Leave a message
Showing posts with label sunita deshpande. Show all posts
Showing posts with label sunita deshpande. Show all posts

Monday, April 22, 2024

मण्यांची माळ - एक विचारमंथन (तन्वी राऊत)

“आयुष्यात एका आवडत्या लेखिकेला भेटायची संधी तुला देवाने दिली तर तू कुणाला भेटशील?” असा प्रश्न जर मला कुणी विचारला तर सर्वप्रथम सुनीताबाई देशपांडेंचंच नाव माझ्या मनःपटलावर तरळून जाईल यात शंका नाही. त्यांची शिस्तप्रियता, वक्तशीरपणा, हाती घेतलेलं काम तडीस नेण्यासाठी त्यात झोकून देण्याची वृत्ती हे गुण तर सर्वश्रुत आहेतच. पण त्यांबरोबरच आजबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे बारकावे टिपण्याची सवय, स्वतःतील गुणदोषांची त्यांना असलेली जाणीव आणि स्वतःतले दोष स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा, स्वतःचं मत व्यक्त करण्याची सडेतोड पद्धत, त्याचबरोबर परिस्थितीकडे पाहण्याचा भावनिक दृष्टिकोन आणि संवेदनशीलता यांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मला भुरळ न पडती तर नवल. ‘आहे मनोहर तरी’ या त्यांच्या आत्मकथनाची पारायणं करुन झाल्यावर माझ्या वाचनात आलेलं मण्यांची माळ हे सुनीताबाईंचं दुसरं पुस्तक.

सुनीताबाईंच्या १३ पूर्वप्रकाशित ललितलेखांचा संग्रह या पुस्तकात आहे. हे लेख म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितींचं, आलेल्या अनुभवांचं सुनीताबाईंनी केलेलं विचारमंथनच म्हणावं लागेल. त्याचबरोबर आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर भेटलेल्या व्यक्तींसोबतचे अनुभवही या लेखांमध्ये त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. या लेखांतील त्यांचे विचार मांडण्याची पद्धत ओघवती असल्यामुळे, वाचकाशी लेखिकेने केलेला तो संवादच वाटू लागतो.

‘एक पत्र’ या पहिल्याच लेखात सुनीताबाईंनी पुलंसोबतचं त्यांचं सहजीवन, एकमेकांचे गुणदोष स्वीकारून केलेली आयुष्यभराची सोबत, पुलं गेल्यानंतरचं त्यांचं बदललेलं आयुष्य आणि त्या अनुषंगाने आठवणी, जीवन-मृत्यू, अस्तित्व यांबद्दलचे विचार मांडले आहेत. ‘निमित्त १२ मार्च’ या १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांवरच्या लेखात राजकारणात वाढीस लागलेली स्वार्थी वृत्ती, व्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड, त्यांतून निर्माण झालेली धार्मिक तेढ, वैरभावना यांबद्दल वाचताना मन सुन्न होतं. किंबहुना त्या घटनेनंतर ३० वर्षांनंतरची आजची परिस्थिती आणखीच विदारक झाल्याचं जाणवतं. ‘डोडी’, ‘माणसाचा पूर्वज’, ‘आनंदमयी सृष्टीची जीवनासक्ती’ आणि ‘महात्मा थोरो’ या लेखांतून मानव आणि इतर पशूंमधील परस्पर संबंध, त्यांचा एकमेकांवरील विश्वास, निसर्गाला मानवाने आणि इतर पशूंनी दिलेली वागणूक याबद्दलच लिखाणही वाचनीय. या पुस्तकातील सर्वच लेख वाचकाला मानवी मूल्य, स्वभावातील गुणदोष, तसेच माणसाच्या अतिमहत्त्वाकांक्षी वृत्तीचे भविष्य काळात येणाऱ्या पिढीला भोगावे लागणारे परिणाम यांबद्दल विचार करायला भाग पाडतं, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य. वाचायलाच हवं असं पुस्तक.

- तन्वी राऊत 
https://www.instagram.com/herbookishworld

Tuesday, March 12, 2024

ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना !

चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांनी लिहिलेली ही कविता. याच कवितेचं नंतर अत्यंत प्रसिद्ध असं गाणंही झालं. ह्रदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेलं हे गीत, आशा भोसले यांनी खरोखरच असं गायलं आहे की ते
स्वरांचे घन येऊन आपल्या मनाला न्हाऊ घालतात प्रत्येक वेळी ऐकताना.

पण मुळात ही कविता आणि ती लिहिण्यामागची पार्श्वभूमी दोन्ही अतिशय उदात्त अशी आहे. एकूणच काव्य, कवी आणि कलाकार या सर्वांसाठीच या कवितेचं स्थान हे पसायदानासारखं आहे. सुनीताबाई देशपांडे यांनीच त्यांच्या 'कवितांजली' ह्या कविता वाचनाच्या कार्यक्रमात ही हकिकत सांगितली होती.

आरती प्रभू यांच्या कविता सुरुवातीला 'सत्यकथा' या मासिकातून प्रसिद्ध होऊ लागल्या आणि साहजिकच ते काव्य अत्यंत लोकप्रिय होऊ लागलं. त्यामुळे 'आरती प्रभू' या नावाला खूप प्रसिद्धी आणि वलय प्राप्त झालं. नेमक्या याच
कारणाने चिं. त्र्य खानोलकरांमधला अत्यंत संवेदनशील असा 'आरती प्रभू' हा कवी खूप अस्वस्थ झाला. त्याच मानसिक घालमेलीतून त्यांनी ही कविता लिहिली. प्रत्येक कवीने, कलाकाराने ज्या कवितेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेऊन मगच स्वतःला कलेच्या स्वाधीन करावं.

"ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना" ... प्रसिद्धी, लोकप्रियता यामुळे कदाचित माझ्या मनात अहंकार निर्माण होईल. आणि त्या अहंकाराने माझं मन मलीन होऊन जाईल, काळवंडून जाईल. अशी भीती, अशी अस्वस्थ करणारी शंका 'आरती प्रभूंच्या' मनात डोकावत होती. म्हणून त्यांनी थेट त्या दयाघनालाच साकडं घातलं की हे दयाघना; तू घनांच्या स्वरूपातून ये आणि माझ्या मनावर बरसून जा.

पण हे बरसणं फक्त भिजण्यासाठी नको... तर तू मला, माझ्या अहंकाराने मलीन झालेल्या मनाला 'न्हाऊ' घाल. आई आपल्या बाळाला न्हाऊमाखू घालते; अंगणात खेळताना, बागडताना, धडपडताना त्या बालकाचे मळलेले अंग धुवून पुसून स्वच्छ करते आणि त्याला त्याचं गोंडस, गोजिरं, निरागस रुप पुन्हा मिळवून देते. तसंच तू घनांमधून , जलधारांमधून थेट माझ्या मनात ये; आणि माझ्या मनावरची ही प्रसिद्धी, वलयामुळे साठलेली अहंकाराची पुटं धुवून टाक. मला पुन्हा एकदा शुद्ध, निर्मळ, निरागस रुप हवं आहे.... म्हणून... "ये रे घना, ये रे घना".

"फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू. नको नको म्हणताना, गंध गेला रानावना" ... 'माझ्या कविता', त्यातून व्यक्त होणाऱ्या माझ्या भावना; या अगदी तरल आहेत, नाजूक आहेत. खरंतर त्या भावना इतक्या हळूवार आहेत की
त्यांना फक्त 'अळुमाळू' याच शब्दात व्यक्त करता येईल. हा अळुमाळू शब्द; ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ओवीमध्ये वापरला आहे. कारण तो नाजूकपणा फक्त स्पर्शाचा भाव नाही; तर ते शुद्धतेचं, पावित्र्याचंही विशेषण आहे.

म्हणून 'आरती प्रभू' म्हणतात की; माझ्या ह्रदयस्थ भावनांमधून उमललेली ही काव्यपुष्पं; ह्या लोकप्रियता, प्रसिद्धी आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अहंकार आदी ऐहिक वाऱ्याने चुरगळून जातील, विस्कटून जातील. आणि मी त्या
काव्यसुमनांना 'नको नको' म्हणतच होतो. मी स्वतःहून कधीच प्रसिद्धीच्या, लोकप्रियतेच्या वाऱ्यालाही उभा राहिलो नाही. पण ... त्या कवितेतील भावफुलांचा गंध ! तो गंध कसा लपवून ठेवू... ! मी माझी ह्रदयस्थ कविता
कुणाच्याही दृष्टीस पडणार नाही याची काळजी घेतली तरीही तो 'गंध' , तो भावगंध सर्वदूर पसरलाच आहे ! मग आता मी काय करू... म्हणूनच ... "ये रे घना, ये रे घना".

"टाकुनिया घरदार, नाचणार नाचणार; नको नको म्हणताना मनमोर भर राना" ... कविता, काव्यउर्मी, काव्योन्मेष, या गोष्टी अशा आहेत की त्यांना कसलंच भान नाही, कसलीच बंधनं नाहीत. स्वयंभू, स्वच्छंदी अशा भावना आहेत या. "नभ मेघांनी आक्रमिले" या अवस्थेत मोर जसे धुंद, मुग्ध होऊन, पिसारा फुलवून नृत्य करणारच. अगदी तसंच एखादी प्रतिभेची श्रावणसर आल्यावर माझ्या मनातले भावमयुर त्यांचा काव्यपिसारा फुलारून नवनिर्मितीच्या रानावनात मुक्त संचार करणारच !

तेव्हा ते माझं काही एक ऐकत नाहीत. आणि मग त्यांच्या या भावमुग्ध अविष्काराने रसिकजनांचं लक्ष आपोआपच वेधून घेतलं जातं. दयाघना... मला भीती वाटते रे... माझ्या या मुक्तमयुरांना कोणी कैदेत तर नाही ठेवणार ना,
काहीतरी व्यावहारिक आमिष दाखवून त्यांचं स्वातंत्र्य हिरावून तर नाही घेणार ना ! म्हणूनच... तू...
"ये रे घना, ये रे घना".

"नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू; बोलावितो सोसाट्याचा वारा मला रसपाना" ... हा कसा पेच निर्माण झाला आहे ! कितीही नको नको म्हटलं तरी तो काव्यगंध रानवाटांनी पसरणारच आहे. शब्दमाधुर्यातून गुंजारव करणारे आर्त सूर एखाद्या वेणूच्या नादलहरींसारखे विहरत, लहरत कानोकानी पोहचणारच आहेत. आणि मग या साऱ्या शब्दलाघवाचा, भावोन्मेषाचा उगम शोधत शोधत तो प्रचंड लोकप्रियतेचा, प्रसिद्धीचा, लोकाभिमुखतेचा वारा ; अनिवार होऊन माझ्या दिशेने येणारच आहे.

त्या सोसाट्याचा वाऱ्यावादळात मी माझी ही काव्यवेल कशी सांभाळू ! त्या सोसाट्याचा वाऱ्याबरोबर जी प्रतिष्ठेची अहंकारमिश्रीत धुळ उडून येईल; ती या डोळ्यांवाटे माझ्या मनापर्यंत पोहचली तर ... काय करू ! माझी फुलं
कोमेजून जातील ना; चुरगळून जातील ना !म्हणूनच... "ये रे घना, ये रे घना; न्हाऊ घाल माझ्या मना"...

मनामध्ये अशी भावकोवळीक असलेला हा 'आर्ततेचा प्रभू' अवघ्या सेहेचाळीस वर्षात स्वतःच त्या दयाघनाला भेटायला निघून गेला. कदाचित स्वतःच्या 'अळुमाळू' भावसुमनांनी त्या प्रतिभेच्या दात्यालाच न्हाऊ घालण्यासाठी
गेला असावा हा 'प्रभू' ... आवाज चांदण्यांचे ... अजूनही ऐकू येतात मात्र इथेच ठेवून गेला... आपल्यासाठी.

रसग्रहण : रोहित कुलकर्णी

Wednesday, November 8, 2023

मनोहरी आठवणी - (डॉ. वीरेंद्र ताटके)

सुनीताबाई या पुलंच्या पत्नी म्हणून सर्वाना परिचित होत्याच . मात्र त्या स्वतः सिद्धहस्त लेखिका होत्या . त्यांचे ' आहे मनोहर तरी ' हे पुस्तक मी १९९२ या वर्षी कॉलेजमध्ये शिकत असताना वाचले होते. त्यानंतर त्यांना लिहलेल्या पत्राला त्यांनी लगेच पत्राने उत्तर दिले होते .

पुलंच्या निधनानंतर सुनीताबाई मनाने आणि शरीराने खचल्या होत्या. मात्र त्यांनी स्वतःचं लिखाण आणि पुलंच्या अप्रकाशित लेखांचं प्रकाशन करण्याचे काम सुरु ठेवलं होतं. त्यानंतर पुलंच्या जन्मदिनी आणि स्मृतीदिनी पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील त्यांच्या घरी जाऊन सुनीताबाईंशी गप्पा मारण्याची अनेकदा संधी मिळाली . प्रत्येकवेळी त्यांनी हसतमुखाने स्वागतच केले.

या जगाचा निरोप घेताना देखील सुनीताबाई मनाला चटका लावून गेल्या. त्या दुर्दैवी दिवशी आकाशवाणीवरील सकाळच्या बातम्यात त्यांच्या निधनाची बातमी सांगितली गेली आणि वैकुंठ येथे सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार असल्याचे कळाले . अनेकजण वैकुंठकडे धावले, परंतु अगदी काही मिनिटं उशीर झाल्यामुळे माझ्याप्रमाणेच अनेकांना सुनीताबाईंचे अंतिम दर्शन झाले नाही .आयुष्यभर वेळेचा काटेकोरपणा पाळलेल्या सुनीताबाईंनी जातानादेखील वेळ अगदी काटेकोरपणे पाळली होती ! वैकुंठभुमीतील त्या अग्नीतून धुराचे लोट हवेत विरत होते…. त्यातील एका उंच जाणाऱ्या नादबद्ध लकेरीकडे पाहत उपस्थितांपैकी पुलंच्या एक ज्येष्ठ नातेवाईक महिला म्हणाल्या, " पोहचली आपली सुनीता पुलंकडे !" सर्वांचेच डोळे पाणावले.

आजही भांडारकर रस्त्यावरून जाताना 'मालती-माधव' इमारतीवरील नीलफलकाकडे पाहून जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात . या दांपत्याने आपल्याला दिलेल्या ' मनोहरी आठवणी ' कायम तशाच राहतील.

- डॉ. वीरेंद्र ताटके

Thursday, April 6, 2023

दर्शनमात्रे - सुनीता देशपांडे

आता बाबाही थकले, आम्हीही थकलो. पण एक काळ असा होता की त्या वेळी आनंदवनात वर्षातून निदान एक तरी फेरी होतच असे. प्रत्येक वेळी आम्हांला काहीतरी नवं दाखवायची योजना बाबांच्या मनात असे आणि त्या उत्साहातच 'आनंदवन - कुटुंबियांकडून स्वागत होई. हा भाग्यलाभ आमच्या भाळी लिहिला गेल्याचा पोटभर आनंद घेऊनच आम्ही परत कधी यायचं तो बेत ठरवून आनंदवनाचा निरोप घेत असू. परतताना 'कन्या सासुरासी जाये, मागे परतुनी पाहे' अशी अवस्था होत नसली तरच नवल.

या वेळी बाबांनी ठरवलं होतं, आम्हांला ताडोबाला नेऊन वाघ दाखवायचा सर्व पूर्वतयारी झाली होती. आवश्यक ते निरोप त्या-त्या ठिकाणी गेले होते. बाबांकडे त्या काळी ड्रायव्हरची सीट डावीकडे असलेली एक जुनी जीपगाडी होती. उन्हापावसासाठी वर ताडपत्रीवजा कव्हर असलेली. बाबा स्वतः उत्तम मेकॅनिक, ड्रायव्हर, सर्व काही. त्या काळी ड्रायव्हिंग तेच करत. आमचा प्रवास त्या जीपमधून सुरू झाला. बाबांच्या शेजारी साधनाताई आणि पलीकडे मी मागे भाई, विकास आणि प्रकाश हे बाबांचे दोघे मुलगे आणि त्या दोघांचा जोडीदार आनंदवनातला तरुण कार्यकर्ता शहा. असे चौघे. गाडीत प्यायचं पाणी आणि वाटेत हवं तर खायला म्हणून टोपलीभर उकडलेली रताळी साधनाताईंनी घेतली होती. बाकी जेवणखाण काहीही सोबत नव्हतं; पण बाबा आणि ताई असताना काहीतरी व्यवस्था नक्कीच केलेली असणार ही मनोमन खात्री असल्यानं मीही निश्चित होते. त्यामुळं एकही प्रश्न न विचारताच हा प्रवास सुरू झाला होता. बाबांचा उत्साह तर अवर्णनीय होता. वेगवेगळ्या अनेक विषयांवर ते बोलत होते ताडोबाच्या दिशेनं धावणाऱ्या त्या आमच्या प्रवासपट्ट्याला बाबांच्या अनुभवाच्या उन्हापावसाचे काठ लाभत होते.

जंगलाची ओळख करून घ्यायची तर प्रथम भेट रात्रीच्या वेळीच व्हायला हवी. म्हणून त्या दृष्टीनेच आम्ही निघालो होतो. ताडोबाच्या अभयारण्यात रात्री गाडी शिरली तेव्हा चांगला काळोख पडला होता. भरपूर भुका लागल्या होत्या. तिथल्या प्रथम वर्गाच्या अतिथिगृहात खोल्या राखून ठेवायची बाबांनी व्यवस्था केली होती; म्हणून गाडी प्रथम तिकडेच नेली. तर तिथं सगळी सामसूम दिसली. कुणालाही काही पत्ता नाही, पर्वाही नाही म्हणताच बाबांचा पारा चढायला सुरुवात झाली. अफगणिस्तानचा राजा की कुणीसा बडा सरकारी पाहुणा पुढल्या पंधरवड्यात येणार म्हणून त्याच्यासाठी आणि त्याच्या लवाजम्यासाठी तिथली सगळी सरकारी अतिथिगृहं साफसफाई, रंगरंगोटी, मोडतोड दुरुस्ती वगैरे पूर्वतयारीच्या दृष्टीनं अचानक बंद करण्यात आली होती.

तळहातावर भाकरी घेऊन खाताखाता त्यातलाच घास कुष्ठरोग्यांनाही भरवत त्यांची सेवा करणारा हा बाबा, पाहुण्यांना सायीचे घट्ट दही देता आलं नाही तर अत्यंत अस्वस्थ होतो. मनासारखा पाहुणचार करायला न जमणं हा त्यांना एकदम विदर्भ प्रांताचाच अपमान वाटायला लागतो. ती नामुष्की सहन करण्याची ताकद, इतक्या पारंब्यांनिशी धरणीवर भक्कम उभ्या असलेल्या या 'वटवृक्षात ' नाही.

आम्ही त्या अभयारण्यातल्या झाडावर बांधलेल्या एखाद्या मचाणावर रात्रीचा मुक्काम करायचं ठरवलं. निराशा सर्वाचीच झाली होती. पण या प्रवासाला सुरुवात केल्या क्षणापासून आम्हां साऱ्याजणांचा जो एकच एकसंध गट होता, त्याचे आता दोन गट झाले. साधनाताई, ती तीन मुलं आणि आम्ही दोघं याचा एक गट आणि बाबांचा एकट्याचा दुसरा गट. तिकडे एवढ्यातेवढ्यान अंगार धगधगत होता. कारणाशिवायच बाबा मुलांवर आणि ताईंवर डाफरत होते. त्यांना थंड करण्याचे आणि खुलवण्याचे आम्हां सर्वाचे अयशस्वी प्रयत्न चालूच होते..

प्रथम वर्गाच्या सरकारी अतिथिगृहातला त्या रात्रीचा 'डिनर दुसऱ्या दिवशीचा 'ब्रेक फास्ट आणि 'लंच सर्व काही आम्हांला त्या उकडलेल्या रताळ्यांच्या टोपलीत सापडलं आणि आरामगृहातल्या गादयागिरद्या त्या लाकडी मचाणावर..

मनात आणलं तर किती गप्प बसता येतं ते अरण्याकडून शिकावं, त्या नीरव शांततेचा भंग करण्याचं धाडस म्हणा किंवा उद्धटपणा म्हणा, आम्हां कुणातच नव्हता. अगदी जरूरच पडली तर एकमेकांशी कानगोष्टी बाबांचा वेध घेत होतो. रात्रीच्या फेरफटक्यासाठी बाहेर पडणाऱ्या वन्य चाहूल घ्यायला बाबा पंचप्राण कानात गोळा करून बसले होते. त्या प्राण्यांच्या पदरवांवरून, एकमेकांना घातलेल्या सादाप्रतिसादांवरून, कोण, कुठल्या दिशेनं कशासाठी निघाला असेल ह्याचा ते अंदाज घेत होते. वाघाचा मागोवा लागताच ताडोबाचा तो औरस रहिवासी आम्हांला दाखविण्यासाठी ते जीपमधून अरण्यदर्शनाला निघणार होते. करत आम्ही पशूंची

पण कुठल्या मुहुर्तावर हा ताडोबाचा बेत केला कोण जाणे, असं वाटावं अशीच काहीशी ग्रहदशा होती. ती रात्र वाघोबांच्या पंचांगातली 'निर्जळी एकादशीची असावी. ताडोबाच्या जंगलातले सारे वाघ ध्यानस्थ होऊन बसले होते आ आपल्या तपाचरणानं बाबा आमटे नामक नरसिंहाला अधिकाधिक त्रस्त करत होते. शेवटी बाबांनी मनाशी काहीतरी निश्चय केला आणि आम्हांला पुन्हा गाडीत घालून ते अरण्यदर्शनाला निघाले. प्रखर दिवे असलेल्या त्या जीपगाडीतून ती. अख्खी रात्र आणि पहाट, आणि मग दिवसाउजेडी सकाळी-दुपारी पायीपायीदेखील त्या जंगलात सगळीकडे आम्ही बाबांबरोबर खूप चकरा मारल्या. लहानमोठ्या अनेक रानवाटा पालथ्या घातल्या. एखादया वळणावर समोर एकदम शेकडो पणत्या पेटलेल्या दिसल्या की हरणांचा तो कळप जास्तीत जास्त जवळून पाहता यावा म्हणून बाबा गाडीच्या दिव्यांची सावध उघडझाप करत, आवाज न येईल अशी हळूहळू जीप पुढं पुढं नेत आम्हांला त्या वनवाशांशी ओळखी करून देत होते. त्या बावीसतेवीस तासांत आम्ही एकटे-दुकटे आणि कळपांनी किंवा छोट्याछोट्या गटानं फिरणारे अनेक प्राणी पाहिले; पण बाबांनी योजिलेलं व्याघ्रदर्शन काही घडलं नाही. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वीची आमची शेवटली शोधयात्रा करत हळूहळू जीप जात असताना तर मला एक नवलच पहायला मिळालं. आमच्या मार्गापलीकडेच थोड्याशा मोकळ्या जागेत एक मोर आणि एक हरणाचं पाडस मिळून मजेत खेळताना दिसलं. आम्ही जागच्या जागी गाड थांबवली. पण आमची चाहूल लागताच ते दोघे पळून आडोशाला गेले. आम्ह पुढं निघून गेलो; आणि त्या सफरीमधल्या अशा अनेक लहानमोठ्या तृप्त क्षणांची बेरीज करत असताना बाबांच्या दिशेनं नजर गेली की मला धडकी भरत होती शेवटी अंधार पडू लागला आणि ताडोबाच्या जंगलातून आनंदवनाच्या दिशेन परतीचा प्रवास सुरू झाला.

शौक म्हणून शिकार करणं हे मला अत्यंत असंस्कृत मनाचं लक्षण वाटतं. पण या शौकासाठी आपल्या देशात तर बडेबडे लोक सोयीचं असेल तर अभयारण्याच्या दिशेनंही जातात; आणि अभयारण्यात जनावरं मारणं हा गुन्हा नोंदवला जाईल आणि न जाणो उद्या प्रकरण अंगावर शेकेल म्हणून त्या अरण्याच्या सीमेवर बाहेर बकऱ्या वगैरे प्राणी बांधून ठेवतात. ते प्राणी भुकेनं ओरडायला लागले की अभयारण्यातल्या वाघाबिघांनी त्या दिशेनं भक्ष्यासाठी । जंगलाची सीमा ओलांडून बाहेर यावं म्हणजे तो वाघ टिपून आयती शिकार 'साधता येते. भारतात वाघाची शिकार करण्याची कधी स्वत:ची, तर कधी पाहुण्यांची हौस भागवणाऱ्या अनेक राजकारण्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनो, अशा रीतीनं अभयारण्यातल्या आपल्या वाघांची संख्यादेखील खूप कमी केली आहे, असं मी ऐकलं होतं. ताडोबा सोडून बाहेर पडताना उगाच शंका चाटुन गेली; चोवीस तासांत इतका आटापिटा करूनही इथं एकही वाघ दिसला नाही; म्हणजे इथले सगळे वाघ असेच या लोकांनी संपवले की काय?

परतीचा तो प्रवास सुरू झाला तेव्हा पोटात भूक, डोळ्यांवर झोप, आणि डोक्यात अशा अनेक शंका होत्या. बाबा मात्र फारच अस्वस्थ होते. ताडोबा म्हणजे वाघांचा राजा. साक्षात वाघ! बाबांची आणि त्याची जुनी दोस्ती. या आपल्या मित्रानं आपल्याला असा दगा दयावा? हे दुःख, चीड असह्य होती. आम्हांला हे सगळं कळत होतं; पण 'अपराध बाबांनी केलेलाच नाही त्याबद्दल ते असा त्रागा करून घेत असलेले पाहून आम्ही सगळेच भांबावून गेलो. काल ताडोबाच्या दर्शनाला निघतानाचा बाबांचा उत्साह आणि आज तिथून परततानाचा हा मूड याचं काहीही नातं नव्हतं. बाबांना खुलवण्यासाठी आम्ही सगळेच आपापल्या परीनं त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होतो.

मी पाहुणी म्हणून असेल, बाबा माझ्यावर उखडत नव्हते, पण प्रतिसादही देत नव्हते. साधनाताई किंवा मुलांपैकी कुणी काही बोलायचा प्रयत्न केला की बाबा त्यांना एकदम फटकारू लागले, तेव्हा भाईनं ताबा घेतला आणि तो त्यांच्याशी संवाद साधू लागला. "जाऊ दे हो बाबा. ही जनावरंदेखील आपल्या राज्यात अशीच वागणार" इथून सुरुवात करून मग आमच्याऐवजी कुणी मंत्रीबिंत्री आला असता ताडोबाला तर काय घडलं असतं याचं वर्णन करायला भाईनं सुरुवात केली. मग गाणी, नकला, विनोदी किस्से, कायकाय तो करत राहिला. आम्ही सगळे सुखावून हसत होतो; पण तरीही बेताबेतानं. बाबाही मधूनच काही बोलून आपण ऐकत आहोत हे दाखवत पाहुण्यांचा आब राखत होते. पण हे काही खरं नव्हे अशी जाणीव सर्वानाच होती. ताण फारसा सैलावत नव्हता.

कालपासून या गाडीनं केलेल्या प्रवासात प्रत्येकाच्या बसायच्या जागा ठरूनच गेल्या होत्या. पुढच्या बाजूला मधे ताई, डावीकडे ड्रायव्हर, बाबा, उजवीकडे मी माझ्या ताब्यात बाबानी एक भलामोठा टॉर्च दिला होता. कुणा परदेशी 'आनंदवनाच्या मित्रानं बाबांना तो भेट दिलेला होता. गाडीच्या बॅटरीवर पेटवायचा. खूप शक्तिमान, दूरवर तेजस्वी प्रकाश पाडणारा. साधारणतः वाघाची उंची लक्षात घेऊन जनावरांच्या डोळ्यांत प्रकाशझोत गेला पाहिजे असा कोन साधून तो टॉर्च मांडीवर घेऊन बसण्याची आणि त्या दिशेनं जनावर दिसतं का पहाण्याची कामगिरी बाबांनी माझ्यावर सोपवली होती आणि काल रात्री मी ती व्यवस्थित पारही पाडली होती. आता त्या प्रकाशाच्या टप्प्यात वाघच आला नाही तर कोण काय करणार? आजही मागच्या बाजूला चाललेल्या भाईच्या कार्यक्रमाला दाद देत असतानाही मी माझं काम विसरले नव्हते.

