Wednesday, May 29, 2024

मोत्या शीक रे अ आ ई

शिक्षण आणि शिक्षक या विषयावर असंख्य चर्चा, परिषदा आणि परिसंवाद, लेख, भाषणे चालूच असतात. पुष्कळदा वाटते, की या भानगडीत वेळ घालवण्याऐवजी आसपासची चार पोरे जमवून त्यांना चार अक्षरे शिकवण्यासाठी जर ही तज्ज्ञ मंडळी धडपडतील तर हा वेळ सत्कारणी लागेल. आणि म्हणूनच शिक्षण यासंबंधी कोणी काही बोलायला लागले, की मला माझ्या लहानपणी पाठ केलेल्या 'मोत्या शीक रे अ आ ई'ची आठवण होते. आपल्या मोत्याला अ आ ई शिकवायला निघालेली ती पोर अधिक प्रामाणिक होती. फक्त हा शिक्षणाचा व्यवहार एकतर्फी होता. इथे शिक्षक शिकवायला आतुर होता; शिष्य मात्र नव्हता. आपल्याही प्राथमिक शाळेपासून ते उच्च शिक्षणापर्यंतचा प्रकार बराचसा असाच आहे. कुठे शिकवायला उत्सुक असणारे शिक्षक आणि सर्वस्वी अनुत्सुक विद्यार्थी, कुठे शिक्षकही अनुत्सुक आणि विद्यार्थीही अनुत्सुक, कुठे विद्यार्थी उत्सुक, शिक्षक अनुत्सुक ! बहुतेक ठिकाणी शिकवायची इच्छा नसणारे शिक्षक आणि शिकायची इच्छा नसणारे विद्यार्थी अशीच गाठ मारलेली असते. पहिलीपासून ते अकरावी-बारावीपर्यंत आणि पुढेही ह्या गाठी कशाबशा सोडवत जायच्या आणि एकदाचे मोकळे व्हायचे.

शिक्षकाकडे शिकायला मुले पाठवतानादेखील केवळ इतके रुपये देऊन मुलाला इतके तास शिकवण्याच्या आर्थिक कराराचे या व्यवहाराला स्वरूप नसते; कारण इथे मुलांना शिकवून तयार करणे हे निर्जीव वस्तू तयार करण्यासारखे काम नव्हे. तसले काम हा एक वेळ शुद्ध आर्थिक व्यवहार असू शकेल. पण अशा निर्जीव वस्तू बनवणारा माणूसही कित्येकदा त्यात आपला जीव ओततो. 
फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे: कोल्हापूरला मी चप्पल विकत घ्यायला गेलो होतो. लहानसे दुकान होते. मी चप्पल पायात घातली आणि सहज चांभारदादांना म्हणालो, "अंगठा पक्का आहे ना? चपलेच्या अंगठ्याला भलत्या वेळी तुटायची हौस असते." चांभारदादा म्हणाले, "साहेब, तसल्या वांड सोभावाची वाण पायताणं आपल्या हातून नाही घडायची." मला त्यांचे ते 'वांड सोभावाचे पायताण' ही कल्पना फार मजेदार वाटली. मला त्याच्या त्या बोलण्याची मजा वाटलेली पाहून चांभारदादांचीही कळी खुलली, आणि चार इकडल्या तिकडल्या गोष्टी सांगताना त्यांनी आपल्या धंद्यातली गुरुकिल्ली मला सांगितली, "हे बघा साहेब, नवी चेपली नव्या बायकूसारखी. नवराबायकू संसारात रुळेपोत्तूर चार दिवस लागत्यात. एकदा का रुळली दोघंजणं-मग? नवरा न् बायकू येकजीव. तसंच पावलाचं आणि चपलीचं असतं. चप्पल चांगली कंची? जी पायात असतानी असल्याचं भान नसावं, आन् नसली का म्हंजी पाऊल टाकताना अवघड वाटावं."

