे. मी हे दृश्य माझ्या कॅमेऱ्यात पकडले. या प्रकाशचित्राचा कॉपीराईट कोणाचा?”

सुनीताबाई : “ प्रकाशचित्रकाराचा म्हणजे तुमचा कारण निसर्गाला कॉपीराईट कुठे आहे?”

मी : या प्रकाशचित्रात काहीतरी कमी आहे असे मला वाटले. विचार करताच लक्षात आले की, यात मानवी अस्तित्व यायला हवे. मी खूप भाग्यवान. मला तेवढ्यात तेथे पु. ल. फिरायला आले आहेत असे दिसले. मी फ्रेम पकडून बसलो. काही क्षणातच माझ्या फ्रेममध्ये भाई आले. सूर्यप्रकाश भाईंच्या पाठीमागून असल्याने ‘सिल्ह्युट’ प्रकारचा उत्तम फोटो मला मिळाला. या प्रकाशचित्राचा कॉपीराईट कोणाचा?”

सुनीताबाई : “ तुमचा आणि भाईंचा.”

मी : “बरं ! आता मी इतका भाग्यवान नाही की, तेथे माझ्यासाठी भाई फिरायला यावेत. पण मला फोटोत मानवी अस्तित्व हवेच होते. तेवढ्यात तेथे एक कचरा गोळा करणारी छोटी मुलगी आली. मला मानवी अस्तित्वाबरोबरच एक हालचालही मिळाली. पुन्हा मला एक उत्तम फोटो मिळाला. या प्रकाशचित्राचा कॉपीराईट कोणाचा?”

सुनीताबाई : “ तुमचा ! कारण ती मुलगी कोणी सेलिब्रिटी नाही. पु. ल. हे सेलिब्रिटी आहेत.”

मी : “ सुनीताबाई, न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी आहे. ती लहान-थोर जाणत नाही. तिच्यापुढे सर्वांना समान न्याय आहे.”

माझा चौथा प्रश्न बाकी होता. समोर बसलेली विख्यात, प्रथितयश व्यक्ती माझ्या धाडसाने चकित झाली होती.

मी : “ मी फिल्मच्या छोट्याशा तुकड्यावर अभिव्यक्त होतो. तुम्ही लेखक लोक बुद्धी, पेन व कागद यांच्या साहाय्याने अभिव्यक्त होता. मी एखाद्याचा फोटो काढला तर त्याला व्यक्तीचित्र म्हणतात , तसेच तुम्ही एखाद्याबद्दल लिहिलेत तर त्यालाही व्यक्तीचित्रच म्हणतात. मग मला आता सांगा की ‘औक्षवंत हो मुली’ या लता मंगेशकर यांच्यावर लिहिलेल्या व्यक्तीचित्रावर भाईंचा व लता मंगेशकर यांचा कॉपीराईट हवा. कारण लता मंगेशकरही सेलिब्रिटी आहेत. मग तशी काही नोंद त्या पुस्तकात आहे का?”

माझ्या या चौथ्या प्रश्नाने त्यांना अंतर्मुख केलं. त्याचं कोणतंच उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. माझ्या युक्तिवादाने मी सुनीताबाईंना माझा मुद्दा पटवून देण्यात यशस्वी झालो होतो. ते ही कोणतीही कटूता न आणता. अर्थात या विषयाला अनेक कायदेशीर पैलू आहेत आणि तो मोठा विषय होऊ शकतो याची मला जाणीव आहे. पण सुनीताबाई आणि माझ्यातला हलकासा असलेला ताणही दूर झाला होता. त्यांनी खिलाडूपणे माझा कॉपीराईट मान्य केला होता. त्यांनी मला परत एकदा कॅलेंडरसाठी प्रचंड मदत केली. त्या नोव्हेंबर महिन्यात भाईंच्या जन्मदिनी ‘ आनंदयात्री पु. ल.’ हे कॅलेंडर प्रकाशित झालं. सुनीताबाई ते सर्वार्थाने निर्दोष कॅलेंडर पाहून हरखून गेल्या.


मी वरचेवर त्यांच्याकडे जात राहिलो. २००० साली माझ्याकडे पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा आला. बदलत्या तंत्रज्ञानाने ही नवी गंगा आणली होती. कधी-कधी या विषयी त्या बोलत–विचारत. एकदा चांगली संधी साधून मी त्यांना विचारले की – “ सुनीताबाई, मला तुमचा फोटोसेशन करायची इच्छा आहे. कधी करू या?” यावर त्यांचे उत्तर होते की- “ मला फ्लॅशचा त्रास होतो.” मी म्हणालो – “ पण मी तर फ्लॅश न वापरता फोटो काढीन.” यावर त्यांची पळवाट होती की - “माझे फोटो चांगले येत नाहीत.” मीही हट्टी मुलासारखा म्हणालो – “ आता डिजिटल कॅमेरा आहे. त्याच्या डिस्प्लेवर लगेचच आपल्याला फोटो बघायला मिळतो. मी तो तुम्हाला दाखवीन. तो जर तुम्हाला आवडला नाही तर आपण डिलीट करून टाकू.” यावर लगेचच त्यांनी उत्तर दिले की – “ मी हल्ली घरी साडी नेसत नाही. गाऊन घालते. म्हणून नको.” यावर मी निरुत्तर झालो. पण मनातला विचार काही लोपला नाही. पुढे काही वर्षे गेली. आणि २००८ च्या जुलै महिन्यात त्यांना जी. ए. कुलकर्णी प्रथम पुरस्कार जाहीर झाला. मला खूप आनंद झाला. आनंद दोन गोष्टींसाठी एक म्हणजे पुरस्कार मिळाल्याचा आणि दुसरं म्हणजे तो घेण्यासाठी का होईना सुनीताबाई सर्वांना सामोरं जाणार म्हणून. मी त्यांना अभिनंदन करण्यासाठी फोन केला. आणि म्हणालो – “ सुनीताबाई, पुरस्कार घेण्यासाठी आता तुम्ही साडी नेसणार असाल नां ? पुरस्काराचा कार्यक्रम झाल्यावर आता आपण फोटोसेशन करू शकतो की.” माझा हट्ट त्यांनी बेसावध क्षणी का होईना मान्य केला.