परतीची वाट बाबांनी वेगळी निवडली होती. ताडोबाची हद्द संपली तेव्हा आमची गाडी एका अगदी चिंचोळ्या पाणंदीतून चालली होती. बैलगाड्यांसाठीची ती रानातली वाट असावी. दोन्ही बाजूंना बोरूची गर्द रानं होती. बोरूच्या काटेरी फांदया गाडीला मधूनमधून घासत होत्या. कपडे फाटू नयेत, हातापायांवर ओरखडे येऊ नयेत, म्हणून कडेला बसलेल्यांनी सावधगिरी घ्यायला हवी होती. माझ्या मागेच बसलेल्या भाईनं आपले पाय गाडीबाहेर काढले होते, ते मी त्याला 'काटे लागून पँट फाटेल' म्हणून आत घ्यायला सांगितले. 'पायाला ओरखडा येईल त्याची काळजी नाही, पँट फाटेल तिची काळजी' असा त्यावर त्यानं शेरा मारून सर्वांना हसवलं आणि पाय आत घेतले. आम्ही सगळे गप्प होतो. बाबांच्या मौनासारख्याच घट्ट काळोखातून जीप चालली होती. अचानक या वाहनाचा अडथळा मध्येच आल्यानं बावरून जागच्या जागी थबकलेला एक वाघ प्रकाशझोतात आला. मी दबलेल्या स्वरात एकदम म्हटलं वाघ!

क्षणात बाबांनी तिथंच गाडी थांबवली. पुढं मी आणि मागं भाई गाडीच्या उजव्या अंगाला होतो. आम्हांपासून तर तो वाघ फार तर हातभर अंतरावर असेल. जरा पुढं वाकले असते तर त्याच्या गळ्याला किंवा कपाळाला स्पर्श करता आला असता, इतकं जवळ उभं असलेलं ते अगदी तरुण, उंचपुरं भरलेल सुंदर उमदं जनावर दिसताच तो वाघ आहे, पुढच्या क्षणी एकच पाऊल पुढे टाकून आमच्यापैकी दोघातिघांना तो सहज ओढत कुठंही घेऊन जाऊ शकेन इतका दांडगा आहे, वगैरे कोणताही विचार किंवा कसल्याही भीतीचा लवलेशही आमच्यापैकी कुणाच्याही मनात उमटला नाही. त्याची उंची सर्वसाधारण वाघांपेक्षा थोडी अधिक होती; त्यामुळे प्रकाशाचे किरण सरळ रेषेत त्याच्या डोळ्यात घुसलेच नव्हते. तसे ते घुसावे आणि दिपून जनावर आंधळं व्हावं याची काळजी घेऊनच त्या टॉर्चचा कोन साधला होता. अशा वेळी डोळे बारीक केल्यानं कपाळाला आठ्या पडलेला वाघ पहायला मिळतो. पण इथं प्रत्यक्ष किरणांचा झोत त्यान्या गळ्यावर, छाताडावर पडला होता आणि त्याच्या त्या उत्फुल्ल - हसा तेजस्वी डोळ्यांतल त्याच्या उमदया काळजाचं ओलसर प्रतिबिंब आम्ही भरल्या डोळ्यांनी पहात होतों, जन्मजन्मांतरीचा जिवलग इतक्या प्रदीर्घ ताटातुटीनंतर अचानक कडकडून मिठीत घेता यावा अशा भरल्या आनंदात आम्ही तिथून निघालो ते थेट आनंदवनात येऊन पोचेपर्यंत मग कुणी कुणाशी फारसं बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हतंच. ताडोबा सोडताना पोटात ओरडणारे ते कावळे कुठे उडून गेले ? थकव्याचं तृप्तीत रूपांतर होताना कोणती प्रक्रिया होते? त्या स्थित्यंतराला किती वेळ लागत असतो? गेले अखंड चोवीस तास आमच्यापासून सतत दूर दूर जात असलेले बाबा नेमक्या कोणत्या क्षणार्धात आमच्याशी पुन्हा एकजीव होऊन गेले? ही अशी कोणती जादू कुणी केली? आणि या सगळ्या घटनेमागचं प्रयोजन कोणतं? अलगअलग सातजणांचं आमचं ते कुटुंब एका धूलिकणाइतकं क्षुल्लक होऊन त्या वाघाच्या पावलाशी असलेल्या मातीत मिसळायला इतकं आसुसलं ते का? ही ओढ कसली ? आजच्या या क्षणी पडणारे हे असले प्रश्नदेखील त्यावेळी मूक झाले होते.

जिम कॉर्बेट हा माझा एक आवडता लेखक त्याच्याच जातीच्या इतरही विश्वमित्रांच्या साहित्यातून माझी खूप वाघांशी ओळख आहे. प्रत्यक्षातदेखील मी बंदिस्तच नव्हे, तर मुक्ता वाघही पाहिले आहेत. बाबांनी तर आयुष्यात कित्येक वाघ पाहिले, मारले आणि खेळवलेही. पण सर्वार्थानं इतकं सुंदर जनावर वाघांच्या जातीत जन्माला येऊन जगाच्या पाठीवर नांदू शकतं असं कुणी सांगितलं असतं तर त्या क्षणापर्यंत आमच्यापैकी कुणालाही ते खोटंच वाटलं असतं. आपल्या जाणिवेच्या कक्षेबाहेरचा विश्वाचा पसारा, स्वतःच्या सामर्थ्याची झलक ही अशी मधूनच कधी तरी दाखवतो. अशा वेळी एक दैवदुर्लभ साक्षात्कार घडल्याचा अलौकिक अनुभव लाभतो. माझ्या बाबतीत तो वाघ आज असंख्य अज्ञात विश्वबांधवांचं एक प्रतीक होऊन बसला आहे. दर भाऊबीजेला तरी त्याला आठवणीनं मनातल्या मनात ओवाळाव वाटतं. लीन होऊन त्याच्या हाती राखी बांधावी वाटते' आपलं माहेर खऱ्या अर्थानं श्रीमंत असल्याचाच हा साक्षात्कार. हसतहसत सारा निसर्गच आपल्या आनंदात सहभागी झाल्याचा साक्षात्कार !

('हंस', दिवाळी १९९१ )

हा लेख उपलब्ध करून देण्यासाठी श्री आमोद घांग्रेकर ह्यांचे मनापासून आभार. 

Thursday, October 6, 2022

कविता 'जगणारी' विदुषी सुनीताबाई देशपांडे

सुनीताबाई देशपांडे म्हटलं, की आपल्या चटकन् आठवतं पु.लं.ची पत्नी. पु.लं.ची पत्नी ही त्यांची ओळख आहेच, किंबहुना तो त्यांचा बहुमान आहे हे नक्की. पण केवळ पु.लंमुळे त्यांना ओळख नाही. एक अतिशय समर्थ आणि व्यासंगी लेखिका आणि विदुषी म्हणून सुनीताबाईंना महाराष्ट्र ओळखतो. त्यांचं कवितेवरिल जिवापाड प्रेम, पु.लं.सोबत संसार करण्याचं विलक्षण कसब आणि त्यांनी केलेलं प्रामाणिक लेखन यातून त्यांच्या आयुष्यातील समृद्धीचा अंदाज लागू शकतो. पूर्वाश्रमीच्या सुनीता ठाकूर यांचा जन्म रत्नागिरीमधे ३ जुलै १९२६ रोजी झाला. त्या एक अत्यंत हुशार विद्यार्थिनी होत्या हे वेगळं सांगायला नको.
 
सुनीताबाईंचे वडिल, सदानंद ठाकूर हे फार मोठे वकील होते. काँग्रेसमधे असणार्या त्यांच्या मामांनी १९४२मध्ये भुमीगत रेडिओ पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. परंतु काही कारणांस्तव ते काम पूर्ण झाले नाही. सुनीताबाईंनी मोर्चाचे नेतृत्वही केले होते. आणि मुख्य म्हणजे त्या एकदा मिलिट्रीच्या गाड्यांच्या ताफ्यालाही सामोर्या गेल्या होत्या! वाटतं, की कदाचित याच सगळ्या अनुभवसंचितातून त्यांच्यामधे एक अढळ कणखरता निर्माण झाली असावी. नाहितर, अवघ्या अस्तित्वावर कवितेचा हळवा संवेदन धागा तोलून धरताना अशी कणखरता आणि खरंतर शिस्तही सांभाळणं किती अवघड आहे! शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या रत्नागिरीहून मुंबईला स्थायिक झाल्या. तिथे त्या ओरिएंटल हायस्कूलमधे शिकवत होत्या. आश्चर्य म्हणजे पु.ल.ही तेव्हा ओरिएंटल हायस्कूलमधे शिक्षक म्हणून काम करत होते. तेव्हा दोघांच्याही कवितेवरच्या नितांत प्रेमामुळे त्यांच्या मनाचा धागा जुळला, आणि दोघांच्याही जीवनाची कविता बहरुन आली! १२ जून १९४६ रोजी त्यांचा विवाह झाला. तोही नोंदणी पद्धतीने.

त्यांनी अनेक चित्रपट व नाटकांमधून उत्तम अभिनयही केला. 'नवरा बायको' या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. 'वंदे मातरम्' या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रसिद्ध झाली. 'राजमाता जिजाबाई' हा एकपात्री प्रयोगही त्यांनी केला. 'सुंदर मी होणार' मधली दीदीराजे ही महत्वाची भूमिकाही त्यांनी साकारली. पु.लं. बरोबर त्यांनी अनेक नाटकं साकारली. 'वार्यावरची वरात' 'बटाट्याची चाळ' अशा अनेक नाटकांमधे त्यांनी भुमिका केल्या. सहचरणीच्या आपल्या भूमिकेत त्यांनी पु.लं.च्या कामात वेळोवेळी हातभार लावला. अर्थात्, त्यांच्यासरख्या इतक्या हरहुन्नरी माणसासोबत संसार करणं हेही कर्तृत्वच म्हणावं लागेल!

सुनीताबाईंना अवघा महाराष्ट्र पु.लं.ची पत्नी म्हणून मुख्यत्वे ओळखत असला, तरी पु.लं.च्या इतक्या भव्य यशामधे सुनीताबाईंचा सिंहाचा वाटा आहे यात संशय नाही. ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ जयंत नारळीकर म्हटले होते, की "पुलं पुरुषोत्तम झाले, ह्यामागचं कारण, त्यांना वेळोवेळी "सुनीत" करणाऱ्या सुनीताताई." या शब्दांतून, या विदुषीचं आपला व्यासंग सांभाळून पतीला अखंड साथ देण्याचं सहजव्रत स्पष्टपणे जाणवतं. पण पु.लं.च्या मनात सुनीताबाईंबद्दल नक्कीच एक सप्रेम आदर होता. तेच एकदा म्हटले होते, की “सुनीता फार बुद्धिमान आहे, मॅक्ट्रिकला गणिताला तिला शंभर पैकी शंभर मार्क मिळाले होते. नंतर बेचाळीसच्या चळवळीत गेली, संगिनी रोखून गोरे शिपाई समोर असताना मोर्चातील सर्व पळाले, ती एकदम ताठ उभी होती! तिला वजा केले, तर बाकी उरेल; पण चार लोकांची असते तशी. वारा प्यालेल्या वासरासारखी माझी अवस्था झाली असती. बंगल्यात राहिलो असतो. ए सी गाडीतून फिरलो असतो. बंगल्यासमोर नाना क्षेत्रातील कलावंतासमवेत मैफिली भरल्या असत्या. एकूण भोगाशिवाय कशाला स्थान राहिले नसते.”
 
यातूनच पुलंच्या जीवनातील सुनीताबाईंचा अविभाज्य वाटा दिसून येतो. या दांपत्याचं जीवन सर्वांगाने समृद्ध होतंच, पण लौकिक अर्थाने समृद्ध असूनसुद्धा सुनीताबाई फार काटकसर करत. त्यांचा हा स्वभाव हे पुलंच्या मिश्किल विनोदांचं अनेकवेळा मूळ होत.
 
कविता हा सुनीताबाईंचा आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय. मुळातच रसिकतेने काठोकाठ भरलेल्या मनाला कविता दूरची कशी बरं वाटेल? ती नेहमीच त्यांच्या जवळ रराहिली. त्यांची होऊन राहिली. अगदी शेवटपर्यंत! लहान मुलांंनी मुग्धपणे आनंदासाठी बडबड गाणी म्हणावीत, श्लोक, स्तोत्र वगैरे अस्खलित म्हणून दाखवावं तशाच त्या कविता म्हणत. त्याच आनंदात, त्याच आस्थेने. अगदी गोविंदाग्रजांपासून कित्तीतरी कवींच्या कविता त्यांना संपूर्ण तोंडपाठ असायच्या. त्या वारंवार म्हणताना, मनात खोलवर होत जाणारं त्याचं चिंतन याचा केवळ अंदाजच आपण बांधू शकतो. कवितेच्या याच उत्कट प्रेमामुळे पुढे पु.ल. आणि सुनीताबाईंनी मिळून काव्यवाचनाचे जाहिर कार्यक्रम सुरू केले. बा.भ. बोरकर, बा.सी. मर्ढेकर, आरती प्रभू अशा काही निवडक कविंच्या कवितांचा मागोवा घेणार्या या कार्यक्रमाला रसिकांची अलोट गर्दी होत असे. ते कार्यक्रम केवळ कवितेच्या प्रामाणिक प्रेमातून केले असले, तरी त्यातून सुनीताबाईंना बरेच नावलौकिक मिळाले. सुनीताबाईंचं मराठी भाषेवर प्रभुत्व तर होतंच, शिवाय बंगाली आणि उर्दू भाषेचाही त्यांचा उत्तम अभ्यास होता.

सुनीता देशपांडेंशी निगडीत आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा जी.एं. सोबतचा पत्रव्यवहार. जी.ए. कुलकर्णींच्या लेखनाचं मोठेपण सुनीताबाई आणि पु.ल. जाणून होते. ते या दोघांच्याही आवडीचे लेखक होते. पण सुनीताबाई आणि जी.ए. कुलकर्णी या दोघांमधलं मैत्र हे काही विलक्षणच होतं. त्यांचा पत्रव्यवहार हा फार मोलाचा होता. पुस्तकांबद्दल, इतर चांगल्या साहित्याबद्दल, आणि अशा आणखी बर्याच गोष्टींबद्दल त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र म्हणजे वाचकाला समृद्ध करणारा संवाद आहे. तो पत्रव्यवहार २००३साली 'प्रिय जीए' या नावाने सुनीताबाईंनी प्रकाशितही केला आहे. 'समांतर जीवन' (१९९२), 'सोयरे सकळ' (१९९८), मनातलं आकाश, मण्यांची माळ (२००२) ही त्यांची प्रकाशित झालेली पुस्तकंही वाचकपसंतीस पात्र ठरली आहेत. सुनीता देशपांडेंचं पुस्तक म्हटल्यावर अनेकांना आठवतं ते 'आहे मनोहर तरी'. १९९० मधे प्रकाशित झालेलं सुनीताबाईंचं हे आत्मचरित्र त्याच्या नावानेही आपल्याला भुरळ घालतं! यामधे त्यांच्या सहजिवनाचा अनुभव अत्यंत प्रामाणिकपणे व्यक्त केलेला आहे. हे पुस्तक प्रकाशित होताच त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता, अजूनही लाभतो आहे.
 
सुनीताबाईंच्या आणि खरंतर या दांपत्याच्या अगणित वैशिष्ट्यांपैकी आणखी एक म्हणजे औदार्य! अनेकानेक सामाजिक साहित्यिक संस्थांना त्यांनी भरभरुन देणग्या दिल्या. विशेष म्हणजे त्या प्रत्येक संस्थेला ती देणगी त्यांची असल्याचे अनुच्चारीत ठेवायला सांगून दिलेल्या त्या देणग्या म्हणजे सामाजिक कर्तव्याचं निर्मोहीपणे जपलेलं भान म्हणावं लागेल. पु.लं.च्या निधनानंतर त्यांनी 'पु.ल.देशपांडे' फाऊंडेशनची स्थापना करुन अशाच अनेक देणग्या निर्वाच्यता ठेऊन दिल्या. देणग्या योग्य त्या संस्थेच्या आणि योग्य त्या हातांतच जायला हव्यात हा त्यांचा कटाक्ष सदैव असे.
 
'इतकं समृद्ध जगल्यावर, मृत्यूही तितकाच वैभवशाली यावा. त्याने उगाच रेंगाळू नये. माणसाला केविलवाणं करु नये' असं एकदा त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या शेवटच्या दिवसांत ग्लानीत असतानाही त्यांच्या ओठांवर कविता असायची! माणसाने इष्टदेवतेचा अखंड जप करावा तसं ग्लानी अवस्थेतही त्यांचं कविता म्हणणं चालूच असे. आयुष्यसाराचं तीर्थ ओंजळीत वहाणारी कविता, तिच तर त्यांची देवता होती. शेवटच्या क्षणापर्यंत या विदुषीने तिला जपलं होतं. ७ नोव्हेंबर २००९ रोजी त्यांच्या देहातून कविता बाहेर पडली!
कविता जगणार्या विदुषीने शब्दांचा निरोप घेतला.

~ पार्थ जोशी

Tuesday, June 28, 2022

संवेदनशील आणि कर्तबगार सुनीताबाई - गोविंद तळवलकर

सुनीताबाई देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व करारी आणि संवेदनशीलही. आथिर्क व्यवहार असोत, मुदिते तपासणे असो वा कुणासाठी मदतीचा हात पुढे करणे असो, त्यात त्यांचा काटेकोरपणा दिसून येई आणि संवेदनशीलताही..

प्रथम पु. ल. आणि आता सुनीताबाई. दोघांच्या निधनामुळे जवळपास ४० वर्षांचा संबंध संपुष्टात आला आणि त्याचबरोबर या काळातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. तसे पाहिले तर दोघांचीही व्यक्तित्व स्वतंत्र होती, पण दोघेही परस्परांवर किती अवलंबून होते, हे सतत जाणवत होते.

काही वेळा कृतक रागाने सुनीताबाई म्हणत, भाईमुळे आपल्याला आपले काही करता वा लिहिता-वाचता येत नाही; पण त्या पु.लं.शी इतक्या समरस झालेल्या होत्या की, त्यांच्या नंतरच्या काळात त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्त्या, त्यांच्या संबंधीचा आथिर्क व्यवहार इत्यादी कामात सुनीताबाई बराच काळ व्यग्र राहिल्या. नाहीतरी पु. ल. असतानाही लिखाण तयार झाल्यावर त्याच्या शुद्धलेखनाची तपासणी, प्रती तयार करणे आणि प्रकाशकाकडे हस्तलिखित देऊन मुदिते आली की, ती अनेकवार तपासणे ही जबाबदारी सुनीताबाईच आवडीने पार पाडीत असत.

मुदितांबाबत त्या नेहमीच कटाक्ष बाळगीत. यामुळेच कुसुमाग्रजांच्या 'विशाखा' या संग्रहाच्या आवृत्तीत चुका आढळल्यावर त्यांनी दुरुस्त्या करून तात्यासाहेबांकडे पाठवल्या. इतके करूनही नव्या आवृत्तीत चुका राहिल्याच.

वेळ मिळाल्यावर त्यांनी पु.लं.च्या नंतर काही लिखाण केले, पण त्यातलेही काही दोघांच्या सहजीवनासंबंधी बरेच होते. पु.ल. व सुनीताबाई यांच्या स्वभावातही अंतर होते. पु.लं.ना सहसा कोणाला दुखवायचे नसे. यामुळे काही वेळा गोंधळ होई आणि तो निस्तरण्याचे काम सुनीताबाईंवर पडे आणि वाईटपणाच्या त्या धनी होत. पु.ल. यांच्या लिखाणावर सर्व संस्कार करण्याप्रमाणेच नाटकांच्या व एकपात्री प्रयोगांची सर्व व्यवस्था सुनीताबाई सांभाळत होत्या. काटेकोरपणा आणि व्यवस्थितपणा हा त्यांच्यापाशी जन्मजातच होता. यामुळे भाषणाचा कार्यक्रम ठरवण्यास कोणी आल्यास त्याची पूर्वपरीक्षा होत असे. पण यामुळे कार्यक्रमात कसलाही व्यत्यय येत नसे. याच त्यांच्या वृत्तीमुळे पु. ल. देशपांडे फौंडेशनतफेर् देणग्या देण्यासाठी निवड करण्यात त्यांचा बराच वेळ जाई.

आता तो काळ संपला...

'पु.ल.' फौंडेशनच्या संबंधातील प्राप्तिकराच्या संबंधात सुनीताबाईंना काही प्रश्न होते. कोणत्या रीतीने कायदा मोडला जाता कामा नये, पण नोकरशहांमुळे नियमांचा भलताच अर्थ लावला जाऊ नये, असे त्यांना वाटू लागले. मग पालखीवालांचा सल्ला घेण्याचे ठरले. पु.ल. व सुनीताबाईंनी हा विषय माझ्याकडे काढला, तेव्हा पालखीवालांशी माझे स्नेहाचे संबंध असल्यामुळे मी भेट ठरवली. आम्ही तिघे गेलो. प्रश्न काय आहे, हे सुनीताबाईंनी स्पष्ट केले व शंका सांगितल्या. पालखीवाला जेव्हा कोणतीही गोष्ट कमालीच्या एकाग्रतेने ऐकत व विचार करत तेव्हा वातानुकूलित दालनातही त्यांच्या कपाळावर घाम जमत असे. तसे झाले आणि सात-आठ मिनिटांत त्यांनी सुनीताबाईंचा विचार पूर्णत: बरोबर ठरवला. ते त्यांना म्हणाले की, तुम्ही चांगल्या वकील झाल्या असता.
          
पु. ल. व सुनीताबाई काही ध्येयवादामुळे भाऊसाहेब हिरे यांच्या मालेगावमधील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक म्हणून काम करत होते आणि त्या आश्रमाचे व्यवस्थापन सुनीताबाई सांभाळत. एकदा महाराष्ट्रातील काही प्रमुख गांधीवादी तिथे राहायला आले असता, आयत्या वेळी त्यापैकी काहींनी गाईचे दूध व त्या दुधाचेच दही हवे, अशी मागणी केली. आयत्या वेळी हे जमणे शक्य नव्हते. तेव्हा सुनीताबाईंनी त्यांना नुसते गाईचे दूध नाही, असे सांगितले नाही, तर तुमचा जर इतका कडक नियम आहे तर गाईचे दूध मिळू शकते की नाही, याची आधी चौकशी करायची होती. तुमचे नियम इतरांना त्रासदायक होऊ शकतात, याचा विचार करायला हवा होता, असे खडसावले.

याच सुनीताबाई मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे, कवी बोरकर, कुमार गंधर्व इत्यादींचा अतिशय आपुलकीने पाहुणचार करताना मी पाहिले आहे. मन्सूर यांचे सोवळेओवळे असे. तेही त्या कटाक्षाने सांभाळत. काव्यात रमणाऱ्या सुनीताबाई सुग्रण होत्या. त्याचा अनुभव मी अनेकदा घेतला आणि ते दोघेही आमच्या घरी येत तेव्हा सौ. शकुंतलाच्या पदार्थांचे कौतुक करून आस्वाद घेत. मित्रपरिवारातील कोणी आजारी पडल्यास नुसती चौकशी करून न थांबता शक्य ती मदत करण्यास सुनीताबाई चुकत नसत. भाषाशास्त्रज्ञ डॉ. कालेलकर यांच्या अखेरच्या आजारात सुनीताबाईच सर्व पाहत होत्या.

अरुण लिमये हे कॅन्सरने आजारी झाले तेव्हा प्रथम अमेरिकेतून औषध आणण्याची कल्पना सुनीताबाईंची व कुमुद मेहता यांची. त्या काळात परकी चलनावर बरीच नियंत्रणे होती आणि सरकारी परवाना लागत असे. त्या दोघी माझ्याकडे आल्या आणि आम्ही तिघांनी बरीच खटपट करून औषध आणण्यात यश मिळवले. नंतर लिमये यांना उपचारासाठी परदेशी पाठवण्याच्या कामी सुनीताबाई व कुमुद मेहता यांचा पुढाकार होता.

पु. ल. यांचे एकपात्री प्रयोग व पुस्तकांची विक्रमी विक्री हे पर्व सुरू होण्यापूवीर् पु.ल. दिल्लीत आकाशवाणी खात्यातफेर् नुकत्याच सुरू झालेल्या टीव्ही विभागात काम करत होते. त्या काळात राजधानीत मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा संकल्प सुटला; पण संकल्प व सिद्धी यात पैसा या परमेश्वराची इच्छा उभी असते. संकल्प करणाऱ्यांनी याचा विचार केला नव्हता. हे पाहून पु. ल. व सुनीताबाई यांनी एक कार्यक्रम केला आणि प्राथमिक खर्चाची सोय करून दिली.

काव्य, ललित साहित्य यांची उत्तम जाण असलेल्या सुनीताबाईंना खगोलशास्त्राचे आकर्षण होते. यासंबंधी त्यांनी काही वाचन केले होते. या आवडीमुळे त्यांनी नारळीकरांच्या संस्थेला मदत केली. कवितेच्या आवडीतूनच पु. ल. व सुनीताबाई यांनी काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. प्रवासातही कवितांची उजळणी होत असे. यामुळे त्यांच्याबरोबरचा प्रवास आनंददायक होत असे.

चाळीसएक वर्षांच्या सहवासात आमचे अनेक सुखसंवाद झाले आणि काही वेळा वादही झाले; पण वाद मित्रत्वाचे व निकोप वृत्तीचे होते. तो काळ आता संपला.

गोविंद तळवलकर
अमेरिका
महाराष्ट्र टाईम्स
१०-११-२००९

Wednesday, April 20, 2022

आहे मनोहर तरी गमते उदास -- (मुकुंद कुलकर्णी)


सुनिताबाई देशपांडे
3 जुलै 1926 - 7 नोव्हेंबर 2009

पुलं मध्ये एक खेळिया दडला होता . त्यांचा स्टेज परफॉर्मन्स अप्रतिम असे . त्यांना सुनिताबाईंची तेवढीच तोलामोलाची साथ लाभत असे . उभयतांनी सादर केलेला बा. भ. बोरकरांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम रसिकांना मंत्रमुग्ध करत असे . पुलंच्या पेटीवादनासोबत सुनिताबाईंच्या गप्पांचा कार्यक्रमही रंगतदार होत असे . स्वतः सुनिताबाई तरल कवीमनाच्या होत्या . पुलंच्या स्मरणार्थ झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पद्मा गोळे यांच्या दोन कविता सादर केल्या होत्या , त्या ऐकणे हा अवर्णनीय आनंदानुभव होता . कविता वाचन कसे असावे याचा तो आदर्श वस्तुपाठ होता . त्या स्वतः उत्तम परफॉर्मर होत्या . महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पुल यांच्या अर्धांगिनी सुनिताबाई या स्वतः उत्तम साहित्यिक होत्या . इ.स.1945 मध्ये त्यांची भाईंशी भेट झाली . दि.12 जून 1946 रोजी भाई व सुनिताबाई विवाहबंधनात बांधले गेले . पूर्वाश्रमीच्या सुनिता ठाकूर या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या भाईंशी विवाहबद्ध झाल्या . पुल आणि सुनिताबाई यांनी ओरिएंटल हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काम केले होते . सुनिताबाईंनी पुलंबरोबर अनेक नाटकात काम केले होते . रत्नागिरी येथे सुनिताबाईंचे पुलं बरोबर लग्न झालं होतं . सुनिता ठाकूर ही देखणी , बुद्धीवान मनस्वी तरुणी रत्नागिरीच्या समृद्ध निसर्गाच्या साक्षीने पुलंची अर्धांगिनी झाली .