माझ्या पायांत इतक्या मायेने त्यापूर्वी कुणी चप्पल सरकवली नव्हती. जीवनात स्वीकारलेल्या कामात असा जिव्हाळा येणे हेच महत्त्वाचे. दुर्दैवाने शिक्षकाच्या कामात असा जिव्हाळा यावा याची समाजालाच आच लागलेली मला दिसत नाही. याचे मुख्य कारण शिक्षकाचे हात निर्मितीत गुंतलेले आहेत याची जाणीव कमी झाली आहे. राजकारणात आपण अमक्या पुढाऱ्याचे हात बळकट करा, तमक्या पुढाऱ्याचे हात बळकट करा हे सतत ऐकतो, पण शिक्षकाचे हात बळकट करा असे म्हणणे आपल्याला सुचत नाही. केवळ आर्थिक दृष्टीने नव्हे तर इतर अनेक दृष्टींनी शिक्षकाचे जीवन हे त्याच्या शिक्षणकार्यात त्याला आनंद वाटावा अशा प्रकारचे कसे होईल याची समाजच चिंता करत नाही, आणि उगीचच शिक्षकांकडून अनेक प्रकारच्या अपेक्षा मात्र करत राहतो. 

(अपूर्ण)
एक शून्य मी
हा लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवरून पुस्तक घरपोच मागवा.

Wednesday, May 22, 2024

कानिटकरांनी लिहिलेल्या पत्राला पुलंचे उत्तर..

पुलंचा सत्कार करावा म्हणून कानिटकरांनी पत्र लिहिलं त्याला उत्तर देताना (दिनांक ९.४.७७) पु.ल. म्हणतात..

तुमचे पत्र मिळाले तुमच्या आणि आनंदच्या सदभावना मी समजू शकत नाही असे नाही. परंतु तुम्ही योजित असलेल्या सत्काराला मान्यता द्यायला माझ्या मनाला प्रशस्त वाटत नाही.

हाती आलेल्या पैशांचा समाजिक सत्कार्यासाठी उपयोग करावा या भावनेनेच मी व सुनीताने आवश्यकतेहून अधिक पैसे न खर्च करता संसार केला. फार मोठे त्यागपूर्ण जीवन जगलो असे नाही. परंतु चैनीच्या बाबी मर्यादित ठेवल्या. विशेषतः सुनीताने घरात नोकरचाकर, स्वैपाकी वगैरे न ठेवता सारी कामे, एखाद्या मध्यम उत्पन्नात संसार करणाऱ्या गृहिणीसारखी स्वतःच केली. ही सारी काटकसर आणि व्यवहाराबाबतची दक्षता आपल्या मिळकतीचा लाभ सामाजिक कार्याला मिळावा ह्या हेतुनेच पाळलेली होती. सुदैवाने आम्हा दोघांनाही भपकेबाज राहणीची हौस नाही. त्यामुळे हे सारे जमले. ह्याबद्दल सत्कार किंवा गौरव याची खरोखरच अपेक्षा ठेवली नाही. तेंव्हा आजवर जे टाळत आलो ते तसेच चालू ठेवावे असे वाटते.

तुम्ही आणि आनंद यादव भेटलात तर आनंदच वाटेल. आधी फोन करून कळवा म्हणजे निवांतपणे गप्पागोष्टी करता येतील.

तुमचा
पु. ल. देशपांडे


Monday, May 20, 2024

मी एक असामी

माझ्यासाठी कुणीही कोकिळा कधी गायली नाही. मुगभाटात आंब्याच्या मोसमात कोकिळा न येता 'पायरे हाप्पोस' येतो. वसंत, हेमंत वगैरे ऋतू मुंबईच्या वाटेला जात नाहीत. मुंबईला दोनच ऋतू - उन्हाळा आणि पात्रसाळा. एक पावसाच्या धारा, नाहीतर घामाच्या धारा. मोर नाचताना मी कधी पाहिले नाहीत. चांदण्याला शोभा असते ही ऐकीव माहिती. जाई-जुई चमेलीला बहर आलेला मी वेणी- वाल्याच्या टोपलीत पाहिलाय फक्त. आकाशात मेघांची दाटी झाली की मला 'नभ मेघांनी आक्रमिलें' वगैरे गाणी न सुचता छत्री दुरुस्तीला टाकली पाहिजे हे आठवतं. सागराच्या अफाट विस्ताराचं मला यत्किंचितही कौतुक नाही. कारण मला बोट लागते आणि कोकणात जाताना सागराचा विस्तार एवढा मोठा करायची ह्या विधात्याला काही गरज होतीच का हा प्रश्न विचारीत मी डोकं धरून आलं-लिंबू चोखीत रत्नागिरी बंदराची वाट पाहत असतो.

साहित्य-संगीत-कला-विहीन माणूस म्हणजे बिनशेपटीचा बैल असं मला नानू सरंजामे एकदा म्हणाला होता. पण ह्या नानूनंच सांगितलेल्या साहित्यिकांच्या लाथा- ळ्यांच्या कथा मी ऐकल्या आहेत. मानकामेशेटनी गवई लोक एकमेकांवर कशी शिंगं खुपसून धावतात तेही सांगितलंय ! साहित्य, संगीत वगैरेची शेपटं लावून अशी शिंगं खुपसणारे बैल होण्यापेक्षा बेनसन जानसन कंपनीत एक तारखेला पडेल ते हातावर घेऊन मान मोडून खर्डेघाशी करणारा बिनशेपटीचा, त्रिनशिंगांचा, साधा, सरळ ओझ्याचा बैल होणंच बरं असं मला वाटायला लागलंय !

कसा मी कसा मी हे माझं मला नीटसं कळत नाही. पण ह्या जगात येताना जसा गपचूप आलो, तसा जातानादेखील आपल्या हातून त्या जगाला फारसा धक्का न लावता निघून जाण्याची इच्छा बाळगणारा असा मी एक असामी आहे. आणि म्हणूनच असल्या ह्या माणसाचं नाव रवींद्रनाथ, सुभाषचंद्र, वगैरे नसून धोंडो भिकाजी जोशी कडमडेकर असं असलं म्हणून बिघडलं काय ? उलट बरंच आहे. उगीच आडनाव भोसले लावायचं आणि चालवायची पिठाची गिरणी, यात काय अर्थ आहे ?

बाकी चारचौघांपुढे आपण साधे सरळ ओझ्याचे बैल आहोंत हे कबूल केलं म्हणजे कसं मोकळं मोकळं वाटतं. 

पु. ल. देशपांडे 
असा मी असामी 
संपूर्ण पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.

Tuesday, May 7, 2024

नेपोलियन कुत्रा

माझ्या परिचयाच्या एका गृहस्थांचा कुत्रा फक्त शास्त्रीय संगीतच ऐकतो,असा त्यांचा दावा आहे. सिनेमातली गाणी सुरु झाली, की रेडियोवर "जंप घेऊन ऐक्चुली भुंकायला लगतो."! त्याच्या मालकीणबाईचेदेखील "आय सिंप्लि हेट फिल्म म्यूज़िक" असे आहे. कुठल्याशा दिगंबरबुवा पुढे आठवड्यातले तीन दिवस बसून त्या केदार, हमीर वगैरे मातब्बर मंडळींची आकंठ अब्रू काढीत असतात. समाजकल्याण ,बैडमिंटन, रमी, स्लिमींग, सिनेमे, आमचा शनिवार, गायन, बॉलरुम डान्सक्लास आणि ज्ञानेश्वरी एवढे सगळे एका आठवड्यात कोंबणाऱ्या ह्या शिष्या आणि ते दिगंबरबुवा यांचा केदार-हमीरांचा त्रिसाप्ताहिक आक्रोश ऐकुनही त्यांच्या नेपोलियनला (कुत्र्याचे नाव) आयुष्यात कशावरही भुंकण्याची वासना तरी कशी राहते, त्याचे तोच जाणे. मी जर कुत्रा असतो तर त्या घरात मुके जनावर हेच नाव सार्थ करीत राहिलो असतो.

