Wednesday, August 15, 2007

माटे मास्तर

मैत्र

माटे मास्तर


"" तुम्ही कितीही वाचा , कितीही लिहा , केवढेही वक्तृत्व करा आणि सार्वजनिक कामात

कितीही स्वार्थत्याग करा ; पण तुम्ही मास्तर असला तर तुमची रया गेली म्हणून समजा . ""

हे उद्गार ` मास्तर ' ही उपाधी ज्या श्री . म . माट्यांच्या नावापुढे कायमची चिकटलेली होती .

त्यांचे आहेत .



अपुऱ्या उत्पन्नात अब्रूला जपत संसाराचा गाडा हाकणे , वर्गांत मुलांच्यापुढे कितीही दरारा

दाखवला तरी समाजात सदेव बापुडवाणेपणाने जगणे , साधेपणाच्या नावाखाली कसलीही

हौसमौज न करता , आयुष्याची वाटचाल करीत राहणे आणि एकूणच ` उपेक्षेचा गाव आंदण

आम्हांसी ' अशा वृत्तीने चित्ती समाधान मानीत जगणे हीच ` मास्तर ' ह्या मनुष्यविशेषाची

काही वर्षांपूर्वी तरी व्यवच्छेदक लक्षणे होती . माटे मास्तरांच्याच आवडत्या शब्दांत सांगायचे

म्हणजे सारे काही एकूण ` डगमगीत ' चाललेय असे पाहताक्षणी प्रत्ययाला येणे हे शेठजींना

रूचणारे नव्हते . मुख्या प्राणिमात्रासारखे ` मास्तरमात्र ' हे गरिबीतच जगले पाहिजे असा

समाजाचा आग्रहच होता . आजही ` मास्तर ' व्हावे अशा महत्वाकांक्षेने कुणी झपाटलेले दिसत

नाही . पण एक काळ मात्र असा होता . ` रया ' असो वा नसो , सारे आयुष्य आर्थिक चणचणीत

होरपळून जाणार हे ठाऊक असो , एकूणच ` आबाळ ' ह्याखेरीज कुंटुबीयांच्या पदरात टाकता

येण्यापलीकडे हाती काही लागणार नाही हेही पक्के ठाऊक असो , तरीही आपण ` मास्तर '

म्हणूनच आयुष्य काढणार असा निर्धार करून देशाची सेवा करण्याच्या ध्येयाने प्रेरित

झालेले तरूण आसपास आढळत असत . ` शाळा काढणे ' आणि आपणे अर्धपोटी राहून ती चालवणे

ही देशाची फार मोठी सेवा समजली जायची .



लोकमान्य टिळक , आगरकर , चिपळूणकर , रँग्लर परांजपे , कर्वे ही सगळी मास्तर -

मंडळीचे . ` विद्यावाचून तुम्हांला गती नाही ' हे निरक्षर समाजाला कळवळून सांगणारे फुले

आणि सनातन्यांची अभ्रद , अर्वाच्य हबोलणी न ऐकल्यासारखी करून मुलींना शाळेकडे

नेणाऱ्या सावित्रिबाई मास्तरपंथीयच . कर्मवीर भाऊराव पाटील तर मास्तरांचे मास्तर . त्या

काळातला निरनिराळ्या सार्वजनित चळवळींचा इतिहास पहिला तर त्यागाची नशा

चढल्यासारखी माणसे धुंद कार्य करताना दिसतात . आपापल्या क्षेत्रात ` देह जावो



पान नं . 87

अथवा जावो ' ह्या भावनेने आपापली आयुष्ये झोकून देताना दिसतात . ` इंग्रजांची सत्ता नाहीशी

करणारा एक समर्थ समाज उभा करणे , ' हा एकच विचार घेऊन नाना प्रकारच्या साधनांनी

हा प्रयत्न चाललेला होती . कुणी सशस्त्र चळवळीत होते , कुणी पत्रकारितेत होते . ( ह्या क्षेत्रातल्या

मंडळीचे आता ` डगडगीतत ' चाललेले दिसत असले तरी स्वातंत्र्यपूर्व काळात इथे उपासमारीच

होती ! ) , कुणी अंधश्रध्दा टाकून देऊन समाजाने बुध्दिनिष्ठ व्हावे म्हणून धडपडत होते .

थोडक्यात , आपला देश जगाच्या नकाशावर बलाढ्य , स्वतंत्र देश म्हणून यावा यासाठी झटत

होते .



कोणे एके काळी म्हणे एक असुर मातला होता . त्याचा वध व्हावा म्हणून देवांनी दुर्गेची

आराधना करण्यासाठी यज्ञ मांडला . त्यात ज्या देवांच्या हाती जे शस्त्र वा साधन होते ते त्या

त्या देवांनी देवीला अर्पण केले . खड्रगधाऱ्यांनी खड्गे दिली , डमरूधाऱ्यांनी डमरू दिले ,

लेखणीधाऱ्यांनी लेखणी दिली आणि अशा नानाविध साधनांनी दुर्गा सहस्त्रभुजा होऊन

अवतरली आणि तिने असुराचा वध केला , अशी एक पुराणकथा आहे . परसत्तेच्या असुराचा

निःपात करायला निरनिराळ्या क्षेत्रांतील माणसे आपापली शस्त्रे आणि साधने घेऊन आपल्या

देशात सज्ज झाली होती . महाराष्ट्रातही रानड्यांच्या कार्याने उत्पन्न झालेल्या धुगधुगीतून

ठिणग्या उसळायला लागल्या होत्या ; क्वचित लहानसा जाळही दिसे . अशा काळात

वऱ्हाडातल्या शिरपूर नावाच्या खेड्यात 31 ऑगस्ट 1886 रोजी माट्यांचा जन्म झाला .