सुनिताबाईंनी लिखाणाला सुरूवात फार उशीरा केली . इ.स.1990 मध्ये त्यांचे ' आहे मनोहर तरी ' हे पारितोषिकपात्र पुस्तक प्रसिद्ध झाले . आहे मनोहर तरी हा आंबटगोड आठवणींचा गुलदस्ता आहे . ही मराठी साहित्यातील एक सर्वोत्तम कलाकृती आहे . आहे मनोहर तरी .... सर्वांनाच खूप आवडले . अनेक भाषांत त्याची भाषांतरे झाली . ' मनोहर छे पन ' गुजराथी अनुवाद सुरेश दलाल , ' है सबसे मधुर फिर भी ' हिंदी अनुवाद रेखा देशपांडे , ' अँड पाईन फॉर व्हॉट इज नॉट 'इंग्रजी अनुवाद गौरी देशपांडे तसेच उमा कुलकर्णी यांनी आहे मनोहरचा कन्नड अनुवाद केला आहे . भारतभरातल्या वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहोचले आहे.

पु.ल. जसे रसिकांचे भाई तशा सुनिता देशपांडे सुनीताबाई . सुनिताबाईंनी वंदे मातरम आणि नवरा बायको या मराठी चित्रपटात तसेच सुंदर मी होणार राजेमास्तर या नाटकातून भूमिकाही साकारल्या आहेत . तसेच त्यांचा एकपात्री प्रयोग राजमाता जिजाऊ ही खूप गाजला होता . ' प्रिय जी ए ' या त्यांच्या जी ए कुलकर्णी यांच्या बरोबरच्या पत्रव्यवहाराचे पुस्तक हा तर मराठी साहित्यातील एक अमूल्य ठेवाच आहे . आहे मनोहर तरी , प्रिय जी ए , मण्यांची माळ , मनातलं अवकाश , सोयरे सकळ , समांतर जीवन या आपल्या साहित्यकृतींनी सुनिताबाईंनी मराठी वाङमय समृद्ध केले आहे . जी ए कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला ' प्रिय जी ए पुरस्कार ' सुनिताबाईंना इ.स. 2008 साली मिळाला होता .

सुनिताबाईंच्या प्रतिभेला जी हिरो प्रतिमा अभिप्रेत होती ती श्रीकृष्णासारखी सर्वगुणसंपन्न होती . राकट कणखर तरीही अति मृदू , तरल . फ्रेंच पायलट , लेखक सेंट एक्झुपेरी हा सुनिताबाई आणि जी ए यांना भावणारा समान दुवा होता .' दि लिटिल प्रिन्स ' या पुस्तकात तो लिहितो , " what is most impossible is invisible . " असं काहीसं झाल होतं . पुलंनी या विषयावर नाटक करावं अशी सुनिताबाईंची इच्छा होती , पण पुलनी ते फारसं मनावर घेतलं नाही . पिग्मॕलियनच ती फुलराणी हे रुपांतर पुलंनी केलं . बर्नार्ड शॉ आणि पुल हे एकाच जातकुळीचे , सहज सुंदर आणि निर्मळ . तसेच जी ए , सुनिताबाई , खानोलकर ग्रेस हे समविचारी . जी ए आणि सुनिताबाई यांच्या पत्रव्यवहारात हे पदोपदी जाणवतं . ' सन विंड अँड स्टार्स ' हे एक्झुपेरीच पुस्तक त्यांच्या पत्रसंवादात येतं . जी ए आणि सुनिताबाई यांच्या पत्रसंवादात जगभरातील साहित्याचे संदर्भ तर येतातच , पण एकमेकांविषयीचा आदर , आस्था ही व्यक्त होते ." विपरीत अनुभवांची वेदनाच बरोबर घेऊन चालणारा एक हळवा , मनस्वी कलावंत जी एं च्या रुपाने भेटला आणि सुनिताबाईंनी त्याच्यावर स्नेहाचा वर्षाव केला . " अरुणा ढेरेंची ही प्रस्तावना यथार्थच आहे .

कार्लाईल या सुप्रसिद्ध इंग्रजी लेखकाच्या आणि त्याच्या पत्नीवरच्या लेखावरून पुल आणि सुनिताबाई यांच्यात वाद होतात आणि सुनिताबाईंची लेखणी धारदार होते . तोच संघर्ष पुढे आहे मनोहर मध्ये सुनिताबाई आणि भाई यांच्या माध्यमातून अवतरला आहे . काही असलं तरी गाणारा , अभिनय करणारा , विनोदांनी लोकांना तणावमुक्त करणारा , स्नेह्यांचा प्रचंड गोतावळा बांधून असणारा , सर्व लोकांचा हिरो हाच त्यांचा हिरो होता . तसाच तो सर्वगुण संपन्न लिटिल प्रिन्सही होता . भाई आणि सुनीताबाईंच हे मैत्र खरोखरच अलौकिक होतं

अत्यंत समृद्ध , परिपक्व सहजीवन जगलेल्या या महाराष्ट्राच्या लाडक्या दंपतीचे आदरपूर्वक स्मरण . सुनिताबाईंना सादर प्रणाम !

मुकुंद कुलकर्णी ©

Tuesday, December 14, 2010

पुलंची खडूस बायको

सुनीताबाई ग्रेट होत्या. त्यांनी आयुष्यभर वाईटपणा घेण्याचं धाडस केलं. चांगुलपणा सोपा असतो. तो बाजूला ठेवून जाणूनबुजून वाईटपणा घ्यायला, मोठं धाडस लागतं. पुलंच्या अंगभूत चांगुलपणाला बाईंच्या ‘खडूस’पणाचं संरक्षक कवच लाभलं म्हणून महाराष्ट्राचं ते अक्षरधन सुरक्षित राहिलं.

कोणी काही म्हणो, जनसामान्यांमध्ये सुनीताबाईंची प्रतिमा ‘पुलंची खडूस बायको’ अशीच होती.

सुजाण साहित्यरसिकांना सुनीताबाई या संवेदनशील लेखिका आणि उच्च अभिरुचीच्या आस्वादक म्हणून ठाऊक आहेत. पण, अशांची संख्या किती? पुलंसारख्या अष्टपैलू खेळियाचा चाहता असायला वाचक असण्याचीही गरज नव्हती. त्यांना ऐकणं-पाहणं पुरेसं होतं. साहजिकच त्यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा. त्यांच्या तुलनेत सुनीताबाईंचं लेखन आस्वादण्यासाठी आवश्यक प्रगल्भ, उच्च साहित्यिक अभिरुची लाभलेल्या रसिकांची संख्या किती असेल? त्यातही सुनीताबाईंचं सर्वात गाजलेलं पुस्तक होतं ‘आहे मनोहर तरी’. ते गाजलं ते त्यातल्या वादग्रस्ततेमुळे. ‘पुलंच्या बायको’ने जाहीरपणे पुलंची उणीदुणी काढली आहेत, याची मनुष्यसुलभ पण साहित्यिक निकषांवर कमअस्सल उत्सुकता त्यामागे होती. या पुस्तकाच्या ‘यशा’ने सुनीताबाईंच्या, तोवर एका उच्च वर्तुळात आणि सांगोवांगीत असलेल्या, ‘खडूस’पणावर शिक्कामोर्तब झालं..
..बाईंची पहिली भेट हा सगळा गदारोळ होण्याच्या आणि सुनीताबाईंची स्वतंत्र ओळख समजण्याच्या आधी झाली. एकोणीसशे त्र्याऐंशीच्या उन्हाळ्यात दोन शाळकरी मुलांनी ‘१, रूपाली’ची बेल वाजवली, तेव्हा सेफ्टी डोअरच्या आतलं दार उघडलं गेलं. समोर बाई. गो-यापान. त्रासिक मुद्रा.

‘पु. ल. आजोबा आहेत का? त्यांना शाळेत नाट्यशिबिराच्या उद्घाटनाला बोलावायचंय.’

‘बाळांनो, ते आराम करताहेत. त्यांना बरं नाहीये. ते तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकतील असं वाटत नाही.’

बाई ‘बाळांनो’ असं म्हणाल्या, पण त्यात ‘माया’ जाणवली नाही.

तेवढ्यात आतून हाक.. ‘सुनीता, येऊ दे त्यांना आत.’

आत पु. ल. सोफ्यावर गुडघे दाबत बसलेले. त्यांनीही ‘नकार’च दिला, पण कसा, तर त्यांच्या मिष्कील शैलीत हसत हसत म्हणाले, ‘तू घेणार आहेस का शिबीर. दहावीत गेलायस का? अरे वा! आमचा भय्या वैद्यही मुलांना काय काय उपक्रम करायला लावतो. मला आवडलं असतं रे यायला. पण, माझे ना गुडघे खूप दुखतायत. डॉक्टरनी मनाई केलीये कुठे जायला. माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला.’

आम्ही खूष. तेव्हा वाटलं, पु. ल. किती चांगले आहेत आणि बाई काय खडूस आहेत.. आता असं वाटतं, बाईंनी उगाच वाईटपणा घेतला. पण, त्यांच्या जागी त्या बरोबर होत्या. पुलंचा सांभाळ करणं, ही त्यांनी जाणीवपूर्वक घेतलेली जबाबदारी होती. ती त्या ११० टक्के पार पाडत होत्या. आमची कोवळी मनं वगैरे सांभाळण्याचं काही कारण नव्हतं.

पुढे ‘आहे मनोहर तरी’वरचा गदारोळ वाचून- प्रत्यक्ष पुस्तक वाचण्याच्या आधी- बाईंची हीच इमेज पक्की झाली. बाई स्वत:ला समजतात कोण? पु. ल. आहेत म्हणून त्या आहेत, त्यांची जी काही ओळख असेल समाजात, ती ‘पुलंची बायको’ म्हणून आहे. एवढ्या मोठ्या ‘पदा’साठी बाईंना जरासे पु.ल. सहन करावे लागले असतील, तर त्यात एवढा काय त्रागा करायचा? इतर नवरे- ते पु. ल. नसताना- यापेक्षा किती वाईट वागतात. या गदारोळावर पु. ल. गप्प राहिले. त्यांनी सुनीताबाईंचं कौतुक केलं.

लोकांच्या मनात पु. ल. मोठे झाले. बाईंना मोठं मानणारे तेव्हा फारच थोड्या संख्येने असतील.
यानंतर बाईंशी पुन्हा भेट झाली ती ‘मित्रहो’, ‘रसिकहो’, ‘श्रोतेहो’ या पुलंच्या भाषणांच्या संग्रहांच्या निमित्ताने. ही भाषणं कॅसेटवर रेकॉर्डेड होती. ती ऐकून त्यांची मुद्रणप्रत तयार करण्याचं काम आलं. पुलंच्या कामाला नकार देणं शक्यच नव्हतं. या कामात तर पुलंशी थेट भेट होण्याचा बोनस होता. (फक्त बोनसच मिळाला ते सोडा.) एव्हाना पु. ल. थकले होते. पावलाला पाऊल जोडून चालण्याची कसरत त्यांना करावी लागे. साहजिकच सगळं ठरवलं ते बाईंनीच. ‘या कॅसेट आम्ही तुम्हाला देणार नाही. त्यांची कॉपी होऊ शकते. वॉकमन घेऊन आलात, तर कॅसेट देईन. तुम्ही इथेच बसून मुद्रणप्रत तयार करायची,’ त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
‘किती वाजता येऊ?’

‘आम्ही सहाला उठतो. साडेसहानंतर कधीही या. लवकर आलात तर चांगलं. सात वाजता या.’

सकाळी सात वाजता कपभर चहा घेऊन कामाला सुरुवात. बाहेर हॉलमध्ये काम सुरू होतं. पु. ल.-बाई आत. आठ-साडेआठला बाईंनी सांगितलं, ‘नाश्ता करायला या.’

नाश्त्याला पोहे होते. या दोघांशी ‘गप्पा’ काय मारणार? ते केवढे मोठ्ठे, आपण किती लहान, अशा विचाराचा दबाव. पण, तरीही वर्तमानपत्र, त्यातलं काम, संपादकांची मैत्री वगैरे बोलणं होत राहिलं. भीड चेपल्यावर ‘पोहे छान झाले आहेत’ अशी दाद दिली, तर बाई म्हणाल्या, ‘शेजारच्या जोशी हॉस्पिटलच्या कँटीनमधून आलेले आहेत. आमचा नाश्ता तिथूनच येतो. माझे हात काही आजारामुळे थरथरतात. साधं पातेलंही नीट पकडता येत नाही. स्वयंपाक कुठून करणार? दुपारचा डबा एकीकडून येतो, रात्रीचं जेवण दुसरीकडून.’

हे सगळं सांगताना बाई मॅटर ऑफ फॅक्ट बोलत होत्या. कुठेही ‘पाहा पुलंसारख्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची अवस्था. म्हातारपणाचे भोग’ वगैरे करवादेपणाचा लवलेशही नाही.

नंतर पुन्हा मुद्रणप्रतकार हॉलमध्ये, कोचावर आणि कथानायक-नायिका आतल्या खोलीत. नंतर लक्षात आलं की मुद्रणप्रतकाराला त्याचं काम नीट करता यावं, त्याला डिस्टर्बन्स होऊ नये, म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. एकदा- बाईंचा डोळा चुकवून आल्यासारखे- पु. ल. हॉलमध्ये आले. एका खुर्चीत बसले. हातात पुस्तक. पण लक्ष पुस्तकाबाहेर. मुद्रणप्रत तयार करण्याच्या कामाकडे.

‘स्पीड चांगला आहे हो तुमचा.’

हे आइसब्रेकिंग.

‘हे कामच आहे माझं.’

‘बरं आहे का भाषण? जमलंय का नीट?’

‘छान आहे.’

तेवढ्यात बाई बाहेर आल्या. पुलंनी पुस्तकात डोकं घातलं. त्या शांतपणे म्हणाल्या, ‘भाई, त्यांना डिस्टर्ब करू नकोस. ते आपल्यासाठी काम करतायत.’

काही वेळ शहाण्या मुलासारखं पुस्तक वाचून पु. ल. पुन्हा आत.

एके दिवशी ‘सुयोग’ची मंडळी नाटकांचं मानधन घेऊन आली. हा तर पैशांचा व्यवहार. पण, बाईंनी त्यांना सांगितलं, ‘ते भाईंच्या पुस्तकाचं काम करतायत. फार कॉन्सन्ट्रेशनचं काम आहे. त्यांना डिस्टर्ब करायला नको. आपण आत बसू.’

त्यांचा पुढचा व्यवहार डायनिंग टेबलावर झाला.

बाईंचा हा ‘खडूस’पणा असेल, तर तो ग्रेट होता. पुलंच्या कामाची आणि ते करणा-याची किती काळजी! पुलंनी लिहिलेला शब्द न् शब्द बाईंनी जपून ठेवला होता. तो जादूचा पेटाराही एकदा पाहायला मिळाला.

नंतर कधीतरी मुंबईच्या फेरीत त्यांनी आठवणीने एनसीपीएवर मासे जेवायला बोलावून घेतलं. आमच्या ‘१, रूपाली’मधल्या नाश्त्याच्या चर्चामध्ये कधीतरी माशांचा विषय झाला होता. ‘आईच्या हातचे मासे खिलवतो’, असंही बोलून गेलो होतो. तो योग आला नाही. पण, हे लक्षात ठेवून, काम संपून बराच काळ लोटलेला असताना बाईंनी आठवणीनं मासे खायला बोलावून घेतलं होतं.

बाई खडूस होत्या?

असतील. पु. ल. गेले, त्याची आदली संपूर्ण रात्र आम्ही काही पत्रकार पुण्यात ‘प्रयाग हॉस्पिटल’समोरच्या फुटपाथवर मुक्काम टाकून होतो. कोणत्याही क्षणी ‘दिनेश’ येईल आणि तो आल्यावर ‘निधन’ जाहीर होईल, सरकारी इतमाम टाळण्यासाठी बाई कदाचित पहाटेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतील, अशी भीती होती. त्यामुळे, सगळे रात्रभर ‘पहा-या’वर. मध्यरात्रीच्या सुमारास तिथे आलेल्या जब्बार पटेलांनी विचारलं, ‘पुलंना पाहिलंस का? चल दाखवतो.’ मागच्या खिडकीतून अचेतनाच्या सीमारेषेवर शांतपणे पहुडलेले पु. ल. दिसले. दार उघडून बाई बाहेर आल्या. त्या कोणाला ओळखण्याच्या स्थितीत नव्हत्या. ओळख दिली नाही. त्या अगदी शांतपणे, स्थितप्रज्ञतेने, जणू तिथे आपला जन्माचा जोडीदार मृत्युशय्येवर पडलेला नाहीच, अशा रीतीने बोलत होत्या.

त्या इतक्या कोरड्याठाक होत्या का?

तसं असतं, तर पुलंच्या जयंतीच्या एक दिवस आधी बाई कशा गेल्या? हा निव्वळ योगायोग?

बाई ग्रेट होत्या. त्यांनी आयुष्यभर वाईटपणा घेण्याचं धाडस केलं.
चांगुलपणा सोपा असतो. तो अंगभूत असतो. तो बाजूला ठेवून जाणूनबुजून वाईटपणा घ्यायला, मोठं धाडस लागतं. पुलंच्या अंगभूत चांगुलपणाला बाईंच्या ‘खडूस’पणाचं संरक्षक कवच लाभलं म्हणून महाराष्ट्राचं ते अक्षरधन सुरक्षित राहिलं. ‘खडूस बायको’विना पु. ल. अपूर्ण होते..
..खडूस बायको मात्र संपूर्ण होती.

- मुकेश माचकर
१५ नोव्हेंबर २००९
प्रहार

Friday, June 13, 2008

एक पत्र भाईसाठी - सुनीता देशपांडे

पु.ल. गेल्यानंतर आलेल्या त्यांच्या वाढदिवशी सुनीताबाईंनी जागवलेल्या या पुलंच्या आठवणी... ' महाराष्ट्र टाइम्स ' च्या १२ नोव्हेंबर २००० च्या अंकातून पुनर्प्रकाशित

प्रिय भाई,

परवाच्या १२ जूनला तू गेलास. गेलास म्हणजे कुठे गेलास? दृष्टीआड गेलास म्हणावं, तर तसा तू अनेकदा दृष्टीआड होतच होतास. कधी पलीकडल्या खोलीत, तर कधी पलीकडल्या गावात किंवा पलीकडल्या देशातही. परवा गेलास तो पलीकडल्या जगात, एवढाच छोटासा फरक. एरवी तू तर या क्षणीही माझ्या डोळ्यांसमोरच आहेस. ऐकतो आहेस ना, मी काय सांगतेय ते?

आपण एकमेकांना पाहिलं, एकमेकांत गुंतत गेलो आणि दीड-दोन वर्षांनंतर, तुझ्या हट्टाखातर मी कायदेशीर लग्नबंधन स्वीकारलं. योगायोग म्हणावा अशी एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? आपण लग्न रजिस्टर केलं, तो दिवसही नेमका १२ जूनच होता. परवा कुणी तरी म्हणालं, 'भाईंचा जीव त्या १२ जून या तारखेसाठी घुटमळत होता.' लोक काहीही बोलतात. त्या दिवशी दुपारी एक वाजून बावीस मिनिटांनी तुझी प्राणज्योत अखेर मालवली, कुडीचा श्वासोच्छवास थांबला, हे झालं वेळापत्रक. पण खग्रास ग्रहणाचे वेध काही काळ आधीच लागले होते. तू अगदी केविलवाणा झाला होतास. डॉक्टरांनीही आशा सोडली होती. प्रयत्न फक्त चालू ठेवले होते. आजूबाजूची हवा खूप काही सुचवत होती; पण काहीच स्पष्ट सांगत नव्हती.

तुला ठाऊक आहे, आपल्या डॉक्टर दिवट्यांसारखाच हा आपला डॉक्टर प्रयागही एक देवमाणूस आहे. विज्ञाननिष्ठ, पण विज्ञानाच्याही चालू घडीच्या मर्यादा जाणणारा आणि म्हणूनच असेल, चमत्कारांवरही अविश्वास न दाखवणारं. त्यांचं सगळं हॉस्पिटलच तुझ्या एका प्राणासाठी धडपडताना पाहून मी म्हटलं, “डॉक्टर, पुरे आता.'' त्यांनी घाईघाईने उत्तर दिलं, “तुम्ही लक्ष घालू नका. Miracles can happen. आपण प्रयत्न करू."

Miracles! चमत्कार! होय, आजचे चमत्कार हे उद्याचं वास्तव ठरू शकतात.

आठवणी...आठवणी...आठवणी! भोगलेल्या रंगीबेरंगी सुखदुःखांच्या-हळुवार, फक्त आपल्या कानातच गुंजन घालणार्‍या, घरगुतीही आणि काही काळ वाजतगाजत राहणाऱ्या-रंगणाऱ्या, सार्वजनिकही, काही काSळ? छे छे! अनादी अनंत काळाच्या संदर्भात क्षणार्धाच्याही नव्हेत. कालप्रवाहात पाSर वाहून जाणाऱ्या. पण या क्षणी त्या जिवंत आहेत. याच घरात माझ्या सोबतीने वावरताहेत. घरातल्या माणसांप्रमाणेच त्या त्या घराच्या भितींनाही तिथे वास्तव्य करणारे रंग, गंध, स्पर्श आपले वाटत असणार. त्यांनाही ह्या साऱ्यांच्या आठवणी येतच असतील, तिथे रेंगाळणाऱ्या.

तुला आठवतंय? एके काळी मी संपूर्ण महाभारत वाचून काढलं होतं. 'व्यासोचिष्ट जगत्‌ सर्वम्‌' म्हणजे नेमकं काय, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या अल्पमतीच्या प्रमाणात त्या काळाशी क्षणभर एकजीव झालेही. हो, क्षणभरच म्हणायचं आज त्यातलं त्या आठवणींत कितीसं उरलंय? तपशील वाहून जातो, तत्त्वाचा अशा आपल्या अस्तित्वातच मुरतो. तो कितपत मुरलाय याचा अंदाज घ्यायचं म्हटलं, तरी त्यासाठीच्या वादविवादाला, सहमतीला किंवा विचारांच्या तफावती दाखवायलाही दुसरं कुणी तरी लागतंच ना?

समोर तू, प्रत्यक्षात अबोल असतास तरी तो अंदाज माझा मला घेता आलाही असता कारण तुला मुळी वादविवादात कधी रसच नसायचा. रस होता तो संगीतात, अभिनयात, मुख्यत: संभाषणात. या तिन्ही शेतमळ्यांतला सुगंध, ओलावा, तुझ्यात सहज मुरायचा. शेत पिकायला उपजत बी-बियाणं लागतं हे खरंच; पण असलं खतपाणीही लागतं. या दोन्ही गोष्टी तुझ्यात जन्मजातच होत्या. म्हणून तर तू आनंदाच्या बागा फुलवू शकलास, पण शेताला मशागतही लागते, पीक जोमदार यायला शेतमजुरांचा घामही तिथे गाळावा लागतो. हे तुला कळत का नव्हतं? पण श्रेय द्यायला तू कधीच राजी नसायचास.

अधूनमधून मी वादही घालत असे; पण उपयोग नसायचा. मी दु:खी व्हायचे, अनेकदा तुझा रागही यायचा. मीही अपरिपक्वच होते ना?

मग लक्षात यायला लागल, याची सगळी निर्मिती ही, उत्तुंग इमारती, मनोरे, कळस दोन्ही तीर साधणारे पूल यांचीच आहे. हसतखेळत केलेली. डोंगरकपारीत सुंदर लेणीही याला सहज कोरता येतात. त्यासाठी मातीच्या, दगड-धोंड्यांच्या स्पर्शाचा ध्यास असावा लागत नाही. त्यांचं अस्तित्व गृहीतच धरलं जातं.

पण मला ही अक्कल यायला तुझा जीवच पणाला लागायला हवा होता? शहाणपणा येण्यासाठी ही किंमत द्यावी लागणार, याची कल्पना असती तर आजन्म वेडीच राहायला तयार होते रे मी! गेल्या चोपन्न वर्षांत मी किती वाद घातले! आपण एकमेकांच्या सहनशीलतेचा अंतच पाहिला जणू! मी ऐकवत राहून; तू न बोलता. क्वचित एखादा शब्द बोलायचास, तोही अगदी चपखल बसणारा. तुझ्या अफाट शब्दसंपदेने मला प्रथमपासूनच मोहून टाकलंय, ती मोहिनी अखेरपर्यंत माझा ताबा सोडणार नाही, एवढी जबरदस्त आहे साधी 'उपदेशपांडे'सारखी मला दिलेली पदवीदेखील (खरं तर टोमणाच) मी डोक्यावर घेऊन मिरवलीच ना!

लहान मुलांशी खेळांवं, तसा शब्दांशी तू मजेत खेळायचास. ३०-३५ वर्षांपूर्वी “हसवणूक' हा संग्रह प्रकाशित झाला, त्या वेळी या नव्या संग्रहाचं नाव काय ठेवायचं? 'हसवणूक' की 'फसवणूक'?-हा प्रश्न पडला. दोन्ही नावं तूच सुचवलेली; पण मला निर्णय घेता येईना. तू पटकन 'हसवणूक' असं लिहून दिलंस आणि आनंदाने माझे डोळे पाणावले. या क्षणीही तो प्रसंग आठवताच पुन्हा मनाची तीच गत झाली आहे. 'जे आनंदेही रडते, दु:खात कसे ते होई?' हे कवी अमरच असतात बघ! मी उगाच सांगत नाही. हेही गोविदाग्रजच नाही का म्हणून गेले?

"फ आणि ह. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मधे पकडून नियतीने चालवलेली आपल्या साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली को, त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची 'हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं?' हे तूच लिहून ठेवलंयस. तुला ते जमलं, सर्वांनाच कसं जमणार?

फुलाच्या आसपास सुगंध दरवळतो, तसा तुझ्या आसपास आनंद दरवळत असायचा. "आनंदाचे डोही आनंद तरंग." म्हणून तर तू सर्वांना आवडायचास. तुलादेखील गर्दी खूप आवडायची आणि तीही सदैव तुझ्याभोवती गोळा व्हायची. ही देवघेव अगदी नैसर्गिक होती. झऱ्याचं पांथस्थाशी नातं असावं तशी. पण तुझ्या जीवनात मी आले ती अधूनमधून तरी एकान्ताची मागणी करत.

एकान्त म्हणजे पोकळी नव्हे. एकाकीपणाही नव्हे. आपण हतबल झालो की, पोकळी निर्माण होते,पण खंबीर असलो, तर आव्हानं तेवढी सामोरी येतात. त्यांना तोंड देणं सोपं नसतं हे खरं, पण शक्‍य असतं हेही खरं. स्वतःचं बळ आपण एकवटू लागलो की, हळूहळू त्याचा अंदाज यायला लागतो आणि त्या उत्खननात एखादी रत्नांची खाणही अचानक नजरेला पडू शकते.

तुला सार्वजनिक आपण प्रिय, तर वैयक्तिक 'मी'ची ताकद ज्याने त्याने अजमावायला हवी हा माझा अट्टाहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे, याचा प्रत्यय मला सतत येत राही, तर नेमकं त्याच गोष्टीचं विस्मरण तुला सतत होत राही.

अशा अनेक बाबतींत तू आणि मी एकमेकांपासून खूप दूर होतो. जणू ' दोन धृवांवर दोघे आपण'. सदैव माणसांत रमणारा तू, तर माणसांपेक्षा मानवेतर जीवसृष्टी-वनस्पतीसृष्टी मला अधिक प्रिय.

तूही जर इतर चारचौघांसारखाच 'एखादा कुणी' असतास ना, तर मग निर्मितीची, साहित्य-संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असती, तरी मी त्या कशानेही आकर्षिले गेले नसते, हीच शक्यता अधिक आहे. मला भावली ती तुझ्यातली निरागसता. तुझा 'मूल'पणा. तुझी लबाडीही पटकन उघड व्हायची. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा, त्यात तरबेज व्हावं, त्यासाठी मेहनत करावी, हे तुझ्या स्वभावातच नव्हतं. व्याख्यानांत, लिखाणात, तू असल्या गुणांची प्रशंसा करायचास. पण प्रत्यक्षात, त्यापेक्षा गप्पा माराव्या , लोळत पडावं , गाणं ऐकावं , फार तर पुस्तकं वाचावी , चाळावी हे तुला अधिक प्रिय. निर्मितीक्षम कलाकाराची साधना सतत डोक्यातच कुठेतरी मूकपणे चालूच असते का ?