बाकी ते नेपोलियन देखील नुसते भुंकतच असते. दुसरे एखादे स्वाभिमानी कुत्रे असते, तर त्याने गुरूशिष्या पैकी एकाच्या तरी नरड़ीचा घोट घेतला असता. हे फक्त भुंकते. एकदा मात्र आशाळभूतपणाने हा नेपोलियन आपल्या खिडकीतून समोरच्या मल्होत्रांच्या खिडकितल्या 'प्रिन्सेस'कडे डोळ्यांत केवळ कुत्रीच आणू शकतील इतके कारुण्य आणुन बघत बसलेला मी पाहिला होता. काही वेळाने त्याच्या डोळ्यात ते अवघ्या अभाग्याचे अश्रू इतके दाटले, आणि त्याच्या जिभेची लांबी इतकी वाढली, की हा आता लवकरच "चौधवी का चाँद...." म्हणायला सुरवात करतो की काय असे मला वाटले. पण तो शास्त्रोक्त संगीतवाला कुत्रा असल्यामूळे जोगिया रागात "पियाको मिलन की आऽऽसा" म्हणाला असता. मी गेल्यावर म्हणालाही असेल. हिंदी सिनेमातले नायक गायक झाले, की त्यांचा मिनिट्भर आधी नेमका अस्सा चेहरा होतो. हा नेपोलियन म्हणे लेबले पाहून रेकॉर्ड ओळखतो.

"नेपोलियऽऽन बडे गुलामअली आण!"

म्हंटल्यावर टेबलावरच्या दोन तीन रेकॉर्डसमधून शिंच्याने नेमका गुलामअली दातात धरुन आणलाही होता. पण बाई आत गेलेल्या पाहून हळूच मी टेबलावरच्या उरलेल्या रेकॉर्डस पाहिल्या, त्याही गुलामअलीच्याच होत्या. ही जादू करुन दाखवण्यात त्यांनी मला फसवले, स्वत:ला फसवले की नेपोलियनला ते मला अध्यापही कळलं नाही. त्या नंतर नेपोलियन दिगंबरबुवाच्या तराण्याची हुबेहुब नक्कल करतो हे ऐकुन मला यत्किंचितही आश्चर्य वाटलं नाही. कारण दिगंबरबुवा आजपर्यंत, कित्येकवर्ष भुंकण्याचीच नक्कल करुन त्याला तराणा म्हणत आले आहेत.

कुत्र्यांसारखी वागणारी कुत्री ही मला माणसांहूनही आवडतात. कारण माणसांसारखी वागणारी माणसे भेटायला आयुष्य खर्ची पडते. समोरून गेलेल्या कुत्रीकडे पाहण्यासाठी मान न वळविता जाणारी कुत्रीं भलतीच शिष्ट वाटतात. नाकासमोर जाणारे कुत्रे हे तर कुत्रेच नव्हे. कुत्र्याने मागे राहत, पुढे पळत, बाजूच्या गटाराकडे हुंगत, वाटेतल्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालीतच चालले पाहिजे. रात्रीच्या वेळी मुन्सिपाल्टीच्या दिव्याच्या प्रकाशात चारपाच कुत्रे एखाद्याच प्रेयसीभोवती रिंगण धरतात, ते कसे प्रामाणिक वाटते. कुत्र्यांनी श्वधर्म सोडायचे कारणच काय? पण हा धर्म त्यांना माणसे सोडायला लावतात. त्यांना साबण लावून आंघोळी काय घालतात, पावडरी काय लावतात, ब्रशाने त्यांचे दात साफ काय करतात ! काही उत्साही मालकिणी त्यांना लिपस्टिक लावून त्यांच्या डोळ्यांत सुरमा घालतात, असे मी ऐकले आहे.