म्हणजे त्यांच्या जन्माला यंदा शंभर वर्षे . भारताच्या इतिहासातील नव्हे तर जगाच्या

इतिहासातील ही लक्षणीय शंभर वर्षे . परंपरेने स्वीकारलेल्या ज्ञानाचा , देवधर्म इत्यादींविषयक

क्लपनांचा , रूढींचा , आजारविचांराचा , कधी पूर्वकर्माला दोष देत तर कधी आसुरी

राजसत्तेच्या आणि धर्मसत्तेच्या भयाने जे जे लादले जाईल त्याचा निमूटपणाने स्वीकार करीत

जगण्याची पध्दत होती . त्या पध्दतीतून सुटका करून घेऊन निर्भयपणाने "" हे असे का ? "" हा

प्रश्न विचारणारा नवा मनुष्यसमाज घडत होता . प्रामुख्याने युरोप खंडात धर्म असो की

राजकिय सत्ता असो , प्रत्येक माणसाला "" असे का ? "" हा प्रश्न विचारायचा अधिकार

मनुष्यजन्मात आल्यामुळे लाभलेला आहे हे बऱ्याच काळापासून ख्रिस्ती धर्मसुधारकांनी ,

भौतिक शास्त्रज्ञ आणि इहवादी मानव्यशास्त्रवेत्यांनी देहदंडाची सजा भोगूनही सिध्द करीत

आणलेले होते . त्या त्यागी विचारवंतांनी जुन्या जगावर घण घालून अंध धर्मश्रध्दांचे बांध

फोडून नव्या विचांराचे प्रवाह खळाळते केले होते . ` देवी हक्काची ' भाषा जाऊन मानवी हक्काची

सनद मान्य होत होती .



इंग्रजी सत्ता भारतात आल्याबरोबर हे नवविचारांचे प्रवाहही कळत , नकळत इथे वाहू

लागले . मुख्यतः पांढरपोशा समाजात एक वेचारिक खळाळ सुरू झाला . सुरूवातीला जेत्या

इंग्रडजाचे अनुकरण म्हणून , परंतु नंतर विचारपूर्वक . एके काळी परंपरागत आचारविचारांच्या

कौटुंबिक वेटाळ्यात राहणारी माणसे सार्वजनिक सभा , व्याख्याने , वर्तमानपत्रांतील लेख ,

चर्चा , ऐहिक विषयांचा विचार करणारे ग्रंथ ह्या साधनांतून घडणारे नवे संस्कार अनुभवू

लागली . देवभक्तीच्या जोडला देशभक्ती हा नवा विचार आला .



साहेब येण्यापूर्वीच्या देशी राजवटीत नाना प्रकारच्या आनाचारांना आणि चोऱ्या

दरोड्यांना असा काही ऊत आला होता , न्यायसंस्थेचा असा काही बोजवारा उडाला होता

आणि सर्वत्र अशी काही बेबंदशाही माजली होती की इंग्रजाचे थोडेफार कायद्याचे , शिस्तीचे



पान नं . 88

आणि शासकीय जरब बसवणारे राज्य आल्यावर इंग्रजांचे भारतात येणे हे न्यायमूर्ती

रानड्यांसारख्या लोकोत्तर देशभ्कीतलादेखील ` देवा वरदान ' वाटले . उत्तर पेशवाईतली आणि

मोगल बाजशाहीतली गुंड - दरोडेखोरांची झोटिंगशाही साबेहबहादुराने निपटून काढली होती .

काठीच्या टोकाला सोने बांधून काशीयात्रेला निर्धास्त मनाने जावे अशा प्रकारचे सुरक्षिततेची

भावना इंग्रजाने इथल्यारयतेत निर्माण केली होती . कालान्तराने काठीला बांधायला नावापुरते

सोनेही प्रजेच्या गाठीला उरणार नाही आणि ते साम्राज्यशाहीच्या खजिन्याबोरबर

सातासमुद्रांपलीकडल्या इंग्लंड देशात जाईल याची मात्र बहुसंख्य प्रजेला कल्पना आली

नव्हती . ` पारतंत्र्य म्हणजे मुख्यतः आर्थिक शोषण ' हा विचार लोकमान्यांसारख्यांनी

जनसामान्यांच्या मनात रूजवायला सुरूवात केली . पारतंत्र्यातल्या सुखवस्तू जीवनमानाचा

अनुभव थोड्याफार प्रमाणात इंग्रजी शिक्षण घेतलेल्या नोकरदार अशा ब्राम्हण समाजालाच

येत होता . उरलेला समाज उपेक्षेच्या अंधारात ठेचकळत जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यात चकरा

खात होता . अशा काळात गावात घर किंवा रानात शेत नसलेल्या ब्राम्हण कुटुंबात माट्यांचा

जन्म झाला . पोराबाळांसाठी चारा आणणारा कुटुंबप्रमुख बाप मागे विधवा पत्नी आणि पाच

मुले ठेवून मेल्यावर त्या कुटुंबाची जी वाताहत होते तिचा माट्यांनी पुरेपुर अनुभव घेतला .



खेड्यातल्या ` साळे ' पासून फर्ग्युसन कॉलेजच्या वर्गापर्यंतचा त्यांचा प्रवास ` खडतर ' ह्या

एकाच विशेषणाने सांगण्यासारखा झाला . ` च्कू ताड्या घोट्या ' ही शालेय शिक्षणपध्दती होती .

