Wednesday, August 15, 2007

सखे सोबती गेले पुढती

मैत्र

सखे सोबती गेले पुढती

चादरीखाली झाकलेला देह डोळ्यापुढे दिसत होता . शांत झोप लागल्यासारखा . ह्या झोपेतून आता जाग नाही हे कळत होते . असल्या झोपेकडे सगळ्यांचा प्रवास असतो , हा वेदान्तही माहिती होता . घणाघाती घाव पडावा अशी सुन्न झालेली माणसे पायाखालची जमीन खचल्यासारखी उभी होती . हलली तरी छायांसारखी हलत होती . बांध फोडून बाहेर
हुंदके कानांवर येत होते . सारे काही संपलेले आहे या जाणिवेने देहमन बधिरले होते . त्या घरात गेल्यावर कधी आतल्या कोचावर बेठक मारून हातातल्या आडकित्याने सुपारी कातरीत बसलेल्या थाटात , तर कधी आतल्या खोलीतून बाहेर प्रवेश करीत "" या "" अशा मोकळ्या मनाने स्वागत करणारा तो आवाज आता पुन्हा कानी पडणे नाही हे समजत होते . आतल्या खोलीतून बाहेरच्या दिवाणखान्यात तो मृत देह उचलून आणताना , असाही एक प्रसंग आपल्या आयुष्यात येणार आहे असे कधीही वाटले नव्हते . पाचसहा दिवसांपूर्वीच गोष्टी झाल्या होत्या . माडगूळकरांना आणि विद्याबाईंना आम्ही सांगत होतो , "" तुम्ही जिमखान्यावर राहायला या . सगळे जुने स्नेहीसोबती तिथेच आसपास राहतात . भेटीसाठी सोप्या होतील . आता ` पंचवटी ' तली ही जागाही अपुरी पडत असेल . पूर्वीपेक्षा वर्दळही खूपच वाढली आहे . मोटांरीचा धुरळा , पेट्रोलचे भपकारे . . . अधिक मोकळ्या हवेत या . . . "" आणि त्याआधी , आठदहा दिवसांपूर्वीच , गीताचे दान मागायला गेलो होतो . बाबा आमटयांच्या आनंदवना - तल्या वृक्षारोपण - समारंभासाठी . असा हा गीत मागायला जायचा परिपाठ गेल्या तीस - पस्तीस वर्षांचा . रिक्त हस्ताने आल्याचे स्मरत ही .चित्रपटव्यवसायात असताना तर नित्यकर्माचाच तो एक भाग होता . आताशा नेमित्तिक . पुण्याला ` बालगंधर्व ' थिएटर उभे राहत होते . गोपाल देऊसकरांच्या सुंदर चित्रांशी स्पर्धा करणाऱ्या चार ओळी पाहिजे होत्या . ` पंचवटी ' गाठली .माडगूळकरांना म्हणालो , "" स्वामी , चार ओळी हव्या आहेत . . . बालगंधर्वाच्या पोर्ट्रेटपाशी . "" मागणी संपायच्या आत माडगूळकर म्हणाले , "" असा बालगंधर्व आता न होणे . "" तेवढ्यात कुणीतरी आले . गप्पागोष्टी सुरू झाल्या . मी समस्यापूर्तीची वाट पाहत होतो . तासाभरात निघायचे होते . त्या श्लोकाला चाल लावायची होती . उद््घाटन - समारंभाच्या प्रसंगी गाण्याच्या गीतांच्या तालमी चालल्या होत्या . त्यांत माडगूळकरांचेच ` असे आमचे पुणे ' होतेच . तालमीच्या ठिकाणी बाळ चितळे श्लोक घेऊन आला . सुरेख , वळणदार अक्षरात लिहिलेला . बकुळ पंडितला मी चाल सांगितली . रंगमंदिराच्या उद््घाटनाच्या वेळी रसिकांनी तुडुंब भरलेल्या प्रेक्षागारातले दिवे मंदावले . रंगमंचावर मांडलेल्या बालगंधर्वांच्या ` नारायण श्रीपाद राजहंस ' आणि ` स्वयंवरातली रूक्मिणी ' अशी दोन दर्शने घडवणाऱ्या त्या अप्रतिम चित्रांवरचे पडदे दोन युवतींनी बाजूला केले , आणि लगेच माडगूळकरांच्या गीताचे गायन सुरू झाल्यावर रसिकांना कळेना , की त्या रंगशिल्पाला दाद द्यावी की गीतातल्या शब्दशिल्पाला . प्रेक्षागारात पुन्हा प्रकाश आला त्या वेळी त्या ` रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्् ' ह्या अनुभूतीचे पर्युत्सुक झालेल्या रसिकांच्या खिशांतले शेकडो हातरूमाल अश्रू पुसत होते .
पुणे विद्यार्थीगृहासाठी ` मुक्तांगण ' उभे करताना अशीच ` मुक्तांगणा ' च्या गाण्याची मागणी घेऊन आलो होतो . ` मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी ' असे मर्ढेकर म्हणून गेले आहेत . माडगूळकरांच्यापाशी गीते मागताना हे किती खरे होते . आम्हां मागणाऱ्यांचीच ताकद अपुरी पडली . शेकडो गीते त्यांनी दिली . आणखी शेकडो मिळाली असती . दोन वर्षांपूर्वी झालेल्या त्या भंयकर आजाराने त्यांच्या शरीरावर आघात केला होता ; - पण गीतप्रतिभेचा झरा मात्र अखंड वाहत होता . ` मुक्तांगणा ' च्या गाण्याच्या वेळचीच गोष्ट . मी माडगूळकरांना ` मुक्तांगणा ' चा हेतू सांगितला . वृक्षरोपणाने कार्यारंभाची मुहूर्तपेढ रोवली जाणार होती . त्या कार्याच्या वेळी मला गीत हवे होते ते माडगूळकरांच्याच प्रतिभेतून फुललेले . गप्पागोष्टी चालल्या असतानाच माडगूळकरांनी हातातल्या कागदावर दोन ओळी लिहिल्या :

`आनंदसाधकांनो , या रे मिळून सारे !
मुक्तांगणांत या रे , मुक्तांगणांत या रे ! ! '

त्यानंतर मग इकडच्यातिकडच्या गप्पागोष्टी झाल्या . घरी परतल्यानंतर तासाभरातच फोन वाजला . पलीकडून माडगूळकरांचा आवाज आला : "" घ्या , तुमचं गाणं तयार आहे . कागद - पेन्सिल घ्या .