तू लिहीत वगैरे नसायचास तेव्हाचा तुझा वेळ तू फुकट घालवतो आहेस, असं मला चुकूनही कधी वाटत नसे. Gained=Lost म्हणजेच Lost=Gained हे फिजिक्समधलं गणित मलाही माहीत आहे. पण तरीही काहीही फुकट जाऊ नये यासाठी मी सदैव जागरूक मात्र असते. नातवंडं दूध पितानादेखील थोडं इकडे तिकडे सांडतात, आणि मी “अरे असं सांडू नवे रे, नीट प्यावं, '” असं म्हटलं की, “जाऊ दे ग" म्हणून हसून सोडून देतात. हा संवाद वरचेवर घडतो, पण त्यातून दोऱ्ही पक्ष धडा घेत नाहीत. विचार येतो, हेच ठीक आहे. सगळेच काटेकोर वागले, तर जगणं किती एकसुरी बेचव होईल!

बोरकरांची ओळ आहे, 'चंदन होओनि अग्नी भोगावा” जिवंत असताना, मृतावस्थेतही, कितीही उगाळलं तरी आणि डोवटी जळून जातानादेखील, त्या चंदनासारखंच आपल्या प्रकृतिधर्माप्रमाणे मंद दरवळत राहणं सोपं नाही. ज्या महाभागाला हे जमेल, त्याला अग्नीदेखीळ भोगता येईल. ही खरी आत्मा आणि कुडीची एकरूपता. तो चिरंजीवच. नायं हन्ति न हन्यते.

तू गेलास आणि लोक हेलावून मला म्हणाले, "वहिनी, भाई गेले, तरी तुम्ही एकट्या आहात, पोरक्या झालात असं मानू नका. काहीही लागलं, तरी संकोच न करता सांगा, कुठल्याही क्षणी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत." हा खरचं त्या साऱ्यांच्या मनाचा मोठेपणा. तो त्यांनी आपापल्या परीने व्यक्त केला. कारण त्यांना कसं कळावं की, मी या क्षणीही एकटी नाही आणि पुढेही कधी एकटी नसणार. किंवा आयुष्यभर एकटीच होते आणि एकटेपणाच माझ्यासारखीचा प्राण असतो.

तुझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतला, त्या क्षणीच मी एक प्राण सोडला आणि दुसऱ्या स्वतत्रं जीवनात प्रवेश केला. Robert Graves ची एक कविता आहे, मूळ शब्द आज निटसे आठवत नाहीत. पण मनाच्या गाभ्यात अर्थ मात्र या क्षणी जागा झालाय तो काहीसा असा -मृत्यूतून पुनर्जन्म होणे ही मोठीशी जादू किंवा अशक्यप्राय़ गोष्ट नव्हे. जीवन बहुधा पूर्णांशाने विझलेलं नसतंच. एखाद्या समर्थ फुंकरीने वरची राख उडून जाते. आणि आतला तेजस्वी जिंवत अंगार धगधगायला लागतो... आणि हेही तितकंच खरं की ते निखारे पुन्हा फुलायला लागतात, त्या वेळी त्यांच्यावरची आपण उडवून लावलेली राख आपल्याभोवती जमून दुसऱ्या कुणाच्या तरी फुंकरीची वाट पाहत आपल्याला लपेटून गुपचुप पडून असते. अहिल्येच्या शिळेसारखी.

एकटेपणा हा एकटा कधीच येत नसतो. सोबत भला मोठा आठवणींचा घोळका घेऊनच येतो. कवी खानोलकरांसारखा ‘तो येतो आणिक जातो.’ येताना कधी कळ्या घेऊन आला, तरी जाताना त्यांची फुलं झालेली हाती पडतील की निर्माल्य, हे त्याला तरी कुठे माहीत असतं? त्या क्षणी जे भाळी असेल, ते स्विकारायचं की नाकारायचं याचा निर्णय घेण्याचं तेवढं स्वातंत्र्य ज्याच्या त्याच्या हाती असतं. स्वातंत्र्य! ऍब्स्ट्रॅक्ट, कॉंक्रिट काहीही नाही-"

अस्तित्वाला जाग येते, त्या क्षणीच श्वास सुरू होतो. आईच्या गर्भात फार तर तिच्या श्वासावर जगता येईल. पण पुढे प्रत्येक श्वास आपला आपल्यालाच घ्यावा लागतो. तेवढाच आपला अधिकार. तो टिकवण्यासाठी किती धडपडायचं ते मात्र आपल्या हाती असतं.

पण मुळात कसलीही धडपड तुझ्या स्वभावातच नव्हती. देवळातल्या देवासारखा तू पुढ्यात येईल त्याचा स्वीकार करत गेलास. मग ते पंचामृत असो, नाहीतर साधं तुळशीपत्र. त्याबद्दल तक्रारीचा चुकून एखादा शब्ददेखील कधी तुझ्या तोंडून बाहेर पडत नसे. याचा अर्थ, तुला निवड करता येत नव्हती, किंवा “सुखदु:खे समे कृत्वा' असा काही तुझा स्वभावविशेष होता, असं नव्हे. कुठे सभा-समारंभाला जाताना मी कपाटातून काढून देईन तो पोशाख तू सहजगत्या चढवत असस. पण कधी गडबडीत मी ते काम तुझ्यावरच सोपवलं, तर तुझ्या कपाटात घडी घालून रचून ठेवलेल्या ८-० बुदाशर्टांतला हवा तो मधलाच कुठला तरी छानसा-बहुधा तुला अधिक आवडणारा बुदाशर्ट तू ओढून काढून अंगावर चढवत असस आणि विस्कटलेला बाकोचा ढिगारा पुन्हा रचून ठेवण्याचं काम खुदाल माझ्यावर टाकण्यात तुला काहीही चूक वाटत नसे. अज्ञा प्रकारची तुझी कोणतीही कृती जाणीवपूर्वक नसायची. केवळ अंगवळणी पडलेली, पुरुषप्रधान संस्कृतीतून परंपरागत चालत आल्याने सहज स्वीकारलेली अश्ली ती तुझी सवय होती. परावलंबनाच्या तुझ्या आवडीचाही तो भाग असू हकेल. बहुधा दोन्ही.

असा तू देवमाणूसही; आणि माझ्या वाट्याला आलेला आळशी नवराही. हाती येईल ते स्वीकारायचं आणि त्याच्याशी खेळत बसायचं. पुढे तू अभिमानाने ते नावही स्वीकारलंस, पण खरं तर तू जन्मजातच 'खेळिया' होतास. अशा माणसासाठी इतर कुणाला काही करावं लागतच नाही.

तुझ्यासाठी मी काय केलं? तुझ्या तहान- भुकेचं वेळापत्रक सांभाळलं, माझ्या परीने नवी-जुनी खेळणी पुरवली, अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले. त्यात फार तर क्वचित कधी एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती? कलावंत 'तू' होतास. शब्दकळेची गर्भश्रीमंतीही 'तुला' लाभली होती. येताना कंठात आणि बोटांत सूर घेऊनच तू जणू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास, तरी तुझा तो दीर्घायुषी सोबती अजून बराच काळ मागे राहणार आहे.

तू गेलास उद्या मीही नाहीशी होणार पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजाने चमकतच राहील ना ?

असा तू वेगळा आणि मीही वेगळी. मग हा इतका प्रदीर्घ प्रवास आपण एकत्र केलाच कसा. हा प्रश्न इतर कुणाला पडला, तरी आपणां दोघांना पडायचं कारणच नव्हतं. कसा विरोधाभास आहे पहा! एकत्र प्रवास, पण आपापल्या मार्गाने. वास्तव्य एकाच घरात, पण जगणं स्वतंत्र. असा वावर चालतो, तेव्हा स्वाभाविकच अधूनमधून एकमेकांचे एकमेकांना धक्के बसतात; पण सहजपणे सॉरी' म्हणून क्षणात आपण आपल्या दिडोने पुढे जातो, आपापल्या कामांत मग्न राहतो.

तसं खरं सांगायचं तर माझ्यातही कर्तृत्वशाक्ती अगदीच काही कमी नव्हती. मी अथक परिश्रम करू शकते-खूप सोसू शकते-सतत धावपळ करू शकते-अनेक गोष्टी निभावून नेऊ शकते, हा आत्मविश्वास माझ्यात खूप होता आणि काही चुकलंच तर स्वतःहून ते मान्य करण्याचा प्रामाणिकपणाही होता. माणसाला आणखी काव हवं असतं? या साऱ्यासकट आपलं उद्दिष्ट ठरवणं इतकंच ना? क्षीण म्हणा किंवा प्रभावी म्हणा. स्रोत तोच. फक्त त्याची दिशा ठरवायचा क्षण येतो, तेव्हा कोणतं वळण घ्यायचं, याचा निर्णय घेण्याचा प्रश्न निर्माण होतो. तो प्रश्न मी पटकन सोडवून टाकला आणि हातमिळवणी केली. म्हणजे माझा हात तुझ्या हातात दिला की, तुझा हात माझ्या हातांत पकडला? असले प्रश्न सोडवत बसायला कधी वेळच मिळाला नाही म्हणा किंवा ते महत्त्वाचे वाटावे, असे प्रसंगच आले नाहीत म्हणा; कारण कोणतंही असेल, पण त्यावाचून काही अडलं नाही हे मात्र खरं.

वय वाढत जातं, त्याच्या जोडीने उरला दिवस अल्प, घोडे थकुनी चूर' ही जाणीवही वाढत जाते. उन्हं उतरत जातात, तशी आपली शक्ती कमी होत जाते; पण त्याचबरोबर अनुभवांचं माप भरून ओसंडायला लागतं. व्यक्तिमत्त्व प्रगल्भ-एका अर्थी ऐश्वर्यसंपन्न होत चालल्याचा साक्षात्कार होण्याचाही संभव असतो.

आशा-निराशेच्या पालखीतून असा डोलत डोलत प्रवास चालू राहतो. या वाटेवर, “कुणासाठी? कश्यासाठी? कुठे? आणि कुठवर?' असले प्रश्नही अधूनमधून भेटत असतात आणि त्यांच्या सोबतीनेच शेवटी दिगंबरात विलीन व्हायचं असतं. या क्षणी खानोलकर मदतीला आला, तशीच अगदी व्यासांपासून ते अद्ययावत कवींपर्यंत कुणालाही-आठवातल्या अगदी कुणालाही-साद घालावी, तो आनंदाने हजर होतो. त्यालाही भविष्यात वाचकाच्या मनात जगण्याची ओढ असतेच ना?

कवी ग्रेसच्या ओळी आहेत ,

' क्षितीज जसे दिसते ,
तशी म्हणावी गाणी।
देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी ॥
गाय जशी हंबरते ,
तसेच व्याकुळ व्हावे ।
बुडता बुडता सांजप्रवाही ,
अलगद भरुनी यावे ' .


तुझं व्यक्तिमत्व असं विचारपूर्वक संस्कारीत होत गेलेलं नव्हतं. तू पिंडाचाच सुसंस्कृत होतास. जन्मजात कलावंत होतास , तसाच विचारवंही जन्मजातच होतास. ती तुझी श्रीमंतीही होती आणि मर्यादाही होती. आपली संस्कृतीच पुरुषप्रधान आहे , त्याच पाळामुळातून तुझं पोषण होत गेलं आणि अंगभूत कृतज्ञताबुध्दीने आपल्या परीने तीच संस्कृती तू जपलीस. ती तुझी सहज प्रवृत्तीच होती , प्रकृती होती. मराठी ' विश्वकोषा ' त किंवा ' हूज हू ' मध्ये तुझ्या नावाची नोंद कलावंत म्हणून होईल. तशीच ' विचारवंत ' हे ही विशेषण तुझ्यामागे लावलं जाईल. पण आपण उभयतांच्या जीवनकोशात माझ्यासमोर ठाकलास तो त्या पुरुषप्रधान संस्कृतीचा आधारस्तंभच जसा! प्रज्ञेअभावी नवे , तर निव्वळ आळसापोटी तू विचार करण्याचं टाळत आलास. जे सहज आयते मिळतात , त्यासाठी बुद्धी कशाला शिणवावी ? मनात विचार घोळवण्यापेक्षा सूर घोळवणं हे केव्हाही अधिक आनंददायी , स्वत:लाही आणि भोवतालच्यांनाही. ही लबाडी म्हण किंवा पळवाट म्हण , मला कळायची पण त्याची तुला चिंता नव्हती. मी का कोणी परकी होते ? हक्काची बायकोच ना तुझी !

लग्नाच्या नोंदणी-अर्जावर सही करताना मीच नव्हता का सामाजिक बांधिलकी वगैरेला राजीनामा दिला? लग्नाची काय आणि समाजाची काय, बांधिलकी एकदा मानली की, पर्याय दोनच. एक तर फारकत घेऊन मोकळं व्हायचं, किंवा स्वतःला विसरून जबाबदारी स्वीकारायची. मी हा दुसरा पर्याय निवडला. स्वखुषीने, आनंदाने स्वीकारला.

मला एका योगायोगाचं नवल वाटतं : तुला शारीरिक दु:ख अजिबात सहन होत नसायचं आणि परावलंबन खूप आवडायचं; आणि तुला हा जो होवटला आजार आला, तोही शारीरिक दु:ख, वेदना, असलं काहीही न आणता फकत परावलंबन घेऊनच आला. ते परावलंबनही सतत वाढत जाणारं. त्याने माझी जबाबदारीही वाढवत नेली. मनावरचा ताण वाढत गेला आणि आतून खूप थकत गेले रे मी! याची जाणीव तुलाही होत असावी, अज्ञी अधूनमधून मला शंका येत राही. तू असा केविलवाणा व्हायचास तेव्हा न चुकता ते जुनं गाणं मनात जागं व्हायचं: बघु नको5 मजकडे केविलवाणा, राजसबाळा.' तुझा तो राजसबाळपणा अखेरपर्यंत तुझ्यात येऊन वस्तीला राहिला होता. त्याचं ओझं माझ्या मनावर येऊन पडत राहिलं तेही तुझ्या अखेरपर्यं, आणि आता अजया आठवणींतून माझ्याही अखेरपर्यंतच.

तुझा आजार संथ गतीने पण वाढतच चालला होता, पण शेवटी शेवटी तू अगदीच दीनवाणा झालास, तेव्हा मात्र माझा धीरच सुटला. नाही नाही ते विचार मनात यायला लागले. तुझी आई ९५ वर्षांची होऊन गेली. वाटलं, यालाही असंच दीर्घायुष्य लाभणार्‌ असेल, तर या अवस्थेत माझ्यानंतर याचं कसं होणार? आजवरचं तुझं आयुष्य हेवा करण्याजोगं होतं, म्हणूनच कसं भर्रकन गेल्यासारखं वाटलं. थोडंथोडकं नव्हे, ऐंशी वर्ष असं सुंदर, संपन्न जगल्यानंतर मृत्यूही वैभवशालीच असावा. रेंगाळू नये, तुला त्याने आणखी केविलवाणा करू नये, असं तीव्रतेने वाटत होतं आणि योगायोगाने म्हणा किंवा तुझ्यावर खऱ्या अर्थाने जीव टाकणाऱ्यांच्या इच्छाशक्तीच्या बळावर म्हणा, घडलंही तसंच.

तू गेलास आणि सगळेच किती हळहळले! लहानांपासून थोरापर्यंत, सगळेच. जणू आपल्या घरातलंच कुणी वडीलधारं माणूस आपल्याला सोडून गेलं, असं आतड्याचं दु:ख सर्वत्र व्यक्‍त झालं. सुन्नाट, धीरगंभीर, घरंदाज. वाटलं, स्वत:चं हे वैभव पाहायला क्षणभर तरी तू जवळपास हवा होतास. मिरवणूक, भाषणं, अंत्यविधी असलं काही काही नको म्हटलं आणि ते मानलं गेलं.

लोकप्रिय माणूस हा सार्वजनिक होतो. त्याच्या मृत्यूलाही लोक शांतता लाभू देत नाहीत. पण तू सर्वार्थाने भाग्यवान ठरलास. प्रत्येकाने वैयक्तिक रीत्या मूक अश्रूंनी तुला निरोप दिला. सर्वांच्या वतीने मिनिट-दीड मिनिटाची सरकारी मानवंदना. बस्स!

बारा जूनला तू गेलास, त्याला आता बराच काळ लोटला. तुझ्या अखेरच्या आजारपणापासून आजच्या या घडीपर्यंत तुझ्या संदर्भात जे जे काही घडलं, ते कुणीही हेवा करावा असंच. आणि प्रत्येक वेळी मलाही तेच तेच वाटत राहिलं, हे पाहायला इथे तू हवा होतास-तू हवा होतास.

या आठवणीदेखील किती लहरी असतात! कधी मैत्रिणी होऊन येतात, तर कधी वैरिणी! कधी यावं, किती काळ थांबावं, कधी नाहीसं व्हावं, सगळे निर्णय त्याच घेतात, आपल्या संमतीची त्यांना पर्वाच नसते. पुन्हा पुन्हा भेटीला येतात, जा जा म्हटलं तरी रेंगाळत राहतात, कधी कधी प्रदीर्घ मुक्कामच ठोकतात. आपण कशालाही डरत नाही, या अहंकाराचा धुव्वा उडवण्यासाठीच जणू यांचा जन्म!

आठवणी अनावर होतात, डोकं जड होतं, ही गर्दी, हा भार सहन तरी कसा करायचा? आज माझ्या उघड्या डोळ्यांना तू समोर दिसत नाहीस. मिटले की लगेच समोर येऊन ठाकतोस. चक्र सुरू होतं. अज्ञा या आठवणी, सुख-दु:खांच्या. माझ्या बाबतीत आज दुःखांच्याच अधिक. कुणी दुसऱ्याने दिलेल्या दु:खाच्या नव्हे, माझ्या स्वत:च्याच स्वभावदोषातून माझ्या हातून वेळोवेळी घडलेल्या अगणित चुकांच्या आणि त्याबद्दल आता होत राहिलेल्या पश्चात्तापाच्या.

थोडीथोडकी नव्हे अखंड ५४ वर्षांची ही वाटचाल. प्रवास म्हटला की , सहाजिकच चढ उतार आले. पण आज या घटकेला कशाचाही शीण जाणवत नाही. थकवा येतो तो सतत येत रहाणाऱ्या या आठवणींचा. थकल्याभागल्या मनावर असं अधिपत्य गाजवू नये , एवढाही पोच त्यांना नसतो. तू या सगळ्यातून सुटलास. माझ्या मनाच्या एका बंदिस्त कोपऱ्यात कायम वास्तव्याला आलास. शांतपणे इतर सर्वांच्या नकळत माझ्या सोबतीला येऊन राहिलास. जसा खळखळ पण निर्धास्त जगलास , तसाच निर्धास्तपणे चिरकाल विसाव्याला येऊन राहिलास.

मला तरी आता करण्यासारखं राहिलंच आहे काय ? तसा व्याप खूप आहे पसारा बराच आवरायचा आहे. तुझ्या दोन-तीन नव्या पुस्तकांचं कामही व्हायचं आहे. म्हटलं तर काम भरपूर आहे , पण ते ओझं मीच डोक्यावर घेतलं पाहिजे , असं थोडंच आहे ? मदतीला धावून येणारे खूप स्नेही सोबती आहेत. सगळं निभावून न्यायला ते समर्थ आहेत. मी स्वत: काय त्यांच्या मदतीने काय आणि उरलेलं सारं काही त्यांच्यावरच सोपवून काय हळूहळू सगळं काम पुरं होईल आणि त्यातलं काहीही झालं नाही तरी कितीसा फरक पडणार आहे ? या संदर्भात सत्य एकच आहे , ते म्हणजे या घरांत खेळण्याऱ्या हवेतून श्वास घ्यायला माझ्या जोडीला आता तू नसणार.
अशा वेळी काय करावं ?
(मंगेश पाडगांवकरांचं नाव घेऊन)
सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालावं इतकंच.


सुनीता देशपांडे
महाराष्ट टाईम्स
१२ नोव्हेंबर २०००

Wednesday, January 24, 2007

आहे मनोहर तरी. (सुनीता देशंपाडे)

प्रकाशक :- श्री. पु. भागवत, मौज प्रकाशन गृह,पुणे
सर्व कॉपीराईट्स - मौज प्रकाशन गृह


हे आत्मचरित्र नाही.

आठवणींच्या प्रदेशातली ही स्वैर भटकंती. पाखरांसारखी क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर ,कुठूही. दिशाहीन. पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत केलेली.

आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेली माणसे यात नाहीत. म्हणजे त्यांना मी विसरले असे नव्हे. पण या विशिष्ट भटकंतीत ती भेटली नाहीत इतकेच. आणि जी भेटली, तीही त्या त्यासंदर्भात भिडली तितकीच इथे उमटली. त्यांचेही हे संपूर्ण चित्र नव्हे.

पाण्यात ओढस लागण्याचे प्रसंग आयुष्यात सतत येत असतात. ही स्थळातून जळात आणि जळातून स्थळात जाण्याची ओढ (की खोड?) टागोरांनाही होती असे त्यांनी म्हटलेय. मग माझ्यासारख्या सामान्यांची काय कथा ?

प्रत्येकाने स्वतःच्या शालेय जीवनात आपण पुढे कोण होणार यावर एकतरी निबंध लिहिलेला असणारच. स्वतःचे ते आदर्श चित्र निबंधाच्या वहीतच राहते. पुढे कधीतरी प्रौढवयात आपल्यातले ते नार्सिससचे फूल दरवळायला लागले की कालप्रवाहाच्या सतत हलणाऱ्या पाण्यात दिसणारे स्वतःचे प्रत्यक्ष प्रतिबिंब आणि ते वहीतले चित्र यांचे काहीतरी नातेजाणवते का ?

अशा अनेक प्रश्नांचा हा आलेख.आमच्या संसारातल्या सततच्या धावपळीतून गेल्या चार-पाच वर्षात अधून मधून वेळ मिळेल तसे, थोडेथोडे तुकडया तुकडयांनी केलेले हे लिखाण. कोणतीही योजना न आखता केलेले. त्यामुळे सुरूवातीचा मूडही अधूनमधून बदलणे स्वाभाविकच आहे.

एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकेल सांगता येत नाही.

कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे जलद भरभरून येतात आणि आकाश धुऊन स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रूपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळी च रांगोळी. धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर नक्षत्र.

पळसखेडच्या दिशेने पक्ष्यांचे लक्ष थवे येतात आणि त्यांतलं एखादं वेल्हाळ पाखरू गात माझ्या झाडावर उतरतं.

चोहूकडून नातवंडं येऊन बिलगतात आणि `गोष्ट सांग' म्हणून चिवचिवाट करतात....हे सगळं किती लोभसवाणं आहे ! मग माझ्याच पापण्यांत पुन्हा पुन्हा हे असं धुकं कांजमा होतंय ? `आहे मनोहर तरी गमते उदास ' अशी ही मनाची अवस्था असताना या पाखरांना मी गोष्ट तरी कोणती सांगू ?

एक होता राजा आणि एक होती..
(एक कोण होती ?)
... आणि एक होती परी की एक होती म्हातारी ?की...
(दुसरं कुणी नव्हतंच ?) फक्त...
एक होती परी आणि ती झाली म्हातारी ?........

सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच. ही साठा प्रश्नांची कहाणी.सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे. अपूर्ण मात्र नक्कीच.

सध्या असा एक मूड आहे की ज्याला `आताशा मी नसतेंच इथे' मूड म्हणता येईल.म्हणजे कुणाला भेटू नये, कुणी येऊन डिस्टर्ब करू नये, एकटेच बसावे, स्वतःतच राहावे,असा. पडून किंवा बसून राहावे.- डोळे उघडे किंवा मिटलेले, कसेही. पण सभोवारचे काहीच न पाहता, त्यात अगर या इथे न राहता. सारा कल्पनेचा किंवा विचारांचा खेळखेळत, त्याच जगाशी एकरूप होत, तिथली सुखदुःखे भोगत.अशा वेळी डोळ्यांना दुसरचं जग दिसत राहतं. कानांची स्थिती Sir Thomas Browneच्या शब्दांतल्या नाईल नदीसारखी होते.`and Nilus heareth strange voices' अशी. धूसर स्वप्नं पडत राहतात, विरत राहतात. `मी झालेंय निळं गाणं- निळ्या नदीत वाहणारं- निर्मात्याबरोबरच' ती हीच अवस्था का ? पद््माबाईना विचारायला हवं.

आयुष्याच्या सुरूवातीला, जिथून आयुष्य फुलायला लागते अशा वळणावर एक, आणि शेवटी शेवटी, म्हणजे जिथून आयुष्य उतरणीला लागले अशा वळणावर एक, असे दोन जबरदस्त मित्र मला लाभले. दोघेही अगदी भिन्न प्रकृतीचे,प्रवृत्तीचे. मीही तीच राहिले नव्हते. पार बदलून गेले होते. मधल्या काळात तिसऱ्याच एकाच्या सहवासात स्वतःला पूर्ण विसरून, चक्रावून - अगदी पायाला चाके लावून- त्याचा संसार केला. तोही जबरदस्त होता म्हणून मी या बंधनात अडकले की... तो अगदीच मूल होता म्हणून त्याचेच खेळणे करून मनसोक्त खेळत राहिले ? की दोन्ही ?

आज पाहावे तिथे सगळी स्वच्छ निराशाच दिसतेय. आकाशदेखील कुठे निळे नाही.सगळीकडे एकच राखी रंग, अगदी निर्मळ किंवा विशुध्द कारूण्याची राखी रंगच्छाटा.Grayof the purest melanchol. झाडे देखील स्तब्ध, विचारमग्न उभी आहेत. आईच्या डोळ्यांत गलबल दिसली तर कडेवरचं मूल कसं बावरून तिला नुसतं बिलगून राहतं तशी पानांची सळसळही पूर्णपणे विराम पावली आहे. माझ्या मनात कसले विचार येताहेत त्याच्याशी याबाहेरच्या जगाचे इतके जवळचे नाते असेल? कोण जाणे. पण कदाचित साऱ्यासजीव-निर्जीव सृष्टीशी माझे अज्ञात नातेही शेवटी त्याच मूलतत्त्वांतून-पंचमहाभूतांतून - सारी सृष्टी निर्माण झाली ना ? मग सारे काही अदृष्ट धाग्यांनी जोडलेलेनसेलच कशावरून ? समोरच्या खिडकीच्या लोखंडी गजांचे माझ्या रक्तातल्या लोहाशी नाते असेलही. समोर कोण राहतो ? त्याची-माझी ओळख नाही, त्याचे नाव मला माहीत नाही.अरे वेडया, आम्हा बाहेरच्या लोकांपासून संरक्षण मिळावे म्हणून खिडकीच्या झरोक्यात तू उभे केलेल हे लोखंडी पहारेकरी आमच्याही नात्यातलेच आहेत हे कसे विसरलास ? हा विचार आला आणि सगळे काही मूर्खपणाचेच वाटायला लागले. मूर्खपणाचे की भीतिदायक ?की आशादायक ?

मूड्स तरी किती अस्थिर असतात ! येतात, जातात. पण मुक्कामाला आले की कधीतरी हेपाहुणे जाणार आहेत हे भानच नाहीसे होते, आणि आपण त्यांच्यात अगदी बुडून जातो.

प्रचंड वेगाने स्वतःभोवती आणि आपल्या जन्मदात्या भोवती फिरणारी ही पृथ्वी अशीच,या मूड्ससारखीच, पाय रोवायला आधारभूत आणि स्थिर वाटते. या वेगाचे आणि तिच्याही हतबलतेचे ज्ञान झाले की भीतीने आपले पाय डळमळू लागतात. अज्ञानात खरेच सुख आहेहे आपला अनुभव हरक्षणी सांगत असतो, तरीही आपण ज्ञानाच्या मागे धावतो आणि आपल्या मुलाबाळांनाही ज्ञानी करण्यासाठी धडपडतो. हा शहाणपणा म्हणायचा की वेडेपणा ?