घरातल्या दारिद्रयामुळे पंचांगात महिन्यातून दोनदा येणारी एकादशी माट्यांच्या घरात

अनेकदा यायची . त्यात दुष्काळाची भर . आई महिनोन््महिने रात्री फक्त लोटाभर पाणी

पिऊन गोणपाटाच्या अंथरूणावर आडवी व्हायची . दारिद्रयाच्या हातात हात घालून लोटाभर

उपेक्षा चालत असते . माट्यांनी ही दारिद्रय आणि उपेक्षेची अवस्था वर्ष - दीड वर्षांचे

असल्यापासून उपभोगली . त्यांचे उपेक्षितांशी असलेले नाते स्वानुभवातून बालपणापासून

जुळले . आपले दारिद्रय हीसुध्दा तुलनेने सुबत्ता वाटावी अशा भयानक अवस्थेत जगणारी

निरनिराळ्या उपेक्षित जातीजमातींतली माणसे आपल्या अवतीभोवती त्यांनी शाळकरी

वयापासून पाहिली . त्या अभागी जिग्याचे दुःख त्यांच्या मनावर तेव्हापासून घाव घालून गेले .

आणि पुढचा सारा जीवनाचा प्रवास करताना हे अंधारात ठेचकळत चाललेले जगणे आपल्या

वाणीने आणि लेखणीने समाजापुढे आणणे हे व्रत त्यांनी स्वीकारले .



साहित्याची त्यांनी केवळ एक सौंदर्य आणि आनंद ह्यांचा प्रत्यय घडवून आणणारी कला

म्हणून कधीच उपासना केली नाही . अज्ञान , अंधश्रध्दा , अमानुष परंपरांचे भीतीपोटी होणारे

पालन , आर्थिक दारिद्रय आणि त्यातून येणारे मानसिक दारिद्रय , आला भोग निमूटपणाने

स्वीकारली अगतिक वृत्ती , - अशांतून संपूर्ण उपेक्षितावस्थेत जगणारी माणसे त्यांच्या

लहानपणी त्यांना भेटत होती . सुस्थित समाजाकडून मिळायच्या मायेच्या एका शब्दाला आणि

पाण्याच्या एका घोटाला मोताद झालेल्या दलितांची पाल्यापाचोळ्यासारखी चाललेली फरफट

ते पाहत होते . साहित्यातून समाजमानस प्रकट होते असे म्हणतात . पण माटे जे मराठी साहित्य

वाचत होते त्या साहित्यात देश , राष्ट्र , समाज , न्याय , अन्याय हे शब्द उच्चरवाने उच्चारले

जात असताना ज्यांच्या अस्तित्वाचीदेखील दखल घेतली जात नाही अशी माणसे कुठे त्या

साहित्यात आढळत नाहीत ही टोचणी त्यांच्या मानाला होती . त्या टोचणीतूनच उघड्यावर

पडलेल्या बन्सीधरापासून , मुक्याने मेलेल्या सावित्रीपासून , आंधळ्या रूढीचे बळी होऊन



पान नं . 89

पुरंदर किल्ल्याच्या पायाभरणीत गाडल्या गेलेल्या नाथनाक - देवकाईपासून ते तारळखोऱ्यातल्या

पिऱ्या मांगापर्यंत नाना दुःखे भोगणारे उपेक्षित त्यांच्या लेखणीतून प्रकटले .



पण हे सारे लेखन भाबडेपणाने हुंदके काढीत झाले नाही . एखाद्याला उपजत गायनाचा

गळा लाभावा , तसेच माणूस कितीही थोर म्हणून गणला असला तरी त्याचे म्हणणे तर्कावर

घासून नंतरच त्याचा स्वीकार किंवा अव्हेर करायची बुध्दी त्यांना उपजत लाभली असावी .

त्यांनीच एक ठिकाणी म्हटले आहे : तर्क ह्या विचारसंस्थेचा कायमचा निरोप घेणे माझ्याच्याने

ह्या जन्मी होईल असे मला वाटत नाही . "" तर्क तो अर्क जाणावा ! नर्क संपर्क चूकवी ""

उपेक्षितांच्या अवस्थेची , नाना जातीजमातींची त्यांनी माहिती मिळवली . त्यांना प्राप्त झालेल्या

देन्यावस्थेची तर्कसंगती लावण्याचा प्रयत्न केला . त्या अवस्थेचा पूर्वजन्म , देवाची कृपा -

अवकृपा यांच्याशी काहीही संबंध नसून ही माणसाची बुध्दिहीनता आणि स्वार्थासाठी पोसवली

जाणारी अंधश्रध्दा यांची परिणती आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला .



दरिद्री जीवने पाहून त्यांच्या मनाची कालवाकालव होत होतीच , पण योग्य अशा ग्रंथाच्या

अध्ययनाच्या आधारावर त्या भावना शास्त्रकाट्याच्या कसोटीला उतरण्याचा आग्रह होता .

तिथे त्यांना तडजोड मान्य नव्हती . ते मानत होते बौध्दिक वर्चस्व आम्हांला पटवायला नको

का ? "" असा सवाल त्यांनी केला आहे . बौध्दिक वर्यस्वाला त्यांनी महत्वाचे स्थान दिले ,

पण बौध्दिक वर्चस्व जर माणसाचे देन्य , उपेक्षा इत्यादी दूर करण्याच्या कामाला येत नसेल

तर त्या बुध्दिमंतांचीही त्यांना मातब्बरी वाटतनव्हती . "" शंकराचार्य , रामानुजाचार्य

ह्यांच्यासारखे जे प्रखर बुध्दिमान लोक आहेत ते मला केवळ तालीमबाजासारखे वाटतात . . .

त्यांच्या त्या वादात शिरून त्यांची बरोबरी करता येणार नाही हे खरे असले तरी आतून माझे

मन मला असे सांगत असते की , गड्या , ही कसरत आहे . हे काही खरे नव्हे . खरे नव्हे म्हणजे

केवळ अनुमानाचे आहे . वास्तवाशी ओळख आहे व ती ओळख दाखवलेली आहे असे

नव्हे ! "" . . . . "" मोठमोठाले प्रेषित , ज्यांनी नव्या धर्माच्या घोषणा केल्या त्यांचीसुध्दा मला

मातब्बरी वाटत नाही . एकाने सांगावे , ` मी त्याचा अवतार आहे , ' दुसऱ्याने सांगावे , ` मी

त्याचा प्रेषित आहे . ' तिसऱ्याने सांगावे , ` मी त्याचा मुलगा आहे . ' . . . आपल्या शक्ती मोठ्या

आहेत तर आपल्या ठिकाणी काही देवी अंश आहे असे त्यास वाटू लागावे हेही खरेच दिसते .

पण तेवढ्यामुळे ते खरेच तसे होते असे मात्र मला म्हणवत नाही . ते आचार्य जसे कसरत

करणारे तसे हे लोक आत्मवंचित होते . ""



ह्या निर्भय बुध्दिनिष्ठेच्या बाबतीत त्यांचे गोत्र वीर सावरकरांशी जुळते . किंबहुना बाबा

वाक्यम्् प्रमाणम्् न मानणाऱ्या आगरकर , फुले , आंबेडकर यांसारख्या विचारवंतांशी जुळते .



एक प्राचीन राष्ट्र नव्या जोमाने परकीय सत्तेविरूध्द उठून उभे राहण्याचा प्रयत्न करीत

असताना , जाती - जमाती , स्पृश्य - अस्पृश्य , जनवासी - विजनवासी , नागरी - ग्रामीण अशा

भेदांमुळे एका राष्ट्रातले नागरिक असूनही एकमेकांना अनोळखी राहणारा समाज एकसंध

व्हावा , उपेक्षेमुळे अपरिचित राहिलेले देशबांधव परिचित व्हावेत , त्यांचे देन्यनष्ट करायला

आपण आपला मदतीचा हात पुढे केला पाहिजे अशी वृत्ती त्यांच्या मानाने सुस्थितीत

वाढणाऱ्या समाजात वाढीला लागावीही माट्यांच्या लिखाणामागची मूळ प्रेरणा त्यांच्या



पान नं . 90

वेचारिक आणि ललित अशा दोन्ही प्रकारच्या विपुल लेखनाच्या मुळाशी असल्याचा प्रत्यय

त्यातला आशय , आणि अभिव्यक्तीची रीत ह्या दोन्हींतून येतो . छडीऐवजी लेखणी हाती

धरणाऱ्या लोकशिक्षकाचीच त्यांची भूमिका होती .



माटे मास्तर वस्तीला आणि चरितार्थासाठी पुण्यात राहिले , पण पुण्यातल्या माट्यांच्या

मनाचा मुक्काम मात्र कृष्णा - कोयना - तारळी खोऱ्यातल्या गावकुसातल्या आणि गावकुसा -

बाहेरच्या वस्तीतच पडलेला होता . देहूच्या वाण्याचे मन पंढरपुरी रेंगाळत होते . त्यातलाच हा

प्रकार होता . त्यांनी मॅट्रिकवाल्यांची मास्तरकी पोटासाठी असली तरी अत्यंत इमानाने केली

हे खरेच आहेच ; पण त्याहूनही अस्पृश्यांसाठी आयुष्याची वीस वर्षे , पावसपाण्याची , चिखल -

मातीची , सापविंचवाची पर्वा न करता , ह्या उपेक्षित माणसांच्या अंतरंगात शिरण्यासाठी

त्यांच्या रोजच्या भेटीगाठींच्या लोभाने जी विनामूल्य मास्तरकी केली ती त्यांना अप्रूप वाटत

होती . तिथल्या त्या गावरान मारठीला गावरान शेंगेसारखी काय नामी चव आहे हे मराठी

वाचकाला माटे मास्तरांनी प्रथम दाखवून दिले .



आज ग्रामीण साहित्याची नवलाई वाटू नये इतक्या प्रमाणात त्या जीवनाची निरनिराळी

दर्शने मराठी कथा - कादंबऱ्यांतून वाचकाला घडताहेत . पण महाराष्ट्राचे खरे भाग्यविधाते

कोण हे जसे ग . बा . सरदारांच्या ` उपेक्षित मानकऱ्यां ' वरच्या ग्रंथातून सामान्य वाचकाला

प्रथम कळले त्याचप्रमाणे महाराष्ट्राला उपेक्षित भाग्यविहीनांच्या जीवनाचे पहिले प्रभावी

दर्शन माटे मास्तरांनी ` उपेक्षितांच्या अंतरंगा ' त घडवले .



मराठी ग्रामीण कथेचे जनक म्हणून कृतज्ञतेने माट्यांचा उल्लेख व्हायला हवा .

त्याबरोबरच मराठी भाषेचे खरपूस मराठीपण कसे आसते याची जाणीवही माट्यांच्या

मराठीनेच मराठी वाचकाला करून दिली . किबंहुना आचार्य अत्र्यांनी माट्यांच्या ` शेलीकार

माटे ' अशा शब्दांत गौरव केल्यावर माट्यांचे ` शेली ' एवढेच बलस्थान आहे असाही समज

पसरला . माट्यांच्या भोषेतला अस्सलपणा , मराठी मुलखात उपेक्षित जीवन जगणाऱ्या ज्या

मराठी माणसाची त्यांनी कथा सांगितली त्यातल्या आशयाचा अस्सलपणात आहे . भाषेचाही

गंमत म्हणून खेळ त्यांनी मांडता येतो . तसला , नागरांना नवलाची वाटावी अशा भाषेचा खेळ मांडून

