पुलंनी या नाटकाबद्दल एका मुलाखतीत सांगितले - होते : 'आता इतकी वर्षं झाली त्या गोष्टीला, की मला तो तपशील आठवतसुद्धा नाही. पण एक विचार माझ्या डोक्यात अनेक वर्षं होता. ज्याप्रमाणं त्यागानं किंवा ध्येयवादानं जगणं हे मूल्य मानलं जातं, त्याप्रमाणं सौंदर्य हे एक मूल्य आहे. पण - आपल्याकडे मात्र अनेकवेळा सौंदर्याचा संबंध चैनीशी जोडला गेला, आनंददायक गोष्टी उगीचच त्याज्य मानल्या गेल्या आणि आनंद त्याज्य मानणारे लोक म्हणजेच सारे सात्विक, ध्येयवादी वगैरे अशी चुकीची - समजूत पुष्कळवेळा झाली. एक त्यागी जीवन आणि एक आनंद देणारं - भोगणारं जीवन म्हणजे गांधीजींसारखा त्यागी महात्मा आणि दुसरा - टागोरांसारखा सौंदर्याला जीवनमूल्य मानणारा आणि तरीही विरागी; अशा दोन वृत्तींचं द्वंद्व नाटकातून परिणामकारकपणे उभं करता येईल, असं मला वाटलं. काही लोकांना अशा तऱ्हेचं द्वंद्व आता - कदाचित ढोबळ वाटेल, तर मी ते मान्य करीन. पण ज्या काळात, ज्या वयात मी ते नाटक लिहिलं, तेव्हा अशा त-हेची दोन वृत्तींमधली द्वंद्वं दाखवली जायची. त्या काळाचा किंवा संस्काराचा हा परिणाम - असेल. त्यामुळे आजच्या हिशेबात 'तुझे आहे - तुजपाशी' हे नवीन नाटक आहे, असं मी म्हणणार नाही. त्यातील शामची भूमिका ही लेखकाची भूमिका आहे. नाटकाचा गाभा विनोदी ठेवल्यानं कोणावर - दुष्टपणानं आरोप ठेवले गेले नाहीत. त्यातल्या आचार्यांची मला चेष्टा करायची नव्हती. त्यांना शेवटी - सहानुभूती दिली, तीसुद्धा जाणीवपूर्वकच.'

जगण्यासाठी त्यातील काकाजींचे तत्त्वज्ञान आजही वेगवेगळे वक्ते आपल्या व्याख्यानातून सांगत असतात. पुलंच्या स्वभावविशेषाचे दर्शन दाखवणारी त्यातील काकाजींची भूमिका आहे. जीवन सुंदर आहे, ते आनंदात जगलं पाहिजे, ही भूमिका घेऊन वावरणारे काकाजी सुखाच्या शिखरावर आहेत. 'लुतफे मैं तुझसे क्या कहूँ जाहिद, हाय कंबख्त ! तू ने पी ही नही!' हे उद्गार मद्याला उद्देशून असले तरी जीवनाशी संबंधित आहेत. आयुष्यातील सुख-दुःखाच्या क्षणाचा उपभोग घेतल्याशिवाय ते कळत नसतं. आध्यात्मिक ग्रंथांच्या नुसत्या पारायणानं आत्मिक आनंद गवसत नसतो. 'आयुष्यभर सकाळी साध्या वरणाबरोबर फोडणीचा भात आणि रात्री फोडणीच्या वरणाबरोबर साधा भात खाऊन कवडी कवडी जोडायची आणि शेवटी 'श्रमसाफल्य' किंवा असंच काही तरी नाव देऊन डेक्कन जिमखान्यावर बंगला नावाची भाड्याची चाळ बांधायची - झाली आयुष्याची इतिकर्तव्यता' हे काकाजींचे उद्गार चाकोरीबद्ध जगणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत.
या नाटकातून पुलंनी प्रेक्षकानुनय केला आहे. आचार्यांचे मनःपरिवर्तन ज्या गतीने होते ते न पटणारे आहे वगैरे त्रुटी समीक्षकांनी काढल्या. सर्वसामान्य प्रेक्षकांना त्यात काही खटकले नाही. पुलंनी एकेठिकाणी म्हटलंय, 'पहिला प्रयोग हाऊसफुल्ल तर होता. सतत दीडशे प्रयोग एकही खुर्ची खाली नव्हती. पंचविसाव्या प्रयोगाबद्दल सत्कारासाठी काही मंडळी आली, तेव्हा त्यांना सहज गमतीनं मी म्हटलं, 'माझ्या साठाव्या वर्षी जर हे नाटक चालू असेल, तर मी स्वतः सत्कार करून घेईन.' आणि विशेष म्हणजे मला साठावं लागलं, त्या दिवशी या नाटकाचे पाच वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग होते. अजूनही खूप चाललंय. मलासुद्धा आश्चर्य वाटतं. कुणीतरी म्हणालं, हा फ्ल्यूक आहे. माझ्या आयुष्यात असे फ्ल्युक्स वारंवार आले!'
'तुझे आहे तुजपाशी'च्या लेखनाची काटेकोर चिकित्सा करून त्यातील उणिवांवर बोट ठेवता येण्यासारखे आहे. तशी सापेक्ष मते असतातच. पुलंचं हे नाटक त्या सगळ्याला तोंड देऊन रसिकमनांवर कायम राज्य करीत राहिलं, एवढं निश्चित.
- रजनीश जोशी
रंजनमूल्य असलेली पुलंची नाटके
असा असामी - पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी गौरवग्रंथ