`आनंदसाधकांनो , या रे मिळून सारे !
मुक्तांगणांत या रे ! !
वयवंशधर्मभाषा यांना न ठाव कांही
क्रीडांगणीं कलांच्या हा भेदभाव नाही
मनममोकळेपणे घ्या इथले पिऊन वारे
मुक्तांगणांत या रे . . . . . . . ' ""

गीतांच्या जन्मकाळाशी गुंतलेल्या अशा किती आठवणी . डेक्कन जिमखान्याच्या टेनिस कोर्टाजवळच्या रस्त्यातून जाताना एका विजेच्या खांबापाशी आलो की आठवते : रात्रीचे चित्रिकरण आटपून चालत चालत आम्ही दोघे येत होतो . पहाट होत होती . रस्त्यातले दिवे मालवले . त्या खांबापाशी क्षणभर थांबून माडगूळकर उद््गारले ,

"" विझले रत्नदीप नगरांत !
आता जागे व्हा यदुनाथ . . . ""

लकडी पुलाजवळ जिथे टिळक रोड सुरू होतो तिथेच पंतांचा गोट होता . आता तिथे सिमेंटकॉक्रीटच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत . त्या पंतांच्या गोटात एका दहा गुणिले दहा क्षेत्रफळाच्या खोलीत आमचा तळ असे . किती गीतांचा आणि पटकथांचा जन्म त्या खोलीत झाला आहे हे सांगायला आता ती खोलीही उरली नाही . किती चर्चा , किती नकला किती गाणीबजावणी , किती थट्टामस्करी . . . वाढत्या वयाबरोबर वारंवार आठवणारी गडकऱ्यांची एकच ओळ : ` कृष्णाकाठी कुंडल आतां पहिले उरलें नाही . ' साहित्यकलांच्या नव्या निर्मितीत बेहोश होण्याऱ्यांची तिथे मेफिल जमायची . मला वाटते , यापूर्वी मी कुठेसे म्हटले आहे तेच पुन्हा म्हणतो : ` स्वरवेल थरथरे फूल उमललें ओठीं . . . ' हे माडगूळकरांच्या गीतांच्या बाबतीत सर्वार्थांने खरे आहे . जणू काय लक्ष गीतांची उतरंड त्यांच्या मनात विधात्याने त्यांना जन्माला घालतानाच रचलेली होती . मागणाऱ्याने मागावे आणि एखाद्या फुलमाळ्याने भरल्या
टोपलीतून फूल काढून दिल्यासारखे माडगूळकरांनी अलगद टपोरे गीत काढून द्यावे .

` संसारीं मी केला तुळशीचा मळा ! करदा सावळा पांडुरंग ' आशा ओळींनी सुरूवात होणारा त्यांचा एक अभंग आहे . माणसाला अचंब्यात टाकणाऱ्या माडगूळकरांच्या प्रतिभेने वास्तविक आपल्या मळ्यात नाना प्रकारच्या फुलांची बाग फुलवली होती . ही केवळ चतुर कारागिरी नव्हतीं ; त्यांना नुसतेच एक गीतकार म्हणून कमी लेखणाऱ्यांना नाना प्रकारच्या भाववृतींशी समसर होणारे माडगूळकर ठाऊक नव्हते . गेल्या जवळजवळ तीन तपांच्या सहवासात मला अनेक प्रकारचे माडगूळकर पाहायला मिळालेले आहेत . प्रौढांच्या मेळाव्यात बसलेले माडगूळकर त्यात एखादे पोर आले की एका क्षणात किती देखणा पोरकटपणा करू शकत ! एखाद्या ग्रामीण पटकथेतले संवाद लिहिताना त्यांचा तो माणदेशी शेतकऱ्याचा अवतार
पाहण्यासारखा असे . ते शीघ्रकवी होते तितकेच शीघ्रकोपीही होते . आणि त्या कोपाचा अवसर उतरल्यावर विलक्षण मवाळही होऊन जात . ज्ञानेश्वरीतल्या एखाद्या ओळीवर निरूपण करताना त्यांच्यातला रसाळ पुराणिक दिसायला लागे ; आणि ` एक पाय तुमच्या गावांत ! दुसरा तुरूंगांत किंवा स्वर्गात ! तमा नाहि त्याचि शाहिराला . . . ' असा पवाडा स्फुरायला लागला की अगिनदास - तुळशीदासांच्या वंशाचा दिवा पेटता असल्याची साक्ष पटे . केवळ साहित्यिकां -
साठी साहित्य आणि कवींसाठी कविता लिहिणारा हा कवी नव्हता . कवितेच्या याचकाची जातकुळी किंवा हेतू न पाहता , गीतदान हा जणू आपला कुलधर्म आहे आणि त्याला आपण जागलेच पाहिजे अशा भावनेने त्यांनी कविता लिहिल्या .


हा कवी आपल्या व्यक्तिमत्वात भाववृत्तींच्या इंद्रधनुष्याचे किती खेळ खेळवीत जगत होता . प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळीत असतानाही चटकन कविता , कथा , कादंबरी , पटकथा अशा नाना प्रकारच्या निर्मितीच्या कार्यात तन्मय होऊन जात होता . त्यांच्या गीतांना चाली लावण्याचा योग मला लाभला , ते गीत घडत असताना त्यांचे ध्यान पाहत बसणे हा ते गीत
वाचण्याइतकाच आनंदाचा भाग असे . माडगूळकर उत्तम अभिनेते होते . एखादे कडवे लिहिताना तो भाव सूक्ष्म रूपाने त्यांच्या चेहऱ्यावर दिसे . चित्रपटातला प्रसंग सांगितला की पटकन पहिली ओळ त्यांच्या मुखातून बाहेर पडायची , आणि पेळूतून सूत निघाल्यासारखे कवितेच्या ओळींचे सूत्र प्रकट व्हायला लागायचे . यमकप्रासांसाठी अडून राहिलेले मी त्यांना कधी पाहिले नाही . त्यांची गीते गाताना किंवा वाचताना जर मन कुठल्या एका गुणाने थक्क होत असेल तर त्यांतल्या सादगुणाने . कविह्दयातून रसिकह्दयापर्यंतची कवितेची वाटचाल कशी सहज पण म्हणून काही ती नुसतीच सुबोध नसे . अनेक प्रतिमांचा सुंदर मिलाफ तीत