आपल्या भाषाप्रभुत्वाच्या करामती दाखवाव्या म्हणून त्यांनी लेखन केले नाही . आपल्या

लेखनकलेचे कौतुक त्यांना अभिप्रेतच नव्हते . सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवून वाचकांचे

मतपरिवर्तन व्हावे हा हेतू मनात पक्का बाळगून त्यांनी लिहिले . खुद्द माट्यांनीच म्हटले आहे ,

"" ललित वाडःमयाने मतप्रचार होत नाही किंवा मतपरिवर्तन होत नाही असे म्हणणाऱ्यांचा

दावा अगदी चुकीचा आहे . प्रचार आमि परिवर्तन त्याने होतातच होतात हे मी अनुभवाने

पाहिले आहे . या यशाला निरगाठ मारली पाहिजे असे वाटून ` उपेक्षितांचे अंतरंग ' हे माझे

पुस्तक मी प्रसिध्द केले . ""



` सामाजिक बांधिलकी ' हा शब्दप्रयोग माट्यांच्या काळी जन्माला आलेला नव्हता . पण

आपल्याला जे जे काही समाजहिताचे वाटते ते ते लिहून प्रकट कारयला आपण बांधील आहो

ह्या भावनेनेच त्यांनी लेखन केले . आपल्याला रूचलेल्या , पटलेल्या शेलींनी लिहिले . ते लिहिणे

` देशी ' होते . मराठी मुलखातल्या उपेक्षित माणसांइतकेच नागर संस्कृतीचे नाते तोडून

टाकलेल्या उपेक्षित शब्दांचे अंगभूत सामर्थ्य दाखवणारे होते . त्या हातसडीच्या भाषेच्या

तुलनेने नागरी लेखकांची रेडिमेड आणि कागदी भाषा कितीही अलंकार लेवून आलेली



पान नं . 91

असली तरी बेगडी वाटायला लागली . माट्यांच्या भाषेचा हा वाण शंभर टक्के मऱ्हाटी आहे .

रानफुलासारखे अंग आणि रंग लेवून सहजतेने प्रकटलेली ही भाषा हा त्यांच्या व्यक्ति -

मत्वाचाच एक भाग होती . त्यांच्या भाषेतले हे देशीपण ऐकायलादेखील गोड वाटायचे . त्यांचा

विद्यार्थी होऊन त्यांच्या वर्गात बसायचे भाग्य मला लाभले नाही . पण फर्ग्युसन कॉलेजात मी

शिकत असताना स . प . कॉलेजात त्यांच्या मराठीच्या तासाला मी जाऊन बसलो होतो .

अधूनमधून इतर कॉलेजांतल्या नामवंत प्राध्यापकांच्या तासांना त्यांच्या परवानगीने जाऊन

बसणे हा कॉलेजमध्ये असताना आम्हा काही मित्रांचा छंद होता .



माट्यांचे शिकवणे हे एखाद्या ज्येष्ठ मित्राने खांद्यावर हात ठेवून आपल्याला चार हिताच्या

गोष्टी सांगाव्या तशा पध्दतीचे मला वाटले होते . आज ह्या गोष्टीला जवळजवळ पंचेचाळीस

वर्षे झाली तरी वर्गात माट्यांनी बोलता बोलता विद्यार्थ्यांना उद्देशून "" . . . त्याचं काय आहे

गड्यांनो . . . "" असा श्बदप्रयोग केलेला मला आठवतोय . आमचे मराठीचे प्राध्यापक

रा . श्री . जोग उत्तम शिकवित , पण सूर कधी असा सलगीचा नसे . ही सलगीची तऱ्हा थेट

शेताच्या बांधावरच्या डेरेदार आब्यांच्या सावलीत चालणाऱ्या बोलण्याची होती . तीच

लिहिण्यात आली . शब्द संस्कृत कुळातून तसाच्या तसा आलेला असो वा जानपदाशी सोयरीक

सांगणारा असो , माट्यांच्या वाक्यात कमालीच्या सहजतेमे आणि अर्धाची पुरी गरज भागवीत

येऊन बसलेला असे . माटे मास्तरांच्या आवडत्या शब्दांत सांगायचे म्हणजे ` चपखल ! '



` उपेक्षितांचे अंतरंग ' वाचल्यावर तात्यासाहेब केळकर म्हणाले होते , "" या पुस्तकाची भाषा

विद्यार्थ्यांनी पाठ करावी . "" माट्यांची भाषा आपल्यया अस्तित्वाकडे वाचकांते लक्ष वेधून घेते

यात शंका नाही . पण भाषेचा डौल वाचकाच्या मनात ठसवावा म्हणून माट्यांनी तिला

जाणूनबुजून निराळे रूपडे बहाल केलेले नाही . त्यांच्या व्यक्तिमत्वाची जी घडण आहे

तिच्याशी इमान राखणारी अशी ती भाषा आहे . माटे जेव्हा मुलीच्या लग्नाच्या वेळी

प्रकाशकडून ध्यानीमनी नसताना पाचएकशे रूपये मिळाले त्याचा उल्लेख त्या ` चळवळीत '

नोटा मिळाल्या असा करतात त्या वेळी शाळामास्तरच्या आयुष्यात नोटांचे बंडल ही डोळे

दिपवून टाकणारी घटना कशी आहे ते ` चळवळीत ' शब्दाने सांगून जातात . गडकऱ्यांच्या

साहित्याला जी . ए . कुळकर्ण्यांनी मराठी भाषेचा ` कॉर्निव्हल ' म्हटले होते . माट्यांची मराठी

भाषा हा ग्रामीण जनतेचा ` उच्छाव ' आहे . इथे जानपद , बामणाघरची आणि संतसाहित्यातली

भाषा ह्यांच्या संगमातून एक विलक्षण लोभसवाणे असे भाषेचे रूप प्रकटले आहे , मग ती

भाषा ललित वाङमयात येवो किंवा विज्ञानबोधाच्या प्रस्तावनेसारख्या वेचारिक निबंधात

येवो . वाचकाला आपल्या प्रवाहात ओढून नेण्याचे फार मोठे सामर्थ्य ह्या भाषेला लाभले आहे .