माझ्या लहानपणी आमच्या घरात बालदत्तोत्रेयाच्या चित्राची एक फ्रेम होती. रंगीत पाटावर मांडी घालून बसलेल्या वर्ष-दीड वर्षांच्या बालकासारख्या गोड चेहऱ्याच्या हसतमुखदत्तात्रेयाचं ते चित्र मला खूप आवडायचं. आईने मग ती फ्रेम मलाच दिली. तिच्या देवांजवळच भिंतीवर, माझा हात पोचेल इतक्या उंचीवर खिळा मारून घेऊन त्यावर मी ती टांगली. रोज बागेतून निवडून निवडून फुले आणायची आणि त्यांचा हार करायचा. आंघोळ झाल्याबरोबर त्या फ्रेमची काच पुसून त्या देवाला पुन्हा गंध लावायचं आणि तो फुलांचा हार घालायचा. मग हात जोडून डोळे मिटून मी प्रार्थनाकरीत असे. ही प्रार्थना निश्चित कोणती होती, त्यातून मी त्या देवाशी कोणता संवाद साधत होते, यांतले काहीच आता आठवत नाही. पुढे कधीतरी मी नास्तिक होत गेले आणि पक्की नास्तिक झाल्यावर त्याचा अभिमानही बाळगू लागले. आजही मी नास्तिकच आहे, अगदी पक्कीच. पण आज वाटते,नास्तिक्य ही अभिमान वाटण्यासारखी गोषट असली तरी त्यात मनःस्थिती मात्र नसते आस्तिक्य हे बिनबुडाचे असते खरे, पण त्या अज्ञानात सुख नक्कीच असते. इथे सुखाचा अर्थस्थेर्य,आधार, शांती, असाही असेल. त्यामुळे मला माझ्या नास्तिक्याचा अभिमान असलातरी आस्तिकांचा हेवा वाटतो. आणि दुर्देवाची गोष्ट अशी की आस्तिक माणूस हा विचारान्ती पुढे नास्तिक होऊ शकतो,, पण खरा नास्तिक हा आस्तिक कधीच होऊ शकत नाही.

आप्पांना जाऊन आता सात वर्षे होऊन गेली. त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षाच्या आतच आईही गेली. जन्माला आलेलं प्रत्येकजण असं जातच असतं. शिवाय त्यांची वयेही झाली होती. हे सगळे खरे असले तरी अशा व्यवहारी दृष्टिकोनातून मला आप्पा-आईकडे पाहता येत नाही. मी स्वतः नको तितकी व्यवहारी आहे तरीही. त्यांनी मला जन्म दिला, माझे पालनपोषण केले. वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षापर्यंत मी त्यांच्याच छत्राखाली वाढले. त्यानंतर मी स्वंतत्र जीवनक्रम स्वीकारला, तरी शेवटपर्यंत आमचे संबंध कुठेही दुरावले नव्हते. उलट माझे वय वाढत गेले तशी प्रेमाची किंमत मला अधिकाधिक जाणवू लागली आणि त्यांच्या मृत्यूमुळे पोरकेपण आले.

पण यात नवल ते काय ? आई-वडील गेले की मुले मोठी असली तरी पोरकी होतातच.मग हळूहळू दुःख कमी कमी होत जाते आणि पुढे सोईस्कर विसरही पडायला लागतो. अधून मधून आठवणी तेवढया शिल्लक राहतात. बऱ्या,वाईट, दोन्हीही माझ्या बाबतीत ही नेसर्गिक वाटचाल आहेच. पण आणखीही काही घडतेय. ते निश्चित काय ते निरखण्याचा का हा प्रयत्न आहे ?

आप्पांना मृत्यू मोठा छान आला. वयोमानाप्रमाणे ते थकत चालले होते, शरीरदुबळे होत होते, स्मृतीही अंधूक होत चाललीय का अशी अधून मधून शंका येई. पण समाधानी वृत्ती आणि प्रेमळपणा जराही कमी झाला नव्हता. निवृत्तीतला आनंद मनसोक्त घेत आणि परावर्तित करीत त्यांचे वय वाढत होते. त्यामुळे त्यांनी आपल्यातून कधी जाऊच नये असेच त्यांच्या सहवासात आलेल्या सर्वांना वाटे. त्यांचा शेवटचा आजारही आला तसाच झटकन त्यांना घेऊन गेला. अवघ्या बारा तासांत सकाळी एकरा-साडेअकराला त्यांना हार्ट-अँटॅक आला. लगेच उपचार सुरू झाले,आणि पुण्या-मुंबईला मुलांना फोन गेले. रात्री आठनंतर एकेक गाडी येऊन पोचली आणि सगळी मुले त्यांना भेटली. आम्ही दोघे सर्वात शेवटी दहा वाजता येऊन पोचलो. सलाइन,ऑक्सिजन वगेरे लावलेल्या अवस्थेत ते डोळे मिटून पलंगावर पडले होते. भोवतीला सगळे आप्तस्वकीय. मी त्यांच्या कानाशी जाऊन म्हणाले,""आप्पा मी आलेय. कसं वाटतंय तुम्हाला ?""

त्यांनी मोकळा असलेला हात माझ्या पाठीवरून फिरवत क्षीण आवाजात म्हटलं,"
"किती ग माझ्यासाठी माझ्या बाळांना त्रास झाला !"

"आप्पा, मला ओळखलंत ?"

"माझे भाई नाही आले ?"

"म्हणजे त्यांनी बरोबर ओळखले होते. मग त्यांनी माझ्याकडे थोडे पाणी मागितले. डॉक्टर सकाळी आप्पांना अँटॅक आला म्हणता क्षणी आले होते ते आता घरी जायला निघाले. मी दारापर्यंत त्यांच्याबरोबर जात त्यांना म्हटले,"
"आप्पांचं सर्व काही फार छान झालंय. त्यांना सुखानं जाऊ दे. आता उगाच त्यांना नाकातोंडात नळ्या घालून जगवत ठेवू नका."

"डॉक्टर मला म्हणाले,""त्यांना आलेले अँटॅक इतका जबरदस्त आहे की आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आता ते त्यातून वाचणार नाहीत. सकाळपासून इतका वेळ राहिले ते केवळ त्यांच्या विलपॉवरवर. सगळ्या मुलांना भेटायची त्यांची इच्छा होती.असावी. ती आता पूर्ण झाली आहे. मला नाही वाटत आता ते फार वेळ राहतीलसे" "आणि तसंच झालं. दहा-पंधरा मिनिटांत आप्पांनी प्राण सोडला.

बिचाऱ्या आईचा आजार मात्र साडेतीन-चार महिने रेंगाळला. तिला स्ट्रोक आला आणि अर्धांग लुळं पडलं. हळूहळू स्मृती,वाचा,भान सगळे जात चालले; आणि नेमके तिला नको असलेले परावलंबित्व आले. पेसा,मनुष्यबळ,काही कमी नव्हते.पण अपंग होऊन तिला जगायचे नव्हते, आणि तेच नशिबी आले. ती आजारी पडताच आम्ही मुंबईला आणले. तिथे सगळी मुले,नातवंडे,लेकी,सुना-सगळीसगळी होती. त्या तीन-चार महिन्यांत आळीपाळीने तिच्या जवळ बसत होतो.कामे वाटून घेऊन करत होतो. तिऱ्हाइताला पाहताना वाटावे, आई किती भाग्यवान !कुणी कमी पडू देत नाहीत. पण प्रत्यक्षात मात्र हे सगळे कर्तव्यबुध्दीने,नाइलाजास्तव चालले आहे याची जाणीव मला अस्वस्थ करीत होती, अद्याप करतेय.

समजा, तिच्या ऐवजी मी अशी आजारी असते, तर ती सारखी काहीतरी औषधोपचार,सेवाशुश्रूषा,नवससायास करत राहिली असती.

तिचा हा शेवटचा आणि खराखुरा एकमेव आजार. यापूर्वी, गेल्या इतक्या वर्षांच्या काळात ती कधी आजारी पडलीच नाही असे नाही. पण डॉक्टरपेक्षाही स्वतःचे औषधपाणी स्वतःच करत ती त्या अवस्थेतही घरकाम जमेल तसे करतच राही. ती अंथरूणात आराम करतेय आणि दुसरं कुणी तिची सेवाशुश्रूषा करतंय असं दृश्यप्रयत्न करूनही माझ्या डोळ्यांपुढे येऊ शकत नाही. परावलंबित्व ही गोष्टच तिला नमानवणारी. आणि दुर्देवाने नेमकी ही अवस्था मला पुरेपूर जाणवत होती, तरीही तिच्या सेवेला सगळे सोडून मी द्यावा तितका वेळ दिला नाही.

आई गेली. मुलेबाळे,नातवंडे लेकीसुना,अगदी भरले घर होते, तरी तिच्या शेवटच्या क्षणाला ती एकटीच होती. ती तर गेली, चांगली म्हातारी होऊन गेली. मग आता यानंतर त्याबद्दल लिहून मी दुःख उकरून काढतेय का ? हे दुःख नव्हे; हा वरचेवर होणारा मनाचा गोंधळ आहे. उलटसुलट विचारांचा, भावनांचा गुंता आहे.तो सोडवता आला तर पाहावा, त्यातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करावायासाठी हा सलारा खटाटोप.

या तिच्या आजाराच्या तीन-चार महिन्यांत,दोन-तीन दिवसअसे सर्व मिळून फार तर पंधरा-वीस दिवस मी तिच्याजवळ असेन. उरलेल्या वेळात माझ्या स्वतःच्या व्यापातच गुंतले होते, घर-संसार,प्रुफे,नव्या कविता वाचनाच्या कार्यक्रमाची तयारी, आमच्या ट्रस्टच्या एका मोठाय व्यवहाराची कामे आणि त्यानिमित्त आवश्यक ती धावपळ, घरातले इतर किरकोळ आजार, अडचणी, वगेरेवगेरे. पण हे सर्व चालू असताना आपण आईसाठी काही करू शकत नाही ही खंतहीसतत होतीच. पण फक्त खंत नव्हती. या काळात पूर्वनियोजित कामांसाठी एक-दोनछोटे प्रवास झाले. बोरकरांच्या कविता वाचनाचे मुंबई-पुण्याचे पहिले दोन आमंत्रितांसाठीचे वगेरे मोठे कार्यक्रम झाले. अशा वेळी, या कार्यक्रमांत काही अडथळा तर येणार नाही ? ऐनवेळी, अगदी नेमक्या त्याच दिवशी तिचा आजार ही आमची अडचणही होऊन बसली होती, आणि नेमक्या याच घटनेच्या मनाला अधिक यातना होत. आपण स्वतः किती स्वार्थी,कृतघ्न,ढोंगी आहोत असे वाटे. स्वतःचीच जेव्हा जाऊन राहत असे तेव्हा ?

हॉस्पिटलमधे मी आईच्या उशाशी बसले होते. माझी थोरली वहिनी आपल्या छोटया नातींना घेऊन आली होती. तासभर त्या छोटया मुलींनी खूप करमणूक केली.मोठया गोड पोरी. सगळ्यांना कौतुक. आईच्या शेजारी त्यांना पाहताना एकदममन कुठल्या कुठे गेले. वाटले, ही पलीकडे झोपलेली म्हातारी, माझी आई,हीहीएकेकाळी अशीच छोटी,चुणचुणीत,गोड होती असेल. तिचेही तिच्या आईवडिलांनी असेच कौतुक केले होते असेल...

फार बेचेन झाले. करूणेनं मन भरून आलं, डोळ्यांवाटे वाहू लागलं. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या या फेऱ्यात सुरूवातीच्या टोकाला कुठेतरी त्या छोटया पोरी आहेत,मध्याच्याही पुष्कळ पुढे कुठेतरी मी आह आणि अगदी शेवटच्या टोकाला आई आहे.आईची जागा काही काळाने मी घेणार, त्या वेळी ? त्या वेळी माझ्या वाटयाला आलेल्या फेऱ्याच्या सुरूवातीला कुणी,मधे कुणी,कुठेच कुणी आपले असे दिसेना.किंबहुना, तो फेराच नाहीसा झाला होता, फक्त शेवटच्या टोकाला मी लोंबकळत होते.खरे तर आपली ही अवस्था इतर कुणालाही क्लेश देत नाही, असा क्लेश होऊ शकेल असे लागेबांधे गुंतलेले आपल्याला कुणीही नाही; चला- खऱ्या अर्थाने आपण मुक्तआहो. आपल्यामुळे इतर कुणालाही दुःख नाही, ही केवढी आनंदाची घटना आहे !मग मला आनंद न होता हे असं तिसरचं काही कां होतंय ?

रात्र झाली आहे. नुकतेच डॉक्टर तपासून गेले. शरीराबरोबरच आईचं मनही अस्थिर होऊ लागलं आहे. स्मृती फार अंधूक होत चालली आहे आणि असंबध्दता वाढते आहे. वाचाही अस्पष्ट आणि असमर्थ होऊ लागली आहे. असे आणखी किती दिवस जाणार ? हे म्हणजे संपूर्ण परावलंबित्व. नेमकी तिला नको असलेली अवस्था. तिने आयुष्यभर अनेकांसाठी अनेक कष्ट उपसले. पण कुणाही पुढे मदतीसाठी याचना केली नाही. आपल्याला मरण कसे नको ? तर नेमके असे, असेच ती म्हणाली असती निश्चित. मी म्हणे लहानपणी फार अशक्त होते, वरचेवर काही ना काही होऊन आजारी पडे. सारखी किरकीर आणि रडणे चालू असे. माझ्या लहानपणी आईची स्वतःची,चुलत दिराची,मामेसासूची,बरीच मुले माणसे घरात होती. सेपाकपाणी,आले गेले,सर्वांचा अभ्यास करून घेणे,सणवार,एवढया मोठया घरसंसारात त्याकाळाच्या गरजेनुसार पडणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या उचलून, पुन्हा आमचे आजार,जाग्रणे, म्हणजे तिला किती कष्ट पडले असतील ! माझ्यापुरते तरी कृतज्ञतेच्या भावनेनेमी तिच्यासाठी काही करायला नको का ? आता इतक्या उशिरा दुसरे काय करणार ?आता तिच्यासाठी करण्यासाठी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे या परावलंबित्वातून तिची सुटका. पण हे कोण कसे करणार ?मर्सी किलिंगबद्दल अद्याप तरी नुसती चर्चाच चालूआहे. चर्चेत मला रस नाही;तिला तर कधीच नव्हता. याक्षणी मी तिच्यासाठी काहीकरणे, अगदी पुढला मागला कसलाही विचार न करता काही करणे म्हणजे...

सगळीकडे सामसूम आहे. प्रत्यक्ष मुलगीच खोलीत तिच्याजवळ असल्यामुळे हॉस्पिटलच्या नर्सिससुध्दा निर्धास्त आहेत. आम्ही, म्हणजे मी, बेल वाजवल्या शिवाय कुणीही खोलीत येणार नाही. आई शांत पडली आह. डोळा लागला आहे. हीच वेळ आहे. मोठया निश्चयाने मी जवळ गेले. म्हातारपणाने आणि आजाराने आवळचिवळ झालेली तिची एवढीशी मान. माझ्या हातांत पुरेशी शक्ती निश्चित आहे. आईसाठी काही करण्याची ही अखेरची संधी आहे. बंडखोर,क्रांतिकारी वगेरेमाझी एकेकाळची विशेषणे कालप्रवाहात कधीच वाहून गेली. आताच्या कुणालाही त्यातले काहीही माहीत नसेल. पण ती बंडखोरी अद्याप मेलेली नाही हे मी स्वतः जाणते ना ? माझ्या सामर्थ्याचा पुरेपूर अंदाज मला स्वतःला आहे ना ? मग ? मग अडतेय कुठे ? भीती ? ती तर कधीच नव्हती, नाही. कुठे जीव गुंतलाय का, की ज्यासाठी जगायला पाहिजे, अविचारी बनून चालणार नाही ? एकेकाळी असे खूपकाही होते. अगदी परवा परवा पर्यंतही असे थोडे शिल्लक असल्याचे अधूनमधून जाणवे. पण आता- या क्षणी तरी असा कुठलाही पाश नाही. माझे हात मुळीच थरथरत नाहीत. गादीचा कोपरा खूप जोरात दाबून पाहिला, आणि पलंगाचा कठडाही. हातांतपुरेसा जोर आहे. मग अडतेय कुठे ? मध्यमवर्गीय दुबळेपणा ? मी असे कृत्रिम वर्ग मानत नाही. मी त्या अर्थाने मध्यमवर्गीय वगेरे मुळीच नाही. भरपूर कष्ट मी आवडीने करते. कोणतेही आवश्यक काम करण्यात मला कमीपणा कधीच वाटलेला नाही. नाइलाजास्तव कष्ट करणाऱ्या माझ्या परिचयातल्या `कष्टकरी' वर्गातल्या अनेकव्यक्तींपेक्षा माझ्या वेयक्तिक गरजा फार कमी आहे. ते असो, पण माझ्यात असला कसला दुबळेपणा नक्की नाही. या क्षणी तरी नाही. माझ्या डोळ्यांदेखत अन्याय होत असेल तर तो समूळ निपटायला मी मागलापुढला विचार करणार नाही. मी पूर्वीचीच आहे; पिंड तोच आहे.

संतापाच्या भरात कुणालाही मारणं ही गोष्ट मुळीच कठीण नाही. कोणताही प्राणी हे करू शकतो. शांत डोक्याने, विचारपूर्वक शत्रूला मारणे हे चारचौघांचे काम नसेल,पण तेही फार कठीण काम आहे असे मला वाटत नाही. आपण ज्यांना क्रांतिकारी म्हणतो, त्यांतल्या अनेकांनी तेच केलेय. वेळी प्रसंगी मीही ते करू शकले असते. पणजिथे आपला जीव जडला आहे अशा, निरपराध, विश्वासाने झोपलेल्या व्यक्तीचा प्रेमापोटी गळा दाबण्याची अलौकिक शक्ती माझ्या हातांत नाही. या क्षणी मला ती शक्ती हवी होती, पण त्या बाबतीतला माझा दुबळेपणा फक्त जाणवला. आवंढा गिळता येईनासा झाला. खूप गरम अश्रू वाहू लागले. इतके असहाय दुःख यापूर्वीकधी झाल्याचं स्मरणात नाही. आईची ती मान आणि माझे ते हात यांच्यात दुबळेपणाची एकच चढाओढ लागून राहिली आहे. आई गेल्याला आता इतके दिवस लोटले तरी ही जीवघेणी चढाओढ डोक्यातून मिटतच नाही.

याच आईने आम्हा मुला-नातवंडांची आणि आप्तेष्टांची अनेक आजारपणं काढली. जाग्रणं केली, काळजी वाहिली, मर मर मरून आम्हांला तऱ्हतऱ्हा करून खाऊपिऊ घातलं. अभ्यास करून घेतला. मुलं मोठी झाली तशी पांगत गेली. मग आई आम्हां सगळ्यांना या ना त्या कारणाने कोकणात आपल्याकडे बोलवत राहिली,आमच्या वाटेकडे डोळे लावून बसू लागली. आंबे,नारळ,बोरे,शेवग्याच्या शेंगा,तऱ्हेतऱ्हेची फुलझाडे- जे जे तिच्या मेहनतीतून ती फळाला आणी ते ते आम्हांसर्वांना ती कुणा ना कुणाबरोबर पाठवत राही. मग नारळ पाठवताना ती पोचवण्यासाठी त्याला किती त्रास होत असेल याची ती विचार करत नसे. तिची असली कामे करणाऱ्या मंडळीनाही कधी तक्रार केली नाही. कारण या नाही त्या तऱ्हेने ती त्यांच्या उपकाराची परतफेड करत असावी. पण असल्या भेटी स्वीकारताना आमची,निदान माझी तरी, फार पंचाईत होई. मी नेहमीप्रमाणे काहीतरी कामात असे. कधीकामासाठी बाहेर जाण्याच्या तयारीत असे. कधी घरात तिसरेच कुणी काही महत्त्वाच्या कामासाठी आलेले असे. अशा वेळी आईने पाठवलेले आंबे,पोहे,किंवा असलेच काही घेऊन कुणीतरी येई. आईचे काम केल्याची आणि विशेषतः पु.ल.देशपांडेयांच्या घरी जाऊन आल्याची धन्यता त्याच्या चेहऱ्यावर दिसे. माझा मात्र चेहरा ओशाळा होई. आईचा राग येई. या वस्तू इथे मिळत नाहीत का ?मग उगाचइतक्या दुरून त्या कुणाबरोबर तरी पाठवायच्या कशाला ?आणून पोचवायचा त्यांनाही त्रास आणि आता त्यांचे आदरातिथ्य करत बसायचा मलाही त्रास. मग त्यांच्याशी काहीतरी बोलावे लागे. चहापाणी विचारावे लागे. एरवी मी दिवसभर बडबडत असते. रोजचा कित्येकदा आणि कित्येक कप चहा करते. पण हा कपभरचहा आणि ही इकडली तिकडली चौकशीची चार-सहा वाक्ये मला जड वाटत.

या वस्तू इथे मिळत नाहीत का? आम्ही कामात असतो हे हिला कळत नाही का ?पुण्या-मुंबईसारख्या शहरात, अगदी एखादा पु.ल.देशपांडे किंवा डॉ. ठाकूर असला तरी, त्याचं घर शोधून काढून या भेटी पोचवायच्या म्हणजे काय ताप असतोहे कितीदा सांगूनही हिला कळत कसं नाही ? आणि वर त्या भेटीबरोबर पत्रही असे.यांतली ही पिशवी या नातवाला पोचव, ती त्या नात जावयाला पोचव-म्हणजे आम्हांला काय दुसरे धंदेच नाहीत का ? असल्या आईची मग मला लाज वाटे. आणि ओशाळ्या सुरातच तिचं हे मला न पटणारं वागणं कसं चूक आहे हे न राहवून मीत्या पाहुण्यांना बोलूनही दाखवीत असे. मला कळू लागल्यापासून जवळजवळ तीस एक वर्ष आईचं हे वागणं माझ्या काटेकोर व्यवहारी दृष्टिकोनात कधी बसलं नाही आणि त्यामुळे ते मला कधी मनापासून रूचलंही नाही. पण आई आईच राहिली आणि त्यानंतर मात्र पुढे पुढे आपलेच काहीतरी चुकतेय असे मला वाटू लागले. आता आई नाही. माझ्यावर तसे ओशाळे होण्याचा प्रसंग तर आता कधीच येणार नाही. ती पाठवी त्या वस्तू, मला हव्या तेव्हा मी आणू शकेन. ते सगळे काही इथेही मिळते.मात्र तिने लावलेल्या आणि वाढवलेल्या झाडांचे आंबे, नारळ, शेवग्याच्या शेंगा, बोरे,रामफळे,फणसाच्या कुयऱ्या- इथल्या बाजारात विकायला येत नाहीत. इथे मिळणाऱ्या या व्सतू कदाचित अधिक चांगल्या प्रतीच्याही असतील. जिभेला त्याअधिक चांगल्या लागतील. पण आत कुठेतरी पिंडाला तृप्त करण्याचं सामार्थ्य त्यांनानक्कीच नाही. कारण त्यांना आईच्या हाताचा स्पर्श नसेल.

हा पिंड म्हणजे काय ? आई-आप्पांनी मला जन्म दिला. माझं अस्तित्व हे त्यांच्यामुळे. पण जन्म दिला म्हणजे काही उपकार केले असे मी मानत नाही. तोत्यांच्याही आनंदाचा भाग होता. त्यांनी,विशेषतः आईने, आम्हां मुलांचे पालपोषण केले. पण हाही तिच्या आनंदाचाच भाग म्हणायचा. स्वतःच्याच मुलांचे केले ना ?मी तिच्याच पोटची. पण तिच्या पोटची म्हणूनच तिच्यातले अनेक गुण दोषही अपरिहार्य माझ्यातही आले आहेत. गुणांपेक्षा दोषच अधिक. तिच्याच सारखी मीफार मोठयाने बोलते. तिच्या मोठयाने बोलण्याचा आम्हांला कधी त्रास झाला नाही,कारण लहान पणापासूनच आम्हांला त्याची सवयच झाली होती. मला वाटते. शहराबाहेरराहणारी माणसे जरा मोठयानेच बोलतात का ? कोण जाणे. पण तसे म्हणावे तरमाझी इतर भावंडे माझ्याइतकी मोठयाने बोलत नाहीत. मी मात्र फार मोठयाने बोलते. याची जाणीवही मला सतत होत असते. कारण भाईला त्याचा फार त्रास होतोहे मला कळते. पण तरीही, अनेकदा ठरवूनही मी माझी ही सवय बदलू शकले नाही.हा पिडांचाच धर्म ना ?

तिच्यातला माझ्यात उतरलेला दुसरा दोष म्हणजे ती तोंडावर कुणाचे कौतुक करू शकत नसे. ही बाई एके काळी शिक्षिका होती. लग्न झाल्यावर पहिली तीन मुले होईपर्यंत तिने हे काम करून जी काही आर्थिक कमाई केली त्याचाही हातभार तिच्या संसाराच्या पायाला लागला. वक्तृत्वात तिला बक्षिसे मिळाली होती. घोडयावर बसावं उत्तम घोडेस्वार व्हावं, ही तिची अपुरी राहिलेली इच्छा मी पुरी करावी असे तिलाफार वाटे. त्या दृष्टीने तिने प्रयत्नही केले. मला अनेकदा सांगून पाहिले. मला घोडाहा प्राणी फार म्हणजे फार आवडतो. घोडयावर बसायलाही माझी ना नव्हती. पण त्याबद्दल आईला होती तितकी ओढ मला नव्हती. तिचे स्वप्न होते, तसे माझेत्याबद्दल नव्हते. मलाही तशी हौस असती तर तिने रत्नागिरीसारख्या ठिकाणी एखादा घोडापाळलाही असता कदाचित, कुणी सांगावे ! पण हीच बाई पुढे वाढत्या संसारात अशीकाही बुडून गेली, की वेळीप्रसंगी एखादी पोथी आणि तिला येणारी पत्रे यापलीकडेतिचे वाचन राहिले नाही. अधूनमधून आप्तेष्टांना पत्रे लिहिणे आमि संसारातलेहिशेब-ठिशेब यापलीकडे लेखन गेले नाही. नाही म्हणायला तिच्या मृत्यूनंतर, परवा परवा तिच्या कपाटात दोन-चार वह्या सापडल्या. त्यांत तिने डायरीवजा थोडे लिहिलेले आहे. मी ते वाचल्यावर हसावे का रडावे कळेना. सगळ्या लिहिण्यात सूरएकच. आप्पांबद्दलची तक्रार. आणि खरे सांगायचे तर तिने लिहिलेल्यात काहीही अतिशयोक्ती नाही. म्हणजे आमचे आप्पा वाईट होते का? मुळीच नाही. त्यांच्यासारखा सज्जन गृहस्थ शोधून सापडणे कठीण. पण सज्जनपणा,चांगुलपणा,दातृत्व,आदरातिथ्य वगेरे गुण प्रसंगी उपद्रवीच असतात. मला वाटते, दुर्गुणांप्रमाणेचसद्् गुणांचेही माणसाला व्यसन लागते. आणि व्यसनाधीन माणसाच्या बायकोची परवड व्हायची ती होतेच. दुर्गुणी माणसाच्या बायकोबद्दल इतरांना सहानुभूती तरी वाटत असते. पण सद््गुणी नवऱ्याच्या बायकोला सक्तीने आनंदी मुखवटा वापरावा लागतो. आणि सदेव हसतमुख राहण्याच्या सक्तीसारखी दुसरी महाभंयकर शिक्षा नसेल. हे झाले जनरल. प्रत्यक्ष आमच्या घरातलं सांगायाचं झालं तर दुसऱ्याला त्रासहोईल असं जाणूनबुजून आप्पांनी कधीही काही केलं नाही. अगदी स्वप्नात देखील नसावं. आप्पा संतच होते. पण जुन्या काळच्या संतांच्या बायका निरक्षर होत्या,आत्मचरित्रे लिहित नव्हत्या हे आपल्या संस्कृतीचे सौंदर्य टिकवायला किती उपकार कठरले ! आईने ह्या वह्या कधी लिहिल्या कोण जाणे. पण त्यात तिने आप्पांना दोष मुळीच दिलेला नाही. नवरा हा असाच असतो असं ती गृहीतच धरत होती. आप्पांचा मोठेपणा तिला कळत होता आणि तो टिकावा म्हणून आपल्या परीने ती आनंदाने कष्ट उपसत होती. पण शेवटी तीही माणूसच. कधी थकू शकते, स्वतः आजारी पडू शकते. याचं भान ठेवून, तिच्या अडचणी लक्षात घेऊन, मग आप्पांनी त्यावर आपली गृहस्थी बेतली असती तर आपलं मन मोकळं करायला तिला ह्या वह्यांचा आधार घ्यावा लागला नसता. तशी आप्पांची जीवनमूल्ये बावनकशी होती. त्यामुळेच ते संत म्हणा किंवा फार थोर म्हणा असे होते, निर्भेळ माणूस नव्हते. ह्या माणसांच्या जगात खरी स्वच्छ माणसेच सापडत नाहीत. आणि संत म्हटले किंवा फार थोर लोक म्हटले, की मग`लोकापवादो बलवान मतो मे' आले आणि पत्नीच्या नशिबी वनवासही आलाच.