असायचा ` दूर कुठे राउळांत दरवळतो पूरिया ' असे एक गाणे त्यांनी लिहिले होते . सुरांच्या शाहिरांचा त्यांना वरदहस्त लाभला होता . माडगूळकर महाराष्ट्रातल्या घराघरातच नव्हे , तर झोपडीझोपडीत गेले . ती वाट मराठी मुलखात कविप्रतिभेच्या ह्या त्रेगुण्यात्मक शेलीने घडवली होती यात शंका नाही . सर्व अंगानी आणि सर्व गुणांनी त्यांनी मराठी भाषा पचवली होती . त्यांच्या गद्य किंवा पद्य भाषेला अमराठी वळण ठाऊकच नव्हते . ज्या ग्रामीण वातावरणात ते वाढले तिथल्या पारावर पवाडा असतो , देवळात पंतवाङ्मयाचा विदग्ध स्वरूपातला शब्दश्रीमंतीचा खजिना मोकळा करीत कथेकरीबुवा येत असतात , आणि जत्रेच्या रात्री कड्या - ढोलकीच्या साथीत पायांतल्या घुंगरांशी स्पर्धा करीत श्रृंगारिक शब्दांचेही ता थे तक्् थे चाललेले असते . सुगीच्या दिवसांत पाखरांच्या थव्यांबरोबर लोकगीते गाणारे भटके कलावंतही भाषेचा एक न्यारा रांगडेपणा घेऊन येत असतात . सारे गाव ह्या संस्कारांत वाढत असते . माडगूळकरांच्या बालपणी हा असर अधिक होता . पण तो रस साठवणारे पात्र सर्वांच्याच अंतःकरणात नसते . जीवनातल्या अनेक अंगांचे नाना प्रकारांनी दर्शन घडवणाऱ्या संत - पंत - शाहीर - लोककलावंत असणाऱ्या गुरूजींनी ह्या देशात शतकानुशतके ही खुली विद्यापीठे चालवली आहेत . मात्र त्या
विद्यापीठांना माडगूळकरांसारखा एखादाच त्या परंपरेला अधिक समृध्द करणारा विद्यार्थी लाभतो . आपल्या गीतांना त्यांनी आपल्या आईच्या ओव्यांची दुहिता म्हटले आहे . ह्या ` आई ' शब्दात ग्यानोबा - तुकोबा ही माउलीपदाला पोचलेली मराठी संतमंडळी आहेत इतकेच नव्हे , तर ` तुलसी - मीरा - सूर - कबीर ' ही आहेत . म्हणूनच त्यांच्या कवितेतला प्रसाद सर्वांच्यपर्यंत पोचतो आणि तिचे नाते मानवतेच्या प्रेमाने ओथंबलेल्या प्राचीन आणि सुंदर परंपरांशी जुळताना आढळते . हे केवळ त्यांच्या अभंग किंवा भक्तिपर रचनेतच होते असे नाही . एका चित्रपटात त्यांनी एक धनगरी गीत लिहिले आहे :



"" आसुसली माती
पिकवाया मोती
आभाळाच्या हत्ति आता
पाऊस पाड गा
पाऊस पा ड ""



ही कविता लिहून झाली त्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो होतो . सुधीर फडक्यांनी त्या गीताला सुंदर चाल दिली आहे . "" ध्येसपांडेगुर्जी , ऐका . . . "" म्हणून त्यांनी ते गाणे वाचायला सुरूवात केली . सुरांचा संबंध नव्हता . छंदातच वाचन चालले होते . आवेश मात्र धनगराचा . अशा वेळी त्यांच्यातल्या त्या अभिनयगुणाचे आश्यर्य वाटायचे . क्षणार्धात त्या कवितेतल्या धनगरांतले ते धनगर होऊन गेले . त्या गाण्यातल्या ` पाऊस पाड गा ' मधले ` गा ' हे संबोधन ऐकल्यावर ` गा ' , ` वा ' , ह्या साऱ्या संबोधनांतले मऱ्हाटीपण डोळ्यांपुढे नाचायला लागले . त्या एका नेमक्या ठिकाणी पडलेल्या ` गा ' मुळे ` एकनाथ - धाम ' नावाच्या प्रभात रस्त्यावरच्या घरातली ती चिमुकली खोली माणदोशातला उजाड माळ होऊ नगेली . योग्य ठिकाणी पडलेल्या नेमक्या शब्दाला मंत्रसामर्थ्य प्राप्त होत असते . मर्ढेकरांच्या ` फलाटदादा ' तल्या ` सांगा वे तुमि फलटदादा ' मधल्या ` वो ' ने जसे त्या रेल्वेच्या फलाटाला मुंडासे बांधून खांद्यावर कांबळे टाकून उभे केले , तेच ह्या ` गा ' ने केले होते . भाषेचे प्रभुत्व हे शब्दसंग्रहावरून किंवा शब्दांचे नुसतेच खुळखुळे वाजवण्याच्या करामतीतून जोखायचे नसते . मुळचाचि खरा असणारा झरा हा असा एखाद्या चिमुकल्या शब्दाने अवचित भेटत असतो .


गीतभावनेशी तादात्म्य पावण्याच्या त्यांच्यामधल्या गुणांच्या असंख्य खुणा त्यांच्या गीतांतून आढळतात . शब्दयोजनेतले त्यांचे अवधान सुटत नाही . अशी शेकडो गीते त्यांनी रचली . चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिल्यामुळे आमच्या` आर्डरी ' ही विचित्र असायच्या ` आर्डरी ' हा त्यांचाच शब्द . कधीकधी चाल सुचलेली असायची .

"" स्वामी , असं वळण हवं . ""
"" फूल्देस्पांडे , तुम्ही बाजा वाजवीत राहावे . ""

मित्रांच्या नावांची गंमत करणे हा त्यांचा आवडता छंद असायचा . मग मधुकर कुळकर्ण्याला ` पेटीस्वारी ' , राम गबालेला ` रॅम्् ग्लाबल , ' वामनराव कुळकर्ण्यांना ` रावराव ' . . कुणाला काय , कुणाला काय असे नाव मिळायचे . चाल पेटीवर वाजवत बसल्यावर चटकन त्या चालीचे वजन त्यांच्या ध्यानात येई . मग त्या तालावर झुलायला सुरूवात . बेठकीवर उगीचच लोळपाटणे , पोटाशी गिरदी धरून त्याच्यावर चिमट्यात अडकवलेल्या कागदाचे फळकूट पुढ्यात ठेवून सुपारी कातरायला सुरूवात . मग आडकित्याची चिपळी करून ताल . . . नाना तऱ्हा . एखाद्या अचानक तिथे आलेल्या नवख्याला वाटावे , इथे गीत आकाराला येते आहे , की नुसताच पोरकटपणा चाललाय ! एखादे दांडगे मूल पाहावे तसे वाटत असे . त्यांच्यातला नकलावर जागा झाला की मग तो मूलपणा पाहावा . खरे तर मानमरातबाची सारी महावस्त्रे फेकून शेशवात शिरलेल्या माणसाचे ते दर्शन असायचे . ह्या स्वभावगत मूलपणाने त्यांना खूप तारलेले होते . प्रापंचिक जबाबदाऱ्या फार लवकर त्यांच्या अंगावर पडल्यामुळे विशीतच फार मोठे प्रौढपण त्यांच्यावर लादले गेले होते , त्यातून ही मूलपणाकडची धाव असायची की काय , ते आता कोणी सांगावे ? गडकरी गेले त्या वेळी रसिक महाराष्ट्र असाच सुन्न झाला होता म्हणतात . माडगूळकरांना गडकऱ्यांविषयी अतोनात प्रेम . आम्ही जोडीने केलेल्या प्रवासात गडकऱ्यांच्या कलितांचेच नव्हे तर , नाटकांतील उताऱ्यांचे पठण हा आमचा आवडता छंद असायचा . हरिभाऊ आपटे , नव्हे , तर नाथमाधव , गडकरी , बालकवी , केशवसुत , फडके , खांदेकर , अत्रे ह्या आधुनिक काळातल्या साहित्यकारांते मार्ग पुसेतु आम्ही ह्या साहित्यांच्या प्रांतात आलो . मी मुंबईत वाढलो आणि माडकूळकर माडगुळ्यात वाढले , तरी आमच्या साहित्यप्रेमाचे पोषण एकाच पध्दतीने चाललेले होते . गडकऱ्यांच्या निधनानंतर वर्षभराच्या आतच आमचा जन्म , माडगूळकर माझ्यापेक्षा फक्त एक महिन्याने मोठे . बालपणातले आमचे इतर वातावरण मात्र निराळे होते . ` त्या तिथे ,
पलिकडे , तिकडे , माझिया प्रियेचे झोपंडे ' ही कविता प्रथम त्यांच्या तोंडून ऐकल्यावर मी म्हणालो होतो , "" महाकवि , तुम्ही लकी ! ( माडगूळकर मात्र स्वतःला ` महाकाय कवी ' म्हणत . ) तुमच्या प्रियेच्या झोपड्याकडे वळताना त्या वळणावर आंब्याचं वाकडं झाड होतं . आम्ही वाढलो त्या वातावरणातल्या वळणावर जळाऊ लाकडांची वखार ! "" पण सुदेवाने मी मुंबईत वाढूनही तसा मुंबईकर नव्हतो . शाळकरी वयातल्या माझ्या खूप सुट्या कोल्हापुराजवळच्याच एका खेड्यात माझ्या आत्याच्या गावी मी घालवल्या . शिवाय माझ्या लहानपणीचे पार्लेही एक खेडेवजाच गाव होते . माझ्या घराच्या मागल्या बाजूला पावसाळ्यात भातशेती चालायची . ज्याला हल्ली ` प्लॉट््स ' म्हणतात ती सारी भाताची खाचरे किंवा दोडक्यांचे , पडवळांचे आणि काकड्यांचे मळे होते . फर्लांगभर अंतरावरच्या विहिरीवर मोट चालायची . आजच्यासारखे चारी बांजूना सिंमेट - कॉक्रीटचे जंगल उभे राहिले नव्हते . आमच्या शनिवार - रविवारच्या सुट्या आंब्याच्या मोसमात बागवानांच्या नजरा चुकवून केऱ्या पाडणे , गाभळलेल्या चिंचाच्या शोधात भटकणे , घरामागल्या आज भुईसपाट झालेल्या टेकडीवर काजू तोडायला जाणे , विहिरीत मनसोक्त पोहणे , असल्या मुंबईकर मुलांच्या नशिबात नसलेल्या गावंढ्या उद्योगांतच जायच्या . पण आपल्याला आमचे म्हणून सांगण्यासारखे खेडे नाही याची मात्र मनाला खूप खंत वाटे .पण मुंबईकर असूनही आमचे कुटुंब तसे घाटीच होते . त्यामुळे माडगूळकरांच्या ग्रामीण प्रकृतीने मला चटकन आपलेसे करून टाकले . कोल्हापूर भागातली ग्रामीण बोली फार बाळ - पणापासून माझ्या जिभेवर चढली आहे . एवढेच नव्हे , एकूणच बोलीभाषांतल्या गोडव्याचा मी आजही भक्त आहे . आजही माणसे वऱ्हाडी , सातारी वगेरे भाषांत बोलत असली तर गाणे ऐकल्यासारखे मी त्यांचे बोलणे ऐकतो . किंबहुना अडाणीपणा दाखवण्यासाठी त्या बोलीचा उपयोग केलेला मला रूचत नाही . कोकणी बोलणाऱ्यांशी मी कोकणीतच बोलतो . ह्या बोलींना लेखीच्या कृत्रिम बंधनात जखडू नये , श्वासाश्वासातूनच त्यांचा व्यवहार चालावा , असे मला वाटते . माडगूळकरांना केवळ सातारी - कोल्हापुरीच नव्हे , तर त्या भागातल्या निरनिराळ्या बोलींतल्या सूक्ष्म छटाही अवगत होत्या . शब्दांचे रंगढंग ते क्षणात कंठगत करीत . एक काळ असा होता की तासन््तास आमचे संभाषण सातारी बोलीतच चाले . कधी कोकणी ढंगात . प्रथम ज्या बोलीतून सुरूवात व्हायची त्याच बोलीत संवाद चालू .