` मंगळवेढ्याचे कुसू ' सारख्या चोखामेळ्याच्या कथेत भाषेचे हे प्रवाहीपण तीव्रतेने जाणवते .

विशेषतः जुन्या पोथ्यांसारखी मोठ्यानेही गोष्ट वाचावी . चोखोबांच्या काळातल्या परंपराग्रस्त

समाजपरिस्थितीबद्दल लिहिताना माटे म्हणतात , "" जग आंबून गेले होते . जिणे रूग्ण झाले

होते . मन जरत्कारू बनले होते . सारा गुजारा जुन्यावर चालला होता . मनाला नवी पालवी

फुटतच नव्हती . असलेली पाने चरबट आणि तडतडीत बनलेली होती . . . साऱ्या गोष्टी

श्रुतिस्मृतिपुराणोक्त पध्दतीने चालल्या होत्या . ज्याचे त्याचे तंत्र ठरले होते . तंत्राच्या मागे जो

मंत्र होता तो पूर्वी केव्हातरी काही शतकांपूर्वी कोणीसा कल्पिला होता . पण त्या मंत्राला मनाची

ओळख नव्हती . ""

माटे मास्तर

पान नं . 92

बारा बलुत्यांच्या पूर्वजन्मसिध्द उद्योगांत पिचून निघालेल्या माणसांबद्दल बोलताना त्यांनी

त्या बलुतेदारीचे काय भेदक चित्र काढलेय : "" जीविताचा गाडा तर कायमचाच रूतलेला होता .

त्या गाडयावर बापही बसत असे . आजाही बसला होता , पणजाही बसला होता . त्याचा

खापरपणजाही बसला होता . गाडा म्हणून हालत नसे . आपली पोरंही यात बसणार आणि

पणतवंडंही त्यातच बसणार हे त्यांना कळून चुकलं होतं . तुमच्या घरांवर तुरकाटया हांतरता

हांतरता कोणाच्या शंभर पिढया गेल्या होत्या . तुमची डोकी चोळता चोळता कोणाच्या दीडशे

पिढया गेल्या होत्या . तुमची लाकडं फोडता फोडता , तुमची ढोरं ओढता ओढता , तुमच्या

पाटलापुढे खुळखुळा नाचवता नाचवता कोणाच्या पिढयानुपिढया मातीत गेल्या होत्या .

जीविताचा गाडा कायम लगद्यात गच्च बसला होता . ""



` मंगळवेढयाचं कुसू ' ही माटे मास्तरांची असामान्य साहित्यनिर्मिती आहे असे मला वाटते .

वारकरी संप्रदायातल्या संतांनी आजवर स्पृश्यांनी अस्पृश्य म्हणून कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी

ठेवलेल्या उपेक्षित समाजाला आशेचा किरण दाखवला होता . जुन्या जाखाई - जोखाईसारख्या ,

भक्तांच्या मनात भय निर्माण करणाऱ्या देवतांऐवजी सौम्य , सुंदर , प्रसन्न , कनवाळू असा नवा

देव जीवमात्राच्या कल्याणासाठी सारा भेदभाव विसरायला लावण्याच्या हेतूने अवतरल्याची

वार्ता पंढरपूरच्या दिशने येत होती . पण मुखी , ` विष्णुमय जग वेष्णवांचा धर्म ! भेदाभेद भ्रम

अमंगळ ' चा गजर असूनही खुद्द पंढरीलगतच्या मंगळवेढयालाही पडलेला उच्चनीचतेच्या

कल्पनेचा अमंगळाचा वेढा उठायला तयार नसल्याचा जसा चोखामेळ्याला अनुभव आला

तसाच मंदिरप्रवेशाच्या चळवळीच्या वेळी माटयांनाही आला .



समाजाच्या हितासाठी म्हणून सुरू झालेल्या सर्व चळवळींचा इतिहास हाच आहे . मूळ हेतू

बाजूला राहतो आणि लेबलांचे आणि प्रतीकांचे स्तोम माजवणारे पुढारी आपल्या स्वार्थाला

पोषक असे वळण त्या चळवळीला देतात . थोडक्यात म्हणजे धर्मनिष्ठा , राष्ट्रभक्ती , क्रान्ती ह्या

कल्पनांचे भांडवल वापरून नफेखोर धंदा सुरू होतो . बुध्दिनिष्ठ तत्वज्ञानावर अधिष्ठित

असलेल्या ट्रेड युनियन चळवळीमध्येही युनियन चालवणे हाच एक ट्रेड होऊन गेलेला आपण

पाहतोच आहो . अशा काळात सामाजिक व्यवहाराचे नीट अध्ययन करून त्यावर

स्वार्थनिरपेक्ष , वास्तवाला साक्ष ठेवून परीक्षण करणारा निर्भय विचारवंत समाजात असावा

लागतो . आपल्या विश्लेषणामुळे गतानुगतिकतेलाचधर्म , किंवा वर्षानुवर्षे चालवत आणलेल्या

आंधळ्या कर्मकांडालाच संस्कृती मानणाऱ्या समाजात आपण अप्रिय ठरू ही भीती असल्या

विचारवंताला बाळगून चालत नाही . पुष्कळदा सुधारक आणि सनातनी , जातीयवादी आणि

जातिविचारमुक्त अशा परस्परविरोधी गटांकडून एकदमच दूषणे स्वीकारावी लागतात .