१० जुलै २००८ रोजी सकाळी मी त्यांच्या घरी पोहोचलो. पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला होता. मंडळी निवांत झाली होती. त्यांचा भाचा डॉ. दिनेश ठाकूर, त्यांची पत्नी सौ. ज्योती, बंधू डॉ. श्रद्धानंद ठाकूर, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे, महेश एलकुंचवार, दिलीप प्रभावळकर, डॉ. शिरीष प्रयाग, बापू कांचन आदी सुहृद गप्पांमध्ये रंगले होते. कोणीतरी त्यांना काही ओळी लिहून पाठवल्या होत्या. त्यात लिहिलं होतं – “ सुनीताबाई, आज तुमच्या सन्मानासाठी आम्हीच आम्हाला मिरवले आहे. कारण तुम्ही आहात हीच आमची श्रीमंती आहे. अशी एखादी व्यक्ती असते, की जी केवळ जीवनमूल्यांच्या आधारानं जगू पाहते. ही गोष्टच आम्हाला धीर देणारी आहे. तुमचं पुस्तक ‘आहे मनोहर तरी..’ वाचलं तेव्हा ही जाणीव आम्हाला पहिल्यांदा झाली. आणि एक व्यक्ती – कणखर, स्वयंसिद्ध व्यक्ती म्हणून कितीतरी बायकांना आणि पुरुषांनाही खूप दिलासा मिळाला.” जणूकाही तेथे आलेल्या प्रत्येकाचे मन हेच तर सांगत होते.

आधीच उत्तम ‘स्कीन कॉम्प्लेक्शन’ असलेल्या सुनीताबाईंच्या चेहऱ्यावरचे हसू जास्तच स्निग्ध झाले होते. मी काही अनौपचारिक असे क्षण कॅमेराबद्ध केले. पूर्वेकडच्या खिडकीतून येणारा प्रकाश हा एकमेव स्त्रोत. उत्सवमूर्तीला काही सूचना करता येतील अशी परिस्थिती नव्हती. त्या जेथे बसल्या होत्या त्याच ठिकाणी मला फोटो घेणे गरजेचे होते. मी कॅमेऱ्यावर टेली लेन्स लावली. त्यांच्या नकळत मी फोटोसेशन सुरूही केला होता. त्यांचे हावभाव, त्यांची नजर, त्यांचे हसू, हळूहळू एक एक फ्रेम ! पंधरा मिनिटात माझं काम झालं होतं. बऱ्याच वर्षांची माझी इच्छा फलद्रूप झाली होती.

मी त्या फोटोंचे एडिटिंग केले. परत एकदा त्यांना फोन केला. माझ्या लॅपटॉपवर मी त्यांना ते एडीट केलेले सर्व फोटो दाखवले. त्यांच्या चेहऱ्यावर परत एकदा हसू पसरले. त्यांच्या नकळत टिपलेल्या त्या भावमुद्रा पाहताना त्यांना परत एकदा त्या आनंदसोहळ्याचा अनुभव आला असेल का? चेहरा तर ते सांगत होता. मला आवडलेली खळाळून हसतानाची त्यांची भावमुद्रा त्यांनाही खूप आवडली. मग त्यांच्या डोळ्यांत पाणी का दाटून आले असेल? काहीच न बोलता त्या उठल्या. वॉकरला धरून हळूहळू चालत आत गेल्या. काही वेळात परत बाहेर आल्या. त्यावेळी त्यांच्या हातात चार कॅसेट्स होत्या. पुलंच्या कॅसेट्सचा संग्रह होता तो. “ तुम्ही खूप छान फोटो काढलेत माझे” असं म्हणत माझ्या जवळ येत त्यांनी तो संग्रह मला दिला. माझ्यासाठी अमूल्य भेट होती ती.

नंतर परत ते फोटो पाहताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी आश्चर्याने दंग झालो आणि सुनीताबाईंपुढे नतमस्तकही ! मी त्यांचे ‘सोयरे-सकळ’च्या प्रकाशनात १९९८ साली फोटो टिपले होते. बरोबर दहा वर्षानी पुरस्काराच्यावेळी त्यांनी परत तीच जांभळी फुले असलेली साडी नेसली होती. माणसाचा साधेपणा, व्यवस्थितपणा, किती असावा, त्याच्या गरजा किती कमी असाव्या याचा तो साक्षात्कार होता. पुलंसारख्या प्रतिभावान, सर्व गुण संपन्न व्यक्तीची पत्नी – गृहिणी, सखी व सचिव अशा रूपांत वावरताना हा साधेपणा जास्तच उजळून आला होता. जणू संत तुकाराम महाराजांनी अभंगात म्हटल्याप्रमाणे ‘जोडोनियां धन, उत्तम वेव्हारें, उदास विचारें वेच करी’ हेच साऱ्या आयुष्याचे ब्रीद या साधेपणातून आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या या भूतलावर आल्या असाव्या.


सतीश पाकणीकर
९८२३०३०३२०
https://www.facebook.com/sateesh.paknikar

Friday, June 13, 2008

एक पत्र भाईसाठी - सुनीता देशपांडे

पु.ल. गेल्यानंतर आलेल्या त्यांच्या वाढदिवशी सुनीताबाईंनी जागवलेल्या या पुलंच्या आठवणी... ' महाराष्ट्र टाइम्स ' च्या १२ नोव्हेंबर २००० च्या अंकातून पुनर्प्रकाशित

प्रिय भाई,

परवाच्या १२ जूनला तू गेलास. गेलास म्हणजे कुठे गेलास? दृष्टीआड गेलास म्हणावं, तर तसा तू अनेकदा दृष्टीआड होतच होतास. कधी पलीकडल्या खोलीत, तर कधी पलीकडल्या गावात किंवा पलीकडल्या देशातही. परवा गेलास तो पलीकडल्या जगात, एवढाच छोटासा फरक. एरवी तू तर या क्षणीही माझ्या डोळ्यांसमोरच आहेस. ऐकतो आहेस ना, मी काय सांगतेय ते?

आपण एकमेकांना पाहिलं, एकमेकांत गुंतत गेलो आणि दीड-दोन वर्षांनंतर, तुझ्या हट्टाखातर मी कायदेशीर लग्नबंधन स्वीकारलं. योगायोग म्हणावा अशी एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? आपण लग्न रजिस्टर केलं, तो दिवसही नेमका १२ जूनच होता. परवा कुणी तरी म्हणालं, 'भाईंचा जीव त्या १२ जून या तारखेसाठी घुटमळत होता.' लोक काहीही बोलतात. त्या दिवशी दुपारी एक वाजून बावीस मिनिटांनी तुझी प्राणज्योत अखेर मालवली, कुडीचा श्वासोच्छवास थांबला, हे झालं वेळापत्रक. पण खग्रास ग्रहणाचे वेध काही काळ आधीच लागले होते. तू अगदी केविलवाणा झाला होतास. डॉक्टरांनीही आशा सोडली होती. प्रयत्न फक्त चालू ठेवले होते. आजूबाजूची हवा खूप काही सुचवत होती; पण काहीच स्पष्ट सांगत नव्हती.