"" कवा आलायसा म्हमयस्नं ? "" म्हटले की , "" येरवाळीच आलु न्हवं का रातच्या
पाशिंदरनं . ""
"" काय च्या ह्ये जहालं का न्हाई ? "" ह्या थाटात फाजिलपणा सुरू .

` पुढचं पाऊल ' चित्रपटाच्या वेळी आम्ही संवाद लिहित होतो . माडगूळकरांनी एक पार्ट घ्यायचा , मी दुसरा , प्रभाकर मुझुमदार संवाद टिपून घ्यायचा . आम्ही दोघेही नकलावर असल्यामुळे सोंगे वठवायला वेळच लागत नसे . त्या चित्रपटाचे शूटिंग हा तर दोनअडीच महिने त्या स्टुडिओत चाललेला सांस्कृतिक महोत्सवच होता . प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी
आयत्यावेळचे इतके संवाद बोलले जायचे , की शेवटी रेकॉर्डिस्ट शंकरराव दामले म्हणायचे , "" रिहर्सलच्या वेळी बोललेलंच येणार आहे की शेवटी गाववाले ? "" त्या वेळी ` काय गाववाले ' हे कुणीही कुणालाही हाक मारण्याचे सार्वजनिक संबोधन होते . गेल्या कित्येक वर्षांत मी चित्रपटांच्या स्टुडिओत गेलो नाही . ते गाव एके दिवशी सोडले ते सोडलेच . त्यानंतर त्या दिशेने अनेक आमंत्रणे आली . - पण नाही जावेसे वाटले . आता तिथे काय आहे , मला ठाऊक नाही . पण पंचवीसेक वर्षांपूर्वी पुण्यातल्या ` प्रभात ' , ` नवयुग ' , ` डेक्कन ' वगेरे स्टुडिओत
चित्रपटनिर्मिती होत होती त्या वेळी स्टूडिओ हे जणी साहित्या - संगीत कलांचे मीलनक्षेत्र होते . मी आणि माडगूळकर ज्या काळी पुण्यात आलो तो काळ ह्या क्षेत्रात आर्थिक दृष्टीने मुळीच लाभदायक नव्हता . ` प्रभात ' चा संसार कोलमडला होता . ` नवयुग ' स्टुडिओचेही तेच . पलीकडे ` डेक्कन ' स्टुडिओ होता . आता त्या ठिकाणी तेलाच्या गिरण्या वगेरे आल्या आहेत . पेशाच्या दृष्टीने ते दिवस ओढगस्तीतेच . निर्मातेमंडळीत तर चित्रपट म्हणजे कलानिर्मितीचे क्षेत्र मानून धडपडणाऱ्या आमच्यासारख्या येडपटांना पेशात बनवायची चढाओढच लागलेली होती . दिवसावारी येणाऱ्या एक्स्ट्रांपासून ते लेखक , संगीतदिग्दर्शक , नट वगेरेंना ` बुडपणे ' हा मुळी नियमच होता . ठरलेले पेसे देणे हा अपवाद . इतके असूनही त्या स्टुडिओची ओढ जबरदस्त . प्रसिध्दीच्या झगमगाटापेक्षा तिथले वातावरण अधिक आकर्षक असायचे . शिवाय
मराठी चित्रपटात प्रसिध्दीचा तरी कसला कर्माचा झगमगाट ! एक रंगीत पोस्टर करायचे म्हणजे निर्मात्याने त्यापूर्वी ज्याचे पेसे बुडवले नसतील असा होतकरू पेंटर पकडून त्याला चान्स द्यायचा ! पण माडगूळकरांच्या सहवासातल्या तिथल्या मेफिलीत लाभणाऱ्या आनंदाला तोंड नव्हती . मला तर नेहमी वाटते की , माडगूळकरांच्या तोंडून चित्रपटकथा ऐकताना
होणारा आनंद ती पडद्यावर पाहताना मिळाला असे क्वचितच घडले . नाना प्रकारच्या अनुभवांच्या पुड्या तिथे सोडल्या जायच्या . वादविवाद रंगायचे . नव्या कवितांचे वाचन चालायचे . सिनेमावाले असलो तरी मनांची पाळेमुळे साहित्यात , अभिजात संगीतात , उत्तम नाटकांत रूजलेली . तशी सगळीच हुन्नरी मंडळी . आजही डोळ्यांपुढे त्या मेफिली उभ्या राहतात . राजाभाऊ परांजपे , राम गबाले , वसंत सबनीस , ऑफिसला मारलेली टांग सायकली -
वर टाकून आलेले वसंतराव देशंपाडे , हळूच एखादी कोटी करून आपण त्यातला नव्हेच असा चेहरा करून बसलेले बाळ चितळे , अप्पा काळे , ग . रा . कामत , गोविंदराव घाणेकर , सुधीर फडके , बहुगुणी वसंत पवार , अस्सल कोल्हापूरी साज भाषेला चढवून बोलणारे वामनराव कुलकर्णी , गुपचूप बोलल्यासारखे बोलणारे विष्णुपंत चव्हाण , सातमजली हसणारे काका मोडक , खास ठेवणीतून टाकल्यासारखे एखादेच मार्मिक वाक्य टोकणारे शंकरराव दामले ,
कथेतल्या कच्च्या दुव्यावर नेमके बोट ठेवणारे राजा ठाकूर . . . .


पुण्यातला चित्रपटव्यवसाय विसकटला . काहींना काळाने ओढून नेले . माणसे पांगली कायमची हरवली . मेफिली संपल्या . आता तर त्या मेफिलींचा बादशहाच गेला . त्या मेफिलींची ओढ विलक्षण होती . एक तर आमच्या दरिद्री स्टुडिओतली कॅमेऱ्यापासून ते रेकॉर्डिंग मशिनपर्यंतची सारी यंत्रसामुग्री चालण्यापेक्षा मोडून पडण्याचच अधिक तत्पर . अशा वेळी सारे स्थिरस्थावर होईपर्यंत करायचे काय ? अपरात्र झालेली असायची . दरिद्री स्टुडिओचा दरिद्री कँटीन . तिथून येणारा चहा ही जास्तीत जास्त चेन . पण मेफिलीचा रंग असा गहिरा , कडूगोड अनुभवांच्या पोतड्या तुडुंब भरलेल्या . माडगूळकरांनी गावाकडल्या गोष्टी सुरू कराव्या आणि मेफिलीने त्या अवाक होऊन गोष्टी ऐकाव्या . असेच एकदा ते औंध संस्थानातल्या गरीब विद्यार्थ्यांच्या छात्रालयातल्या गोष्टी सांगत होते . घटकेत मुलांची बौध्दिक आणि शारीरिक सुदृढता तपासणारे , त्यांच्या हिताची काळजी करणारे औंधकरमहाराज त्यांनी डोळ्यांपुढे उभे केले होते .