आम्हांला आई दिसली ती दिवसरात्र काही ना काही कामातच असलेली. तिने आम्हांला तरतऱ्हा खाऊपिऊ करून घातले, शिकवले, आमची आजारपणे काढली;पण कधीही प्रेमाने जवळ घेऊन मुका घेतल्याचे आठवत नाही, की तोंडभर कौतुक केल्याचेही आठवत नाही. या गोष्टींना तिला वेळ नव्हता म्हणणे सर्वस्वी खरे नव्हे.मनात असते तर त्यात अशक्य काहीच नव्हते. तिचा तो स्वभावच नव्हता असेच म्हणावे लागेल. तिला आमचे दोषच दिसायचे आणि ते घालवण्यासाठी जिवाचे रान करण्यात ती धन्यता मानायची. इतरांनी आम्हांला नावे ठेवू नयेत या साठीही हीधडपड असेल. पण कौतुक करून घेण्याची भूक इतकी मोठी असते, की आईच्या रोजच्या आमच्यासाठी होणाऱ्या काबाडकष्टांपेक्षा वर्ष-सहा महिन्यांनी पाठीवरूनप्रेमाने फिरणारा आप्पांचा हात आम्हांला अधिक मोलाचा वाटे.

समिधाच सख्या या, त्यांत कसा ओलावा,
कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा ?
जात्याच रूक्ष या, एकच त्यां आकांक्षा
तव आंतरअग्नी क्षणभर तरि फुलवावा !

या कुसुमाग्रजांच्या ओळी कविता म्हणून माझ्याप्रमाणे इतरांनाही आवडतच असणार. कितीतरी संसारी बायकांना त्यांत ओळखीचा चेहरा दिसल्याचने त्यांचा आधारही वाटत असणार. कवितेच्या बाबतीत हे सर्व ठीक असते. पण प्रत्यक्षात,`जात्याच रूक्ष' असे काहीही कुणालाही आवडणार नाही. अगदी त्या समिधांनाही स्वतःतल्या या गुणाचा तापच होत असेल.

आई मधला हा दोष माझ्यात सहीसही उतरला आहे. तिला स्वतःतल्या त्या दोषाची जाणीव नव्हती. ते तिला कर्तव्यच वाटे. त्यामुळे त्या बाबतीत ती सुखी होती. मला हादोष सतत जाणवत असतो. पण त्यातून सुटका नाही. एखादे पुस्तक वाचले,नाटकपाहिले, गाणे किंवा व्याख्यान ऐकले, आणि ते खूप आवडले, तरी त्यात एवढेसे काहीन्यून राहिले असेल तर ते नजरेतून सहसा सुटत नाही, विसरता येत नाही; त्या गोष्टीला चांगले म्हणून गुणगान करताना ती अधिक चांगली व्हावी या हेतूने का होईना. पण ते न्यून ही सांगितल्यावाचून राहवत नाही. हाही पिंडाचाच भाग.

आईमधला स्पष्टवक्तेपणाही असाच माझ्यात आलेला आहे. हा गुण म्हणायचा की दोष ? स्पष्टवक्तेपणा हा तसा पाहिला तर गुणांच्या यादीतच सापडतो. पण प्रत्यक्षात मात्र तो ज्याच्या अंगी असतो तो माणूस फारसा कुणाला आवडत नाही हाच अनुभव येतो. कुणीतरी दुसऱ्या कुणाच्यातरी बाबतीत स्पष्टवक्ता असणे सर्वांना मानवते. व्यासपीठावरून भाषण करताना तर हा गुण प्रकर्षाने जाणवतो. सर्व श्रोत्यांकडून पसंतीच्या टाळ्या मिळतात. पण प्रत्यक्षात दोन व्यक्तींत एक स्पष्टवक्ती असणे म्हणजेदुसरीचा दोष न घाबरता सांगणे असाच प्रकार होतो. मग तो फटकळपणा ठरतो.कुणालाही सहसा न आवडणारा. एकाच नाण्याच्या या दोन बाजू. छाप आणि काटा.स्पष्टवक्तेपणा हा त्या सामान्य व्यक्तीच्या नशिबी काटाच होऊन येतो. सार्वजनिकपुढाऱ्याच्या नशिबी मात्र तो छाप होतो. आम्ही सामान्य माणसे. तेव्हा पिंडातूनआलेल्या या स्पष्टवक्तेपणाच्या दोषामुळे आम्हांला मात्र मिळणे किंवा कुणाचे प्रेममिळणे फार फार कठीण. इतर लोक आम्हांला सदेव टाळतच असतात. फारच खरेबोलताता ते `तुमची भीती वाटते ' असे स्पष्ट सांगतात, इतकेच.

या स्पष्टवक्तेपणाप्रमाणेच कामसू वृत्तीही गुण आणि दोष यांच्या सरहद्दीवरचवास्तव्याला असते. सतत काही ना काही काम करत राहण्यातच धन्यता वाटणारीमाणसे चांगली की वाईट ? एके काळी मी `चांगली' असेच उत्तर दिले असते. त्यालाथोर थोर आदर्श व्यक्चींच्या वचनांचा आणि वर्तनाचा आधारही दिला असता. पणआता मात्र `निश्चितच वाईट' असेच म्हणेन. आता पाय जमिनीला लागले आहेत.आता थोरामोठयांचा ऐकीव आदर्श जीवनाचा आधार वाटत नाही. स्वतःचे अनुभववेगळेच सत्य सांगून जातात.

आमचे आप्पा आणि आई दोघेही सतत काही ना काही काम करत असायचे.त्यामुळे या बाबतीत त्यांचा एकमेकांना त्रास झाला नाही. त्यांचा हा गुण आम्हांबहुतेक भावंडात उतरलाय. लहानपणी हे ठीक असते. पण पुढे बायको जर आळशीमिळाली तर तिला अशा कामसू नवऱ्याचा जाचच होईल. हे झाले माझ्या भावांच्याबाबतीत. पण मुलींचा फक्त नवऱ्याशीच नव्हे, तर सासरच्या सगळ्याच घराशी संबंधयेतो. अशी वेळी तिथली माणसे जर आळशी किंवा जरूर तरच हातपाय हलवणारीअसतील तर तिच्यावर कामाचा खूपच भार पडतो. म्हणजे या कामसू व्यक्तीला श्रमअधिक होतात. त्यातून, आपण आहोत म्हणून हे सगळं निभवलं जातंय असाअंहकारीही स्पर्श करायला लागतो. शिवाय, या दोन परस्परविरोधी प्रवृत्ती एकाचघरात एकत्र नांदायच्या म्हटले की संघर्ष अटळच होऊन बसतो. पांढरपेशा समाजातअसले संघर्ष चारचौघांना कळणे ही लाजिरवाणी गोष्ट वाटते आणि मग मनाचा फारकोंडमारा होतो. घरात काय आणि समाजात काय, कामसू माणसांचे प्रमाण एकूणकमीच असते. त्यामुळे जी अशी सतत काम करणारी माणसे असतात त्यांना इतरलोक आळशी आणि ऐतखाऊ वाटतात आणि वेताग येत असतो. इतरांना तर याकामसू लोकांचा सदेव तापच होत असतो. शेवटी सारखे काम तरी कशाला करतराहायचे ? शाळेत असताना वाचलेली `लोटसईटर्स 'ही कविता मला या संदर्भातनेहमी आठवत राहते. ते तत्त्वज्ञान कुठेतरी आत अंतरात्म्याला आवडलेल असते.आणि आपण न थकता सतत काम करू शकतो हा आपला मोठेपणा न वाटता,आळशी नाही ही उणीव वाटत राहते. असो.

आईचा हात फार सढळ होता. तिथे हिशेबी वृत्ती नव्हती.मनाचे मूलभूत औदार्यआणि परंपरागत रीतिरिवाजांच्या बंधनातून पत्करलेली विशिष्ट जीवनपध्दती यांतूनकधीकधी मजेदार प्रसंग निर्माण होत. सहज गंमत म्हणून आठवतो तो एक सांगते.आमच्या लहानपणी कोकणात आम्हांला घरात सुपे, रोवळ्या,हारे वगेरे गोष्टीलागायच्या. त्या काळी बालद्या हा प्रकार फारसा वापरात नव्हता. मोरीत बसूनधुवायला दगडी डोणी असत आणि धुतलेल्या कपडयांचे पिळे ठेवायला हारे असत.धान्य पाखडायला सुपं लागत आणि सांदूळ धुवायला रोवळ्या. त्या काळी या वस्तूविणून विकायला महारणी यायच्या. आणची एक ठरलेली महारीण होती आणिवर्षांतून दोन-तीनदा ती आमच्याकडे या वस्तू विकायला आणी.माझ्या आठवणीततरी वर्षानुवर्षे हीच बाई या वस्तू घेऊन येई. ती आली की तिचा माल ती उलट-सुलटकरून दाखवी. आईला पसंत पडला की तो एका बाजूला ठेवी. मग काय काय घ्यायचेते ठरले, की भावात घासाघीस चाले, आणि शेवटी सौदा पटला की मग त्या वस्तूंवरपाणी टाकून तो माल आई घरात घेई. महारणीला शिवणे ही गोष्ट अब्रह्मण्यम् होती.तिने केलेल्या वस्तूंनादेखील त्यांवर पाणी टाकल्याखेरीज आम्ही हात लावायचा नसे.तिच्या आणि आमच्या सामाजिक स्थानातला हा फरक आई कसोशीने पाळत असे.त्यात काही चूक अगर अन्याय आहे असे तिला कधीही वाटले नाही. उलट, हे असेचअसायला हवे यावर तिची इतकी श्रध्दा होती, आणि आम्हांलाही या बाबतीत तिचाअसा काही धाक होता, की वेगळा काही आचार-विचार तिथे त्या काळी संभवतच नव्हता. केक मेलांवरून पायपीट करून भर उन्हाची आमच्या दारी येणारी हीमहारीण मग तिथे चांगली तास-दोन तास रेंगाळत असे. आई मग तिला जेवण देई.चहापाणी देई. चहाबरोबर काहीही खायला दिले की ती ते लगेच मुलांसाठी न्यायलाम्हणून मोटलीत बांधू लागे आणि मग आई तिला रागवे."
"दिलंय ते निमूटपणे खा.उन्हातान्हातून आलीस ते पाय काय मुलांचे नाय भाजले. आणि मुलांची आठवणमलाही आहे. आण्हांलाही देवाच्या दयेनी भरपूर मुलंबाळं आहेत. हे घे मुलांसाठी. पणतुला दिलंय ते तू खा."
" असा संवाद दर वेळी चाले. तिच्या मुलांची आणि घरच्यासर्वांची नावे आईला माहीत होती. आणि आमची सर्वांची तिला. मग हा कुठे असतोआणि तो हल्ली काय करतो वगेरे एकमेकींच्या चौकश्या चालत. सुखदुःखाच्या गोष्टीचालत. जाताना ती तांदूळ,पोहे,लोणचे,कसली कसली औषधे, जुने कपडे, कायकाय घेऊन जाई. या वस्तू देताना आईच्या मनात कोणताही हिशेब नसे. पण तिचामाल विकत घेताना मात्र घासाघीस ही व्हायचीच.

एकदा अशीच ती महारीण मागल्या दारी येऊन बसली आणि तिने नेहमीप्रमाणेआईला हाक मारली. मग अगदी नेहमीच्याच पध्दतीने खरेदी वगेरे झाली. पाणीटाकून माल उचलत असताना आईचे लक्ष तिच्या सुजलेल्या पायाकडे गेले.आईनेचौकशी केली तेव्हा कळले, की रानात कसलातरी मोठठा काटा लागून तिची पोटरी थोडी फाटली होती आणि आता त्यात पू पण झाला होता. पाय सुजला तर होताच,पण ठणकल्याने दोन-तीन दिवस झोपही आली नव्हती. आईने `पाहू' म्हणून तिचापाय पकडला. मग गरम पाणी, पोटॅशियम परमॅगनेट,कापूस,बँडेज म्हणून जुन्याधोतराच्या पटटया वगेरे वस्तू आणि जखमेवरचा हमखास इलाज असे ते `शेटटीचंमलम' आणायला आण्हांला सांगून आईने सगळा पू पिळून काढला आणि यथासांगऔषधपाणी करून तिचा पाय बांधून दिला. हे करत असताना ती बाई मोठमोठयानेओरडत,रडत होती आणि त्याच्याही वर आवाज काढून,या वयाला आणिबाईमाणसाला असं ओरडणं शोभत नाही, सहन करता येत नाही तर बायकांच्याजन्माला आलीस कशाला, वगेरे व्याख्यान आई तिला देत होती,. शेवटी एकदाचे तेड्रेसिंग संपले. पुवाने भरलेले कापसाचे बोळे वगेरे एका कागदात गुंडाळून,`रानातटाकून दे' म्हणून आईने तिच्याकडे दिले. मग आई तिच्या टोपल्यांवर पाणी टाकी तसे.आम्ही आईच्या डोक्यावर कळशी ओतली आणि आंघोळ करून आई घरात आली.एका छोटया डबीत आणखी थोडे मलम घालून आईने तिला ते पुन्हा एकदोनदालावायला म्हणून दिले. झाल्या प्रकारात काही अंतर्गत विसंगती आहे असे त्या काळी तिला, आईला अगर आम्हालांही कुणाला वाटले नाही.

पुढे वय थोडे वाढल्यावर आणि शिक्षणाने थोडे ज्ञान आल्यावर आईच्या यासोवळ्या-ओवळ्याचा मला फार राग येऊ लागला. आज मात्र हा प्रसंग आटवला, कीआईचा कर्मठपणा आणि सह्दयता दोन्ही एकाच वेळी हातात हात घालून उभीअसल्यासारखी दिसतात. या नेहमीच्या, ओळखीच्या, सर्व संबंधित गोरगरिबांबद्दलतिच्या पोटात अमाप माया होती. या बाबतीतले तिचे रागलोभ सगळे वेयक्तिक होते.आमचे सार्वजनिक असतात. वाटते, मी आईच्या जागी असते तर त्या महारणीकडचामाल घेताना तिला अस्पृश्य मानून त्यावर पाणी नक्कीच टाकलं नसतं. पणत्याचबरोबर बहुधा तिच्या पायाकडे सोयीस्कर दुर्लक्षही केले असते कदाचित. फार तर"
"एखाद्या डॉक्टरला दाखव. वेळेवर औषधपाणी केलं नाहीस तर पाय तोडावालागेल"
" असा कोरडा सल्ला दिला असता. कुणी सांगावे !

गेल्या पंधरा-वीस वर्षात मी जेव्हा जेव्हा रत्नागिरीला गेले, तेव्हा तेव्हा सुंदराबाई म्हणून एक बाई न चुकता भेटायला यायची. मलाच नव्हे, आम्हां मुलांपेकी कुणीही रत्नागिरीला गेले तरी ती भेटायला येऊन जायचीच. आम्ही दोन-तीन दिवसांसाठीगेलो तरी तिला कसा सुगावा लागे कळत नसे. एखादी वेडी भिकारीण अशी ती दिसे. केस पिंजारलेले, काहीशी गलिच्छ. एकटी असली तरी ती सारखी बडबडत असायची. तिच्यात असं काहीतरी होतं की मला ती कधीच आवडली नाही. आईच्या पोटात मात्र तिच्याबद्दल अपरंपार दया असे. आमच्याकडून पेसे किंवा एखादी वस्तू हातावर पडेल या आशेने ती येई. पण येताना कधी रिकाम्या हाताने येत नसे. कुठल्यातरी दुकानातून विकत घेतलेली गलिच्छ कागदात बांधलेली एखादी खाण्याची वस्तू ती घेऊन येई. चिवडा, लाडू फुटाणे, किंवा असलेच काहीतरी. ते ती आम्हांलादेई आणि खाण्याचा आग्रह करी. आम्हीही तिला भरघोस काही द्यावे अशी आईची अपेक्षा असे. तिला उचलून काही द्यायला आमची ना नसे, पण तिने फार वेळरेंगाळून आम्हांला त्रास देणे, तिने आणलेले आम्हांला खायला लावणे, याला आमचा विरोध असे. एके काळी आपण कसे खूप श्रीमंत होतो, मग नवरा मेल्यावर आपल्याला इतरांनी कसे लुटले, मग आपल्या डोक्यावर त्याचा परिणाम कसा झाला, त्यानंतर शेजाऱ्यापाजाऱ्यांनीही आपले घरदार धुऊन नेऊन आपल्याला भिकेलाकसे लावले वगेरे आपली कहाणी तिने आईला सांगितली होती; आणि त्यावर आईचा पूर्ण विश्वास होता. आता ही कहाणी खरी असू शकेल, तशी खोटीही असू शकेल.आणि काहीही असले तरी त्याचा आम्हांला कां त्रास? पण आईला वाटे प्रसंग, कुणावर कसा येईल सांगता येत नाही, तेव्हा आम्ही त्या सुंदराबाईशी फार सहानुभूतीने वागावे."

"ती तर अर्धवट वेडीच आहे. तिला काय कळतं ? पण आम्ही शहाणी आहोत ना ? मग थोडं सहन केलं तर काय बिघडतं ? इतक्या लांबून पायपीट करत तुम्हांला डोळे भरून पाहायला येते. एके काळची घरंदाज बाई. आता भिकारी झाली, वेडीझाली, तरी रीतिरिवाज रक्तात आहेत. कुणाला भेटायला जायचं तर रिकाम्या हाताने नाही जाणार. तिच्याकडे पेसे कुठले ? पण कसंतरी करून काहीतरी प्रेमाने आणले, तर तुम्हांला तिच्या समाधानासाठी थोडं तोंडात टाकायला काय होतं ? स्वच्छतेची थोतांड मला नका सांगू !हॉटेलात खाता-जेवता , तिथे सेपाकघरात काय चालतं ते पाहता काकधी ? पण तिकडे ठणकावून पेसे घेतात तेव्हा तुम्ही निमूटपणे नोटा काढून द्याला. इथेही प्रेमानं काही आणते तर तिची किंमत नाही. आईला आई म्हणता हे तरी माझं नशीब !"

" - इथपर्यंत आईची मजल जायची. त्या सुंदराबाईबद्दल आईला इतका उमाळा कां ते मला कधीच कळले नाही. मला तर ढोंगी वाटायची. पण आईचा दृष्टिकोन काही बाबतीत हा असा फार उदार होता. कदाचित नेमित्तिक भेटीला येणाऱ्या आम्हां मुलांपेक्षा, नित्याच्या या गोतावळ्याचा आईला अधिक आधार तरवाटू लागला नसेल ? कोण जाणे !

अशीच एकदा आप्पांना बरं नाही म्हणून मी रत्नीगिरीला त्यांना भेटायला गेलेहोते. आप्पा, आई दोघेही थकलेले, तेव्हा सेपाकाला एक पोरगी आणि वरकामालाचोवीस तास घरी राहणारी एक बाई अशी दोन बायका कामाला आहेत हे मलाठाऊक होते. मी तीन-चार दिवसांसाठी येणार हे कळवले होते. मी संध्याकाळी जाऊनपोचले आणि दुसरे दिवशी सकाळीच वरकामाला असलेल्या बाईने आपली पाळी सुरूझाल्याचे सांगितले. म्हणजे आता पुरे तीन दिवस ही नुसती बसून राहणार. आईचे याबाबतीत कडक सोवळे असे. त्याचा फायदा घेऊन महिन्यातून दोनदादेखील `पाळी'चेनिमित्त सांगून कुणी बसून खाल्ले तरी तिला चाले. अशा वेळी त्या दूर बसतात याचेचतिला कौतुक. आम्ही कुणीही आपापल्या घरी विटाळ पाळत नाही ही गोष्ट तिलामुळीच आवडत नसे. त्यामुळे आमच्या घरी कधी राहायला येणेही तिला मनापासूनपसंत नसे. तिच्या या वागण्याचा फायदा कामवाल्या बाया चांगलाच घेत. मी घरीआल्यावर आप्पा-आईना आवडेल असं काहीतरी करून खाऊपिऊ घालणार, तरहाताखाली मदतीला कुणी नाहीच, आणि त्यात सेपाकाला येणाऱ्या पोरीनेही "
"पोटदुखते आहे,"
" असा निरोप पाठवला. मी वेतागून म्हटले,"
" आजच नेमकं हिचं पोटकसं दुखायला लागलं ?"
" तर आई म्हणाली,"
"तिचे दिवस भरत आले आहेत, तीलवकर बाळंत होणार असेल."
" मला त्या दोघीचा, आईच्या सोवळ्या-ओवळ्याच्याकल्पनेचा आणि माझ्या नशिबाचाही भयंकर राग आला. मी कधी नव्हे ती माहेरीआले तरी तिथेही मला क्षणाची विश्रान्ती नाही, याचे आईला वाईट वाटले. पण तिनेत्याबद्दल त्या दोघीनांही दोष न देता, स्वतःचे वय झाल्यने आणि ढोपरे फार दुखतअसल्याने आपल्याच्याने आता होत नाही, नाहीतर आपणच कसे वेगळे केले असतेहेच ऐकवले.

तिसरे दिवशी माझा सगळा सेपाक करून झाल्यावर सेपाकीणी आली. मीम्हटले.""यायचंच तर लौकर का नाही आलीस? आता सगळा सेपाक झालाय; तूजा."" तर आईने तिला जेवूनच जायला सांगितले. कारणे दोन. एक तर ती रोजसेपाक केल्यावर जेवूनच घरी जायची.,मग आज उपाशी पोटी कसे पाठवायचे ? आणिदुसरे, त्याहून महत्त्वाचे कारण म्हणजे ती गरोदर आहे आणि पहिलटकरीण आहे.तिला काही खावेप्यावे वाटत असले तरी तिला कोण करून घालणार ? मी इतकाचांगला सेपाक केलाय, तर दोन घास खाऊन तिचा आत्मा तृप्त झाला तर परमेश्वरमला आशीर्वादच देईल. मला स्वतःला मात्र राब राब राबून मिळणाऱ्या परमेश्वराच्यात्या आशीर्वादापेक्षा दोन घटका विश्रान्ती आणि आप्पांच्या प्रकृतीकडे अधिक लक्षदेता आलं आसतं तर ते अधिक मोलाचं होतं. पण आईचे सगळे तर्कशास्त्रच उलटेहोते. त्यामुळे तिचे मझे कधई पटलेच नाही

आज आई नाही. आता मागे वळून पाहताना असे अनेक प्रसंग आठवले, कीत्यामागच्या तिच्या मनाचा मोठेपणा दिसतो आणि स्वत:ची लाज वाटते. आईचंऔदार्य माझ्या बहिणीत आलंय. माझ्यात आप्पांची निवृत्ती थोडीबहुत आली असावी,पण आईचं हे औदार्य मात्र जरासुध्दा आलं नाही

मला वाटते, औदार्यामागे विचार, सद््सद््विवेकबुध्दी नसते. कुणालाही पटकनकाही देण्यातला निर्भेळ आनंद तेवढा असतो. या आनंदाचा छंद लागला, की औदार्यहा त्या व्यक्तीचा अविभाज्य घटक बनतो. हा फार मोठा गुणच मानला पाहिजे.कारण त्यातून स्वतःला सुख लाभतेच, पण दुसऱ्यालाही लाभच होतो, आनंद मिळतो.शिवाय, त्यात समाजविघातक असे काहीही नाही. औदार्यामुळे स्वभावाचे काही कोपरेघासून जाऊन जीवनाचा पोत छान तलम बनत असावा.

माझी आई किंवा तिच्यातला हा गुण मोठया प्रमाणावर लाभलेली माझी बहीण याकुणालाही, काहीही पटकन उचलून देताना मी अनेकदा अनुभवलंय. माझ्या हातून मात्र असं सहसा घडत नाही. एखादी वस्तू किंवा पेसे मागायला दारी आलेल्याला मीसहज `नाही' म्हणून घालवून देऊ शकते. मग ती मागणी कितीही शुल्लक असो किंवामागणारी व्यक्ती कितीही थोर असो. भिकाऱ्याला द्यायलातर पाच-दहा पेशांचेनाणेदेखील माझ्या हातून कधी सुटत नाही. त्यामुळे मी फार चिक्कू आहे असाकुणाचाही समज होणे स्वाभाविक आहे. पण अगदी खरं सांगायचं तर मला त्याचेसोयरसुतक जरासुध्दा नाही. मी तशी रेशमाच्या किडयाच्या जातीची, स्वतःभोवतीछोटासा कोष विणून त्यात राहणारी व्यक्ती आहे. माझ्या या बंदिस्त जगात ज्यांनास्थान आहे असी मोजकीच माणसं आहेत. तिथे त्यांच्या मनाचे आणि मतांचे फारमोल आहे. त्या बाहेरील जगाला माझ्याहिशेबी काही महत्व नसावे. मला सर्वार्थाने नओळखणाऱ्या अनेकांना हे विधान चुकीचे किंवा अतिशयोक्त वाटेल. पण तसे नाही.मला योग्य वाटेल तिथे कितीही आणि काहीही देताना आणि पुढल्या क्षणी तेविसरूनही जाताना मला मी पाहिले आहे. पण त्या क्षणी तिथे `इदं न मम' हीनिःसंगतेची भावनाच प्रबळ असावी. औदार्याचा लवलेशही नसावा. म्हणून मलावाटते, या बाबतीत मी कदाचित आप्पाची मुलगी शोभेन.

आमचे आप्पा हे निष्णात फौजदार वकील होते. तर्कशुध्द विचार करत निर्णयालायेण्याची, उलटसुलट विचार करून शंका काढण्याची त्यांना चांगलीच सवय होती.बुध्दिबळ आणि ब्रिज हे त्यांचे आवडते खेळ होते. या दोन खेळांचा आणि तर्कशुध्दविचारसरणीचा परस्परसंबंध असेल का ?

या तिन्ही गोष्टी मलाही खूप आवडायच्या. त्यांतल्या बुध्दिबळ आणि ब्रिज याखेळांशी पुढे माझा काहीच संबंध राहिला नाही. पण विचारांचा खेळ मला अजूनहीआवडतो. तो कुठेही,केव्हाही, स्वतःशीच खेळता येतो.

आप्पांना वाटे, मी वकील व्हावे, बॅरिस्टर व्हावे. बॅ.सीता आजगावकर ही त्यांचीबहीण.(सख्खी नव्हे,त्यांना सख्खे भावंड वगेरे नव्हतेच. ही दूरची, बहुधामावसबहीण असावी. ) ही माझ्या समजुतीप्रमाणे महाराष्ट्रातील पहिली स्त्री बॅरिस्टर. तीशंकरशेट स्कॉलरही होती. आप्पांना साहजिकच तिचा फार अभिमान होता. मीही असंकाही व्हावं असं त्यांना फार वाटे. पण या बाबतीतही मी त्यांची निराशाच केली.नाही म्हणायला माझा थोरला भाऊ वकील आमि पुढे जज्ज झाला. पण त्यालावकिलीत फारसा रस नव्हता. थोरल्या मुलाने वडिलांचा व्यवसाय घ्यावा या त्याकाळच्या धोरणामुळे त्याला वकील करण्याच आले होते इतकेच. पण मी कदाचितबऱ्यापेकी वकील होऊ शकले असते असे आता वाटते.