तुला ठाऊक आहे, आपल्या डॉक्टर दिवट्यांसारखाच हा आपला डॉक्टर प्रयागही एक देवमाणूस आहे. विज्ञाननिष्ठ, पण विज्ञानाच्याही चालू घडीच्या मर्यादा जाणणारा आणि म्हणूनच असेल, चमत्कारांवरही अविश्वास न दाखवणारं. त्यांचं सगळं हॉस्पिटलच तुझ्या एका प्राणासाठी धडपडताना पाहून मी म्हटलं, “डॉक्टर, पुरे आता.'' त्यांनी घाईघाईने उत्तर दिलं, “तुम्ही लक्ष घालू नका. Miracles can happen. आपण प्रयत्न करू."

Miracles! चमत्कार! होय, आजचे चमत्कार हे उद्याचं वास्तव ठरू शकतात.

आठवणी...आठवणी...आठवणी! भोगलेल्या रंगीबेरंगी सुखदुःखांच्या-हळुवार, फक्त आपल्या कानातच गुंजन घालणार्‍या, घरगुतीही आणि काही काळ वाजतगाजत राहणाऱ्या-रंगणाऱ्या, सार्वजनिकही, काही काSळ? छे छे! अनादी अनंत काळाच्या संदर्भात क्षणार्धाच्याही नव्हेत. कालप्रवाहात पाSर वाहून जाणाऱ्या. पण या क्षणी त्या जिवंत आहेत. याच घरात माझ्या सोबतीने वावरताहेत. घरातल्या माणसांप्रमाणेच त्या त्या घराच्या भितींनाही तिथे वास्तव्य करणारे रंग, गंध, स्पर्श आपले वाटत असणार. त्यांनाही ह्या साऱ्यांच्या आठवणी येतच असतील, तिथे रेंगाळणाऱ्या.

तुला आठवतंय? एके काळी मी संपूर्ण महाभारत वाचून काढलं होतं. 'व्यासोचिष्ट जगत्‌ सर्वम्‌' म्हणजे नेमकं काय, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या अल्पमतीच्या प्रमाणात त्या काळाशी क्षणभर एकजीव झालेही. हो, क्षणभरच म्हणायचं आज त्यातलं त्या आठवणींत कितीसं उरलंय? तपशील वाहून जातो, तत्त्वाचा अशा आपल्या अस्तित्वातच मुरतो. तो कितपत मुरलाय याचा अंदाज घ्यायचं म्हटलं, तरी त्यासाठीच्या वादविवादाला, सहमतीला किंवा विचारांच्या तफावती दाखवायलाही दुसरं कुणी तरी लागतंच ना?

समोर तू, प्रत्यक्षात अबोल असतास तरी तो अंदाज माझा मला घेता आलाही असता कारण तुला मुळी वादविवादात कधी रसच नसायचा. रस होता तो संगीतात, अभिनयात, मुख्यत: संभाषणात. या तिन्ही शेतमळ्यांतला सुगंध, ओलावा, तुझ्यात सहज मुरायचा. शेत पिकायला उपजत बी-बियाणं लागतं हे खरंच; पण असलं खतपाणीही लागतं. या दोन्ही गोष्टी तुझ्यात जन्मजातच होत्या. म्हणून तर तू आनंदाच्या बागा फुलवू शकलास, पण शेताला मशागतही लागते, पीक जोमदार यायला शेतमजुरांचा घामही तिथे गाळावा लागतो. हे तुला कळत का नव्हतं? पण श्रेय द्यायला तू कधीच राजी नसायचास.

अधूनमधून मी वादही घालत असे; पण उपयोग नसायचा. मी दु:खी व्हायचे, अनेकदा तुझा रागही यायचा. मीही अपरिपक्वच होते ना?

मग लक्षात यायला लागल, याची सगळी निर्मिती ही, उत्तुंग इमारती, मनोरे, कळस दोन्ही तीर साधणारे पूल यांचीच आहे. हसतखेळत केलेली. डोंगरकपारीत सुंदर लेणीही याला सहज कोरता येतात. त्यासाठी मातीच्या, दगड-धोंड्यांच्या स्पर्शाचा ध्यास असावा लागत नाही. त्यांचं अस्तित्व गृहीतच धरलं जातं.

पण मला ही अक्कल यायला तुझा जीवच पणाला लागायला हवा होता? शहाणपणा येण्यासाठी ही किंमत द्यावी लागणार, याची कल्पना असती तर आजन्म वेडीच राहायला तयार होते रे मी! गेल्या चोपन्न वर्षांत मी किती वाद घातले! आपण एकमेकांच्या सहनशीलतेचा अंतच पाहिला जणू! मी ऐकवत राहून; तू न बोलता. क्वचित एखादा शब्द बोलायचास, तोही अगदी चपखल बसणारा. तुझ्या अफाट शब्दसंपदेने मला प्रथमपासूनच मोहून टाकलंय, ती मोहिनी अखेरपर्यंत माझा ताबा सोडणार नाही, एवढी जबरदस्त आहे साधी 'उपदेशपांडे'सारखी मला दिलेली पदवीदेखील (खरं तर टोमणाच) मी डोक्यावर घेऊन मिरवलीच ना!

लहान मुलांशी खेळांवं, तसा शब्दांशी तू मजेत खेळायचास. ३०-३५ वर्षांपूर्वी “हसवणूक' हा संग्रह प्रकाशित झाला, त्या वेळी या नव्या संग्रहाचं नाव काय ठेवायचं? 'हसवणूक' की 'फसवणूक'?-हा प्रश्न पडला. दोन्ही नावं तूच सुचवलेली; पण मला निर्णय घेता येईना. तू पटकन 'हसवणूक' असं लिहून दिलंस आणि आनंदाने माझे डोळे पाणावले. या क्षणीही तो प्रसंग आठवताच पुन्हा मनाची तीच गत झाली आहे. 'जे आनंदेही रडते, दु:खात कसे ते होई?' हे कवी अमरच असतात बघ! मी उगाच सांगत नाही. हेही गोविदाग्रजच नाही का म्हणून गेले?

"फ आणि ह. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मधे पकडून नियतीने चालवलेली आपल्या साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली को, त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची 'हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं?' हे तूच लिहून ठेवलंयस. तुला ते जमलं, सर्वांनाच कसं जमणार?

फुलाच्या आसपास सुगंध दरवळतो, तसा तुझ्या आसपास आनंद दरवळत असायचा. "आनंदाचे डोही आनंद तरंग." म्हणून तर तू सर्वांना आवडायचास. तुलादेखील गर्दी खूप आवडायची आणि तीही सदैव तुझ्याभोवती गोळा व्हायची. ही देवघेव अगदी नैसर्गिक होती. झऱ्याचं पांथस्थाशी नातं असावं तशी. पण तुझ्या जीवनात मी आले ती अधूनमधून तरी एकान्ताची मागणी करत.

एकान्त म्हणजे पोकळी नव्हे. एकाकीपणाही नव्हे. आपण हतबल झालो की, पोकळी निर्माण होते,पण खंबीर असलो, तर आव्हानं तेवढी सामोरी येतात. त्यांना तोंड देणं सोपं नसतं हे खरं, पण शक्‍य असतं हेही खरं. स्वतःचं बळ आपण एकवटू लागलो की, हळूहळू त्याचा अंदाज यायला लागतो आणि त्या उत्खननात एखादी रत्नांची खाणही अचानक नजरेला पडू शकते.

तुला सार्वजनिक आपण प्रिय, तर वैयक्तिक 'मी'ची ताकद ज्याने त्याने अजमावायला हवी हा माझा अट्टाहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे, याचा प्रत्यय मला सतत येत राही, तर नेमकं त्याच गोष्टीचं विस्मरण तुला सतत होत राही.

अशा अनेक बाबतींत तू आणि मी एकमेकांपासून खूप दूर होतो. जणू ' दोन धृवांवर दोघे आपण'. सदैव माणसांत रमणारा तू, तर माणसांपेक्षा मानवेतर जीवसृष्टी-वनस्पतीसृष्टी मला अधिक प्रिय.

तूही जर इतर चारचौघांसारखाच 'एखादा कुणी' असतास ना, तर मग निर्मितीची, साहित्य-संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असती, तरी मी त्या कशानेही आकर्षिले गेले नसते, हीच शक्यता अधिक आहे. मला भावली ती तुझ्यातली निरागसता. तुझा 'मूल'पणा. तुझी लबाडीही पटकन उघड व्हायची. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा, त्यात तरबेज व्हावं, त्यासाठी मेहनत करावी, हे तुझ्या स्वभावातच नव्हतं. व्याख्यानांत, लिखाणात, तू असल्या गुणांची प्रशंसा करायचास. पण प्रत्यक्षात, त्यापेक्षा गप्पा माराव्या , लोळत पडावं , गाणं ऐकावं , फार तर पुस्तकं वाचावी , चाळावी हे तुला अधिक प्रिय. निर्मितीक्षम कलाकाराची साधना सतत डोक्यातच कुठेतरी मूकपणे चालूच असते का ?

तू लिहीत वगैरे नसायचास तेव्हाचा तुझा वेळ तू फुकट घालवतो आहेस, असं मला चुकूनही कधी वाटत नसे. Gained=Lost म्हणजेच Lost=Gained हे फिजिक्समधलं गणित मलाही माहीत आहे. पण तरीही काहीही फुकट जाऊ नये यासाठी मी सदैव जागरूक मात्र असते. नातवंडं दूध पितानादेखील थोडं इकडे तिकडे सांडतात, आणि मी “अरे असं सांडू नवे रे, नीट प्यावं, '” असं म्हटलं की, “जाऊ दे ग" म्हणून हसून सोडून देतात. हा संवाद वरचेवर घडतो, पण त्यातून दोऱ्ही पक्ष धडा घेत नाहीत. विचार येतो, हेच ठीक आहे. सगळेच काटेकोर वागले, तर जगणं किती एकसुरी बेचव होईल!

बोरकरांची ओळ आहे, 'चंदन होओनि अग्नी भोगावा” जिवंत असताना, मृतावस्थेतही, कितीही उगाळलं तरी आणि डोवटी जळून जातानादेखील, त्या चंदनासारखंच आपल्या प्रकृतिधर्माप्रमाणे मंद दरवळत राहणं सोपं नाही. ज्या महाभागाला हे जमेल, त्याला अग्नीदेखीळ भोगता येईल. ही खरी आत्मा आणि कुडीची एकरूपता. तो चिरंजीवच. नायं हन्ति न हन्यते.

तू गेलास आणि लोक हेलावून मला म्हणाले, "वहिनी, भाई गेले, तरी तुम्ही एकट्या आहात, पोरक्या झालात असं मानू नका. काहीही लागलं, तरी संकोच न करता सांगा, कुठल्याही क्षणी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत." हा खरचं त्या साऱ्यांच्या मनाचा मोठेपणा. तो त्यांनी आपापल्या परीने व्यक्त केला. कारण त्यांना कसं कळावं की, मी या क्षणीही एकटी नाही आणि पुढेही कधी एकटी नसणार. किंवा आयुष्यभर एकटीच होते आणि एकटेपणाच माझ्यासारखीचा प्राण असतो.

तुझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतला, त्या क्षणीच मी एक प्राण सोडला आणि दुसऱ्या स्वतत्रं जीवनात प्रवेश केला. Robert Graves ची एक कविता आहे, मूळ शब्द आज निटसे आठवत नाहीत. पण मनाच्या गाभ्यात अर्थ मात्र या क्षणी जागा झालाय तो काहीसा असा -मृत्यूतून पुनर्जन्म होणे ही मोठीशी जादू किंवा अशक्यप्राय़ गोष्ट नव्हे. जीवन बहुधा पूर्णांशाने विझलेलं नसतंच. एखाद्या समर्थ फुंकरीने वरची राख उडून जाते. आणि आतला तेजस्वी जिंवत अंगार धगधगायला लागतो... आणि हेही तितकंच खरं की ते निखारे पुन्हा फुलायला लागतात, त्या वेळी त्यांच्यावरची आपण उडवून लावलेली राख आपल्याभोवती जमून दुसऱ्या कुणाच्या तरी फुंकरीची वाट पाहत आपल्याला लपेटून गुपचुप पडून असते. अहिल्येच्या शिळेसारखी.