कुत्री ज्या वातावरणात वाढतात त्याच्याशी एकरूप होतात. मांजरासारखी अलिप्त राहत नाहीत. शिवाजीमहाराजांच्या कुत्र्याने मालकाच्या चितेत उडी टाकली याप्चे एकमेव कारण तो काळच मुळी आत्मसमर्पण, निष्ठा ह्यांसारख्या बुरसटलेल्या इतिहासजमा गुणांचा होता. आजच्या काळातल्या कुत्र्याने त्या नेत्याची सद्दी संपलेली पाहून नवा घरोबा केला असता. बिचाऱ्या कुत्र्याला 'नेपोलियन' म्हणा, 'म्याकमिलन' म्हणा, की आणखी काही म्हणा, त्याचे सुखस्वप्न एकच. सभोवती हाडकांची रास आहे... आपण स्वस्थपणाने त्यांतलेच एखादे चघळतो आहो... समोरच्या गल्लीतून शेपूट उडवीत एक अंगा- पिंडाने भरलेली कुत्री येते आहे... मोसम सोहाना आहे... गल्लीतली इतर सर्व कुत्री मुन्सिपाल्टीवाल्यांनी गोणत्यात पकडून नेली आहेत... गल्लीत आता फक्त ती आणि मी... इतर कुणाचे भुंकणे नाही... गुरगुरणे नाही... काही नाही... काही नाही... असल्या सुखस्वप्नातच त्याला रंगू दिले पाहिजे.

- पाळीव प्राणी
हसवणूक
पु. ल. देशपांडे

सैनिकांचा जयजयकार

गेल्या वर्षी मुंबईच्या कुलाबा भागातील एका बराकी पुढून जाताना मी एक दृश्य पाहिले होते. तिथे राहणारी एक तुकडी, मला वाटते, आघाडीवर चालली होती. ट्रंका रस्त्यावर आल्या होत्या. मोठमोठे लष्करी ट्रक उभे होते. त्या सैनिकांची बायका - पोरे - कुणी खिडकीतून, कुणी फाटका जवळून - मुक्या डोळ्यांनी ते दृश्य पाहत होती. मला वाटले, पुढे जावे आणि त्या सैनिकांचा 'जयजयकार' करावा. पण माझ्याही मनाला ती सवय नव्हती.

गेल्या कित्येक वर्षांत आम्ही मुळी सैनिकांचा जयजयकारच केलेला नाही. सवय मोडली आमची! पूर्वी युद्धाला जायला निघालेल्या सैनिकांना गावच्या साऱ्या सुवासिनी पंचारती ओवाळत. पौरजन पुष्पवृष्टी करत. वृध्द आशिर्वादासाठी थरथरते हात उंचावत. आपल्या देशात पौरूषाचा हा असा भरगोस सत्कार व्हायचा. इंग्लंडमध्ये गेल्या युद्धातही लहान लहान खेड्यांतून ज्या वेळी तरुण सैनिक निघाले, त्या वेळी त्यांच्या वाटेवर पुष्पवृष्टी केली होती. तरुणी बेभान होऊन चुंबनांचा वर्षाव करत. गावातला बँड दिवसभर वाजे.

आमचा जवान गाठोडे पाठीला बांधून एकाकी चालताना पाहिला, की माझी मलाच कीव येते. अजूनही तो आमचा ' हिरो ' झाला नाही. क्षात्रधर्माला इथे अवकळाच आली होती. चीन्यानी बरी आठवण करून दिली. आम्ही साहित्यकार तरी काय करीत होतो म्हणा!

- शुरां मी वंदिले 
(एक शून्य मी)
पु.ल. देशपांडे