माटयांवर असे अनेक हल्ले झाले . वर्षानुवर्षे अस्पृष्टांच्या वस्तीत विनामूल्य मास्तरकी

करणाऱ्या माटयांची ब्राम्हणांनी महारमाटे म्हणून हेटाळणी केली आणि अस्पृश्यांच्या सेवेतून

आपण निवृत्त व्हावे असे वाटण्यासारखी परिस्थिती त्याही समाजातल्या नव्या पुढाऱ्यांनी

स्वीकारलेल्या नव्या धोरणांमुळे निर्माण झाली . अस्पृश्यतेचा कलंक घालवून हिंदुधर्म निर्मळ

आणि सबळ करावा ही माटयांची भावना सनातन्यांना तर पटली नाहीच , पण ह्या धर्मात

राहून आपली परिस्थिती अजिबात सुधारणार नाही या विचाराच्या प्रभावामुळे अस्पृष्टांना

माटे मास्तरांची शिकवणी नकोशी झाली .



अत्रे - माटे वादाचा गदारोळ वर्तमानपत्रांतून आणि सभांतून एवढया जोरात उठत होता .



पान 93

की बुरसटलेल्या विचारांचा एक सनातनी पुणेकर अशीच माटयांची प्रतिमा पुण्याबाहेरच्या

लोकांच्या डोळ्यांपुढे होती . ज्या महाराष्ट्रदेशाची गीते आम्ही गात होतो त्यातल्या चर्मकार ,

ढोर , मातंग यांसारख्या उपेक्षित जातींतल्या लोकांच्या माटे परिषदा भरवीत होते , याचा

आम्हांला पत्ताच नव्हता . ` ही भगवद््गीता अपुरी आहे . ' म्हणणारे माटे आम्हांला ठाऊकच

नव्हते . "" अर्जुनाचे भय किती खरे होते ते परिणामावरून सिध्द झाले . एवढे प्रचंड दल नष्ट

झाले . आणि कुरूक्षेत्रावर तरूण पुरूषांच्या प्रेतांचा खच पडला . थोरामोठयांच्या स्त्रिया

रणांगणावर ऊर बडवीत आल्या . . . या मारामारीच्या परिणामाने अर्जुन दचकला होता .

आत्मिक भीती तर त्याला होतीच . तिचा परिहार कृष्णाने केला . पण सामाजिक नरकाची भीती

कृष्णाने बिलकुल घालवली नाही . असे असता अर्जुनाने युध्दास तयार व्हावे याचे नवल

वाटते . "" गीतेसंबंधी असा परखड अभिप्राय चाळीस - पन्नास वर्षांपूर्वी देणे सोपे नव्हते . पण

` यद्दपि सत्यम्् लोकविरूध्दम् नाचरणीयम् ना करणीयम् ' हे बचावाचे धोरण विचारवंताला

शोभणारे नसते . मतभेद व्यक्त करायला माटे कचरले नाहीत . ` मतभेदाचा उबारा मला

मानवतो . अर्थात त्याचाही किंमत मी अधूनमधून देत आलो आहे . ' असे त्यांनी म्हटले आहे .



विभूतीपूजा हा आपल्या देशातल्या लोकांच्या मनाचा स्थायिभाव . अशा काळात म . गांधी

आणि नेहरू यांच्याशी मतभेद असलेले माटे आम्हांला मुसलमानविरोधी म्हणून धर्मवेडे वाटत

होते . स्वतःचा उल्लेख एखाद्याने हिंदू असा केला की , तो आम्हांला पुराणमतवादी वाटायचा .

आपण ख्रिस्ती आहोत किंवा मुसलमान आहोत म्हणणारा तसा वाटत नसे . माटयांना हे धोरण

` घरच्या म्हातारीचा काळ ' यासारखे वाटत होते . अंधश्रध्दा सगळ्याच धर्मांतून घालवायला

प्रचंड प्रमाणात विचारचक्रपरिवर्तनाच्या चळवळीची त्यांना आवश्यकता वाटत होती . ह्या

बाबतीत महात्माजींना लिहिलेल्या एका जाहीर पत्रात त्यांनी कळवळून म्हटले आहे :

"" महात्माजी , या लोकांना संतवचने पाठ आहेत . परंतु त्यांतील विचारांच्या औदार्यांची सारिका

पंख फडफडून केव्हाच निघून गेली आहे . त्यांना पाठ येत असलेल्या वचनांचा रक्तक्षय

झाला आहे . ""



हा वेचारिक रक्तक्षय घालवायला सारा धार्मिक , राजकीय , सामाजिक व्यवहार बुध्दीच्या

निकषांवर घासून घ्यायला हवा असे त्यांचे ठाम मत होते . त्या बाबतीत इंग्रजांच्या ज्ञानोपासने -

विषयी त्यांना आदर होता . "" इंग्रज हा आपल्या मानेस बसलेला म्हणून आपल्याला नकोसा

वाटावा हे बरोबर होते . पण इंग्रज हा ज्ञानाचा मित्र आहे . तो चौकशी करतो आणि चौकशीचे

हिशेब लिहून ठेवतो . "" माट्यांच्या बुध्दिनिष्ठ आणि अभ्यासाने प्रकटावे ह्या वृत्तीचे उत्तम

उदाहरण म्हणजे ` विज्ञानबोधाची प्रस्तावना ' . विनोबा आपल्या ` गीता - प्रवचनां ' ना