आमचे आप्पा गेले त्यापूर्वी दहाच दिवस आधी आम्ही कोल्हापूरला काहीकामानिमित्त गेलो होतो. तिथून जवळच रत्नागिरीला आप्पा-आईना भेटायला म्हणूनएका दिवसासाठी जाऊन आलो. आम्ही घरी जाऊन पोचल्यावर तासाभराने आप्पांनी

माझ्या हाती एक पत्र दिले. ते एक प्रकारचे इच्छापत्रच होते. त्यांच्या पेशाअडक्याचेआणि जमीजुमल्याचे पुढे काय करायचे याबद्दलचे इच्छापत्र त्यांनी रीतसर करूनठेवलेच होते. या पत्रात त्यापेकी काही नव्हते. स्वतःच्या मृत्यूनंतर आपले डोळेनेत्रपेढीला आणि शरीर मेडिकल कॉलेजला द्यावे अशी इच्छा त्यात सविस्तर लिहिलेलीहोती. इतके मुलगे,सुना,जावई,दुसरी मुलगी वगेरे इतरही असताना, कुटुंबात इतकेडॉक्टर्स असताना, हे पत्र मलाच कां लिहिले, असे मी विचारले तेव्हा ""यावरून याबाबतीत तुझ्यावर माझा सर्वात अधिक विश्वास आहे असंच नाही का सिध्द होत ?""असा त्यांनी प्रतिप्रश्न केला. मग मी त्यांना दोनतीन गोष्टी समजावून सांगितल्या :एक तर डोळे हे माणसाच्या मृत्यूनंतर तासाभरात काढले तरच त्यांचा उपयोग करतायेतो, असे मला वाटते. आणि रत्नागिरीत नेत्रपेढी नसल्याने ते शक्य होणार नाही.बाकीच्या शरीराचा उपयोग हा केवळ हा केवळ डिसेक्शनसाठी मेडिकल कॉलेजला तेवढाहोणार. तिथे मग गरीब-श्रीमंत, मूर्ख-विचारवंत, सर्वांच्या शरीराचे अवयवअभ्यासाच्या दृष्टीने सारखेच. पुण्या-मुंबईसारख्या मोठया शहरांत. जिथे मेडिकलकॉलेजे आहेत तिथे, रोज अनेक बेवारशी मृत देह फुकट मिळू शकतात. असेअसताना उगाच खर्च करून आपला देह तिथे नेऊन देणे हा वेडेपणाच नाही का ?तेव्हा हा हटट त्यांनी सोडावा. पण त्यांच्या इच्छेला मान देण्यासाठी मी माझे डोळेआणि शरीर मृत्यूनंतर असे देऊन टाकण्याची व्यवस्था नक्की करीन. आम्ही शहरातराहतो. आम्हांला मृत्यूही शहरातच येईल असे धरून चालू, तेव्हा हे सहज शक्यहोईल. मी तुम्हांला असं वचन दिलंय हे सर्वांच्या कानावर घालून ठेवते म्हणजे झालं.

त्यांना माझे म्हणणे तितकेसे रूचलेले दिसले नाही. पण त्यावर ते काही बोललेनाहीत. हा मृत्यूचा विचार मात्र त्यांना तरीही सोडत नव्हता. कारण त्यानंतर थोडयावेळाने पुन्हा तोच विषय काढून ते म्हणाले.

""विनोबांनी, सावरकरांनी प्रायोपवेशन केल्याचं वाचलं. मला वाटतं. आपणहीआता तेच करावं. आणखी किती जगायचं आणि कशासाठी ? आता या बाबतीत तरकाही अडचण नाही ना ? पण तुझ्या आईला ते पटत नाही. तुम्ही माझ्यासाठीइतकं करा. तिची समजूत घाला आणि मला सहकार्य द्या.""

आई तिथेच बसली होती. ती भडकून म्हणाली,""मी असलं काही ऐकून घेणारनाही. त्यांना आता या वयात दुसरा काही धंदा नाही. उगाच काहीतरी विचार करतबसतात आणि म्हातारचळ लागल्यासारखे वेडंवाकडं सांगत बसतात. पण तुला तरीकाही अक्कल हवी की नको ? तू ऐकून कसं घेतेस असलं अभद्र ?""

खरे तर हा अप्रिय विषय आम्हांला कुणालाच नको होता. पण आप्पांच्या डोक्याततो ठाण मांडून बसला होता, तेव्हा त्यांच्या डोक्यातून तो काढून टाकणे भाग होते.मग मी त्यांना म्हटले,""आप्पा, मला तुमचं म्हणणं पटत. मीही तुमच्याच विचाराचीआहे. पण प्रायोपवेशन वाटतं तितकं सोपं नाही. त्याला इतरांचा विरोध चालू शकतनाही. समजा, तुम्ही प्रायोपवेशन सुरू केलं आणि काही काळानं तुमची शुध्द गेली आणि त्यानंतर तुम्हांला जगवण्याचे प्रयत्न इतरांनी केले तर सगळंच फुकट नाही काजाणार ? आणि आईच खुद्द तसं करील याची मला खात्री वाटते. तुम्ही विचार करूशकता. तुमची समजूत घालणं सोपं आहे. आईला असलं काही पटवणं कुणाला तरीशक्य आहे का ? तेव्हा तुम्ही असा विचार करा- गेली साठ-पासष्ट वर्ष आईनंवाढलेल्या अन्नावरच पोरालेलं हे तुमचं शरीर त्यावर अधिक हक्क कुणाचा ? तुमचाकी तिचा ? मग त्या शरीराची विल्हेवाट होईना का तिच्या मनाजोगी ? आपण याहाडामांसाला फार महत्व देऊयाच नको. मला तर वाटतं, जिवंतपणीच स्वतःच्याशरीराकडे निर्मम भावनेनं पाहता आलं तर किती सुखाचं होईल ! तुम्ही मृत्यूचाविचारच डोक्यातून काढून टाका बरं. त्याला यायचं तेव्हा येऊ द्या. इतकी घाईकशाला ? तुम्ही आम्हांला सगळ्यांना आणखी खूप हवे आहात. आमच्या एकत्रितइच्छाशक्तीपुढे तुमचा एकटयाचा काय निभाव लागणार ?"

मी तो विषय एकदाचा संपवून टाकायचा वेडयावाकडया भाषेत प्रयत्न करत होतेलहानपणी अधूनमधून कोर्टात एखादा फार महत्त्वाचा दावा चालू असला, की आप्पातो ऐकायला आम्हांला यायला सांगायचे. जिल्हा-न्यायलय आमच्या घरासमोरचचपराश्यापर्यंत सगळी माणसे आम्हांला ओळखत. आमचे घर, कोर्ट, पोस्ट, ऑफिस,युरोपियन क्लब (आता तिथे गोगटे कॉलेज झालंय.) या इमारती एकाच परिसरात,थोडया गावाबाहेर होत्या. नवीन न्यायाधीश आले की प्रथम त्यांचा आमच्या गराशीपरिचय होई. पी.एम.लाड, गुंडील,वॉटरफील्ड, डी. आरा. प्रधान- तिथेबदलून आलेल्या बहुतेक न्यायाधीशांचे आमच्या घरी खूप जाणेयेणे असे. त्यांचे-आमचे त्या वेळी जोडले गेलेले कौटुंबिक संबंध पुढेही वर्षानुवर्षे-अद्यापही-तुटलेलेनाहीत. या पार्श्वभूमीवर,लहानपणी त्या कोर्टात आप्पा चालवीत असलेले काहीखटले बाकावर बसून मी ऐकलेले आहेत, तो काळ या क्षणी मला(आणि बहुधाआप्पांनाही) आठवला. शेवटी आप्पा मला हसून म्हणाले,""तू वकील फार चांगलीझाली असतीस !""

त्यानंतर दहाच दिवसांनी आप्पा गेले, `आपण आता जावं' या प्रबळ इच्छेच्यापोटीच हे शक्य झालं असेल का ? अगदी शांत,निरामय असा हा मृत्यू. मी बरेचमृत्यू खूप जवळून पाहिले आहेत. मृत्यूनंतर काही वेळाने अनेक मृतदेहांच्या नाकातूनवगेरे एक प्रकारचा द्रव बाहेर पडतो. आप्पांच्या बाबतीत असले काहीही झाले नाही.मृत्यूनंतरही दहा-बारा तास ते त्याच अवस्थेत, अगदी स्वच्छ, शांत झोपल्यासारखेपलंगावरच होते.

मृत्यूचं दुःख हे असतंच. आणि दुःखात मला वाटतं माणसांची मनं थोडी विशाला,क्षमाशील किंवा अधिक उदार होत असावीत. आपण भेदभाव विसरू पाहतो,एकमेकांच्या मदतीला धावतो, मृतदेहाला तर पवित्र मानून नमस्कारदेखील करतो. मगहा मृतदेह स्वच्छ असला काय किंवा दुर्देवाने गलिच्छ झालेला असला काय. हे खरं

असलं तरी आप्पांचा मृतदेह शेवटपर्यंत स्वच्छ राहिला या गोष्टीचेही कुठेतरी मलासमाधान होते. आपला मृत्यूही असाच असावा ही इच्छा तर असेलच; पण त्यांचीचमुलगी असल्यामुळे तो असाच असण्याची शक्यता असल्याचे तर हे समाधान नसेल ?

थोडे बहुत कळायला लागेपर्यंतची माझ्या वयाची पहिली आठदहा वर्षे वजा केलीतर त्यानंतर आईच्या मृत्यूपर्यंत साधारणतः पंचेचाळीस-पन्नास वर्षे आई मलालाभली. माझ्या सासूबाईशी माझी ओळख झाल्यालाही आता जवळपास तेवढाच काळलोटला आहे. साधारणतः एकाच वयाच्या,सारख्याच मध्यमवर्गीय सुशिक्षित आणिसुसंस्कृत घरांत वाढलेल्या,आपापले संसार निष्ठेने केलेल्या या दोन बायका. भाईचेवडील फार लौकर गेले. त्यामुळे मी त्यांना पाहिलेले नाही. पण भाईकडून त्यांच्याबद्दलजे काही ऐकले, त्यावरून तेही आमच्या आप्पांसारखेच एक देवमाणूस होते. म्हणजेया दोघींनी ज्यांच्या बरोबर संसार केले तेही वृत्तीने सारखेच होते म्हणायला हरकतनाही. पण मुळातच या दोघींचे पिंडधर्म अनेक बाबतींत वेगळे होते. त्यामुळे त्यांच्याशीसंबंधित असलेली माझी सुखदुःखंदेखील अगदी वेगवेगळ्या जातीची आहेत.

माझीही त्या दोघींशी वागण्याची तऱ्हा एकच नसे. आईशी हक्काने फटकूनवागणारी मी, सासूशी संबंध आला की चार वेळा विचार करत असे. देण्याघेण्याच्याबाबतीत `अं:! आपलीच आहे !' अशी आईला गृहीत धरणारी मी, सासूच्या बाबतीतशक्य ते उपचार पाळत असे. थोडक्यात, आईच्या बाबतीत आतडयाचा धागागुंतल्यामुळे तिला मी माझ्यातच पाहत असे आणि अनेकदा हक्काने दुर्लक्षीत असे, तरसासूच्या बाबतीत कर्तव्य, सुसंस्कृतता, भाईला बरे वाटावे ही इच्छा, आणि वळणलावले नाही असा आईला कुणी दोष देऊ नये हा कटाक्ष, वगेरे गोष्टींची फळी पक्कीठेवून झुकते माप घालण्याकडे माझा कल असे.

माझ्या सासूबाईंचा जन्म गणेशचतुर्थीला झाला आणि माझ्या आईचा शिवरात्रीला.हे दोन्ही सणांचे दिवस; त्यामुळे सहज लक्षात राहण्यासारखे. पण माझ्या आईचाजन्मदिवस शिवरात्रीचा, ही गोष्ट मी लग्न होऊन सासरी आले तरी मला माहीतनव्हती. आमच्या लहानपणी वाढदिवस वगेरे प्रकार नव्हतेच. आमच्या घरीच नव्हेतर त्या काळातल्या माझ्या माहितीतल्या इतर घरांतही कधी कुणाचा वाढदिवससाजरा झाल्याचे आठवत नाही. पण माझ्या सासूबाईंचा जन्म गणेशचतुर्थीच्या दिवशीझाला हे मला आमच्या लग्नाच्या आधीच कळले. त्यांच्याकडूनच. सहज बोलताबोलता. मग मी ते लक्षात ठेवले आणि त्यानंतर त्यांचा प्रत्येक वाढदिवस आठवणीने माझ्या परीने मी साजरा करीत आले. सतत पस्तीस-छत्तीस वर्षे, नेमाने. आता हळूहळूमीच ती प्रथा मोडून टाकली. म्हणजे आठवण येत नाही म्हणून नव्हे. आठवण येते,मी फोनवर त्यांच्याशी त्याबद्दल मुद्दाम बोलतेही; पण पहिल्यासारखा वाढदिवस साजराकरणे सोडून दिले. त्यांना बेसनाचे लाडू खूप आवडत. घरी केलेल्या साजूक तुपातबेसन खमंग भाजून आणि बेदाणा,बदाम वगेरे घालून मी खास त्यांच्यासाठी लाडूकरत असे. त्या दिवशी त्यांना जितकी वर्षे पुरी होत तितके लाडू आणि शिवाय साडीवगेरे. एकदा कधीतरी आईशी बोलताना मी याचा उल्लेख केला, तेव्हा ती म्हणाली,""वा, त्यांचा जन्म गणपतीच्या दिवशी का ? माझा शिवरात्रीला."" तेव्हा मलाआईचाही वाढदिवस असू शकतो हे इतक्या वर्षांनी प्रथमच जाणवले., आणि ही गोष्टइतक्या उशिरा कळली याचे हसूच आले. पण त्यानंतरही कधी मी आईचा वाढदिवसखास लक्षात ठेवला नाही आणि सासूबाईंचा वाढदिवस विसरू दिला नाही.भाईलाही स्वतःच्या वाढदिवसाबद्दल उत्साह असे आणि मीही त्या दिवशी त्याच्या आवडीचा खास असा सेपाक करत असे.

असे या मायलेकांचे पंचवीस-तीस वाढदिवस झाले, पण माझी जन्मतारीख कोणतीहे विचारण्याचं माझ्या सासूबाईंना कधी सुचलं नाही आणि भाईला ती तारीख मुद्दामलक्षात ठेवावी असं कधी वाटलं नाही. मला मात्र इतरांच्या जन्मतारखा लक्षातठेवायच्या आणि त्या त्या दिवशी प्रत्यक्ष, फोनवर किंवा पत्राने सदिच्छा द्यायच्या असाछंदच लागला आणि हळूहळू तो वाढतच गेला. मग त्यांतल्या काहींनी माझीजन्मतारीख काढण्याचा आणि उलट मलाही सदिच्छा पाठवण्याचा उद्योग सुरू केलाआणि त्यामुळे मग मला भंयकर संकोचल्यासारखं व्हायला लागलं. मनुष्यस्वभाव तरीकसा मजेदार असतो ! माझा वाढदिवस भाईच्या लक्षात नसतो याचे मला मनापासूनवाईट वाटे. आताशा आताशा तो मुद्दाम ती तारीख लक्षात ठेवतो, आणि आपल्यालक्षात आहे हे मला त्या दिवशी सकाळी किंवा आधल्या दिवशीही सांगून टाकतो.मला वाईट वाटू नये म्हणून; स्वतःच्या आनंदासाठी नव्हे. कारण त्या शुभेच्छा देऊनहोताच त्याने `हुश्श' केल्याचे मला जाणवते. मग माझाच मला खूप राग येतो.आपणच कुठेतरी कधीतरी बोललो असणार, याला माझा वाढदिवस कधीच आठवतनसल्याचे. या विचाराने मला स्वतःशीच फार लाज वाटते. माझा वाढदिवस कुणाच्याध्यानामनी नव्हता ते किती चांगले होते ! त्यात कसला तरी गूढ आनंद मला त्यादिवशी लाभायचा. माझ्या हाताने आता तो मी गमावून बसले. आणि कमावले काय ?वर्षांतून एक-दोन कसेसेच दिवस, की ज्या दिवशी फोन वाजला की धडाधडायलालागतं. आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर नसतील ? यांच्याशी आता काय आणिकसं बोलू ? मला औपचारिक बोलणं आवडत नाही हे ठीक आहे. पण करं सांगायचं तर वेळप्रसंगी तसं बोलावं लागतं हे कळत असूनही मला औपचारिक बोलताच येतनाही. म्हणजे नक्की काय होतं ? मला रंगभूमीवर अशी एखादी भूमिका वढवायलामिळाली असती की असं औपचारिक बोलण्याचा जिचा स्वभावच आहे, तर मी काय

केलं असतं ? ती भूमिका नाकारली असती ? सांगता येत नाही. ती भूमिका तशीमहत्त्वाची असती तर मी ती स्वीकारलीही असती आणि बहुधा चांगली वठवलीहीअसती. मग हा रंगभूमीवरचा अभिनय प्रत्यक्ष जीवनात क्वचित्प्रंसगी आवश्यकअसला तर कां करू नये ? आवश्यक असतानादेखील तो करू नये असे मला मुळीचवाटत नाही. पण मला मात्र तो तसा करता येत नाही हेच तर दुर्देव आहे. पराभवआहे. अशा हजारो रंगीबेरंगी पराभवांची मालिका म्हणजेच आपले आयुष्य का ? ""

माझ्या माहेरचे आणि सासरचे वळण अनेक बाबतींत वेगळे होते. आमच्याआप्पांना चहा फार आवडे. काम करताना त्यांना मधूनमधून थोडाथोडा चहा लागतअसे. अशा वेळी साहजिकच त्यांच्याबरोबर त्या वेळी जी कुणी माणसे असत त्यासर्वांसाठी आई चहा करीत असे. आप्पांच्या वकील मित्रमंडळीत, त्यांच्याकडेशिकायला येणाऱ्या तरूण वकील मंडळीत आणि आप्पांच्या पक्षकारांतही बरेचलोक धर्माने मुसलमान होते. आमच्या पलीकडे बरीच मुसलमान कुटुंबे राहतहोती. अद्याप आहेत. या सर्व मंडळीचे आणि आईचे संबंध खूप जिव्हाळ्याचे होते. पणचहा देताना मात्र, तोच चहा पण मुसलमानांसाठी आई वेगळ्या कपबश्या वापरतअसे. खरे तर सहज ओळखू याव्यात म्हणून, पण प्रत्यक्षात त्यांनाखास सन्मानितवाटावे म्हणून, आईने या कपबश्या जरा अधिक किंमतीच्या आणि फुलांची नक्षीअसलेल्या अशा घेतल्या होत्या. चहा देताना मोठया चतुराईने ती त्या त्या माणसापुढेतो तो कप ठेवी. पण आप्पांचे एकदोन मुसलमान वकील मित्र तिच्याहूनही चतुर होते.ह्या पाहुणचाराचे वेशिष्टय लौकरच त्यांच्या ध्यनात आले आणि मग आईने टेबलावरचहा आणून ठेवला की त्यांतला कधी हा तर कधी तो वकील नेमका आप्पांच्या पुढचाकप आपण घेई आणि आपल्या पुढयातला कप आप्पांच्या पुढे ठेवी. आई मगघाईघाईने त्यांना सांगे ""त्यांचा (म्हणजे आप्पांचा) चहा नका तुम्ही घेऊ. ते सारखाचहा पितात. मग पित्ताचा त्रास होतो. म्हणून मी त्यांना अर्धाच कप चहा दिलाय.त्यांना तोच घेऊ दे. तितकाच पुरे. तुम्ही तुमचा घ्याकपभर."" त्यावर तेही हसूनसांगत की त्यांनाही सारखा सारखा चहा घेऊन त्रास होतो, तेव्हा अर्धा कप चहाहवा होता. आणि हे सांगत असतानाच आप्पांच्या कपातून ते तो चहा पिऊही लागत.आप्पाही मग समोर आलेल्या त्या फुलांच्या कपातला अर्धा चहा पीत आणि उरलेलाअर्धा आईकडे देत तिला सांगत,""हा तू घे. फक्कड झालाय. पण मी अर्धा कपचघेतला. बाकीचा तुला ठेवलाय. घे."" मग आम्ही रिकाम्या कपबश्या धुवायला आतआणल्या की."" हा पण कप मेल्यांनी बाटवला.!"" म्हणत आई तो आप्पांचा कपही`मुसलमानांच्याकपा'त ठेवी. लौकरच घरात असे `मुसलमानांचे कप'च फार झाले,तेव्हा आईने तिचे हे सोवळे मनातल्या मनात गंगेला वाहिले आणि मग सगळे कपनिधर्मी झाले. आमच्या घरातली ही कपबश्यांची, भांडयाकुंडयांची,पंक्तींची वगेरे वर्णव्यवस्था अशी हळूहळू कोलमडून पडली आणि `ह्या नव्या पिढीला विधिनिषेधच
राहिला नाही, तिथे मी तरी एकटी किती पुरी पडणार ?' अशा विषादाने आई खिन्नझाली. आप्पाही अर्थातच त्या नव्या पिढीतच होते.

माझ्या सासरी सोवळ्या-ओवळ्याचा प्रकार किंवा असला भेदभाव नव्हता. पाळीच्यावेळी तीन दिवस दूर बसणे हा प्रकारही माहेरच्यासारखा सासरी नव्हता. त्यामुळे खूपमोकळे वाटे. मात्र गुरूवारी माझ्या सासूबाईंना कांदा-लसूणच वर्ज्य होती असे नव्हे,तर त्या दिवशी त्यांचेही सोवळे-ओवळे असे. सकाळची पहिली चहा-कॉफीही गुरूवारीप्रथम आंघोळ करून, मग भरलेल्या पाण्याचीच करावी लागे. पाळी चालू असले तरत्या सुनेच्या हातचे अन्न त्यांना गुरूवारी चालत नसे. ""गुरूवारमध्येच असं काय खासअसतं ? तुमचा जर असल्या गोष्टींच्यावर विश्वास नाही तर गुरूवारी तरी तुम्ही त्याकां करता ?"" असे मी सासूबाईंना विचारत असे; पण त्यांच्याकडे त्यावर काहीच उत्तरनसे. त्या गप्प बसत. किंवा ""एक वार तरी करावंसकेलं तर काय बिघडलं? तुझीआई पण सोवळं-ओवळ मानतेच."" असले काहीतरी उत्तर देत. माझ्या आईची मात्रया बाबतीतली विचारसरणी पक्की होती.तिला वाटे, पिढयानपिढया आपले पूर्वजजीवनाची जी मळलेली वाट तुडवट आले तोच ही भवनदी पार करायचा निश्चितआणि खात्रीचा मार्ग आहे. त्या वाटेवरून प्रवास करण्यातच आपलं भलं आहे. त्यापूर्वजांच्या पुण्याईने आणि आशीर्वादानेच आपल्याला शरीरा-मनाची ही शक्ती-बुध्दीलाभली, त्यांचा अवमान करणे हे पाप आहे. या निष्ठा मूर्खासारख्या, बिनबुडाच्याहोत्या; पण त्यांना चिकटून राहण्यात कष्ट अधिक होते तरीही ते उपसण्याची ताकदआईमध्ये खूप होती. कुटुंबातल्या आणि भोवतालच्या इतरांचाच विचार आई प्रथमकरीत असे, पण तो पक्कया आखीव अशी तिच्या दृष्टिकोनातून. भाई किंवा त्याच्याआई यांना इतरांचा विचार कधी सुचतच नाही. हे एकेकाचे प्रकृतिधर्म किवां पिंडधर्मअसतात. त्याला त्या त्या व्यक्तीचा इलाजच नसावा.

सर्वसाधारण घरामध्ये बायकांचे राज्य असते. त्यामुळे स्वतःचे घर असावे,तेघर, त्यातल्या सोयी, तिथले सामानसुमान,भांडीकुंडी, मांडणी वगेरे वगेरे कशीअसावी, याबद्दलही विशेषतः बायकांना स्वतःची मते, हौशी असतात. दुर्देवाने याबाबतीत मी बायको म्हणून नालायकच निपजले. असली कोणतीच शहरी हौस मलानाही. निवडच करायची झाली तर शहराबाहेर,छोटंसं, खूप मोठठाली झाडंआजूबाजूला असलेलं, एक गाय आणि एक कुत्रा यांची सोबत असलेलं, नदीकाठचंघर मी निवडलं असंत. पण भाई हा पक्का शहरी माणूस असल्याने तसे घर आपल्यानशिबात नाही हे मी चटकन मान्य करून मोकळी झाले. मग शहरातच राहायचे तरबेताचे असे आणि स्वच्छ घर असले की झाले. ते असेल तसे मी भागवून घेत असे.एक स्वच्छता सोडली तर माझ्या इतर गरजा फारच कमी होत्या. अमकीच भांडीकुंडीवगेरे मला लागत नसत. त्यामुळे अशा वस्तू निवडून मी कधी जमा केल्या नाहीत.पण घरातल्या प्रत्येक चीजवस्तूशी माझी वेयक्तिक ओळख आहे. सुरूवातीच्या काळात जुन्या कपडयांवर वगेरे घेतलेली आणि पुढे वेळीप्रसंगी कुणीकुणी दिलेली जी काहीभांडीकुंडी माझ्या घरात जमली आहेत त्यांच्यावर माझा माणसांसारखा जीव जडलाआहे. त्यांतल्या एखाद्या भांडयाला पोचा आला तर चारपाच दिवस माझी झोप उडते आणि त्यानंतर वर्षाननुवर्षे ते भांडे वापरताना त्या पोच्यावरून माझा हात न चुकताफिरतो, ते भांडे कुरवाळल्यासारखा.

भाईला मात्र गाडीसारखी घराचीही हौस होती.मग आम्ही सांताक्रूझला मोठठं घरघेतलं. तिथल्या त्या मोठाल्या हॉलमध्ये अनेकांची गाणी झाली.या कार्यक्रमांनामित्रमंडळींप्रमाणेच घरचे लोकही साहजिकच असत. माझ्या सासूबाईंनाही गाण्याचीखूपआवड. त्या बाबतीत माझी आई म्हणजे दुसरं टोकं होतं. मुलांना झोपवण्यासाठीयापेक्षा अधिक गाण्यांची मानवजातीला गरजच नाही, असे तिचे मत होते असावे.आम्ही गाणं शिकावं असं तिला वाटे. आपला जावई गाणारा आहे याचाही तिलाअभिमान होता; पण याचा अर्थ तिला संगीताच्या क्षेत्रात काही रस होता असा मात्रमुळीच नव्हे. याउलट, माझ्या सासूबाईना दिवसभर रेडिओ लावून बसा म्हटले तरीती शिक्षा वाटत नाही. त्यांना गाण्यातले डावेउजवे काही कळते अशातला भाग नाही,पण गाणे ऐकायला मनापासून आवडते हे मात्र खरे. तर सांताक्रूझच्या घरी त्या पाचवर्शांत झालेल्या प्रत्येक गाण्याला त्या हजर असतच. मग मध्यंतरात कॉफी होई. तीतयार करून कप भरणे वगेरे सर्व मी केलेल असे. पण ट्रे भरभरून पाहुण्यांना कॉफीनेऊन देणे, रिकामे कप गोळा करून सेपाकघरात आणून ठेवणे वगेरे कामांनामित्रमंडळीपेकी काही स्वयंसेवक पुढे येत. असल्या कामात भाई स्वतः, त्याचे भाऊअगर त्याच्या आई कधीही स्वतःहून भाग घ्यायला येत नसत. पण माझ्या सासूबाईंनाकुणीतरी कॉफी नेऊन दिली, की त्या मलाही चारचारदा ""तूही घे ना ग"" असाआग्रह करत. आपण घरातली माणसे, पाहुण्यांना आधी द्यावे, मग आपण घ्यावे,असा विचार भाईप्रणाणेच त्यांनाही चुकूनही सुचत नसे .""आधी तू घे बघू. मग संपेल."" असेमनापासून सांगत. कारण मीही त्यांची होते, इतर पाहुणे मंडळीसारखी परकी नव्हते.