एकटेपणा हा एकटा कधीच येत नसतो. सोबत भला मोठा आठवणींचा घोळका घेऊनच येतो. कवी खानोलकरांसारखा ‘तो येतो आणिक जातो.’ येताना कधी कळ्या घेऊन आला, तरी जाताना त्यांची फुलं झालेली हाती पडतील की निर्माल्य, हे त्याला तरी कुठे माहीत असतं? त्या क्षणी जे भाळी असेल, ते स्विकारायचं की नाकारायचं याचा निर्णय घेण्याचं तेवढं स्वातंत्र्य ज्याच्या त्याच्या हाती असतं. स्वातंत्र्य! ऍब्स्ट्रॅक्ट, कॉंक्रिट काहीही नाही-"

अस्तित्वाला जाग येते, त्या क्षणीच श्वास सुरू होतो. आईच्या गर्भात फार तर तिच्या श्वासावर जगता येईल. पण पुढे प्रत्येक श्वास आपला आपल्यालाच घ्यावा लागतो. तेवढाच आपला अधिकार. तो टिकवण्यासाठी किती धडपडायचं ते मात्र आपल्या हाती असतं.

पण मुळात कसलीही धडपड तुझ्या स्वभावातच नव्हती. देवळातल्या देवासारखा तू पुढ्यात येईल त्याचा स्वीकार करत गेलास. मग ते पंचामृत असो, नाहीतर साधं तुळशीपत्र. त्याबद्दल तक्रारीचा चुकून एखादा शब्ददेखील कधी तुझ्या तोंडून बाहेर पडत नसे. याचा अर्थ, तुला निवड करता येत नव्हती, किंवा “सुखदु:खे समे कृत्वा' असा काही तुझा स्वभावविशेष होता, असं नव्हे. कुठे सभा-समारंभाला जाताना मी कपाटातून काढून देईन तो पोशाख तू सहजगत्या चढवत असस. पण कधी गडबडीत मी ते काम तुझ्यावरच सोपवलं, तर तुझ्या कपाटात घडी घालून रचून ठेवलेल्या ८-० बुदाशर्टांतला हवा तो मधलाच कुठला तरी छानसा-बहुधा तुला अधिक आवडणारा बुदाशर्ट तू ओढून काढून अंगावर चढवत असस आणि विस्कटलेला बाकोचा ढिगारा पुन्हा रचून ठेवण्याचं काम खुदाल माझ्यावर टाकण्यात तुला काहीही चूक वाटत नसे. अज्ञा प्रकारची तुझी कोणतीही कृती जाणीवपूर्वक नसायची. केवळ अंगवळणी पडलेली, पुरुषप्रधान संस्कृतीतून परंपरागत चालत आल्याने सहज स्वीकारलेली अश्ली ती तुझी सवय होती. परावलंबनाच्या तुझ्या आवडीचाही तो भाग असू हकेल. बहुधा दोन्ही.

असा तू देवमाणूसही; आणि माझ्या वाट्याला आलेला आळशी नवराही. हाती येईल ते स्वीकारायचं आणि त्याच्याशी खेळत बसायचं. पुढे तू अभिमानाने ते नावही स्वीकारलंस, पण खरं तर तू जन्मजातच 'खेळिया' होतास. अशा माणसासाठी इतर कुणाला काही करावं लागतच नाही.

तुझ्यासाठी मी काय केलं? तुझ्या तहान- भुकेचं वेळापत्रक सांभाळलं, माझ्या परीने नवी-जुनी खेळणी पुरवली, अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले. त्यात फार तर क्वचित कधी एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती? कलावंत 'तू' होतास. शब्दकळेची गर्भश्रीमंतीही 'तुला' लाभली होती. येताना कंठात आणि बोटांत सूर घेऊनच तू जणू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास, तरी तुझा तो दीर्घायुषी सोबती अजून बराच काळ मागे राहणार आहे.

तू गेलास उद्या मीही नाहीशी होणार पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजाने चमकतच राहील ना ?

असा तू वेगळा आणि मीही वेगळी. मग हा इतका प्रदीर्घ प्रवास आपण एकत्र केलाच कसा. हा प्रश्न इतर कुणाला पडला, तरी आपणां दोघांना पडायचं कारणच नव्हतं. कसा विरोधाभास आहे पहा! एकत्र प्रवास, पण आपापल्या मार्गाने. वास्तव्य एकाच घरात, पण जगणं स्वतंत्र. असा वावर चालतो, तेव्हा स्वाभाविकच अधूनमधून एकमेकांचे एकमेकांना धक्के बसतात; पण सहजपणे सॉरी' म्हणून क्षणात आपण आपल्या दिडोने पुढे जातो, आपापल्या कामांत मग्न राहतो.

तसं खरं सांगायचं तर माझ्यातही कर्तृत्वशाक्ती अगदीच काही कमी नव्हती. मी अथक परिश्रम करू शकते-खूप सोसू शकते-सतत धावपळ करू शकते-अनेक गोष्टी निभावून नेऊ शकते, हा आत्मविश्वास माझ्यात खूप होता आणि काही चुकलंच तर स्वतःहून ते मान्य करण्याचा प्रामाणिकपणाही होता. माणसाला आणखी काव हवं असतं? या साऱ्यासकट आपलं उद्दिष्ट ठरवणं इतकंच ना? क्षीण म्हणा किंवा प्रभावी म्हणा. स्रोत तोच. फक्त त्याची दिशा ठरवायचा क्षण येतो, तेव्हा कोणतं वळण घ्यायचं, याचा निर्णय घेण्याचा प्रश्न निर्माण होतो. तो प्रश्न मी पटकन सोडवून टाकला आणि हातमिळवणी केली. म्हणजे माझा हात तुझ्या हातात दिला की, तुझा हात माझ्या हातांत पकडला? असले प्रश्न सोडवत बसायला कधी वेळच मिळाला नाही म्हणा किंवा ते महत्त्वाचे वाटावे, असे प्रसंगच आले नाहीत म्हणा; कारण कोणतंही असेल, पण त्यावाचून काही अडलं नाही हे मात्र खरं.