नित्यपठनीय म्हणत . मला आधुनिक जगात जगायला ही ` विज्ञानबोधाची प्रस्तावना ' अधिक

नित्यपठनीय वाटते . "" आपल्या सामाजिक व राजकीय चळवळींच्या दिशा , गती , व भवितव्य

ही या शास्त्रज्ञांत संस्कारांनी जर पूत झालेली नसतील तर आपली फसगत होईल आणि आपण

भलत्याच ठिकाणी धडका देत बसलो होतो असे दिसून येईल . "" हे वाक्य आजच्या परिस्थितीत

सार्वजनिक जीवनात भाषा , प्रांत , पंथ असा भलत्या ठिकाणी धडका देण्याचे जे प्रयत्न चालले

आहेत ते पाहून शंभर टक्के खरे वाटते . बुध्दिनिष्ठेची पुष्कळदा भावनाहीनतेशी सांगड बांधली

जाते . ऊठसूट ` अश्रुनीर वाहे डोळा ' ह्या अवस्थेत जाणाऱ्याची भाबडेपणाने मानवतावादाशी

जोडी जमवली जाणे ही त्याचीच दुसरी बाजू . वज्राची कठोरता आणि कुसुमांची मृदुता हा



पान नं . 94

मेळ दुर्लभ .



तर्कनिष्ठ माटे मास्तर परमेश्वाराच्या अस्तित्वाबद्दल शंका घेत असताना ` विठो तुझे माझें

राज्य ! नाही आणिकांचे काज ' म्हणणाऱ्या तुकोबांच्या वृत्तीतल्या संपूर्ण समर्पणाच्या भावनेने

व्याकूळ होताना दिसतात . संतांच्या साहित्याविषयी त्यांना मर्यादित प्रमाणात प्रेम आहे .

त्यांच्यातल्या समाजशास्त्रज्ञाला , वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्रातील बाराही बलुती ओव्या ,

अभंग रचून मराठी सारस्वत समृध्द करीत होती याचे अतोनात कौतुक आहे . पण ` तुकोबा '

हा माटे मास्तरांचा ` वीक पॉइंट . ' "" मला खरी भीती त्या देहूच्या वाण्याची वाटते "" असे

विलक्षण जिव्हाळ्याने ते म्हणून जातात . इकडे तर परमेश्वरदर्शन वगेरे अद्भुताच्या तडाख्यात

सापडलो तर आपण कोठच्या कोठे जाऊन पडू अशी त्यांना भीती वाटते , तारतम्य आणि तर्क

कसे सोडावे असा प्रश्न पडतो ; पण ` माझे माथा तुझा हात ! तुझे पार्यी माझे चित्त ! ऐसी

पडयेली गाठी ! शरीर संबंधाची मिठी ' म्हणणारा हा देहूचा वाणी त्यांना सोडवत नाही . त्या

वाण्याचा विठू आणि त्याचा हा जगावेगळा भक्त यांची अलौकिक एकरूपता , माटे

मास्तरांच्याच भाषेत सांगायचे म्हणजे त्यांच्या "" मनाचे कुसु मोडून टाकते "" , ` आम्ही जातों

आमच्या गावा ! आमुचा रामराम घ्यावा ' म्हणत कुडीसहित गुप्त होणाऱ्या तुक्याची आठवण

त्यांना सद््गदित करते . इथे मात्र तर्काच्या तापल्या भूमीवर पावसाचा शिडकावा पडतो ,

मानवी जीवनात विश्लेषणापलीकडे असलेला आपुलकीचा मृद््गंध सुटल्यासारखा वाटतो

आणि माटे मास्तरांचा सकृद्दर्शनी उग्र वाटणारा चेहरा पित्याचे वात्सल्य लेवून डोळ्यांपुढे उभा

राहतो .



माटयांशी माझा मी पुण्याच्या आकाशवाणी - क्रेंद्रावर नोकरीला असताना परिचय झाला .

प्रकृतीच्या दृष्टीने त्या काळात ते , त्यांच्यात शब्दांत सांगायचे म्हणजे , रकमेला आले "" होते

रेडिओवर कधीतरी "" टॉक "" द्यायला येत . त्यांची शेवटची गाठ त्यांच्या मृत्यूच्या थोडे दिवस

आधी डॉ . घारपुऱ्यांच्या इस्पितळात पडली . एके काळचा त्यांचा थोराडपणा पार आक्रसून

गेला होता . कॅन्सरने त्यांचा घास घेतला . "" माझ्या पश्चात्् जगाने मला बरे किंवा वाईट म्हटले

तर जगदाकारात विलीन झालेल्या मला त्याचे काय सुखदुःख असणार ? "" असे त्यांनी

` चित्रपट ' ह्या आत्मचरित्राचा शेवट करताना म्हटले आहे . त्यांना वाईट म्हणण्याचा किंवा

त्यांचाविसर पडण्याचा प्रश्नच उरलेला नाही . जोवर मराठी भाषा जिवंत आहे तोवर त्यांनी

साहित्यात जी सुंदर शिल्पे कोरून ठेवली आहेत त्या शिल्पांनी त्यांना चिरंजीवित्व दिले आहे ,

एवढेच नव्हे तर ` मास्तर ' ही पदवी त्यांच्या कर्तृत्वाने खूप श्रेष्ठ ठरली आहे .

* * * *

2 प्रतिक्रिया:

shashankk said...

Dear Deepak,
I am really surprised to see "not a single" comment on such beautiful article. Every Marathi person should read the everfresh- "Upekshitanche Antarang" by Matemaster. Pu. La. U are really great -for highlightening personalities like - Matemaster.
My salutes to you both.
Deepak, khoop dhanyavad.
Shashank

macrothescribe said...

wachla tar pratikriya denarna, pu. la. he vinodi lekhak ani performerchya palikade barech kahi hote hech tathakathit sahityapremina mahit naste, tithe kon kuthlya mate mastaranawarcha pu.laancha lekh kon wachnar ani tyarwar kai kapal pratikriya denar. apan sarva karante ahot hech khare