माडगूळकरांचे माडगूळ्याइतकेच औंधावर प्रेम . त्या चिमूटभर संस्थानात विद्यार्थिदशे - तल्या माडगूळकरांना फार मोठा सांस्कृतिक धनलाभ झाला होता . तिथे नुसतेच अन्नछत्र नव्हते ; ज्ञानछत्रही होते . फार मोठ्या अंतःकरणाच्या , त्या वरपांगी करड्या वाटणाऱ्या राजाच्या हाताची दणकट थाप त्यांच्या पाठीवर पडली होती . ती ऊब त्यांनी आयुष्यभर जिवापाड जपली होती . किंबहुना सिनेमात नशीब काढायला माडगूळकर आले त्या वेळी त्यांना ` औंझकर ' असेच म्हणत . बेचाळिसच्या सुमाराला त्यांची - माझी पहिली भेट झाली त्या वेळी औंधकराचे माडगूळकर झाले होते .` नाट्यनिकेतना ' त वल्लेमामा म्हणून तबलजी होते . त्यांचे वास्तव्य कोल्हापुरात असे . मी आणि माडगूळकर फिरायला चाललो असताना वाटेत एकदा वल्लेमामा भेटले . त्यांनी माडगूळकरांना "" कसं काय औधंकर ? "" म्दटल्यावर मी
जरासा चपापलोच . मग मलामाडगूळकरांनी ` औंधकर ' नावाची कथा सांगितली . औंधकर - काळातले त्यांचे चित्रपटसृष्टीतले अनुभव त्यांनी लिहिले आहेत . काही व्यक्तींचे आणि स्थळांचे स्मरण त्यांना चटकन भूतकाळात घेऊन जाई . मात्र त्या प्रतिकूल काळाचे त्यांनी चुकूनसुध्दा गहिवर काढून भांडवल केले नाही . साऱ्या कडू अनुभवांना त्यांनी थट्टेत घोळून टाकले , आणि वेळोवेळी स्नेहाचा हात पुढे केलेल्या लोकांचे स्मरणही ठेवले . एक मात्र खरे की , गरिबीच्या काळात भोगाव्या लागलेल्या गोष्टींचा त्यांच्या मनावर कुठेही ओरखडा होता . ज्या वयात जे लाभायला हवे होते ते न लाभलेल्यांना नंतर कितीही ऐश्वर्य लाभले तरी कसलेतरी अबोध औदासीन्य मनावर मळभ आणीत असते . सगळ्याच चांगल्या कलावंतांत किंवा भारतीय विचारवंतांतही कलेच्या आणि व्यवहाराच्या क्षेत्रांत व्यवहारिक पातळीवरून सर्व तऱ्हेच्या धडपडी , नाना प्रकारच्या तडजोडी करताना मनाच्या खोल कप्प्यात एक विरक्त दडलेला असतो असे मला वाटते . माडगूळकरही याला अपवाद नव्हते . कधीकाळी बाळझोपेतून जागे होताना कानांवर पडलेली एकतारी त्यांच्या मनात सतत वाजत होती . ते काही कुणी षड्रिपू जिंकलेले किंवा सहजपणाने ` मी ' पण गळलेले संत नव्हते . प्रतिभावंत होते . सर्वस्वी मुक्त असा कोणीही नसतो . माडगूळकांनाही रागलोभद्वेषमत्सर सर्व काही होते . फक्त कुठला रिपू कुठल्या जोमाने उभा
आहे हेच माणसाच्या स्वभावाचे लक्षण शोधताना पाहायचे असते . रामदासांसारखा समर्थ माणूसदेखील ` अचपळ मन माझें नावरे आवरीतां ' असे असहायपणाने म्हणतो . तुकोबाही ` काय करूं मन अनावर ' म्हणताना भेटतात . पण हे सारे असूनही माणसात एक ` अंतर्यामी ' म्हणून असतोच . माडगूळकरांच्या आणि माझ्या सहवासात आम्ही ऐन उमेदीच्या आणि हौसेच्या काळात अविदितगतयामा अशा रात्री घालवल्या आहेत . मनाच्या खोल अज्ञात घळीतल्या अंतर्यामी अशा वेळी बोलत असतो . हा खरे तर आपुला संवाद आपणासी असाच असतो . त्या संवादातून माडगूळकरांचा एकतारी सूर प्रकट व्हायचा . कदाचित ती खुंटी पिळणारे हात ज्ञानदेव - एकनाथ - तुकोरामांचे असतील . कुणी त्या क्षणांना तो त्या वेळचा त्यांचा ` मूड ' असेल असेही म्हणून विश्लेषण केल्याचे समाधान मानील . काही का असेना , त्या ` मूड ' मझले माडगूळकरांचे दर्शन खूप परिणामकारक असे .

"" श्रीधर कविचे नजिक नाझरें नदी माणगंगा !
नित्य नांदते खेंडे माझें धरूनि संतगंगा ! ! ""


अशी त्यांची एक कविता आहे . माडगूळकरांचे खेडे संतसंगाला धरून नांदत असायचे की नाही याला महत्व नाही : माडगूळकरांच्या मनात मात्र संतसंगाला धरून नांदणारा गाव वसला होता यात शंका नाही . श्रीधर कवीचे त्यांच्या मनात कायमचे अधिष्ठान होते . माणगंगेच्या तीरी आपला जन्म होण्यात काही योगायोगा असावा , असेही त्यांच्या भाविक वृत्तीला वाटत असावे . त्यामुळे व्यावहारिक जगात वावणाऱ्या माडगूळकरांची आणि श्रीधर कवीला संगे ` मूड ' मधले माडगूळकरांचे दर्शन खूप परिणामकारक असे .