वय वाढत जातं, त्याच्या जोडीने उरला दिवस अल्प, घोडे थकुनी चूर' ही जाणीवही वाढत जाते. उन्हं उतरत जातात, तशी आपली शक्ती कमी होत जाते; पण त्याचबरोबर अनुभवांचं माप भरून ओसंडायला लागतं. व्यक्तिमत्त्व प्रगल्भ-एका अर्थी ऐश्वर्यसंपन्न होत चालल्याचा साक्षात्कार होण्याचाही संभव असतो.

आशा-निराशेच्या पालखीतून असा डोलत डोलत प्रवास चालू राहतो. या वाटेवर, “कुणासाठी? कश्यासाठी? कुठे? आणि कुठवर?' असले प्रश्नही अधूनमधून भेटत असतात आणि त्यांच्या सोबतीनेच शेवटी दिगंबरात विलीन व्हायचं असतं. या क्षणी खानोलकर मदतीला आला, तशीच अगदी व्यासांपासून ते अद्ययावत कवींपर्यंत कुणालाही-आठवातल्या अगदी कुणालाही-साद घालावी, तो आनंदाने हजर होतो. त्यालाही भविष्यात वाचकाच्या मनात जगण्याची ओढ असतेच ना?

कवी ग्रेसच्या ओळी आहेत ,

' क्षितीज जसे दिसते ,
तशी म्हणावी गाणी।
देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी ॥
गाय जशी हंबरते ,
तसेच व्याकुळ व्हावे ।
बुडता बुडता सांजप्रवाही ,
अलगद भरुनी यावे ' .


तुझं व्यक्तिमत्व असं विचारपूर्वक संस्कारीत होत गेलेलं नव्हतं. तू पिंडाचाच सुसंस्कृत होतास. जन्मजात कलावंत होतास , तसाच विचारवंही जन्मजातच होतास. ती तुझी श्रीमंतीही होती आणि मर्यादाही होती. आपली संस्कृतीच पुरुषप्रधान आहे , त्याच पाळामुळातून तुझं पोषण होत गेलं आणि अंगभूत कृतज्ञताबुध्दीने आपल्या परीने तीच संस्कृती तू जपलीस. ती तुझी सहज प्रवृत्तीच होती , प्रकृती होती. मराठी ' विश्वकोषा ' त किंवा ' हूज हू ' मध्ये तुझ्या नावाची नोंद कलावंत म्हणून होईल. तशीच ' विचारवंत ' हे ही विशेषण तुझ्यामागे लावलं जाईल. पण आपण उभयतांच्या जीवनकोशात माझ्यासमोर ठाकलास तो त्या पुरुषप्रधान संस्कृतीचा आधारस्तंभच जसा! प्रज्ञेअभावी नवे , तर निव्वळ आळसापोटी तू विचार करण्याचं टाळत आलास. जे सहज आयते मिळतात , त्यासाठी बुद्धी कशाला शिणवावी ? मनात विचार घोळवण्यापेक्षा सूर घोळवणं हे केव्हाही अधिक आनंददायी , स्वत:लाही आणि भोवतालच्यांनाही. ही लबाडी म्हण किंवा पळवाट म्हण , मला कळायची पण त्याची तुला चिंता नव्हती. मी का कोणी परकी होते ? हक्काची बायकोच ना तुझी !

लग्नाच्या नोंदणी-अर्जावर सही करताना मीच नव्हता का सामाजिक बांधिलकी वगैरेला राजीनामा दिला? लग्नाची काय आणि समाजाची काय, बांधिलकी एकदा मानली की, पर्याय दोनच. एक तर फारकत घेऊन मोकळं व्हायचं, किंवा स्वतःला विसरून जबाबदारी स्वीकारायची. मी हा दुसरा पर्याय निवडला. स्वखुषीने, आनंदाने स्वीकारला.

मला एका योगायोगाचं नवल वाटतं : तुला शारीरिक दु:ख अजिबात सहन होत नसायचं आणि परावलंबन खूप आवडायचं; आणि तुला हा जो होवटला आजार आला, तोही शारीरिक दु:ख, वेदना, असलं काहीही न आणता फकत परावलंबन घेऊनच आला. ते परावलंबनही सतत वाढत जाणारं. त्याने माझी जबाबदारीही वाढवत नेली. मनावरचा ताण वाढत गेला आणि आतून खूप थकत गेले रे मी! याची जाणीव तुलाही होत असावी, अज्ञी अधूनमधून मला शंका येत राही. तू असा केविलवाणा व्हायचास तेव्हा न चुकता ते जुनं गाणं मनात जागं व्हायचं: बघु नको5 मजकडे केविलवाणा, राजसबाळा.' तुझा तो राजसबाळपणा अखेरपर्यंत तुझ्यात येऊन वस्तीला राहिला होता. त्याचं ओझं माझ्या मनावर येऊन पडत राहिलं तेही तुझ्या अखेरपर्यं, आणि आता अजया आठवणींतून माझ्याही अखेरपर्यंतच.

तुझा आजार संथ गतीने पण वाढतच चालला होता, पण शेवटी शेवटी तू अगदीच दीनवाणा झालास, तेव्हा मात्र माझा धीरच सुटला. नाही नाही ते विचार मनात यायला लागले. तुझी आई ९५ वर्षांची होऊन गेली. वाटलं, यालाही असंच दीर्घायुष्य लाभणार्‌ असेल, तर या अवस्थेत माझ्यानंतर याचं कसं होणार? आजवरचं तुझं आयुष्य हेवा करण्याजोगं होतं, म्हणूनच कसं भर्रकन गेल्यासारखं वाटलं. थोडंथोडकं नव्हे, ऐंशी वर्ष असं सुंदर, संपन्न जगल्यानंतर मृत्यूही वैभवशालीच असावा. रेंगाळू नये, तुला त्याने आणखी केविलवाणा करू नये, असं तीव्रतेने वाटत होतं आणि योगायोगाने म्हणा किंवा तुझ्यावर खऱ्या अर्थाने जीव टाकणाऱ्यांच्या इच्छाशक्तीच्या बळावर म्हणा, घडलंही तसंच.

तू गेलास आणि सगळेच किती हळहळले! लहानांपासून थोरापर्यंत, सगळेच. जणू आपल्या घरातलंच कुणी वडीलधारं माणूस आपल्याला सोडून गेलं, असं आतड्याचं दु:ख सर्वत्र व्यक्‍त झालं. सुन्नाट, धीरगंभीर, घरंदाज. वाटलं, स्वत:चं हे वैभव पाहायला क्षणभर तरी तू जवळपास हवा होतास. मिरवणूक, भाषणं, अंत्यविधी असलं काही काही नको म्हटलं आणि ते मानलं गेलं.

लोकप्रिय माणूस हा सार्वजनिक होतो. त्याच्या मृत्यूलाही लोक शांतता लाभू देत नाहीत. पण तू सर्वार्थाने भाग्यवान ठरलास. प्रत्येकाने वैयक्तिक रीत्या मूक अश्रूंनी तुला निरोप दिला. सर्वांच्या वतीने मिनिट-दीड मिनिटाची सरकारी मानवंदना. बस्स!

बारा जूनला तू गेलास, त्याला आता बराच काळ लोटला. तुझ्या अखेरच्या आजारपणापासून आजच्या या घडीपर्यंत तुझ्या संदर्भात जे जे काही घडलं, ते कुणीही हेवा करावा असंच. आणि प्रत्येक वेळी मलाही तेच तेच वाटत राहिलं, हे पाहायला इथे तू हवा होतास-तू हवा होतास.

या आठवणीदेखील किती लहरी असतात! कधी मैत्रिणी होऊन येतात, तर कधी वैरिणी! कधी यावं, किती काळ थांबावं, कधी नाहीसं व्हावं, सगळे निर्णय त्याच घेतात, आपल्या संमतीची त्यांना पर्वाच नसते. पुन्हा पुन्हा भेटीला येतात, जा जा म्हटलं तरी रेंगाळत राहतात, कधी कधी प्रदीर्घ मुक्कामच ठोकतात. आपण कशालाही डरत नाही, या अहंकाराचा धुव्वा उडवण्यासाठीच जणू यांचा जन्म!

आठवणी अनावर होतात, डोकं जड होतं, ही गर्दी, हा भार सहन तरी कसा करायचा? आज माझ्या उघड्या डोळ्यांना तू समोर दिसत नाहीस. मिटले की लगेच समोर येऊन ठाकतोस. चक्र सुरू होतं. अज्ञा या आठवणी, सुख-दु:खांच्या. माझ्या बाबतीत आज दुःखांच्याच अधिक. कुणी दुसऱ्याने दिलेल्या दु:खाच्या नव्हे, माझ्या स्वत:च्याच स्वभावदोषातून माझ्या हातून वेळोवेळी घडलेल्या अगणित चुकांच्या आणि त्याबद्दल आता होत राहिलेल्या पश्चात्तापाच्या.

थोडीथोडकी नव्हे अखंड ५४ वर्षांची ही वाटचाल. प्रवास म्हटला की , सहाजिकच चढ उतार आले. पण आज या घटकेला कशाचाही शीण जाणवत नाही. थकवा येतो तो सतत येत रहाणाऱ्या या आठवणींचा. थकल्याभागल्या मनावर असं अधिपत्य गाजवू नये , एवढाही पोच त्यांना नसतो. तू या सगळ्यातून सुटलास. माझ्या मनाच्या एका बंदिस्त कोपऱ्यात कायम वास्तव्याला आलास. शांतपणे इतर सर्वांच्या नकळत माझ्या सोबतीला येऊन राहिलास. जसा खळखळ पण निर्धास्त जगलास , तसाच निर्धास्तपणे चिरकाल विसाव्याला येऊन राहिलास.

मला तरी आता करण्यासारखं राहिलंच आहे काय ? तसा व्याप खूप आहे पसारा बराच आवरायचा आहे. तुझ्या दोन-तीन नव्या पुस्तकांचं कामही व्हायचं आहे. म्हटलं तर काम भरपूर आहे , पण ते ओझं मीच डोक्यावर घेतलं पाहिजे , असं थोडंच आहे ? मदतीला धावून येणारे खूप स्नेही सोबती आहेत. सगळं निभावून न्यायला ते समर्थ आहेत. मी स्वत: काय त्यांच्या मदतीने काय आणि उरलेलं सारं काही त्यांच्यावरच सोपवून काय हळूहळू सगळं काम पुरं होईल आणि त्यातलं काहीही झालं नाही तरी कितीसा फरक पडणार आहे ? या संदर्भात सत्य एकच आहे , ते म्हणजे या घरांत खेळण्याऱ्या हवेतून श्वास घ्यायला माझ्या जोडीला आता तू नसणार.
अशा वेळी काय करावं ?
(मंगेश पाडगांवकरांचं नाव घेऊन)
सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालावं इतकंच.


सुनीता देशपांडे
महाराष्ट टाईम्स
१२ नोव्हेंबर २०००

Tuesday, January 29, 2008

आठ आण्यातलं लग्न -- सुनीता देशपांडे

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे निवर्तल्याला उद्दा- १२ जून रोजी सहा वर्ष पूर्ण होत आहेत. योगायोगानं त्यांचं लग्नही याच तारखेला झालं होतं, चोपन्न वर्षाच्या सहजीवनानंतर त्यांची कायमची ताटातूट झाली, तिही याच दिवशी. सुनीताबाईंनी त्यांच्या लग्नाची सांगितलेली ही चित्तरकथा....

साठ-बासष्ट वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात जुवळे आडनावाचे एक शिक्षणप्रेमी गृहस्थ मुंबईच्या दादर-माटूंगा विभागात `ओरिएंट हायस्कूल' नावाची शाळा चालवत होते. या ना त्या कारणाने इतरत्र प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधत असलेले शिक्षक यांना या शाळेचा आधार होता. असाच भाईने( पु,ल. देशपांडे) त्या शाळॆत शिक्षक म्हणून प्रवेश केला आणि काही काळाने मीही! भाई वरच्या वर्गाना शिकवत असे आणि मी खालच्या वर्गाना.(तिथेच बाळ ठाकरे हा भाईचा विद्यार्थी होता आणि राज ठाकरेचे वडील श्रीकांत हा माझा विद्यार्थी होता.)

शिक्षक म्हणून काम करतानाच भाईची आणि माझी ओळख वाढत गेली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मग `आपण लग्न करूया.' असा भाईचा आग्रह सुरू झाला... वाढतच राहिला.