हे `आपलं' आणि `परकं' ह्याच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात.माझी आई आणि सासूबाई या दोघींच्या तर अगदी दोन टोकांच्या होत्या. रक्ताचेनाते हे माझी आई अपरिहार्यपणे मानतच आली. पण अगदी मनाच्या गाभ्यात तिलालेकीसुना काय आणि शोजारपाजारच्या बायकांपासून कामवाल्यांपर्यंत इतर जणी काय,एका विशिष्ट पातळीवर सगळ्या सारख्याच होत्या. देवधर्म,सोवळेओवळे,रीतिरिवाज, नीति-अनीतीच्या कल्पना वगेरे बाबतींतल्या आईच्या निष्ठा पाळणाऱ्यात्या तिला स्वकीय वाटत आणि धुडकावणाऱ्या त्या परक्या वाटत. अशा अनेकबाबतीतं माझ्यासारख्या मुलीला तिने जन्माला घातले यात पूर्वजन्मीचे तिचे कोणतेतरी पाप गुंतले असावे अशी तिची भावना असावी. तसे तिने कधी बोलूनदाखवले नाही. पण माझ्या अशा एखाद्या कृतीनंतर तिला जे दुःख आणि वेदना होतत्यावरून मला हे जाणवे. पण या बाबतीत मीही तिच्याइतकी हट्टी होते. तिला दुःख होते म्हणून आपण पडते घ्यावे, असे तिच्या हयातील मला कधीही वाटले नाही.

आम्ही परदेशप्रवासाला निघालो तर आमचा प्रवास सुखरूप पार पडो म्हणून तीसत्यनारायण बोलून गेली. आम्ही परत आल्यावर जोडप्याने बसून तो पुजावा अशीतिची इच्छा. कारण तो नवस बोलताना म्हणे तिची धारणा तशीच होती. भाईचाहीअसल्या गोष्टीवर विश्वास नाही. पण तिची चेष्टा करत का होईना, भाई पूजेलाबसला आणि कथा सांगणाऱ्या भटजींचीही अधूनमधून खिल्ली उडवत त्याने ती पूजायथासांग पार पाडली. मी मात्र त्याच्याबरोबर बसले नाही. माझा असल्या गोष्टींवरविश्वास नाही हे माहीत असताना आईने या नवसात मुळात मला गोवावेच कां ?आणि विश्वास नसताना केलेली असली खोटी पूजा तिच्या त्या देवाला तरी मानवेलकी ? तरीही आईला सत्यनारायण करायचाच असेल आणि भाई त्याला तयारअसेल तर त्याने माझ्याऐवजी सुपारी लावून पूजेला बसावे असे मी सांगितले; आणिशेवटी ती पूजा तशीच पार पडली. मग सेपाक करण्यात, इतर कामांत,,वगेरे मी तिलासर्व मदत केली; पण ही मदत आईला होती. त्या देवाशी या गोष्टींचा काहीही संबंधनव्हता. खरे तर आईच्या दृष्टीने घरातला तो एक आनंदाचा प्रसंग. मंगल कार्य. पणत्या दिवशी तिच्या डोळ्याला मधूनमधून पाणी येत होते. माझ्यावर मात्र त्याचाकाडीचाही परिणाम होत नव्हता. ती वाकली होती; मी ताठ होते.

पुढे एकदा बऱ्याच वर्षानंतर त्या प्रसंगाची कशावरून तरी आठवण निघाली आणिमाझ्या त्या हटटी स्वभावाचा निषेध करताना ""कुठे फेडणार आहात ही पापं कोणजाणे !"" असे ती पटकन बोलून गेली आणि तिच्या डोळ्यांना पुन्हा पाणी आले.त्यावर मी म्हटले.

""मी केवळ पूजेला बसले नाही म्हणून जर मी तुला पापी वाटत होते, तर मगप्रसादाच्या शिऱ्यापासून कितीतरी सेपाकात वगेरे मी त्या दिवशी तुला मदत केली तीमाझ्या हातची कशी चालली ग ?""

तीही माझीच आई. म्हणाली,""कुठे चालली ?मी तर तुला कशालाही हात लावू दिलानसता. इतके सत्यनारायण मी करते तेव्हा तू थोडीच असतेच मदतीला ? पण विचार केला,त्या देवाला डोळे आहेत. नेवेद्याचा सेपाक.तेवढं तरी पुण्य तुझ्या हातून घडू दे.""

मी कपाळावर हात मारून घेतला. त्या दिवशी अशा रितीने माझ्या पदरी पडलेलेपुण्य पुरेसे नव्हते म्हणून तिने मला सद्बुध्दी लाभावी एवढयासाठी म्हणे आणखी एकसत्यनारायण माहू पूजला होता.

आम्ही- विशेषतः मी- जाणूनबुजून स्वतःचं असं अकल्यमआम करते आणि त्याचीभरपाई करण्यासाठी तिला असे आता या वयात न पेलणारे कष्ट पडतात. माझ्या पोटी तिच्याबद्दल दयामायाच नाही असे पुढेपुढे तिचे ठाम मत बनत गेले होतेअसणार. पण हा गेरसमज दूर करायचा उपाय तरी कोमता ? तिच्या समाधानासाठीमी देवपूजा करणे ? म्हणजे माझा स्वासच मती मागत होती. आई आणि मुलगी हेआतडयाचे नाते आम्हां दोघींत निश्चितच होते. पण देवाने आम्हां दोघींची स्थाने हीअशी दोन ध्रुवांवर रोवून ते आतडे तुटेपर्यंत ताणले होते खरे.

माझ्या सासूबाई अश्रध्द मुळीच नव्हत्या. पण त्यांच्या श्रध्दा,देव, धर्म त्यांच्यापुरतेसगळे काही होते. ते त्यांनी कुणावरही कधी असे लादले नाही. खावे,प्यावे,द्यावे,घ्यावे, चार घटका आयुष्य लाभलेय तर ते आनदात घालवावे, अशा वृत्तीचा हा भागहोता. अस्तित्ववादी विचारसरणी वगेरेतून निर्माण झालेली ही तात्त्विक भूमिकानव्हती; तो रक्तदोष( रक्तगुण म्हणू या हवे तर) होता. त्यामुळे लेकी-सुनांशी आणिमुलांनातवंडांशी त्यांचे खटके उडत ते ऐहिक पातळीवरच्या त्यांच्या अपेक्षाभंगातूनकिंवा त्यांच्या मागण्या आणि आमच्याकडून होणारा पुरवठा यांतल्या तफावतीतूनउद्भवत. सुनाकाय, जावई काय, त्यांच्या नातयात आलेली सगळी माणसे ही त्यांनीत्यांची मानली. मग ती कशीही वागली तरी त्यांना चालत. मी ऋण काढून सण केलाअसता तरीही त्यांना विषाद वाटला नसता. फक्त त्या सणात त्यांनाही प्रेमानेसहभागी करून घ्यावे, इतकेच, आपल्या इतरांपासूनच्या अपेक्षा या अशा छोटयाअसोत की मोठया असोत, तपशिलावर बेतलेल्या असोत की त्त्वावर, त्या पुऱ्याहोण्यात नाना तऱ्हेच्या अडचणी असू शकतात आणि हे लक्षात न आल्यानेच आपणदुःखी होतो. माझ्या सासऱ्यांच्या अकाली निधनामुळे बराच काळ त्यांना आर्थिकओढाताण सहन करावी लागली हे खरे. पण परिस्थिती सुधारली तरीही त्यांनामनाजोगे सुख कधीच लाभले नाही. शत्रूच्याही वाटयाला येऊ नयेत इतके आप्त-स्वकीयांचे मृत्यू त्यांच्या वाटयाला आले. पण निवृत्ती मात्र त्यांच्यापासून सदेवदूरच राहिली. त्यामुळे बाकी सर्व काही असूनही दुर्देवाने त्या असुखीच राहिल्या. कुणीकितीही दिले, त्यांना बरे वाटावे, खूष करावे म्हणून कितीही धडपडले, तरी त्यातूनत्यांना मिळणारे समाधान हे फक्त क्षणिक असे. वृत्तीतच कुठेतरी अतृप्तीचा आणितक्रारीचा सूर घुमताना ऐकू येत असे. अजूनही येतो.

म्हणजे मग मृत्यू काय करतो ? त्याचा प्रभाव, त्याची टांगती तलवार वगेरेला खरेचकाही अर्थ आहे का ? की त्याच्या बाबतीतही `अतिपरिचयात् अवज्ञा' हेच तत्त्व लागूपडते ? मला वाटते, अनेकांच्या बाबतींत, त्या क्षणी त्याचा घाव जाणवतो, इतकेच. बाकीइतकी लौकर बरी होणारी एवढी मोठी जखम दुसरी कोणतीही नसेल. स्वतःच्यास्वभावातून निर्माण होणारे सव मात्र संवेदनाशील माणसांना जन्मभर टोचचत राहतात.

मी सासूबाईंशीबी अधूनमधून वाद घालत आले. त्यांच्या अधिक्षेप न करता त्यांचीचेष्टा करत आले. पण आमचे भांडण असे कधी झाल्याचे आठवत नाही.

पारल्याच्या आमच्या त्या छोटयाशा बेठका घराला वरती एकच खोली होतीय ती भाईच्या वडिलांनी खास त्याच्यासाठीच बांधली होती. आमच्या लग्नानंतर अर्थातचतीच आमची खोली झाली. आणचे कुणीही पाहुणे,दोस्तमंडळी आली तरी ती मगआमच्या खोलीतच आमच्याबरोबर राहत. घरच्या इतरांना परकी अशी नानाजोग, जे. पी. नाईक, भय्या वगेरे मंडळी मुक्कामाला आली तरी ती त्या वरच्याखोलीत आमच्याबरोबर असत. अशा एखाद्या वेळी भाई कामानिमित्त बाहेरगावीगेलेला असला आणि मी एकटीच असले तरी माझ्या सासूबाईंनी या पाहुण्यांच्यावास्तव्याला कधी हरकत घेतली नाही. माणसाच्या सभ्यतेवर, सुसंस्कृतपणावर त्यांचाविश्वास होता. त्यांच्या तुलनेने माझी आई या बाबतीत फार कर्मठ, सोवळ्याविचारांची होती. असे प्रसंगक्वचित एकदोनदाच आले असतील, पण त्या वेळीमाझ्या सासूबाईंनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मला फार मोलाचा होता. याबाबतीत आईपेक्षा त्यांचे पारडे जड होते. आणि ही गोष्ट मी त्यांच्या माझ्यासंबंधातल्या कोणत्याही संदर्भात विसरूच शकत नाही. त्यांच्या वागण्यातून आम्हांसगळ्यांना अनेकदा मनस्ताप होत आला आहे. त्या त्या वेळी त्यांचा फार रागहीयेतो. पण मग मला दयाही येतो. स्वतःपलीकडे दुसऱ्या कुणावर तरी जीव तोडून प्रेमकरण्यातला आनंद त्यांच्या ललाटी लिहिलाच गेला नाही, त्यामुळे जमेची बाजू खूपअसूनही त्यांची ओटी फारशी कधी भरली नाही खरी.

गेल्या काही वर्षांपासून माझ्या अंतर्मनात सुरू असलेली एक प्रक्रिया आप्पा-आीच्यामृत्यूनंतर जरा तीव्र झाली आहे. मनाच्या खेळात मृत्यूच्या विचाराभोवती पिंगा घालणंजरा जास्तच व्हायला लागलंय. जन्म आणि मृत्यू हे दोन्ही आपल्या हाती नाहीत. पणया दोहोंना जोडणारा प्रवास तरी ? तोही आपल्या हाती नाही ? अनुकूल किंवाप्रतिकूल परिस्थितीची ताकद आणि आपले आईबाप आणि पूर्वज यांच्या वारशातूनलाभलेल्या पिंडाची ताकद या दोन ताकदींची गुंतागुंत. त्यात खर्ची पडणाऱ्या शक्तीतूननिर्माण होणारी सुखदुःखे सगळेच परस्वाधीन. त्यातला अहंकारी `मी' हा तरी मुळातमनाजोगा असावा ! तो `मी' म्हणजेच पिंड ना ? आई-बाप, पूर्वज या साखळीतले काहीदुवे आणि त्यांत आपल्या निर्मितीमुळे पडलेला आणखी एक वळसा. हे सगळं मोठंविचित्रच आहे.

मी मृत्यूचा विचार करते,म्हणजे नक्की काय करते ? माझ्या डोळ्यांपुढे दोनतीनप्रसंग पटकन येऊन जातात. मी खूप लहान होते, धामापूरला आजीकडे होते.पावसाळ्याचे दिवस. खूप रान वाढलेले. त्या काळी त्या भागात संडास ही गोष्टच नव्हती.

शेतात कुठेतरी जायचं. मी जाऊन बराच वेळ झाला म्हणून आजी शोधायला आली. माझ्या बोलण्याचा आवाज ऐकू आला म्हणून ती त्या दिशेला आली.माझ्यासमोर जवळच काही अंतरावर एक नाग वेटोळं घालून, फणा काढून ऐकत (?)होता, आणि मी त्याच्याशी गप्पा मारत होते.- त्याला काहीतरी सांगत होते. मला हीसवयच होती. कावळा,चिमणी, मुंग्या, तांदळातल्या किडी, हालती पाने-फुले, झाडेयांच्याशी बोलताना पाहून""अशांनी एक दिवशी वेड लागेल !""असे आईहीम्हणायची. धामापूरच्या त्या वेळच्या आमच्या घरात भिंतीवर एक खूप मोठठे नागोबाचेचित्र रंगवलेले असे. दरवर्षी नागपंचीमीच्या आधी ती भिंत सारवून नवा नागोबारंगवला जाई. आणि नागपंचमीला त्याची यथासांग पूजा होई. ती एक संरक्षक देवताचमानली जाई. खरा नागदेखील कधीमधी दिसे. पण तरी त्याला मारायचे नसे. आजीत्याला राखणदार म्हणे. मी ज्याच्याशी बोलत होते तो इतरत्र कुठेही दिसला असतातरी आजीने हात जोडून त्याला ""राखणदारा,भलं कर बाबा सर्वांच"" असेच म्हटलेअसते. पण तो रक्षणकर्ता असला तरी शेवटी विषारी जनावरच ते. त्याच्यापासूनकिती दूर राहायचे याची अक्कल माणसाला हवी. त्या वयात मला ती निश्चितचनव्हती. भिंतीवरचा नाग तर चोवीस तास घरातच असे. त्याला मी हातदेखील लावतअसे. त्याच्या फणेवर गंध-पुष्पे लावली जात. हात जोडून नवस बोलले जात. त्यामुळेअसेल कदाचित, पण या खऱ्या नागाचे मला जरादेखील भय वाटले नव्हते. आणिम्हणूनच मी त्याच्याशी बोलत बसले होते असेन.त्याला संरक्षक देवता मानणारीआजी मात्र भलतीच घाबरली आणि मला मागच्या मागे बकोटीला धरून उचलूनधावत घरी आली. मग मला देवाच्या पायावर घालणे, भिंतीवरच्या नागोबापुढेस्वतःचे आणि माझे नाक,डोके घासणे वगेरे बरेच काही आजीने केले. मला नसमजणारे बरेच समजावूनही सांगितले. त्याचले काहीच आता आठवत नाही. पणमृत्यूचा विचार आला की हा प्रसंग न चुकता आठवतो.

दुसरा प्रसंग खूप मोठया वयातला आहे. आम्ही दिल्लीला होतो. साठ सालचीगोष्ट असावी. संध्याकाळ झाली होती. भाई ऑफिसमधून घरी येऊन टेबलावर`अपूर्वाई' या प्रवासवर्णनातला पुढला भाग लिहित होता आणि मी समोरच बसूनपूर्वीच्या भागाची `किर्लोस्कर' ला पाठवण्यासाठी प्रेसकॉपी करत होते. आभाळ भरूनआले होते. खोलीत दिवा, पंखा लावून आमचे काम चालले होते. अचानक गडगडाटसुरू झाला. ती मेघगर्जना तर होतीच, पण पृथ्वीच्या पोटातूनही काही विचित्र आवाजयेताहेत असा भास झाला आणि सगळं थरथरायला लागलं. आम्ही दोघंहीएकमेकांकडे पाहून ""धरणीकंप! असे म्हणत जागचे उठलो. आम्ही वरच्यामजल्यावर राहत होतो. पंडारा रोडला, मधे मोठे मोकळे मेदान आणि भोवताली हीसरकारी घरे होती. धरणीकंप झाला की इमारती कोसळतात, तेव्हा घर सोडून शक्यतितक्या लौकर उघडया जागी जाणे आवश्यक असते, हे आम्हां दोघांनाही माहीतहोते. भाई धावत खाली उतरून मेदानात गेला. जाता जाता त्याने आमच्याकडे कामाला असलेला पोरगा भेदरून रडायला लागला होता त्यालाही खाली नेले.भोवतालच्या सर्व घरांतली बहुतेक सगळी माणसे धावत मेदानात गोळा झाली होती.मी मात्र प्रथम दिवा आणि पंखा बंद केला. टेबलावरचे कागद उडू नयेत म्हणूनत्यावर पेपरवेट ठेवले. भाईने पेन उघडेच टाकले होते ते नीट बंद करून खणातटाकले. खाली उतरताना घराला कुलूप घातले. मी खाली जाऊन पोचेपर्यंत धरणीकंपकधीच थांबला होता. त्यानंतर पुढले काही दिवस माझी ही वर्तणूक हा आमच्यामित्रमंडळीत चेष्टेचा विषय होता. या गोष्टीलाही आता कितीतरी वर्षे झाली. पण मृत्यूचाविचार म्हटला की हाही प्रसंग न चुकता डोळ्यांपुढे जसाच्या तसा लख्ख उभा राहतो.

तिसरा प्रसंग मात्र अगदी याच्या उलट आहे. मला वाटते, शेहेचाळीस सालच्याऑक्टोबरातलीच गोष्ट असावी. दिल्लीजवळ ओखल्याला डॉ. झाकीर हुसेन यांचीजामिया मिल्लिया इस्लामिया ही संस्था. भय्या (मीर असगर अली )हा तिथला विद्यार्थी.त्या संस्थेचा रौप्यमहोत्सव होता. त्या निमित्ताने प्रथम ओखल्याला, मग मीरतलाकॉग्रेसचे सेशन होणार होते तिथे, आणि परतताना उत्तर हिंदुस्थानातली प्रसिध्द स्थळेपाहायला, असा दौरा आखून भय्याबरोबर भाई आणि मी जायचे नक्की केले होते.आयत्या वेळी भाईचा बेत रजा न मिळाल्याने रद्द झाला आणि भय्या आणि मीदोघेच दिल्लीला आणि तिथून ओखल्याला गेलो. माझी उतरायची व्यवस्था प्रो. आगाअश्रफ यांच्या घरी होती. अगदी डोळ्यांचे पारणे फिटेल असा सुंदर सभारंभ पहिल्यादिवशी पार पडला. गांधी,नेहरू,आझाद,जिना वल्लभभाई, राजाजी, सरोजिनीनायडू-- नाव घेण्यासारखा त्या काळचा देशातला प्रत्येक राजकीय पुढारी त्या प्रचंडस्टेजवर बसला होता. अनेकांची भाषणे झाली. सभारंभानंतर जवळपासचे म्हणजेदिल्लीहून वगेरे आलेले पाहुणे परत गेले. जेवणे, गप्पा होऊन आम्ही झोपलो.मध्यरात्री प्रचंड आरडाओरडा ऐकू आला आणि मी जागी झाले. घरातले इतरहीलोक उठले होते. फाळणीपूर्वीचा तो काळ. ठिकठिकाणी मधूनमधून जातीय दंगेउसळत होते. त्या रात्री ओखल्याच्या शेजारच्या गावातून हिंदुंचा प्रचंड जमाव हातांतपलिते घेऊन मुसलमानांचे हे विद्यापीठ जाळायला हल्ला करून येत होता.`हर हरमहादेव' च्या घोषणा ऐकू येत होत्या. प्रो. अश्रफ माझ्याजवळ आले आणि म्हणाले,""घाबरू नको. काही होणार नाही. ते लोक खूप दूर आहेत. पोलिसांची गस्त चालू आहे.""

हे जरी खरं होतं तरी मी भेदरून थरथरत होते. हा प्रसंग आठवला म्हणजे नचुकता मला माझी भयंकर लाज वाटते. मी मृत्यूला घाबरले म्हणून नव्हे. ती प्रतिक्रियानेसर्गिकच होती. त्यात कमीपणा मानायचे काय कारण ! पण मला शरम वाटते तीत्या क्षणी माझ्या डोक्यात क्षणभर का होईना, पण येऊन गेलेल्या एका विचाराची.मला वाचले, मुसलमानांना मारायला आलेले हे हिंदू. मी त्यांच्यातलीच आहे, हिंदूआहे हे त्यांना कळणार नाही आणि मला निष्कारण मरावे लागणार.

मी त्यांच्यातलीच आहे' म्हणजे काय ? मी धर्म मानत होते का ? त्या काळीभय्याइतका जवळचा मला दुसरा कुणीही मित्र नव्हता. घरदार, नातीगोती, कोणतीही बंधने न मानणारी मी, सुंदर जीवनमूल्यांना जिवापाड जपणारी मी, क्षणभर काहोईना पण त्या अविचारी जमावाला `आपला मानते ? प्रसंग आलाच असता तरप्रो. आगा अश्रफ आणि त्यांच्या घरातल्या इतरांनीही त्यांच्या घरच्या माझ्यासारख्यापाहुणीला वाचवण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा केली असती, हे त्या क्षणीही मलाकळत होते. त्यांचा तो धर्मच होता. त्या क्षणी त्या मुसलमानांतला माणूस जागा झालाहोता आणि माझ्यातला हिंदू डोकं वर काढू पाहत होता. हल्ला करून येणाऱ्यांचा लोंढापरतून सगळे स्थिरस्थावर होण्यात अर्धाएक तास तरी गेला असेल. तो महाभयंकरविचाराचा क्षण कधीच मागे गेला होता. प्रत्यक्ष प्रसंग आलाच असता तर स्वतःवर सूडकाढण्यासाठी मी कदाचित सर्वांत अधिक धेर्य आणि माणुसकी दाखवली असती. इतरकुणाला काहीही कळले नाही; पण मला मात्र माझं एक वेगळंच दर्शन झालं होतं.
या वृत्ती एरवी कुठे असतात ? प्रसंगी केवढी उसळी मारून ज्वालामुखीतूनविध्वसंक लाव्हा अचानक उफाळून यावा तशा येतात ! या एवढयाशा जीवात असंकाय काय एकवटलेलं असतं आणि संस्कार करून न घेता स्वतंत्र अस्तित्व बाळगतअसतं ? आपल्यालाच आपण अद्याप ओळखलेले नाही.
भीती ही शारीरिक असते की मानसिक ? माझ्या असे लक्षात आलेय, की इतरांच्यादृष्टीने अत्यंत क्षुल्लक वाटणाऱ्या काही प्रसंगी मी शारीरिक आणि मानसिक दोन्हीदृष्टींनी अगदी अळुमाळू होऊन भेदरून लागते आणि जिथे सर्वसामान्यांचेधेर्य खचते तिथे मी अगदी सहजतेने वावरू शकते. उदाहरणच द्यायचे झाले तरअगदी जवळच्या व्यक्तीचादेखील आजार, अगर मृत्यू, अपघात, ऑपरेशन, वेडा,राजकीय लढयातील दंडुकेशाही किंवा गोळीबार, आग, युध्द, असल्या गोष्टींचे अगरनेसर्गिक आपत्तींचे मला कधीच भय वाटलेले नाही. पण दारू पिऊन झिंगलेला माणूस,चोरी, मारामारी, दंगे, अगदी चित्रपटातले बॉक्सिंग किंवा कुस्तीचे दृश्य, असल्या गोष्टीमी पाहू शकत नाही. मला कसेतरीच व्हायला लागते. मळमळायला लागले, थरथरायलालागते, आपल्याला भोवळ येईलसे वाटू लागते. मी क्राइम-स्टोरीज वाचू शकते, म्हणजेवाचताना ती दृश्ये डोळ्यांसमोर उभी राहतातच ना ? पण त्या वेळी असे काही होत नाही.प्रत्यक्षात मात्र अशा वेळी माझी मी राहतच नाही. म्हणजे निश्चित काय ?मला वाटते, माझ्यातले जिवाला अतिशय घाबरणारे, दुबळे, नेसर्गिक अस्तित्वअशा वेळी जागृत होऊन माझ्या संस्कारित अस्तित्वावर मात करते. म्हणजेच मलावाटते माणसाला दोन पिंड असावेत. एक आई-बाप आणि पूर्वज यांच्यापासूनलाभलेला आणि पुढे आपल्या वंशजांचे आपण पूर्वजच होणार या अर्थाने आपल्यास्वतःच्या आयुष्यातल्या नव्या अनुभवाने थोडा बदलेला असा संस्कारित पिंड; आणिदुसरा आदिमायेकडून (इथे मूळ शब्द `आदिमाया' नसून `आदिमाय' असा असायलाहवा ) लाभलेला, कोणतीही संस्कार करून घ्यायला राजी नसलेला मुळ पिंड. ---वाटले तरअसे म्हणून या, की भूगोलावर आधारलेले जिवंत शरीर म्हणजे हा मूळ पिंड आणि इतिहासावर आधारलेले मन हा संकरित पिंड. म्हणजे मग हे द्वेत झाले. आजचेवेद्यकशास्त्र हे शरीर आणि मन यांचे अद्वेत मानण्याकडे झुकत असताना हाद्वेतविचार योग्य आहे का ? अचूक आहे का ? मलाही शंका आहे, पण त्याबरोबरच हा विचारही आहेच.

आता वय उताराला लागलंय. स्वतःच्या प्रकृतीची मी कधीच काळजी केलेलीनाही. तेव्हा मला काय वाटतं याची काळजी न करता आता प्रकृतीने मला इंगादाखवायचं ठरवलं तर मला तक्रार करण्याचा अधिकार नाही. आपल्याला शेवटचाआजार कधी येईल आणि कोणत्या स्वरूपाचा येईल हे जरी अनिश्चित असलं आणिआपल्या हाती नसलं तरी त्या वेळी नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचं आपल्याशी जेवर्तन राहील ते बरंचसं आपलं आयुष्यभर त्यांच्याशी जे वर्तन राहिलं त्यावरचअवलंबून असणार.त्यामुळे या बाबतीत कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवण्याचामला अधिकार नाही. मी मला वाटले तसेच वागत आले, इतरांना काय वाटेल याचाविचार कधीच केला नाही. म्हणजे मी माझ्यासाठीच जगले, इतरांसाठी नाही. मग मीमरताना इतरांनी स्वतःच्या आयुष्यातला काही वेळ आणि काही शक्ती माझ्यासाठी कांखर्च करावी ?

म्हणजे मग हा प्रश्न सोडवायचा एकमेव उपाय म्हणजे आत्महत्या का ?

स्वतःच्या विचारानेच जगणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तींनी खरं तर एकटं राहावं,एकटं जगावं, एकटं मरावं. हा विचार आला की मला न चुकता फक्त माझ्या आजीची आठवण येते. तिचा- माझा सहवास माझ्या लहानपणी घडला तेवढाच. पण आम्हां दोघींचाएकमेकींवर इतका जीव होती, की आयुष्यातला अत्यंत सुखाचा काळ कुठला या प्रश्नाला,लहानपणी धामापूरला होते तो, किंवा धामापूरच्या आजीच्या सहवासात गेला तो, इतकेचउत्तर मी देऊ शकेन. या आजीचे मला दिसलेले रूप फार सुखद आहे आणि तिच्यापूर्वायुष्याची वाडवडिलांकडून कानावर आलेली कहाणी विलक्षण आहे.

तसे आम्हां दोघींचे रक्ताचे नात नव्हते. ती माझी सावत्र आजी. आम्ही ठाकूरधामापूरचे. माझे पणजोबा खूप श्रीमंतही होते आणि मोठे व्युत्पन्नही होते. त्यांच्याघोडयाच्या नाला म्हणे चांदीच्या असत. त्या काळातल्या श्रीमंत जहागीरदारांना साजेसेते रूबाबात राहिले असणार, आपल्या लहरीप्रमाणे मनमाना कारभार केला असणार.त्या मोठया कुटुंबात आणि गावात त्यांचा दरारा फारच होता. धामापूर हे मालवणपासून बारा मेलांवर आहे. मालवणहून नेहरूपाराला नदीपाशी येणारा रस्ता धामापूरला जातो...

(अपूर्ण)
सुनीता देशपांडे
संपूर्ण पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
https://amzn.to/3W3HcDf
a