` श्रीधर कविचें नजिक नदी माणगंगा !
नित्य मांदते खेडें माझे धरूनि संतगंगा ! ! ""


अशीं त्यांची एक कविता आहे . माडगूळरांचे खेडे संतसंगाला धरून नांदत असायेच की नाही याला महत्व नाही ;माडगूळकरांचे मनात मात्र संतसंगाला धरून नांदणारा गाव वसला होता यात शंका नाही . ह्या श्रीधर कवीचे त्यांच्या मनात कायमचे अधिष्ठान होते . माणगंगेच्या तीरी आपला जन्म होण्यात काही योगायोग असावा , असेही त्यांच्या भाविक वृत्तीला वाटत असावे . त्यामुळे व्यवहारिक जगात वागणाऱ्या माडगूळकरांची आणि श्रीधर कवीला संगे घेऊन वागणाऱ्या माडगूळकांची रस्सीखेचही चाललेली दिसायची . जीवनातल्या श्रेयस आणि प्रेयस वृत्तींचा हा सनातन झगडा आहे . ह्या रस्सीखेचीतमाणूस कधी प्रेयसाच्या किंवा ऐहिक लाभाच्या दिशेला ओढला गेला तर त्याला तेवढ्यासाठी बाद ठरवण्याची गरज नाही . माणूस संपूर्णपणे ओळखणे ही एक दुरापास्त गोष्ट आहे . पण निर्मितिक्षम कलावंताचे अंतर्मन सतत कुठे ओढ घेत असते ते त्याच्या कलाकृतीतून प्रकट झाल्यावाचून राहत नाही . कलावंताच्या निर्मितीची त्याच्या व्यवहारिक आचरणाशी नेहमीच सांगड घालता येत नाही . खरे तर ती घालण्याचा प्रयत्नही करू नये . कवितेत तारूण्यसुलभ भावनांचा रसरसीत अविष्कार करणाऱ्या माडगूळकरांना अकाली पोक्तपणा आला होता , नव्हे , परिस्थितीने तो त्यांच्यावर लादला होता . चित्रपटाशी माझा संबंध तुटला . भेटीगाठींमध्ये महिन्यामहिन्याचे अंतर पडू लागले . मात्र ` फार दिवस झाले , माडगूळकरांची गाठ पडली नाही . एकदा भेटायला हवं , ' असे सतत वाटायचे . आणि मग गाठ पडली की मधला न भेटण्याचा काळ हा काठी मारल्यामुळे वेगळ्या झालेल्या पाण्यासारखा वाटायचा . असाच एकदा खूप दिवसांच्या अंतरानंतर त्यांच्या घरी गेलो होतो माडगूळकरांच्या मातुःश्रींना ओळख लागली नाही . मग अण्णांनी त्यांना ओळख पटवून दिली . आई म्हणाल्या , "" हे काय बरं ? अधूनमधून दिसत असावं बाबा ! "" त्यांचे ते ` दिसतं असावं ' मनाला एकदम स्पर्श करून गेले . जिथे या ना त्या कारणाने ऋणानुबंध जुळलेले असतात तिथे नुसते ` असणे ' याला महत्व नसते ; अशा माणसांनी एकमेकांना ` दिसत असायला ' हवे . अशा अहेतुक दिसण्याला माणसामाणसांच्या संबंधात फार महत्व असते .
आपली माणसे ` आहेत ' एवढेच गृहित धरून चालत नाही . काळ त्यांना ` न दिसणारी ' केव्हा करून टाकील ते सांगता येत नाही ! पुन्हा कधीही न दिसण्याच्या महायात्रेला माडगूळकर असे चटकन निघून जातील असा स्वप्नात , सुध्दा विचार आला नव्हता . चारपाच दिवसांपूर्वीच ह्या आनंदवनातल्या वृक्षारोपणा - साठी ` कोवळ्या रोपट्या आज तूं पाहुणा ' ह्या त्यांनी लिहिलेल्या गाण्याची चाल मी त्यांना फोनवरून ऐकवली होती . "" तिथं जायला हवं . "" असे त्यांनी म्हटल्यावर "" चलता का ? बरोबर जाऊ या "" असे मी त्यांना म्हणालो होतो . बरोबर कुठले जाणे ? ते गाणे बरोबर घेऊन जाताना त्या संध्याकाळी दर्शन घडले ते चिरनिद्रित माडगूळकरांचे . चौतीसएक वर्षापूर्वींची अशीच एक संध्याकाळ . ह्याच पुण्यात ` भानुविलास ' हे नाटकाचे थिएटर असताना आवारात एक लहानसे औटहाऊस होते . ` युध्दाच्या सावल्या ' हे माडगूळकरांचे नाटक चिंतामणराव कोल्हटकरांनी बसवले होते . त्या औटहाऊसमध्येच चिंतामणरावांनी माझी आणि माडगूळकरांची गाठ घालून दिली होती . त्याच्या कितीतरी वर्षे आधी कोल्हापुरातल्या सोळंकुरमास्तरांच्या ` यशवंत संगीत विद्यालया ' त शाळकरी वयाच्या विद्याबाईकडून ` वद यमुने कुठे असे घनश्याम माझा ' हे गाणे ऐकताना प्रथम माडगूळकर हे नाव ऐकले होते . त्यानंतर ` ललकारी राया माझा गे मोटेवरी ' , ` नको बघूस येड्यावाणी ग , तुझ्या डोळ्यांचं न्यारं पानी ' अशी कितीतरी त्यांची गाणी पुरूषोत्तम सोळंकुरकरांकडून मी शिकलो होतो . ` भानुविलास , ' मधल्या त्या औटहाऊसमध्ये आम्ही प्रथम भेटलो तेच जुन्या
ओळखीचे मित्र भेटल्यासारखे . पुण्यातल्या अनोळखी रस्त्यांतून हिंडत हिंडत आमच्या गप्पा चालल्या होत्या . मेफिल सुरू झाली होती - ती गेली इतकी वर्षे चालूच होती . ` पहिल्या पाळण्या ' तला त्यांचा बापाचा अभिनय पाहून माडगूळकर हे कुणीतरी साठीतले गृहस्थ असावेत असा समज झाला होता . ` ब्रम्हचारी ' त तर त्यांनी लहानसहान कितीतरी भूमिका केलेल्या आहेत . अनेक वर्षांनी पुन्हा ` ब्रम्हचारी ' पाहताना त्यात निरनिराळ्या सोगांत सजलेले माडगूळकर शोधून काढीत होतो . . . त्यानंतरच्या काळात आमच्या किती मेफिली रंगल्या त्याचा हिशेब नाही . जीवनात वाट्याला येणाऱ्या मळ्यांच्या आणि माळांच्या वाटा कितीतरी वर्षे जोडीने तुडवल्या . कधी दूरदूरच्या बांधांवरून हाका देत तुडवल्या . आता सारे संपले . आता उरले माडगूळकर नसलेल्या जगात जगणे . त्यांच्याविषयी भूतकालवाचक क्रियापदात बोलणे . ज्या ओळींनी अंगावर आनंदाचे रोमांच उभे केले त्या ओळीच्या स्मरणाने व्याकुळ होणे . ज्या थट्टाविनोदांनी पोट धरधरून हसलो त्यांच्या आठवणींनी फुटणाऱ्या हसण्याला शोकाची चौकट येणे . आमच्यांत कित्येक बाबतीत मतभिन्नता होती . सुरूवातीच्या काळात कॉलेजचे शिक्षण झालेल्या स्त्रीपुरूषांच्या एकत्र मेळाव्यात वागताना ते काहीसे परकेपणाने वागत . अशा समुदायाविषयी त्यांचे काही प्रतिकूल पूर्वग्रह असत . मग त्यांचा धाकटा भाऊ अंबादास याच्या
कॉलेजमधल्या मित्रांबरोबर येणाऱ्या मेत्रिणीही त्यांचा वडीलभावासारखा सहजपणाने मान राखू लागलेल्या पाहिल्यावर त्यांच्या मतात खूप फरक पडला होता . त्यांची मुले - मुली कॉलेजात जाऊ लागली . कॉलेजची पायरी न चढलेल्या माडगूळकरांना कॉलेजच्या संमेलनाला अध्यक्ष होण्याची आग्रहाची निमंत्रणे येऊ लागली . मर्ढेकरांच्या कविता प्रथम प्रसिध्द झाल्या होत्या ,
त्या काळातही त्या कवितेविषयी आमचे खूप वादविवाद व्हायचे . खुद्द मर्ढेकरांनी त्यांची ` जत्रेच्या रात्री ' ही कविता वाचल्यावर त्यांचे मनापासून कौतुक केले होते . पण माणसा - माणसांच्या जीवनातल्या तारा मतभिन्नतेला ओलांडून जुळून येणाऱ्या असतात . हा नेमका काय चमत्कार असतो हे कविकुलगुरूंनाही उमगले नाही . म्हणून तर त्या जुळण्यामागल्या अंतरीच्या हेतूला ` को पि ' म्हणजे ` कसलासा हेतू ' म्हणून त्यांनी हात टेकले . असल्या ह्या सौहार्दाने जुळलेले आमचे धागे . त्यांत केवळ माडगूळकरांच्या कविताप्रतिभेचे आकर्षण नव्हते . आणखीही खूप काही होते . नित्य भेटीच्या आवश्यकतेच्या पलिकडले .


महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत . इतर काहीही देणाऱ्या माणसापेक्षा समाजाला गाणे देणाऱ्या माणसाचे उपकार फार मोठे असतात . ` Song has the lognest life ' अशी एक म्हण आहे . एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते . एवढेच कशाला ? माणसाच्या मनाचे लहानमोठे , रागद्वेष घटकेत घालवून
टाकण्याचे गाण्याइतके दुसऱ्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते . हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते . एक विशाल ह्दय ते गाणे गात असते . माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली . चित्रपटांना दिली , तमाशाच्या फडात , देवळात , शाळेत , तरूणांच्या मेळाव्यात, माजघरात , देवघरात , शेतामळ्यांत , विद्वज्जनपरिषदेत . . . त्यांच्या गाण्यांचा संचार नाही कुठे ? माडगूळकरांचे चिरंजीवित्व त्यांच्या गाण्यांनी सिध्दच झाले आहे . व्यक्तिशः मला तर माडगूळकरांचे स्मरण करणे म्हणजे माझ्या पंचविशिपासून ते आता साठीकडे वळलेल्या माझ्याच आयुष्याकडे पुन्हा वळून पाहण्यासारखे वाटते . आम्ही काम केलेला एकादा जुना चित्रपटच पुन्हा पाहण्यासारखे त्यातली माडगूळकरांची भूमिका आणखी खूप पाहायला मिळणार अशी आशा होती . कवितेच्या त्या जिंवत झऱ्यातून अजून कितीतरी ओंजळी भरभरून प्यायला मिळणार आहेत अशी खात्री होती . प्राणान्तिक संकटातून ते वाचले होते . इडापीडा टळली असा भाबड्या मनाला धीर होता . आणि अचानक चित्रपटगृहातल्या अंधारात ती बाहेर पडायच्या दरवाजावरची ` एक्झिट ' ची लाल अक्षरे पेटावी , आणि ` म्हणजे एवढ्यात संपला चित्रपट ? ' असे म्हणता म्हणता ` समाप्त ' अशी प़डद्यावर पाटी यावी , असेच काहीसे घडले . त्या अज्ञात ऑपरेटरने कुणाच्या जीवनकथेची ` समाप्त ' ही अक्षरे कुठल्या रिळाच्या शेवटी लिहिली आहेत हे कुणाला कळले आहे ?

मी चित्रपटव्यवसाय सोडून बेळगावला गेल्यावर माडगूळकर मला म्हणाले होते , "" मित्रा ,अशी मेफिल अर्ध्यावर टाकून जाणं बरं नव्हे . "" आम्ही आता काय म्हणावे ? आणि कुणाला म्हणावे ?
शब्द : - 5127
-----------------------------------

4 प्रतिक्रिया:

Abhijeet said...

great job deepak

Pramod Thakar said...

Deepak

Abhinandan, Khupach chhan.
Are he download karata yeil ka?
Tasech Ha evadha blog tu marathit
kasa, kontya software madhe lehilas. (Chukalo type kelas)

Dhnyawad
Pramod Thakar
Pune
pramodthakar@gmail.com

Unknown said...

Thats really good job Deepak.
Nice to be people like u around having the values about our tradition in mind.
Thats really great!!!!!

Unknown said...

Thats really good job Deepak.
Nice to be people like u around having the values about our tradition in mind.
Thats really great!!!!!