लग्न हे मला कृत्रिम बंधन वाटे. स्मजा- उद्दा आपलं पटेनासं झालं, तर लग्नात `शुभ मंगल सावधान' म्हणणारा तो भटजी किंवा नोंदणी पद्धतीने लग्न केलं असेल तर ते रजिस्टर करणारा तो कायदेतज्ज्ञ हे आपली भांडणं मिटवायला येणार आहेत का? मग त्यांच्या उपस्थितीची आपल्या लग्नाला गरजच काय? माझं ताठ मन वाकायला तयार नव्ह्तं आणि भाईचा आग्रह चालूच राहिला होता. शेवटी `माझ्यासाठी तू इतकंच कर. लग्नविधीला फक्त `हो' म्हण. मग तू म्हणशील तशा लग्नाला माझी तयारी आहे,' या त्याच्या आग्रहाला मी मान्यता दिली खरी! खरं तर तत्पूर्वी एकदा भाईचं लग्न झालेलं होतं. या गुणी मुलाला आपली लाडकी केल देऊन मोठ्या थाटामाटात कर्जतच्या दिवाडकर लोकांनी त्याला जावई करून घेतला होता. पण लग्नानंतर १५-२० दिवसांतच ती मुलगी तापाने आजारी पडली आणि डॉक्टरी उपचारांचाही उपयोग न होऊन बिचारी मृत्यू पावली.

माझ्या आईने लेकीसाठी काही स्थळं हेरून ठेवली होती. एक तर तिला या बिजवराशी मी लग्न करणं मुळीच पसंत नव्हतं. शिवाय परजातीतला जावई हेही खटकत होतं. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आणि मी आमच्या गावी रत्नागिरीला आले. `भाईने टपाल घेऊन येणाऱ्या बसने यावे, ती गाडी आधी पोस्टात येते, तिथे टपालाच्या थैल्या टाकून मग गावात गाडीतळावर जाते. पोस्टाच्या कंपाऊंडला लागूनच आमचा वाडा आहे, मी त्याला उतरून घेऊन आमच्या घरी आणिने,' असे मी भाईला सांगितले होते. प्रत्यक्षात भाई एकटाच न येता त्याचा भाऊ उमाकांत आणि जुवळे सरांचा हरकाम्या बाळू तेंडुलकर यांच्यासह आला. मी आप्पा-आईशी त्यांची ओळख करून दिली. त्यांनी उभवतांना वाकून नमस्कार केले आणि पुढल्या १०-१५ मिनिटांतच भाईने सर्वांना हसवून आपलेसे करून घेतले. `हसवण्याचा माझा धंदा' या नावे पुढच्या काळात भाई रंगभूमीवर एक कार्यक्रम करत असे. माझ अनुभव मात्र सांगतो- हसवणं हा त्याचा धंदा नव्हता, त्याचा तो धर्मच होता.

पुढल्या ४-५ दिवसांत लग्न रजिस्टर करायचं होतं. त्यावेळी भरायचा छापिल फॉर्म आठ आण्याला मिळे, तेवढाही खर्च इतर कुणावर पडु नये म्हणून मी तो फॉर्मही विकत आणून वाचून ठेवला होता आणि आप्पांनाही दाखवला होता.

आमचे आप्पा- म्हणजे माझे वडील हे स्वत: रत्नागिरीतले नामवंत वकिल तर होतेच, पण संत प्रवृत्तीचा माणूस म्हणूनही त्यांचा लौकिक होता. भाई रत्नागिरीला आल्यावर दोन-तीन दिवसांतच लग्न रजिस्टर करून टाकावे, असे आई-आप्पांना मनातून वाटत होते. त्याप्रमाणे आप्पांनी कोर्टातून परतताना आपल्या वकील स्नेह्यांना `मुलीचं लग्न रजिस्टर करायचं आहे, साक्षीदार म्हणून सह्या करायला तुम्ही केव्हा येऊ शकाल?" असे विचारले आणि फॉर्म वगैरे सर्व तयार आहे, वगैरे सांगितले. त्यावर, `मग आत्ताच जाऊ या की!' म्हणून ते आप्पांबरोबरच निघाले.

रत्नागिरीचे मुख्य ऑफिस आमच्या शेजारच्या कंपाऊंडमध्ये होते. तसेच घरासमोरच जिल्हा न्यायालय होते. दुपारी आप्प घरी परतत तेव्हा दुपारचा चहा होत असे. त्या सुमाराला आमच्या वाड्याला फाटकाची खिटी वाजली की आप्पा आले, असे आम्ही खूशाल मानत असू. आईने चहाला आधण ठेवले होते. खिटी वाजली म्हणून मी सहज तिकडे पाहिले, तर आप्पांच्या सोबत आणखी तीन-चारजण येताना दिसले. मी आईला ते सांगतच तिने आधणात आणखी चार-पाच कप पाणी वाढवले.

हे लोक साक्षीदार म्हणून सह्या करायला आले आहेत आणि पुढच्या दहा-पंधरा मिनीटांत आमचे लग्न होणार आहे, याची घरच्या आम्हाला कुणालाच पूर्वकल्पना नव्हती. उन्हाळयाचे दिवस. वधू घरच्याच साध्या, खादीच्या सुती साडीतच होती आणि नवरदेव घरी धुतलेल्या पायजम्यावर साधा, बिनबाह्यांचा बनियन घालून, चहाची वाट पाहत, गप्पा मारत ऊर्फ सर्वांना हसवत बसलेले. आप्पांनी आल्या आल्या मला हाक मारली. जावयाशी त्या लोकांची ओळख करून दिली आणि त्या फॉर्मवर आम्हा उभयतांना त्या साक्षीदारांसमोर सह्या करायला सांगितले. आमच्या आणि साक्षीदारांच्याही सह्या झाल्या आणि लग्न `समारंभ' संपला. नेहमीच्या दुपारच्या चहाबरोबरच लग्नही झाले आणि माझ्या लक्षात आले की, आपण केवळ त्या छापील फॉर्मवर सह्या करून `कु. सुनीता ठाकूर' हिचे नाव `सौ. सुनीता देशपांडे' करण्याचे काम फक्त आठ आण्यात आणि दोन-चार मिनीटांत उरकले.

एका योगायोगाचे मात्र मला नवल वाटते. आमच्या या लग्नाच्या दिवसाची तारीख होती १२ जून, आणी त्यानंतर बरोबर चोपन्न वर्षांनी १२ जूनलाच भाईचा मृत्यू झाला. आठ आण्यात आणि दोन-तीन मिनिटांत जोडलेलं ते लग्नबंधन तुटलं. पण त्या चोपन्न वर्षाचं एकत्र जीवन खूप रंगीबेरंगी आणि एकूण विचार करता खूप संपन्नही जगलो खरं!

-- सुनीता देशपांडे
a