Saturday, February 19, 2022

जयतु शिवाजी

कुठल्या दूरच्या शतकातल्या कोण्या एका अज्ञात दिवशी
ते ठावूकही नाही मला आज महाराष्ट्रातल्या कुठल्या
डोंगरातल्या अरण्याच्या अंधारात बसलेल्या
हे शिवराज ,
उजळीत तुझे भाळ विजेच्या तेजाने अवतरला होता
एक विचार ,
खंडखंड, छिन्नविच्छिन्न भारत मी एकत्र बांधीन
एका धर्मपाशात ….

परक्या इतिहासकारांनी तुम्हाला केलं होत दस्यू,
केला होता उपहास, तुमच्या पुण्य प्रयान्ताना
म्हणत होते पुन्हा पुन्हा एका लुटारूंचा
निष्फळ प्रयास, थांबव तुझं बरळण असत्यरूपा,
तुझ्या खोटेपणावर विधात्याच्या कधीही खोट्या
न ठरणाऱ्या लिखिताने आज मिळवलाय जय ।।

जे आहे अमर त्याला कधी गाडू शकेल का

तुझी ही कुत्सित भाषा ?
जी तपस्या सत्य आहे तिला रोखू शकणारा
त्रिलोकात कुणी नाही हे जाणतो मी निश्चितपणे ,
हे राज तपस्वी वीरा तुझा हा उदार विचार
भरून राहिला आहे विधात्याच्या भांडारात.
त्यातला एक कण तरी काळ हरवून टाकू शकेल का ?
तुझ ते प्राणार्पण स्वदेश लक्ष्मीच्या गाभाऱ्यातल,
तुझ ते सत्यसाधन कोणाला ठाऊक होत की
चिरयुग युगांतरात होऊन राहिलं आहे ते भारताच धन ?

हे राजबैरागी, अख्यात, अज्ञात राहिलात दीर्घकाळ
डोंगरदऱ्याच्या तळाशी, पण पावसाळ्यातले निर्झर
जसे खडक भेदून उठतात परिपूर्ण होऊन, तसेच
आज बाहेर आलात विश्वलोकाला झाला विस्मय ,
ज्याची पताका झाकीत होती आकाश इतकी वर्ष
ती इतकी लहान होऊन कुठ झाकली गेली होती ?

मी एक कवी, पूर्व भारतातला असाच विचार करीत ,
हे अपूर्व दृश्य पाहतो आहे की ह्या वंगदेशाच्या
अंगणात हि तुझी जयभेरी कुठून कशी निनादू लागली ?

सत्य कधीही मरत नाही - मरत नाही, शत-शतकांच्या
विस्मरणाच्या तळाशी असल तरी मरत नाही,
अपमानाने अस्थिर होत नाही, आघाताने ढळत नाही,
वाटत होत ज्यांना कि जे निःशेष झालंय काळाबरोबर,
स्वतःच्या कर्माच्या पैलथडीवर तेच सत्य आज
अवतरलंय पुन्हा तुझा पूज्य अतिथीचा वेष घेऊन
भारताच्या दारी आजही तोच मंत्र तीच उदार दृष्टी
पाहते आहे एकटक भविष्याच्या मुखाकडे, तिथलं
कुठलं दृश्य पाहते आहे ते कुणी सांगाव ?

हे अशरीरी तपासा तुझी फक्त तपोमुर्ती करून धारण
आज ते सत्य तुझी तीच प्राचीन शक्ती घेऊन
आलं आहे करायला तुझंच काज.
आज तुझी नाही ध्वजा, नाही सैन्य, रण,
अश्वदल, अस्त्र खरतरं आज नाही गाजत,
आकाशाला उन्मत करणार ते हर हर हर ,
फक्त तुझ नाव आज उतरलं आहे खाली
पितृ लोकातून
हे स्वामी ,
त्यांनी केलं आव्हान आणि
क्षणार्धात ह्रीदयास्थानी
तुमच्या,
बसला बंगल्यांचा प्राण ।।
तुला ओळ्खल रे आज तुला ओळखल
तू महाराज.

आठ कोटी वंग-नंदन राजस्व तुझे घेऊन हाती
उभे आहेत आज, ऐकल नाही तेव्हा, आज आला
तुझा आदेश, झुकलं माझ मस्तक कंठा-कंठात
ह्रिदयाहृदयात साठवून ठेवीत होईल एक
सारा भारत देश.

तुझा ध्यानमंत्र, तुझा संदेश, बैराग्याची छाटी,
गरिबांच बळ तीच करून आपली ध्वजा
एक धर्मराज्य होईल ह्या भारतात,
हे महावचन करीन सत्य ,

मराठीर शाये आजि
हे बंगाली
एंक कण्ठे बॉलो
जयतु शिवाजी ।।

मराठयांच्या संगे हे बंगाल्यानो आज
एकसाथ मिळून हा महोत्सव करा .
आज एका सभांगणी
पूर्व,पश्चिम, दक्षिण, उत्तर
अवघा भारत होऊन एक
त्या पवित्र नामाने
आपलाच आपण गौरव करा .

कवी : रवीन्द्रनाथ टागोर
अनुवादक : पु.ल देशपांडे

0 प्रतिक्रिया: